रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

सांस्कृतिक राजधानीतील सुसंस्कृत नेतृत्व

 

क्षमता, गुणवत्ता आणि आकाराने ‘सह्याद्रि’ सारख्या विशाल शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कोकणची सांस्कृतिक राजधानी ‘चिपळूण’सह संगमेश्वरचे आमदार शेखर निकम (सर) यांचा आज वाढदिवस आहे.शिक्षण, सहकार आणि राजकारणाच्या माध्यमातून जनविकासाच्या कामात कार्यरत राहिलेल्या खा. गोविंदराव निकम साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून चालताना काळानुरूप बदल स्वीकारीत शेखर सरांनी ‘पर्यटन आणि पर्यावरण’सारख्या विषयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकारणातून द्वेषविरहित राजकारण साधताना समाजातील सर्वस्तरीयलोकांना प्रामाणिक सहकार्य केल्याचे आमदार होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘पालखी विकासाची’ मधील समाजपयोगी कामांच्या यादीवरून लक्षात येते.अचूक वेळेत मदत करणाऱ्या, जनसामान्यांच्या मनात आपल्या दैनंदिन स्वाभाविक वर्तवणुकीतून ‘आपला माणूस’ अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या आणि ती जपण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शेखर सरांच्या कारकीर्दीचा आजच्या त्यांच्या ५६ व्या अभिष्टचिंतनदिनी घेतलेला हा आढावा.

स्व. आई अनुराधा आणि स्व. वडील गोविंदराव या दाम्पत्याच्या पोटी १ मार्च १९६६ रोजी जन्मलेल्या शेखर सरांचं आजचं शांत, संयत, मनमिळावू, अभ्यासू आणि जनतेच्या अपेक्षांना भिडणारं व्यक्तिमत्त्व संपूर्ण रत्नागिरी जिल्हावासियांना भावतं आहे. जनतेसाठी सदैव उपलब्ध राहण्याची सवय आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातल्या अभ्यासू वावरातून त्यांनी मागील दहा-पंधरा वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात वेगाने आपले स्थान पक्के केले आहे. ते कार्याध्यक्ष म्हणून सह्याद्रि शिक्षण संस्थेचा ३३ माध्यमिक विद्यालये, १८ व्यावसायिक महाविद्यालये, ५ कनिष्ठ महाविद्यालये, ४ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, २ प्राथमिक शाळा असा भव्यदिव्य डोलारा सांभाळत आहेत. सह्याद्रि ही आज महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. तिचे कामकाज पाहण्यासाठी असंख्य मान्यवर सावर्डेत येत असतात. मागील ६५ वर्षांच्या या संस्थेचा, जणू मैलाचा दगड ठरावा असा अलीकडचा विस्तार साकारण्यात सरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

चिपळूण संगमेश्वर मतदार संघ आकाराने मोठा आहे. तरीही आमदार म्हणून शेखर सर चिपळूण तालुक्यासह संगमेश्वरातील देवरुख-मार्लेश्वर पर्यंतच्या विशाल मतदारसंघात सर्वांना सहज उपलब्ध होत असतात. त्यांना भेटायला येणाऱ्यांचे प्रश्न व्यक्तिगत असोत, विकासाचे असोत किंवा शोषित-पिडीत वर्गाच्या हेळसांडीचे असोत अशा सर्वच प्रश्नांची प्रामाणिक उकल करण्याकडे त्यांचा कायम भर असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघाकडेही विशेषत्वाने लक्ष देत आपली ताकद वाढविली होती. तरीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते थोड्या मताने पराभूत झाले. मात्रते निराश होऊन घरी बसले नाहीत. पाहिल्यासारख्याच जोमाने मतदासंघात वावरत राहिले. त्यांनी लोकसंपर्क वाढविला. लोकांच्या अपेक्षांना भिडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून लोकविकासाची प्रलंबित कामे केली. यात विहीर बांधकाम, पाईप लाईन जोडणी, बौद्ध विहार, विंधनविहीर आणि पंप, पाण्याच्या तळ्यांचे बांधकाम, वीज कनेक्शन जोडणी, सभागृह बांधकाम आणि लादीकाम, प्लास्टरकाम, पिकअप शेड बांधकाम, मोऱ्या, पाखाडी, गणपती विसर्जन घाट, संरक्षक भिंत, मंदिर वॉल कंपाऊंड, स्टील मटेरियल पुरवठा, पेव्हर ब्लॉक, सौरउर्जा, मंदिर, ग्रील्स, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, खडीकरण आदींसह अनेक ठिकाणी ग्रामदेवता मंदिरांच्या उभारणी व दुरुस्तीसाठी सहकार्य आदींचा समावेश आहे. कापशी नदीवर बंधाऱ्यांचे जाळे, स्वखर्चातून १७५ विंधन विहिरी त्यांनी बांधून दिल्या. यातून त्यांची ‘जलदूत’ अशी ओळख निर्माण झाली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याचा यशस्वी प्रयोग सरांनी राबविला. निवडून येण्यापूर्वीपासून त्यांनी शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया, पशूपालन आदी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातील अनेक कामांचा धडाका सुरु ठेवल्याने त्यांच्याकडे ‘भावी आमदार’ म्हणून बघायला सुरुवात झालेली होती. आमदार नसताना शेखर सरांनी केलेल्या कामांमुळे आज जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळेच मतदार संघासाठी ते करीत असलेल्या विकासाच्या प्रयत्नांचे रुपांतर जनतेच्या अपेक्षांच्या बदलांमध्ये होणे आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर सरांनी आपल्या मतदारांना, ‘आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन’ अशी दिलेली खात्री त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीतून निश्चित जाणवते आहे.

मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेखर सरांनी कोकण विकासाशी निगडीत जवळपास सारे मुद्दे मांडले होते, भविष्यात त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आपल्या या भाषणात बोलताना त्यांनी, ‘शासनाच्या दुर्लक्षामुळे कोकणात पर्यटन विकास होत नाही’ असे म्हटले होते.कोकणात नद्यांना पूर येतात. यावर उपाय म्हणून रोहा आणि कराड प्रमाणे नद्यांना दोन्ही बाजूंनी भिंती घालून संरक्षण करण्याची मागणी केली होती. कोकणातल्या छोट्या छोट्या खोऱ्यात पाझर तलाव व्हावेत. ‘सिरीज ऑफ बंधारा’ ह्या संकल्पनेची कोकणात आवश्यकता असल्याचे शेखर सरांनी आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे विधिमंडळात आवर्जून सांगितले होते. रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला नसल्याबाबत त्यांनी जाहीर मत व्यक्त केलं होतं.  खाजगी पडीक क्षेत्राचे वातावरण नैसर्गिक आहे. अशा जमिनींवर साग, बांबू, खैर अशी लागवड होण्यासाठी विशेष योजना हवी असा मुद्दाही मांडला होता. प्रक्रिया उद्योगाचे काम कोकणात होत नाही. यासाठी शासनाची भाग भांडवलाची स्कीम आहे. पण मागच्या ५ वर्षात त्याचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी यावेळी कोकण पर्यटन विकास महामंडळ, छोट्या मच्छिमारांच्या समस्या, कोकणात समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्सच्या अंतराचा मुद्दा, कोकण कृषी विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १९९० पूर्वीपासून असलेली जागांची ६ ही संख्या वाढावी, मत्स्य विद्यापीठाची आवश्यकता, एल.ई.डी. मासेमारी बंद करावी, शासकीय ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, रिक्त असलेली पदे, रुग्णालयांची चालू असलेली बांधकामे, काजू बागायतदारांच्या समस्यांसंदर्भात केसरकर समितीचा अहवाल अमलात आणावा, खैराच्या लागवडीची शेतीत गणना व्हावी, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग आदी मुद्दे मांडल्यावर कोकणातले लोक ‘आत्महत्या’ करत नाहीत म्हणून याकडे लक्ष द्यायचे नाही असे न करता याकडे गांभिर्याने पाहावे अशीही भूमिका मांडली होती.

समस्यांचा विचार करता, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघडोंगरी भागात वसलेला आहे. आजही इथे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना सर्वाधिक खराब रस्ता म्हणून कायम खेड ते संगमेश्वरकडे पाहिले गेलेले आहे. या स्थितीत बदल होतो आहे, तो अधिक वेगाने व्हायला हवा आहे. अलीकडचे देवरूख ते संगमेश्वर मार्गाचे झालेले डांबरीकरण अनेकांना सुखावणारे ठरले आहे. मागचं संपूर्ण वर्ष कोरोना संक्रमणाने व्यापलं होतं. अजूनही त्यातून आपली मुक्तता झालेली नाही. अशा स्थितीत शेखर सरांची संवेदनशीलता अनेकवेळा पाहायला मिळाली. प्रसंगी विरोध पत्करून, ‘कृपा करून गावी येण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. आम्ही १४ दिवस क्वारंटाईन राहू’ या चाकरमान्यांच्या आवाहनाला दाद देत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता.

विदेशी वृक्षप्रजाती ही शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमातून वगळायला हवी अशी पर्यावरणप्रेमींची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. तिला शासनस्तरावर वाचा फोडण्याचे काम शेखर सरांनी केले. सामाजिक वनीकरण खाते अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रभर विदेशी वृक्ष प्रजातींची शासकीय कार्यक्रमातून लागवड झाली आहे. विदेशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीचे पर्यावरण, जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू लागलेत. या विदेशी प्रजातींशी जीवसृष्टी एकरूप होत नाही. यातील काही प्रजाती मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेतात. अशा जैवविविधता धोक्यात आणणाऱ्या विदेशी वृक्षांना शासकीय वृक्षारोपण कार्यक्रमातून तसेच निर्मितीतून वगळावे. देशी वृक्षांच्या प्रजातींना जाणीवपूर्वक प्रशासनाने प्राधान्य द्यावे. असा धोरणात्मक बदल शासनाकडून व्हावा, अशी विनंती शेखर सरांनी सप्टेंबर २०२० मध्ये शासनाला केली होती. त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याबाबतच्या सूचनाही महसूल आणि वन विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रधान मुख्य वन संरक्षकांना दिल्या होत्या. कोकणात वणव्याची समस्याही मोठी आहे. चिपळूणातल्या पर्यावरणप्रेमींनी यावर काम करायला सुरुवात करताच शेखर सरांनी वणवा मुक्तगावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याचे जाहीर केले.

मागच्या महिन्यात, किल्ले प्रचितगडच्या जीवघेण्या शिडीच्या दुरावस्थेतेबाबत शेखर सरांनी तातडीने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत दाखविलेल्या तत्परतेची तमाम शिवप्रेमी नक्की दखल घेतील. आपल्याकडे किल्ल्यांसंदर्भात अनेकविध प्रश्नकायम आहेत. मागच्या शिवजयंतीला गोवळकोट बंदरावर मातीत उलट्या गाडलेल्या ४ तोफा गडावर नेण्याचे काम राजे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी अनेकांच्या सहकार्याने पूर्ण केले. जिथे जिथे शिव छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व इतर ऐतिहासिक वास्तू आहेत त्या त्या ठिकाणी आजच्या पिढीतले राजांचे मावळे संवर्धन कामासाठी कार्यरत आहेत. स्वच्छता आणि संवर्धनाचे काम हे मावळे मनापासून, कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि स्वयंस्फूर्तीने करत असतात. शासकीय पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आदींनी त्यात्या ठिकाणी वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळेला किमान एकत्र करून या कष्टाळू मावळ्यांसोबत चहा-पान घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची पद्धत सुरु करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची पद्धत सुरु झाल्यास गडकिल्ल्यांच्या स्वच्छता कामाला अधिक उत्साह येईल. याद्वारे चर्चा घडून आपोआप संवर्धन कामाला गती प्राप्त होईल.

आपल्या भागाचा विकासकरणे हे लोकप्रतिनिधींचे पहिले काम आहे आणि शेखरसर यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.तरीही कालौघात आपल्या कामाचा ठसा उमटावा अशी भरीव कामेही त्यांच्याकडून व्हावीत, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.सकारात्मक राजकीय भूमिका आणि विकासकामांना प्राधान्य या कार्यपद्धतीद्वारे सरांना मतदारसंघात मोठे काम उभे करणे शक्य आहे. कोकणात आणि शेखर सरांच्या मतदारसंघात पुष्कळ देवराया आहे. अपवाद वगळता या देवरायांची आजची स्थिती भयावह आहे. ‘विज्ञानवादी’ युगात मंदिरांच्या निर्मितीसाठी किंवा इतर कारणांन्वये अनेक पुरातन देवराया मुळापासून तोडल्या गेल्या आहेत. यातल्या काही देवराया प्रातिनिधिक स्तरावर म्हणून पारंपरिक देशी वृक्षांच्या माध्यमातून पुन्हा वनसमृद्ध आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. अशा विषयात काम करणाऱ्यांची कोकणात कमी नाही. त्यांना पाठबळ आवश्यक आहे. सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या चिपळूणच्या नाव लौकिकाला साजेसे उपक्रम होण्यासाठीही सर योगदान देत असतात. शहरातल्या सर्वात जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांना त्यांचे सहकार्य असते. वाचनालयाने पनवेल ते पणजी दरम्यानचे सर्वोत्तम वस्तूसंग्रहालय आणि कलादालन प्रकल्प उभारले आहेत. तालुकाभर आजही पुरातन भग्नावशेष इतरत्र विखुरलेले पाहायला मिळतात. हे अवशेष संग्रहालयात एकत्रित यायला हवे आहेत.

चिपळूण शहर आणि तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था धडपडते आहे. चिपळूणला डेस्टीनेशन बनविण्याचे काम हे सर्वांचे आहे. ही संस्था अनेक वर्षे पर्यटन महोत्सव भरवते आहे. याला भरीव शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळायला हवे आहे. चिपळूण हे कोकणातील महत्वाचे मध्यवर्ती केंद्र आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, धबधबे आदी पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी शेखर सरांनी ‘The Happening Kokan’ नावाचा माहितीपट बनवला होता. महामार्ग चौपदरीकरणानंतर मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणचे महत्त्व सर्वाधिक वाढणार आहे. कोकणात पर्यटनाच्या व्यवसायाचा विचार करता येथे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असलेलं ‘पर्यटन माहिती केंद्र’ तयार होणं आवश्यक आहे. चिपळूण तालुक्यात गेल्या पंचवीसेक वर्षांत रोजगारसमृद्धी साधणारा एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. इथल्या हातांना काम देण्याची क्षमता असलेला ‘पर्यटन’ हाच एकमेव व्यवसाय आहे. त्याच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा, प्रत्यक्ष पर्यटनस्थळी विविध सोयी उभ्या व्हायला हव्यात. कोयना अवजलाच्या बळावर बारमाही वाहणाऱ्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या किनारवर्ती भागात पर्यटनाचा अनोखा आधुनिक प्रकल्प आकाराला येऊ शकतो. महामार्गावरचे शहर असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो. कोकण ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. इथल्या महेंद्रगिरी पर्वतात भगवान परशुरामांचा भव्य पुतळा उभारल्यास ते कोकण पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरू शकते. पूर्वी इथल्या पर्यटनप्रेमींनी परशुराम ते गोवळकोट असा रोपवे व्हावा म्हणून सर्व्हे केला होता. त्याला गती मिळायला हवी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या मध्यवर्ती शहरात छोटेखानी थिएटर आवश्यक आहे. अखिल भारतीय तालुकास्तरीय पहिले दैनिक वृत्तपत्र सुरु करणाऱ्या चिपळूणच्या भूमीत आजही माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी एकत्रित बसायला जागा उपलब्ध नाही. समुद्रअभाव असलेल्या चिपळूण शहरातल्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेस मनोरंजनासाठी घराबाहेर पडल्यावर कोठे जावे ? असा प्रश्न पडतो. इथल्या साने गुरुजी उद्यानाचे नूतनीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण ते एकच उद्यान चिपळूणच्या लोकसंख्येला पुरेसे नाही. या शहराची आजची स्थिती ‘इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र’च्या अवस्थेवरून सहज लक्षात यावी.

जनसामान्यांच्या मनातील दैनंदिन विकासाचे प्रश्न मार्गी लावत असताना काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची क्षमता असलेले विषय शेखर सरांकडून मार्गी लागावेत, अशी अपेक्षा आहे. शेखर सरांना महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री’, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा भालचंद्र पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा पुरस्कार, दापोली कृषी विद्यापीठाचा ‘आबासाहेब कुबल’ पुरस्कार आदी पूर्वीच प्राप्त झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, वास्तवाचे भान ठेवत कार्यरत राहणाऱ्या सरांना मतदारसंघात ‘ऑफबीट’ काम करणे अवघड नाही. कोकणातील खाड्यांतून जलवाहतुकीच्या भन्नाट कल्पना त्यांच्याही डोक्यात कायम घोळत असतात. आजच्या वाढदिवसाला दोन दिवस बाकी असताना सरांनी आपल्या मतदारांशी सोशल मिडीयावरून ‘दोन शब्द मनातले’ म्हणत संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोना महामारी आणि आजपासून (१ मार्च) सुरु होणाऱ्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कारण देत जाहीर सार्वजनिक वाढदिवस कार्यक्रम टाळण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले, हे महत्त्वाचे आहे.

सुसंवादी शेखर सरांचा मूळ पिंड राजकीय नाही. त्यांची कार्यपद्धतीही राजकीय दिसत नाही. शेखर सरांच्या जगण्यात वायफळ बडबड किंवा उघड संताप भावना आढळून येत नाही, ही कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे नेतृत्व करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. स्वभावात, बोलण्यात कधीही त्रस्तता येऊ न देता व्यस्त राहाणं ही सरांची खासियतआहे. आपल्या याच स्वभावाने त्यांनी विरोधकांनाही आपलसं केलं आहे. त्यांची आजवरची ही ऊर्जादायी वाटचाल राजकारणात यशस्वी होऊ पाहणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शक आहे. सरांना त्यांच्या जीवनात पत्नी सौ. पूजाताई निकम यांची मिळालेली मोलाची साथ विशेषत्वाने नोंद घ्यावी अशीच आहे. ते कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचा कौटुंबिक आपुलकीचा प्रेमळ वरदहस्त सरांना लाभलेला आहे. त्याचा उपयोग कोकणच्या भल्यासाठी व्हावा. कोकणच्या सांस्कृतिक राजधानीच्या इतिहासात भरीव नोंद करता यावी असे अजोड काम शेखर सरांकडून घडो. त्यासाठी आई तुळजाभवानीने त्यांच्या हाताला यश द्यावे, अशी आजच्या शुभदिनी प्रार्थना करतो आणि शेखर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

धीरज वाटेकर

ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...