सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

“दशा टाळण्यासाठी, कोकण पर्यटनाला हवेय ‘हरित’ दिशा !”

      एकविसाव्या शतकातील, एकविसाव्या वर्षात प्रवेश करताना, कोकणच्या लाल मातीत कार्यरत हाताला रोजगाराच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देण्याची अमर्याद क्षमता असलेल्या, मागील तीन दशकात विस्तारलेल्या ‘पर्यटन’ विषयाची वर्तमान ‘दशा’ तपासून आगामी ‘दिशा’ ठरवायला हवी आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आमचा पर्यटन विषयक एक लेख वाचून, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या एका ज्येष्ठांचं, ‘पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !’ असं अस्वस्थ करणारं उत्तर आलेलं. वास्तविक ‘कोकणात भूमिपुत्रांना आत्मनिर्भर बनविणारं, पर्यावरण जपणारं पर्यटन हवंय’, ही भूमिका अनेक विद्वज्जन सातत्याने मांडत आलेत. नव्या दशकात झेपावताना, “दशा टाळण्यासाठी, कोकण पर्यटनाला हवेय ‘हरित’ दिशा !” या मूळ भूमिकेचीच केलेली ही पुनर्उजळणी !

गेले दोन दशकांहून अधिक काळ आम्ही सातत्याने पर्यटन आणि पर्यावरण विषयात प्रत्यक्ष कार्यरत राहून लिहित असल्याने, ‘पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !’ या वाक्यातील मर्मभेदक पर्यावरणीय सूचनेने आमच्या मेंदूचा ताबा घेतला. सोशल मिडिया हे वर्तमान शतकातील अत्यंत ताकदवान शस्त्र आहे. काही काळ आम्ही या विचारात गुंतलो असताना, ‘सायकल चालविणे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी (जीडीपी) हानिकारक असते...!’ अशा आशयाची पोस्ट आमच्या वाचनात आली. पोस्टकर्त्याने उपरोधिकपणे सत्य लिहिलं होतं, ‘एक सायकल चालक देशासाठी मोठी आपत्ती आहे. कारण तो कार खरेदी करत नाही. तो कर्ज घेत नाही. तो गाडीचा विमा घेत नाही. वगैरे...’ पोस्टच्या शेवटी, ‘चालणे हे आणखी धोकादायक आहे कारण पादचारी सायकल देखील विकत घेत नाहीत’ असं म्हटलेलं. यातला विरोधाभास सोडला तर ज्या जुन्या पण सोन्याच्या सवयी सोडून पाश्चात्य सवयींच्या अधीन झालेलो आम्ही ‘पर्यटन’ नामे पुन्हा जुन्या सवयींकडे वळतोय. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. शहरात दिमाखदार हॉटेल्स असलेल्या आस्थापनांनी ‘निसर्ग/कृषी पर्यटन’ स्वरूप व्यवस्थाही उभारण्याकडे लक्ष केंद्रित केलंय. अनेकांनी अशा व्यवस्था उभारल्यातही ! अर्थात हे सगळं साकारात असताना कोकणच्या मूळ निसर्गाला आम्ही कितपत बाधा आणतो आहोत ? पर्यावरणासाठी अस्वस्थ होणाऱ्या आम्हांला गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदीसाठी का प्रयत्न करता येत नाहीत ? वणवे विझवताना आमची दमछाक होतेय. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग साकारताना तोडल्या गेलेल्या हजारो वृक्षांसाठी हळहळण्या पलिकडे आम्ही काहीही केलेलं नाही. महामार्गाच्या दुतर्फा नव्याने वृक्ष लावण्यासाठी चळवळ सक्रीय होत नाही. म्हणून कोकणातील आगामी पर्यटनाकडे बघताना शिल्लक राहिलेल्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं ? हे आपल्याला ठरवावं लागेल. मानवी इतिहासात जगण्यासाठी, रोजगारासाठी आणि नवनवीन शिकण्यासाठी जसजशी स्थलांतरे झालीत तसतशी पर्यावरणाची हानी होत राहिली आहे. १९९० नंतर जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे स्थलांतराला वेग आला. परराष्ट्र खात्याच्या एका आकडेवारीनुसार आज सुमारे पावणे तीन कोटी भारतीय विदेशात कार्यरत आहेत. यातलं स्थलांतर यापुढच्या काळातही होत राहाणार आहे. पर्यावरणाची हानी मात्र रोकावी लागणार आहे. शतप्रतिशत पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था कोलमडलेल्या हिंदी महासागर क्षेत्रातील मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स या देशांना कोरोनाकारणे भारताने जून २०२० मध्ये अन्नपदार्थ, औषधे, आयुर्वेदिक औषधे आदिंची मदत पोहोचवली होती, हेही आम्हाला विसरून चालणार नाही. कोरोनामुळे भारतातील बेरोजगारी आणि दारिद्र्य हे निकषाच्या खाली घसरण्याची चिन्हे आहेत. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद आणि पर्यावरणीय विध्वंस ह्या कोकणासह साऱ्या जगासमोरील समस्या आहेत. स्वच्छ हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी व्यवस्थात्मक पुनर्रचना करावी लागणार आहे. कसणाऱ्यांना जमीन आणि मालमत्तेसंदर्भात शेती हक्क धोरणाचा विचार केल्यास दारिद्र्य, विषमता, वंचितपणामुळे होणारे स्थलांतर कमी होऊ शकेल. पर्यटनाच्या नावाने चैन, चंगळवाद, एका विशिष्ठ मर्यादेबाहेरील मौजमस्तीस कोकणाने कायम विरोध करायला हवा आहे. ‘प्रकृतीदर्शन आणि निसर्ग निरीक्षण’ हेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे आहे.

जगातील १० टक्क्याहून अधिक रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनामुळे आपल्याकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटनाला बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांमुळे वाढणारा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन हा भविष्यातील चिंतेचा विषय ठरणार आहे. एका आकडेवारीनुसार देशात आज उत्सर्जित होणाऱ्या एकूण कार्बनपैकी पर्यटनातील उत्सर्जन १० टक्क्याहून अधिक आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढते आहे. हिमालयापासून कन्याकुमारी – अंदमानपर्यंत आपले देशांतर्गत पर्यटन विस्तारले आहे. सतत नवी डेस्टीनेशन पुढे येत आहेत. पर्यटन आणि वाहतूक हे एकत्र चालणार आहे. रात्रंदिवस रस्त्यांवर धूर ओकणाऱ्या वाहनांना आम्हाला पर्याय शोधावे लागणार आहेत. गेल्यावर्षी पर्यटन हंगामात मनाली येथे पर्यटकांची संख्या इतकी वाढली की कुल्लू ते रोहतांग पास मार्गावर हजारो पर्यटक रात्रभर अडकले. गर्दीची स्थिती इतकी बिघडली की लोकांना तिथेच रस्त्यांवर शौचासाठी जावे लागले. अर्थात काही पर्यटनस्थळी क्षमतेपेक्षा अधिक येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला कोकणाला नियंत्रित करावे लागेल. कोकणात इतकी गर्दी खेचणाऱ्या जागा मोजक्या आहेत. त्या गर्दीचे नियोजन करणे पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक आहे. आपल्या शेजारच्या भूतानने पर्यटन शुल्क वाढवून पर्यटकांची संख्या निर्धारित केली आहे. पर्यटनासाठी लोकांना आवडत्या ठिकाणी जायचा पर्याय उपलब्ध असायला हवा असला तरी देशाचा आर्थिक फायदा पाहाताना दूरगामी पर्यावरणीय तोट्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यटन म्हणजे पर्यावरणाची हानी नव्हे ! १९९० साली जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात अचानक मेलेल्या हरणांच्या शवविच्छेदनानंतर बेजबाबदार पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यातून टाकलेले खाद्यपदार्थ त्या निष्पाप प्राण्यांनी प्लॅस्टिकसहित खाल्याचे निष्पन्न झालेले. आपल्याकडे गाई-गुरांच्या बाबतीत हे घडताना दिसतेय. आज कित्येक पर्यटनस्थळी स्वातंत्र्याच्या नावाखाली धुडगूस चालू असतो. मद्यपींनी मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्रास झाले आहे. ‘युज अॅन्ड थ्रो’ जीवनशैलीमुळे प्लेट, चमचा, स्ट्रॉ, पाण्याच्या बाटल्या आदि कचरा वाढतोय. पर्यटकांकडून होणाऱ्या या अस्वच्छतेचा फटका स्थलांतरित पक्ष्यांनाही बसतोय. म्हणू स्वच्छतेच्या बाबतीत आपण पूर्वेकडील राज्यांचा कित्त्ता गिरवायला हवा. लडाख सारख्या ठिकाणी सुमारे ७०० हॉटेल्स आहेत. त्यात वर्षभरात अडीच लाख पर्यटक राहून जातात. जेवढी त्या भागाची लोकसंख्या आहे. अर्थात पाण्यासारख्या तिथल्या स्थानिक संसाधनावर याचा ताण येत असणार आहे. कोकणात पर्यटन वाढ करताना आम्ही पाण्याचा विचार करणार आहोत का ? कोकणात फलोत्पादन, दुग्धव्यवसाय आणि पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. कोकणात विमानतळ उभारून उद्योगधंदे वाढावेत यासाठी प्रयत्न होताहेत. पण या सगळ्या विकासासाठी लागणाऱ्या पाण्याकडे आम्ही पाहात नाही. कोकणातील शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याची मागणीही वाढलेय. ही मागणी पूर्ण करण्यासाठी लागणारा पुरेसा पाणी’साठा’ कोकणकडे आहे का ? देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये कोकणचा समावेश असूनही दरवर्षी उन्हाळा आला की आपल्याकडे टँकरने पाणीपुरवठा का करावा लागतो ? हे अपयश शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह इथल्या जनतेचे असल्याने कोकणातील पाणीटंचाई जणू मानवनिर्मित ठरावी. रोज सकाळी उठून विकासाचा खुळखुळा वाजविणारे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी अशा अनेक मुलभूत प्रश्नांवर बोलत नाहीत आणि सुस्त प्रशासन दिवस ढकलत राहाते.

कोकणात येणाऱ्या एकूण पर्यटकांत स्वतःच्या गाड्या घेऊन येणारे नोकरदार वर्गातील पर्यटक अधिक आहेत. त्यांचा सर्वाधिक खर्च हा मुख्यत्वे खाद्यवस्तू, शॉपिंगनंतर प्रवास आणि हॉटेलवर होत असतो. या साऱ्या हॉटेल्स, गेस्टहाऊस, कृषी पर्यटन केंद्रे, दुकानदार, गाईड्स, वाहतूक व्यवस्थेतून शासनास महसूल प्राप्ती होते. मुंबई विद्यापीठांतर्गत एकूण ८२६ महाविद्यालये कार्यरत असल्याने कोकणात नव्या विद्यापीठाची मागणी सातत्याने होत आहे. ते रास्तही आहे. मूळ मुंबई विद्यापीठाचे वलय सोडण्याची मानसिकता नसलेली अनेक महाविद्यालये कोकणात आहेत. अलिकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यास परवानगी मिळूनही कोकणातील अनेक महाविद्यालयांनी मूळ मुंबई विद्यापीठाची साथ सोडलेली नाही. म्हणून इथल्या स्थानिक पर्यावरणाला, कोकणी उद्यमशीलतेला अनुसरून आहे त्याच मुंबई विद्यापीठांतर्गत विशेष आत्मनिर्भर शिक्षणप्रणाली सुरु करायला हवी. आमचे दापोलीचे कृषी विद्यापीठ अनेकविध कृषी प्रकल्पांचे आगर आहे. हे प्रकल्प पर्यटकांनी पाहायला हवेत. तशा व्यवस्था खुल्या व्हायला हव्यात. कोकणात राहून कृषी शिक्षणाशी, व्यवसायाशी, शेतीशी संबंध नसलेल्या एका मोठ्या वर्गाला पिढीला कोकण कृषी विद्यापीठाचे हे शैक्षणिक सौंदर्य माहिती नाही. सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांकडून मद्यपान, गोंधळ होण्याच्या घटना घडत असल्यामुळे सामाजिक शांतता भंग पावते. या घटना पावसाळ्यात सर्वाधिक घडतात. त्यामुळे ऋतु बदनाम होण्याच्या घटना घडतात. अलिकडे राज्यातील काही ठिकाणे तर कौटुंबिक पावसाळी पर्यटनाच्या यादीतून बाद होताना दिसताहेत. यात कोकणातील आंबोलीसह इतर ठिकाणांची यात भर पडू नये. काही घाटात तर, ‘पावसाळ्यात पाऊस आणि दारूडेच एकत्र येतात’, असं बोललं जातं. ते कोकणबद्दल बोललं जाऊ नये. एकेकाळी विमान प्रवास ही चैनीची किंवा श्रीमंतीची गोष्ट वाटायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. देशात विमान वाहतूक क्षेत्र प्रचंड वेगाने विस्तारले आहे. पण कोकणात ना डोमॅस्टिक ना इंटरनॅशनल विमानतळ आजही उभे राहू शकले ! मला काय त्याचे ? मी आणि मला निवडून देणारे मतदार संघातील माझे निम्मे मतदार एवढ्या पुरता विचार करण्याच्या विकृत राजकारणाचा आणि त्याला वर्षानुवर्षे पोसणाऱ्या आम्हा करंट्या मतदारांमुळे विकास अडलेला आहे. असो. दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षाच्या सुरुवातीस सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ कार्यान्वित होईल असा आशावाद सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री हरदीप पुरी यांच्याशी या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची तत्परतेने दखल घेतली आहे. तिकडे शिर्डीला विमानतळ उभे राहिल्याने ते शहर देशातील हैदराबाद, बेंगलोर, उदयपूर, जयपूर, चेन्नई, भोपाळ आदि शहरांशी वेगाने जोडले गेले. चिपी विमानतळामुळे कोकणही असे जोडले जाईल. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी कोलंबो ते बौद्धगया अशी विमानसेवा सुरु करण्याचा आग्रह महाराष्ट्र सरकारकडे धरला होता. अशा अनेक संधी कोकणात पुढच्या दहा वर्षांत दृष्टीपथास येण्यासाठी पायाभूत व्यवस्थांचे सक्षमीकरण गरजेचे आहे.

कॅलिफोर्नियाचं स्वप्न कोकणी माणूस मागील पन्नास वर्षे पाहतोय. कोकणातून जाणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी मार्गाच्या स्वप्नाचेही असेच आहे. कोरोना येण्यापूर्वी मुंबई ते गोवा असा कोकणातून जाणारा हा पाचशे किमीचा दुपदरी सागरी महामार्ग पूर्ण व्हायला पाच वर्षे लागणार होती. त्यासाठीच्या खर्चाचा आकडा साडेतीन हजार कोटी रुपये होता. कल्पनेप्रमाणे हा मार्ग कॅलिफोर्नियातील ‘यूएस पॅसिफिक स्टेट हायवे (कोस्ट हायो)’ सारख्या स्वरुपात असणार होता. दरम्यान कोरोनामुळे हे थांबलं. आता त्याला कधी मुहूर्त लागेल, काय माहित ! संपूर्ण मार्गात जयगड खाडी (जयगड-तवसाळ), दाभोळ खाडी (दाभोळ-धोपावे), केळशी खाडी (केळशी-वेळास), सावित्रीच्या खाडीवर वेश्वी-बागमांडले आणि रायगड जिल्ह्यात आगरदांडा दिघी दरम्यान पुलांची आवश्यकता आहे. सागरी महामार्गामुळे चिंचोळ्या किनारपट्टीतील गावं रस्त्यांनी जोडली जातील. कोकण रेल्वे आणि मुख्य राष्ट्रीय महामार्गाला पर्याय उपलब्ध होईल. या विषयाची सखोल माहिती देणारा रत्नागिरीच्या प्रा. राजेंद्रप्रसाद मसूरकर सरांनी लिहिलेला विस्तृत लेख कृषिवल दीपावली अंकात (२०२०) प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी कोकणात खाडी किनाऱ्याने (उदाहरणार्थ दाभोळ खाडीतील उसगाव ते परशुराम) रस्ते असण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे, जी योग्य आहे. रस्त्यांचे उत्तम जाळे पर्यटनाला पोषक ठरते. रेवस-रेड्डी सागरी महामार्ग राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. निधीच्या अडचणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये सागरी महामार्ग पुन्हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने या प्रकल्पाचे काय होणार ? हा प्रश्न आहे. मध्यंतरी, ‘केंद्राच्या आयुष मंत्रालयातर्फे होणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लॅटला सिंधुदुर्गमध्ये जागा मिळणार नसेल तर अन्यत्र परवानगी मिळणार नाही’ असं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं म्हणणं वाचण्यात आलं. या प्रकल्पामुळे कोकणातील औषधी वनस्पतींवर संशोधन होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा वृत्तांमुळे कोकणातील राजकीय नेतृत्वाला विकासाची दूरदृष्टी नाही हे सातत्यानं वाचनात येणारं विधान पटू लागतं. नव्या दशकाची झेप ठरविताना या प्रदूषण विरहित प्रकल्पांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. आजही कोणतेही सत्ताधारी वरिष्ठ चिपळूणात आले की आमची वृत्तपत्रे, सोशल मिडिया कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याच्या वापरासाठी प्रयत्नरत होतात. पण प्रश्नाच्या मूळाशी कोणी जात नाही.

पर्यावरण पर्यटन म्हणजे ‘नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती शिकण्याच्या उद्देशाने नैसर्गिक भागाकडे प्रवास करणारे लोक असा अर्थ शिकविला जाण्याची गरज आहे. पर्यावरणाचा नाश आणि प्रदूषण करणाऱ्यांवर आर्थिक भार टाकला गेला पाहिजे. लोटे-परशुरामच्या औद्योगिक वसाहतीतून दाभोळच्या खाडीत रासायिनक पदार्थांचा विसर्ग होतो. याचा परिणाम इथले मासे, भाजीपाला आणि इतर घटकांमधून मानवात आणि पशुपक्ष्यांमध्येही होतो. कोकणातल्या प्रदूषणकारी प्रकल्पांबाबत, एखाद्या प्रदेशात आधीच प्रदूषण असेल तर त्या परिसरात पुन्हा नवीन प्रदूषण तयार करणारे उद्योग नकोत असं सुचवणारे नकाशे (Zoning Atlas Society of Industries) लोकांसमोर यायला हवेत, असं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ सर व्यक्त करतात. २०१० साली पश्चिम घाट जैवसंस्था तज्ज्ञ मंडळाचे प्रमुख असताना डॉ. गाडगीळ सरांनी रत्नागिरी जिल्ह्याचा हा नकाशा मागितला होता. पुढे काही वर्षांनी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्यामुळे रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा नकाशा त्यांना मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यात आधीच भरपूर प्रदूषण आहे. म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प नको आहेत. बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हायला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी अवघ्या ६ महिन्यात कोकणातल्या सावित्री नदीवर अत्याधुनिक पूल उभारला. हे सत्य समोर असताना या देशात हलगर्जी करणारे कॉन्ट्रॅक्टर, काही दशकांच्या प्रतिक्षेनंतर होऊ घातलेल्या कोकणातून जाणाऱ्या एकुलत्या एक राष्ट्रीय महामार्गाच्या वाटेला कसे काय येऊ शकतात ? रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील विलास पाटणे यांनी या संदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण लिहिले आहे. त्याप्रमाणे २०२४ पूर्वी मुंबई ते गोवा चौपदरी रस्त्याचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा करूया ! असे घडल्यास ही येत्या दशकातील सर्वात मोठी उपलब्धी ठरेल. मुलभूत पायाभूत व्यवस्था सुधारल्याने आणखी १० वर्षांनी ‘नव्या दशकाची झेप’ लिहिताना यातल्या अनेक मुद्यांवर जनतेतून कार्यवाही झालेली असेल.

ज्यांनी पाहिलंय त्यांनी नुसतं ‘कोकण’ शब्द ऐकला तरी स्वर्गीय सौंदर्य डोळ्यांसमोर येतं. आंबे, फणस, करवंद, काजू, कोकमासह नारळी-पोफळीच्या बागा, कौलारू घरं, मातीच्या भिंती, शेणाने सारवलेले घर-अंगण, अंगणातलं तुलसी वृंदावन, पक्ष्यांचे किलबिलाट, पहिल्या पावसाने गंधवती पृथ्वीला (माती) येणारा सुगंध, खळाळते धबधबे, हिरवीगार शेती, निरभ्र आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, श्रावण-चैत्रात झाडांना फुटणारी पालवी, ग्रामदेवतेचं देऊळ, सण-उत्सव, पालख्या, परंपरा आदि अनुभवलेलं सारं काही मनाच्या सुगंधी अत्तरकुपीत बंद करून ठेवलेलं ! कोकणात येणाऱ्या पर्यटकांना फक्त पावसाळ्यात हिरवागार निसर्ग तर बघायला मिळतोच पण धबधबे, सह्याद्रीतील थंडी, अंगाला झोंबणारा वारा-पाऊस, धुके, पावसाळी गिर्यारोहण, रानभाज्या, चढणीचे मासे, बत्तीवर पकडलेले खेकडे, भात लावणी, गावठी पद्धतीने भाजलेले काजू, सड्यावरची रानफुले आदि गोष्टी अनुभवायला मिळतात. कोकणाला लागून असलेल्या पश्चिम घाटात आठ नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी अंमलबजावणीचे आव्हान पेलायचे आहे. जंगल पर्यटन संकल्पना राबवित असताना अतिसंवेदनशील भागांत पर्यटकांकडून धांगडधिंगा न होता दक्षिणेतील राज्यांप्रमाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवास, निवास, भोजन यांचे शिस्तबद्ध नियोजन व्हायला हवे. कोकणातील काही गावं आजही रस्ता, एस.टी. पासून वंचित आहेत. गावातल्या लोकांना हाताला इथेच कामधंदा मिळाला असता तर ? तसं न घडल्याने इथला माणूस शहरात गेला. ‘पर्यटन’ व्यवसाय चळवळ वाढल्यापासून मंडळी पुन्हा कोकणात परतू लागलीत. वर्षानुवर्षे कुलूपबंद असलेली घरं उघडली जात आहेत. सारी बंद घरं उघडली जाऊन कोकणातलं गाव पुन्हा समृद्धीच्या वळणावर येण्यासाठीही इथल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्य म्हणजे कोकणी पर्यटन म्हणून, नव्या दशकाची झेप घेताना व्यावसायिकांनी येणाऱ्या पर्यटकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याचे भान ठेवायला हवे.

तब्बल ४२ खाडयांनी युक्त असलेली 'बॅकवॉटर' ही कोकणच्या पर्यटनाला मोठा आधार देणारी नैसर्गिक समृद्धी आहे. केरळनेही अलेप्पी ते कोट्टायम बॅकवॉटरमध्ये मोठे यश मिळवले आहे. 'बॅकवॉटर'च्या जीवावर चिपळूणला पर्यटन डेस्टीनेशन बनविण्यासाठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ ही संस्था श्रीराम रेडिज यांच्या नेतृत्वाखाली धडपडते आहे. त्यांना हे करताना आलेले अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कोकणात 'बॅकवॉटर' संकल्पनेला मोठे यश का मिळत नाही ? याच्यातून स्पष्ट व्हावे. बीचशॅक्स ही आम्हाला अजूनतरी फारशी पटलेली संकल्पना नाही. अर्थात शेजारच्या गोव्यामुळे ही संकल्पना अधिक बदनाम आहे. तिची अंमलबजावणी करताना कोकणी संस्कृतीचा नीटसा विचार व्हायला हवा. भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत सरांच्या कोकणची पर्यावरणीय मीमांसा करणाऱ्या सोशल मिडीयावरील पोस्ट वाचल्या की अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांचे निरसन होण्यासाठी, नव्या दशकाची झेप घेताना कोकणाचा विचार करताना अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना शासन आणि प्रशासनाने एका व्यासपीठावर आणायला हवे आहे. भारतातल्या ८ समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लैग' सन्मान मिळाला. त्यात सिंधुदुर्गातील निवती-भोगवे समुद्रकिनाऱ्याची चर्चा सुरु झालेली. कोकणातले किनारे वादातीत सुंदर आहेत. संपूर्ण कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किनारपट्टीच्या भौगोलिकतेचा सुयोग्य उपयोग करून स्वराज्याचे पहिले मराठा आरमार निर्मिले होते. अर्थात इथल्या प्रत्येक दगडा-धोंड्याला, किल्ल्यांना, वास्तूंना समृद्ध इतिहास आहे. वारसा आहे. फक्त आम्ही तो जगासमोर जगाच्या पद्धतीने मांडायला हवाय. आजपासून सुरु होणारं दशक यासाठी सत्कारणी लागावं.

स्थानिक पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाल्याशिवाय कोणतेही पर्यटनस्थळ विदेशात प्रसिद्ध होऊ शकत नाही. म्हणून आमचं कोकण पहिल्यांदा ‘याचि देहि याचि डोळा’ आम्ही पाहायला हवं. त्यातून घराघरात प्रत्येक पर्यटनस्थळाच्या शाश्वत विकासाचा ध्यास जन्माला येईल. कोकणातल्या पावसाळी पर्यटनस्थळांवर नुसती बंदी, गर्दी, आणि दंग्यांची वृत्ते प्रसिद्ध झाली तरी ती आमच्या पर्यटनाचे चित्र नकारात्मक बनवतात, हे लक्षात घ्यायला हवं. कोकणाच्या पर्यावरण, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेकरिता डोंगराळ प्रदेश आणि समुद्र हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. डोंगरउतारामुळे शेतीस मर्यादा आहेत. समुद्रातील संधी शोधायला अजून हव्या आहेत. अशा अवस्थेतील कोकणी अर्थव्यवस्थेला म्हणून शाश्वत पर्यटनाची जोड हवी आहे. हे शाश्वत पर्यटन इथून पुढच्या काळात हरित असायला हवेय, जाणीव कोरोनानेही याची जाणीव करून दिलेली आहे. ‘हरित कोकण’ संकल्पना लक्षात ठेवून आखणी झाली, पायाभूत सुविधांसह कोकणातील सार्वजनिक स्वच्छतेकडे इथल्या प्रत्येकानं लक्ष पुरवलं तर पर्यटन व्यवसाय उभा करायला कोकणी माणूस केव्हाही सज्ज आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.     ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

गावाचा वाढदिवस

        महाराष्ट्रात नुकत्याच १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यातल्या काही पंचायती पूर्णत:, काही अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या सदस्यांकडून जनतेला सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावच्या भल्याची अपेक्षा असणार आहे. ग्रामपंचायती ह्याच देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या कणा असल्याने त्या चालविणाऱ्या विश्वस्थांची जबाबदारी मोठी आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना मागच्या २०२०च्या दीपावलीनंतर कोरोना अनलॉक वातावरणात (२३ नोव्हेंबर) आम्ही कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वेबसाईटकरिता शुभसंदेश रेकॉर्ड करताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलेली ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना आठवली. यापूर्वी कधीतरी अण्णांच्याच तोंडून ऐकलेली ही सामाजिक प्रदूषण दूर सारण्याची क्षमता असलेली संकल्पना या भेटीत वन-टू-वन ऐकल्यावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवर्जून नोंदवावीशी वाटली.

'खेड्यांकडे चला' हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागेही तेच सूत्र आहे. राळेगणसिद्धीप्रमाणे शासनाचे विविध पुरस्कार पटकावणारं वाशिम जिल्ह्यातील जांभरूण महाली गावही ‘गावाचा वाढदिवस’ साजरा करतं. महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या इंग्रजी पुस्तकात ‘टुवर्डस् आयडियल व्हिलेजेस्’ पाठात या गावाची दखल घेतली आहे. राज्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, कोकणातल्या डॉ. प्रसाद देवधरांचे झाराप आदी काही गावं आहेत. समाजाने आणि माध्यमांनी अशा गावांची आणि तिथल्या प्रयोगांची सातत्याने विशेष दखल घ्यायला हवी आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना अधिक महत्त्वाची वाटते. ४० वर्षांच्या जन आंदोलनातून देशाला १० कायदे देणारे अण्णा आता ८४ वर्षांचे झालेत. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या वातावरणातही अण्णांनी केलेलं काम, त्यांचं असणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, व्यक्त होत राहाणं आम्हाला महत्वाचं वाटतं. समाजकार्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्तींना कामाप्रति समाजाचा विरोधाभास दिसून आला तर नैराश्य येतं. अशा वातावरणात, ‘अध्यात्म माणसाला पूर्ण बदलू शकते, यावर माझा विश्वास आहे’, असं म्हणणारे अण्णा आम्हाला जवळचे वाटतात. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पाच सूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून अण्णा कमालीचे आग्रही आहेत. मंडळाच्या राज्य पर्यावरण संमेलनकारणे आम्ही २०१६ पासून अनेकदा, ४० वर्षांपूर्वी ओसाड, दुष्काळग्रस्त असलेल्या राळेगणसिद्धीतील जलसंधारण आणि ग्रामविकासाची कामे पाहिलीत. अण्णांच्या या कामातून प्रेरणा घेत देशातल्या अनेक गावांनी जलसंधारण व ग्रामविकासाची कामे सुरु केलीत. राळेगणसिद्धीतील जातीभेद नष्ट करण्यासाठी अण्णांनी गावकुसाबाहेरील कुटुंबांना आपले निवासस्थान असलेल्या यादवबाबा मंदिराजवळ वसविले. गावातल्या सर्वांचे विवाह एकाच मांडवात, एका मुहूर्तावर करण्याचा पायंडा पाडला. गावजेवण सुरु झालं. तुलनेने कमी शिकलेल्या अण्णांसारख्या विभूतीने सर्वस्वाचा त्याग करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले अशी उदाहरणे दुर्मीळ होताहेत. म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यामुळे जोडला गेल्यानंतर आमचं राळेगणसिद्धीला जाणं होऊ लागलं. जलसंधारण, ग्रामविकास आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा ध्यास घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ऐकणं हा सामाजिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी असलेला समृद्ध जीवनानुभव आमच्याही पदरात पडू लागला. पुढे २०१६ साली ‘निसर्ग आणि सामाजिक प्रदूषण’ विषयावर अण्णांची विस्तृत मुलाखतही घ्यायला मिळाली होती. मंडळाच्या नव्याने बनविण्यात येत असलेल्या वेबसाईटसाठी शुभसंदेश रेकॉर्ड करताना अण्णांनी, राळेगणसिद्धी आणि जनआंदोलनांसंदर्भात विस्तृत माहिती असलेले ८ व्हिडिओ नुकतेच प्रदर्शित झाल्याचे म्हटले. या संदर्भात त्यांना अधिक विचारता अवघ्या मिनिटभरात पाणलोट क्षेत्रातून ग्रामीण विकास आणि ग्रामसभेची माहिती देत अण्णा सामाजिक पर्यावरणांतर्गत ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पनेवर बोलू लागले. तसं याबाबत त्यांच्या तोंडून पूर्वीही ऐकलेलं होतं. पण का कोण जाणे ? आज (कदाचित कोरोना पार्श्वभूमीवर) त्या विषयातलं गांभीर्य अधिक जाणवू लागल्याने आम्ही शक्य तितक्या शांततेने अण्णांचे बोलणे ऐकू लागलो. अण्णा सांगत होते, ‘लोकं आपले वाढदिवस करतात. राळेगणसिद्धी परिवार गावाचा वाढदिवस करते. गावाचा वाढदिवस म्हणजे काय ? जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घ्यायची. लग्न होऊन येऊन १ वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करायचा. गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषाचं गावानं पूजन करायचं. सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करायचं. गावाच्या विकासाचं काम करणारे तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदिंना सन्मानित करायचं. हे सामाजिक पर्यावरण आहे. म्हणून गावाचा वाढदिवस देशभरातील गावागावात व्हायला हवा. यातून सामाजिक प्रदूषण दूर होईल. गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल. गाव एक होईल.’ अण्णांचे विविध कामाचे ८ व्हिडिओ त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या ‘राळेगणसिद्धी - जल संरक्षण क्षेत्र विकास’ या व्हिडिओत त्यांनी ‘गावाचा वाढदिवस’ या संदर्भातील आपली भूमिका मांडली आहे. गावातल्या वयोवृद्ध स्त्री-पुरुषाला आपले माता पिता मानून समस्त ग्रामस्थ त्यांचे पूजन करतात. एका वर्षात जन्माला आलेल्या बालकांना नवीन कपडे शिवले जातात. त्यांचा स्वागत केले जाते. लग्न करून गावात आलेल्या सुनांचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. समाजसेवेचं काम करणाऱ्या गावातील युवकांचा सन्मान केला जातो. त्यांची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न होतो. दरवर्षी २ ऑक्टोबरला, गांधी जयंतीदिनी हा गावाचा वाढदिवस (ग्रामपरिवर्तन दिन) होतो.

राळेगणसिद्धीत गावाचा वाढदिवस वर्षानुवर्षे सुरु आहे. हे काम पाहून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील भारावून गेले होते. आजचं आमचं बोलणं संपवून निघताना अण्णांनी, ‘सरकार पडण्याला घाबरतं. सरकार पाडण्याची शक्ती जोपर्यंत जनतेत येणार नाही तोपर्यंत खरे लोकतंत्र येणार नाही’ असं म्हटलं. या देशात ‘प्रजासत्ताक’ आलंय. त्याला ७१ वर्षे पूर्ण झालीत. ‘आज जनता देशाची मालक झाली आहे. ग्रामसभेला अधिकार देणारा कायदा देशाला हवा आहे. यासाठी जनतेचे संघटन करावं लागेल’, अण्णांचे हे विचार ऐकून आम्ही राळेगणसिद्धीच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या परिसरातून बाहेर पडलो. तेव्हा, ‘कथनी और करनी मैं अंतर नही होना चाहिये !’ हे अण्णांचं वाक्य कानात गुंजत राहिलं.  

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5443837279092300750&title=Birthday%20of%20Villages&SectionId=1002&SectionName=Be%20Positive








बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

वयस्क ‘नरसांबर’ दर्शन !

(छायाचित्र : गुगलच्या सौजन्याने)
     कालभैरव जयंतीच्या सोमवारची (७ डिसेंबर २०२०) सकाळ. वेळ साधारण सकाळी अकरा वाजताची. निसर्ग न्याहाळत जंगलातून चालायला सुरुवात होऊन तीनेक तास झालेले होते. चालताना सह्याद्रीत डाव्या हाताला दूरवर एका स्वतंत्र डोंगरावर विस्तीर्ण पसरलेल्या महिमतगडाचे रांगडे सौंदर्य, दुतर्फा दिसणारे त्याचे बुरुज पाहात आणि उजव्या बाजूच्या खोल दरीतील गुहेत विसावलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वरचरणी मनोमन नतमस्तक होत लिंग डोंगराच्या दिशेने निघालेलो. दोनही बाजूला खोल दऱ्या असलेल्या दंडाच्या वाटेवरून चालताना, लिंगाचा डोंगर नजरेच्या टप्प्यात आला. नेमकं तेव्हा एका गवताळ टप्प्यावर डाव्या बाजूच्या झाडीतील आडोश्याला चरत असलेलं नर जातीचं वयस्क आणि रुबाबदार सांबर हरिण वाऱ्याच्या वेगानं आल्या वाटेला परत फिरलं अन् क्षणार्धात आमच्या नजरेआड झालं. दोन फुटाहून अधिक वाढलेली आकर्षक शिंगे आणि खांद्यापर्यंत किमान दीडेक मीटर उंचीचं, पूर्ण वाढ झालेलं, धिप्पाड देहयष्टी असलेल्या वयस्क एकलकोंड्या नरसांबराचं नजरेला पडलेलं शरीरसौष्ठव सौंदर्य केवळ अवर्णनीय !

सांबर हरीण (Cervix Unicolour) भारतात आढळणारी हरीणाची सर्वात मोठी आणि मुख्य जात आहे. सांबर हरिणाचा स्वभाव गरीब आणि भित्रा असला तरी त्याचा गडद तपकिरी रंग त्याच्या रुबाबात भर घालतो. आम्हाला ज्यानं दर्शन दिलं तोही असाच रुबाबदार, आकर्षक शिंगे आणि धिप्पाड देहयष्टी असलेला होता. हे नर सांबर झाडाच्या खोडाला शिंगे घासत असतात. जंगलात फिरत असताना त्यांनी घासलेली झाडे दिसतात. लिंगाच्या डोंगरावर जाण्याच्या चारेक दिवसांपूर्वी (४ डिसेंबर) कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्थेचे मित्र सचिन धायगुडे यांची फेसबुकवर ‘सांबराची घासण’ ही पोस्ट वाचलेली. अंगावरच्या गोचिडांचा त्रास, खाज कमी करण्यासाठी सांबरं चिखलात लोळतात. खाज असेल तर झाडाच्या खोडाला जोरजोरात अंग घासतात. जंगल फिरताना झाडांच्या खोडांवर ही ‘सांबराची घासण’ दिसून येते. त्यासाठी सांबरं झाडाची सालं शिंगांनी सोलतात. सोललेली सालं खातात. तिचा काही भाग झाडाच्या बुंध्याजवळ पडलेला दिसतो. पोस्ट वाचताना सांबराची ही वर्तवणूक लिंगाच्या डोंगरावर बघायला मिळाली तर ? असं सहज वाटून गेलेलं, अन् चक्क सांबरानेच दर्शन दिलं ! मार्लेश्वरकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या डाव्या हाताला असलेल्या लिंगाच्या डोंगरावर जाण्याचा बेत जवळच्या आंगवली (देवरुख-संगमेश्वर) गावचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक मित्र संजीव अणेराव यांच्या सहकार्याने ठरवलेला. त्यासंदर्भात यथावकाश लिहीन. चिपळूणच्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे चेअरमन श्रीराम रेडिज आणि आम्ही सर्व संचालक मंडळी (रविवारी) अणेराव यांच्या सेंद्रिय मसाला बाग आणि ‘वनालिका’ हॉलिडे होमच्या भेटीला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी श्रीराम रेडिज, वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, करजाई क्रिएशनचे महेंद्र कासेकर, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक, हॉटेलियर प्रल्हाद लाड, ‘ग्लोबल चिपळूण’चे मॅनेजर विश्वास पाटील आणि आम्ही ‘सृष्टीज्ञान’चे संस्थेचे तरुण कार्यकर्ते कुणाल अणेराव, स्थानिक वाटाड्या शांताराम रेवाळे आदि लिंगाच्या डोंगराच्या दिशेने जात असताना सांबराचं अलभ्य दर्शन झालं. तेव्हाही दक्षिणोत्तर पसरलेला, सह्याद्रीतील सलग रांगांपासून सुटावलेल्या एका स्वतंत्र डोंगरावर उठून दिसणारा अवाढव्य डोंगरी किल्ला महिमतगड डाव्या हाताला होता. त्याच्या दोनही टोकावर स्थानापन्न असलेले दोन बुरुज आणि बालेकिल्ल्यावरील ध्वजस्तंभही नजरेस पडत होते.

नरसांबर दर्शन क्षणाचे फोटो घ्यायला न मिळाल्याने आम्ही दोघे-तिघे चुटपुटलो. तेव्हा ‘जंगल हे वर्तमानपत्रासारखं वाचत वाचत चालताना, “सांबर अचानक डोळ्यासमोरून गेलं” ही “न्यूजफ्लश” होती. न्यूजफ्लश प्रमाणेच ती हालचाल आपल्या नजरेत राहायला हवी. अशा क्षणातल्या हालचाली कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी टिपणे फार महत्त्वाचे असते.’ असे वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट आम्हाला सांगत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांबराचे डोळ्यांनी दिसणारे सौष्ठव, काही सेकंदांच्या अवधीत कॅमेऱ्यात टिपणे अवघड होते. मानवी आवाजांना घाबरल्याने झुडुपात सांबराचा आवाज झालेला. तेव्हा पहिल्यांदा माकड किंवा डुक्कर असेलं असं वाटलेलं. आमच्या इनमिन नऊ जणांतील सुरुवातीचे दोघे-तिघे विशेष बोलण्याचा आवाज न करता दांडीच्या वाटेनं किंचित पुढे गेलेले. मधल्या फळीतील आम्ही तिघे-चौघे निसर्गाच्या गप्पा करत चाललेलो. पाठीमागे काहीश्या अंतरावर शेवटचे दोघे होते. तेव्हा मधल्यांच्या आवाजाने त्या शाकाहारी सांबराची वाळलेलं गवत खाण्यातली तंद्री भंगली आणि झुडुपातून ते अचानक समोर आलं. अपरिचित चाहूल जाणवल्यास वन्यजीवांमध्ये सजगता निर्माण होत असल्याची ती नैसर्गिक प्रतिक्रिया होती. श्रेष्ठ साहित्यिक अनंत काणेकर यांनी १९५५ साली लिहिलेली ‘सांबर’ नावाची एकांकिका आहे. ‘साम्बरी’ या काल्पनिक वन्यजमातीच्या, ‘सांबरी पुरुषाने एकतरी सांबर मारलाच पाहिजे. नाहीतर त्याला समाजात मान नाही’ या मूळ जीवनसूत्राला छेद देणारी ही शोकान्त एकांकिका आपल्याला वन्यजीवांच्या हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. कॉलेजयीन जीवनात स्नेहसंमेलनाच्या वातावरणात कधीतरी ती ऐकलेली. आज पहिल्यांदा असं सांबर दर्शन घडल्यावर विविध ठिकाणी वाचलेलं सांबरांचं वर्णन आठवलं. तेव्हा ‘गरीब स्वभावाचा हा प्राणी हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला कसा वाचवित असेल ?’ असाही विचार मनाला स्पर्शून गेला.

जगभरातील अभयारण्यांच्या चौकटीतलं वन्यजीव दर्शन आणि आजचं मोकळ्या आकाशाखाली मुक्त संचार करणारं, मानवी पाऊलखुणांची चाहूल लागताच, अवघ्या काही सेकंदात, मानवी डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत सुरक्षित जागेत पसार झालेलं ते सांबर हरिणाचं दर्शन मनसोक्त डोळे भरून निसर्ग पाहायला शिकविणारं होतं. आमच्यासारखे हाता-गळ्यात कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांनाही सांबराने काही सेकंदांच्या इंट्रीने चकवलं. मोकळ्या वातावरणात जंगलातील खरीखुरी गंमत समजावून सांगितली. फोटोंच्या फारशा मोहात न अडकणारे सन्मित्र, निलेश बापट अनेकदा सांगतात, ‘जंगलात अशा अचानकच्या क्षणी उघड्या डोळ्यांनी बघण्यातलं, ते दृश्य अनुभवण्याचं सुख वेगळंच ! ते जंगलातील खरं सौंदर्य !’ त्याची अनुभूती घेऊन आम्ही लिंगाचा डोंगर उतरलो.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

वयस्क ‘नरसांबर’ दर्शन घडण्यापूर्वीचा फोटो... 

लिंगाच्या डोंगराकडे जाणारी दंडाची वाट...

लिंगाचा डोंगर ट्रेकमधील सहभागी सहकारी

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...