गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

तेरड्याची ज्येष्ठा गौरी आली

निसर्गसुंदर कोकणाने गणपती आणि त्यांची आई गौराई यांना जणू निसर्गदेवता मानले आहे. कोकणी आसमंतात तेरडा फुलायला लागला की गौरी-गणपतीचे दिवस जवळ आल्याचे मानले जाते. गौरीचं वास्तव्य पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असतं. आजच्या (दि. २१) गौरी आगमनदिनी दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया व कुमारिकांनी येथील आतगाव रोडवरील पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीची गौरी स्वरूप आवाहन पूजा केली आणि गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढली.

कोकणातील अनेक गावात गौरी आगमनासाठी डोक्यावरील रोवळीत किंवा सुपात  हळद, तेरडा, आघाडा यांचे रोपटे घेण्याची प्रथा आहे. तेरडा वनस्पतीची गौराई कोकणात बघायला मिळते. केळशी पंचक्रोशीत तेरडा रोपाला गौरीचे प्रतिक मानून आवाहन करण्यात येते. ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त आज सायंकाळी महिलांनी तेरड्याची रोपे मुळासकट काढून वाजत गाजत मिरवणुकीने आणली. तेरडा वनस्पतीची ही मुळे ही लक्ष्मीची पाउले मानली जातात. पूजनासाठी तेरड्यापासून सुंदर गौराई साकारण्यात येते. तेरड्याचा वापर श्रीगणेशाच्या माटोळीतही केला जातो. देवी गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून तिला ज्येष्ठागौरीही संबोधले जाते. गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला अतिशय आकर्षक रुपात सजविले जाते. आज सायंकाळी कोकणातील तेरडा रोपट्यांची, विड्याची विधिवत पूजा व गौरी देवतेस आवाहन करण्यात आले. देवी गौराई आपल्या लाडक्या लेकाला बाप्पाला भेटावयास अवतरली आहे. या श्रद्धेने सर्वत्र गौरीपूजनाची तयारी होत असते.

परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष पूजा-साहित्य आणावे लागत नाही. रानावनात आढळणारी फूलपत्री गौराईस प्रिय आहे. कोकणात माळरानी, डोंगर उतारावर, शेताच्या बांधावर जांभळी, फिक्कट गुलाबी, तांबड्या, पांढऱ्या रंगांची ही फुले सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. तेरड्याच्या फुलांचं आयुष्य पाच ते सात दिवस असते. सह्याद्रीतील काही भागात यंदा तेरडा जुलै-ऑगस्टमध्येच बहरला होता. हवामानातील बदल याला कारणीभूत असावा.

फेसबुक लाईव्ह लिंक :: (१) https://m.facebook.com/story.php?story_fbid=635692405317530&id=100002456712976&mibextid=Nif5oz
(२) https://m.facebook.com/story.php?story_fbid=657021372869388&id=100002456712976&mibextid=Nif5oz

धीरज वाटेकर

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

'प्रदक्षिणा संकल्पेश' आरती संग्रह प्रकाशन



केळशी (दापोली) :: येथील आतगाव वरची भाट भागातील वाटेकर परिवाराच्या वतीने पारंपरिक गणेशोत्सवाच्या 'अंगारक योग' पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन, भजनातून समाज प्रबोधनाची चळवळ राबविणारे आणि आपल्या भजन मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशासमोर भजन सेवा सादर करणाऱ्या 'बुवा' जहांगीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अंगावर योगावर स्थापन झालेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशोत्सवाचे हे एकविसावे वर्ष आहे.



या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केळशीच्या विकासाचा ध्यास घेतलेले उपसरपंच केदार पतंगे, गोसावी ग्रामस्थ मंडळ आणि गोसावी भजन मंडळाचे अध्यक्ष विलास कुवेसकर, अरविंद जाधव, 'प्रदक्षिणा संकल्पेश' मूर्तीकार शेखर केळसकर, 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरत्यांचे लेखक मच्छिन्द्रनाथ तुकाराम वाटेकर, गोसावी महिला मंडळाच्या प्रतिनिधी सौ. शुभांगी बाईत, श्रीमती विजया बन्सीधर वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 



तांबड्या जास्वंद फुलाची प्रभावळ पाठीशी घेऊन स्थानापन्न झालेली मस्तकापासून लांबसडक निमुळती पायापर्यंत रूळणारी सरळ सोंड, तिच्या मुख अग्रावर पांढरा शुभ्र एकवीस कळ्यांचा दाणेदार मोदक धरलेल्या अवस्थेतील प्रदक्षिणा संकल्पेशगणेशाची शाडूच्या मातीतील मूर्ती पाहाता क्षणी नजरेत भरावी अशी आहे. त्याच्या लंब उदरावर नाभी कमळातून नुकताच जन्म घेतल्यासारखे भासवणारी नागपाशकटी, मागच्या डाव्या हातात आपलाच अर्धा दात, मागच्या उजव्या हातात परशू, नेहमीप्रमाणेच पुढच्या उजव्या हाताने वरदान प्रदान करणारा वरदहस्तआणि पुढच्या डाव्यात हातात इक्षुदंड (गणेशवेल) गुंडाळलेल्या या बाप्पाच्या साथीला मूषकराज विराजित आहेत. बाप्पाचे मस्तकावरचे सुपाएवढे कान म्हणजे जणू भक्तांचे गाऱ्हाणे मनापासून ऐकून घेण्याची खात्री पटविणारे, दीड दिवसीय पूजेसाठी दोन्ही पाय जवळ घेऊन स्थानापन्न झालेल्या प्रदक्षिणा संकल्पेशाच्या चेहऱ्यावरील कोवळे नाजूक हास्य समाधान देणारे आहे.

 



पूर्वी पार्थिव श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी घरोघरी लागणार्‍या आवश्यक वस्तूंमध्ये आरतीचे एखादे पुस्तक हमखास असायचे. या पुस्तकांचे जतनही व्हायचे. सध्या ऑनलाईन आरत्या उपलब्ध झाल्याने अशा छापील पुस्तिकांची गरज कमी झाली आहे. अर्थात आरत्या सगळ्यांनाच तोंडपाठ नसल्यामुळे पुस्तिका आवश्यकही आहेत. श्रीगणेशाच्या नियमित आरत्यांसह डॉक्युमेंटेशन म्हणूनही प्रदक्षिणा संकल्पेशआरती संग्रहाकडे पाहण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 



स्वर्गीय निसर्गसौंदर्य आणि परंपरा जपलेल्या ग्रामीण कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी येथील पर्यटन वैशिष्ट्ये यात अंतर्भूत आहेत. गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या नियमित आरत्यांसह, भाषाशास्त्राचे अभ्यासक मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी लिहिलेल्या प्रदक्षिणा संकल्पेशया अंगारक गणपतीचे स्वरूप, सौंदर्य, वैशिष्ट्य विशद करणाऱ्या आरत्या यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रदक्षिणा संकल्पेशाच्या मागील एकविस वर्षांच्या उत्सवातील चित्रमय रंजकआठवणी या आरती संग्रहात सामावलेल्या आहेत.

 



निरूपणासाठी प्रसिद्ध असलेले येथील कै. तुकाराम (बुवा) सुभाननाथ वाटेकर यांनी सांगितलेल्या 'घरात गणपती आणायचा असेल तर तो अंगारक योगावर आणायचा आणि घरीच विसर्जन करायचे तर ते बुधवारच्या गणेश चतुर्थीचे' या संकेतानुसार हा अंगारक योग प्रदक्षिणा संकल्पेश गणेशोत्सव सुरू आहे.

 


यावेळी जहांगिर शेख, केदार पतंगे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आठवणी सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वाटेकर परिवाराच्या वतीने गोसावी भजन मंडळाच्या सर्व प्रतिनिधींना चिपळूणच्या मनोदय एंटरप्रायझेसचे दीपक वाटेकर यांच्या हस्ते लेंगा-कुर्ता-टोपी पारंपरिक पेहेराव भेट देण्यात आला. यावेळी दापोलीतील पायल मोटर्सचे प्रविण वाटेकर, राजेश भिसे, नरेश भिसे, संतोष मांडवकर, प्रदीप शिर्के, संतोष पाटील, सौ. उर्मिला पाटील, सौ. वैशाली जाधव, सौ. रिना भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक धीरज वाटेकर यांनी केले.

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

नवभारताचा निर्माता :: भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक असाधारण दूरदर्शी अभियंता होते. विसाव्या शतकात, ते त्यांच्या हयातीत जणू आख्यायिका बनलेले अतुलनीय अभियांत्रिकी कामगिरीने भरलेले जीवन जगले. औद्योगिक विकासाच्या भव्य दृष्टीने त्यांना अद्वितीय व्यक्ती बनवले. पिण्याचे सुरक्षित पाणी आणि योग्य सिंचनासाठी जलस्रोतांचा प्रभावी वापर हा त्यांच्या जीवनाचा ध्यास राहिला. तंत्रशुद्ध आर्थिक व्यवहार्यता, गुंतवणुकीवर पुरेसा परतावा आणि सामाजिक उद्देशाची पूर्तता होण्याची खात्री असल्याशिवाय त्यांनी मोठे अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेतले नाहीत.

विश्वेश्वरय्या हे गणितज्ज्ञ आणि इंग्रजीचे उत्तम अभ्यासक होते. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. आज हा दिवस देशात सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. विश्वेश्वरय्या यांनी भारतात अभियांत्रिकीचा पाया घातला. जागतिक कीर्तीचे अभियंता आणि नवभारताचे एक निर्माते म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे त्यांच्या पूर्वजांचे गाव. दक्षिण भारतात आपल्या मूळ गावाच्या नावाचा स्वत:च्या नावाच्या आधी उल्लेख करण्याची पद्धत आहे. त्यानुसार ‘मोक्षगुंडम’ गावाचे नाव विश्वेश्वरय्या यांच्या नावाच्या आधी आलेले आहे. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होते. पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये (लग्न-मुंजी, सत्यनारायण वगैरे) यांमधून मिळणार्‍या दक्षिणेतून त्यांचा घरखर्च कसाबसा चालवत. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी पैसा नव्हता. तेव्हा त्यांनी विद्यार्थिदशेत शिकवण्या करून शाळेच्या फीसाठी कष्टाने पैसा जमा केला होता. १८८०मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून प्रथम क्रमांकासह बीए केले. यामुळे पुणे कॉलेज ऑफ सायन्समध्ये (भारतातील सर्वात जुने आजचे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे) त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. येथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत पूर्ण करून नोव्हेंबर १८८३ मध्ये ते एल.सी.ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजीनिअरिंग) आजची बी. ई. सिव्हिल पदवी वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना बर्कले पदकाने सन्मानित करण्यात आले. मार्च १८८४मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारमधून त्यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता म्हणून आपल्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्दीची सुरुवात केली होती.

नद्यांच्या जलस्रोतांचा योग्य उपयोग करणे ही त्यांची आवड होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सेवेत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील खानदेशातील धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण व नियोजन केले. त्याची अंमलबजावणी केली. पाणीपुरवठा योजनांची त्यांची कल्पना आणि यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता ओळखून सरकारने त्यांना सिंध प्रांतातील सुक्कूर शहराच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेचे स्वतंत्रपणे नियोजन, आराखडा आणि अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले होते. तुलनेने हे कठीण काम होते. त्यांनी तेही यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना सुरत पाणीपुरवठा योजना पुरविण्याचे काम देण्यात आले. यातून एक प्रतिभावान आणि सक्षम जलसंपदा अभियंता म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. हळूहळू त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बेळगाव, धारवार, विजापूर, अहमदाबाद, पुणे आणि भारताबाहेरील एडन बंदरासाठी ब्रिटिश लष्करी वसाहत आदी ठिकाणी काम केले. पुणेजवळील खडकवासला जलाशयाची साठवण क्षमता वाढवणे आवश्यक असताना धरणाची उंची न वाढवता त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण क्षमतेचे प्रदर्शन घडवले. १९०३मध्ये विश्वेश्वरय्या यांनी आठ फूट उंच स्वयंचलित गेट्सची प्रणाली शोधून काढली. जेव्हा पाणी पूर्ण पूर पातळीपर्यंत वाढते तेव्हा हे दरवाजे उघडायचे आणि पूर ओसरल्यावर बंद व्हायचे. त्यामुळे धरणाची पूर्ण क्षमता नेहमीच वापरली जायची. त्यांचे हे ‘पेटंट’ डिझाईन नंतर ग्वाल्हेरमधील तिगारा धरण आणि म्हैसूर राज्यातील कावेरी ओलांडून कृष्णराजसागर धरणासह भारतातील इतर अनेक धरणांमध्ये वापरले गेले. त्यांचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे ब्लॉक सिस्टीम ऑफ इरिगेशन (BSI) ही पद्धत होय. ज्यात कालव्यांद्वारे पाणी पुरवठा रोटेशन आणि पुरवठ्याचे समान वाटप समाविष्ट होते. ज्यामुळे पाण्याचा गैरवापर टाळता येणे शक्य झाले होते. या कल्पनेचा डेक्कनच्या कालवा प्रणालीत उपयोग झाला.

वसाहतवादी ब्रिटीश प्रशासनात कार्यरत अस्वस्थ विश्वेश्वरयांनी १९०८मध्ये ४८व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि फ्रीलान्स सल्लागार अभियंता म्हणून काम सुरु केले. दरम्यान आपला दृष्टीकोन विस्तृत करण्यासाठी त्यांनी युरोप प्रवास केला. युरोपहून परतल्यावर हैदराबाद सरकारने त्यांना सल्लागार अभियंता बनण्याची विनंती केली. हैदराबाद शहराला मुसी नदीच्या विनाशकारी पुरापासून वाचवण्यासाठी आणि चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी सिकंदराबाद-हैदराबाद या जुळ्या शहरांतील प्रसिद्ध टँक बंडची योजना तसेच परिसरातील इतर नाल्यांमध्ये वाहणारे पाणी साठवण्यासाठी त्यांनी योजना आखल्या. दरम्यान त्यांना पूर्वीच्या म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून आमंत्रण मिळाले. १५ नोव्हेंबर १९०९रोजी विश्वेश्वरय्या म्हैसूर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. म्हैसूरमधील कार्यकाळात त्यांनी त्यांची दूरदृष्टी आणि अष्टपैलुत्व दाखवून दिले. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी त्यांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प महाराज सर जयचमराजेंद्र वोडेयार यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी झाले. त्यांनी म्हैसूर आर्थिक परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कावेरी खोऱ्याचे सर्वेक्षण केले. म्हैसूरमधील उद्योगांसाठी पुरेशी वीज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कृष्णराजसागर धरणाची रचना करताना विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या स्वयंचलित स्लुइस गेट्सची नवकल्पना वापरली. दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या हे राज्याचे जलद औद्योगिकीकरण करण्यात आणि तेथील नागरिकांसाठी शैक्षणिक संधींचा विस्तार करण्यात यशस्वी ठरले. नीटनेटके, स्वच्छ, कुठेही एकसुद्धा सुरकुती नसलेले धोतर किंवा सूट आणि डोक्यावर म्हैसुरी फेटा (पगडी) घालणे हे विश्वेश्वरय्यांचे खास वैशिष्ट्य होते. ते शिस्तीचे भोक्ते होते. ऑफिसमध्ये कामासंबंधीची गोष्ट आखीव, घाई न करता, व्यवस्थित करणे ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. स्थापत्यशास्त्रज्ञ विश्वेश्वरय्या हे जन्माने मोठे नव्हते ते प्रयत्नाने श्रेष्ठ झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन, उत्साह आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. 

पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणत, ‘He is an engineer of Integrity, Character and Broad National Outlook.’ १ सप्टेंबर १९६१ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवात पंडित नेहरूंनी आपल्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्याच छापाची पोस्टाची तिकिटे चिकटवलेली होती. त्यांनी युवा पिढीला दिलेला संदेश - It is better to worn out than rust out – अर्थात झिजलात तरी चालेल, पण गंजू नका. गंज चढलेले आयुष्य काय कामाचे? त्यांच्या हयातीत त्यांना अनेक सन्मान मिळाले. १९११मध्ये कमांडर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE), १९१५मध्ये नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (KCIE), स्वतंत्र भारताने १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. विश्वेश्वरय्या हे १०१ वर्षे ६ महिन्यांचे वृध्दापकाळ होईपर्यंतचे शिस्तबद्ध जीवन जगले. १२ एप्रिल १९६३रोजी त्यांचे निधन झाले.
भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना मानाचा मुजरा...

धीरज वाटेकर
स्थापत्य अभियंता चिपळूण


‘अभियंता दिन’ पुरवणीची सुरुवात रत्नागिरीतून!

स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘खाजगी अभियंता’ म्हणून जबाबदारी सांभाळून आवड जोपासण्यासाठी आम्ही पत्रकारितेकडे वळलो. २००२साली वार्तांकनासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातील पोफळी वीज मंडळात साजरा होणाऱ्या अभियंता दिन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. तेव्हा कोकणात फारसा कुठे अभियंता दिन साजरा होत नव्हता. असल्यास तो अभियांत्रिकी कार्यालयातील भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याच्या पलिकडे जात नव्हता. पोफळीतील कार्यक्रमाने आमच्या मनात ‘टयॅब्युलर’ आकाराच्या ‘अभियंता दिन’ पुरवणीची बीजे पेरली. तेव्हा कोणत्याही वर्तमानपत्रात एखाद्या विषयावर ‘टयॅब्युलर’ आकाराची किमान आठ किंवा सोळा पानी पुरवणी करणे हे आव्हानात्मक होते. आमचे तत्कालिन सहकारी ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रमोद पेडणेकर यांच्या सहकार्याने आजपासून वीस वर्षांपूर्वी २००३साली १६ पानी ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून आजतागायत रत्नागिरीसह राज्यातील विविध दैनिकात ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध होत असते. मात्र २००३पूर्वी ‘टयॅब्युलर’ आकाराची पुरवणी प्रसिद्ध झाल्याचे आम्ही पाहिलेले नाही.

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...