रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !


कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (२७ सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्यावर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अॅन्ड वॉचवर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन २०५० पर्यंत जगातील ६८ टक्के लोकसंख्या शहरीभागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात ग्रामीण डेस्टीनेशन्सना मोठ्या संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचीयंदाच्या पर्यटन दिनाची मध्यवर्ती संकल्पना सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन (Tourism for Inclusive Growth) अशी आहे. कोरोनोत्तर काळात ग्रामीण डेस्टीनेशन्सना मोठ्या संधींचा कोकण संदर्भात विचार करताना आपल्याला विकासासाठी हव्या असलेल्या सर्वसमावेशक कोकण पर्यटनाचा विचार करावा लागेल.

लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहोचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी १९८० सालापासून आपल्याकडे पर्यटन दिन साजरा होतो आहे. अलिकडे आपल्या देशाने जबाबदार प्रवासी (Responsible Traveler) बनविण्याचे लक्ष ठेवले असून त्या पार्श्वभूमीवर इको टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया (ESOI) चे रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ सुवर्णकाळठरू शकणार आहे. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६०पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील, असा अंदाज आहे. कोकणसाठी राज्य सरकारने नुकतीच ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मुंबई-सिंधुदुर्ग ह्या ४०० किमीच्या ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) प्रकल्प घोषणा केली. याद्वारे वरळी (मुंबई) उन्नत मार्गावरून साडेतीन तासात मनुष्य सिंधुदुर्गला पोहोचेल अशी संकल्पना आहे. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) आणि सर्वेक्षण काम सुरु झाले असताना वकील ओवेस पेचकर यांनी हा प्रश्न मुमाबी उच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण करत नाही, तोवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रकल्प सुरू करू देणार नाही,’ असं उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला सुनावले आहे. पर्यटकांची वर्तमान मानसिकता पुरेसी कॅश करण्यासाठी कोकणचं कोकणीपण टिकायला हवं आहे. असं असताना कोकणात ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या नावाखाली गेली अनेक वर्षे काय सुरु आहे ? याची जाणीव आम्हाला जुलै महिन्यातील अतिवृष्टीने करून दिली आहे. तरीही अशा महामार्गांसाठी आम्ही अजून किती वृक्षतोड करणार आहोत ? किती निसर्गहानी करणार आहोत ? आणि विकासाचे अनेक मुद्दे बाजूला ठेवून अशा महामार्गाची कोकणला खरंच गरज आहे का ? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. निसर्गसमृद्ध कोकणवर आपण ‘ग्रीन’ नावाने रिफायनरी लादतोय. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यासह इथल्या जंगलांमध्येही अतिक्रमण करून बंगले बांधले गेलेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे इथल्या पर्यावरण प्रेमींना सातत्याने, ‘सह्याद्री वाचवा’ म्हणत आवाज उठवावा लागतोय. तरीही लोकप्रतिनिधी कोकणाचा पर्यटन विकास होत असल्याचे सांगत असतात. हा सारा विरोधाभास वाटावा अशी स्थिती आहे.

एकीकडे सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेच असायला हवे. तर दुसरीकडे आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने आम्ही स्थानिकांनी येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. यासाठी यंत्रणा कार्यरत व्हायला हव्यात. आरोग्य पर्यटनसारख्या विषयात केरळ, तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी असताना आपण कधी यात पुढाकार घेणार ? यासाठी शासन धोरण काय आहे ? भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. अपवादात्मक काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागलंय. यातल्या तारकर्लीला २०११ साली आदरातिथ्यात देशात पहिला क्रमांक मिळाला होता. २०१५ साली तारकर्लीचा देशातील सर्वोत्कृष्ट सागरी किनारा म्हणून सन्मान झाला होता. असं असलं तरी तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? हे फार महत्वाचे आहे. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहे. शासनाने यांना विश्वासात घ्यायला हवे आहे. त्यांच्याकडे ‘कोकण पर्यटन’ म्हणून काही जबाबदाऱ्या सोपवायला हव्या आहेत. जगभरातील पर्यटकाचा कोकण विषयक दृष्टीकोन नकारार्थी होणार नाही याची काळजी घेणारं वृत्तलेखन आणि वार्तांकन होण्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. ‘कोकणात फिरताना पर्यटकांनी कचरा हा कचरा पेटीत टाकावा. पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असे वर्तन असावे. ऐतिहासिक पर्यटनस्थळी आपली नावे लिहिण्याचा मोह टाळावा. तीर्थक्षेत्री अस्वच्छता टाळावी. स्थानिक संस्कृतीची चेष्टा करू नये’, यांसारख्या विषयांवर वेळ देऊन काम व्हायला हवं आहे. यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोकणी माणसे पर्यटन साक्षर व्हायला हवी आहेत. गुहागर, आरेवारे, कुणकेश्वर, तारकर्ली, वर्सोली, दिवेआगर, केळवा आणि बोर्डी येथे बीचशॅक्स सारख्या नव्याने जन्माला येणाऱ्या संकल्पनांना आम्ही थेट गोव्याशी जोडण्यापूर्वी त्यांची कोकणातील मांडणी स्पष्ट करायला हवी आहे. अन्यथा कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर झावळीच्या झोपड्यांमधील बीचशॅकम्हणजे मुली-बाळी निवांत फिरू न शकणारे, कोकणच्या मूळ संस्कृतीला बाधा आणणारे पर्यटन अशी त्यांची ओळख बनेल. कदाचित ती अधिक त्रासदायक ठरेल.

कोकणच्या सागर किनाऱ्यावरून मुंबई ते गोवा जाणाऱ्या देशातील पहिल्या लक्झरियस क्रुज सेवेला कोकणात थांबा नाही आहे. जलवाहतुकीद्वारे पर्यटन सेवेत असलेल्या कोर्डेलिया क्रूझया कंपनीशी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी)करार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात क्रूझ टर्मिनलची आवश्यकता असणार आहे. पर्यटनाच्या या नव्या आयामाला शुभेच्छा देताना याच कोकणातल्या दाभोळ बंदराची माहिती घ्यायला हवी आहे. दाभोळ ते गोवळकोट (चिपळूण) बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मली नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे प्रसिद्ध झालेल्या विश्व गॅझेटिअरमध्येही दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. इतक्या नैसर्गिक नोंदी उपलब्ध असताना आम्ही निसर्ग ह्रासाचे प्रकल्प कोकणात का आणतो ? वर्षा ऋतूतील कोकणी निसर्ग आणि धबधब्यांविषयी चर्चा करताना ही स्थळे पर्यटक कुटुंबियांना पर्यटनासाठी सुरक्षित वाटायला हवीत. मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे असे भव्य प्रकल्प असणे काही गैर नव्हे ! मात्र एकट्या मुंबईवर आपण प्रकल्पांचा अजून किती ताण देणार आहोत ? आणि मुंबईच्या शेजारी असलेल्या कोकणाकडे ममत्वाने कधी पाहाणार आहोत ?

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होत का नाही ? आम्ही कोकण पर्यटनाचं मार्केटिंग कधी करणार आहोत ? याचा खर्च कोणी करायचा ? मध्यंतरी चिपळूणच्या ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी’साठी आम्ही ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड’च्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स केल्या होत्या. ‘डेस्टिनेशन चिपळूण’ सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पण सतत याचा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहातो. एका अंदाजानुसार पर्यटन व्यवसायातील ८० टक्के व्यवसाय हा जाहिरातीवर अवलंबून असतो. तर एकूण पर्यटन व्यवसायातील २०टक्के भाग जाहिरातीवर खर्च केला जातो. कोकणात आमच्या व्यावसायिकांकडून हेही होत असेल का ? प्रश्न आहे. कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्यताकद आहे. यामुळे कोकणातीलसमुद्रकिनारे स्वच्छ आहेत का ? पाहावे लागेल. नसल्यास ते स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे.

देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रत्नागिरीसह सिंधुदूर्गात स्कुबा डायव्हिंग सुरु झाले आहे. तिथेही, ‘फार कमी वेळ मिळतो. समुद्र अस्वच्छ आहे’ अशा पर्यटकांच्या तक्रारी ऐकू येतात. यावर आम्हाला उपाय शोधावा लागेल. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. मुळात कमी बजेट असणार्‍या फिल्म्स करणे ही मोठी कसरत आहे. कोकणात मॅनपॉवर, व्यवस्थापन, जेवणखाणं, निवास या गोष्टी परवडणार्‍या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही अपवादात्मक भेटते, असं यातल्या लोकांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात लो बजेट चित्रपटांची निर्मिती होत असते. कोकणी सौंदर्याला चित्रपटात आणताना याचा विचारही करावा लागेल. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही ? आमच्या कर्नाळा आणि फणसाड या अभयारण्यांची उत्कृष्ट अशी ओळख का नाही ? अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

अख्खं जग सध्या रिव्हेंज टुरिझमसाठी तयार होते आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकण यासाठी तयार आहे का ? कोकणला यासाठी नवीन नीती आणि योजना तयार करावी लागेल. पर्यटकांच्या आरोग्याची नियमित चौकशी,आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकतानाची काळजी आदी नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील. कोकणी माणूस हे करेल यात शंका नाही. पण शासनाने ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग देण्याऐवजी प्रलंबित कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ द्यावे. थीमबेस्ड कोकणला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी व्यापक विचार करावा. कोकणात राज्याचा आर्थिक विकास सांभाळण्याची शक्ती आहे. संकटे कितीही आली तरी कोकण रडणारा नाही लढणारा आहे. हे कोकणी स्पिरिट इथली संस्कृती आहे. जुलैच्या महापुरात ती दिसली आहे. ती पर्यटनातही दिसण्यासाठी कोकणाचा सर्वसमावेशक विचार झाल्यास इथल्या पर्यटन दिनाचे भविष्य उज्ज्वल आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com





आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...