रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आदर्श प्राध्यापक हरपला !


आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते ही दुर्मीळ जाणीव जपणारे, आपल्या लिखाणातून सतत ती व्यक्त करणारे, या वाटेवरून चालणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारे चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त, आदर्श प्राध्यापक मधू जाधव यांचे दिनांक २५ ऑगस्ट (रविवार) रोजी सोलापूर मुक्कामी दु:खद निधन झाल्याची पोस्ट वॉट्सअपवरून समजली. धक्काच बसला. लौकिकार्थाने सरांचा विद्यार्थी नसलेला मी अस्वस्थ मानसिकतेत थेट सन २००२ सालात पोहोचलो !

सन १९७४ ते २००९ इतका प्रदीर्घ कालावधी चिपळूणात प्राध्यापकीय जीवन जगलेल्या सरांची आणि माझी पहिली भेट झाली २००२ सालच्या मराठा साहित्य संमेलनात ! चिपळूणच्या ग्रामीण पत्रकारितेत काहीतरी करण्यासाठी धडपडत असलेल्या मला या संमेलनाच्या स्मरणिकेच्या संपादन समितीत काम करण्याची संधी मिळाली. विषय माझ्यासाठी नवीन होता. मार्गदर्शक होते, अर्थातच जाधव सर ! तेव्हापासून सरांसोबत संवाद सुरु झाला आणि असंख्य स्मरणिका, विशेषांकांचे संपादन, पुस्तकांचे लेखनही ! सन २०१८ साली आम्ही आमच्या ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या जीवनकथेवरील अभिप्राय पुस्तिकेकरिता, चरित्रनायक परांजपे गुरुजींच्या सूचनेनुसार सरांशी संवाद साधला. त्यांना, आम्ही लिहिलेली काही पुस्तके भेटही पाठविली. सरांनी ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ यावर ‘बेस्ट वर्ड्स ईन बेस्ट ऑर्डर’ या शब्दात आपला अभिप्राय पाठविला. सर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आमची इतर भेट पुस्तकेही वाचली. त्यातल्या ‘कृतार्थीनी’ या मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या चरित्र पुस्तकात आम्ही नीटशा माहिती अभावी ‘मोघम’ कॅप्शनसह छापलेला विद्यार्थी वसतिगृहाच्या कोनशीला अनावरण प्रसंगीचा फोटो पाहून, तात्काळ फोनवर ‘हा चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेजचा असून त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले होते’ असे सांगून उत्तम माहितीही दिली. आपल्या देशात गावागावात, कानाकोपऱ्यात विलक्षण काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या जीवनाला शब्दबद्ध करायला हवं. या ठाम मताचे सर होते. आमची ती पुस्तके वाचून सरांनी आपली अलिकडची तीन पुस्तके भेट पाठविली, आवर्जून अभिप्रायही मागितला. त्याबाबत फोनवर बोलणंही झालं ! मात्र लेखी अभिप्राय द्यायचा राहिला तो राहिलाचं ! ती तीनही पुस्तकं सरांच्या आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते या भूमिकेशी सुसंगत आहेत. सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद (रावबहादूर मल्लप्पा बसप्पा वारद), उद्योगरत्न श्री. ए. जी. पाटील ; एका संघर्षाची कहाणी आणि तिसरे आहे होनमुर्गीचे संत श्री सद्गुरू जंगली महाराज (मोहम्मदशाह उर्फ जंगलीशाह दाऊदशाह कादरी) यांचे ! पुण्याच्या जंगली महाराज रोडवर एक तपाहून अधिक काळ माझे जाणे-येणे आहे. मात्र त्या मूळ स्थानाची सरांनी दिलेली, सोलापूरच्या होनमुर्गी गावात आपल्याला घेऊन जाणारी माहिती यापूर्वी वाचलेली नव्हती.  

तीन तपाहून अधिक काळ सरांनी साहित्य, इतिहास, संत, समाजसुधारक या विषयांच्या अवतीभवती राहून आपला जीवनकाळ सफल केला. अलिकडेच सरांच्या २२ व्या कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे २७ नोव्हेंबर २०१८ ला ना. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. ‘सोलापूर जिल्हा पर्यटन’ पाठोपाठ सध्या सर ‘अक्कलकोट दर्शन’ लिहित होते. चिपळूणातून, कोकणातून त्यांच्याकडे जाणाऱ्या स्नेहींना ते आपणहून अभ्यासपूर्ण अक्कलकोट दर्शन घडवितं. आम्हांलाही त्यांनी यायला सुचविले होते, पण तेही राहिले. या पुस्तकानंतर ‘संत गाडगेबाबा’ यांच्या जीवनावर विस्तारपूर्वक लिहायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. खरंतर गाडगेबाबांविषयी आम्हांलाही अतीव आदर असल्याने आम्ही, ‘आपले पुस्तक वाचावयास उत्सुक आहोत’ असे त्यांना बोललो होतो, आता तेही राहिले. सरांचे विवेकवादी लेखन, आकाशवाणीवरील व्याख्याने इथल्याप्रमाणे सोलापूरातही सुरूच होती. सरांच्या भूत भानामती जादूटोणा आणि शोध भुताचा या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले होते. आदर्श प्राध्यापक, प्रौढशिक्षण कार्यकर्ता, व्यसनमुक्ती कार्य, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्या कामासोबतच ते कन्या भक्ती हिच्या जलचळवळ अभियानचे खंबीर पाठीराखे होते. स्वतःची पदरमोड करून सुरु असलेला भक्तीचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी ते सुरुवातीपासून गेली ८ वर्षे सोबत राहिले. परवाच्या ९ ऑगस्टला भक्तीने फेसबुकवर, ‘उजनीतील पाण्याने हिप्परगा तलाव भरणार, पप्पांचं - आमचं स्वप्न पूर्ण होतंय, धन्यवाद. सोलापूरला आल्याचे सार्थक झाले, लाखोंना पाणी मिळेल !’ अशी पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला. तो सरांनी सरांनी ‘याचि देहि याची डोळा’ अनुभवला आणि अवघ्या दोनेक आठवड्यात सर गेले ! हा सरांच्या कुटुंबियांवर मोठा आघात ठरला आहे.  
       
जेष्ठ संपादक, नानासाहेब जोशी यांनी, ‘चिपळूणला मिळालेले वैभव’ अशा शब्दात सरांचा गौरव केला होता. त्याचा अर्थ जाधव सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या ‘ज्ञान जान्हवीचा प्रवाह’ या डी.बी.जे. कॉलेजच्या साडेतीन तपाची वाटचाल सांगणाऱ्या ग्रंथाकडे पाहाताना कळतो. अशा प्रकारचे ग्रंथ सिद्ध करताना, यापूर्वी असे काम केलेल्यांचा संदर्भ समोर ठेवून काम करण्याची सरांची सवय, आपल्यालाही असल्याबाबत आम्हांला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले होते. असो ! सरांनी देहदान केले होते. त्यांचे अचानकचे जाणे सहृदयांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज वाटेकर  

२२ व्या पुस्तक प्रकाशन प्रसंगीचा क्षण !

दैनिक सकाळ रत्नागिरी २५ ऑगस्ट २०१९  

दैनिक सकाळ सोलापूर ३१ ऑगस्ट २०१९














सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

एक ‘संजय’ मलाही भेटला !



निश्चित तारीख नि वार डायरीत शोधावा लागेल ! पण पावसाळ्याचे दिवस होते. सायंकाळची चहाची वेळ ! ठिकाण बहुधा तृप्ती हॉटेल असावं ! लिहिलेलं मनाजोगं छापून येतं नसल्याच्या, नाराजीत वावरत असलेल्या मला त्या दिवशी संजय सहजच बोलून गेला. ‘कुठल्यातरी पेपरला जॉईन हो ! लिहिलेलं छापून यायला तेही आवश्यक असतं.’ झालं ! त्याच्या या वाक्याने पुर्वानुभावामुळे ‘पत्रकार’ होण्याची इच्छा नसलेला मी केवळ आपलं लिहिलेलं छापून येईल या एका आशेने पुन्हा पत्रकारितेकडे वळलो. त्यात रुळलो आणि जवळपास १२/१४ वर्षे वावरलोही ! आज या घटनेला, संजयच्या जन्मतारखेएवढी वर्ष पूर्ण होताहेत. ‘संजय’ स्वतः कसा आणि किती बहरला ? याबाबत आत्ताच एक्कावनीच्या उंबरठ्यावर मांडणं कदाचित घाई-घाईचं होईल. पण त्याच्या सहज स्वभावातून, बोलण्यातून, गुदगुदल्यांतून, माणूस जोडो अभियानातून अनेकांचं निभावल्याचं मी तरी पाहिलंय ! ही यादी मोठी आहे. या मागची कारणं शोधताना, का कुणास ठाऊक ? पण कायम मला महाभारतातला संजय आठवतो आणि मी म्हणतो, ‘एक संजय मलाही भेटला.’    
 
महाभारतातल्या संजयला सगळेच ओळखतात. हा संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होता. तो धृतराष्ट्राला नेहमी सल्ला देत असे. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना या संजयच्या वाणीने ऐकली होती. असो ! प्रस्तुतच्या गौरवांकाची गौरवमूर्ती असलेला आमचा संजय आज वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करतोय ! यशस्वी आयुष्याचा अर्धशतकी टप्पा त्याने पूर्ण केला आहे. आमचाही संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. माझ्यासह अनेकांना त्याने आजवर अनेक उपयुक्त सल्ले दिलेत. आपल्या पोटापाण्याच्या ठिकाणावरील कामाचा, तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा बरोबर अंदाज घेत, त्याचा उपयोग करून स्वतःकडे, शिल्लक असलेला ‘वेळ’ दुसऱ्या कामात गुंतवून पदरात यश पाडून घेण्याचं फार कमी लोकांना जमलेलं कौशल्य संजयने जमवलंय ! यामागचं त्याचं तत्वज्ञानही खूप साधं, सरळ नि सोपं आहे. नोकरीच्या निमित्ताने तो गाणे-खडपोली एम.आय.डी.सी.तील जे. के. फाईल्स कंपनीत कामगार म्हणून रुजू झाल्यावर दुपारी साडेतीन नंतरचा वेळ शिल्लक असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुंदर हस्ताक्षर असलेला संजय अधिकचे काय करता येईल ? याच्या शोधात असताना त्याला ‘पत्रकारिता’ हे क्षेत्र गवसले. कंपनीतील निळ्या कपड्यांचा त्याने त्याच्या मानसिकतेवर कधीही परिणाम होऊ दिला नाही, हे त्याच्या विनोदी जगण्याच्या पद्धतीचे सर्वात मोठे यश मानायला हवे. तो कार्यरत असलेल्या कंपनीत, पंचक्रोशीतल्या जवळपास साऱ्या गावातील सहकारी असल्याने गावोगावच्या ताज्या घटना त्याला एकाच ठिकाणी कळायच्या. बोलका, विनोदी स्वभाव असल्याने त्याचं तेव्हाही आणि आजही कुणाशीही जमतं. या मिळकतीच्या जोरावर संजयने पत्रकारिता यशस्वी केली. तेव्हा या भागात हा एकटाच पत्रकार म्हणून कार्यरत होता. शैलीदार बोलण्यामुळे तो हसतखेळत बातम्या मिळवायचा. त्याच्या या बातम्यांनी ‘तरुण भारत’ वृत्तपत्राच्या रत्नागिरी आवृत्तीचा सुरुवातीचा काळ गाजविलायं. कोयना प्रकल्प अस्तित्वात येत असल्याच्या कालखंडापासूनचा अलोरे पंचक्रोशीचा ‘संजय’ हा एक चालता-बोलता इतिहास आहे. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात त्याच्या फेसबुकवरील पोस्ट वाचल्यावर प्रतिसाद म्हणून जो आठवणींचा पाऊस कमेंटमध्ये पडतो, तो पहिला की याची जाणीव व्हावी. आपल्याला कशाकशातलं किती कळतं ? यात अडकण्यापेक्षा आपल्याला जे काही कळतं, त्याचा सर्वोत्तम उपयोग करून आयुष्य सार्थकी कसं लावावं हे संजयकडून शिकावं !    
   
आता सोशल मिडिया अधिक प्रभावी झालायं ! मनातलं सगळं पेपरात छापता येतचं असं नाही. मग संजय या सोशल मिडियाचा सहज वापर करताना दिसतो. अलिकडच्या काळात अलोरेतील देवमाणूस असलेले डॉ. पी. डी. पांढरपट्टे यांनी वयोमानपरत्त्वे, निवृत्तीनंतरही सुरु असलेला आपला दवाखाना बंद करून मुलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संजयला कळले. त्याने ‘देवमाणूस दूर चाललायं, हे वेदनादायी आहे’ म्हणत आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविल्या. अलोरे हायस्कूलने आपल्या सन १९७२ पासूनच्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचं ठरवलं. त्यात याला आपला शालेय मित्र अनिल रायबागी भेटला. विप्रो या नामवंत उद्योग समूहाचा व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेल्या मित्राशी संजय ज्या आत्मीयतेने एकरूप झाला ते कौतुकास्पद होते. शाळेनेही प्रत्यक्ष कार्यक्रमात रायबागींचा सन्मान संजयच्याच हस्ते केला. असंख्य राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या व्यंकटेशराव कररा यांच्यासोबत सुरुवातीच्या कठीण काळात उभे राहणाऱ्यांपैकी संजय एक जबाबदार घटक आहे. चिपळूणच्या पूर्व भागात असलेल्या दसपटीतल्या व्यक्तिमत्त्वांचा याला प्रचंड अभिमान ! तो त्याच्या लेखणीतूनही जाणवतो. याच अनुषंगाने त्याने दैनिक तरुण भारतमध्ये पूर्वी ‘बॉर्डर’ नावाचे सदर चालविले होते. आजही तो या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वांविषयी लिहित असतो. पूर्वीचं हे सगळं लेखन त्यानं सांभाळलं असतं तर आज एक सुंदर पुस्तक झालं असतं. स्वतः गुणवंत कामगार ठरल्यानंतर त्याने इतरांना प्रेरणा दिली. कामगार कल्याण मंडळाचे उपक्रम समाजातील कामगारांपर्यंत पोहोचावेत म्हणून तो आजही धडपडत असतो. गप्पांच्या निमित्ताने घडलेला एखादा जुना गंमतीदार किस्सा जसाच्या तसा पुन्हा उभा करून सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. सहजतेने मनातलं सगळं बोलून मोकळं होण्याचा त्याचा स्वभाव अनेकांना आवडतो. या स्वभावाने कधीकधी त्याचं नुकसानही होतं ! पण संजयला त्याची फारशी चिंता नसते. ‘पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेलं पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !’ असं म्हणणाऱ्या व. पु. काळेंच्या लिखाणाचा संजयवर मोठा पगडा आहे. वाचनाची गोडी लागायच्या सुरुवातीच्या कालखंडात त्याने त्यांचीच पुस्तके अधिक वाचलीत. हे त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून कुणालाही लक्षात यावं. कुणाला पटो अथवा न पटो ! आपल्या साऱ्या कुटुंबियांसह जवळच्या अनेक मित्रांच्या अडचणींच्या प्रसंगी धावून जाणारा संजय अनेकांना माहिती आहे. किंचित उशीरा लक्षात आल्यानंतरही झपाटल्यासारखा तो श्रद्धा वहिनीच्या मागे उभा राहिला, तिचे शिक्षण त्याने पूर्ण होऊ दिले. अर्थात वाहिनीनेही त्याच्या विश्वासाचं चीज केलं. ‘शिक्षिका’ म्हणून वाहिनीची आजची असलेली ओळख निश्चित कौतुकास्पद आहे. त्याच्या दोनही गुणवान लेकरांच्या प्रगतीचा आलेख कुणालाही हेवा वाटावा असाच राहिला आहे. त्याचा आजचा गौरव सोहोळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला आईचं असणं जितकं आनंददायी आहे तितकंच अण्णांचं नसणं वेदनादायी आहे.        

मी व्यावसायिक, सामाजिक स्तरावर कार्यरत होतानाच्या कालखंडातल्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी ‘संजय’ एक आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातलं चांगलं-वाईट जवळून अनुभवलेल्या संजयने, वयाने तब्बल ११ वर्षांनी मोठा असूनही जसं माझ्यासारख्याला मित्र म्हणून सहज स्वीकारलं, तसं अनेकांना स्वीकारलेलं आहे. माझ्या लग्नाचा सन्माननीय निमंत्रक राहिलेल्या संजयविषयी सांगण्यासारख्या खूप काही आठवणी माझ्याजवळ आहेत, तशा त्या अनेकांजवळ असणार आहेत. आजपासून काळ जसजसा पुढे जात राहिलं तसतशा त्या उलगडत जातील ! उलगडणाऱ्या अनेकांच्या आठवणींमधून एक माणूस म्हणून ‘संजय’चे व्यक्तिमत्व समाजात अधोरेखित होईल ! या साऱ्या शुभेच्छांतून नवचैतन्याने भारलेले संजयचे व्यक्तिमत्त्व समाजाच्या प्रत्येक हाकेला ‘ओ’ देण्यासाठी अधिक क्षमतेने कार्यरत होईल, या विश्वासासह !

धीरज वाटेकर

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...