शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

दृष्टी परिवर्तनाचे ‘रक्षाबंधन’ घडावे !

     
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी बहिण भावाच्या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृती मानवी जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असे वचन आहे अर्थात ‘जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो.’ हे सारे खरे असले तरीही स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचार आपल्याला नवीन नाहीत. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळात रक्षाबंधनाचा सण हा मानवी दृष्टी परिवर्तनाचा सण बनायला हवायं ! ज्यातून भारतीय संस्कृती संवर्धनाचे मूल्य बदलत्या युगातही जपले जाईल.

      हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेस राखी पौर्णिमा येते. ही पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावाआपल्या भावाने आपले रक्षण करावेही या मागची मंगल मनोकामना ! रक्षाबंधन एकमेकांशी जवळीक साधण्याचा, परस्परांना हमीविश्वास देण्याचा, ‘मी तुझ्या मदतीसाठीसंरक्षणासाठी इथे आहे, मी आपल्या नाते संबंधाप्रति,  मैत्रीप्रति वचनबद्ध आहे’  हा विश्वास दर्शवण्याचा सण आहे. आपल्याकडे पूर्वी सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपणलाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणीतरी असावा, ही भावना भावाजवळ येऊन थांबे, तेव्हा ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतं. कोणत्याही क्षणीप्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणाऱ्या भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना बहिणीच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भसंस्कार यात महत्त्वाचा आहे. ‘राखी ह्या शब्दातच ‘रक्षण कर (राख म्हणजे सांभाळहा संकेत आहे. रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झालीयाबाबत निश्‍चित पुरावा नाही. एका आख्यायिकेनुसार पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे अनेकदा देवांचे काही चालत नसे. एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेलअशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याला त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे म्हणतात. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले होते. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलत असते. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःकडे घेत असतो. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे बहिणीचे भावाच्या विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत यामध्ये दिसून येतो. देशाच्या काही भागात ज्या स्त्रीयांना भाऊ नाहीत्या स्त्रीया चंद्राला आपला भाऊ मानून ओवाळतात. हा पूर्वांपार चालत आलेला सणभारतीय संस्कृतीमध्ये आजही मानाचे स्थान राखून आहे.ह्याच दिवशी आपले कोळीबांधव खवळलेल्या सागराला शांत करण्यासाठीत्याची पूजा करून नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात थांबलेल्या मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात.

      आज बदलत्या काळात राख्यांचे ट्रेण्डही बदललेत. सध्या बाजारात डिझायनर राख्यांची चलती आहे. बच्चे कंपनीसाठी डोरेमॉनपासून बालगणेशापर्यंत राख्यांची भरपूर व्हरायटी आज पहायला मिळते आहे. एका मोठ्या मण्यामध्ये आणि दोन्ही बाजूला एकेक किंवा अधिक छोटे मणी अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या बीड्स राख्यांना आज बाजारात खूप मागणी आहे. जरदोसी धाग्यांपासून वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बनलेल्या राख्या, लहान मुलांच्या भावविश्वातली मिकी माऊस, टेडी बेअर, बॅटमॅन, हॅना मॉण्टा, छोटा भीम,बालगणेशडोरॅमॉन कार्टून्स विराजमान असलेल्या राख्या, मण्यांप्रमाणेच मोत्यांचाही वापर असलेल्या डिझायनर राख्या, विविध रंगधागे आणि आकारात मिळणाऱ्या फॅन्सी राख्यांसह स्वस्तिकजपमाळेतील मणीरुदाक्षओम्कुयरीगणपतीदेवी अशी अक्षरं / चिन्हं असणाऱ्या धार्मिक, अध्यात्मिक टच देणाऱ्या राख्यांनी मार्केट काबीज केले आहे. डायमण्ड्स, मणी, वेल्वेट बॉल्स यापासून बनवण्यात आलेली ब्रेसलेट राखी, फेंगशुईतील विण्डकॉइन, ड्रॅगन, कासव, गोल्डफिश, लाफिंग बुद्धा अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षीचा ट्रेंड आहे तो वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो असे लिहून धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा. बदलत्या काळात नात्यातील भावना त्याच असल्या तरी परिसीमा बदलताहेत. पूर्वीपासूनचा कडक स्वभावाचा दादा आता मित्र किंवा कुल ब्रो झाला आहे. त्यामुळे राख्याही बदलल्यात. राखीपौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षकआणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे तरुणींचा कल जास्त आहे, अर्थात बाजारपेठेनेही याची दाखल घेतलेली आहे. ऑनलाइन मार्केट अर्थात इन्स्टाग्रामफ्लिपकार्ट सारख्यासाइट्सवरूनही राख्यांची विक्री होते आहे. ‘प्लॅटिनम बँड्स’ हे सुद्धा राखीचं एक महागडं नवं रूप बाजारात उपलब्ध आहे. कस्टमाइज्ड गोष्टी आवडणाऱ्यांसाठी, भावांना त्यांच्या नावाच्या आद्याक्षराची राखी बांधणं पसंत करणाऱ्या बहिणींसाठी वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये नावे कोरून अ‍ॅक्रेलिक, लाकूड, धातूवर तयार केलेल्या राख्या अनेकांनाभावताहेत. बाजारात या राख्यांचं प्रमाण फारसं नसलं तरी त्या ऑनलाइन उपलब्ध होताहेत. राखीला बंधू-भगिनी प्रेमाची झालर म्हणून चक्क भावाबहिणीचे फोटोच राखीवर पिट्र करून घेण्याचा नवीन प्रकार रुजू पाहतो आहे, अर्थात राखीतही आता डिजिटलायझेशन येत आहे.

      आमच्या लहानपणी आम्ही सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या चकतीची स्पंजवाली राखी मनगटावर आवडीने मिरवायचो. एक सोनेरी धागा, त्या धाग्याच्या मधोमध एक चांदीची चकती, त्या चकतीवर एक भला मोठा स्पंज आणि त्या स्पंजवर फुलं, मोती असलं काही तरी डिझाइन असायचं. ही राखी बांधल्यानंतर दुसऱ्या किंबहुना त्याच दिवशी पहिल्या त्या राखीच्या चकत्या गळून पडायच्या. मग स्पंज सुटा व्हायचा आणि दोन दिवसांनंतर मनगटावर फक्त धागा शिल्लक राहायचा. स्पंजचा वापर पाटी पुसायला व्हायचा. लालहिरव्यापिवळ्या अशा कोणत्याही रंगात मिळणारी रेशमी गोंड्याची साधी राखी अनेकांच्या हातावर दिसायची. बालपणातली राखी म्हटलं की अजूनही हेच चित्र राखी डोळ्यांसमोर येते. त्या काळीही चंदनाचा एखादा छोटासा नारळ, एकच फुलं, रूदाक्ष अशा डिझाइनच्या आटोपशीर राख्याही होत्या. स्वस्तिकचं चिन्ह आणि त्यावर शुभ लाभ ही अक्षरं असलेली राखी अपवादाने दिसायची. राखी जेवढी मोठी, तेवढं चांगलं, अशी एक वेडी समजूत मनात कुठेतरी घट्ट रूजलेली होती. शाळेतल्या रक्षाबंधनाची मौज वेगळीच होती. तिसरी-चौथीत असताना आपल्याच हातावर अधिकाधिक राख्या असाव्यात, असं वाटायचं. नि आठवी-नववीत आल्यानंतर, आज आपला हात प्लास्टरमध्ये असता तर किती बरं झालं असतं ? असा विचार मनात येऊन जायचा, असो !

            कुरियर, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात पोस्टानं राख्या येणं कमी झालं तरीही ग्रामीण भागात ते कायम आहे. माध्यमं बदलली असली तरी माया कायम आहे. हा सण साजरा करण्यामागचा मूळ हेतू, शास्त्र जाणून तरुण पिढी या संस्कृतीलापरंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. याची जाणीव करून देण्याची जबाबदारी ज्येष्ठांनी योग्य रित्या पार पाडली तर हे सण मानवी जन्माचे सार्थक घडवतील.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

‘ग्रेटभेट’ : विश्वविख्यात 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे

      जेथे अंधार आहे, तेथे दिवा लावा !
     
माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपतीपदाच्या काळातील आपल्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान विश्वास दाखवलेले आणि संपूर्ण जगभर 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' अशी ओळख असलेल्या, '...आणि दोन हात' या प्रसिद्ध आत्मचरित्राचे नायक आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांची त्यांच्या दादर येथील क्लिनिकमध्ये आम्ही नुकतीच (१८ ऑगस्ट २०१८) सदिच्छा भेट घेतली. आपल्या समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. समाजात वाईट कितीही असलं तरीही आपण आपल्या आयुष्यात काय चांगलं करू शकतो ? याचा विचार सतत केला पाहिजे. असे सांगून,  'जेथे अंधार आहे तिथे दिवा लावा !' जे काम करतायं, ते लिहूनही ठेवा. उपयोग होईल, असा सल्ला ८७ वर्षे वयाच्या आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांनी दिला.

      दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी, प्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांचे आम्ही लिहिलेले चरित्र, आमची आठवी लेखनकृती 'कृतार्थीनी' प्रकाशित झाल्यानंतर, त्या पुस्तक लेखनाचे कौतुक करण्यासोबतच आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांनी, 'मुंबईत याल तेव्हा अवश्य भेटा' अशी सूचना केली होती. आम्हालाच त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला बराच उशीर झाला, अर्थात संपर्क होता !

      'काळोखाचा सागर किती अथांग असला,
      तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातचं !’
ही कुसुमाग्रजांची कविता सरांनी आम्हाला ऐकवली. आपलं वय किती ? आणि काही कौटुंबिक प्रश्न विचारल्यानंतर, इंजिनियर असूनही पैशाच्या मागे न धावता लेखनकला जोपासून आहात. तुमच्याकडे पाहून तुमच्या मित्रमंडळींचा काय वाटते ? सद्यस्थितीत लोकं जागे होत आहेत का ? शिक्षणाचा परिणाम काही होतोय का ? कोणाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडला ? संस्काराची शिदोरी ? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी विचारले. विशेष म्हणजे आम्ही देत असलेल्या उत्तरातील मुद्दे, हातात कागद-पेन घेऊन आदरणीय डॉ. श्रीखंडे सर स्वतः टीपत होते. आमच्या जीवनातील हा अत्यंत विलक्षण असा अनुभव होता.

      बोलताबोलता आमची कॉलेजमध्ये असल्यापासूनची चरित्रे वाचनाची आवड आणि त्यातून 'कॅटलिस्ट' प्रमाणे कार्यरत राहाण्याची बनलेली मानसिकता त्यांनी बरोबर हेरली. आमच्या व्यक्तिगत ग्रंथालयाची, संकल्पित संग्रहालयाची माहिती, कोकणातील पर्यटन, पर्यावरण विषयक आम्ही करीत असलेल्या कामांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. पुरातत्तवीय नवलांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, संग्रहालयाकडे आत्यंतिक आवश्यक म्हणून पाहण्याच्या आपल्याकडील वृत्तीचा अभाव आणि विदेशी लोकांची संग्रहालये विकसित करण्याची मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले. भरपूर पैसा कमावणारी माणसं आज प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगून त्यांनी याच्या पुष्ठ्यर्थ वैद्यकीय जीवनातील अलिकडची उदाहरणे सांगितली.

      अटलबिहारी वाजपेयींबद्दल तुला काय वाटतं ? या त्यांच्या प्रश्नावर बोलताना, 'काही माणसांचं मोठेपण आपल्याला उशीरा समजतं. किंबहुना माणूस गेल्यावर समजतं.' हे आमचे उत्तर ऐकल्यावर या मागची कारणमीमांसा करताना ते थेट आठनऊशे वर्षे मागे गेले. इतिहासात आपली प्राचीन भारतीय संस्कृती महान आहे. संपत्ती आणि सुबत्ता यामुळे भारतावर झालेली परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्यात गेली आठ-नऊशे वर्षे राहिल्याचा हा परिणाम आहे. जे देश कधी पारतंत्र्यात गेलेच नाहीत ते पाहिले की हे जाणवतं असे त्यांनी सांगितले. वेस्टर्न सायन्स येईपर्यंत जगात आयुर्वेद श्रेष्ठ सायन्स होते. आज दुर्दैवाने आपल्याकडे संशोधन कमी, थापा मारण्यात रस अधिक अशी मानसिकता जाणवत असल्याचे ते म्हणाले. चीनच्या सामान्य माणसाची कमाई आपल्याकडील माणसाच्या सहा पट अधिक आहे आणि हे गेल्या वीस वर्षांत घडलंय याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शंभर वर्षांपूर्वी बालकामगार जगात सर्वत्र होते, आज नाहीत कारण जगं बदलत चाललंय. जातिभेद मागे पडलाय. पूर्वी माणसं मलेरिया टायफाईड न्यूमोनिया ने मरतं, आज ते ही बदललंय. आपल्याकडे भारतात कायद्याने न्याय उशीरा मिळतो आणि ते योग्यच आहे अन्यथा सर्वजण कोर्टात जात राहतील असेही त्यांनी सांगितले.

      जगातील सुंदर आहे नि अनेक चांगली माणसं चांगली कामं करताहेत. लेखणीतून माणसं तयार होऊ शकतात, माणसं बदलू शकतात. माणसांना बदलवण्यातच खरे कौशल्य आहे. स्वतःबद्दल पुस्तक लिहा, प्रकाशित कधी करायचं ते नंतर बघू पण स्वतःविषयी लिहायला सुरुवात करा. ‘जी चूक मी केली ती करू नका’, असा आपुलकीचा सल्लाही सरांनी दिला. गेली २० वर्षे आम्ही डायरी लिहितोय हे मात्र सरांना सांगायचे राहून गेले. आम्ही चिपळूणचे म्हटल्यावर, सरांनी चिपळूणचे प्रसिद्ध डॉ. रत्नाकर घाणेकर हे माझे विद्यार्थी अशी आठवण सांगून डॉ. देवधर, डॉ. पाटणकर, नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. 'या भेटीने समाधान झालेलं नाही, पुन्हा भेटायला याअशी आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांची सूचना ग्रहण करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

https://www.facebook.com/groups/2124009321200341/permalink/2153386568262616/?__tn__=K-R


आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...