शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

कोकण पर्यटन आणि डिजिटल विश्व







शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची गती ही समुद्रकिनाऱ्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. ‘डिजिटल लाईफस्टाईल’ हाही असाच एक बदल आहे, तो कोकणने स्वीकारलेला दिसतो. ‘डिजिटल लाईफ’चं मूळ अधिकाधिक व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे कोकणने ‘आमची शाखा कुठेही नाही किंवा जेवणाची काय ती एकदाच ऑर्डर द्या किंवा कोकम सरबताच्या कितीही बाटल्या घ्या, चव बदलणार नाही आणि पैसेही कमी होणार नाहीत’ या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. तरच ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेल्या ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये कोकण पर्यटनाला टिकाव धरता येईल.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इंटरनेट, संगणक आणि मोबाईलद्वारे आपली उत्पादने आणि सेवांचे विपणन अर्थात मार्केटिंग करणे तुलनेने गतिमान झालेले असले तरी त्याचे चांगले-वाईट परिणामही त्याच वेगाने पसरत असल्याने हे तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे आहे. त्यामुळे याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर व्हायला हवा आहे. कोकण पर्यटनात काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेलं ‘डिजिटल मार्केटिंग’ शिकलं पाहिजे. आपण डिजिटल युगात जगत आहोत. मे २०१९ च्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या ७७० कोटी असताना ४४० कोटी लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. सरासरी दोन तास या प्रमाणे ३५० कोटी लोक सोशल मीडिया वापरत होते. गुगल सर्चइंजिनवर प्रत्येक सेकंदाला ४० हजाराहून अधिक सर्च यायचे. यातले ६० टक्क्याहून अधिक सर्च मोबाईलवरून व्हायचे. फेसबुकवर प्रत्येक सेकंदाला ६ नवे प्रोफाईल निर्माण होत होते. त्याच ठिकाणी ६ करोड हून अधिक अॅक्टिव्ह पेजेस होती. साधारणपणे ३०० तासांचे व्हिडिओ युट्युबवर प्रत्येक सेकंदला अपलोड होत होते. इंस्टाग्रामवर दर महिन्याला ८० करोड लोक अॅक्टिव्ह होते. ही आकडेवारी वाढत जाणारी आहे. आजचा ग्राहक डिजिटल आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांनाही अधिकाधिक ‘डिजिटल’ व्हावे लागणार आहे. पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध असलेल्या Shopping, Ticket and Room Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Job searching आदि बऱ्याच बाबी डिजिटल होत आहेत. इंटरनेटच्या या सर्वव्यापी ट्रेंडमुळे पर्यटन व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचा वाटा खूप मोठा राहाणार आहे. एका अभ्यासानुसार तंत्रज्ञान वापर करणाऱ्यांपैकी ७० हून अधिक टक्के लोकं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्याआधी ऑनलाईन, फिरायला बाहेर पडण्याआधी माहिती घेत असतात. त्यामुळे जगाच्या डिजिटल बाजारात आपली ‘कोकण’ म्हणून दमदार आणि देखणी उपस्थिती असायला हवी. डिजिटल दुनिया ही आपल्याला कोकण म्हणून ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवते. ग्राहकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करते. ती आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्यासाठी उपयुक्त आहे. कोकणातील पर्यटन निगडीत उत्पादने आणि व्यावसायिकांनी आपल्या सेवांची ऑनलाईन जाहिरात करायला हवी आहे. Video Marketing, ईमेल मार्केटिंग हीही काळाची गरज आहे. डिजिटल जमान्यात Content Marketingला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या कोकणातील पर्यटन निगडीत व्यवसायाविषयी व्यक्त होताना पुरेशी काळजी घ्यायला हवी आहे.

आपल्या देशात इंटरनेट प्रभावी झालं तेव्हा डिजिटल मार्केटिंग काही लोकांपुरते मर्यादित होते. सोशल मिडिया प्रभावशाली झाल्यावर ते सामान्यांना खुले झालेले आहे. त्याचा नीट उपयोग करून घेणे ही कला असून ती आपण आपल्या आवश्यकतेनुसार शिकायला हवी आहे. आजही कोकणात महामार्गावर बहुतांशी हॉटेलात टिपीकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही. पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात तर प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी ? आणि कसे ? यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. सावंतवाडीतील लाकडी वास्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमीपुत्रांची पाऊले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात. येत्या काही वर्षात साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यास रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नातून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो डिजिटल असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाईल्डलाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाईल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटरपार्क, थीमपार्क आणि सर्वात महत्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राईड सारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रीय करत त्याचे डिजिटल मार्केटिंग करून कितीतरी समृद्धी आणणे शक्य आहे. अर्थात पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा काळजीपूर्वक सांभाळला जायलाच हवा ! आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्क कल्चर नाही. सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरात नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खाजगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोकं ‘सेकंड होम’ एन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी आम्हाला डिजिटल सक्षम व्हावे लागेल. आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने डिजिटल जाहिरातीतून आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये कोकण दिसायला हवे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते. पण तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? इथे अजून डिजिटल मार्केटिंग हवे आहे.

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल. डिजिटल प्लॅटफॉर्म इथे उपयोगी पडेल, पडतो आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची डिजिटल दृष्टी विकसित व्हायला हवी. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची पडायला हवा आहे. चिपळूणच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारीसाठी आम्ही ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. डेस्टिनेशन चिपळूणसर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला. पण सतत याला येणारा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहिला. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी निधी लागणार आहे. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी. 

कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं डिजिटल मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

    कोरोना पश्चात अख्खं जग रिव्हेंज (रिस्क) टुरिझमसाठी तयार झाले आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकणही यासाठी तयार आहे. शासनाने कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ या इथल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोकणातलं कौलारु घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाची, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट इकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या हृदयात उतरायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढऱ्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते ? हे अजून कितीकाळ शब्दातच सांगायचं ? कोकण पर्यटनातील सर्व उद्योग, पर्यटन सुविधा आदिंची माहिती एका क्लिकवर आणण्यासाठी सोशल मिडीयावर शेकाडोनी ग्रुप्स कार्यरत आहेत. यांद्वारे जमा होणारा ‘डेटा’ ही आजच्या ‘डिजिटल लाईफ’मध्ये सर्वात मोठ्या संपत्ती प्रमाणे आहे. तिचा उपयोग ‘कोकण पर्यटन’ म्हणून काळजीपूर्वक व्हायला हवा आहे. कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा डिजिटल मार्केटिंगवर खर्च करतो ? हे फार महत्त्वाचे आहे. व्यवसायासाठी हा खर्च व्हायला हवा आहे. डिजिटल जीवन शैलीतील माध्यमांचा सर्वोत्तम उपयोग करून कोकण पर्यटन वृद्धी शक्य आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८,

dheerajwatekar@gmail.com

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...