सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने...!

यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाला, ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो) ने एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून ते उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये कौशल्यपूर्ण रीतीने स्थापित करण्याची जागतिक पातळीवरील ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केली तिच्या यशाची किनार आहे. बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ रोजी  सकाळी वाजून २८ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे यान १०४ उपग्रह घेऊन अंतराळात झेपावले, या कामगिरीने इस्रो आणि इस्रोत काम करणार्‍या सर्व राष्ट्रभक्त शास्त्रज्ञांबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पण भावनेने केलेल्या कष्टाचे हे चीज असून हे यश नजरेसमोर ठेवूनच यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाकडे पाहायला हवे !

दुसरीकडे संपूर्ण जगाशी आपली विज्ञान म्हणून तुलना करताना आपले किती शोधनिबंध प्रसिद्ध होतात ? अत्युत्कृष्ट ठरेल असे नवीन संशोधन (ब्रेक थ्रू) किती ? आणि आपण केलेल्या संशोधनाचे तंत्रज्ञान आणि व्यवसायात रूपांतर किती ? असे हमखास ठरलेले प्रश्न पुढे येतात. यातील पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक असली तरी तिसर्‍या विज्ञानाच्या यशस्वी व्यावसायिक रुपांतरणाच्या बाबतीत आपण अजूनही अडखळतो आहोत, असे यातील तज्ञान्चे मत आहे. यास्तव देशात सध्या "मेक इन इंडिया" चा प्रयोग सुरू झाला असावा ! काहीही असले तरी ती सध्याची गरज आहे.

विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्याची गरज जगातल्या विकसित देशांना फारशी भासत नसताना काही प्रमाणातील अशिक्षित अंधश्रद्धेय वातावरणामुळे भारताला ती जास्त जाणवते. कारण आपण अनेकदा कार्यकारणभाव समजावून घेण्यात कमी पडतो, यास्तव भारतात परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे आणि त्यानिमित्ताने देशभर विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, लोकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणे हा यातील एक प्रयत्नच आहे. याचा विचार करून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर हे १९८६ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. भारताला विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार मिळवून देणार्‍या डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन त्यांच्याशी संबंधित हा दिवस असावा, म्हणून त्यांनी ज्या दिवशी त्यांचा पुढे जगप्रसिद्ध झालेला निबंध नेचरया जागतिक स्तरावरील विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला तीच 28 फेब्रुवारी तारीख या दिवसासाठी निश्‍चित करण्यात आली.

डॉ. रामन यांना ज्या वैज्ञानिक शोधाबद्दल सर्वश्रेष्ठ "नोबेल" पारितोषिक मिळाले तो शोध "रामन इफेक्ट" नावाने प्रसिद्ध आहे. या संशोधनासाठी त्यांनी अवघ्या दोनशे रुपयाची साधने वापरली होती. सन १९२१ मध्ये रामन यांना कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटनला पाठविण्यात आले होते. तेथील रॉयल सोसायटीच्या सभेत निबंध वाचून झाल्यावर समुद्रमार्गे परतताना आकाशाच्या निळ्या रंगाबद्दल त्यांचे मनी कुतुहल जागृत झाले. भारतात आल्यावर त्यांनी पाणी आणि बर्फ यावरून होणार्‍या प्रकाशाच्या प्रकीर्णनावर संशोधन चालू केले. त्याआधारे पाणी व आकाश यांच्या निळ्या रंगाची कारणमीमांसा स्पष्ट केली. पारदर्शक पदार्थातून एक रंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय होईल ? याचा अभ्यास करीत असताना मिळणार्‍या वर्णपटात एक विशेष गोष्ट त्यांना आढळली. मूळ एकरंगी प्रकाशाशिवाय इतर अनेक कंपन संख्या असणार्‍या रेषा वर्णपटात उमटल्या होत्या. याचाच अर्थ पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशाचे प्रकीर्णन झाले असा होतो. हेच संशोधन रामन इफेक्टचा शोध म्हणून पुढे आले. हा शोध 28 फेब्रुवारी 1928 रोजी लागला. रामन यांच्या शोधानंतर केवळ दहा वर्षात दोन हजारापेक्षा जास्त संयुगांची रचना रामन परिमाणाच्या सहाय्याने निश्चित करण्यात आली. कोणत्याही वस्तुतील परिवर्तन किंवा बदल हा त्या वस्तुची अगोदरची आणि नंतरची स्थिती यातील फरक असतो. म्हणजे एखादी गरम वस्तू थंड झाली, तर तिच्या स्थितीत परिवर्तन झाले. आणि थंड वस्तू पुन्हा गरम झाली तरी तोही परिवर्तनाचाच प्रकार असतो. असे बदल विश्वात ज्या नियमांनुसार घडतात, ते विश्वव्यवस्थेचे नियम होय. आणि हे नियम आपल्याला ज्यामुळे सहज समजतात, ते "विज्ञान" अशी विज्ञानाची सोपी व्याख्या सांगता येईल.

अशा या विज्ञानाचा विचार करता, आजही आपण सर्व भारतीय संशोधनापेक्षा परदेशातून आलेल्या उत्पादनांना अधिक चांगली म्हणून प्राधान्य देत असतो. मायबाप सरकारी यंत्रणाही कायम अनुभवी व्यक्तीकडूनच टेंडर मागवते. उत्पादन यापूर्वी कोठे वापरले? ते पाहून नंतर स्वीकारले जाते. यास्तव एखाद्या संशोधकाने नवीन काही शोध लावला असेल, तर त्याच्या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्याला अडथळे निर्माण होतात. हे बदलून नवीन गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण आपल्याकडे निर्माण होणे गरजेचे आहे. आज संशोधकांनी आपले संशोधन बाजारपेठेपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे वातावरण बनले आहे. नवीन उत्पादन बाजारात खपले गेले नाही, तर नुकसान होईल याची भीती अनेकाना अडचणीत आणते, परदेशात असे धोके सहज स्वीकारले जातात, आपण हे शिकायला हवे. कारण नवीन उत्पादन यशस्वी ठरले, तर फायदा अधिक होऊ शकतो. आपण आपली मानसिकता तशी बनवायला हवी. तयार होऊ पाहणार्‍या पिढीचा विचार करता, देशात वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयआयटी व तत्सम महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा सुरू झाली आणि प्रात्यक्षिके अडगळीत जाऊन पडलीत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विज्ञान प्रात्यक्षिकांबद्दल अनास्था वाढू लागली आहे. हे सध्या देशभर बनलेले मत खोडण्यासाठी, वेगळेपणा जोपासणारी काही शिक्षणसंकुले यशस्वीपणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी अनुभूतीपूर्ण शिक्षण देत आहेत. आपला पाल्य चांगला अभियंता, वैद्यकीय अधिकारी, विज्ञानतज्ञ बनवू पाहणार्‍या पालकांनी यास्तव अशा शिक्षण संकुलाची निवड आपल्या पाल्याच्या 10 वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी करायला हवी. आजच्या विद्यार्थ्यांना काही नवीन  दाखवले तर त्यांना नक्की आवडते. विज्ञान म्हटले की निरीक्षण करणे आलेच ! ही निरीक्षण वृत्ती आजूबाजूच्या वातावरणातूनही निर्माण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये अशी वृत्ती जोपासली जाण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करायला हवेत, असे सार्वत्रिक व्यक्त होत असलेले मत विचारात घेवून आम्ही कोकणात चिपळूण येथे "ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स" नावाने नव्याने विज्ञान क्षेत्रात ११ वी, १२ वी स्तरावर सुरू केलेल्या शिक्षणक्रमाचे वेगळेपण निश्चित नजरेत भरते. मुलांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्न व्हायला हवेत, ही बाब हेरून येथे कायम विद्यार्थ्यांच्या एकूण विकासावर भर देण्याचा प्रयत्न होत आहे.

नुकतेच भारताने ज्या १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले, त्यात सहा देशांचे १०१ (अमेरिकेचे ९६ आणि इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, कझाकस्तान, नेदरलँडस् व स्वित्झर्लंड या देशांचा प्रत्येकी एक) आणि भारताचे तीन उपग्रह अवकाशातील  निर्धारित कक्षेत स्थिर केले आहेत. उपग्रहाचा समावेश आहे. इतर देशांना त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा, भारताच्या भूमीचा आधार घ्यावा लागतो आहे ही भारतवासीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या नासालाही जे साध्य झाले नाही ते इस्रोने शक्य करून दाखविले आहे. आजही आपल्या देशातील मुलं प्रशिक्षणासाठी नासात जातात, भविष्यात परदेशांमधील मुलं इस्रोत आली तर आश्चर्य वाटायला नको ! १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर कंपनीने मोलाची कामगिरी बजावली. एस.१३९ हेड एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल डायव्हर जेट आफ्ट एन्ड व पीएम ओएक्सएल मोटार केस या तांत्रिक उपकरणाची निर्मिती वालचंदनगर कंपनीत करण्यात आली होती. याचा उपयोग यानाच्या उड्डाणासाठी झिरो व पहिल्या स्टेजसाठी केला जातो. ही कंपनी गेली ४५ वर्षे संशोधन क्षेपणास्रासाठी लागणारी विविध उपकरणे तयार करीत आहे. आक्टोबर २००८ मधील चांद्रयान, नोव्हेंबर २०१३ मधील मंगलायान मोहिमेतही या कंपनीचा सहभाग होता. आगामी काळात "इस्रो' आपला १०० वा उपग्रह तयार करणार आहे. पहिल्या चाचणीसाठी सायकलवरून रॉकेट नेणे, पहिला उपग्रह बैलगाडीतून प्रक्षेपण तळापर्यंत नेणे येथपासून सुरू झालेला प्रवास आज एकाच वेळी १०४  उपग्रह सोडण्यापर्यंत आला आहे. सन २००८ साली भारताने पीएसएलव्हीया अंतराळ यानातून १० उपग्रह अवकाशात कुशलतापूर्वक स्थापित करून इस्रोने अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहून पूर्ण केला होता ! तत्पूर्वी रशियाने एकाच वेळी १३ उपग्रह पाठविल्याचीही बातमी आली होती. सन २०१३ मध्ये अमेरिक अंतराळ संशोधन संस्था नासाने एकाच वेळी २९ उपग्रहांचे प्रक्षेपण करून नवा विक्रम नोंदविला होता. त्यानंतर रशियाने एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात पाठवून नासाचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, २२ जून २०१६ रोजी एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून इस्रोने एक अभिनव विक्रम स्वत:च्या नावे नोंदविला. तेव्हा या २० मध्ये तीनच उपग्रह भारताचे होते. एकट्या अमेरिकेचे यात १३ उपग्रह होते. भारताने सन १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी घेतली तेव्हापासून आधुनिक तंत्रज्ञान भारतापर्यंत पोचू नये यासाठी विविध प्रकारचे निर्बंध अमेरिकेने लादले होते. या सर्वांवर मात करत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने झेप घेतली आहे. जागतिक कंपन्यांनी त्यांचे आराखडे द्यावेत, त्यानुसार उपग्रहाची बांधणी आणि प्रक्षेपण भारतातून होईल, अशा प्रकारची जबरदस्त योजना "इस्रो' आखत आहे.

अमेरिकेला उपग्रह पाठवायला जेवढा खर्च लागतो, त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात इस्रोकडून उपग्रह पाठविले जातात, हे भारतीय शास्त्रज्ञांचे विलक्षण यश आहे. फार पूर्वी भारताने जेव्हा रोहिणीनावाच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते, तेव्हा त्याला एक खेळणेसंबोधून अमेरिकेने भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाची थट्‌टा केली होती. परंतु समय बलवान होता हैं,’ याची प्रचीती यावर्षी साऱ्या जगाला आली आहे. या देशात काहीही नाही म्हणत जगभर फिरत नकाराचा सूर आळविणाऱ्या तरुण पिढीने यातून निश्चित धडा घ्यायला हवा.

धीरज वाटेकर
कार्यकारी संचालक,
ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, चिपळूण



प्रसिद्धी:http://www.konkanalerts.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/








रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

खा. हुसेन दलवाई यांचे कोकणातील बोलीभाषा विषयक मार्गदर्शन

खासदार हुसेन दलवाई

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित  कोकणातील विविध बोलीभाषा संदर्भातील पहिले, अपरान्त साहित्य संमेलन नुकतेच चिपळूणात पार पड़ले. यावेळी कोकणातील बोलीभाषाया विषयावरील चर्चासत्रात राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी कोकणातील मुस्लीम बोली या विषयानुरूप मराठी प्रमाणभाषेसह कोकणातील विविध बोलीभाषांच्या मंथनातून जड़णघड़णीसंदर्भात मौलिक विचार मांडले. आजच्या मराठी राजभाषा दिन पार्श्वभूमीवर त्या विचारांचा आढावा...! 


दलवाई म्हणाले, अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाला मराठी बोलीभाषांची नोंद घ्यावीशी वाटली नाही. बोलीतूनच प्रमाणभाषा समृद्ध होते, व्याकरण नंतर येते. प्रमाणभाषा आवश्यक आहे, पण म्हणून बोलींचे महत्व कमी होत नाही. 'तो काल गेला व्हता' असे म्हटले की बरेच जण हसतात, पण 'गेला नव्हता' म्हटले की हसत नाहीत, ही विसंगती आहे. प्रमाणभाषा समृद्ध करायचे काम बोलीभाषेनेच केले आहे. उच्चाराच्या संदर्भात आगरी, कोळी, कुणबी आणि कोकणातील मुसलमान यांची भाषा एकमेकांच्या जवळची आहे. काही फरक आहेत, मुसलमानांच्या बोलीत काही उर्दू शब्द येतात. इस्लामी संस्कृतीचा प्रभावही आहे. भालचंद्र मुणगेकर नेहमी म्हणतात, तुम्ही कोकणी लोकांनी बाराखड़ीच बदलून टाकली आहे. आम्ही 'पड़ला' म्हणतच नाही, 'परलाव' म्हणतो. 'पलत पलत जेवायला गेलो आनि धारकन परलो’ म्हणतो. यातून जे सांगायचं होतं ते सार् यांना कळले. शुद्ध भाषेचा वाद अगदी चिपळूणकरांपासून राहिलेला आहे. फुल्यांनी काय विचारलंय याच्यावर चिपळूणकर कधीच बोललेले नाहीत, मात्र त्यांच्या भाषेवर मात्र हल्ला केला. तरीही आज जागतिक पातळीवर फुल्यांच्या तत्कालीन विचारांवर विचार होतो, विविध जागतिक विद्यापीठात अभ्यास होतोय. आज सभागृहात महिला बसलेल्या आहेत त्या मागची प्रेरणा महात्मा फुले आहेत, तरीही फुले यांची निव्वळ भाषेवरून त्याकाळी चिपळूणकरांनी चेष्टा केली. आजमितीला मोठ्या प्रमाणात बोलीभाषा वापरली जाते. आनंद यादवानी संपूर्ण 'गोतावळा', बोराड़ेनी 'पाचोळा' कादंबरी संपूर्ण बोलीभाषेत लिहीलेय. बा. भ. बोरकरांनी कोकणी शब्द वापरलेत. नारायण सुर्वे यांच्या अतिशय चांगल्या कविता आहेत. नामदेव ढसाळ यांचे लेखन समजून येण्यासाठी ती बोली समजून घ्यावी लागेल. गणेश देवी यांचे बोलीभाषेवर खूप चांगले काम आहे. महानोर यांनी अतिशय चांगली प्रतिके वापरलीत. 'या नावाने या भूमीला ज्ञान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य घ्यावे' असे खेड्यातून आल्यामुळे व शेतीशी संबंध असल्यामुळेच ते बोलू शकतात. 'कोणती पुण्ये येति फळाला, जोंधळ्याला चांदणे लकड़ून जावे', ही प्रतिके ग्रामीण साहित्यातून पुढे येतात. विविध समाजातले साहित्य पुढे आल्याने आदिवासी, कातकरी आदि लिहायला लागले. एकेकाळी फक्त ब्राह्मण लिहायचे आता बहुजन लिहितात, ब्राह्मण अमेरिकेत जातात. दलित, मराठा समाजातील कितीतरी लेखक आज पुढे आलेत. 

कोकणातील इरसाल म्हणी कोकणाबाहेर खूप आवड़तात. 'तहान लागल्यावर विहीर खणायला जाता' ही खूप इरसाल म्हणं आहे ती अशी नंतर सुधारली. वामन होवाळ, सोपान कांबळे यांची उस्मानाबाद-मराठवाड़्याकड़ची बोली सगळ्यात गोड आहे. 'गेलोलो, आलेलो' अशी गोलाई या भाषेत आहे, कर्कशपणा कमी आहे. विविध गाण्यांच्या बंदिशीवरून बारकाईने नजर फिरवली तर त्यात देशभरच्या ब्रीज, आहुती, मैथिली, राजस्थानी या भारतीय भाषांतील शब्द सापडतील, त्यामुळे त्या गाताना कोठेही शब्द अड़त नाहीत. आपल्याकडील "क्लासिकल" गायक या बंदिशींमुळे हिंदीतून राहिले आहेत. माझ्या एका मैत्रिणीने काही मराठी बंदिशी केलेल्या आहेत, त्या कबीरांवर आहेत. भाषा ही लोकांना एकत्र आणते. मी विधानपरिषदेत बोलायला लागलो तेव्हा नितीन गडकरी  'व-हाड़ी' भाषा बोलायचे. ते पाच बोलत नाहीत 'पाँच' बोलतात, दस बोलतात. परंतू त्या सभागृहात गेल्यानंतर मराठी भाषा किती प्रगल्भ आहे, हे लक्षात आलं. भाषेत जरा चुकलो तर पूर्वी लोक चेष्टा करायचे. मी शाळेत असतांना लोक आम्हाला 'चिचो' म्हणायचे. आम्हाला 'ण आणि ड़' बोलताच यायचा नाही, आज चेष्टा होत नाही, अशी आठवण दलवाईंनी सांगितली.

लक्ष्मण मानेनी उपरा लिहिताना कैकाड़ी बोली वापरलेय. पुस्तक वाचून समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, समजलं की गोडी लागते. 'विंचू चावला, विंचू चावला', 'कधी पाजवा कधी वाजवा, मी ढोलकीच त्याची' यात महिलांचे दुःख मांड़लय. बोलीभाषा महिलांनी जतन केली आहे. बहिणाबाईंच्या कवितेची बोली ही अहिराणी नसून वेगळी आहे, आपण समजतो हा सुद्धा वाद आहे. 'रात्रीस खेळ चाले' मधील भाषेला थोडासा प्रमाणभाषेचा स्पर्श आहे कारण मूळ देवगड़ी बोली सर्वांना कळेल असे नाही. आज सिरीयलमध्ये मोठ्या प्रमाणात बोलीभाषेचा वापर होतो. पुण्यात बव्हंशी हिंदी बोलतात, आजची पिढी तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. ती इंग्रजी, मराठी, कोकणी, आगरी आदि अनेक भाषा बोलते. सन १९७० ला बाबा आमटेंच्या एका देशव्यापी शिबीरात सहभागी असताना आमचे भाषेच्या अनुषंगाने गट झाले हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. सानेगुरुजी म्हणालेत, 'खरा तो एकहि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' आणि हे काम बोलीतून घड़ते. जयवंत दळवी, आरती प्रभू यांनी आपल्या लेखनात वापरलेल्या मालवणी बोलीभाषेला मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्रहरण नाटकाने प्रमाण मिळवून दिले आहे. म्हणून आज तिथला कोकणी माणूस लाजत वगैरे नाही. फाईलला शासकिय भाषेत ‘नस्ती’ म्हणतात, प्रशासकीय भाषा अशी जड करून ठेवली आहे. मुंबईच्या घरी रोज भाजी घेवून येणाऱ्या सामवेदी ब्राम्हणाची व्यथा त्यांनी ऐकवली. सगळेच ब्राम्हण पुढारलेले आहेत, हा समाज चुकीचा आहे असे ते म्हणाले.

कोकणातल्या मुस्लीम बोलीची फारशी कोणी दखल घेतलेली नसून संशोधनही झालेले नाही. प्रा. मैमुना दळवी यांनी यावर लिहिलेले आहे. मागे एकदा साहित्य संमेलनात अब्दुल कादिर मुकादम यांचे भाषण झाले होते. त्यांच्या कन्या, कोकणी खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक प्रा. मोहसीना मुकादम यांनी मुंबईतील कोकणी मुसलमानांच्या भाषेवर लिहिले आहे. मुंबईचा मुस्लीम हा हबशी इराणातून आलेला परंतु भाषा कोकणी, इतर कोकणी अरबस्तान, गल्फ येथून मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी आलेले आहेत. व्यापारासाठी आलेले पुढे कोकणसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावले, सुफीपंथाचा पगडा इथे आहे. त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीवर ‘सुफी’ प्रभावामुळे हिंदू आणि मुस्लीम असा तणाव नाही. ‘सुफी’ लोक प्रवचने करायचे. त्याला सर्वपन्थीय समाज श्रोता असायचा. परंतु सर्वांनी मुसलमान व्हावे अशी काही अट त्यांची नसायची. काही लोक मुस्लीम व्हायचे ! या साऱ्यामुळे आपल्याला इतर ठिकाणांच्या मानाने शिक्षण परंपरेच्या बाबतीत कोकणातला मुसलमान सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतो, तो इथल्या बोलीशी, खाद्यसंस्कृतीत मिसळलेला दिसतो. यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. दलवाई, कासकर आणि देसाई हे मुसलमान समाजात स्वतःला जास्त सुशिक्षित समजतात, ते ‘हत बेस’, ‘हत ये’ बोलतात ‘थै’ बोलत नाहीत. यात सुद्धा बोलीतील भेद जाणवतो. रायगड, रत्नागिरी आणि दालदी मुसलमान तर याहूनही वेगळी बोली बोलतो. हमीदा बानू यांचे ‘मजलीस’ नावाचे पुस्तक आहे, त्यांनीही या बोलीवर लिहिले आहे. स्त्री दु:ख खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे. ती म्हणते, ‘ती पांढऱ्या पायाची असं आपण पुरुषांबाबत बोलत नाही. स्त्रीयांबाबतही बोलू नका, तिचा दोष नाही, अल्लाच्या इच्छेप्रमाणे ते झालेले आहे’. स्त्री साहित्यात मोठ्या प्रमाणावर बोलीभाषेचा वापर झालेला दिसतो. इस्लाम येथे दोन प्रकाराने आलेला आहे. व्यापारी आणि त्यातून सुफीपंथ आला. सारे पीर केरळ ते अजमेर-काश्मीर पर्यंत सुफी आहेत. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी संस्कृतीचे संवर्धन, समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काश्मीर, केरळ, कर्नाटक ते कोकण-सिंधुदुर्ग प्रत्येक ठिकाणच्या मुसलमानाची भाषा वेगळी आहे, त्यावर तिथला प्रभाव आहे. इथली भाषा राजापूरला संपते, पुढे दुसरी बोली सूरु होते. आम्ही बाराखडी सोपी केलेली आहे, ड, र, ळ वापरत नाही. ही भाषा व्यापाऱ्यांनी आणलेली नाही, त्यांना ही भाषा शिकवली गेली आहे. इथल्या कुणबी, कोळी, आगरी आणि मुसलमानाच्या बोलींत मोठ्या प्रमाणात साम्य आहे. मुसलमानांच्या भाषेत काही उर्दू शब्द आहेत, यामागे व्यापारी समूहासोबत इथल्या समाजाचा ‘नाविक’ व्यवसाय हे सुद्धा एक कारण आहे. आम्ही ग्लास म्हणतो, पेला म्हणत नाही. आज मुसलमान आपल्या कोकणी भाषेपासून दूर चाललेत. आपण आपली मातृभाषा विसरलो, तर सगळच विसरू. कारण तिचा संस्कृतीशी फार मोठा संबंध आहे. तिच्या पासून आपण लांब गेलो तर समाजापासून आपण तुटतो. आम्ही मोहरमात, ‘इमाम हुसेन ररायला निकले फुलों का शेरा है, अल्ला अल्ला बादल फिर साया है, मेहंदी लगाओ जी कासम बाला के हाथ’ अशी आठवण गीते म्हणायचो. पूर्वी मिरवणूकपूर्व रात्री ताबूताची उंची वाढविण्यासाठी रातोरात प्रयत्न होत असत, आज आम्ही ताबूत, ऊर्स यांपासून आम्ही लांब गेलेलो आहोत. गाणी, कव्वाली या सुफीतून आलेल्या आहेत.  

पूर्वी काळोखाच्या खोलीत स्त्रीयांचे बाळंतपण होत असे. त्या खोलीची खिडकी लहानच असायची. मूल झालं की ते सुपात टाकले जायचे, सूप ओढले जायचे आणि लग्न ठरवून टाकले जायचे. ‘सुपात परलाय सोनपुतला, त्याच्या बाबाला देगुन कलवा, त्याच्या मामुला तारन कलवा, सुपात परलाय सोनपुतला’ असं म्हटल जायचं ! आता ती प्रथा गेलेली आहे. लग्नाच्या वेळेला सकाळी सकाळी बायका, ‘तुना बाय शेजारनीचो कोम्भूरलो, कोम्भूरल्यानी आवाज केलो, इद्रमभाई शान्याची निज पोरगी, कोम्भूरल्यानी आवाज केलो’ अशी गाणी म्हणायच्या. दुर्गाबाई भागवत यांनी ही सगळीबोली भाषेतील गाणी जमा केली होती. त्यातली ऊर्दू त्यांनी हमीदभाई यांच्याकडे दिली. उर्दू मला आणि हमीदभाईनाही येत नव्हते, तेव्हा आमच्या भाबी ती ऊर्दू गाणी म्हणायच्या आणि मी लिहायचो, असा रोज रात्री उपक्रम चाले. पुढे त्याचे काय झाले माहित नाही पण दुर्गाबाईनी त्यावर खूप मेहनत घेतली होती, असे दलवाई म्हणाले. बोलींचा वापर गाण्यांत अधिक झाला आहे. गीता, कुराण, बायबल विविध सारे धर्मग्रंथ पद्यांमध्ये आहेत. ते सहजतेने गायले जातात. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अगदी मोरोपंतांपर्यंत  लेखन पद्यात आहे. तत्पूर्वी गद्यात बखरी लिहिल्या जायच्या. बखरीतही इतिहास कमी असायचा, पद्यातून संगोपन व्हायचे, या साऱ्यांचा अभ्यास लोकांनी वेळोवेळी केलेला आहे. जर्मनीत जेव्हा भाषेसंदर्भात प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्यांनी गावागावातून काय शब्द बोलले जातात याची माहिती घेवून ‘जर्मन भाषा विकसित केली. चिपळूणच्या विश्रामगृहात ‘गरम आणि गार पाणी’ असे लिहिलेले असायाचे, थंड म्हणत नाहीत, ‘गार’ फक्त कोकणी माणूसच म्हणतो. म्हणून शब्द भांडार वाढविण्यासाठी बोलीभाषा गरजेच्या आहेत. हमीद दलवाई गेले तेव्हा नानासाहेब गोरे यांनी आपल्या अग्रलेखात म्हटले होते, ‘हमीदची मराठी खास चिपळूणी मराठी होती’, अशी आठवण त्यांनी अखेरीस सांगितली.

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com
प्रसिद्धी : दैनिक सागर, मराठी राजभाषा दिन दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ 

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...