शनिवार, २३ मार्च, २०१९

साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक !


अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती कायम आमच्या वैचारिक जडणघडणीचे कारण ठरलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रकाशकाका देशपांडे होत.

सन १९९२ साली, प्रकाश काकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा १२ वर्षांचे आम्ही अलोरेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होतो. सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अलोरेच्या वातावरणात काही साहित्यप्रेमी सृजनांच्या सहकार्याने, आमच्या वडिलांनी 'ओंजळ काव्य रसिक मंच' स्थापन केला. या मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रमुख वक्ते’ म्हणून  दिनांक ४ एप्रिल १९९२ रोजी गुढीपाडव्याला प्रकाशकाका अलोरेत आले असताना आम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिले, त्यांचे विचारही ऐकले. अर्थात तोपर्यंत आमचा आणि साहित्याचा फारसा संबंध नव्हता. निव्वळ आमच्या बाबांच्या आग्रहाखातर आम्ही कार्यक्रमात असायचो. वाचन ही जेमतेमच होतं. काकांनी आपल्या भाषणात वाचनाबाबत केलेलं मार्गदर्शन आजही आठवतंय. ‘अस्वस्थ आणि बेचैन साहित्यप्रेमींची चळवळ’ अशा शब्दात त्यांनी ‘ओंजळ’ला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी ‘कविता नव्या-जुन्यांची’ हा आमच्या वडिलांच्याच संकल्पनेतला कार्यक्रम सादर झाला होता, अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. बाबांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘प्रमुख वक्ते’ म्हणून प्रकाशकाकांची प्रतिमा आमच्या मनात तेव्हाच घट्ट बसली.

प्रकाशकाकांची दुसरी व्यवस्थित भेट आठवतेयं ती सन २००८ सालच्या मार्च महिन्यातली ! त्याच्या काही महिने अगोदरपासून आम्ही आमचे सहकारी समीर कोवळे आणि विलास महाडिक यांच्या सहकार्याने पूर्ण करीत आणलेला 'चिपळूण तालुका पर्यटन' हा पुस्तक निर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना 'एक्सर्ट ओपिनिअन' घेण्यासाठी आम्ही काकांना भेटलो होतो. काकांमधील 'साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक' व्यक्तिमत्वाची ओळख पहिल्यांदा आम्हाला तेव्हा झाली. आमच्या नियोजित पुस्तक प्रकल्पाचे मनापासून कौतुक करताना काकांनी आवर्जून त्यात काही मुद्द्यांची आपणहून भर घातली होती, यास्तव आम्हीही सर्वानुमते काकांचा फोटोसह गौरवपूर्ण उल्लेख त्या पुस्तकात केला होता. पुढे जाऊन त्याच बैठकीत काकांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या हॉलमध्ये घेण्याची सूचना केली होती. पुढे गुढीपाडव्याला तो कार्यक्रम लोटिस्माच्याच सभागृहात पार पडला. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हॉल भरून रसिकांची दुर्मीळ गर्दी तेव्हा चिपळूणात अनेकांनी अनुभवली होती. या सा-यात काकांचे मोलाचे सहकार्य राहिले हे नक्की ! 

या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीनंतर यावर्षीच्या सन २०१८ च्या गुढीपाडव्याला, पेढे गावातील श्रीपरशुराम निसर्ग सान्निध्य पर्यटन केंद्रात आम्ही त्याच चिपळूणच्या पुस्तकाची 'दशकपूर्ती' साजरी केली. काकांचे हमखासचे मार्गदर्शन तेव्हाही मिळाले. गेल्या दहा वर्षांत आमची आठ पुस्तके प्रकाशित झाली. प्रत्येक वेळी प्रकाशित पुस्तक चिपळूणच्या वाचनालयाकरिता काकांच्या हाती देतानाचा आमचा आनंद केवळ अवर्णनीयचं राहिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या कार्यबाहुल्यातून वेळ मिळेल तेवढे वाचनालयाशी जोडले गेलो ते काकांमुळेच ! वाचनालयाच्या उपक्रमात काहीवेळा व्यासपीठावर येऊ शकलो तेही काकांमुळेचं ! आमच्या आठव्या लिखित 'कृतार्थीनी' या सुप्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाच्या दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी मुरूड ता. दापोली येथील प्रकाशन सोहोळ्यास प्रत्यक्ष निमंत्रण नसतानाही काका आपले दोन सहकारी नामवंत कवी आणि लोटिस्माचे वर्तमान अध्यक्ष अरूण (दादा) इंगवले आणि साहित्यिक प्रा. संतोष गोणबरे (आमचा    कॉलेजयीन साहित्यिक मित्र) यांच्यासह उपस्थित राहिले, तो क्षण आमच्यासाठी सुखद तितकाच धक्कादायक होता. आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुरूडच्या कार्यक्रमाला चिपळूणातून कशाला कोण येईल ? हा आमचा विचार काकांनी खोटा ठरविला होता. 'मुद्दामहून तुला शुभेच्छा देण्यासाठीच आलोय' असेही ते यावेळी म्हणाले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'कदाचित' वाचनालयाच्या कक्षेत येऊ न शकणारे परंतु सर्जनशील समाजासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम काकांनी विचारपूर्वक सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाच्या पटलावर आणून यशस्वी केलेले आम्ही पाहिलेत. वाचनालयाचे 'कलादालन' हा अशातीलच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तो काकांच्या कल्पक नेतृत्वाखाली पूर्णत्वास जातो आहे. आगामी काळात त्याचा परिघ विस्तारेल असा विश्वास वाटतो. 

सतत कार्यरत राहू पाहणा-या वर्तमान तरूण पिढीच्या सोबत असलेले 'प्रकाशकाका' आम्ही पाहिलेत-अनुभवलेत. आज प्रकाशकाका देशपांडे यांच्या विविधांगी कतृत्वसंपन्न कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रति सदैव आदरभाव असलेल्या सर्वांकडून 'कृतज्ञता सोहोळा' संपन्न होतो आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सोहोळ्यासाठी आणि काकांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही भरभरून सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला सतत मिळत राहावा, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. 


धीरज वाटेकर  (८ ऑक्टोबर २०१८)



सोमवार, १८ मार्च, २०१९

पालावलेल्या जंगलातील दोन तास !

रात्री साडेनऊची वेळ ! ठिकाण चांदोली अभयारण्याचा बफर झोन ! रस्त्यावर न्यायला आलेल्या धनगराने घराचा दरवाजा उघडला. घरात पाऊल ठेवले तर दरवाजातच आडव्या मोकळ्या जागेत म्हैस, रेडकू, दोन बैल बांधलेले. अधिकची जनावरं शेजारच्या एका खोलीत ! जवळच्या खुराड्यातल्या काही कोंबड्या, नि घरातच इकडे तिकडे फिरणाऱ्या दोन कुत्र्यांनी आमचे स्वागत केले. घरच्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर घोंगडी अंथरलेली. हातपाय धुऊन तिथेच बसलो. मित्राने विचारले, ‘कसं वाटलं ?’ आमची प्रतिक्रिया ‘जबरदस्त !!!’

चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने गेल्या आठवड्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते. चिपळूणला परतताना रात्रीच्या जेवणाचा बेत निलेशने, आमच्या परतीच्या प्रवासाचा रस्ता थोडा वाकडा करून ढेबेवाडी नजीकच्या प्रसिद्ध वाल्मिकी पठाराजवळ असलेल्या पाणेरी गावात निश्चित केला होता. ज्यांच्या घरी गेलो त्या विठ्ठल येमकर यांच्या पत्नी माळकरी असल्याने माझ्या शाकाहारी जेवणाचा प्रश्न सुटला होता. आमच्या दोघा मित्रांना मसाल्याचे वाटण नसलेल्या इथल्या खास मांसाहारी जेवणाचा, रश्याच्या आनंद घ्यायचा होता. म्हणून आमचे इकडे येणे झाले. पण या रात्रीच्या दोन तासात आम्ही इथले जे जगणे अनुभवले ते सारेच विलक्षण होते.

ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत. शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ च्या रात्री आमची गाडी जेव्हा तिथे नावनोंदणी करायला थांबली तेव्हा अंगाला स्पर्शिलेला वारा, पवनचक्यांचा कानात गुंजलेला ‘उँ उँ उँ’ असा विशिष्ट आवाज मनात तिथेच थांबण्याची इच्छा निर्माण करून गेला. वनखात्याची चेकपोस्ट सोडल्यावर, गेली अनेक वर्षे ज्याच्या दर्शनासाठी आतूर होतो त्या जरबेल (रानटी उंदीर)ची वाटेत अनेकदा भेट झाली. खूप चपळ त्यात रात्र त्यामुळे फोटो घेता आला नाही. हा उंदीर हाती लागलेलं धान्याचं अख्खं गोडावून खाली करण्याची ताकद ठेवतो. अर्थात सारं धान्य तो हळूहळू बिळात नेतो. जंगलाचा इन्सायक्लोपिडिया असलेल्या निलेशने माहिती दिली. मध्येच आकाराने काहीसे मोठे, गवताळ भागात रात्रीचे अॅक्टीव असलेले रानटी ससे (हेअर) भेटले. या दोघांचं दर्शन जाता-येता झालं. काही वेळाने आम्ही येमकर यांच्या घरी पोहोचलो. अंधाराची तीव्रता एवढी जबरदस्त की घरात लाईट पोहोचलेला असतानाही बाहेरचा काळाकुट्ट अंधार शहरी मनात धडकी भरवायला पुरेसा असलेला. घराबाहेरच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून प्रत्यक्ष घरात प्रवेश करेतोपर्यंत नाकाला येणारा वास तीनदा बदलला जो नेहमीच्या शहरी परिचयातला नक्कीच नव्हता. दारातली जनावरं वाळकं गवतं, भाताचा पेंढा खात बसली होती. काही रवंथ करीत होती. आता हळूहळू यांना हिरवा झाडपाला कमी होत जाईल, आमची नजर हेरून येमकारांनी माहिती दिली. थोड्याश्या गप्पा झाल्या, वेळ कमी होता. पुन्हा चिपळूणला निघायचे होते. वाघाच्या उपस्थितीने दिव्याने दिवा लागावा तसं जंगल कसं पेटत जातं ? म्हणजे जागं होतं जातं, याची सुंदर माहिती त्यांनी दिली. घरात शेतात लागणारी हत्यारे, लाकडी नांगर, कुळव, सापत्या ठेवलेली दिसली. त्या पठारावर धनगरांची चार घरे नि तीनच माणसे होती.

काही दिवसांपूर्वीच इथे गव्याने एक बाई मारली. ती नेमकी यांच्या संबंधातली. दुपारी पाण्याला गेलेल्या त्या बाईची परतायची नि गव्याची एकाच वाटेत गाठ पडली. सध्याच्या पालावलेल्या जंगलात कुठल्याश्या झाळीत लपलेला तो गवा दुर्दैवाने तिला दिसला नाही. दोघे समोरासमोर येताच जे व्हायचं तेच झालं. जंगलातील झाडं जुनी पालवी पडून नवी पालवी अडवायला लागलीत. त्यालाच पालावलेल्या जंगलाचा काळ म्हणतात. घरी येऊन आम्ही जेवायला बसलो. निलेश आणि विश्वासराव मांसाहारावर ताव मारते झाले. तसं विशेष काही असणारही नव्हतं ! पण तरीही जे होतं आणि ज्या वातावरणात मिळालं होतं त्याला कशाचीच सर येणार नाही. दोघा मित्रांना येमकरांनी मटन वाढले. सोबतीला ते आणि त्यांचा मुलगाही बसला. आणखी एक मुलगा आणि सून माहेरी गेलेले. आम्ही आलोय म्हणून शेजारच्या घरातली बाईही इथेच आलेली. माझ्यासाठी एका बाजूला छानशी शाकाहारी पातळ भाजी बाईनी चुलीवरून आणून ठेवली. समोर एका ताटलीत तुकडे केलेल्या भाकऱ्यांचा ढीग ठेवला होता. मी आणि विश्वासरावांनी मनातून म्हटलं एवढं कधी नि कुणाला संपायचं ? पण त्या साऱ्या भाकऱ्या संपवून पुन्हा मागवाव्या लागल्या. त्या भाकऱ्या बऱ्यापैकी कडक होत्या. आपल्याकडच्या भाकऱ्या नरम होतात. म्हणून मी सहजंच विचारलं तेव्हा, ‘पीठ जरा जास्त वेळ मळलं की येते अशी भाकरी !’ अगदी सहजतेने त्या बाई बोलून गेल्या. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता ! मला त्यांचं वागणं मनाचा मोठेपणा सांगून गेलं. 

तिकडे मांसाहारावर ताव मारणे सुरु असताना मध्येच येमकर मला म्हणाले, ‘पाव्हणं खा दणकून....!’ त्यांचा हा आदेश चाळीशीच्या उंबरठ्यावर जगण्यापुरतं खाण्याचा विचार करणाऱ्या मला पुरता संकटात टाकून गेला. जेवणाचे काही घास पोटात ढकलतो तोच समोरचा बैल निवांत मुतला, शाकाहारी जेवणाऱ्या मला ते पटकन जाणवलं. तेवढ्यात दुसराही...! बाकी इथल्या लोकांसाठी त्यात काहीच नवीन नव्हतं. कोणाचं तिकडे लक्षही गेलं नाही. मी मात्र विचार करू लागलो. ग्रामीण भागातील संस्कृती नि त्यांच्याशी आमची असलेली एकरूपता म्हणजे काय ? ते लक्षात आलं. जंगलात फिरताना असे अनुभव अनेकदा येतात. मात्र घरातला हा माझा तरी पहिलाच अनुभव होता. निलेशच्या आग्रहाने इथला भातही आवडीने खाल्ला. जोडीला त्यानेच मागवून घेतलेलं, वेगळ्या चवीचं दही, लसणीची चटणी याने जेवणाची लज्जत अधिक वाढविली. जेवण आटपले. निलेशने मटणाची हाडं ताटाबाहेर ठेवलेली होती. विश्वासरावांची ताटात होती. घरच्यांनी ताटं उचलली. हाडं तिथंच ठेवली. मला काहीच कळेना ? मनात म्हटलं, ‘हा निलेश असा कसा ?’ तेवढ्यात तिथं दारातला कुत्रा आला नि ती हाडं खाऊन गेला, मी बघतच बसलो ! माहितीचा पुढचा अध्याय निलेशने सांगून संपवला. जेवल्यानंतर येमकर पुन्हा गप्पा मारू लागले. म्हणाले, ‘जंगलातल्या आमच्या पिढीचं निभावलं. पुढच्या पिढीचं अवघड आहे, शिक्षण गरजेचं आहे.’ त्यांचं बोलणं खरचं होतं. पण इथल्या मुलांना आम्ही जाणीवपूर्वक आत्ताचे जंगलं विषयक शिक्षण द्यायला हवे आहे, असं उगाचंच मनात वाटून गेलं.

चिपळूणजवळचं कोयनेचं वाहतं पाणी घाटावरती असतं तर इथले शेतकरी लखपती झाले असते. असं सांगताना मध्येच काही निलेश बोललाच तर येमकर त्याला, ‘हाँ...! बोल तू...!’ असा प्रतिसाद देत होते. त्यातून त्या दोघातले वर्षानुवर्षांचे संबंध सतत जाणवत होते. निघताना घरातल्या बाई म्हणाल्या, ‘या पुन्हा कुटुंबाला घेऊन !’ तर आमचा निलेश म्हणाला, ‘लॉज दाखवायला बामण आणलायं ! त्याला आवडलं तर आलोच आठवडाभर...!’ नेहमीच्या सवयीप्रमाणे निलेशने त्या जेवणाचे पैसे देऊ केले. परतीच्या प्रवासात या भागातल्या जुन्या आठवणी तो सांगत राहिला. आम्ही जमेल तेवढे प्रश्न विचारत राहिलो. रात्री अडीच वाजता चिपळूण आले. येमकरांसारख्या लोकांच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे घालविलेल्या निलेशचा मला मनापासून हेवा वाटला.  

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com, https://dheerajwatekar.blogspot.com


दैनिक तरुण भारत (रत्नागिरी) संवाद पुरवणी २३ मार्च २०१९
दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) २३ मार्च २०१९ 

मंगळवार, १२ मार्च, २०१९

आठवणीतले ‘भडकावू’ भाषण !


घडत्या-बिघडत्या, रत्नागिरीतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या कॉलेजयीन जीवनात आमच्या व्यक्तिमत्त्वावर, आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली आणि आदरणीय प्रा. एस. डी. आटे या दोन अधिव्याख्यात्यांचा जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे. गेल्या नुकताच आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. यावेळी आम्हाला सुदैवाने सोबतच्या सहकाऱ्यांसह आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली सरांना विजयनगर-सांगली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटता आले. भेटीदरम्यान आमच्या सहकाऱ्यांना काही जुन्या आठवणी सांगताना सर थेट, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. त्या भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

आदरणीय हंपाली सरांसोबतची प्रत्येक भेट ही बुद्धीवर्धकच असते. याची जाणीव त्यांना भेटणाऱ्या आणि ओळखणाऱ्या सर्वांनाच आहे. सर सध्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनात स्थापत्य / उपयोजित यंत्रशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात आम्ही चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते.

शनिवार दिनांक ८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी कोल्हापूर मधील भेटी आटपल्यावर दिवसभरातल्या कामाविषयी फेसबुक आणि वॉट्सअप सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. आमच्या पुढील नियोजनाविषयी काहीही माहिती नसताना सरांनी थेट, ‘सांगली अभियान कधी आहे मित्रा ?’ असा प्रश्न विचारला. इच्छा असूनही, निव्वळ व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण ठिकठिकाणच्या जवळच्यांना भेटू शकत नाही ही नेहमीची खंत याहीवेळी जाणवली. सरांकडून मात्र सांगलीतील जेवणाचे चांगले पर्याय, गणपती दर्शन आणि वेळ मिळाला तर घरी भेट अशा बाबी सांगितल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तर सरांनी फोन करून पत्रकार परिषद असलेल्या सांगलीतील हॉटेल नटराज येथे मी भेटायला येतो असे सांगून आमची अडचणही बहुदा ओळखली. या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्हांला अचानक सरांकडे जाण्यासाठी वेळ उपलब्ध असल्याचे लक्षात येणे, सुदैवाने आम्ही त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात असणे असे सारे काही जुळून आले. प्रत्यक्षात सरांना जाऊन भेटलो तेव्हा मनाला लाभलेले समाधान शब्दात सांगणे कठीण आहे. आम्ही येतोय म्हणताच मॅडमनी अगदी थोड्या वेळात केलेला उपमा-चहा गप्पांत गोडवा निर्माण करून गेला. देशाच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, माणसाच्या मानसिकता बदलाच्या आव्हानापर्यंत वेगवेगळ्या विषयावरील गप्पा सुरु असताना सर अचानक, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

रत्नागिरी युवा महोत्सवात
कॉलेजला मिळालेल्या चषकासह...!  
वयाच्या एकविसाव्या वर्षी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना सन २००१ साली रत्नागिरीत विविध कॉलेजचा स्पर्धात्मक सहभाग असलेला युवा महोत्सव सुरु होता. या महोत्सवाच्या वक्तृत्त्व स्पर्धांत, ‘युवकांच्या दृष्टीकोनातून देशासमोरील प्रश्न’ असा विषय देण्यात आला होता. आमच्या कॉलेजमधून यासाठी प्रतिनिधी म्हणून स्पर्धेतून आमची निवड झालेली. भाषणाची रिहसल सरांनी घेतली होती. स्पर्धांत आकाशवाणी केंद्राचा सहभाग होता. ही सारी निवडक अंतिम भाषणे केंद्रावरून प्रसारित होणार होती. आमच्या भाषणातील सारे मुद्धे निवडण्यात आम्हाला आमच्या वडिलांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे व्यावसायिक कार्यकर्ते नरेंद्र घाडीगावकर यांनी सहकार्य केले होते. हे मुद्दे सरांनाही ज्ञात होते. अनेक मुद्धे असेही होते जे इच्छा असूनही काही मर्यादांमुळे आम्ही वगळले होते. स्पर्धास्थळी प्रत्यक्षात मात्र आम्ही सळसळत्या रक्ताच्या भावनिक आवेशात स्टेजवर भाषणाला उभे राहिलो. सुरुवातीपासूनच अचानक शरीरात संचारलेल्या त्या उत्साहाच्या भरात आमच्या तोंडून ठरलेले मुद्धे अधिक आक्रमकतेने मांडले गेलेच पण रिहसलमध्ये नसलेला ए्नरॉन प्रकल्पाचा मुद्धाही अधिकच तीव्रतेने मांडला गेला. अखेर नको व्हायला तेच झाले ! आमच्या भाषणाला उपस्थितांच्या अधिक टाळ्या मिळूनही प्रत्यक्षात गुणांकनात मात्र कमतरता राहिली. कॉलेजचा एकत्रित युवा महोत्सव स्पर्धेतील पहिला क्रमांक हुकला. पुढच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ए्नरॉनचा मुद्धा भाषणात आला नसता तर कदाचित कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला असता. पण ते राहिले. मुख्य म्हणजे एवढे होऊनही आदरणीय हंपाली सर आणि आटे सर यांपैकी कोणीही आम्हांला फारसे बडबडले नाहीत. कदाचित त्यानांही ते मुद्धे पटले असावेत. आमचे व्यक्त होण्याचे व्यासपीठ आणि आवाजाची तीव्रता यात काहीतरी गडबड झाली असावी. स्पर्धेत व्यासपीठावर आमच्याकडून जे बोलले गेले ते सारे सहजतेने आलेले होते. त्याचा झालेला परिणाम मात्र आम्हांला खूप मानसिक वेदना देऊन गेला.     
   
परवाच्या भेटीत, १८ वर्षानंतर सरांनी पहिल्यांदा त्या भाषणाचा उल्लेख ‘भडकावू’ असा केला नि हे सारे आठवले. कदाचित त्यावेळच्या परीक्षकांनीही आमच्या भाषणाला असाच शेरा दिला असेल ! पण त्या भाषणाने सरांचे नि आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले ते कायमचेच ! तेव्हापासूनच्या आमच्या जीवनप्रवासात शरीराने दूर असले तरी मनाने सरांचे निश्चित लक्ष असते. जीवनाच्या विविध वळणावर वेळोवेळी भेटलेले, ज्यांच्यासमोर आम्ही कायम नतमस्तक होतो असे सरांसारखे मोजके मार्गदर्शक या ना त्या मार्गाने आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून लाभणाऱ्या या मार्गदर्शनरुपी श्रीमंतीने जबरदस्त सुखावलेले आम्ही आणखी एका नव्या उपद्यापासाठी सज्ज होत असतो.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
ईमेल : dheerajwatekar@gmail.com   

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...