शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आत्मनिर्भर भारत : ‘शहरी आणि ग्रामीण’ अंतर मिटायला हवं !

विकतचे प्रोजेक्ट कॉलेजयीन जीवनात सबमिट करणाऱ्या पिढीला ‘आत्मनिर्भर’ व्हायला समजवायचे कसे ? कामचलाऊ ऑनलाईन शिक्षण या देशाचे भविष्य घडवू शकत नाहीत. प्राचीन भारत आत्मनिर्भर होता तेव्हा इतर देश विकासाचे स्वप्न बघायचे. पुढे भारतावर आक्रमणे वाढत गेली. समस्या वाढत गेल्या. स्वातंत्र्यकाळात चरखा घेऊन वावरणाऱ्या महात्मा गांधींनीही या देशाच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न पाहिलेले. आपण त्यांचे ऐकले नाही. कोरोनाने, कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्यासाठी भारताचे ग्रामीण चारित्र्य उंचावायला लागेल. प्रत्येक सज्ञान नागरिकाला आपल्यातला आळसपणाचा व्हायरस दूर सारून सृजनशीलता, स्वावलंबन वाढवावे लागेल. मोजक्या शहरांऐवजी गावांमध्ये सापडणारा, भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी पायाभूत, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांकडे जबाबदारीने पाहाण्याचे, शहरी आणि ग्रामीण भागातील दरी मिटविण्याचे आव्हान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताचे यश मुख्यत्वे तिथेच दडलेले आहे.

यंदाच्या गणपतीत कोकणात, गावी असताना निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छोटाभाऊ आणि शाळकरी मित्र केदार गप्पांच्या ओघात एकदम गाव सोडण्याची भाषा बोलू लागले. मला क्षणभर काही कळेना. मग थोडं विस्तारानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मित्र म्हणाला, ‘शहरातली एखादी चांगली शिक्षणसंस्था गावात येईल का ? ते सांग. विद्यार्थी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू.’ मित्राच्या बोलण्यात प्रामाणिकपणा असला तरी व्यवहारी शिक्षणसंस्थांना हे कोण समजावणार ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत राहिलो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गावांच्या उद्धाराच्या घोषणा आपण ऐकतो आहोत. मागच्या शंभरेक वर्षांत पायाभूत, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांकडील अक्षम्य दुर्लक्षामुळे आज गावं रिकामी झालीत. काही गावं तर ‘वृद्धाश्रम’ बनलीत. आमचे वास्तव्य असलेल्या कोकणात याचे प्रमाण भयंकर आहे. देशातल्याही बऱ्याचश्या गावात आज म्हातारा, म्हातारी आणि त्यांच्यानी न होणाऱ्या ओसाड जमिनी, पडके वाडे, घरं नि बागा गावोगावी शिल्लक राहिल्यात. जीवनाचा कायापालट करण्यासाठी शहरात आलेल्या व्यक्तीला चक्रव्यूहात सापडल्यासारखे झालेय. शहरी जीवनाच्याही स्वतःच्या समस्या आहेत. त्यात रोज ‘कोरोना’सारखी नवीन भर पडते आहे. गर्दी, गोंगाट, हवा, पाण्यासह अन्नातील प्रदूषणाचे दुष्परिणामही वाढताहेत. अस्वच्छता वाढतेय. कोसळणाऱ्या इमारती आणि निवाऱ्यांची समस्या कायम आहे. ग्रामीण भागात संधी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेच्छेने का होईना, लोकं शहरात जगताहेत. आपले लोकप्रतिनिधी आणि मायबाप सरकार खेड्यात उद्योगधंदे सुरू करण्याचे धोरण लवचिक केल्याचे सांगतात. मात्र प्रत्यक्षात प्रयत्न करू पाहणाऱ्यांच्या नशीबी येणारे ‘प्रशासकीय’ अनुभव डोंगळ्यांनी रक्त पिऊन हैराण केल्यासारखे भासतात. गावातील प्रतिनिधी सक्षम असतील तर राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, वारणानगर सारखी गावं आकाराला येतात. पण असे प्रतिनिधी कितीसे आहेत ? शहराच्या तुलनेत गावात बकालपण, महागाई कमी असते. नैसर्गिक आहार, विहार मिळतो. आरोग्य उत्तम राहिल्याने कार्यक्षमता पुरेपूर वापरता येते. याचा विचार होताना दिसत नाही. देश स्वतंत्र झाल्यावर पारंपारिक व्यवस्थेला धक्का बसत गेला. माणुसकीचा र्‍हास होऊ लागला. ग्रामीण जीवनपद्धती कालबाह्य झाल्या. गावातील लोकांचे एकमेकांवर अवलंबून राहाण्याचे दिवस संपले. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लोप पावली. शहर आणि गाव यात दरी निर्माण होत गेली. या स्थितीने एवढे भयानक रूप धारण केले की शहरातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर चणे विकणार्‍याचे उत्पन्न गावातील किराणा विकणाऱ्यापेक्षा अधिक बनले. आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील ही दरी मिटवायला प्रयत्न करावे लागतील.

आत्मनिर्भरतेचा आणि आपल्या भाषा, साहित्य, संस्कृतीचा जवळचा संबंध आहे. पुण्याच्या विश्व मराठी परिषदेने कोरोना लॉकडाऊनमध्ये (जुलै) डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची याच विषयावर ७ दिवसांची ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली होती. तिच्या सुरुवातीला डॉ. जोशी यांनी, ‘आपल्या देशात ९५ टक्के लोक हे नोकरी देण्याच्या गुणवत्तेचे नाहीत’, या नारायण मूर्ती यांच्या विधानाची आठवण करून दिली. आत्मनिर्भरतेची अभिरुची वृद्धिंगत होण्यासाठी माणसांमध्ये गावाच्या मातीत हात घालण्यासाठी रुची असायला हवेय. भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकली तरच स्थानिक रोजगार टिकणार हे वास्तव समजून घ्यायला हवे. एकेकाळचे या संस्कृतीचे मालक आता नोकर झालेत. कोकणासारख्या प्रांतात तर ८० टक्के जमिनी या २० टक्क्यांच्या मालकीच्या तर शिल्लक २० टक्के जमिनी ह्या ८० टक्क्यांच्या मालकीच्या आहेत. यातूनच पुढे गावात शेतीत, बागेत काम करायला माणसं मिळेनाशी झाली. लोकांनी शहरात जाऊन ‘चाकरमानी’ व्हायला पसंती दर्शविली. कोकणच्या मातीत, बागांत राबणाऱ्या हातात आज नेपाळ्यांसह इकडून तिकडून आणलेले आदिवासी, कातकरी काम करताहेत. यावर उपाय म्हणून ‘कम्युनिटी फार्मिंग’, कसणाऱ्याला अधिकचा मोबदला मिळावा असा विचार मांडला गेला. पण सध्याचा काळ ‘विनोबां’चा नसल्याने हे मान्य होत नसावे. गेल्या शंभरेक वर्षांत आपण आपली मातृभाषा विकासाची आणि रोजगाराची न ठेवली नाही. इंग्रजीचा अकारण फुगा फुगवला. इंग्रजी ही भाषा नसून ती एक संस्कृती असल्याचं आम्हाला कळलं नाही. म्हणून आमच्या गावातल्या मित्राला चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची परवड सहन होत नाही आहे. त्याची ही मानसिकता आपण शहरावलेल्यांनी बनवली. त्यासाठी देशाची आणि जगाची वर्तमान अर्थव्यवस्था मुठभरांच्या हाती दिली. शब्द पाळणे नव्हे तर शब्द न पाळणे हा सभ्यपणा बनवला. वर्तनाशी निगडीत असलेली मूल्यव्यवस्था संपवली. पूर्वी मानवी जीवन नद्यांच्या साथीनं विकसित झालेलं. पोसलेलं. आम्ही गेल्या १०० वर्षांत त्या नद्या प्रदूषित केल्या. असांस्कृतिक, बाजारावादाच्या युगाला आपलंस केलं. भांडवलखोरी, नफेखोरीच्या संस्कृतीत आम्ही गुदमरलो. ७०च्या दशकात या स्थितीने वेग पकडला. गावखेड्यातले स्थानिक उद्योग बंद पडू लागले. संस्कृतीतून निर्माण होणारा रोजगार सुरुवातीला मोठ्या आणि नंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे गेला. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण केले. आमच्या संस्कृतीतील मूल्यव्यवस्था नामशेष होत गेली. जगात बाजारापुरती विद्या शिकवली जाऊ लागली. तयार वस्तू विकत घेता येईल एवढीच क्रयशक्ती लोकांच्या खिशात राहिली. जीवनातलं सौंदर्य नाहीसं होतं चाललं. मानवी अजेंडा घेऊन लढणारी माध्यमे कालबाह्य होत गेली. शासनात तर सामन्यांच्या पत्राला उत्तर न देणारी संस्कृती निर्माण झाली. ‘कोरोना’त भरडलेला सामान्य कष्टकरी ८०० किलोमीटर पैदल गेला. त्याला पाहून व्यथित व्हायला झालं. आमची संस्कृती अशी कधीच नव्हती, ओ ! पण हे घडलं. कोणत्याही विषयात ‘मला काय त्याचे ?’ आणि ‘निवळ दुर्लक्ष’ करण्याची आमची मानसिकता आम्हाला नडली. पूर्वी मर्यादित असलेला आमच्या जीवनाचा भूगोलतर विस्तारला पण बुद्धी आकसली. वाचन मंदावलं. दर्जेदार जीवनपद्धती नामशेष झाली. आजही देशातला एक मोठा वर्ग वर्तमानपत्रही वाचत नाही. पूर्वी माणसं उत्तम वाचायची. फक्त छापलेलं नव्हे तर आपल्या भागातला सारा परिसर ती अभ्यासायची. जैवविविधता वाचायची. निरीक्षण करायची. वास्तव्याच्या ठिकाणची त्यांना इत्यंभूत माहिती असायची. आम्ही या सर्वांपासून तुटत चाललो. आज सोशल मिडीयावर भरपूर रेडीमेड मजकूर उपलब्ध आहे. लाभ घेणाऱ्यांचा अभाव आहे. वाचक ग्रंथांपर्यंत पोहोचत नाहीत. नवा आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ग्रंथ ही गरज आहे हे आमच्या लक्षात येत नाही. सामान्य माणूस ग्रंथांपासून तुटल्याने ग्रंथालये ही आपली वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे काही ग्रंथशत्रूवर्षानुवर्षे कार्यरत राहातात. लिहिणारे लोकं आयुष्यभर चिंतन करून लिहितात. आमचा समाज वाचायाचे कष्ट घ्यायलाही तयार नाही. आत्मनिर्भर होत बाजारवादाला शह देण्याची क्षमता ग्रंथसंस्कृतीत आहे. म्हणून ती हेतूपुरस्सर वाढविली जात नसावी. देशात कायदा आणि सुव्यस्थेवर प्रचंड खर्च होतो. तो कमी करण्यासाठी संस्कृती आणि ग्रंथवाचन आवश्यक आहे. पिढी सुजाण, सम्यक, तर्काचा, बुद्धीने विचार करणारी असली तर कायदा आणि सुव्यस्थेवरचा खर्च कमी होईल. आत्मनिर्भरतेला मदत होईल. पण असं न होता गेली अनेक वर्षे भाषिक आणि सांस्कृतिक चळवळ शिस्तबध्दपणे कमकुवत केली जात आहे, हे श्रीपाद जोशी सरांचे म्हणणे पटते.

पूर्वी देशात बारा बलुतेदार-अलुतेदार पद्धती होती. बी.ए. एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या, मुंबई राज्याच्या महसूल खात्यात अव्वल कारकून, मामलेदार, सबजज्ज म्हणून काम केलेल्या त्रिंबक नारायण अत्रे यांनी १९१५ साली म्हणजे टिळकांनंतर आणि गांधीयुगाचा उदय होत असल्याच्या काळात ‘गावगाडा’ नावाचं पुस्तकं लिहिलं. आजही मराठीतील सर्वश्रेष्ठ १०० पुस्तकांत गणना व्हावी असं हे पुस्तकं. आत्मनिर्भर भारताबद्दल लिहिताना या पुस्तकाविषयी सांगायलाच हवं. धर्म, जाती, गुरंढोरं, पशुपक्षी, वेशीबाहेरील आणि आतील समाज, रितीरिवाज, गावपंचायत, देवदेवस्की, श्रद्धा-अंधश्रद्धा, आचार-विचार, सरकारी नियमात पिचणारा समाज आदिंचे विवेचन असलेल्या या पुस्तकातून व्यापक समाजचिंतन व्यक्त होते. आत्मनिर्भर भारताचा विचार करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवी कार्यकर्त्याने हे पुस्तक वाचायला हवं. देशातली काही मोजकी मंडळी सोडली तर बऱ्याच लोकांचा जन्म हा गावातला असेल. त्यामुळे गावाशी नाळ जुळलेला, तिथली संस्कृती, लोकव्यवहार, भाषा आदिंचा एकत्रित संस्कार आपल्यावर झालेला असतो. कोणा महनीयांचे  चरित्र, आत्मचरित्र वाचलं की हे जाणवतं. ही ग्रामसंस्कृती १०० वर्षांपूर्वी आत्यंतिक भरभराटीला पोहोचलेली नसेल पण तिथले लोकं सुखी-समाधानी होते. प्रपंच म्हटला की अडीअडचणी ह्या असायच्याच ! तरीही आपली मन:शांती न हरवता, आरडाओरडा दोषारोप न करता ग्रामस्थांच्या सूचनेने, सहकार्याने अडचणी सोडवल्या जात. लग्न, यात्रोत्सवात गावातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असायचा. काही कर्मठांचा उपद्रव असायचा, पण त्याचा गावच्या व्यवहारात विशेष हस्तक्षेप नसायचा. वाद गावात मिटायचे. गावातील विद्वान आणि प्रतिष्ठितांचा शब्द ‘प्रमाण’ असायचा. लोकांच्या पारंपारिक व्यवसायात आधुनिकतेचा वावर नसल्याने कौशल्याचा पुरेपूर वापर व्हायचा. कालांतराने आपल्याकडे व्यवसाय स्वातंत्र्य आले. त्याचे काही फायदे झाले तसे तोटेही झाले. व्यवसाय स्वातंत्र्याचा पहिला फटका गावागावातल्या बारा बलुतेदार आणि अलुतेदारांना बसला. लोकांना पैसा अति झाला. पूर्वी गावात दोन-चार जण दारू प्यायचे. आता उलटं झालंय. लोकांना कोणाचा धाक राहिला नाही. परमार्थ कमी झाला, स्वार्थ बोकाळला. राहणीमान सुधारलं आणि जीवनमान घसरलं. या पार्श्वभूमीवर ‘गावगाडा’ पुस्तकाचे संदर्भमूल्य अधिक आहे. या पुस्तकातले उतारे खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवे होते. ‘गावगाडा’ म्हटला की चांगल्याचा हात धरून वाईटही चालतं. पूर्वीही चाललं. मुघलांनी इथल्या भूमीवर अत्याचार केले. इंग्रजांनी व्यापार केला.  या काळात देशाला समाजसुधारकांची परंपरा लाभली. स्वातंत्र्यानंतर समाजसुधारकी वातावरण लोप पावलं. आजचा गावगाडा टेलिफोन, मोबाईल, टीव्ही, मोटारसायकल, कार, संगणक आदि सोयींमुळे उतरणीला लागल्याचं बोललं जातं असलं तरी शहरांवर येणारा ताण कमी करण्यासाठी गावांना शहरातील किमान पायाभूत सुविधांशी जोडायला हवं आहे. अर्थात दोनेक हजार लोकसंख्येच्या गावात किती हॉटेल्स, किती वडापाव सेंटर, चहाच्या टपऱ्या असाव्यात यालाही मर्यादा असायला हव्यात. कारण टपरीवर सिगारेट ओढणाऱ्यांचा घोळका, ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं बीअरबार हे चित्र काही चांगलं नव्हे. गावच्या सुधारणांसाठी, बदलासाठी शहरातील संस्था, माणसं आणि गावं यांच्यात पूल तयार व्हायला हवा. शहरे चांगली होत राहातील पण गावं स्मार्ट व्हायला हवीत. गावात पायाभूत सुविधा, उत्तम शाळा, हिरव्यागार देवरायांचं जतन, नद्या नाल्यांची स्वच्छता आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. गावातले लोंढे शहरात येण्याचे थांबवण्याचा याच मार्ग आहे.

ज्या समाजाला ‘आत्मनिर्भर’ करण्याचे मिशन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाळगले आहे तो समाज आता बहुभाषिक झालाय. एकुणातल्या मुठभर लोकांना समृद्धीची चव चाखायला मिळते आहे. भाषिक संबंध तुटल्यामुळे माणसं गुलाम होत गेलीत. हिंदी कितीही बोलली तरी देशाची लिंकभाषा इंग्रजी झाली आहे. जोडाक्षरांसारखं अफलातून संचित असलेल्या मराठीचं स्वतंत्र भाषिक विद्यापीठ असावं असं आम्हाला वाटत नाही. सध्याचा बाजार समाजमाध्यमांनी व्यापला आहे. आपण सर्वजण त्याचे वाहक बनलोय. आपण या माध्यमांचं नेमकं काय करतोय ? आपल्याजवळ सांगण्यासारखं काही आहे का ? ही समाजमाध्यमं कशासाठी निर्माण झालीत ? या माध्यमांचं चारित्र्य काय ? याची माहिती नसल्याने आम्ही त्यांचा वापर करताना आमचा विवेक हरवून बसतो. आमच्यातच भांडतो. ही सोशलमाध्यमं मार्केटिंग टूल्स आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’च्या यशस्वीतेसाठी आम्ही हे समजून घ्यायला हवं. समूह माध्यमांमुळे ग्राहकांवर नजर ठेवणं सोपं झालंय. या बाजाराला प्रत्येक गोष्ट विकायची आहे. नको असलेल्या वस्तूही ग्राहकांच्या गळ्यात मारायच्यात. त्यातच जीवनात नसलेल्या गोष्टी असल्यासारख्या समजून आम्ही जगू लागल्याने बुद्धीहीन आणि मट्ठ लोकांची संख्या वाढतेय. यात भांडवलदारांची मोठी गुंतवणूक आहे. आपण कोणता विचार करायचा ? हेही समाजमाध्यमं ठरवतात. आपल्याला तपासायचीही संधी मिळत नाही. जगात या समूहमाध्यमांनी क्रांती घडवल्या. आमची आनंद आणि सुखाची व्याख्या बदलवली. आमचं स्वतःवरच नियंत्रण हरवल. द्वेष, चीड, संताप आणि राग वाढीस लागला. आजच्या जगात, ‘जे जे फुकट असतं ते सर्वाधिक महाग असतं’ हे कदाचित आम्हाला या जन्मात तर सोडा, मरेस्तोवर कळणार नाही. या आभासी जगात जो पैसे भरतो, तो त्याला हवा असलेला समाज घडवितो. आपलं जीवन माध्यमांच्या शक्तींनी नियंत्रित केलंय. संवाद भावनिक बनलाय. त्यातला वैचारीकपणा कमी झालाय. ‘कोरोना’मय बाजारात वस्तू विकण्यासाठी लोकांच्या मनात भीती आणि विश्वास निर्माण केला जात आहे. तंत्रज्ञान कोणतही असेना, उत्तमच असतं. पण त्याचा वापर कशासाठी होतो ? हे महत्वाचं आहे. तंत्रज्ञानामुळे माध्यमांचा पसारा वाढलाय. वाहिन्या, न्यूजपोर्टल, ही ऑनलाईन पत्रकारितेतील क्रांती ठरताहेत. या आधुनिक पत्रकारितेचे मूळ ‘व्यापारी माहिती’त आहे. पूर्वी पत्रकारितेने जनमत तयार केले, आजही होते आहे. पण त्यातून कोणाला समाजभान येत नाही. टीव्हीच्या रिमोट मधून हजारभर वाहिन्यांचे वहन होतेय. त्यासाठी लागणारा सारा पैसा आपल्यासाठी कोणीतरी दुसरा भरतो. अर्थात आपल्याला हवा असलेला मजकूर त्यात न मिळता पैसे देणाऱ्याला हवा असलेला मजकूर आपल्याला पाहावा लागतो हे नागवं सत्य आत्मनिर्भर होण्यासाठी आम्हांला समजून घ्यावं लागेल. ‘कोरोना’ने असंख्य पत्रकारांना घरी बसवले असताना तुरळक अपवाद वगळता त्यावर बोलायला आजची वर्तमानपत्र आणि पत्रकारिता तयार नाहीत, हे कशाचे द्योतक आहे ? हे चित्र बदलून स्वतःचं बॉल बेअरिंग नीट करण्याचा समांतर विचार देणारं सामूहिक शहाणपण सोशल मीडियातून आपल्यापर्यंत झिरपायला हवंय. आत्मनिर्भर भारत अभियानाचं यश त्याच्याशीही निगडीत आहे.

आपल्या देशातील माणसांच्या मनावर धर्म, आचार-विचार, जीवन व्यवहार, सण-समारंभ, आरोग्य, तंत्रज्ञान, पारंपरिकता, रूढी, प्रथा, श्रद्धा-अंधश्रद्धा, विचार, अविचार यांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे इथे कोणतीही समस्या सोडवताना, तशी निरीक्षणं नोंदवताना समाजशास्त्र, अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करावा लागतो. शहराजवळची गावं सोडली तर देशातल्या, महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यातलं आजचं चित्रही वेगळं आहे. इथलं जीवन अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यात अडकलेलं आहे. घरात शौचालय नसल्याने पहाटेच्या अंधारात गाव जागं व्हायच्या आत कुठे तरी आडोसा गाठणारी गावं कमी नाहीत. कोकणात काही प्रतिष्ठित कुटुंब वगळली तर सर्वसामान्य घरांची जबाबदारी गेली अनेक दशके स्त्रीया सांभाळताहेत. या स्त्रीयांमध्ये रक्तक्षय, जीवनसत्त्वांची कमतरता, कॅल्शियमच्या अभावामुळे पायात गोळे येणं, सांधेदुखी, अंगदुखी, कणकण, डोकेदुखी असली दुखणी चालूच असतात हे अभ्यासांती धान्यात येईल. गावातल्या स्त्रीयांत तंबाखू खाण्याचे प्रमाण अधिक आहे. तरुणींसाठी ब्युटीपार्लरची संख्या लक्षणीय वाढलेय. पूर्वी घराच्या दारात असणारी गवतीचहा, तुळसही आज शोधावी लागते. तरीही गावातली माणसं अज्ञानात, रोज कमावून रोज खाण्यात सुखी दिसतात. मूलभूत गरजांची, तंत्रज्ञानाची माहिती ह्या गावात पोचलेली नाही. तिथे आजही पाण्यासाठी वणवण करण्यात दिवस संपतो. हातपंप असला तर पाणी नसतं. पाणी असलं तर वीज नसते. दोन्ही असलं तर पाण्याच्या शुद्धतेचा अभाव !  घरातल्या कर्त्या पुरुषाला आणि मुलाला शिक्षण, उपचार, अन्न सगळं सुरुवातीला मिळतं. नंतर मुलीला आणि स्त्रीला ! असली पुरुषप्रधानता आजही काही ठिकाणी घट्ट जाणवेल. म्हणून गावं स्मार्ट हवीत म्हणताना तिथली माणसंही स्मार्ट, जागृत, बुद्धिमान, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान असणारी हवीत. तरुण राजकीय कार्यकर्त्यांना एखादं सामाजिक काम करून ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणवून घेण्यात आनंद वाटतो. मात्र असं म्हणवून घेण्यासाठी आपल्याला गावातले वीजेचे प्रश्न, स्ट्रीटलाईटची चालू-बंद अवस्था, रस्ते, त्यांची डागडुजी, सांडपाणी गटार व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, आठवडा बाजार, मुबलक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शुद्धता, शाळा, कॉलेज, मैदान, गार्डन, व्यायामशाळा, विविध लसीकरण, आरोग्यकेंद्रे, दवाखाना, आरोग्य शिबिरे, गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, ज्येष्ठांचा सन्मान, अकस्मात घडणाऱ्या घटनातील मदत, गावात सरपंचांचे असलेले लक्ष, शासनाच्या योजना ग्रामसेवक सांगतात का ? आदि प्रश्न पडायला हवेत. १९५२ साली वि. स. पागे यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना सुरू केली. लोकांचा प्रतिसाद पाहून सरकारने २६ जानेवारी १९७८ मध्ये यासंदर्भात कायदा केला. ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीची रोजगार हमी योजना प्रचंड यशस्वी झाली. २००५ साली केंद्र सरकारने ती देशभरात योजना लागू केली. आज ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम म्हणून ओळखली जाते. तरीही समृद्ध गावं आकाराला आली नाहीत. ग्रामीण भागातील योजनांवर अब्जावधी रुपये खर्च होताहेत. तरीही गावे ओस का पडतात ? गावातील तरुण शहराकडे का धावतात ? भारताचे पोट ज्या गावांवर अवलंबून आहे, तिथली जनता सुखी होणे ही आमची प्राथमिकता असायला हवी. त्यांना अंधारात ठेवून शहरे उजळविणारी विचारधारा आम्ही गेली अनेक दशके पोसली. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्हाला तिच्यातून बाहेर पडावे लागेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी (१२ मे) देशवासीयांना केलेल्या संबोधनात ‘आत्मनिर्भर’ शब्द वापरला. तो समजून न घेता काहींनी त्याची टिंगलटवाळी केली. चालायचंच ! पूर्वी लोकांनी गांधीजींचं ‘खेड्याकडे चला’ म्हणणं तरी कुठं मनावर घेतलेलं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘एक जीवनस्वप्न माझ्या डोळ्यांसमोर मी स्पष्ट पाहात आहे की, आपली प्राचीन भारतमाता पुन्हा जागृत झाली आहे व कोणत्याही काळापेक्षा अधिक भव्य स्वरूपात ती आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे.’ या संकल्पपूर्तीसाठी ‘आत्मनिर्भर भारत’ योगदान देऊ शकते. इतिहासात डोकावता, भारतात ‘स्वदेशी’ संदर्भात पहिल्यांदा १९०५च्या सुमारास दादाभाई नौरोजी यांनी मांडणी केली. कदाचित तत्पूर्वी त्याची गरज नसावी. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि १९२० नंतर महात्मा गांधींनी हा विषय पुढे आणला. ‘स्वयंपूर्ण गावं संपन्न भारत घडवू शकतात’, असं दीनदयाळ उपाध्याय म्हणालेले. दत्तोपंत ठेंगडी म्हणत, ‘जगातील आधुनिक आर्थिक धोरणांमध्ये संस्कृती आणि मानवी नाती यांचा विचार करण्यात आला नाही. प्रत्येक देशाला आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा विचार करुन आपल्या देशाला सोईची असेल अशी आर्थिक व्यवस्था करणे आवश्यक आहे.’ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘इंडिया २०२०’ मध्ये, ‘भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये समृद्ध होईल. जगात त्याचे नाव होईल’ अशी भूमिका मांडलेली होती. याचा सारांश असलेल्या आत्मनिर्भर भारताचा अध्यात्मिकता हा आत्मा आहे. एकदा हा जीवनाधार निश्चित झाला की मग पुढे जाण्यासाठीचे मार्गही स्पष्ट होऊ लागतील. निवळ भौतिक वस्तूंबाबत स्वावलंबी होणे हे ध्येय नाही. भारताने जगाला दिशा देणे अपेक्षित आहे. अतिप्राचीन भारतीय सभ्यतेमुळे आपल्याकडे संकल्पनांची निर्यात क्षमता भरपूर आहे. मानवी सभ्यतेच्या भारतीय प्रवाहात असलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टी आपण जगाला देऊ शकतो. तरीही भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच जग पाहाते. देश स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असताना हे थांबवण्याचे पाऊल उचलण्याची संधी कोरोनाने दिली. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) म्हटले. कोरोनाकाळात भारताने जगाची भूक भागवल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी विविध कृषी मालाची होणारी निर्यात कोरोना काळात मार्च ते जून २०२० मध्ये २३.२४ टक्क्यांनी वाढली. कोरोनानंतरच्या काळात शहरांना मजुरांची, कामगारांची पूर्वीइतकी गरज कदाचित असणार नाही. बेकारी वाढेल. गावात रोजगार निर्माण करावा लागेल. खाजगीकरण, बाजारीकरण आणि जागतिकीकरणाने आणलेली जीवनशैली बदलावी लागेल. मॅगीच्याऐवजी शेवया जवळ कराव्या लागतील. कमी अंतरांसाठी बैलगाडी, सायकली वापराव्या लागतील. अवाढव्य धरणांऐवजी पाझरतलाव, प्रचंड उत्पादने करणार्‍या उद्योगांऐवजी कुटीर, गृहोद्योग गावात सुरू करावे लागतील. कपड्यांपासून पादत्राणांपर्यंत गावचे ब्रॅण्ड विकसित करून त्यांना प्रतिष्ठा द्यावी लागेल.

भारताचा प्राचीन इतिहास हेच सांगतो की भारत जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या उच्चांकावर होता, आत्मनिर्भर होता. इथला समाज उद्यमशील, कल्पक, परिश्रमी, पुरुषार्थी, सुखी, समाधानी आणि वैभवसंपन्न होता. सुमारे चारशेहून अधिक वर्षे मुघल आणि जवळपास दोनशे वर्षे ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्यामुळे भारतीय समाज संस्कृती दुबळी बनली. असांस्कृतिक बदलांनी समाजाला घेरले. देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर समस्या दूर होतील ही सामान्य अपेक्षा फोल ठरली. समाज आत्मविश्वासहीन बनला. ‘आत्मनिर्भर भारत’ ही देशाची मान ताठ करणारी, अभिमानाने छाती फुलून येणारी,आपणही कोणीतरी महत्त्वाचे आहोत’ असं सांगू पाहाणारी घोषणा आहे. पाश्चिमात्यांनी केलेली प्रगती भौतिक आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर आजही भारत सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागे देश उभा राहायला हवा आहे. या विषयावर सरकार काम करते आहे. स्वयंसेवी संस्थाही काम करताहेत. मागच्या काही दशकात भारत आणि इंडिया वेगळा झालेला. ६५ टक्के माणसं शहरात तर ३५ टक्के गावात राहिली. एका आकडेवारीनुसार देशातील ११५ जिल्ह्यांची आर्थिक स्थिती आजही वाईट आहे. म्हणून आपल्या देशाला फरक पडतो. तरीही प्रत्येक कामात स्पेशलायझेशन हवंय हे आपण समजून घेतलं तर अनेक गोष्टी सोप्या होतील. कोरोना व्हायरसला प्रगत जगाच्या तुलनेत भारताने नियंत्रणात ठेवले. यामागे रोगप्रतिकारक्षमता हे प्रमुख कारण आहे. कोरोना काळात गावी पोहोचलेल्यांपैकी काहींनी हतबल न होता गावातच काहीतरी करण्याचा विचार निश्चित केला, हे आत्मनिर्भरता शक्य असल्याचे द्योतक आहे. लोकांनी मास्क बनवून विकले. काहींनी कम्युनिटी किचन चालवले, आजही चालवताहेत. सॅनिटायझर तयार झाले. कोरोनापूर्वी आपल्या देशात ‘पीपीई किट’ दीडेक हजार बनत. तो उद्योग दिवसाला तीन ते चार लाख किट्स बनवू लागला. ५० सुद्धा तयार न होणारी व्हेंटिलेटर मशीन ५००च्या होताहेत. यातून आपली लपलेली क्षमता दिसून आली. ही क्षमता आत्मनिर्भर भारतची प्रेरणा ठरावी. हा तो काळ आहे जेव्हा जगातल्या जवळपास साऱ्या विषयातल्या वस्तू चीनने भारतीय बाजारात आणलेल्या. यातून मोठा अडसर निर्माण झालेला. कधीतरी प्रतिक्रिया देणे होतेच. आपल्या प्रधानमंत्र्यांनी योग्य वेळेत ही संधी साधली. ती वाया जाऊ न देणे देशवासियांच्या हातात आहे. अर्थात देशातलं सगळं चित्र एकदम बदलणार नाही. पण तसं वातावरण तयार होईल. कोकणात तर डहाणूपासून बांद्यापर्यंतच्या कोकणी पदार्थांची रेलचेल असलेलं डी-मार्टसारखं साखळी दालन सुरुवातीला कोकणच्या राष्ट्रीय आणि सागरी महामार्गावर आणि नंतर राज्यात, देशात निर्माण व्हायला हवंय, असं सुचवावंसं वाटतं. आपल्याकडील अनेक छोट्या मोठ्या ‘गावठी’ प्रयोगांना जुगाड टेक्नॉलॉजी’ म्हणणं, आपलं ते हीन संबोधणं, इम्पोर्टेड म्हणजे चांगलं आणि ‘स्वदेशी म्हणजे कामचलाऊ म्हणणं आपण थांबवायला हवंय.

१९९१-१९९२ दरम्यान पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारने अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली. भारतीयांना व्यापाराचे विश्व मोकळे झाले. विदेशी उद्योजकांसाठी भारतीय व्यापारपेठ काही अपवाद वगळता पूर्ण खुली झाली. मल्टिनॅशनल कंपन्या भारतात आल्या. यामुळे भारताच्या गंगाजळीत वाढ झाली. पण आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलो. याचा फायदा चीनने घेतला. अनेक क्षेत्रांत त्यांची एकाधिकारशाही सुरु झाली. भारताएवढी एकत्रित अखंड बाजारपेठ चीनकडेही नाही. जागतिक बाजारपेठेत चीन आपला प्रतिस्पर्धी आहे. त्यांची प्रगती निश्चित कौतुकास्पद आहे. त्यांच्याशी जागतिक बाजारात लढा देणे सोपे नाही. तरीही प्रत्येक देशवासीयाने निर्धार केला तर आपण चीनची आर्थिक कोंडी करू शकतो. या चीनने १९८८ मध्ये औद्योगिक प्रगतीची योजना बनवली होती. त्यांनी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केला. कुठल्या पद्धतीचे उत्पादन चीन कमीत कमी खर्चात उत्पादन करून, जास्तीत जास्त देशांमध्ये विकू शकतो, यासंबंधी मास्टर प्लॅन बनवला. अशी हजारो उत्पादने हेरली. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. ही उत्पादने दुसऱ्या देशांमध्ये अधिकाधिक विकण्याची व्यवस्था उभारली. यासाठीच्या निर्यातक्षम कारखान्यांना सरकारकडून भरघोस सवलती मिळाल्या. परिणामस्वरूप चीनची उत्पादने खूप स्वस्त मिळू लागली. आपण तीच चिनी उत्पादने खरेदी करायला सुरुवात केली. परिणाम भारतीय उद्योगांवर झाला. कृषी क्षेत्रात सातत्याने काम करून प्रश्न आणि आत्महत्या कायम आहेत. दुसरीकडे केंद्रीय खते विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना काळात मे २०२० मध्ये खतांच्या किरकोळ विक्रीत मे २०१९ च्या तुलनेत ९८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली. भारत ट्रॅक्टर निर्यात करणारा देश आहे. या पार्श्वभूमीवर, ‘शेती ते ग्राहक अशी पायाभूत सुविधांची साखळी उभारण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा ‘आत्मनिर्भर भारत योजनेत करण्यात आली. आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्णपणे स्वयंपूर्ण होणे नाही. वर्तमान व्यावहारिक जगात तसे शक्यही नाही. मात्र इतर देशांवर कमी विसंबून राहात आपल्या गरजा मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण भारतासारख्या विशाल लोकसंख्येची जबाबदारी स्वीकारणे सोपे काम नाही. सध्या आपला देश जगातील सर्वात तरुण देश आहे. येथील लोकसंख्येचे ६५ टक्क्यांहून अधिक नागरिक ३५ वर्षांहून कमी वयाचे आहेत, ही आपली मोठी उपलब्धी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारत २०३०च्या पूर्वी चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल. याबाबत पावले उचलत पुढच्या २० वर्षात ठरवून आपण १३० कोटी लोकसंख्या १२५ कोटी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

सरतेशेवटी, भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मी आजपासून काय करू शकतो ? याचा विचार करू यात ! घरातल्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ? केवळ यावर त्याची बौद्धिक पातळी ठरवणे आपण सोडून द्यायला शिकूयात. स्वदेशी वस्तूंचा अधिक उपयोग करूयात. जागतिक राजकारणाबद्दल जागरूक राहूयात. युवकांनी स्वतःच्या कुटुंब नियोजनास प्राधान्य द्यायला शिकायला हवंय. ‘देशभक्ती हा विनोदाचा विषय नाही’ हे आपण स्वतःला समजवूया. कोरोनाची आलेली साथ, झालेले मृत्यू आणि आर्थिक नुकसान विध्वंसक आहे. यामुळे जगातील पुरवठा साखळी खंडित झाली आहे. तरीही चौकटीबाहेरचा विचार करण्याची संधी या संकटाने दिली. 'आत्मनिर्भर भारत' असाच चौकटीबाहेरची दूरदृष्टी असलेला कार्यक्रम आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी आपलं शासन हे अधिक कार्यक्षम, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी व्हायला हवं. शासन, प्रशासन आणि जनतेचं नातं विश्वासाचं, मैत्रीचं बनल्यास आळसविरहित आत्मनिर्भर भारताची वाटचाल देशाला महासत्तेकडे नेईल.


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

आरमारी ‘शिव’सत्तेत समुद्रीकोकणचा भौगोलिक प्रभाव !

भौगोलिक महाराष्ट्रातला समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश म्हणजे कोकण. कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. इथले दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. शिवपूर्वकाळात मुस्लिम सत्ताधीश त्यांना आपल्या सैन्यात आवर्जून भरती करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मावळ्यांना एकत्र करून मराठा साम्राज्य उभारले. सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. राजांचं पश्चिम किनारपट्टीवरील आरमारी सामर्थ्य अभ्यासताना, कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग पाऊलोपावली जाणवतो. प्रस्तुत लेखात आरमारी शिवसत्तेतील समुद्रीकोकणच्या भौगोलिक प्रभावाचा आढावा घेऊया !

सर्वात प्रभावी आणि जलद प्रवासाची सोय असलेल्या नौकानयनात आपले भारतीय प्राचीन काळापासून निष्णात असल्याचे उल्लेख इतिहासात भेटतात. अर्थात भारतीय राज्यकर्त्यांची नौकानयन परंपरा ही शांतता आणि व्यापाराची होती. प्राचीन लेण्यांमध्ये सागरीप्रवास आणि व्यापाराचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्रातील सातवाहन राजे त्रिसमुद्रतोयपितवाहनया गौरवास्पद उपाधीने स्वत:ला भूषवित. हजारभर वर्षापूर्वी दक्षिणेतील चोल राजांनी पूर्वआशिया (कंबोडिया-अंकोरवाट) भागात भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केलेला. तद्नंतर समुद्रबंदीसारख्या घातक रूढींमुळे भारतीयांनी समुद्राशी नाते तोडले आणि आपले वर्चस्व गमावले. महाराष्ट्राचा सागराशी असलेला संबंध हा यात्रा आणि अभ्यंगस्नानापुरता राहिला. त्यात समुद्री पर्यटनाचे अनुभव नसायचे. तेव्हा कोकण किनारपट्टी आरमारीदृष्ट्या विकसित नव्हती. इथे गुजराप्रमाणे खुल्या खोल समुद्रा थेट मार्गस्थ होता येत नसायचे. भौगोलिक मर्यादांमुळे येणाऱ्या अडचणी, साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे इथले लोकजीव किनाऱ्यालगत ५/७ किलोमीटरच्या परिघाच्या मर्यादेत वावरायचे. दक्षिण कोकणात तर खाड्या आणि खडकाळ भागांमुळे किनाऱ्यालगतचा प्रवास सावधपणे करावा लागे, आजही काही ठिकाणी अशी स्थिती आहे. उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेकडे गोवा सीमेवरील तेरेखोल खाडीपर्यंतची कोकण किनारपट्टी भौगोलिक वैशिष्ट्यांनी युक्त होती. इथली लोकसंस्कृती, माणसांचे स्वभाव, त्यांची वृत्ती, संघर्ष करण्याची मानसिकता हे सारे इथल्या इतिहास आणि भूगोलाचा परिणाम होते. पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पोहोचल्यावर इथले किनारवर्ती वातावरण बदलले. वास्को-द-गामा आल्याची नोंद जगाने घेतली, परंतु आपण नाही. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व भारतात अंमलात आणत सागरी सत्तेची फेरमांडणी केली. पुढे डच, फ्रेंच, ब्रिटिशकाळात हा संघर्ष वाढत गेला. या सागरी सत्तांनी बळकट जलदुर्ग आणि शक्तिशाली आरमार उभारले. तेव्हा एकाही स्थानिक भारतीय सत्ताधिशाकडे आरमार नव्हते. भारताचे बादशहा म्हणवून घेणार्‍या मोगल सत्ताधिशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता, पोर्तुगीजांना फी (कार्ताझ) देऊन विशिष्ठ मार्गावर फिरायचा परवाना घ्यावा लागे. हा कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज गलबतांचे कप्तान जहाजांना अडवत. मालमत्ता जप्त करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. पराक्रमासाठी आसुसलेल्या इथल्या मावळ्यांची मोट बांधली. विशेष पूर्वपरंपरा नसताना, कष्टातून, तरबेज आणि अनुभवी विरोधांना धूळ चारून, सागराचे व्यापारी महत्त्व ओळखून पहिलं स्वदेशी सागरी आरमार उभारलं. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापाराची खंडीत झालेली परंपरा सुरु केली. याची मांडणी सचिन पेंडसे यांच्या ‘मेरिटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ या पुस्तकात भेटते.

१६४८ मध्ये कोकणातील तळे, घोसाळे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा राजांचा सिद्दीशी संबंध आलेला. राजे स्वतः खलाशी किंवा दर्यावर्दी नव्हते. त्यांना आरमारी युद्धतंत्राची माहिती नव्हती. जवळ लढाऊ जहाजेही नव्हती. पाण्यातील किल्ले लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव नव्हता. मोगल आणि आदिलशाहीला भूमीवर शह देत कोकणात आरमार उभारणे सोपे नव्हते. पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज आणि डचांकडून आरमार उभारण्याचे कौशल्य शिकावयास मिळणे अशक्य होते. कोकणातला उंचचउंच सह्याद्री दक्खनच्या पठारापासून वेगळा होता. इथे घनदाट जंगल, अरबी समुद्र, खाड्या, समुद्रातील बेटे आदि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्यांमधील अंतर कमी राहाणार होते. याचे लष्करी डावपेचांमधील महत्त्व राजांनी अचूक हेरले होते. कोकणला पश्चिमेकडे समुद्राचे संरक्षण होते. पूर्वेकडूनही आक्रमणाचा धोका कमी होता. स्थानिक सरदारांच्या माध्यमातून वर्चस्व राखणाऱ्या आदिलशाह आणि मोगल बादशाह यांचे कोकणकडे विशेष लक्ष नव्हते. त्यांनी आरमारी सामर्थ्य उभे करण्याचा विचार केलेला नव्हता. पोर्तुगीज, इंग्रज आणि डच आक्रमकांपासून देशाला वाचविण्यासाठी, स्वराज्याला पूर्णत्त्व आणण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यशाली आरमाराची आवश्यकता महाराजांना जाणवलेली होती. भौगोलिकतेचा अचूक फायदा घेत राजांनी जमिनीवर गनिमीकावा तंत्र अवलंबिलेलं. तसं इथे, सागरी सत्तांवर अंकुश मिळवण्यासाठी आरमार आवश्यक होतं. किनारपट्टीवरील अवघड जागी किल्ले बांधणं गरजेचं होतं. याभागात फिरंग्यांचा संपर्क असल्याने शहरांचा विकास झालेला. वादळात सापडलेली जहाजे समुद्रकिनाऱ्यावर फुटत असत. त्यात असलेला माल स्थानिक सार्वभौम सत्तेच्या ताब्यात येत असे. आरमाराच्या दृष्टीने कोकणातील खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसरा होत्या. समुद्रकिनारी असणाऱ्या कठीण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी उत्तम होत्या. आरमारी संरक्षणाच्या दृष्टीने गिरिदुर्ग आणि जलदुर्गांची बांधणी आणि नवी संरक्षक स्थळे निर्माण करण्यासाठी किनारपट्टीवरील बेटे आणि समुद्रापर्यंत घुसलेले डोंगरसुळके मोक्याच्या जागा पुरवायला सज्ज होते. हे आरमारी महत्त्व लक्षात आल्याने राजे कोकणात शिरायची संधी शोधत होते.

जानेवारी १६५६नंतर औरंगजेब, बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. विजापूरला अली आदिलशाह मरण पावला होता. याकाळात राजांनी जावळी जिंकली. दाभोळवर भगवा फडकवला. तेव्हा कोकण किनारपट्टी निरनिराळ्या राज्यात विभागलेली होती. प्रजा अत्याचारांनी त्रस्त होती. सह्याद्रीतील डोंगररांगांच्या माथ्यावर उभे राहिलेल्या राजांना सागराच्या भव्यतेचे दर्शन झालेले. त्यांनी वेश पालटून कोकणपट्टीची पाहाणी करून घेतली. १६५७ला ते उत्तर कोकणात उतरले. त्यांनी कल्याण, भिवंडी परिसर जिंकला. आता जिंकलेला समुद्रकिनारा आणि मुलुखाच्या संरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता होती. आरमारी उभारणीसं आवश्यक नौका भर समुद्रात बांधता येत नाहीत. त्यासाठी लष्करीदृष्ट्या उपयुक्त अशी समुद्रातून आत घुसलेली खाडी आणि तळ कोकणच्या या भौगोलिक किनारपट्टीत मुबलक होतेच. १६५७ला कल्याणजवळील दुर्गाडी येथे उत्तम प्रतीचे सागवान वापरून पहिली २० जहाजे आणि लढाऊ गलबते बनविण्यास राजांनी सुरुवात केली. पुढच्या काळात राजांच्या आरमारात गाब्र (गुराब-तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज), तरांडी (माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करणारी नाव), तारव आणि गलबत (जलद चालणारे जहाज), शिबाड (मालवाहतूक करणारी व्यापारी जहाज), तिर्कटीतारू, मचवा, पडाव, होडी, डोण, पगार आदि प्रकार राहिले. राजांनी कल्याणची ही जबाबदारी सेनापती आबाजी सोनदेव यांच्यावर सोपविली. कामात आपल्या स्थानिक लोकांचा समावेश असणं लाभदायक ठरलं. जहाजांसाठी लागणारं लाकूड, कारागीर उपलब्ध होते, पण तंत्रज्ञान नव्हतं. हे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी वसईत तारवे बांधणारे कुशल पोर्तुगीज खलाशी लैतांव व्हियेगस आणि त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगस यांची मदत घेतली. त्यांच्यासोबत ३४० माणसं कार्यरत होती. आपल्या स्थानिक कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं हा यातला मुख्य हेतू होता. तसं राजांनी आबाजींना, ‘जी माणसे या कामावर नियुक्त कराल ती अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची हवीत, जी ते ज्ञान आत्मसात करू शकतील’ असं सांगितलं होतं. पोर्तुगालचे मुख्यालय असलेल्या गोव्यात मराठा आरमार उभारणीची ही वार्ता पोहोचल्यावर गडबड होण्याचा धोका होता. अल्पावधीत तसं घडलं. २ महिन्यांनी व्हेगास नोकरी सोडून गेला. अर्थात तोवर मावळे बरेचसे शिकले होते. राजांनी आपल्या जहाजांचे डिझाईन युरोपियन प्रमाणे न करता कोकणच्या भौगोलिकतेला अनुसरून केले. तेव्हा युरोपियन जहाजे खोल पाण्यात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बांधण्यात येत. त्यामुळे त्यांच्या पाण्याखालच्या तळाची खोली अधिक असायची. राजांची जहाजं ही किनारपट्टीच्या आसपास अधिक वावरणार होती. त्यांनी आपली सुरुवातीची जहाज छोटी आणि सरळ तळ असलेली, वेगाने किनारपट्टी जवळ पोहोचतील अशी बनविलेली. यामुळे राजांचे आरमार शत्रूंना आव्हान देऊ लागले. नौकाबांधणी, समुद्र, वारा, खगोलशास्त्र, नाविक रणनीती आदि ज्ञान शिकायला एकेक जन्म पुरायचा नाही हे वास्तव असताना राजांनी हे सारे जुळविले. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ ग्रंथातील, ‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ या वाक्यात मराठी आरमाराच्या प्रेरणेचे गुपित सामावले आहे. राजांना आरमारी, जहाज बांधणीज्ञान संपादन करण्यासोबत नौकाबांधणी, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडणारे जलदुर्ग बांधणे, माणसे प्रशिक्षित करणे आदि गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्यांनी पुढे आरमाराच्या वेगवेगळ्या तुकड्या बनविल्या. प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारची २०० जहाजं असायची. इथल्या भौगोलिकतेचा वापर करीत थेट खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी द्यायचे तंत्र वापरले. मोठी जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत असता शत्रु समोर आल्यास एकत्र येऊन झुंजायचे आणि वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास व गलबत योग्य चालवता येत नसल्यास शत्रूशी झुंज न देता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे, असे युद्धतंत्र होते.

राजे स्वतः शिस्तप्रिय असल्याने, आधुनिक प्रशासनाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवस्थेत दिसतात. नीती-नियमांचे काटेकोर पालन केले जाई. वर्षाचे ८ महिने राजांचे आरमार खुल्या समुद्रात असायचे. पावसाळ्याचे ४ महिने ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित ठेवले जायचे. हे काम समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधि व्हायचे. जहाजे खुल्या उथळ समुद्रात किंवा जलदुर्गाच्या खाली उघड्यावर नांगरून ठेवता येत नसत. छावणी दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात होई. एकाच बंदराच्या आसपासच्या गावांना अधिक कष्ट पडून नये, हे त्यामागचे कारण होते. नाविकांना पावसाळ्याचे ४ महिने शेतीत काम करावे लागे. आरमारात पठाणासोबत कोकणातील कोळी, सोनकोळी, आगरी, भंडारी, दादली, कोकणी मुस्लिम आणि कर्नाटकातील अंबी समाजाचे नाविक असत. या लोकांना समुद्र संचाराचे ज्ञान होते. गावाने प्रत्येकी १०० माणसांमागे २ माणसे आरमाराला द्यावीत अशी मागणी असे. राजांच्या आरमारात ५ हजार लोक होते. सागरी युद्धाच्यावेळी जलदुर्गांमधून आरमाराला युद्ध साहित्य पुरवण्यात येई. युद्धकैदी ठेवण्यासाठी जलदुर्गांचा उपयोग होई. जलदुर्गांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली जहाजे शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहात. नजीकचा परिसर, किनारपट्टी, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे होई. किल्ल्यांवरील सैन्य आणि तोफांमुळे समुद्रात आणि नदीत येऊ पाहणाऱ्या जहाजांना परतून लावता येत असे. राजांचे किल्ले उघड्या मैदानात किंवा सपाटीवर अभावाने आढळतात. भौगोलिकतेचा अचूक उपयोग करून नैसर्गिक बळकटी, अभेद्यता, जलसंचय आणि संरक्षण यांचा विचार येथे दिसतो. सिद्धीचे सामर्थ्य त्याच्या जहाजात होते. त्याचे आरमार दीडशे वर्ष जुने होते. तरीही राजांनी शून्यातून आपले आरमार उभारून त्याला सर्व शक्तीनिशी झुंज दिली. महाराज समुद्राकडे वळले नसते तर कदाचित सिद्दीशी संघर्ष करण्याचा प्रश्न आला नसता. परंतु स्वराज्याचे ध्येय त्यांनी तडीस नेले. आरमाराच्या जहाजांसाठी लागणारं लाकूड रयतेला त्रास न देता उपलब्ध झालं पाहिजे याबाबत राजे दक्ष होते. जहाज बांधणीस कमी पडलेली आंबा, फणसाची लाकडं त्यांनी कर्नाटकातूनही मिळवलेली. महत्त्वाच्या जहाजांसाठी बंदुकीच्या आणि तोफेच्या गोळ्यांपासून बचाव करणारे महत्त्वाचे लाकूड म्हणून ते सागवानाचा उपयोग करीत. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे राजांची १० हजारावर फौज होती. १६७४ च्या मे महिन्यात, लष्कराच्या छावणीला त्यांनी दिलेले पत्र, ‘आदर्श राज्य कसं असावं ?’ याचं उत्तम उदाहरण आहे. राई म्हणजे वनराई तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित राजांनी चलनी नाण्यांना शिवराईसंबोधलं असावं. पुण्याजवळच्या शिवापूरगावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. राजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केली. पुढे इंग्रजांनी ते तोडले. आजही बाणकोटला काही साग दिसतात.

राजांनी सिद्दीची इतर ठाणी जिंकली तरी, चौल (उत्तर) आणि दाभोळ (दक्षिण) या दोन प्राचीन बंदरांच्या मधोमध वसलेला जंजिरा जिंकणे आरमारासाठी आवश्यक होते. त्यासाठी प्रबळ आरमार आणि आर्थिक सामर्थ्य आवश्यक होते. म्हणून १६६४ मध्ये सुरत लुटण्यात आली. १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’शी राजांच्या आरमाराशी इस्ट इंडिया कंपनीच्या मरीनला लढावे लागले. सुरतेतून मिळालेल्या धनाचा उपयोग करून राजांनी २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग उभारण्याचे काम सुरु केले. राजांच्या हस्ते पायाभरणी झालेला तिथला दगडही आज भौगोलिकदृष्ट्या ‘मोरयाचा दगड’ नावाने प्रसिद्ध आहे. ८ फेब्रुवारी १६६५ ला आपल्या आरमाराचा उपयोग करत राजांनी आदिलशाही राज्यातील धनाढ्य बंदर बसरूरवर स्वारी केली. हे जोखमीचे काम अभ्यासल्यावर राजांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहाते. २९ मार्च १९६७ ला सिंधुदुर्गचे काम पूर्ण झाले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये म्हणून राजांनी येथे २ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. जंजिरेवर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा राजांच्या महत्त्वकांक्षेला आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर दुसरी राजपुरी वसवावी लागेल हा विचार करून त्यांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर सागरीदुर्ग बांधायचा निर्णय घेतला. या कुरटे बेटाजवळील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक होते. बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील होते. राजांनी तेथे गड बांधायचे निश्चित केले. गडावर चोहोबाजूंनी खारेपाणी असताना दहीबाव, साखरबाव आणि दूधबावची उपलब्धी, सुमारे ४० शौचकूपांचे बांधकाम तिथल्या भौगोलिकतेचा उपयोग स्पष्ट करते. यानंतर राजांनी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, सुवर्णदुर्ग बांधला. विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून संपूर्ण कोकण किनारपट्टी नियंत्रणाखाली आणली. हर्णै बंदरातील बेटावर १६६३ मध्ये बांधलेला सुवर्णदुर्ग हा राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजा भोज याने ११९५ ते १२०५ मध्ये बांधलेला किल्ला. आरमारी महत्त्व ओळखून राजांनी तो जिंकून घेतला. या भागातले भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे विजयदुर्गजवळची खडकात खोदलेली ३५५ फुट X २२७ फुट आकाराची गिर्ये गोदी होय. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार ५०० टनी जहाज येथे सहज बांधता येत असावे. अर्थात राजांकडील सर्वाधिक जहाज २५० टनी होते आणि १५० टनी जहाजे अधिक बांधली जात. विजयदुर्गपासून १५० मैल अंतरावर पश्चिमोत्तर समुद्रतळातील ४०० मीटर लांबीची तटबंदीही भौगोलिकतेचे दर्शन घडवते. ज्या भागात ही तटबंदी आहे त्या बाजूने येणारी अनेक जहाजे शिवकाळात, धडकून फुटून गेल्याची नोंद आहे. हे कशाने घडते ? याचे कोडे पोर्तुगीज आणि इंग्रजांना पडायचे. विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथे राजांनी पश्चिमोत्तर समुद्राच्या तळात ही संरक्षक तटबंदी उभारल्याचे किंवा ती शिलाहारांच्या काळात बांधली गेली असावी असे म्हटले जात असले तरी संशोधकांच्या म्हणण्यानुसार ती भिंत नैसर्गिक आहे. पुण्याच्या डेक्कन पुरातत्त्व संस्थेचे निवृत्त संशोधक डॉ. अशोक मराठे हे  कोकण किनारपट्टीवर पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीचा अभ्यास करत असताना त्यांना केळशी-हरेहरेश्वर ते विजयदुर्ग दरम्यान किनारपट्टीलगत एक रेष आढळून आली होती. ही दगडी भिंत असल्याच्या प्राथमिक अंदाजानंतर डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्यात पाणबुडे उतरवले. तेव्हा ही भिंत ८ हजार वर्षे पुरातन असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजचे संशोधक सहायक सचिन जोशी यांनीही मिथ्स अँड रिअॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅपट फोर्ट विजयदुर्गया विषयावर शोधनिबंध सादर करताना, ‘विजयदुर्ग किल्ल्याजवळची समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे’ असे म्हटले होते. नंतरच्या काळात आंग्रेंनीही याच भागात समुद्रातील टेकडी ‘आंग्रे बँक’ शोधली. अर्थात या साऱ्या भौगोलिकतेचा उपयोग सुरुवातीच्या काळात राजांनाही झाला.

इंग्रजांनी २६ नोव्हेंबर १६६४ ला इस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या एका पत्रात, ‘शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठविली आहेत.’ असे लिहिले होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार, १६६५ मध्ये मराठा आरमारात ८५ लढाऊ आणि ३ उच्च दर्जाची जहाज होती. पोर्तुगीज विजरई कोंदि द सांव्हिसेति याने राजांच्या आरमाराविषयी १६६७च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास, ‘शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते. त्याच्याविरुद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावर किल्ले बांधले. आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत’ असे कळविले होते. संपूर्ण राजवटीत तारवांमधून (संगमिरी) स्वारी करणारे राजे कदाचित एकमेव असावेत. राजांनी १६७० मध्ये नव्याने १६० जहाजांची बांधणी नांदगाव (कुलाबा) येथे केली. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावरील संगमेश्वरजवळच्या ओझरखोल (निढळेवाडी) येथेही राजांनी नौकाबांधणी सुरु केली होती. छत्रपतींच्या आरमारातील प्रसिध्द 'संगमेश्वरी' नौका इथली. शिवकालीन नौकाबांधणीची ही तंत्रपरंपरा आजही सुरु आहे. चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीवरील गोविंदगड हा दाभोळ खाडीतील आरमाराला निरोप पोचविणे, तेथून येणारे निरोप स्वराज्याची राजधानी रायगडावर पोचविणे या कामातील दुवा म्हणून काम करायचा. रायगडावर विशिष्ठ ठिकाणी आग पेटविल्यावर गोविंदगडाच्या समोरील सह्याद्रीतून ती दिसायची. रायगडावर पेटविलेली आग पाहून गोविंदगडावर खुणेची आग पेटविली जाई. याद्वारे फार थोड्या वेळात राजधानी रायगड ते मराठा आरमार यांच्यात संदेशाची देवाणघेवाण होई, इथे आपल्याला भौगोलिक महत्त्व दिसून येते. राजांनी या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रावर जरब बसवित सागरी व्यापार सुरु केला. समुद्राला पश्चिमेकडील नद्या जिथे मिळत तिथे बंदरे होती. त्यातूनही वाहतूक चाले. खास मीठाच्या (सॉल्टफ्लीट) वाहतुकीसाठी राजांनी गलबतांचा तांडा तयार करून घेतला होता. १६६५ च्या सुरतकर इंग्रजांच्या पत्रानुसार, दरवर्षी दक्षिण कोकणातील ७/८ बंदरातून राजांची २/३ गलबते पर्शिया, बसरा, आणि मोक्का (अबेसॅनिया) बंदरात व्यापारासाठी जात. परकीय सत्तांशी व्यापार करताना राजांनी आयात कमी आणि निर्यात जास्त हे वाणिज्य अनुकूल धोरण अवलंबिले होते. कोकण आणि घाट जोडणारे घाटमार्ग हे व्यापाराचे राजमार्ग होते. त्या मार्गांवर उभारलेले किल्ले चेकपोस्टचे काम करायचे. १६६९ पर्यंत गोवा, वसई, मुंबई ही मोठी समुद्री शहरं वगळता सगळं ताब्यात घेतलं. आरमाराला एक सुसंघटीत आणि फायदेशीर संस्थान बनवलं. या आरमाराने पुढे जवळपास १५० वर्ष राज्य केलं.

राजांनी मुरुड-जंजिऱ्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) बांधला. या पद्मदुर्गच्या भिंतींचे दगड झिजलेत पण दरजा भरलेला चुन्याचा मसाला झिजला नाही. मुंबईजवळ खांदेरी बंदरावरच्या बेटावर १६७२ मध्ये किल्याचं बांधकाम सुरु केलं. तत्पूर्वी या बेटांवर युरोपियन लोकांना गोड्या पाण्याची सोय करणे जमले नव्हते. राजांनी आपल्या संस्कृतीतील ज्ञानाच्या आधारे येथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. कामास विरोध करण्यासाठी इंग्रजांनी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे ठरवले. त्यांना आपल्या मोठ्या जहाजांचे विशेष महत्त्व वाटत होते. त्यामुळे कोकणातला उथळ समुद्र आणि खाड्यांचा विचार करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांच्या मोठ्या जहाजांना खाडीमध्ये ठिय्या देणे जमले नाही. वार्‍यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात. त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. उथळ पाण्यात मराठ्यांच्या छोट्या बोटींविरोधात इंग्रजांच्या बोटी जिंकू शकल्या नाहीत. राजांनी आपले आरमार आपल्या हद्दीत वावरणारे केलेले. मराठे लोकं रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत विविध बेटांवर सामान पोहवत. इंग्रज जहाजे पूर्णपणे वार्‍यावर अवलंबून असत. खांदेरीच्या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलयी वारे आदिंचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. खांदेरी उभारताना आजूबाजूला मोठाले दगड टाकण्यात आले. त्याच्यावर कालवे वाढून दगडाच्या कडा धारधार होतील. पायाला इजा होऊन त्यास सागराचे खारेपाणी लागताच आग होईल आणि पोहोचणं अवघड बनेल अशी योजना होती. जवळचा काशाखडक ते खांदेरी हा सागरीप्रवास खडकाळ आहे. तिथे पाण्याला उलट-सुलट प्रवाह असून अचानक बदलणारे वातावरण अशी त्या सागरीपट्ट्याची आजही भौगोलिक ओळख आहे. १६७८ ला कुलाबा किल्याचं काम सुरु झालं. मोठाले दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधण्यात आल्या. चुन्याने दरजा भरल्या नाहीत. समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळल्या की त्यांचं पाणी दोन दगडांच्या फटीतून आत जावं आणि पाण्याच्या प्रवाहाचा रोध कमी व्हावा, हा विचार भौगोलिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीतल्या समुद्री कोकणला राजांनी आरमारी उभारणीने बळकट बनवले. त्यांनी जमिनीवरील युद्धात जसा सह्याद्रीतले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले आदि भौगोलिकतेचा पुरेपूर वापर करून घेतला तसाच आरमारी युद्धात किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेचा उपयोग केला. स्वराज्य निर्मितीसाठी निष्ठावान मावळ्यांप्रमाणे सह्याद्री, सागराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. राजांच्या आरमाराविषयी जेम्स डग्लस म्हणतो, ‘शिवाजी जन्माने खलाशी नव्हता, ही त्या ईश्वराची कृपा होय. जर असता तर जशी त्याने भूमी पादाक्रांत केली त्याप्रमाणे सागरावर आपला अंमल गाजवला असता. खलाशी नसताना त्याने सागरावर आपले वर्चस्व स्थापन केलेच.’ सह्याद्री आणि सागराच्या या इतिहासात मानवी सामर्थ्याला अपयशी करण्यास निसर्ग आणि भौगोलिकता कारणीभूत ठरल्याचे दिसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य आणि आरमार उभारण्यापासून कोणालाही रोखता आलं नाही.

राजांच्या जीवनातील व्यवधानता पाहाता, सागरी सत्तेसारख्या अनोख्या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या असामान्य कर्तृत्त्वात भौगोलिकतेचा मोठा प्रभाव आहे. राजांच्या आरमाराविषयी कमी लिहिलं गेलं आहे. आजही जगातील ९० टक्के व्यापारी माल आणि वस्तूंची वाहतूक सागरी मार्गाने जहाजाद्वारे होत आहे. आगामी काळात समुद्रमार्ग हा प्रवासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह मोठ्या प्रमाणात खुला व्हायला हवा आहे. तसा तो व्हावा म्हणून अख्खं जग प्रयत्न करते आहे. आपले केंद्र सरकारही यावर काम करते आहे. महत्त्वाचा मार्ग म्हणून सागरीमार्गाला महत्त्व यायला विमान आणि रस्त्यांचे अपघात, प्रवासास लागणारा वेळ, आणि पैसा हेही कारण आहे. केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नातून ‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ अंतर्गत समूह सागरी सेवा प्रकल्प गोव्यात सुरु होण्याबाबतची वृत्त आपण वाचली आहेत. प्रत्येकाला समुद्राच्या तळाशी जाणे शक्य नसल्याने भविष्यात जगातल्या समुद्रीतळाची डिजिटल लायब्ररी तयार होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच भारताने सागरी सत्ता बनण्यासाठी विचार करायला हवा आहे. वर्षभरापूर्वी मुंबई विद्यापीठात सागरी मार्ग वाहतूक यावर एक सेमिनारही झाला होता. आपला अधिकतर इतिहास हा बखरी आणि प्रवासवर्णनातून लिहिला गेलेला आहे. त्याजोडीला इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा चिकित्सक अभ्यास वास्तूविशारदशास्त्राच्या दृष्टीने व्हायला हवाय. त्यातून इतिहासाची अधिकची भौगोलिक चिकित्सा पूर्ण होऊ शकेल.

संदर्भ :

१. मराठी विश्वकोश (http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9817&Itemid=2)

२. केतकर ज्ञानकोश

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी प्रशासनातील मुसलमानांचे योगदान (http://14.139.13.47:8080/jspui/bitstream/10603/241792/9/09_chapter%203.pdf)

४. मराठी सत्तेचा उदय, शिवाजी विद्यापीठ बी.ए. भाग १ (http://www.unishivaji.ac.in/uploads/distedu/2019_2020/SIM%202019/B.%20A.%20Part-I%20History%20(Rise%20of%20Maratha%20Power)%20sem%20I.pdf)

५. https://www.thinkmaharashtra.com/node/2045

६. शिवछत्रपतींचे आरमार - गजानन भास्कर मेहेंदळे

७. महाराष्ट्रेतिहास परिषद निबंध संग्रह-३, १९६८

८. कोकणचा राजकीय इतिहास – डॉ. खोबरेकर (१९९७)

९. इतिहास आणि भारतीय संस्कृती – जानेवारी - मार्च २०१२         

१०. इतिहास आणि भारतीय संस्कृती – एप्रिल – जून २०१६                                  

११. छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) – वा. सी. बेंद्रे

१२. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आणि नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे आणि मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद ‘ए फिफ्थ पर्स्पेक्टीव्ह’चे चंद्रशेखर बुरांडे यांच्याशी चर्चा. 


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. 

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, 

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...