बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

‘अ.भा.वि.प.’ची रत्नागिरीतील पाच दशकांची वाटचाल !

‘थोडा वेळ समाजासाठी’ ही संकल्पना तरुणांच्या मनात रुजवित, आदर्श विद्यार्थी चळवळीचे तत्त्वज्ञान मांडून देशभरात गेल्या ६८ वर्षांत ते सिद्ध करणारी, जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अशी ओळख असलेल्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात गेली ५२ वर्षे काम सुरु आहे. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून वैशिष्ट्यपूर्ण आणि सदैव कार्यरत,
देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारी तरुणाई घडविणाऱ्या या संघटनेच्या कोकण प्रदेशाचे ५२ वे अधिवेशन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान रत्नागिरीत संपन्न होते आहे, त्या निमित्ताने ‘अ.भा.वि.प.’च्या रत्नागिरीतील पाच दशकांच्या  वाटचालीचा हा धावता आढावा !

लहान वयात मोठं कार्य उभे केलेल्या स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थानी मानून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू पाहाणारी, दिनांक ९ जुलै १९४९ मध्ये रा. स्व. संघाच्या मोजक्या प्राध्यापकांनी स्थापन केलेली ही संघटना आज संघपरिवारम्हणून ओळख असलेल्या संघटनांपकी एक बहुचर्चित देशव्यापी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना बनली आहे. ‘सेवा, संस्कार आणि संघर्ष’ या त्रिसूत्रीवर काम करत अ.भा.वि.प.ने आजपर्यंत लाखो तरुणांच्या मनात ‘एक आंदोलन देश के लिये’ म्हणत राष्ट्रभक्ती, देशभक्तीचा विचार आणि समाजाविषयी ममत्व जागविण्याचे काम केले. आपापल्या कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी ‘झिंदाबाद झिंदाबाद ! विद्यार्थी परिषद झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत मोर्चा, आंदोलने, सदस्यता करणारी परिषदेची प्रवाही कार्यकर्त्यांची तरुणाई अनेकदा समाजाचे लक्षवेधून घेत असते. संघटनेच्या रत्नागिरीतील ५२ वर्षांच्या अशा या  कामाचा इतिहास हा माणूस जगण्याच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या, येथील अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिलेल्या योगदानाचा इतिहास आहे. एखाद्या संघटनेचे काम सुरु करणे सोपे असते, परंतु ते इतकी वर्षे टिकवणे कठीण असते. ‘अ.भा.वि.प.चे काम नक्की चालते कसे ?’ याबाबत अनेकांना आजही कुतूहल आहे. या लेखातून त्यातील काही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील, जी नवनव्या कार्यकर्त्यांना सदैव अखंड कामाची प्रेरणा देत राहतील !      

साधारणतः सन १९६०च्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या मार्गदर्शनखाली झपाटल्यासारखे कार्यरत झाले होते. यातूनच पुढे सन १९६४-६५ पासून रत्नागिरी शहरात गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘सदस्यता नोंदणी’ होऊन प्रा. मुळ्ये, प्रा. शेवडे, प्रा. लेले यांच्या प्रयत्नातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु झाले. पेढांबे-चिपळूणचे रहिवाशी महाराष्ट्र ‘कृषिभूषण’ स्वर्गीय रणजितराव खानविलकर हे त्याकाळचे परिषदेचेच कार्यकर्ते (ही आठवण त्यांनीच आम्हास सांगितली होती) होत. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमातून काम सुरु असताना स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्यासह सध्याचे आसाम आणि नागालँड या राज्यांचे राज्यपाल असलेल्या  पद्मनाभ आचार्य, सदाशिवराव देवधर, बाळासाहेब आपटे, सुरेशराव मोडक आदि रत्नागिरीतील काम वाढावे म्हणून अनेकदा मुंबईतून त्याकाळी प्रवास करीत असत. या प्रवासातून सन १९७० ला रत्नागिरी शहरात पहिली शाखा तयार होऊन ‘माधव ठाकूर’ ह्या कार्यकर्त्यावर ‘शहरमंत्री’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. प्राचार्य सुभाष देव हेही याच दरम्यान कामात आले. त्याचवेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जी.एस. निवडणुकीत परिषद कार्यकर्ते भिकू उर्फ दादा इदाते (थोर शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष) हे निवडून आले होते. परिषदेच्या बैठकींना किमान ४०-५० कार्यकर्त्यांचा ग्रुप असायचा. याच कालखंडात परिषदेचे चिपळूणातही काम सुरु झाले होते.         

सन १९७०-८०च्या दशकात अगदी सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोकण विभाग अधिवेशन’ आणि ‘डिपेक्स’ संपन्न झाले. मुंबईच्या प्रांतवर्गाला रत्नागिरीतून २० कार्यकर्ते उपस्थित होते. या कालखंडात आचरेकर माडीवर गोखले नाका येथे परिषदेचे कार्यालय सुरु झाले होते. अॅड़. अजित गोगटे, अॅड़. बाबा परुळेकर, सुरेखा दाते, अरुण भाटकर, जयंत करमरकर हे कार्यकर्ते तेव्हा सक्षमतेने परिषदेचा विचार महाविद्यालयीन तरुणाईसमोर ठेवत होते. या दशकात आणि त्यानंतरही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ. सुभाष देव हे सुरुवातीची १० वर्षे रत्नागिरी शहर शाखेचे अध्यक्ष आणि प्राचार्यपदाच्या कालखंडातही त्यांचा कामात सक्रीय सहभाग राहिला, महाविद्यालयीन अनेक कार्यक्रम-उपक्रम त्यांच्या सहज परवानगीने साकार झाले. सन १९७८ साली प्रांतस्तरीय पतितपावन मंदिर (रत्नागिरी) ते काळाराम मंदिर (नाशिक) अशी ‘समता ज्योत यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत गो. नी. दांडेकर, बाळ आपटे, शंकरराव खरात हे सहभागी झाले होते. वार्षिक सदस्यता उपक्रम याच दरम्यान सुरु झाला, किमान १०० कार्यकर्ते साप्ताहिक बैठकीला उपस्थित असत. हातात पावती पुस्तक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक रुपया घेऊन सदस्यता केली जाई. कार्यकर्त्यांवर कधी-कधी प्रश्नांचा भडीमार तर कधीकधी हातावर चटकन एक रुपया मिळे. अधिक सदस्यता, चांगली आणि वेळेत व्हावी, याकरिता स्वतंत्र बैठका होत. सदस्यता प्रमुख आणि समिती ठरे. या बैठकांमधून पुढील वर्षाचे नियोजन करणारे कार्यकर्ते घडत.  यातील जमलेला काही निधी हा छपाईशुल्क म्हणून काही प्रांतनिधी म्हणून पाठविला जाई. विद्यार्थ्यांचे त्यांच्या शिक्षण क्रमानुसार वर्गीकरण आणि भागश: याद्या तयार होत. भागश: याद्यांनुसार संपर्काची रचना, प्रत्यक्ष संपर्क आणि कार्यक्रमांना आमंत्रण यातून परिषदेच्या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होई. दिनांक ९ जुलैचा स्थापनादिन एक आनंदोत्सव असे, आजही हेच सुरु आहे.      

१९८०-९० च्या दशकात, सन १९८२-८३ मध्ये मुंबईतून पहिली विद्यार्थीनी पूर्णवेळ, शुभांगी गद्रे-पुरोहित  रत्नागिरीला आली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर संघटना सांगेल तेथे, सांगेल त्या स्वरूपाचे काम समर्पण भावनेने एका निश्चित कालावधीपर्यंत करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हटले जाते. अशा कार्यकर्त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील योगदानाला आणि परिषदेच्या संघटनात्मक कामाला प्रारंभ झाला. या दशकात रत्नागिरीला विद्याधर मुळे, रवि देशपांडे, मेधा महाबळ, संतोष बाम, शशांक गाजरे हे पूर्णवेळ कार्यकर्ते मिळाले तर प्रांतातून विद्यमान महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, संजय परमणे, प्रा. जयंत कुलकर्णी यांचा प्रवास सुरु झाला. प्रा. अच्युत लेले हे रत्नागिरी शाखेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर प्राचार्य सुभाष देव, प्रा. श्रीकृष्ण जोशी, प्रा. राजू सप्रे यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. या दशकात परिषदेचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून दापोलीच्या उदय गोविलकर यांच्याकडे जबाबदारी होती. या कालखंडात ५०० सदस्यता व्हायची. सन १९८५ साली रत्नागिरीत प्रथमच तंत्रनिकेतन महाविद्यालयात परिषदेचे प्रांत अधिवेशन झाले होते. यावेळी रत्नागिरीतून प्रदीप कुलकर्णी, ज्योती फडके-काळे, विनीत देव, संगीता करंबेळकर, विदुला देशपांडे, नयनाताई लिमये-सहस्रबुद्धे, मालती पाथरे-साबळे, गणेश मुळ्ये, चिपळूणातून डॉ. विनय नातू, अनिल परांजपे, दापोलीतून अनिल जोशी, सौरभ बोडस, वैशाली गोगटे, उदय गोविलकर, देवरुखातून नयना नवरे, संदीप गानू या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली होती. याच दरम्यान प्रा. यशवंतराव केळकर यांच्या ६१ वर्षे वयपूर्तीचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी रत्नागिरीतून ६१ हजार रुपयांचा ‘यशवंत निधी’ संकलित करून तो प्रांताच्या कोशात जमा करण्यात आला. सन १९८९ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू शशिकांत कर्णिक यांच्या विरोधात रत्नागिरीत आंदोलन करण्यात आले. सन १९९० साली सुनीला मेस्त्री या काश्मिरी तरुणीचे रत्नागिरीत अल्पबचत सभागृहात भाषण झाले होते, विद्यार्थीनींच्या मोठ्या उपस्थितीने पुन्हा एकदा विद्यार्थीनी कामास या व्याख्यानाने गती मिळवून दिली. गीताताई गुंडे यांचा प्रवास त्याकाळात रत्नागिरीत सुरु झाला होता, त्याचाही विद्यार्थीनी काम वाढण्यास खूप उपयोग झाला होता.  

सन १९९१ ते ९५ दरम्यान संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह देवरुख, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर, मंडणगड येथे संघटनात्मक काम वाढीस लागले. रत्नागिरीतून अकल्पिता सरदेसाई, रमेश काळे, दर्शना  कुलकर्णी-जानराव, रुपाली पंडितराव-जोशी, अपर्णा बापट-पंडितराव, संजना बर्वे-मराठे, मनीषा ठाकूर, मकरंद दामले, सातवळेकर भगिनी, चिपळूणातून संगीता गोखले, विनोद झगडे, विराज आवटी, प्रकाश कुंभार, योगिनी मालशे, प्रा. विकास मेहंदळे, संगीता आणि अपर्णा बापट, दर्शना देशपांडे, देवरुखातून विठ्ठल सावंत, कांचन फाटक, नयना बने, स्मिता गद्रे, हर्षदा सावंत, संभाजी आंब्रे, दापोलीतून श्रीरंग जांभळे, विद्याधर करंबेळकर, दुर्गा आंबर्डेकर, देवयानी सरखोत, संजय मिश्रा, लांज्यातून जयेश शेट्ये, संजय गांधी, अरुण उपशेट्ये, श्रीराम जंगम, किशोर मानकर, गुहागरातून मयुरेश पाटणकर, अभय भाटकर, स्मिता तांबे, अमोल दीक्षित, खेडमधून दिलीप आम्बुर्ले, भूषण काणे, अॅड़. मिलिंद जाडकर, मंडणगडातून बापू शेठ, सचिन शेठ हे कार्यकर्ते परिषदेच्या प्रवाहात प्रामुख्याने कार्यरत होते. याच दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात प्रमुख कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रवास सुरु झाला. त्याकाळी विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे, राजेश पांडे, विनय नवरे, वर्षा पवार-तावडे, नरेंद्र पवार हे कार्यकर्ते प्रांतातून तर अकल्पिता सरदेसाई, श्रीरंग जांभळे, दर्शना कुलकर्णी, स्वाती सातवळेकर, भूषण काणे, अॅड़. संदेश चिकणे, विश्वास वाडेकर, शलाका पाटील, सोनाली गानू, माधव नामजोशी जिल्हा प्रवास करीत. रत्नागिरी शाखेची मनीषा ठाकूर मंत्री तर श्रीरंग जांभळे जिल्हाप्रमुख होता. प्रा. सुभाष देव, प्रा. प्रकाश घळसासी, प्रा. कांबळे हे शहराध्यक्ष, उमेश आपटे, संतोष बाम, अविनाश मणेरीकर हे पूर्णवेळ कार्यकर्ते तर जयंत कंधारकर, प्रमोद कुलकर्णी, सतीश कुलकर्णी हे विभाग संघटनमंत्री म्हणून जिल्ह्यात कार्यरत असत. या सर्वांच्या एकत्रित कामामुळे सन १९९१ च्या काश्मीर आणि आसाम बचाव आंदोलनात रत्नागिरीतून १०० जणांनी सहभाग घेतला होता. सन १९९२ ला रत्नागिरीत ‘कोकण उपकेंद्र मागणी परिषद’ झाली, यावेळी शहरात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीसमोर निदर्शने करण्यात आली होती. यात तीन जिल्ह्यातील ६५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता, नेतृत्व वर्षा पवार-तावडे हिने केले होते. याचवर्षी हृदयनाथ मंगेशकर यांचा ‘भावसरगम’, अरुण दाते यांचे गायन आदि उपक्रम आर्थिक कार्यक्रम म्हणून झाले. जिल्ह्याच्या कोषाची व्यवस्था लागावी म्हणून आर्थिक कार्यक्रमांची असलेली रचना रत्नागिरीत कार्यान्वित झाली. सन १९९३ च्या मोर्चा पूर्वी ५०० संख्येची मशालज्योत यात्रा काढण्यात आली. जून १९९३ मध्ये फी वाढीविरोधात महाराष्ट्रात एकाचवेळी ठिकठिकाणी, जिल्ह्यात जिल्ह्यात वाटुळ, लांजा, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण, भरणेनाका येथे मोठा रास्तारोको करण्यात आला. रास्तारोकोचे नेतृत्व अकल्पिता सरदेसाई, जयेश शेट्ये, विठ्ठल सावंत, प्रकाश कुंभार, भूषण काणे, शिल्पा सातवळेकर यांनी केले. महाराष्ट्र परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ७ सप्टेंबर १९९३च्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठीच्या विराट मोर्च्यात जिल्ह्यातून ७७८ कार्यकर्ते सहभागी झाले होते, लांज्यातून लक्षणीय १५० जणांचा सहभाग होता. जिल्ह्यातून मोर्चाचे नेतृत्व रमेश काळे याने केले. सन १९९४ साली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मंडणगड ते बांदा अशी ‘स्वामी विवेकानंद संदेश यात्रा’ काढण्यात आली होती. सन १९९४ साली वनवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन रत्नागिरी, भरणे नाका, चिपळूण, लांजा, संगमेश्वर येथे ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोको, मोर्डे-संगमेश्वर येथील श्रमसंस्काराचा अनुभव देणारे श्रमानुभव शिबीर, बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानमाला हे कार्यक्रम संपन्न झाले. उमेश आपटे, श्रीरंग जांभळे, अकल्पिता सरदेसाई आणि मधुवंती साठे यांनी जिल्ह्यात संघटनात्मक काम उभे राहावे म्हणून विशेष योगदान दिले.

सन १९९५ ते २००० दरम्यान जिल्ह्यात परिषदेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, विविध वसतिगृहे येथे काम वाढत गेले. या दरम्यान परिषदेच्या कामातून प्रेरणा घेऊन दापोलीची कार्यकर्ती शलाका पाटील हिने सुरुवातीला वर्षभर विक्रमगड-डहाणू आणि त्यानंतर मध्यप्रदेशात ‘वनवासी कल्याण आश्रम’करिता पूर्णवेळ काम केले. याच कालखंडात जिल्ह्यात रत्नागिरी, लांजा, भांबेड, वेरवली, रिंगणे, नेर्ले, राजापूर, पाचल, देवरुख, संगमेश्वर, कसबा, चिपळूण, अलोरे, मार्गताम्हाने, गुहागर, दापोली, वाकवली, मंडणगड येथे महाविद्यालयीन शाखा उभ्या राहिल्या. शहरात सुषमा कोतवडेकर, सोनाली गानू या शहरमंत्री, प्रा. घळसासी, प्रा. महेश नाईक हे अध्यक्ष तर संभाजी आंब्रे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. लांज्यातून प्रा. मराठे, प्रा. आनंद मराठे, राजापुरातून प्रा. कांबळे, दापोलीतून प्रा. साठे, लवेलमधून प्रा. गद्रे, चिपळूणातून प्रा. अर्चना बक्षी कार्यरत होत्या. याच कालखंडात जिल्ह्यात व्यावसायिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढला. सन १९९६ ला श्रीधर फडके यांचा ‘ऋतू हिरवा’ आर्थिक कार्यक्रम आणि ११० विद्यार्थी संख्येचे धामणंद-खेड, मुरडे, कोळथरे, कोळीसरे, रानारी, तिवडी-चिपळूण येथील श्रमानुभव शिबिरांतून कार्यकर्ता ग्रामीण वातावरणाशी जोडला गेला. सन १९९७ च्या प्रतिभासंगम संमेलनाची सुरुवात पतितपावन मंदिरातून ग्रंथदिंडीने, राज्यातील ८०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली होती. हातात भगवा ध्वज, ग्यानबा तुकारामचा गजर, स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवरचे यथार्थ चित्रण करणारे चित्ररथ यामुळे दिंडी आकर्षण ठरली होती. शहरातील शिर्के प्रशालेच्या प्रांगणात संमेलनासाठी स्वा. सावरकर नगरी उभारण्यात आली होती. या संमेलनाला उद्घाटक मंगेश पाडगावकर, डॉ. आनंद यादव, रमेश पतंगे, किशोर पाठक, अरुण म्हात्रे, रमेश कोटस्थाने, अंजली हर्डीकर, नितीन केळकर, प्रवीण दवणे, नामदेव कांबळे यांच्यासह सुधीर मोघे यांचा कविता पानोपानी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, द. मा. मिरासदार यांच्या तोंडून आचार्य अत्रे ऐकण्याचा अविस्मरणीय अनुभव, शब्दांशी असलेलं देण-घेण मानणाऱ्या पानिपतकार विश्वास पाटील यांची रंगलेली मुलाखत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे तत्कालीन संचालक आणि आजचे राज्यसभा खा. विनय सहस्रबुद्धे यांनी समरसतेचा विचार मांडणारे साहित्य निर्माण व्हायला हवे हा समारोपाला दिलेला विचार घेऊन संमेलनाला उपस्थित राज्यभरातील सुमारे ७०० साहित्यिक आपापल्या गावी परतले होते, ह्या संमेलनाने परिषदेच्या रत्नागिरीतील कामाला नवा आकार प्राप्त करून दिला होता. यशस्वीतेसाठी प्रांत संघटनमंत्री रत्नाकर पाटील, सहसंघटनमंत्री संजय पाचपोर, प्रांताध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रांतमंत्री नरेंद्र पवार (कल्याणचे आमदार), प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. नरेंद्र पाठक, अतुल कुलकर्णी यांचा प्रवास, निमंत्रक अरविंद नाईक, स्वागताध्यक्ष जयंत देसाई, जयंत पटवर्धन, जयंत पुरोहित, जिल्हाप्रमुख संभाजी आंब्रे, शहराध्यक्ष प्रा. घळसासी, शहरमंत्री सुषमा कोतवडेकर, प्रतिभासंगम प्रमुख जयवंत धुमाळ, निधीप्रमुख अमित करंदीकर, विश्वास वाडेकर, धीरज वाटेकर, अॅड़. संदेश चिकणे, अॅड़. समीर आठल्ये, मंदार दामले, यशवंत सोहोनी, अभिजित जेधे या प्रमुख कार्यकर्त्यांसह विभाग संघटनमंत्री शिवाजी दहीबावकर, जिल्हा संघटनमंत्री निरंजन काळे, पालक शुभांगी पुरोहित, प्रदीप कुलकर्णी आदींसह सुमारे २५० कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमातून संमेलन यशस्वी झाले. ‘नियोजन-व्यवस्था-भोजन’ या तीनही कसोट्यांवर हे संमेलन कमालीचे यशस्वी ठरले. संमेलनातून १५ लाख रुपयांचा निधी जमा झाला होता. या संमेलनात कार्यकर्ता म्हणून काम केलेला प्रत्येकजण आजही प्रतिभासंगमची आठवण निघाली की त्या संस्मरणीय आठवणीत रमतो, त्या आठवणी जगतो आहे. यानंतरच्या कालखंडात ज्योती रेगे, बलराज जोशी हे पूर्णवेळ कार्यकर्ते, उत्तम पाटील, चारुदत्त देशपांडे हे विद्यार्थी विस्तारक लाभले. सन १९९९ ला ‘मतदार राजा जागा हो’ द्वारे जिल्ह्यात १० गेटसभा, ३० कॉलेजच्या माध्यमातून ५० हजार पत्रकांचे वाटप करण्यात आले. याचे नेतृत्व संभाजी आंब्रे, मंदार गानू, रामचंद्र केळकर यांनी केले. याकालखंडात मकरंद दामले, मंदार दामले, विश्वास वाडेकर, सोनाली गानू, संभाजी आंब्रे, अॅड़. संदेश चिकणे, धीरज वाटेकर, अॅड़. समीर आठल्ये, निवेदिता करंबेळकर, नूतन करंबेळकर, नेत्रा करंबेळकर, सुषमा यादव, मंदार दामले, यशवंत सोहोनी, जयेश शेट्ये, अभिजित जेधे, स्वप्नील सावंत, कै. विवेक पवार, पल्लवी मुळ्ये, गणपतीपुळेच्या ‘प्राचीन कोकण’चे संचालक वैभव सरदेसाई, आश्विनी केतकर, सुचिता भागवत, शलाका मुकादम, अमिता मुळ्ये, वृंदा गद्रे, मिनाक्षी नामजोशी, विद्या परुळेकर, राजेश गोसावी, प्रसाद भुर्के, क्षमा सातवळेकर, कमाल गद्रे, रमेश हर्चे, मनोज बाईंग, विनोद पवार, मंजिरी पेठे, कै. शबरी पाटणे, निलेश ठाकूर, स्वरूपा हेगशेट्ये, अमोल तांबे, अमित तांबे, युवराज पेठे, निनाद जोशी, प्रमोद कांबळे, विक्रम फडके, अमोल कदम हे कार्यकर्ते कार्यरत होते.     

सन २००० ते २०१० या दरम्यान निनाद जोशी, स्वप्नील सावंत, कै. विवेक पवार, धीरज वाटेकर, अभिजित जेधे, अॅड़. समीर आठल्ये, पल्लवी मुळ्ये, वैभव सरदेसाई, आश्विनी केतकर, स्वरूपा हेगशेट्ये, प्रमोद कांबळे, अमित तांबे, अमोल तांबे, युवराज पेठे, अमोल कदम, विक्रम फडके, निवेदिता करंबेळकर, नूतन करंबेळकर, नेत्रा करंबेळकर, सुषमा यादव, स्वाती करमरकर, विठ्ठल रावनंग, समीर रावनंग, स्नेह बापट, अजय इदाते, मनीषा शेवडे, अॅड़. महेंद्र मांडवकर, प्रणिता नामजोशी, रत्नप्रभा रहाटे, प्राची साळवी, अमेय हर्डीकर, नीता जाधव, जयेश हर्डीकर, भाग्यश्री रायकर, गौरीप्रसाद जोशी हे तर सन २०१० नंतर संकेत देवस्थळी, अनिरुद्ध परांजपे, मानसी मुळ्ये, निकिता राणे, अपूर्वा सरपोतदार, सतीश सूर्यवंशी हे कार्यकर्ते प्रामुख्याने कामात होते. या कालखंडात सुचिता देशपांडे, विवेक शिरोडे, अमोल पाठक (लोकसभाध्यक्ष खा. सुमित्रा महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक), दत्ता मिसाळ, विलास बोरसे, योगेश कुलकर्णी, मयुरी वायगुडे हे पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत राहिले. सध्या संतोष तोनशाळ, प्रेरणा पवार हे पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत आहेत. अध्यक्ष म्हणून या कालखंडात प्रा. महेश नाईक, प्रा. सुधीर येवले, प्रा. श्रीकांत दुधगीकर, प्रा. प्रभात कोकजे, जिल्हाप्रमुख म्हणून अमेय हर्डीकर, प्रमोद कांबळे, संकेत देवस्थळी, प्रा. श्रीकांत दुधगीकर, साईजित शिवलकर, विभाग संघटनमंत्री शिवाजी दहिबावकर, शरद चव्हाण, मिलिंद आरोलकर, यदुनाथ देशपांडे यांनी तर प्रांत आणि क्षेत्रीय संघटनमंत्री म्हणून देवदत्त जोशी गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.

सन २००५ साली मंदार सावंतदेसाई, सन २०१० साली अॅड़. संदेश चिकणे या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक लढविली होती. ५ ऑगस्ट २००५ रोजी कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मुल्यांकन आणि झेरॉक्स या करिता आंदोलन छेडले होते. जून २००८ मध्ये दापोलीत प्रांत समीक्षा बैठक आणि पूर्णवेळ कार्यकर्ता वर्ग संपन्न झाला.जुलै २००९ मध्ये राजिवडा-रत्नागिरी आय.टी.आय.चे प्राचार्य  यांना फी-वाढीविरोधात घेराव घालण्यात आला होता. जानेवारी २०१५ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे ‘प्रदेश कार्यकारिणी बैठक’ संपन्न झाली. तिला प्रांतातून १२५ प्रतिनिधी आणि त्या बैठकीच्या व्यवस्थेकरिता ५० कार्यकर्ते कार्यरत होते. यावेळी सुनीलजी आंबेकर, प्रा. मिलिंद मराठे, संजय पाचपोर उपस्थित होते. झारेवाडी-रत्नागिरी, शिपोशी-लांजा, बुरंबी-देवरुख, अलोरे याठिकाणी श्रामानुभव शिबिरे या कालखंडात संपन्न झाली. २०१५ मध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘युगंधरा विद्यार्थीनी संमेलन’ संपन्न झाले. जिल्ह्यातून याला २०० विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या संपूर्ण कालखंडात २५ डिसेंबर २०१५ ला परिषदेच्या महाराष्ट्र प्रांताचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन संपन्न झाले. यावेळी स्वतंत्र ‘कोकणप्रांत’ घोषणा होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी असे दोन जिल्हे त्यांचे केंद्र अनुक्रमे चिपळूण आणि रत्नागिरी घोषित करण्यात आले. या अधिवेशनाला ५० कार्यकर्ते आणि ७ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जानेवारी २०१७ मध्ये दापोलीत ‘कोकण प्रांत कार्यकारिणी बैठक’ संपन्न झाली. यानंतर लोटे येथील परशुराम आर्युवेद महाविद्यालयात ‘पंचकर्म आर्युवेद काळाची गरज’ याविषयावर कार्यशाळा संपन्न झाली, त्यास १०० रुपये शुल्क भरून १३० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळा प्रमुख डॉ. प्रेमदास चव्हाण, तर डॉ.अमोल कदम, डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या सुरुवातीपासून प्राचार्य सुभाष देव, शुभांगीताई पुरोहित, प्रदीप कुलकर्णी, नरेंद्र घाडीगावकर यांनी ‘पालक’ या नात्याने सतत अनेक वर्षे न विसरता येणारे योगदान दिलेले आहे. त्यानंतरच्या अलिकडच्या कालखंडात डॉ. अजित जोग, संभाजी आंब्रे, निनाद जोशी, प्रा. अर्चना बक्षी, धनंजय साठे, सौरभ बोडस, विश्वास वाडेकर, स्वप्निल सावंत हेही या विषयाची जबाबदारी सांभाळून आहेत. सन डिसेंबर २०११ मध्ये लातूरला परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. सुमारे ६०० जुने कार्यकर्ते-प्रतिनिधी संमेलनास उपस्थित होते. आपल्या सोबत बेभानपणे काम केलेल्या सवंगड्यांना भेटणे हा संमेलनाचा आपसूकच बनलेला हेतू अनेकांचा साध्य झाला. मुंबईतील ५० व्या प्रदेश अधिवेशनातही ‘पूर्व कार्यकर्ता एकत्रीकरण’ झाले होते. दोन्ही वेळेला जिल्ह्यातून पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेच्या प्रेरणेतून आजवर जिल्ह्यातून अकल्पिता सरदेसाई, श्रीरंग जांभळे, कै. किशोर पुरोहित, शलाका पाटील-मोरे, स्वाती करमकर-रानडे, विक्रम फडके, स्वप्नील सावंत, प्रणिता नामजोशी, मनिषा शेवडे, रत्नप्रभा रहाटे, सतीश सूर्यवंशी, गौरीप्रसाद जोशी, संकेत देवस्थळी हे पूर्णवेळ कार्यकर्ते राज्यात कार्यरत झाले.  

सन १९८५ नंतर ३२ वर्षांनी २७ ते २९ डिसेंबरला रत्नागिरीत अधिवेशन होत आहे. रत्नागिरी अधिवेशनासाठी कोकण प्रांतातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या नावाने अनेकांचे महाविद्यालयीन जीवन व्यापून टाकले आहे. शिबिरे, सहली, अभ्यासवर्ग म्हणजे परिषदेचे काम हा प्राथमिक समज जसजसे आपण कामात अधिक समरस होत जातो तसतसा व्यापक होत जातो, संघटनेचे अनेकविध पैलू समजत जातात. परिषदेच्या कामाची पाच-सहा वर्षांची शिदोरी पुढे जीवनात सदैव उपयोगीच पडते, असा अनेकांचा अनुभव आहे. आपण ज्या काळात काम केले तो ‘अभाविप’चा ‘सुवर्णकाळ’ होता, असे स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे तो त्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा ‘सुवर्णकाळ’ असतो. हा सुवर्णकाळ जगलेले अनेक ‘पूर्व कार्यकर्ते’ या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आपला थोडा वेळ समाजासाठी देऊ पाहाणाऱ्या वर्तमान महाविद्यालयीन तरुणाईनेही त्यांच्यासारखेच आपल्या कार्यक्षम जीवनातील काही काळाच्या समाजसेवेच्या समिधा अर्पिण्यासाठी कार्यरत होण्याची पहिली पायरी हे अधिवेशन ठरू शकते. त्यासाठी नवतरुण कार्यकर्ते बंधू-भगिनींना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा !   

धीरज वाटेकर (पूर्व कार्यकर्ता)

‘अभाविप’च्या ५२ व्या कोकण प्रदेश अधिवेशन निमित्ताने...

(टीप : या लेखातील मुद्द्यांसंदर्भात, आपला पूर्व कार्यकर्ता बंधू संभाजी आंब्रे याने अनेक पूर्व कार्यकर्ते, प्राध्यापक, पूर्णवेळ कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता. अजूनही हा लेख आपल्याला अपूर्ण वाटू शकतो. आगामी काळात हे लेखन सर्वार्थाने परिपूर्ण व्हावे यासाठी पूर्व कार्यकर्त्यांनी आपले काही अनुषंगिक अनुभव कृपया dheerajwatekar@gmail.com येथे पाठवावेत आणि ‘अ.भा.वि.प.’ची रत्नागिरीतील पाच दशकांची वाटचाल ! हा लेख अधिक परिपूर्ण होण्यासाठी आपले योगदान द्यावे. धन्यवाद.)

                                          


रविवार, २४ डिसेंबर, २०१७

अटलजी ! भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह !







धीरज वाटेकर

अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या सन २०१३ साली 
प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील विशेष लेख !



शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारे संघटन

‘अभाविप’च्या ५२ व्या कोकण प्रदेश अधिवेशन निमित्ताने... 

साधारणतः १६ ते २१ या वयोगटातील युवक हा शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असतो. या वयात, विद्यार्थी मनात ‘असंतोष’ निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नकारात्मक प्रभावाने व्यापण्याची शक्यता असते. आज आपल्याकडे पारंपारिक कुटुंबपद्धतीही जवळपास नाहीशी झाली आहे. युवा वर्गात एक ‘प्रतिसंस्कृती’ निर्माण होऊ पाहाते आहे. साधारणतः या वयातला युवक हा शिक्षणाबरोबरच स्वतःचे अवलंबित्व संपवून, स्वायत्तता आणि जबाबदारी पेलण्यासाठी किमान वैचारिक स्तरावर धडपडत असतो. अशा अवस्थेतील युवकांनी सकारात्मक विचारांनी भारलेल्या युवा चळवळीला भावनिक प्रतिसाद देत तिच्यावर बौद्धिकश्रद्धा दाखवून आपली तारुण्यसुलभ उर्मी जगायला प्रारंभ केला की त्यातून पुढे राष्ट्राला, समाजाला काहीतरी ‘ठोस’ देण्याची क्षमता असलेलेच कार्यकर्ते घडतात. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून गेली ७० वर्षे अशी वैशिष्ट्यपूर्ण आणि सदैव कार्यरत, देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारी तरुणाई घडविणारी विद्यार्थी संघटना म्हणून जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेकडे पाहिले जाते. या संघटनेच्या कोकण प्रदेशाचे ५२ वे अधिवेशन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान रत्नागिरीत संपन्न होते आहे, त्या निमित्ताने...!

‘दिशा भविष्याची, कौशल्यपूर्ण शिक्षणाची’ हे या अधिवेशनाचे मुख्य सूत्र आहे. आज संपूर्ण जग, सर्वाधिक तरुणाईच्या जोरावर संधीचा देश बनलेल्या भारताकडे मोठ्या आशेने बघते आहे ! देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण आणि वय ३५ वर्षांच्या आतली आहे. कोकणातील या तरुणाईला कौशल्यपूर्ण शिक्षणाची भविष्यातील दिशा या अधिवेशनात स्पष्ट केली जाणार आहे. भूतकाळात रमणारी, सदैव घडून गेलेल्या घटनांविषयी बोलणारी आणि आठवणी सांगत बसणारी व्यक्ती आपले तारुण्य गमावून प्रौढत्व आणि वृद्धत्वाकडे झुकलेली असते. ‘अभाविप’ तरुणाईला भविष्यातल्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी सतत विविध रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवृत्त करत असते आणि एकदा का या वयात तरुणाच्या रक्तात ही सदैव ‘कार्यरत’ राहाण्याची शैली शिरली की मग तो तरुण उर्वरित आयुष्यातही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा विचार करत, त्याचा ध्यास घेत, स्वप्नांना साकार करण्यासाठी अविश्रांत कठोर मेहनत करताना, यशस्वी होताना दिसतो. संपूर्ण देशभरात डोळसपणे पाहिल्यास राष्ट्रहिताचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य उभे करणारी, तो विचार घेऊन जगणारी अशी तरुणाई आपल्याला दिसेल. सामर्थ्यशाली युवक सामर्थ्यवान राष्ट्र निर्मिती करू शकतो. एकविसावे शतक आशियाचे शतक आहे, ते भारताचे कसे बनू शकते ? त्यासाठी युवाशक्तीला कौशल्य विकासाच्या प्रवाहात आणून विकासाची नवनवी शिखरे गाठण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आज कला-कौशल्य माध्यमातून भारत उत्पादनाचे मोठे केंद्र शकतो आहे. याचा सारासार विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘कौशल्य विकास’ या विषयाला अतिशय महत्त्व दिले आहे. बुद्धीचे काम हे श्रेष्ठ, महत्वाचे आणि हाताचे, कष्टाचे काम हे कमी दर्जाचे ही मानसिकता आम्हाला बदलावी लागणार आहे. ‘आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आईला बुद्धीचे काम करण्याची संधी मिळाली असेल तरीही आपण आपल्या आईचा सन्मान करतो’ असा मुद्दा खुद्द पंतप्रधानांनीच मांडून हाताच्या आणि कष्टाच्या कामाचा, श्रमाचा आपण सन्मान करायला हवा, अशी समानतेची भूमिका मांडलेली आहे, जी अतिशय योग्यच आहे. आज स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठीची ताकद ही पारंपरिक पदवी शिक्षणापेक्षा कौशल्य शिक्षणात अधिक आहे. तिला अनुसरून समाजात बदल घडायला हवा आहे, त्यासाठी तो सर्वप्रथम तरुणाईत उतरायला हवाय. त्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडणे शक्य आहे. हा दूरगामी विचार या अधिवेशनात चर्चिला जाणार आहे.

आपल्याकडे आपला संकल्प पूर्ण करण्यासाठीचा आवश्यक समर्पण भाव असेल, त्यासाठी जीवन अर्पण करण्याची, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वय महत्वाचे ठरत नाही. लहान वयात मोठं कार्य उभे केलेल्या स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थानी मानून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू पाहाणारी, दिनांक ९ जुलै १९४९ मध्ये रा. स्व. संघाच्या मोजक्या प्राध्यापकांनी स्थापन केलेली ही संघटना आज संघपरिवारम्हणून ओळख असलेल्या संघटनांपकी एक बहुचर्चित देशव्यापी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना बनली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने संगोपन झालेले, आहार, राहाणीमान, भाषा, पेहेराव वेगवेगळे असलेल्या संपूर्ण देशातील तरुणाईला, स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून सर्वांना प्रेरणादायी असलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या मंत्रघोषाने एका धाग्यात गुंफण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. या मंत्राने पूर्वी तरुणाईला भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याची ताकद दिली, आणि आज स्वतंत्र भारताला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी, विकासाची नवनवी शिखर गाठण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, भारतातील गावे, गरीब शेतकरी, मजूर अशा सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची प्रेरणा हाच मंत्र देतो आहे. सन १९६०च्या दशकात महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव केळकर, सुरेशराव मोडक असे प्राध्यापक-शिक्षक कार्यकत्रे, बाळ आपटे, पद्मनाभ आचार्य, अनिरुद्ध देशपांडे, अरविंद वैशंपायन, प्रभाकर देसाई   असे धडाडीचे विद्यार्थी कार्यकर्ते, मदनदास यांच्यासारखे पूर्णवेळ कार्यकत्रे झपाटल्यासारखे कार्यरत झाले होते. अखिल भारतीय विद्यापीठात प्रवास, गाठीभेटी, बैठका, प्रवास, विद्यार्थी सत्कार, संगीत, शास्त्रीय संगीत, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा, विविध स्थानिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांची आंदोलने, महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलने, विविध गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी, अधिवेशन, अभ्यासवर्ग, कार्यकारिणी, प्रवास, डिपेक्स, प्रतिभासंगम आदि कार्यक्रम-उपक्रमांमुळे या सकारात्मक चळवळीवर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांच्या देशभर पिढय़ाच्यापिढय़ा निर्माण झाल्या. स्वर्गीय यशवंतराव केळकर हे विद्यार्थी परिषदेच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होत. आमच्या पिढीने त्यांना पाहिलेलं नाही, परंतु त्यांची सार्वजनिक आयुष्यातील आपल्या उक्ती आणि कृतीत पराकोटीची एकरूपता, स्वप्नांना दृष्टी देणारे, समाजाच्या गतीचं चालण्यीचं भान बाळगणारे, अगदी निरेपक्ष, निरहंकारी साधा प्राध्यापक अशी मनावर बिंबलेली प्रतिमा आजही आम्हाला आम्हीच सन १९९८ मध्ये लिहिलेल्या ‘आज यशवंतराव हवे होते’ या एका लेखाच्या मथळ्याची आठवण करून देते. एकाच वैचारिक सूत्राने बांधलेल्या आजी-माजी कार्यकर्त्यांची देशव्यापी साखळी हे अभाविपच्या आजवरच्या यशाचे गमक मानले जाते.

सन १९६४-६५ पासून रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सदस्यता नोंदणी होऊन प्रा. मुळ्ये, प्रा. शेवडे यांच्या प्रयत्नातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु झाले. प्रा. यशवंतराव केळकर यांच्यासहित सध्याचे आसाम आणि नागालँड या राज्यांचे राज्यपाल असलेले  पद्मनाभ आचार्य, सदाशिवराव देवधर, बाळासाहेब आपटे हे रत्नागिरीतील काम वाढावे म्हणून अनेकदा मुंबईतून त्याकाळी प्रवास करीत असत. केंद्रीय भटक्या-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, ‘कृषिभूषण’ स्वर्गीय रणजितराव खानविलकर हे रत्नागिरी शाखेचे अगदी सुरुवातीचे कार्यकर्ते होत. सन १९७० ला रत्नागिरी शहर शाखा सुरु होऊन शहरमंत्री ही जबाबदारी माधव ठाकूर ह्या कार्यकर्त्याने सांभाळली होती. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमातून काम वाढत गेले. सन १९८० ला रत्नागिरीत ‘कोकण विभाग अधिवेशन’ संपन्न झाले होते. परिषदेचे पहिले कार्यालय गोखले नाका येथे आचरेकरांच्या माडीवर होते. त्यानंतर पासून, ते सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आजगावकरवाडी येथे आहे. सन १९८२ साली प्रांतस्तरीय पतितपावन मंदिर (रत्नागिरी) ते काळाराम मंदिर (नाशिक) अशी ‘समता ज्योत यात्रा’ काढण्यात आली. या दरम्यान रत्नागिरीला पहिली पूर्णवेळ ‘शुभांगी पुरोहित’ यांच्या रूपाने मिळाली, त्या परिषदेच्या पहिल्या महिला पूर्णवेळ होत. तेव्हापासून रत्नागिरीत परिषदेचे संघटनात्मक काम वाढते राहिले असून आजतागायत त्यातील विद्यार्थीनी सहभाग लक्षणीय आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर संघटना सांगेल तेथे, सांगेल त्या स्वरूपाचे काम समर्पण भावनेने एका निश्चित कालावधीपर्यंत करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हटले जाते. अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान रत्नागिरीतील काम वाढण्यासाठी मिळालेले आहे. सन १९८५ साली प्रा. यशवंतराव केळकर यांच्या ६१ वर्षे वयपूर्तीचा कार्यक्रम रत्नागिरीत झाला होता, त्यावेळी येथून ६१ हजार रुपयांचे निधी संकलन करण्यात आले होते. प्रांत अधिवेशन, सन १९९१ च्या काश्मीर आणि आसाम बचाव आंदोलनात सहभाग, सन १९९३ चा विराट मोर्चा, ‘स्वामी विवेकानंद संदेश यात्रा’, श्रमानुभव शिबीरे, विविध आर्थिक कार्यक्रम आणि सन १९९७ च्या ‘प्रतिभासंगम’ संमेलनाने परिषदेच्या रत्नागिरीतील कामाला नवा आकार प्राप्त करून दिला होता. राज्यातून ८०० विद्यार्थी साहित्यिकांची उपस्थिती लाभलेल्या या संमेलनात कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या २५० जणांपैकी प्रत्येकजण आजही प्रतिभासंगमची आठवण निघाली की त्या संस्मरणीय आठवणीत रमतो, त्या आठवणी जगतो.   
   
परिषदेचे काम केलेले जुने कार्यकर्ते ‘पूर्व कार्यकर्ता’ म्हणूनही अत्यंत जबाबदारीने आपले योगदान देत संघटनेचे काम सतत प्रवाही कसे राहील यासाठी प्रयत्नरत असतात. या प्रामुख्याने पूर्णवेळ कार्यकर्त्यांची व्यवस्था, आर्थिक तरतूदी, निरनिराळ्या व्यवस्था आदींचा समावेश होतो. ‘परिषदेचे काम हे पवित्र काम आहे’ हा विचार एकदा का मनावर पक्का बिंबला की तो कार्यकर्ता सदैव आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपले शक्य ते योगदान देत राहतो. देशासाठी काही क्षण जगण्याची प्रेरणा देणारा, त्याच्या अंतरंगात भिनलेला विचार कार्यकर्त्याला सदैव कार्यरत ठेवत असतो. अशा असंख्य पूर्व कार्यकर्त्यांचे पाठबळ जबाबदारीने आजही संघटनेच्या मागे उभे आहे, विशेष म्हणजे या साऱ्या भाव-भावना जपाण्यामागे एक संस्काराचा घट्ट धागा विणला गेला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी अधिवेशनासाठी कोकण प्रांतातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सन १९८५ नंतर ३२ वर्षांनी रत्नागिरीत अधिवेशन होत आहे. कौशल्य विकासासोबत नवीन विद्यापीठ कायदा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र समस्या, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आदी समस्यांवर चर्चा, अनुभवकथन, सांकृतिक कार्यक्रम, शोभायात्रा आणि नूतन कोकण प्रदेश कार्यकारिणी निवड आदि कार्यक्रम या अनुषंगाने  होणार आहेत. वर्तमान कार्यकर्त्यांसोबत ज्यांनी आपल्या तरुणपणात सामाजिक चळवळीच्या आयुष्याचा श्रीगणेशा अभाविपपासून केला असे कोकणातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहाणार आहेत.

तरुणांच्या सक्रीय सहभागानेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७० वर्षानंतरही  आपल्याला अजूनही जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, गरिबी, अज्ञान, भ्रष्टाचार आणि कुशासन यांसारख्या विषयात अजूनही मोठे काम करावे लागणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे या सर्वांतील अगदी पहिले काम होते, त्यानंतरच्या काळात विविध प्रश्नांना भिडणारी तरुण पिढी उभी करण्याचे ‘अभाविप’चे काम, व्रत म्हणून सुरूच आहे, आपला थोडा वेळ समाजासाठी देऊ पाहाणाऱ्या वर्तमान महाविद्यालयीन तरुणाईने आपल्या कार्यक्षम जीवनातील काही काळाच्या समिधा अर्पिण्यासाठी कार्यरत व्हायला हवे. त्याची पहिली पायरी हे अधिवेशन ठरू शकते. देशहितासाठी जगण्याची प्रेरणा घेऊ पाहाणाऱ्या या पिढीच्या नवतरुण कार्यकर्ते बंधू-भगिनींना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा !   

धीरज वाटेकर (पूर्व कार्यकर्ता)







शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

गाव बदलण्याची प्रेरणा देणारे राळेगणसिद्धी ‘पर्यावरण संमेलन’ !

-   
राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलनात उपस्थित
प्रतिनिधीशी संवाद साधताना अण्णा हजारे 

आपल्या गावाच्या ग्रामसभेला खूप महत्त्व आहे. शासकीय अभियान, उपक्रमात सर्वाधिक लोकसहभाग देणाऱ्या  गावाचा ग्रामविकासातून कायापालट होऊ शकतो. वृक्षतोड आणि ह्रासामुळे पर्यावरण विषयाला जागतिक महत्त्व आले आहे. "पर्यावरण" विषयामुळे आज संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे, आंपण प्रयत्न करून प्रकृतीचे शोषण थांबवायला हवे. शोषण करून होत असलेला वर्तमान विकास शाश्वत नाही, त्याला सूज आली आहे. मनुष्य जन्म हा सेवेसाठी असून त्याचसाठी त्याचा उपयोग व्हायला हवा. पुढील ८०-९० वर्षांत समुद्रकाठच्या शहरांना धोके निर्माण होणार आहेत. राळेगणसिद्धीला आमच्या ग्रामस्थांनी अड़ीच-तीन लाख झाड़े लावून जगवली आहेत. त्यामुळे गावात डॉक्टरांना फारसे पेशंट मिळत नाहीत. म्हणून आपण ध्येयवादी बनून ‘पर्यावरण संवर्धन’ कार्य केल्यास निश्चित बदल होऊ शकतो. आपले गाव बदलण्याची असे प्रेरणादायी मार्गदर्शन संमेलनाध्यक्ष अण्णा हजारे यांच्याकडूनच, राज्याच्या २७ जिल्ह्यांमधून आलेल्या ३०० शिक्षक, पर्यावरणप्रेमींना प्रेरणा मिळाल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न झालेले दुसरे राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलन निसर्ग संवर्धनाचा विचार रुजविण्यात यशस्वी झाले.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळमहाराष्ट्र या संस्थेने राळेगणसिद्धी येथे हे दोन दिवशीय संमेलन आयोजित केले होते. मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेतून  वृक्षारोपण करून स्वत:ला सामाजिक कार्यात गुंतवून घेत ‘पर्यावरण संवर्धन’ कामास प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत अनेक पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविले, वर्तमान संमेलने हा त्यातीलच एक भाग ! संमेलनांसह मंडळाने यापूर्वी राज्यभर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षक आणि शेतकरी मेळावा’, रोपवाटिका, ‘एक मूल एक झाड’, ‘यशाची वनशेती’, ‘वनश्री बंधारा योजना’, पर्यावरण कार्यशाळा, राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचेही यशस्वी आयोजन केले आहे. कोकणातही उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित चंदनतज्ज्ञ महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने पक्षीदिन, कोकणातील पहिले पश्चिमघाट बिगर मोसमी जंगलपेर अभियान, रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक शिक्षण घेणार्या चिमुकल्या मुला-मुलींच्या माध्यमातून ७५ लाख बीज पेरणी - वृक्ष लागवड अभियान राबविले आहेत.

पूर्वी राळेगणसिद्धी हे दुष्काळ, कर्जबाजारीपणा, बेकारीने ग्रासलेले महाराष्ट्रातील एक खेडेगाव होते. आज राळेगणसिद्धी हे देशातील आदर्श आणि स्वयंपूर्ण खेडेगाव मानले जाते. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, टेकड्यांवर विशिष्ट प्रकारे बांधबंदिस्ती करून वाहून जाणार्‍या पाण्याची साठवण, जमिनीची धूप थांबवणे, पावसाचे पाणी थेंबनथेंब साठवून वापरण्यासाठी इथे मोठे बांधीव कालवे तयार केले आहेत. ह्यामुळे ह्या भागातील भूजल-पातळी लक्षणीयरीत्या उंचावली आहे. कोरडी पडलेली विहीर अथवा कूपनलिका (बोअरवेल) गावात नाही. पूर्वी दरवर्षी जेमतेम एक पीक हाती येणाऱ्या इथे आज वर्षाला दोन कधी तीन पिके घेतली जातात. अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रातही गावाने मोठी मजल मारली आहे. अनेक घराघरांत स्वतंत्र बायोगॅस सयंत्रे आहेत. गावभेटीत संमेलनाला आलेल्या प्रतिनिधींनी पाणलोट क्षेत्रात झालेली कामे, नळपाणी योजना, माहिती केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प, मीडिया सेंटर आदींची पाहणी केली. या प्रतिनिधींशी संवाद साधताना, स्वच्छ आचार, स्वच्छ विचार, निष्कलंक चरित्र आणि सामाजिक नैतिकता जपल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, गावच्या नेतृत्वाने, आपण प्रत्येकाने नि:स्वार्थी भावनेतून काम केले पाहिजे, असा संदेशही अण्णांनी दिला. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत कुकडी कालव्यावर अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून राळेगणसिद्धी व परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणाऱ्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचेही नुकतेच भूमिपूजन झाले आहे. एखाद्या गावाला वीजेसाठी स्वयंपूर्ण बनवून ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळवून देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असणार असून सर्वांनी पुढील वर्षी हा प्रकल्प पाहायला, असेही अण्णांनी यावेळी नमूद केले. एक मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यातून रोज सुमारे ५ हजार युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. राळेगणसिद्धीत जलपुन:र्भरणाचा प्रकल्प सुरु आहे. कुकडी कालव्यावर वाडेगव्हाण येथे ६५० अश्वशक्तीचे दोन पंप बसवून उंचावरील राळेगणसिद्धीच्या पठारी भागावर पाणी उचलून ते डोंगरमाथ्यावरील ओढेनाल्यांमध्ये सोडले जाते आहे. त्यामुळे राळेगणसह परिसरातील गावांतील भूजल पातळीत वाढ झाली आहे. लोकांचे राहणीमान उंचावले आहे. या उपसा योजनेचे वार्षिक वीजबिल ग्रामपंचायत, यादवबाबा उपसा जलसिंचन योजना आणि  लोकवर्गणीतून अदा केले जाते, या साऱ्याबाबत प्रतिनिधींनी माहिती घेतली.  

संमेलनात, पर्यावरण संवर्धन : जाणीव आणि कर्तव्य' या विषयाला वाहिलेल्या 'शोधांकन' या विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. देशभरात स्वखर्चाने 'चंदन लागवड़ अभियान' राबविणा-या महेंद्र घागरे यांना मंड़ळातर्फे कोकण विभागात उपाध्यक्ष विलास महाड़िक आणि सचिव-पर्यटक अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या सहकार्याने राबविलेल्या विनामूल्य उपक्रमांसाठी पंचवीस हजार रूपयांचा धनादेश अण्णा हजारे यांच्या हस्ते  अदा करण्यात आला. घागरे यांनी हा धनादेश मंड़ळाच्या कार्यासाठी मोरे यांच्याकड़े दिला. संमेलनात हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

संमेलनात, (१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० शिक्षकांना, राळेगणसिद्धी हे गाव ‘रोलमॉंडेल’ म्हणून पुढे ठेवून शासनाच्या योजना सर्वदूर पोहोचविण्यासाठी, शिवार आणि ५० कोटी वृक्ष लागवडसंबंधी ‘पर्यावरणदूत’ म्हणून  मार्गदर्शन करणे, या शिक्षकांनी पुढे आपापल्या जिल्ह्यात ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून काम करून तळागाळापर्यंत हा विषय पोहोचवावा, असा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे, (२) आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक वनशेती व्यतिरिक्त स्थानीय पिकांसोबत सांगड घालून वनशेतीच्या विविध पद्धतींची म्हणजेच कृषी वनशेती पद्धतीची शिफारस अनेक विद्यापीठांनी केली आहे. वनेतर क्षेत्रावर (पडीक जमीन, शेतीक्षेत्र) वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतकरी करीत असलेल्या प्रयत्नाचे क्रेडिट त्याला मिळायला हवे, हे क्रेडिट केवळ शाब्दिक स्वरूपाचे न राहता त्याला आर्थिक मोबदला मिळण्याची व्यवस्था निर्माण करून तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ‘कार्बन क्रेडिट’ संकल्पना राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हायला हवेत. (३) ‘पर्यावरण शिक्षण’ ही संकल्पना शालेय स्तरावर विद्यार्थी वर्गाच्या मनावर बिंबवताना, वर्तमान जीवनाशी निगडित समस्या केंद्रस्थानी ठेवून त्यात तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हायला हवा.पर्यावरण शिक्षण आयुष्यभर चालणारी शिक्षणप्रणाली बनण्यासाठी पूर्णवेळ शिक्षकाचे नियोजन आणि त्याला सुविधा पुरविणे आवश्यक वाटते. अध्यापन आणि अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठीचे नियोजन व अंमलबजावणीची संधी मिळेल, विद्यार्थी मनात संतुलित दृष्टिकोन निर्माण असे वातावरण शाळेत निर्माण व्हायला असून त्याकरिता पूर्णवेळ शिक्षकाचे नियोजन करण्याची मागणी, (४) विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाबद्दल शिक्षण देण्याचे काम  सध्या ‘राष्ट्रीय हरित सेना आणि एन. एस. एस.’च्या माध्यमातून चालते. जैविक परिसंस्था, त्यांचे परस्परांवरील अवलंबित्व व त्याच्या अस्तित्वाची गरज यांचे शिक्षण, प्रत्यक्ष भेटी व प्रात्यक्षिकांद्वारे देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक समस्यांबाबत शास्त्रीय चौकस बुद्धी निर्माण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यामध्ये त्यांचा सहभाग प्राप्त करून घेता यावा या करिता भरीव आर्थिक तरतूदीची मागणी करणारा ठराव मंजूर  करण्यात आला.

हे संमेलन मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या सक्रीय मार्गदर्शनाखाली प्रमोद मोरे, विलास महाडीक, धीरज वाटेकर, प्रमोद काकडे, प्रा. लालासाहेब गावडे, रामदास ठाकर, बापूराव खामकर, बाळासाहेब जठार, डॉ. अमोल बागूल, सीताराम कदम, तुकाराम अडसूळ, वैभव मोरे, गोरख शिंदे, लतीफ राजे, विजयकुमार बेबडे, प्रा. नागेश शेळके, लक्ष्मण साळुंखे, पीटर रणसिंग, व्यंकट लाडके, वनश्री मोरे, सौ. कावेरी मोरे, सौ. मनिषा लहारे, उल्का कुरणे, आदि सदस्यांच्या खंबीर पाठबळावर यशस्वी झाले. 

 धीरज वाटेकर






आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...