मंगळवार, ३१ मार्च, २०२६

एका निरलस सेवेची गाथा

 श्रीमती विठाबाई श्रीपत भोसले (आक्का) यांचे नुकतेच (२७ मार्च २०२६) घोणसरे येथील ‘विजयश्री’ हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झाले. जीवन कधी कधी इतकी कठोर परीक्षा घेते की, त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांचे आयुष्य अतिशय साधे होते. पण त्यातील निग्रह असामान्य होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यात वैधव्याचे दु:ख ओढवूनही त्यांनी हार मानली नाही. आपल्या दु:खाला त्यांनी सामर्थ्यात बदलले. कृतज्ञ तपस्येच्या प्रवासी ठरलेल्या आक्का यांचे अंतिम संस्कार मार्गताम्हाने येथे सख्खे भाऊ, बहिण, भाचा-भाची आदींच्या उपस्थितीत पार पडले. नातू कुटुंबात त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ६७ वर्षे, केवळ सेवा म्हणून नव्हे तर निष्ठेने आणि ममत्वाने वेचली. कोणा सर्वसामान्यांप्रमाणेच साधेसे जीवन जगणाऱ्या, सर्वार्थाने वेगळे जीवन जगलेल्या आणि निरलस सेवेची गाथा बनून राहिलेल्या आक्का यांच्या रूपाने एका स्त्रीच्या कर्तृत्वाला वाहिलेली ही शब्द श्रद्धांजली!

मूळचे संगमेश्वर तालुक्यातील माखजनच्या नातू घराण्यातील, मार्गताम्हाने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तात्यांचा गुहागरचे प्रसिद्ध उद्योजक बापूजी खरे यांच्या कन्या शालिनी (विजया नातू) यांच्याशी मे १९५६ रोजी विवाह झाला. विवाहानंतर महिन्याभरात विजया वहिनी शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाल्या. लग्नानंतरची एक-दोन नव्हे सलग सात वर्षे या जोडप्याने, तात्या ताम्हान्यात आणि विजया वहिनी पुण्यात अशी काढली. याच कालखंडात, १९५९ मध्ये स्व. आक्का यांचे नातू कुटुंबियांत आगमन झालेले. गुहागर तालुक्यातील जामसूतच्या सीताराम (बाबा) साळवी यांच्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या २०-२२ वर्षाच्या थोरल्या लेकीला, विठाबाईं यांना सहा महिन्यात वैधव्य आलेलं. दैवाचा असा घाला पडेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. विठाबाई माहेरी परतण्यापूर्वी ‘मला माझ्या पायावर उभी करा’ म्हणत सासरघरी राहिल्या. मात्र वर्ष व्हायला आलं तरी काही जमून आलेलं नव्हतं. विठाबाई माहेरी वडिलांकडे परतल्या होत्या. माहेरी त्यांना ‘आक्का’ म्हणत. आक्काचं शिक्षण नसल्यात जमा होतं. नाही म्हणायला बालपणी त्यांना पालशेतच्या दत्ताची (श्रीदत्तमंदिर) ओढ लागलेली होती. वेळ मिळेल तेव्हा त्या दत्ताकडे माथा टेकायला जायच्या. त्यांच्या माहेरच्या घरातही पाचेक भावंडात आक्का सर्वात मोठ्या होत्या. आई लहानपणी देवाघरी गेलेली. कोणाचा आधार नव्हता. उत्पन्नाचे किरकोळ साधन असलेली घरची शेती वडील करायचे. आक्का घरी परतल्यापासून ‘आपण आहोत तोवर काळजी नाय ! पण नंतर काय व्हयाचं ?’ याची चिंता साळवींना होतीच. साळवी नकळत रोज पांडूरंगाला हात जोडीत. मनोमन विनवित. कधीकधी आक्का वडिलांना म्हणायच्या, ‘मला माझ्या पायावर उभी करा ! माझ्या हुशारीचा उपयोग व्हायला हवा. असं मला वाटतं.’ बाबा साळवींना हे पटायचं. एके दिवशी पांडुरंगाने म्हणा किंवा दत्तगुरूंनी म्हणा या बाप-लेकीचं ऐकलं.

तात्या नातू तेव्हा बुधवारी वेळंबला पेशंट तपासणीच्या वाराला जायचे. एकदा तिथल्या शंकरराव ओकांजवळ ते बोलले होते, ‘सौ. विजयाबाईंची सुट्टी संपून शिक्षणाची वेळ जवळ येत आहे. पुण्याला घरात हिच्या सोबत राहील अशी बाई पाहिजे आहे. बघा कोणी भेटली तर ?’ ओकांनी ते लक्षात ठेवले. कधीकधी खरेदीसाठी बाबा साळवी ओकांच्या दुकानात यायचे. जुना परीचय होता. ओकांनी तात्यांचं म्हणणं लक्षात ठेवून साळवींच्या कानावर घातलं होतं. ‘... पण असं जमंल का ?’ या विचारात असलेले बाबा साळवी ना निर्णयाप्रत आलेले ना लेकीला काही बोलू शकलेले.

एके सायंकाळी मार्गताम्हान्याला दिलेल्या माहेरवाशीण नीराबाई ‘आक्का, आक्का गं !’ अशी हाक मारीत आल्या. आल्या त्या थेट स्वयंपाकघरात शिरल्या. ‘का आलीस ?’ असं आक्काने विचारल्यावर नीरा बोलू लागल्या, ‘अग ते मार्गताम्हान्याचे डॉक्टर नाहीत का तात्या नातू ? त्यांची बायको गरोदर हाय. त्यांना कायम राहू शकेल अशी घरकामासाठी बाई पाहिजे. राहाशील त्यांच्याकडे ?’

‘आगंऽऽऽ, पण ते बामण नि आपण मराठा. त्यांच्या घरात राहून कसलं काम करणार ग मी !’ नाही म्हटलं तरी सामाजिक स्तरावर अनेक विषयांना सोबत घेऊन चालणारा तो काळ होता. नशीबाने अगोदर ठोकरलेलं असल्यानं आक्कांच्या मनात प्रश्न आला.

‘आगं, हे बघ ! त्यांना घरात राहून काम करण्यासाठी बाई माणूस पाहिजे. काम काय ? पगार काय ? हे सारं समक्ष विचारू. पटलं तर राहा. नाय तर नको. बाकी तुझ्या बाबांना सांग हो कसं काय ते तूच !’ आक्कांच्या मनात भविष्याची पेरणी करून नीरा निघून गेल्या. निराच्या सांगण्याने असंख्य प्रश्नांच्या भोवती फिरण्यात आक्कांची रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला.

आक्का बाबांना म्हणाल्या, ‘बाबा ! ताम्हान्याचे डॉक्टर हायत ना तात्या, त्यांच्याकडे एक नोकरबाई पाहिजे. तुम्हाला पटत असेल तर विचाराल माझ्यासाठी ? ते डॉक्टर चांगले आहेत. अनेकांसाठी रात्री-बेरात्री धावतात. गोरगरीबांची जाण आहे त्यांना. एकट्या माझाच विचार करायचा झाला तर मीही गरजू आहे ना?’

बाबा म्हणाले, ‘होय बाय! वेळंबचे ओक पण असंच म्हणताहेत! पण तू म्हणतेस म्हणून, अन्यथा माझा अजून तसा काही विचार नाही. तू असं कर. तात्यासाहेबांकडे सांगावा दे नीराकरवीच! तुझी-माझी वळख द्यायला सांग नीट. होकार आला तर जाऊ आपण भेटायला.’ आक्कांना चटकन मिळालेला बाबांचा सकारात्मक प्रतिसाद अनपेक्षित होता.

बाबा पुन्हा म्हणाले, ‘आक्का! एरवी कुणाच्या तरी घरी तू रोजगाराला जावंस हे नसतं पटलं मनाला! पण तात्या नातू म्हणजे देवमाणूस ग! त्यांच्या घरी कामाची संधी मिळणं हे भाग्याचं आहे तुझ्या! या माणसाचे जोडे जरी उचलायला लागले तरी लोकं तुला भाग्यवानच म्हणतील. एक भाकरीची आशा नाही करायची. चवथ भाकरी टिकवून ठेवायची. चोरी-मारी, लबाडी करायची नाही. सच्च्यासारखं वागायचं. पगार-बिगार काही नाही मिळाला तरी त्यांच्या घरचं काम घे. ते समजून देतील! तुझं भलं करतील. त्यांच्या रूपाने देवच तुझ्या मदतीला आलाय बघ.’ आपल्या वडिलांचे हे शब्द काळजात खोलवर जपून ठेवत आक्कांनी ६७ वर्षे निरलस सेवेत घालवली.

 लहान वयात नियतीचा क्रूर आघात सोसलेल्या आक्का यांनी अंगभूत गुणांच्या बळावर आपले आणि संपर्कात आलेल्या साऱ्यांचे जीवन अधिक प्रकाशमान होण्यास हातभार लावला. नातू घराण्याचा आधारवड बनून त्यांनी आपली सेवा सार्थकी लावली. स्व. आक्कांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १ जानेवारी १९३८चा! वयात आल्यावर विवाहाची स्वप्ने रंगवताना काळाने त्यांच्या वैवाहिक जीवनावर घाला घातलेला. सुखाचे दिवस पाहण्यापूर्वी आणि मनातील सारे संसारात उतरवण्यापूर्वीच पदरात वैधव्य आलेले. अशा स्थितीत समाजाच्या दृष्टीने कदाचित त्या 'दुर्दैवी' ठरल्या असत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. नियतीने त्यांच्या वाट्याला मार्गताम्हानेतील सुसंस्कृत डॉ. तात्यासाहेब नातू कुटुंबियांचा सहवास आणला. आपली प्रापंचिक आवश्यकता म्हणून का असेना, परंतु त्या काळात अशा मुलीला स्वीकारणे, तिला सन्मानाने वागवणे, हे तितके सोपे नव्हते. मात्र नातूंच्या सुसंस्कृत कुटुंबियांनी आक्क्कांना केवळ आपल्या घरात आश्रयच दिला नाही तर त्यांना आपले मानले. आपल्या ६७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी केवळ घरातील कामे केली असे नाही तर त्या घराचा 'कणा' बनून राहिल्या. ते घर त्यांच्यासाठी जणू 'तीर्थक्षेत्र' बनून राहिले होते. विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक आमदार तात्यासाहेब नातू यांचे ‘जनी जनार्दन’ हे चरित्र लेखन करताना आम्ही भेटलो, तेव्हा निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या आक्कांच्या संवादाची अनुभूतीही अशीच राहिली. आक्कांची सेवा ही केवळ ड्युटी नव्हती, ती 'भक्ती' होती. संपर्कात आलेल्या अनेकानेक लहानांचे मोठेपण आणि थोरांचे वृद्धापकाळ त्यांनी जवळून जवळून पाहिले, अनुभवले आणि सावरलेहि! अगदी १९९२ साली स्व. तात्यांचे निधन झाले तेव्हाही पहिला आक्रोश करणाऱ्या त्याच होत्या. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील उणीवा त्यांनी इतरांच्या सुखात शोधल्या. स्वतःचे दुःख फारकाळ कुरवाळत न बसता, नातू यांच्या घरच्या सेवेला त्यांनी आपले ध्येय मानले.  श्रीमती विजया वहिनींना मोठ्या बहिणीसमान असलेल्या आक्कांनी आपली लेकरं समजून तात्या आणि वहिनींच्या मुला-नातवंडांवर माया केली. त्यांचा सांभाळ केला. पैसे घेऊन सांभाळणं यात खरंतर काही विशेष नाही. पण आपलं समजून करत राहाणं आक्कांनी जमवलं. अणीबाणीचा कालखंड असेल किंवा तात्यांच्या मृत्यूचा क्षण अशा असंख्य कठीण प्रसंगी आक्का कुटुंबियांसोबत उभ्या होत्या. नातू कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने आक्का काहीकाळ पुण्यातही वास्तव्याला होत्या. पुण्यासह मार्गताम्हन्यातील वास्तव्यातील, आक्कांच्या हातच्या भाज्या, नाश्त्यातील धिरड्या, मऊ भात आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीची चव आता अनेकांना आठवत राहील.

आपण काही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आपले वाईट होणार नाही’ या वाक्यावर विलक्षण श्रद्धा राहिलेल्या आक्कांचं नशिबानं आकाश हिरावून घेतलं, तेव्हा डॉ. तात्यासाहेब नातू आणि श्रीमती डॉ. विजया नातू यांच्यासारख्या सुसंस्कृत कुटुंबाने त्यांना आपलं मानलं. याच पाठबळावर रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असे 'माणुसकीचे नाते' आक्कांनी गेली ६७ वर्षे जपले. या प्रदीर्घ प्रवासात आक्कांनी स्वतःला विसरून याच कुटुंबाला आपले मानले. नातूंच्या तीन पिढ्यांतील साऱ्याच कुटुंबीयांनीही त्यांना कधीही 'परके' मानले नाही. नातू कुटुंबात त्यांना जीवनभर निखळ प्रेम आणि आदर मिळाला. म्हणूनच अंगभूत गुणांच्या बळावर आक्का केवळ स्त्रीचे आयुष्य न जगता निरलस सेवेच्या बळावर त्यागाची आणि त्याला मिळालेल्या सन्मानाची यशोगाथा बनून राहिल्या. स्व. आक्का यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

धीरज वाटेकर, चिपळूण

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धा

चिपळूण :: महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि कोकण भराठी साहित्य परिषद, शाखा चिपळूण आयोजित आणि ‘आपलं चिपळूण’ सहआयोजक असलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती 'गणपत वाणी' काव्यलेखन स्पर्धेचे नुकतेच दिमाखदार पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमीचे पूजन-पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत भागवत यांनी बोलताना, शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  शुभेच्छा दिल्या. ‘गणपत वाणी’ स्पर्धेच्या आयोजकांना त्यांनी कल्पनेसाठी धन्यवाद दिले. यानिमित्ताने चिपळूणचे नाव जगभर पोहोचल्याचे ते म्हणाले. त्यांनी ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेसंदर्भात बोलताना वाचनात आलेल्या ‘फ्यूचर टॉक : कॉन्वर्सेशन्स अबाउट टुमारो विद टुडेज़ मोस्ट प्रोवोकेटिव पर्सनैलिटीज़’ या पुस्तकाचा संदर्भ दिला.

पारितोषिक वितरण हस्ते - एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत 



स्व. अप्पा जाधव यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर

‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी बोलताना, मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. या अभिवन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ‘लोटिस्मा’च्या प्रांगणात झाला याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि ‘मसाप’चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्य परिक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले.


ज्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते स्व. अप्पा जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय नाटककार, कवी व लेखक होते. ते एकेकाळच्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय सेवानिवृत्त संघाचे माजी अध्यक्ष राहिले होते.

यावेळी विजेता १ - अतुल देशपांडे (नाशिक-ऑस्टिन), विजेता २ - किरण वेताळ (पुणे), विजेता ३ - डॉ. मनोज वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ १ - विजय सातपुते (पुणे), उत्तेजनार्थ २- विजया गुळवणी (पुणे), उत्तेजनार्थ ३ - वृंदा कुलकर्णी (पालघर), उत्तेजनार्थ ४ - सुधीर नागले (रायगड), उत्तेजनार्थ ५ - हर्षदा सुंठणकर (बेळगाव), प्रोत्साहनपर १ - सुजाता संजय (लंडन), प्रोत्साहनपर २ - डेविड पेनकर (ईस्त्रायल), प्रोत्साहनपर ३ - शर्मिला पटवर्धन (बंगलोर), प्रोत्साहनपर ४ – सुषमा वडाळकर (बडोदे), प्रोत्साहनपर ५ - श्रीती राशिनकर (इंदौर), प्रोत्साहनपर ६ - सारिका बिवलकर (रत्नागिरी), प्रोत्साहनपर ७ - मेधा लोवलेकर (चिपळूण) यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतिक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

 


‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी कांही कविता’ मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता राहिल्या. ४७ वर्षांचं (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचलनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वान्द्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.



यावेळी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


धीरज वाटेकर 

बांधावरचे साहित्य संमेलन २०२६


आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग असलेले हे संमेलन अनोखे, अनुकरणीय ठरले. जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत.' या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,' अशी भूमिका यावेळी मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केली.

कोकणात बांध म्हणजे भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणारी, माती किंवा दगडांची अगदी छोटीशी जेमतेम वितभर उंचीची भिंत!. कोकणात हे बांध शेतीचे संरक्षण करतात, मृदसंधारण करतात आणि पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयुक्त ठरतात. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पिकांच्या वाढीसोबतच जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि मातीची धूप होण्यापासून रोखणे अशी महत्वाची कामे हे बांध करत असतात. कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱ्या या  'बांध'वर साहित्य प्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आणि त्यांच्या या प्रयोगाचे राज्यभर कौतुक झाले. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ‘बांधावरचे संमेलन रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) रोजी चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारूळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकणात सलग ११ ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करणारे सुभाष लाड, वाशिष्ठी उद्योग समूहाच्या प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव, नामवंत कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश गांधी यांनी खास मालवणी भाषेत गाऱ्हाणे घातले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे, विजय कदम यांनी केले. साथसंगत यदुवीर चौगुले यांनी दिली. धीरज वाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

संमेलनाध्यक्ष  बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे बारटक्के म्हणाले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी उद्घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन केले. आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत मांडले. सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून आणि महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून आल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष मोदी म्हणाले, ‘आजचे संमेलन ही केवळ जागेची बदललेली रचना नाही, तर विचारांची दिशा बदलणारा प्रयोग आहे. आज इथे कविता केवळ ऐकली जाणार नाही ती अनुभवली जाणार आहे. कथा फक्त सांगितली जाणार नाही ती जमिनीतून उगवलेली वाटेल. गाणी रंगमंचावर नाही तर वाऱ्यासोबत झुलताना ऐकू येतील. आजचा दिवस मराठी साहित्याच्या वाटचालीत एक स्मरणीय टप्पा ठरेल, याची मला खात्री आहे.’ संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशयगुण, नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कविता लिहिल्याबरोबर फेसबुक, व्हॉटस्अप वर शेअर करण्याची घाई करतात. हे चुकीचे आहे. जसे लोणचे मुरल्यानंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते असे ते म्हणाले. दुपारी भोजनानंतर ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन या सत्रात अमोल पालये (तिलोरी), ज्ञानेश्वर झगडे (खारवी) यांनी बोलीभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण केले. नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवींचे 'माती, नाती अन् माणूस ' या विषयावर काव्य संमेलन रंगले. कवी अरुण म्हात्रे, सूत्रसंचालक कैलास गांधी यांचेसह सर्व मान्यवरांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. म्हात्रे आणि गांधी यांची काव्य’नोकझोक’ यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली. मुझ्झफर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, विजय हटकर, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासुन कौतुक केले.  यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, ‘बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ठ आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यांवर भाष्य करायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन शेती पहाताना पीकं डोलताना, पाहाताना, बांधावरुन एखादी नदी अगर नाला जवळून पाहाताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.’ असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, ‘धामणवणे गावातील 'साद मयुराची' या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझं अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींचा पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.’


संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.


पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास जवळपास ३५० साहित्यिक आणि रसिकांनी अनुभवला. निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी सुंदर स्वागत रांगोळी काढलेली होती. काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांध हेच व्यासपीठ होता. संमेलन परिसर शेणामातीने सारवलेला होता. विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर रेखाटलेल्या कविता जागोजागी झाडांवर टांगल्या होत्या. झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान पोडिअम बनविला होता. जेवणामध्ये झुणका भाकर (ज्वारी/बाजरी/तांदूळ/नाचणी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वांग्या-पावट्याची गावरान भाजी, वरण-भात तर नाश्त्याला केळीच्या पानात आंबोळी-घावणे आणि चटणी, सायंकाळी चहापानाला स्थानिक अल्पोहार मोंगा-पोपटी (शाकाहारी) असा अस्सल कोकणी ग्रामीण बेत होता. शेतामध्ये वारूळ पूजन, संत तुकारामांच्या स्पर्शाने पावन झालेला दगडी दिवाद्वारे दीपप्रज्वलन, ग्रामदेवतेला केलेलं स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे (प्रार्थना), बोलीभाषेत लिहिलेलं संमेलन गीत, स्थानिक वाद्य ‘संबळ’ याचे वादन, मान्यवरांचा घोंगडी, मोरपीस, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देऊन केलेला सन्मान, प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक टाळणं, पत्रावळीखाली योग्य आकाराचं ताट देण्याची कल्पना, टेबल खूर्ची यांना फाटा देऊन व्यासपीठावर म्हणजेच बांधावर गाद्या टाकून केलेली बैठक व्यवस्था, संमेलनाचा लोगो छापलेल्या उपस्थितांना ‘वानोळा’भेट देण्यात आलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या, पारंपरिक सांस्कृतिक धरोहरांना दिलेला मान, रसिकांसाठी काजूच्या झाडांच्या सावलीतील व्यवस्था यांमुळे घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा उपस्थितांच्या मनात भरून राहिला.






बांधावरचे संमेलन लिंक - https://www.youtube.com/live/-JORZNEcfGw?si=bKvR02Ib4hN8FO38

बांधावरचे संमेलन आकाशवाणी वृतांत - https://youtu.be/je-L1qwqlQc?si=5fKTQ3CHA-I_9jsl


संमेलन प्रतिक्रिया

बांधावरचे संमेलन व्यासपीठ


बांधावरचे संमेलन परिसर

नैसर्गिक साहित्यातून लोगोची रांगोळी  

भूमाता सातेरी पूजानाच्या दिशेने जाताना...  

भूमाता सातेरी (वारूळ) पूजन 

कवी संमेलन

काजूच्या सुकलेल्या फांदीचा डायस








गावरान भोजन 

मोंगा (पोपटी)चा आस्वाद



धीरज वाटेकर      

मो. ९८६०३६०९४८

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध हे आज, शनिवारी (३१ जानेवारी) ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. कोणतेही आदर्श शिक्षक-मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासह त्यांचे जीवन घडविण्याकडे लक्ष देत असतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, त्यांच्या क्षमता ओळखणारे, त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारे मार्गदर्शक व शिल्पकार शिक्षक आदर्श मानले जातात. विषयज्ञान, अवांतर वाचनाची आवड, संवाद कौशल्य, सहानुभूती, संयम आणि सतत शिकण्याची-शिकवण्याची वृत्ती असलेल्या वाचासिद्ध सरांच्या ज्ञानाचा आवाका आणि कामाचा झपाटा अफाट आहे. नियोजन, आयोजन, नेतृत्व, देखरेख यांसारख्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांचा खुबीने उपयोग करणारे वाचासिद्ध सर उत्कृष्टतेसाठी सातत्याने वचनबद्ध राहिलेले मागील दहाएक वर्षात आम्ही अनुभवले आहेत.

वाचासिद्ध सरांचा जन्म ५ जानेवारी १९६८चा. पन्नास वर्षांपूर्वीच्या कोकणातील कमीतकमी सुविधा असलेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले हे त्यांचे मूळगाव. सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पोहणे, झाडावर चढणे, व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, ढोलवादन आदी कलागुणांसह सरांची शास्त्रीय संगीताची आवड तेव्हापासूनची. आंजर्ले गावच्या मुख्य रस्त्यावरील त्यांच्या एकत्रित छोट्याश्या कुटुंबाची घराशेजारी नारळी-पोफळीची छोटीशी बाग होती. गाई-म्हशी होत्या. गावात येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांना या घराचे दरवाजे सदैव खुले राहिलेले. अशा वातावरणात सरांचे बालपण गेले. पुढे असेच वातावरण केळीच्या छोट्याश्या बागेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चिपळूणच्या घराभोवती तयार केले. या जागेत पावसाळी दिवसात पोटापुरतं भात तर उन्हाळी दिवसात पावट्याचं पिकं घेतलं जातं. विशेष म्हणजे वाचासिद्ध सरांचं चिपळूणचं हे घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचं हक्काचं ठिकाण आहे. संघदृष्ट्या सरांकडे गेली अनेक वर्ष हिंदू विद्यार्थी वसतीगृहाच्या न्यासाची जबाबदारी आहे. २०२१च्या चिपळूण महापुरात आपल्या घरात पाणी शिरलेले असताना शाळेतील, महापूरग्रस्तांसाठीच्या सामाजिक सेवायज्ञात योगदान देत राहिलेले वाचासिद्ध सर अनेकांनी अनुभवलेत. घरची बागायती, गायी-गुरे-गोठा, दुग्धोत्पादन संस्कृतीमुळे कायम मातीच्या सान्निध्यात राहिलेल्या सरांनी आपल्या मुख्याध्यापकीय नेतृत्वाच्या कालखंडात शालेय वातावरणात सुरु केलेल्या ‘वसुबारस’ उत्सव आणि रानभाज्या प्रदर्शनातील उत्साहाच्या मुळाशी बालपणातील संस्कार असावेत. आंजर्लेच्या पूर्ण प्राथमिक शाळेसह माधवराव खांबेटे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पदवी शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचा चिपळूणशी संबंध आला. ते डी.बी.जे. महाविद्यालयातून बी.एस्स.सी. झाले. बी.एड.चे शिक्षण त्यांनी देवगडच्या श्री एस. के. पंतवालावलकर कॉलेज ऑफ एजुकेशनमधून पूर्ण केले. कॉलेजयीन जीवनात आमदार अप्पासाहेब गोगटे आदी व्यक्तींचा सहवास आणि संपर्क लाभल्याचा सरांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा सकारात्मक परिणाम झाला. विद्यार्थीदशेत कॉलेजमधील गैरसोयींविरोधात विद्यापीठस्तरावर आवाज उठवून त्यांनी आपले म्हणणे प्रशासनाला मान्य करायला लावल्याचा इतिहास आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (NEP TASK राज्य समन्वय कक्ष) राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) अंतर्गत समिती सदस्य म्हणून सरांची निवड झाली. ही निवड त्यांनी आम्हाला कळूही दिली नाही. खरंतर अशा घटना घडल्यावर बातमीसाठी आग्रह न धरणारी अपवादात्मक माणसं आम्ही आमच्या तीसेक वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत पहिलीत, वाचासिद्ध सर यांपैकी एक होतं.

वाचासिद्ध सर २ जुलै १९९२ रोजी शिक्षक म्हणून युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. १९९२ ते २०१७ या काळात युनायटेडच्या ‘गुरुदक्षिणा सभागृह’ उभारणी, नापासांची शाळा, रविवारच्या गणिताच्या विशेष वर्गांसह दहावीच्या परीक्षेसाठी १७नंबरचे फॉर्म भरून अनेक विद्यार्थी यशस्वी करण्यात सरांचा सहभाग राहिला आहे. २०१६साली, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आणि माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या सहकार्याने सरांनी इतिहासात पहिल्यांदा ‘युनायटेड’ची सहल राज्याबाहेर, राजधानी नवी दिल्ली येथे नेली. विद्यार्थ्यांनी दिल्लीत तब्बल आठ दिवस मुक्काम केला. पुढे यावरील ‘वेध दिल्लीचा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही केले. ताजमहाल सारख्या वास्तूला आपल्या शिक्षकांच्या समवेत अभ्यासण्याचा एक दुर्मिळ योग विद्यार्थ्यानी अनुभवला. भारताचे संसद भवन आणि संसदीय कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना प्रमुख सल्लागार रघुनंदन शर्मा आणि कल्पना शर्मा यांनी दिलेली माहिती अविस्मरणीय ठरली.

पर्यवेक्षक म्हणून ते १ नोव्हेंबर २०१७ रोजी संस्थेच्या अलोरे शाळेत रुजू झाले. पुढे १ जून २०२० रोजी तिथेच मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी स्वीकारली. १ जून २०२५ रोजी वाचासिद्ध सर युनायटेड शाळेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. मात्र सरांची अलोरेतील कारकीर्द ‘स्पृहणीय’ घटनांनी भरलेली ठरली. अलोरेतील सरांचे आगमन जणू ‘पूर्वनियोजित’ आणि ‘शुभस्य शीघ्रम्’ या संस्कृत सुभाषितासारखे असल्याचे सिद्ध झाले. अलोरेत आल्यानंतर सरांनी अगदी सुरुवातीलाच दूरदृष्टीने शाळेतील बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या ‘विद्यार्थीप्रिय’ अरुण केशव माने सरांच्या अनुभव आणि संपर्काचा लाभ शाळेला होईल अशी संस्थात्मक रचना केली. खरंतर तिथेच त्यांनी आपल्या अलोरे शाळा कारकिर्दीतील अर्धीअधिक लढाई जिंकलेली! जागतिक पातळीवर पोहोचलेल्या अलोरेतील माजी विद्यार्थ्यांच्या शाळेप्रति असलेल्या भावना त्यांनी अचूक ओळखल्या. माजी विद्यार्थी भेटीगाठी हा विषय पूर्ण क्षमतेने हाताळला. अलोरेत आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मनात विश्वासाची पेरणी केली. त्यातून शाळेसाठीची अनेक चांगली, पवित्र आणि कल्याणकारी कार्ये कमालीच्या वेगाने जेमतेम आठेक वर्षांत अंमलात आणली. अलोरे शाळेतील २०१७-२०२५ या कालखंडाकडे आज तटस्थपणे पाहिले की, वाचासिद्ध सरांच्या अलोरेतील ‘पूर्वनियोजित’ आगमनाचा अर्थ लक्षात येतो. अलोरे शासकीय शाळेचा भाडेपट्टी करार मागील काही वर्षांपासून वादात होता. कोयना जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यापासून अलोरे, पोफळी आणि कोयना येथे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारात घेऊन परशुराम एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला १९७२साली अलोरेत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला शिक्षक वेतनेतर अनुदानातून प्रशालेचे भाडे आदी विविध खर्च पूर्णत्वास जात होते. मात्र शिक्षक वेतनेतर अनुदान बंद झाल्यावर शाळेला शासनाचे वीज, पाणी आणि भाडे भरणे अशक्य होऊन बसले. यामुळे निर्माण झालेल्या संघर्षातून जलसंपदा खात्याने अलोरे शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर फेब्रुवारी २०२५मध्ये संस्था आणि शासनाच्या कोयना सिंचन विभाग कोयनानगर (सातारा) यांच्यात तीस वर्षांचा सामंजस्य करार पूर्ण झाला. जलसंपदा विभागाने प्रशालेची आजवरची वाटचाल आणि गुणवत्ता बघून हा तीस वर्षांचा करार केला. याच्या पाठीमागे केवळ वाचासिद्ध सर आणि अलोरे शाळा-संस्था समन्वयक अरुण माने सरांनी केलेली अविश्रांत धडपड कारणीभूत आहे, हे आवर्जून नोंदवायला हवे.

माजी विद्यार्थी आग्रहास्तव अलोरे शाळा स्थापनेपासून सलग २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केलेल्या आगवेकर सरांचं नाव प्रशालेला देण्यात आलं. त्यानंतर आगवेकर सरांचा, ११ मार्चचा स्मृतिदिन ‘नंदादीप’ म्हणून साजरा होऊ लागला. वाचासिद्ध सरांनी, अरुण माने आणि शशिकांत वहाळकर सरांच्या सहकार्याने, अलोरे शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठी ३-४ वर्षांच्या प्रयत्नातून जनरल रजिस्टरवरील क्रमांक एकच्या विद्यार्थिनी प्रभावती कोनसिरसगी-बन्नी (बेळगाव) यांना शोधून काढून निमंत्रित केले. सुवर्ण महोत्सव निमित्ताने झपाटलेली ही त्रयी, आगवेकर सरांनी गुरु मानलेल्या मा. ना. कुलकर्णी सरांच्या पाउलखुणा शोधायला संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील दुंडगे गावी पोहोचली होती. सुसज्ज ‘कै. सुभाष लाड ग्रंथालय’ विभाग, महाराष्ट्राच्या आजवरच्या ग्रामीण शालेय इतिहासातील ‘न भुतो न भविष्यती’ अशा अभिनव उपक्रमांनी संपन्न झालेला शाळेचा सुवर्णमहोत्सवी उत्सव, तितक्याच गौरवशाली उंचीची नोंद असलेल्या संग्राह्य स्मरणिकेची निर्मिती, अटल टिंकरिंग लॅब, ज्युनिअर कॉलेजची शास्त्र शाखा, नवा अभ्यासक्रम (NEP), पालक-शिक्षक भेटी, अलोरे शाळेच्या अनुषंगाने घेतलेली आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची भेट, एक राखी देशासाठी..., पालवी-कला छंद वर्ग आदी घटना अलोरेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेल्यात. सरांनी अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी दिवसात जुन्या शाळेला ‘स्मृतिस्थळ’ म्हणून उजाळा दिलेला होता.

जून २०२५ नंतर ‘युनायटेड’मध्ये मिळालेल्या वर्षभरापेक्षा कमी अवधीत सरांमधील उपरोल्लेखित कौशल्यांची चुणूक पाहायला मिळाली. याच काळात नगर पालिकेचा ‘वाचू आनंदाने’, मिलिंद नाईक यांची कार्यशाळा उपक्रम शाळेत संपन्न झाला. युनायटेडसह गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा उपक्रम राबवला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित सहाशे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ‘युनायटेड’मध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधुभाव दर्शवणारी नसून सैन्यातील शूरवीरांना मनोबल देणारी ठरली. सेवानिवृत्ती रजा न घेत ‘युनायटेड’चे मुख्याध्यापक म्हणून मिळालेल्या उण्यापुऱ्या आठेक महिन्यांच्या कालावधीतही सरांनी दखलपात्र काम केले. पालकांनी विशेष कौतुक केलेले ‘युनायटेड’चे यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलनही संस्मरणीय झाले. ‘अथ् रामायण’उपक्रमात, ग.दि.मा. यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांचे सोबतचा संस्थेच्या गुरुकुल विभागाचा विद्यार्थी सहभाग, दिवाळीपूर्व दिवसात ‘वसुबारस’दिनी युनायटेड शाळेतून निवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचे कार्यक्रम निमित्ताने शाळेत एकत्रीकरण करण्यात आले होते. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती, महापरिनिर्वाणदिनी सरांनी शाळेतील शिक्षकांसाठी दोन गटात चक्क मोबाईल तंत्रज्ञानातील ‘चॅटजीपीटी’ अॅपचा उपयोग करून प्रश्नोत्तरांचे स्वरूप असलेले चर्चासत्र घेतले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीमुळे यंदा शाळा संकुलाला ‘स्ट्रॉन्गरूम’चे स्वरूप आलेले. तेव्हा ‘शाळेची गैरसोय होतेय’, अशी खंत अधिकाऱ्यांकडून व्यक्त झाल्यावर, ‘शाळेचा उपयोग स्ट्रॉन्गरूम म्हणून होत असताना, लाल दिव्यांच्या गाड्या पाहाणाऱ्या इथल्या चार हजार विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडणारे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत सजगतेने पोहोचवणारे वाचसिद्ध सर होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेले २८ पैकी १४ नगरसेवक सरांचे माजी विद्यार्थी राहिलेत.

वाचासिद्ध सरांची भाषणे तपासली तर त्यात सर नेहमी, ‘समाजातील सज्जनशक्ती आणि मातृशक्ती’वर विश्वास प्रकटताना दिसतात. ते बोलताना विविध पुस्तकांचे दाखले देतात. शिक्षण क्षेत्राचा मनुष्याच्या मस्तिष्काशी संबंध असल्याचे सांगणाऱ्या सरांनी, मानवी जीवनावर ठसा उमटवणारे तत्वज्ञान अनेकदा विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे. ‘स्वातंत्र्यदिन’ हा ज्ञात-अज्ञात सैनिकांचा स्मरणदिन आहे. पुन्हा ही वेळ येऊ नये, या दिनी अशी जागरुकता व्हायला हवी आहे. कोणताही स्मरणदिन हा अनुकरण संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाच्या श्रद्धास्थानांचा आदर करणे आणि तो सहानभूतीने प्रकट करणे भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा आहे. याचं अवमूल्यन होता कामा नये. समाजातून जाणाऱ्या मंडळींची जागा कोणीतरी घेण्याची आवश्यकता असते. भारत ही परमेश्वराची भूमी आहे. इथल्या कणाकणामध्ये प्राण भरलेला आहे. इंग्रजांनी आणि इतरांनी ही भूमी लुटली पण इथला प्राण ते लुटू शकले नाहीत. सरांच्या या भावना विचार करायला लावणाऱ्या आहेत. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी दूरदृष्टी (व्हिजनिंग), नियोजन (प्लानिंग) आणि वचनबद्धता (कमिटमेंट) याला पर्याय नाही. ‘कमिटमेंटचा माणूस’ आपल्या ध्येयांशी, कामाशी आणि नातेसंबंधांशी वचनबद्ध असतो. पूर्णपणे समर्पित असतो आणि दिलेले वचन पाळतो. असा माणूस आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो. आम्हाला जाणवलेले वाचासिद्ध सरांचे व्यक्तिमत्त्व असे आहे. आपल्या आंजर्ले गावाची ‘कालाष्टमी’ न चुकवले सर, ‘आई वडिलांची उतारवयात सेवा करण्याचे लाभलेले भाग्य सर्वोत्तम’ असल्याचे नमूद करतात यातच सारं आलं. सरांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विपश्यना, मनशक्ती आदींचे प्रशिक्षण वर्गही जाणीवपूर्वक पूर्ण केलेले. विविध पुस्तकांचे नियमित वाचन करणारे सर अनेकांना भेट म्हणून पुस्तके देत आलेत. श्रीमारुती या देवतेच्या विशेष अभ्यासासह वंदेमातरम्, भारतीय संविधान, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांची ते उत्तम मांडणी करतात. इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासाचा विषय आहे. पण काही माणसं हा जणू अभ्यास सोबत घेऊन जन्माला आल्यासारखी वावरतात. अशी काही माणसं आम्ही सामाजिक क्षेत्रात वावरायला लागल्यापासून गेली तीसेक वर्षे जवळून अनुभवतो आहोत, त्यात सरांचा नंबर वरचा आहे.

सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर नववर्षारंभी, भेटण्यासाठी आम्ही वाचासिद्ध सरांकडे वेळ मागितली. सरांनी एका रविवारी शाळेतच बोलावले. वेळ दिली होती सायंकाळी सातची! मुख्याध्यापक कार्यालयात दीडेक तास आमच्या गप्पा झाल्या असतील. सरांचे अलोरे शाळेतील ज्येष्ठ सहकारी अरुण केशव माने (सर)आणि शशिकांत शंकर वहाळकर (सर) सोबत होते. या भेटीत सुरुवातीलाच सरांनी, ‘तुझ्यासाठी एक गोष्ट काढून ठेवलेय...’ म्हणत आपल्या कपाटातून एक फाईल काढली आणि आमच्यासमोर ठेवली. हातात घेतल्यावर लक्षात आलं, ‘ती फाईल म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या म्हणजे १९१८ सालच्या शाळेतील शिक्षकांचं ते वार्षिक पगारपत्रक होतं. त्यावर शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापकांपासून सर्व शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.’ कदाचित, रद्दीत जाऊ शकणाऱ्या कागदपत्रांतून सरांनी ही फाईल बाजूला केली होती. शाळा-शिक्षक-विद्यार्थी-पालक-संस्थाचालक या पंचसुत्रीत जीवनभर कार्यरत राहून सामाजिक स्तरावर परिणामकारक विचार रुजविणारे शिक्षक दिवसेंदिवस कमी होत चालेलत. वाचासिद्ध सर अशांपैकी आहेत. वाचासिद्ध सरांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी श्रीदेव भैरीबुवा चरणी प्रार्थना!

 

धीरज वाटेकर

चिपळूण

एका निरलस सेवेची गाथा

 श्रीमती विठाबाई श्रीपत भोसले (आक्का) यांचे नुकतेच (२७ मार्च २०२६) घोणसरे येथील ‘विजयश्री’ हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झ...