शनिवार, २५ जुलै, २०२६

व्हावी ‘जबाबदार आणि सुरक्षित पावसाळी पर्यटना’ची पहाट


अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने यावर्षी (२०२६) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक घाटरस्ते आणि धबधब्यांवर जाण्यासाठी बंदी घातली आहे. यामुळे कोकणच्या पावसाळी पर्यटनाला बंदीचे ग्रहण लागल्याचे बोलले जात असले तरी यातून जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनाची नवी, सकारात्मक पहाट उजाडण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर काल, रविवारी सुट्टीचे औचित्य साधून, प्रशासनाने घातलेली बंदी आणि पोलीस बंदोबस्त झुगारुन रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध परंतु अतिशय धोकादायक देवकुंड धबधब्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खरंतर कोकणात सध्या घालण्यात आलेली पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी ही केवळ एक तात्पुरती सुरक्षा उपाययोजना असणार आहे. सवतसडा (चिपळूण), सवतकडा (राजापूर), आंबोली, सावडाव, नापणे, अशा अनेक ठिकाणी अटी आणि शर्थीसह पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात ‘जबाबदार आणि सुरक्षित पावसाळी पर्यटना’ची नवी पहाट व्हावी यासाठी स्थानिकांसह मान्सूनप्रेमी पर्यटकांनीही गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे.


अलिकडेच पुण्यातून १७ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देवकुंड धबधबा परिसरात आला होता. दुपारच्या सुमारास हे पर्यटक धबधब्याच्या मुख्य प्रवाहात उतरले. मात्र, पावसाळ्यातील पाण्याच्या प्रचंड वेगाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने, या गटातील दोघे जण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि 'सिक्रेट पॉइंट' या संपूर्ण परिसरात पावसाळी पर्यटनास कडक बंदी घातलेली असतानाही, पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घातल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरवर्षी जुलै महिन्यात कोकणची भूमी हिरव्यागार शालूने नटून पर्यटकांना साद घालत असते. परंतु, जुलै २०२६च्या सुरुवातीलाच हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यांमुळे, वाढत्या अपघातांमुळे आणि गावोगावी कोसळणाऱ्या दरडींमुळे कोकणातील पावसाळी पर्यटन क्षेत्राला काहीसे 'निर्बंधांचे ग्रहण' लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, याकडे पूर्णपणे नकारात्मक दृष्टीने न पाहता 'सुरक्षित आणि शाश्वत पर्यटन' अशी सकारात्मक दृष्टी ठेवून काम होण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि ग्रामपंचायती मिळून पर्यटकांना सुरक्षित अंतरावरून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी देत आहेत. पर्यटन संपूर्णपणे बंद करण्याऐवजी अतिधोकादायक ठिकाणे बंद आहेत. अन्य ठिकाणी कडक वॉच ठेवला जात आहे. सुरक्षित ठिकाणी पर्यटकांसाठी नव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.


कोकणात प्रवेश करण्यासाठी पश्चिम घाटातील (सह्याद्री) घाटरस्ते हे पर्यटनाचा मुख्य भाग आहेत. परंतु, मुसळधार पावसामुळे हे घाटरस्ते सध्या संवेदनशील बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा आणि पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची कडा खचल्याने आणि दरड कोसळण्याचा तीव्र धोका असल्याने शासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ नुकतीच एक किरकोळ दरड कोसळली होती, मात्र महामार्ग पोलीस आणि स्थानिक मदत पथकाने युद्धपातळीवर दगड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली. सुट्टीच्या दिवशी तिथेही होणारी वाहनांची गर्दी प्रचंड आहे. ताम्हिणी घाटातील बससेवा बंद आहे. यामुळे एस.टी.चे दैनंदिन सुमारे ६०-७० लाखांचे नुकसान होत आहे. खरंतर पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्याची पर्यटकांची इच्छा बंदी घालून थांबवता येईल असे नाही. त्यापेक्षा सुरक्षित आणि नियोजित सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नियंत्रित प्रवेश क्षमता, प्रशिक्षित मार्गदर्शक, सुरक्षित दर्शन मंच, ट्रेकिंग मार्ग, सीसीटीव्ही देखरेख, बचाव पथके, आपत्कालीन सुविधा, पर्यावरण जनजागृती असे प्रयत्न करायला हवेत. यातून पर्यटकांना सुरक्षित अनुभव, जैवविविधता संवर्धन आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे वाटते.

 


रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पानवल धबधबा, निवळी धबधबा, भाट्ये बीच, आरेवारे आणि गणपतीपुळे समुद्रकिनारा या ठिकाणी प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रशासनाने योग्य त्या सुरक्षा अटींसह सुरू ठेवला आहे. राजापूरच्या मौजे चुनाकोळवण येथील प्रसिद्ध सवतकडा धबधबाही सुरु आहे. तेथे अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून धबधब्याकडे जाणारी पायवाट रुंद करणे, बांबूचे रेलिंग उभारणे अशी पर्यटकांच्या सुरक्षेची कामे केली आहेत. सवतसडा धबधबा (चिपळूण) कोसळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून हा धबधबा सुरक्षित अंतरावरून पाहता येतो. मात्र पाण्याच्या मुख्य प्रवाहात जाण्यास बंदी आहे. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा मार्लेश्वर धबधबा (संगमेश्वर) धबधबा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मुख्य गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचा जोर वाढल्यास तात्पुरती रोख लावली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींच्या मदतीने धबधब्यांवर चांगल्या सुविधा दिल्या आहेत, त्यामुळे येथे सुरक्षित पर्यटन सुरू आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा आणि तेथे उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज (काचेचा पूल) पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. धबधब्याच्या फेसाळत्या प्रवाहावरून काचेच्या पुलावर चालण्याचा हा सुरक्षित थरार अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. कणकवली जवळचा सावडाव धबधबा हा या हंगामातील सर्वात सुरक्षित धबधबा ठरला आहे. येथे ग्रामपंचायतीने पर्यटकांसाठी लोखंडी रॅम्प, पायऱ्या, उत्तम रस्ते आणि प्रसाधनगृहांची उत्तम सोय केली आहे. ज्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार मिळत आहे. आंबोली मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. घाटात दाट धुके असल्याने केवळ दिवसाच्या वेळी येथे पर्यटकांना थांबण्याची परवानगी दिली जात आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांचा कडक वॉच आहे. दहिबावचा मायनी धबधबा पर्यटकांना साद घालतो आहे. संभाव्य सागरी धोके लक्षात घेता महाराष्ट्र सागरी मंडळाने कोकणातील किनारपट्टीवरील सर्व प्रकारच्या व्यावसायिक जलक्रीडा आणि बोटिंगवर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याची परवानगी असली तरी खोल पाण्यात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 


उत्तर कोकणातील रायगड जिल्हा हा ट्रेकर्स आणि पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता रायगड जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. माणगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट, कुंभे धबधबा आणि सिक्रेट पॉईंट या चार प्रमुख ठिकाणी अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने थेट ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. या पर्यटन स्थळांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये हुल्लडबाजी करणे, धोकादायक सेल्फी काढणे, पाण्यात उतरणे आणि मद्यपान करणे यावर पूर्णपणे कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महादरवाजा परिसरात दरड कोसळल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ले रायगडाचा चित्तदरवाजा आणि नाणेदरवाजा पायरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता. सध्या गडावर जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची तपासणी करूनच पर्यटकांना मर्यादित स्वरूपात परवानगी दिली जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोरबे धरण, कुंडी नदीपात्र, धरनोळी नदीपात्र, चिंध्रण, शांतिवन नदीपात्र, माची प्रबळ आदी मुख्य धबधब्यांच्या १ किलोमीटर परिसरात ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. अनेक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावण्यात आलेले आहेत. तर बंदी न घालता ठराविक निर्बंध घालण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे. 


जुलैच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात पाच दिवसात सरासरी १२०० मिमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील जवळपास धबधबे प्रवाहित झाले आहेत. नुकतीच रायगडच्या झेनिथ धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सुमारे १०० पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. यावेळी विहारी आणि ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून दोरखंडाच्या साहाय्याने या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर प्रशासनाने स्थानिक तरुणांची 'आपत्ती व्यवस्थापन रक्षक' म्हणून नेमणूक केली असून, त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शन केले जात आहे. मुरुड-जंजिरा नजीकचे खरआंबोळी, गारंबी, चिचघर, नागशेठ धबधबे प्रवाहित झाले आहेत. पांडवकडा धबधबा नवी मुंबई परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. २०१४ मध्ये पांडवकडा परिसरात पर्यावरण प्रकल्प सुरु होणार होता. संरक्षक भिंत, तिकीट खिडकी, कपडे बदलण्याच्या खोल्या यांचे काम सुरु झाले होते. मात्र हा प्रकल्प अर्धवट थांबला हे पर्यटनासाठी मारक आहे.

 


मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विकेंडला लाखो चाकरमानी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निसर्ग सौंदर्य बहरले असून, प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मालशेज घाट, टिटवाळा जवळील परिसर आणि शहापूर तालुक्यातील धबधबे सध्या पर्यटकांनी गजबजले आहेत. मात्र, घाटातील दाट धुके आणि दरडींचा धोका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी रात्रीची वाहतूक मर्यादित केली आहे. मुख्य धबधब्यांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पर्यटकांना सुरक्षित अंतरावरूनच निसर्गाचा आनंद घेता येत आहे. कोंडेश्वर आणि भगीरथ धबधबा (बदलापूर / वांगणी) येथे दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रवेशबंदी लागू केली आहे. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू आणि तलासरी भागाला सध्या हवामान विभागाने 'अलर्ट' जारी केला आहे. येथे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जव्हारचे दाभोसा आणि काळमांडवी धबधबे ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्हा प्रशासनाने धबधब्यांच्या परिसरात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे या बंदीच्या वातावरणातही ग्रामीण अर्थव्यवस्थेला सकारात्मक गती मिळण्याची आशा आहे. दाभोसा आणि काळमांडवी धबधबा (जव्हार, पालघर) स्थानिक आदिवासी गाईड्सच्या मदतीने पर्यटकांना दूरवरून निसर्ग पाहण्याची परवानगी आहे. चिंचोटी धबधबा (वसई) अतिशय धोकादायक बनल्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

 


कोकणातील अनेक पावसाळी पर्यटनस्थळी सध्या धबधब्यांच्या कड्यावर किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी उभे राहून सेल्फी घेण्यास कायदेशीर गुन्हा घोषित करण्यात आले आहे. धबधब्यांच्या परिसरात दारू पिणे, काचेच्या बाटल्या टाकणे किंवा डीजे वाजवणे यावर कडक निर्बंध आहेत. संध्याकाळी उशीरा व रात्री कोणत्याही धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना थांबण्याची परवानगी नाही. कोकणातील पावसाळी पर्यटनावर असणारे निर्बंध हे पर्यटकांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी नसून, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी असल्याचे प्रशासन सांगत आहे. याही स्थितीत रत्नागिरीचा सवतसडा, सिंधुदुर्गचा सावडाव, पालघरमधील जव्हारचा आदी विविध ठिकाणाचा परिसर पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या काळात कोकणात अनेक पावसाळी पर्यटन स्थळांवर गर्दीचे उच्चांक मोडले जातात. वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंग, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, बेफिकीर कचराबाजी, हलगर्जीतून होणारे पर्यटकांचे अपघात, वादावादी अशातून ‘पावसाळी पर्यटनबंदी’ होणार नाही, याची सर्वानीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

मंगळवार, २३ जून, २०२६

रियासतकार सरदेसाई यांच्या कोकणातील मूळ घराचा शोध!

दैनिक नागपूर तरुण भारत (पुणे आवृत्ती)

रियासतकार म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक महान आणि व्यासंगी इतिहासकार ‘पद्मभूषण’ गोविंद सखाराम सरदेसाई यांचे कोकणातील मूळगाव असलेल्या लांजा तालुक्यातील गोविळ येथील मूळघराचा शोध घेण्यात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या संस्थेला नुकतेच यश आले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी ही माहिती दिली. मराठा साम्राज्याचा सर्वसमावेशक इतिहास 'रियासत' या ग्रंथांच्या माध्यमातून लिहून काढल्याने 'रियासतकार' ही उपाधी सरदेसाई यांना मिळाली होती.

 

रियासतकार सरदेसाई यांचे गोविळ (ता. लांजा) येथील घर (वाडा)

कोकणातील राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था कोकणरत्नांचा शोध घेऊन आपल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांची चरित्रे समाजासमोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते. लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीचे सुपुत्र ज्येष्ठ समीक्षक वि. शं. चौगुले, कोटगावची स्नुषा झांशीची राणी लक्ष्मीबाई, रिंगणे गावचे सुपुत्र नाटककार ला.कृ.आयरे, तळवडे गावचे सुवर्णकार जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, शिपोशी गावचे क्रांतिकारक गोपाळ गणेश आठल्ये, रत्नागिरीत पहिला छापखाना सुरू करणारे जनुभाऊ आठल्ये, १८८६ मध्ये कोचीनहून 'केरळ कोकीळ' मासिक काढणारे कृष्णाजी नारायण आठल्ये, न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये, राजापूर तालुक्यातील तळवडेचे ‘पितांबरी’कार रवींद्र प्रभूदेसाई, वाटूळचे सुप्रसिद्ध प्रवचनकार सु. ग. शवडे (गुरुजी) अशी कितीतरी नावं सांगता येतील. संघाच्या शिपोशी गावात पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची माहिती देण्यात आली होती. मात्र ज्या गोविळ गावात त्यांचा जन्म झाला तेथील घराचा शोध लागलेला नव्हता. पुढे ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला लाड हे ठिकठिकाणी सरदेसाई यांच्याबद्दल बोलत होते. दरम्यान ‘हर्दखळे’ गावाचं गीत तयार करताना लाड यांचा त्या गावातील अनेक लोकांशी संपर्क आला. गावाचे शिक्षक महेश गुरव यांनी त्यांना आणि त्यांच्या टीमला आपल्या घरी जेवावयास बोलावले. त्या वेळेला त्यांनी 'आपण गोविळ गावात शिक्षक आहोत' असे सांगितले. लाड यांनी तातडीने त्यांना गो. स. सरदेसाई यांच्या घराबद्दलची माहिती विचारली. गुरव यांनीही, ‘शोध घेऊन सांगतो’ असे उत्तर दिले.

 

घराचे मालक - विलास नारायण सुर्वे

सध्या देशभर सुरु असलेले जनगणनेचे काम स्थानिक शिक्षक करीत आहेत. या दरम्यान गुरव यांना गोविळ गावात मूळवाडीमध्ये वस्तीपासून थोडेदूर, डोंगरात एका बाजूला झाडांनी वेढलेले पण गावातल्या घरांपेक्षा वेगळ्या ठेवणीचे चौसोपी आणि माडीचे घर दिसले. त्यांनी उत्सुकतेने घरमालक विलास सुर्वे यांना घराबद्दलची विचारणा केली तेव्हा सुर्वे यांनी, ‘हे घर आपल्या वडिलांनी १९४५मध्ये सरदेसाई यांच्याकडून विकत घेतले’ असे सांगितले. गुरव गुरुजींना तेव्हा लाड यांची आठवण झाली. त्यांनी तात्काळ भांबेड हायस्कूलचे जयराज मांडवकर यांना आणि मांडवकर यांनी लाड यांना हे कळविले. लाड यांनी नुकतीच महेश गुरव (गुरुजी), जयराज मांडवकर (सर) आणि संघाचे पदाधिकारी महेंद्र साळवी यांचेसह गोविळ गावातल्या गो. स. सरदेसाई वाड्याला भेट दिली. तो ऐतिहासिक वाडा पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्याचे लाड म्हणाले. १९४५मध्ये विकत घेतलेला तो वाडा जसा होता तसाच आजही उभा आहे. याबद्दल त्यांनी वाड्याचे मालक विलास सुर्वे यांचे आभार मानले. त्याकाळात इतिहासकार म्हणून सुशिक्षित लोकांमध्ये गो. स. सरदेसाई यांचा मोठा बोलबाला होता. एका मोठ्या व्यक्तीचं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीचं घर आपण घेतलेलं आहे याचे भान सुर्वे यांच्या वडिलांना पूर्णपणे होते. त्यांनी या घरामध्ये कोणताही बदल करायचा नाही अशी सक्त ताकीद आपल्या मुलांना दिली होती, अशी माहिती सुर्वे यांनी दिली. सुर्वे यांचे वडील गिरणीत चांगल्या हुद्द्यावर काम करीत होते. त्यामुळे ते हे घर आणि सोबतची पंधरा एकर जागा विकत घेऊ शकले. त्यांनी मुंबईहून बोटीने आणलेला शिसव लाकडातला कोरीव काम केलेला पलंग आणि अशा काही वस्तू कुटुंबीयांनी जपल्या आहेत.

 

शोधकर्ते सुभाष लाड (मध्यभागी) आणि सहकारी  

रियासतकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म सखाराम व गंगाबाई (लक्ष्मीबाई) या दाम्पत्याच्या पोटी याच वाड्यात १७ मे १८६५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्या शिपोशी गावातल्या प्राथमिक शाळेत झाले. ती शाळा इमारत शिपोशी गावाने आजही जपून ठेवलेली आहे. पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले. १८८४ मध्ये ते मॅट्रिकला रत्नागिरीत असतांना गंगूताई किर्तने या मुलीशी त्यांचा विवाह झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयांतून १८८८ला ते बी.ए. झाले. नंतर ते बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्याकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. पुढे त्यांना तिथेच हिशेब तपासणीस म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. सयाजीरावांच्या बरोबर त्यांना परदेश दौरे करण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांना इतिहासाची आवड निर्माण होऊन बडोद्यात त्यांनी मुघल रियासत लिहून पूर्ण केली. त्यांनी आपले छोटे भाऊ दिनकर यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. सयाजीरावांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे दिनकर हे परदेशी जावून नेत्रतज्ञ होऊ शकले. त्यांनी पुण्यातील तळेगाव येथे इस्पितळ उभारून जनसेवेला सुरुवात केली. रियासतकार बडोद्याहून ३६ वर्षांनंतर १९२५ला सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी डॉ. दिनकर यांनी आपल्या भावाला सेवानिवृत्तीनंतर एकाग्रपणे इतिहास लेखन करता यावे म्हणून कामशेत येथे बंगला बांधला. रियासतकार सेवानिवृत्त झाल्यानंतर ते या बंगल्यात आले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत (९ नोव्हेबर १९५९) वास्तव्यास होते. कामशेत येथे राहून आपले उर्वरित आयुष्य रियासतकारांनी केवळ इतिहास लेखनाला समर्पित केले. प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या प्रेरणेने त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून मराठी रियासत : ८ खंड, मुसलमानी रियासत : ३ खंड, ब्रिटिश रियासत : २ खंड, 'पेशवे दप्तर' ४५ खंड तयार झाले. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतुलनीय लेखन कामगिरीबद्दल भारत सरकारने १९५७ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. लाड यांनी रियासतकारांचे पणतू जयदीप यांच्याशी संपर्क साधून कामशेतमधील बंगल्यालाही भेट दिली होती.

 

रियासतकार सरदेसाई

हा वाडा काहीसा अपूर्णावस्थेत आहे. तो चौसोपी असला तरी तीनच बाजू पूर्ण असून पश्चिमेला असलेली बाजू राहून गेली असावी. मधले रांजणही सुंदर आहे. पूर्वेकडे दर्शनी बाजू असून घराची माडी अधिक आकर्षक दिसते. चार फूट उंचीचा जोता घडीव दगडात चुनखडीचा वापर करून बांधला आहे. समोरील भागात सहा लाकडी खांब असून ते दगडी ताशीव उठाळ्यावर उभे आहेत. माडीचा भाग ही मोकळा व प्रशस्त असून लाकडी रेजे बसविल्याने बंगलीला श्रीमंती थाट आला आहे. माडीच्या मजबूत फळ्या आजही सुस्थितीत आहेत. घरातील त्या काळातील वापरात असलेल्या अनेक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. घराच्या भिंती दगडा मातीच्या दीड फूट रुंदीच्या असून त्यावर एक इंच जाडीचा चिकण मातीचा मुलामा दिलेला आहे. कालपरत्वे बऱ्याच ठिकाणी तो मुलामा निघाल्यामुळे आतील दगड दिसू लागले आहेत. घराला वेळोवेळी रंग देणे तसेच पॉलिश करणे हे फारच महागडे असल्याने त्याचे जीर्णपण दिसून येते आहे. गोविळमधील वास्तूला तशाच स्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने, ‘आपणही काही मदत करू’ असे त्यांचे आश्वासन लाड यांना जयदीप यांनी दिले आहे.




रविवार, २१ जून, २०२६

'राखणदार पदयात्रा' निमित्ताने...

कोकणच्या जल, जंगल आणि संस्कृती रक्षणाचा नवा एल्गार


        स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेला कोकण प्रांत सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. अनिर्बंध रिअल इस्टेट विकास, खाणकाम (मायनिंग) आणि विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील तरुण आणि पर्यावरणप्रेमींना जागे करण्यासाठी 'कोकणी रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे आणि त्यांच्या 'राखणदार टीम'ने नुकतीच मृग नक्षत्रात (जून २०२६) एका ऐतिहासिक 'राखणदार पदयात्रेची' सुरुवात केली. या यात्रेचा पहिला टप्पा कणकुंबी ते बांदा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु आहे. ही पदयात्रा केवळ एक आंदोलन नसून कोकणची संस्कृती आणि निसर्ग वाचवण्याची जनचळवळ बनण्याची आवश्यकता आहे.


             कोकणी संस्कृतीत 'राखणदार' म्हणजे गावाचा, वनाचा किंवा स्थानाचा अदृश्य रक्षक देव जो संकटसमयी धावून येतो. आजच्या काळात जेव्हा कोकणची जमीन परप्रांतीय आणि मोठ्या कंपन्यांच्या विळख्यात सापडत आहे, तेव्हा "कोकणचे खरे राखणदार हे येथील स्थानिक लोकच आहेत" हा विचार घेऊन ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या संवेदनशील पश्चिम घाट (Western Ghats) क्षेत्रात या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा पहिला टप्पा अतिशय दुर्गम आणि महत्त्वपूर्ण जलस्रोतांच्या भागातून आखण्यात आला. यात्रेची सुरुवात गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून झाली. हा भाग महादयी नदी आणि इतर अनेक जलस्रोतांचे उगमस्थान आहे. या राखणदार पदयात्रेची सुरुवात केरी गावातील आजोबांच्या तळीतील पवित्र जल, तीर्थ म्हणून सोबत घेत, कणकुंबी मंदिरात नारळ ठेऊन करून केली गेली. या प्रवासासाठी गावातील तरुण मंडळी, शालेय विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्या सहभागामुळे उद्याच्या पिढीकडून निसर्गसंवर्धनाची आशा अधिक दृढ झाली. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर आपल्या जल, जंगल आणि जमिनीबद्दल संवेदनशील असलेल्या प्रत्येक मनाचा एक हुंकार आहे. आपल्या मातीचे, देवराईंचे आणि आपल्या अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या राखणदाराचे रक्षण करण्याचा हा एक सामूहिक संकल्प आहे. जे आपले आहे, जे आपल्या पूर्वजांनी जपले आहे, ते जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास आम्ही तयार आहोत.


               ही यात्रा केरी, कारापूर, आणि दोडामार्ग सीमावर्ती भागातून पुढे सरकली. तिथून भेडशी, सातली आणि कुडसे गावांना भेटी देत थेट तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश केला. शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि विळवडे मार्गे जात सोनुर्ली येथील ऐतिहासिक श्री देवी माऊली मंदिरामध्ये या चार दिवसीय यात्रेची सांगता झाली. कोकणातील वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांचे पाणी विषारी होत चालले आहे (उदा. लोटे एमआयडीसीमुळे वाशिष्टी नदीची झालेली दुरवस्था). यामुळे मासेमारी आणि स्थानिक लोकांचे रोजगार धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ही पदयात्रा नद्या, पाण्याचे झरे आणि जंगले वाचवण्यासाठी स्थानिकांना संघटित करत आहे. कोकणात हजारो वर्षांपासून 'देवराई' (देवांसाठी सोडलेले पवित्र जंगल) जपण्याची परंपरा आहे. या देवराया म्हणजेच नैसर्गिक जैवविविधतेचे केंद्र आहेत. या यात्रेदरम्यान तरुण पिढीला या निसर्गपूजक परंपरांची आणि सातेरी संस्कृतीची जाणीव करून दिली जात आहे. कोकणच्या पर्यावरणाला आणि पारंपरिक उपजीविकेला नख लावणाऱ्या खनिज प्रकल्पांना (मायनिंग) आणि अनिर्बंध रिअल इस्टेटच्या नावाखाली होणाऱ्या जमिनींच्या बळकावणीला विरोध करणे हा या यात्रेचा मुख्य अजेंडा आहे. या पदयात्रेत गोव्यातील 'Enough is Enough' आणि 'Goyant Kollso Naka' पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते फ्रान्सिस कोएल्हो, पर्यावरण अभ्यासक सत्यजीत चव्हाण, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव छायाचित्रकार सोमेश काणेकर, दिग्दर्शक विनायक कोळवणकर आदींसह तिन्ही राज्यांतील स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'रानमाणूस' प्रसाद गावडे यांच्या साध्या आणि प्रभावी संवादशैलीमुळे गावोगावी लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. "आम्ही निसर्गाचा केवळ वापर करत नाही, तर आम्ही निसर्गाचे अपत्य आहोत," हा या चळवळीचा मूळ मंत्र आहे.


            पूर्वी कोकणात, गावातला कुणीही अतिरेक करू लागला की त्याला भीती कुठल्या गोष्टीची घातली जायची? तर गावच्या मुंजोबाची, ग्रामदेवाची किंवा देवीची किंवा वनदेवाची. कितीही भाबडेपणा असला तरी तो एक श्रद्धेचा आणि सामाजीक सुरक्षितता राखण्याचा एक भाग होता. आता तीच वेळ आलेली आहे. राज्य वा केंद्र सरकार पर्यावरण आणि निसर्गाबाबत भयंकर विचार करताना दिसत आहेत. गावच्या लोकांची, निसर्गाची इथल्या प्रकृतीची त्यांना अडचण होऊ लागलीय असे वाटावे अशी स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली सर्वत्र मिळणाऱ्या टक्केवारीने देश, देशाची जमीन विकून ढेकरा द्यायची हाव ओसंडून वाहू लागलीय. कोकणात जे लोक जीव तोडून इथल्या जमिनीला, लोकांना, पर्यावरणाला वाचवू पाहतायत. विकास शाश्वत आणि निसर्गाला हानी न पोहचवता होऊ शकतो हे दाखवतायत दुर्दैवाने त्यांना मात्र इथला मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियाही जवळपास ठेंगा दाखवत आहे. ‘राखणदार’ नावाने सामान्य लोकांच्या भावनेला हाताशी धरून एका उदात्त कामासाठी ही यात्रा सुरु आहे. पर्यावरण वाचवणे, पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प हाणून पाडणे, निर्णयप्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा निर्णय अंतिम असावा, शाश्वत विकासाबद्दल जनजागृती करणे ह्या आणि अश्या अनेक गोष्टी प्रसाद गावडे आणि मंडळी कित्येक वर्षे करताहेत. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगातही कोकणातील राखणदारांची संकल्पना टिकून आहे. शहरात राहणारे कोकणातील लोकही आपल्या मूळ गावाशी आणि वाडीच्या राखणदाराशी भावनिकरित्या जोडलेले असतात. सणावाराला किंवा महत्त्वाच्या कामाला ते आवर्जून आपल्या वाडीतील राखणदाराचं स्मरण करतात. तरीही, काही ठिकाणी या श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली टीकेचे धनी होतात. पण कोकणातील लोकांसाठी हा केवळ अंधविश्वास नसून, तो त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा, निसर्गाशी असलेल्या त्यांच्या आत्मिक नात्याचा आणि पूर्वजांबद्दलच्या आदराचा एक भाग आहे. कोकणातील राखणदार ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती कोकणच्या मातीतील लोकांच्या श्रद्धेचं आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना आधार देते, भयमुक्त ठेवते आणि एकत्र बांधून ठेवते.


            कोकणाच्या मातीत 'राखणदार' नावाची एक अदृश्य पण तितकीच शक्तिशाली संकल्पना खोलवर रुजलेली आहे. 'राखणदार' म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, राखणदार म्हणजे आपल्या घराची, वाडीची, शेतीची, अगदी संपूर्ण गावाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती किंवा ग्रामदेवता. ते अनेकदा आपल्या पूर्वजांचे आत्मे किंवा विशिष्ट नैसर्गिक शक्तींशी जोडलेले असतात. कोकणातील प्रत्येक वाडी किंवा घरामागे एक संरक्षक शक्ती उभी असते, असे मानले जाते आणि हीच शक्ती 'राखणदार' म्हणून ओळखली जाते. या राखणदारांचं कोणतंही विशिष्ट रूप नसतं. ते कधी झाडाच्या रूपात (उदा. पवित्र वड, पिंपळ, आंबा), कधी दगडाच्या रूपात, तर कधी केवळ एका अदृश्य अस्तित्वाच्या रूपात असतात. काही ठिकाणी त्यांना 'वनदेवता', 'क्षेत्रपाल' किंवा 'गावदेवी' च्या रूपातही पूजले जाते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या क्षेत्राचं दुष्ट शक्तींपासून, वाईट नजरेपासून आणि संकटांपासून रक्षण करणं. घरात शांतता, समृद्धी आणि आरोग्य राखण्यासाठी ते मदत करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. कोकणातील लोक या राखणदारांवर निस्सीम श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्याशी संबंधित अनेक परंपरा आजही जपल्या जातात. जेव्हा एखाद्या घरात नवीन कार्य सुरू होतं, नवजात बाळ जन्माला येतं, किंवा एखादं संकट दूर होतं, तेव्हा राखणदारांना नारळ किंवा कोंबड्याचा नैवेद्य दाखवला जातो. नवस फेडताना अनेकदा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आजही काही ठिकाणी पाळली जाते. घरातून बाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना राखणदारांना मनोमन प्रार्थना करून आशीर्वाद मागितले जातात. "राखणदार पाठीशी राहा!" असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. राखणदारांच्या काही अदृश्य नियमांचं पालन न केल्यास वाईट गोष्टी घडतात अशीही एक भीती काही लोकांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा असतो. कोकणातील अनेक वाड्यांमध्ये राखणदारांसाठी विशिष्ट जागा किंवा लहानशी देवडी असते. इथे नियमितपणे दिवे लावले जातात, धूप जाळला जातो आणि स्वच्छता राखली जाते.


            राखणदार पदयात्रा ही कोकणातील जंगल, पाणी, जैवविविधता, पारंपरिक देवऱ्या आणि स्थानिक संस्कृती यांच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली जनजागृती यात्रा आहे. या यात्रेचा उद्देश गावागावांतील लोकांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटवून देणे आणि स्थानिक समुदायांना निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी करणे हा आहे. या पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला गेला. गावातील पारंपरिक सण, देवऱ्या, जलस्रोत, जंगलांशी निगडित श्रद्धा, जैवविविधता आणि पर्यावरणीय आव्हाने यांची माहिती संकलित केली. तसेच स्थानिक लोकांच्या अनुभवांमधून निसर्गरक्षणाच्या पारंपरिक पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. राखणदार पदयात्रा ही केवळ चालण्याची यात्रा नसून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे. जंगल, पाणी, माती आणि जैवविविधता यांचे संरक्षण हे आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून दिला जातो. “आपल्या भूमी, पाणी, जंगल आणि संस्कृतीचे खरे राखणदार आपणच आहोत” ही भावना जागृत करून स्थानिक समाजाच्या सहभागातून शाश्वत भविष्यासाठी एक व्यापक चळवळ उभारणे हे राखणदार पदयात्रेचे प्रमुख ध्येय आहे.


            कोकणचा विकास पर्यावरणाचा नाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून होत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. जर आजचा कोकणी माणूस एकत्र आला नाही, तर येणारा काळ या भूमीसाठी कठीण असेल. कोकणी जनतेला याबाबत पुरेसे अवगत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून, ही राखणदार पदयात्रा प्रत्येक कोकणवासीयाला स्वतःच्या मातीचा 'राखणदार' बनण्याचे आवाहन करते आहे.

dheerajwatekar@gmail.com

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

एका निरलस सेवेची गाथा

 श्रीमती विठाबाई श्रीपत भोसले (आक्का) यांचे नुकतेच (२७ मार्च २०२६) घोणसरे येथील ‘विजयश्री’ हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झाले. जीवन कधी कधी इतकी कठोर परीक्षा घेते की, त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांचे आयुष्य अतिशय साधे होते. पण त्यातील निग्रह असामान्य होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यात वैधव्याचे दु:ख ओढवूनही त्यांनी हार मानली नाही. आपल्या दु:खाला त्यांनी सामर्थ्यात बदलले. कृतज्ञ तपस्येच्या प्रवासी ठरलेल्या आक्का यांचे अंतिम संस्कार मार्गताम्हाने येथे सख्खे भाऊ, बहिण, भाचा-भाची आदींच्या उपस्थितीत पार पडले. नातू कुटुंबात त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ६७ वर्षे, केवळ सेवा म्हणून नव्हे तर निष्ठेने आणि ममत्वाने वेचली. कोणा सर्वसामान्यांप्रमाणेच साधेसे जीवन जगणाऱ्या, सर्वार्थाने वेगळे जीवन जगलेल्या आणि निरलस सेवेची गाथा बनून राहिलेल्या आक्का यांच्या रूपाने एका स्त्रीच्या कर्तृत्वाला वाहिलेली ही शब्द श्रद्धांजली!

मूळचे संगमेश्वर तालुक्यातील माखजनच्या नातू घराण्यातील, मार्गताम्हाने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तात्यांचा गुहागरचे प्रसिद्ध उद्योजक बापूजी खरे यांच्या कन्या शालिनी (विजया नातू) यांच्याशी मे १९५६ रोजी विवाह झाला. विवाहानंतर महिन्याभरात विजया वहिनी शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाल्या. लग्नानंतरची एक-दोन नव्हे सलग सात वर्षे या जोडप्याने, तात्या ताम्हान्यात आणि विजया वहिनी पुण्यात अशी काढली. याच कालखंडात, १९५९ मध्ये स्व. आक्का यांचे नातू कुटुंबियांत आगमन झालेले. गुहागर तालुक्यातील जामसूतच्या सीताराम (बाबा) साळवी यांच्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या २०-२२ वर्षाच्या थोरल्या लेकीला, विठाबाईं यांना सहा महिन्यात वैधव्य आलेलं. दैवाचा असा घाला पडेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. विठाबाई माहेरी परतण्यापूर्वी ‘मला माझ्या पायावर उभी करा’ म्हणत सासरघरी राहिल्या. मात्र वर्ष व्हायला आलं तरी काही जमून आलेलं नव्हतं. विठाबाई माहेरी वडिलांकडे परतल्या होत्या. माहेरी त्यांना ‘आक्का’ म्हणत. आक्काचं शिक्षण नसल्यात जमा होतं. नाही म्हणायला बालपणी त्यांना पालशेतच्या दत्ताची (श्रीदत्तमंदिर) ओढ लागलेली होती. वेळ मिळेल तेव्हा त्या दत्ताकडे माथा टेकायला जायच्या. त्यांच्या माहेरच्या घरातही पाचेक भावंडात आक्का सर्वात मोठ्या होत्या. आई लहानपणी देवाघरी गेलेली. कोणाचा आधार नव्हता. उत्पन्नाचे किरकोळ साधन असलेली घरची शेती वडील करायचे. आक्का घरी परतल्यापासून ‘आपण आहोत तोवर काळजी नाय ! पण नंतर काय व्हयाचं ?’ याची चिंता साळवींना होतीच. साळवी नकळत रोज पांडूरंगाला हात जोडीत. मनोमन विनवित. कधीकधी आक्का वडिलांना म्हणायच्या, ‘मला माझ्या पायावर उभी करा ! माझ्या हुशारीचा उपयोग व्हायला हवा. असं मला वाटतं.’ बाबा साळवींना हे पटायचं. एके दिवशी पांडुरंगाने म्हणा किंवा दत्तगुरूंनी म्हणा या बाप-लेकीचं ऐकलं.

तात्या नातू तेव्हा बुधवारी वेळंबला पेशंट तपासणीच्या वाराला जायचे. एकदा तिथल्या शंकरराव ओकांजवळ ते बोलले होते, ‘सौ. विजयाबाईंची सुट्टी संपून शिक्षणाची वेळ जवळ येत आहे. पुण्याला घरात हिच्या सोबत राहील अशी बाई पाहिजे आहे. बघा कोणी भेटली तर ?’ ओकांनी ते लक्षात ठेवले. कधीकधी खरेदीसाठी बाबा साळवी ओकांच्या दुकानात यायचे. जुना परीचय होता. ओकांनी तात्यांचं म्हणणं लक्षात ठेवून साळवींच्या कानावर घातलं होतं. ‘... पण असं जमंल का ?’ या विचारात असलेले बाबा साळवी ना निर्णयाप्रत आलेले ना लेकीला काही बोलू शकलेले.

एके सायंकाळी मार्गताम्हान्याला दिलेल्या माहेरवाशीण नीराबाई ‘आक्का, आक्का गं !’ अशी हाक मारीत आल्या. आल्या त्या थेट स्वयंपाकघरात शिरल्या. ‘का आलीस ?’ असं आक्काने विचारल्यावर नीरा बोलू लागल्या, ‘अग ते मार्गताम्हान्याचे डॉक्टर नाहीत का तात्या नातू ? त्यांची बायको गरोदर हाय. त्यांना कायम राहू शकेल अशी घरकामासाठी बाई पाहिजे. राहाशील त्यांच्याकडे ?’

‘आगंऽऽऽ, पण ते बामण नि आपण मराठा. त्यांच्या घरात राहून कसलं काम करणार ग मी !’ नाही म्हटलं तरी सामाजिक स्तरावर अनेक विषयांना सोबत घेऊन चालणारा तो काळ होता. नशीबाने अगोदर ठोकरलेलं असल्यानं आक्कांच्या मनात प्रश्न आला.

‘आगं, हे बघ ! त्यांना घरात राहून काम करण्यासाठी बाई माणूस पाहिजे. काम काय ? पगार काय ? हे सारं समक्ष विचारू. पटलं तर राहा. नाय तर नको. बाकी तुझ्या बाबांना सांग हो कसं काय ते तूच !’ आक्कांच्या मनात भविष्याची पेरणी करून नीरा निघून गेल्या. निराच्या सांगण्याने असंख्य प्रश्नांच्या भोवती फिरण्यात आक्कांची रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला.

आक्का बाबांना म्हणाल्या, ‘बाबा ! ताम्हान्याचे डॉक्टर हायत ना तात्या, त्यांच्याकडे एक नोकरबाई पाहिजे. तुम्हाला पटत असेल तर विचाराल माझ्यासाठी ? ते डॉक्टर चांगले आहेत. अनेकांसाठी रात्री-बेरात्री धावतात. गोरगरीबांची जाण आहे त्यांना. एकट्या माझाच विचार करायचा झाला तर मीही गरजू आहे ना?’

बाबा म्हणाले, ‘होय बाय! वेळंबचे ओक पण असंच म्हणताहेत! पण तू म्हणतेस म्हणून, अन्यथा माझा अजून तसा काही विचार नाही. तू असं कर. तात्यासाहेबांकडे सांगावा दे नीराकरवीच! तुझी-माझी वळख द्यायला सांग नीट. होकार आला तर जाऊ आपण भेटायला.’ आक्कांना चटकन मिळालेला बाबांचा सकारात्मक प्रतिसाद अनपेक्षित होता.

बाबा पुन्हा म्हणाले, ‘आक्का! एरवी कुणाच्या तरी घरी तू रोजगाराला जावंस हे नसतं पटलं मनाला! पण तात्या नातू म्हणजे देवमाणूस ग! त्यांच्या घरी कामाची संधी मिळणं हे भाग्याचं आहे तुझ्या! या माणसाचे जोडे जरी उचलायला लागले तरी लोकं तुला भाग्यवानच म्हणतील. एक भाकरीची आशा नाही करायची. चवथ भाकरी टिकवून ठेवायची. चोरी-मारी, लबाडी करायची नाही. सच्च्यासारखं वागायचं. पगार-बिगार काही नाही मिळाला तरी त्यांच्या घरचं काम घे. ते समजून देतील! तुझं भलं करतील. त्यांच्या रूपाने देवच तुझ्या मदतीला आलाय बघ.’ आपल्या वडिलांचे हे शब्द काळजात खोलवर जपून ठेवत आक्कांनी ६७ वर्षे निरलस सेवेत घालवली.

 लहान वयात नियतीचा क्रूर आघात सोसलेल्या आक्का यांनी अंगभूत गुणांच्या बळावर आपले आणि संपर्कात आलेल्या साऱ्यांचे जीवन अधिक प्रकाशमान होण्यास हातभार लावला. नातू घराण्याचा आधारवड बनून त्यांनी आपली सेवा सार्थकी लावली. स्व. आक्कांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १ जानेवारी १९३८चा! वयात आल्यावर विवाहाची स्वप्ने रंगवताना काळाने त्यांच्या वैवाहिक जीवनावर घाला घातलेला. सुखाचे दिवस पाहण्यापूर्वी आणि मनातील सारे संसारात उतरवण्यापूर्वीच पदरात वैधव्य आलेले. अशा स्थितीत समाजाच्या दृष्टीने कदाचित त्या 'दुर्दैवी' ठरल्या असत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. नियतीने त्यांच्या वाट्याला मार्गताम्हानेतील सुसंस्कृत डॉ. तात्यासाहेब नातू कुटुंबियांचा सहवास आणला. आपली प्रापंचिक आवश्यकता म्हणून का असेना, परंतु त्या काळात अशा मुलीला स्वीकारणे, तिला सन्मानाने वागवणे, हे तितके सोपे नव्हते. मात्र नातूंच्या सुसंस्कृत कुटुंबियांनी आक्क्कांना केवळ आपल्या घरात आश्रयच दिला नाही तर त्यांना आपले मानले. आपल्या ६७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी केवळ घरातील कामे केली असे नाही तर त्या घराचा 'कणा' बनून राहिल्या. ते घर त्यांच्यासाठी जणू 'तीर्थक्षेत्र' बनून राहिले होते. विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक आमदार तात्यासाहेब नातू यांचे ‘जनी जनार्दन’ हे चरित्र लेखन करताना आम्ही भेटलो, तेव्हा निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या आक्कांच्या संवादाची अनुभूतीही अशीच राहिली. आक्कांची सेवा ही केवळ ड्युटी नव्हती, ती 'भक्ती' होती. संपर्कात आलेल्या अनेकानेक लहानांचे मोठेपण आणि थोरांचे वृद्धापकाळ त्यांनी जवळून जवळून पाहिले, अनुभवले आणि सावरलेहि! अगदी १९९२ साली स्व. तात्यांचे निधन झाले तेव्हाही पहिला आक्रोश करणाऱ्या त्याच होत्या. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील उणीवा त्यांनी इतरांच्या सुखात शोधल्या. स्वतःचे दुःख फारकाळ कुरवाळत न बसता, नातू यांच्या घरच्या सेवेला त्यांनी आपले ध्येय मानले.  श्रीमती विजया वहिनींना मोठ्या बहिणीसमान असलेल्या आक्कांनी आपली लेकरं समजून तात्या आणि वहिनींच्या मुला-नातवंडांवर माया केली. त्यांचा सांभाळ केला. पैसे घेऊन सांभाळणं यात खरंतर काही विशेष नाही. पण आपलं समजून करत राहाणं आक्कांनी जमवलं. अणीबाणीचा कालखंड असेल किंवा तात्यांच्या मृत्यूचा क्षण अशा असंख्य कठीण प्रसंगी आक्का कुटुंबियांसोबत उभ्या होत्या. नातू कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने आक्का काहीकाळ पुण्यातही वास्तव्याला होत्या. पुण्यासह मार्गताम्हन्यातील वास्तव्यातील, आक्कांच्या हातच्या भाज्या, नाश्त्यातील धिरड्या, मऊ भात आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीची चव आता अनेकांना आठवत राहील.

आपण काही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आपले वाईट होणार नाही’ या वाक्यावर विलक्षण श्रद्धा राहिलेल्या आक्कांचं नशिबानं आकाश हिरावून घेतलं, तेव्हा डॉ. तात्यासाहेब नातू आणि श्रीमती डॉ. विजया नातू यांच्यासारख्या सुसंस्कृत कुटुंबाने त्यांना आपलं मानलं. याच पाठबळावर रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असे 'माणुसकीचे नाते' आक्कांनी गेली ६७ वर्षे जपले. या प्रदीर्घ प्रवासात आक्कांनी स्वतःला विसरून याच कुटुंबाला आपले मानले. नातूंच्या तीन पिढ्यांतील साऱ्याच कुटुंबीयांनीही त्यांना कधीही 'परके' मानले नाही. नातू कुटुंबात त्यांना जीवनभर निखळ प्रेम आणि आदर मिळाला. म्हणूनच अंगभूत गुणांच्या बळावर आक्का केवळ स्त्रीचे आयुष्य न जगता निरलस सेवेच्या बळावर त्यागाची आणि त्याला मिळालेल्या सन्मानाची यशोगाथा बनून राहिल्या. स्व. आक्का यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

धीरज वाटेकर, चिपळूण

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धा

चिपळूण :: महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि कोकण भराठी साहित्य परिषद, शाखा चिपळूण आयोजित आणि ‘आपलं चिपळूण’ सहआयोजक असलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती 'गणपत वाणी' काव्यलेखन स्पर्धेचे नुकतेच दिमाखदार पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमीचे पूजन-पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत भागवत यांनी बोलताना, शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  शुभेच्छा दिल्या. ‘गणपत वाणी’ स्पर्धेच्या आयोजकांना त्यांनी कल्पनेसाठी धन्यवाद दिले. यानिमित्ताने चिपळूणचे नाव जगभर पोहोचल्याचे ते म्हणाले. त्यांनी ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेसंदर्भात बोलताना वाचनात आलेल्या ‘फ्यूचर टॉक : कॉन्वर्सेशन्स अबाउट टुमारो विद टुडेज़ मोस्ट प्रोवोकेटिव पर्सनैलिटीज़’ या पुस्तकाचा संदर्भ दिला.

पारितोषिक वितरण हस्ते - एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत 



स्व. अप्पा जाधव यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर

‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी बोलताना, मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. या अभिवन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ‘लोटिस्मा’च्या प्रांगणात झाला याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि ‘मसाप’चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्य परिक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले.


ज्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते स्व. अप्पा जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय नाटककार, कवी व लेखक होते. ते एकेकाळच्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय सेवानिवृत्त संघाचे माजी अध्यक्ष राहिले होते.

यावेळी विजेता १ - अतुल देशपांडे (नाशिक-ऑस्टिन), विजेता २ - किरण वेताळ (पुणे), विजेता ३ - डॉ. मनोज वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ १ - विजय सातपुते (पुणे), उत्तेजनार्थ २- विजया गुळवणी (पुणे), उत्तेजनार्थ ३ - वृंदा कुलकर्णी (पालघर), उत्तेजनार्थ ४ - सुधीर नागले (रायगड), उत्तेजनार्थ ५ - हर्षदा सुंठणकर (बेळगाव), प्रोत्साहनपर १ - सुजाता संजय (लंडन), प्रोत्साहनपर २ - डेविड पेनकर (ईस्त्रायल), प्रोत्साहनपर ३ - शर्मिला पटवर्धन (बंगलोर), प्रोत्साहनपर ४ – सुषमा वडाळकर (बडोदे), प्रोत्साहनपर ५ - श्रीती राशिनकर (इंदौर), प्रोत्साहनपर ६ - सारिका बिवलकर (रत्नागिरी), प्रोत्साहनपर ७ - मेधा लोवलेकर (चिपळूण) यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतिक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

 


‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी कांही कविता’ मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता राहिल्या. ४७ वर्षांचं (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचलनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वान्द्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.



यावेळी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


धीरज वाटेकर 

व्हावी ‘जबाबदार आणि सुरक्षित पावसाळी पर्यटना’ची पहाट

अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने यावर्षी (२०२६) कोकणातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , ठाणे , पालघ...