अतिवृष्टी
आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने यावर्षी (२०२६) कोकणातील
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,
ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक घाटरस्ते आणि
धबधब्यांवर जाण्यासाठी बंदी घातली आहे. यामुळे कोकणच्या पावसाळी पर्यटनाला बंदीचे
ग्रहण लागल्याचे बोलले जात असले तरी यातून जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनाची नवी,
सकारात्मक पहाट उजाडण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर काल, रविवारी सुट्टीचे औचित्य साधून, प्रशासनाने घातलेली
बंदी आणि पोलीस बंदोबस्त झुगारुन रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध
परंतु अतिशय धोकादायक देवकुंड धबधब्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन
पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खरंतर कोकणात सध्या
घालण्यात आलेली पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी ही केवळ एक तात्पुरती सुरक्षा
उपाययोजना असणार आहे. सवतसडा (चिपळूण), सवतकडा (राजापूर),
आंबोली, सावडाव, नापणे,
अशा अनेक ठिकाणी अटी आणि शर्थीसह पर्यटनाला परवानगी देण्यात आली
आहे. त्यामुळे कोकणात ‘जबाबदार आणि सुरक्षित पावसाळी पर्यटना’ची नवी पहाट व्हावी
यासाठी स्थानिकांसह मान्सूनप्रेमी पर्यटकांनीही गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे.
अलिकडेच पुण्यातून १७ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देवकुंड धबधबा परिसरात आला होता. दुपारच्या सुमारास हे पर्यटक धबधब्याच्या मुख्य प्रवाहात उतरले. मात्र, पावसाळ्यातील पाण्याच्या प्रचंड वेगाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने, या गटातील दोघे जण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि 'सिक्रेट पॉइंट' या संपूर्ण परिसरात पावसाळी पर्यटनास कडक बंदी घातलेली असतानाही, पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घातल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरवर्षी जुलै महिन्यात कोकणची भूमी हिरव्यागार शालूने नटून पर्यटकांना साद घालत असते. परंतु, जुलै २०२६च्या सुरुवातीलाच हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यांमुळे, वाढत्या अपघातांमुळे आणि गावोगावी कोसळणाऱ्या दरडींमुळे कोकणातील पावसाळी पर्यटन क्षेत्राला काहीसे 'निर्बंधांचे ग्रहण' लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, याकडे पूर्णपणे नकारात्मक दृष्टीने न पाहता 'सुरक्षित आणि शाश्वत पर्यटन' अशी सकारात्मक दृष्टी ठेवून काम होण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि ग्रामपंचायती मिळून पर्यटकांना सुरक्षित अंतरावरून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी देत आहेत. पर्यटन संपूर्णपणे बंद करण्याऐवजी अतिधोकादायक ठिकाणे बंद आहेत. अन्य ठिकाणी कडक वॉच ठेवला जात आहे. सुरक्षित ठिकाणी पर्यटकांसाठी नव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
कोकणात प्रवेश करण्यासाठी पश्चिम घाटातील (सह्याद्री) घाटरस्ते
हे पर्यटनाचा मुख्य भाग आहेत. परंतु, मुसळधार पावसामुळे हे
घाटरस्ते सध्या संवेदनशील बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा
आणि पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट
२०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे
रस्त्याची कडा खचल्याने आणि दरड कोसळण्याचा तीव्र धोका असल्याने शासनाने हा
प्रतिबंधात्मक आदेश दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली घाटात मुख्य
धबधब्याजवळ नुकतीच एक किरकोळ दरड कोसळली होती, मात्र
महामार्ग पोलीस आणि स्थानिक मदत पथकाने युद्धपातळीवर दगड हटवून वाहतूक पूर्ववत
सुरू केली. सुट्टीच्या दिवशी तिथेही होणारी वाहनांची गर्दी प्रचंड आहे. ताम्हिणी
घाटातील बससेवा बंद आहे. यामुळे एस.टी.चे दैनंदिन सुमारे ६०-७० लाखांचे नुकसान होत
आहे. खरंतर पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्याची पर्यटकांची इच्छा बंदी घालून
थांबवता येईल असे नाही. त्यापेक्षा सुरक्षित आणि नियोजित सुविधा उपलब्ध करून देणे
आवश्यक आहे. नियंत्रित प्रवेश क्षमता, प्रशिक्षित मार्गदर्शक,
सुरक्षित दर्शन मंच, ट्रेकिंग मार्ग, सीसीटीव्ही देखरेख, बचाव पथके, आपत्कालीन सुविधा, पर्यावरण जनजागृती असे प्रयत्न
करायला हवेत. यातून पर्यटकांना सुरक्षित अनुभव, जैवविविधता
संवर्धन आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे वाटते.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पानवल धबधबा, निवळी धबधबा, भाट्ये बीच, आरेवारे आणि गणपतीपुळे समुद्रकिनारा या ठिकाणी प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रशासनाने योग्य त्या सुरक्षा अटींसह सुरू ठेवला आहे. राजापूरच्या मौजे चुनाकोळवण येथील प्रसिद्ध सवतकडा धबधबाही सुरु आहे. तेथे अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून धबधब्याकडे जाणारी पायवाट रुंद करणे, बांबूचे रेलिंग उभारणे अशी पर्यटकांच्या सुरक्षेची कामे केली आहेत. सवतसडा धबधबा (चिपळूण) कोसळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून हा धबधबा सुरक्षित अंतरावरून पाहता येतो. मात्र पाण्याच्या मुख्य प्रवाहात जाण्यास बंदी आहे. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा मार्लेश्वर धबधबा (संगमेश्वर) धबधबा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मुख्य गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचा जोर वाढल्यास तात्पुरती रोख लावली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींच्या मदतीने धबधब्यांवर चांगल्या सुविधा दिल्या आहेत, त्यामुळे येथे सुरक्षित पर्यटन सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा आणि तेथे उभारण्यात
आलेला महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज (काचेचा पूल) पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण
ठरत आहे. धबधब्याच्या फेसाळत्या प्रवाहावरून काचेच्या पुलावर चालण्याचा हा
सुरक्षित थरार अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. कणकवली जवळचा सावडाव धबधबा हा
या हंगामातील सर्वात सुरक्षित धबधबा ठरला आहे. येथे ग्रामपंचायतीने पर्यटकांसाठी
लोखंडी रॅम्प, पायऱ्या, उत्तम रस्ते
आणि प्रसाधनगृहांची उत्तम सोय केली आहे. ज्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार मिळत
आहे. आंबोली मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. घाटात दाट धुके असल्याने केवळ
दिवसाच्या वेळी येथे पर्यटकांना थांबण्याची परवानगी दिली जात आहे. हुल्लडबाजी
करणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांचा कडक वॉच आहे. दहिबावचा मायनी धबधबा पर्यटकांना साद
घालतो आहे. संभाव्य सागरी धोके लक्षात घेता महाराष्ट्र सागरी मंडळाने कोकणातील
किनारपट्टीवरील सर्व प्रकारच्या व्यावसायिक जलक्रीडा आणि बोटिंगवर ३१ ऑगस्ट २०२६
पर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याची परवानगी
असली तरी खोल पाण्यात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
उत्तर कोकणातील रायगड जिल्हा हा ट्रेकर्स आणि पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता रायगड जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. माणगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट, कुंभे धबधबा आणि सिक्रेट पॉईंट या चार प्रमुख ठिकाणी अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने थेट ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. या पर्यटन स्थळांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये हुल्लडबाजी करणे, धोकादायक सेल्फी काढणे, पाण्यात उतरणे आणि मद्यपान करणे यावर पूर्णपणे कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महादरवाजा परिसरात दरड कोसळल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ले रायगडाचा चित्तदरवाजा आणि नाणेदरवाजा पायरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता. सध्या गडावर जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची तपासणी करूनच पर्यटकांना मर्यादित स्वरूपात परवानगी दिली जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोरबे धरण, कुंडी नदीपात्र, धरनोळी नदीपात्र, चिंध्रण, शांतिवन नदीपात्र, माची प्रबळ आदी मुख्य धबधब्यांच्या १ किलोमीटर परिसरात ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. अनेक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावण्यात आलेले आहेत. तर बंदी न घालता ठराविक निर्बंध घालण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.
जुलैच्या पहिल्या
आठवड्यात रायगड जिल्ह्यात पाच दिवसात सरासरी १२०० मिमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील
जवळपास धबधबे प्रवाहित झाले आहेत. नुकतीच रायगडच्या झेनिथ धबधब्यावर अचानक
पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सुमारे १०० पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. यावेळी
विहारी आणि ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून दोरखंडाच्या
साहाय्याने या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर प्रशासनाने
स्थानिक तरुणांची 'आपत्ती व्यवस्थापन रक्षक' म्हणून नेमणूक केली असून, त्यांच्या माध्यमातून
पर्यटकांना मार्गदर्शन केले जात आहे. मुरुड-जंजिरा नजीकचे खरआंबोळी, गारंबी, चिचघर, नागशेठ धबधबे
प्रवाहित झाले आहेत. पांडवकडा धबधबा नवी मुंबई परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने तेथे
जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. २०१४ मध्ये पांडवकडा परिसरात पर्यावरण प्रकल्प
सुरु होणार होता. संरक्षक भिंत, तिकीट खिडकी, कपडे बदलण्याच्या खोल्या यांचे काम सुरु झाले होते. मात्र हा प्रकल्प
अर्धवट थांबला हे पर्यटनासाठी मारक आहे.
मुंबईच्या
वेशीवर असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विकेंडला लाखो चाकरमानी पावसाळी
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निसर्ग सौंदर्य
बहरले असून, प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी आणि
सुरक्षेसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मालशेज घाट, टिटवाळा जवळील परिसर आणि शहापूर तालुक्यातील धबधबे सध्या पर्यटकांनी
गजबजले आहेत. मात्र, घाटातील दाट धुके आणि दरडींचा धोका
लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी रात्रीची वाहतूक मर्यादित केली आहे. मुख्य
धबधब्यांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पर्यटकांना
सुरक्षित अंतरावरूनच निसर्गाचा आनंद घेता येत आहे. कोंडेश्वर आणि भगीरथ धबधबा
(बदलापूर / वांगणी) येथे दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रवेशबंदी
लागू केली आहे. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू
आणि तलासरी भागाला सध्या हवामान विभागाने 'अलर्ट' जारी केला आहे. येथे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जव्हारचे दाभोसा आणि
काळमांडवी धबधबे ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्हा प्रशासनाने धबधब्यांच्या परिसरात
सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यटन मार्गदर्शक
म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे या बंदीच्या वातावरणातही ग्रामीण
अर्थव्यवस्थेला सकारात्मक गती मिळण्याची आशा आहे. दाभोसा आणि काळमांडवी धबधबा
(जव्हार, पालघर) स्थानिक आदिवासी गाईड्सच्या मदतीने
पर्यटकांना दूरवरून निसर्ग पाहण्याची परवानगी आहे. चिंचोटी धबधबा (वसई) अतिशय धोकादायक
बनल्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
कोकणातील
अनेक पावसाळी पर्यटनस्थळी सध्या धबधब्यांच्या कड्यावर किंवा पाण्याच्या
प्रवाहाच्या मध्यभागी उभे राहून सेल्फी घेण्यास कायदेशीर गुन्हा घोषित करण्यात आले
आहे. धबधब्यांच्या परिसरात दारू पिणे, काचेच्या
बाटल्या टाकणे किंवा डीजे वाजवणे यावर कडक निर्बंध आहेत. संध्याकाळी उशीरा व
रात्री कोणत्याही धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना थांबण्याची परवानगी नाही.
कोकणातील पावसाळी पर्यटनावर असणारे निर्बंध हे पर्यटकांच्या आनंदावर विरजण
घालण्यासाठी नसून, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी
असल्याचे प्रशासन सांगत आहे. याही स्थितीत रत्नागिरीचा सवतसडा, सिंधुदुर्गचा सावडाव, पालघरमधील जव्हारचा आदी विविध
ठिकाणाचा परिसर पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. शनिवार-रविवार आणि
सुट्ट्यांच्या काळात कोकणात अनेक पावसाळी पर्यटन स्थळांवर गर्दीचे उच्चांक मोडले
जातात. वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंग, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, बेफिकीर कचराबाजी, हलगर्जीतून होणारे पर्यटकांचे
अपघात, वादावादी अशातून ‘पावसाळी पर्यटनबंदी’ होणार नाही,
याची सर्वानीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
धीरज
वाटेकर
















-7.jpg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87.jpeg)


.jpg)



.jpeg)




.jpg)