शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

नाथमंत्र ‘पुष्पांजली’ संकलनकर्त्यांना श्रद्धांजली !

महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त वरिष्ठ तहसिलदार, महाराष्ट्र नाथजोगी गोसावी समाज मुंबई यांच्या कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून काम केलेले सुदन दाजी जाधव यांचे नुकतेच (४ जानेवारी) ८६व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य आज (१६ जानेवारी) सकाळी ११ वाजता पोलादपूर येथील निवासस्थानी होत आहे. आपल्या कार्यकाळात शासनाच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर कार्यरत राहिलेल्या, नाथमंत्र ‘पुष्पांजली’चे संकलन करणाऱ्या जाधव यांना वाहिलेली ही श्रद्धांजली!

आमच्या सासऱ्यांचे (अरुण दाजी जाधव) सख्खे भाऊ असलेल्या सुदन जाधव यांची आणि आमची ओळख विवाहादरम्यानची, २००९सालची! आमच्या विवाहाला ते सपत्नीक उपस्थित होते. सप्टेंबर २०११ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हा ‘पोरका करून गेलीस मजला, जगी माझे नसे कुणी’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. या व्यक्तिमत्त्वाशी विवाहात झालेला प्राथमिक परिचय पुढे अधिक समृद्ध होत गेला. कित्येकदा भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी विविध विषयावर संभाषण व्हायचे. हे ते दिवस होते जेव्हा जाधव यांनी ‘नाथमंत्र पुष्पांजली’चं संकलन प्रसिद्ध करण्याचे मनावर घेतले होते. या अनुषंगिक विषयावर अनेकदा चर्चा झाली. या संकलनात त्यांच्या आई स्व. कृष्णाबाई दाजी जाधव यांचा मोठा सहभाग राहिलेला. ‘पुस्तके’ हा आमचा बालपणापासूनचा ‘वीक पॉईन्ट’. जाधव हे नाथ संप्रदायातील आणि त्यातही आपल्या नाथजोगी समाजातील प्रथा-परंपरा यांचे संकलन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आलेले. असे छोटे-मोठे दस्तऐवज हे कोणत्याही मुलभूत संशोधनासाठी सहाय्यभूत ‘लिखित साधने’ म्हणून महत्त्वाचे असतात. त्यामुळे आम्हाला जाधव यांच्या या संकलनाबाबत उत्सुकता होती.

जून २०१३ साली ही पुस्तिका प्रकाशित झाली. जाधव यांनी समाज बांधवांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेली ही पुस्तिका आम्हालाही मिळाली. २०१४ साली आमच्या भावाच्या लग्नाला जाधव मुंबईहून बसचा प्रवास करून चिपळूणला आले. तेव्हाही त्या गडबडीत विविध गप्पा झालेल्या. पुढे काही वर्षे गप्पांचा हा सिलसिला सुरु राहिला. ते सारे संवाद आमच्या ‘मनी’ स्मरणबद्ध आहेत. आपला समाज अजूनही मागे आहे. नाथांनी दिलेले वाङ्मय आपण विसरत चाललो आहोत. कोकणात नाथपंथाचा प्रसार फारच थोडा झालेला आहे. असे जाधव म्हणायचे. नाथमंत्र हे नाथ संप्रदायातील शक्तिशाली सिद्ध मंत्र आहेत. या मंत्रांचा उपयोग प्राणायाम, ध्यान आणि कठोर साधनेत केला जातो. नाथांनी सार्वजनिक लोकवाणीला महत्व दिल्यामुळे भारताच्या प्रत्येक भागात आजही नाथपंथाचा प्रभाव दिसून येतो. या प्रभावाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी आपणही योगदान द्यायला हवे, हा संदेश जाधव यांनी आपल्या संकलनातून दिलेला आहे.

‘जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून नाही तर त्याने जगाला काय दिलं या बद्दल त्याचा सन्मान होत असतो’ हे कॅल्व्हिन कूलिज यांचे उद्बोधन आपल्या पुस्तिकेच्या सुरुवातीला उपयोजिलेल्या जाधव यांची दृष्टी स्वच्छ होती. विचारपूर्वक त्यांनी ही पुस्तिका संकलित केली. एका चांगल्या आणि आवश्यक पुस्तिकेचे संकलनकर्ते म्हणून ते आमच्या सदैव स्मरणात राहतील.

 

भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचास...