कोकणच्या जल, जंगल आणि संस्कृती रक्षणाचा नवा एल्गार
स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेला कोकण प्रांत सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. अनिर्बंध रिअल इस्टेट विकास, खाणकाम (मायनिंग) आणि विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील तरुण आणि पर्यावरणप्रेमींना जागे करण्यासाठी 'कोकणी रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे आणि त्यांच्या 'राखणदार टीम'ने नुकतीच मृग नक्षत्रात (जून २०२६) एका ऐतिहासिक 'राखणदार पदयात्रेची' सुरुवात केली. या यात्रेचा पहिला टप्पा कणकुंबी ते बांदा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु आहे. ही पदयात्रा केवळ एक आंदोलन नसून कोकणची संस्कृती आणि निसर्ग वाचवण्याची जनचळवळ बनण्याची आवश्यकता आहे.
कोकणी संस्कृतीत 'राखणदार' म्हणजे गावाचा, वनाचा किंवा स्थानाचा अदृश्य रक्षक देव जो संकटसमयी धावून येतो. आजच्या काळात जेव्हा कोकणची जमीन परप्रांतीय आणि मोठ्या कंपन्यांच्या विळख्यात सापडत आहे, तेव्हा "कोकणचे खरे राखणदार हे येथील स्थानिक लोकच आहेत" हा विचार घेऊन ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या संवेदनशील पश्चिम घाट (Western Ghats) क्षेत्रात या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा पहिला टप्पा अतिशय दुर्गम आणि महत्त्वपूर्ण जलस्रोतांच्या भागातून आखण्यात आला. यात्रेची सुरुवात गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून झाली. हा भाग महादयी नदी आणि इतर अनेक जलस्रोतांचे उगमस्थान आहे. या राखणदार पदयात्रेची सुरुवात केरी गावातील आजोबांच्या तळीतील पवित्र जल, तीर्थ म्हणून सोबत घेत, कणकुंबी मंदिरात नारळ ठेऊन करून केली गेली. या प्रवासासाठी गावातील तरुण मंडळी, शालेय विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्या सहभागामुळे उद्याच्या पिढीकडून निसर्गसंवर्धनाची आशा अधिक दृढ झाली. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर आपल्या जल, जंगल आणि जमिनीबद्दल संवेदनशील असलेल्या प्रत्येक मनाचा एक हुंकार आहे. आपल्या मातीचे, देवराईंचे आणि आपल्या अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या राखणदाराचे रक्षण करण्याचा हा एक सामूहिक संकल्प आहे. जे आपले आहे, जे आपल्या पूर्वजांनी जपले आहे, ते जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास आम्ही तयार आहोत.
ही यात्रा केरी, कारापूर, आणि दोडामार्ग सीमावर्ती भागातून पुढे सरकली. तिथून भेडशी, सातली आणि कुडसे गावांना भेटी देत थेट तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश केला. शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि विळवडे मार्गे जात सोनुर्ली येथील ऐतिहासिक श्री देवी माऊली मंदिरामध्ये या चार दिवसीय यात्रेची सांगता झाली. कोकणातील वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांचे पाणी विषारी होत चालले आहे (उदा. लोटे एमआयडीसीमुळे वाशिष्टी नदीची झालेली दुरवस्था). यामुळे मासेमारी आणि स्थानिक लोकांचे रोजगार धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ही पदयात्रा नद्या, पाण्याचे झरे आणि जंगले वाचवण्यासाठी स्थानिकांना संघटित करत आहे. कोकणात हजारो वर्षांपासून 'देवराई' (देवांसाठी सोडलेले पवित्र जंगल) जपण्याची परंपरा आहे. या देवराया म्हणजेच नैसर्गिक जैवविविधतेचे केंद्र आहेत. या यात्रेदरम्यान तरुण पिढीला या निसर्गपूजक परंपरांची आणि सातेरी संस्कृतीची जाणीव करून दिली जात आहे. कोकणच्या पर्यावरणाला आणि पारंपरिक उपजीविकेला नख लावणाऱ्या खनिज प्रकल्पांना (मायनिंग) आणि अनिर्बंध रिअल इस्टेटच्या नावाखाली होणाऱ्या जमिनींच्या बळकावणीला विरोध करणे हा या यात्रेचा मुख्य अजेंडा आहे. या पदयात्रेत गोव्यातील 'Enough is Enough' आणि 'Goyant Kollso Naka' पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते फ्रान्सिस कोएल्हो, पर्यावरण अभ्यासक सत्यजीत चव्हाण, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव छायाचित्रकार सोमेश काणेकर, दिग्दर्शक विनायक कोळवणकर आदींसह तिन्ही राज्यांतील स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'रानमाणूस' प्रसाद गावडे यांच्या साध्या आणि प्रभावी संवादशैलीमुळे गावोगावी लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. "आम्ही निसर्गाचा केवळ वापर करत नाही, तर आम्ही निसर्गाचे अपत्य आहोत," हा या चळवळीचा मूळ मंत्र आहे.
पूर्वी कोकणात, गावातला कुणीही अतिरेक करू लागला की त्याला भीती कुठल्या गोष्टीची घातली जायची? तर गावच्या मुंजोबाची, ग्रामदेवाची किंवा देवीची किंवा वनदेवाची. कितीही भाबडेपणा असला तरी तो एक श्रद्धेचा आणि सामाजीक सुरक्षितता राखण्याचा एक भाग होता. आता तीच वेळ आलेली आहे. राज्य वा केंद्र सरकार पर्यावरण आणि निसर्गाबाबत भयंकर विचार करताना दिसत आहेत. गावच्या लोकांची, निसर्गाची इथल्या प्रकृतीची त्यांना अडचण होऊ लागलीय असे वाटावे अशी स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली सर्वत्र मिळणाऱ्या टक्केवारीने देश, देशाची जमीन विकून ढेकरा द्यायची हाव ओसंडून वाहू लागलीय. कोकणात जे लोक जीव तोडून इथल्या जमिनीला, लोकांना, पर्यावरणाला वाचवू पाहतायत. विकास शाश्वत आणि निसर्गाला हानी न पोहचवता होऊ शकतो हे दाखवतायत दुर्दैवाने त्यांना मात्र इथला मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियाही जवळपास ठेंगा दाखवत आहे. ‘राखणदार’ नावाने सामान्य लोकांच्या भावनेला हाताशी धरून एका उदात्त कामासाठी ही यात्रा सुरु आहे. पर्यावरण वाचवणे, पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प हाणून पाडणे, निर्णयप्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा निर्णय अंतिम असावा, शाश्वत विकासाबद्दल जनजागृती करणे ह्या आणि अश्या अनेक गोष्टी प्रसाद गावडे आणि मंडळी कित्येक वर्षे करताहेत. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगातही कोकणातील राखणदारांची संकल्पना टिकून आहे. शहरात राहणारे कोकणातील लोकही आपल्या मूळ गावाशी आणि वाडीच्या राखणदाराशी भावनिकरित्या जोडलेले असतात. सणावाराला किंवा महत्त्वाच्या कामाला ते आवर्जून आपल्या वाडीतील राखणदाराचं स्मरण करतात. तरीही, काही ठिकाणी या श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली टीकेचे धनी होतात. पण कोकणातील लोकांसाठी हा केवळ अंधविश्वास नसून, तो त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा, निसर्गाशी असलेल्या त्यांच्या आत्मिक नात्याचा आणि पूर्वजांबद्दलच्या आदराचा एक भाग आहे. कोकणातील राखणदार ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती कोकणच्या मातीतील लोकांच्या श्रद्धेचं आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना आधार देते, भयमुक्त ठेवते आणि एकत्र बांधून ठेवते.
कोकणाच्या मातीत 'राखणदार' नावाची एक अदृश्य पण तितकीच शक्तिशाली संकल्पना खोलवर रुजलेली आहे. 'राखणदार' म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, राखणदार म्हणजे आपल्या घराची, वाडीची, शेतीची, अगदी संपूर्ण गावाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती किंवा ग्रामदेवता. ते अनेकदा आपल्या पूर्वजांचे आत्मे किंवा विशिष्ट नैसर्गिक शक्तींशी जोडलेले असतात. कोकणातील प्रत्येक वाडी किंवा घरामागे एक संरक्षक शक्ती उभी असते, असे मानले जाते आणि हीच शक्ती 'राखणदार' म्हणून ओळखली जाते. या राखणदारांचं कोणतंही विशिष्ट रूप नसतं. ते कधी झाडाच्या रूपात (उदा. पवित्र वड, पिंपळ, आंबा), कधी दगडाच्या रूपात, तर कधी केवळ एका अदृश्य अस्तित्वाच्या रूपात असतात. काही ठिकाणी त्यांना 'वनदेवता', 'क्षेत्रपाल' किंवा 'गावदेवी' च्या रूपातही पूजले जाते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या क्षेत्राचं दुष्ट शक्तींपासून, वाईट नजरेपासून आणि संकटांपासून रक्षण करणं. घरात शांतता, समृद्धी आणि आरोग्य राखण्यासाठी ते मदत करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. कोकणातील लोक या राखणदारांवर निस्सीम श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्याशी संबंधित अनेक परंपरा आजही जपल्या जातात. जेव्हा एखाद्या घरात नवीन कार्य सुरू होतं, नवजात बाळ जन्माला येतं, किंवा एखादं संकट दूर होतं, तेव्हा राखणदारांना नारळ किंवा कोंबड्याचा नैवेद्य दाखवला जातो. नवस फेडताना अनेकदा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आजही काही ठिकाणी पाळली जाते. घरातून बाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना राखणदारांना मनोमन प्रार्थना करून आशीर्वाद मागितले जातात. "राखणदार पाठीशी राहा!" असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. राखणदारांच्या काही अदृश्य नियमांचं पालन न केल्यास वाईट गोष्टी घडतात अशीही एक भीती काही लोकांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा असतो. कोकणातील अनेक वाड्यांमध्ये राखणदारांसाठी विशिष्ट जागा किंवा लहानशी देवडी असते. इथे नियमितपणे दिवे लावले जातात, धूप जाळला जातो आणि स्वच्छता राखली जाते.
राखणदार पदयात्रा ही कोकणातील जंगल, पाणी, जैवविविधता, पारंपरिक देवऱ्या आणि स्थानिक संस्कृती यांच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली जनजागृती यात्रा आहे. या यात्रेचा उद्देश गावागावांतील लोकांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटवून देणे आणि स्थानिक समुदायांना निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी करणे हा आहे. या पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला गेला. गावातील पारंपरिक सण, देवऱ्या, जलस्रोत, जंगलांशी निगडित श्रद्धा, जैवविविधता आणि पर्यावरणीय आव्हाने यांची माहिती संकलित केली. तसेच स्थानिक लोकांच्या अनुभवांमधून निसर्गरक्षणाच्या पारंपरिक पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. राखणदार पदयात्रा ही केवळ चालण्याची यात्रा नसून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे. जंगल, पाणी, माती आणि जैवविविधता यांचे संरक्षण हे आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून दिला जातो. “आपल्या भूमी, पाणी, जंगल आणि संस्कृतीचे खरे राखणदार आपणच आहोत” ही भावना जागृत करून स्थानिक समाजाच्या सहभागातून शाश्वत भविष्यासाठी एक व्यापक चळवळ उभारणे हे राखणदार पदयात्रेचे प्रमुख ध्येय आहे.
कोकणचा विकास पर्यावरणाचा नाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून होत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. जर आजचा कोकणी माणूस एकत्र आला नाही, तर येणारा काळ या भूमीसाठी कठीण असेल. कोकणी जनतेला याबाबत पुरेसे अवगत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून, ही राखणदार पदयात्रा प्रत्येक कोकणवासीयाला स्वतःच्या मातीचा 'राखणदार' बनण्याचे आवाहन करते आहे.
dheerajwatekar@gmail.com
-7.jpg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)