गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

शिवपूर्वकालीन दक्षिणाभिमुख "गणेशगुळे"


रत्नागिरीच्या दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर शिवपूर्वकालीन श्रीलंबोदराचे स्थान आहे. दर्यावर्दी गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे स्थान सागरकिनारी वसलेल्या निसर्गसंपन्न गणेशगुळे या गावी आहे. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ या जुन्या म्हणीमुळे अनेक अख्यायिकाही आहेत. हे ठिकाण पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असून स्वामींची या स्थानावर अढळ श्रद्धा होती.

पौराणिक कथेनुसार लंबासुराचा वध करण्यासाठी अवतरलेले लंबोदर हे गणपतीपुळे येथे युद्ध करीत असताना लंबासुर गणेशगुळे येथे पळाला. तेथेही लंबोदराने त्यास गाठले. आपले प्राण वाचविण्यासाठी लंबासुर मध्य प्रदेशातील ॐकार ममलेश्वर येथे आला व त्याने नर्मदेत उडी मारली. लंबोदराने शिवाची उपासना करून लंबासुर वधासाठी आवश्यक त्रिशूळ शिवाकडून प्राप्त करून घेतले. लंबासुराचा वध केला. तेव्हापासून गणशगुळे, गणपतीपुळे व ॐकारेश्वर (मध्यप्रदेश) येथील पंचसोंडय़ा गणपती ‘लंबोदर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण गणेशभक्त पोटशूळाच्या विकाराने आजारी पडले. आजार असह्य झाल्याने गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. जीवघेण्या वेदनांमध्येही त्यांची निरपेक्ष करुणायुक्त उपासना सुरूच होती. यातूनच त्यांना श्रीगणेशाची ध्यानावस्था प्राप्त झाली. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, ‘तू व्याधीमुक्त होशील. माझे येथे अवशेषात्मक वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर बांध. या कामी तुला सातारचे शाहू महाराज मदत करतील.’ येणेप्रमाणे शाहू महाराजांनाही दृष्टांत होऊन त्यांचा जासूस आर्थिक मदतीसह गणेशगुळे येथे पोहोचला. यातूनच या मंदिराची उभारणी झाली. चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. त्यातून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला. 

या काळात दु:खी व पीडित लोक मोठय़ा प्रमाणावर श्रीगणेशाची उपासना करू लागले. गणपतीच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडे. परंतु नंतर एके दिवशी ‘शिवाशिवीमुळं’ हे झिरपणारे पाणी बंद पडले. त्याच दिवशी गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळे येथे स्थलांतर केले, अशी आख्यायिका सांगतात. स्थलांतरादरम्यान गणेशपावलांचे ठसे पावस मार्गावरील डोंगरात दिसतात, असे म्हणतात.
 स्थानिक भंडारी समाजाचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून समुद्रप्रवासापूर्वीच्या त्यांच्या विधीवत पूजनातून ‘गलबतवाल्यांचा गणपती’ अशी एक ओळख या ठिकाणाला मिळाली.

हे मंदिर जांभ्या दगडात बांधलेले असून चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर ४० फूट उंचीचा आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी २ द्वारे आहेत. या दोनही दालनांना जोडणारी १२ फूट उंचीची शिळा म्हणजेच श्रीगणेश असे मानले जाते. संपूर्ण डोंगर गणेशमय झाला आहे. अनेक गणेशभक्तांना या ठिकाणी श्रीगणेश साक्षात्कार झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे तीन दिवसांचा उत्सव साजरा होतो. माघी गणेशोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराचे आवार निसर्गरम्य असून येथे ७० फूट खोल विहीर आहे. पश्चिमेस पसरलेला अथांग सागर अन् अनेक ठिकाणी खाडीच्या स्वरूपात जमिनीत शिरलेली समुद्राचे पाणी यातून जाणवणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे दिसते.

धीरज वाटेकर


  दैनिक लोकसत्ता (मुंबई वृत्तांत) शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०





रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

सर्वसमावेशक स्वातंत्र्याच्या शोधात...


सार्वभौम भारताचा आज ७० वा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्याचे महत्व समजण्यासाठी कधीतरी “गुलाम” असावे लागते. ते गुलामीचे जीणे जगलेली पिढी आज कार्यरत नसल्याने आणि उरलेल्या आम्हा सर्वांना गुलामी माहिती नसल्याने दिवसागणिक स्वातंत्र्याचे महत्व कमी होते आहे की काय? अशी स्थिती सध्याच्या सुट्टीच्या मानसिकतेने निर्माण केली आहे. अर्थात दुसऱ्या बाजूने आजची तरुणाई सर्वसमावेशक भारतीय स्वातंत्र्याचा शोध घेत असल्याचेही दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा झालेला उदय याचेच द्योतक आहे. खरेतर स्वातंत्र्याच्या बीजांचा आज वटवृक्ष व्हायला हवा होता. परंतु गत ७० वर्षांत आम्हाला वटवृक्षमय सर्वसमावेशक विकास साधता आलेला नाही. म्हणूनच मोठ्या विश्वासाने तरुणांनी भारतीय राजकारणाला वळण दिले आहे. तो विश्वास जपत आगामी काळात सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने कार्यरत राहिल्यास आपण “अतुल्य भारत” साकारू शकू.
भारताला स्वातंत्र्य ७० वर्षांपूर्वीच मिळालंय. पण मिळालंय म्हणजे नक्की कुणाला मिळालंय ? ज्यांना आजही स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्यांना ते कधी मिळणार ? ज्यांना मिळालं नाही आणि ज्यांना मिळालंय ते कोण आहेत ? अशा अनेक अंगाने भारतीय स्वातंत्र्याचा विचार व्हायला हवा. जेव्हा जेव्हा देशात महिलांवरील सामूहिक अत्याचार - बलात्काराची घटना घडते तेव्हा तेव्हा अनेक संवेदनशील मने या देशाबद्दल, देशाच्या आत्मियतेबद्दल विचार करू लागतात. अनेकदा हा देश आपला नसावा, या भावना बळावतात. या देशात नियमित दंगली होत असतात. दुर्दैवी दलित अत्याचार, पुतळा विटंबना, विविध पुरस्कार वापसी या घटना तर ठराविक अंतराने घडतातच. भावनेची किंमत मोजून मानवी मतांच्या स्वातंत्र्याचा लिलाव देशात या काळात बहरतो हा इतिहास आहे. कोकणात तर अगदी शुल्लक अपवाद वगळता शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. त्याला कारणेही तशीच आहेत. परंतु  इतरत्र या देशातील शेतकरी आत्महत्या करतात, परंतु व्यापारी कधी आत्महत्या री नाही. या देशातील गिरणी कामगार देशोधडीला लागले पण गिरणीमालक मात्र गब्बर झाले. शाळेत असताना भारत माता की जयम्हणताना रक्त सळसळायचं, स्फूर्ती यायची, प्रचंड अभिमान वाटायचा आजही वाटतो. परंतु या देशात जातीवर आधारित समाजव्यवस्था अस्तित्वात असल्याचं कळायला लागल्यापासून देश या संकल्पनेला तडा जाऊ लागलाय. देशाची घटना, त्यातून निर्माण होऊ शकणारी लोकशाही, प्रजासत्ताक संकल्पनेतून घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात लंच नाही. यास्तव, आज या देशातील सार्वत्रिक समाजमन कशाचाही विचार न करता मृतमय जीवन जगत प्रत्येक विशेष स्मरण दिन हा सुट्टी दिन म्हणून घालवतो आहे.
देशभर सगळीकडे थोड्या फार फरकाने चाकोरीबद्ध पद्धतीने आपण  स्वातंत्र्यदिन साजरा करतो आहोत. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतले आम्ही एक स्वतंत्र नागरिक होत म्हणजे नक्की काय ? जे काम करण्यासाठी मला पगार दिला जातो, ते करण्यासाठी नागरिकांकडून मनाला येइल तेवढं 'चहापाणी' घेणे म्हणजे स्वातंत्र्य ? रहदारीचे नियम माहित असूनही ते पाळणे म्हणजे स्वातंत्र्य ? जमल्यास वर्षातले दोन दिवस देशाच्या नावाने सोडून बाकीचे सारे दिवस गावभर वाट्टेल तिथे मावा, गुटखा खा थुंकणे म्हणजे स्वातंत्र्य ?  रोज संध्याकाळी नाक्यावर बसून आमच्या माताभगिनींची, त्यांनी आत्महत्या करेपर्यंत छेड काढणे म्हणजे स्वातंत्र्य ? हजारो जीवांचे मोल देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कमावलेल्या गडकिल्ल्यांच्या दौलतीवर दारू सिगरेट पिणे म्हणजे स्वातंत्र्य ? बायकांनी नोकरी व्यवसायाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी दारू सिगरेट पिण्यातही पुरुषांची बरोबरी करणे म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य ? सामाजिक ऐक्यासाठी सुरु केल्या गेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे म्हणजे स्वातंत्र्य ? अर्थात आपल्या मनाला येईल तसं वागणं म्हणजे स्वातंत्र्य, असे आजकाल काहीसे दिसते आहे. आजच्या आणि पुढच्या पिढीकडून पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु आपण आज आजूबाजूला पाहतो तेव्हा 'स्वातंत्र्य आणि स्वैराचार' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे माहित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. माझे स्वातंत्र्य हे  माझा स्वैराचार होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी. कारण असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर आपणाला स्वराज्य तर मिळालेय  परंतु सुराज्य येण्याकरिता ते गरजेचे आहे .

आजची पिढी म्हणजे नुसताधिंगाणा, कशाची काही पडली नाही आहे, सदैव  मोबाइल आणि इंटरनेट, ना कशाची काळजी, ना  जबाबदारी असे मागच्या पिढीचे एक सामुदायिक मत आहे. काही अंशी ते खरेही आहे. राष्ट्राभिमानाच्या कल्पना वेगळ्या असतील परंतु त्या आजच्या तरुण पिढीला राष्ट्राभिमानी भावनेपासून दूर लोटता येणार नाही. काळाप्रमाणे व्यवस्था बदलतात परंतु हा सारा बदल चुकीचा असतो से नाही. देशाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आजची पिढी मागच्या पिढीइतकी आक्रमक नाही, पण आक्रमकता हेच केवळ  राष्ट्राभिमानाचे प्रमाण असू शकत नाही. तेव्हाचे राजकारणी आणि आजचे राजकारणी यां जसा फरक तसाच तेव्हाच्या राष्ट्राभिमानात आणि आजच्या राष्ट्राभिमानात फरक फरक पडत गेला आहे.  आज १५ ऑगस्टचा “स्वातंत्र्योत्सवआपल्या परीने साजरा करण्याचे अनेकांनी मार्ग शोधलेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या सुट्टीचं हे वास्तव आहे की अनेकजण त्या दिवशी उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडतात आणि संपूर्ण दिवस इतर सुट्टीप्रमाणे घालवतात. एकमेकांना १५ ऑगस्टचे छान-छानमेसेजेसपास करतात. फेसबूकवर राष्ट्रप्रेमाचे संदेश, फोटो अपलोड करतात. ज्या मातीत, देशात आपण लहानाचे मोठे झालो, वाढलो, बहरलो, त्या देशाचं आपण काही देणं लागतो ही भावना निर्माण करायला आपली व्यवस्था कमी पडते आहे. देशासाठी आयुष्य वाहिलेल्यांना खरी श्रद्धाजली देण्यासाठी त्यांच्यासारखे जीवन जगण्याची तयारी ठेवावी लागले. कदाचित हे विधान अतिशयोक्ती वाटेल परंतु, सातत्यानं केलेली एखादी छोटी गोष्ट मोठं ध्येय गाठण्यात यशस्वी ठरत असते. या दिवशी आपण अनेक गोष्टी करू शकतो एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्याची माहिती करून घेणे, मुलांना, देशभक्तांची माहिती देणे, स्वातंत्र्य संग्रामावरील पुस्तक वाचन, स्वातंत्र्यानंतर भारत अनेक आव्हानांना कसे सामोरे  गेला याची माहिती करून घेणे, देशातील इस्त्रो, बीएआरसी, अशा संस्थांची माहिती करून घेणे आदि अनेकांचा समावेश होऊ शकेल. 

व्यक्तिश: आम्ही आजच्या स्वातन्त्र्यादिनाला, पहिल्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानातील कराची शहर अनुभवलेल्या दिवसांसह कोकणच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील ४१ वर्षांच्या सेवाकाळाचा जीवनप्रवास यशस्वी केलेल्या, महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चिपळूण येथील ८५ वर्षे वयाचे सेवानिवृत्त अपग्रेड़ मुख्याध्यापक मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजी यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध असलेल्या आम्ही लिहिलेल्या (धीरज वाटेकर) "प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी" या चरित्र ग्रंथाचे तरुणाईचे उपस्थितीत समारंभपूर्वक प्रकाशन करण्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यपूर्व काळ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्यांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक समजत नाही असे नेते या देशाने पाहिलेत.  देशातील सर्व सामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यानी स्वातंत्र्याचे रोपटे लावले आणि ते राजकारण्यांनी पोखरले अशी समाजाची भावना आहे. या पोखरण्यावर औषध नाही, सारे एका कंट्रोलच्या बाहेर गेले आहे. पूर्वी लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान असताना देशात एकेवर्षी दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना “देशात दुष्काळ पडला आहे आजपासून मी सायंकाळचे जेवण बंद करणार आहे” असे जाहीर केले त्यानंतर जनतेला आवाहन करण्याची गरज पडली नाही. मध्यंतरी माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विचारप्रवाहांचे लोक एकाच व्यासपीठावर आले, देशाने राजकीय सर्वसमावेशकता पाहिली. विकसनशील भारताच्या प्रयत्नात ही राजकीय सर्वसमावेशकता दिसायला हवी म्हणजे स्वातंत्र्यदिन समाजाला आपलासा वाटू लागेल. अर्थात आपला देश खरोखरच एक बलाढय राष्ट्र म्हणून जगासमोर येण्याचा असा काही प्रयत्न करताना दिसत असेल तर या देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. यात भारतीय संविधानाचे पालन, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे, आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढय़ास ज्यामुळे स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची जोपासना त्यांचे अनुसरण करणे, भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता उन्नत राखणे, धार्मिक, भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा वाढीला लावण्यासाठी कार्यरत राहाणे, आपल्या संमिश्र संस्कृती” या  समृद्ध वारशाचे जतन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण, सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, आपला देश सतत यशाच्या चढत्या श्रेणी प्राप्त करेल यासाठी सतत प्रयत्नशील राहाणे आदींचा समावेश आहे.

आज देशात स्वच्छ भारत अभियानआणिमेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान उंचावत आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटीआणिस्कील इंडियासारखे  देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) चालना देणारे उपक्रम आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरणारे  आहेत. त्यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, थेट परदेशी गुंतवणुकीस चालना मिळेल. ‘जन धन योजनाआणिबेटी बचाओ, बेटी पढाओसारख्या योजनाही समाजात बदल घडवून णू शकतात. संपूर्ण देशातील लोकांच्या मनात वरील योजनांमुळे अभिमानाची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे हे खरे असले तरी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करूनही ज्या गतीने या योजनांच्या घोषणा झाल्या, त्या गतीने त्यांची अंमलबजावणी झालेली नाहीअर्थात त्याकरिता वेळ द्यावा लागणार हे नक्की आहे. दुर्दैवाने वर्तमान काळातील मानवी समुदायाला टप्प्याटप्प्याने नाही तर तात्काळ फार मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. कितीही पद्धतशीर नियोजन आणि कार्यप्रणालीचे  योग्य व्यवस्थापन राबवूनही योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडथळ्यानी या देशाला गत ७०वर्षात ग्रासले आहे. वास्तविक कायदेमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी मनापासून हातात हात घालून काम केले तर या देशात मोठा बदल घडून येऊ शकतो, देशवासीयांची  तशीच अपेक्षा आहे. भारतानेच जगाला योग्य दिशा दाखवावी, हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. ते पुरे करण्यासाठी, गुंतवणूक, रोजगार, आर्थिक विकासाबरोबरच शांतता, प्रगती आणि मैत्री यांची शाश्वती देणारीवसुधैव कुटुंबकमही उक्ती सत्यात उतरविण्यासाठी चार स्तंभांचीच भूमिका महत्वाची आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्काच्या नावाने वैचारिक धोबीघाट तयार करून आपापली वैचारिक धुणी धुण्याचा प्रकार देशात नेहमीच सुरु असतो. या देशात राज्यघटनेने राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिलेल्यावंदे मातरम् सारख्या गीतालाही विरोध होतो. अशा अनेक घटना पाहाता, भारतात देशहितासाठी मोठे संघटित सामर्थ्य उभे करण्याची गरज राहणार आहे. लोकशाहीपद्धतीनेच अनेक प्रश्नांना सणसणीत उत्तरे द्यावी लागणार आहेत. ती उत्तरे देण्याची ताकद आजच्या तरुणाईत नक्की  आहे. फक्त “सर्वसमावेशक स्वातंत्र्याच्या शोधात...” असलेल्या या तरुणाईला तसा विश्वास देऊ केल्यास आपला सर्वांचा भारत आगामी काळात जगात “अतुल्य” बनेल.

धीरज वाटेकर, चिपळूण       

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...