गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

शिवपूर्वकालीन दक्षिणाभिमुख "गणेशगुळे"


रत्नागिरीच्या दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर शिवपूर्वकालीन श्रीलंबोदराचे स्थान आहे. दर्यावर्दी गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे स्थान सागरकिनारी वसलेल्या निसर्गसंपन्न गणेशगुळे या गावी आहे. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ या जुन्या म्हणीमुळे अनेक अख्यायिकाही आहेत. हे ठिकाण पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असून स्वामींची या स्थानावर अढळ श्रद्धा होती.

पौराणिक कथेनुसार लंबासुराचा वध करण्यासाठी अवतरलेले लंबोदर हे गणपतीपुळे येथे युद्ध करीत असताना लंबासुर गणेशगुळे येथे पळाला. तेथेही लंबोदराने त्यास गाठले. आपले प्राण वाचविण्यासाठी लंबासुर मध्य प्रदेशातील ॐकार ममलेश्वर येथे आला व त्याने नर्मदेत उडी मारली. लंबोदराने शिवाची उपासना करून लंबासुर वधासाठी आवश्यक त्रिशूळ शिवाकडून प्राप्त करून घेतले. लंबासुराचा वध केला. तेव्हापासून गणशगुळे, गणपतीपुळे व ॐकारेश्वर (मध्यप्रदेश) येथील पंचसोंडय़ा गणपती ‘लंबोदर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण गणेशभक्त पोटशूळाच्या विकाराने आजारी पडले. आजार असह्य झाल्याने गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. जीवघेण्या वेदनांमध्येही त्यांची निरपेक्ष करुणायुक्त उपासना सुरूच होती. यातूनच त्यांना श्रीगणेशाची ध्यानावस्था प्राप्त झाली. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, ‘तू व्याधीमुक्त होशील. माझे येथे अवशेषात्मक वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर बांध. या कामी तुला सातारचे शाहू महाराज मदत करतील.’ येणेप्रमाणे शाहू महाराजांनाही दृष्टांत होऊन त्यांचा जासूस आर्थिक मदतीसह गणेशगुळे येथे पोहोचला. यातूनच या मंदिराची उभारणी झाली. चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. त्यातून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला. 

या काळात दु:खी व पीडित लोक मोठय़ा प्रमाणावर श्रीगणेशाची उपासना करू लागले. गणपतीच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडे. परंतु नंतर एके दिवशी ‘शिवाशिवीमुळं’ हे झिरपणारे पाणी बंद पडले. त्याच दिवशी गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळे येथे स्थलांतर केले, अशी आख्यायिका सांगतात. स्थलांतरादरम्यान गणेशपावलांचे ठसे पावस मार्गावरील डोंगरात दिसतात, असे म्हणतात.
 स्थानिक भंडारी समाजाचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून समुद्रप्रवासापूर्वीच्या त्यांच्या विधीवत पूजनातून ‘गलबतवाल्यांचा गणपती’ अशी एक ओळख या ठिकाणाला मिळाली.

हे मंदिर जांभ्या दगडात बांधलेले असून चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर ४० फूट उंचीचा आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी २ द्वारे आहेत. या दोनही दालनांना जोडणारी १२ फूट उंचीची शिळा म्हणजेच श्रीगणेश असे मानले जाते. संपूर्ण डोंगर गणेशमय झाला आहे. अनेक गणेशभक्तांना या ठिकाणी श्रीगणेश साक्षात्कार झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे तीन दिवसांचा उत्सव साजरा होतो. माघी गणेशोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराचे आवार निसर्गरम्य असून येथे ७० फूट खोल विहीर आहे. पश्चिमेस पसरलेला अथांग सागर अन् अनेक ठिकाणी खाडीच्या स्वरूपात जमिनीत शिरलेली समुद्राचे पाणी यातून जाणवणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे दिसते.

धीरज वाटेकर


  दैनिक लोकसत्ता (मुंबई वृत्तांत) शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...