पन्नास
वर्षांपूर्वीच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावातील बोअरवेलची जन्मकथा मोठी
रंजक आहे. पाणी टंचाईने घेरलेल्या त्या गावात बोअरवेल मारण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व्हे
केला. पाण्याची जागा नक्की करून, अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी
एका आठवड्याच्या गुरूवारी खूण म्हणून चुना टाकलेला मोठाला दगड आणून ठेवला. ज्या वाडीत
ही बोअरवेल घ्यायची होती ती गावच्या मुख्य रस्त्यावर होती. गावचे ग्रामसेवक शनिवार-रविवारच्या
जोड सुट्टीत आपल्या मूळगावी गेलेले असतानाच बोअरवेल कॉन्ट्रॅक्टर बोअर पाडण्यासाठी
मूर्तवड्यात पोहोचले होते. दरम्यानच्या काळात त्या वाडीत लगोरीचा खेळ खेळणाऱ्या
लहानग्या मुलांनी सर्व्हे अधिकाऱ्यांनी चुना टाकून खूण केलेला मोठाला दगड आपल्या
खेळाचा भाग बनवला. मुलांनी तो दगड उचलून मुख्य रस्त्यालगत आणून ठेवला. वाडीतील मोकळ्या
जागेत चुना टाकलेला दगड ही बोअरवेलच्या जागेचे खूण याची जाणिव असलेल्या कॉन्ट्रक्टरने,
पूर्वीच्या सूचनेप्रमाणे सोमवारी पहाटे बोअरींग मारायला सुरूवात
केली. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी आपल्या कामावर रूजू होण्याकरिता ग्रामसेवक आले. पाहातात
तर बोअरवेलचे काम बरेच पुढे गेलेले आणि जागाही बदललेली! ग्रामसेवकांनी संबंधितांना
विचारणा केली. ‘जेथे पांढरा दगड ठेवलेला होता तेथे आम्ही बोअरींग मारायला सुरूवात
केली’, असे उत्तर संबंधित कॉन्ट्रक्टरने दिले. तोवर याठिकाणी
पाण्याचा चांगलाच उद्भव असल्याच्या अनुमानापर्यंत कॉन्ट्रक्टर पोहोचला होता.
बघताबघता रस्त्यानजीकच्या त्या चुकीच्या जागेवर पाणी लागले. नियोजनाप्रमाणे
पाण्याची उपलब्धी आणि बोअरींगची खोली पूर्ण झाल्यानंतर बोअरींग कॉन्ट्रक्टर निघून
गेले. रस्त्याशेजारी बोअरवेल मारल्याचे पाहून रस्ते विभागात काम करणाऱ्या
कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली. गावच्या पाण्याचा
स्त्रोत रस्त्याला आडवा येत असल्याची ती तक्रार होती. अर्थात या सर्व प्रकाराला ग्रामसेवकांना
जबाबदार धरण्यात आलं. प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्ते आणि बांधकाम विभागाने
मूर्तवडे ग्रामपंचायतीवर आणि ग्रामसेवकांवर केस टाकली. संपूर्ण गाव ग्रामसेवकांच्या
बाजूने उभा राहीला. त्यांचे वकीलपत्रही तालुक्यातील नामवंत वकिलांनी स्वीकारले. वर्षभर
ही केस चालली. अंतिम टप्प्यात ग्रामसेवकांच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तीवाद
केला, ‘जमीनीत ज्या ठिकाणी पाणी असते, तेथूनच
ते घ्यावे लागते. रस्ता कोठूनही प्रयत्न करून फिरवून नेता येऊ शकतो.’ या
युक्तीवादावर न्यायाधीशांचे मत अनुकूल बनले. केसचा निकाल ग्रामसेवकांच्या बाजूने लागला.
हा प्रसंग आम्ही २०१६ साली लिहून प्रकाशित केलेल्या ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ या पुस्तकात
नोंदवलेला आहे. ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ हे पुस्तक ८६वर्षे वयाचे सेवानिवृत्त ग्रामसेवक
दत्ताराम (आबा) महाडीक यांची ती जीवनकथा आहे. दुर्दैवाने असा न्याय गोदावरी किनारी
वसलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमी नाशिकच्या तपोवनात मागच्या दहा वर्षात जन्माला
आलेल्या आणि निसर्गत: वाढलेल्या झाडांना मिळाला नाही. उलट परिणामस्वरूप बीड जिल्ह्यातील
सह्याद्री देवराई जाळण्यात आल्याच्या आरोप समाजमाध्यमातून करत नागरिकांनी आपला रोष
व्यक्त केला. ही घटना प्रातिनिधिक असली तरी कोकणातही हेच सुरु आहे. तीन दिवसांच्या
प्रवासावरून परतताना वाटुळ (राजापूर) ते साखरपा (संगमेश्वर) दरम्यान रस्त्याशेजारी
ठिकठिकाणी वृक्षतोड केल्याचे दिसले. पोटतिडीकीने समाजमाध्यमात वृक्षतोडीची छायाचित्रे
प्रसूत केल्यावर एका ठिकाणी, ’...अशाप्रकारे झाडं तोडणं गरजेचे आहे. तोडलेल्या झाडांच्या
ठिकाणी पुन्हा नैसर्गिकरित्या झाडे आणि झुडपी जंगले चांगली तरारून उभी राहतात. ग्रामीण
भागातल्या माणसाला चार पैसे मिळण्यासाठी हे करावे लागते. झाडं तोडल्यामुळे अनेक लोकांच्या
भुकेची सोय झालेली आहे, मला याबद्दल कधी वाईट वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया आली.
पुढे लिहिलं होतं, ‘झाडांबद्दल कळवळा असणारे लोक शहरात राहतात. इको फ्रेंडली स्टिकर
लावून पर्यटनाच्या नावाने दूरदूरच्या गावात कार्बन मोनॉक्साईड सोडतात. दारूपार्टी
करतात. स्वतः गावात राहत नाहीत. गावातल्या लोकांना शिकवण्याचं काम मात्र करतात.’ ही
प्रतिक्रिया वाचून झाल्यावर मागील तीन दिवसातील कोकण आणि गोव्यातील घटनाक्रम पुन्हा
आठवला.
नववर्ष
स्वागत निमित्ताने कोकण आणि गोवा हाऊसफुल्ल आहे. ही गर्दी कोकणाला नवीन नाही पण झेपेनाशीही
झाली आहे. मालवण सारख्या पर्यटन शहरांच्या अरुंद रस्त्यावर होणारी गाड्यांची गर्दी
प्रचंड आहे. या पर्यटनातून येणारा कचरा भयंकर समस्या आहे. गर्दीच्या वातावरणात आम्हाला
त्याकडे बघायला वेळही नसावा. अशा स्थितीत, ‘चला जपूया, आपलं कोकण!’ म्हणणं धाडसाचं
ठरावं! पण हे धाडस दाखवत आपल्याला यावर मार्ग शोधावाच लागेल. कोकणातील खड्डया-खड्डयातील
रस्त्यांवरून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाची तमा न बाळगता गर्दी करणारं मानवी मन
कोकण भूमीला स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेताना दिसायला हवं! तरच, ‘साधीभोळी आम्ही कोकणची
माणसा, जगताव सुखाचो क्षण!’ ह्या गीतकारांच्या पवित्र भावना ‘पर्यटनदृष्ट्या’ अबाधित
राहातील. यासाठी कोकणातील सुखाचे क्षण अबाधित ठेवण्याची, कोकण अस्वच्छ न करण्याची शपथ
कोकणात पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येकाने नववर्षारंभाच्या निमित्ताने घ्यायलाच हवी!
धीरज वाटेकर, चिपळूण
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८
(कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या धीरज वाटेकर यांची
पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली २८ वर्षे ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक
जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा