शनिवार, १० जानेवारी, २०२६

परखड शब्दात ‘कटूसत्य’ सांगणारे ‘निसर्गशास्त्रज्ञ’

२००८! आमच्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तकाच्या प्रकाशनाची गुढीपाडव्याची तारीख निश्चित झालेली. पुस्तक स्वरुपात पहिल्यांदाच मजकूर प्रकाशित होणार असल्याने उत्सुकता, दडपण, वेळ कमी कामे फार अशी स्थिती. त्यातच ‘कोकण इतिहास पुरुष’ अण्णा शिरगावकर यांचा, ‘चिपळूणला एका निसर्ग कार्यशाळेला येत असून तिथे भेटायला या’, असा निरोप मिळालेला. १८ फेब्रुवारी २००८ रोजी अण्णांना भेटायला कार्यशाळेत पोहोचलेल्या आम्हाला पहिल्यांदा निसर्गशास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सर भेटलेले. कालांतराने आम्ही ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी चालवलेल्या पर्यावरण जनजागरणाच्या चळवळीकडे वळलो. चळवळीच्या या वाटेवरून चालताना गत दोन दशकात अनेकदा गाडगीळ सरांच्या भेटी झाल्या. अत्यंत परखड शब्दात निसर्गविषयक ‘कटूसत्य’ सांगणारे गाडगीळ सर आमच्या सदैव स्मरणात राहातील.

 

१८ फेब्रुवारी २००८

कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता शाश्वत विकासाचा विचार लोकांसोबत राहून मांडणाऱ्या गाडगीळ सरांचे नुकतेच (७ जानेवारी) निधन झाले. पर्यावरण क्षेत्रात आयुष्यभरात दिलेल्या योगदानासाठी सरांना अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला होता. गाडगीळ सरांना ऐकणं हा अफाट समृद्ध करणारा अनुभव असायचा. सर पर्यावरणाचा विचार हृदयापासून संदर्भासह मांडायचे. आम्हाला अनेकदा हा अनुभव घेता आला. सरांचा मराठी भाषा सौष्ठवाचा अभ्यासही दांडगा होता. याबाबतीतील विविध संदर्भही ते द्यायचे. २०१८ साली भूतानचा अभ्यास दौरा करण्यापूर्वी आम्ही सरांना भेटलेलो. तेव्हा सरांनी ‘निसर्ग पर्यटन’ संकल्पनेबाबत आपली परखड मते मांडली होती. ‘सह्याद्रीची आर्त हाक! - पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ हा वनराई ने प्रकाशित केलेला त्यांचा ग्रंथ आम्ही आमच्या आळंदीच्या पर्यावरण संमेलनात सहभागींना भेट दिला होता. सरांनी आपले हस्ताक्षर असलेले ‘उत्क्रांती एक महानाट्य’ हे प्रचंड वैज्ञानिक मूल्य असलेले पुस्तक मधंतरी भेट म्हणून पाठवलेले. सरांचे हस्ताक्षर असेलेला तो दस्तऐवज अमूल्य आहे. मध्यंतरी डॉ. गाडगीळ आणि डॉ. विजय एदलाबादकर यांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील १५ गावांच्या जैवविविधता नोंदवह्या बनवण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. त्यात आम्ही पर्यावरण मंडळाने कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे गावावर काम केलेले.

 

हस्ताक्षरांकित अमूल्य पुस्तक भेट. 

२०११ साली डॉ. गाडगीळ समितीने पश्चिम घाट संरक्षण व संवर्धनासाठी उपाय सुचविणारा अहवाल दिला. या अहवालाला भारताच्या पर्यावरण इतिहासात खूप महत्त्व आहे. नियोजनकर्त्यांना तो अहवाल गैरसोयीचा वाटला. म्हणूनच तर आजही पर्यावरणीयदृष्ट्वा संवेदनशील गावे आणि वाड्या-वस्त्या या श्रेणीतून वगळण्यासाठी आजही प्रयत्न सुरु असतात. या साऱ्या घडामोडीत गाडगीळ सरांनी आपली भूमिका एकदाही बदलली नाही. या अहवालात सरांनी म्हटलं होतं, ‘रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही आता प्रदूषणकारी प्रकल्पांना‌ जागा नाही.’ रत्नागिरी जिल्ह्यात, इटलीमधून हद्दपार करण्यात आलेली घातक विषारी रसायनिक पदार्थ बनवणारी 'मिटेनी एस.पी.ए.' ही रासायनिक कंपनी लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक या नावाने सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवरचे सरांचे जाणे अधिक वेदनादायी आहे. सरांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते ऐकून अनेकदा अनेकांच्या भुवया उंचावायच्या. वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबतची त्यांची भूमिकाही अशीच चर्चेचा विषय झालेली. सरांची यामागची भूमिका समजून घेण्यासाठी तेव्हा आम्ही, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रतिनिधी त्यांना भेटायला गेलेलो. तेव्हा, ‘संविधानातील तरतुदीनुसार निसर्गाची चांगली व्यवस्था आणणं शक्य आहे. देशभर बागायतदारांना माकडांचा आणि शेती करणाऱ्यांना डुकरांचा त्रास होतो आहे. हिमाचल प्रदेशातही सफरचंदाच्या बागा पिकवणाऱ्या बागायतदारांना माकडांचा प्रचंड त्रास आहे. बागायतदार शेती-बागायती बंद करण्याच्या विचारापर्यंत आलेत. म्हणून वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे! जगात कोणत्याही देशात अशी बंदी नाही. नियंत्रण न ठेवल्यास वन्यप्राण्यांची संख्या वाढेल. अर्थात शिकाऱ्यांना रान मोकळं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे. सामान्य लोकांनी परंपरा जपल्यात. निसर्ग व्यवस्था पूर्वी लोकांनी सांभाळली. जिथे जिथे पर्यावरण संरक्षण आहे ते लोकांमुळे आहे. सामान्यांच्या विवेकबुद्धीला आपण मानायला हवं आहे. निसर्ग संवर्धनातून शाश्वत विकास साधताना स्थानिक लोकांना न्याय्य लाभही व्हायला हवा आहे. पैसे कमावण्याच्या हेतूने निसर्गाचा विध्वंस सुरु आहे. त्यावर निर्बंध आणायला हवा आहे. केरळातील दोन जिल्ह्यात लोकांनी जैवविविधता रजिस्टर बनवली. खाणीमुळे होणारे नुकसान लक्षात आणून दिले आणि केरळच्या हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. खाणींचे काम थांबवण्यात आले. अशी जागृती व्हायला हवी आहे. कायद्याचा तो उद्देश आहे. नाशिकमध्ये खाणीच्या कामामुळे गोदावरीच्या उगमाकडील ब्रह्मगिरी पर्वताच्या भागाचा मोठा विध्वंस सुरु होता. तो थांबवला गेला आहे. भारतीय संविधानातील चौकटींचा आधार घेऊन पर्यावरणीय जनजागृती व्हायला हवी आहे. संविधानाप्रमाणे पर्यावरण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या चांगल्या संधी आहेत.  शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरण संवर्धन कामात सहभागी व्हायला हवं आहे. जागृती कृतियुक्त असायला हवी’, अशी भूमिका सरांनी मांडली होती.

 

राळेगणसिद्धी - २०१६च्या  पर्यावरण संमेलनास
उपस्थित प्रमुख मार्गदर्शक 'पद्मभूषण' अण्णा हजारे,
पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ आणि स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे

पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणाऱ्या सरांच्या आत्मचरित्रावर आम्ही आवर्जुन लिहिले. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा विश्वास उराशी बाळगून गाडगीळ सर हयातभर वावरले. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरावा, ही निसर्गदेवतेच्या चरणी प्रार्थना. गाडगीळ सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

धीरज वाटेकर चिपळूण

  

स्व. गाडगीळ सरांचे आत्मचरित्र ‘‘सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी’’चा आम्ही लिहिलेला आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स ने प्रसिद्ध केलेला ग्रंथ परिचय - https://dheerajwatekar.blogspot.com/2024/03/blog-post_19.html

 


बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

चला, जपूया कोकण!


        नववर्षारंभपूर्व आठवड्यात तीन दिवस कोकणसह गोव्यात फिरत होतो. पर्यटकांनी भरलेल्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चालकाने, ‘स्वर्गापेक्षा सुंदर आसा, आमचो ह्यो कोकण ! तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन !! असो आमचो ह्यो कोकण... !! ध्रु !!’ हे गीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी स्वतः संगीतबद्ध केलेलं, कोकणी भगिनींनी गायलेलं आणि लाखो व्ह्यूज मिळालेलं गाणं लावलं. गाडीत सर्वांनी एकच जल्लोष केला. पुढे गाडीतून उतरतानाही हेच गाणं ऐकून सफर पूर्ण करण्याची फर्माईश पूर्ण करण्यात आली. संवेदनशील मनानं कोकण भूमीविषयीची ही सर्वमान्य उत्कंठा तर टिपली पण याच दिवसात जाणवलेल्या कोकणपण हरवत नेणाऱ्या खुणांनी अस्वस्थताही आली.


पन्नास वर्षांपूर्वीच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावातील बोअरवेलची जन्मकथा मोठी रंजक आहे. पाणी टंचाईने घेरलेल्या त्या गावात बोअरवेल मारण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. पाण्याची जागा नक्की करून, अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी एका आठवड्याच्या गुरूवारी खूण म्हणून चुना टाकलेला मोठाला दगड आणून ठेवला. ज्या वाडीत ही बोअरवेल घ्यायची होती ती गावच्या मुख्य रस्त्यावर होती. गावचे ग्रामसेवक शनिवार-रविवारच्या जोड सुट्टीत आपल्या मूळगावी गेलेले असतानाच बोअरवेल कॉन्ट्रॅक्टर बोअर पाडण्यासाठी मूर्तवड्यात पोहोचले होते. दरम्यानच्या काळात त्या वाडीत लगोरीचा खेळ खेळणाऱ्या लहानग्या मुलांनी सर्व्हे अधिकाऱ्यांनी चुना टाकून खूण केलेला मोठाला दगड आपल्या खेळाचा भाग बनवला. मुलांनी तो दगड उचलून मुख्य रस्त्यालगत आणून ठेवला. वाडीतील मोकळ्या जागेत चुना टाकलेला दगड ही बोअरवेलच्या जागेचे खूण याची जाणिव असलेल्या कॉन्ट्रक्टरने, पूर्वीच्या सूचनेप्रमाणे सोमवारी पहाटे बोअरींग मारायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी आपल्या कामावर रूजू होण्याकरिता ग्रामसेवक आले. पाहातात तर बोअरवेलचे काम बरेच पुढे गेलेले आणि जागाही बदललेली! ग्रामसेवकांनी संबंधितांना विचारणा केली. ‘जेथे पांढरा दगड ठेवलेला होता तेथे आम्ही बोअरींग मारायला सुरूवात केली’, असे उत्तर संबंधित कॉन्ट्रक्टरने दिले. तोवर याठिकाणी पाण्याचा चांगलाच उद्भव असल्याच्या अनुमानापर्यंत कॉन्ट्रक्टर पोहोचला होता. बघताबघता रस्त्यानजीकच्या त्या चुकीच्या जागेवर पाणी लागले. नियोजनाप्रमाणे पाण्याची उपलब्धी आणि बोअरींगची खोली पूर्ण झाल्यानंतर बोअरींग कॉन्ट्रक्टर निघून गेले. रस्त्याशेजारी बोअरवेल मारल्याचे पाहून रस्ते विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली. गावच्या पाण्याचा स्त्रोत रस्त्याला आडवा येत असल्याची ती तक्रार होती. अर्थात या सर्व प्रकाराला ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात आलं. प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्ते आणि बांधकाम विभागाने मूर्तवडे ग्रामपंचायतीवर आणि ग्रामसेवकांवर केस टाकली. संपूर्ण गाव ग्रामसेवकांच्या बाजूने उभा राहीला. त्यांचे वकीलपत्रही तालुक्यातील नामवंत वकिलांनी स्वीकारले. वर्षभर ही केस चालली. अंतिम टप्प्यात ग्रामसेवकांच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तीवाद केला, ‘जमीनीत ज्या ठिकाणी पाणी असते, तेथूनच ते घ्यावे लागते. रस्ता कोठूनही प्रयत्न करून फिरवून नेता येऊ शकतो.’ या युक्तीवादावर न्यायाधीशांचे मत अनुकूल बनले. केसचा निकाल ग्रामसेवकांच्या बाजूने लागला. हा प्रसंग आम्ही २०१६ साली लिहून प्रकाशित केलेल्या ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ या पुस्तकात नोंदवलेला आहे. ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ हे पुस्तक ८६वर्षे वयाचे सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्ताराम (आबा) महाडीक यांची ती जीवनकथा आहे. दुर्दैवाने असा न्याय गोदावरी किनारी वसलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमी नाशिकच्या तपोवनात मागच्या दहा वर्षात जन्माला आलेल्या आणि निसर्गत: वाढलेल्या झाडांना मिळाला नाही. उलट परिणामस्वरूप बीड जिल्ह्यातील सह्याद्री देवराई जाळण्यात आल्याच्या आरोप समाजमाध्यमातून करत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. ही घटना प्रातिनिधिक असली तरी कोकणातही हेच सुरु आहे. तीन दिवसांच्या प्रवासावरून परतताना वाटुळ (राजापूर) ते साखरपा (संगमेश्वर) दरम्यान रस्त्याशेजारी ठिकठिकाणी वृक्षतोड केल्याचे दिसले. पोटतिडीकीने समाजमाध्यमात वृक्षतोडीची छायाचित्रे प्रसूत केल्यावर एका ठिकाणी, ’...अशाप्रकारे झाडं तोडणं गरजेचे आहे. तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा नैसर्गिकरित्या झाडे आणि झुडपी जंगले चांगली तरारून उभी राहतात. ग्रामीण भागातल्या माणसाला चार पैसे मिळण्यासाठी हे करावे लागते. झाडं तोडल्यामुळे अनेक लोकांच्या भुकेची सोय झालेली आहे, मला याबद्दल कधी वाईट वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया आली. पुढे लिहिलं होतं, ‘झाडांबद्दल कळवळा असणारे लोक शहरात राहतात. इको फ्रेंडली स्टिकर लावून पर्यटनाच्या नावाने दूरदूरच्या गावात कार्बन मोनॉक्साईड सोडतात. दारूपार्टी करतात. स्वतः गावात राहत नाहीत. गावातल्या लोकांना शिकवण्याचं काम मात्र करतात.’ ही प्रतिक्रिया वाचून झाल्यावर मागील तीन दिवसातील कोकण आणि गोव्यातील घटनाक्रम पुन्हा आठवला.


नववर्ष स्वागत निमित्ताने कोकण आणि गोवा हाऊसफुल्ल आहे. ही गर्दी कोकणाला नवीन नाही पण झेपेनाशीही झाली आहे. मालवण सारख्या पर्यटन शहरांच्या अरुंद रस्त्यावर होणारी गाड्यांची गर्दी प्रचंड आहे. या पर्यटनातून येणारा कचरा भयंकर समस्या आहे. गर्दीच्या वातावरणात आम्हाला त्याकडे बघायला वेळही नसावा. अशा स्थितीत, ‘चला जपूया, आपलं कोकण!’ म्हणणं धाडसाचं ठरावं! पण हे धाडस दाखवत आपल्याला यावर मार्ग शोधावाच लागेल. कोकणातील खड्डया-खड्डयातील रस्त्यांवरून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाची तमा न बाळगता गर्दी करणारं मानवी मन कोकण भूमीला स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेताना दिसायला हवं! तरच, ‘साधीभोळी आम्ही कोकणची माणसा, जगताव सुखाचो क्षण!’ ह्या गीतकारांच्या पवित्र भावना ‘पर्यटनदृष्ट्या’ अबाधित राहातील. यासाठी कोकणातील सुखाचे क्षण अबाधित ठेवण्याची, कोकण अस्वच्छ न करण्याची शपथ कोकणात पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येकाने नववर्षारंभाच्या निमित्ताने घ्यायलाच हवी!

 

धीरज वाटेकर, चिपळूण

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८

(कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या धीरज वाटेकर यांची पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली २८ वर्षे ते पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)



शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

नीलिमा पक्ष्याची दुसऱ्यावर्षी एकाच जागी वीण!



            नीलिमा (Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्यावर्षी आमच्या परसदारातील हॉलच्या खिडकीच्या डाव्या कोपऱ्यावर विश्वास दाखवला. सर्वसाधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा विणीचा हंगाम असलेल्या या पक्ष्याने परसदारी गतवर्षी (२०२४) २३ जूनला पहिले अंडे दिले होते. त्याच ठिकाणी यावर्षी (२०२५) २६ मेला अंडे दिले गेले. नीलिमा पक्ष्याने गतवर्षी १७ जुलैला तर यंदा २० जूनला आपला विणीचा हंगाम पूर्ण केला आणि पिल्ले घरट्यातून आकाशी उडाली. या पक्ष्याचा गतवर्षीचा विणीचा हंगाम २५ दिवसांचा होता. यंदाचा हंगाम २६ दिवसांचा राहिला. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या हंगामासाठी गतवर्षीच्या जागेचीच निवड केल्याने महिनाभर आमच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता.


जवळपास पक्षी घरटं बांधताना छद्मवेश (camouflage) धारण करत असतात अर्थात स्वतःचे खरे स्वरूप लपवत असतात. यंदा घराच्या खिडकीत सलग दुसऱ्यांदा निलीमाचं घरटं बांधून पूर्ण होईपर्यंत आम्हालाही या घरट्याबाबत लक्षात आलं नव्हतं. टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा पक्षी. जेमेतेम ६ इंच/ १५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव निलीमा असे आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो. निलीमा पक्षी निळ्या रंगाचा असून त्याच्या मान-गळ्याला नारंगी रंग आहे. पोटाखालचा भाग पांढरा असतो. याची मादी फिकट रंगाची असते. हा पक्षी उडणाऱ्या माश्या आणि कीटकांसह जमिनीवरचे किडेही खातो. लालसर तपकिरी ठिपके असलेली याची अंडी असतात. आमच्या परसदारी यावर्षी पक्ष्याने २६जूनला पहिले अंडे दिल्यावर सलग दोन दिवसात आणखी दोन अंडी दिली. २९ तारखेला अंडं दिलेलं नव्हतं. या पक्ष्याने चौथं अंडं ३० तारखेला दिलेलं दिसलं. ६ जूनच्या रात्रीपासून घरट्याजवळ टकटक आवाज येऊ लागला होता. पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी जवळ आल्याचा तो संकेत होता. दोन दिवस असेच निघून गेले. ९ जूनला तीन अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतला. एक पिल्लू अंड्यात आहे असे वाटलेले. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. गेल्यावर्षी नीलिमाने चार पिल्ले दिलेली, यंदा मात्र अंडी चार घातलेली असताना पिल्ले मात्र तीनच जन्मली.

 


नीलिमाने अंडी घालायला सुरुवात केल्यापासून कोकणात अवकाळी पाऊस बरसू लागलेला. आता पावसाने जोर धरला होता. त्यातच पिल्ले जन्मलेली. कसं होणार? असं उगाचच वाटत असताना १७ जूनला पिल्लांना भेटायला सूर्यदेव आलेले. सूर्याची किरणे पिल्लांवर पडल्यावर इवलीशी पिल्ले खूपच लोभस दिसत होती. पिल्ले तशी मोठीही झालेली. गतवर्षी चार पिल्ले एवढ्याशा घरट्यात आनंदाने राहिलेली होती. पिल्लांच्या घरट्यातील हालचालींवरून यंदा तीन तरी राहतील का? असा प्रश्न पडलेला. तसंच झालं. १८ जूनला सायंकाळी एक पिल्लू घरट्यातून खाली कुंडीत पडलं. नर-मादी आजूबाजूला घिरट्या घालत होती. पिल्लाला उचलून घरट्यात ठेवणे आवश्यक होते. पण नर-मादी अंगावर येण्याची शक्यता होतीच! त्यात घरटे पिल्लांना कमी पडत असेल अशीही शक्यता वाटलेली. म्हणून याच हंगामात बुलबुलने उपयोग करून सोडलेल्या घरट्याला खिडकीत ठेवले आणि त्यात हे पडलेले पिल्लू ठेवले. थोड्यावेळाने नीलिमा आली. तिने पिल्लाला पाहिलं, अन्न दिलं. एवढं सगळं करूनही दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, १९ जून रोजी सकाळी ते पिल्लू पुन्हा खाली पडलेलं दिसलं. आता त्याच्या जगण्याची शक्यताही आम्हाला कमी वाटू लागलेली. पण आपण शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत, असं मनाशी म्हणत खाली पडलेल्या पिल्लाला उचलून पुन्हा घरट्यात ठेवलं. पिल्लू घरट्यातून खाली पडताना घरटंही बाहेरच्या बाजूला कलंडलेलं दिसलं होतं. म्हणून खिडकीच्या लोखंडी ग्रीलजवळ दोन्ही घरट्यांना एक आडोसा उभा केला. दुपारी पाहिलं तर ते दुखापत झालेलं पिल्लू आपल्या मूळ घरट्यातून जाऊन परत नव्या घरट्यात येताना दिसलं. काहीसं तरतरीत झालं असावं. सायंकाळी तिन्ही पिल्लांचे सतत आवाज करणे, घरट्याच्या वरती येऊन बसणे सुरू झालेले. त्यांची चुळबूळ वाढलेली जाणवत होती. वाढलेली चुळबुळ खरी ठरली. एकेक करून २० जूनला तीनही पिल्ले घरट्यातून उडाली. घरट्यातून दोनदा खाली पडलेल्या पिल्लाने मात्र आकाशी झेप घ्यायला इतर दोन पिल्लांपेक्षा किमान चारेक तास अधिक घेतले असतील. तीनही पिल्ले आनंदात-समाधानात असल्याची खात्री करून आम्ही आमच्या कामात गुंतलो. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्या वर्षी आपल्या परसदारावर दाखवलेला विश्वास पुढील वर्षी कायम राहील का? की पक्षी जागा बदलेल? हे समजण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहायला हवी!

 


परसादारातले पशु-पक्षी- झाडे आम्हाला माणसाळलेले जाणवतात. दारातील झाडे एकमेकांशी बोलतात. आपल्या भावना आम्हालाही सांगू पाहातात, असे वाटते. त्यांच्याकडे लक्ष नही दिले तर झाडे-निसर्ग पोरका होतो. माडांना तर माणसांचा सहवास लागतच असावा. क्वचित प्रसंगीही नारळ कधी कुणाच्या डोक्यात पडल्याचे ऐकिवात नाही. आपल्या असण्याचा आनंद झाडेही साजरा करत असावीत. म्हणूनच तर आम्ही आमचा सवडीचा वेळ बऱ्याचदा झाडांसोबत घालवतो. उन्हाळी हंगामाच्या शेवटी आणि पावसाळ्यापूर्वी शासकीय कर्मचारी ज्या निर्दयतेने झाडाच्या कुंपणाबाहेरील-रस्त्यावरील फांद्या तोडतात ते पाहून खूप वाईट वाटतं. कारण कदाचित याच फांद्यांचा नव्याने जन्मा येणाऱ्या पाखरांना आधार मिळणार असतो. परसदारी निवडुंग कुळातील ब्रम्हकमळाच्या फुलण्याच्या वेळचा आनंद तो काय वर्णावा? आत्मिक सुखाची कल्पना याहून वेगळी ती काय असावी? त्याक्षणी लाभलेला आनंद वेगळा असतो. आम्ही तर या फुलाचे बहरणे साजरे करतो. पहाटे हे फुल कोमेजणार हे माहिती असते. तरीही आम्ही त्या फुलातील सौंदर्य भरभरून न्याहाळतो. कारण निसर्ग आपल्याला भावनांचे असे उमाळे जगायला देत असतो. परसदारातील साऱ्या पक्ष्यांच्या विणीचेही तसेच असते.

 


खरंतर परसदारी यावर्षी विणीच्या हंगामात एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल चार पक्ष्यांनी आपला संसार थाटण्याचा प्रयत्न केलेला. नीलिमा पक्ष्याने तर यंदा परसदारी त्याच ठिकाणी सलग दुसऱ्यावर्षी घरटे केलेले. अर्थात सर्वच पक्ष्यांचा विणीचा हंगाम यशस्वी होऊ शकला नाही. काहींनी आपणहून घरटे अर्धवट सोडले. काहींची वीण दुर्दैवाने अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यापूर्वीच संपुष्टात आली. मात्र असे असले तरीही अपवादालाही विशेष झाडी नसलेल्या चिपळूण शहरातील खेंडीतील वास्तव्यात मागील १६ वर्षांत विविध छोट्या पक्ष्यांना आपल्या हक्काचा अधिवास-आधार वाटावा असं नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे ही घटना सांगत होती. आपल्या परसदारावर, इथल्या निसर्गावर आणि आजूबाजूच्या साऱ्या परिसरावर विणीच्या हंगामासाठी पक्ष्यांनी पसंतीची मोहर उमटवली होती. भक्तीचा उंबरठा घेऊन निवासी वास्तूत वावरणाऱ्या आम्हाला आकांक्षांचे पंख घेऊन आकाशी उडालेली पिल्ले पाहाताना झालेला आनंद शब्दातून व्यक्त होण्यापलिकडला राहिला.

 

धीरज वाटेकर, चिपळूण


२६ मे २०२५ - चिपळूणच्या खेंड येथील निवासी वास्तूमधील हॉलच्या 
खिडकीतील डाव्या कोपऱ्यात नीलिमा पक्ष्याने केलेले घरटे






२६ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले पहिले अंडे

२७ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले दुसरे अंडे

२८ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले तिसरे अंडे

३० मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले चौथे अंडे

९ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले


११ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले

१० जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले

१७ जून २०२५ नीलिमा पक्षी आपल्या पिल्लांसह

१८ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले

२० जून २०२५ - घरट्यातून उडालेल्या पिल्लासह नीलिमा पक्षी

नीलिमा पक्षी





गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

पर्यावरण चळवळीशी लोकांना जोडण्याचे काम करत राहू


माहूर (नांदेड) :: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रेरणा आणि स्व. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शानुसार आपण पर्यावरणाच्या जनजागरण चळवळीचे काम करत आहोत. पर्यावरणाच्या चळवळीत काम करणाऱ्या आपणा कार्यकर्त्यांचे मुख्य काम या चळवळीशी लोकांना जोडणे हे आहे. पर्यावरण अभ्यासक-संशोधकांची संशोधने आणि कार्य जास्तीत जास्त समाजमानसापर्यंत पोहोचवून त्यांचा पर्यावरण चळवळीला पाठिंबा उभा करण्याचे काम आपले आहे. अशा संमेलनांच्या आणि मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते साध्य होत आहे. मंडळाच्या कामाला अधिकाधिक पर्यावरण मित्रांशी जोडत पर्यावरण चळवळीला अधिकाधिक जनसमुदायाचा पाठिंबा मिळण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया असे आवाहन लेखक आणि पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

 


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र माहूर येथील श्रीजगदंबा धर्मशाळा परिसरात २६-२७ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित नवव्या पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मा. शब्बीर (मामू) सय्यद (बीड) यांच्याहस्ते झाले. संमेलनाच्या सुरुवातीला वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाचे काम, माहूर मधील पर्यावरण आदी विषयाची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण केली. वाटेकर पुढे म्हणाले, आबासाहेबांच्या पर्यावरण जनजागरण विचारांचा जयघोष आज नवव्या पर्यावरण संमेलन निमित्ताने महाराष्ट्राचे शक्तिपीठ श्रीक्षेत्र माहूर येथे आई रेणुकेच्या दारात होतोय, ही आनंदाची बाब आहे. माता सती पार्वती ही अग्निकुंडातून उत्पन्न झाली. या इहलोकी श्री रेणुका देवी या नावाने ओळखली गेली. शिवस्वरूप पुरूष तत्वाचे ऋषि जमदग्नि यांचा पती म्हणून स्वीकार करून भगवान विष्णूंचा ६ वा अवतार असेल्या श्री परशुराम यांची माता म्हणून प्रसिद्ध झाली. कोकण ही भगवान परशुराम यांची भूमी आहे. आम्ही त्या भूमीचे प्रतिनिधित्त्व करतो. आमच्या मनात या मातृस्थानाविषयी विशेष आदरभाव आहे.

 


राज्यभरातील पर्यावरणप्रेमी शिक्षक हे पर्यावरण मंडळाचे मुख्य घटक आहेत. आज काम करणारे हात कमी आहेत, म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवं. ही मंडळाची भूमिका आहे. आपलं काम हे जाणीव जागृतीचं काम आहे.

 


माहूरचा परिसर सह्याद्रीचा आहे. सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सह्याद्री महाराष्ट्राचा जीवनदाता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने परकीय आक्रमकांना पराभूत करण्यासाठी आणि स्वतःचे राज्य स्थापित करण्यासाठी सह्याद्रीचा कुशलतेने उपयोग केला होता. समृद्ध जैवविविधता असलेला आपला प्रिय सह्याद्री गेली काही दशके विकासाचे घाव सोसत आहे. वृक्षतोडीमुळे भूस्खलन आणि मातीची धूप सुरू आहे. अवैध जंगलतोड, शेतीची क्षेत्रवाढ, विविध पिकांची एकसुरी लागवड, खाणकाम आणि खडी क्रशर, जंगलांच्या पोटात शिरलेले रस्ते, प्रदूषणकारी प्रकल्प अश्या अनेक कारणांनी सह्याद्रीची सलगता संपुष्टात येत आहे. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले वाघांचे आणि इतर वान्य प्राण्यांचे भ्रमणमार्ग अडथळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात खंडित झाले आहेत. हत्तींचे कोकणात दोडामार्गात आगमन, गव्यांचे समुद्र किनाऱ्यावर येणे, माहूरसह देशभर बिबटे मानवी वस्तीमध्ये स्थिरावणे हे सगळे धोकादायक अवस्थेत पोहोचले आहे. सह्याद्रीला संवर्धनासाठी आपल्या कुबड्यांची गरज नाही. सह्याद्री अवाढव्य, दयाळु, दाता आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आपण आणि आपले पूर्वज हजारो वर्षांपासून खेळले, बागडले, नांदले, विस्तारले. सह्याद्रीने आपल्या शेकडो पिढ्यांना सांभाळले आहे. त्याला ओरबाडणे आपण थांबवायला हवे आहे.


माहूरमध्ये चालुक्य, यादवकाळात जलाशय निर्माण करण्यात आले. महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जलाशय निर्माण करणे व त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. माहूरमधील जलाशयांच्या प्राचीन जागांचे संरक्षण व्हायला हवे. त्यांचे महत्त्व टिकायला हवे आहे. या स्थानांचे सुशोभीकरण आणि सौन्दयीकरण करताना मूळ बदलू नये. जंगलांमध्ये आजही दुर्लक्षित कुंडे आहेत. कुंडांची निगा राखली जायला हवी. या भूमीत श्रीक्षेत्र माहूर परिक्रमा सुरू आहे. तिला भविष्यात पर्यावरणीय पर्यटन अंगाने नियमित स्वरुपात आणता येईल का? पाहायला हवं आहे. आई रेणुकेने आपल्या सर्वांच्या हाताला पर्यावरण प्रबोधनाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी बळ द्यावे अशी विनंती वाटेकर यांनी याप्रसंगी बोलताना केली.

संमेलनात पाणी समस्या (‘जलपुरूष’ बाबुरावजी केंद्रे - लोहा नांदेड), विषमुक्त शेती व देशी गोसंवर्धन (अॅड. उदय संगारेड्डीकर - नांदेड), वन्यजीव संरक्षण, संवर्धन वास्तव व भ्रम (प्रा. डॉ. रमजान विराणी पांढरकवडा), पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती नवीन देशी व विदेशी तंत्रज्ञान (अविनाश पोळ), जागतिक तापमान वाढ बदलते वातावरण व मानवी आरोग्य (दीपक श्रोते - नागपूर), निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे आदींची अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न झाली. 








मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

अगम्य-अतर्क्य कोकण


कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव आहे. कोकणी निसर्गाबाबत आलेल्या सकारात्मक-नकारात्मक अनुभवांची शिदोरी गाठीशी बाळगलेली कोणीहि व्यक्ती व्यक्त होते तेव्हा ते ऐकत राहावं! समाजरचनेतील प्रबोधनाचे मुद्दे टप्प्याटप्यावर बदलतात. मागील दोनेक हजार वर्षांचा इतिहास अभ्यासला तर हे जाणवतं. पण प्रबोधनाची मुलभूत गरज कधीही संपत नाही. कालौघात जे चांगले असते तेच टिकते. समाजाची सामुहिक मानसिकता हा ‘मला पटत नाही’ म्हणून सोडून देण्याचा नव्हे तर अभ्यासाचा विषय आहे. भारतीय समाजमनाला गैर गोष्टी फार काळ आवडत नाहीत. सामाजिक मानसिकतेच्या या पार्श्वभूमीवर ‘भूत’ हा विषय इतकी शतके कसा काय टिकला? याच्या मुळाशी आपण जसजसे जायचा प्रयत्न करू तसतशी आपल्याला निसर्गातील या अद्भुत, अगम्य-अतर्क्य, अमानवीय सकारात्मक आणि नकारात्मक उर्जाकेंद्रांची अनुभूती येत जाईल.

‘कांतारा’ मधून प्रेरणा घेऊन कोकणसह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ब्रह्मराक्षसाचे कथानक घेऊन  ‘मुंज्या’ चित्रपट तयार झाला. कोकण किनाऱ्याच्या आतील भागातील लोकप्रिय लोककथा आणि कोकणातील शूटिंग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. खरंतर सत्तरच्या दशकापर्यंत सिनेमागृहातील रुपेरी पडद्यावर भूताची चाहूल लागली की पडद्यावरून नजर हटवून इतरत्र पाहाणारा, घाम फुटणारा किंवा खाली मान घालून बसणारा आपला प्रेक्षक होता. काहीअंशी असेलही. पण आजच्या डिजिटल काळातील पिढी ‘भूत’ विषय एन्जॉय करते आहे. भूतपट हे भयपटांपेक्षा अधिक मनोरंजन करत आहेत. कृष्णधवल ते रंगीत तंत्रज्ञानाचाही हा परिणाम असावा. मुंज्याने पहिल्या आठवड्यात ३३ कोटींचा व्यवसाय केला. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याशिवाय कमी बजेट असलेले या धाटणीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळवतायत. अशा चित्रपटांच्या मुळाशी असलेल्या ‘भूत’ विषयाला ‘खोटं’ ठरविण्यापूर्वी ही उर्जा ‘नक्की कोणती असावी? आणि असं का घडत असावं?’ याचा शोध घ्यायला हवा. भूतकथा जगभर भेटतात. समाजमनावर त्यांचा पगडा इतकी वर्षे कसा टिकून राहतो? हे आपण ते समजून घ्यायला हवं आहे. दुसरीकडे सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेल्या याच कोकणात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारले. कोकणातील दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. महाराजांनी सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग करून घेतला. राजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी पश्चिम किनारपट्टीवर उभारलेलं आरमारी सामर्थ्य अभ्यासताना भूताखेतांच्या लोककथा अंगा-खांद्यावर खेळवणाऱ्या याच कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग जाणवतो. हेही लक्षात घेतले पाहिजे.

भुताखेतांचा त्रास होऊ नये म्हणून कोकणात इष्ट व आराध्य देवतांची नियमित व्रते आणि कुलाचार पाळून आपली योग्यता वाढवावी असे सांगितले जाते. ‘भूत’ या विषयावर व्यक्त होत असताना कोकणच्या निसर्गातील गुढता आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेली इथली मानवी समाजव्यवस्था समजून घ्यायला हवी असे वाटते. कोकणात गावोगावी ग्रामदेवतेची उपासना चालते. ग्रामदेवता ही गावाचे रक्षण करणारी, संकटकाळी शक्ती देणारी देवता आहे. गाव उत्सवाच्या दिवशी तिला बलिदान देण्याची प्रथा आहे. ग्रामदेवतांना ठरलेली परंपरागत देणी न दिल्यास त्या रागावतात असेही मानले जाई. कॉलरा, देवी, प्लेग हे रोग परंपरागत देणी न दिल्याचा परिणाम म्हणून आणले जातात असेही मानले जाई. अगदी असाध्य अशा रोगावर कोणताच इलाज न चालल्यास तो दुष्ट शक्तीचा परिमाण आहे किंवा भुतांनी केलेला आहे असे मानले जात असे. याचा उपाय करण्यासाठी भगत, तांत्रिक-मांत्रिक असत. या अनुषंगाने थोडं कोकणच्या  इतिहासात डोकावलं असता ‘भूत’ विषयाचा दरारा अस्तित्वात असल्याचे संदर्भ भेटतात. विजापूरच्या युसुफ आदिलशहाने कोकणात १५०२मध्ये सावित्री नदी ते देवगड पर्यंतच्या रत्नागिरीतील भागात खोतीची पद्धत सुरु केली होती. जमिनीच्या महसुलात सुलभता आणण्यासाठी ही व्यवस्था होती. प्रत्यक्षात मात्र या व्यवस्थेने अनेक नवे प्रश्न कोकणात निर्माण झालेले दिसतात. महादेवशास्त्री नावाचे प्रसिद्ध मांत्रिक जादूटोण्याच्या विद्येत प्रवीण असल्याचे समजल्यावर नाना फडणीस यांनी, तंत्रविद्येने ब्रिटीशांचा नाश करण्याकरिता किती काळ लागेल याची विचारणा करण्यासाठी आपला दूत पाठविला होता. कोकणात सामान्य लोकांचे दारिद्र्य, जमिनीच्या लहानशा तुकड्यावरून व इतर कारणांवरून होणारी भाऊबंदकी-भांडणे नित्याचीच बाब होती. ज्याच्याशी वाकडे असेल त्याच्यावर भूते घालणे हा सर्वसामान्य रिवाज होता. भूते घालण्याचे प्रकार वाढल्याने पेशवाईत, भूतांच्या चौकशीचे, बंदोबस्त करण्याचे आदेश दिल्याचे किस्से आहेत. कोकणात बलुतेदारी होती. १७६५च्या एका यादीत बलुतेदारांची संख्या अकरा, १७९९च्या यादीत बारा, १८१८च्या यादीत तेरा भेटते. सर्वांना जातीविषयक रीतीभातींचे रूढीने, नियमाने पालन कोकणात बंधनकारक होते. जगभरातील मानवी समाजात ‘गुलामगिरी’ हे लक्षण आढळते. कोकणही याला अपवाद नाही. ब्रिटीशकालीन कागदपत्रात याच्या नोंदी भेटतात. पेशवाईत भूतांच्या दहशतीने अनेक कुटुंबे नव्हे तर तळकोकणातील गावेच्या गावे स्थलांतरित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १७७४-७५ साली कोकणातील अंजनवेल, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड आणि सौंदळ तालुक्यात पेशवे सरकारने याकामी दोन अधिकारी नेमले होते. त्यांच्या मदतीला दोन कारकून आणि सहा शिपाई होते. या अधिकाऱ्यांना वर्षाला ३५० रुपये पगार आणि २६१ रुपये भत्ता ठरला होता. अधिकाऱ्यांनी गुन्हेगाराची शक्ती पाहून रुपये २५ ते ५० दंड करावयाचा अधिकार असे. भुते घालणाऱ्यांची आणि ती निवारण करणाऱ्यांची यादी वैद्यांच्या यादीप्रमाणे गावोगावच्या पोलीस पाटलांना माहिती असणे आवश्यक असायचे. ही यादी दर महिन्याला अद्ययावत व्हायची. असा दंडक असायचा. हे सारे १९व्या शतकापर्यंत सुरू असावे. पुढे ब्रिटिश राजवटीत बंद करण्यात आले.

भारताचा पश्चिमेकडील भाग हा सह्याद्री आणि समुद्र-खाड्यांच्या चिंचोळ्या पट्टीत विराजमान आहे. या प्रदेशाने स्वतःची अशी काही भूवैशिष्ट्ये सांभाळली आहेत. कोकणातील उंचचउंच सह्याद्रीच्या कडेकपारीत घोंगावणारा वारा, समुद्रावर उठणाऱ्या लाटा, सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचणार नाही अशी निबिड अरण्ये, दूरवर असणारी मनुष्यवस्ती, जुनाट व अजस्त्र वृक्षांचे अस्तित्व, पडकी घरे-वाडे-विहिरी, रात्रीच्या अंधाराला छेद देणारी अपुरी वीजव्यवस्था यामुळे भूतांचे (नकारात्मक उर्जा) प्राबल्य वाढले असावे. भूत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कोकणात पिशाच्च या नावानेही ते रूढ झाल्याचे दिसते. कोकणात चांगल्या-वाईट भूतकथा नाहीत असे गाव सापडणार नाही. इथल्या देवभोळ्या लोकांचा देवाइतकाच भूतांवरही विश्वास असावा. कोकणात भूतबाधा उतरवणाऱ्यांची, उपाय सांगणाऱ्यांची संख्याही विलक्षण असावी. मध्यरात्र उलटून गेलेल्या कोकणात रात्री काळाकुट्ट अंधारातील कोणत्याही घाटातील नागमोड्या वळणांच्या मोकळ्या रस्त्यावरून संततधार पावसात, वाऱ्याच्या झूळूकेत रातकिड्यांची किरकिर ऐकत प्रवास करताना गाडी अचानक बंद पडली तर? अर्थात दैव बलवत्तर असल्यास काहीतरी विचित्र अनुभूती येऊन गाडी आपोआप पुन्हा चालू होते आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो. अगदी आमच्याही लहानपणी सुट्टीत आजोळी किंवा गावी गेलो आम्ही भावंडं रात्री अंगणात बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असू. हा उद्योग कोकणात सर्वत्र चालायचा. भूताखेतांचे किस्से रंगायचे. लोकांच्या मांडणीत असे दाखले असायचे की त्यांना खोटं ठरवणं अडचणीचं ठरावं. गीतकार दिलीप शिंदे यांचं आनंद शिंदे यांनी गायिलेलं, ‘सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी! बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी’ हे गीतही आपल्याला कोकणातील भूत’लोक’कथा सांगतं. कोकणनजीक गोव्यात डिचोली तालुक्यातील साळ गावात होळी पौर्णिमेच्या तीन दिवसात 'गड्यांची जत्रा' म्हणून स्थानिक दैवत श्रीमहादेव यांची जत्रा भरते. या गड्यांच्या जत्रेला गेलेल्या माणसाला रात्री १२ नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत घरी परतता येत नाही असा नियम आहे. डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील श्रीलईराई देवीची जत्रा ही एप्रिल-मे महिन्यात होते. गोव्यातील या दोन गूढ आणि रहस्यमय जत्रा आहेत. कोकणात भगवान श्रीशंकर आणि देवी श्रीभवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक आहेत. भगवान श्रीशंकर यांच्या अधीन वेताळ, चाळा, राक्षस, भूतपिशाच्च असतात अशी श्रद्धा कोकणात आहे. या अज्ञात शक्तीला वर्षातून एकदा परंपरेनुसार मान दिला जातो. डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी ‘कोकणचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात भुतांचे १६ प्रकार सांगितले आहेत. त्यात वेताळ हा पहिला असून त्याला भूतांचा राजा म्हटले जाते. मात्र भुतांच्या याच राजाची कोकणात पूजा केली जाते. आरवली, पेंडूर, वराड, कुणकेरी, ओटवणे, परुळे, पोईप, नाणोस या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात त्याची मंदिरे व मूर्ती आढळतात. कोकणातील गावात याला रक्षणकर्ता म्हणून मान्यता मिळालेली आहे. कोकणातील भुते अभ्यासताना हे समजून घ्यायला हवे आहे. भूत रात्रीचं का दिसतं? लोकमान्यता अशी की दिवसभर देवांचा वास पृथ्वीवर असतो. देवांच्या शक्ती सूर्याच्या उजेडासोबत सर्वत्र पोहोचतात. त्यामुळे अमंगळ शक्तींना बाहेर पडता येत नाही. दैवी शक्तींचा संकोच होऊन भूतं रात्री बाहेर पडतात. दुसरं कारणं असं असावं की, दिवसभरात सजीवांच्या हालचालींमुळे वातावरणात उष्णता वाढते. ही ऊर्जा दिवसा शक्तीमान असते. तिच्या प्रभावात निगेटिव्ह एनर्जी दबून जाते. रात्री जमिनीचा खालचा स्तर थंड होऊ लागतो. वीजेचा वापर कमी होतो. मोबाईलचे संदेश कमी होतात. उर्जेचा वापर मंदावतो. अशा शांततेत नकारात्मक उर्जा आपले अस्तित्व प्रकट करते. या उर्जेशी आपण परिचित नसल्याने भास होत राहातात. पण मग एखाद्या विशिष्ठ जागी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वर्षी, एकमेकांना न ओळखणार्‍या लोकांना एकाच प्रकारचा भास का होतो? असेही प्रश्न पडतात.

कोकण हे गूढ गोष्टींचे भांडार आहे. येथील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा पगडा आहे हे नक्की. भूतांच्या अस्तित्वाची खात्री पिढय़ान्-पिढय़ा इथल्या मनुष्याने बाळगली आहे. भूतांचा उद्भव, संचार, इच्छेनुरूप रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे, प्रसंगी भले करण्याचे सामर्थ्य, त्यांचा स्वभाव, त्यांची निवासस्थाने, शक्तीच्या मर्यादा, त्यांना प्रसन्न करून घेण्याचे वा हुकमतीत ठेवण्याचे उपाय, त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रण शक्ती आणि या अनुषंगाने येणारे समज, रूढी आणि परंपरा यांचे फार मोठे विश्व आहे. कदाचित कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या तुलनेत आजही विशेष झालेला नाही. त्यामुळे कोकणात आजही नकारात्मक शक्तींचे अस्तित्व असावे. कोकणात आजही घनदाट झाडी, अरण्य आहे. डोंगरकडे, घाट, एकाकी सडे, दूर असलेली घरे-वाड्या-वस्त्या गूढरम्य असतात. रात्रीच्या निरव शांततेत पान हलतात, वारा सुसाट येतो, नारळ-सुपारी डोलतात, ओहोळ, छोटे झरे खळखळ करत वाहत असतात. वाळलेल्या पानांच्या पातेऱ्यावर पाऊले टाकली की आवाज येतो. भोवताली अफाट गर्द झाडी, आसमंतात पक्षांचा किलबिलाट, घरी परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घंटा ऐकू येणाऱ्या एखाद्या तळ्याची ठिकाणी जिथे माणूस प्राणीहि दिसत नाही अशा ठिकाणी ते सवाष्ण बाईने सांजवेळी जायचे नसते. हे कोकणवासीयांच्या मनात पक्के आहे. भूत-पिशाच्च एक ऐतिहासिक वास्तव आहे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. भूते ही त्रास देणारी व त्रास न देणारी या प्रकारात मोडतात. कोकणातील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा रंजक पगडा आहे. भुतांच्या अस्तित्वाविषयीची खात्री पिढय़ान् पिढय़ा कोकणी माणसाने बाळगली आहे. कोकणातील लोकांचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढाच भूतबाधेवरही आहे. याचमुळे गावागावात डॉक्टरप्रमाणे या विषयातले तज्ज्ञही असतात. अपवाद वगळता कोकणातील भुते त्रास देणारी नसावीत. कारण भूतांचे अस्तित्व नाकारण्यासाठी स्मशानभूमीत रात्र काढणारे अवलिया कोकणात भेटतील. कोकणाची भूमी अलौकिक उर्जेने संपन्न आहे. इथे अनेक सकारात्मक नकारात्मक घटनांचे किस्से ऐकायला येतात. भूत हा त्यापैकी एक प्रकार असावा. कोकणात आपण जेव्हा नैसर्गिक उर्जेने भरलेल्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला अलौकिक अनुभव येतो. उर्जा जुळून येत नसेल तर कसलाही अनुभव येत नाहीत. आपण त्यावर विश्वासही ठेवू शकत नाही. कोकणात अलौकिक वातावरणामुळे लोकांना चांगले वाईट अनुभव येतात. या शक्ती ठराविक ठिकाणी वास्तव्य करून असतात. मनुष्यप्राण्याचा वावर नाही, स्वच्छता नाही. चिखल, पाणी, गच्चझाडी, डेरेदार वृक्ष, भव्य सरोवर, बंद पडलेली सदनिका, जुने मंदिर, पडलेला वाडा, पडलेली बुजलेली विहिर, जुनाट आड अशा ठिकाणी नकारात्मक शक्तींचे वास्तव्य असते. नकारात्मक शक्तींची स्वतःची एक वारंवारिता (फ्रिक्वेंसी) असावी. काही कारणाने आपण त्यात आलो तरच त्यांच्या अस्तित्वाचा अंदाज येतो.

आजही कोकणातील अनेक देवळात पाषाण न्याय निवाडा पद्धतीद्वारे जनतेला सुखी ठेवण्याचे काम सुरू आहे. कोकणातील गावरहाटीची संकल्पना समजून घेतली की नकारात्मक उर्जा समजणे सोपे होईल. मागील किमान २० वर्षे आम्ही कोकणात व्यावसायिक कारणे बारमाही दिवसा-रात्री ऊन-वारा-पावसात पनवेल ते पणजी अशी भ्रमंती करतो आहोत. निसर्गातील अद्भुत, अगम्य-अतर्क्य, अमानवीय अनुभूती आम्हीही घेतल्या आहेत. अर्थात सह्याद्रीत आणि कोकणात आम्हाला आलेल्या साऱ्या अनुभूती या सकारात्मक राहिल्यात. नकारात्मक अनुभूती नाही असं नाही पण त्या आमच्यासोबत असलेल्यांना अधिक जाणवलेल्या आहेत. समर्थ रामदास जवळपास चार दशकांच्या साधनेनंतर आपल्या घरी वृध्द आईला भेटायला आले. तेव्हा आईचे डोळे गेले होते. हे लक्षात येताच समर्थांनी तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. आईला दृष्टी आली. उघड्या डोळ्याने आईने समर्थांना विचारले, ‘इतके वर्ष बाहेर राहून कोणते भूत वगैरे वश केलेस का? ही भूतचेष्टा कुठून शिकून आलास?’ यावर समर्थांनी आईला अत्यंत गोड शब्दात मोजक्या पदात प्रभू श्रीरामांचे चरित्र ऐकवत सुंदर उत्तर दिले. त्या पदाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ‘सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥‘ बाकी ज्याची त्याची मर्जी!

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

(पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांची पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली पंचवीस वर्षेहून अधिक काळ ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

परखड शब्दात ‘कटूसत्य’ सांगणारे ‘निसर्गशास्त्रज्ञ’

२००८! आमच्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तकाच्या प्रकाशनाची गुढीपाडव्याची तारीख निश्चित झालेली. पुस्तक स्वरुपात पहिल्यांदाच मजकूर प्र...