आम्हाला आणि आमच्या वडिलांना सख्खी बहिण नाही. आपसूक ‘सख्खी आत्या’ नाही. सौ.च्या वडिलांना म्हणजे सासऱ्यांनाही सख्खी एक बहिण! लग्नानंतर ती आमचीही आत्या झालेली. १ जून २००९ रोजी विवाहबद्ध झाल्यावर आमचा, वारकऱ्यांचा तालुका असलेल्या पोलादपूरशी, मामांशी आणि त्यांच्या पत्नी शशिकला (आत्या) यांच्याशी विशेष स्नेह जुळलेला. मृत्यूप्रसंगी आत्ये ७५ वर्षे वयाची होती. शीघ्रकवी असलेल्या आत्येच्या संवादात विविध संतांचे अभंगच अधिक असायचे. कधी केला असेल तिने हा अभ्यास? असा प्रश्न पडावा इतक्या गतीने ती एकावर एक संतवचने निरुपणासह ऐकवायची. तिच्या अशा संवादात गर्भितार्थ दडलेला असायचा. ‘आपण आता अक्षरं म्हणतो पूर्वीच्या काळात वचनं म्हणायचे’ असं ती सांगायची. अक्षरांना वचनाप्रमाणे सांभाळल्याने इतरांचा विश्वास मिळतो. आपल्या बोलण्याला महत्त्व प्राप्त होते. हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सामाजिक संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते. आजच्या पिढीला हे कार्यशाळा घेऊन शिकवावे लागते. मात्र आपण जे बोलतो किंवा जे वचन देतो, त्याप्रमाणे वागणे आणि त्याचे पालन करणे हे तत्त्व आत्ये-मामांनी जीवनभर जपले होते. ही बाब उभयतांना अनुभवलेल्या अनेकांच्या तोंडून आम्हीही ऐकलेली. यामुळे या दोघांना आपल्या बोलण्यावर आणि कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासह इतरांचा विश्वासही संपादन करता आला होता. विठ्ठलाची पूजा करणाऱ्या वारकऱ्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनातही भक्ती आणि सामाजिक मूल्यांचा खोलवर प्रभाव दिसतो. अशा पती-पत्नी जीवनात त्याग, क्षमा आणि प्रेम यासारख्या गुणांना महत्त्व देतात. पती-पत्नी म्हणून एकमेकांना देवही मानतात. ते पती-पत्नी म्हणून एकमेकांना आणि भगवान विठ्ठलाला समर्पित असतात. वारकरी वैवाहिक जीवन हे भक्ती, त्याग, क्षमा, प्रेम, साधेपणा आदी सामाजिक मूल्यांनी भरलेले असते. आत्ये-मामांच्या सहवासात आम्हाला हे सारं अनुभवायला मिळालं. आमच्याशी अधिकारवाणीने संवाद साधणाऱ्या मोजक्या माणसांत आत्ये एक होती.
आत्येचा एकूणच दरारा मोठा राहिलेला. तिचं महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुकच्या नाक्यावरील श्रावणातील ग्रंथपरंपरा जपलेलं घर अडीअडचणीतील गरजूंसाठी हक्काचे होते. त्याकाळी कोकणातला ‘रानमेवा’ मुंबईला पाठविण्याचा व्यवसाय करणाऱ्या आत्तेच्या घराच्या दारात भला मोठा तराजू टांगलेला असायचा. त्यावर उन्हाळी हंगामात आंबा, कैरी, फणस, करवंदे, जांभळे यांचा व्यापार चालायचा. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळायचा. हिशोब करायला आत्ये बसलेली असायची. कपाळी भले मोठे कुंकू लावलेली, डोक्यावर पदर घेतलेली, अत्यंत कडक आवाजात बोलणारी आत्ये इथे अनेकांना भेटायची. आतून ती तितकीच मायाळू आणि प्रेमळ होती. याचा प्रत्यय मामांना भेटायला येणाऱ्यांना आत्येच्या हातचं चहापान घेताना यायचा. उभयतांच्या काळात अनेक संत-सज्जनांची पाऊले या घराकडे वळत राहिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पोलादपूर शाखेची आत्ये अध्यक्ष राहिलेली. तिने कापडे बुद्रुक गावच्या शाळेत २००५साली दीड दिवसांचे साहित्य संमेलन घेतले होते. आलेल्या पाहुण्यांना आपल्या हातचं खाऊ-पिऊ घातलं होतं. तिच्यासोबत कधी गप्पा मारायला बसलो तर ती आम्हाला ज्ञानाची महती सांगायची. ‘हाताच्या बोटावर मोजण्याइतकी ज्ञानी माणसं या धरित्रीवर टिकतील’ म्हणायची.
श्री गुरु आजरेकर संप्रदाय (कोकण विभाग) माध्यमातून पोलादपूर तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध गावात वारकरी संप्रदायाचे एक मोठे नेटवर्क तयार केलेली आत्ये एक अद्भुत व्यक्ती होती. तिला आपल्या पोलादपूरच्या जाधव कुटुंबियांबद्दल जितके प्रेम तितकेच कापड्याच्या सकपाळ कुटुंबियांबद्दलही होते. सर्जनशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आत्येने अद्भुत वाटाव्यात अश्या काही काव्यरचना केलेल्या. आत्येच्या या अचाट शीघ्रवाणीचे सामर्थ्य अनुभवण्याचा योग १५ डिसेंबर २०१६रोजी आम्हाला आला. तो दिवस आमचे सासरे अरुण दाजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनाचा होता. शिरस्त्याप्रमाणे पोलादपूरला, भावाला भेटायला आलेल्या आत्येला नियोजित कार्यक्रमाचं कळलं. दिवसभर ती विचार करत राहिली असावी. तिने एका कागदावर लिहिलेल्या काव्यपंक्ती सायंकाळी कार्यक्रमात ऐकवल्या तेव्हा उपस्थितांनी तिला टाळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिलेली. अर्थात काव्यपंक्तीही तशाच होत्या. पण त्यातील, ‘अभागी मी एकटी। अकरा जणांत धाकुटी।। माता पिता छत्र गेले। माझे सर्व आले संपुष्टी।।’ या पंक्तीने मात्र आम्हाला अस्वस्थ केलेले. आत्येनं कागदावर लिहिलं होतं...
चांदीच्या गं निरांजनी वात तुपाची तेवते।
माझ्या लाडक्या बंधूला पंचाहत्तरीला ओवाळिते।।
जाधवांच्या घराण्यात जन्मा आला अधोक्षज।
जन्मा आल्यापासुनि त्याला न्यायनिवाड्याची हौस।।
प्रामाणिक काम त्याचे साच बोलणे रोकडे।
त्याच्यापुढे मेरू आणि मज मंदार तोकडे।।
असा माझा बंधूराया सदाशिवाचा अवतार।
माऊलीच्या कृपेने गं त्याचा चालिला संसार ।।
तीन मुली दोन मुलगे त्यांस अडचण काही नलगे।
आणि लाडके जामात क्षीराब्धीच्या सागरात ।।
रजकणांचे आकलन धीरज ते धीरज धरणारं।
आणि मोठे प्रशांत तेही महा महासागर।।
अभागी मी एकटी अकरा जणांत धाकुटी।
माता पिता छत्र गेले माझे सर्व आले संपुष्टी।।
असा बंधूचा परिवार लोभस राजस सरोवर।
बंधू-वहिनी मजवरी ढाळति छत्र आणि चामर।।
त्रैलोक्यात असा भाऊ कुणा नाही मिळणार।
देवा मागणे माझे हे आयुष्य दे दादा वाहिनीला।।
आत्येचे वडील दाजी काळू जाधव यांना तीन पत्नी होत्या. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक कन्या, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलगे आणि एक कन्या आणि तिसऱ्या पत्नीपासून सहा मुलगे आणि एक कन्या होती. सहावे अपत्य म्हणजे आमचे सासरे आणि शेवटची कन्या म्हणजे आत्या याचा आम्हाला, ‘अकरा जणांत धाकुटी’ असं आत्येच्या तोंडून ऐकल्यावर शोध लागला होता. त्याच काव्यात आत्येनं पुढे ‘माझे सर्व आले संपुष्टी’ असंही म्हटलं होतं. आत्या उच्च पारमार्थिक विचारांची स्त्री होती. तिच्या मनीचे भाव सहज समजण्यासारखे नव्हते. त्या अभीष्टचिंतनाच्या कार्यक्रमात तिला याबाबत विचारायचं राहिलं ते राहिलंच! पुन्हा तो योग आला नाही. मामांच्या पश्चात सव्वा वर्ष त्यांच्याच नावाचा ध्यास घेऊन निराशेचं जीवन ती जगली. त्यातून तिची मामांशी असलेली वचनबद्धता आमच्यासारख्यांना जाणवत राहिली. वैवाहिक जीवनात पतीला भक्कम आधार दिलेल्या आत्तेने ध्यासमग्न स्थितीत आपला देह ठेवला. अंत्यसंस्कार प्रसंगी आत्येचं पार्थिव शरीर जवळच्या स्मशानभूमीत नेताना, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता । निरोप द्यावा आता येतो आम्ही ।। हे भजन म्हणण्यात आलेलं. कापडे बुद्रुक गावातील फौजदारवाडीतून रस्त्यानजीक वाहणाऱ्या ओहोळाच्या शेजारील जागेत स्वर्गीय मामांचा अग्निकाष्ठ झालेला. आत्तेला तिथेच मामांच्या शेजारील जागेत अग्नी देण्यात आला. कोकणात झालेल्या अवकाळी पावसाने तो ओहोळही जिवंत होऊन जणू आत्येला लगबगीने भेटायला आल्यासारखा भासत होता. ‘मृत्यूचा सोहळा व्हावा ऐसा’ असं वातावरण या उभयतांनी मृत्यू पश्चात जगलं असावं.
ब्रिटिशकाळात रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील दऱ्याखोऱ्यांचा अविकसित भाग अशीच ओळख राहिलेल्या पोलादपूर तालुक्याच्या गत शंभरेक वर्षातील घडामोडींचे सकपाळ मामा साक्षीदार होते. मृत्यूप्रसंगी मामा ९५ वर्षे वयाचे होते. मामांचा जन्म १९३३सालचा! मामांनी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सभापती, श्रीगुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड दिंडी पंढरपूरचे विश्वस्त, १९६७-७२ या कालावधीत पोलादपूर तालुका पंचायत समितीचे सभापती आदी पदे भूषविली होती. मामा हे कापडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य, पोलादपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, कॉंग्रेस कमिटी पोलादपूरचे प्रांतिक सदस्य राहिले होते. पूर्वीपासून पोलादपूर हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून परिचित. या तालुक्याची राजकीय आणि शैक्षणिक पीछेहाट होत असताना बंधुजीराव पालांडे, बाळाराम मोरे, वि. सु. मालुसरे, कोंडीराम मास्तर उतेकर, कमलाकर चित्रे, श्रीपती मोरे, बाबाजी महाडिक आदींसह मामांनीही तालुक्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी काम सुरु केले होते. ह्या अल्पशिक्षित मंडळींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले योगदान दिलेले. याच मंडळींच्या योगदानामुळे पंचक्रोशीत शाळा-हायस्कूल उभ्या राहिल्या. मामांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेत पोलादपूरच्या कुंभारवाडयात (भैरवनाथनगर) चळवळीचे कार्यालय सुरू केले होते. पंचक्रोशीतील २८२ गावे पायी चालून संयुक्त महाराष्ट्राची भूमिका जनमानसांत रूजविली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढयाच्या काळात ‘गुप्तवार्ता’ पोहोचविण्याचे कामही मामांनी केले होते. रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कापडे गावातील वरदायिनी माध्यमिक विद्यालयासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. मंडळाचे अध्यक्ष कै. दादासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना १५ जून १९७० साली झाली. तेव्हापासून ५४ वर्षे त्यांनी विद्यालयाचे ‘सभापती’ म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनीच शाळेत उच्च माध्यमिक शाखा सुरु केली. खरंतर शाळेच्या अध्यक्षांना स्कूल कमिटी चेअरमन म्हणायची पद्धत आहे. परंतु मामा पोलादपूर पंचायत समितीचे सभापती असताना शाळा सुरु झाल्याने शाळेतही ‘सभापती’ शब्द रूढ झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सावंत कापडे-देवळे भागात प्रचारासाठी आले होते. त्यांच्यासमोर कागदावर स्वाक्षरीसाठी अंगठे देणारी जनता पाहून मामांनी त्यांच्यादेखत, ‘दादा! अकलेची दुकाने काढा कापड्याला अन देवळ्याला (अर्थात शाळा सुरु करा)’ म्हटल्याची आठवण शाळेचे माजी मुख्याद्यापक अ. वि. जंगम यांनी नोंदवली आहे. उभयतांच्या कार्यकाळात मधु मंगेश कर्णिक, मारुती चितमपल्ली, दा. कृ. सोमण आदी दिग्गज मंडळी कापड्याच्या शाळेत येऊन गेली. पोलादपूर, कापडेसह देवळे, साखर, उमरठ, मोरसडे या तालुक्यातील गावात शाळा उभारणीत, सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मामांचे योगदान राहिले. रायगड जिल्हा परिषद शाळा कापडे बुद्रुक गावातील प्राथमिक शाळेचे ते रजिस्टर क्रमांक एकचे विद्यार्थी होते. १९६०मध्ये त्यांनी श्री गुरु आजरेकर फडाचे ज्ञानदेव विठ्ठल भुरे माऊली यांचे शिष्यत्व पत्करून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. या दिंडीला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मामांनी पोलादपूर तालुक्यात हरीनाम सप्ताह व्हावेत म्हणूनही लक्ष दिले. एकविसाव्या शतकात तालुक्याचा विकास होत असताना गाव आणि वाड्यावस्त्या ओस पडू लागल्याची खंत त्यांना होती. मामांचे निधन झाल्याची दु:खद बातमी आम्हाला समजली तेव्हा आम्ही पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिर परिसरात होतो. ज्या मामांमुळे आम्हाला जीवनात पहिल्यांदा रिंगण सोहोळा अनुभवता आला त्या मामांना श्रीनामदेव पायरीवरूनच आम्ही मनोमन श्रद्धांजली वाहिली होती.
‘जीवन तो वही, जो समाज को दिशा दे’ म्हणतात. आत्ये आणि मामा असं जीवन जगलेली माणसं. त्यांचे काही काळचे सान्निध्य आम्हाला लाभले. लग्नानंतर दोनेक आठवडे देवदर्शन करीत असताना, आत्येने आम्हाला फलटणचे नेत्रदीपक रिंगण (२५ जून २००९) पाहायला, माऊलींच्या दर्शनाला बोलावलेले. एका विस्तीर्ण माळरानावर चुलीवरील आपल्या हातच्या अळूवडीचे केळीच्या पानावर चविष्ट भोजन खाऊ घातलेले. तो भोजन आनंद आजही आमच्या मनात ताजा आहे. दरवर्षी आपल्या आजरेकर फडातल्या सहकाऱ्यांसाठी पाचेक किलोच्या डबाभर अळूवड्या बनवून नेणारी ही आते होती. आत्तेविषयी रोज नवनवीन माहिती कानी पडणारा तो काळ होता. पंढरपूरचे दर्शन झाल्यावर मामांच्या साक्षीने, ‘जावई! आता एकदा आम्हाला दोघांना घेऊन आळंदीला चला!’ अशी आत्येची ‘अधिकारवाणी’ आम्ही पहिल्यांदा ऐकलेली. आम्ही ‘हो!’ म्हणणं ओघाने आलेलं. पुढच्या दोनेक महिन्यात आम्ही उभयतांना घेऊन आळंदीला माऊलींच्या दर्शनाला गेलेलो. आमचा ‘पंढरपूर ते आळंदी’ हा जीवनातील पहिला प्रवास या उभयतांच्या सान्निद्ध्यात झालेला. १६-१७ वर्षांच्या सहवासात आत्येच्या ‘अधिकारवाण्या’ आम्ही ऐकल्या. अंत्यविधीप्रसंगी श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलतानाही आम्हाला आठवली ती आत्येची अधिकारवाणीच! आत्येची ही अधिकार'वाणी’ पुन्हा कधीही ऐकायला मिळणार नाही. याची जाणीव आता डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरते आहे.
धीरज
वाटेकर चिपळूण
मो.
९८६०३६०९४८