गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

अचाट वनसंवर्धन प्रयोगांची तीन दशके

             जंगल-देवरायांमध्ये खूप धडपड, मेहनत आणि संयमाच्या माध्यमातून वनसंवर्धनाचे अचाट प्रयोग 'प्रत्यक्ष जमिनीवर' यशस्वीपणे राबविणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ पुणे (AERF) संस्थेने तीन दशकांचा कार्यकाळ (१९९४-२०२४) पूर्ण केला आहे. खाजगी जंगल संवर्धन, देवराई व जंगलांचे पुनरुज्जीवन, वनशेती, पारंपरिक बियाणे संरक्षण व संवर्धन, सेंद्रिय पद्धतीने फळबाग व्यवस्थापन, आर्थिकदृष्टया उपयुक्त बांबू आदी झाडांची लागवड, सुधारित चुल निर्मिती आणि वितरण, दुर्मीळ वनस्पतींचा अभ्यास व संवर्धन, कांदळवन संवर्धन, स्थानिक लोकांचे सक्षमीकरण, स्थानिक लोकांना निसर्ग व्यवस्थापनाशी जोडणे, वनस्पती संशोधन आणि निर्मिती, जैवविविधता समिती सक्षमीकरण, लोक जैवविविधता नोंदवही, निसर्गपूरक पर्यटन (भीमाशंकर व अलिबाग) आदी प्रयोग सहाशे गावातून यशस्वी केले आहेत. संस्थेने तीन दशकांच्या कार्यपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील देवरुख कार्यक्षेत्रात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' कामाचे फ्रेमवर्क तयार केलेल्या, मानवी जीवन बदलवण्याची क्षमता असलेल्या या संस्थेच्या विलक्षण कामाचा हा आढावा...

 

समुदाय आधारित संवर्धन कामाचे फ्रेमवर्क


१९९४मध्ये स्थापना झाल्यापासून, अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) सह्याद्रीत जिथे इतर कोणतीही संवर्धन यंत्रणा अस्तित्वात अशा ठिकाणी काम करत आहे. AERFने 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' (Community Based Conservation) कामाचे फ्रेमवर्क तयार केले आहे. देवराया या परंपरेने देवतेच्या श्रद्धेने समुदायांनी संरक्षित केल्या आहेत. देवराया म्हणजे अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे समृद्ध भांडार आहेत. देवरायांमध्ये अनेक पाणी साठवण्याची पारंपारिक यंत्रणा आहे. येथील अनेक महाकाय वृक्ष कार्बन शोषून घेण्याचे काम करतात. AERFने आजवर ८० पवित्र उपवनांच्या पर्यावरणीय पुनर्संचयनाचे काम केले आहे.

संचालक - डॉ. अर्चना गोडबोले 

सहसंचालक - श्री. जयंत सरनाईक 

१९९४मध्ये स्थापन झाल्यापासून, AERF ‘प्रत्यक्ष जमिनीवर संरक्षण व संवर्धन कार्यक्रम उत्तर सह्याद्री परिसरात राबवत आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट क्षेत्रात जातात. संगमेश्वर तालुका हा पश्चिम घाटात वसलेला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य (BWLS) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ आहे. हे भारतीय जायंट स्क्विरल (शेखरू) आणि स्थानिक समुदाय - महादेव कोळी यांच्या निरोगी लोकसंख्येसाठी ओळखले जाते. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (IBA) आहे. AERFने २००६पासून येथे पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकणारे, शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी काम सुरु ठेवले आहे. तेथे हिरडा संकलनही चालते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आणि कातकरी व ठाकूर या जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायांचे घर आहे. AERFने अलिबागमधील महाजने गावात विकेंद्रित बायो-डिझेल संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. ग्लोबल व्हिलेज एनर्जी प्रोग्राम (GVEP) अंतर्गत हा प्रकल्प २००८ मध्ये सुरु झाला आणि तो आजही सुरु आहे. हा प्रकल्प गावातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशी बायो-डिझेल उत्पादन देणाऱ्या झाडांच्या प्रजाती-करंजाच्या वापरावर लक्ष केंद्रित करतो आहे. राज्यात करंजाची झाडे अलिबाग (रायगड) आणि सोलापूर जिल्ह्यात अधिक आहेत. सोलापूर भागात त्यांना विशेष महत्त्व नाही. मात्र अलिबाग भागात या झाडाचा उपयोग करून घेण्याची पारंपरिक व्यवस्था आजही आहे.

 

सिंधुदुर्ग हा पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात वसलेला अरुंद किनारी जिल्हा आहे. हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध असलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंसाठी प्रसिद्ध आहे. AERFने देवराई परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि संरक्षण करारांतर्गत येथे काम करत आहे. २०१०-११मध्ये जैवविविधता मूल्यांकन आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याने AERFने मुख्यतः असनिये आणि दाभिळ गावातील जमीन विनाशकारी खाण प्रकल्पापासून सुरक्षित केली. त्याबरोबर सावंतवाडी आणि दोडामार्ग जिल्ह्यातील सुमारे ५०० चौ किमी जंगल संरक्षण करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.  विशेष म्हणजे असनिये गावात पृष्ठभागावरील पाण्यापासून (surface water) विकसित झालेल्या प्रचंड उत्पन्न देणाऱ्या काजूच्या बागा आहेत.

 

देवरुख कार्यक्षेत्रातील काम

एईआरएफ संस्थेच्या ६० जणांच्या टीमपैकी देवरुख केंद्रावर सुमारे तीसेक विषयतज्ज्ञ लोकं काम करत आहेत. ‘अदिवासी भागातील लोकज्ञान आजच्या काळात संवर्धन विषयात उपयोगात आणता येईल का? पासून सुरुवात करून सह्याद्रीतील विशेषतः कोकणातील जंगलातून विशेष मेहनत न करता पैसे मिळायला लागले तरच ती वाचतील’ इथपर्यंतची भूमिका एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांनी अभ्यासकांना सुरुवातीलाच स्पष्ट करून सांगितली. उत्तर सह्याद्री भागात पर्यावरणाचे प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत. उत्तर सह्याद्री भागात महत्वाची जैवविविधता नाही, सर्वकाही दक्षिणेकडच्या सह्याद्री भागात आहे असंच मत काही तज्ज्ञांचं बनत असल्याचं ध्यानात आल्यावर ‘एईआरएफ’ संस्थेचा जन्म झाला होता. तज्ज्ञांचं मत असंच राहिलं तर अडचण वाढत जाणार होती. शहरी-निमशहरी भागातील आपण मंडळी दोन-चार झाडे लावून पर्यावरण संवर्धन केल्याचे समाधान मिळवतो. मात्र सह्याद्रीच्या ग्रामीण भागात याचा उपयोग नाही. सह्याद्रीतील खाजगी जंगले वाचवण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) या संस्थेने प्रकल्प सुरू केला. देवरुख भागातून या प्रकल्पाला सुरुवात केलेल्या संस्थेने आतापर्यंत उत्तर सह्याद्रीतील ७३ गावातील १३ हजार एकर जंगल सन २०३२ पर्यंत संरक्षित केलेलं आहे. समृद्ध जंगलांच्या वापराबाबतची समाजाची धारणा ही इंधनाच्या गरजांसाठी लाकूड किंवा लाकूडतोडीशी संबंधित आहे. AERFने जंगले त्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतात हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. जैवविविधता संवर्धनाचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. नवकल्पना, दीर्घकालीन प्रयत्न आणि अंमलबजावणीतील सातत्य याद्वारे यावर उपाय शोधले जाऊ शकतात. ’वृक्षलागवड’ हा शब्द अलीकडे फार प्रतिष्ठित झाला आहे. परंतु ’वृक्षलागवड’ हा शब्दच चुकीचा आहे, अशी संस्थेची धारणा आहे. आपण रोपं लावण्याचे काम करतो. लावलेल्या रोपाची वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून जोपासना केली तर अनेक वर्षांनी रोपांचे वृक्ष होण्याची शक्यता असते. वृक्षलागवडीने वृक्षतोडीची भरपाई मुळीच होऊ शकत नाही. एखाद्या महावृक्षाने वर्षानुवर्षं साठवून ठेवलेला कार्बन वृक्ष तोडल्यावर वातावरणात उत्सर्जित होतो. तेवढा कार्बन शोषून घ्यायला नवीन लावलेली झाडे किमान २०-२५ वर्षं मोठी व्हावी लागतात. आज वृक्षतोडीचा वेग प्रचंड आहे. कुठली झाडे कुठे लावायची? कशी लावायची? याचे शास्त्र बाजूला ठेवून निव्वळ ’अमुक अमुक कोटी’ इतका आकडा पूर्ण करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला दोन दोन फुटांवर झाडे लावण्याने निसर्गसंवर्धन होत नाही हे आपण समजून घ्यायला हवे आहे.

माध्यमातील अभ्यासकांना मार्गदर्शन करताना
‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेच्या
संचालक डॉ. अर्चना गोडबोले

देवराई पुनरुज्जीवन 

संस्थेने संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावी श्रीजुगाईदेवी ग्रामदेवतेच्या देवराईत पुनरुज्जीवन कार्यक्रम सुरु केला. तेव्हा तिथे ३१८ आकेशिया, गिरिपुष्प आदी वनस्पती होत्या. प्रयत्नांति आज सुंदर देवराई बहरलेली दिसते. सह्याद्रीत वर्षानुवर्षे जंगलतोड हा कार्यक्रम सुरु असताना संस्थेने मात्र किरदाडी (संगमेश्वर) गावात एका गृहस्थांच्या १५ एकर खाजगी पडीक जमिनीवर वनशेती विकसित केली. या जमिनीवर पूर्वी करवंद, रानमोडी, पेठगुळी आदींचे रान वाढलेले होते. जंगलात पाय ठेवणेही मुश्कील बनल्याने दुर्लक्षित होते. आज त्या भागात निलगिरी वूड पिजन सारख्या विविध पक्ष्यांसह, खवलेमांजर, गवे, बिबट्या, रानमांजर यांचा अधिवास आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुळे गावात ३३एकर क्षेत्राची श्रीनवलादेवीची देवराई आहे. संस्था यापैकी २०एकरवर काम करते आहे. या देवराईतील ५ एकर क्षेत्र गडगडी धरणाच्या कॅनॉलला सोडलं गेलं. परिणामस्वरूप देवराई दुभंगली. तोड वाढली. देवराईतील आपल्या कार्यक्षेत्रात संस्थेने साफसफाई केली. झाडांवर चढणाऱ्या वेली काढून झाडांना मोकळा श्वास घेऊ दिला. झाडे मोठी होऊ लागली. आमच्या भेटीत ही झाडे आकाशाशी स्पर्धा करायला सज्ज झालेली दिसून आली. संस्था या भागात वर्षाला किमान १० शेतकऱ्यांना १७५ दिवसांचे काम देते आहे. देवराईने ३०० प्रकारचे जैववैविध्य सांभाळले आहे. दीडशेहून अधिक वनस्पती आहेत. इथे सीता-अशोक, सांद्रुक, पन्नासेक दासवणसह वेगळ्या प्रकारची सावलीत वाढणारी अंजनीची झाडे आहेत. संस्थेने याच देवराईत एका वडाच्या झाडावर १७-१८ ग्रेट हॉर्नबील पाहिलेत. बाकी निलगिरी वूड पिजन, गरुड, ककणेर, माडगरुड, जंगली कुत्रे अशी संपदा आसपास आहेच! वाशी तर्फे संगमेश्वर गावात मोडकाडंग येथील श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची २२एकर देवराई आहे. संस्थेने ३० वर्षांपूर्वी याच देवराईतून आपले काम सुरु केले होते. संरक्षणाच्या दृष्टीने देवराईला गडगा व गेट बांधलेले आहे. विशेष म्हणजे, आता पिक घेतलं जात नसलं तरी या देवराईत पूर्वांपार ‘देवशेत’ आहे. पूर्वी देवशेत केलं जायचं. अख्खा गाव दिवस ठरवून शेत करायचा. उत्पन्नाचे धान्य गरीब-गरजूंना मिळायचे. त्या बदल्यात त्यांनी देवराईत किंवा मंदिर परिसरात काम करायचं असं पूर्वांपार नियोजन होतं.

 

संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन

संगमेश्वर तालुक्यातील
कुळे गावातील श्रीनवलादेवीची देवराई


संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन




भारत हा पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय या दोन जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटनी युक्त आहे. सह्याद्रीचा उत्तर पश्चिम घाट भाग हा संयुक्त राष्ट्रांनी (UN) जाहीर केल्यानुसार जगातील २% जैवविविधतेचे घर आहे. यात सुमारे ५००० प्रजातींच्या फुलांच्या वनस्पती आणि पक्ष्यांच्या ६०० प्रजाती आहेत. मात्र यातील महत्त्वाच्या अनेक वन्यजीव कॉरिडॉर झोनमध्ये अनेक एकर खाजगी मालकीची जंगले आहेत. भारतात १३ हजारपेक्षा जास्त दस्तऐवजीकरण केलेल्या देवराया आहेत. भारताच्या पर्यावरणीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे महत्त्व लक्षणीय आहे. दुर्मीळ जैवविविधतेचे आश्रयस्थान असलेला पश्चिम घाट हा भाग वृक्षतोड, अज्ञान आणि उदासीनतेच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आहे. पश्चिम घाटातील उत्तर पश्चिम घाटाचा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, कीटक यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. गोडबोले यांनी आपली सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ देवरायांसाठी काम सुरु केले. काही समविचारी सहकाऱ्यांसोबत ‘अ‍ॅप्लाईड इन्व्हॉरमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली होती. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील देवरायांपासून कामाला सुरूवात करताना गावकऱ्यांना संस्थेच्या कामाचे गांभीर्य लगेच लक्षात आले नव्हते. मात्र सततच्या प्रयत्नांनंतर देवराईत पुन्हा झाडे वाढू लागली. आसपासच्या विहिरीतून पाण्याची पातळी वाढली. गावकऱ्यांनी विश्वास दाखवण्यास सुरूवात केली. संस्थेच्या या कामाला दिल्लीच्या प्रतिष्ठित सिव्हिल सोसायटी मासिकातर्फे समाजात बदल घडविण्यासाठी, पायाभूत स्तरावर काम करणाऱ्यांना दिला जाणारा ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार मिळाला आहे.

 


लोकसहभागातून जंगल संरक्षण

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडीत संस्थेने लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्पाचा करार केलेला आहे. याद्वारे २०२८ पर्यंत ५०४एकर खाजगी जंगल राखलं गेलंय. यात १०० सहभागी शेतकरी आहेत. पैकी जमिन मालक आणि गावाचे सरपंच रत्नाकर सनगरे यांची अभ्यासदौऱ्यात भेट झाली. ‘हे जंगल वाचवल्याने जमिनीची धूप थांबली. जमिन अधिक पाणी शोषून घेऊ लागली. वाडीतील पाण्याचे प्रमाण वाढले. जवळचे ओढे जास्त काळ पाण्याचे राहू लागले. विहिरींना पाणी इतकं वाढलं की त्यावर पाणी योजना केली गेली. वाडीत नळाने पाणी पोहोचलं. यासोबत लोकांना आर्थिक फायदाही मिळाला’ असं सनगरे यांनी सांगितलं. देवरुख अभ्यासदौऱ्यात एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांच्यासह गुणवंत महाजन, राजेश जाधव, संजय पाष्टे, सचिन पर्शराम अशा अनेक जमिनीवर काम करणाऱ्या  विषयतज्ज्ञांनी माहिती दिली.

 

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प फलक 

खासगी आणि सार्वजनिक जमिनी अशा दोन्ही ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे काम आव्हानात्मक आहे. दोन्ही ठिकाणची कार्यपद्धती वेगवेगळी असते. देवराया सार्वजनिक असतात. अशी सार्वजनिक क्षेत्र राखण्यासाठी संपूर्ण गावाबरोबर काम करावे लागते. ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या ही प्रक्रिया थोडीशी दीर्घकालीन असते. खासगी जमिनीच्या बाबतीत फक्त जमीन मालकाशी व्यवहार असतो. अर्थात एका सातबाऱ्यावर अनेक नावे असल्यामुळे सगळ्यांची संमती घेणे हे एक आव्हान असते. एखादा खासगी जमीनमालक त्याच्या जमिनीवरचे जंगल न तोडता राखणार असेल तर आम्ही त्याच्याशी दहा वर्षांचा लेखी सामंजस्य करार करून प्रतिएकर काही ठराविक रक्कम बक्षीस / मोबदला म्हणून देतो. हा करार करताना मालकाचा जमिनीवरचा मालकी हक्क कायम राहील, याची स्पष्ट लेखी हमी संस्था देते. जेणेकरून त्याच्या मनात काही शंका राहू नये. यामुळे लोक लेखी करार करायला तयार होतात.

 

सह्याद्रीच्या डोंगराळ भागात पूर्वी ‘कुमरी’ पद्धतीने शेती चालायची. ही कुमरी पद्धतीने होणारी शेती community फार्मिंगचे उत्तम उदाहरण होती. पुढे आंबा आणि काजूच्या बागांच्या उभारणीत आम्ही या पारंपारिक शेती पद्धतीसह कोकणातील जैवविविधता संपवली. World Bank forestry projectने सुचविल्याप्रमाणे सह्याद्रीसह संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी विदेशी झाडे लावली गेली. परिणामस्वरूप रिठा, बिब्बा आदी महत्त्वाची देशी झाडे कमी होत गेली. कोकणातील निम्मे जमीन / जंगल खाजगी आहे. त्याची बेसुमार तोड होते. हे जळावू लाकूड जवळच्या इचलकरंजीला अधिक लागतं. कोकणात ते उपलब्ध होतं. एकदा तोडलेलं हे जंगलं पुन्हा उत्पादनक्षम व्हायला वेळ लागतो. अशी जंगलं पुनरुज्जीवित करायला धनेश सारखे पक्षी आवश्यक आहेत. म्हणून संस्थेने यावरही काम केलं. लोकं जंगलांप्रमाणे देवरायाही तोडतात लक्षात आल्यावर संस्थेने ५०० देवरायांचा सखोल अभ्यास केला. प्रत्यक्ष संवर्धन कामात उपयुक्त होईल असे जैवविविधता संशोधन केले. संस्थेच्या संशोधनानुसार तळकोकणात नाचणीच्या २७जाती मिळायच्या, आज चार जातीही शिल्लक राहिलेल्या नाहीत. सह्याद्रीतील जंगले शासकीय पातळीवर ताब्यात घेतानाही स्थानिकांच्या मानसिकतेचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं संस्थेला वाटतं. कारण जंगलातील बफर झोनमधून कोअरमध्ये जा-ये करणाऱ्या स्थानिकांना आम्ही चुकीची वागणूक देणार असू तर तो त्याच जंगलाला आग लावून आपला राग व्यक्त करू शकतो हेही आपण लक्षात घ्यायला हवं आहे.

 

वनोपजांचे मार्केटिंग

वनोपजांचे योग्य मार्केटिंग करून त्याद्वारे जंगलसंवर्धन कसे करता येईल? यासाठी संस्था काम करते आहे. देवरायांमध्ये बेहेडय़ाचे प्रचंड वृक्ष आहेत. बेहेडा गोळा करण्याचे काम अनेक गावकरी करत असत. पण त्यातून फारसा पैसा मिळत नसे. माळशेज घाटामध्ये संस्थेने देवराईतील ग्रामस्थांशी करार केला. तिथे हिरड्याची बरीच  झाडे आहेत. हिरडे विकून ग्रामस्थांना उत्पन्न मिळण्यासाठी संस्थेने मदत केली आहे. सोळा देवरायांमध्ये ’बेहडा संकलन कार्यक्रम’ सुरु झाला. यामध्ये निसर्गाला धक्का न लावता शाश्वत पद्धतीने बेहड्याचे संकलन करणे, त्यामधून मिळालेल्या मोबदल्याचे योग्य वाटप करणे आदी प्रशिक्षण संस्था ग्रामस्थांना दिले आहे. वनोपजांचे शाश्वत पद्धतीने संकलन केल्याबद्दल ’फेअरवाईल्ड फाऊंडेशन’ या जागतिक संघटनेकडून वनोपजांना प्रमाणपत्र दिले गेले. २०१५ साली संस्थेने हिरडा आणि बेहडा या वनोपजांसाठी हे प्रमाणपत्र मिळविले आहे. संस्थेने ‘नेचर कनेक्ट’ ब्रँड अंतर्गत आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद, हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदी शुद्धता प्रमाणित उत्पादने घेत असून त्याची संपूर्ण विपणन व्यवस्थाही तयार झाली आहे. जवळच्या चार-पाच तालुक्यातील हळद ही प्रक्रियेसाठी येत असते. बेहेडा चूर्ण पुरवण्यासाठी पक्का हर्ब्स या इंग्लंड मधील कंपनीशी संस्थेने करार केला आहे. यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे. मूल्यवर्धन आणि शाश्वत पुरवठा साखळी विकसित करून उच्च आर्थिक परतावा देऊ शकतात. एईआरएफचा ठाम विश्वास आहे की, खराब वातावरणात शाश्वत जीवन जगणे शक्य नाही. सह्याद्रीतील जंगलं उद्योगाशी जोडली जातायत हे सर्वसामान्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. संस्थेने देवरुख कार्यक्षेत्रात रोपवाटिका केली आहे. या रोपवाटिकेत निंबेरा, बिवळा, दासवण-चांदफळ, सीताअशोक, करंज, रिठा, फणस, चामोळी, सुरंगी, बकुळ, बहावा, सिरस, आवळा, सिसम, फाशी, हिरडा, बेहडा, अर्जुनसादडा, यरंडी, किळचा, जांभूळ, पारजांभूळ, कडूकवठ, सांदरुख आदी २७ प्रकारची ७ हजार रोपं आहेत.

 

संस्थेतर्फे नेचर कनेक्ट ब्रँड अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या
आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद,
हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदींची
माहिती देताना डॉ. गोडबोले आणि गुणवंत महाजन






‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेची रोपवाटिका

‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम

महावृक्ष म्हणजे अशी  झाडे, जी बघताक्षणी आपल्याला भव्यदिव्य वाटतात. ज्याची उंची २५-३० फुटांपेक्षा जास्त आहे. ज्याचा पर्णसंभार विस्तृत आहे. ज्याचा घेर दोन-तीन मीटरपेक्षा जास्त आहे ते वृक्ष. हे महावृक्ष किमान ८०-१०० वर्षं जुने आणि एका प्रदीर्घ काळाच्या पर्यावरणीय सुस्थितीचे निदर्शक असतात. असा महावृक्ष अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, खारीसारखे प्राणी, साप अशा जीवजातींना आश्रय देत असतात. ते वृक्ष म्हणजे एक परिसंस्थां असते. महावृक्षाच्या सावलीमुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहून माणसाचे, तसेच पशुपक्ष्यांचे जीवन सुसह्य होते. अशा महावृक्षांनी भरपूर प्रमाणात, टनावारी कार्बन वातावरणातून शोषून स्वतःमध्ये साठवून ठेवलेला असतो. ज्या क्षणी असे मोठे झाड तोडले जाते तेव्हा हा कार्बन पुन्हा उत्सर्जित होतो आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला खतपाणी मिळत असते.

 

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न
जवळजवळ १००० झाडे मोजून मालकांना प्रशस्तीपत्रक प्रदान

‘नवीन झाडे लावली म्हणजे जुनी कितीही तोडली तरी चालतील’ या भ्रमापोटी, वाढत्या शहरीकरणामुळे आज बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. जुन्या मोठ्या ‘महावृक्षा’चे महत्त्व ओळखून त्यांना वाचवण्याचे काम ही संस्था करते आहे. सह्याद्रीत, विशेषतः कोकणातल्या देवरायांत बेहडा वृक्षांची संख्या जास्त आहे. या वृक्षांवर धनेश (हॉर्नबिल) पक्ष्याची घरटी आहेत. धनेशाला वनशेतकरी (फॉरेस्ट फार्मर) म्हणतात. अनेक जंगली झाडांची फळे खाऊन बीजप्रसार करण्याचे आणि जंगल वाढवण्याचे काम धनेश करत असतो. संपूर्ण पश्चिम घाटामध्ये ’ग्रेट पाईड हॉर्नबिल’ आणि ’मलबार पाईड हॉर्नबिल’ या दोन पक्ष्यांनी बीजप्रसारावाटे जंगल राखण्याचे मोठे काम केले आहे. ’हॉर्नबिल’ वाचवायचा असेल तर त्याला घरटे बांधायला अनुकूल अशी मोठी झाडं वाचवली पाहिजेत, याचा विचार करून संस्थेने सह्याद्रीत असे वृक्ष कुठे कुठे आहेत? याची नोंद घेतली. ‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम सुरू केला. आर्थिक गरजेसाठी, पडून नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी किंवा विकासकामासाठी लोकांकडून या झाडांची तोड होते. अशी धोक्यातील झाडे हेरून त्या झाडांवर सूचनाफलक लावणे, झाडाच्या मालकाला थोडाफार आर्थिक मोबदला देणे, झाड न तोडण्याविषयी लेखी करार करणे, झाड वाचवल्याबद्दलचे प्रमाणपत्र देणे अशा शक्य त्या सर्व मार्गांनी धोक्यात आलेले महावृक्ष वाचवायचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे. आजवर साधारण एक हजार महावृक्ष वाचविण्यात आले आहेत. पाच हजारांहून अधिक वृक्षांची माहिती गोळा झाली आहे. या उपक्रमासाठी बंदीपूर अभयारण्याच्या आसपास काम करणाऱ्या ’जंगल स्केप’ संस्थेचे सहकार्यही आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या संस्थापक संचालक डॉ. गोडबोले यांनी सहा वर्षे ईशान्येकडील स्थानिक समुदायांसोबत काम केले आहे. त्यांनी उत्तर पश्चिम घाट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचे नेटवर्क विकसित केले आहे. त्या क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या निमंत्रित एनजीओ सदस्य प्रतिनिधी आहेत.

 

निधी उभारणीचे आव्हान

AERF आपल्या सामाजिक उद्देशासाठी डायकिन इंडस्ट्रीज लि. जपान, क्रेडिट सुइस इंडिया, पुक्का हर्ब्स U.K., डायनॅमिक रेमेडीज प्रा. लि., प्राज इंडस्ट्रीज, वनाझ इंजिनियरिंग लि. यांसोबत काम करते आहे. महावृक्ष वाचवल्याबद्दल संस्थेकडून गावांना अथवा खासगी मालकांना दिला जाणारा आर्थिक मोबदला / भरपाईसाठी निधी उभारणी ही सुद्धा खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संस्था ’ग्लोबल गिव्हिंग’ सारख्या संस्थांकडून निधी गोळा करतात. ’ग्लोबल गिव्हिंग’ ही जागतिक संस्था आहे जी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्याला देणगी द्यायला इच्छुक असणारे लोक यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते. ’ग्लोबल गिव्हिंग’ हा crowd funding platform आहे. इथून मदत मिळवणे आव्हानात्मक आहे. ज्या सामाजिक संस्थांचे काम हे व्यापक स्तरावर आहे, ज्यांचे व्यवहार चोख आणि पारदर्शक आहेत अशा संस्थांना ’ग्लोबल गिव्हिंग’तर्फे देणग्या मिळतात. यासाठी संस्थात्मक कामाचा दर्जा आणि शिस्त राखण्याचे आव्हान असते. जे अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF)ने सक्षमपणे पेलेले आहे. आजकाल वाघ अथवा हत्ती अशा लोकप्रिय प्राण्याच्या संरक्षणासाठी पैसे द्यायला तयार असणारे हजारो लोक आणि संस्था जगभर आहेत. परंतु झाडे वाचवण्यासाठी निधी उभारणे अवघड आहे. तरीही गेली ३० वर्षे ही संस्था महावृक्ष आणि जंगलं वाचवण्याचे काम करते आहे. महावृक्ष वाचवण्याचे संस्थेचे काम व्यापक स्तरावर व्हायला हवे आहे. सरकारी योजनांपेक्षा खासगी संस्थांच्या माध्यमातूनच हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकते असे संस्थेचे मत आहे. गावागावांमध्ये काम करणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा आहे. त्यासाठी खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. गावागावांमध्ये जाऊन अभ्यास करणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे, संस्थेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखणे, निधी उभारणी हे सगळं करण्यासाठी खूप धडपड, मेहनत आणि संयम आवश्यक आहे. नुसते भावनिक आवाहन पुरेसे नाही.

 

वाशी तर्फे संगमेश्वर गावातील मोडकाडंग येथील
श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची देवराई

अपवाद वगळता जंगल संरक्षण-संवर्धनाचे आजचे बहुतांशी काम हे cosmetic स्वरूपाचे असल्याची खंत डॉ. गोडबोले बोलून दाखवतात. आपल्या देशात आरडाओरडा करून विषय पूर्णत्त्वास जात नाहीत, अन्यथा हा देश खूप पुढे गेला असता. या देशात काम  करताना विषय समजून घेऊन, वेळ देऊन वर्षानुवर्षे शांतपणे काम करावं लागतं. तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर संवर्धन पाहायला मिळतं. संस्थेचे काही पथदर्शी प्रयोग ‘सरकारी धोरण’ म्हणून स्वीकारले जावेत असं टीम एईआरएफला अजिबात वाटत नाही. अशी कामं होण्यासाठी लोकं एकमेकांशी जोडलेली राहाणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. सरकारी प्रक्रिया, ‘चला जंगलं वाचवूया’ असं म्हणेलही पण त्यातून गोंधळ अधिक होईल. ‘प्रसिद्धी’बेस काहीतरी तात्कालिक उपाययोजना करून आपण जंगलं वाचवू शकत नाही. जंगल संवर्धनाचे काम हे सबसिडीबेस्ड काम नाही. अशी स्पष्ट भूमिका घेऊन जगभर वावरणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’चं हे काम पाहाणे, समजून घेणे, संवर्धित जंगलात मोकळा श्वास घेणे, या संस्थेसोबत काम करणे हा जंगल संवर्धनविषयक मानवी जाणीवा बदलवणारा अनुभव देणाऱ्या संस्थेला तीन दशकांच्या कार्यपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा!

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

ई-मेल :: dheerajwatekar@gmail.com



 

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कांबळे मास्तरांचा तास

        

        २०२२चा मराठी पत्रकार दिन. वेळ सकाळची! ठिकाण रत्नागिरी शहरातील माळनाका येथील सरकारी विश्रामगृह. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या, महाराष्ट्रातील मोजक्या नियतकालिकांपैकी एक असलेल्या, साप्ताहिक सत्यशोधकच्या दीडशेव्या विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे सर रत्नागिरीत आले होते. प्रकाशन करावयाच्या अंकाची प्रत सरांनी आदल्या रात्री पाहिलेली होती. ‘नव्या पिढीसाठी दस्तावेज’ या मथळ्याखाली अतिथी संपादकीय मनोगताच्या तिसऱ्या परिच्छेदात आम्ही लिहिलं होतं, ‘महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी दीनबंधु हे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले सत्यशोधक साप्ताहिक १८७१ सालचे आहे.’ आमच्या या मजकुराची वैचारिक दिशा अचूकपणे हेरून सरांनी सकाळी चहा-नाष्टा घेताना तासभराच्या काळात ज्या संपादकीय सूचना केल्या त्यातून हा ‘कांबळे मास्तरांचा तास’ लिहावासा वाटला. या लेखनाबाबत आम्ही सरांना कळवलं तेव्हा त्यांनी ‘स्वागत आणि शुभेच्छा’ दिल्याने आमचा लेखन उत्साह अधिक दुणावला.

सत्यसेवेचे कंकण बांधून, ‘हरि कृष्ण भक्ते तुला स्थापियेले | करि सत्य सेवा जना रंजविले || किती अन्य आले बहुश्रूत झाले | परि सर्व तुझ्याच ठायी रिझाले ||’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून लिमये यांनी सत्यशोधकसाप्ताहिकाचा पाया घातला होता. तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज होय. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. महात्मा फुले यांनी सुरुवातीपासून धरलेल्या सत्यशोधनाच्या आग्रहाचा प्रभाव कै. हरि नारायण लिमयेंवर पडला, नव्हे तर ते तसेच असणार अशी सरांची मांडणी राहिली. फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाची, सत्यशोधनाची व्यापक चळवळ चालू केली होती. अनेक अंगाने तिचा अनेक लोकांवर, अनेक पद्धतीने परिणाम झालेला आहे. ‘सत्यशोधनाची’ ही संकल्पना फुल्यांनी नक्कीच १८७१ पूर्वी वापरलेली असणार! हे सरांचं म्हणणं आम्हाला पटलं होतं. फुले पुढे याच शब्दाच्या नावे चळवळ स्थापन करण्यापर्यंत पोहोचले होते. १९७३ ला फुल्यांनी चळवळ सुरु केली म्हणजे पहिल्यांदा तो शब्द वापरला असं होऊ शकत नाही. तसा विचार केल्यास आपण फसण्याचा संभव अधिक आहे. सत्यशोधक चळवळीच्या स्थापनेच्या अगोदरचा काळ हा पूर्वतयारीचा भाग होता. एखादा नाविन्यपूर्ण शब्द असा अचानक चलनात येऊन ‘कॉईन’ होत नाही. त्यासाठी सुरुवातीला त्या शब्दाबाबत लोकांचं प्रबोधन करावं लागतं. शब्द लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. नंतर तो ‘कॉईन’ केला जातो. सत्यशोधक चळवळ स्थापन होण्यापूर्वी कोकणातल्या एका ब्राह्मणाने आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राला ते नाव दिले याचा अर्थ हा शब्द त्यापूर्वी कोकणात हा शब्द पोहोचला असावा का? त्या काळी या शब्दाचा प्रसार असा सर्वदूर झाला असेल? यावेळी काहीतरी घडलं असेल? काय घडलं? अशा विविधांगी अंगाने विचार करण्याची आवश्यकता कांबळे सर बोलून दाखवत होते. एखादा ऐतिहासिक दस्तऐवज बनवताना तू, ‘आपण ऐतिहासिक दस्तावेज करतोय या टेंशनमधून बाहेरच पडू नकोस’ असं खूप छान सरांनी सांगितलं. त्यांचं हे वाक्य अंतर्मनाला स्पर्शून गेलं. सत्यशोधक साप्ताहिकातील जुन्या अंकातील ऐतिहासिक लेखनाचे विश्लेषण व्हायला हवे. कोणीतरी यावर पी.एच.डी. करायला हवी. वेगवेगळे अॅप्रोच डोळ्यासमोर ठेवून लेखन करायला हवं. संदर्भ गोळा करणं हे खूप मोठं काम आहे. संदर्भ गोळा करताना वेड लागायची पाळी येते. तरीही शांतपणे काम करण्यावर भर द्यायला हवा. आमच्या संपादकीय लेखाचा दाखला देत सर पुढे म्हणाले, ‘महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज १८६३ ला स्थापन केला हे खरे आहे. पण ती एक संघटनात्मक क्रिया (organize activity) होती. प्रत्यक्ष सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी महात्मा फुले यांनी सत्यशोधक हा शब्द कशा पद्धतीने कोठे कोठे वापरला हे पाहावे लागेल’, सरांनी आम्हाला थोडा वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक शब्दानुसार प्रबोधन केले होते. शब्दाचा प्रचार केला होता. तो शब्द लोकांच्या मनात बिंबवला होता हे मान्य करायला हवं. कालांतराने नंतर त्याला संघटीत आणि आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ हे नाव पुढे आलं होतं. हे सारं सुरु असताना सत्यशोधन निमित्ताने सामाजिक अभिसरणाची प्रक्रीया सुरु असताना कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती वर्तमानपत्र सुरु करते आणि त्याला ‘सत्यशोधक’ हे नाव देते ही महत्त्वाची घटना असल्याचे लक्षात आले. ‘सत्यशोधक’ (truth finding / truth seeker) काय आहे? हा प्रबोधनाच्या लाटेतून आलेला शब्द आहे. मुळात सत्य काय आहे? असे प्रश्न स्वतःला विचारून संशोधनाचा आनंद घेत काम करण्याची आवश्यकता आहे. विशेषांकात ‘सत्यशोधक’ शब्दाविषयी लेखन असायला हवं होतं अशी सरांची भूमिका होती, एव्हाना ती आम्हाला पटली होती. सत्य कशाला म्हणतात? ते शोधायचं कसं? ते का शोधायचं ? त्याचा फायदा काय? परिणाम काय? असे अनेक प्रश्न कांबळे सरांनी तासाभरात उपस्थित केले. ‘मी मनापासून सारा अंक चाळला आहे. तू ये नाशिकला! मी देतो तुला माझ्याकडे काय असेल ते?’ असंही बोलून गेले.

‘मीही अशाच पद्धतीने काम खूप एन्जॉय करतो. मी दरवर्षी एखादा शब्द घेतो आणि त्यावर संशोधनात्मक दृष्टीने विचार करत राहातो’ असं कांबळे सर सांगत होते. ‘कोरोना’ काळात कांबळे सर ‘पोतराज’ या शब्दावर दीड वर्षे काम करत होते. पोतराज हा गावकूस नसलेला, रंगीबेरंगी चिंध्यांनी अंग झाकून (आभरान) अंगावर कोरड्याने आसूड ओढत दारोदार फिरणारा समाज किंवा कडकलक्ष्मी. मरीआई ही कडकलक्ष्मी पोतराजाची देवता. पोतराज हा स्त्री-‌वेशात पुरुष असतो. जटा वाढलेल्या, केसांचा अंबाडा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ आणि पायात खुळखुळ्या घातलेला पोतराज मरीआईच्या नावाने दान मागताना आपल्याला भेटतो. अर्थात आता त्यांच्या भेटीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मुळात पोतराज कशाला म्हणतात? मरिआई म्हणजे काय? ती देवी असेल तर देवी कुणाला म्हणतात? देवीचे प्रकार किती? मरिआई हे नाव पहिल्यांदा कुणी ठेवलं? ‘आभरान’ कसं तयार करतात? आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्याची कल्पना काय आहे? इतर धर्मात काय आहे? लोकांना सत्य का आवडतं? या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात? आदी प्रश्न स्वतःला विचारून लेखनकाम वेडयासारखं एन्जॉय करता आलं पाहिजे. एखाद्या मिशनसारखं त्याकडे बघायचं. म्हणजे आपल्याला गुणवत्ता मिळते, असं कांबळे सर सांगत राहिले.

प्रत्यक्ष प्रकाशन समारंभातही कांबळे सरांनी, असत्यशोधनाची मोहीम सुरु असलेल्या काळात सत्यशोधनाचे काम आवश्यक असल्याची भूमिका मांडली. महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ १८७३ची आणि रत्नागिरीतील साप्ताहिक सत्यशोधक १८७१चे यास्तव आम्हाला एकमेकांच्या संबंधांबाबत प्रश्न पडला होता. कांबळे सरांनी यावर थेट भाष्य करताना सत्यशोधक साप्ताहिक हे फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा परिणाम असल्याचं म्हटलं. सत्यशोधनाची चळवळ, विचार आपल्याकडे युरोपमधून आलेला आहे. मुळात ‘सत्य’ ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. सत्याला असंख्य पैलू आहेत. ‘कदाचित सत्य असं काहीच नसतं’, असंही उत्तर मिळू शकतं. सत्याचे सारे पैलू तपासून पाहिले तरीही सत्याची नीटशी व्याख्या करता येत नाही. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून सत्यशोधनाची, प्रबोधनाची चळवळ सुरु झाली.   तत्पूर्वीचे सत्यशोधन आध्यात्मिक पातळीवर होते. महात्मा फुल्यांच्या काळात जातीव्यवस्था टोकाला पोहोचलेली होती. व्यवस्था देवा-धर्माने केलेली आहे असं सांगितलं जात होतं. मात्र खरंच हे कोणी तयार केलेलं आहे? याचा शोध घेतल्याशिवाय विषमता संपणार नाही. यासाठी सत्यशोधनाचा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. सार्वजनिक सत्यधर्म सुरु केला होता. चळवळ सुरु केली होती. फुल्यांच्या विचारांतील शिक्षणाचा विचार अल्पावधीत सर्वत्र पसरलेला दिसतो. त्याकाळी महात्मा फुल्यांचा विचार समजून घेण्यासाठी त्यांची भेट होणं आवश्यक नव्हतं. मानवी जीवनात दु:ख का निर्माण होतं? नशीबामुळे, परंपरेमुळे की पाप केल्यामुळे याची मीमांसा नीट होत नव्हती. भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा याची मीमांसा केली. बुद्धांनी ‘तृष्णा’ तर महात्मा फुल्यांनी ‘अविद्या’ असा शब्द योजला. यातून सत्यशोधनासाठी पर्याय पुढे आला. दु:ख हे मानव निर्मित आहे. सत्याचा शोध घेतला पाहिजे. ही भावना प्रबळ होत गेली. त्या भावनेचा एक किरण कोकणात येऊन पोहोचला असावा. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी हे करणं, वृत्तपत्र काढणं अवघड होतं, वेडेपणा होता. कारण पूर्वी म्हटलं जायचं, ‘ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार प्रबळ होतो तो वर्तमानपत्र काढतो.’ आपल्या भाषणाच्या शेवटी, ‘फुल्यांचा प्रभाव होता की नव्हता? यात फार अडकू नका’ असंही आम्हाला सांगायला सर विसरले नाहीत. दीडशे वर्षांपूर्वी लिमये यांनी आपला रस्ता पकडला असे कांबळे सरांनी नमूद केले. कांबळे सरांनी आपल्या या भाषणात अभ्यासक आणि पत्रकारांसाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलं. पण विविध संघटनांच्या भाऊगर्दीत या कार्यक्रमाकडे फिरकायला असंख्य पत्रकारांना वेळ मिळाला नाही. या कार्यक्रमाचं मर्यादित वृत्त शासकीय स्वरुपात प्रसिद्ध झालं. कांबळे सरांच्या या मांडणीमुळे आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो...

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ सालचा. १८४७ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना इंग्रजी, मराठीशिवाय उर्दू, कानडी, मद्रासी, गुजराती भाषा येत होत्या. संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. त्यांचे वाचन चौफेर, चिकित्सक आणि चोखंदळ होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानांचा, संप्रदायांचा त्यांनी अभ्यास केला होता. थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ आणि ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांनी त्यांच्या मनात सर्वप्रथम खळबळ उडवून दिली होती. यातून त्यांची दृष्टी प्रगल्भ झाली होती. १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात या देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी सुरु केली. यासाठी त्यांना परांजपे, हाटे, गोवंडे आदी सहकाऱ्यांनी आर्थिक साहाय्य केले होते. वयाच्या विशी-पंचविशीत त्यांनी सत्य शोधनाचा मार्ग स्वीकारला होता. लोकांना शक्य ती मदत करण्यापासून समाज सुधारणेसाठी प्रशासकीय, तसेच लोकांमध्ये सक्रीय राहून, बदल घडवणारे समाजसेवक म्हणून ते काम करू लागले होते. आपले विचार सभांमधून आणि पत्रके काढून प्रसिद्ध करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचे १८५३चे ‘निर्मिकाचा शोध’ हे चौदा अखंडांचे वैचारिक पद्यमय पुस्तक याचे द्योतक आहे.

साऱ्या निर्मितीला । पोकळी कारण ।। असे तिचे गुण । स्वाभाविक ।।

विषाणूचा मेंदू । धर्माची प्रकृती ।। देवाची उत्पत्ती । तोच करी ।।  

शिका शिका तुम्ही । घ्या सत्याचा शोध ।। उत्पत्तीचा बोध । ध्यानी आणा ।।

‘निर्मिकाचा शोध’मधून महात्मा फुल्यांनी ‘सत्याचा शोध घेण्यासाठी शिकावे’ ही भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. फुल्यांनी १८५५ साली लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ नाटकातही ‘सत्य’ हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. या नाटकातील एका प्रसंगात तर ‘सत्य बोल सर्वास आवडू लागतात’ असे वाक्य विदूषक पात्राच्या तोंडी आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुशिक्षित समाजात धर्म सुधारणेच्या विचाराचे स्वागत करणारे तीन प्रवाह महाराष्ट्रात प्रभावीपणे वाहात होते. पहिला प्रवाह धार्मिक सुधारकांचा होता. यात २० ऑगस्ट १८२८ला राजाराम मोहनरॉय यांनी स्थापन केलेला एकेश्वरवादी ब्राह्मो समाज आणि ३१ मार्च १८६७ साली मुंबईत केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारातून स्थापन झालेला ‘एकेश्वरी पंथ’ प्रार्थना समाज होता. दुसरा प्रवाह हा आगरकर यांच्यासारख्या बुद्धिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. तिसरा प्रवाह ब्राह्मण्यास विरोध करणाऱ्या बहुजन समाजाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा होता. १८५३ साली मुंबईत वेस्टर्न इंडिया असोसिएशन तर १८८५ साली इंडियन नशनल कॉंग्रेसची स्थापना झाली होती. या संपूर्ण शतकात सार्वजनिक जीवनाला प्राधान्य मिळू लागले होते. समाजसेवेत जवळपास पंचवीस वर्षे घालवल्यावर वयाच्या पन्नीशाच्या आसपास फुले यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा अनुभव आलेला होता. समाजाच्या स्थापनेपूर्वी तुकाराम हनुमंत पिंजण, ज्ञानगिरी बाबा, रामशेठ उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ग्यानोबा झगडे मिस्त्री, धोंडीराम गवंडी वैग्रे आदी मंडळी सायंकाळी त्यांच्याकडे चर्चेसाठी जमायची. यावेळी संत कबीरांच्या विशेषतः बीजक ग्रंथातील ‘विप्रमती’ भागाचं वाचन व्हायचं. ज्ञानगिरी बाबा हे वाचन करीत असत. यावेळी घडणाऱ्या संवादातून सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं फुल्यांना अगत्याचं वाटू लागलं होतं. ‘सत्यशोधक’ समाजच्या स्थापनेची बीजं फुल्यांच्या याच विचारात असावीत. स्थापनेच्या पहिल्या, २४ सप्टेंबर १९७३च्या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा झाली होती. ‘सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था, सत्य शोधण्याचे काम करणारा समाज म्हणून 'सत्यसोधक समाज' हे नाव सर्वांनी संमत केलं होतं. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली होती. आपल्या या चळवळीसाठी महात्मा फुल्यांनी 'सत्यशोधक' हा शब्द का वापरला? तो कोठून आला? याबाबतची पुरेशी स्पष्टता होईल असा एकही थेट संदर्भ उपलब्ध होत नाही. तथापि महेश जोशी यांनी आपल्या 'सत्यशोधक समाजाचा इतिहास' ग्रंथामध्ये, ‘महात्मा फुले यांच्या तोंडी सत्यशोधक समाज आणि मानवधर्म असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी सत्यशोधक हा शब्द बाबा पद्मनजी यांच्याकडून आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला दिसतो’ असं म्हटलं आहे. बडोद्याच्या गायकवाड यांना उद्देशून मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड क्लेअर १८३२ साली आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना लिहिलेल्या पत्रात गायकवाड यांना उद्देशून ‘हे भारतीय लोक सत्याची फारशी पर्वा करत नाहीत’ असे म्हटल्याने भारतीयांविषयी असा अपप्रचार होत असताना ‘सत्यशोधक’ हा शब्द समाजसुधारकांना आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटला असावा, असंही मत त्यांनी नोंदवलं आहे.

महत्वाचं म्हणजे बाबा पद्मनजी यांनी लोकांमध्ये धर्मजागृती व्हावी म्हणून ‘सत्यशोधक सभा’ स्थापन केली होती. मात्र तिच्या कालावधीचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे 'बाबा पद्मनजी’ यांनी तो शब्द कोठून उचलला असेल, तेही सांगता येत नाही. फुल्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. हा पोवाडा शुद्ध करण्यासाठी बाबा पद्मनजीयांचे सहकार्य मिळाले होते. हे दोघेही समकालीन होते. ब्राह्मणांचे कसब या १८६९ साली जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमनजी त्यांची प्रस्तावना आहे. बाबा पद्मनजी हे शालेय वयात असताना फ्री चर्च स्कूलमध्ये जाऊ लागल्यावर त्यांच्या मनावर नव्या शिक्षणपद्धतीचा परिणाम होऊन त्यांनी ‘सकल विश्वाचा उत्पन्नकर्ता श्री जगद्गुरू सर्वोत्तम नारायण याच्या पवित्र चरणांते स्मरून’ २५ ऑगस्ट १८४९ रोजी एक शपथ घेतली होती. जिचा उल्लेख अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रात भेटतो. यात त्यांनी ‘ईश्वर मला असत्य भाषण करण्यास बुद्धी न देवो’ असं म्हटलं आहे. बाबा पद्मनजी यांनी आपल्या याच शाळेमधील मित्रांविषयी १८५१ मध्ये लिहिले होते, ‘मी मुंबईस सत्य शोधू लागल्यापासून बेळगांवी जाईपर्यंत फ्री चर्च विद्यालयात जी सत्यशोधकांची टोळी झाली होती तिच्यात ब्राह्मण, परभू, सोनार, शेणवी इ. जातींची मुले होती.’ (संदर्भ :: बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, १९७९, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई - पान २६, पीडीएफ आवृत्ती) पुढे ३ सप्टेंबर १८५४ साली बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ‘हिंदू धर्मात राहून मनातील अज्ञान व अविद्या यांचा नाश करता येत नाही. सत्यशोधन व असत्य मुक्ती यासाठी ऋषिप्रणित हिंदू धर्मातील वचने उपकारक ठरत नाहीत.’ यामुळे आपण ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बाबा पद्मनजी यांनी १२ नोव्हेंबर १८५१ रोजी उडतरे, जि. सातारा येथून ज्ञानप्रकाश वर्तमानपत्रास प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रात ‘...सत्ययुगाचा प्रथम दिवसाचा अरुणोदय झाला आहे.’ असे लिहिले होते. बाबा पद्मनजी यांनी १८६१ मध्ये सत्यदीपिका (धाकटी) नावाचे लहान मुलांचे मासिक सुरु केले होते. हे मासिक १८७३ साली बंद पडल्यावर त्यांनी सत्यदीपिका (थोरली) सुरु केले होते. ते १८७७ला बंद पडले. पुढे १८८२ मध्ये त्यांनी ‘सत्य’वादी नावाचे पाक्षिक सुरु केले होते.

‘सत्यशोधक या नावाचे एक मराठी पत्र निघणार आहे असे ऐकून आम्हास मोठा आनंद वाटला होता. परंतु जेव्हा त्याचा एक अंक येऊन पोहोचला आणि आम्ही तो वाचला तेव्हा आम्हास खेद वाटला. कारण सत्यशोधक हे नाव देऊन त्यात द्वेषाने उगीच जागा भरणे अयोग्य आहे’ असा उल्लेख १ जुलै १८५४च्या ‘ज्ञानोदय’ मध्ये असल्याची नोंद आपल्याला ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ‘रा. का. लेले’ यांच्या ग्रंथात भेटते. अहमदनगरच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनने याच ज्ञानोदयचा पहिला अंक २० जून १८४२ रोजी प्रकाशित केला होता. या अंकाचा बाबा पद्मनजी यांच्यावर प्रभाव राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातल्या नवशिक्षित तरुणांमधला एक मोठा वर्ग स्वधर्मापासून वैचारिकदृष्ट्या दुरावत होता. आपला धर्म, परंपरा, समाजव्यवस्था यांच्यातल्या दोषांची जाणीव झाल्यामुळे ही मंडळी ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाली होती. बाबा पदमनजींप्रमाणे काहींनी प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचं धाडस केलं. या वर्गासाठी ज्ञानोदयहे मार्गदर्शक वर्तमानपत्र होतं. “आपल्या तरुणपणी आपण ज्ञानोदयचे वाचक तर होतोच, पण स्वतःशिवाय आणखी दहा वर्गणीदार या वर्तमानपत्राला मिळवून दिले होते”, अशी आठवण बाबा पदमनजी यांनी अरुणोदयया आत्मचरित्रात नोंदवली आहे.

महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे सत्यशोधकीय नियतकालिकेहे डॉ. अरुण शिंदे यांचे महत्त्वाचे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. त्यानुसार सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघालीत. दीनबंधु’ (१८७७ - कृष्णराव भालेकर, नारारण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे), ‘सत्सार’ (१८८५, म. फुले), ‘दीनमित्र’ (१८८८ - गणपतराव पाटील), ‘राघव भूषण’ (१८८८ - गुलाबसिंह कौशल्य), ‘अंबालहरी’ (१८८९ - कृष्णराव भालेकर), ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ (१८९२ - कृष्णराव भालेकर), ‘मराठा दीनबंधु’ (१९०१ - भास्करराव जाधव), ‘दीनमित्य’ (१९१०, मुकुंदराव पाटील), ‘विश्वबंधू’ (१९११ - बळवंतराव पिसाळ), ‘जागरूक’ (१९१७ - वालचंद कोठारी), ‘जागृति’ (१९१७ - भगवंतराव पाळेकर), ‘डेक्कन रयत’ (१९१८ - अण्णासाहेब लठ्ठे), ‘विजयी मराठा’ (१९१९- श्रीपतराव शिंदे), ‘सत्यप्रकाश’ (१९१९ - नारारण रामचंद्र विभूते), ‘गरिबांचा कैवारी’ (१९२० - बाबूराव रादव), ‘भगवा झेंडा’ (१९२० - दत्ताजीराव कुरणे), ‘तरुण मराठा’ (१९२० - सखाराम पांडूरंग सावंत), ‘राष्ट्रवीर’ (१९२१ - शामराव भोसले), ‘प्रबोधन’ (१९२१ - के. सी. ठाकरे), ‘संजीवन’ (१९२१ - द. भि. रणदिवे), ‘सिंध मराठा’ (१९२४ - दत्तात्रेर वासुदेव अणावकर), ‘हंटर’ (१९२५ - खंडेराव बागल), ‘मजूर’ (१९२५ - रामचंद्र लाड), ‘कर्मवीर’ (१९२५ - शि. आ. भोसले), ‘नवयुग’ (१९२६ - बाबासाहेब बोले), ‘सत्यवादी’ (१९२६ - बाळासाहेब पाटील), ‘ब्राह्मणेतर’ (१९२६ - व्यंकटराव गोडे), ‘कैवारी’ (१९२८ - दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिके सुरू झाली. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. जागृतिहे साप्ताहिक बडोद्याहून तर सिंध मराठाहे कराचीहून प्रसिद्ध होत होते. येवला, जि. नाशिक (राघव भूषण), तरवडी, जि. अहमदनगर (दीनमित्र) अशा ग्रामीण भागांतून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत नियतकालिके प्रसिद्ध होत होती. यात रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी १८७१ साली सुरु केलेल्या सत्यशोधक साप्ताहिकाचा उल्लेख नाही.

सत्य हा संस्कृत शब्द आहे. भारतीय दर्शनांमध्ये ‘सत्य’ या संकल्पनेचा विचार प्रमाण आणि प्रामाण्य या संकल्पनांच्या संदर्भात झालेला दिसतो. महात्मा फुले यांच्या असंख्य पत्रावर ‘सत्यमेव जयते’ असाच उल्लेख आहे. फुले यांचा संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी 'अखंड' रचले होते. त्याची एकूण अखंड संख्या ९९९ आहे. १८८७ मध्ये प्रसिद्ध झाले. यात महात्मा फुले म्हणतात,

सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥

जगामाजी सुख सारे । खास सत्याची  ती पोरे

सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥

सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे. महात्मा फुल्यांची अखंड रचनेत अनेकदा ‘सत्य’ शब्द वापरला आहे. आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात महात्मा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ लिहिला होता. ‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही’ अशी सुरुवात करून महात्मा फुल्यांनी लिहिलेला हा ग्रंथ त्यांच्या मृत्युनंतर १८९१ ला प्रकाशित झाला.

तत्कालिन सरकारी परिस्थिती लोकांसमोर मांडायची एवढाच सत्याचा मर्यादित अर्थ असल्याच्या काळात फुल्यांनी सत्यशोधनाचा आग्रह धरला होता. आपल्याकडील केशवपनाची चाल बंद करायला समाजसुधारकांना संघर्ष करावा लागला होता. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहामागील भूमिका तपासताना ‘ब्रिटीश इथले नव्हेत’ हे सत्य आपल्या लक्षात येतं. गांधीजींनी ब्रिटीशांच्या जाण्याचा आग्रह धरल्याचेही दिसते. भाषेच्या अंगाने पाहिलं रत्नागिरीतील लिमये यांनी ‘सत्यशोधक’ शब्द पहिल्यांदा कॉईन केला असं दिसतं. पण चळवळीच्या अंगाने पाहिलं तर तो महात्मा फुल्यांच्या जीवनात सर्वत्र आढळतो. सत्यशोधक समाज हे दोन शब्द कदाचित एकमेकांना जोडलेले नसावेत. ‘बहिष्कृत भारत’ किंवा ‘सत्याचे प्रयोग’ प्रमाणे हे शब्द थेट वापरले गेले असण्याची शक्यता आहे. फुल्यांच्या सत्यशोधक समाज मधील ‘समाज’ हा शब्द तत्पूर्वी अनेकांनी आपल्या चळवळीसाठी वापरला आहे. अशा अभ्यासात शोधाच्या वाटा बंद झाल्यावर आपल्याला विषयाचा अर्थ-अन्वयार्थ शोधावा लागतो असं उत्तम कांबळे सरांचं रास्त म्हणणं होतं. महात्मा फुल्यांच्या संपूर्ण विचारांचे बीज आपल्याला ‘सत्य काय हे जाणून घ्यायला हवे म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात’ याकडे झुकलेले दिसते. महात्मा फुल्यांनी जीवनात सत्याला खूप महत्त्व दिले आहे. त्यांनी जीवनभर केलेली मीमांसा सत्याशी निगडित आहे. त्यांनी सत्य हे तर्काला आणि वास्तवाला जोडलेलं दिसतं. तत्पूर्वीचं सत्य आपल्याला देव, धर्म याला जोडलेलं दिसतं. महात्मा फुल्यांनी जीवनभर स्वतःला कृतीतूनच ‘सत्यशोधक’ मानलं आहे. इतिहास हा एक आरसा आहे. जितका इतिहास जुना तितका त्या आरश्यामागील पाराही प्रसंगी क्षीण होत जाण्याची संभवना असते. अशा प्रसंगी नवीन पारा जोडून नीटसं पाहाणं आवश्यक बनतं. तसंच ‘सत्यशोधक समाज’ हे विशेषणात्मक नाव १९७३ ला पुढे आलं असलं तरी महात्मा फुल्यांचं काम तत्पूर्वीपासून सुरु आहे हे स्पष्ट आहे. कधीकधी काही शब्द नावात यायला उशीर होतो पण ते शब्द तत्पूर्वी वापरात किंवा व्यवहारात आलेले असतात. ‘सत्यशोधक’ संदर्भात ही शक्यता अधिक वाटते. आपल्याकडे इतिहासात कॉईन झालेले शब्द हे ज्यांच्या नावावर जमा झालेले दिसतात, त्यांच्यापूर्वी ते कोणीतरी वापरले असावेत असे मानणारा एक प्रवाह आहे. बाबा पद्मनजी यांचे विषयी अभ्यासताना ‘सत्यशोधक’ हा शब्द पूर्वी अस्तित्वात असावा असं वाटतं. महात्मा फुले यांनी जीवनभर कार्य केलेल्या चळवळीचं बिरूद असलेला ‘सत्यशोधक’ शब्द रत्नागिरीच्या लिमयेंनी कसा वापरला? त्यामागे शाब्दिक आकर्षण असावं का? की महात्मा फुल्यांच्या प्रभावातून हा शब्द घेतला? पण तसं त्या साप्ताहिकात दिसतं नाही आणि नोंदही नाही. दुर्दैवाने त्याचे सुरुवातीचे अंकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा लेख वाचून कोणाला यातील मसुद्यावर कोणाला अधिक प्रकाश टाकता आला तर आम्हाला अधिक आनंद होईल.

सत्यशोधकचा दीडशे वर्ष विशेषांक निघेपर्यंत ‘रत्नागिरीतून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ प्रसिद्ध होते’ हे अनेकांना माहिती नव्हते. सत्यशोधकीय विचारधारेतील नियतकालिकांच्या आजवरच्या यादीत रत्नागिरीतील या पत्राचा उल्लेख नाही. ‘सत्यशोधक’ हे नाव आपल्या नियतकालिकासाठी संघटीत पद्धतीने कै. हरि नारायण लिमये यांनी पहिल्यांदा कॉईन केले होते. यावरून आम्ही अनुमान लावलं होतं. सत्यशोधकचे स्वातंत्र्यपूर्व जुने अंक चाळताना आम्हाला अंकात ज्योतिष विषयक मजकूर दिसला. बाबासाहेब बोले यांच्या चळवळी संदर्भात लिहिताना चरित्रकार धनंजय कीर यांनी ‘सत्यशोधक’ मधून खोतांची पाठराखण झाल्याची नोंद केल्याने हे महात्मा फुल्यांच्या विचारधारेशी संबंधित नसल्याचं आमचं मत बनलं होतं. तरीही कांबळे सरांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा होता. सत्यशोधक अंकाच्या अतिथी संपादकीयात आम्ही पुढे लिहिलं होतं, ‘पत्रकारिता’ ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं जग क्षणोक्षणी बदलतंय. पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ बेहेरेंच्या शब्दातील हे चैतन्य आम्हाला उत्तम कांबळे मास्तरांच्या तासात अनुभवता आणि हा लेख लिहिताना जगता आलं.

 

संदर्भ :-

तृतीय रत्न (नाटक) – महात्मा फुले (१८५५ :: अप्रकाशित) प्रथम प्रकाशन – पुरोगामी सत्यशोधक

बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर (१९७९ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

जोतिचरित्र – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (सप्टेंबर १९९१ :: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया)

सत्यशोधक समाजाचा इतिहास – महेश जोशी (२००२ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले – श्रीराम गुंदेकर (जुलै २००४ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्रीराम गुंदेकर

मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा. का. लेले (द्वितीयावृत्ती २००४ :: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)

 

धीरज वाटेकर चिपळूण, मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित नऊ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  

 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

सत्यशोधक वर्ष १५० - 'अतिथी' संपादकीय

नव्या पिढीसाठी दस्तावेज

‘पत्रकारिता’ ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं जग क्षणोक्षणी बदलतंय. जग पूर्वीही बदलत होतं. पण ते बदल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जगभरातील पत्रकार करायचे. संगणक आणि स्मार्ट मोबाईल फोनने इंटरनेटच्या माध्यमातून जग जोडले गेल्याने आज जगातील अनेक बदल आपण सर्वजण आपापल्या परीने टिपतो आणि प्रसिद्धही करतो आहोत. गुहेत राहणाऱ्या माणसाला काहीतरी सांगण्याची इच्छा झाली म्हणून त्याने गुहेतील भिंतीवर रेघोट्या ओढल्या, चित्रे काढली. एखाद्या घटनेचं आपापल्या परीने विश्लेषण करणं ही माणसांची नैसर्गिक ऊर्मी आहे. आपल्याला जे कळलं, समजलं, ते इतरांना सांगणं हा सहज मानवी स्वभाव आहे. अभिव्यक्त होण्याची गरज सर्वांना असते. मात्र पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. याचा विचार करून ‘साप्ताहिक सत्यशोधक’ आपल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कोकणातील नव्या अभ्यासू पिढीसाठी, पत्रकारांसाठी, कोकण समजून घेण्याची इच्छा असलेल्या आणि कोकणासाठी काहीतरी सकस करू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘printed words are permanent’ या सूत्राला धरून एक दस्तावेज उपलब्ध करून देत आहे. हा दस्तावेज पुढील पिढ्यांनाही उपयुक्त ठरेल.

आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी लोकजागृती करण्यासाठी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु केले होते. त्यांनी आपल्या पहिल्या अंकात म्हटले होते, ‘मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने चालविणे आणि समाजाला योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची दर्पण छापणारास उत्कंठा आहे.’ ‘दर्पण’ सुरु झाले तो दिवस (६ जानेवारी) महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होत असतो. हे औचित्य साधून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ आपला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक आज प्रकाशित करत आहे.

महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे सत्यशोधकीय नियतकालिकेहे डॉ. अरुण शिंदे यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे पुस्तक आहे. यानुसार, कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी दीनबंधुहे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली, असं त्यांनी म्हटलंय. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले ‘सत्यशोधक’ साप्ताहिक ‘१८७१’ सालचे आहे. प्रत्येक रविवारी सायंकाळी छापतेअसे बिरूद घेऊन रत्नागिरी येथून प्रसिद्ध होऊन समाजप्रबोधन आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे.

‘आपल्या देशातील जवळपास संपादक टिळक-आगरकर यांचा वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हातरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हते. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारांपैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले. पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर, आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्याला उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे ?’ गणपती वासुदेव उर्फ ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली हे वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं. ‘बदलती पत्रकारिता’ यातून ध्यानात यावी.

बेहेरे पुढे म्हणतात, ‘आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेक जण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्यातरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत. त्यांनी लिहिले तरी फारसे कोणी वाचीतही नाहीत. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ त्या संपादकाची कितीतरी मते अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दातून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. अस्सल गोष्टी दिसेनाशा झाल्यात. सगळ्यात भेसळ असते. माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले, परंतु युद्धाची नशा चढलेले लहानमोठे संपादक दिसतात. ते महत्त्वाचे असतात. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करणे सहसा शक्य होत नाही. त्याचे व्यवसायाचे साधन म्हणजे त्याची लेखणी होय. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसे छोट्या वृत्तपत्रकाराचे होते. तो आपल्या अंगाबरोबर जगतो, गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हाने देऊ शकतो.’ बेहेरे यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर देशातील वादळवाऱ्यात आपल्या मताचे झाड उन्मळून पडू नये एवढी काळजी घेण्याचे काम गेली दीडशे वर्षे लिमये कुटुंबीयांनी केले आहे, ते महत्त्वाचे आहे.

अलीकडे पत्रकारितेमध्ये बातमीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वैयक्तिक मतांचा भडिमार होताना दिसतो. हा एक व्यावसायिक आजार ठरावा अशी आजची स्थिती आहे. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. भारतीय पत्रकारांना दिवसभर बातम्या द्यायची कधीच सवय नव्हती. डिजिटल मंचावर यशस्वी होण्यासाठी आज ती अंगी बाणवावी लागली आहे. डिजिटल मंचावर बातमी वेगाने पोहोचविण्याचा ताण अधिक आहे. आपलं लेखन लोकं चटकन वाचतात. जागा प्रचंड असते. पण वाचकाकडे वेळेची मर्यादा असते. प्रिंटमध्ये लेखाची गुणवत्ता वृद्धिंगत करणारी लांबी असू शकते. ती सहज लक्षातही येते. वाचकाला वेळेचं नियोजन करता येतं. २८० अक्षरांच्या (५० शब्द) एका ट्विटमध्ये मुद्द्याचं सारं येत असेल तर लोकांनी ६००/८०० शब्दांचे अग्रलेख का वाचायचे ? असा मुद्दा हल्ली चर्चेत असतो. पण या सर्वातून संदर्भबहुलता मागे पडण्याचा धोका संभवतो. म्हणून आपण या अंकात विषयानुरूप ‘भाष्य’ करणारे प्रदीर्घ लेख प्रसिद्ध केलेत. अंकाची तीन पानी अनुक्रमणिका पाहिली तरी हे लक्षात येईल.

भारतातील वर्तमानपत्रांची किंमत वाजवीपेक्षा आजही कमी आहे. इथे एका प्रतिपेक्षा एक कप चहा किंवा कॉफी अधिक महाग असते. डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने समोर असली तरी प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी होणार नाही. आज काही दैनिकांनी त्यांचे ऑनलाईन ई-पेपर वाचण्यासाठी वर्गणी सुरु केली आहे. तरी आजही, ‘स्क्रोल’सारखे अपवाद वगळता डिजिटल माध्यमातून आर्थिक स्वावलंबन पूर्णत: यशस्वी झालेले नाही. फेसबुक आणि व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांचं प्रमाण भारतात लक्षणीय आहे. ‘इन्स्टाग्राम’ही वेगाने वाढते आहे. यांनी प्रिंट मिडियापासून लोकांना दूर नेलेले आहे. म्हणून छोट्या-मोठ्या भारतीय नियतकालिकांनी दृश्यात्मक चैतन्य अधिकाधिक जपायला हवंय. प्रस्तुत अंकात आपण हा प्रयत्न केलेला आहे.

स्वतःवरच ‘सेन्सॉरशिप’ लादून घेतलेला मनुष्य कधीही पत्रकार होऊ शकत नाही. त्यासाठी लिहिण्याचं कौशल्य आणि विस्तृत वाचन आवश्यक आहे. पत्रकारितेचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या तरुण पिढीने इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी यातल्या कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण घ्यावं. त्यानंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम करावा हे अधिक योग्य होईल, असं आम्हास वाटतं. भारत हा असा देश आहे जिथे फार कमी गोष्टींचा पूर्वअंदाज बांधता येतो. म्हणून नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. वाचकांना बारकाव्यांसह, वैविध्यपूर्ण मजकूर हवा असतो. विषयाच्या मांडणीतला दीर्घकाळ टिकणारा स्पष्ट उद्देश असलेले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले एका पेक्षा एक सरस आणि दर्जेदार लेख या विशेषांकात आपल्याला वाचता येतील.

‘कोकण आणि विकास एवढे दोन शब्द दिसले की कोकणी माणसाला एवढा हर्षवायू होतो की आता कोकणाचा स्वर्ग झाला असे त्याला वाटते.’ ४० वर्षांपूर्वी ‘कोकणाचा विकास : आता अभ्यास समिती कशासाठी ?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील या ओळी आहेत. याच लेखात कोकणात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी उतारू बंगल्यावर निवेदनांचा पाऊस पडेल त्यापेक्षा कोठे कोठे प्रत्यक्ष प्रयोगाचे लहानसे झरे असतील ते पाहावेत. विकासाची तहान भागविण्यास उपयोगी पडतील.’ असे म्हटले होते. सरकारकडे कोकण रेल्वेची पहिली रितसर मागणी १८९२ साली झाली होती. पुणे-बेळगाव-लोंढा रेल्वे अस्तित्वात आल्यावर त्या रेल्वेने कऱ्हाड-चिपळूण-पनवेल मार्गाची योजना १९०० साली तयार झाली होती. १९११ साली जी.आय.पी. रेल्वेने दिवा-दासगाव या कोकण मार्गावर योजना आखली होती. सगळ्यांप्रमाणे तीही मागे पडली. १९५० साली अ. ब. वालावलकर यांनी पुन्हा या विषयाला चालना दिली. त्यांनी मुंबई-बेळगाव-बेंगलोर ही कोकणातून दक्षिणोत्तर जाणारी योजना बनविली होती. त्या नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. ‘सत्यशोधक’चे सुरुवातीचे अंक असते तर यावर अधिक प्रकाश पाडता आला असता, असो ! सांगायचा मुद्दा हा की, कोकणाचा विकास अशा गतीने होतो आहे. प्रस्तुत विशेषांकात याची साद्यंद चर्चा आपल्याला वाचायला मिळेल. विशेषांकात, ‘रत्नागिरी (सिंधुदूर्गसह) जिल्हा गृहोद्योग विकास समितीचा १९५१ सालचा अहवाल दिला आहे तोही सर्वांना उपयुक्त ठरावा.

२०२० च्या दिवाळीत, नितीन लिमये यांचा फोन येईपर्यंत साप्ताहिक ‘सत्यशोधक’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे आमचं लक्ष गेलेलं नव्हतं. २८, २९ डिसेंबर २०१९ ला चिपळूणला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे दुसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या स्मरणिकेचा संपादक म्हणून आमचा नितीनजींशी आणि पर्यायाने साप्ताहिक सत्यशोधकशी पहिल्यांदा संपर्क आला होता. फोनवरील संभाषणाप्रमाणे २९ नोव्हेंबर २०२१ला नितीनजींना, ‘पत्रकारिता : काल, आज, उद्या, कोकण विकास आणि निवडक सत्यशोधक’ असं मनात तरळलेलं अंकाचं स्वरूप व्हाट्सअॅपवर कळवलं होतं. अंकाचा १५० वर्षांचा लोगो तयार झाला तेव्हा त्यात लोकप्रतिनिधींसाठी ‘कोकण विकास : माझी भूमिका, माझे योगदान’ हा एक विषय वाढवला गेला. अंक अधिकाधिक ‘संग्राह्य’ करण्याकडे नितीन यांचा सुरुवातीपासून कल होता. त्याला अनुसरून लेखकांना विनंती पत्र पाठवण्यासाठीचे नियोजन सुरु झाले. २००२ पासून आम्ही दिवाळीला अनेकांना अंतर्देशीय पत्र पाठवीत असल्याने काही महत्त्वाचे पत्ते संग्रही होते. त्यात विषयानुसार अधिकची भर करून शंभराहून अधिक लेखकांची पत्त्यासह यादी आम्ही नितीन यांच्याकडे सोपविली. पुढचा फॉलोअप त्यांनीच केला. यादीतील सगळ्यांनी लेखन प्रतिसाद दिला असता तर कदाचित हा विशेषांक दोन भागात प्रसिद्ध करावा लागला असता. नव्या-जुन्या मान्यवर लेखकांकडून आलेल्या मजकुराचा अंदाज घेऊन हा ‘नियोजित’ अंक ‘दिवाळी २०२१’ला प्रकाशित करणे आम्हाला टाळावे लागले. ‘दिवाळी अंकांच्या नियमित प्रवाहात हा अंक नसावा’ ही त्यामागची भूमिका होती. त्याचवेळी ‘६ जानेवारी २०२२ ; मराठी पत्रकार दिन’ हा प्रकाशन दिवस ठरवण्यात आला होता. लिहिणाऱ्या लेखकांची नावं असलेली जाहिरात ‘सत्यशोधक दिवाळी २०२१’ विशेष पुरवणी अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज हा अंक प्रसिद्ध होत आहे. ‘कोकण आणि पत्रकारिता’ या दोन विषयांना अनुसरून एक दस्तावेज तयार झाल्याचं समाधान याप्रसंगी आहे.

साप्ताहिक सत्यशोधकने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान दिलेलं आहे. दीर्घकालीन यशासाठी ‘विश्वास’ हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. ‘सत्यशोधक’ने तो सांभाळला आहे. हा अंक सत्यशोधकच्या वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. कोकणातील नव्या अभ्यासू पिढीला, पत्रकारांना, कोकण समजून घेण्याची इच्छा असलेल्या, कोकणासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या सर्वांना यातून ठोस दिशा सापडेल असा आमचा दावा नाही. मात्र ‘कोणत्या दिशेने जाऊ नये’ हे यातून ठळकपणे लक्षात येईल. ग. वा. बेहेरे यांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ या अंकांच्या निर्मितीतले मागील सहाएक महिने आमच्यासाठी असेच होते. अंकाचा ‘अतिथी संपादक’ म्हणून नितीन लिमये आणि कुटुंबीयांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला, पहिल्यापासून अंकातील विचार आणि त्याच्या निर्मितीसाठी जे ‘स्वातंत्र्य’ दिलं त्याची इथं नोंद करायला हवी. आजच्या पत्रकारितेत अधिक मोकळीक देणारा माध्यमसमूह सापडणं कठीण असताना इथे ती मिळाली यासाठी आम्ही ‘लिमये’ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ‘सत्यशोधक’च्या पुर्वसुरींनाही विनम्र अभिवादन करतो.

धीरज वाटेकर


संपादक : नितीन लिमये
अतिथी संपादक : धीरज वाटेकर
अंकाची पृष्ठसंख्या : ४७२
अंकाचे मूल्य : ७९९ रुपये
सवलत मूल्य : ५०० रुपये
अंकासाठी संपर्क :
नितीन लिमये - 9423291319 / 9545030454

अक्षरांना वचनांप्रमाणे सांभाळलेलं दाम्पत्य

‘तुका म्हणे वचनासाठी। नाम धरियेले कंठी।।’ हे वचन ऐकवून देवाचे नाव आपल्या कंठात धारण केल्याने , सतत नामस्मरण केल्याने बोलण्याची (वचनाची) शक्...