शुक्रवार, ३ जून, २०२२

कोकणातील आपत्ती रोखायला हव्यात !



तांत्रिकदृष्ट्या निसर्गनिर्मितअशी नोंद असलेल्या आपत्तींचे अलिकडच्या काळातील सततच्या होणाऱ्या आगमनामुळे ह्या आपत्ती मानवनिर्मितअसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपत्तीला मानवनिर्मित बनविणारी विकासप्रक्रिया कोकणवासियांनी नाकारायची आवश्यकता आहे. शासन कोणतेही असेना, त्यांना सर्वसामान्यांच्या भूमिकेचा विचार करावा लागत असल्याचे दाखले उपलब्ध असल्याने जल-जंगल-जमीन यांचा कोकणातील अमर्याद वापर थांबवून आपण आपल्या भविष्याला चांगले जीवन प्रदान करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल हरवल्याने कोकणची कोंडी झाली आहे. नैसर्गिक संपत्ती मुबलक असलेला आणि निसर्गाने भरभरुन दिलेल्या वरदानामुळे वेगळे आकर्षण ठरलेल्या कोकण प्रदेशाला आपत्तींचे ग्रहण लागलेले आहे. कोकणातील आपत्ती रोखणारी पर्यावरणपूरक भूमिका घेणे, त्यादृष्टीने कार्यरत होणे, आपल्या भूमिकेच्या बाजूने शासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळवणे, सातत्याने त्याचा आढावा घेणे हेच काम इथून पुढच्या प्रत्येक जागतिक पर्यावरण दिनाला कोकणवासियांनी करायला हवे आहे.

कोकणवासियांनी जमिनी विकण्यासह पर्यटन विकास म्हणून केलेली रिसॉर्टसह सर्व प्रकारची स्थापत्यकामे अधिकाधिक पर्यावरण स्नेही कशी होतील याकडे लक्ष द्यायला हवे आहे. कोकणातल्या वर्तमान आपत्ती बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम आहे. कोकणात होणाऱ्या वृक्षतोडीत सरकारी जमिनीपेक्षा खाजगी जमीन अधिक आहे. कोकणात उन्हाळ्यात लावले जाणारे वणवे, जंगलांना लावण्यात येणाऱ्या आगी, कोकणाची वाढती लोकसंख्या, वाहने, औद्योगिकरण, कचरा, प्लास्टिक पिशव्या, गाळाने भरलेल्या नद्या, धरणे, तलाव आदी प्रकारच्या निसर्गाच्या छेडछाडीमुळे आपत्ती वाढल्या आहेत. हवामान बदलाचे दुष्परिणाम आज देशभर भोगावे लागताहेत, त्यात कोकणही मागे नाही. भविष्यात याचे परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणात महापूराच्या पातळीने आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. कोकण आणि त्याला जोडलेला पश्चिम घाटातील सह्याद्रीचा परिसर हा पारंपारिक प्रचंड पावसाचा प्रदेश आहे. त्याच्या पूर्व-पश्चिम वहन मार्गातील वनश्री संपुष्टात ल्याने तो जमिनीत झिरपता थेट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावत सुटतो आहे. कोकण भूमीत २००५ सालचा महापूर, २००९ सालचे फयान चक्रीवादळ, २०२० सालचे निसर्ग चक्रीवादळ, २०२१ चे तोक्ते चक्रीवादळ २००५ च्या महापुरातील उंचीचे सारे रेकॉर्ड ब्रेक करणारा जुलै २०२१चा महापूर आणि त्याच्या जोडीला सह्याद्रीत कधी नव्हे इतक्या घडणाऱ्या भू-सख्खलनाच्या घटना धक्कादायक आहेत.

 

मागील वर्षी कोकणात २२ ते २३ जुलै २०२१च्या दरम्यानही खूप मोठा पाऊस पडला. कोकणातील नद्यांना पूर येण्यात नाविन्य नाही. पण महापूराचा विचार आणि उपाययोजना करताना आम्हाला नदीची व्यवस्था नीट समजून घ्यावी लागेल. ती समजून घेतल्यानंतर त्याद्वारे येणारे निष्कर्ष जमिनीवर उतरविणाऱ्या सर्व संबंधितांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण द्यावे लागेल. कारण सध्याच्या यंत्र युगातील अमानवीयकामे निसर्गाच्या मुळावर उठलीत. हे आपल्याला मुंबई-गोवा महामार्गाच्या निर्मितीसाठी फोडलेल्या घाट-डोंगरांची सध्याची अवस्था पाहिली असता लक्षात येईल. कोकणातील नद्यांचे पात्र पावसाळ्यात फुगते. आजूबाजूला गाळाचे मैदान तयार होते हे माहिती असताना आम्ही नद्यांची रुंदी का कमी केलीय?’ हे अनाकलनीय आहे. नद्यांचा गाळ काढायचा आहे?’ हे आम्हा सर्वांना फक्त पावसाळा जवळ आला कीच का बरे आठवते? या प्रश्नांची तीव्रता यंदा कमी झाली.  यंदा महापूरग्रस्त शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे गाळ काही प्रमाणात का होईना काढले गेलेत. तरीही नदीच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरोधातील आमची मानसिकता महापूरांचे प्रमुख कारण आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था आम्ही मोडून काढली आहे. दरडी का कोसळताहेत?’ कोकणातील बहुतांश दरडी या डोंगराळ भागात आणि मुसळधार पावसाळ्याच्या दिवसात कोसळतात. नको असलेले मोठाले झाड थेट तोडता येत नसेल तर त्याच्या बुंध्यात आग लावण्याची अघोरी प्रथा आम्ही आजही जोपासून आहोत. तसेच अवैज्ञानिक पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी डोंगररचना अस्थिर करतो आहोत, म्हणून हे सारे घडते आहे. पूर्वी ही प्रक्रिया अतिशय संथ असायची. आताच्या विकासाच्या यंत्र युगात हा वेग वाढल्याने आपत्ती वाढल्या आहेत. हे चक्र थांबवणे, त्याची तीव्रता कमी करणे आमच्या हातात आहे. डोंगराचा विध्वंस थांबविला नाही तर पुढील काळात मोठ्या दुर्घटना घडतीलअशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ (सर) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मांडत आलेत. आम्ही याचा विचार करायला हवा आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिवृष्टी आणि महापूराचा तडाखा बसला की हजारो कोटींची हानी होते. डांबरामध्ये ऑईलची अधिक भेसळ असलेले कित्येक रस्ते जमिनीतून उखडले जातात. रस्ते खचतात. पूल वाहून जातात. वीजेचे खांब कोसळतात, वाकतात. वीज पुरवठा खंडित होतो. पाणी पुरवठा योजना बंद पडतात, खराब होतात. दरडी कोसळतात. गावागावांचे संपर्क तुटतात. लोकांच्या शेतीचे, घरांचे नुकसान होते. अनेकांना स्थलांतरित व्हावे लागते. पाळीव पशूंचा जीव जातो. अशा काळात निकषाप्रमाणे शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांची मदतही मिळते. शासन काही भूमिकाही ठरवते, त्या कार्यान्वित व्हायला हव्यात. २०२१ च्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवरही सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार सुरु केल्याचे मासिक लोकराज्य ऑगस्ट २०२१ वर नजर फिरवली असता लक्षात येते. कोकणातील आपत्ती आणि निसर्गहानी विषयासंदर्भातील आजवरच्या साऱ्या अहवालांचे एकत्रीकरण करून त्यातून तज्ज्ञांच्या साहाय्याने परिणामकारक उपाययोजना निश्चित करणे, महाड आणि चिपळूण मधील महापूर नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्ठी, गांधारी, सावित्रीनदीतील गाळ व कचरा काढणे, मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत उभारणे, डोंगर कोसळण्याच्या घटना आणि कोयना अवजलाच्या वापराचा मुंबई लिंक प्रकल्पासाठी निर्णय घेणे, कोकणच्या २६ नदी खोऱ्यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली निर्माण करणे, आपत्कालीन बचाव यंत्रणा उभी करणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. ही कामे व्हायला हवी आहेत. जुलै २०२१ च्या चिपळूण महापुराचा विचार करताना येथील ज्येष्ठ जलतज्ज्ञ आणि आंबा उत्पादनाशी निगडीत डिफ्युझर तंत्रज्ञानाचे जनक विजय जोगळेकर यांची सह्याद्रीत लहानमोठी धरणे बांधून पावसाचे पाणी अडवण्याबाबत मांडलेली भूमिका अधिक रास्त आहे. तिच्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना व्हायला हव्यात. चिपळूणचे पाणलोट क्षेत्र हे दक्षिणेकडे कुंभार्ली घाटमाथा ते उत्तरेकडे श्रीक्षेत्र नागेश्वर-वासोटा किल्ला आणि पश्चिमेच्या बाजूला वाशिष्ठी नदीच्या खाडी किनारी चिपळूण शहर असे विस्तारलेले आहे. या सर्व क्षेत्रातील पावसाचा एकत्रित परिणाम म्हणून चिपळूणला महापूर येत असतो. चिपळूणच्या पूर्वेकडील चिपळूण ते सह्याद्री या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या ६/७ उपनद्यांमध्ये योग्य ठिकाणी 'नियंत्रित जलनिस्सारणतत्वाप्रमाणे लहानमोठी धरणे बांधून पाणी अडवून ठेवले तर चिपळूणला येणाऱ्या महापूराची तीव्रता कमी होईल. दुसऱ्या राज्य सिंचन आयोगाने धरण क्षमता वाशिष्ठी खोऱ्यात प्रस्तावित केलेली आहे. या प्रस्तावित धरणक्षेत्रात मानवी वस्ती फारशी नसल्याने तेथे विस्थापितांचाही प्रश्न नाही आहे. धरणे ही निसर्ग आणि पर्यावरणाला पूरक नाहीत हे सत्य असले तरी बिघडलेल्या पर्यावरणीय वातावरणात कोकणातील महापूरासारख्या आपत्ती रोखण्यासाठी सह्याद्रीत लहान-मोठी धरणेहाच पर्याय अधिक संयुक्तिक वाटतो आहे. कोकणात महापूर येणाऱ्या इतर शहरातही हाच उपाय संयुक्तिक ठरू शकतो.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकणासह सगळीकडे कोस्टल रेग्युलेटरी झोनचे नियम डावलून सुरु असलेला विकास पुढच्या दहा-वीस वर्षांत जमीनदोस्त होण्याचा धोका तज्ज्ञ वर्तवत आहेत. जिथे नद्या, ओढे समुद्राला मिळतात तिथल्या चिखलाट जमिनीत फोफावणारी खारफुटीची जंगलं समुद्राच्या लाटांचा हल्ला पेलतात. ती टिकवायला हवीत. कोकणात काही समुद्रकिनारे खडकाळ आहेत, काही रेतीच्या पुळणीचे आहेत. खारफुटी नसलेल्या काही किनाऱ्यांवर ब्रिटिशपूर्व काळात स्थानिकांनी उंडीच्या झाडांची एक तटबंदी उभारलेली होती. हा साठ फुटांपर्यंत उंच होणारा वृक्ष डोलकाठीसाठी खास उपयोगात यायचा. पुढे इंग्रजांनी कब्जा केल्यावर किनाऱ्याजवळची ही तटबंदी आरमारासाठी त्यांनी तोडून टाकली. अशी नोंद आपल्या एका लेखात डॉ. गाडगीळ सरांनी केलेली आहे. म्हणून आपण पुन्हा खारफुटी वाढवली पाहिजे. उंडीच्या झाडांची तटबंदी उभारली पाहिजे. त्सुनामी, वादळ, महापूर काळात पाण्याचा लोंढा रोखून आजूबाजूच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खारफुटीची मदत होते. लाटा आणि वाऱ्यांची तीव्रता खारफुटीची भिंत कमी करते. किनाऱ्यांची धूप कमी होते. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांत कोकण किनारपट्टीवरील अनेक नागरिकांनी खारफुटीमुळे तडाखा कमी बसल्याचे स्पष्ट केले आहे. खारफुटीची जंगले देखणी वाटत नसली तरी परिसंस्थेमध्ये त्यांचे महत्त्व मोठे आहे. कोकणातील समुद्रकिनारे आम्हाला वाऱ्यापासून संरक्षित करावे लागणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त किनाऱ्यांवर सुरू, केतकी/केवडा यांची लागवड करावी लागेल. दापोली तालुक्यातील आडे-आंजर्ले-पाडले आदी भागात केवड्यांचे बन आम्ही नष्ट करत चाललो आहोत. कोकणात आपत्ती रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी निसर्गाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु व्हायला हवी आहे.

कोकणच्या निसर्ग संपदेला, पर्यावरणाला बाधक ठरणारे प्रकल्प येऊ नयेत अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने करत आहेत. विकास म्हणून दळणवळणाची साधने, चौपदरी रस्ते, खेड्यापाड्यांपर्यंत जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण हे सारे आवश्यक आहे. पण तरीही आधुनिक शिक्षण आणि अत्याधुनिक वैद्यकीय सोयी वगळता कोकणात गाव आणि शहरे यातील फरक शिल्लक असायला हवा. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुन्डल्ये यांच्या मतानुसार,आपल्याला कोकणासह देशभरात स्थलानुरूप उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. जलसंधारणाची कामं स्थलानुरूप (site specific) असणं आवश्यक आहे. शेजारच्या दोन गावांमध्ये कदाचित वेगळे उपाय करणं योग्य असू शकेल. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रुंदी, खोली, आजूबाजूच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास करून मग कामं केली, तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.ब्रिटिशांनी कब्जा करताच भारताचं वर्णन वृक्षांचा महासागरअसं केलं होतं. ही वृक्षराजी ग्रामसमाजांनी, आदिवासी समाजांनी सांभाळली होती. जिंकलेला देश लुटण्यासाठी ब्रिटिशांनी या समाजसंघटना मोडून, वनसंपत्ती सरकारच्या ताब्यात घेऊन आदिवासी आणि स्थानिकांना दुर्दशेच्या खाईत लोटलं. स्वतंत्र भारत स्वावलंबी गावांचं गणराज्य बनेल,’ असं स्वप्न महात्मा गांधीजींनी पाहिलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळताच हे व्हायला हवं होतं. परंतु आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाचं काय चित्र दिसतं? आपण सर्वांनी मिळून भारतातील वृक्षांचा महासागर संपवला आहे. आपत्ती त्याचा परिणाम आहे. कोकणात घाटमाथ्यावर अति प्रचंड पडतो. तरीही कोकणात अनेक भागात जानेवारीत पाण्याची टंचाई भासते. आम्ही पावसाचे पाणी जमिनीत जिरवायला कमी पडतो आहोत.

 

इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे महासंचालक राहिलेल्या देवकीनंदन भार्गव यांनी आपल्या एका लेखात यापुढे खनिजोत्पादन स्थानिक समाजांच्या सहकारी संस्थांकडे सोपवणे उचित आहे, त्या संस्था परिसराला सांभाळत, आज जशी चाललेली आहे तशी ओढ्या-नद्यांची नासाडी न करत, अवाजवी यांत्रिकीकरणाच्या फंदात न पडता, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण करत खनिज व्यवसाय सांभाळतील,’ असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विचार करता, रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या घटना खूप होऊ लागल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यातील तळीये गाव मलब्याखाली गाडले गेले. तळीयेसह रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे ही याची अलिकडची उदाहरणे आहेत. जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग येथे कळणे गावात लोहखनिजासाठी खाणकाम सुरू असलेल्या भागात अतिवृष्टीमुळे खाणीच्या वरच्या बाजूला असेला उभा कडा ढासळला आणि त्यात साचलेल्या पाण्यासकट हा सगळा मलबा खाणीच्या खालच्या बाजूला असलेल्या गावात घुसला. खरंतर १९६७ च्या भूकंपापासून सह्याद्रीचा कोकणातील पट्टा भूस्स्खलनाला पूरक ठरू लागला असावा. एका आकडेवारीनुसार १९८३ साली रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ठिकाणी लहानमोठ्या दरडी कोसळून २३ व्यक्ती मरण पावल्या होत्या. २००५ साली महाड तालुक्यात १७ ठिकाणी दरडी कोसळून कोडविते, दासगाव, रोहन, जुई येथील १९७ व्यक्ती मरण पावल्या होत्या. चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाखालील पेढे गावातील कुंभारवाडीवर घसरून चार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली दरड सक्षम मनुष्यबळाच्या अभावाचे कारण ठरावी. हे थांबवण्यासाठी आपण कोकणच्या पर्यावरणाकडे आत्मियतेने पाहायला हवे आहे.

सन १९५० नंतर, कोयना धरणाच्या निर्मितीपासून चिपळूणात औद्योगीकरणाचे वारे वाहू लागले. सध्याच्या परिस्थितीला आम्ही सारे कोकणी दोषी आहोत. पूर्वी कोकणात कोणत्याही घाटातून उतरलं की अल्याड आणि पल्याड डोंगर हिरवेगार डोंगर दिसायचे. आज ते उघडे बोडके होऊन त्यांचे कडे कोसळू लागलेत. हल्ली कोकणात १५ ते २० दिवसात कोसळणारा पाऊस हा ढगफुटी सदृश होऊन एकाच दिवसात कोसळण्यामागे आणि चक्रीवादळाचं प्रमाण वाढण्यामागे वातावरणातील बदल हे महत्वाचे कारण जवळपास पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करताहेत. देशात घरोघरी सोलर प्रकल्प उभारायला हवेत. आपल्याकडे उन्हाळा सर्वाधिक असल्याने ते अवघड नाही. कोकणाबाबत, ‘मी एकट्याने करून काय होणार आहे?’ असा नकारार्थी विचार न करता, ‘मी केले तर निश्चित होणार आहे,’ हा सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून आपल्याला कार्यरत व्हावे लागेल. कोकणच्या पश्चिमेकडील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अंबा घाटातून संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे वाहणारी काजळीनदी पावसाळ्यात महापूर घेऊन येत असते. २०२१ मध्ये हे घडले नाही. कोकणातील साखरपा गाव पुरापासून वाचलेअशा बातम्या माध्यमात झळकल्या. याला कारण नॅचरल सोल्युशन्स आणि नाम फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी केलेली नदीतील गाळमुक्ती. काजळीनदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आलं. स्थलानुरूप उपाययोजना कोकणात प्रभावी ठरत असल्याने साखरप्यातील उपचार सर्वत्र लागू होईल असे नाही. मात्र आपत्तींवर उपचार होऊ शकत नाही असे अजिबात नाही. म्हणून मी केले तर निश्चित होणार आहे,’ हा विचार कोकणात अंगिकारला जायला हवा आहे.

महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी आपल्या वृक्ष लागवड आणि रोपे निर्मिती कार्यक्रमातून विदेशी वृक्ष प्रजातींना वगळावे. वृक्षारोपणामध्ये केवळ स्थानिक वृक्ष प्रजातींना प्राधान्य द्यावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय व्हावा यासाठी कोकणातील चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी महसूल व वन, पर्यावरण, सामाजिक वनीकरण,रोजगार हमी योजना आदी मंत्रालयांकडे पत्रव्यवहार केला आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी विदेशी वृक्ष प्रजातींपैकी गुलमोहर, निलमोहर, प्लटोफोरम, कॅशिया, रेन्ट्री, काशीद, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, मॅन्जीयम आदी झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. या झाडांच्या फांदया, खोडाचे लाकूड ठिसूळ असते. अशी झाडे वादळत तग धरू शकत नाहीत. स्थानिक वृक्ष प्रजातींची वाढ मर्यादशीर असूनही मुळे खोलवर जातात. त्यांचे लाकूड चिवट आणि कठीण असते. ही झाडे वादळात सहसा पडत नाहीत. २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळात मुबंई शहरात जे मोठे वृक्ष आणि त्यांच्या फ़ांद्या कोसळून अपिरमित हानी झाली त्यात ७० टक्के विदेशी प्रजातीचे वृक्ष (ऑस्ट्रेलियन ऑकेशिया) होते असे मुबंई महानगरपालिकेचे निरीक्षण आहे. पालिकेनेही यापुढे मुबंई शहरात आणि परिसरात विदेशी वृक्ष प्रजाती न लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्तींचा विचार करता शासनानेही हा निर्णय घेणे सार्वजनिक हिताचे आहे. नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत. पण अलिकडची पर्यावरणीय संकटे अधिक मानवनिर्मित आहेत. क्लायमेट चेंजचे परिणाम आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. या पुढे असे पूर-महापूर वारंवार येत राहणार आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम कसे कमीतकमी करता येतील, आपत्ती कशा रोखता येतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. अशा काळात महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये एकमेकांत समन्वय नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात, हे बदलावे लागेल. कोकणसह महाराष्ट्र राज्याला दुष्काळ, महापूर आणि जंगलात लागणाऱ्या आगी वादळे या महत्त्वाच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. महापूर, चक्रीवादळ आणि भूस्खलन अशा तिहेरी अस्मानी संकटांच्या कोंडीत कोकण सापडले असताना ‘हवामान बदल या जागतिक स्तरावरील व्यापक कारणाकडे बोट दाखवून आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती हा टाळता न येण्यासारखा प्रकार असला तरी आजच्या आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या युगात या आपत्तींना सामोरं जाताना पूर्वीची हतबलता का येत असावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणून आपत्तीमुळे कमीत कमी वित्तहानी होईल आणि जीवितहानी होणार नाही या दृष्टीनं नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपली पाऊले पडायला हवीत.

निसर्गचक्रीवादळानं गुहागर, दापोली आणि मंडणगड सह रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातला. निसर्ग काय किंवा तौक्ते वा २००९चं फयान याजीवितहानी झाली नाही, हे सत्य आहे. अर्थात या तिन्ही वादळांची आंध्रप्रदेश-ओडिशाच्या किनाऱ्यांवर धडकणाऱ्या चक्रीवादळांच्या तीव्रतेशी तुलना केली तर यातलं गणित लक्षात येईल. या वादळांचा सामना करण्यासाठी कोकणात विशेष पूर्वतयारी असायला हवी आहे. पावसाळ्यात पूर येणं हे कोकणच्या निसर्गजीवनाचं अविभाज्य अंग आहे. एखाद्या वर्षी धो धो पाऊस पडून नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत, त्यांच्या किनाऱ्यांवरच्या घर-बाजारात किंवा शेतांमध्ये पुराचं पाणी खेळून गेलं नाही तर कोकणात पावसाळा साजरा होत नाही. पण कधीकधी हा विध्वंस महागात पडतो. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही आपणहून गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदी, वणवे न लागणे, मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग साकारताना दुतर्फा नव्याने वृक्ष लागवड चळवळ, असे मुद्दे घेऊन कार्यरत व्हायला हवे आहे. चिपळूणात एकच देऊ नारा संपवू वणवा साराहे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून अखंड कोकण वणवामुक्त व्हावं म्हणून गेल्या दोनेक वर्षांपासून वणवा मुक्त कोंकणकार्यरत झाली आहे. सह्याद्री निसर्ग मित्रसंस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव पाहाता वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वणवा न लावता, न लावू देता सामाजिक स्तरावर वणवा जाळण्याऐवजी वणवा लावणारी प्रवृत्ती जळून जाण्याची आवश्यकता आहे. कायद्याने गुन्हा असलेली वणवा लावण्याची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सध्याच्या जंगलातील वणव्यांच्या ऋतू हंगामात जनजागृतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. 

 

कोकणच्या लाल मातीत कार्यरत हाताला रोजगाराच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देण्याची अमर्याद क्षमता असलेला, मागील तीन दशकात हळूहळू सर्वदूर विस्तारत असलेला पर्यटनउद्योग अधिकाधिक हरितअसायला हवा आहे. अर्थात पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !हे जरी खरं असलं तरी कोकणाभूमिपुत्रांना आत्मनिर्भर बनविणारं, पर्यावरण जपणारं पर्यटन हवंय’, ही भूमिका असायला हवी आहे. पर्यटनाच्या नावाने चैन, चंगळवाद, एका विशिष्ठ मर्यादेबाहेरील मौजमस्तीस कोकणी माणसाने विरोध करायला हवा आहे. प्रकृती दर्शन आणि निसर्ग निरीक्षणहेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे आहे. यापुढे जाऊन कोकणात ‘पर्यावरण पर्यटन संकल्पनेला अधिक बळ द्यायला हवे आहे. म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती शिकण्याच्या उद्देशाने नैसर्गिक भागाकडे प्रवास करणारे लोक असा कोकण पर्यटनाचा अर्थ शिकविला जाण्याची गरज आहे. कोकणात पर्यावरण आणि पर्यटन एकत्र चालायला हवे आहे. संपूर्ण कोकणासाठी आम्ही कोकणी लोकांनी एकत्र यायला हवे आहे.

सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून स्वतंत्र असलेली कोकणभूमी म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश. अशी नैसर्गिक संपन्नता क्वचितच कोणत्या प्रदेशाला मिळाली असेल. मात्र बदलत्या निसर्गचक्रामुळे कोकणातल्या लोकांना निर्धास्त जगणे अवघड होईल की काय? अशी स्थिती येऊन ठेपली आहे. यावर उपाययोजना शासनाने कराव्यात म्हणून कोकणवासियांनी तशा मागण्या नोंदवायला हव्या आहेत. स्वतंत्र भारतात १९५० पासून वृक्षारोपणाचे सोहोळे सुरु आहेत. १९७६ च्या एका वृत्तात राज्यातील एका मंत्र्यांनी म्हटले होते, ‘मागील दोन पिढ्यांनी वृक्षांची तोड करण्यापलिकडे दुसरे कोणते कार्य केलेले नाही. ज्या पद्धतीने वृक्ष संवर्धन व्हावयास हवे तसे ते झाले नाही. वृक्षजोपासना व जंगलवाढ करणे हे एकट्या शासनाचे काम नाही. त्यासाठी समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे.’ सरकारी वृक्षारोपण चळवळीस समाजाची साथ मिळालेली नाही. हीच अनास्था आज कोकणच्या पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. आगामी काळात कोकण भूमीचा विचार करताना आम्हाला संकुचित विचारातून बाहेर येत सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या पर्यावरणीय उपक्रमांना आमच्या सार्वजनिक जीवनात प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी इकोजीवनपध्दती अंगीकारावी लागेल. कोकणच्या स्वर्गीय सौंदर्याला लागलेले आपत्तींचे ग्रहण थोपविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण.

dheerajwatekar@gmail.com

रविवार, १० एप्रिल, २०२२

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

भारतात 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असल्याचा मान मिळालेले, महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' ‘ब्लू मॉरमॉन’ आज चिपळूणातील आमच्या खेण्ड निवासस्थानी अंगणी बागडताना पाहून सध्याच्या उन्हाच्या तीव्र कडाक्यातही परसदारी नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळाली. कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात वर्षभर सामान्यपणे आढळणारे हे फुलपाखरू श्रीरामनवमी दिनी प्रत्यक्ष आपल्या परसदारी अनुभवण्याचा आजचा आनंद केवळ शब्दातीत होता. पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात हे फुलपाखरू अधिक ठिकाणी आढळून येत असताना सध्याच्या दिवसात त्याने सहज दर्शन दिल्याने निसर्गाबद्दलची आमची अनामिक ओढ अधिक तीव्र होण्यास मदत झाली.


फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉनप्रमाणे प्राणी शेकरू, पक्षी हरियाल, वृक्ष आंबा, फूल जारुळ ही आपल्या राज्याची मानचिन्हे आहेत. हे फुलपाखरू भारतील भारतातील पश्चिम घाट, दक्षिण भारत, पूर्व किनाऱ्यासह श्रीलंकेतही आढळते. शास्त्रीयदृष्ट्या ब्लू मॉरमॉन (राणी पाकोळी ; Papilio polymnestor) च्या पंखांचा विस्तार १२०ते १५० मिमी असतो. मखमली काळ्या रंगाच्या ब्लू मॉरमॉनच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. चार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी लव ही याची अधिकची वैशिष्ट्ये आहेत. याच्या पंखाच्या खालची बाजू काळी असते. शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपकेही असतात. लिंबू, संत्रे, बेल या ह्या फुलपाखराच्या आवडत्या वनस्पती आहेत, असं कुठेतरी वाचलेलं आठवतं. कदाचित परसदारच्या बेलाच्या झाडाने त्याच्या सध्याच्या चैत्रपालवीने तर याला आकर्षित केले नसेल ना? फुलपाखराचं अस्तित्व असणं हा जैवविविधतेच्या समृद्धतेचा पुरावा असल्याने आणि आपल्या परसदारी हे शक्य असल्याने समाजाने निसर्गाकडे अधिक सजगतेने पाहायला हवे आहे.



जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासह पानगळीच्या जंगलातही हे फुलपाखरू आढळते. त्याचं एका दिशेने वेगात उडणं आणि उडताना सतत मार्ग बदलणं, वर-खाली उडणं सारं माहिती असल्याने छायाचित्र घेता येईल का? असाही प्रश्न असतो. पण आमच्या अंगणी त्याला विशेष कोणताही अडथळा येईतोपर्यंत अगदी वाऱ्याच्या हलक्या झुळूकीतही पान हलूनही ते पानावरून हललेले नव्हते. एखाद्या पानावर बसून ते क्षार शोषायला लागले की ते सहसा विचलित होत नसल्याचा हा परिणाम असावा. किंवा दुपारच्या उन्हाच्या कडाक्यात ते आपले पंख उघडे ठेवून विश्रांती घेत असल्यानं आम्हाला सोबतचा फोटो चक्क मोबाईलवर टिपण्याची लॉटरी लागली असावी. कारण आम्ही त्याच्या अगदी जवळ गेलो तरी त्याला काही फरक पडलेला नव्हता. सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर आम्ही याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या अंगणी त्याला आल्याचं पाहून मिळालेलं समाधान केवळ अवर्णनीय !

 

- धीरज वाटेकर

राज्य सचिव, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ.

https://kokanmedia.in/2022/04/10/bluemormon/?shared=email&msg=fail


शनिवार, ५ मार्च, २०२२

पूज्य भाऊ सहस्रबुद्धे : दत्त संप्रदायी सत्पुरुष

               प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज (श्रीक्षेत्र माणगाव) यांचे शिष्य, पूज्य श्री. बाळकृष्ण काशीनाथ उर्फ भाऊ सहस्रबुद्धे म्हणजे आपल्या अफाट तप सामर्थ्यातून सिद्ध झालेले एक अलौकिक दैवी व्यक्तिमत्त्व आहे. पूज्य भाऊ हे असंख्य शिष्यगणांच्या जीवनातील दीपस्तंभ आहेत. भाऊंचा मार्गदर्शन शब्द म्हणजे शिष्यांच्या मनात चैतन्य निर्माण करणारा अमृतकुंभ आहे. कोकणातल्या कुंब्रल (दोडामार्ग) गावी काहीतरी वेगळे घडावे, वेगळे उगवावे आणि या मातीचा गंध अध्यात्मिक क्षेत्रात सर्वत्र पसरवा असा जणू परमेश्वरी संकेत असल्यासारखे पूज्य भाऊ आपल्या संपूर्ण जीवनात वावरले आहेत. भाऊंचे गुरु पूज्य टेंब्येस्वामी महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगावी झाला होता. टेंब्येस्वामी महाराजांनी २४ जुलै १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदेला श्रीनर्मदा मातेच्या कुशीत गरुडेश्वर (गुजरात) येथे समाधी घेतली होती. यानंतर जवळपास २६ वर्षांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १४ फेब्रुवारी १९४० रोजी जन्मलेल्या आणि मानवी मनात आयुष्यभर दत्त संप्रदायी सत्पुरुष म्हणून स्थान निर्माण करणाऱ्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या तपस्वी जीवनाचा हा मागोवा.

अनादि काळापासून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची हजारो वर्षांची सलग परंपरा लाभलेला महाराष्ट्रासारखा भूप्रदेश जगाच्या पाठीवर क्वचित कुठे सापडेल. साऱ्या संतांनी मानवी समुदायाला ईश्वरभक्ती शिकवत उदात्तपणे जीवन जगण्याचे तत्वज्ञानही शिकवले आहे. पूज्य भाऊंकडे पाहिल्यावरही हेच जाणवते. कष्टाळू, अभ्यासू, व्यासंगी भाऊंचं मार्गदर्शन हे नेहमीच त्यांचा आवाजातील प्रेमळपणा, कारुण्य, मार्दवता आणि विषयातील प्रभुत्व यांमुळे प्रभावी ठरलेले आहे. आयुष्यात माणसाला कितीही वैभव प्राप्त झालं तरीही पूर्ण समाधान लाभतंच असं नाही. म्हणून तर ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ असं समर्थ रामदासांनी तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीही ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ म्हटलंय ते काही उगीच नव्हे. मानवातील विवेक काहीवेळा अडचणीच्या काळात ढळत असतो. अशावेळी त्याला देहरूपी गुरूंची खऱ्या अर्थाने गरज असते. आपल्या संपर्कात आलेल्या अगणितांची ही गरज भाऊंनी पूर्णत्वास नेलेली आहे. आकर्षक गौरवर्ण, नाकाने सरळ, तेजस्वी डोळे, कपाळावरील अष्टगंधाचा टिळा, साधा आणि स्वच्छ पोशाख, सदा हसतमुख चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले विलक्षण तेज आदींच्या समुच्चायातून साकारलेल्या पूज्य भाऊंरुपी सत्पुरुषाचे दर्शन-मार्गदर्शन अध्यात्मिक आनंदाचे अधिष्ठान आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ‘सहस्रबुद्धे’ घराण्याचे मूळ गाव आहे. कोतवडे हे रत्नागिरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. मूळची गणपुलेअसलेली आणि कालांतराने चतुरस्र बुद्धी, व्यवहार कुशलता, बाणेदारपणा या अंगभूत गुणांमुळे ही मंडळी बुद्धी सहस्त्रेषुअर्थात सहस्रबुद्धे नावाने प्रसिद्ध झाली असावीत असे म्हटले जाते. कोतवडे गावात पेशव्यांच्या उत्कर्षाच्या काळात बांधलेले ‘सहस्रबुद्धे’ घराण्याशी संबंधित स्वयंभू जागृत श्रीदेव धामणेश्वराचे भव्य मंदिर आहे. हे बिनखांबी मंदिर पायापासून घुमटापर्यंत जांभ्या रंगाच्या विशाल चिऱ्याचे एकावर एक थर रचून बांधले आहे. अहमदनगर मधील प्रसिद्ध संत आणि शिर्डीच्या श्रीसाई संस्थानचे पहिले अध्यक्ष श्रीदासगणू महाराज (गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे ; ६ जानेवारी १८६८ ते २६ नोव्हेंबर १९६२) यांचेही मूळगाव कोतवडे होते. प्रस्तुत लेखात आपण ज्यांच्याविषयीची मांडणी करतो आहोत त्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या घराण्याचे कोतवडे येथून विस्थापित झालेले मूळ पुरुष गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील ‘वेळगे’ गावी स्थिरावले होते. ‘वेळगे’ येथे याच सहस्रबुद्धेंपैकी ‘अनंत’ नामक व्यक्तीला तीन अपत्ये झाली. काशीनाथ हे त्यापैकी एक अपत्य होत. पुढे काशीनाथ यांना भालचंद्र नावाचे अपत्य झाले. भालचंद्र हे १९०७ दरम्यान वेळगे गावातून महाराष्ट्र-गोवा हद्दीवरील कुंब्रल (दोडामार्ग) या जैवविविधतेने संपन्न अशा गावात स्थायिक झाले. कुंब्रल मुक्कामी भालचंद्र यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. यातील मुलगा काशीनाथ हे पूज्य भाऊ यांचे वडील होत. काशीनाथ यांना सामाजिक कार्याची आवड होती. काशीनाथ यांना एकूण आठ अपत्ये झाली. भाऊ हे दुसरे अपत्य होय. पूज्य भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग सहस्रबुद्धे हे शिक्षक-साहित्यिक होते. शिक्षकी पेशात इमानेईतबारे सेवा बजावून निवृत्तीनंतर त्यांनी काहीशा उशीरा कथालेखनाला प्रारंभ केला होता. त्यांच्या कथांमध्ये आपल्याला दक्षिण कोकणी लोकजीवनातील सरळपणा, मिश्किलपणा, गांभीर्य, विनोद आणि वातावरणातील गूढता भेटते. त्यांच्या ‘अबोध’ कथासंग्रहाला प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी प्रस्तावना लिहिली होती.

पूज्य भाऊंच्या आणि त्यांच्या भावंडांच्या प्राथमिक शिक्षणाकरिता वडील काशीनाथ यांनी आपल्या राहात्या घरी दोन शालेय शिक्षक (पंतोजी) नेमले होते. कुंब्रल भागात शाळा नसल्याने काशीनाथ यांनी कालांतराने रत्नागिरीपर्यंत पायपीट करून आपल्या घराच्या आवारात गावातील वीस विद्यार्थ्यांच्या कल्याणार्थ शाळेची परवानगीही मिळवली होती. पहिल्या दिवसापासून पूज्य भाऊंना लागलेली शिक्षणातील गोडी बालवयात एकदम दुसरीच्या वर्गात प्रवेश करू देण्यास उपयोगी पडली होती. भाऊंचे बालपण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेत होते. आजोबा भालचंद्र यांचेही मार्गदर्शन भाऊंना लाभत होते. वयाच्या आठव्या वर्षी भाऊंची मुंज (उपनयन संस्कार) करण्यात आली. मुंजीचा ठरलेला कार्यक्रम काशीनाथ यांना अचानकच्या अडचणीस्तव महिनाभर लांबवावा लागला होता. महिन्याभरानंतर मात्र काशीनाथ यांनी भाऊंच्या मुंजीचा केलेला कार्यक्रम त्या काळात कुंब्रल पंचक्रोशीत आगळावेगळा ठरला होता. या कार्यक्रमात पूज्य भाऊंना पहिल्यांदा गायत्री मंत्राचा उपदेश झाला होता. भाऊंच्या मुंजीनंतर आई जानकी यांनी भाऊंच्या मनात दीक्षेद्वारे श्रीरामसेवेची आवड निर्माण केली होती. त्या अर्थाने आई जानकी या पूज्य भाऊंच्या पहिल्या गुरु होत. आईंच्या मार्गदर्शनाने पूज्य भाऊंची श्रीरामसेवा सुरु झाली. श्रीरामसेवा परिणामस्वरूप भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात असलेली किंचितशी चंचलवृत्ती कायमची बदलली.

ग्रंथ वाचनाची आवड अधिक वाढल्यानंतर एके दिवशी भाऊंनी आपल्या घरातील श्रीगुरुचरित्र ग्रंथाची पोथी वाचनासाठी उघडली. या पोथीत भाऊंना त्या बालवयातील इवलाश्या तळहातावर मावेल इतका छोटासा एक फोटो मिळाला. हा फोटो पाहताच क्षणी भाऊंना फोटोतील व्यक्तीविषयी चमत्कारिक आकर्षण निर्माण झालं होतं. या आकर्षणाचा परिणाम इतका वाढला की, ‘हेच माझे गुरु आहेत’ असे शब्द भाऊंच्या तोंडून आपल्या बाहेर पडले होते. तेव्हा भाऊंचे आजोबा भालचंद्र हे शेजारीच बसले होते. भाऊंच्या तोंडचे हे वाक्य ऐकून आजोबा भालचंद्र यांनाही अचंबा वाटला. त्यांनी तातडीने भाऊंच्या जवळ येऊन पोथीत सापडलेला फोटो पाहिला तर तो फोटो श्रीक्षेत्र माणगावच्या प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा होता. आजोबांनी हा फोटो कोणाचा आहे हे ओळखल्यावर भाऊंना आणखी आनंद झाला. त्यांनी लगेच ‘मी त्यांना पाहाण्यास आतुर आहे. मला तेथे जावयाचे आहे.’ असे आजोबांना सांगितले होते. आजोबांनी टेंब्येस्वामी महाराजांनी समाधी घेतली असून ते हयात नसल्याचे सांगितले. बालवयातील भाऊंसाठी हा मोठा धक्का होता. त्याही वयात भाऊ क्षणभर स्तब्ध झाले होते. भाऊंच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि निराशेचे भाव पसरले होते. पण आंतरिक तळमळ भाऊंना शांत बसू देत नव्हती. भाऊ शेवटी आजोबांना पुन्हा म्हणाले, ‘ते नसले तरी मला त्यांची जन्मभूमी पाहायची आहे. दत्तदर्शन घ्यायचे आहे.’ भाऊंची ही अनामिक ओढ आजोबांना लक्षात न आली तर नवल ! आजोबांनी तातडीने आपल्या एका खात्रीच्या माणसासोबत भाऊंना श्रीक्षेत्र माणगाव येथे पाठवले. या पहिल्याच भेटीत भाऊंना प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा गुप्तरितीने उपदेश झाला. महाराजांच्या झालेल्या याच उपदेशावर नितांत श्रद्धा ठेवून पूज्य भाऊंनी आपले जीवनव्रत आरंभिले.

भाऊंना लौकिकार्थाने दोन गुरु मिळाले. गुरूंच्या उपदेशस्वरूप जीवनव्रत आरंभिल्याने भाऊंमध्ये ज्ञानवृद्धी होऊ लागली होती. भाऊंकडून वेगवेगळ्या देवतांच्या सेवा घडू लागल्या होत्या. वैदिक, पुराणोक्त मंत्रांचा अभ्यास, धार्मिक शिक्षण, दैनंदिन संध्या आणि पूजाअर्चा यांचे घरच्या घरी दोन वर्षे अध्यात्मिक बैठक असलेल्या गुरुजींकडून मार्गदर्शन मिळत होते. बालवयात स्वतःला संस्कारक्षम शिक्षण मिळाले नसल्याची सतत जाणवणारी उणीव वडील काशीनाथ यांनी आपल्या मुलांच्या जीवनात राहाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. १९५२-५३ सालचे दरम्यान सावंतवाडी परीक्षा केंद्रावर पूज्य भाऊ इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी भाऊंना सावंतवाडी किंवा बांदा येथे जावे लागणार होते. आपल्या भागात सातवीच्या पुढील शाळा असायला हवी हा विचार काशीनाथ यांच्या मनात कित्येक वर्षे सुरूच होता. त्यावर्षी काशीनाथ यांनी जवळच्या कोलझरला शाळा सुरु केली. भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग हे या शाळेवरचे पहिले शिक्षक होते. अवघ्या आठ मुलांना घेऊन ही शाळा सुरु झाली होती. आज या शाळेचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. ही शाळा आज भाऊंचे वडील काशीनाथ यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेची साक्ष देत आहे. याच शाळेत भाऊंचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. मात्र या पुस्तकी ज्ञानाने आपल्याला नोकरी व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर जावे लागेल, प्रसंगी सरकारी नोकरी पत्करावी लागेल वगैरे विचार पचनी न पडल्याने भाऊंनी दहावीची परीक्षा देणे टाळले. भाऊंनी संस्कृतचा विशेष अभ्यास सुरु केला. पोटापाण्यासाठी घरातील शेती व्यवसाय आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दैनंदिन तपश्चर्या व साधनेत विशेष काळ घालविण्यास सुरुवात केली. वयाच्या १८व्या वर्षापासून भाऊंकडून पीडितांच्या पीडापरिहार्थ सेवा घडू लागली. अध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने विविध अडचणीतील पीडितांना उपाय सुचविण्यास प्रारंभ झाला होता. भाऊंकडून पीडितांचा पीडापरिहार इतक्या सहजतेने घडू लागला की भाऊंकडे येणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. १९५९ साली वयाच्या विसाव्या वर्षी भाऊंना परांजपे नामक गुरुजी घरी येऊन वेदोक्त शिक्षणाचे मार्गदर्शन करीत राहिले होते. मंत्रसंहितांसह विविध संहितांचे अधिकचे ज्ञान भाऊंना याच काळात प्राप्त झाले होते.

हा तो काळ होता जेव्हा दक्षिण कोकणात गोवा राज्यबंदीचे वातावरण पसरले होते. स्थानबद्धतेचे वाँरट आलेले भाऊंचे गोव्यातील नातेवाईक सखाराम पांडुरंग बर्वे हे कुंब्रल मुक्कामी आले होते. ते चारेक वर्षे कुंब्रलला राहिले. आपल्या या वास्तव्यात बर्वे यांनीच भाऊंना संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाऊंनी हार्मोनियम, तबला आणि गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण केले. संगीत क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळावे म्हणून १९६३ साली भाऊ सावंतवाडी येथील जोशी यांच्याकडे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्याच्या उद्देशाने अधिकच्या शिक्षणासाठी दाखल झाले. या परीक्षेला बसलेले भाऊंसोबतचे काही विद्यार्थी सहजगत्या ही परीक्षा पास होऊ लागल्याने आणि परीक्षेचा अभ्यास खूपच हलका वाटू लागल्याने भाऊंनी ती परीक्षा देणे ‘मध्यमात’ ऐन परीक्षा केंद्रावर जाऊन टाळले. परीक्षकांकडून याबाबतची विचारणा होताच, ‘परीक्षा अभ्यासक्रमापेक्षा बिंदूमात्र जास्त माझा अभ्यास झालेला आहे’ असं उत्तर भाऊंनी दिलं होतं. परीक्षकांनी मग लेखी पेपरनंतर होणारी १५ मिनिटांची तोंडी परीक्षा भाऊंसाठी खासबाब म्हणून तब्बल ७५ मिनिटे घेतली होती. यावेळी भाऊंनी दिलेली उत्तरे ऐकून अवाक् झालेल्या परीक्षकांची भाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप तर मारलीच परंतु पुढील काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची संधीही भाऊंना दिली होती.

भाऊंनी यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी काही शास्त्रीय पुस्तके अभ्यासून वैयक्तिक साधनेद्वारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. तत्पूर्वी म्हणजे १९६१ पासूनच भाऊंचे अध्यात्म आणि ज्योतिष यांची सुयोग्य सांगड घालून येणाऱ्यांना घडणारे मार्गदर्शन खूपच प्रभावी ठरू लागले होते. समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीची पत्रिका बघितल्यावर पत्रिकेत ज्या ग्रहांची तक्रार दिसते आहे त्या ग्रहांच्या देवतांची भाऊंकडून दिली जाणारी उपासना सेवा श्रेष्ठ ठरू लागली होती. लोकांना आपापल्या घरी बसून सहज करता येण्यासारखी उपाययोजना अनेकांना आपल्या समस्यांवर मात करण्याचे बळ देत होती. भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढत होती. भाऊंना वैयक्तिक अध्यात्मिक साधनेला वेळ अपुरा पडू लागला होता. म्हणून १९६९ मध्ये भाऊंनी आपला मुक्काम गोव्यातील ‘वेळगे’ या मूळगावी हलविला. १९७३ पर्यंत तिथेही भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढली. शेवटी भाऊ पुन्हा कुंब्रलला परतले. मात्र यावेळी घरी न थांबता भाऊ कोलझर येथील श्रीहनुमान मंदिरात वास्तव्याला आले. भाऊंनी आपली अध्यात्मिक सेवासाधना सुरु केली. कुटुंबापासून दूर राहून तपश्चर्या पूर्ण करण्यास आणि लोककल्याणार्थ भाऊंना पुरेसा वेळ मिळू लागला. जवळपास एक तपाहून अधिककाळ १९८६ पर्यंत भाऊंना श्रीहनुमंताच्या चरणी सेवेत राहून आपली विशेष तपश्चर्या रुजू करता आली. याकाळात भाऊंनी अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संत, सज्जनांची दर्शने आणि तीर्थक्षेत्री तीर्थाटने केली. तपश्चर्या फलित म्हणून शेकडो लोकांना अडचणीतून मोकळे होता यावे म्हणून भाऊंनी रामरक्षा, श्रीहनुमानस्तोत्र, श्रीव्यंकटेशस्तोत्र यांसह भगवान हनुमंताशी बोलणे करून आपल्याकडून प्रत्येक व्यक्तीला दिला जाणारा शब्द सत्कारणी लागेल याची काळजी घेतली. याच हनुमान मंदिरात भाऊंच्या अध्यात्मिक जीवनाला विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. पुढे पुढे भाऊंना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या इतकी वाढली की मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. दरम्यान ‘ज्याचे तोंडून श्रीराम हा शब्दही म्हटला जात नाही अशांना तू संकटमुक्त करून आम्हास अडचणी आणत आहेस. हे तू बंद कर. येणाऱ्यांना सेवा दे. ती हनुमंताकडून रुजू करून नंतरच शब्द दे.’ असा सूचनावजा आदेश भाऊंना सद्गुरुंकडून प्राप्त झाला. तेव्हापासून भाऊंनी लोकांना मार्गदर्शन करण्याची गणिते बदलली. तेव्हापासून आजतागायत पूज्य भाऊंनी भेटीस आणि मार्गदर्शनास येणाऱ्या प्रत्येकास प्रथम ग्रंथवाचन, जपरुपी सेवा देऊन नंतरच त्याच्या समस्येसंदर्भात अंतिम शब्द दिल्याचे अनेकांना ज्ञात आहे. पूज्य भाऊंनी सद्गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून श्रीरामदासस्वामी यांच्या त्रयोदशाक्षरी ‘श्रीराम जयराम जयजयराम’ या मंत्राप्रमाणे श्रीहनुमंतांच्या प्रेरणेने ‘जय जय जय श्री जय हनुमान’ हा मंत्र सिद्ध केला. विविध पीडा निवारण, लग्नकार्यादी अडचणी, नोकरी प्राप्तीतील समस्या, आदी कामांकरिता या मंत्राचा अनेकांना फलप्राप्त्यर्थ उपयोग झाला आहे.

आजन्म ब्रम्हचर्यपालन करत अध्यात्माकडे वळलेले पूज्य भाऊ हे आई जानकी यांच्या आज्ञेने १९८६ साली कुंब्रलला घरी परतले. आपलं घर, कुटुंब, शेती आणि संसार यात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. कुटुंबातील लग्नकार्ये, मुंज आदींत भाऊंनी लक्ष घातलं. कुटुंबातील वडिलोपार्जित भूखंडांची विभागणी, नव्याने घरबांधणी, घरी येणाऱ्यांना नियमित मार्गदर्शन सेवा सुरु केली. विशेष म्हणजे या काळात कालसर्पदोष शांतीसारख्या विविध धार्मिक मुद्द्यांवर छोटे छोटे उपाय सुचवून संत्रस्त लोकांना गुण प्राप्त करून दिला. काही हजार लोकांना रामरक्षा म्हणावयास सांगून त्याद्वारे लग्न आणि नोकरी यासारख्या प्रश्नांची उकल मिळणे, श्रीगणपती सहस्रआवर्तनातून नोकरीची उपलब्धी, श्रीशिवमंत्र आणि शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाच्या वाचनातून रोगमुक्ती तसेच पिढीजात दोष निवारणार्थ ६ किंवा १० अक्षरी प्रभावी मंत्राचा उपयोग करून लोकांना संकटमुक्त होण्यासाठी पूज्य भाऊ सहाय्यभूत ठरल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

२०११ सालच्या प्रारंभी पहिल्यांदा आम्ही एका अचानक योगावर पूज्य भाऊंच्या कुंब्रलमधील निवासस्थानी पोहोचलो होतो. या पहिल्या भेटीत आमचं भाऊंचे ज्येष्ठ बंधू पत्रकार आणि कथाकार स्वर्गीय पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्याशी अधिक बोलणं झालेलं. त्यानंतरच्या जवळपास भेटीत आमच्या पूज्य भाऊ आणि पांडुरंग सहस्रबुद्धे सरांसोबत, शेणाने सारवलेल्या सुगंधित अंगणात कोकणी पद्धतीने शाकारणी केलेल्या मांडवाच्या सावलीत तासनतास रंगलेल्या गप्पा आठवतात. विशेष म्हणजे पूज्य भाऊ आणि सहस्रबुद्धे सरांसोबत स्वतंत्र संवाद व्हायचा. कधी कधी कुंब्रलला नुकत्याच सारवलेल्या अंगणातही आमचं आगमन व्हायचं तेव्हा त्या ओलेथर सारवणावर काढलेली ती छोटीशी पांढरी रांगोळी भारतीय संस्कृतीचं अलभ्य दर्शन घडवायची. पूज्य भाऊंच्या उपस्थितीतील तिथल्या वातावरणात अनामिक आनंदाची दुर्मीळ अनुभूती मिळायची. आमच्या २०११ सालच्या दिवाळीपूर्व भेटीत, आम्ही नाथसांप्रदायी असल्याचे कळताच पूज्य भाऊंनी आम्हाला जवळच्या मोरगाव येथील श्रीदेव म्हातारबाबा देवस्थान चरणी नतमस्तक होण्याची आज्ञा केली होती. त्याच दिवशी सूर्यास्तसमयी श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेताना आम्हाला आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींची तुलना २००० साली गणेशगुळे येथे आलेल्या अनुभवाशी करण्याचा मोह आम्हाला अनावर झाला होता. श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी चिपळूणला मार्गस्थ झालो होतो. काळोख झालेला नव्हता पण अंधारून आलेलं होतं. त्याच रात्री आमच्या राहात्या घरी कुटुंबात आमच्याच खूर्चीत बसलेल्या अवस्थेतील श्री म्हाताराबाबांची दिव्यदर्शन‘स्वरूप’ उपस्थिती आम्हाला कळली तेव्हा ‘पूज्य भाऊ हेही आपले गुरुच !’ याची मनोमन खात्री पटली होती. म्हातारबाबा देवस्थान महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील बांद्यापासून १० ते १२ किमी. अंतरावर आहे. हे स्थान किमान दोनेकशे वर्षपूर्व असावे. बांदा या गावातून घारपी, फुकेरी, कोलझर, कुंब्रल, उगाडे, तळकट, शिरवल, झोळंबे गावी जाणाऱ्या अतिदुर्गम जंगलातील पायवाटेवर हे ठिकाण आहे. येथे पूर्वीच्या काळी पैदल किंवा बैलगाडीने प्रवास चालायचा. रात्री-अपरात्री या रस्त्यावर मदतीसाठी कोणी नसायचं. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करताना विशिष्ठ ठिकाणी थांबून खडे (दगड) टाकून देवाला मदतीसाठी हाक मारण्याची प्रथा रूढ झाली होती. कालांतराने कच्चा मार्ग झाल्यावर खडे टाकण्याची प्रथा मागे पडून चिलीम (विडी) ठेवण्याची प्रथा सुरू झाली. ही चिलीम एखादी वयस्कर व्यक्ती ओढत असावी असा रूढ समज होता. एके रात्री एक वाटसरू रात्री या वाटेने आपल्या घरी निघाले होते. निर्जन जंगलातून पुढे जायचा त्यांना धीर होईना. त्यांनी रूढ प्रथेप्रमाणे विशिष्ठ ठिकाणी उभे राहून, ‘मदत कर’ अशी विनंती केली. तेव्हा समोरून डोक्यावर फटकूर, हातात कंदील आणि दांडा धरलेली व्यक्ती वाटसरूला दिसली. त्यांनी वाटसरूला घरापर्यंत सोबत केली. घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी बोलल्यावर रात्रीच्या वेळी सर्वांच्या मदतीला येणारी अदृश्यरूपी शक्ती हीच म्हातारबाबा असल्याचा उलगडा झाला होता. कालांतराने याठिकाणी आजचे मंदिर उभे राहिले. हे क्षेत्र श्रीगोरक्षनाथ यांचे शिष्य ‘गहिनीनाथांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नजीकच्या इन्सुलीत (सावंतवाडी) प्रसिद्ध संत सोहिरोबानाथ अंबिये यांनाही एका वडाच्या झाडाखालच्या पाषाणी बसलेले असताना गहिनानाथांचा (गैबीनाथ) साक्षात्कार झाला होता. श्रीम्हातारबाबा क्षेत्री ‘उन्हाळी व पावसाळी’ पाण्याचे दोन झरे आहेत. आडाळी आणि मोरगावच्या हद्दीतील त्रिकोणात हे स्थान आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथे म्हातारबाबाची जत्रा भरते. श्रीम्हातारबाबा अडचणीत सापडलेल्या आणि त्यांना हाक मारणाऱ्या प्रत्येकाला संकटकाळात मदत करतात अशी या परिसरातील श्रद्धा आहे.विभिन्न वनदेवतांचे सूक्ष्म अध्ययन हवे’ असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटलेलं आहे, त्यामागे कदाचित हीच भावना असावी.

श्रीम्हातारबाबांच्या या अनुभूतीनंतर आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या व्यावसायिक कामास्तव सिंधुदूर्गात गेलो तेव्हा तेव्हा पूज्य भाऊंच्या दर्शन-मार्गदर्शनार्थ कुंब्रलला जात राहिलो. साधारणतः दीडेक वर्षे या भेटी होत राहिल्या असतील. त्यानंतर एका विशेष प्रयोजनास्तव, १२ ऑक्टोबर २०१२ पासून भाऊंनीच आपला मुक्काम कुंब्रलमधून रत्नागिरीत हलवला होता. २०१५ साली रत्नागिरीतच पूज्य भाऊंचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन (पाद्यपूजन-दर्शन-मार्गदर्शन) सोहोळा सर्व शिष्यगणांनी संपन्न केला होता. किमान सहा वर्षे, २०१८ पर्यंत पूज्य भाऊंचे रत्नागिरीत वास्तव्य होते. याही काळात भाऊंनी अध्यात्म, दैवी संकेतांवर विश्वास असलेली अनेक माणसे नव्हे तर कुटुंबे रत्नागिरीत जोडली. आज शुभारंभ (६ मार्च २०२२) होत असलेल्या प्रस्तुतच्या साप्ताहिक ‘रत्नागिरी प्रतिनिधी’चे संपादक सुनील चव्हाण आणि कुटुंबीय यांपैकीच एक होत. पूज्य भाऊंच्या उण्यापुऱ्या ८३ वर्षांच्या जीवनाकडे तटस्थपणे पाहिल्यावर नियमबद्ध आचरण, कमालीची सत्यप्रियता, देशभक्ती आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे भाऊंची समाजमनावरील छाप अधिकाधिक घट्ट बनल्याचे जाणवते. मानवी मनाला एखाद्या क्षणाचा सत्संग जरी घडला तरी जीवन सफल झाल्याचे समाधान भेटत असते. अशाच एखाद्या क्षणापुरते का होईना ? पूज्य भाऊंचे सानिद्ध्य लाभलेल्यांचा अनुभवही असाच आहे. भाऊंचे अध्यात्मिक जीवन, त्यांनी विविध गरजूंसाठी केलेले कार्य, लोकांना आलेले त्यांचे अध्यात्मिक अनुभव यातून अगणितांची जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी बदलून गेलेली आहे. रत्नागिरीतून सिंधुदूर्गात परतल्यावर पूज्य भाऊंचे आम्हाला कधी देवगडात कधी कुडाळात दर्शन-मार्गदर्शन लाभलेले आहे. तसे ते अनेकांना लाभलेले असेल. पण भाऊंना त्यांच्या कुंब्रलमधील अध्यात्मिक पवित्र्याने भारलेल्या निसर्गरम्य वातावरणातील ‘कुटी’त बैठक मारून बसलेलं असताना ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवणं, त्यांचं मार्गदर्शन आपल्या पदरात पाडून घेणं ही मानवी जीवनातील सर्वोत्तम अध्यात्मिक अनुभूती ठरावी.


धीरज वाटेकर, चिपळूण.

मो. ९८६०३६०९४८.

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  





आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...