सोमवार, १२ जून, २०१७

जंगलांचे आक्रंदन आणि मानवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात आकुर्डे गावातील अनिल पोवार आणि पत्रकार रघुनाथ शिंदे या दोघा उमद्या व्यक्तीमत्वांचा रानगव्याच्या हल्ल्यात अलिकडेच दुर्दैवी मृत्यू झाला आणि जंगलांचे आक्रंदन आणि मानवी मृत्यू हा जुनाच प्रश्न नव्याने समाजासमोर पुन्हा एकदा उभा ठाकला. अपुरा पाणीसाठा, चा-याच्या कमतरता यामुळे या भागातील रानगवे वाड्यांवस्त्यांवर येवून पोहोचले आहेत. परिसरात गव्यांची दशहत निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग एकटा-दुकटा शेतात जाण्यास टाळाटाळ करू लागला आहे. भुदरगड तालुक्यातील हे वनक्षेत्र रांगणा किल्ल्यापासून विस्तारलेले असून, दाजीपूर गवा अभयारण्याला संलग्न आहे. घनदाट जंगल असणारा हा वनचरांचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा हा परिसरही वृक्षतोडीने ग्रासला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवनावर अतिक्रमण होवून अखेर ते मार्ग मिळेल तिकडे सैरभैर जावू लागल्याने हे सारे देशभर सर्वत्र घडते आहे. या साऱ्याचे मूळ अर्थातच वृक्षतोडहेच आहे, आम्ही मात्र आक्रंदणाऱ्या जंगलांचा आवाज ऐकण्याच्या मनस्थितीत आजही नाही, हेच सततच्या दुर्दैवी घटनांतून जाणवते.    


आपल्या देशात कर्म करतो कोण ? नुकसान सोसतो कोण ?’ अशी विचित्र स्थिती आजही कायम आहे. बेसुमार जंगल तोडीमुळे आपल्याकडे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, होत आहेत, होणार आहेत. परंतु जो समूह या साऱ्यापाठी आहे त्याचे काहीही बिघडल्याचे एकही उदाहरण वाचनात, ऐकण्यात, पाहाण्यात नाही. भुदरगड तालुक्याच्या कडगाव-पाटगाव ते रांगणा किल्ला, मठगाव ते आंबोली परिसरातील वनक्षेत्रात अनेक वन्यप्राणी स्थिरावलेले आहेत. निर्ढावलेले रानगवे तर रात्री पोटभर खाऊन गाव-गल्लीतून पाणवठयाकडे ये-जा करताहेत. या उपद्रवी जनावरांना बेशुद्ध करून दाजीपूर अभयारण्यात नेऊन सोडणे इतकाच काय तो पर्याय आज उपलब्ध आहे. हे प्रकार बळावूच नयेत म्हणून आम्ही काहीही करत नसल्याने घटन घडल्यानंतर शासन जागे होते आहे. जंगलांच्या सीमा ओलांडून येणाऱ्या बिबट्यांचे हल्ले आणि त्यात होणारे मानवी आणि बिबट्यांचे मृत्यू ही देशभरातील मोठी समस्या आहे. त्यात बिबट्यांची संख्याही कमालीच्या वेगाने घटते आहे. मानव आणि बिबट्या यांच्या संघर्षात अनेकदा बिबट्यांना ठार करावे लागले आहे. त्याची अधिकृत आकडेवारी ऐकून निसर्गप्रेमी व्यथित होतात. आसामसह कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हत्तींचा उपद्रव असाच आहे. गीरच्या जंगलातील सिंहांचे कळप नजीकच्या गावात पोहोचलेत, काझीरंगातील गेन्ड्यांनाही शहराची सवय झाली आहे. वन्यजीवांचा अधिवास संपल्याने समस्या तीव्र बनली आहे. यातील बऱ्याचश्या घटना ह्या विशेषतः तीव्र  उन्हाळ्यात, पाणीटंचाई काळात घडतात. जगभरातील हा चर्चेचा मुद्दा आहे.

निसर्गातील प्रत्येक घटक माणूस, प्राणी, पक्षी, वनसंपत्ती, जलसंपत्ती, शेती हे सारे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यात माणूस हा जरासा बुद्धिजीवी असल्याने अन्नसाखळीसाठी निसर्गातील प्रत्येक घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे, याची त्याला जाणीव झाली आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकावर एकमेकांना जगवण्याचीही जबाबदारी आहे. कारण जे-जे जीवंत असते, ते एक दिवस नष्टही होणार आहे. पर्यावरणाच्या अन्नसाखळीतील अनेक घटक एकमेकांना भीत असतात. वन्यप्राणी जंगल सोडून लोकवस्तीत घुसले की हे जाणवते. वन्यप्राणी शेती नष्ट करतात,त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त  शेतक-यांना वन्यप्राण्यांचे हल्ले त्यांच्या जगण्यावर आघात करणारेच वाटतात. सापांना लोकवस्तीतून पकडून जंगलात नेऊन सोडल्यानंतर तेत्यांच्या मूळ जागी न सोडता कुठेही नेऊन सोडले तर साप, नाग नंतर मृत्यू पावतात. पर्यावरणात असे अनेक विषय येतात. आपल्याकडे प्राणी आणि  मनुष्य यांच्यातील इंटरॅक्शन वाढविण्याची खूप मोठी गरज आहे. मानव स्वत:च्या हक्कासाठी भांडतो, परंतु पशु-पक्ष्यांचेही हक्क वगेरे असू शकतात, हे मात्र माणूस मानायलाच तयार नाही. यात दुर्दैवाने जे पर्यावरण तत्व मानतात, जगतात, त्यात वावरतात त्यांचाच नाहक बळी जातो, हे अतिशय दुर्दैवी आहे.   
शेती-बागायतीत घुसून वन्यप्राण्यांकडून शेतक-यांचं मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. आंबोली ते मांगेली या सहय़ाद्रीच्या पट्टय़ात गवारेडे, रानडूक्कर, माकड, हत्ती आदि वन्यप्राण्यांकडून दरवर्षी लाखो रुपयांचं नुकसान होते. सरकारदरबारी वेळोवेळी कैफियत मांडून देखील ठोस काही घडत नाही. वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नये, यासाठी धोरण राबवायला हवंय. वन्यप्राण्यांचा उपद्रव केवळ आपल्यालाच सहन करावा लागतो असं नाही. जगात अनेक देश आहेत, वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीत येऊन नुकसान करू नये यासाठी, या देशांनी उपाययोजना केल्या आहेत, याबाबत आपल्याकडे उदासीनता आहे. वन्यप्राण्यांना जंगलात खाद्य शोधण्यासाठी दीर्घकाळ पायपीट करावी लागते. तुलनेत लोकवस्तीत मुबलक पाणीसाठा व शेती, बागायती असल्यामुळे सारेच सहज उपलब्ध होते. पाणी व खाद्याची पायाभूत गरज लोकवस्तीत सहज पूर्ण होत असल्यानेच वन्यप्राणी निव्वळ लोकवस्तीत अतिक्रमण करू लागले आहेत. वन्यप्राण्यांच्या या अतिक्रमणामुळे शेती-बागायतींची नासधुस होऊन शेतक-यांचं अतोनात नुकसान झालेले  आहे, प्रसंगी मृत्यू होत आहेत. वनविभागाकडे वन्यप्राण्यांचं अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना नाही. नुकसान टाळण्यासाठी शेती  बागायतींना सौरकुंपण घालण्याची तरतूद मात्र आहे. तिचा किती प्रभावी उपयोग होतो ? हा प्रश्नच आहे.  

फारपूर्वी जंगली प्राणी लोकवस्तीत येत नसत. त्यांना जंगलात खाद्य मिळत होतं. आज पोल्ट्रीसारखे अनेकविध पदार्थ नदीकिनारी, वस्तीजवळ दूरवर कोठेही कसेही टाकले गेल्याने त्याच्या वासाने वन्यप्राणी लोकवस्तीत घुसतात. वन्यप्राण्यांना लोकवस्तीपासून दूर करण्यासाठी शेकोटी पेटवून त्यात मिरचीपूड किंवा मिरची घालून प्राण्यांना तीव्र वास येऊन ते लोकवस्तीपासून दूर जातील, असेही प्रयत्न करता येतील. या वन्यप्राण्यांना लोकवस्तीपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने झपाटून सौरऊर्जा कुंपण, वनक्षेत्राच्या हद्दीत चर मारणे अशी कामं मनापासून करायला हवीत. एखाद्या वन अधिकाऱ्याने दिवस-रात्र एक करून, अशाच एखाद्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचे हल्ले प्रयत्नपूर्वक कमी करून दाखवायला हवेत, असे प्रयोगशील उमदे काम इतर अनेकविध क्षेत्रात होते, इथेही व्हायला हवे, म्हणजे त्याचा कित्ता इतर ठिकाणी गिरवता येईल.

धीरज वाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...