सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

नाथभूषण आर. आर. भंडारे : मनाला चटका लावणारी एक्झिट !


चालू महिन्याच्या पहिल्या रविवारी (३ फेब्रुवारी) अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने ‘नाथभूषण’ या महासंघाच्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने समारंभपूर्वक गौरविलेल्या खेड-भरणे येथील रामचंद्र रक्कमनाथ तथा आबा भंडारे यांचे अवघ्या आठच दिवसात गेल्या रविवारी (१० फेब्रुवारी) दु:खद निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहात समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे नाथपंथी समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या रामचंद्र रक्कमनाथ तथा आर. आर. भंडारे यांची ही अचानकची एक्झिट संवेदनशील मन असलेल्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

मृत्यूने चोरपावलांनी येवून आकस्मिकपणे माणसांचे जीवन संपवणे ही विसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्रापूर्वीची नेहमीचीच घटना होती. मात्र वैद्यकीय प्रगतीमुळे मानवी आयुष्य वधारले आहे. तरीसुद्धा मानवाला कुठे ? कधी ? कसे ? मरण येणार ? हे सांगणे कठीण आहे. गेल्या शंभर वर्षात मृत्यूची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. या साऱ्या कागदी अभ्यासाच्या पलिकडचा विचार करायला भाग पाडणारे असे आबांचे जाणे घडले आहे. आबांसारखी, जीवनातील प्रत्येक पायरीवर आपली कर्तव्ये पार पाडत, जीवनाचा उद्देश समजून घेत थोडेसे अंतर्मुख होऊन जगणारी माणसे आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असली तरी त्यांच्या स्मृती अनेकांच्या हृदयांतरी कायम राहतील असेच त्यांचे जगणे होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव तसा हळूहळू आपल्या शेवटाकडे प्रयाण करीत असतो. हा प्रवास अखंड सुरु असतो. त्याचा शेवट शांत आणि समाधानाने व्हावा असे आपल्याला कितीही वाटत असले तरीही प्रत्येकाच्या बाबतीत तसे घडतेच असे नाही, या मागची कारणमीमांसा हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे. परवाच्या रविवारी (१० फेब्रुवारी) चिपळूण-नवीमुंबई-चिपळूण प्रवासात, दिवसभर ड्रायव्हिंग करत असताना सायंकाळी चारसव्वाचारच्या सुमारास एका निवांत क्षणी वॉट्सअप पाहताना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ‘प्रवक्ता’ ग्रुपवर प्रवक्ते विश्वनाथ डवरी यांनी दुपारी २.२५ वाजता टाकलेली पोस्ट वाचून मन कातरले. ती पोस्ट आबांची प्रकृती बिघडल्याची जाणीव करून देण्याबाबतची होती. गेल्याच रविवारी (३ फेब्रुवारी) बरोबर याचवेळी आबा, ‘नाथभूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ. संजय कदम आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत सत्काराला उत्तर देत होते. ‘या पुरस्कारामुळे आपण कृतार्थ झालो आहोत. ज्या समाजासाठी झटलो. त्यांनी आपले प्रेम या पुरस्काराच्या रूपाने परत दिले त्यामुळे आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमानंतर आबांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप यांच्या आग्रहाखातर घरी आम्ही जाऊन चहापान घेतले होते. आबांची तेव्हाही भेट झाली होती. तशी तब्बेत ठीक नव्हती. आबा झोपूनच होते. हे सारे आठवले. तातडीने चार वाजून एकोणीस मिनिटांनी संदीपना फोन लावला. फोनवर ‘आबा गेले !’ एवढंच काय ते ऐकू आलं. बाकी संदीप यांच्या रडण्याचा आवाज कानात येत राहिला. २७ सेकंदांनी फोन बंद झाला. क्षणभर काय करावे ? हेच समजेना. विज्ञानयुगातील हा ‘भ्रमणध्वनी’ आपल्याला कोणत्या क्षणांना सामोरे जायला लावेल याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. संदीपचे शब्द पुनःपुन्हा कानात आठवून चार वाजून अडतीस मिनिटांनी आम्ही वॉट्सअपवरून घडलेली घटना इतरांना कळविली, इतक्या लवकर कळवणे योग्य होते की अयोग्य ? याबाबतही नंतर आमच्या मनात द्वंद्व राहिले. नंतरच्या वृत्तात आबांच्या जाण्याची वेळ सायंकाळी ४.२० अशी नोंदवलेली होती.  

समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, विधानभवनात साप आणि माकड सोडणारे नेते अशीही त्यांची ओळख होती. भंडारे, यांना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या सहीने दिलेले प्रवक्ता विश्वनाथ भंडारी यांनी लिहिलेले मानपत्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आजच्या पिढीस ओळख करून देण्यास पुरेसे आहे. त्यातील वर्णनानुसार, नाथ संप्रदायासारख्या महत्त्वपूर्ण पवित्र अशा समाजात आपला जन्म दिनांक ऑगस्ट १९४६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रामचंद्र रक्कमनाथ भंडारे असे नाव आपण धारण केले. परिस्थितीशी टक्कर देत आपले बालपण गेले. मंत्रालयासारख्या मोठ्या ठिकाणी आपण शासनाची सेवा केलीत. ही सेवा प्रामाणिकपणे करत असतानाच आपला नाथ समाज सुद्धा आपण विसरला नाहीत. मंत्रालयात डेस्क ऑफिसर, रेकॉर्ड इन्चार्ज आपण होता आणि इंडस्ट्री हे खाते आपणाकडे होते. मंत्रालयात संपूर्ण राज्यातून लोक येत असतात; त्या दृष्टीने आपण येणाऱ्या समाजाच्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. एक नव्हे- दोन नव्हे -तर तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्र नाथजोगी सेवा समाज मुंबई, या संस्थेचे आपण सचिव म्हणून काम केले आहे. विमुक्त भटक्या जमातीचे आपण सन्माननीय सदस्य सुद्धा होता. लक्ष्मण माने, मच्छिंद्र भोसले, बाबुराव चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबर आपण समाज एक करण्याचा प्रयत्न केला. अनेक मेळावे घेतलेत. त्यापैकी १९८७ ला अखिल महाराष्ट्र नाथजोगी समाजाचा महामेळावा आपण खेड या ठिकाणी घेतला होतात. मंत्रालयामध्ये आपण समाज कल्याण सल्लागार बोर्डावर सुद्धा होता. ज्येष्ठ नेते डॉक्टर जयाजी नाथ व डॉक्टर गोरखनाथ चव्हाण यांना आपण स्वतः संस्थेमध्ये घेतले होते व त्यांना मार्गदर्शनही केले होते. यावेळी संस्थेच्या इतर काही लोकांनी 'हे आपल्या जातीचे नाहीत' अशा प्रकारे विरोध केला होता; परंतु अशा प्रकारच्या बारीक-सारीक अडथळ्यांना लिलया पार करण्याचे कसब तुमच्याकडे होते. आपण अनेक वधू-वर मेळावे सुद्धा घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. आपण अनेक मोर्चे घेतले, त्यामध्ये पुंगीवाले, सापवाले, नंदीबैलवाले, माकडवाले यांना घेऊनही आपण मोर्चे काढलेले आहेत. आपण विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला मंत्री भेटायला येत नाहीत या रागातून आपण विधानभवनामध्ये साप आणि माकडे सोडली होती !! त्यामुळे गहजब झाला होता !! भारताची राजधानी दिल्ली येथे सुद्धा आपण एन. डी. सोनवणे संरक्षक यांच्या बरोबर मोर्चा काढून धडक दिली होती. नागपूर येथे काढलेल्या मोर्चा मध्ये सुद्धा आपले नेतृत्व सिद्ध झाले होते. वयाची कोणतीही तमा न बाळगता व शरीर प्रकृतीकडे लक्ष न देता आपण आज सुद्धा कोकणामधील गोरगरीब नाथ जोगी समाजाचे काम करीत आहात. आपण वयाने सुद्धा आता ज्येष्ठ असून, अनुभवाने परिपक्व आहात. या वयातही आपण मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहात, ही कौतुकाची व अभिमानाची अशी बाब आहे. नाथ जोगी समाजाचे चरित्रकार म्हणून इतिहास तुमच्याकडे पाहिल आणि संघटनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहास तुम्हाला टाळून पुढे जाऊ शकणार नाही !! पुढील आयुष्यात तुमची तब्येत चांगली राहावी व तुमची शंभरी पूर्ण व्हावी, अशी परमेश्वराकडे या सन्मानपत्राच्या निमित्ताने प्रार्थना करुन आपण केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, आपला अधिकार मान्य करून अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या हातात असलेला सर्वोच्च  "नाथ भूषण" हा पुरस्कार आपणाला सन्मानपूर्वक व कृतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे !! या मानपत्रासहच्या सत्कारानंतर अवघ्या आठच दिवसात आबांची प्राणज्योत मालवली.

आत्तापर्यंत जगलेल्या एकोणचाळीस वर्षांपैकी तेवीस वर्षांच्या सक्रीय सामाजिक आयुष्यात, स्वतःच्या समाजात वावरण्याचा अत्यंत कमी संबंध आलेल्या माझ्यासारख्याला अखिल भारतीय नाथपंथी महासंघाने गेल्या रविवारी (३ फेब्रुवारी २०१९) नाथभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने 'कोकण आणि नाथपंथ' या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात आबांशी झालेली माझी ती पहिली भेट दुर्दैवाने शेवटची ठरली. जन्म आणि मृत्यू या आपल्या नियंत्रणापलिकडील मानवी जीवनातील अटळ घटना आहेत. दरम्यानच्या आयुष्याची समीकरणेही इतकी साधी नसतात. आयुष्यातील शेवट गोड व्हावाही इच्छाही प्रत्येकाच्या अंतरी असते. पण तसे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. असे विलक्षण भाग्य लाभलेले, आम्ही पाहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या मनात आर. आर. भंडारे यांची सदैव नोंद राहील.

धीरज वाटेकर

दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...