बुधवार, ३ जुलै, २०१९

तिवरेतील शोकांतिका !

'अरे त्या ...ची डेडबॉडी नाही मिळायला अजून ? खाली गेली असलं वाहून ? लोकं शोधतायतं !' काल रात्री धरण फुटून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे (ता. चिपळूण) गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या एका बाजूच्या खोलीत दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना, सकाळी भेटायला जाताना हा संवाद कानावर पडला नि मनाला असह्य वेदना झाल्या. कालपर्यंत जी नावानंं ओळखली जात होती त्यांची आजची ओळख त्रासदायक होती. पुढे गेल्यावर त्या खोलीतील प्रत्यक्ष दृश्य जे दिसलं ते तर त्याहून विदारक होतं. त्या खोलीतले आर्त स्वर मन विस्कटून टाकत होते. प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळणारं सत्य घटनेची भयानकता सांगत होता. कुणा लहानग्या शाळकरी मुलानं डोळ्यांदेखत घरचे सारे गमावले होतं ! तर कोणी आपली दुचाकी वाचवायला म्हणून गेलेला परतलाच नव्हता. कोणी पुलावरून दुचाकी घेऊन जाताना अचानकच गायब झाला होता. कोणी जेवायला बसलेला पुन्हा उठूच शकला नाही. गेलेल्यांच्या या साऱ्या आठवणीने जमाव अश्रू ढाळत होता. चिपळूणहून तिवरेकडे जाताना वाटेत भेटलेल्या नदीच्या दोन्ही पात्राशेजारील विस्कळीत निसर्ग, शेती, घरे, झाडे कालच्या रात्रीची तिवरेतील शोकांतिका बयाण करत होते.

photo : www.thehindu.com
घटना घडल्याचे चिपळूणात अनेकांना आदल्या रात्रीच (मंगळवार) समजले. प्रशासन सतर्कही झाले. आज (बुधवारी) सकाळी-सकाळी अनेकजण तिवरेकडे धावले. तिवरे धरण फुटल्याची बातमी आम्ही सकाळी व्हसअपवर पाहिली, नुसती बातमीच नाही तर पाठोपाठ मृतांचा आकडाही वाचायला मिळाला. खरंतर सह्याद्रीतील प्राचीन बैलमारव घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेलं तिवरे हे निसर्गरम्य गावं. आज मात्र गावात जाताना त्या वातावरणाकडे बघवत नव्हतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह असंख्य बघ्यांचीही गर्दी उसळल्याने सकाळीच रिक्टोली फाट्याच्या अलिकडे रस्ता जॅम झाला. चिपळूणच्या पर्यटनात ‘तिवरे’ गावाचे स्थान महत्वाचे आहे. अर्थातच 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'ची टीमही घटनास्थळी पोहोचली. भेटणारे अनेकजण घटनेची माहिती देत होते. काल (मंगळवारी) धरण ओव्हर फ्लो झाले. धरण जिथून फुटले तिथून खालून गढूळ पाणी येत होते. धरण लिक होते. प्रत्यक्ष घटनेत तिवरेच्या भेंवाडीतील सारी घरे, गणपतीचे मंदिर वाहून गेले. या धरणाच्या गळतीचा विषय किमान ४ वर्ष जुना आहे. ३ वर्ष तो गावात चर्चेत आहे. गेली २ वर्षे वृत्तपत्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर मांडला गेलेला आहे. अर्थात ‘असं होऊ शकतं ?’ हे माहित असून सुद्धा ते कोणाला थांबवता आलेलं नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे ८ घरं गेली, ११ कुटुंब उद्धवस्थ झाली. जवळपास २३ जण बेपत्ता झाले. एकजण सुदैवाने जीवंत सापडला. १८ जणांचे मृतदेह सापडले. ४ जणांचा शोध सुरु आहे. किमान ३५ जण विस्थापित झालेत. सारं वेदनादायी आहे. मृतदेह शोध मोहिमेत एन.डी.आर.एफ.चे पथक आणि त्यांच्या मदतीला स्थानिकांसह साताऱ्याचा सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुप, रत्नागिरीचा जिद्दी मौन्टेनिअरिंगचा ग्रुप कार्यरत आहे. सगळ्या प्रेतांची धरणाच्या अजस्त्र लोंढ्यात आदळआपट झाल्याने ओळख पटविणेही कठीण बनले आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर विस्थापितांना अनेकांनी आपापल्या परीने मदतीचा हात देऊ केलाय. तशी सुरुवात तर तिवरे ग्रामस्थांनीच केली. सरकारची यंत्रणा, वैद्यकीय सेवा, ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ सह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही तिवरेत पोहोचले. आमच्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ म्हणून दिवसभरात गावात दोन फेऱ्या झाल्या. पहिल्या भेटीत तातडीची गरज समजावून घेवून चेअरमन श्रीराम रेडिज यांनी पुढच्या आठवड्याभराच्या जेवणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. जसा त्यांनी विचार केला तसा विचार करणाऱ्या अनेक संस्था असल्याचं दुसऱ्या भेटीत लक्षात आलं. कारण तातडीच्या गरजांमध्ये लागणारे अन्नधान्य, कपडे, भांडी, पाणी असं शाळेत जमा झालेलं पाहिलं. संपूर्ण दिवसभर लोकं मदत घेऊन आपणहून तिवरेकडे धावत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रत्नागिरीहून कोणीतरी पाचशे वडापाव घेऊन आलं होतं. समाज एकवटलेला दिसला. 
   
तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. हा भाग दुर्गम आहे. २.४५२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण सन २००० साली पूर्णत्वास गेले होते. तिवरे धरण फुटीत भेंदवाडी पाण्याखाली गेली. स्थानिकांनी या घटनेला प्रशासनाला जबाबदार धरले. त्यांचा पत्रव्यवहारही तेच बोलतोय. सरकारी कारभार लोकांच्या जीवाशी खेळल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. यातल्या दोषींवर कारवाई होईलही ! मात्र ही घटना गेलेल्यांचे आणि मागे राहिलेल्या विस्थापितांचे प्रश्न, नव्याने निर्माण करून राहिली आहे. ते सुटेपर्यंत तरी क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणारी कालची अमावस्या विसरणे केवळ अशक्य आहे !

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...