रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

कोकणातील पर्यटन उद्योगाचे भवितव्य


आजच्या घडीला पर्यटन हा संपूर्ण जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा उद्योग आहे. जगातील कंबोडिया, मॉरिशस, बाली, थायलंड आदि अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. हे जरी खरे असले तरी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह जगातील समुद्रकिनारा लाभलेल्या जवळपास देशांच्या विकासाच्या मुळाशी कितीही ‘पर्यटन पर्यटन’ म्हटलं तर ‘पोर्ट डेव्हलपमेंट’ ही मूळ संकल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर स्थिरावण्यासाठी बंदर उद्योगांचा विकास होणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहात ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्र कसा असावा ? हे अभ्यासताना कोकण विभागात पर्यटन उद्योग स्थिरावण्यासाठी पायाभूत सुविधांसह बंदर विकासांची आवश्यकता विशेषत्वाने नोंदवली जायला हवी आहे.

एकविसाव्या शतकात कोकणासह भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला. देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या काही वर्गाच्या हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे सर्वत्र पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे विणले गेले. पूर्णत्वास गेला नसला तरी कोकणातही मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांतून कोकणातही पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचे चित्र तयार झाले. पर्यटन हा पारंपरिक भारतीय जीवनपध्दतीतील परमश्रध्देचा विषय आहे. तीर्थाटनाच्या माध्यमातून सुरु झालेले पर्यटन आज झपाट्याने आधुनिक बदल स्वीकारीत पुढे सरकत आहे. कोकणही त्यात मागे नाही आहे. कोरोना काळातही इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर नववर्षाचे स्वागत (२०२१-२२) करण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती. आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये वैयक्तिक सुखसुविधा आणि स्वच्छता हे मुद्दे कळीचे आहे. कोकणात तुलनेने स्वच्छता आहे. फारपूर्वी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निवास, प्रवास, खानपान सोयीसुविधांचे व्यवस्थापन आणि नियोजन करणे असे पर्यटन व्यवसायाचे स्वरूप होते. कालांतराने त्यात प्रत्यक्ष नियोजन करण्याची भर पडली. आजचा पर्यटन व्यवसाय हा पर्यटन उद्योग म्हणून विकसित होत आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेट बँकिंग आदि सोशल मीडिया मोठया प्रमाणावर साहाय्यभूत ठरत आहे. नवनवीन पर्यटन संकल्पना विकसित करून त्याद्वारे पर्यटन उद्योग बहुआयामी बनविण्याच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. कोकणातही हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हीरक महोत्सवी महाराष्ट्रातील कोकण पर्यटन अभ्यासत ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्राचा विचार करताना ‘कोकण पर्यटन डिजिटल विश्व’ मोठी भूमिका बजावणार हे नक्की आहे. अर्थात यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याची दृष्टी सकस व्हायला हवी आहे.


जागा स्वतःची असेल तर कोकणात पर्यटन उद्योग सुरू करताना लागणारी गुंतवणूक अत्यल्प असते. तसेच या व्यवसायात काही प्रमाणात का होईना, पर्यटकांच्या खिशातून अगोदर पैसे मिळत असल्याने ते प्राप्त करून त्यांच्यावर खर्च करून वर त्यांचीच प्रशंसा प्राप्त करण्याची नामी संधी हा व्यवसाय प्राप्त करून देतो. यात अनेकदा कोकणी स्वभाव आडवा येतो, हे वास्तव आहे. तरीही वर्षानुवर्षे उत्तम सेवा देणारी ठिकाणेही कोकणात कमी नाहीत. अशा ठिकाणच्या कोकणी पर्यटन व्यावसायिकांत आपल्याला उत्तम संवादकौशल्य, संभाषणचातुर्य, मनुष्य हाताळणीचे कौशल्य, विनम्रता, समयसूचकता, साहस, जिज्ञासा, नियोजनक्षमता, कॉमनसेन्स, निर्णयक्षमता, विषयज्ञान आदि गुण हमखास जाणवतात. म्हणून कोकणवर प्रेम करणारे पर्यटक सातत्याने अशा ठिकाणी आपल्या सुट्या व्यतित करत असतात. हे गुण असलेल्या व्यक्तिंची कोकण पर्यटन व्यवसायात वृद्धी होणे हे व्यावसायिक भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोकणात आज येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील मौजमजेसाठी, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पाहाण्यासाठी येतात. हेरिटेज, मंदिर स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, धार्मिक दर्शन, नाविन्यपूर्ण संकल्पना, इंडॉलॉजी, आर्किऑलॉजी, शहरीकरणाला कंटाळलेल्या पर्यटकांना ग्रामीण कोकणी जीवनाच्या परंपरांची, वैशिष्टयांची ओळख आणि अनुभव करून देणारे कृषी पर्यटन, कोकणाला लाभलेल्या सह्याद्री आणि सागराच्या सानिद्ध्यातील साहसी पर्यटन, दुर्गभ्रमण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्क्युबा डायव्हिंग, स्कीईंग, रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग यांसाठीही येतात. तसेच कोकणी घरे, संस्कृती, जीवनपध्दती, खाद्यसंस्कृती, चालीरिती यांचा अनुभव घेण्यासाठी, नदीची परिक्रमा किंवा उगम ते संगम सफर अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. विविध संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांसह विवाहासाठी ‘wedding destination’ म्हणून कोकणी सौंदर्याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण पर्यटकांत वाढते आहे. कोकणातील सण-उत्सवाला, आयुर्वेद, देवराई, वनराई, आकाशदर्शन, आदि पर्यावरणीय संकल्पना समजून घेण्यासाठी, ग्राम पर्यटन, संग्राहालये पाहण्यासाठी, बोर्डी (जि. रायगड) येथील चिक्कू महोत्सव, मुरुड-हर्णे-वेळास येथील डॉल्फिन-कासव महोत्सव, चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीतील क्रोकोडाईल सफारी, डॉल्फिन महोत्सव आदिंसाठी कोकणात पर्यटक येतात. कोकणातील पर्यटन व्यवसाय उद्योगाचे स्वरूप धारण करताना त्याला  अधिकाधिक नवनवीन संकल्पनांद्वारे व्यक्त होण्याची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक पर्यटकस्नेही असायला हवा आहे. कोकण पर्यटन उद्योगाला आपले विश्व व्यापक करण्यासाठी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमावर भर द्यावा लागणार आहे. अलिकडच्या काळात तसे प्रयत्न होत आहेत. संजय नाईक यासाठी विशेष मेहनत घेत आहेत हे निश्चित स्वागतार्ह आहे. वास्तविक कोकणातील प्रत्येक महाविद्यालयात पर्यटन उद्योग विकसित करण्याविषयी मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यांना मार्गदर्शन आणि या विषयात लक्ष घालणारे करणारे कॉलेजच्या स्टाफरूमच्या बाहेरील पर्यटन विषयात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असायला हवेत.

कोकण पर्यटन उद्योगाच्या दुसऱ्या अडचणीच्या बाजूकडे आगामी १५ वर्षांच्या काळात काळजीपूर्वक लक्ष दिले तर कोकण प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था सांभाळू शकतो. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ३८ टक्के टक्के कारखाने कोकणात आहेत. जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कोकण महाराष्ट्राला देत आहे. मात्र हे उद्योग कोकणातील नद्या आणि खाड्या सातत्याने सर्वाधिक प्रदूषित करण्याचे काम करत आहेत. यांच्यामुळे कोकणातील शेती आणि मच्छिमार उद्ध्वस्त झाला आहे. कोकणाला हवा असलेला सागरी महामार्ग आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुंबई गोवा चौपदरीकरण मार्ग आजही अपूर्ण आहे. या रस्त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की अनेक ठिकाणी शासन-प्रशासनाला कंटाळून नागरिकांनी स्वतः रस्त्यांचे खड्डे भरायला घेतलेत. कोकणी माणसांनी काही ठिकाणी या खड्ड्यात वृक्षारोपण कार्यक्रमही केले. पण शासन-प्रशासन म्हणून याची कोणालाही लाज वाटत नाही. कोरोना कालखंडात उद्योगाकडे वळण्याचे स्वप्न पाहणारा त्यासाठी झटणारा कोकणातील पर्यटन व्यावसायिक कर्जांच्या विळख्यात सापडला आहे. त्याला सरसकट कर्जमाफी नको आहे. पण कोरोना संक्रमणात सापडलेल्या कोकणातील व्यावसायिकांना उभारी येण्यासाठी किमान कर्जावरील व्याजमाफी देण्याची भूमिका शासनाने घ्यायला काहीही हरकत असण्याचे कारण नाही, पण तेही होत नाही आहे. कोकणातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी बँकांची कर्ज काढून उभे केलेत. पायाभूत सुविधांची शब्दशः बोंब असताना कोकणातील निसर्गाच्या प्रेमामुळे पर्यटक कोकणात येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी कोकणातील ‘सेवाकर्मी’ पर्यटन व्यावसायिकाला शासकीय आधाराची गरज आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची मासळी हे कोकणाचे वैभव आहे. मागील काही वर्षांत शासनाने कोकणात पर्यटन महोत्सवांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचं मार्केटिंग व्हायला हवं आहे. कोकण पर्यटन व्यवसाय उद्योगात परावर्तित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कल्पक होण्याची आवश्यकता आहे. ‘कोकण पर्यटन उद्योग मिशन’ म्हणून कार्यरत व्हायला हवे आहे. विविध प्रकल्पांना होणारा कडवा विरोध आणि समर्थन या दोन्हींच्या मधला पर्यावरणस्नेही व्यवहार्य विचार रुजविण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी स्टरलाईट प्रकल्पाच्यावेळी जागतिक कीतीर्चे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर यांनी रत्नागिरीत येऊन स्टरलाईट प्रकल्प हानिकारक आहे असा अहवाल दिल्यावर हा प्रकल्प रद्द झाला होता. कोकणातील मायनिंग आणि इतर साऱ्या प्रदूषणकारी उद्योगांचा असाच निर्णय व्हायला हवा आहे. तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी इथली मागणी आहे. यात दक्षिण रायगडमधील २० महाविद्यालयेही समाविष्ट होऊ शकतात. काही संस्थाचालकांना आजही ‘मुंबई विद्यापीठ’ ची भुरळ आहे. यातून मार्ग निघायला हवा आहे. रोजगार देणारे कौशल्य शिक्षण कोकणात हवे आहे. समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, मेरिटाईम, रेल्वे तंत्रज्ञान आदि अभ्यासक्रम कोकणाला हवे आहेत. त्यातून इथले उद्योगजगत विकसित होईल. आगामी काळाचा वेध घेताना हे विचार महत्त्वाचे असणार आहेत.


कोकणात २००९ मध्ये आलेल्या फयाननंतर निसर्ग, तोक्ते अशी ४/५ वादळे आलीत. महापूर-वादळांनी कोकणाची सर्व बाजूंनी नव्याने उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. कोकणच्या उद्योजकीय विकासासाठी अशा संकटांची व्याप्ती आणि खोली शासकीय पातळीवर समजावून घेतली जायला हवी आहे. इथल्या सामान्य शेतकऱ्यांचे जीवन हे आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, करवंद, केळी, मिरी यांवर अवलंबून आहे. महापूर-वादळात यांचे अमाप नुकसान होते. अशावेळी मिळणारी शासनाची मदत साफसफाई करायलाही पुरत नाही. अशा वातावरणात अंदाजे वर्षातील ६० ते ९० दिवस चालणारा पर्यटन व्यवसाय भविष्यात ‘उद्योग’ म्हणून कसा झेपावेल ? यावर आजच विचार व्हायला हवा आहे. कोकणात कोणताही मोठा उद्योग येत नाही. मुंबईत बसून कोकणाच्या भवितव्याचे निर्णय घेणारे पुढारी कोकणाचा विकास करत आहेत. कोकणातील जमिनींचे कसाई भरमसाट दराने शेत जमिनी विकत घेऊन त्यांचे तुकडे पाडून करोडपती बनले आहेत. याची दुसरी बाजू ही की यातून जमिनीच्या वाढलेल्या भरमसाट दरांमुळे नव्याने जमीन घेऊन बाग लावणे हे आता कोकणी माणसासाठी दिवास्वप्न ठरते आहे. महाराष्ट्रात एप्रिल १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी तीन वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली होती. तेव्हा ‘उर्वरित’ समजून कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले. आर्थिक विकासात कोकणाची उपेक्षा आणि अन्यायाची वेग इथून आणखी वाढला. आतातर ही मंडळे कुठे गुंडाळून ठेवलीत देव जाणे ! म्हणून देशासह राज्याच्या आर्थिक विकासात सतत उपेक्षित असलेल्या कोकणाचा विकास होण्यासाठी 'कोकण प्रादेशिक विकास मंडळ' स्थापन करायला हवे आहे. संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करायला हवे आहे. यात कोकण पर्यावरण, महापूर, नद्यांची पात्रे, प्रदूषण, फलोत्पादन, मत्स्योत्पादन धोरण, लहान मच्छिमारांना मोठ्या सवलती, पर्यटन उद्योग कोकण विकासाचा केंद्रबिंदू करण्याचे नियोजन, पायाभूत सुविधा, किफायतशीर हॉटेल बांधण्यासाठी उद्योजकांना सहकार्य, छोट्या-छोट्या धरणांची आवश्यकता, प्रदूषण आदिंचा विचार व्हायला हवा आहे. कोकण विकासाच्या योजनांचा नेहमी मोठा गाजावाजा होतो. योजना जाहीर होतात. मात्र योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना फोलपणा समोर येतो. खर्च होऊनही परिणाम साधला गेलेला नसतो. पुन्हा विकासाचा मुद्दा चर्चेला येतो. पुन्हा नवी योजना येते. महाराष्ट्राचा अमृत महोत्सवी वेध घेताना असंच होत राहाणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे.

गेली पन्नासहून अधिक वर्षे कोळसेवाले आणि आता लाकूडतोडे जंगलमाफिया सह्याद्रीचे लचके तोडत आहेत. कोकणातील घाटातून असंख्य ट्रक भरून लाकडे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांचे बॉयलर पेटवण्यासाठी जातात. इथल्या एम.आय.डी.सी.मधील कारखाने नद्या-खाड्या प्रदूषित करतात. आज प्रचंड जंगलतोडीमुळे कोकणातले डोंगर उघडेबोडके झालेत. जमीन धरून ठेवायला झाडेच नसल्यामुळे डोंगरावरील माती, दगड, गोटे नदी-खाड्यांत आलेत. गाळ वाढलाय. पिढ्यांपिढ्या कोकणी माणूस पाऊस अनुभवतोय. कोकणातल्या काही भागात तर ६/८ महिने पाऊस पडायचा. पण डोंगर खाली येणे, दरडी कोसळणे आणि महापूर येणे हे नित्याचे प्रकार होत नव्हते. ते आज होतायेत, याला कारण अनियंत्रित विकास हेच आहे. निसर्गरम्य कोकणात विदेशी वृक्षांची लागवड नको यासाठी आमदार शेखर निकम आग्रही आहेत. पर्यावरणप्रेमींचीही ही मागणी आहे. तिचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. कोकणात पर्यटन उद्योग बहरण्यासाठी पायाभूत सुविधा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोकणात ७०/८० पर्यटन ग्राम आहेत. राज्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा वेध घेताना किमान या गावात चोवीस तास वीजपुरवठा, पाणी, पक्का दुपदरी रस्ता, पार्किंग, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आदि मुलभूत मूलभूत सुविधा या गावांमध्ये असतील अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. कोकण पर्यटन विकासाचे कामे मार्गस्थ करताना कोकण पर्यटनकर्मींना खूप अडचणी येतात. बांधकामांसह विविध शासकीय बाबी पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगीची सिंगल विंडो व्यवस्था असायला हवी आहे. कोकणातल्या खाड्यात पर्यटक बोटीतून फिरवायचे असतील तर मेरिटाईमसह शासनाच्या सर्व परवानग्या क्लिष्ट आहेत. शासनाकडे भरावे लागणारे शुल्क आणि वर्षाकाठी जमणारी गंगाजळी यांचे गणित जुळत नसल्याचा अनुभव गेली ७/८ वर्षे चिपळूणातील ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था घेत आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन उद्योग विकसित होण्यासाठी अशा प्रयत्नांना जाचक अटीत न अडकवता पाठबळ द्यायला हवं आहे. सागरकिनारा लाभलेल्या जगातील बहुसंख्य देशात रेल्वेही सागरकिनाऱ्यावरून जाते. कोकणात मात्र ती सह्याद्रीतून नेण्यात आली. हे कौशल्याचे काम होते. त्यासाठी सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत. मात्र आज कोकण रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकण्यात अडचणी येताहेत. म्हणून कोकण रेल्वेने आगामी ट्रॅकसाठी सागरकिनाऱ्याकडे आणि त्यातील रिंगरूटकडे पाहायला हवे. ही आणि ‘पोर्ट’ विकासाची माजी आमदार प्रमोद जठार यांची आग्रही मागणी रास्त आहे.

कोकणात एकविसाव्या शतकात, पूर, महापूर, वादळे, चक्रीवादळे आदिंनी कोकण भूमीला हैराण केले आहे. पर्यावरणीय ह्रासाचे हे परिणाम भविष्यात अधिकाधिक गडद होत जाणार आहेत, असं यातल्या तज्ज्ञांचं मत आहे. ते विचारात घेता शासकीय पातळीवर अशा आपत्तींपासून बचाव होण्यासाठी तसेच आपत्तीग्रस्तांना त्वरित न्याय मिळण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण व्हायला हवी आहे. तात्पुरत्या मलमपट्टीस्वरूप उपचारांनी कोकणात ‘पर्यटन उद्योग’ ही संकल्पना अशा आपत्तीत किती टिकाव धरेल हा प्रश्न भविष्याचा वेध घेताना पडतो आहे. कोकण पर्यटन उद्योग साकारण्यासाठी हवी असलेली हजारो कोटींची गुंतवणूक कोकणात आणण्यासाठी ‘पोर्ट’ हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकडे लक्ष दिल्यास कोकण पर्यटन उद्योग उद्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळेल. 

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...