शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कांबळे मास्तरांचा तास

        

        २०२२चा मराठी पत्रकार दिन. वेळ सकाळची! ठिकाण रत्नागिरी शहरातील माळनाका येथील सरकारी विश्रामगृह. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या, महाराष्ट्रातील मोजक्या नियतकालिकांपैकी एक असलेल्या, साप्ताहिक सत्यशोधकच्या दीडशेव्या विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे सर रत्नागिरीत आले होते. प्रकाशन करावयाच्या अंकाची प्रत सरांनी आदल्या रात्री पाहिलेली होती. ‘नव्या पिढीसाठी दस्तावेज’ या मथळ्याखाली अतिथी संपादकीय मनोगताच्या तिसऱ्या परिच्छेदात आम्ही लिहिलं होतं, ‘महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी दीनबंधु हे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले सत्यशोधक साप्ताहिक १८७१ सालचे आहे.’ आमच्या या मजकुराची वैचारिक दिशा अचूकपणे हेरून सरांनी सकाळी चहा-नाष्टा घेताना तासभराच्या काळात ज्या संपादकीय सूचना केल्या त्यातून हा ‘कांबळे मास्तरांचा तास’ लिहावासा वाटला. या लेखनाबाबत आम्ही सरांना कळवलं तेव्हा त्यांनी ‘स्वागत आणि शुभेच्छा’ दिल्याने आमचा लेखन उत्साह अधिक दुणावला.

सत्यसेवेचे कंकण बांधून, ‘हरि कृष्ण भक्ते तुला स्थापियेले | करि सत्य सेवा जना रंजविले || किती अन्य आले बहुश्रूत झाले | परि सर्व तुझ्याच ठायी रिझाले ||’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून लिमये यांनी सत्यशोधकसाप्ताहिकाचा पाया घातला होता. तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज होय. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. महात्मा फुले यांनी सुरुवातीपासून धरलेल्या सत्यशोधनाच्या आग्रहाचा प्रभाव कै. हरि नारायण लिमयेंवर पडला, नव्हे तर ते तसेच असणार अशी सरांची मांडणी राहिली. फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाची, सत्यशोधनाची व्यापक चळवळ चालू केली होती. अनेक अंगाने तिचा अनेक लोकांवर, अनेक पद्धतीने परिणाम झालेला आहे. ‘सत्यशोधनाची’ ही संकल्पना फुल्यांनी नक्कीच १८७१ पूर्वी वापरलेली असणार! हे सरांचं म्हणणं आम्हाला पटलं होतं. फुले पुढे याच शब्दाच्या नावे चळवळ स्थापन करण्यापर्यंत पोहोचले होते. १९७३ ला फुल्यांनी चळवळ सुरु केली म्हणजे पहिल्यांदा तो शब्द वापरला असं होऊ शकत नाही. तसा विचार केल्यास आपण फसण्याचा संभव अधिक आहे. सत्यशोधक चळवळीच्या स्थापनेच्या अगोदरचा काळ हा पूर्वतयारीचा भाग होता. एखादा नाविन्यपूर्ण शब्द असा अचानक चलनात येऊन ‘कॉईन’ होत नाही. त्यासाठी सुरुवातीला त्या शब्दाबाबत लोकांचं प्रबोधन करावं लागतं. शब्द लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. नंतर तो ‘कॉईन’ केला जातो. सत्यशोधक चळवळ स्थापन होण्यापूर्वी कोकणातल्या एका ब्राह्मणाने आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राला ते नाव दिले याचा अर्थ हा शब्द त्यापूर्वी कोकणात हा शब्द पोहोचला असावा का? त्या काळी या शब्दाचा प्रसार असा सर्वदूर झाला असेल? यावेळी काहीतरी घडलं असेल? काय घडलं? अशा विविधांगी अंगाने विचार करण्याची आवश्यकता कांबळे सर बोलून दाखवत होते. एखादा ऐतिहासिक दस्तऐवज बनवताना तू, ‘आपण ऐतिहासिक दस्तावेज करतोय या टेंशनमधून बाहेरच पडू नकोस’ असं खूप छान सरांनी सांगितलं. त्यांचं हे वाक्य अंतर्मनाला स्पर्शून गेलं. सत्यशोधक साप्ताहिकातील जुन्या अंकातील ऐतिहासिक लेखनाचे विश्लेषण व्हायला हवे. कोणीतरी यावर पी.एच.डी. करायला हवी. वेगवेगळे अॅप्रोच डोळ्यासमोर ठेवून लेखन करायला हवं. संदर्भ गोळा करणं हे खूप मोठं काम आहे. संदर्भ गोळा करताना वेड लागायची पाळी येते. तरीही शांतपणे काम करण्यावर भर द्यायला हवा. आमच्या संपादकीय लेखाचा दाखला देत सर पुढे म्हणाले, ‘महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज १८६३ ला स्थापन केला हे खरे आहे. पण ती एक संघटनात्मक क्रिया (organize activity) होती. प्रत्यक्ष सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी महात्मा फुले यांनी सत्यशोधक हा शब्द कशा पद्धतीने कोठे कोठे वापरला हे पाहावे लागेल’, सरांनी आम्हाला थोडा वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक शब्दानुसार प्रबोधन केले होते. शब्दाचा प्रचार केला होता. तो शब्द लोकांच्या मनात बिंबवला होता हे मान्य करायला हवं. कालांतराने नंतर त्याला संघटीत आणि आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ हे नाव पुढे आलं होतं. हे सारं सुरु असताना सत्यशोधन निमित्ताने सामाजिक अभिसरणाची प्रक्रीया सुरु असताना कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती वर्तमानपत्र सुरु करते आणि त्याला ‘सत्यशोधक’ हे नाव देते ही महत्त्वाची घटना असल्याचे लक्षात आले. ‘सत्यशोधक’ (truth finding / truth seeker) काय आहे? हा प्रबोधनाच्या लाटेतून आलेला शब्द आहे. मुळात सत्य काय आहे? असे प्रश्न स्वतःला विचारून संशोधनाचा आनंद घेत काम करण्याची आवश्यकता आहे. विशेषांकात ‘सत्यशोधक’ शब्दाविषयी लेखन असायला हवं होतं अशी सरांची भूमिका होती, एव्हाना ती आम्हाला पटली होती. सत्य कशाला म्हणतात? ते शोधायचं कसं? ते का शोधायचं ? त्याचा फायदा काय? परिणाम काय? असे अनेक प्रश्न कांबळे सरांनी तासाभरात उपस्थित केले. ‘मी मनापासून सारा अंक चाळला आहे. तू ये नाशिकला! मी देतो तुला माझ्याकडे काय असेल ते?’ असंही बोलून गेले.

‘मीही अशाच पद्धतीने काम खूप एन्जॉय करतो. मी दरवर्षी एखादा शब्द घेतो आणि त्यावर संशोधनात्मक दृष्टीने विचार करत राहातो’ असं कांबळे सर सांगत होते. ‘कोरोना’ काळात कांबळे सर ‘पोतराज’ या शब्दावर दीड वर्षे काम करत होते. पोतराज हा गावकूस नसलेला, रंगीबेरंगी चिंध्यांनी अंग झाकून (आभरान) अंगावर कोरड्याने आसूड ओढत दारोदार फिरणारा समाज किंवा कडकलक्ष्मी. मरीआई ही कडकलक्ष्मी पोतराजाची देवता. पोतराज हा स्त्री-‌वेशात पुरुष असतो. जटा वाढलेल्या, केसांचा अंबाडा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ आणि पायात खुळखुळ्या घातलेला पोतराज मरीआईच्या नावाने दान मागताना आपल्याला भेटतो. अर्थात आता त्यांच्या भेटीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मुळात पोतराज कशाला म्हणतात? मरिआई म्हणजे काय? ती देवी असेल तर देवी कुणाला म्हणतात? देवीचे प्रकार किती? मरिआई हे नाव पहिल्यांदा कुणी ठेवलं? ‘आभरान’ कसं तयार करतात? आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्याची कल्पना काय आहे? इतर धर्मात काय आहे? लोकांना सत्य का आवडतं? या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात? आदी प्रश्न स्वतःला विचारून लेखनकाम वेडयासारखं एन्जॉय करता आलं पाहिजे. एखाद्या मिशनसारखं त्याकडे बघायचं. म्हणजे आपल्याला गुणवत्ता मिळते, असं कांबळे सर सांगत राहिले.

प्रत्यक्ष प्रकाशन समारंभातही कांबळे सरांनी, असत्यशोधनाची मोहीम सुरु असलेल्या काळात सत्यशोधनाचे काम आवश्यक असल्याची भूमिका मांडली. महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ १८७३ची आणि रत्नागिरीतील साप्ताहिक सत्यशोधक १८७१चे यास्तव आम्हाला एकमेकांच्या संबंधांबाबत प्रश्न पडला होता. कांबळे सरांनी यावर थेट भाष्य करताना सत्यशोधक साप्ताहिक हे फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा परिणाम असल्याचं म्हटलं. सत्यशोधनाची चळवळ, विचार आपल्याकडे युरोपमधून आलेला आहे. मुळात ‘सत्य’ ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. सत्याला असंख्य पैलू आहेत. ‘कदाचित सत्य असं काहीच नसतं’, असंही उत्तर मिळू शकतं. सत्याचे सारे पैलू तपासून पाहिले तरीही सत्याची नीटशी व्याख्या करता येत नाही. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून सत्यशोधनाची, प्रबोधनाची चळवळ सुरु झाली.   तत्पूर्वीचे सत्यशोधन आध्यात्मिक पातळीवर होते. महात्मा फुल्यांच्या काळात जातीव्यवस्था टोकाला पोहोचलेली होती. व्यवस्था देवा-धर्माने केलेली आहे असं सांगितलं जात होतं. मात्र खरंच हे कोणी तयार केलेलं आहे? याचा शोध घेतल्याशिवाय विषमता संपणार नाही. यासाठी सत्यशोधनाचा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. सार्वजनिक सत्यधर्म सुरु केला होता. चळवळ सुरु केली होती. फुल्यांच्या विचारांतील शिक्षणाचा विचार अल्पावधीत सर्वत्र पसरलेला दिसतो. त्याकाळी महात्मा फुल्यांचा विचार समजून घेण्यासाठी त्यांची भेट होणं आवश्यक नव्हतं. मानवी जीवनात दु:ख का निर्माण होतं? नशीबामुळे, परंपरेमुळे की पाप केल्यामुळे याची मीमांसा नीट होत नव्हती. भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा याची मीमांसा केली. बुद्धांनी ‘तृष्णा’ तर महात्मा फुल्यांनी ‘अविद्या’ असा शब्द योजला. यातून सत्यशोधनासाठी पर्याय पुढे आला. दु:ख हे मानव निर्मित आहे. सत्याचा शोध घेतला पाहिजे. ही भावना प्रबळ होत गेली. त्या भावनेचा एक किरण कोकणात येऊन पोहोचला असावा. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी हे करणं, वृत्तपत्र काढणं अवघड होतं, वेडेपणा होता. कारण पूर्वी म्हटलं जायचं, ‘ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार प्रबळ होतो तो वर्तमानपत्र काढतो.’ आपल्या भाषणाच्या शेवटी, ‘फुल्यांचा प्रभाव होता की नव्हता? यात फार अडकू नका’ असंही आम्हाला सांगायला सर विसरले नाहीत. दीडशे वर्षांपूर्वी लिमये यांनी आपला रस्ता पकडला असे कांबळे सरांनी नमूद केले. कांबळे सरांनी आपल्या या भाषणात अभ्यासक आणि पत्रकारांसाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलं. पण विविध संघटनांच्या भाऊगर्दीत या कार्यक्रमाकडे फिरकायला असंख्य पत्रकारांना वेळ मिळाला नाही. या कार्यक्रमाचं मर्यादित वृत्त शासकीय स्वरुपात प्रसिद्ध झालं. कांबळे सरांच्या या मांडणीमुळे आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो...

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ सालचा. १८४७ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना इंग्रजी, मराठीशिवाय उर्दू, कानडी, मद्रासी, गुजराती भाषा येत होत्या. संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. त्यांचे वाचन चौफेर, चिकित्सक आणि चोखंदळ होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानांचा, संप्रदायांचा त्यांनी अभ्यास केला होता. थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ आणि ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांनी त्यांच्या मनात सर्वप्रथम खळबळ उडवून दिली होती. यातून त्यांची दृष्टी प्रगल्भ झाली होती. १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात या देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी सुरु केली. यासाठी त्यांना परांजपे, हाटे, गोवंडे आदी सहकाऱ्यांनी आर्थिक साहाय्य केले होते. वयाच्या विशी-पंचविशीत त्यांनी सत्य शोधनाचा मार्ग स्वीकारला होता. लोकांना शक्य ती मदत करण्यापासून समाज सुधारणेसाठी प्रशासकीय, तसेच लोकांमध्ये सक्रीय राहून, बदल घडवणारे समाजसेवक म्हणून ते काम करू लागले होते. आपले विचार सभांमधून आणि पत्रके काढून प्रसिद्ध करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचे १८५३चे ‘निर्मिकाचा शोध’ हे चौदा अखंडांचे वैचारिक पद्यमय पुस्तक याचे द्योतक आहे.

साऱ्या निर्मितीला । पोकळी कारण ।। असे तिचे गुण । स्वाभाविक ।।

विषाणूचा मेंदू । धर्माची प्रकृती ।। देवाची उत्पत्ती । तोच करी ।।  

शिका शिका तुम्ही । घ्या सत्याचा शोध ।। उत्पत्तीचा बोध । ध्यानी आणा ।।

‘निर्मिकाचा शोध’मधून महात्मा फुल्यांनी ‘सत्याचा शोध घेण्यासाठी शिकावे’ ही भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. फुल्यांनी १८५५ साली लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ नाटकातही ‘सत्य’ हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. या नाटकातील एका प्रसंगात तर ‘सत्य बोल सर्वास आवडू लागतात’ असे वाक्य विदूषक पात्राच्या तोंडी आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुशिक्षित समाजात धर्म सुधारणेच्या विचाराचे स्वागत करणारे तीन प्रवाह महाराष्ट्रात प्रभावीपणे वाहात होते. पहिला प्रवाह धार्मिक सुधारकांचा होता. यात २० ऑगस्ट १८२८ला राजाराम मोहनरॉय यांनी स्थापन केलेला एकेश्वरवादी ब्राह्मो समाज आणि ३१ मार्च १८६७ साली मुंबईत केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारातून स्थापन झालेला ‘एकेश्वरी पंथ’ प्रार्थना समाज होता. दुसरा प्रवाह हा आगरकर यांच्यासारख्या बुद्धिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. तिसरा प्रवाह ब्राह्मण्यास विरोध करणाऱ्या बहुजन समाजाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा होता. १८५३ साली मुंबईत वेस्टर्न इंडिया असोसिएशन तर १८८५ साली इंडियन नशनल कॉंग्रेसची स्थापना झाली होती. या संपूर्ण शतकात सार्वजनिक जीवनाला प्राधान्य मिळू लागले होते. समाजसेवेत जवळपास पंचवीस वर्षे घालवल्यावर वयाच्या पन्नीशाच्या आसपास फुले यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा अनुभव आलेला होता. समाजाच्या स्थापनेपूर्वी तुकाराम हनुमंत पिंजण, ज्ञानगिरी बाबा, रामशेठ उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ग्यानोबा झगडे मिस्त्री, धोंडीराम गवंडी वैग्रे आदी मंडळी सायंकाळी त्यांच्याकडे चर्चेसाठी जमायची. यावेळी संत कबीरांच्या विशेषतः बीजक ग्रंथातील ‘विप्रमती’ भागाचं वाचन व्हायचं. ज्ञानगिरी बाबा हे वाचन करीत असत. यावेळी घडणाऱ्या संवादातून सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं फुल्यांना अगत्याचं वाटू लागलं होतं. ‘सत्यशोधक’ समाजच्या स्थापनेची बीजं फुल्यांच्या याच विचारात असावीत. स्थापनेच्या पहिल्या, २४ सप्टेंबर १९७३च्या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा झाली होती. ‘सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था, सत्य शोधण्याचे काम करणारा समाज म्हणून 'सत्यसोधक समाज' हे नाव सर्वांनी संमत केलं होतं. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली होती. आपल्या या चळवळीसाठी महात्मा फुल्यांनी 'सत्यशोधक' हा शब्द का वापरला? तो कोठून आला? याबाबतची पुरेशी स्पष्टता होईल असा एकही थेट संदर्भ उपलब्ध होत नाही. तथापि महेश जोशी यांनी आपल्या 'सत्यशोधक समाजाचा इतिहास' ग्रंथामध्ये, ‘महात्मा फुले यांच्या तोंडी सत्यशोधक समाज आणि मानवधर्म असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी सत्यशोधक हा शब्द बाबा पद्मनजी यांच्याकडून आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला दिसतो’ असं म्हटलं आहे. बडोद्याच्या गायकवाड यांना उद्देशून मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड क्लेअर १८३२ साली आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना लिहिलेल्या पत्रात गायकवाड यांना उद्देशून ‘हे भारतीय लोक सत्याची फारशी पर्वा करत नाहीत’ असे म्हटल्याने भारतीयांविषयी असा अपप्रचार होत असताना ‘सत्यशोधक’ हा शब्द समाजसुधारकांना आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटला असावा, असंही मत त्यांनी नोंदवलं आहे.

महत्वाचं म्हणजे बाबा पद्मनजी यांनी लोकांमध्ये धर्मजागृती व्हावी म्हणून ‘सत्यशोधक सभा’ स्थापन केली होती. मात्र तिच्या कालावधीचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे 'बाबा पद्मनजी’ यांनी तो शब्द कोठून उचलला असेल, तेही सांगता येत नाही. फुल्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. हा पोवाडा शुद्ध करण्यासाठी बाबा पद्मनजीयांचे सहकार्य मिळाले होते. हे दोघेही समकालीन होते. ब्राह्मणांचे कसब या १८६९ साली जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमनजी त्यांची प्रस्तावना आहे. बाबा पद्मनजी हे शालेय वयात असताना फ्री चर्च स्कूलमध्ये जाऊ लागल्यावर त्यांच्या मनावर नव्या शिक्षणपद्धतीचा परिणाम होऊन त्यांनी ‘सकल विश्वाचा उत्पन्नकर्ता श्री जगद्गुरू सर्वोत्तम नारायण याच्या पवित्र चरणांते स्मरून’ २५ ऑगस्ट १८४९ रोजी एक शपथ घेतली होती. जिचा उल्लेख अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रात भेटतो. यात त्यांनी ‘ईश्वर मला असत्य भाषण करण्यास बुद्धी न देवो’ असं म्हटलं आहे. बाबा पद्मनजी यांनी आपल्या याच शाळेमधील मित्रांविषयी १८५१ मध्ये लिहिले होते, ‘मी मुंबईस सत्य शोधू लागल्यापासून बेळगांवी जाईपर्यंत फ्री चर्च विद्यालयात जी सत्यशोधकांची टोळी झाली होती तिच्यात ब्राह्मण, परभू, सोनार, शेणवी इ. जातींची मुले होती.’ (संदर्भ :: बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, १९७९, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई - पान २६, पीडीएफ आवृत्ती) पुढे ३ सप्टेंबर १८५४ साली बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ‘हिंदू धर्मात राहून मनातील अज्ञान व अविद्या यांचा नाश करता येत नाही. सत्यशोधन व असत्य मुक्ती यासाठी ऋषिप्रणित हिंदू धर्मातील वचने उपकारक ठरत नाहीत.’ यामुळे आपण ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बाबा पद्मनजी यांनी १२ नोव्हेंबर १८५१ रोजी उडतरे, जि. सातारा येथून ज्ञानप्रकाश वर्तमानपत्रास प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रात ‘...सत्ययुगाचा प्रथम दिवसाचा अरुणोदय झाला आहे.’ असे लिहिले होते. बाबा पद्मनजी यांनी १८६१ मध्ये सत्यदीपिका (धाकटी) नावाचे लहान मुलांचे मासिक सुरु केले होते. हे मासिक १८७३ साली बंद पडल्यावर त्यांनी सत्यदीपिका (थोरली) सुरु केले होते. ते १८७७ला बंद पडले. पुढे १८८२ मध्ये त्यांनी ‘सत्य’वादी नावाचे पाक्षिक सुरु केले होते.

‘सत्यशोधक या नावाचे एक मराठी पत्र निघणार आहे असे ऐकून आम्हास मोठा आनंद वाटला होता. परंतु जेव्हा त्याचा एक अंक येऊन पोहोचला आणि आम्ही तो वाचला तेव्हा आम्हास खेद वाटला. कारण सत्यशोधक हे नाव देऊन त्यात द्वेषाने उगीच जागा भरणे अयोग्य आहे’ असा उल्लेख १ जुलै १८५४च्या ‘ज्ञानोदय’ मध्ये असल्याची नोंद आपल्याला ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ‘रा. का. लेले’ यांच्या ग्रंथात भेटते. अहमदनगरच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनने याच ज्ञानोदयचा पहिला अंक २० जून १८४२ रोजी प्रकाशित केला होता. या अंकाचा बाबा पद्मनजी यांच्यावर प्रभाव राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातल्या नवशिक्षित तरुणांमधला एक मोठा वर्ग स्वधर्मापासून वैचारिकदृष्ट्या दुरावत होता. आपला धर्म, परंपरा, समाजव्यवस्था यांच्यातल्या दोषांची जाणीव झाल्यामुळे ही मंडळी ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाली होती. बाबा पदमनजींप्रमाणे काहींनी प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचं धाडस केलं. या वर्गासाठी ज्ञानोदयहे मार्गदर्शक वर्तमानपत्र होतं. “आपल्या तरुणपणी आपण ज्ञानोदयचे वाचक तर होतोच, पण स्वतःशिवाय आणखी दहा वर्गणीदार या वर्तमानपत्राला मिळवून दिले होते”, अशी आठवण बाबा पदमनजी यांनी अरुणोदयया आत्मचरित्रात नोंदवली आहे.

महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे सत्यशोधकीय नियतकालिकेहे डॉ. अरुण शिंदे यांचे महत्त्वाचे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. त्यानुसार सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघालीत. दीनबंधु’ (१८७७ - कृष्णराव भालेकर, नारारण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे), ‘सत्सार’ (१८८५, म. फुले), ‘दीनमित्र’ (१८८८ - गणपतराव पाटील), ‘राघव भूषण’ (१८८८ - गुलाबसिंह कौशल्य), ‘अंबालहरी’ (१८८९ - कृष्णराव भालेकर), ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ (१८९२ - कृष्णराव भालेकर), ‘मराठा दीनबंधु’ (१९०१ - भास्करराव जाधव), ‘दीनमित्य’ (१९१०, मुकुंदराव पाटील), ‘विश्वबंधू’ (१९११ - बळवंतराव पिसाळ), ‘जागरूक’ (१९१७ - वालचंद कोठारी), ‘जागृति’ (१९१७ - भगवंतराव पाळेकर), ‘डेक्कन रयत’ (१९१८ - अण्णासाहेब लठ्ठे), ‘विजयी मराठा’ (१९१९- श्रीपतराव शिंदे), ‘सत्यप्रकाश’ (१९१९ - नारारण रामचंद्र विभूते), ‘गरिबांचा कैवारी’ (१९२० - बाबूराव रादव), ‘भगवा झेंडा’ (१९२० - दत्ताजीराव कुरणे), ‘तरुण मराठा’ (१९२० - सखाराम पांडूरंग सावंत), ‘राष्ट्रवीर’ (१९२१ - शामराव भोसले), ‘प्रबोधन’ (१९२१ - के. सी. ठाकरे), ‘संजीवन’ (१९२१ - द. भि. रणदिवे), ‘सिंध मराठा’ (१९२४ - दत्तात्रेर वासुदेव अणावकर), ‘हंटर’ (१९२५ - खंडेराव बागल), ‘मजूर’ (१९२५ - रामचंद्र लाड), ‘कर्मवीर’ (१९२५ - शि. आ. भोसले), ‘नवयुग’ (१९२६ - बाबासाहेब बोले), ‘सत्यवादी’ (१९२६ - बाळासाहेब पाटील), ‘ब्राह्मणेतर’ (१९२६ - व्यंकटराव गोडे), ‘कैवारी’ (१९२८ - दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिके सुरू झाली. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. जागृतिहे साप्ताहिक बडोद्याहून तर सिंध मराठाहे कराचीहून प्रसिद्ध होत होते. येवला, जि. नाशिक (राघव भूषण), तरवडी, जि. अहमदनगर (दीनमित्र) अशा ग्रामीण भागांतून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत नियतकालिके प्रसिद्ध होत होती. यात रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी १८७१ साली सुरु केलेल्या सत्यशोधक साप्ताहिकाचा उल्लेख नाही.

सत्य हा संस्कृत शब्द आहे. भारतीय दर्शनांमध्ये ‘सत्य’ या संकल्पनेचा विचार प्रमाण आणि प्रामाण्य या संकल्पनांच्या संदर्भात झालेला दिसतो. महात्मा फुले यांच्या असंख्य पत्रावर ‘सत्यमेव जयते’ असाच उल्लेख आहे. फुले यांचा संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी 'अखंड' रचले होते. त्याची एकूण अखंड संख्या ९९९ आहे. १८८७ मध्ये प्रसिद्ध झाले. यात महात्मा फुले म्हणतात,

सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥

जगामाजी सुख सारे । खास सत्याची  ती पोरे

सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥

सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे. महात्मा फुल्यांची अखंड रचनेत अनेकदा ‘सत्य’ शब्द वापरला आहे. आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात महात्मा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ लिहिला होता. ‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही’ अशी सुरुवात करून महात्मा फुल्यांनी लिहिलेला हा ग्रंथ त्यांच्या मृत्युनंतर १८९१ ला प्रकाशित झाला.

तत्कालिन सरकारी परिस्थिती लोकांसमोर मांडायची एवढाच सत्याचा मर्यादित अर्थ असल्याच्या काळात फुल्यांनी सत्यशोधनाचा आग्रह धरला होता. आपल्याकडील केशवपनाची चाल बंद करायला समाजसुधारकांना संघर्ष करावा लागला होता. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहामागील भूमिका तपासताना ‘ब्रिटीश इथले नव्हेत’ हे सत्य आपल्या लक्षात येतं. गांधीजींनी ब्रिटीशांच्या जाण्याचा आग्रह धरल्याचेही दिसते. भाषेच्या अंगाने पाहिलं रत्नागिरीतील लिमये यांनी ‘सत्यशोधक’ शब्द पहिल्यांदा कॉईन केला असं दिसतं. पण चळवळीच्या अंगाने पाहिलं तर तो महात्मा फुल्यांच्या जीवनात सर्वत्र आढळतो. सत्यशोधक समाज हे दोन शब्द कदाचित एकमेकांना जोडलेले नसावेत. ‘बहिष्कृत भारत’ किंवा ‘सत्याचे प्रयोग’ प्रमाणे हे शब्द थेट वापरले गेले असण्याची शक्यता आहे. फुल्यांच्या सत्यशोधक समाज मधील ‘समाज’ हा शब्द तत्पूर्वी अनेकांनी आपल्या चळवळीसाठी वापरला आहे. अशा अभ्यासात शोधाच्या वाटा बंद झाल्यावर आपल्याला विषयाचा अर्थ-अन्वयार्थ शोधावा लागतो असं उत्तम कांबळे सरांचं रास्त म्हणणं होतं. महात्मा फुल्यांच्या संपूर्ण विचारांचे बीज आपल्याला ‘सत्य काय हे जाणून घ्यायला हवे म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात’ याकडे झुकलेले दिसते. महात्मा फुल्यांनी जीवनात सत्याला खूप महत्त्व दिले आहे. त्यांनी जीवनभर केलेली मीमांसा सत्याशी निगडित आहे. त्यांनी सत्य हे तर्काला आणि वास्तवाला जोडलेलं दिसतं. तत्पूर्वीचं सत्य आपल्याला देव, धर्म याला जोडलेलं दिसतं. महात्मा फुल्यांनी जीवनभर स्वतःला कृतीतूनच ‘सत्यशोधक’ मानलं आहे. इतिहास हा एक आरसा आहे. जितका इतिहास जुना तितका त्या आरश्यामागील पाराही प्रसंगी क्षीण होत जाण्याची संभवना असते. अशा प्रसंगी नवीन पारा जोडून नीटसं पाहाणं आवश्यक बनतं. तसंच ‘सत्यशोधक समाज’ हे विशेषणात्मक नाव १९७३ ला पुढे आलं असलं तरी महात्मा फुल्यांचं काम तत्पूर्वीपासून सुरु आहे हे स्पष्ट आहे. कधीकधी काही शब्द नावात यायला उशीर होतो पण ते शब्द तत्पूर्वी वापरात किंवा व्यवहारात आलेले असतात. ‘सत्यशोधक’ संदर्भात ही शक्यता अधिक वाटते. आपल्याकडे इतिहासात कॉईन झालेले शब्द हे ज्यांच्या नावावर जमा झालेले दिसतात, त्यांच्यापूर्वी ते कोणीतरी वापरले असावेत असे मानणारा एक प्रवाह आहे. बाबा पद्मनजी यांचे विषयी अभ्यासताना ‘सत्यशोधक’ हा शब्द पूर्वी अस्तित्वात असावा असं वाटतं. महात्मा फुले यांनी जीवनभर कार्य केलेल्या चळवळीचं बिरूद असलेला ‘सत्यशोधक’ शब्द रत्नागिरीच्या लिमयेंनी कसा वापरला? त्यामागे शाब्दिक आकर्षण असावं का? की महात्मा फुल्यांच्या प्रभावातून हा शब्द घेतला? पण तसं त्या साप्ताहिकात दिसतं नाही आणि नोंदही नाही. दुर्दैवाने त्याचे सुरुवातीचे अंकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा लेख वाचून कोणाला यातील मसुद्यावर कोणाला अधिक प्रकाश टाकता आला तर आम्हाला अधिक आनंद होईल.

सत्यशोधकचा दीडशे वर्ष विशेषांक निघेपर्यंत ‘रत्नागिरीतून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ प्रसिद्ध होते’ हे अनेकांना माहिती नव्हते. सत्यशोधकीय विचारधारेतील नियतकालिकांच्या आजवरच्या यादीत रत्नागिरीतील या पत्राचा उल्लेख नाही. ‘सत्यशोधक’ हे नाव आपल्या नियतकालिकासाठी संघटीत पद्धतीने कै. हरि नारायण लिमये यांनी पहिल्यांदा कॉईन केले होते. यावरून आम्ही अनुमान लावलं होतं. सत्यशोधकचे स्वातंत्र्यपूर्व जुने अंक चाळताना आम्हाला अंकात ज्योतिष विषयक मजकूर दिसला. बाबासाहेब बोले यांच्या चळवळी संदर्भात लिहिताना चरित्रकार धनंजय कीर यांनी ‘सत्यशोधक’ मधून खोतांची पाठराखण झाल्याची नोंद केल्याने हे महात्मा फुल्यांच्या विचारधारेशी संबंधित नसल्याचं आमचं मत बनलं होतं. तरीही कांबळे सरांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा होता. सत्यशोधक अंकाच्या अतिथी संपादकीयात आम्ही पुढे लिहिलं होतं, ‘पत्रकारिता’ ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं जग क्षणोक्षणी बदलतंय. पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ बेहेरेंच्या शब्दातील हे चैतन्य आम्हाला उत्तम कांबळे मास्तरांच्या तासात अनुभवता आणि हा लेख लिहिताना जगता आलं.

 

संदर्भ :-

तृतीय रत्न (नाटक) – महात्मा फुले (१८५५ :: अप्रकाशित) प्रथम प्रकाशन – पुरोगामी सत्यशोधक

बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर (१९७९ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

जोतिचरित्र – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (सप्टेंबर १९९१ :: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया)

सत्यशोधक समाजाचा इतिहास – महेश जोशी (२००२ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले – श्रीराम गुंदेकर (जुलै २००४ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्रीराम गुंदेकर

मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा. का. लेले (द्वितीयावृत्ती २००४ :: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)

 

धीरज वाटेकर चिपळूण, मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित नऊ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  

 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

सत्यशोधक वर्ष १५० - 'अतिथी' संपादकीय

नव्या पिढीसाठी दस्तावेज

‘पत्रकारिता’ ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं जग क्षणोक्षणी बदलतंय. जग पूर्वीही बदलत होतं. पण ते बदल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जगभरातील पत्रकार करायचे. संगणक आणि स्मार्ट मोबाईल फोनने इंटरनेटच्या माध्यमातून जग जोडले गेल्याने आज जगातील अनेक बदल आपण सर्वजण आपापल्या परीने टिपतो आणि प्रसिद्धही करतो आहोत. गुहेत राहणाऱ्या माणसाला काहीतरी सांगण्याची इच्छा झाली म्हणून त्याने गुहेतील भिंतीवर रेघोट्या ओढल्या, चित्रे काढली. एखाद्या घटनेचं आपापल्या परीने विश्लेषण करणं ही माणसांची नैसर्गिक ऊर्मी आहे. आपल्याला जे कळलं, समजलं, ते इतरांना सांगणं हा सहज मानवी स्वभाव आहे. अभिव्यक्त होण्याची गरज सर्वांना असते. मात्र पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. याचा विचार करून ‘साप्ताहिक सत्यशोधक’ आपल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कोकणातील नव्या अभ्यासू पिढीसाठी, पत्रकारांसाठी, कोकण समजून घेण्याची इच्छा असलेल्या आणि कोकणासाठी काहीतरी सकस करू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘printed words are permanent’ या सूत्राला धरून एक दस्तावेज उपलब्ध करून देत आहे. हा दस्तावेज पुढील पिढ्यांनाही उपयुक्त ठरेल.

आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी लोकजागृती करण्यासाठी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु केले होते. त्यांनी आपल्या पहिल्या अंकात म्हटले होते, ‘मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने चालविणे आणि समाजाला योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची दर्पण छापणारास उत्कंठा आहे.’ ‘दर्पण’ सुरु झाले तो दिवस (६ जानेवारी) महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होत असतो. हे औचित्य साधून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ आपला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक आज प्रकाशित करत आहे.

महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे सत्यशोधकीय नियतकालिकेहे डॉ. अरुण शिंदे यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे पुस्तक आहे. यानुसार, कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी दीनबंधुहे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली, असं त्यांनी म्हटलंय. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले ‘सत्यशोधक’ साप्ताहिक ‘१८७१’ सालचे आहे. प्रत्येक रविवारी सायंकाळी छापतेअसे बिरूद घेऊन रत्नागिरी येथून प्रसिद्ध होऊन समाजप्रबोधन आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे.

‘आपल्या देशातील जवळपास संपादक टिळक-आगरकर यांचा वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हातरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हते. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारांपैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले. पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर, आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्याला उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे ?’ गणपती वासुदेव उर्फ ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली हे वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं. ‘बदलती पत्रकारिता’ यातून ध्यानात यावी.

बेहेरे पुढे म्हणतात, ‘आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेक जण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्यातरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत. त्यांनी लिहिले तरी फारसे कोणी वाचीतही नाहीत. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ त्या संपादकाची कितीतरी मते अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दातून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. अस्सल गोष्टी दिसेनाशा झाल्यात. सगळ्यात भेसळ असते. माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले, परंतु युद्धाची नशा चढलेले लहानमोठे संपादक दिसतात. ते महत्त्वाचे असतात. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करणे सहसा शक्य होत नाही. त्याचे व्यवसायाचे साधन म्हणजे त्याची लेखणी होय. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसे छोट्या वृत्तपत्रकाराचे होते. तो आपल्या अंगाबरोबर जगतो, गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हाने देऊ शकतो.’ बेहेरे यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर देशातील वादळवाऱ्यात आपल्या मताचे झाड उन्मळून पडू नये एवढी काळजी घेण्याचे काम गेली दीडशे वर्षे लिमये कुटुंबीयांनी केले आहे, ते महत्त्वाचे आहे.

अलीकडे पत्रकारितेमध्ये बातमीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वैयक्तिक मतांचा भडिमार होताना दिसतो. हा एक व्यावसायिक आजार ठरावा अशी आजची स्थिती आहे. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. भारतीय पत्रकारांना दिवसभर बातम्या द्यायची कधीच सवय नव्हती. डिजिटल मंचावर यशस्वी होण्यासाठी आज ती अंगी बाणवावी लागली आहे. डिजिटल मंचावर बातमी वेगाने पोहोचविण्याचा ताण अधिक आहे. आपलं लेखन लोकं चटकन वाचतात. जागा प्रचंड असते. पण वाचकाकडे वेळेची मर्यादा असते. प्रिंटमध्ये लेखाची गुणवत्ता वृद्धिंगत करणारी लांबी असू शकते. ती सहज लक्षातही येते. वाचकाला वेळेचं नियोजन करता येतं. २८० अक्षरांच्या (५० शब्द) एका ट्विटमध्ये मुद्द्याचं सारं येत असेल तर लोकांनी ६००/८०० शब्दांचे अग्रलेख का वाचायचे ? असा मुद्दा हल्ली चर्चेत असतो. पण या सर्वातून संदर्भबहुलता मागे पडण्याचा धोका संभवतो. म्हणून आपण या अंकात विषयानुरूप ‘भाष्य’ करणारे प्रदीर्घ लेख प्रसिद्ध केलेत. अंकाची तीन पानी अनुक्रमणिका पाहिली तरी हे लक्षात येईल.

भारतातील वर्तमानपत्रांची किंमत वाजवीपेक्षा आजही कमी आहे. इथे एका प्रतिपेक्षा एक कप चहा किंवा कॉफी अधिक महाग असते. डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने समोर असली तरी प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी होणार नाही. आज काही दैनिकांनी त्यांचे ऑनलाईन ई-पेपर वाचण्यासाठी वर्गणी सुरु केली आहे. तरी आजही, ‘स्क्रोल’सारखे अपवाद वगळता डिजिटल माध्यमातून आर्थिक स्वावलंबन पूर्णत: यशस्वी झालेले नाही. फेसबुक आणि व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांचं प्रमाण भारतात लक्षणीय आहे. ‘इन्स्टाग्राम’ही वेगाने वाढते आहे. यांनी प्रिंट मिडियापासून लोकांना दूर नेलेले आहे. म्हणून छोट्या-मोठ्या भारतीय नियतकालिकांनी दृश्यात्मक चैतन्य अधिकाधिक जपायला हवंय. प्रस्तुत अंकात आपण हा प्रयत्न केलेला आहे.

स्वतःवरच ‘सेन्सॉरशिप’ लादून घेतलेला मनुष्य कधीही पत्रकार होऊ शकत नाही. त्यासाठी लिहिण्याचं कौशल्य आणि विस्तृत वाचन आवश्यक आहे. पत्रकारितेचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या तरुण पिढीने इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी यातल्या कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण घ्यावं. त्यानंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम करावा हे अधिक योग्य होईल, असं आम्हास वाटतं. भारत हा असा देश आहे जिथे फार कमी गोष्टींचा पूर्वअंदाज बांधता येतो. म्हणून नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. वाचकांना बारकाव्यांसह, वैविध्यपूर्ण मजकूर हवा असतो. विषयाच्या मांडणीतला दीर्घकाळ टिकणारा स्पष्ट उद्देश असलेले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले एका पेक्षा एक सरस आणि दर्जेदार लेख या विशेषांकात आपल्याला वाचता येतील.

‘कोकण आणि विकास एवढे दोन शब्द दिसले की कोकणी माणसाला एवढा हर्षवायू होतो की आता कोकणाचा स्वर्ग झाला असे त्याला वाटते.’ ४० वर्षांपूर्वी ‘कोकणाचा विकास : आता अभ्यास समिती कशासाठी ?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील या ओळी आहेत. याच लेखात कोकणात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी उतारू बंगल्यावर निवेदनांचा पाऊस पडेल त्यापेक्षा कोठे कोठे प्रत्यक्ष प्रयोगाचे लहानसे झरे असतील ते पाहावेत. विकासाची तहान भागविण्यास उपयोगी पडतील.’ असे म्हटले होते. सरकारकडे कोकण रेल्वेची पहिली रितसर मागणी १८९२ साली झाली होती. पुणे-बेळगाव-लोंढा रेल्वे अस्तित्वात आल्यावर त्या रेल्वेने कऱ्हाड-चिपळूण-पनवेल मार्गाची योजना १९०० साली तयार झाली होती. १९११ साली जी.आय.पी. रेल्वेने दिवा-दासगाव या कोकण मार्गावर योजना आखली होती. सगळ्यांप्रमाणे तीही मागे पडली. १९५० साली अ. ब. वालावलकर यांनी पुन्हा या विषयाला चालना दिली. त्यांनी मुंबई-बेळगाव-बेंगलोर ही कोकणातून दक्षिणोत्तर जाणारी योजना बनविली होती. त्या नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. ‘सत्यशोधक’चे सुरुवातीचे अंक असते तर यावर अधिक प्रकाश पाडता आला असता, असो ! सांगायचा मुद्दा हा की, कोकणाचा विकास अशा गतीने होतो आहे. प्रस्तुत विशेषांकात याची साद्यंद चर्चा आपल्याला वाचायला मिळेल. विशेषांकात, ‘रत्नागिरी (सिंधुदूर्गसह) जिल्हा गृहोद्योग विकास समितीचा १९५१ सालचा अहवाल दिला आहे तोही सर्वांना उपयुक्त ठरावा.

२०२० च्या दिवाळीत, नितीन लिमये यांचा फोन येईपर्यंत साप्ताहिक ‘सत्यशोधक’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे आमचं लक्ष गेलेलं नव्हतं. २८, २९ डिसेंबर २०१९ ला चिपळूणला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे दुसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या स्मरणिकेचा संपादक म्हणून आमचा नितीनजींशी आणि पर्यायाने साप्ताहिक सत्यशोधकशी पहिल्यांदा संपर्क आला होता. फोनवरील संभाषणाप्रमाणे २९ नोव्हेंबर २०२१ला नितीनजींना, ‘पत्रकारिता : काल, आज, उद्या, कोकण विकास आणि निवडक सत्यशोधक’ असं मनात तरळलेलं अंकाचं स्वरूप व्हाट्सअॅपवर कळवलं होतं. अंकाचा १५० वर्षांचा लोगो तयार झाला तेव्हा त्यात लोकप्रतिनिधींसाठी ‘कोकण विकास : माझी भूमिका, माझे योगदान’ हा एक विषय वाढवला गेला. अंक अधिकाधिक ‘संग्राह्य’ करण्याकडे नितीन यांचा सुरुवातीपासून कल होता. त्याला अनुसरून लेखकांना विनंती पत्र पाठवण्यासाठीचे नियोजन सुरु झाले. २००२ पासून आम्ही दिवाळीला अनेकांना अंतर्देशीय पत्र पाठवीत असल्याने काही महत्त्वाचे पत्ते संग्रही होते. त्यात विषयानुसार अधिकची भर करून शंभराहून अधिक लेखकांची पत्त्यासह यादी आम्ही नितीन यांच्याकडे सोपविली. पुढचा फॉलोअप त्यांनीच केला. यादीतील सगळ्यांनी लेखन प्रतिसाद दिला असता तर कदाचित हा विशेषांक दोन भागात प्रसिद्ध करावा लागला असता. नव्या-जुन्या मान्यवर लेखकांकडून आलेल्या मजकुराचा अंदाज घेऊन हा ‘नियोजित’ अंक ‘दिवाळी २०२१’ला प्रकाशित करणे आम्हाला टाळावे लागले. ‘दिवाळी अंकांच्या नियमित प्रवाहात हा अंक नसावा’ ही त्यामागची भूमिका होती. त्याचवेळी ‘६ जानेवारी २०२२ ; मराठी पत्रकार दिन’ हा प्रकाशन दिवस ठरवण्यात आला होता. लिहिणाऱ्या लेखकांची नावं असलेली जाहिरात ‘सत्यशोधक दिवाळी २०२१’ विशेष पुरवणी अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज हा अंक प्रसिद्ध होत आहे. ‘कोकण आणि पत्रकारिता’ या दोन विषयांना अनुसरून एक दस्तावेज तयार झाल्याचं समाधान याप्रसंगी आहे.

साप्ताहिक सत्यशोधकने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान दिलेलं आहे. दीर्घकालीन यशासाठी ‘विश्वास’ हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. ‘सत्यशोधक’ने तो सांभाळला आहे. हा अंक सत्यशोधकच्या वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. कोकणातील नव्या अभ्यासू पिढीला, पत्रकारांना, कोकण समजून घेण्याची इच्छा असलेल्या, कोकणासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या सर्वांना यातून ठोस दिशा सापडेल असा आमचा दावा नाही. मात्र ‘कोणत्या दिशेने जाऊ नये’ हे यातून ठळकपणे लक्षात येईल. ग. वा. बेहेरे यांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ या अंकांच्या निर्मितीतले मागील सहाएक महिने आमच्यासाठी असेच होते. अंकाचा ‘अतिथी संपादक’ म्हणून नितीन लिमये आणि कुटुंबीयांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला, पहिल्यापासून अंकातील विचार आणि त्याच्या निर्मितीसाठी जे ‘स्वातंत्र्य’ दिलं त्याची इथं नोंद करायला हवी. आजच्या पत्रकारितेत अधिक मोकळीक देणारा माध्यमसमूह सापडणं कठीण असताना इथे ती मिळाली यासाठी आम्ही ‘लिमये’ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ‘सत्यशोधक’च्या पुर्वसुरींनाही विनम्र अभिवादन करतो.

धीरज वाटेकर


संपादक : नितीन लिमये
अतिथी संपादक : धीरज वाटेकर
अंकाची पृष्ठसंख्या : ४७२
अंकाचे मूल्य : ७९९ रुपये
सवलत मूल्य : ५०० रुपये
अंकासाठी संपर्क :
नितीन लिमये - 9423291319 / 9545030454

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

आठवे पर्यावरण संमेलन आळंदी (देवाची) वृत्तांत

आठवे पर्यावरण संमेलन आळंदी (देवाची) वृत्तांत

 

पृथ्वीतलावर पर्यावरणीय ‘आणीबाणी’ची स्थिती


- संमेलनाध्यक्ष प्रा. श्री. द. महाजन



आळंदी (देवाची) :: आपल्याकडे वृक्षलागवड खूप आवश्यक आहे. मात्र फॉरेस्ट आणि प्लांटेशन यात फरक आहे. वृक्षलागवडीमुळे जंगलं तयार होऊ शकत नाहीत. ती वनशेती असते. जंगल हे हजारो वर्षांच्या एकत्रित पर्यावरणाच्या परिणामांचा भाग असते. ते वर्षभरात तोडून टाकता येत, पण निर्माण करता येत नाही. म्हणून मूळचे शिल्लक जंगल तुटू नये यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सातत्याने वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे. जुन्या जंगलातून जेवढा ऑक्सिजन निर्माण होऊ शकतो तेवढा वन लागवडीतून निर्माण होऊ शकत नाही. आज मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीतलावर पर्यावरणाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पर्यावरणीय आणीबाणी निर्माण झालेली आहे. असे मत भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे व्यक्त केले.

 

https://youtu.be/dld-WQcDo28 (प्रा. श्री. द. महाजन यांच्या भाषणाची लिंक)

 

महाजन पुढे म्हणाले, पर्यावरण बदल आणि जागतिक तापमानवाढ यांचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. माझ्या एका लेखक मित्राने आपल्या पुस्तकात ‘मनुष्य जातीची सामुहिक आत्महत्येकडे वाटचाल सुरु आहे’ असे म्हटले आहे. यावर युद्धपातळीवर काम होण्याची आवश्यकता आहे. १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जर्मनीतील काही संशोधक पुण्याला आले होते. ‘जर्मनीमध्ये आज जंगल किती आहे?’ हा प्रश्न मी त्यांना विचारला होता. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात आम्हाला युरोपचा भूगोल अभ्यासाला होता. तेव्हा विषय शिक्षकांनी ‘ज’ लक्षात ठेवायला सांगितला होता. आम्हीही ‘ज’ म्हणजे जर्मनी-जंगल-जोगळेकर सर असं मनात पक्कं झालेलं समीकरण आजही विसरू शकलेलो नाही. आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा जर्मनीत चाळीस टक्केहून अधिक जंगल असल्यास क्रमिक पुस्तकात नमूद होतं. बऱ्याच वेळानंतर एका शास्त्रज्ञाने मला सांगितलं, ‘sorry to say you sir, there is no forest in Germany today’ आज जर्मनीत जंगल नाही. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तेही सगळं प्लांटेशन आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे परवलीचे शब्द झालेले आहेत. नुसतं पर्यावरण प्रेम पुरेसं नाही. त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचा अभ्यास केल्यास आपण संवर्धन आणि संरक्षण करू शकू. निसर्ग आणि पर्यावरणाचा शाळेत अभ्यास सुरु झालेला आहे. न्यायालयांच्या सूचनेनुसार शासनाने देशभर पर्यावरणाचा अभ्यास सुरु केला. मात्र हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना या विषयाचे तितकेचे ज्ञान नाही. भारतीय संस्कृती मानवाला प्राणी म्हणून संबोधते. पाश्चात्य राष्ट्रांत मानवाला परमेश्वराचे लाडके अपत्य संबोधतात. त्याच्यासाठी परमेश्वराने इतर वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती केल्याचे सांगतात. यामुळे पाश्चात्य राष्ट्रांची विकासनीती आणि निसर्गनिती याच विचारावर आधारित आहे. पाश्चात्य राष्ट्रांत पर्यावरणाचे नुकसान होण्याला हा विचार कारणीभूत आहे.  

 


पृथ्वीवर सूक्ष्म जीव, वनस्पती, प्राणी हे तीन प्रकारचे सजीव आहेत. वनस्पती आपले अन्न आपण निर्माण करतात. ही कला फक्त वनस्पतींनाच अवगत आहे. वनस्पती या कार्बनडाय ऑक्साइड आणि पाण्यापासून गुल्कोजची साखर तयार करते. आपण आपले अन्न तयार करत नाही. आपण तयार केलेलं अन्न फक्त शिजवते. प्राणी हे वनस्पतींनी निर्माण केलेलं अन्न वापरतात. सूक्ष्म जीव हे मृत वनस्पती आणि प्राणी यांचं रुपांतर खतांमध्ये करतात. म्हणून जमिनीत सूक्ष्म जीव आवश्यक आहेत. पाश्चात्य राष्ट्रात वनस्पतींना सजीव मानत नसत. आपले शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी जगाला हे पटवून दिलं. वनस्पती निर्माण होतात, त्यांची वाढ होते, त्या मरतातहि. अर्थात त्या सजीव आहेत. भारतातील सहन करू शकणाऱ्या किमान निम्या लोकांनी किमान उन्हाळ्यात दोन दिवसातून एकदा अंघोळ केली तर कितीतरी वीज वाचेल आणि कितीतरी कार्बनडाय ऑक्साइड वायू थांबेल. पर्यावरण संसाधने कमीतकमी वापरायला हवीत. शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. कित्येक सपुष्प वनस्पतींना आकर्षक, सुंदर आणि सुवासिक फुले येतात. ही फुले देवाला वाहाण्यासाठी किंवा मानवी नेत्रसुखासाठी आहेत असं आपल्याला वाटतं. ही फुले म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत. फुलांपासून फळे, फळांमध्ये बिया आणि त्यातून पुन्हा वृक्ष तयार होणार आहेत. कीटकांना आकर्षक करून घेण्यासाठी फुलांना रूप, रंग आणि वास आहे. म्हणून आपण झाडावरील फुले तोडताना काळजी घ्यायला हवी आहे. असे महाजन म्हणाले.

 

माणूस रोज ४० ग्रॅम केमिकल पाण्यात टाकतो आहे – शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे


राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ (नि.), पर्यावरण सल्लागार डॉ. प्रमोद मोघे यांचे संमेलनात प्रमुख बीजभाषण झाले. त्यांनी ‘एक कप चहाचे प्रदूषण’ या विषयाद्वारे आपले विवेचन सादर केले. चहाचे पिक घेताना चहात लोहाचा अंश येतो. चहात टॅनिन, पॉलिथिनॉल चे अंश असतात. चहाचा डाग जात नाही. साखर बनवताना उसावर सोळा रसायने वापरली जातात. एक किलो साखर निर्मिती ही सोळा लिटर पाणी अशुद्ध करते. आजच्या पाण्यातही खूप रसायने असतात. मानवी जीवनपद्धती अडचण निर्माण करते आहे. माणूस रोज ४० ग्रॅम केमिकल पाण्यात टाकतो आहे. पाण्यात क्लोरिन किती वापरावे? याची मर्यादा ठरलेली आहे. ती न पाळल्याने स्त्रियांमध्ये थायरॉईड आणि सर्वसामान्यांमध्ये कन्सर वाढलेला आहे. आजच्या साखर आणि दुधात भेसळ आहे. गाळणे प्लॅस्टिक वापरल्याने पुन्हा चहाचे प्रदूषण होते. दैनंदिन टूथपेस्टमध्ये आठ केमिकल आहेत. आपण सारे पाश्चात्य संस्कृतीचे गुलाम झालो आहोत. जलाशयात जलपर्णी का होते? तर ती साबणामुळे तयार होते आहे. अगदीच चहा प्यायचा असेल तर तो पाण्यासारखा प्यावा, साखरेचे प्रदूषण कमी करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

पर्यावरण कामात तरुणांचा सहभाग वाढायला हवा – प्रमोद मोरे




मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी बोलताना, पर्यावरण कामात तरुणांचा सहभाग वाढायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या पर्यावरण मंडळाचे कार्य राज्यभर सुरू आहे. या कार्यात तरुणांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी (देवाची)चे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप यांनी बोलताना, पर्यावरण काम केल्याने आरोग्य चांगले राहाते असे नमूद केले. पर्यावरण हा विषय घेऊन शिक्षकांच्या माध्यमातून ही मोठी चळवळ चालते आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. देविदास धर्मशाळा आळंदी (देवाची)चे अध्यक्ष ह. भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर यांनी, दर महिन्याला पर्यावरण व्याख्यान करा, धर्मशाळा सोबत असेल असे जाहीर केले.

 

पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनावा - धीरज वाटेकर


सातशे वर्षापूर्वी ‘पर्यावरण’ या विषयाकडे आपले संत सूक्ष्मपणे पाहत होते. संत ज्ञानेश्वरांनी, एका ठिकाणी ‘नरगेचि रचावी, जळाशये निर्मावी महावने लावावी, नानाविधे।‘ असे म्हटलेले आहे. यातील 'नानाविध' हा शब्द माऊलीनी पर्यावरणाचा विचार करता अतिशय सूचक वापरला आहे. एकाच प्रकारच्या झाडांच्या बागा लावल्या आणि ती झाडे संभाव्य रोगाला प्रतिकार करणारी नसली तर ती सर्वच्या सर्व कीडग्रस्त होतात. वेगवगळ्या प्रकारच्या झाडांमधील अशी प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. तेंव्हा कीड किंवा रोग पडला तरी सगळी झाडे नष्ट पाहू नयेत, या मागील माऊलीच्या दृष्टीकोन संभवतो. कोणत्याही सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी मनुष्यामध्ये एक विशिष्ठ स्वभाव असावा लागतो. सध्याच्या जगासमोरील पर्यावरणीय संकट दूर सारण्यासाठी पर्यावरण जनजागरण-संवर्धन वर्तन हाही मानवी स्वभाव आणि संस्कार बनायला हवा आहे असे मत लेखक-पत्रकार आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.


वाटेकर पुढे म्हणाले, माऊलींच्या पर्यावरणीय चिंतनाला पारमार्थिक तत्त्वज्ञानाची बैठक आहे. पर्यावरणीय समस्या तेव्हा नव्हत्या, आज प्रचंड आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनण्याची गरज आहे. हाच विचार करून अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे यांनी १९८२ साली पर्यावरण जनजागरणाचं काम सुरु केलं होतं. आजचं पर्यावरण संमेलन हे त्याचंच रूप आहे. खरंतर निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मनुष्याच्या लुडबुडीमुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन बिघडलं आहे. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबुड करून निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करायला हवी आहे. ही दुरुस्ती करण्याचे काम अनेक मंडळी आपल्यापरीने करत आहेत. अशा तज्ज्ञांचे विचार उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात एक व्यवस्था उभी करायला हवी याची जाणीव सुमारे ३० वर्षांपूर्वी आबासाहेबांना झाली होती. त्यातून मंडळाचे काम उभे राहिल्याचे वाटेकर यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी वृक्षाला स्थितप्रज्ञ म्हणून गौरविले आहे. सर्वांभूती समदृष्टी ठेवणारी व्यक्ती आणि वृक्ष एक समान आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 'जो या खांडवया घावो घाली का लावणी जायचे केले दोघन एकीच साऊली वृक्षू दे जैसा. वृक्ष जो त्याला तोडण्याच्या हेतूने त्याच्यावर घाव घालतो आणि जो पाणी घालून त्याला वाढवतो त्या दोघाना समान सावली देतो. मित्र आणि शत्रू असा भेदभाव न करता सर्वाविषयी समभाव ठेवणे हे वृक्षाचे लक्षण आहे. तसेच ते स्थितप्रज्ञ व्यक्तीचे अर्थात संताचे लक्षण आहे. ज्ञानेश्वरीत विविध वृक्षांची नावे, पशुपक्ष्यांची नावे, धातूंची नावे प्रसंगपरत्वे ज्ञानेश्वरांनी दृष्टांत, रूपक, उपमा यांच्याद्वारे समर्पकपणे उल्लेखले आहेत. अरण्यांना 'निकुंज' म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्ग, पर्यावरण हे शब्द आढळत नाही. त्यांनी 'जीवसृष्टी' आणि 'भूतसृष्टी' ह्या संकल्पनांचा उपयोग पर्यावरण अर्थी घेतलेला आहे. निसर्गातील विविध घटकांचे दाखले दिले आहेत, असे वाटेकर म्हणाले.


आज समाजात काम करणारे हात कमी आहेत. म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवं. ही मंडळाची भूमिका आहे. आपलं काम हे जाणीव जागृतीचं काम आहे. कार्य करत राहाणे आवश्यक आहे. यातून आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यातलं अंतर कमी करता येईल. आळंदीतील पर्यावरण संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर, संतोष सुर्वे, गजानन बाड, ओंकार शिपटे, सौ. मायावती शिपटे, श्रुतिका आखाडे, शैलेजा आखाडे यांच्यासह राज्याच्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, ठाणे, सातारा, जळगाव, सांगली, यवतमाळ, रायगड, छत्रपती संभाजीनगर, बीड, नंदुरबार, धुळे, लातूर, मुंबई, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, हिंगोली, वाशिम, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, धाराशिव आदी २१ जिल्ह्यातील २०० पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

 


भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन रविवार दि. २९ डिसेंबर रोजी आळंदी (देवाची) येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरात संपन्न झाले. आयोजक संस्था ही प्रमुख ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲ. राजेंद्र उमाप यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, . लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, प्रभाकर म्हस्के, उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. यावेळी पर्यावरण पुस्तकभेट, शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचे उत्कृष्ट कार्य करणारा सातारा जिल्हा गट, अबितखिंड व आंबीखालसा ग्रामस्थ, व्ही. व्ही. पोपरे, पर्यवेक्षक माळी, पर्यावरणावर पीएच.डी करणारे आवटी दांपत्य आणि स्थानिक संयोजन समितीचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



दुपारनंतरच्या सत्रात आळंदी येथील सिद्धबेट येथे पर्यावरणप्रेमींची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. इंद्रायणी सेवा फौंडेशनचे विठ्ठल शिंदे आणि प्रभाकर तावरे यांनी इंद्रायणी नदीची भीषण अवस्था सर्वांच्या लक्षात आणून दिली. 

भयंकर प्रदूषणाची शिकार झालेली इंद्रायणी नदी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे यांनी, आळंदीत पर्यावरण ज्ञानयज्ञ नियमित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे सहसचिव संजय गायकवाड यांनी आभार मानले.

 



शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

 जागतिक नदी दिन विशेष



यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाशिष्ठी नदीचे पूजन आणि नदीच्या २९० मीटर रुंद पात्रातील दोन्ही तीरांना विधीवत ६५ साड्या नेसवण्याचा उपक्रम संपन्न झाला होता. यावेळी बोलताना, ‘नदीबरोबरचे नाते अधिक घट्ट करावे लागेल’ अशी भूमिका आम्ही मांडली होती. तेव्हा या उपक्रमावर काहींनी टीका केली होती. २१-२३ जूनला चिपळूणला भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद स्तरावरील महाराष्ट्रातील पहिली ‘नदी की पाठशाला’ संपन्न झाली. डॉ. राणा यांनीही, ‘नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही तर माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल.’ अशा आशयाची मांडणी केली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून २००५ पासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी (आज, २२ सप्टेंबर) जागतिक नदी दिन उत्सव संपन्न होतो. व्यक्तिनिष्ठ विकासाच्या गर्तेत मानवी मनाची समूह भावना गळून पडत चाललेली असताना नदीसोबतचे नाते घट्ट करू पाहाणाऱ्या साडी नेसवण्यासारख्या उपक्रमांकडे चांगली घटना म्हणून पाहायला हवे!

मानवी जीवनात नदीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. नद्यांनी आपल्या जीवनात समृद्धी आणली आहे, आपला देश उत्सवप्रिय आहे. त्याचे नद्यांवर प्रचंड दुष्परिणाम झालेत. आज आपण नदीवर नदीसाठी किती वेळा जातो? आपण केवळ नदीला प्रदूषित करण्यासाठी तिच्याकडे जातो. कारण आपल्याला नदी कळलेली नाही. पूर्वी आपण दैनंदिन गरजांसाठी नदीवर जात होतो. नदीचे पाणी नळाद्वारे यायला लागल्यावर आपण नदी अस्वच्छ केली आहे. शहरांचा विकास, उद्योग, ऊर्जानिर्मिती आदी विषय पुढे नेताना नदी परिसंस्था प्रदूषित करायला हवी असे नाही. कोणत्याही नदीवरील बांध किंवा धरण हे नदी प्रवाहाच्या वरील किंवा खालील नैसर्गिक व्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करतात असे अभ्यासकांचे मत आहे. नदीविषयी आजचा स्थानिक शेतकरी, कष्टकरी, बुद्धिजीवी, लोकप्रतिनिधी आणि पाण्याचा वापर दैनंदिन करणारा वर्ग फारसा जागरूक नाही. निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या कोकणची अर्थव्यवस्था खरंतर शेती, बागायती, मासेमारी, ग्रामीण पर्यटन यावर आधारित होती. पण औद्योगिकीकरण, खाणी, रासायनिक प्रकल्प, मोठ्या गृहबांधणी योजना, श्रीमंत लोकांनी घेतलेल्या जमिनी व त्यातील उद्योग यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. मानवी जीवनात एकवेळ समुद्र सान्निध्य नसलं तरी काही अडत नाही, पण नदी किंवा ओढ्याचाही सहवास नसेल तर जीवन रुक्ष बनते. ऑन फेल्डहाऊस पंचेचाळीस वर्षे महाराष्ट्रातील नद्या, धार्मिक परंपरा, लोकजीवन यांचा अभ्यास करून नद्यांचे काठ फिरून लिहिलेले ‘नदी आणि स्त्रीत्व’ हे पुस्तक विलक्षण आहे. नदी संस्कृतीचा मानवी जीवनावर प्रचंड प्रभाव राहिला आहे. फारपूर्वी आपल्याकडे मुलींना  नद्यांची नावे आणि मुलांना पर्वतांची नावे न ठेवण्याचा प्रघात होता. नदीची चंचलता आणि पर्वताची स्थिरता यामागे असल्याची नोंद यात भेटते. नदीची खणा-नारळाने ओटी भरणे, नदीला साडी नेसवणे असे अनेक विधी देशभर होतात. नदीला माणूसपण, स्वीपण बहाल केलेले दिसते. नद्या या मानवाच्या उद्धारकर्त्या, पालनकर्त्या असल्याने त्यांना मातृत्व दिलेले आहे. मूर्तीशास्त्रानुसारही नदीचे गोमुखातून अवतरण होत असते. अध्यात्मिक पातळीवर नदीचे सारे माहात्म्य उचित असले तरी वर्तमानात नदीचे पावित्र्य हे तिच्या खळाळण्यात किंवा वाहत्या पाण्यात आहे हे जाणून होणाऱ्या कृतींकडे सजगतेने पाहाण्याची आवश्यकता आहे. वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे ज्या सजगतेने आम्ही पाहिले तिच सजगता आम्हाला तीन दिवसीय ‘नदी की पाठशाला’ उपक्रमात अनुभवायला मिळाली. त्यातही  डॉ. राजेंद्र सिंह राणा, भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी मांडलेल्या भूमिका तर कोकणातील नद्यांच्या तीरावर राहणाऱ्या समस्याग्रस्त समूहाने काळजीपूर्वक समजून घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या होत्या. मात्र गाळ काढण्यासाठी प्रसंगी उपोषणाचे हत्यार उपसलेल्या संवेदनशील चिपळूणकरांनी दुर्दैवाने या साऱ्याकडे दुर्लक्ष केले.

‘नीर-नारी-नदी-नारायण’ - डॉ. राजेंद्रसिंह यांची घोषणा


‘नदी की पाठशाला’ कार्यक्रमात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आपली भूमिका मांडली. नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही. माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल. चिपळूण शहराच्या पूरमुक्तीसाठी सह्याद्री पर्वतरांगा हिरव्यागार व्हायला हव्यात. धरणे बांधून समृद्ध होता येणार नाही. देशातील ४२ टक्के धरणे महाराष्ट्रात आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात. पाणी आणि नदीसोबत आपण जोडले गेलेलो नाही. ‘नदी की पाठशाला’ उपक्रम नदीला माणसे जोडणारा आहे. कोयनेचे अतिरीक्त अवजल कृष्णा खोऱ्यात सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र याठिकाणी ते वापरात आणावे असा मुद्दा चर्चेत असल्याचेही डॉ. राणा यांनी नमूद केले. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार ‘पंचमहाभूते’ ही आपली दैवते होती. आपण त्यांचा सन्मान करत होतो तेव्हा अख्खं जग भारताकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करत होता. भारत विश्वगुरु होता. आज आपण ही ओळख गमावली आहे. कार्बन शोषण करण्याची सर्वाधिक ताकद कोकणात आहे. म्हणून लोकं कोकणात यायला इच्छुक आहेत. कोकण हे भारतातील सर्वात पाणीदार क्षेत्र आहे. येथे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. कोकणात स्वतःच्या जलस्त्रोतांचा अभाव आहे. पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. कोकणने समुद्राला जाऊन मिळणाऱ्या पाण्यातून स्वतःची वॉटरबक तयार करायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. पावसाचे आणि कोयनेच्या वीज निर्मितीनंतर नदीमार्गे समुद्राला मिळणारे पाणी साठवून आपली नदी ही जमिनीखालूनही वाहात राहिल असे पाहायला हवे. नदी जमिनीखालून वाहते तेव्हा बाष्पीभवन होत नाही. पाण्याचा नाश होत नाही. आपली वॉटरबक कायम राहते. नद्यांच्या विकासासाठी लोकांनी पुढाकार घेतल्यास सामान्य माणूस नदीशी जोडला जाईल. अभियान अधिक यशस्वी होईल. भारतीय लोकं हे पाणी, स्त्री आणि नदी यांचा खूप आदर करतात, म्हणून त्यांना नारायण म्हणतात. नदी सभ्यतेला जन्म देते. ही संकल्पना मांडून मार्च २०२३मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक जल परिषदेत  दिलेल्या ‘नीर-नारी-नदी-नारायण’ या घोषणेचा पुनरुच्चार डॉ. राणा यांनी केला तेव्हा डी.बी.जे. महाविद्यालयाचा सेमिनार हॉल दुमदुमून गेला.

 

‘डोह’ हे कोकणी नद्यांचे वैशिष्ट्य - भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर

भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण कोकणचे वर्गीकरण तीन टप्प्यात करता येईल. मध्य कोकणात सह्याद्रीची उंची सर्वाधिक आहे. खडा सह्याद्री आहे. दक्षिण-उत्तर कोकणात सह्याद्रीची उंची कमी आहे. जिथे सह्याद्रीची उंची जास्त आहे तिथे पाऊस जास्त आहे. म्हणून दक्षिण-उत्तर कोकणच्या तुलनेत मध्य कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. उत्तर कोकणात उत्तम सखल किनारपट्टी आहे. म्हणून तो भाग अधिक वेगाने विकसित झालेला दिसतो. दक्षिण कोकणात किनारपट्टीपासून आत सखल भाग आहे. शेतीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मध्य कोकणात मात्र किनारपट्टी ते सह्याद्री या दरम्यान डोंगररांगा आहेत. सखलभूमीचे प्रमाण कमी असलेला डोंगराळ-खडकाळ भाग म्हणजे मध्य कोकण होय. मध्य कोकणात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातून नद्या, ओढे-नाले वाहतात. कोकणातील जवळपास प्रत्येक नदी ही भेगांमधून वाहाते आहे. उत्तरेतून निघून दक्षिणेला मिळणारी एकही नदी कोकणात नाही. निसर्ग आणि खडकांची अनुकूलता नसल्याने कोकणातील सगळ्या नद्या ह्या पूर्व-पश्चिम आहेत. कमी अंतरात वाहणाऱ्या नद्यांनी जमिनीला ठिकठिकाणी खोलवर खणून डोह निर्माण केले आहेत. कोकणातील नद्यांत ठिकठिकाणी आढळणारे असे डोह देशावरील नद्यांत फारसे पाहायला मिळत नाहीत. कोकणातील नद्यांचे कॅरक्टर डोह आहे. या नद्यांतील उथळ डोह स्वच्छ होतात, खोल डोह स्वच्छ होत नाहीत. आज कोकणातील हे मोठे डोह गाळाने भरलेले आहेत. धरणे होण्यापूर्वीपर्यंत कोकणात बंदरे कार्यरत होती. मात्र धरणे झाल्यावर नद्यांना अडथळे निर्माण झाले. गाळ पुढे ढकलण्याची नदीची शक्ती कमी होऊन बंदरे ओव्हरण्याचे प्रमाण वाढले. कालपरत्वे बंदरे ओव्हरली गेलीत. २०२१च्या महापुराने हा गाळ थोडा पुढे सरकलेला आहे. २००५ ते २०२१ दरम्यान गाळाचे प्रमाण वाढून अधिक उंचीचा पूर आला. कोकणातील वाशिष्टी, काजळी, सावित्री, शास्त्री आदी सर्व नद्यांना हे लागू होतं. म्हणून नुसता धरणांनाही दोष देण्यात अर्थ नाही. धरणे ही आपलीच तहान भागवण्यासाठी आहेत. कारण उल्हास वगळता कोकणातील बहुतेक नद्या पूर्वांपार हंगामी पावसाळी वाहाणाऱ्या आहेत. जांभा खडक मध्य व दक्षिण कोकण वगळता अन्यत्र नाही. जांभा खडक कठीण झाला की त्याचा कातळ बनतो. कोकणात दोन किमी. जाडीत लाव्हाचे किमान ४६ थर आहेत. हे थर आपल्याला मोजता येतात. यातील सुटलेलं मटेरियल मोठाले दगड आदी शेवटी नदीत पोहोचतं. कोकणातील डोंगर गोलाकार आहेत. त्यात विशेष पाणी साठत नाही. सपाटी असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी जिरत असतं. कारण तिथे पाणी मुरायला वेळ मिळतो, झरेही फुटतात. जिथे झरे तिथे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत नदीला पाणी असते. अन्यथा नदी कोरडी पडलेली दिसते. कोकणात अजूनही काही ठिकाणी उंच डोंगरावर, मध्यम भागात आणि समुद्रसपाटीलगत  पाणी मिळते. मात्र या प्रत्येक ठिकाणाच्या पाण्याचा मूळ स्त्रोत वेगळा आहे. आज कोकणातील नद्या धरणापर्यंत येऊन थांबल्यासारखे झाले आहे. सर्व नद्या गाळांनी भरलेल्या आहेत. जंगलतोडीमुळे गाळ वाढतो आहे. जगबुडी, शिवनदी, वाशिष्ठी सगळ्या नदी भरून वाहात असताना मोठा पाऊस आणि जर भरतीची वेळ असेल तर महापुराची शक्यता बळावते आहे. आपल्या देशातील भूजल साठ्याची परिस्थिती गंभीर आहे. कोकणात पावसाचे पाणी मुबलक आहे. परंतु व्यवस्थापनात आपण कमी पडतो. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यासाठी पहिल्यांदा आपण प्रत्येकाने पाण्याचा आदर करायला शिकण्याची गरज आहे. आजही गड-किल्ल्यावर किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पाण्याचे साठवण तलाव पहायला मिळतात. प्रत्येक सजीवाच्या चाऱ्यापाण्याची सोय निसगनि केलेली आहे. परंतु भौगोलिक संरचनेत विविधता असल्यामुळे कोकणातील यशस्वी प्रयोग विदर्भात यशस्वी होईल याची खात्री नाही. म्हणून विभागनिहाय कोकणच्या भौगोलिकतेचा विचार करून इथला विकास करायला हवा आहे.

उत्सव हे नदी समजून घेण्याचे मार्ग - शैलजा देशपांडे

नदी एक जग दुसऱ्याला नेऊन जोडण्याचे काम करते. जी नाद करते, जी प्रवाही आहे ती नदी आहे. नदी विषयक काम करण्यासाठी नदीची नाडी ओळखता आली पाहिजे. नदीला नक्की हवंय काय? हे समजून घ्यायला हवं आहे. लोकसहभागातून नदीचे पुनरुज्जीवन व्हायला हवे आहे. नुसते रुंदीकरण आणि खोलीकरण म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन नाही. नद्या स्वच्छ व्हायला हव्यात. प्रत्येक नदीचा उगम वेगळ्या पद्धतीने असतो. उगम क्षेत्रात नदी बाल्यावस्थेत खेळकर असते. तिथली जैवविविधता वेगळी असते. पुढे नदीचा खळाळता स्वभाव दिसतो. नदी आपल्या सोबत येताना गोडं पाणी आणते. ती सागराचे खारे पाणी स्वतःत घेते. नदीचे गोडे पाणी जिथे समुद्राच्या खाऱ्या पाण्याला मिळते तापमानात व्हेरिएशन असते. नदी आणि समुद्राच्या या मनोमिलनाच्या ठिकाणी जगातील सर्वोत्तम जैवविविधता असते. नदीचे प्रवाहही अनेक आहेत. पात्रामधील प्रवाह, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, जमिनीत मुरणारा प्रवाह, पाझरणारा प्रवाह, भूजल यात कोठेही बाधा आली तर नदीच्या परीसंस्थेला अडचण होते. नदीतील प्रत्येक जीवाची आपली जागा असते. त्या साऱ्या जागा पुनरुज्जीवित करणं म्हणजे नदी पुनरुज्जीवित करणे होय. नदीची ही रचना महोत्सवांसारख्या जनजागरणातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. अशी मांडणी जीवित नदी पुणेच्या संस्थापक देशपांडे यांनी केली. 

थेट पाणी पिता येईल अशा विहिरी ही श्रीमंती - डॉ. अजित गोखले

अन्न पाण्याशिवाय आपण काही दिवस तग धरू शकतो पण श्वास ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपली जमीन जेव्हा अशक्त होते किंवा बेशुद्ध होते तेव्हा पावसाची अडचण होते. आजकाल मराठवाडा सारख्या भागात पाऊस पडल्यापडल्या पूर येत असेल तर त्याची कारणे नैसर्गिक असू शकत नाही. ग्लोबल वार्मिंग ला दोष दिला की आपण दोषमुक्त होतो ते चुकीचं आहे. नदीत मासे असतात पाऊस सुरु झाल्यावर ते समुद्राकडून खाडीकडे खाडीकडून नदीकडे नदीकडून डोंगराकडे प्रवास करतात. हे जगभर घडतं. म्हणून पावसाळ्यात नदीला कोणताही अडथळा नसावा. चुकीच्या पद्धतीने नदीला अडवल्यावर अडचणी निर्माण होतात. बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे माशांना पुढे सरकण्यात अडथळा येतो. कोकणातील नद्या दगड फोडतील अशा क्षमतेच्या आहेत. त्या समृद्ध करण्यासाठी आम्हाला मोठी शहरे मोडावी लागतील, जाणीवपूर्वक छोट्या शहरात, गावाकडे वळावे लागेल. गावागावातील सांडपाणी जमिनीवर जाईल हे पाहायला हवे आहे. जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता अमेरिका, कृषीदृष्ट्या भारतातील सर्वात श्रीमत राज्य पंजाब, पंजाब मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा भटिंडा, महाराष्ट्रातील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत तालुका शिरोळ या साऱ्यात पाण्याची कमतरता, शेतकऱ्यांची कष्ट करायची तयारी, रासायनिक खतांचा वापर यांसोबत कॅन्सरचे सर्वाधिक प्रमाण हे भयावह साम्य आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात दर चाळीस किमीवर मेगा प्रोजेक्ट्स आणण्याचे जे विचार सुरु आहेत त्याकडे पाहायला हवे आहे. कोकणात अलीकडे खूप सेप्टिक टँक बांधले गेलेत. ते तळाशी खुले आहेत. आपले त्याकडे लक्ष नाही. त्याच्या शेजारी झाडे हवी आहेत. झाडे नसल्याने ते शुध्द पाणी प्रदूषित करत आहेत. थेट पाणी पिता येईल अशा विहिरी आज कोकणातही फार कमी शिल्लक राहिल्या आहेत. ती लोकं नशीबवान आहेत. त्यांनी ही श्रीमंती जपावी असे गोखले म्हणाले.


‘नदी की पाठशाला’च्या पार्श्वभूमीवर ‘नदी महोत्सव’, नदी वारसा फेरी, नदी संस्कृती, नदी जनजागरण असे उपक्रम सर्वत्र होऊ लागलेत. स्त्रीरूपी नद्या हे कोकणसह महाराष्ट्राचे स्वाभाविक वास्तव आहे. ब्रह्मपुत्र आणि सिंधू या भारतातल्या प्रमुख पुल्लिंगी मानल्या जाणाऱ्या नद्या आहेत. काही तुरळक अपवादांमध्ये पुरुषांचे रूपांतर नद्यांमध्ये झालेल्या कहाण्या आहेत. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या देवळात पाच नद्यांचा उगम आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास होऊ लागल्यावर ब्रह्मदेवाने यज्ञ करण्याचे मनात आणून, ब्रह्मारण्यात उत्तम रत्नखचित मंडप घातला. यज्ञसामुग्री जमा करून, देव, ऋषि, गंधर्व आदींना निमंत्रण केले. वेदी सिद्ध होऊन, यज्ञाच्या मुहूर्ताची घटिका भरत आली. तथापि मुख्य यजमान ब्रह्मदेव यांच्या पत्नी सावित्री वस्त्रभूषणे परिधान करण्यात निमग्न असल्यामुळे त्यांना मुहूर्ताच्या समयाचे भान राहिले नाही. विष्णुप्रभृति देवांची अनुमति घेऊन ब्रह्मदेवाने आपली द्वितीय पत्नी गायत्रीचे समागमे यज्ञदीक्षा घेतली. कर्मास आरंभ केला. नंतर मंगलवाद्यांचा गजर व वेदघोष झाला तो ऐकून सावित्री लगबगीने यज्ञमंडपांत येऊन पाहते तो गायत्रीसमागमे यजमान यज्ञ करीत आहेत. कोपायमान होऊन ब्रह्मा, विष्णु, महेश व गायत्री या चौघांस सावित्रीने शाप दिला, ‘तुम्ही गायत्रीचा पक्षपात केलात त्या अर्थी जलरूप होऊन स्त्रीनावाने जगात प्रसिद्ध व्हाल. गायत्रीही नदी होईल. तिच्याकडे लोक दुर्लक्ष करतील. हे ऐकून विष्णूंनाही क्रोध आला. त्यांनी सावित्रीला तसाच शाप दिला. या परस्पर शापांमुळे भगवान विष्णु हे कृष्णानदीरूप झाले. शिव वेण्णारूप, ब्रह्मदेव कुकुद्मतीरूप झाले. गायत्री व सावित्री यांची नावे तीच राहिली. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी पॉवर हाऊसमध्ये वार्षिक पूजेच्या प्रसंगी जलप्रपाताची अर्थात नदीची ओटी भरली जाते. पंढरपूरच्या पुढे भीमा नदीकिनारी माचणूर गाव आहे. तिथे भीमेला साक्षात श्रीसिद्धेश्वराची बहीण मानतात. माचणूरच्या सिद्धेश्वराच्या महाशिवरात्री उत्सवात नदीला साडी-चोळी वाहतात. माणसाची उन्नती ही निसर्गाशी जवळीक साधल्याने होते हे आजचं जग विसरू लागलं आहे. संदीप सावंत यांनी निर्माण केलेला ‘नदी वाहते’ हा माणसाच्या भूमिनिष्ठ जाणिवांची पाठराखण करणारा कलात्मक चित्रपट आहे. त्यातून मांडण्यात आलेला विचार प्रात्यक्षिक आहे. हा सिनेमा नदीच्या काठावरील माणसांना वाचवा असाही संदेश देतोय. खरंतर या साऱ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी वाचलेल्याप्रमाणे, ‘दहा दिशातून सृष्टीवरती जे जे सुंदर येते, स्वागत करूया त्या सगळ्याचे सारून सर्व मते’ अशा मोकळ्या विचाराने वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे पाहाण्याची आवश्यकता होती.

वाशिष्टीला साडी नेसवण्याचा उपक्रम


तर मागच्या जागतिक जलदिनी, परचुरीतील कृषी पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, त्यांच्या पत्नी डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांनी वाशिष्टी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम केला. या निमित्ताने त्यांच्या हाऊस बोटीवर चार दिवस श्रीमद्भागवत आणि मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. जलदिनी नदीचे पूजन होऊन २९० मीटर रुंदीच्या पात्राला एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेसवण्यासाठी ६५ साड्या एकमेकांना बांधून लांब पट्टा तयार करण्यात आला होता. साड्यांचा हा पट्टा एका किनाऱ्यावरून बोटीदवारे दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला होता. नदीच्या मध्यभागी काही वेळ थांबून वशिष्टी नदीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली होती. उपस्थितांना नदी स्वच्छता, प्रदूषणमुक्ती बाबत शपथ देण्यात आली. साडी नेसवण्याच्या कार्यक्रमानंतर नदीला नेसवलेल्या ६५ साड्या प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना भेट देण्यात आल्या होत्या. अर्थात आपल्या संस्कृतीने नदीचे उगमस्थान हे मस्तक आणि नदी जिथे समुद्राला मिळते ते चरण मानले आहे. त्यामुळे नदीला लांबीप्रमाणे साडी नेसवणे शक्य नाही. हा विलोभनीय उपक्रम पाहाण्यासाठी गुहागरसह कराड, नाशिक, पुणे आदी दूरदूरच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. याच कार्यक्रमात आम्ही वाशिष्टी नदीबाबत विवेचन केले होते. वाशिष्टी नदीचा उगमापासून ते संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादूई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जल पर्यटन, जलमार्ग वाहतूक असे विषय जोडले पाहिजेत. यातून नदीच्या तीरांवरील गावे समृद्ध करता येतील. वाशिष्टी नदीच्या तीरावर अठरापगड जातींची संस्कृती विकसित झाली आहे. डच लोकांनी १६३७मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर १९७१मध्ये प्रख्यात इंजिनीयर बी. एन्. गोरे यांनी वाशिष्टीचा अभ्यास केला होता. येथे देशातील मोठे बंदर विकसित करता येईल, असा त्यांचा निष्कर्ष होता. खासदार (कै.) बापूसाहेब परुळेकर यांनीही वाशिष्ठी नदीच्या विकासाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता. वाशिष्टी नदीपात्रात, समुद्राजवळ असलेल्या दाभोळची भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील शक्तिशाली बंदर अशी ओळख राहिली आहे. भारतातील बहुतांश नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. करोना काळात लॉकडाऊनमध्ये वशिष्टी नदीला मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली होती. तेव्हा आजवर न दिसलेले अनेक जलचर वाशिष्टीत दिसून आले होते. पाण्याची गुणवत्ता सुधारली होती. अनेकांना नदीचे सौंदर्य पाहाता आले होते. नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल तर नदीपात्र स्वच्छ राहील ते गाळाने भरणार नाही हे पाहावे लागेल. यासाठी आपल्याला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नदीबरोबरचे आपले नाते अधिक घट्ट करावे लागेल. आपलं जग हे भावनेवर चालतं. नदी, भूमी या सृजनाच्या, निर्मितीच्या शक्ती आहेत. या स्त्री रूपांची पूजा करणे आणि त्यांना साडी नेसवणे हे सौभाग्याचे आणि मांगल्याचे प्रतिक आहे. अशा उपक्रमातून संदर्भीय विषयाच्या भावना पवित्र व्हायला मदत होते. कोणत्याही नदीला साडी नेसवून नदीचे संवर्धन होऊ शकत नाही किंवा तिचा विकासही होऊ शकत नाही. परंतु नदीला नेसवलेली साडी पवित्र प्रसाद म्हणून नेसणाऱ्या स्त्रीच्या मनात नदी संवर्धनाची भावना नक्की दृढ करू शकते. पुढे जाऊन तीच स्त्री नदीत कचरा टाकणाऱ्या कृतीही रोखून परिवर्तन करू शकते. भारतीय समाजमनही भक्तीमार्गी आहे. ‘देखे मनुष्यजात सकळ, स्वभावतः भजनशील’ असं संत श्रीज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटलं आहे. दारुचे दुष्परिणाम माहित असूनही लोकं ती सोडत नाहीत. मात्र त्याच व्यक्तीने एखाद्या अध्यात्मिक ठिकाणी जाऊन माळ गळ्यात धारण केली की निर्धाराने दारू सुटते. नदी स्वच्छतेचेही तसेच आहे. पूर्वी त्यातले पाणी आपल्यालाच उद्या प्यायचे आहे, याची जाणीव असल्याने नदीत कोणी कचरा टाकत नव्हते. आज चित्र बदलले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी भक्तिमार्गाचा उपयोग केला तर बिघडलं कुठे? दुसरं एक कारण असं की आपल्या समाजाला भव्यता आणि वेगळेपणा आवडतो. अर्थात म्हणून आपण काहीही वेगळं करायला लागलो तर ते समाज स्वीकारतोच असंही नाही. पण नदीला साडी नेसवण्याचा प्रघात देशभर स्वीकारला गेला आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आपण तो कोकणात आणलाय, इतकंच! तो स्वीकारायचा की नाकारायचा हे समाज ठरवेल. मानवी समूहाच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा तो एका पिढीपुरता मर्यादित नसतो. तो काळानुरूप बदल स्वीकारित दीर्घकाळ टिकून राहातो. परंतु तोवर वाट न बघता ‘उचलली जीभ...’ पद्धतीने उपक्रमालाच मूर्खपणाचा प्रकार म्हणणे किंवा वाशिष्टीला साडी मग महामार्गाला सदरा असं काहीतरी उपरोधिक लिहिणे, त्याची ‘री’ ओढणे आणि असं टोकाचं हिणकस बोलणाऱ्यांना संबंधित विषयातील जागतिक तज्ज्ञ अशी ओळख असलेल्यांनी पाठिंबा देणे हे उचित नव्हे! वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाबाबत यानिमित्ताने इतकंच!

वाशिष्टी नदीविषयी मनोगत व्यक्त करताना धीरज वाटेकर

वाशिष्टी ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. इतिहासात डोकावले असता, सातवाहनकालीन राजा पुलुमावि हा गौतमी अथवा वाशिष्टी पुत्र असल्याचा संदर्भ भेटतो. आमचेही बालपण वाशिष्टी नदीकाठी कोयना जलविद्युत प्रकल्प वसाहतीत व्यतित झाले आहे. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाण्याचे जणू व्रत आचरल्याप्रमाणे नदीचे कार्य सुरु असल्याचे आम्ही बालपणी अनुभवले आहे. नकोशा गोष्टी हळुवारपणे बाजूला सारत कसलीही खंत न करता मार्गक्रमण करत नितळ, स्वच्छ, खळखळून हसणारी नदी आज मात्र आमच्या अति हव्यासामुळे गुदमरलेली दिसते. तिला पूर्वपदावर आणण्यासाठी मानवी पाऊले सजगतेने तिच्याकडे वळायला हवीत. त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे स्वागत करणे, सक्रीय पाठबळ देणे हे आपले ‘समाजभान’ उत्तम असल्याचे लक्षण म्हणता येईल.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

अक्षरांना वचनांप्रमाणे सांभाळलेलं दाम्पत्य

‘तुका म्हणे वचनासाठी। नाम धरियेले कंठी।।’ हे वचन ऐकवून देवाचे नाव आपल्या कंठात धारण केल्याने , सतत नामस्मरण केल्याने बोलण्याची (वचनाची) शक्...