शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

कोकणचे भवितव्य


कोकणातला शेतकरी, सर्वसामान्य माणूस आत्महत्या करीत नाही. वीजचोरी करत नाही. कर्जमाफी, व्याजमाफी मागत नाही, कधीही हात पसरत नाही. म्हणून त्याला काहीही मिळत नाही. यंदाच्या पूरातही हेच चित्र पाहायला मिळाले. हा कोकणी माणूस अतिसहनशील आहे. या सहनशीलतेमुळे मुत्सद्दी राजकारणी कोकणावर सातत्याने अन्याय करत आलेत. आमच्याकडे राज्यस्तरावर कोकणाची अमर्याद छाप पाडणारा नेता नाही. चुकून एखादा सापडला तर त्याला आम्हां कोकण्यांचे अजिबात पाठबळ मिळत नाही. का नाही ? तर ‘आमचे-तुमचे’ गल्लीतले राजकारण ? चुकून एखाद्याला मिळालेच तर तो नेता पुन्हा गल्लीतल्या राजकारणात उतरून स्वतःची बोळवण करून घेतो. समूळ कोकणासाठी म्हणून आम्ही कोकणी कधीही एकत्र येत नाही. सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात सिंचनाची स्थिती भयावह आहे. पूर / महापूर आम्ही उशाला घेऊन झोपतो. आमची असंख्य घरे फक्त गणपती आणि शिमग्यालाच उघडतात. आणि आम्ही तरीही आमच्या या साऱ्या मुद्द्यांचे ‘गावठी’ राजकारण करण्यात धन्यता मानतो. सुदैवाने चालू शतकात कोकणी माणूस जागा होतो आहे, असे म्हणावे ! अशा काही घटना घडताहेत. काही संघटना प्रयत्न करताहेत, हे स्वागतार्ह्य आहे. भूतकाळातही यापूर्वी असे प्रयत्न घडलेले आहेत. त्यामुळे वर्तमान प्रयत्नांचे भवितव्य काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आजही जुने मुद्दे समोर येतात. त्या मुद्यांच्या आधारे ‘कोकणचे भवितव्य’ समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न !  

हा लेख लिहायला घेतला तेव्हाएक आनंदाची बातमी वाचली. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पडवे येथे २हजार ६०० कोटींच्या मेगा लेदर अँड फूटवेअर क्लस्टरला तत्वत: मान्यता मिळाली. यासाठी गेली अनेक वर्ष माजी आमदार डॉ. विनय नातू प्रयत्न करत होते. या प्रकल्पाची माहिती त्यांनीच पहिल्यांदा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांच्यापर्यंत पोहचवून उद्योग निर्मितीसाठी आपले सततचे प्रयत्न कायम ठेविले होते. यामुळे कोकणात रोजगार वाढेल, विकासाला गती प्राप्त होईल. असे प्रकल्पकोकणचे भवितव्यनिश्चित करणार आहेत. कोकणची वनसंपदा, लालमाती, जांभा दगड, खळाळूनवाहणाऱ्या नद्या, खाडय़ा, स्वच्छ सागरकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, फणस, काजू, कोकम, आंबा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, इथले गड, किल्ले, लेणी, देवळे, तीर्थस्थळे, मशीदी, दर्गे, गावे, बंदरे आणि हजारो वर्षांची परंपरा असूनही त्याचं जीवंत स्मारक आम्ही उभारू शकलो नाही. सध्याच्या चौपदरीकरण होत असलेल्या महामार्गावर, कुठेतरी ते जुनं मातीचा धुरळा उडविणारं, मोबाईलची रेंज नसलेलं, निसर्गरम्य प्राचीन कोकण आम्ही जपायला हवं, असं आजही वाटतं. ‘फादर ऑफ नेशन’ महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले कोकणचे आहेत. अंदमानमध्ये हुतात्मा झालेल्या नोंद ३१० पैकी ३५ जण कोकणातील आहेत. स्वतःच्या हिंमतीवर ९ ताम्रपट शोधणारा भारतातील एकमेव व्यक्ती अण्णा शिरगावकर कोकणातले आहेत. पां. वा. काणे आणि महर्षी धोंडो कर्वे दोघे भारतरत्न शिक्षक-विद्यार्थी यांच्या नावे ओळखली जाणारी शाळा सन  १८६३ ची रत्नागिरीतील ! सन १९३९ ला ती बंद झाली. सध्या तिथे ट्रेनिंग कॉलेज चालते. महाराष्ट्रातले पहिले सार्वजनिक वाचनालय कोकणात रत्नागिरीला सन १८२८ बुक सोसायटी नावाने सुरु झाले. आज ते नगर वाचनालय म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिले वर्तमानपत्र दर्पण सन १८५४ बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले. भारतातल्या पाहिल्या बॅरिस्टर महिला सीताबाई नारायण आजगावकर याही कोकणातल्याच ! भारतातील व्यक्तिगत मालकीची एकमेव बँक ‘युनियन बँक ऑफ चिपळूण’ चालविणारे प्रोपरायटर बापूसाहेब खरे कोकणातले. राईट टू रिजेक्ट हा कॉलम मतपत्रिकेवर असावा असं लोकसभेत पहिल्यांदा सांगणारे बापूसाहेब परुळेकर कोकणचे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, मध्यप्रदेश-भीमबेटका गुहा येथील आदिम चित्रलिपी शोध घेणारे हरिभाऊ वाकणकर हे संगमेश्वर धामणीचे ! कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांचा पुतळा निर्माण करणारे नारायण लक्ष्मण सोनवडेकर सोनवडे-सावंतवाडीचे ! शोधलं तर खूप काही मिळेल. या साऱ्याचा सारासार विचार कोकणच्या भवितव्यासाठी व्हायला हवा. कोकणात सन २०१० पासून इतिहास परिषद कार्यरत आहे. तिच्या दरवर्षीच्या अधिवेशनात नवे संदर्भ समोर येत असतात. ऐतिहासिक आणि प्राचीन खूणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जपणूक होत नसल्याने ही मंडळी कायम हळहळत असतात. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कोकणात या विषयात काय करता येईल ? अशी विचारणा शासनाने केली असेल असे वाटत नाही. कोकणचा प्राचीन, अर्वाचीन काळाचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला जायला हवा. कोकणात मनुष्यवस्तीस प्रारंभ कधी झाला ? सातवाहनपूर्व काळातील समाजव्यवस्था, गावातील मंदिरे, स्थानिक दैवते, परंपरा, विविध राजवाटीतील स्थित्यंतरे, राजवटींचे योगदान, नौकानयन, बंदरसंस्कृती आणि त्यासंबंधित अर्थव्यवस्था यांचा इत्यंभूत अभ्यास, संशोधन, सलग लेखन व्हायला हवंय. परदेशी तज्ज्ञांच्या मते इ.स. किमान ३० हजार वर्षे पूर्व कातळशिल्पे, कोकणाला जागतिक वारसा बनविण्यास सक्षम आहेत. हा विषय लावून धरणारे कातळशिल्प संशोधक सुधीर (भाई) रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. या शिल्पांत गेंडा प्राणी दिसतो आहे. शिल्पांत बैलांचे चित्र नाही, अर्थात मानवाने शेती सुरु करण्यापूर्वीची ही चित्रे असावीत असा निष्कर्ष तज्ज्ञ काढताहेत. रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात ही शिल्पे अधिक आढळली आहेत. भविष्यात हा परिसर जागतिक हेरीटेज टुरिझम बनून एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे. 

पंतप्रधान पंडित नेहरूंकडे उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा कोयना धरणाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हा वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करणार ? असा प्रश्न नेहरूंनी विचारला होता. आम्ही त्याचे उत्तर आजही शोधतो आहोत. कोयनेतील वीजनिर्मितीनंतर समुद्रात सोडले जाणारे ‘वाशिष्ठीतील जलवैभव’ कोकणासाठी वापरण्याची योजना प्रत्यक्षात आल्यास कोकणाचा पाणी प्रश्न सुटेल. कोकणातल्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांमधील पाण्याची ६१२ टी.एम.सी. क्षमता १०५ टी.एम.सी. क्षमतेच्या कोयना धरणापेक्षा जवळपास सहापट अधिक आहे. हेही सारे पाणी समुद्रात वाहून जाते. कोकणात छोट्या धरणांची साखळी उभी करून हे सारे पाणी प्रथम वीजनिर्मितीसाठी आणि नंतर सिंचनासाठी वापरण्याची सूचना ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांच्या समितीने केलेली आहे. कोकणातील गावागावातून महिला हंडाभर पाण्यासाठी आजही दोन-दोन किलोमीटर पायपीट करते. आमचे कुणाचेच पाय दुखत नसल्याने कोकणात, राज्यातील ४६ टक्के पाणी उपलब्ध असूनही सिंचन अत्यल्प का ? हा प्रश्न आम्हाला पडत नाही. राज्याच्या जलसिंचन विभागात सन २०१४ पूर्वी घोटाळा झाला. सरकारनेच काही पाटबंधारे प्रकल्पांना स्थगिती दिली. माहितीनुसार त्यात रायगड जिल्ह्यातील कोंडाणे, बाळगंगा, काळू प्रकल्प, शाई, सुसरी, काळ जलविद्युत प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील गडगडी मध्यम, जामदा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरसिंगे, गडगडी मध्यम, शिळ लघु प्रकल्प आदि १२ प्रकल्पांचा समावेश आहे. चौकशी नावाखाली या प्रकल्पांची कामे बंद आहेत. कोकणचा विकास होतो आहे.

संपूर्ण विकासाची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणारे नेतृत्व कोकणाला लाभलेले नाही. स्वातंत्र्यानंतर कोकणचे राजकीय नेतृत्व प्रथम स्व. बाळासाहेब सावंत यांनी केले. त्यांना हंगामी मुख्यमंत्रीपदही मिळाले होते. त्यानंतर बॅ. ए. आर. अंतुले, भाईसाहेब सावंत, शामराव पेजे, बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते ही काही नावे डोळ्यांसमोर येतात. अलिकडच्या काळात, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे हा एक अपवाद ! शिक्षक भरतीच्या निमित्ताने कोकणातील स्थानिकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सन २०१० च्या शिक्षक भरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील ११५७ पैकी ३७ शिक्षक कोकणातील असल्याचे आकडेवारी सांगते. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांत तर अधिक भयंकर स्थिती असावी. कोकण आणि बुद्धिमत्ता हे समानार्थी शब्द असूनही आम्ही स्पर्धा परीक्षांची वाट का धरत नाही ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी आणि पशु-पक्षी प्रदर्शन भरते. प्रदर्शनाला तरुणांची उपस्थिती असते. प्रदर्शनात आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, अवजारे आणि मार्गदर्शन मिळते. दुसरीकडे मात्र शासन कृषी विभागाच्या योजना बंद करत असल्याची ओरड ऐकू येते. कृषी विभागाला सरकारकडून अनुदान प्राप्त होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सन २०१९ च्या निवडणूकपूर्व ‘महाजनादेशयात्रा’ दरम्यान राजापूरात तीन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक असणाऱ्या, प्रकल्प उभारणीच्या काळात दीड लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करणारा, उभारणीनंतर वीस हजार थेट व इतरत्र लाखो रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या बहुचर्चित नाणार ‘ग्रीन’ रिफायनरी (तेल शुद्धीकरण) प्रकल्पाच्या फेरविचाराचा मुद्दा मांडला. हा प्रकल्प कोकणाला ‘रोजगार’ देऊ शकतो, हे मान्य केलं तरीही त्यातून घडू पाहाणारा भयानक नैसर्गिक विनाश कसा सावरायचा ? याचे नीट उत्तर अद्याप मिळालेले नाही. अभ्यासपूर्ण मांडणी न करता, ‘स्थानिकांना एखादा प्रकल्प नको असेल तर आमचाही विरोध आहे’ अशी भूमिका घेणारे राजकारणी आम्हांला लाभले आहेत. प्रचंड आर्थिक गुंतवणूक असणारा हा पहिलाच प्रकल्प असल्याने बुद्धीभेद टाळून विचार व्हायला हवा. प्रकल्पाबाबतच्या शंका निराकरण करण्यावर भर द्यायला हवा. मोठे वृक्ष पावसाळ्यात पाण्याचा विपुल साठा करत असतात. जमिनीतील आर्द्रता दीर्घकाळ टिकवितात. कोकणातील बेसुमार जंगलतोड थांबवून नवीन वृक्षलागवड, फळबागा विकसित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला गेला पाहिजे. कोकणातील जमिनीचा तीव्र उतार लक्षात घेऊन सिंचन व्यवस्थापनासाठी तंत्र विकसित केले पाहिजे.

कोकणातल्या शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठावरील ताण वाढला आहे. आम्ही गेली अनेक वर्षे ‘स्वतंत्र विद्यापीठ’ मागतो आहोत. राज्यात अनेकांना (सोलापूर) ते मिळाले आहे, पण आम्हांला नाही. का ? माहित नाही. आजही आमच्या नशीबी ‘मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सक्षमीकरण’ ह्याच घोषणा आहेत. स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ सरकारला नागपूरला न्यायचे आहे. हे म्हणजे मनात आले तर ते कोकणातला समुद्रही तिकडे नेतील, अशातलं ! बरं हे असं करू नका, सांगण्यासाठी आम्हांला आमची क्रयशक्ती खर्च करावी लागते. त्यावर ‘आम्ही कोकणाचा विकास करू !’ हे पालुपद कितीही सरकारे बदलली तरी सर्वांच्याच तोंडी असतचं ! कोकणात सन १९७२ ला विद्यापीठ सुरु झाले. १०० वर्षापूर्वी सहकारी तत्वावर भारतातील पहिला काजू बी साखर कारखाना तोरणे बंधू यांनी सावंतवाडीत उभारला होता. इथे केळी लागवडीचा प्रयोग, हळद, चिक्कू लागवड (डहाणू-घोलवड), नारळ लागवड, हापूस इकॉनॉमी (अल्फान्सो सिटी), काजू यांना वाव आहे. ३० वर्षांपूर्वी कोकणात फळप्रक्रिया उद्योग चळवळ सुरु होती. कोकणात ५२७ फळप्रक्रिया उद्योग आहेत. मात्र एकूण फळांच्या २% फळे ही प्रक्रिया उद्योग वापरात नाहीत. कोकणात सध्या कृषी कोर्सना चांगले दिवस आहेत. त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. आमच्याकडचा पेढांबे (चिपळूण) साखर कारखाना, ‘बंद कसा पडला?’ हे सांगण्यात आम्हांला मोठेपणा वाटतो हे थांबवायला हवे. आजही इथल्या सरबताची चव बाटली बदलली की बदलते, हे चित्र बदलायला हवे. जवळपास ३ हजार कोटींची अर्थव्यवस्था असलेल्या इथल्या हापूसला जी. आय. मानांकन मिळाले आहे. अजूनही कोकणच्या हापूसचा ब्रँड विकसित होणे बाकी आहे. शासनाने आंबा-काजू करिता ‘आंबा काजू बोर्ड’ स्थापन केले आहे. त्याला निधी मिळायला हवा.

उर्वरित महाराष्ट्रातील योजनांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडत असताना गेल्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणच्या पर्यटनावर शे-पाचशे कोटी रुपये तरी प्रत्यक्षात खर्च झाले असतील का ? प्रश्न आहे. यास्तव स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ / प्राधिकरण ही कोकणवासियांची जुनी मागणी आहे. इथल्या तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या जागा विकून, घरदार गहाण ठेवून पाच-पंचवीस वर्षांत ग्रामीण पर्यटनाचे किमान १० हजार प्रकल्प उभारलेत. त्यांना पर्यटक प्रतिसादही मिळतो आहे. समुद्रकिनारी पर्यटन प्रकल्प सुरु करण्यासाठी परवानगी घ्यायला जर आम्हांला दिल्लीला जावे लागणार असेल तर अवघड आहे. सरकार, प्रशासन नावाच्या यंत्रणेने यात ‘मदत आणि सहकार्य’ स्वरुपात लक्ष घालायला हवं. ‘कोकणात रोजगार नाही’ या मुद्द्यानुरूप ओरड करताना सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या, दीर्घ मुदतीची कर्जे, सबसिडी, भरीव अर्थसाहाय्य का होत नाही ? हे समजण्यापलिकडे आहे. मुंबईत, कोकणातली दहा हजारांहून अधिक गाववार, वाडीवार ग्रामस्थ मंडळे कार्यरत आहेत. या मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटतात, संपर्कात असतात. गावाच्या कार्यक्रमांचा, विकासकामांचा पाठपुरावाही करतात. मुंबईत राहून आपापल्या गावात खूप प्रभावी काम करतात ही मंडळं ! कोकणच्या प्रश्नांबाबत या लोकांनी एकदा मनावर घ्यायला हवं. लोकवर्गणीतून सार्वजनिक कामे पार पाडण्याचा कोकणी सामाजिक संस्कार याचं लोकांनी जपला आहे. एकीकडे कोकणच्या विकासाचा वारू चौफेर दौडविण्याचे प्रयत्न चालू असताना, ह्या विकासाचा आनंद, उपभोग घ्यायला कोकणात घरटी माणूसच शिल्लक राहिलेला नाही. कोकणात केरळपेक्षा अधिक क्षमता आहे. इथे वर्षभरात किमान एक कोटी लोक भेट देत असावेत. एकट्या गणपतीपुळेला वर्षाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या १५ लाख आहे. कोकणात पर्यटनाचे नीट नियोजन केले गेले तर एकाही तरुणाला मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही, इतकी ताकद इथल्या निसर्गात आहे. दुर्दैवाने एकही अद्ययावत पर्यटनस्थळ कोकणात नाही. पर्यटक ज्या समुद्रकिनाऱ्याच्या आशेने येतात तिथे महिलांसाठी टॉयलेट व्यवस्था नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा नि विकासाचे राजकारण मात्र मोठ्या प्रमाणात करत असतात. उर्वरित महाराष्ट्राला सरकार जसे विविध विषयात मदतीचे पॅकेज देते, तसे कोकणाला पर्यटनाच्या बाबतीत हवे आहे. तरुणांनी जागा विकून, घरदार गहाण ठेवून, पर्यटनाचे एकाहून एक देखणे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांना बेकायदेशीर ठरवून नोटिसा देण्याचे काम शासकीय यंत्रणा नियमितपणे करत आहे. कोकणाचं दुर्दैव आहे की हा उद्योग उभारण्यासाठी शासन मदत करत नाही अडचणीत आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात. कोकणात रोजगार निर्माण करण्याची सर्वाधिक क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला मदत करायची नाही हे समजण्यापलीकडे आहे. कोकणातील निवडणुकांमध्ये, विधानसभा, लोकसभेत कोकणाच्या पर्यटनाची विशेष चर्चा होत नाही, न्याय मिळणे दूरचे.

कोकणाचा इतिहास अभ्यासता सध्याचं कोकण किमान १०/१५ हजार वर्ष जुनं असावं ! गुहागर तालुक्यातील पालशेत (पलिपपट्टमय) ९० हजार वर्ष जुनं ठिकाण असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. १७ व्या शतकात कोकणातील खेडी स्वयंपूर्ण होती. तीच आर्थिक विकासाची केंद्र होती. शिरभारे काम चालायचे. शतकभरापूर्वीपासून पोटापाण्यासाठी आम्ही मुंबईत जाऊ लागलो आणि गावातले आळशी बनत गेले, अशी शंका मला येते. कोकणच्या इतिहासात डोकावताना अलिकडचा सन १९५१ सालचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (एकत्रित) जिल्हा गृहोद्योग विकास समितीचा अहवाल वाचनात आला. त्यातले तत्कालिन उल्लेख कोकणच्या आजच्या विकासाच्या विचारसरणीच्या पलिकडे जाऊन मुद्दे मांडत असल्याचे दिसले. अर्थात ते ते सारे तेव्हा कोकणात होते, असाच त्याचा अर्थ आहे. कोकणातली हवा दमट, आळस आणणारी, आरोग्याला पोषक. किनाऱ्यावर सरासरी ८० ते १०५ इंचापर्यंत पाउस, सह्याद्रीत हे प्रमाण १४ किमान इंचांनी अधिक. उपलब्धीच्या मानाने अतिशय कमी क्षेत्र लागवडीखाली आलेले. जमिनीत तांदूळ, नागली, हरिक, वारी, डाळ, तीळ, भुईमुग, वारव, गवत, बाभूळ, नारळ, कारळे तीळ, मिरची, मसाल्याचे सामान, ऊस, औषधे, मादक पदार्थ, फळे, भाज्या, किरकोळ खाद्य पिके यांचा वावर ! डोंगराळ भाग अधिक असल्याने पिकवलेले धान्य कुटुंबाला निम्याहून कमी मुदतीतही न पुरणारे. तेव्हा मत्सोद्योग (हर्णै, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ले, शिरोडे), हातमागावरील विणकाम (म्हाप्रळ, दाभोळ, खेड, कणकवली, कुडाळ, चिपळूण, निवळी, पानवल, पालगड, मठ, खरवते, जांभारी, कट्टा), पॉटरी (म्हाप्रळ, जालगाव, लांजा, झाराप, कलमठ), तांबे-पितळ (हर्णे, चिपळूण, माखजन, रत्नागिरी, राजापूर), रंगाची माती (कुडाळ, सावंतवाडी), सिलिका सँड (कुडाळ, सावंतवाडी, मालवण), जांभा दगड (सर्वत्र), काथ्या उद्योग (वेंगुर्ले, सावंतवाडी, आरोंदा), कात उद्योग (चिपळूण, सावंतवाडी, कुडाळ, मालवण), सुगंधी द्रव्ये, औषधी पदार्थ, ताग (देवगड, सातवली, राजापूर), कातडी कमावणे (दापोली, कणकवली, गोपुरी, लांजा, मालवण, देवरुख, देवगड), मिठागरे (रत्नागिरी, मिठबाव, शिरोडे, कोचरे), बटणे तयार करणे (विजयदुर्ग), लाकडी व लाखेच्या वस्तू (सावंतवाडी) हापूस आंबा (बाणकोट, हर्णे, रत्नागिरी, पावस, पूर्णगड, देवगड, जैतापूर, मालवण, वेंगुर्ला), हरडा (बाणकोट, दाभोळ, जयगड, सैतवडा, मार्गताम्हाने), काजू मालवण, वेंगुर्ला असे दोन-तीन कारखाने, मिठाई (राजापूर, खेड), साबण (मठ), मध काढणे (प्रभानवल्ली, कणकवली, फोंडा, आंबोली), हातकागद (राजापूर), बिबे (मालवण) तेल काढणे ( अडूर, राजापूर, पाट, नारगोळी, पालघर, लांजा), बांबू (कणकवली, वेंगुर्ला, मालवण, मिठबाव) आदि व्यवसाय चालायचे. रेल्वेमार्ग अभाव, आठ महिने बोटप्रवास, मुंबई-गोवा प्रांतिक रस्ता, असमाधानकारक रस्ते, पावसाळ्यात तुटणारे दळणवळण, भांडवलाची उणीव, कच्च्या मालाचा अपुरा व अनियमित पुरवठा, विक्रीतील अडचणी अशा परिस्थितीत कोकणं उभं राहात गेलं. इतकं उभं राहिलं की देशातली ४५ पैकी ६ भारतरत्न याच कोकणाने जगाला दिली. माणसाचं खरं आयुष्य मेल्यानंतर सुरु होतं ! याची कोकणाला पक्की जाणीव असावी. आजच्या कोकणच्या एकाही बांधवाला- भगिनीला नियती उपाशी ठेवणार नाही ! परंतु ! नुसतं पोट भरण्यासाठी कोकणी माणसाचा जन्म नाही ! हे आम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवंय.

कोकणात ६४ नद्यांची खोरी आहेत ! त्यातल्या वैतरणा, तानसा, कुंडलिका, भोगावती, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, मांडवी, अर्जुना, कर्ली, तेरेखोल या कमी लांबीच्या तर डहाणू (खोंडा), नवापुर (उचेली), पालघर (सातपाटी), ठाणे, धरमतर (अंबा) रेवदंडा (कुंडलिका), मुरुड, राजपुरी केळशी (भारजा), बाणकोट (सावित्री), आंजर्ले, दाभोळ (वाशिष्ठी) पालशेत, जयगड (शास्त्री), मिऱ्या (काळबादेवी), भाट्ये (काजळी) पूर्णगड (मुचकुंदी), राजापूर (जैतापूर), वाघोटन, देवगड (अर्जुना), आचरा, कालावली (गड), कोळंब, कर्ली (मालवण) याही मोठ्या नद्या आहेत. देशातील सर्वोत्तम समुद्री किल्ले कोकणात आहेत. घाटमाथा ते कोकण यात किमान २ हजार वर्ष जुने ६४/७० छोटेमोठे घाट आहेत ! इथल्या वाल, सुरण, टाकळा, फणसबी, भारंगी, कुडा फुले, अंबाडी या हंगामी भाज्या आरोग्यदायी आहेत. आयुर्वेदाचा विचार करता अनंतवेल, गुळवेल, मुरुडशेंग, वावडिंग, मध, शिकेकाई, हरडा-बेहडा, बिब्बा, कारवी, निर्गुडी, अडुळसा, शिकेकाई, रानचमेली, सर्पगन्धा, धायटी अशा ३२० प्रकारच्या औषधी वनस्पती कोकणात सापडतात. आजमितीस त्यावर २४ उद्योग उभे आहेत. इथल्या पडीक जमिनीवर इमारती लाकूड, बांबू, वनोत्पादनास वाव आहे. देशातील २७६ पैकी ७० महाराष्ट्रात, तर ३१ सेझ कोकणात प्रस्तावित आहेत. जांभूळ, करवंद, अळू, आटकं, बोकीट हा कोकणमेवा इथली शान आहे. इथल्या तमालपात्र, लवंग, काळीमिरी, तिरफळ, चंदन, वाळा, गवती चहा, वेखंड, पुदिना, दालचिनी, जायफळ यांत क्षमता आहे. इथल्या जैवविविधतेत मेंदी पासून हिना तसेच गुलाब, मोगरा, पारिजातक, केवडा, सुरंगी, बकुळ, गुलछाडी, अनंत यांपासून अत्तर बनतो. दुर्मीळ चौसिंगा, हरण प्रजाती (दापोली), साळिंदर (Porcupine), कोकणात बिबटे, भेकर, नीलगाय, डॉल्फीन, आॅलिव्ह रिडले जातीची सागरी कासवे, शॅमेलिऑन सरडा, सर्वात छोटे पिसूरी हरीण (mouse deer), खवले मांजर (Pangolin) आदि वन्यजीवनाने कोकण समृद्ध आहे. निलगिरी वूड पिजन, पाचू कवडा (हरियाल/ कबुतरासारखा), घुबड (brown wood owl Guhagar), ग्रेट पाईड, मलबार पाईड होर्नबिल, मोठा धनेश (horn bill), गिधाडे, सर्पगरुड, समुद्र गरूड (दापोली), ग्रे हेडेड बुलबुल, ब्राऊन हेडेड बुलबुल, ग्राऊंड ब्रश, टिकेल्स ब्लू फ्लायकेयर, व्हाईट ब्लू फ्लायकेयर, पराडाईज फ्लायकेयर, ओरियंट डॉर्फ किंगफिशर ऊर्फ तिबेटी खंडय़ा, इंडियन पिट्टा (नवरंग), मलबार ट्रॉगॉन’ (मलबारी कर्णा), उडता सोनसर्प दुर्मीळ साप ! भगव्या / रंगीत वटवाघूळ येथे पाहायला मिळतात. मायग्रेटेड स्थलांतरित पक्षी यांचा विचार करता शेकाटय़ा (ब्लँक विंग स्टील्ट) या पक्ष्याशी साधर्म्य साधणारा ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा, सीगलपक्षी (सप्टेंबर) येथे दिसतात. आंबोलीचा जंगलपट्टा, तिलारीचा परिसर, मालवण तालुक्यातील काळसे-धामापूर, कुडाळचे पांग्रड मध्ये दुर्मीळ पक्षी वावरतो.

आमचे बीच आधुनिक व्हायला हवेत. मुरुड (दापोली)च्या बीचला महर्षी कर्वेंचे नाव द्यावे म्हणून सविता गोखले (अमेरिका) यांनी प्रयत्न केले. या नावाची ५ हजार पोस्टकार्ड बनवून त्यांनी वाटली. आम्ही आमचीही मानसिकता बदलायला हवी. मालवणचा त्सुनामी आयलंड, स्कूबा समुद्राच्या पावसातील ३ ते ५ मीटर लाटा, हरिहरेश्वर मधली डोंगर ते समुद्र ही वाट ९ मीटर, दक्षिण कोकणातील सावित्री ते तेरेखोल दरम्यानचा जांभा दगड, गुहा, लहान-मोठ्या पुळणी, वाळूच्या टेकड्या सारे वैभव विलक्षण आहे. कोकणाला रासायनिक उद्योग नको आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया ही घोषणा सुरुवातीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष उद्योगपती रावसाहेब गोगटे यांनी सन १९७८ दरम्यान दिली होती. महाराष्ट्रातली पाहिली एम.आय.डी.सी. ही रोहेला सन १९६२ ला उभी राहिली. त्यानंतर १९७२ ला चिपळूण मग १९८० लोटे ला आली.  आज ९५ % पर्यटन व्यवसाय कोकणातील तरुण करतात. बाकी शासकीय कर्मचारी कोकणाबाहेरचे ! इथला व्यापार गुजराती, मारवाडी यांच्या ताब्यात. बेकरी, रबर, केळी, शेती केरळीयन लोकांकडे, बांधकाम व्यवसाय कामातही तोच प्रकार. मासे व्यापारात उत्तर भारतीय ! आंबा विक्री दलाल बाहेरचे ! जमिनी विकणारे दलाल कोकणातील पण विकत घेणारे कोकणाबाहेरील ! हे सारं आम्ही कोकणी माणसाने आपणहून आपल्यावर लादून घेतले आहे.

प्राचीन मूर्तीशास्त्रात कोकण समृद्ध आहे. गणेश-शतक १६ (पन्हाळेकाझी), अनेक ठिकाणी १०/१२ व्या शतकातील विष्णूमूर्ती कोकणात आढळतात. अडूर (गुहागर), मावळंगे (संगमेश्वर) येथील १२ व्या शतकातील नरसिंह, काळ-काम-परशुराम मूर्ती, श्रीराम (कसबा-संगमेश्वर), बलराम (कोळथरे), कृष्ण (माठेवाडा-सावंतवाडी), केशव (गोळप, दिवेआगर), अनंत-विष्णू (गोळप), ब्रम्हदेव (कोर्ले-कुणकावळे), कार्तिकेय  (६ मुखी-विंध्यवासिनी चिपळूण), अग्नी (खेर्डी-दत्तमंदिर), विश्वकर्मा (वावे-खेड, हातात मोजपट्टी, हातोडा, कमंडलू), शिव (शतक ६ वे) – घारापुरी लेणी, पन्हाळे, कर्णेश्वर, सूर्य : कनकादित्य कशेळी, आदित्यनारायण, सूर्यनारायण, व्याडेश्वर, थिबा राजवाडा येथे आहे. या शिवाय आर्यादुर्गा, भगवती (कोटकामते), कारंजेश्वरी (चिपळूण ८ वे शतक) आहेत. कोकणातल्या काही लेण्यांत बुद्धमूर्ती आहेत. कोकणात दाभोळला सन १५५३ सालातली, महाराष्ट्रातील सर्वोत्तम मशीद दाभोळला आहे. तिच्या पाठोपाठ कल्याणाची काळी मशीद (१६४३), भिवंडी (१७११) याही कोकणातच आहेत. कोकणातील गाऱ्हाणे घालण्याची संस्कृती, कौल घेणे, ग्रामदेवता, नारळी पोर्णिमा, पोवत्याची पुनव, गणपती, शिमगा, रमझान ईद, नवरात्र रुजवण सारं काही विलक्षण आहे. जागतिक डेस्टिनेशन ठरू पाहाणारी अश्मयुगकालीन गुहा (पालशेत-काळोशी), केळशीतील वाळूची टेकडी, कातळशिल्पे हा महत्वाचा ठेवा आहे. प्रवास सुलभ झाल्यावर, रोजगाराचा विचार करता पर्यटन गाईड हा आगामी काळात मोठा विषय ठरणार आहे. अर्थात यासाठी स्थळांची माहिती, सतत अभ्यास, वाचन करण्याची तयारी, संभाषण कौशल्य, भटकंतीची आवड आणि अपार मेहनत करण्याची तयारी, शारीरिक सक्षमता, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबतचा उत्साह आवश्यक आहे. नवनवीन माहिती देणारा गाईड पर्यटकांना आवडतो. आर्थिक विकासासाठी आम्हांला मार्केटिंग यंत्रणा अद्ययावत करावी लागणार आहे. आमच्या सावंतवाडीची खेळणी, पेणचे गणपती याबाबतच्या फारश्या पोस्ट आजही व्हायरल होत नाहीत. कोकणात खूप काही चांगलं कामही सुरु आहे. आजची तरुणीही त्यात स्वतःला झोकून देते आहे. वणव्याला पळवून लावणारा योद्धा महाड तालुक्यातला भिवघरचा किशोर पवार हे यातलेच एक उदाहरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सन २००१ साली लोकसंख्या होती ८ लाख ६८ हजार ८२५.  सन २०११ साली लोकसंख्या होती ८ लाख ४९ हजार ६५१. अर्थात लोकसंख्या कमी झाली. कोकणात सर्वत्र हेच चित्र आहे. एकही मोठा रोजगार देणारा प्रकल्प नसणे, निसर्गसंपन्न कोकणच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष, अपुऱ्या दळणवळण सुविधा, २/३ गावांना मिळून एक तलाठी, पर्यटन विषयात काम करताना येणारे कायदेशीर नियमातील अडथळे, मत्स्योद्योग विकास महामंडळाला निधीची गरज आदि अनेक मुद्धे सांगता येतील. यंदा आमच्या चिपळूणात किमान ९/१० वेळा पूर आला. पावसाचं पाणी भरलं. आम्हांला त्याचं काहीही वाटलं नाही. हाच विकासामधला सर्वात मोठा अडसर आहे. कोकणाला वृक्षतोडीपासून परावृत्त करता यावे यासाठी कॅशक्रॉप वाढविण्याच्या हेतूने गेली ५ वर्षे आम्ही कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने चंदन लागवड अभियान राबविण्याचा प्रयत्न केला. आजही आपल्याकडे जितकी मागणी आहे त्या तुलनेत चंदनाची उपलब्धता कमी आहे. जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. आपल्याला मत्स्योद्योग धोरण ठरविण्याची गरज आहे. अनिर्बंध आणि राक्षसी मच्छीमारीमुळे मत्स्यसाठे नष्ट होण्याचा धोका संभवतो आहे. हे टाळण्यासाठी माशांच्या प्रजनन काळात मच्छीमारीस असलेल्या बंदीचे काटेकोर पालन व्हायला हवे. दोडामार्गच्या जंगलात कुडासे-वानोशी गावात निसर्गप्रेमी तरुण प्रवीण देसाई याने आपल्या राहत्या घरी वानोशी फॉरेस्ट होम स्टे संकल्पना साकारली आहे. १० ते १२ एकर जंगलाच्या मध्यभागी त्याचे घर आहे. आजूबाजूला बागायत, जंगली वृक्षही वनस्पतीही मोठय़ा प्रमाणावर आहेत. या साऱ्याचा खूप सुंदर उपयोग केला आहे. असाच उपयोग कोकणात आणखी अनेकांना शक्य आहे.

कवी विजय चिंदरकर यांनी सन १९५८ च्या मालवण साहित्य संमेलनात...
हा सारा अन थाट हवा, अन हवीत सारी अवतीभवती !
सोलकढीची हवी भैरवी, तृप्तीच्या त्या तानेवरती !
ही कविता सादर केली होती. कवितेने आचार्य अत्रे इतके भारावले की, त्यांनी मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता ‘सोलकढीच्या भैरवीने’ झाली असा आशय पकडून संमेलनावर आपल्या मराठा वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिला होता. तात्पर्य हे की कोकणातल्या प्रत्येक गोष्टीत नजाकत आहे. आजच्या मार्केटिंगच्या दुनियेत त्याचे नीट गणित साधता आले तर सारे प्रश्न संपतील. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करावे ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोकणसाठी स्वतंत्र बजेट, कोकण पर्यटनाचे स्वतंत्र नियोजन, मुंबई सहित कोकणातील पाच जिल्ह्याच्या पर्यटनाला दिशा आणि गती देण्याबाबत सर्वच सरकारे अनुकूल असतात. तरीही काहीही घडत नाही. नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्याची पर्यटन क्षमता खूप आहे. अर्नाळा-कळंब बीच, केळवा-माहीम बीच, डहाणू-बोर्डी आणि जव्हार यातून पालघरची आजची अर्थव्यवस्था साडेतीनशे कोटी इतकी आहे. जिल्ह्यात अशीच अजून ७ पॉकेट तयार होऊ शकतात, असे स्थानिकांचे मत आहे. यात आशापुरा-एडवण, शिरगाव बीच, तारापूर-चिंचणी बीच, नरपड-चिखला बीच, आशेरी-नानिवली, कोकणेरे-तांदुळवाडी, नाणे-सांगे, ग्रामीण पर्यटन ऐनशेत यांचा समावेश होऊ शकतो. असाच विचार कोकणातील इतर पर्यटन जिल्ह्यांचा सहज करता येईल. कोकणात कृषी पर्यटनाला आवश्यक पोषक वातावरण आहे. शहरातील प्रदुषणादि विषयांमुळे गावाकडे चलाम्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायाची जोड देता येऊ शकते. या दोन्हीची सांगड घालीत कृषी पर्यटनकोकणात अनेक गावात रुजले आहे. कृषि पर्यटनाचा उगम ऑस्ट्रेलिया मध्ये ६५ वर्षापूर्वी झाला. आपल्याकडे महाराष्ट्रात कर्जत-रायगड येथे सगुणा बाग नावाने शेखर भडसावळे यांनी पहिल्यांदा याची सुरुवात केली. सन २००१ ते २०१८ दरम्यान देशातील सोळा लाख हेक्टर्सवर असलेले ट्री-कव्हर साफ झाले आहे. अंदाजे पाच गोवा राज्ये झाड रहित झालीत. सन २००० साली आपल्याकडे जेमतेम १२% असलेले वृक्ष-कव्हर आज ८.९% उरले आहे. नवी घरे बांधताना, त्यात ५० अंश तापमानाला सहन करणारी वातानुकूलित यंत्रणा बसवून घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. हे सारे कोकणात पण झालंय ! हे दुर्दैवी आहे. लोटे एम.आय.डी.सी.त केमिकल कंपन्याआणण्यात आल्या, त्याचे परिणाम परिसरातील नागरिक भोगत आहेत. केमिकल जमिनीत झिरपून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. याव्यतिरिक्त असलेल्या कोकणातील किती एम.आय.डी.सी.त लोकांना कायम स्वरूपी नोकऱ्या मिळाल्यात हा अभ्यासाचा विषय आहे. बारामती, पुणे भागात प्रदूषणमुक्त अॅटोमोबाईल कारखाने, आय.टी. हब उभे राहिले. निसर्गरम्य कोकणात असे प्रकल्प आणणे दुर्दैवाने लोकप्रतिनिधींना तेव्हा जमले नाही, आज तर त्याहून जमत नाही आहे. दोष कोणाला द्यायचा ? विशेष कौतुक हे की परदेशात, ज्या कंपन्यांनी पर्यावरणाचे वाटोळे केले असे रसायनी-पाताळगंगा, महाड, खेड-लोटे भागात कारखाने मजेत सुरू आहेत. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करून घेतला आणि त्याला जीवघेण्या प्रदुषणापासून वाचवले. दुर्दैवाने तिथेही भरमसाठ वृक्षतोड सुरु आहे. कोकणात टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, महेंद्रा यांचे प्रदूषण न करणारे कारखाने, अॅटोमोबाईल, आय.टी., फुड प्रोसेसिंग उद्योग यायला हवेत. कोकणच्या भवितव्यासाठी तेच योग्य आहेत.

कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, जैवविविधता, निसर्ग, फळफळावळे, चौपदरीकरण होत असलेला महामार्ग, सागरी महामार्ग, बंदरे आणि जलवाहतुकीला चालना देण्याचा सरकारचा विचार, कोकण रेल्वे कोल्हापूरला जोडण्याचा प्रयत्न, पर्यटन, कृषी, ग्रामीण आणि नाविन्यपूर्ण पर्यटन, आधुनिक शेती, फलोद्यान, फळ व अन्न प्रक्रिया उदयोग, पूरक लघुउदयोग, विरार ते अलिबाग फ्री वे, दीघी फ्रेट कॉरिडोर, चिपी-सिंधुदुर्ग आणि पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांतून कोकणच्या भूमीचे भवितव्य उज्ज्वल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोकणात होत असलेल्या हायवे चौपदरीकरण मार्गावर, काही रेल्वेस्टेशनवर, होऊ घातलेल्या एअरपोर्ट परिसरात कोकणातल्या मातीत पिकणारे, तयार होणारे, खाद्यपदार्थ, वस्तू, खेळणी, आयुर्वेदिक औषधे असे सारे काही एकत्रित मिळू शकेल अशा अस्सल कोकणी मॉलची (डी-मार्टच्या धर्तीवर) साखळी उभी होणे अत्यंत आवश्यक आहे. या एका कल्पनेतून भरमसाठ रोजगार निर्मिती शक्य आहे. अर्थात त्यातही कोकणी माणूस किती असणार ? हा प्रश्न आजही आम्हांस सतावतो आहे. त्याचा आपणहून विचार करून कार्यरत होणारी कोकणी पिढी या भूमीला ‘जगातील सर्वाधिक संपन्न भूमी’ बनवू शकते. कोकणचे भवितव्य कोकणच्याच हातात आहे. गरज आहे, ती ठाम विचाराने कार्यरत होण्याची !

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.          
मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुढारी अलिबाग आणि मासिक शब्ददीप सांगली)



              

प्रभाव बालोपासनेचा !


जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या कर्मबंधनाने बद्ध असतो. कर्तव्यपरायणतेला कर्तव्यबुद्धीची जोड मिळाली की मानवी जीवनाचं सार्थक होतं. नेमकं इथंच ‘गुरु’तत्त्व कार्यरत असतं. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मानवी जगण्याचे, सण, उत्सव आणि परंपरांचे सारे संदर्भ बदलले आहेत. तरीही परंपरांचे महत्त्व कमी होत नसून काळाच्या रेषेवर ते अधिक अधोरेखित होत आहेत. आजच्या (२०२०) ‘गुरुपौर्णिमा’दिनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करताना जीवनातील गुरू प्रभावामुळे मानवी विचारात परिवर्तन प्रक्रिया घडण्याच्या वाटेवरील आठविलेली, 
‘प्रभाव बालोपासनेचा’ ही गोष्ट !

मानवी जीवनावर वयोमानपरत्वे निसर्गशक्तीनुरूप घडणाऱ्या घटनांचा, परिस्थितीचा, वातावरणाचा, संपर्कात येणाऱ्या माणसांचा प्रभाव पडत असतो. साऱ्या प्रभावाच्या मूळाशी एखाद्या घटित घटनेचा अन्वयार्थ दडलेला असतो. तो समजून घेण्यासाठी मनुष्याला स्वत:बाबतचे नीटसे आकलन, स्वतःची ओळख असावी लागते. एकदा का ती ओळख सापडली की मग पुढची दिशा निश्चित करणे सोपे होते. निश्चित झालेल्या दिशांवरून मार्गक्रमण करीत आपल्या जीवनातील निसर्ग नियोजित ध्येयाला गवसणी घालणे अनेकांनी शक्य करून दाखविले आहे. आपणही ते करू शकतो. निसर्गशक्तीच्या साहाय्याने नीट योगक्षेमवहायला स्वतःचा शोध घेता यायला हवा. कठोर परिश्रमांची तयारी हवी. साधना हवी. सतत मनन, चिंतन करून अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मूळाशी जाण्याची तयारी हवी. स्वतःत डोकावत, माझ्यातल्या मला जागं करणारा प्रभावशोधण्यासाठी बालपणात पोहोचलो तेव्हा मला झालेला हा उलगडा !  

माझ्या जन्माच्या दरम्यान वडील, कोयना जलविद्युत प्रकल्पाची कार्यालयीन वसाहत असलेल्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या शाळेत रुजू झाले होते. जवळच्या दापोली तालुक्यातील केळशी या मूळगावाहून, सहा महिने वयाच्या माझा मुक्काम अलोरेत हलला. महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे नगर अशी ओळख मिळविलेल्या अलोरेत बालपण जगलेल्या प्रत्येकाच्या मनात तिथल्या आठवणींचा शब्दशः सुखद ठेवा आहे. तसा तो माझ्याही मनात आहे. प्रभावाच्या मूळाशी जाताना एक आठवण ठळकपणे समोर आली. तेव्हा मी दहा-अकरा वर्षांचा होतो. सन १९९०/९१ साल असावे. बेळगाव निवासी परमपूज्य आई श्रीकलावती देवी कृत बालोपासनाउपक्रम अलोरेत नुकताच सुरु झाला होता. राम कदम (काका) यांनी गावात सुरुवातीला हा उपक्रम आपल्या घरी सुरु केलेला. मात्र जसजशी सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या वाढत गेली तसतशा जागा बदलत गेल्या. मला बालोपासना समजली तेव्हा ती दर रविवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत अलोरे बस स्थानकानजिक मराठी शाळेच्या खोल्यांत व्हायची. बालोपासनेनंतर शिरा, उपमा, पोहे, भडंग, केळी, चिक्की, लाडू (विशेषत रव्याचे) आदि कोणतातरी प्रसाद मिळायचा. बालगोपाळांत उपासनेपेक्षा प्रसादाचीच चर्चा अधिक व्हायची. प्रसादाची चव न चाखताच निव्वळ चर्चांद्वारे ती चव तोंडावर रेंगाळू लागल्याने पुढे कधीतरी एका रविवारी मी बालोपासनेस पोहोचलो. घरातील वातावरण अध्यात्मिक असल्याने जाण्यास विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता. बालोपासनेतलं भारलेलं सकारात्मक वातावरण, सहकार्यभावना, बालोपासना पुस्तिका, त्यातला उपस्थितीचा रकाना, त्यात उपक्रम आयोजकांच्या होणाऱ्या सह्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष प्रसादाचा जीभेवर रेंगाळलेला गोडवा या साऱ्याने मी भारावून गेलो होतो.

सहभागाच्या पहिल्याच रविवारी तासाभराच्या त्या वेळेत ‘...ज्ञानभास्करा शांतीसागरा, भक्तमनोहर मुकुण्दा, परमौदारा भवभय्हारा, रखुमाईवरा सुखकंदा ! पाप ताप दुरीतादी हराया, तुची समर्थ यदुराया, म्हणोनी तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया !म्हणून झाल्यावर ओवाळू आरती माता कलावती । पाहता तुझी मूर्ति मनकामनापुर्ती ।धृ.।अशी आरती झाली. इकडे माझ्या मनात मात्र, ‘आज खाऊ काय असेल ?’ याचा विचार सुरु होता. बालोपासना प्रार्थना संपली. त्या वयात घरातही सर्वाधिक आवडणारा शिऱ्याचा प्रसाद मिळाला. घरातलं बारमाही अध्यात्मिक वातावरण, पावित्र्यं आई सांभाळायची. श्रावणात, वडील ग्रंथवाचन करायचे. आम्ही भावंडे ऐकायला बसत असू ! नाही बसलो तरीही कोयना प्रकल्पातल्या त्या जीवनटाईप छोट्याश्या चाळीतील कोपऱ्यावरच्या घरात कुठल्याही खोलीतून ग्रंथ वाचनाचा आवाज कानावर यायचाच ! मनातल्या मनात असलेला तो अध्यात्मिक संदर्भ बालोपासेनेशी लिंक झाला. बालोपासनेची मला गोडी लागली. इतकी की एकही रविवार चुकवायची इच्छा नसायची. का ! कुणास ठाऊक ? मनापासून तिथे जावेसे वाटायचे. प्रसादाची गोडी हेही एक कारण होतेच ! आई-वडीलांनी सांगितलंय म्हणून अंगळ-टंगळ करीत, पुढे मागे हालत, मधले मधले शब्द सहज गाळत, जेव्हढ्या लवकर संपेल तेवढी बरी असं म्हणतही काहींची बालोपासना तेव्हा सुरु असायची. बाळगोपाळांस सूचनापासून सुरूवात होऊन शेवटी गोपाळकृष्ण महाराज की जयम्हटलं की आजूबाजूचे काहीजण पूर्ण श्वास घ्यायचे ! संपली एकदाची ! ते वयही तसचं होतं म्हणा ! या बालोपासनेला स्थानिक दीड / दोनशे मुलं जमायची. नवीन वर्ष सुरु झालं की गावच्या करमणूक केंद्रात कधीतरी वार्षिक सप्ताह भरायचा. सप्ताहात गुळाच्या पाकात एकत्र केलेल्या पोह्याचा प्रसाद दिला जायचा. तो तर मला जाम आवडायचा. एकूणात काय तर मज्जाचमज्जा असायची. पुढे ही बालोपासना गावात २००४ पर्यंत चालू राहिली. असो ! माझे बालोपासनेसोबतचे सुखद जगणे सुरु होते. कधीकधी ती सारी पुस्तिका वाचायचा मलाही कंटाळा यायचा. मग पुन्हा प्रसादाची आठवण व्हायची. दरम्यान, मनातल्या मनात गडबडलेला सूर जुळवून मी बालोपासना म्हणण्यात दंग व्हायचो.

सन १९९२ / ९३ साल असेल. पावसाळा सरत आला होता. लहानपणी वडिलांनी, मूळगावी केव्हातरी असलेल्या कटलरीदुकानाच्या धर्तीवर अलोरेत दुकान सुरु केलं होतं. आई ते सांभाळायची. कालांतराने ते बंद करावं लागलं. पंचक्रोशीतल्या वार्षिक यात्रोत्सवात आम्ही दुकान सुरु केलं. स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिकची गुंतवणूक करून वडील मुंबईतून यात्रांकरिता आकर्षक खेळणी साहित्य आणायचे. साऱ्या यात्रांतून खेळण्याच्या दुकानातून होणाऱ्या विक्रीतून त्यावर्षी केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्क्याहून अधिक किमान व्यवसाय झाल्याचे मला आठवत नाही. नफा तर दूरच राहिला. दुकानातल्या वस्तू मात्र यात्रेत भाव खाऊन जायच्या. त्या वस्तू बघायला म्हणून अनेकजण हमखास यायचे. तर या यात्रांतून शिल्लक राहणारा बराचसा माल वर्षभर घरी पडून असायचा. तो घेऊन गावच्या स्थानिक आठवडा बाजारात दुकान थाटण्याची कल्पना आमच्याकडे अधून-मधून येणाऱ्या सर्वात मोठ्या मावशीने मनावर घेतली. नुसती घेतली नाही तर तिने काही काळ स्वतः ते दुकान चालवलेही ! वडिलांना संसारात मदत या कारणांन्वये मग आईनेही, मावशीने सुरु केलेले आठवडा बाजारातील दुकान पुढे चालविण्याचा निर्णय घेतला. आईची तब्बेत तशी अधूनमधून यथातथा असायची. त्यामुळे ती आठवडा बाजारात, भर उन्हात दुकान घालून बसणार तर तिला डोक्यावर छप्पर घालून देणे आवश्यक बनले. बाबांनी वेल्डिंग वाल्याकडून कल्पकतेने लोखंडी सळ्यांचा मांडव तयार करून आणला. त्यासाठी जमिनीत पुराव्या लागणाऱ्या जाड लोखंडी सळ्या, त्या जाड सळ्यांना पकडून उभे करायच्या काहीश्या बारीक जाडीच्या सळ्या, त्या सळ्यांच्या टोकाला त्याचं आकाराचा कापलेला नट जोडला. चार दिशेला उभ्या राहणाऱ्या चार सळ्यांवर त्याच जाडीच्या आडव्या चार सळ्या टाकल्या आणि त्या आधाराने चादरी / बेडशीट बांधल्या की मांडव तयार व्हायचा. या आडव्या सळ्यांनाही वडिलांनी योग्य आकाराचा बोल्ट जोडून घेतला होता. तर असा हा मांडव बांधण्याचे प्रात्यक्षिक पाहाणे, लहान असलो तरीही घरात मोठा असल्याने माझ्या नशीबी आले. इतके सारे सुरु असताना निरागस अवस्थेत असलेल्या मला पुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव झालेली नव्हती. गावातल्या या आठवडा बाजाराचा दिवस असायचा नेमका रविवारचा ! झालं, मांडव घालायचा दिवस जवळ आला. आई साधारणत साडेआठच्या सुमारास बाजारात येणार असायची. अर्थात मला किमान पावणेआठ वाजता बाजारात येऊन प्रात्यक्षिकात दाखविलेला मांडव जमिनीवर घालणे क्रमप्राप्त असल्याचे लक्षात येताच माझ्या पायाखालची जमीनच हलली. पहिला विचार मनात आला तो अर्थात बालोपासनेचा होता. म्हणून सुरुवातीला मी घरी विरोध करून पहिला. पण घरात, वडीलांसमोर विरोध करायची कुणाचीच हिंमत नव्हती. मग मी लवकर मांडव घालून बालोपासनेला पळता येईल का ? असा विचार करून पहिला. मात्र जागा अडवून दुकानाचा मांडव घातल्यावर तिथे आई पोहोचल्यावरच माझी सुटका होणार आहे हे लक्षात आले. साऱ्या बाजूने माझी पुरती कोंडी झाली. फारसं कळत नव्हतं. नाहीतर कदाचित साक्षात कलावती आईलाच साकडं घातलं असतं. रविवारचा दिवस उजडला. घरातून सकाळी नेहमीप्रमाणे आवरून बाहेर पडलो. पण आज माझ्या हातात बालोपासनेचं पुस्तक नव्हतं. मी मांडव घालायला निघालो होतो. हातात मांडवाचं साहित्य होतं. बाजारातल्या ठरलेल्या जागेवर पोहोचलो. मन खट्टू झालेलं होतं. हे सारं कमी की काय ? मांडव घालायच्या जागेवरून मला बालोपासनेचं ठिकाण अस्पष्ट दिसू लागलं. जागेचा अंदाज घेऊन लोखंडी सळी हाताने उभी धरली आणि त्यावर घण घालायला सुरुवात केली. लोखंडी सळी जसजशी जमिनीत जात होती तसतशी मनातली हुरहूर दबली जाऊ लागली. घणाच्या साहाय्याने मातीत चार दिशेला रोवलेल्या चार लोखंडी सळ्यांना स्वतंत्र पकडून उभी करायची सळी सुतळीने एकीला बांधायला सुरुवात करणार इतक्यात, ‘बाळगोपाळांना सूचनाहे शब्द कानावर पडले. आवाजाच्या दिशेने कान टवकारले. इकडे तिकडे पहिले. त्या दीड-दोनशे मुलांचा, बालोपासनेचा अगदी हलका आवाज कानावर येऊ लागला. डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. मी भर बाजारात मांडव घालत होतो. या मांडवाखाली बसून आई दिवसभर दुकान चालविणार होती. त्यातून कुटुंबाला मदत होणार होती. उमजलेल्या या शहाणपणानं सारं दु:ख गिळलं ! मला झालेलं दु:ख कदाचित आईने जाणलं असावं. तिच्या जाणण्यात प्रसादअधिक राहिला. अर्थात बालोपासनेतून घरी आल्यावर मीही प्रसादाचीच आरती ओवाळायचो ! दिवसभराचा बाजार आटोपून सायंकाळी घरी आल्यावर आईने मांडव घातल्याच्या बदल्यात माझ्या हातावर पाच रुपयांचे नाणे ठेवले. मला माझा पहिला पॉकेटमनी मिळाला. त्या पॉकेटमनीतून, ती प्रसादाची चव चाखता आली नसली तरी मनासारखं खाण्याची हौस भागू लागली. पण माझी बालोपासना सुटली ती कायमचीच !

सुजन, हो ! खरंतर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्यावरील प्रभावाचे रहस्य हे परिणामकारक सहकारात आहे. मनुष्य कितीही स्वार्थी असला तरी दिखाव्यापुरते का होईना दुसऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे. आपली पण काही ना काही सामाजिक जबाबदारी आहे ही भावना त्याच्या मनात बळ धरून असते. त्यामागेही कार्यरत असतो तो प्रभाव ! जीवनात मिळणारे व्यवहारज्ञान, मानवाला एखाद्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे शिकवत असते. एकीकडे हे घडत असताना जीवनाचे आद्यकर्तव्य समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव समजून घेता यायला हवा. आज मी ज्या स्वरूपात समाजात वावरतो, त्यामागचा नक्की अर्थ काय ? कोणत्या कारणासाठी मी आहे ? हा प्रश्न मानवाला पडला की त्यातून आपल्यावरील प्रभावाची निश्चिती होऊ शकते. तो योग्य की अयोग्य ? हेही ठरविता येते. स्वतःच्या जीवनाचे सूक्ष्म अवलोकन करायला लागलो ही पुस्तकी शिक्षण / ज्ञान यांची सत्यता कळते. कदाचित यासाठीच लहानपणी आपल्या संस्कृतीत संस्कार देण्याची उपाययोजना केली गेली असावी. मात्र दुर्दैवाने आज जे संस्कार ४ ते १२ वर्षे वयोगटात व्हायला हवेत ते वयाच्या ६०-६५ वर्षानंतर सुरु होतील की काय ? अशी वर्तमान पिढीची स्थिती आहे. हे बदलण्याचे काम प्रभावकरू शकतो. जो आमच्या पिढीने अनुभवला. प्रभावातून विचार जन्माला येत असतात. हेच विचार आपल्याला सुखाच्या शोधार्थ आयुष्य वाया न घालविता सुखासाठी सद्गुणांची कास धरायला सुचवू शकतात. सध्या तंत्रज्ञानांच्या / सोशल मिडीयाच्या वर्तमान आविष्कारांमध्ये उपलब्ध होणाऱ्या माहितीचा प्रभाव सर्वांना संमोहित करतो आहे. अनेकदा हा प्रभाव झटकून वास्तवाकडे पाहाण्याची गरज असते. पण ते समजणार कसं ? हाही प्रश्न आहे. यासाठी अध्यात्मासारख्या गोष्टींचा आधार घेता येईल. अध्यात्म ही एक प्रचंड आंतरिक क्रिया आहे. सृजनशील माणसं सर्जनशीलतेच्या जोरावर प्रभावी बनतात. त्यात अध्यात्म असतं. सकारात्मकता असते. विषयाशी तादात्म्य पावण्याची अद्भुत क्षमता असते. सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आसपासच्या सार्वजनिक जागरुकतेचे मुख्य अंग बनविण्यात सहकार्य करतो. त्याचा फायदा आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासात नक्की होतो. हे सारं घडावं यासाठी दुसऱ्यांपेक्षा स्वतःकडे डोळस नजरेने पाहायला शिकायला हवं. याद्वारे आपल्या जीवनाला स्पर्शणाऱ्या सकारात्मक प्रभावांची उकल होण्यास मदत होते. जीवनाकडे मागे वळून पाहाताना मला तरी हेच जाणवते.

लग्नानंतर काही वर्षांनी सासू-सासऱ्यांच्या आग्रहाने, पत्नी-मुलासोबत स्वतंत्र वाहनाने दक्षिण भारत भ्रमंतीचा योग आला. मार्गावर पहिले शहर लागले, बेळगाव ! फिरायलाच बाहेर पडलेला असल्याने आवर्जून परमपूज्य आई श्रीकलावती देवी यांच्या मंदिरात गेलो. आईंच दर्शन घेतलं. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी मनावर कोरला गेलेला, पक्कं घर करून राहिलेला तो संस्कारक्षम प्रभावआठवला. डोळ्यांच्या पापण्या पुन्हा ओलावल्या. चेहऱ्यावर उदासी दाटून आली. त्या उदासीचा अर्थ कळणारं कोणीही सोबत नव्हतं. बालोपासना सुटल्यानंतर त्या वातावरणाशी नंतर कधीही, कुठूनही माझा संपर्क झाला नाही. समोर आलेल्या कामाला शक्यतो नाही म्हणायचं नाही’, हे बालोपासना सुटताना सोबत आलेले तत्वकायम जपत आलो. बालवयात जे घडलं त्या प्रभावाने माझ्या अंत:करणात कामातील सकारात्मकतेचा दिवा पेटविला गेला. हा पेटलेला दिवा त्यानंतरच्या अठ्ठावीस-तीस वर्षांच्या कालखंडात दिवसागणिक अधिकाधिक प्रज्ज्वलित होत राहिला. आतून जाणविलेल्या, अचानक भेटलेल्या, संपर्कात आलेल्या विविधांगी निसर्ग शक्तींसमोर मी कायम नतमस्तक होत राहिलो. जिथे जिथे पावित्र्य, सन्मार्ग, सत्कृत्य, समाजकार्य त्या त्या ठिकाणी माझी पाऊलं आपोआप वळत गेली, आजही वळतात. मला हे वळण लावत, आयुष्य मार्गी लावणाऱ्या प्रभावशाली संस्काराचं मूळ त्यासुटलेल्या बालोपासनेत असावं !     


धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

हा मूळ लेख पाक्षिक चिंतन आदेश पुणे यांच्या 
सन २०१९ च्या 'प्रभाव' विषयावरील दिवाळी अंकासाठी 
लिहिलेला होता. कोरोना काळात नव्याने प्रसिद्ध केला आहे.
धन्यवाद !!!

दैनिक जनमाध्यम अमरावती, ५ जुलै २०२०

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी, ४ जुलै २०२० (पूर्वार्ध)

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी, ६ जुलै २०२० (उत्तरार्ध)


मराठी/ हिंदी साप्ताहिक पुरोगामी संदेश (चिमूर-चंद्रपूर), ३ जुलै २०२०
साप्ताहिक लोकनिर्माण  ४ जुलै २०२० 




                

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...