बुधवार, १८ मार्च, २०२०

दोडामार्गच्या वनवैभवात..!

दोडामार्ग ! महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा अखेरचा ६२ गावांचा तालुका. कोकणातील जवळपास जैवविविधता एकहाती सांभाळणारा. गवारेडे, टस्कर हत्तींच्या प्रभावाखाली असलेला. मराठीसह कोकणी आणि मालवणी बोलणारा. एका सीमेला कर्नाटक, पश्चिमेला गोवा राज्याशी जोडलेला. बिचोली (गोवा) तालुक्याशी सतत तुलना होणारा. सन १९९९ ला निर्मिती होऊनही आजतागायत महाराष्ट्र सरकारकडून आरोग्य, रोजगार, उद्योग व्यवसाय, पर्यटन सुविधांत सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेने अलीकडच्या काळात संपूर्ण तालुका गोव्यात विलीन करावाअशी चळवळ उभी झालेला. होऊ घातलेल्या मोपेआंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळचा. कदाचित मायनिंगसाठी गोव्यातल्या उद्योजकांचे बारीक लक्ष असलेला तालुका. यातल्या वनवैभवाशी जवळीकता असल्यानं दोडामार्गात रममाण होण्याची संधी शोधत होतो, मागच्या फेब्रुवारी महिन्यात (२०२०) ती मिळाली. मग काय ? दोडामार्गच्या वनवैभवात मनसोक्त भटकलो. निसर्ग अनुभवाच्या अनेक गोष्टी पोतडीत भरूनच बाहेर आलो..! आजच्या जागतिक वनदिनी त्यातल्या काहींचा उलगडा..!

२८ फेब्रुवारीला दोडामार्गात पोहोचलो तेव्हा सायंकाळचे ६ वाजलेले. सूर्य मावळतीला आलेला. अजून अंधार व्हायचा होता. साध्याश्या लॉजमध्ये टी.व्ही. की गरम पाणी असा विचित्र पर्याय विचारल्यावर गरम पाणी स्वीकारलं. मुक्कामाची इथली पहिलीच वेळ. मित्र यायला अजून अवधी होता. लॉज बुक करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावरची हॉटेल्स ८ नंतर बंद होणारी. नाही म्हणायला चायनीजयुक्त हॉटेल किमान ११ पर्यंत सुरु असणारे. मग जवळच्या खाणावळीचा शोध घेतला. दीडेक तासांनी मित्र पोहोचला. डोक्यातील नेहमीची कामे बाजूला केली. आता हाताशी असलेला क्षण अन क्षण महत्त्वाचा. पुढच्या ४० तासांचं नियोजन केलं, लॉजवर गेलो. खोली उघडली नि आत झोप कमी नि झुरळंच जास्त भेटणार याची जाणीव झाली. याबाबत लॉजच्या मॅनेजरला बोललो तर, ‘काय म्हणता ? मी तर रोज झोपतो या खोलीत ? आम्हाला एकही नाही दिसतं ?’ असं म्हणाला तो ! शेवटी काही झुरळंं त्याला दाखवून, आवरून जेवायला बाहेर पडलो. तसंही जंगल फिरायचं असल्यानं फारसा झोपण्याचा प्रश्न नव्हता. एका साध्या खाणावळीत हलका आहार घेतला. शहरातून आता अशा घरगुती खाणावळी कमी होत चालल्यात.

रात्रीचे साडेनऊ वाजलेले. सर्वत्र मस्त अंधार पसरलेला. दिवसा दिसणारे जंगल रात्री अक्षरशः भयाण वाटते. त्यात रात्र आमावस्येच्या जवळची असेल तर अधिकच. जवळच्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर धुंडाळण्याचं ठरवलेलं. रात्री १० वाजता नाईट ट्रेलला सुरुवात केली. दोडामार्ग बेळगाव मार्गावरील हे जवळचं उत्तम संरक्षित जंगल. सांबर, गवे, खवलेमांजर, बिबट्या, साळींदर, रानडुक्कर, काळमांजर दिसण्याची शक्यता. बॅटरीच्या उजेडात चालायला सुरुवात केली नि रातकिड्यांचा आवाज कानात शिरला. काहीतरी दिसावं म्हणून बॅटरी झाडाचे शेंडे धुंडाळू लागली. निशाचर कुत्र्यांचे भुंकणे सुरु झालेले. वाटेवरती एका सुकलेल्या पानावर बसलेल्या ‘कॉमन ट्री फ्रॉग’ने दर्शन दिले. तिलारी नदीपात्राच्या खळाळत्या आवाजाच्या दिशेने सरसावलो तेव्हा वॉचटॉवर आणि बसण्याची व्यवस्था दिसली. बॅटरीच्या उजेडात नदीचे दोनही तीर चाचपण्याचा प्रयत्न केला. या परिसराला भेट द्यायला येणाऱ्यांसाठी शासनाने २ ठिकाणी वॉच टॉवर आणि बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यातल्या जंगलात जाताना लागणाऱ्या पहिल्याच ठिकाणाजवळ एका आंब्याच्या झाडाच्या खोडावर रात्रींचर असलेला बिनविषारी ‘कॉमन वोल्फ स्नेक’ (कवड्या) दिसला. दिसला तेव्हा तो जमिनीपासून ७/८ फुट उंचीवर पोहोचलेला. कदाचित कुठलाश्या भक्ष्याच्या शोधात वर चढला असावा. त्याला चांगली ग्रीप भेटलेली. मूळ तपकिरी मात्र क्वचित काळ्या रंगाचा दिसणारा कवड्या आम्ही पाहिला. बराचवेळ त्याच्याजवळ घालवला पण हा काही जागचा हालला नाही. मग शेवटी आम्हीच हाललो. बऱ्याच दिवसांनी, बॅटरीच्या प्रकाशात समोर काय चमकेल याचा नेम नसताना काळोख्या अंधारात केलेली रात्रीची पायपीट अविस्मरणीय होती. किर्रर्र अंधारात जंगलवाटा तुडवण्यात वेगळी मजा असते. घुबड आणि नाईटजार सारखे निशाचर शोधण्यासाठी भरपूर अट्टाहास केला. रात्रीच्या अंधारात दोनेक तास इथे घालवले. रात्रीचं हे जंगल वेगळचं भासलं. महाराष्ट्र शासनाने सन १९७९-८० साली येथे हे संशोधन केंद्र स्थापन केलेले. इथला उन्नेयी बंधारा हा तिलारी प्रकल्पांतर्गत येणारा. दोनही प्रकल्पांत गोवा सरकारचा सहभाग. पर्यटनस्थळ म्हणून पहिले जात असले तरी उत्तम ‘पक्षी अभयारण्य’ होण्याची क्षमता या ठिकाणात असल्याची जाणीव झालेली. सकाळी पहिलं इथचं यायचं ठरलं. झुरळवाल्या लॉजवर परतलो तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेलेले. जाताना विनंतीवजा बोललो असलो तरीही कोणी दरवाजा उघडेना. या लॉजवर आल्यापासून कोकणात पर्यटन वाढीसाठी काय काय करायला हवंय ? याचे जणू धडेच मी मनातल्यामनात गिरवित होतो. इतक्यात दार उघडलं गेलं. सुटकेचा निश्वास टाकला. सव्वाएक वाजता उद्याचा विचार करत अंथरुणावर पडलो.

झोपेतून जागा झालो तो पहाटे (२९ फेब्रुवारी) पाचच्या गजराने. पटापट आवरलं. साडेसहाला लॉज सोडला. कालच्याच ठिकाणी जायला निघालो. दोडामार्ग चौकात पिंपळपाराजवळ चहा घ्यायला थांबलो. पिंपळावर दोनेकशे बगळ्यांची वसाहत बसलेली. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची जाणीव रस्त्यावरील नक्षीकाम पाहून आलेली. त्यांच्या खाली म्हणूनचं कोणी दुकानं घालत नसावं. मी सावरलो. वैभव उपहारगृहाच्या दिशेने निघालेलो. तर त्या बगळ्यांनी नको-नको म्हणताना मलाही खांद्यावर थोडासा प्रसाद दिलाचं ! चहा घेताना गळ्यातले कॅमेरे पाहून मालकाने जवळच्या कसईनाथ डोंगरावर जायला सुचवलं. सकाळी ७ वाजता दोडामार्ग सोडलं. बेळगाव रस्त्याला आता कसईनाथाचा डोंगर उजवीकडे दिसत होता. रस्त्यात तिलारी धरणाचा कालवा आडवा आला. आकाशातून मलबार पाईड हॉर्नबिल उडत गेला. भेडशीच्या बाजारपेठेत असलेलं घोटींगचं मोठं झाड पाहिलं. अशा मोठाल्या झाडांच्या ढोलीत धनेशसारख्या पक्ष्यांचे वास्तव्य असते. पूर्वी २०१५ साली झाडावरच्या मधमाश्यांनी बांधलेल्या पोळ्यावर त्याच झाडाची फांदी पडल्याने चवताळलेल्या मधमाश्यांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवून लोकांना जखमी केलं होतं. तेरवण-मेढे बंधाऱ्याच्या दिशेने उजवीकडे वळलो तेव्हा डावीकडे छोटंसं श्रीपाताडेश्वरांच देवस्थान दिसलं. ही देवराई असल्याचं लक्षात आलं. कालच्या रात्रीच्या अंधारात हे छोटंसं मंदिर दिसलं नव्हतं. सकाळी ते पत्र्याची शेड असलेलं मंदिर, तिथला भगवा झेंडा, तुळशीवृंदावन नीटसं पाहिलं. सोबतचे दोघे मित्र वन्यजीव अभ्यासक असल्याने त्यांच्यात मी तसा अनाडीचं ! शक्यतो आपल्यापेक्षा विद्वानांच्यात वावरलं की थोडाफार आपल्यालाही कळतं तशातलं आमचं अरण्यवाचनं ! वेड्यासारखा मी पहिला कुठं गेलो असेन तर तो कालचा ७/८ फुट उंचीवरील कवड्या बघायला. अर्थात सकाळी तो तिथे थोडाच असणार होता. तो नव्हताच. आता उजाडलेलं. कोवळं उनही अजून पडायला नव्हतं. निसर्ग नुकताच खुलू लागलेला. जंगल जागं झालेलं. पक्षांची किलबिल आनंद देत होती. तिलारी नदीच्या वाहत्या पात्राचा आताचा आवाज मनात निर्झराचा नाद गुणगुणवत लागला. एका ठिकाणी गाडी उभी केली नि वाट तुडवायला सुरुवात केली. बऱ्यापैकी दाट जंगल. झाडांच्या फांद्या एकात एक गुंतलेल्या. सूर्यप्रकाश किंचित जमिनीवर पडू लागलेला. इतक्यात एका झाडाच्या शेंड्यावर हालचालीची चाहूल लागली. जागेवरच थांबलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एका झाडाच्या टॉपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू (उडती खार; Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) दिसलं. पण...! नजरेची पापणी लवायच्या आत या फांदीवरुन त्या फांदीवर टुणकन उड्या मारत गेलं सुद्धा. माणसाची साधी चाहूलही लक्षात यावी इतकं शेकरू संवेदनशील. जागेवर शांत उभा राहून कानोसा घेतला. तेव्हा अर्धा डझन शेकरू इथेच भेटले. वेळ सकाळची असल्याने आम्हाला फोटोजनिक पोझ देण्यापेक्षा त्यांना आपल्या पोटापाण्याची चिंता अधिक सतावत असावी. त्यात त्यांच्या मागून पुढून फिरणारे आम्ही ! बऱ्याच वेळानंतर त्यातलं एक शेकरू कुठल्याश्या रानबिब्याच्या पानाचा मागचा कोवळा देठ खाताना दृष्टीस पडलं. एव्हाना आमच्या पाठलागाला तेही सरावलं असावं. जागचं अजिबात हलेनाचं. जमेल तेवढे फोटो टिपले. मित्रानी स्टँड लावून छानसा व्हिडीओ बनवला. शेकरुंच्या सान्निध्यात तासभर कसा गेला ते कळलंच नाही. इथल्या झाडांवर उंच ठिकाणी, बारीक फांदीवर झाडाच्या काटक्या, मऊ पानं यांचा उपयोग करून सहसा अवजड परभक्षी पोचू शकत नाही अशा ठिकाणी शेकरुने बांधलेली घुमटाकार आकाराची घरटी पाहिली. सकाळी आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी शेकरू सक्रीय असतं हे अनुभवायला मिळालं. मधल्याकाळात ते आराम करतं म्हणे. पूर्वी आपल्या राज्यात भीमाशंकर आणि फणसाड अभयारण्यात शेकरूंचा आढळ असायचा. नंतर डोंगररांगा, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबासह पश्चिमघाटात, विदर्भातील जंगलात दर्शन घडू लागलं. त्यांचं आजचं दर्शन आमच्यासाठी सर्वोत्तम. शेकरूंनी नाष्ट्याला काय खाल्लं असावं ? म्हणून विचार करताना झाडाचं वरून लालसर आवरण असलेलं फळ रस्त्यावर पडलेलं दिसलं. ताजं होतं. फळाला नीटसं फोडून आतला गर फस्त करून झालेला. तो नक्की शेकरुनेच केला असेल का ? शेकरुही नंतर खूपसा माणसाळल्याने हा प्रश्न मनात तसाच राहिला.  

पुढच्या तिथल्याच किमान दोन तासाच्या भटकंतीत एरव्ही चुकून दिसला तर नशीब असं म्हणायला लावणारे असंख्य पक्षी पाहायला मिळाले. त्यात यलो ब्रोड बुलबुल, व्हाईट रम्प्ड शामा, टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, डार्क फ्रंटेड वारब्लर, ग्रेट होर्नबिल, लेसर फ्लेम ब्लॅक, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर होते. सुतारपक्षाची ठोकाठोकी विलक्षण आणि गूढ वाटली. रॅकेट टेल्ड ड्रॉन्गो आणि कॉमन ड्रॉन्गो एकमेकांना भेटले. आम्हांला क्लिक करायला मिळाले. स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर) हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. १५ वर्षांपूर्वी शिरवलीच्या जंगलात पहिल्यांदा पाहिलेला, तेव्हा कॅमेरा नव्हता. रूपेरी पांढरा रंग, चकाकणारे काळे डोळे, काळ्या रंगाचा तुरा, लांबलचक फितीसारखी पिसं असलेली शेपटी. सुंदर तर आहेच, पण तो हवेतल्या हवेत उडणारे कीटक फस्त करतो म्हणून फ्लायकॅचर! उडताना वेगाने गिरक्या घेतो. त्याचे हे उडणे एखाद्या नृत्यासारखे वाटते म्हणून तो स्वर्गीय नर्तक’! त्याला भरभरून पाहिलं, कसंतरी क्लिक केलं. कोणत्याही जंगलातून पायी फिरण्याचा अनुभव अनुपम असतो. तो अनुभव जगण्याचा कार्यक्रम सुरु असताना तिलारी नदीपलिकडच्या भागात ‘चेनसॉ’ने झाडं तोडल्याचा कर्णकर्कश आवाज आला. मित्र म्हणाला, ‘पलिकडे खाजगी जंगल आहे ते तोडताहेत !’ ‘चेनसॉ’च्या आवाजाने तोंड पडलेल्या अवस्थेत पुढे चालत असताना एका झाडावरून किंचित मोठासा पक्षी उडालेला दिसला. उडताना पाहिल्यावर कळलं की तो ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ होता. धनेश पक्ष्याच्या (hornbill) प्रजाती खूप आहेत. सह्याद्रीत मोठा अबलक धनेश (Great Hornbill), मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill), मलबारी राखी धनेश (Malabar grey hornbill), राखी धनेश (Indian grey Hornbill) हे चार प्रकार आढळतात. हा त्यापैकीच एक, मी पहिल्यांदा पाहिला. पण फोटो न मिळाल्याने, त्यातूनही नीटसा पाहाता न आल्याने मनाला चटका लागून राहिलेला. मोठाली शेवर पाहिली. बांबूचं जाळलेलं बेट भेटलं. एका पांथस्थाला विचारलं तर म्हणाला, ‘रस्त्यात आडवं येत होतं म्हणून जाळलंनी.’ उन्नेयी बंधाऱ्याच्या दिशेने जाताना रेड स्पर हेन, सर्पंट ईगल, बार्बेट दिसला. बंधाऱ्यावर पोहोचलो, पलिकडे जायला निघालो. एकावेळी अनेक विषय डोक्यात घेऊन चालण्याचा जसा फायदा होतो तसा कधीकधी तोटाही होतो. इथे तोटा झाला. धरणाचे पाणलोट क्षेत्र टिपण्यासाठी कॅमेऱ्याची लेन्स बदलली तेवढ्यात प्रौढ आकारमान असलेला मलबार पाईड हॉर्नबिल मोकळ्या आकाशातून इकडून तिकडे जाताना दिसला. लेन्स चेंज करेपर्यंत तो झाडीत विसावला होता. त्याला आकाशातून उडताना इतक्या जवळून पाहाणे संस्मरणीय होते. मगाचचा ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ बाबतचा मनाला लागलेला चटका पाऊण तासांनी दूर झाला जेव्हा एका अनामिक वळणावर अचानक ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ सामोरा आला नि क्लिक करायला मिळाला. या निमित्ताने एकाच ठिकाणी रात्री आणि दिवसा जंगल निरीक्षणाचा सलग अनुभव मिळाला. चहा-बिस्कीट पोटात ढकलून बाहेर पडलेल्याला आता ४ तास होत आलेले. पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पोटपूजा मस्ट होती. जवळच्या कोनाळकट्टा मुख्य वसाहतीतील एका ‘आँटी’च्या हॉटेलात आलो, चांगला डोसा मिळतो म्हणून. पण पीठ संपलेलं. इडली सांबारावर ताव मारला. मन प्रसन्न असलं की चव समजत नाही, सगळंच छान लागतं. तसं झालं.

पुढचा जंगल थांबा देवराईत होता. तेरवण-मेढे गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आवारात ‘नागकेशर’चं (नागचाफा/सुरंगी/ Mesua ferrea) झाड पाहिलं. भारतात पश्चिम किनारपट्टीत आढळणारं सुरंगी दुर्मीळ तितकंच औषधी आहे. देवराईत शिरतानाच असंख्य विशाल वृक्ष दिसले. मंदिराचा जीर्णोद्धार नियोजित असल्याने अजून किती दिवस ते या स्वार्थी विश्वाची सोबत करतील देव जाणे. त्यांच्याकडे मनसोक्त पाहिलं. कुशीत जाऊन स्वतःचेच फोटोही काढून घेतले. फोटोंकडे पाहिल्यावर कालपरवा जन्मलेल्या मला तो विशाल वृक्ष आपल्या जुन्या-जाणतेपणाची जणू जाणीवच करून देत असल्याचा भास झाला. देवराईत बहरलेल्या ‘सीता-अशोक’नं स्वागत केलं. त्याच्या दर्शन भेटीने प्रसन्न व्हायला झालं. भारत-श्रीलंकेतील हा ‘सीता अशोक’ वृक्ष सुंदर व सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. हिंदू आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जातो. अशोकाचे खरं वैभव म्हणजे त्याची फुले. या फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातला. मंद सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले. फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि शेवटी गडद नारिंगी-लाल होत निघालेली. एकाच गुच्छात छटा क्लिक केल्या. शेकरुसह मलबार पाईड हॉर्नबिलचं पेअर इथेही भेटलं. पण गर्द वनराईत आमच्या सोबतच्या लपाछपीत ते विजयी ठरलं. आम्ही त्याला भेटण्याच्या नादात छोट्याश्या देवराईतल्या पाऊलवाटा नुसत्याच तुडवत राहिलो. त्यातही एक वेगळी मजा असतेच म्हणा ! वेताच्या काठीचं बेट पाहिलं. आणखी कशाकशाची ओळखता न येणारीही फुलंही दिसली.

तिलारी जलविद्युत प्रकल्प क्षेत्रामध्ये वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल आणि इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिलेल्या. मग विशेष काही नसताना तिलारी घाटाचा प्रवास केला. जाताना रस्त्यात केरळीयनांनी मोठ्या प्रमाणात केलेली रबर लागवड, अननस लागवड पहिली. ह्या लागवडीचे प्रमाण इतके की कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात आणि कृषीअंतर्गत शेती उपक्रमात झपाट्याने बदल दिसणार असं वाटलं. लागवडीसाठी पाण्याचे स्रोत असणाऱ्या डोंगर कपारीतल्या जमिनीवर झालेली बेसुमार वृक्षतोड वेदनादायी वाटली. धरणांमुळे इथले पाणी वाढले, शेती वाढली. जंगल कमी होऊ लागले. त्याचा फटका वन्यजीवांना बसू लागलाय. या विचाराने रबर लागवडीतून कोकणात आर्थिक क्रांती घडवण्याची मांडली जाणारी गणितं आमच्यातल्या निसर्गाप्रेमाला अस्वस्थ करून गेली. वाटेत आशियाई हत्तीची माहिती देणारे फलक पाहायला मिळाले. हे फलक पाहून क्षणभर आपण कर्नाटकात तर नाही ना ? असं वाटून गेलं. फलकावर हत्ती-मानव संघर्ष टाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची माहिती होती. आता अत्यंत नागमोडी वळणे आणि अती तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवघड अशी ओळख असलेला तिलारीचा रामघाट सुरु झाला. सोबतीला नदी होतीच. तिलारी जलविद्युत प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केलेला. सन २०१८ साली पाटबंधारे विभागाने बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी, संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण झाल्याने सध्या वाहतूक वाढलेला, आंबोली घाटाला पर्याय असलेला घाट. तिलारीतली रम्य सायंकाळ ही स्वच्छ आणि सुंदर हवेसाठी प्रसिद्ध. तिलारी हे कोकणपट्टीतलं सर्वात मोठं मातीचं धरण तिलारी नदीवर बांधलेलं. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील सीमावर्ती भाग धरणामुळे सुजलाम् सुफलाम्बनलायं. याने उन्हाळय़ात कोरडय़ा पडणाऱ्या विहिरींची पाणीपातळी वाढवली आहे. इथे ६६ मेगावॅटच्या एका जनित्रामधून जलविद्युत निर्मिती केली जाते. खूप ऐकलेलं या घाटाविषयी...! इन्शुरन्स नसलेला महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या घाटातील प्रवासाचा अनुभव शब्दातीत. घाटातून खाली उतरलो तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेलेली. पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून साटेली भेडशी येथील घरगुती खाणावळीत जेवलो.

पुढच्या जंगल प्रवासाला लागलो. आजचा मुक्काम आंबोलीला ठरलेला. जायचा रस्ता दोडामार्ग-सावंतवाडी-आंबोली ऐवजी दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली असा ठरवलेला. हा बराचसा कच्चा, तीव्र चढ-उतारांचा रस्ता जवळपास जंगलातून जातो. वाटेत २/३ गावं लागतात, इतकंच. हाही अनुभव संस्मरणीय. एखादं-दुसऱ्या मोटारसायकलीचा अपवाद वगळता रस्त्याला वाहतूक नव्हती. मित्र म्हणाला, अगदीच नाही म्हणायला दुधवाले, पोल्ट्रीवाले, जवळपासचे दुचाकीस्वार इथून जात-येतात. आम्ही दोडामार्गवरून सासोलीफाटा सोडून कुडासे-कुंब्रलच्या दिशेने निघालो तेव्हा सायंकाळचे ४ वाजलेले. सुपारी पिकासाठी कुंब्रल, तळकट, कोलझर प्रसिद्ध आहे. कुंब्रलच्या पुढे आकाश ढगाळ झालेले. इतक्यात गाडीच्या काचेवर पावसाचे थेंबही जमा झालेले. आणखी थोडं पुढं आल्यावर रस्ता ओला झालेला दिसला. दिवसभर बराचसा प्रवास झालेला. वाटेत अवकाळी पावसाची भेट झालेली. मग काय ? त्याला अंगाखांद्यावर खेळू दिलं. मातीचा सुगंध रंध्रात भरून घेतला. पाऊस थांबला, पुढे निघालो. आंबोली घाटाला पर्याय म्हणून गेली दशकभर, आम्ही प्रवास करीत असलेल्या या मार्गाची चाचपणी सुरु आहे. ब्रिटीशांनी सन १८५६ साली बांधलेला सावंतवाडी आणि बेळगाव या व्यापारी पेठांना जोडणारा आंबोली घाट वाहतुकीला धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात या घाटमार्गावर दरडी कोसळतात. त्याला दाणोली-केसरी-फणसवडे-नेनेवाडी या मार्गाचा पर्याय आहे. पण कुठूनही गेलो तरी वनजमीन असणार आहे. तिला नख लावणं म्हणजे...? पण याही स्थितीत आंबोली घाटाला पर्याय किंवा त्यांची उत्तम डागडुजी व्हायला हवी. आम्ही प्रवास केलेल्या तळकट-चौकुळ-आंबोली या रस्त्याची मागणी पुढे आली आहे. इथेही वाटेत वनखात्याची बरीच जमीन आहे. तळकट-कुंभवडे रस्त्यात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे काळवीट दिसतात. नेचर ट्रेलसाठी हा मार्ग सर्वोत्तम आहे. मात्र दोन गावांच्या जंगलांमधले असे कॉरीडोरवन्यश्वापदांच्या मृत्यूस, त्यांच्याकडून होणाऱ्या मानवी हल्यांना कारण ठरतात. याचा विचार इथे व्हायला हवा, असं प्रवासात वाटतं राहिलं. 

सायंकाळचे साडेपाच वाजून गेलेले. पार करायचं अंतर कमी राहिलं असणारं ! जंगलातली रानपाखरं, जनावरं सारी आपापल्या मुक्कामाला निघालेली. आता कोणीतरी दर्शन देईल असं वाटत असतानाचं त्या दहाफुटाच्या कच्च्या रस्त्याशेजारील झाडावर पुन्हा मलबार पाईड हॉर्नबिलनं दर्शन दिलचं. याला इतक्या जवळून पहिल्यांदा पाहायला मिळालं. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर असल्यानं फोटोत कमाल साधता आली नाही. पण खूप जवळून पाहण्याचा आनंद मात्र घेता आला. दुपारी त्यानागनाथाच्या देवराईत लपाछपीचा खेळ अर्ध्यात टाकून परतलेल्या आम्हाला मी जिंकलो, मी जिंकलो !असं खिजवायला तर हा आला नसेल ना ? क्षणभर असं वाटावं इतक्या जवळून भेटला. (तसं तांत्रिकदृष्ट्या आम्ही अजूनही दोडामार्गच्या हद्दीतच होतो ना !) थोड्या अंतरावर गेल्यावर खडपडे-कुंभवडे गावची पक्की सडक लागली. कुंभासारख्या आकाराचं म्हणून कुंभवडे. गावात सुमारे पाचशेच्या जवळपास लोकवस्ती असावी. बहुतेकजण शहरात राहतात. कुंभासारखा आकार असणाऱ्या या गावात विलोभनीय निसर्ग, अचंबित करून टाकणारे दोन नद्यांच्या संगमावर वाहणारे धबधबे आहेत. कुंभवडेच्या बोरीयेथून कळणेनदी उगम पावते. कुंभवडेपासून कुंब्रलपर्यंत ती न्हयखोलम्हणून ओळखली जाते. दोडामार्ग जंगल प्रदेशातून मार्गक्रमण करीत ही गोव्यात प्रवेश करते. गोवा हद्दीत ओझरी / मेणकुरे भागात शापोरा ब्रीजजवळ तिलारीत विलीन होते. न्हयखोलच्या पात्रावर भेकुर्ली येथे जलविद्युत धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले आहे. या भागात आजही नाचणीची शेती होते.

छोट्याश्या घाटीतील वळणावर गाडी थांबवली जेव्हा समोरच्या झाडाच्या उंच फांदीवर यलो फुटेड ग्रीन पिजन बसलेला दिसला. त्याला कॅमेराबंद करून पुढे निघालोच होतो तर वळणावरच्या पुढच्याच झाडाच्या शेंड्यावर चेस्टनट हेडेड बी इटर (मुरलीचरा) बसलेला दिसला. बराचवेळ तो तसाच बसलेला होता. कुणाचीतरी वाट पाहात असावा. थोड्यावेळाने जिची वाट पाहात होता ती येऊन गेलीच. पण हा काही तिच्या मागून गेला नाही. आम्हाला फोटोपोझ देत बसला. शेवटी आम्ही जसे त्याच्याजवळ जाऊ लागलो तसा सतर्कतेने उडाला. काळी घार (Black Kite), सातभाई (Jungle babbler), शिपाई बुलबुल (Red-whiskered bulbul), लहान पाणकावळा (Little Cormorant), पाँड हेरॉन, रानधोबी (Forest wagtail), Yellow-browed bulbul, वेडा राघू (Green bee-eater), व्हाईट-चीक्ड बारबेट, Indian scimitar babbler आदि पक्षीही पहिले. खडपडे-कुंभवडे गाव हद्दीतही नुकताच पाऊस पडून गेलेला. चहा कोठेच उपलब्ध नसताना अंगातला शीणवठा घालवण्यासाठी इतकं उत्तम वातावरण शोधूनही सापडणार नाही. निवांत व्हायला रस्त्याच्या एका बाजूला आलो. ज्या छोट्याश्या घाटीने आम्ही प्रवास करणार होतो तिचं रम्य चित्र समोर दिसत होतं. पायथ्याशी छोटासा ब्रीजही दिसला. चला ! आता निघू यात !असं आमच्यातला कोणीतरी म्हटला इतक्यात समोरच्या पर्णहीन झाडावर पुन्हा एक मलबार पाईड हॉर्नबिल येऊन बसला. आज बहुदा यांच्याच दर्शनाचा दिवस असावा. तसंही घरून निघताना प्रवासात ओणी (राजापूर), माडखोल (सावंतवाडी) जवळ आणि आज सकाळी दोडामार्ग सोडल्यावर लागणाऱ्या अगदी पहिल्या ब्रीजच्या परिसरातही याने दर्शन दिलेले. आत्ताच्या दर्शनाने त्यांची गेल्या २/३ दिवसातील सारी दर्शने आठवली. विचारचक्रात असताना त्याचं झाडाच्या दुसऱ्या टोकाच्या फांदीवर आणखी एक मलबार पाईड हॉर्नबिल येऊन विसावला. बहुदा ही पेअर असावी. तो तिच्याकडे पाहात होता. ती मात्र दुर्लक्ष करीत होती.असे काहीशे दृश्य होते ते ! १० मिनिटं गेली असतील. शेवटी दोघेही उठून उडून गेले त्या ब्रीजनजीकच्या झाडांत. या पक्ष्यांनी आम्हांला आम्ही खऱ्या अर्थाने जंगलातून प्रवास केल्याची साक्ष दिली.

घाटी उतरून खाली आलो तर इंग्रजी ‘T’ जंक्शनवर एक मार्गफलक दिसला. त्यावर आम्ही आलो त्या रस्त्यावर गोवा, बांदा, दोडामार्ग, तळकट, समोर कुंभवडे तर उजवीकडे आंबोली २० किमी. दाखविले होते. काजूच्या बिया अन् लाल-पिवळ्या बोंडांवर पावसाच्या अस्तित्वाच्या खुणा खुणा आम्हाला चटकन दिसल्या. सध्याचा कुंभवडे-चौकुळ रस्ता उत्तम असल्यानं चौकुळ लवकर आलं. ग्रामीण कोकण कृषी पर्यटनात चौकुळचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कडव्या सैनिकांचा गाव म्हणून चौकुळ प्रसिद्ध आहे. गावात ३५/४० लहान-मोठ्या गुहा, विविध रंगी फुलांचे सडे पाहाता येतात. आजही गावातील किमान ६० टक्के घरातील मंडळी लष्करी सेवेत आहेत. चौकुळ ते आंबोली हे दहा कि.मी. अंतर पूर्वी घनदाट जंगल होते. भणभणता वारा, अहोरात्र धुकं, जंगली श्वापदांचा वावर यामुळे कधी कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागेल याचा पत्ता नाही. जगण्यातला हा बेडरपणा इथल्या माणसात दिसतो. पावसाळी पर्यटनाचा आकर्षणबिंदू असलेले धबधबे, रंगीबेरंगी रानफुलांनी बहरणारी विस्तीर्ण पठारे आदि असल्याने व्हिलेज टुरिझम, अ‍ॅडव्हेन्चर टुरिझम, मान्सून टुरिझम, कौटुंबीक सहल सारे उद्देश येथे सफल होतात. चौकुळला हरतऱ्हेच्या दुर्मीळ वनस्पती आहेत. इथल्या ग्रामदेवतेच्या प्रांगणात धुपाचे झाड आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागात धुपाचे झाड नाही.

आंबोलीला जाताना रस्त्याच्या डाव्या हाताला घटप्रभा नदी भेटली. वर्षानुवर्षे घटप्रभा नदीपात्रात लोकं शेती करतात. त्यामुळे एका सरळ रेषेत शेती आणि मध्येच पाणी, चिखलं त्यातली जैवविविधता आपल्याला दिसते. घटप्रभा सहयाद्रीच्या कुशीने चंदगडमार्गे कर्नाटककडे रवाना होते. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला मिळते. घटप्रभेवर गोकाकचा धबधबा आहे. चौकुळच्या शाळेजवळ थांबलो. मस्त चहा मागवली. कशीही मागवली तरी मिळणार तिथल्या पद्धतीचीच हा अस्सल ग्रामीण कोकणी रिवाज इथेही होताचं. त्यामुळे ‘तलफ’ तशीच राहिली. याच चौकुळला आम्ही सन २०१३ साली निसर्गातल्या दिवाळीचे फटाके उडवायला आलो होतो. पहाटे टेंटमध्ये साखर झोपेत असताना सांबराची बेफाम किंचाळी ऐकून त्या दिशेने धावताना वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सांबराचे झालेले दर्शन, नंतर सांबराच्या पिल्लाच्या केलेल्या शिकारीवर ताव मारणारे वाईल्ड डॉगचे अख्खे कुटुंब भेटलेले. जंगलातल्या त्या दिवाळीवर लिहायचं मात्र अजूनही राहिलंय ! आजच्या दिवसभरात सूर्यास्तापर्यंत न थांबणारा पक्षांचा आवाज अनुभवला. जिथेजिथे क्षणभर विश्रांती घेतली तिथे वाळलेल्या पानावर पाय पडून भंग झालेली शांतता अनुभवली. असंख्य पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांनी श्रीमंत बनवलेले जंगल, बऱ्याच दिवसांनी सहज न दिसणारे असंख्य पक्षी पहिले, काही क्लिक केले. आंबोलीत आलो तेव्हा वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर भेटले. त्यांच्याकडून, आंबोलीत डॉ. वरद गिरी सर आल्याची माहिती मिळाली. त्यांनाही भेटलो. डॉ. गिरी सरांसोबतच्या भेटीबाबत पुन्हा कधीतरी लिहिनं ! पोलीस चौकीजवळच्या हॉटेलात जेवून रात्री पुन्हा चौकुळ रोडवर नाईट ट्रेलला निघालो. रात्रीचं जंगलं अनुभवलं. बॅटरीच्या प्रकाशात दूर झुडुपात इंडियन पाम सिवेट आणि सांबराच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दिनांक १ मार्चची सकाळ. हाताशी वेळ कमी होता. सकाळी आवरून जवळच्या रेशीम संचालनालयाच्या बेसीक सिडफार्म इमारतीनजीक असलेल्या फाकणीच्या देवराईत निघालो. देवराई फक्त फिरणं झालं. फारसं साईटींग झालं नाही. जरवेलची बिळे, बिबट्याची विष्ठा (लेपर्डस्कॅट), कोणीतरी शिकार केलेल्या (बहुधा शिक्रा पक्ष्याने) रानकोंबडीची पिसं दिसली. काही पक्षी पाहिले. या देवराईतून परतताना एक स्थानिक भेटले. तसा कुठल्याही देवराईत सतत वावर असणारा माणूस हा श्रद्धा असलेलाचं असणार ! त्यांनी फाकणीच्या देवराईची माहिती देताना जे काही सांगितलं तो स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. आंबोलीत परतलो. रुचिरात तिथली स्पेशल मिसळ खाल्ली. परतीला लागलो. शेवटचा हॉर्नबिल सायं. ६.३० वा मानसकोंडच्या (संगमेश्वर) अलिकडे दिसला. या साऱ्या प्रवासात सोबत असलेल्या सर्पमित्र अनिकेत चोपडेने तो दाखवला. गंमत वाटली.

सृजन हो ! वर्तमान मानवी जीवनात ‘बी कलरफुल’ संकल्पनेचा शिरकाव झालेला आहे. पूर्वीच्या पिढ्या चाकोरीबद्ध जगल्या. सध्याच्या पिढीला विविधांगी विश्व सतत खुणावत असतं. प्रत्येकाला आपलं असं काहीतरी वेगळं म्हणून करायला मिळतं. ‘बी कलरफुल’ संकल्पनेनुसार जगायला भरपूर बळ देण्याचं काम अरण्याभ्रमंती करते. जंगल थोडंस समजून घ्यायला सुरुवात केली की त्यातली गंमत कळायला लागते. मग त्याच्या संवर्धनासाठी आपली पाऊलं आपसूक वळतात. वळणारी ही पाऊलं जितकी अधिक तितकी जैवविविधता अधिक खुलत जाते. आपलं आयुष्य कलरफुल बनविते. आपल्याला आनंदी बनवते. आनंदी जीवनशैली रोगराईंपासून बचाव करते. ‘दोडामार्गच्या वनवैभवात’ील ही अक्षर भ्रमंती आपल्याला निसर्गाकडे सतत वळवणारी ठरो !

धीरज वाटेकर
@विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.   ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com


(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटनपर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)


आपण वाचत असलेल्या दोडामार्गच्या ज्या वनवैभवात आम्ही
सव्वा महिन्यापूर्वी भटकलो तिथली 'कोरोना लॉकडाऊन' मधली
दिनांक ६ एप्रिल २०२० ची दैनिक सकाळ मधील बातमी  
बॅटरीच्या उजेडात दिसलेले तिलारी नदीचे पात्र 

कॉमन ट्री फ्रॉग 

 कवड्या (कॉमन वोल्फ स्नेक)

दोडामार्ग सूर्योदय

दोडामार्ग चौक : पिंपळपार येथील बगळ्यांची वसाहत

तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर 

   बांबूच्या बेटाला लावण्यात आलेली आग

    शेकरू (Indian giant squirrel

  यलो ब्रोड बुलबुल

तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर

   स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर)

व्हाईट रम्प्ड शामा

मलबारी राखी धनेश (Malabar grey hornbill)

तेरवण-मेढे येथील प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईतील वृक्ष 

तेरवण-मेढे येथील प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या
देवराईतील वृक्षाच्या छायेत ब्लॉगलेखक 

बहरलेला सीता-अशोक 

तिलारी नदी पात्र 

तिलारी घाटातून दिसणारे दृश्य 

तिलारी घाट 

तिलारी घाट 

कुंब्रलतळकट मार्गावर अवकाळी पावसाचे दर्शन
खडपडे हद्दीत दृष्टीस पडलेला गाव नामफलक



दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली कच्चा जंगलमार्ग

फाकणीच्या देवराईतील बिबट्याची विष्ठा (लेपर्डस्कॅट)

फाकणीची देवराई

   दोडामार्गच्या वनवैभवातून परतताना ब्लॉगलेखक
(छायाचित्र : अनिकेत चोपडे)

फाकणीची देवराईतील पाण्याचा झरा

चौकुळ नाईट ट्रेलमध्ये बॅटरीच्या प्रकाशात डोळे चमकलेले इंडिअन पाम सिवेट

चौकुळच्या घटप्रभा नदी पात्रातील शेती 

अवकाळी पावसात न्हाऊन निघालेली काजूची बोंडं 

चौकुळ गाव 

पर्णहीन झाडावर मलबार पाईड हॉर्नबिल पेअर

कुंभवडे घाटीतून दिसणारे दृश्य 

कुंभवडे ‘T’ जंक्शनवरील नामफलक 

चेस्टनट हेडेड बी ईटर (मुरलीचरा)

यलो फुटेड ग्रीन पिजन

जंगलात रस्त्याशेजारच्या झाडावर येऊन
दर्शन दिलेला मलबार पाईड हॉर्नबिल

(सर्व छायाचित्रे : धीरज वाटेकर)


THIS BLOG PUBLISH LINKS / PAPER CUTTINGS



बुधवार, ४ मार्च, २०२०

माचणूरचा महाशिवरात्रोत्सव







देशभरातील श्रीशिव मंदिरात नुकत्याच (दिनांक २१ फेब्रुवारी २०२०) संपन्न झालेल्या महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यंदा अचानक योगावर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूरला पोहोचलो. पूर्वी कधीतरी महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहास वाचताना माचणूर भेटलेलं ! ते मनात घर करून होतचं. महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माचणूर जायचं निश्चित झाल्यावर गाव नीटसं समजून घेतलं. दरवर्षी माघ महिन्यात चंद्र मावळण्याच्या टप्प्यावर (कृष्णपक्ष त्रयोदशी) महाशिवरात्रीपासून पाच दिवस येथे हेमाडपंती श्रीसिद्धेश्वर मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोव्यातून आलेल्या जवळपास लाख-दीड भाविकांच्या उपस्थितीत भव्य यात्रोत्सवात अध्यात्मिकता आणि निसर्गाचा संगम अनुभवता येतो. उत्सवादरम्यान दृष्टीस पडलेलं संस्मरणीय माचणूर गाव अनेक अर्थांनी मुद्दामहून पाहण्यासारखं असल्याचं जाणवलं. त्याचा आढावा...!
नुकतीच शिवजयंती संपन्न झालेली. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रस्त्यात ठिकठिकाणी दिसणारे भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजलेल्या मूर्ती, पळस फुलवून निसर्गाने केलेली केशरी रंगाची अधिकची उधळण मनाचा ठाव घेऊ लागली. दूरवर पसरलेली काळी जमीन हे या मंगळवेढा भागाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेलं मंगळवेढा ! माचणूर गाव सोलापूरपासून ४३ कि.मी. तर मंगळवेढापासून १४ कि.मी., पंढरपूरपासून २१ कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात ठिकठिकाणी रस्त्याच्या शेजारी असलेले बैल-म्हशींचे गोठे, सरळ छप्पराची घरं, चिंचेच्या झाडांच्या सावल्या, ज्वारीची शेतं, शुगर मिल, धुरळा उडवणाऱ्या रस्त्यांवरचीताळ्याची दुकानं बघतबघत सकाळी ११च्या सुमारास माचणूरला पोहोचलो. पंढरपूर-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर असलेल्या माचणूरात पोहोचल्यावर मुख्य रस्त्याच्या उजव्या दिशेस असलेल्या रस्त्यावरील स्वागताच्या कमानीने लक्ष वेधून घेतलं. गावात पोहोचलो तेव्हा यात्रोत्सवाचं वातावरण हळूहळू आकार घेत होतं. उत्सवातील जबाबदार घटक, तरुण, बायाबापड्यांच्या रस्त्यावरच्या हालचाली, स्वतःहून पुढे होऊन अधिकची माहिती देण्याची सहकार्य भावना त्यांच्यातला उत्साह दर्शवित होती. नेहमीप्रमाणे इथल्याही रस्त्याची दुरवस्था जाणवली. रस्त्यावर खडी आणि धुळीचे साम्राज्य दिसले. शासकीय नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन व्यवस्थांनी हा रस्ता आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगून हात झटकल्याची वृत्तपत्रीय बातमी वाचनात आली. गंमत वाटली. अशा या कामसू कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा कमी व्हावा म्हणून महाराष्ट्रात ५ दिवसांचा आठवडा होऊ घातला असावा. असो !
मुख्य रस्ता सोडून थोडं पुढं गेल्यावर काही मिनिटातच रस्त्यावरच्या आडव्या बॅरिकेट्सनी आम्हाला थांबवलं. अगदी उजव्या बाजूला असलेल्या शेतात, यात्रेत आलेल्या दुकानांची गर्दी दिसली. सुरक्षा आणि पार्किंगच्या कारणास्तव पोलिसांच्या सूचनेनुसार गाडी पार्क केली. परिसरात पोहोचलो असलो तरी मंदिर अजूनही किंचित दूर होतं. इतक्यात जवळच्या मोठाल्या जंगली वृक्षांकडे लक्ष वेधलं. या जुन्या वृक्षांवर वाटवाघळांची वसाहत मुक्कामाला असल्याचे दिसले. वटवाघूळ ! उडणारा सस्तन प्राणी. अतिदुर्लक्षित जीव. सकाळची वेळ असल्याने आळसावलेली वाघळं आरडाओरड करीत जागी होत होती. एखादं-दुसरं वयस्कर वाघूळ थोडंफार उडून परत जागेवर बसताना दिसलं. या नववर्षारंभी आमच्या घराच्या टेरेसवरही दोन-तीन लहानशी वाटवाघळं काही दिवस मुक्कामाला होती, त्यांची आठवण झाली. झाडाच्या फांद्यांना एखादे काळसर फळ लटकावे तशी वाघळं दिसत होती. न चुकता ही वाघळं रात्रभर निसर्गात बिया लावण्याचे काम करीत असतात. पिकलेली फळं यांनाच पहिल्यांदा कळतात. आपल्यासारखी चुकीची विदेशी झाडं ही वाघळं लावत नाहीत, की सेल्फी घेत नाहीत. कॅमेऱ्यात त्यांचे फोटो घेतले.
यात्रोत्सवानजीक पोहोचलेलो. बाहेरच्या रिकाम्या शेतात जागा मिळेल तिथे अनेकांनी विविधांगी दुकानं थाटलेली. मेवा, मिठाई, हॉटेल, जनरल स्टोअर्स, नारळ, रसपानगृहे, खेळण्यांची दुकाने, आकाशपाळणे आदिंनी यात्रा परिसर फुलून गेलेला. यात्रोत्सव पाच दिवसांचा असल्याने इथे मला साबण, टूथपेस्ट आणि किरकोळ डाळ-भात-भाकरीसाठी लागणाऱ्या किरणा मालाचं दुकानही भेटलं. साबण नि टूथपेस्ट तशी मला नवीन होती. त्या दुकानदाराजवळ थोडं बोललोही. कोकणातून आलोय म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता जाणवली. होणारी गर्दी ओळखून मंगळवेढा, सोलापूर, सांगोला एस.टी. आगाराने जादा बसेस सोडलेल्या. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था. जोडीला पोलीस आणि कमांडो यांचा बंदोबस्त. मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सरळ रस्त्यावर उजव्या हाताला आणखी एका स्वागत कमानीच्या बाहेर श्रीसिद्धेश्वर अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट यांचा स्टॉल दिसला. स्टॉलची जागा मला आवडली. तिथे थोडी माहिती घेतली. कमानीतून आत गेलो तर समोरच्या दुकानात बेकरीत मिळणाऱ्या तयार फरसाणमधील सारे घटक पदार्थ वेगवेगळे बसलेले दिसले. यात्रेकरूंच्या मागणीप्रमाणे ते तागडीत काय ते एकत्र येतजात होते. कायम तयार फरसाण घेणारा मी एकत्र येतानाचे हे दृश्य पाहात राहिलो. इतक्यात कुठूनतरी कानावर आवाज आला, ‘यात्रेमध्ये आम्ही प्रथमच घेऊन येत आहोत, एटीएम कार्डाचं लेदर पाकीट’ आयडियाच्या कल्पनेनं दूरवर कोणीतरी पाकिटं विकत होता. आता नजरेसमोर मंदिराचे पहिले प्रवेशद्वार स्पष्ट दिसत होते. एरव्ही शांत असलेला हा सारा रमणीय आणि पवित्र मंदिर समूह परिसर आज कमालीचा गजबजलेला होता. पुढचे पाच दिवस असाच राहणार होता. यावर्षी आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अधिक गर्दी जाणवत होती. मंदिरावरील विद्युत रोषणाई नजरेत भरणारी. पहाटे लवकर आलेली यात्रेकरू, भक्तमंडळी, दुकानदार लोकं, त्यांची लेकरं दर्शन आटोपून जवळच्या झाडांच्या सावलीला गोल करून न्याहारीला बसलेली. बहुतेकांच्या ताटात उपवासाचं काहीतरी होतंच.
नाथपंथी श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांच्या साधक निवास इमारतीवर भगवा झेंडा फडकताना दिसला. प्रथमत: नकळत, जवळच असलेल्या त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो. तिथे उजव्या कोपऱ्यात समईची वात मंद प्रकाश देत जळत होती. भक्तांची येजा सुरू होती. भक्तच असले तरी प्रत्येकाच्या नतमस्तक होण्यात वेगळेपणा होता. भींतीवर लावलेल्या महितीफलकावर काहींची नजर स्थिरावायची. काही आपले असेच होते. असंख्य महात्म्यांच्या वास्तव्यामुळे आध्यात्मिकतेने स्पंदित असलेले हे श्रीक्षेत्र माचणूर सर्व पंथाच्या साधकांसाठी उत्तम साधनाक्षेत्र असल्याचं पूर्वी वाचलेलं होतंच, ते जाणवलं. स्वतःसोबत असलेला दिवा, अगरबत्ती प्रज्ज्वलित केली. काही काळाकरिता ध्यानाला बसलो. श्रीक्षेत्रमाचणूर येथून वाहणारी भीमा नदी ही तिच्या प्रवाहाच्या चंद्रकोराकृति दर्शनामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते. या चंद्रभागेच्या नाभीमध्यावर व भूगर्भरेषेवर श्रीक्षेत्र माचणूर आहे. त्याच कारणाने तपस्येसाठी हे स्थान फार दुर्मीळ ! परमेश्वर, साधुसंत आदिंचे क्षणभर वास्तव्य लाभलेल्या भूमी ह्या तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. माचणूराला अशा महासिद्धांचे दीर्घकाळ वास्तव्य लाभलेले तपस्याक्षेत्र आहे. नीरा-नरसिंहपूरपासून पुढे पंढरपूर, माचणूरपर्यंत पसरलेला भीमाकाठचा परिसर प्राचीन हरिक्षेत्र म्हणून ओळखला जातो. जगद्गुरू श्रीरेवणसिद्धांशी माचणूरचा संदर्भ जोडला जातो. यक्षमिथुनांचा उद्धार, विक्रमादित्याला खड्ग प्रदान, बारा हजार कन्यांचे बंध विमोचन या त्यांच्या लीला माचणूर संदर्भीय असाव्यात. इथल्या ‘सिद्धेश्वर’ नावाचा आणि त्यांच्या संचाराचा संबंध असल्याने हे देवालय जगद्गुरू श्रीरेवणसिद्धकालीन असावे. ही भूमी नाथपंथी सिद्धांचे ठाणे म्हणूनही ओळखली जाते. महायोगी श्रीगोरक्षनाथ, श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ, श्रीकाशिनाथ महाराज, श्रीशंकर महाराज, श्री बाबामहाराज आर्वीकर यांचे वास्तव्य या भूमीत होते. हा भाग पूर्वी जंगलमय असावा. श्रीशंकर महाराजांच्या बालपणीच्या श्री स्वामी समर्थांसोबतच्या कथांत इथल्या जंगलाचा उल्लेख येतो.
श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांनाही दीर्घ तपस्येअंती अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांनी, ‘माचणूर येथे श्रीसिद्धेश्वर मंदिराजवळ तुझी कर्मभूमी आहे तेथे जा व कार्य सुरु कर असा आदेश दिला होता. सन १९५५ पासून ते माचणूर येथे वास्तव्यास आले. या क्षेत्रात श्रीगोरक्षनाथ यांनी एकवीस दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती, असे श्रीबाबामहाराज सांगत. अधर्माचा नाशकरून धर्मस्थापना करण्यास्तव या ठिकाणी श्रीसिद्धरामांचे आगमन झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या, ‘भूमीभार सारुनी ज्ञानदीप्ती पाजळी| धर्मवीर प्रसवले सिद्धराम ये स्थळी॥’ या काव्यात केला आहे. चंद्राकोराकृती चंद्रभागेचे विस्तीर्ण वाळवंट असलेल्या माचणूरला पुन:र्प्रकाशात आणून श्रीबाबामहाराज सन १९७१ साली वयाच्या ४७ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. शिर्डी संस्थानचे अधिकृत मासिक ‘श्रीसाईलीला’ च्या एप्रिल १९७२ ला प्रसिद्ध झालेल्या रामनवमी व सुवर्णमहोत्सव विशेषांकाचे (संपादक : का. सी. पाठक) संपादकीय आर्वीकर महाराजांच्यावर लिहिलेले आहे. त्यानुसार आर्वी (जि. वर्धा) येथील मोरेश्वर प्रभाकर जोशी हे बालपणापासून परमार्थाकडे ओढा, लहानपणी गृहत्याग, अज्ञातस्थळी तपाचरण, देशभ्रमण, स्थितीचे निरीक्षण, लोकसंग्रह, लोकोपादेश, लोकोद्धार या द्वारे जीवनात तत्कालिन सर्वश्रेष्ठ प्रवचनकार म्हणून गणले गेलेत. हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभलेल्या माचणूरबाबत श्रीगुरुचरित्र ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती यांनी आपल्या शिष्यांस तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा करून विविध तीर्थक्षेत्रांची माहिती दिली आहे. त्यात माचणूरचा (अध्याय १५. ओवी ५१. हरिहरक्षेत्र महाख्याती | समस्त दोष परिहरती | तैसीच असे भीमरथी | दहा गावे तटाकयात्रा ॥५१॥) उल्लेख आहे.
समाधी मंदिरातून मागे वळलो. मुख्य भव्य दगडी प्रवेशद्वारापाशी आलो. श्रीसिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या स्त्रीया हातात हळद, कुंकू, फुलं घेऊन चाललेल्या. कुणाजवळ एखादी पिशवी, कुणाजवळ लहान मुलं होतं. गर्दी वाढतच होती. माणसं आमंत्रणांनी बोलवावी लागत नव्हती. ती आपोआप येत होती. स्वयंभूपणा म्हणतात तो बहुदा हाच असावा ! खरंतर मला गर्दीत फारसं भटकायला आवडत नाही। पण आज नियतीने तसाच योग जुळलेला. पहिल्या प्रवेशद्वारातून आत येताच मंदिराच्या भव्यतेने लक्ष वेधून घेतलं. पहारेकऱ्यांच्या दोन देवड्यांनी स्वागत केलं. मंदिराचे प्रवेशद्वार उंचीवर आहे. आत देवड्यांपासून पायऱ्या उतरून आपल्याला दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचावे लागते. जवळच्या भिंतीत वीरगळ दिसले. दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी ओवऱ्यांच्या पुढे उतरत्या पायऱ्यांची रचना. डावीकडे हेमाडपंती बांधणीचे श्रीमल्लिकार्जुनाचं मंदिर. उतरत्या पायऱ्यांशेजारील रचना अशी की आपण सहज ओवाऱ्यांच्या छतावर पोहोचून सारा परिसर न्याहाळू शकू. छानसे क्लिक मिळणार या हेतूने पहिल्यांदा उंचीवरून मंदिर आणि भीमा नदीचा परिसर न्याहाळला. संपूर्ण बांधकामा मोठमोठया दगडांचा वापर केलेला आहे. तटबंदी, तटबंदीतील ओवऱ्या आजही ठीकठाक आहेत. अजूनही मी बाहेरच होतो. पण आतल्या गर्दीची जाणीव उंचावरून झाली. आत स्त्री-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा दिसल्या. पोलीस आणि कमांडो अशी चोख व्यवस्था इथेही होतीच. भाविकांच्या रांगा दिवसभर टिकून असतात. नवसापोटी काही भाविक देवाला लोटांगण घालताना दिसले. यात्रेत चोरी होऊ नये म्हणून साध्या गणवेशातील पुरूष व महिला पोलीस, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठीही वेगळा पोलीस कक्ष कार्यरत होता.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आलो. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यानंतर मंदिराचा संपूर्ण परिसर दिसतो. मंदिराच्या आवारात दिवे, पाने, सुगंधी फुले आदिंची सजावट केली होती. अन्नदान सुरु होते. या मंदिराच्या आणि तुळजापूर मंदिराच्या रचनेत साम्य आहे. सोबतच्या सहकाऱ्यांना शोधलं आणि हळूच त्यांच्या कळपात शिरलो. एव्हाना परिसरात येऊन आम्हाला दीड तास उलटलेला. स्त्रीयांची रांग पुढे सरकू लागली की पुरुषांची रांग थांबे. पुरुषांची रांग पुढे सरकू लागली की स्त्रीयांची थांबे. हे नजरेनं हेरलं. अजूनही मंदिरापासून खूप बाहेर असल्याने काय ते कळेना. त्यात पहिल्यांदाच आलेला. रांगेत चालत राहिलो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दीपमाळा दृष्टीस पडल्या. एक दीपमाळ डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस. सभामंडपाला अठरा स्तंभ असून बरेचसे भिंतीत उभे आहेत. सभामंडपातून थोडेसे आत गेल्यानंतर गाभाऱ्यात श्रीसिद्धेश्वर महादेवांचे भव्य शिवलिंग आहे. चांदीचा मुखवटाही आहे. (आम्ही स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.) मंदिर आवारात उजवीकडे श्रीस्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या पाषाण दत्तपादुका दिसल्या. मुख्य मंदिराबाहेर पुराण पिंपळ वृक्ष असून भोवताली दगडीपार बांधलेला आहे. तेथे पिंपळपाराच्या सावलीत गायक मस्तान मुल्ला यांच्या भजन, कीर्तन आणि गौळणीचा संगीतमय कार्यक्रम रंगलेला होता. त्याला टाळसाथ करणाऱ्या सोबतीच्या हालचाली इतक्या लाजवाब होत्या की अनेक भाविक आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होते. पुराणपिंपळाच्या जवळ असलेल्या मुख्य हेमाडपंती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच तीन फूट उंचीच्या रेखीव नंदी, कोनाड्यांची रचना दृष्टीस पडली. मंदिराचं तोंड गंगेकडे (चंद्रभागा-भीमा) आहे. मंदिराची रचना गर्भगृह, सभामंडप, मुखमंडप अशी आहे. आतल्या गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्तीकडे पाहून भगवान शिवशंभोसमोर नतमस्तक व्हायची इच्छा अधिक तीव्र झाली. तीव्र झालेली ही इच्छा अचानक औत्युक्यात बदलली जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दृष्टीस पडले. गाभाऱ्याचा पहिला दरवाजा साधारण पाच फूट उंचीचा. तर त्यातून आत गेल्यानंतर भेटणारा दुसरा मुख्य दरवाजा अगदी अडीच फूट उंचीचा. त्यामुळे एकावेळी एकच भाविक दर्शनाला गाभाऱ्यात जाऊ शकतो. मनुष्य कंबरेत वाकून नव्हे तर नम्र होऊनच श्रीसिद्धेश्वर चरणी जावा अशी व्यवस्था ! मीही तसाच प्रवेश केला. एका अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घेतले. जवळपास अडीच तासांच्या रांगानंतर गाभाऱ्यात पोहोचलेलो. स्कंधपुराणानुसार हे दत्तपद क्षेत्रातील साक्षात भगवान श्रीशंकराचे ह्रदयस्थान आहे. गाभाऱ्यात प्रसन्न आध्यात्मिक लहरी जाणवल्या. एरव्ही अत्यंत शांत असलेल्या या परिसराच्या स्थितीच्या विचारानेच मनात प्रसन्नता उतरली. दर्शनाला इतका उशीर का होतो ? नि रांगा मध्येच शांत का होतात ? याचं उत्तर दरवाजाने दिलं होतं. दर्शन आटोपून बाहेर आलो तेव्हा दुपारचा दीड वाजलेला.
शिवलिंगाचे दर्शन होऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूस मंदिराच्या तटबंदीला लागून असलेल्या दरवाजातून बाहेर आलो. पन्नासएक प्रशस्त पायऱ्या उतरून भीमा नदीच्या छान बांधीव दगडी घाटावर पोहोचलो. भाविक दिवा प्रज्ज्वलित करताना दिसले. घाटाच्या कठड्यावर काही ठिकाणी व्याघ्र प्रतिमा कोरलेल्या आहेत. हा घाट दानशूर राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला. अर्थात तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र निश्चित प्रसिद्ध असणार. समोर नदीपात्रात मध्यभागी श्रीजटाशंकराचे मंदिर दिसले. तसे ते समाधी मंदिराजवळून आणि छतावरून पहिले होते. इथून अधिक जवळून पहिले. या पात्रात फारपूर्वी देवमाशाचे दर्शन व्हायचे, म्हणतात. श्रीजटाशंकराचे मंदिर छोटेसे, सुबक व देखणे आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यास मंदिरापर्यंत चालत अन्यथा बोटीने जाता येते. आज आम्ही पोहोचण्यापूर्वी काही काळ बोटिंग सुरु होते. श्रीजटाशंकराचे गाभार्‍यात ध्यानास बसल्यास एक गूढ अन विलक्षण शांतीचा अनुभव येतो. तो घेता आला नाही. सन १९५६ मध्ये भीमानदीला आलेल्या महापूरात श्रीजटाशंकर मंदिराचा कळस वाहून गेला. तेव्हा पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते. घाटाच्या पायऱ्या चढून श्रीसिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात सहा फूट उंचीपर्यंत पाणी आले होते. आजही पावसाळ्यात भीमा नदीला पूर आला की या सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात शिवपिंडीच्या बाजूने पाणी जमा होतं.
यात्रोत्सवात पाच दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. पहिल्या दिवशी उपवास असतो. आम्ही असताना उपवासाची खिचडी, शेंगदाण्याचे लाडू असं वाटप सुरु होतं. पहिल्या सायंकाळी माचणूरमधून ग्रामदेवतेची सवाद्य पालखी मंदिरात येते. तिचं औक्षण केलं जातं. दुसऱ्या दिवशी पारणं असतं. त्या रात्री नामांकित शाहीरांचा पारंपरिक भेदिक गाण्यांचा (कलगीतुरा) कार्यक्रम रंगतो. तिसऱ्या दिवशी आमावस्या, कुस्तीच्या स्पर्धा होतात. कधीकधी पारणा आणि आमावस्या एकाच दिवशी येते. यातला चौथा दिवस हा विसाव्याचा असतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी देवाची पालखी सवाद्य परत नेण्यात येऊन यात्रेची सांगता होते. हे प्राचीन सिद्धेश्‍वराचं श्रीक्षेत्र माचणूर श्रावण महिन्यातही भाविकांनी फुलून जातं. ग्रामस्थ आपल्या जवळच्यांना श्रावणात आवर्जून माचणूरला बोलवितात. सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ब्रम्हपुरी, माचणूर, बेगमपूर या एकमेकांपासून जवळ असलेल्या गावांत कधीतरी जायला हवं, असं मनात होतंच ! यावर्षीच्या महाशिवरात्रोत्सवाला ते प्रत्यक्षात आलं.
शिवछत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्य काबीज करण्यासाठी स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण त्याचा मनसुबा छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी उधळून लावला. त्यांनाही दुर्दैवी होऊन कैद होऊन अत्यंत क्रूरपणे मृत्यूला सामोरे जावे लागल्याने महाराष्ट्रावर कब्जा मिळविण्याच्या औरंगजेबच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या. मात्र औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी पुरता त्रस्त झाला. वारंवार तो आपल्या छावण्या बदलू लागला. मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानच्या मार्गावरून जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी सरदार गाझीऊद्दीन खानवर होती. त्यास छावणीसाठी पूरक ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या माध्यमातून लागला. त्यावेळच्या पत्रव्यवहारानुसार गाझीऊद्दीन खानने ब्रह्मपुरीस छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी मागितली होती. बादशाहने ती परवानगी दिली. सन १६९४-९५ ला ब्रम्हपुरी गावाजवळ संथ वाहणाऱ्या भीमा नदीकाठच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात किल्ला बांधण्यात आला. तो माचणूर किल्ला गावात सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेवटला आहे. सन १७०१ पर्यंत औरंगजेब येथे मुक्कामी होता. माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारासमोर भव्य तटबंदी आणि दोन बुरुजांचा आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशीदीच्या मागील बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे. या किल्ल्यात मोघल सैन्याची मोठी छावणी होती. स्वतः औरंगजेब किल्ल्यात बसून न्यायदान करी. छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसुबाई, छत्रपती श्रीशाहू महाराज (सातारा) हे औरंगजेबच्या नजरकैदेत २९ वर्षे आणि त्यातील १७ वर्षे महाराष्ट्रात छावणीत असताना ब्रह्मपुरी (सोलापूर) मुक्कामातील अखेरच्या दिवसात त्यांचे धर्मांतरण होण्याची वार्ता बादशाहाने पसरवली होती. तेव्हापासून प्रयत्नरत राहून बाळाजी विश्वनाथ (पहिले पेशवे) यांनी औरंगजेबच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन बादशाहाची ही चाल उध्वस्त केली. ह्या प्रसंगाची सुरुवात झाली होती ती ब्रह्मपुरीत आणि शेवट घडला होता दिल्लीत.
माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलीकडील किनार्‍यावर बेगमपूरमध्ये औरंगजेबच्‍या बेगमची कबर आहे. आपल्या काळात सिद्धेश्वर मंदिर नष्ट करण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न औरंगजेबने केले. मंदिरे फोडण्यासाठी त्याने स्वतंत्र तुकडीची नेमणूक केली होती. त्याची झळ पंढरीच्या पांडुरंगालाही बसली. भीमेच्या पाण्यातलं हे सिद्धेश्वर मंदिर वाहून जावं यासाठी मोठा चर खोदण्याची व्यवस्था त्याने केली होती. पण ती यशस्वी झाली नाही. प्रचलित मौखिक कथेनुसार काहीसे स्थिरावल्यावर औरंगजेबने आपल्या सैनिकांना थेट श्रीसिध्देश्वराचे प्राचीन शिवलींग फोडण्याचे, उध्वस्थ करण्याचे आदेश दिले. मात्र या कामगिरीवर आलेल्या सैनिकांवर तेव्हा भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला. नाईलाजाने जीव वाचविण्यासाठी सैनिकांना परतावे लागले. घडल्याप्रकारने औरंगजेब चांगलाच संतापला. त्या संतापातच भगवान श्रीशंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याने नैवेद्य म्हणून एका थाळीत गोमांस पाठवले. तेव्हा मात्र अतर्क्य घडले. सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात औरंगजेबने पाठविलेल्या थाळीवरील वस्त्र बाजूला होताच गोमांसाच्या जागी पांढरी फुले अवतरली. एका अर्थाने औरंगजेबने संतापात पाठविलेल्या मांसाचा नूर पालटला. म्हणून मासनूर पुढे याचाच अपभ्रंश माचणूर नाव प्रचलित झाले. अर्थात नंतर खजिललेल्या औरंगजेबाने या प्राचीन श्रीसिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये आणि ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. इथल्या उत्सवादरम्यान शासकीय पूजा प्रथम होते. आजच्या महाशिवरात्रीसही पहाटे ५ वाजता मंगळवेढा तहसिलदारांच्या शुभहस्ते ती संपन्न झाली. पहाटे ४ वाजल्यापासूनच भक्तांनी दर्शनाला रांगा लावलेल्या. गेल्यावर्षी नदीपात्रात पाणी अभावाने होते, यंदा भीमेचे पात्र तुडुंब भरलेले. पात्रात डुबकी मारून पहाटे ओलेते भाविक दर्शन घेऊन गेलेले.
वर्तमान माचणूर विलोभनीय आणि नयनरम्य भीमा नदीच्या तीरावरील पुरातन श्रीसिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सातवाहन काळापासून चिपळूण-कराड-मंगळवेढा-तेर हा व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे. हा परिसर हजार वर्षांपूर्वी बिज्जल राजवटीच्या राजधानीचा भाग होता. डोळस पर्यटकांसह प्राचीन स्थापत्य, कला, संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासकाला या परिसरात वावरण्याचा मोह आवरणे कठीण. फारपूर्वी या सिद्धेश्वराच्या तटबंदीला लागून लोकवस्ती असावी असं इतिहास अभ्यासकांचं निरीक्षण आहे. यापूर्वी इथे खोदकामात, जमीन नांगरताना जमीनदोस्त झालेल्या घरांच्या पक्क्या भाजलेल्या वीटा, विविध मातीच्या वस्तू, सोने, सोन्या-चांदीच्या मोहरा, देवदेवता, जुनी नाणी, निरनिराळ्या आकाराचे व रंगाचे मणी, अंगठीतील रंगीबेरंगी खडे अनेकांना मिळालेले आहेत. औरंगजेबच्या काळात इथल्या लोकांनी जमिनीत पुरुन ठेवलेली संपती तशीच राहून गेली असावी. याशिवाय देवदेवतांच्या निरनिराळ्या अवयवांचे घडविलेले अवशेष, शाळीग्रामच्या भग्नशिळा येथे सापडतात. औरंगजेबचा इथला प्रदीर्घ मुक्काम पाहाता त्याने मंदिरांच्या देवतांची तोडफोड केली असावी. या परिसरात तपश्‍चर्या केलेल्या साधू, संन्याशांच्या मते, सिध्दरायाच्या आसपास जगदंबा पार्वती मातेचे भव्य मंदिर, गणपती आणि विष्णुचे मंदिर होते. इथल्या बांधकामातील अनेक मोठमोठ्या शिळा किल्यातील इतर बांधकामात वापरल्या गेल्यात. अर्थात सध्याच्या मल्लिकार्जुन मंदिराची जागा, इतर रचना आणि संदर्भ पाहाता पूर्वी येथे अजून काही मंदिरे असावीत, या मताला दुजोरा द्यावासा वाटतो. श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिराचा प्राचीन बाज आजही टिकून आहे. त्याला रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्याची मागणी होते. ती चुकीची आहे. पुरातत्त्वीय निकषांच्या आधारेच वास्तूची आहे त्या स्थितीत कोणताही फेरफार न करता किमान स्वच्छता ठेवायला हवी.
मानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील प्रेरणांच्या अन्वयार्थ आधारे उभे राहात असते. ‘मनुष्यामध्ये असलेल्या शक्तींचा विकास व्हावा अशी कल्पना साधनेच्या पोटी असते. माचणूर या कल्पनेचा पुरस्कार करत नाही. शक्तींवर आलेली आवरणे दूर सारावी लागतात. म्हणजे त्या शक्तीचे शुद्ध स्वरूप प्रकाशात येते. मनुष्य आपल्यामधील जेवढ्या शक्तींचा आपणास परिचय असेल तेवढीच शक्ती आपण वापरीत असतो. साधक म्हणून, उपासक म्हणून मनुष्याने निष्ठापूर्वक जीवनव्यवहार सुरू केला की, त्याचे जीवनातील प्रत्येक कर्म साधना होत असते. अशा कर्मांनी आपल्यातील उत्तमोत्तम शक्तींचा परिचय आपणास होऊ लागतो. या आत्मिक शक्तीचा उपयोग, दिव्यातिदिव्य कर्मासाठी आपण करू शकतो’, अशी भूमिका श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांनी ‘माचणूरचे हृद्गत’ या आपल्या प्रवचनातून मांडलेली आहे. मानवी शक्तींचा परिचय होण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठी एकदातरी ‘माचणूर’ला भेट द्यायला हवी. 

श्रीसिद्धेश्वर तीर्थक्षेत्र माचणूर हार्दिक स्वागताची कमान

पहिले प्रवेशद्वार

ओवऱ्यांंच्या छतावरून दिसणारे हेमाडपंती मंदिराचे दृश्य

यात्रेतील दुकाने

यात्रेतील दुकाने


यात्रेतील दुकाने

यात्रेतील दुकाने

यात्रोत्सव परिसरात न्याहारीला बसलेले भाविक

दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालेले भाविक

दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालेले भाविक

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

श्रीसिद्धेश्वर

नंदी

मंदिराचे प्रवेशद्वार

श्रीसंत आर्वीकर महाराज

श्रीसंत आर्वीकर महाराज समाधी

प्रसादाचे वाटप

श्रीसिद्धेश्वरासाठी पुरणपोळ्यांचा नैवद्य 

     करताना कर्नाटकातील महिला भाविक

मंदिराची तटबंदी आणि घाट

श्रीजटाशंकर मंदिर आणि भीमा नदीवरील घाट

भीमा नदीचे चंद्रकोर पात्र आणि नदीवरील घाट

श्रीजटाशंकर मंदिर

श्रीजटाशंकर मंदिर

वाटवाघळे

वाटवाघळे

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. 
मो. ९८६०३६०९४८,           
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...