बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

लाभो सर्वां निरोगिता


गणेशोत्सवाशी कोकणवासियांचे जीवाभावाचे नाते आहे. इथल्या माणसांना बाप्पा आपल्या घरातला वाटतो. ही माणसं बाप्पाची नुसती पूजाअर्चा नि आरत्या करत नाहीत. तर तो असेल तितके दिवस त्याच्याशी संवाद करत राहतात. त्याला आपली सुखदु:खे सांगतात. नवस-सायास करतात. वर्षभराची उर्जा उरी साठवून आपलं जीवन जगायला सिद्ध होतात. येणाऱ्या संकटांवर मात करत राहातात. कदाचित म्हणून कोकणी माणसं आत्महत्या करत नाहीत. गेल्यावर्षी ३ जून (२०२०) ला कोकण किनारपट्टीवर धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ, यावर्षी (२०२१) आलेलं तोक्ते चक्रीवादळ आणि जुलै २०२१ मधल्या अतिप्रचंड महापूराने या माणसांच्या मागच्या ५/२५ वर्षांच्या मेहनतीवर कुऱ्हाड फिरवलेय. त्यातच गेली दोन वर्षे आलेलं ‘कोरोना’चं संकट वैश्विक आहे. शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगच्या महामारीचं वर्णन, ‘एकाची तिरडी पोचवून परतलो की दुसऱ्याची बांधायला लागायची’ अशा शब्दात केलेलं आहे. ‘कोरोना’ची भयावहताही कमी नव्हे ! तरीही अनंत यातायात अडचणींना तोंड देऊन कोकणी माणूस घराघरात पोहोचेल. मर्यादित उपस्थितीत का होईना, ‘लाभो सर्वां निरोगिता’ असं साकडं आपल्या लाडक्या बाप्पाला घालताना दिसेल !

जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनाच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धीप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहातो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. कोकणातल्या माणसाची गणेशोत्सवाशी नाळ पारंपारिक जुळलेली असल्याने त्याचे या काळातले वर्तन निवळ कायद्याने नियंत्रित होऊ शकत नाही. असंख्य अडचणी असतानाही मनुष्य आपल्या ठरवलेल्या तत्वाने जगतो, वागतो कारण त्यात त्याचा आनंद सामावलेला असतो. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा (५ ऑगस्ट २०२०) जल्लोष देशभर साजरा होत असताना कोकणसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूर आलेला होता. अशातच त्या दिवशी दुपारी रत्नागिरी तालुक्यातल्या तोणदे गावातील श्रीसांब मंदिरातल्या श्रावण नाम सप्ताहाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. कौलारू मंदिरात छातीपर्यंत पाणी भरलेले असताना छताच्या आढ्यावर बसून भाविक श्रीनामाच्या गजरात दंग झालेले अनेकांनी पाहिले. कोकणातल्या उत्सवी उत्साहाची ही प्रातिनिधिक अनुभूती होती. हिंदू जीवन पद्धतीत मानवाला विष्णू चरित्र आवडल्यास त्याला वैष्णव होता येते. शिवाची उपासना केल्यास शैव होता येते. तसेच रामाची उपासना केल्यास रामभक्त, गणरायावर प्रेम केल्यास गाणपत्य होता येते. मूळ हिंदूजीवन पद्धतीचा त्याग करावा लागत नाही. ही फार मोठी वैश्विक उपलब्धी यात सामावलेली आहे.

                    सन १८९३ ला झालेल्या हिंदू मुसलमानांच्या मोठ्या दंग्यावर विचारविनिमय करण्यासाठी पुण्यात वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी भरलेल्या सभेत घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना पुढे आल्याची नोंद ‘गणेशोत्सवाची साठ वर्षे’ या ज. स. करंदीकर यांनी १९५३ साली संपादित केलेल्या ग्रंथात भेटते. लोकमान्यांनी २६ सप्टेंबरला दैनिक केसरीतून या कल्पनेचे कौतुक केले. १८९४ ला स्वत: राहात असलेल्या श्री. सं. विंचुरकर यांच्या वाड्यात त्यांनी १० दिवसांच्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. उत्सवातून धार्मिक समतोल राखण्याबरोबर लोकसंघटन आणि संघटनेतून सबळीकरण होईल या सामाजिक मानसशास्त्राचा विचार करून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेला व्यापक स्वरूप दिले. गणेशोत्सवाला ज्ञानसत्राची जोड दिल्याने ते चळवळीचे साधन ठरले. कोकणात मुरुड (रायगड) गावी श्रीमंत ताईसाहेब बाळ यांचे चिरंजीव बापूराव यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. मेळे, मंत्रजागर, भजन, दुर्वांची सहस्रनामे असे कार्यक्रम होऊन समुद्रकिनारी बाप्पाचे विसर्जन होई. उत्सवातील मेळ्यांतून ज्ञान मिळे. मेळ्याच्या पदांनी सामाजिक आणि धार्मिक गोष्टी अंतकरणाला भिडत. ‘पैसाफंड’सारखी उपयुक्त संकल्पना कै. अंताजी दामोदर काळे यांनी १८९९ च्या दुष्काळाच्या वेदना अनुभवल्यावर याच उत्सवात सुरु केली. त्यावर्षी देवगडला १८९९ ला विठ्ठल मंदिरात खांबेटे, सदाशिवराव तांबे, रामभाऊ लेले वकील यांची व्याख्याने झाली होती. कर्जत, राजापूर, रत्नागिरीत सन १९०० मध्ये, चिपळूण, पेणला सन १९०५ पासून उत्सव सुरु झाला. आमचं मूळगाव असलेल्या केळशीत (दापोली) प्लेगची साथ आली होती. तेव्हा ग्रामस्थांनी गावातील भैरीबुवाला गाऱ्हाणे घातले होते. देवळात सात दिवस अखंड नामसप्ताहकेला होता. प्लेगची साथ क्षमली आणि नामसप्ताहाची प्रथा सुरु झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे सन १९०८ साली मिठगावणे (राजापूर) येथील उत्सवात आपापसातले कब्जे सरकारात न्यायचे नाहीत. गुरे कोंडवाड्यात पोचवायची नाहीत. अशा शपथ लोकांनी घेतल्या होत्या. मद्यपानाविरुद्ध चळवळ करण्याचे लोकांनी ठरविलेले होते. आपल्यातील राष्ट्रीय गुण लोप पावत चालले असताना निरुपद्रवी असणं हा राष्ट्रीय दुर्गुण असल्याची जाणीव करून देत राष्ट्राचे काम आपणच केले पाहिजे या विचाराचे राष्ट्रीय गुण लोकांच्यात यावेत असं शिक्षण उत्सवातून लोकांना दिलं जाऊ लागलेलं. सध्याच्या कोरोना महामारीची मूळ समजून घेऊन यंदाच्या उत्सवातही लोकांनी अशाच मातृभूमी संरक्षण आणि संवर्धनाच्या शपथा घ्यायला हव्या आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवी कार्यक्षमता डिस्चार्ज होऊन काहीवेळ स्वतःला शटडाऊन करण्याची वेळ येते तेव्हा या बाप्पाचं येणं इथल्या माणसाला मानसिक बळ देत असत. याची निश्चित जाणीव असल्यानं स्वतःच्या जीवाचे अतोनात हाल सहन करून चाकरमानी कोकणात पोहोचतात. गेली दोन वर्षे या त्रासाला ‘कोरोना’ची दुर्दैवी किनार आहे. चाकरमान्यांनी गणपतीसाठी येण्यापूर्वी विचार करावा असं कितीही म्हटलं गेलं तरीही कोकणात लोकं आली आहेत. अर्थात त्यांच्या येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलं आहे. दरवर्षी कोकणात जाण्यासाठी गाड्यांची बुकिंग ४/६ महिने अगोदर सुरु होतात. कितीही व्यवस्था केली तरी अपुरी पडते हे वास्तव माहित असताना प्रवास करण्यासाठी आवश्यक ई-पास, वैद्यकीय तपासणी आदिंबाबत वेळेत पुरेशी स्पष्टता मिळवून देण्यास सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरल्याच्या तीव्र भावना चाकरमान्यांच्या मनात गेल्यावर्षी होत्या. यंदाही टेस्ट होणार आहेत. गेल्यावर्षी कोकणात जाणारे बरेचसे चाकरमानी स्वतःच्या खर्चाने, गाड्या भाड्याने करून गेलेले. यंदा ट्रेन आणि एस.टी. बसच्या जागा भरल्यात. गेल्यावर्षी त्या निम्याही भरलेल्या नव्हत्या. शासकीय निर्णयाला झालेली दिरंगाई यामागे होती. राज्यातल्या ज्या परप्रांतीयांना सरकारने पैसे खर्च करून त्यांच्या राज्यात सोडले ते तिकडचा पाहुणचार झोडून परतले. आम्ही कोकणवासीय मात्र अनेक आठवडे ई-पास कसा मिळवावा ?, एस.टी. सुरू होईल का ?, गावी किती दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल ? या गेल्यावर्षी चाकरमानी अडकले होते. होळी आणि गणपतीला रजा नाही मिळाली तर नोकरीवर लाथ मारून जाणारा असा आमचा इतिहास ! पण कोरोना काळात गाववाले विरुद्ध चाकरमानी अशी आमच्यातच दुर्दैवी दरी निर्माण झाली होती. यावर्षी स्थिती बरी आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मध्यंतरी एका आयुर्वेदीय उपचार केंद्रात गेलो होतो. तिथे आलेली एक महिला वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना हातातली पिशवी सोबत घेऊन जाऊ लागलेली. म्हणून सहजच तिला, ‘पिशवी राहू देत तिथं कोण नेत नाय ती !’ असं सांगण्याचा प्रयत्न वैद्यांनी केला. ‘पैसेबैसे नाहीत ना तीत ?’ असंही विचारलं. अर्थात पिशवीत पैशाचं पाकीट होतं. साहजिक ती बाई पिशवी स्वतःपासून सोडायला तयार नसावी. समोर बसून पाहणाऱ्या आम्हाला त्यात काही विशेष वाटलं नाही. हे सगळ स्वाभाविक ! पण पिशवी उचलून वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना ती चटकन म्हणाली, ‘नको बाबा, पैसा भेटत नाय आता !’ तिच्या या वाक्यानं आम्हाला भलतंच प्रभावित केलं. कोकणच्या भूमीत जगाला समृद्ध करू शकणाऱ्या अर्थव्यवस्थेची मूळं लपलेली असतानाचं हे जीणं अस्वस्थ करणारं आहे. गणेशोत्सवकाळात ‘चाकरमान्यांना कोकणात येऊ नका !’ हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं त्या महिलेच्या वाक्यातल्या व्यथा समजून घेणं निश्चित सोपं नाही. दरवर्षी या काळात गल्लोगल्ली आपली पावडरलेली तोंड घेऊन फ्लेक्स बॅनरवर दर्शन देणाऱ्यांनी आपापल्या भागातील चाकरमान्यांची घरपट जबाबदारी घ्यायला हवी. जवळपास सत्ताधारी असलेल्या कोकणाला हे अवघड नाही. म्हणजे नियोजनाचा दुष्काळ राहाणार नाही. आपल्यावरील कोरोनाचे संकट आजही पूर्णतः टळलेले नाही. ११ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करताना याचे भान बाळगावे लागणार आहे. अर्थात आजची स्थिती कायम राहणार नाही. हेही दिवस जातील. भविष्यात गणेशोत्सव येतील. तेव्हा या वर्षीची उणीव भरून काढता येईल. पण सध्याचा काळ संयमाची कसोटी पाहणारा आहे. आपलं प्रशासन म्हणजे माणसे आहेत. कोरोना रुग्ण वाढले तर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, आणि काही कलेक्टर, सीईओ यांची पुरती दमछाक होते. म्हणून आपण नागरिकांनी हक्क मागताना कर्तव्य पालनाकडे पाहायला हवे आहे.

गणपती बाप्पाचं रुपडं तसं विचित्र. सतत ज्ञान ग्रहण करायला सांगणारं ते हत्तीचं मोठालं मस्तक, सूक्ष्म निरीक्षण करायला सांगणारे लहान डोळे, लांबलचक सोंड, सारं सावधपणे ऐकायला सुचविणारे मोठाले कान, बाहेर आलेला दात, लोकांचे अपराध पोटात घालून क्षमाशील वृत्ती ठेवण्यास सांगणारे भलेमोठे पोट, सापाचे बंधन, अन्यायाचा प्रतिकार करायला सांगणारी आयुधं आणि वाहन काय तर उंदीर तरीही बाप्पा आम्हाला परमप्रिय कारण आमच्या मनातले त्याचे रूप वेगळे आहे. आमच्यासाठी तो सुखकर्ता दुखहर्ता आहे. ‘यावर्षी बाप्पाला आरास कोणती करायची ?’ याचे काही महिने अगोदर सुरु होणारे नियोजन असो किंवा बाप्पाला मुक्यांनी पोहोचविण्यात काय अर्थ ? म्हणून त्यांच्यासमोर एकतरी भजन झालंच पाहिजे अशा घराघरात होणाऱ्या प्रयत्नाला यंदा ब्रेक लागला आहे. तसा ब्रेक खंडणीचं दुर्दैवी स्वरूप येऊ पाहणाऱ्या वर्गणीला, कर्णकर्षक आवाज, अश्लील गाणी आणि गुलालाच्या अतिरेकी वापरालाही आला आहे. दरवर्षी कोकणवासिय बाप्पाच्या डोक्यावर पाने, फळे, फुले, वेली, कवंडाळं, आंब्याच्या डहाळ्याची जी ‘माटवी’ बांधतात. त्यामागे पर्यावरण संवर्धन संकल्पना आहे. पूर्वी रानावनात गुरांच्या मागनं फिरणारे गुराखी या कवंडाळाच्या वेली हेरून ठेवत असत. कोरोना असला तरी हे चित्र घराघरात दिसेल. आपल्या या उत्सवातील पर्यावरण रक्षणाचा संदेश समजून न घेता आम्ही बाप्पाच्याच तोंडावर ‘मास्क’ लावला तर अवघड होईल. गणपतीचा उत्सव हा सगळया पर्यावरणाला आणि परिसराला आनंद देणारा असला पाहिजे. गणेश पूजेसाठी लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक ही फुले तर मोगरा, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ति या २१ पत्री (पाने) शास्त्राने सांगितल्या आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन म्हणून आपल्या परसदारी किती वनस्पती आहेत ? किती लावायच्या आहेत ? त्यासाठी आपण काही करणार आहोत का ? ज्या वनस्पती आहेत त्यांच्याविषयी आपण सोशल मीडियात पोस्ट करू शकतो का ? असा साधासा कृतियुक्त पर्यावरणीय विचार करायला हरकत नाही. बाप्पाला निर्विवाद शाकाहारी भोजन प्रिय आहे. मात्र गौरीला मांसाहारी आहार कसा काय चालतो ? हे  आमच्या सारख्याला न समजलेले कोडे आहे. पडत्या पावसात रात्रीच्यावेळी जेवणावळी आटपल्यावर चिडीचूप झोपी जाणाऱ्या कोकणात या दिवसात वाड्या-वस्त्यांवर घराघरात आळीपाळीने कोणा बुवाची थाप अचानक ऐकू येते. भजनाचा साज ठीकठाक असल्याची खात्री झाली बुवांच्या आवाजाने भरून गेलेल्या वातावरणात सारे सखेसोबती बाप्पासमोर किंवा पडवीत जमा होतात. ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा आवाज रात्रीचा अंधार कापत वाड्या वस्त्या घुमवून काढतो. गणपतीच्या दिवसातल्या या पायरवालाही यंदा ब्रेक  लागलाय. विसर्जनवेळी बाप्पासोबत दहीभाताचा नैवद्य दिला जातो. आपल्याकडे प्रवासाला निघणाऱ्या माणसाच्या हातावर चमचाभर दही देण्याची परंपरा आहे. पाहुण्याला विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या त्यामागे असलेल्या कारणाची आम्ही ‘कोरोना’काळात उजळणी करायला हवी आहे. महाकवी कालीदासानं ‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असं उत्सवप्रिय माणसाचं वर्णन केलं आहे. देशातील लोकजीवनाला जीवनस्पर्शी सांस्कृतिक परंपरेची जोड लाभलेली आहे. हे सगळं आम्हा कोकणवासियांच्या खरं असलं तरी कोरोनाने जाखडी नृत्य परंपरेत म्हटलं जाणारं ‘गणा धाव रे...’ हे गीत म्हणण्याची भक्तांवर आणलेली आहे.

जगाच्या इतिहासात प्लेग महामारीच्या पाऊलखुणा आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. सन १३५० च्या सुमारास युरोपात झालेला प्लेगचा उद्रेक भीषण होता. तेव्हा एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकं मृत्युमुखी पडली होती. १५ व्या शतकात उत्तर आणि दक्षिण अमेरिकन वसाहतींमध्ये इतक्या लोकांचा बळी गेला की त्याचा परिणाम जगाच्या वातावरणावर झाला. सध्या Epidemic Diseases Act, 1897 चा उल्लेख वारंवार होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेला हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता. प्लेगच्या साथीच्या वेळी घरात उंदीर मरून पडलेला दिसला की लोकं घर सोडून गावाबाहेर पळत. गावाबाहेर वाडीत वा शेतात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून राहात. अनेक गावे ओस पडली होती. मृताचा शोक करायला, रडायला सोडा त्याच्या अंत्यसंस्कार करायला जाण्याची हिंमतही होत नसायची. काखेत किंवा जांघेत गाठ आली की तो माणूस गेलाच म्हणून समजावे लागायचे. रोगावर औषध उपलब्ध नसल्याने बाधा झालेली व्यक्ती अगदी अल्पावधीची आपली साथीदार आहे असे समजण्यात यायचे. १८९६१९१७ या काळात एकट्या भारतात ९८ लाख ४१ हजार ३९६ (मराठी विश्वकोश) लोक प्लेग साथीच्या रोगाला बळी पडले. प्लेगच्या साथीच्या काळात अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करून त्याचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्यात आले होते. आपल्या देशाने मागील काहीशे वर्षात रोगांच्या साथी पहिल्यात. पण आजसारखी रात्रंदिवस झोपा उडवणारी समाजमाध्यमे तेव्हा लोकांच्या हातात नव्हती. जसजसे विज्ञान प्रगत होत आहे तसतसा नवनवीन रोगांचा जीवघेणा फैलाव होत आहे. भारत नावाच्या आपल्या एकाच देशात अनेक देश राहातात. त्यांचं जगणं परस्परविरोधी असतं. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू वाढतात. दुसरीकडे अधिक रूग्ण बरे झाल्याची बातमी येते. रुग्णांना दवाखाने अपुरे पडत असतानाही शहरी वस्त्यांमध्ये जमाव काबूत येत नाही. लाखो बेघर उपाशीपोटी आपल्या गावाला जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघतात. काही टॅंकरचा वापर करतात. जनजीवन सुरळीत होईल म्हणून काहीजण समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात. वाढदिवसाच्या जाहिराती सुरु राहतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असताना काहींना दारू दुकानं उघडी हवी असतात. संकटकाळातही राजकारण दिसतं तेव्हा आपला छुपा अजेंडा पुढे रेटणाऱ्यांची कीव येते. तरीही आपण सध्याच्या काळात मन विषन्न आणि उद्विग्न होऊ न देता निर्धाराने निरामय सूर जपायला हवा. गलबला कितीही वाढला तरी आशावादी राहात खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी.

इतिहासाचार्य वि. के. राजवाड्यांच्या मते आपल्याकडला वैयक्तिक आणि घरगुती गणेशोत्सव प्राचीन आहे. सातवाहन, राष्ट्रकुट आणि चालुक्य आदि राजघराण्यांच्या काळात तो चालू होता. पेशवेकाळात त्याला महाराष्ट्रात अधिक महत्त्व प्राप्त झालं. टिळकांनी त्याला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप दिलं. राष्ट्रभक्ती साधली. गणेशोत्सव हे लोकसंवादाचं व्यासपीठ बनवलं. या गणेशोत्सवानं कार्यकर्ता निर्माण करणारा लोकविद्यापीठ म्हणून ही काम केलं. मात्र स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा विस्तार वाढला आणि वैचारिक खोली कमी होत गेली आहे. त्यामुळे ‘गणपती रत्यावर आणू नये’ हे महादेव गोविंद रानडे यांनी व्यक्त केलेलं मत नंतर अशंत: पटू लागलं. गेली काही वर्षे यावर लिहिलं बोललं जातंय. म्हणून ‘कोरोना’ काळात लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे झालेले मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रीय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कुठेही विरोध झालेला नाही. त्यामुळे आपण हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)














गणेशोत्सव : वैभवशाली इतिहास, अस्वस्थ वर्तमान आणि आपण


जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर का होईना या लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रिय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कोणीही कुठेही विरोध केलेला नाही. त्यामुळे आता कुठे थांबायचे, हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

सांज 'सोबत' निमाली !

अपर्णा बेलोसे कदम ! आपल्याला आता भेटणार नाहीत. त्यांचं नवीन लेखन वाचायला मिळणार नाही. हे इतकं अचानक घडेल असं वाटलं नव्हतं. ‘कोरोना’च्या विषाणूच्या महामारीत, व्यापक समाजभान जपणारे वृक्ष काळाच्या उदरात जाणाऱ्या चेहऱ्यांमध्ये एक ऑगस्टच्या सकाळी त्यांची भर पडली. अगदी सकाळी समजलेल्या ह्या घटनेनं कळवळायला झालं ! विश्वास बसेना. ‘कार्या व्हावे समर्पित हेचि बरे...’ तत्वाने जीवन जगणाऱ्या अपर्णा बेलोसे कदम यांनी अनेक क्षेत्रातील उत्साही वावरातून जीवन जगत असंख्य आठवणी मागे ठेवून घेतलेली अचानकची एक्झिट म्हणूनच वेदनादायी आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक हा त्यांचा प्रवास त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती सांगणारा राहिला. जीवनात ज्याज्या ठिकाणी त्या वावरल्या, वास्तव्याला राहिल्या तिथे प्रसंगानुरूप धावून जाण्याच्या त्यांच्या ममत्व आठवणी अनेकांपाशी हृदयस्थ आहेत. एका बाजूला कर्तव्यदक्ष अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला संवेदनशील मनाचा उमदेपणा अशा दोन टोकाच्या भूमिकांमध्ये गुंफलेलं जीवन विलक्षण ताकदीनं जगणारी कवयित्री, लेखिका असलेल्या अपर्णा बेलोसे कदम यांचे व्यक्तिमत्त्व अलिकडच्या काळात ‘सांजसोबत’ संस्थेतील शीर्षकामामुळे समाजाभिमुख झाले होते. जबाबदारीची नोकरी आणि कुटुंब सांभाळून त्यांनी साद कवितासंग्रह, संसार वारीचा कथासंग्रह आदि तीन पुस्तकेही लिहिली. आपल्यासोबत काम करणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना, ‘कसे आहात रे ! निवांत झालात की भेटायला या’ असं सहज बोलून आपलसं करणारा त्यांचा आवाज आता ऐकायला येणार नाही. शाळा-महाविद्यालयीन जीवनातील आपल्यातील लेखन, वकृत्व, संवाद कौशल्य, काव्य, नाट्य आदि अंगभूत कलागुणांना पुढील आयुष्यात प्रापंचिक कसरतीत सांभाळणं, यथायोग्य खतपाणी घालून त्यांची जोपासना करत सतत कार्यरत राहणं हे तसं कठीण. पण मॅडमनी तर या साऱ्या क्षेत्रात ‘परीक्षक’ होण्यापर्यंतची उंची गाठली. अलिकडे कोल्हापूरला झालेल्या महिला नाट्य महोत्सव स्पर्धेकरिता त्या निमंत्रित परिक्षक होत्या. आयुष्य रसरसून जगायचं कौशल्य त्यांनी प्रयत्नपूर्वक साधलं होतं.

सोशल मिडीयावर पोस्टद्वारे सहज व्यक्त होत मतांशी ठाम राहात, संपर्कातील इतरांचे विचारस्वातंत्र्य जपत त्यांनी साधलेली मैत्री त्यांच्यातल्या प्रभावी संवादकौशल्याची जाणीव करून द्यायची. श्यामच्या आईच्या जन्मशताब्दीनिमित्ताने चतुरंग प्रतिष्ठानच्या परिसंवादात त्यांनी ‘आई’च्या बाजूने मांडलेली मते आजच्या काळात विचार करायला लावणारी. सांजसोबतच्या माध्यमातून दुर्गम ग्रामीण भागातील वृद्ध दाम्पत्यांना असलेली आधाराची गरज ओळखून सुरु झालेलं काम आज अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलं आहे. चिपळूणचे ग्रामदैवत श्रीदेव जुना कालभैरव देवस्थानने हल्लीच कोरोनाकाळात ‘सांजसोबत’ संस्थेला मदत दिली. यात देवस्थानच्या साड्या आणि धोतरांच्या जोड्या होत्या. यातली काही वस्त्र देवीला नेसवलेली असल्याचे कळल्यावर, ‘किती भाग्यवंत आमचे आई बाबा !’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तिवरे धरणफुटीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याचे उत्तरकार्य केल्यावर, ‘या दोघांना आम्ही अजून पाच वर्षे तरी जगवले असते’ हे त्यांचं बोलणं कामावरील श्रद्धा सांगणारं होतं. इतरांना काळजी घेण्याचा मायेचा सल्ला देणाऱ्या मॅडम अशा अचानक कश्या काय जाऊ शकतात ? ह्या विचाराने म्हणूनच व्यथित व्हायला होतं.

मुद्रित माध्यमांत संपादकांना हव्या असलेल्या दृष्टीनं दिलेला विषय लिहिण्याचं कौशल्य कमी होतंय ! किंबहुना असंही असतं याची जाणीव नसलेल्या पिढीची रुजवात पक्की होत असताना मॅडमचं नैमित्तिक लेखन संपादकीय दृष्टीकोन सांभाळून होतं. स्थानिक कलाकारांसोबत ‘हमिदाबाईची कोठी’ साकारताना एकत्रित लय जमवणं निश्चित सोपं नव्हतं. पण त्याहीपेक्षा मॅडमनी ती कलाकृती राज्य नाट्य स्पर्धेसाठी करायला स्वीकारणं आणि त्यातही ‘हमिदाबाई’चं आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व स्वत: पेलणं हेच मोठं धाडस होतं. आम्ही ग्रामीण पत्रकारितेत वावरताना, अठरा वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ‘प्रसार माध्यमे आणि साहित्य’ या विषयावरील भूमिका मांडल्यावर त्यांनी केलेलं कौतुक, अगदी दोन वर्षांपूर्वी, नामवंत कवी अरुण म्हात्रे एका साहित्यिक सहलीच्या निमित्ताने कवीवर्य अशोक नायगावकरांसोबत चिपळूणला आले असताना आपल्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावना आणि प्रकाशनासाठी त्यांना भेटायला आलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या संवेदनशील तितक्याच बेधडक लेखनाद्वारे सोशल मिडीयावर नियमित सक्रीय असलेल्या मॅडम आता कायमच्या स्मरणबद्ध झाल्यात.

‘कार्यरत’ माणसं काही कळायच्या आतच अशी एक्झिट घेतात तेव्हा माणूस संपत चालल्याची जाणीव होते. तिन्हीसांजेचं विदारक जीणं जगणाऱ्यांची सोबत निमाल्याचं सत्य स्वीकारणं अनेकांसाठी वाटतं तितकं सोपं नाही. स्पर्धेच्या जंजाळात स्वतःला हरवून कणाकणांनी मातीचं देणं विसरू पाहणाऱ्या दुनियेत फारशी कुणाची वाट न बघता आपल्या स्वयंप्रेरित सहकाऱ्यांच्या बळावर ‘अपर्णा बेलोसे कदम’ नावाचा झरा पूर्ण क्षमतेने वाहात होता. अशातच ‘अचानक निमाल्या अपर्णा, झाल्या निशब्द संवेदना !’ ही स्थिती उभी राहिली असली तरी त्यांनी ‘सांजसोबत’ मळलेली पाऊलवाट विस्तारायला हवी आहे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८


दैनिक सागरने १० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केलेली श्रद्धांजली पुरवणी 

गुरुवार, ३० जुलै, २०२०

‘जलजल्लोष’धारा आठवताना...

पावसाचं येणं मोठं गमतीशीर असतं. ‘कोरोना’ वर्षातील जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात, काही दिवसांची विश्रांती घेऊन हा पाऊस जल’जल्लोष’धारा पुन्हा बरसवू लागला. त्यांच्या थंडगार शिडकाव्याने चित्त प्रफुल्लित झालं. धबधब्यांच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. दुर्दैवाने त्या उत्साही धारा यंदा मानवी पाऊलखुणांच्या अभावी एकटेपणा अनुभवत आहेत. दरवर्षी ५/५० धबधब्यांचे नेत्रसुखद दर्शन आणि त्यातल्या काहींच्या ‘जलजल्लोष’धारांमध्ये मनसोक्त भिजण्यातला आनंद अंगवळणी पडलेल्यांना या आठवणी बैचैन करत असतील. काहीं मनात पाऊस म्हणजे तुंबणारी गटारं, बंद पडणारी वाहतूक व्यवस्था, रस्त्यातले खड्डे असंही असेल. तरीही पावसाळ्याला आपला आवडता ऋतू म्हणणारे कमी नाहीत. शहरांपासून दूर सह्याद्रीत, रानावनात, डोंगरदऱ्यांत, नव्याने उमललेल्या गवतांच्या जीवावर डोलणाऱ्या रानफुलांसोबत चालत जाऊन कोणा कातळकडय़ावरून कोसळणाऱ्या जलजल्लोषधारांच्या संगतीनं जगलेल्या या काही रोमांचक आठवणी...!

धबधबा हा वर्षाऋतूतील चैतन्याचा एक अविष्कार ! धकाधकीच्या जीवनात नियमित व्यापातून मोकळीक घेत आपण जेव्हा स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निसर्गही आपल्याला व्यापातून बाहेर काढण्यास मदत करतो. याची मनाला प्रसन्नता देणारी अनुभूती आल्यानं ‘शुद्धपणा’ म्हणतात तो जणू याच्याकडेच शिल्लक राहिलेला असावा, असं वाटतं. आपण निसर्गाशी एकरूप झालो की गर्द वनराईत, झाडांच्या सावल्यांत, मंद हलक्‍या वाऱ्यात शरीराला, मनाला आणि डोळ्यांना निखळ आनंद मिळतो. या निसर्गातल्या पावसाळी पर्यटनाला, तनामनाला चिंब करणारी धबधब्यांची किनार भेटते. कोणत्याही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून आपण धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने कूच केल्यावर हिरव्यागार वनस्पतींची झूल पांघरलेले डोंगर, त्यावरून वाहणाऱ्या खळाळत्या पांढऱ्याशुभ्र जलरेषा, कधी आकाशातून डोंगरावर उतरणारे इंद्रधनुष्य, कधी काळे ढग तर कधी निरभ्र सूर्यप्रकाशमय आकाशाच्या होणाऱ्या दर्शनानं आपलं मन प्रसन्न बनत जातं. हिरवाईत हरवलेल्या या रानवाटा चालताना जेव्हा पाऊस अंगावर जलधारा ओतत असतो तेव्हा आपण स्वत:च्या मालकीचा खाजगी पाऊस अनुभवत असल्याचा फील येतो. धबधबा जेव्हा नजरेच्या टप्प्यात येतो तेव्हा तर त्याचा धीरगंभीर आवाज, जलतुषारांनी कोंडलेला परिसर, पाण्याशी हितगुज साधण्याचा जमून आलेला निसर्गाचा मूड आपल्याला साद घालतो. आपला उत्साह वाढवतो. धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचल्यावर आपल्या कानात गुंजणारा ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा आवाज वेडावतो. आपण एखाद्या आडवळणावरून निसरड्या पायवाटेने धबधब्याकडे सरकत जात असतो. नेमका तोच काळजाचा ठोका चुकतो. पाय घसरतो. कोणीतरी सोबतचा नाहीतर निसर्गातल्या जैवविविधतेच्या साखळीतील घटक असलेली एखादी झाडाची फांदी, दगड किंवा कदाचित फोटोत अडसर ठरू पाहणारी वेल आपल्याला वाचवायला पुढे येते. आपण निसर्गाच्या त्या सात्विक मायेत अलगत गुंतत जातो. घसरलेल्या पायाची अनुभूती जीवनभरासाठी संस्मरणीय ठरते. निसर्गासोबत बेधुंद आनंद जगणाऱ्यांच्या आठवणींचा सारांश साधारणत असा असावा.

शालेय जीवनातलं नीटसं आठवावं लागेलं पण कॉलेजयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचं काम करताना ‘वर्षासहल’ उपक्रमामुळे आम्हाला पावसाळ्यातील सृष्टीच्या विविध रुपांसोबतचं ‘चुंबकीय’ जगणं अनुभवता आलं. निसर्गनियमानुसार हळूहळू आम्ही त्यात ओढले गेलो. कॉलेजविश्व संपल्यावर पत्रकारिता जगताना लिहिण्याच्या निमित्तानं आमची पाऊलं धबधब्यांच्या नव्या वाटा मळू लागली. गेल्या २०/२२ वर्षांत कित्येक धबधब्यांसोबत निसर्गक्षण जगून झालेत. तरीही धबधब्यांची मोहक आस काही संपत नाही आहे. हे त्या निसर्गाचं देणं ! यातूनच मग आमची पाऊलं निसर्ग संवर्धनविषयक जनजागृतीच्या दिशेला वळली. पावसाळ्यातील निसर्गऊर्जा मानवाला जबरदस्त टॉनिक देत असते. तिचं देणं सारखंच असलं तरी आपलं घेणं हे आपल्या अनुभूतींवर अवलंबून असल्याची जाणीवही याच काळात विकसित होत गेली.

श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या पदस्पर्शानी पावन झालेला काळ नदीप्रवाहानजीकचा  शिवथरघळीचा (रायगड) आवाजी उर्जेच्या जलप्रपाताचा अद्भुत परिसर तर आम्ही समविचारी मित्र मंडळीनी सरासरी वयाच्या पंचवीशीत पैदल अनुभवलेला. शिवथरघळीतून समोर दिसणाऱ्या जलधारांच्या पडद्याच्या साक्षीने साऱ्यांनी वयानुरूप भव्यदिव्य स्वप्न पाहिलेली ! स्वप्न पाहायची सुरुवात तशी आंबोलीला (सिंधुदुर्ग) झालेली, तीही धबधब्याच्याच साक्षीने ! आंबोलीच्या धबधब्याचे रस्त्यावरून वाहाणारे रौद्ररूप अनुभवणे जितके विलक्षण तितकेच धोकादायक ! आम्ही तिथे सन २००२ पासून जात आलोय ! आता तिथे सतत दरडी पडण्याच्या घटना घडत असल्यामुळे प्रवास करून जाऊन असा अनुभव पदरात पाडणं कदाचित कठीण ! अर्थात निसर्ग कधी ? कोणाच्या पदरात कोणता अनुभव टाकेल हे सांगणं कठीण. असो ! रामदासस्वामींचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहे. पर्यावरणरक्षणाची वर्तमान परिभाषा जन्माला आलेली नसल्याच्या काळात त्यांनी मांडलेली निरोगी निसर्गाची आवश्यकता किती मोलाची आहे हे आपल्याला आजवर निसर्गातल्या भटकंतीनं  सांगितलं. यंदा ते ‘कोरोना’ समजावून सांगतो आहे. शिवथरघळसंदर्भातील वाहत्या पाण्याची चंचल माया सांगणाऱ्या समर्थांच्या, गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे || धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।। या प्रसिद्ध ओळींची अनुभूती आम्ही पहिल्यांदा घेतलेला तो क्षण आनंदानुभूती देणारा ठरलेला. भर पावसात जावळीच्या निबिड खोऱ्यातून चालताना दुभंगलेल्या मारुतीच्या मूर्तीची झालेली भेट आम्हाला इतिहासाच्या वाटेवरून चालायची प्रेरणा देणारी ठरली. समर्थांची वसुंधरेवरील झाडेझुडपे, वृक्षवेलींना पाण्यामुळे गुणधर्म प्राप्त झाल्याची महती सांगणारी, नाना वल्लीमधें जीवन । नाना फळीं फुलीं जीवन ।। नाना कंदीं मुळीं जीवन । गुणकारकें।। ही ओळ तर पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव करून देणारी ! समर्थांच्या अशा विलक्षण रचनांची उजळणी आम्ही सन २००६ साली शिवथरघळी सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केलेली होती. सातारा जिल्ह्यातला पाटण तालुक्यातल्या पवनचक्क्यांच्या पठाराखाली असलेल्या श्रीक्षेत्र धारेश्वर गुंफा मंदिराची पर्यटन सहल ठरविण्यासाठी म्हणून केलेल्या दुचाकी प्रवासात भिरभिरणाऱ्या पवनचक्क्यांच्या सानिद्ध्यात अनुभवलेला आणि सर्वांगाला झोंबणारा सोसाट्याचा गार वारा, धुक्यात हरवलेले रस्ते, तिथला निसर्ग आठवला की आजही कोरोनाने मरगळलेल्या मनाला अचानक उभारी मिळते. या धारेश्वर गुंफा मंदिरासह राजाराणी (सावडाव-कणकवली), ठोसेघर (सातारा), कोंडाणे (कर्जत-रायगड), राऊतवाडी (राधानगरी) आदि गुहा-लेण्यांमधून धबधब्यांच्या मागे जाऊन पाहाता येणारी डोळ्यांचे पारणे फेडणारी अनुभूतीही विलक्षण आहे. उंचावरून कोसळणारं धबधब्यांचं फेसाळतं पाणी अंगावर घेण्यात जितकी मजा आहे तितकीच मजा या धबधब्यांच्या मागे उभारण्यात आहे.

१२/१३ वर्षांपूर्वी विळे-निजामपूर (रायगड) भागात, त्या सीझनमध्ये पहिल्यांदा येऊन भेटीसाठी खुणावणारा पाऊसही आठवतो. मे महिन्याच्या अखेरीला प्रवासात अचानक तो भेटीला आलेला. ग्रीष्माच्या कडकडीत उन्हाळ्याने सर्वांगी घामाच्या धारा वाहात असतानाच आकाश गडगडायला लागलं. क्षणार्धात काळे ढग दाटून आले. वळवाच्या पावसाचे ते थेंब जमिनीवर पडायला लागले आणि मातीच्या मोहक सुगंधाने मनातल्या अत्तरकुपीचा ठाव घेतला. बरं ! हा पाऊस तेव्हा टपोऱ्या ‘गारा’ घेऊन अवतरलेला. गारा अंगाखांद्यावरून सांडू लागल्यावर त्यांना हातात पकडण्यासाठी केलेले प्रयत्न आठवतात. याच जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील मोरझोत धबधब्याशी आमचा वेगळा जिव्हाळा आहे. मे महिन्यात जन्मलेल्या (२०१०) अडीच महिन्यांच्या चिरंजीवाला घेऊन जुलैमध्ये आम्ही सपत्नीक मोरझोतच्या दर्शनाला गेलेलो. लग्नानंतर या धबधब्याशी संपर्क आला. नरवीर तानाजी मालुसरेंच्या उमरठजवळच्या चांदके आणि खोपड गावच्या मध्यभागी असलेला हा धबधबा. अर्थात उमरठ समाधी दर्शन ओघाने आलंच ! याच भागात पाहण्यासारखं आणखी एक नवल भेटलं. ते म्हणजे गोपाळवाडीत असलेला महाराष्ट्रातील पहिला झुलता पूल ! ६० फूट लांब आणि ३ फूट रुंदीच्या लोखंडी कमानींनी जोडलेल्या या पुलावरून चालत जात उत्तरवाहिनी सावित्रीच्या प्रवाहातील रांगण खळग्यांची रास पाहणे संस्मरणीय. तुफानी पावसात पूर्ण क्षमतेने कोसळताना रस्त्यापर्यंत भेटीस येणारं मोरझोतचं मोराच्या पिसाऱ्यासारखं फुललेलं रूप अनुभवणं आल्हाददायक !

मानवाला धबधब्यांचं असलेलं आकर्षण प्राचीन आहे. पर्यटनामुळे ते व्यापक झालंय. पावसाळ्यात आकाशातून कोसळणाऱ्या धारांइतक्याच डोंगर कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या धारा मनाला आकर्षून घेतात. मनाला भुरळ घालणारा त्यांचा आवाज आपल्याला संगीताचा मूळस्रोत असल्याचे जणू सांगत राहातो. हवा, पक्ष्यांची किलबिल, नद्या आणि धबधब्यांचे आवाजी प्रवाह, समुद्राची गाज यात संगीत सामावलेले आहे. या निसर्ग संगीतानं भारावून गेल्यानंच आपली पाऊलं तिकडे वळतात. खरंतर प्रत्येक धबधब्याचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य असते. काही उंच ठिकाणावरून अरुंद प्रवाहाद्वारे कोसळतात तर  काहींची रुंदी विलक्षण असते. नदीच्या प्रवाहमार्गात असलेली निरनिराळ्या प्रकारची भूस्तररचनाच धबधब्यांच्या निर्मितीस कारणीभूत होते. एकतर नदीच्या पात्रात कडा तयार होतो किंवा उगम होऊन कड्यावरून नदी उडी घेते आणि धबधबा निर्माण होतो. धबधब्याचे पाणी उंचावरून खाली पडून तळाशी पाण्याच्या आघातक्रियेमुळे तयार झालेली विवरे पाहायलाही उन्हाळ्यात मुद्दाम जावं ! जवळपास धबधब्यात ही विवरे आढळतात. त्यांची रचना, रंगसंगती सारंच विलोभनीय ! २५३ मीटर उंचीच्या शरावती नदीवरील जोग फॉल्सच्या (गिरसप्पा-शिमोगा) तळाशी तर सुमारे ४० मीटर खोलीचे तळे तयार झाले आहे. पूर्वी कधीतरी आशियातला सर्वात उंच धबधबा असा गिरसप्पाचा उल्लेख वाचलेला. तो मनात घर करून राहिला. नंतर प्रत्येक कर्नाटक भेटीत मुद्दामहून आम्ही गिरसप्पा भेटीला जात राहिलो. पहिल्यांदा गेलेलो, त्यावेळी धबधब्याच्या एका कातळकड्याच्या टोकावर जाऊन निवांत बसलेलो ! हे जरा अतीच, पण गिरसप्पा भेटीत तेही करून झालं ! सुरक्षाकारणे आता तिथवर जाता येत नसावं.

सन २०१३-१४ मध्ये ‘ठोसेघर पर्यटन’ हे भारतातील सर्वात उंच धबधबा भटकंतीबाबतचे पुस्तक लिहिताना आलेले अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय ! गिरसप्पाप्रमाणे ठोसेघर धबधब्याच्या माथ्यावरून खोल दरीत घोंगावणारा वारा अनुभवण्यात वेगळं थ्रील आहे. एकदा ठोसेघरहून मुद्दाम वाट वाकडी करून आम्ही कासपठार–बामणोली मार्गावरील भांबवली गावातला वजराई धबधबा बघायला गेलो. ठोसेघर लिहिताना याची ओळख झाली. तोवर हा भारतातला सर्वात उंच धबधबा असल्याचा उल्लेख साताऱ्यापुरता मर्यादित होता. भांबवली हा अठराशेचाळीस फुटावरून (५६० मीटर) कोसळणारा धबधबा ! त्यादिवशी अपुऱ्या वेळेअभावी धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता आलं नाही. दुरून दर्शन घेऊन परतावं लागलं. काहीसा निराश झालो. अशाही आठवणी आपल्याजवळ असतातच. काहीवेळा प्रवासात धबधबे भेटत असताना नेमकी सोबत चुकीची ठरते आणि तिथवर जाणं टाळावं लागतं. हे अनुभव आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा निश्चित करतात. प्रवासात नेहमी गाडीतली एक जागा रिकामी ठेवण्याची सवय आम्हाला अशातून लागली. खोपोलीतला (रायगड) प्रसिद्ध झेनिथ फॉल कोसळतो त्याच्या आजूबाजूच्या साऱ्या डोंगरकड्यावरच्या ‘होलसेल’ धबधब्यांचे दृश्य भर पावसात दुरून घाट रस्त्यावरून पाहाताना खोपोली जणू धबधब्यांची राणी असल्यासारखी भासते. कल्याणहून अहमदनगरकडे जाताना वाटेत भेटणारा माळशेज घाट आणि श्रीक्षेत्र मार्लेश्वरही काही प्रमाणात आपल्याला हेच विलोभनीय दृश्य दाखवतो. वर्षा ऋतूतील आणखी एक भन्नाट अनुभव घेण्यासाठी आपल्याला भर पावसात किंवा पावसाळी वातावरणात कोणताही ट्रेकिंग करायला हवं. अर्थात अनेकदा आडवाटेवरच्या  धबधब्यांपर्यंत पोहोचताना ही अनुभूती येतंच म्हणा ! ओझर्डे (कोयना), सवतसडा (चिपळूण), श्रीक्षेत्र धूतपापेश्वर (राजापूर), नापणे (वैभववाडी), चोरला अशी सह्याद्रीतील आठवणीतल्या जलजल्लोषधारांची यादी न संपणारी आहे.

वर्तमानात बऱ्याच धबधब्यांनी पर्यटनाची मखमली चादर ओढलेय ! त्यामुळे धबधब्यांकडे जाताना वाटेत मनसोक्त खाजवत बसलेली माकडं आणि त्यांना ‘खाऊ घालू नका’ सांगणारे बोर्ड्स आपल्या नजरेस पडतात. खबरदारीचे बोर्ड वाचत धबधब्यांशेजारी उभारून गरमागरम कांदाभजी आणि आलं घातलेला चहा किंवा मक्याचं कणीस न खाणं म्हणजे मानवी जीवन व्यर्थ घालवणं ! नाही म्हणायला धबधब्यास्थळी चालणारा निसर्गाची लय बिघडवणारा विकृत गोंगाट, अंगविक्षेपी सेल्फी आणि मानवी पाऊलखुणांची साक्ष मागे सोडणारा खाद्य पदार्थांचा कचरा कोणाही निसर्गाप्रेमीला व्यथित करणारा ठरतो. तेव्हा आम्हाला चिपळूण जवळच्या वाशिष्ठी उगमाच्या शोधात सन २०१५ साली कुंभार्ली घाटातल्या खोल दरीत भटकतानाचे कचरामुक्त निसर्गदर्शन आठवते. गेल्यावर्षी भेट दिलेलं सोनवडे (गारगोटी) - शिवडाव (कुडाळ) जोडणाऱ्या नियोजित घाटमार्गावरील नाईकवाडीजवळचं ‘वाघवरंडा’ हे स्वर्गीय माळरानही कचरामुक्त दिसलेलं. पावसाळा सरताना बहरलेल्या या माळरानांच्या सौंदर्याचा पोत वेगळाच असतो. कचऱ्यापासून दूर असलेली रानफुलांनी सजलेली, सर्वत्र हिरवळ दाटलेली ही माळराने पाऊस संपताना आणि उन्हाळा सुरु होतानाच्या टप्यावर पाहिली तरच मज्जा ! यंदाच्या ‘कोरोना’ वर्षाऋतूत हे सारं आठवतंय ! ऋतूभान न बाळगता सतत बारमाही फिरणाऱ्या आमच्यासारख्यांच्या मनाची अवस्था काय वर्णावी ?

पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या कोणत्याही घाटातून किंवा उंचीवरल्या गावातून तुफानी पावसात प्रत्येक नागमोडी वळणानजीक डोंगरकड्यावरच्या जलधारा थेट कारच्या टपावर कोसळत असतानाच समोर दरीतून अचानक वरती आलेल्या धुक्याच्या लोटात जेव्हा समोरचा रस्ता हरवून जातो तेव्हा कार ड्राईव्ह करण्याची अनुभूती काय वर्णावी ? अशा अनुभूतींनंतर कदाचित ‘अघोरी’ इच्छेपोटी आम्ही भर पावसात अनेकदा मध्यरात्री महाबळेश्वरहून पोलादपूरमार्गे चिपळूणला उतरलोय ! काळोख्या रात्रीतला धडकी भरवणारा तुफानी पाऊस, गाडी चालवताना आंबेनळी घाटाच्या वळणावळणावर अंगावर येणारा निसर्ग, कानठळ्या बसवणारे, क्वचित कारच्या टपावर कोसळणारे धबधबे आणि आपण ! अहाहा !! क्या बात है !!! जन्माला आलोयच तर एकदा तरी जगायला हवेत असे हे भन्नाट अनुभव ! असे आणखीही अनुभव आहेत.

यातला एक अनुभव आहे गोव्यातील मांडवी नदीवरील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या भेटीचा ! हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. घनदाट जंगलांनी वेढलेल्या या धबधब्याचे भर पावसाळ्यातील विलोभनीय दृष्य आम्हांला ‘याचि देहि’ पाहायचं होतं. एके श्रावण सोमवारी गोकर्णमहाबळेश्वरी अभिषेक करायचा ठरवून निघालेलो. तेव्हा प्रवासात काहीतरी भन्नाट साधलं जावं म्हणून दूधसागरकडे वळलो. भेट दिली तेव्हा जवळच्या कुळे गावातून बायकिंगद्वारे अभयारण्य उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत पर्यटकांना सोडलं जायचं. तिथून पुढं ट्रेकिंगच ! आता हा साधारण १०/१२ कि.मी.चा प्रवास बायकिंग ऐवजी जीपगाड्यांतून प्रवास होतोय. बायकिंगच्या प्रवासातील हे थ्रील ज्यांनी अनुभवलंय त्यांना आम्ही याला ‘भन्नाट’ का म्हटलंय, ते चटकन समजेल. तुफानी पावसात फुटभर रुंदीच्या निसरड्या चिखलयुक्त वाटांवरून वेगाने बाईक दौडत असायच्या. वाटेत नदीचे पात्र ओलांडावे लागते. ह्या बाईक काही अंतर तर अगदी रेल्वेरुळाच्या बाजूने अरुंद वाटेने चालायच्या. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा हजारेक (३१० मीटर) फुटांवरून दुधासारख्या पांढऱ्याशुभ्र धारांचा अखंड जलाभिषेक काळाकभिन्न डोंगरावर करतानाचे दृश्य रेल्वेच्या रुळांच्या शेजारी सुरक्षित उभे राहून पाहात राहावे ! इथून जाणाऱ्या ट्रेन दूधसागरात न्हाऊन निघतात. दूधसागराचे तुषार अनुभवणे हा स्वर्गीय अनुभव ! या धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कॅसलरॉक आहे. येथपर्यंत रस्त्याने पोहोचता येते. तेथून धबधब्यापर्यंत अंदाजे २१ कि.मी.चे ट्रेकिंगही केले जाते. आम्ही मात्र धबधब्याच्या तळाशी असलेल्या उद्यान-जंगलात बाईक सोडून ट्रेकिंग करत रेल्वे ट्रॅकपर्यत पोहोचलेलो. रस्त्यात पुन्हा नदीच्या प्रवाहाला सामोरं जावं लागलंच. तिथलं ते उंच झाडीचं घनदाट जंगल, अंधुकसाही न पोहोचणारा सूर्यप्रकाश, अधुनमधून दणका द्यायला येणारी तुफानी पावसाची सर, ती गेल्यावर झाडांच्या पानांवरून टपकणाऱ्या थेंबांची टीपटीप आणि निर्झरांचा खळखळाट ! व्वा ! जंगलातला पाऊस किती आल्हाददायक असू शकतो हे अशा ठिकाणी अनुभवावं. सततचा धुवांधार पाऊस, निसरड्या वाटा, दाट वृक्षवल्ली यामुळे कॅमेऱ्याचा म्हणावा तितका वापर करता येत नव्हता. मात्र त्याचंही वर्षास्नान चांगलं झालेलं. कदाचित म्हणूनच तेव्हा कंटाळून कॅमेऱ्याच्या लेन्सकॅपने दोनदा आमची साथ सोडलेली. नदीच्या प्रवाहातून ते चालू लागलेलं. पण पुन्हा निसर्गकृपा आमच्या बाजूने झुकली आणि ते सापडलं.

अलिकडचा आठवणारा एक अफलातून अनुभव, राधानगरीच्या राऊतवाडी धबधबा ते दाजीपूर जंगलातल्या प्रवासाचा. सन २०१८ सालच्या जुलै महिन्यातला ! खरंतर हा धबधबा पहिल्यांदा पाहिल्याला आता दहाएक वर्ष झालीत. मात्र दोन वर्षांपूर्वी कोकणात उतरणारे घाट क्षणाक्षणाला वाहतुकीसाठी बंद पडत असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर अवतरत असताना निवळ तुफानी पावसात एखाद्या घाटातून ड्राईव्ह करत कोकणात उतरण्याच्या मोहाने आम्ही चिपळूण कणकवली हा प्रवास सरळ मुंबई-गोवा हायवेने न करता व्हाया कोल्हापूर फोंडाघाटमार्गे करण्याचा विचित्र निर्णय घेतला होता. त्यादिवशी राधानगरी भागातल्या ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ मित्राची भेट आटोपून आम्ही काळम्मावाडी सोडले तेव्हाच सायंकाळचे साडेपाच वाजून गेलेले ! घड्याळाने आमच्या हृदयाचा ठोका वाढवला होता. डोळ्यासमोर फोंडा घाट दिसू लागला. दिवसभर धबधबे जगून झालेले. आता रात्रीचा सुरक्षित मुक्काम आणि उद्याची कामं यांनी मेंदूची पकड घ्यायला सुरुवात केली. गाडीने वेग पकडला. साधारण १४/१५ वर्षांपूर्वी याच घाटातून आम्ही मध्यरात्री बाईकने कुडाळ ते कोल्हापूर प्रवासही करून बघीतलेला. आता ते आठवलं. आजही रस्ता खराब होता. त्यात तो राधानगरीचा असल्याने गच्च धुक्यांनी भरलेला. मनात असंख्य प्रश्न ! लवकरात लवकर घाट उतरणं एवढंच काय ते ध्येय ! आजूबाजूने वाहाणारे खळाळते प्रवाह आता आम्हाला न थांबता पुढे निघून जायला सुचवू लागले. एव्हाना आम्ही न्यूकरंजे सोडून बरेच पुढे आलो. अजून दाजीपूर गेट आलेलं नव्हतं. रस्त्याला जवळपास वाहन नव्हतं. इतक्यात नको ते कानी आलं. एका बाईकवाल्यानं आम्हांला थांबवून पुढचा रस्ता बंद पडल्याचं कळतं केलं. मनात चिंतेचे ढग पूर्वीच जमा झालेले असल्याने चटकन काही सुचेना. तेवढ्यात मागून एक स्थानिक कारवाला आलेला दिसला. त्याने आम्हाला हा राऊतवाडी धबधबा ते दाजीपूर अभयारण्य गेट असा पर्यायी मार्ग सुचवला. आम्ही निर्णयापर्यंत येण्यापूर्वीच, ‘गाडी चालवताना काळजी घ्या !’ अशी आमच्या काळजीत अधिकची भर घालणारी सूचना देऊन तो कोल्हापूरच्या दिशेने धुक्यात गायब झाला. आम्ही युटर्न घेतला. गाडी धबधब्याच्या दिशेने हाकू लागलो. बऱ्याच वेळाने धबधब्याचे दर्शन झाले. आज राऊतवाडी धबधबा आमची जणू सत्वपरीक्षा घेत होता. थांबण्याची इच्छा अनावर होत होती. पण हाताशी अजिबात वेळ शिल्लक नव्हता. त्यात प्रवासाचा मूळ रस्ता बंद झाल्याने या मार्गाने आलेलो. या रस्त्याने आम्ही दाजीपूर गेटपर्यंतच पोहोचणार होतो. तिथून पुढे फोंडाघाटात काही अडचण उभी राहिली तर ? याचीही काळजी होती. पण आता तो विचार करायलाही वेळ नव्हता. सत्वपरीक्षा घेऊ पाहणाऱ्या धबधब्यासमोर नतमस्तक होऊन पुढे निघालो. एकपदरी घाटमार्ग लागला. पुन्हा चारही बाजूंनी सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, दाट जंगल, बेभान होऊन कोसळत असलेला धुवाँधार पाऊस, मार्गाला जोडणाऱ्या अरुंद रानवाटा आणि समोर दाट धुकं भेटलं. वेड्या-वाकड्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना काळजीत भर घालायला कमी की काय म्हणून बोचरी थंडी येऊन सर्वांगाला बिलगली. या मार्गावरचा तो आमचा पहिला प्रवास. पावणेसातच्या सुमारास आम्हाला दाजीपूर अभयारण्याच्या गेटनं दर्शन दिलं. नियोजनात नसतानाही नियतीनं आज आम्हाला राऊतवाडीकडे नेलं. थोडंस सकारात्मक म्हणून मनाला समजावण्याचा प्रयत्न केला. थेट कणकवलीच्या दिशेला लागलो. अंधार पडल्यानं धबधबे पाहण्याचा प्रश्न नव्हता. आता त्यांचं खळाळत संगीत कानात गुंजी घालत होतं. आम्ही गाडी हाकत होतो. फोंडाघाट उतरून सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर क्षणभर थांबून त्या घाटाकडे मागे वळून पाहिलं. तेव्हा अनुभवास आला तो खरा मानसिक निवांतपणा !

वर्षाऋतूत सजीवांच्या स्वागतासाठी उत्सुकतेने धबधबे वाहू लागतात. मनातल्या भीतीवर मात करून तुफानी पावसात ड्राईव्ह करून धबधब्यांच्या ठिकाणी पोहोचताना ठिकठिकाणी वाटा अडवणारी निसर्गाची रूप, त्यातून निर्माण होऊ पाहणाऱ्या समस्या, धुक्यांनी वेढलेल्या घाट रस्त्यातील खड्ड्यांतून प्रवास करताना येणाऱ्या साऱ्या अनुभूती आपलं सर्वांचं जगणं संस्मरणीय करतात. ‘कोरोना’ने याला क्षणिक ब्रेक लावला आहे. जलजल्लोषधारांच्या आठवणी जगात आपण ‘कोरोना’सोबत नित्य दोन हात करतो आहोत. आपल्याला भविष्यात भरपूर जलप्रपातांसोबत जगायचंय. जगावया पुण्य पाहिजे आहे. निसर्गाचा हा ठेवा संपणारा नसला तरी गेल्या काही वर्षांपासून तो मानवी अरसिकतेचा विळख्यातही अडकल्याची धोकादायक बाजू आहे. सृष्टीत आजही काही धबधबे आहेत जिथे निसर्ग आपली ममत्वाने वाट पाहातो आहे. माणसाळलेला तोही यंदाच्या एकटेपणाला कंटाळलेला असेल. त्यालाही आपल्यासारख्यांची सात्विक सोबत हवी असेल. त्यासाठी आपल्याला तूर्तास ‘कोरोना’वर मात करायला हवी आहे. उद्याच्या आनंदासाठी धबधब्याच्या आठवणींना जपून ठेवत आपण ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील ही लढाई जिंकू यात !


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

जोग फॉल, शिमोगा  

अगुंबे घाट, कर्नाटक

आंबोली वर्षासहल २००२ 

आंबोली धबधबा 

चोरला घाट

कोटीतीर्थ धूतपापेश्वर राजापूर 

दूधसागर गोवा (गुगल चित्र)

घागरकोंड, गोपाळवाडी, पोलादपूर   

मार्लेश्वर 
मोरझोत, पोलादपूर
 
नापणे, वैभववाडी 

एन एच ६६ महाड 

ओझर्डे कोयना 

राऊतवाडी, राधानगरी

सवतसडा, चिपळूण 

एन.एच. १८३ केरळ

टपोऱ्या गारा

पत्नी आणि अडीच महिन्याच्या चिरंजीवासह ब्लॉगलेखक @ मोरझोत 

ठोसेघर पर्यटन पुस्तकाचे मुखपृष्ठ-मलपृष्ठ  

दैनिक कृषीवल (कलासक्त  पुरवणी) ८ ऑगस्ट २०२० 

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी १ ऑगस्ट २०२०  
दैनिक रत्नभूमी रत्नागिरी २ आणि ३ ऑगस्ट २०२०  
साप्ताहिक अचूकवार्ता ऑगस्ट २०२०

साप्ताहिक अचूकवार्ता ऑगस्ट २०२०

साप्ताहिक वीर महाराष्ट्र ऑगस्ट २०२०

साप्ताहिक वीर महाराष्ट्र ऑगस्ट २०२०

लिंक 


दैनिक जनमाध्यम अमरावतीने हा ब्लॉग ५ भागात प्रसिद्ध केला.





आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...