गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

कोकणात स्थिरावलेय ग्रामीण साहित्य-संस्कृतीची चळवळ


राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य दिसत नसताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई संस्थेने गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वी करून राज्यातील या क्षेत्रातील गुणवत्तेच्या पातळीचे मूल्यांकन करू पाहाणारा एक नवा बेंचमार्क सेट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास, संस्कृती, नाटय, ग्रंथालय चळवळींचे 'जाणकार' व्यक्तिमत्त्व प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्यातील तळवडे येथे १० ते १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपन्न होत आहे. संघाचे अध्यक्ष आणि 'मोडी दर्पणदिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ग्रामीण मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जडणघडणीची चळवळ कोकणात चांगलीच स्थिरावली आहे. त्या निमित्ताने ग्रामीण साहित्य, सांस्कृतिक चळवळीचा आणि समोर असलेल्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...

कोकणभूमीला र. वा. दिघे, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, साने गुरुजी, कवी माधव, कवी आनंद, 'पद्मश्री' मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद काळे आदी ग्रामीण भागातून पुढे आलेल्या असंख्य दमदार लेखकांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. लांजा तालुक्यातील हरचिरी या छोट्या गावात जन्मलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी याच संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना, ‘समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानके घडत असतात. लेखकाने ती टिपायची असतात. लेखन साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःला घडवायचे असते आणि कायम जमिनीवर राहायचे असते. वेगवेगळे अनुभव त्याला घडवत असतात. लेखकाने कंटाळा करून चालत नाही. त्याने समाजात जे काही वावगे घडते आहे, ते मांडण्यासाठी लिहायला हवे. पुस्तके तर वाचायला हवीतच, पण माणसेही वाचायला हवीत, अनुभवविश्व समृद्ध करायला हवे.असे सांगितले होते. असेच सकस मार्गदर्शन यापूर्वीच्या संमेलनात ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, नाटककार गंगाराम गवाणकर आदींकडून झालेले आहे. खरंतर ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता, भीडभाड न बाळगता वागतात, बोलतात. असे नमुने ग्रामीण जीवनात पाहायला मिळतात. एस.टी. बसच्या प्रवासात, ग्रामीण बसस्टँडवर हमखास भेटतात. कोकणातील अशा बदलत्या काळातील ग्रामीण चित्रण लोकांसमोर यायला हवे आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उत्तम आहे. ‘खरी पुस्तकं खऱ्या भावबळानं वाचणं हा एक अति श्रेयस्कर व्यायाम आहे. दिवसभरात केलेल्या इतर कुठल्याही व्यायामापेक्षा तो आपल्याला अधिक दमवेल असा आहे. जशी शिस्त आणि चिकाटी पैलवानाला लागते तशीच वाचनासाठी लागते. साऱ्या जिंदगीच्या अपेक्षा निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट असतं’ असं अमेरिकेतील विचारवंत ‘हेन्‍री डेव्हिड थोरो’ने सांगितल्याचं नमूद करून व्यंकटेश माडगूळकर आपल्या सरवापुस्तकात म्हणतात, ‘भावबळानं वाचन होतं ते विशी-पंचविशीपर्यंत. पुढं माणूस काही कारणाने वाचतो. काही अपेक्षा ठेवून वाचतो. त्यातही सुरुवातीला साहित्यप्रकार, नंतर प्रवासवर्णन आणि शेवटी अध्यात्म असं आपलं वाचन गडगडत. काही वाचकांच्या बाबतीत ते वृत्तपत्र वाचनापलिकडे ते जात नाही.’ यातला भावबळानं होणाऱ्या वाचनाचा वयाशी जोडलेला दाखला महत्त्वाचा आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य चळवळी आवश्यक आहेत. या साहित्य चळवळीची दखल राज्यस्तरावर घेतली जायला हवी आहे. त्यासाठी संयोजकांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात राज्यभराच्या साहित्यिक वर्तुळात प्रभाव असलेल्या कोकणाबाहेरील साहित्यिकाला, वाड्मयीन नियतकालिकाच्या संपादकाला आवर्जून पाचारण करण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे ही चळवळ सर्वदूर पोहोचायला अधिक मदत होईल. वाचकांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रथा, परंपरा, निसर्ग, समाज व्यवस्था, वैशिष्ट्ये, नवले, असह्यता मांडणारे ग्रामीण मराठी साहित्य हा कायम आत्मीय विषय राहिला आहे. शोषित, पिडीत, असह्य अगतिक माणसांविषयी कणव हा ग्रामीण साहित्य चळवळीचा मुख्य हेतू राहिला आहे. दुर्दैवाने आज कोकणातील खेडेगावातील लोकसंख्या कमी होताना दिसते आहे. अशा वातावरणात कोकणातील जवळच्या दोन तालुक्यातील साहित्य आणि संस्कृतीप्रेमी मंडळी एकत्र येऊन सामाजिक चैतन्याचा शब्दजागर करत असतील, तर तिथे आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हायला हवं आहे, असं व्यक्तिश: आम्हाला या चळवळीचे विविध वृत्तांत वाचताना नेहमी वाटत आलं आहे. कौतुक म्हणून चळवळीच्या दिवाळी अंकात सहभागही नोंदवला आहे. आयोजकांनी यावर्षी ठरवून निमंत्रित केल्याने आणि संमेलनाच्या अध्यक्षीय यजमानपदाचा सन्मान चिपळूणला दिल्याने आम्हाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवता आल्याचं विशेष समाधान आहे. ग्रामीण मराठी साहित्य हे समाज उभारणीचे मोठे शस्त्र आहे, ही बाब आपल्या समाजसुधारक पूर्वसुरींनी सिद्ध केली आहे. अशा कोणत्याही चळवळीच्या प्रारंभी ‘ती चळवळ कशी चुकीची आहे’ हेही सांगायला कोणीनाकोणी सुरुवात केलेली असते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्र घडते. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण साहित्याची निर्मिती आणि जागरणाची प्रक्रिया घडत असताना या चळवळीबद्दल आणि तिच्या सक्रियतेसाठी ग्रामीण भागात विशेष उपक्रम होत नाहीत, हे सत्य आहे. दुर्दैवाने ग्रामीण साहित्य लेखनातून नावारुपास आलेल्या प्रस्थापित मंडळींनाही ग्रामीण भागात साहित्यिक उपक्रम राबवण्यात रुची वाटत नाही. अशा काळात कोणतेही विशेष शासकीय अनुदान नसताना राज्याच्या कोकणभूमीत दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली एक संस्था ग्रामीण साहित्य आणि संस्कृतीच्या जागर गेली आठ वर्षे सुरु ठेवते, हे कौतुकास्पद तितकेच अभिमानास्पद आहे.  

 

पूर्वी ‘लेखक-साहित्य-वाचक’ असा साहित्य व्यवहार होता. एकविसाव्या शतकात तसा तो राहिलेला नाही. साहित्याच्या प्रभावाला नियंत्रित, नियमित आणि निश्चित करणाऱ्या साऱ्या प्रक्रियांनी आजचा साहित्य व्यवहार बनतो. हे सारं व्यापक आहे. तरीही त्यात अस्सल ग्रामीण भागातील कार्याचा अपवाद कायम होता. तो ‘खळगा’ आपल्या परीने भरण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघ करतो आहे. स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिकीकरणाने वेग घेतला आणि शहरी आणि ग्रामीण वास्तवाची दृश्यमानता वाढत गेली. सामाजिक स्तर, विषमता जन्माला आली. महात्मा गांधींची हत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बौद्धधर्माची दीक्षा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा कारणांनी समाज व्यवस्थेत स्थित्यंतर येत गेले. त्याचे प्रतिबिंब साहित्यात-लेखनात उमटले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकात दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, देशावादी आदी साहित्य प्रवाहांचा पाया घातला गेला. बहुजन लेखक वर्ग उदयाला आला. त्यांचं अनुभवविश्व शब्दबद्ध झालं. अनियतकालिकांची चळवळ बहरली. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकीय उत्तरार्धात ‘प्रभावी’ लेखक अपवादानेही दिसला नाही. कारण लेखकांच्या क्षमतांसोबत इथली वाङ्मयीन संस्कृतीही काहीशी धंदेवाईक बनत गेली. प्रसिद्धीची सहज साधने उपलब्ध झाल्याने लेखक बहुत झाले. प्रसिद्धी माध्यमात सातत्याने मिळालेली जागा, चिल्लर पुरस्कार यामुळे लेखक म्हणून आपली एक सांस्कृतिक जबाबदारी आहे याचे भान हरपले, प्रतिभा ‘जणू’ तात्कालिक झाली. २०१४ सालच्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी १९६८ साली आपल्या वाचाया लघुपत्रिकेत हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ असा समीक्षालेख लिहून मराठीतील लहानमोठ्या सर्वच लेखकांच्या नैतिक वाङ्मयीन व्यवहारांवर परखड टीका केली होती. अनेकांना ती झोंबली होती. व्यंकटेश माडगूळकरांनीही आपल्या ‘सरवा’ पुस्तकात ‘कोणत्या वनस्पतींची पानं खावी आणि कोणती खाऊ नयेत हे सशांच्या पिल्लांना त्यांच्या आया शिकवतात. माणसाच्या आयांनी पुस्तकांच्या पानाबद्दल अशी जागरुकता दाखवल्याचं माझ्या पाहाण्यात नाही.’ असं म्हटलं होतं. या भूमिकांवरील ‘उतारा’ शोधताना आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीचा आधार घ्यावा लागेल इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत.


राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या यंदाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी, ग्रामीण भागात राहण्याचा आनंद, बैलगाडीतून अध्यक्षांची मिरवणूक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट गावातून क्रांतीज्योत आणून होणार आहे. विशेष म्हणजे अर्जुना नदीकाठावर नदीपूजन करून नदीपात्रात प्रज्वलित दिवे सोडण्यात येणार आहेत. नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. हे सारे जनजागरण आवश्यक आहे. पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शनासह महिला बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विक्री कक्ष हे सारे ग्रामीण संस्कृतीला पोषक असेच आहे. संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार दिले जातात. यातले संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रिया, शेतकरी, वारकरी आदी आम्हाला विशेष महत्त्वाचे वाटतात. कोरोना अनलॉक वातावरणात २३ नोव्हेंबर २०२० रोजी राळेगणसिद्धी मुक्कामी असताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम्हाला गावाचा वाढदिवससंकल्पना विशद करून सांगितली होती. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गावाचा वाढदिवस साजरा करणे, त्या अंतर्गत जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घेणे, लग्न होऊन एक वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करणे, गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचं वंदन-पूजन करणे, सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करणे, गावाच्या विकासाचं काम करणाऱ्या तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदींना सन्मानित करणे आदी उपक्रमातून सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल, अशी भूमिका होती. हाच विचार थोडा वेगळ्या पद्धतीने इथे जपलेला दिसतो आहे. आजच्या स्त्रिया जेवण बनवायचं सोडून ‘पार्सल’संस्कृतीच्या मागे लागल्यावरून खूप बोललं-लिहिलं जातं. मात्र पूर्वीच्या काळी ‘चाकरमानी’ जीवनपद्धतीत आपलं कोकण याच स्त्रियांनी सांभाळलं होतं. त्यांचा सन्मान करायला आपण कदाचित विसरलो. आजची ‘पार्सल’ किचन संस्कृती हा त्याचा परिणाम तर नसेल ना? म्हणून संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रियांना दिला जाणारा पुरस्कार आम्हाला विशेष महत्वाचा वाटतो.


महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य चळवळीची पहिल्यांदा निर्मिती होत असताना तिच्यासमोर दलित साहित्य चळवळीचा आदर्श होता, हे नाकारता येत नाही. ग्रामीण साहित्य चळवळीच्या मुळाशी सामाजिक अस्वस्थता, असंतोष आणि शोषणग्रस्तता होती. आजही ती पूर्णत्वाने संपलेली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला पुढे नेताना भविष्यात तिच्या ठाम वैचारिक अधिष्ठानाची मांडणी व्हायला हवी आहे. मेळावे, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे ही या चळवळीची अंग आहेत. मात्र चळवळीचे खरे सामर्थ्य हे त‌िच्या तात्त्व‌िक बैठकीत आणि वैचारिक मांडणीत असते. ते काम सुरुवातीच्या काळात आनंद यादव, पाठोपाठ रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले, नागनाथ कोत्तापल्ले आदींनी केल्याचे दिसते. आज राज्यातील ग्रामीण साहित्य चळवळी शिथिलता आलेली आहे. नव्या पिढीला लिहिते करण्यासाठी, दिशा देण्यासाठी ठोस उपक्रम नाहीत, हे खरे आहे. बदलत्या जीवनातील ग्रामीण प्रश्न मांडण्याची व त्यासाठी नवनवीन नेतृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण साहित्याची समीक्षा वाचली तर कोकण म्हणून फक्त श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या लेखनाचे दाखले सापडतात. कोकणातील ग्रामीण साहित्य विचार त्यापुढे जाण्यासाठीची विचारपेरणी कोकणात या चळवळीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न संघाने करावा. त्यातून कोकणातील ग्रामीण साहित्य चळवळीला नव संजीवनी प्राप्त होईल. बळीराजाचे मंदिर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या ‘बरबडा’ येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उपक्रम घेत आहे. १९५३ साली स्थापन झालेली ही संस्था सत्तर वर्षे पूर्ण करते आहे. मुंबईतील चाकरमानी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेऊन सहकार्याचा हात देत संस्था कार्यरत राहिली आहे. आज बदलत्या काळानुरूप संस्था कार्यरत आहे. संघाने २०१७ साली झाशींच्या राणीच्या ‘कोटगावी 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' भरवून हा परिसर नव्याने पुढे आणला. राणींचे वंशज सातारा मुक्कामी दत्तात्रय नेवाळकर यांच्याशी संघाने सकारात्मक चर्चा केली. नेवाळकरांनी नुकतीच कोट येथील आपली ८१ गुंठे जमीन रणरागिणी स्मारक ट्रस्टला देणगी दिली. ही बाब ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फलस्वरूप महत्त्वाची आहे. आजच्या पिढीचं शहरी जगणं स्मार्ट होत चाललंय. वेगाबरोबर धावणं सर्वांना अनिवार्य आहे. बदलत्या जीवनाशी जुळवून घेताना मागच्या पिढीचा हात ताणला जातोय अशी स्थिती आहे. यावर जुळवून घेण्याची भावना वाढीस लावण्याचे औषध देण्याचे काम हा चळवळीतून होऊ शकेल. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची दोन दशके आपली जगून झालीत. यातला आपल्या जगण्याचा आणि समग्र भौतिक पर्यावरणाचा वेग अतिप्रचंड राहिला आहे. मोबाईल आणि इंटरनेट या दोन साधनांनी संपूर्ण मानव जातीला व्यापून टाकले आहे. यामुळे मानवी संस्कृतीत आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. विशेषतः १९८०च्या पूर्वी किंवा दरम्यान जन्मलेल्या पिढीला हे बदल आश्चर्यजनक वाटतात. १९९५ नंतर जन्माला आलेल्या पिढीला या नव्या जगाची चाहूल लागलेली होती. आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक माध्यमे, आणि समाज माध्यमांनी आपल्या अधिसत्तेने सर्वसामान्यांचे जगण्याचे, अभिव्यक्तीचे, सांस्कृतिक, राजकीय आदी संदर्भ बदलून टाकलेत. विविध माध्यमाच्या या सार्वत्रिक अधिसत्तेचा थोपवणे सोपे नाही. प्रत्येक काळाचा एक स्वभाव असतो. आजच्या काळाने वेगाने सामाजिक, धार्मिक, जातिय वितुष्ट वाढवलेले आपण पाहिले आहे. संभ्रम, संशय, भिती, विद्वेष आणि आत्मकेंद्रितता या नव्या माध्यमामुळे अधिकाधिक पसरताहेत. झुंडीने ट्रोलिंग करणे, कोणत्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे, स्वत:विषयी वारंवार सांगत (सेल्फी, स्टेटस्) राहाणे, आपल्या सुरक्षित कवचात जगणे, इतरांविषयी आस्था नसणे अशी मानसिकता घडत आहे. एकाकीपणा, वार्धक्य हेही प्रश्न तीव्र झालेत. पण अशा प्रश्नांकडे बघायला वेळ कोणाला आहे? आपले भावविश्व, पारंपरिक मूल्यव्यवस्था, सांस्कृतिक संवेदना, जगण्या-वागण्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिक–अनैतिकतेच्या संकल्पना, जाणीवांचे, चिंतनाचे क्षेत्र सारं बदललेलं आहे. स्त्रियांच्या देदीप्यमान इतिहासाची उजळणी करताना त्यांच्यावर आजही होणारा अन्याय विसरता येत नाही. शेती, दुष्काळ, कौटुंबिक ताणतणाव, अस्मिता, विध्वंसक राजकारण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते घटस्फोट, नव्या पिढीवर याचा होणारा मानसिक आणि भावनिक परिणाम हे सारं चिंताक्रांत करणारं आहे.


आजच्या समाजाची बदललेली वैचारिक अभिरुची नव्याने लिहिताना ध्यानात घ्यावी लागेल. महानगर आणि खेडे हे अंतर वाढले आहे. प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा देणे आजची सांस्कृतिक गरज बनली आहे. नव्या साधनांनी आपल्याला मूळ भाषेपासून फारकत घ्यायला भाग पाडले आहे. संवादासाठी आम्ही चिन्हांची भाषा (इमोजी) वापरू लागलो आहोत. चिन्हांच्या भाषेचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजे परस्परातला संवाद कमी होणं ठरू शकतं. संवादहीन संस्कृती अविश्वासाकडे झुकल्यास घातक ठरू शकते. याचे भान लेखकाला असायला हवे आहे. आजच्या सामाजिक जीवनात मोठा अंतर्विरोध भरलेला जाणवतो आहे. अशा काळात कोकणातल्या दोन तालुक्यात सुरु असलेली ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ आशेचा ‘नंदादीप’ गेली आठ वर्षे उजळते आहे, हे महत्त्वाचे आहे. हा नंदादीप आपल्याला आपल्या मातृभाषेशी, संस्कृतीशी, मानवी समूहाशी प्रामाणिक राहायला सांगतो आहे. आपल्या परंपरांचे भान राखायला, परंपरांचा नव्या काळाशी अन्वयार्थ जोडायला, समाजजीवनाच्या नकारात्मक बाजूंवर बोलायला, विविध स्थितीगतीचे प्रवाह समजून घ्यायला प्रोत्साहित करतो आहे. हे सारं नीट समजून घेतलं तर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य चळवळीतून काळावर मुद्रा उमटवणारं, दखलपात्र आणि परिणामक्षम लेखन जन्माला येईल, असा विश्वास वाटतो.


-    धीरज वाटेकर, चिपळूण (मो. ९८६०३६०९४८)

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ साधूया!

    


          कोकणातील लोककलांचे वैविध्य चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आजपासून चार दिवस (५ ते ८ फेब्रुवारी २०२३) चिपळूणातील श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्यमहोत्सवात सादर होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत, महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषणडॉ. तानाजी चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कोकण प्रदेश हा सांस्कृतिक परंपरेने आणि लोककलेने समृद्ध आहे. नागरीकरण न झालेल्या आदिवासींसह ग्रामीण जीवनातील कलांना आपण लोककला’ (फोकआर्ट) ही संज्ञा योजिली आहे. निसर्गरम्य कोकणासह जगात जेथे लोककलाविष्कार आहेत तेथे आजही निसर्गसंवाद साधणाऱ्या लोकसमूहांचे अस्तित्व आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव महत्त्वाच्या उत्सवांशी पारंपरिक लोककला निगडीत आहेत. कोकणभूमीत लोककलांचे वैविध्य लपलेले आहे. बदलत्या काळात पर्यटनअंगाने विचार करता या साऱ्याची मूल्यवृद्धीहोऊन लोककलांना राजाश्रयमिळायला हवा आहे. त्यादृष्टीने भव्य उत्सवी वातावरणात लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवायला वाचनालयाचा प्रयास अभिमानास्पद आहे.



रानात जाऊन गवळदेवाचा (पिंपळ तत्सम वृषाखाली पूजा करून रानात जेवण बनवणे) नैवेद्य करण्याची प्रथा आजही कोकणात टिकून आहे. आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेणाऱ्या या निसर्ग देवतेप्रति प्रामाणिक श्रद्धेची भावना त्यामागे आहे. यातून निसर्गाची जपणूकही होत असते. देवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातल्या सगळ्यांनी एकत्र जमून केलेलं सहभोजन ही सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त आहे. कोकणात भातलावणी संपल्यावर घरोघरी गणपती येत असतात. तेव्हा इथला सर्वसामान्य शेतकरी मनुष्य मोकळा असतो. पुढे याच भाताची कापणी आणि मळणी संपल्यावर कोकणाला शिमग्याचे वेध लागतात. या काळातील कोकणी ‘लोककला’ इथल्या मातीला नवीन नाहीत. या लोककला लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. जात्यावरची ओवीगीते, बाळाला जोजवण्याची गीते, सण-उत्सवातील नृत्यनाट्ये, देवतोपासना म्हणून काढली जाणारी चित्रे, शिल्पे, रांगोळी हेही सारे पारंपरिक लोकजीवनाचा घटक आहेत. याद्वारे होणाऱ्या सौंदर्यनिर्मितीचा इथल्या निर्मात्याला कायम आनंद मिळत आला आहे. लोककलांचा महोत्सव म्हणून म्हणून आयोजकांची त्यात डोकावणारी सखोलता, कार्यपद्धतीचे वैविध्य आणि दस्तऐवजीकरण करण्याचा आग्रह याबाबी अधिक महत्त्वाच्या ठराव्यात. काळानुरूप कोकणातील जवळपास साऱ्या लोककलांच्या वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंदात झपाट्याने ‘रंगीतसंगीत’ बदल होताहेत. यामुळे मूळ कलाप्रकार हरवण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वाचनालयाने महोत्सवात शत-प्रतिशत पारंपरिकतेला न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे. अस्सल परंपरा ‘वर्धिष्णू’ करण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक ठरावेत. दशावतारी नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’ लोकनृत्य, शक्तीतुरा, शिमगा पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ठ तालावर पालखी नाचवणारी लोकनृत्य, संकासूर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या पायात चाळ बांधून भरजरी कपड्यांनी सजलेली पारंपरिक सामूहिक नृत्याचा अविष्कार असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे अविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा अभिनव प्रकार आपल्याला फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघर मधील आदिवासी पावसाला विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबड्या) करतात. कोकणात मासेमारी करणाऱ्या गाबीत समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाट्यप्रकार प्रसिद्ध आहे. कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान मिळवला आहे. पण असं असलं तरी याही पलिकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप आदी असंख्य ‘लोककला’ आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या कलांना, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव करतो आहे. अनेक प्रकारच्या बहुविध लोककलांनी आपली भूमी संपन्न आहे. कालानुरूप या लोककला लोप पावत चालल्या आहेत. अंधश्रद्धा बाजूला सारून सकस प्रयोगात्मक लोककला जीवंत राहाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील गणेशोत्सवात ‘जाकडी’नृत्य म्हणजे शक्तीतुरा हे इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य ठरावे. इथल्या श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार आहे. शक्ती-तुरा हे दोन्ही फड आळीपाळीने पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे खास गाण्यांच्या चालीवर एकमेकांना प्रश्न टाकून त्याची उत्तरे पटवून देत असतात. नृत्य पथकातील तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर नृत्य साथ देत असतात. नमन, दशावतार लोककला कलात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती गाऊन कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली जाते. कोकणभूमीने शतकानुशतके जोपासलेला लोककलेचा हा गाभा आपल्याला या महोत्सवात अनुभवता येणार आहे.



‘पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य’ महोत्सवात कोकणातील खाद्यसंस्कृती, जाखडी : काल, आज आणि उद्या, रत्नभूमीतील लोककला, लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती, नमनाचा अनुबंध आणि शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवाद तसेच देवाला जागर-गोंधळ, संकासूर व गोमू, लौकवाद्य मैफल, गज्जा नृत्य, उखाणे, सापाड, नमन, जाखडी, चित्रकथी, कुंभारकला, भेदीक शाहिरी, तारफा नृत्य, घोरनृत्य, दशावतार, काटखेळ, गौरी  टिपरी व गोफ नृत्य, पोवाडा, नकटा, कोळी नृत्य, डेरा, पालखी नृत्य, मंगळागौर, कातकरी, मुस्लिम गीते, खालू बाजा, जलसा, वैदिक लग्नगीते, घोरीप, महिला दशावतार आदी चाळीस हून अधिक लोककला सादर होणार आहेत. महोत्सवांतर्गत स्थानिकांच्या लोककला कट्ट्यात ईशस्तवन, नमन, ओवी, गाऱ्हाणे, स्मरणगीत, ऐतिहासिक पोवाडा, कोकणी गीत, मुस्लिम लग्न, बारसे गीते, पारंपरिक गाणी, पारंपारिक नृत्य, आंबेडकरी गायनपार्टी, सांस्कृतिक गीत, बोलीभाषा संवादात्मक चर्चा, डांगी नृत्य, दिवली नृत्य, आंबेडकरी जलसा, वेसवा नृत्य, कोकणी संस्कृती, भारुड यांसह आष्टा येथील धनगरी नृत्याचे विशेषत्वाने सादरीकरण होणार आहे. चिपळूणातील या भव्य महोत्सवाची आयोजक संस्था, शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षांचा वारसा लाभलेले संस्कारकेंद्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही आहे. चिपळूण शहराला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी, निस्पृह कार्यकर्त्यांचे बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहूश्रुत बनवून शहराचे सामाजिक भान उत्तम विकसित करणारी संस्था अशी तिची ओळख आहे. हे वाचनालय साहित्यिक, सांस्कृतिक अभिसरणाचे मुख्य केंद्र असावं असा व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करते आहे. वाचनीय आणि श्रवणीय असलेले हे वाचनमंदीर आपल्या ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ प्रकल्पांमुळे प्रेक्षणीय झाले आहे. संपूर्ण कोकणभूमी ही जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणात रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडीत धडपड अलिकडे गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यांना चित्रपट अंगाने किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे आहे.  कांतारा या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणारा सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कोला उत्सवासह भूता कोला प्रथा-परंपरा याचं अचूक चित्रण घडलं आहे. या प्रथेत भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर ह्या मंडळींनी तग धरावा यासाठी असे लोककला महोत्सव हे लोककलावंतांच्या जीवनातील जणू ‘पथदीप’ ठरावेत.  

कोकणात ‘पर्यटन’ विकासाचे वारे स्थिरावत असताना लोककला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्याला पर्यटनाशी जोडून नवा विचार देण्याचा प्रयत्न होतो आहे. जगभर आणि देशभर पर्यटन करताना आपण तिथल्या लोकसंस्कृतीचा पोशाख आवडीने परिधान करून आपलीच छायाचित्रे पैसे देऊन मुद्दामहून काढून घेत असतो. भविष्यात कोकणातील विविध लोककलांच्या ड्रेसचे पर्यटन अंगाने असे व्यावसायिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. ‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ होऊन त्यांना ‘राजाश्रय’ मिळावा यासाठीही आगामी दस्तऐवजीकरणासह भव्य उत्सवी वातावरणात सर्वांसमोर येत असलेले लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवण्याचा होत असलेला ‘महोत्सवी’ प्रयत्न स्वागतार्ह म्हणायला हवा.

 

धीरज वाटेकर

लेखक, कोकण विकास, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते

मो. ९८६०३६०९४८

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

हवे मार्केटिंग प्रभावी, होईल पर्यटन बारमाही


मागच्या वर्षीची गोष्ट आहे. पाच दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करून कोकणी चाकरमानी मुंबईला परतू लागले होते. इंदौर-कोचुवेली एक्सप्रेसने (१९३३२) आम्ही इंदोरहून चिपळूणला परतत होतो. दुपारचे दोनेक वाजलेले. मंगळवारी (६ सप्टेंबर २०२२) रात्री ९ वाजता इंदोरहून निघालेली कोचुवेली एक्सप्रेस ट्रेन पनवेलनंतर थेट चिपळूणला थांबा असताना सिग्नलमुळे खेडस्टेशनला थांबली. ट्रेनमधून दिसणाऱ्या समोरच्या प्लॅटफॉर्मवर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी लोटलेली. इतकी गर्दी की प्लॅटफॉर्मवर उभं राहायलाही जागा नसावी. अर्थात हा परिणाम कोकणात टिकून असलेल्या ‘उत्सवसंस्कृती’चा होता. गर्दीकडे पाहात असताना अचानक मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रेन आली आणि जागा पकडायला प्रवाशांची उडालेली झुंबड आपापल्या मोबाईलमध्ये टिपायला इकडे ट्रेनमधील प्रवाशांची झुंबड उडाली होती. ‘पर्यटन’ अंगाने विचार करता ते दृश्य अफलातून होते. खरंतर ट्रेनच्या डब्यात शिरण्यातली गर्दी भारताला अजिबात नवीन नाही. पण या ट्रेनमधील पावसाळ्याच्या दिवसातील, ही गर्दी पाहून ट्रेनमधील प्रवाशांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. मागील पंधराएक वर्षात कोकण पर्यटनात प्रचंड वेगाने बदल झालेत. येत्या काळात मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर एखादं धरण फुटावं तसं पब्लिक या मार्गावरून प्रवास करताना दिसणार आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पब्लिकला अधिकाधिक संख्येने कोकणातल्या गावागावात आणणं, त्याला इथली वैशिष्टय जगायला देणं या क्षेत्रात खूप मोठी पर्यटन संधी दडलेली आहे. तिला पूर्णपणे कॅश करण्यासाठी ‘कोकण’ देशभर पोहोचवू शकेल अशा ‘प्रभावी मार्केटिंग’ची आवश्यकता आहे.


मानवी भांडवल विकासाच्या दृष्टीने भारताची युवाशक्ती ही मौलिक संपत्ती उपयोगात आली आणि आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनलो. १९९० ते २०१८दरम्यान भारतासह दक्षिण आशिया हा सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश राहिला. स्पर्धेच्या काळात माणसाकडे जसजसा पैसा वाढत गेला तसतसा भौतिक प्रगती आणि सोयीसुविधांचा विकास होत गेला. यातून आलेल्या तणावामुळे आपलं जीवन आनंदी बनविण्यासाठी, परिपूर्ण जीवनाचा ध्यास घेऊन माणूस वावरू लागला. भौतिकदृष्ट्या झालेल्या मानवी प्रगतीच्या मर्यादा माणसाच्या जसजश्या लक्षात येऊ लागल्या तसतसा माणूस आनंदी जीवन जगण्याकडे वेगाने आकर्षित होत गेला. शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची मानवी गती ही समुद्रकिनाऱ्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. मागील पंधरा वर्षांच्या कालखंडात त्याचा काहीसा परिणाम स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या निसर्गरम्य कोकण पर्यटनावरही झालेला पाहायला मिळतो. याच काळात कोकणात हॉटेल, कृषी पर्यटन आणि निवास न्याहारी व्यवस्था प्रचंड वाढल्यात. मात्र अपवाद वगळता कोकणातील हायवेवरील असंख्य हॉटेलात स्थानिक वैशिष्ट्यांचे जेवण आजही मिळत नसल्याचे चित्र आहे. बहुतांशी हॉटेलात टिपीकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही. पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी? आणि कसे? यासाठी प्रयत्न व्हायला हवे असून पर्यटन म्हणून कामाची इथे संधी आहे. कोकणभूमीत आनंद प्राप्तीसाठी येणाऱ्या पर्यटकांना जेवणही कोकणातील रीतीरिवाजानुसार मिळायला हवं आहे. किमान तसे पर्याय हॉटेलच्या ‘मेनूकार्ड’वर उपलब्ध असायला हवेत. यासाठी कोकणातील केटरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या महाविद्यालयांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांना कोकणातील हॉटेल व्यवस्थापनाकडून रोजगार संधी मिळायला हव्यात. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विविध समाजांची जेवण बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची लज्जत न्यारी आहे. ती पर्यटकांपर्यंत पोहोचायला हवी आहे. आपल्या सावंतवाडीतील लाकडी वास्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमीपुत्रांची पाऊले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात.

येत्या काही वर्षात साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नातून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, कातळखोदचित्रे, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाईल्डलाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाईल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटरपार्क, थीमपार्क आणि सर्वात महत्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राईड सारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रीय करून पर्यटन समृद्धी आणणे शक्य आहे. आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्ककल्चर नाही आहे. आपल्याकडे सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरत नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन झालेले नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खाजगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोकं सेकंड होमएन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्याची आपल्याला संधी आहे. आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने जाहिरातीमुळे प्रभावित  होऊन आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे आपण थांबवायला हवे आहे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये कोकण दिसायला हवे आहे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते. पण तारकर्लीसह कोकणातील सर्वाधिक पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो? बदलत्या काळात कोकणात असंख्य पर्यटन प्रकल्प सुरु झाले असले तरी अख्खे कुटुंब आनंद मिळवू शकेल अशा व्यवस्था आपल्याला कोकणात अधिकाधिक उभाराव्या लागणार आहेत. आपल्याकडे येणारा पर्यटक हा अधिकाधिक समुद्र आणि निसर्गाच्या ओढीने येत आहे. त्यामुळे याच दोन विषयात लक्ष देऊन अधिकाधिक काम करायची आवश्यकता आहे. उपलब्ध साधनसामुग्री विचारात घेऊन मोठाले पर्यटन प्रकल्प उभे राहातात. कोकणला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कातळखोदचित्रांसारखे कोकणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला झेंडा फडकावायाची संधी देणारे प्रकल्प पुढे येत आहेत. तशी क्षमता इथल्या समुद्री किल्ल्यात आणि अश्मयुगीन वैशिष्ट्यांत आहे. जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी इथे आहे. कोकणात दरवर्षी होणाऱ्या विविध सांस्कृतिक उत्सवांच्या तारखा पंचांग संस्कृतीमुळे आपल्याला वेळेपूर्वी माहिती असतात. त्याचा उपयोग करून कोकणच्या प्रथा-परंपरा-सांस्कृतिक उत्सव-जत्रा-यात्रा- आदींचे वार्षिक पूर्वनियोजित कॅलेंडर प्रकाशित करणे आपल्याला शक्य आहे. ज्याचा सर्वाधिक उपयोग पर्यटन हंगामात कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या आवडीनिवडीनुसार नियोजन करायला होऊ शकेल. केरळमधील नौकानयन शर्यतीप्रमाणे कोकणात गौरी-गणपती, शिमगा खूप मोठे पर्यटन वैशिष्ट्य आहे. त्याचे मार्केटिंग व्हायला हवे आहे.

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करताना दिसतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल, इथे संधी आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची ‘मार्केटिंग’ची दृष्टी विकसित व्हायला हवी आहे. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची पडायला हवा आहे. चिपळूणच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारीसाठी आम्ही ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या होत्या. डेस्टिनेशन चिपळूणसर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला होता. पण सतत याला येणारा खर्च कोण करणार? हा मुद्दा अखेरपर्यंत प्रलंबित राहिला. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी आहे.

 

कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे आपल्याला कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागणार आहेत. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी ‘होम-स्टे’ साकारलीत. कोकणातील महिला इथे येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं प्रभावी मार्केटिंग झालं तर कोकणात परदेशी पर्यटक टक्का वाढेल. तो इथल्या रोजगार निर्मितीस पूरक ठरेल.

कोकणातलं कौलारु घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाची, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट देशभरातील पर्यटकाच्या हृदयापर्यंत पोहोचायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढऱ्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते? हे अजून कितीकाळ शब्दातच सांगायचं? कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा मार्केटिंगवर खर्च करतो? हे फार महत्त्वाचे आहे. पर्यटन ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एकेकाळी मंडणगडची ओळख कोकणातलं अंदमानअशी होती. आता त्या भागातील केळशीसह वेळासच्या किनाऱ्यावर कासव महोत्सवासाठी अलोट गर्दी होते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, मुरूड, लाडघर, कोळथरे, भंडारपुळे, देवगड, वेंगुर्ला, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, साखरी-नाटे, पावस, पूर्णगड, वेत्ये, गावखडी आदी अनेक समुद्र किनाऱ्यावर फारसे पर्यटक येत नसत. तेव्हा कोकणात जाणं म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा मे महिन्यात नातेवाइकांकडे आंबे-काजू खायला जाणं असं स्वरूप तेव्हा होतं. अपवाद गणपतीपुळे, मालवण, तारकर्लीचा होता. कारण तेथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची कॉटेज उपलब्ध झाली होती. २० जानेवारी १९७५ रोजी 'पर्यटन विकास महामंडळ' स्थापन होऊनही कोकणात विशेष पर्यटन गांभीर्य नव्हते. गणपतीपुळेत १९८१च्या सुमारास एमटीडीसी सुरू झालं. १९९१ गणपतीपुळे विकास आराखडा तयार झाला असावा. तसेच पुढे ते तारकर्ली व मालवणमध्येही झाले. कोकण रेल्वे कार्यरत झाली. काही ठिकाणी सागरी महामार्ग अस्तित्वात आला. सागरी किनाऱ्यावरील गावं थेट महामार्गाला जोडली गेली. ज्या गावांमध्ये फक्त होडीनं जावं लागत होतं तिथे पूल झाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या काही वर्षात पूर्ण होईल. यास्तव कोकणात पर्यटक येऊ लागलेत. त्यात ‘हंगामी’ स्वरुपाची प्रचंड वाढ झाली आहे. ती ‘बारमाही’ बहरायला हवी आहे. अर्थात बारा महिने कोकण पर्यटनही संकल्पना पर्यटकांत आणि इथल्या जनमानसातही रुजायला हवी आहे. त्यासाठी प्रभावी ‘मार्केटिंग’च आवश्यक आहे.

-धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २५ वर्षे पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

सोमवार, २ जानेवारी, २०२३

कोकण पर्यटनाच्या नव्या वाटा

   


     सातत्याने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, जगातील अधिकाधिक लोकसंख्या शहरात वास्तव्याला असली तरी ती वेळ मिळताच कोकणासारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात अधिकाधिक संख्येने पर्यटक बनून ये-जा करत असते ही बाब पर्यटन हंगामातील आकडेवारीतून सिद्ध झालेली आहे. कोकणचा विचार करता स्थानिक जनमानसही पर्यटकांचे आदरातिथ्य करायला उत्सुक असल्याचे चित्र आहे. असे असूनही महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६२ वर्ष पूर्ण होऊनही आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात कमी पडत असू, नुसत्या घोषणा करण्यात समाधान मानणार असू तर कोकणसारख्या भागातील प्रयत्नरत हातांनी पर्यटनात बहरणाऱ्या नव्या वाटा धुंडाळायच्या कशा? असा प्रश्न पडतो. कालानुरूप बदल स्वीकारीत बारा महिन्यांच्या कोकण पर्यटन व्यवसायात जीवंतपणा आणण्यासाठी आवश्यक असलेलं वैविध्य जपण्याचं कौशल्य कोकणातील पर्यटन व्यावसायिकात आपल्याला दिसते. या कौशल्याला मुलभूत सेवा-सुधारणांची शासकीय-प्रशासकीय साथ मिळायला हवी. ती मिळाल्यास कोकणात पर्यटनाच्या नव्या ‘बारमाही’ वाटा विकसित होऊन बारा महिन्यांच्या कोकण पर्यटनातून आर्थिक समृद्धी येणे शक्य आहे.

पर्यटन ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एकेकाळी मंडणगडची ओळख ‘कोकणातलं अंदमान’ अशी होती. आता त्या भागातील केळशीसह वेळासच्या किनाऱ्यावर कासव महोत्सवासाठी अलोट गर्दी होते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, मुरूड, लाडघर, कोळथरे, भंडारपुळे, देवगड, वेंगुर्ला, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, साखरी-नाटे, पावस, पूर्णगड, वेत्ये, गावखडी आदी अनेक समुद्र किनाऱ्यावर फारसे पर्यटक येत नसत. तेव्हा कोकणात जाणं म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा मे महिन्यात नातेवाइकांकडे आंबे-काजू खायला जाणं असं स्वरूप तेव्हा होतं. अपवाद गणपतीपुळे, मालवण, तारकर्लीचा होता. कारण तेथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची कॉटेज उपलब्ध झाली होती. २० जानेवारी १९७५ रोजी 'पर्यटन विकास महामंडळ' स्थापन होऊनही कोकणात विशेष पर्यटन गांभीर्य नव्हते. गणपतीपुळेत साधारणत: १९८१च्या सुमारास एमटीडीसी सुरू झालं. १९९१ गणपतीपुळे विकास आराखडा तयार झाला असावा. तसेच पुढे तारकर्ली व मालवणमध्येही झाले. नंतर कोकण रेल्वे कार्यरत झाली. किमान काही ठिकाणी सागरी महामार्ग अस्तित्वात आला. सागरी गावं सागरी महामार्गाला जोडली गेली. ज्या गावांमध्ये फक्त होडीनं जावं लागत होतं तिथे पूल झाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची चर्चा झडू लागली. येत्या काही वर्षात तो पूर्णही होईल. यास्तव कोकणात पर्यटक येऊ लागले. ‘कोकणात पर्यटकांचे बुकिंग होतंय!’ हे लक्षात आल्यानंतर मोठ्या उद्योजकांसह कोकणातील युवा वर्गाने घरची आंबा बागायत सांभाळून लहानसं रिसॉर्ट सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केले. काहींनी शासकीय परवानगीने ‘होम स्टे’ सुरू केले. कोकणात 'होम स्टे' साकारणाऱ्या कुटुंबातील महिला या आलेल्या पर्यटकांना अत्यंत रुचकर कोकणी जेवण देतात. पण हे सारं कोकणी पदार्थ व्यंजन कोकणातील हॉटेलात मिळत नाही. असं का व्हावं? 'होम स्टे'ची सोशल मीडियावर प्रभावी जाहिरात झाल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. कोकणातल्या अगदी कोपऱ्यातल्या किनाऱ्यावरच्या गावांकडेही पर्यटकांचे पाय वळायला लागले. झपाट्याने पूर्वीपेक्षा कोकणात पर्यटन वाढलं, हे सत्य आहे. त्याचं पहिलं श्रेय स्वर्गीय कोकणच्या निसर्गरम्य पर्यटन विकासासाठी गेली काही दशके सातत्याने धडपडणाऱ्यांना द्यायला हवं. दुसरं त्यानुसार पाऊलं उचलणाऱ्या व्यावसायिक आणि प्रशासनाला द्यायला हवं.

कोकणात दरवर्षी होणाऱ्या विविध सांस्कृतिक उत्सवांच्या तारखा ‘पंचांग संस्कृती’मुळे आपल्याला वेळेपूर्वी माहिती असतात. त्याचा उपयोग करून कोकणच्या प्रथा-परंपरा-सांस्कृतिक उत्सव-जत्रा-यात्रा- आदींचे वार्षिक पूर्वनियोजित कॅलेंडर प्रकाशित करणे आपल्याला शक्य आहे. ज्याचा सर्वाधिक उपयोग पर्यटन हंगामात कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या आवडीनिवडीनुसार नियोजन करायला होऊ शकेल. केरळमधील नौकानयन शर्यतीप्रमाणे कोकणात गौरी-गणपती, शिमगा खूप मोठे पर्यटन वैशिष्ट्य आहे. त्याचे मार्केटिंग व्हायला हवे आहे.

समुद्राची ओढ नसलेला माणूस विरळच! समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, फेसाळते निळेशार पाणी, किनाऱ्यावरील पांढरी-सोनेरी वाळू, काळ्या समुद्राची नवलाई, समुद्रकिनाऱ्यावरील दगडी रांजणखळगे (अनारसे), समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग परंपरा जपणारी मंदिरे, गडकिल्ले, जुनी घरे, कोकणी संस्कृती, उत्सव, मासेमारी, कोकणी मेवा, खाण्यापिण्याची चंगळ आदींमुळे कोकणात उंची विदेशी पर्यटनाचा फील घेता येतो. त्यात कोकणला लागून असलेल्या सह्याद्रीतील वळणावळणाचे रस्ते, उंच डोंगर, वृक्षराजी आणि मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंतच्या भागात पर्यटकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असलेले रम्य ठिकाणे यामुळे पर्यटकांना ‘कोकण’ हवाहवासा वाटत असतो. तो ‘कॅश’ करण्याची जबाबदारी कोकणी माणसाची आहे.

मुंबई-गोवा-मुंबई जलमार्गावर सुरु झालेली ‘क्रूझ’सेवा कोकणातही बहरायला हवी आहे. क्रूझसेवेतूनही पर्यटनक्रांती आणि रोजगार निर्मिती शक्य आहे. पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळणे शक्य आहे. केरळने ‘बॅकवॉटर’ संकल्पनेच्या आधारे जगाच्या पर्यटन नकाशावर आपले स्थान निश्चित केले आहे. कोकणातील नद्या-खाड्यांमध्ये भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य असूनही आपल्याला बॅकवॉटर संकल्पना नीटशी राबविता आलेली नाही.

कोकण किनारपट्टीच्या भरती-ओहोटी क्षेत्रामध्ये असलेल्या खडकाळ भागांमध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता (समुद्रशैवाल, अल्गी आदी समुद्रीजीव) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर, भोगवे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच ठिकाणी खडकाळ भागांतील पर्यटन क्षेत्र विकसित होऊ शकेल करण्याची संधी आहे. कोकणात निसर्ग जपत शाश्वत विकासासाठी धोरणात्मक पाऊले उचलली जायला हवी आहेत. कोकणातील जैवपरिसंस्था जपण्याची गरज आहे. सध्याच्या प्रदूषणाच्या दुनियेत निसर्गपूरक जीवनशैलीचे महत्त्व खूप आहे. कोकणात पोर्ट विकसित व्हायला हवी आहेत. तसेच कोकणातील मोकळ्या जागांचा सेंद्रिय पद्धतीने विकास शक्य आहे का? याचा विचार व्हायला हवा आहे. रत्नागिरीत नुकतेच देशातील पाचवे थ्री-डी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणसुरु झाले आहे. अंतराळाचा वेध घेण्याची आवड अनेकांना असते. यामुळे ‘तारांगण’ तोंडओळख होण्यास मदत होईल. अशा प्रकल्पांमुळे पर्यटक कोकणात अधिक वेळ गुंतण्याची प्रक्रिया वेग घेईल, ज्यामुळे त्याचा कोकणातील मुक्काम आणि पर्यटन वृद्धी आकार घेईल.

आपली भारतीय संस्कृती 'अतिथी देवो भव' असे म्हणते. अपवाद वगळला तर आम्ही कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अवाच्यासव्वा किंमती सांगून भांबावून सोडत असतो. होया तर घेवा, नाय तर जावाअसली वाक्य आपल्या संवादातून हद्दपार झाली पाहिजेत. भरपूर नफा कमावण्याच्या नादात लुटारूपद्धती बदलली गेली पाहिजे. अलिकडे सोशल मिडिया कमालीचा सक्रीय असल्याने पर्यटन हंगामात याची हमखास चर्चा होते. हे थांबायला हवे.

सध्याचा काळ हा कोकणातील पर्यटन व्यवसायाला नवनवीन संधी देणारा आहे. आरोग्य पर्यटनात भारतात केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी उपलब्ध असतानाही कोकण यात पुढे दिसत नाही. यासाठी पुन्हा पायाभूत सुविधांचा मुद्दाच ऐरणीवर यावा. पर्यटन हंगामात ‘कोकण हाऊसफुल्ल’ म्हणत आम्ही कितीही ओरडलो तरी आजही भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या 'टूरलिस्ट'मध्ये कोकण नाही. याच्या कारणांच्या मुळाशी आम्ही जायला तयार नाही किंवा व्यवस्थेला शक्य तितका उशीर करण्यात अधिक स्वारस्य असावे, अशी स्थिती आहे. अपवादात्मक मोजक्या कंपन्यांच्या 'टूरलिस्ट'मध्ये तारकर्ली (स्नॉर्केलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागले आहे. या ठिकाणांचाही पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांपेक्षा अधिक नसावा.

‘बारा महिने कोकण’ ही संकल्पना आपल्याकडे विकसित व्हायला हवी त्यासाठी ती इथल्या जनमानसात रुजायला हवी. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहेत. मुळची कोकणातील परंतु नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेली तरुणाई कोकणात काहीतरी करायला हवं असा सकारात्मक विचार करू लागली आहे. याच्या मुळाशी मागील किमान पंचवीसेक वर्षांची या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मेहनत आणि सातत्य कारणीभूत आहे. त्यामुळे कोकणाचा सकारात्मक विचार करणाऱ्या या तरुणाईला सरकार-प्रशासनाने विश्वासात घ्यायला हवे आहे. दुर्दैवाने कोकणातील प्रशासनात कोकणाबाहेरील अधिकाऱ्यांचा-कर्मचाऱ्यांचा टक्का अधिक आहे. त्यांना या भूमीची विशेष काही पडलेली नाही अशी स्थिती आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी गावी निघायचं आणि सोमवारी दुपारी किंवा थेट मंगळवारी कामावर रुजू व्हायचं असा कार्यभार सांभाळणारे कोकणात कितीतरी सापडतील. त्यातच एकाच कर्मचाऱ्यावर असलेला अधिकच्या कामाचा ताण, कोकणची भौगोलिक स्थिती अशा अनेक कारणांमुळे इथल्या मुलभूत विकासात सतत अडचणी निर्माण होत राहातात. पर्यायाने कोकणात अध्येमध्ये ‘स्वतंत्र कोकण राज्य’ची मागणी जोर धरताना दिसते. भावनिकदृष्ट्या दृष्ट्या ही मागणी स्वीकारणे अवघड असले तरी तिच्यामागाचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही हे सत्य आहे. त्यामुळे अशा मागण्या येणार नाहीत या दृष्टीने विचार व्हायला हवा आहे.

कोकणात येणाऱ्या पर्यटकाने आयुष्यातील काही दिवस कोकणातच वास्तव्य करावे, पर्यटनाचा निवांत आनंद घ्यावा यासाठी शासन आणि प्रशासनाने नेमके काय प्रयत्न केलेत? कोकणातील पारंपरिक, शेतकरी, कातकरी, आदिवासी, कोळी आदी विविध समाजाच्या सोबतची जगण्यातील निवासी अनुभूती आपण पर्यटनात आणायला हवी आहे. कोकणात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘निवास व न्याहरी’ योजनेला प्रोत्साहन दिलेलं दिसतं. पण त्यातील कागदपत्रीय क्लिष्टता कमी व्हायला हवी आहे.

कोकणातील किल्ल्यांची चांगल्या प्रकारे देखभाल झालेली नाही. त्यांची पर्यटकांना पुरेशी माहिती नाही. यामुळे समुद्रातील, समुद्राचे सान्निध्य लाभलेल्या, जमिनीवरील आणि जंगलातील किल्ल्यांचे वैश्विक वैभव पर्यटकांविना आहे. कोकणी माणूस प्रामाणिक आहे. त्याच्याकडे चिकाटीही आहे. त्याला शासकीय सहकार्याची आणि पायाभूत गरज आहे. कोकण पर्यटनाची नवी दिशा ठरवण्यात ‘जागतिक वारसास्थान कातळशिल्पे’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तसे प्रयत्न सुरूही आहेत, त्यांना संपूर्ण प्रशासकीय पाठबळ मिळायला हवं. कोकणात सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धबधबे, तलाव, सागरकिनारा, नद्या, खाड्या, जंगलवैविध्य, प्राचीन वास्तू, तीर्थक्षेत्रे, किल्ले, थंड हवेची ठिकाणे आदी पर्यटन वैभव असूनही इथलं पर्यटन दुबळं असल्याचं दिसतं. कोकणाचे सौंदर्य टिपण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते येतात. या साऱ्यांच्या नोंदी (डॉक्युमेंटेशन) व्हावे. मुळात कमी बजेट असणाऱ्या फिल्म्स करणे, ही मोठी कसरत आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे 'प्लॅन्ड टुरिझम' असतो. दुबईसारखे वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे 'थीम्स' दिसतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे.

कोकणात मनुष्यबळ, व्यवस्थापन, जेवणखाणे, निवास या गोष्टी परवडणाऱ्या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही नाही. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही? आपल्या आंबोली-दोडामार्ग वगळता कर्नाळा, फणसाड जंगलांची उत्कृष्ट अशी ओळख का होत नाही? अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असे काही जोरदार सुरू झाले, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचे मार्केटिंग झाले तर कोकणात देशी-परदेशी पर्यटक नक्कीच येईल. तशी विशेष उभारी कोकणात मागील दहाएक वर्षांत पर्यटन व्यवसायाने घेतलेली दिसते आहे. ‘सी-वर्ल्ड’सारखा प्रकल्प कोकणात व्हायला हवा आहे. जागतिक वारसास्थळांचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती वेगवेगळी 'थीम्स' तयार होऊ शकतात. विजयदुर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक येण्यासाठी कोकणात काही प्रकल्प उभे राहायला हवे आहेत. यात पुढाकार कोण घेत आहे? यापेक्षा प्रकल्प उभे राहाणे महत्त्वाचे आहे. असा सकारात्मक विचार व्हायला हवा आहे.

कोकणातील ‘रेवस ते रेड्डी’ या ४९८ किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गावर भरपूर पर्यटनस्थळं आहेत. ती विकसित करून पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोकण पर्यटन आपसूक आणखी वाढेल. सागरी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी या मार्गावर खाद्य-पेयाचे स्टॉल, पेट्रोलपंप आदी आनुषंगिक सुविधा आवश्यक आहेत. कोकणात किनाऱ्यांवर सार्वजनिक चौपाटी केंद्र उभारली जायला हवीत. त्याच प्रमाणे कोकणातील साऱ्या पर्यटन मार्गांवर हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात किंवा नदी किनारी पर्यटकांना काही काळ विसावा घेता येईल अशी ‘क्षणभर विसावा केंद्र’ उभारली जायला हवी आहेत.

पर्यटन हंगामात आजही कोकण हाऊसफुल्ल असतं. मात्र कोकणात पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करत असतात. अंतराचा विचार करता ते योग्यही आहे. असे पर्यटक स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादे वाहन ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसभर भ्रमंती करतात. कोकणच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह प्रेक्षणीय स्थळांचे नियोजन पर्यटकांना देत असतात. त्या त्या ठिकाणचे वाहनचालक पर्यटकांना नियोजनानुसार पर्यटन दर्शन घडवत असतात. हे असे कोकणात का होत नाही? आम्ही कोकण पर्यटनाचे मार्केटिंग कधी करणार? यासाठी आम्हाला कोकण पर्यटनाचे मार्केटिंग देशभर करावे लागेल. पर्यटनाचा ८० टक्के व्यवसाय हा जाहिरातीवर अवलंबून असतो. एकूण पर्यटन व्यवसायातील २० टक्के खर्च जाहिरातींवर होतो. आमच्या व्यावसायिकांकडून हे होत असेल का? कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. सर्व आर्थिक पातळीतला पर्यटक आला तरी त्याला सेवा मिळू शकते.

युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित झाला होता. त्याचा पर्यटन विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळ’ स्थापन केले होते. छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना रत्नागिरी येथे झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत कोकणसाठी स्वतंत्र सागरी पर्यटन महामंडळ स्थापन होणार होते. एप्रिल २०१६ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासाच्या घोषणा केल्या होत्या. त्यांनीही स्वतंत्र ‘पर्यटन विकास महामंडळ’ बाबत सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर अगदी अलिकडे (१६ डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात कार्यान्वित झाली तर त्यातून कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता वाढेल. आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळानंतर बऱ्याच वर्षांनी कोकणचा ठोस विचार करणारे राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभलेत असा संदेश सर्वत्र जाईल. कारण अपवाद वगळता राज्य व केंद्र सरकारने कोकणच्या पर्यटन विकासासाठी किरकोळ स्वरूपाचा निधी देऊन अल्पसल्प कामे केली आहेत. तीही कामे आपल्याला ‘गणपतीपुळे-तारकर्ली’ अशाच मोजक्या ठिकाणी दिसतील. कोकणच्या सर्वंकश पर्यटन विकासासाठी दृश्य स्वरुपात भरीव असे काहीही झालेले नाही. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. अगदी अलिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावरून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘कोकण महामार्गाचं काम अर्धवट असून ते वेगानं झालं पाहिजे’ अशी चर्चा केली होती. यावरून पायाभूत सुविधांची कल्पना यावी. पर्यटन हा जगात सर्वाधिक रोजगार आणि परकीय चलन मिळवून देणारा उद्योग असताना जागतिक पर्यटनात आपल्या देशाचा वाटाही नगण्य आहे. अलिकडे देशात चांगले प्रकल्प आणि प्रयत्न होत आहेत. तसे ते कोकणातही व्हायला हवेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ संस्थेला केरळच्या ‘पर्यटन विकास प्राधिकरण’प्रमाणे आर्थिक स्वायतत्ता मिळणे आवश्यक आहे.

खरंतर कोकणसह आपल्या महाराष्ट्राला पर्यटन विषयाची ‘व्यावसायिक दृष्टी’ किती आहे? असा प्रश्न पडावा अशी आपली स्थिती आहे. प्रदूषण विरहित वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या कोकण भूमीत येत असल्याने पर्यटनाच्या बारमाही नव्या वाटा धुंडाळताना आपल्याला कचऱ्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. इतिहासात डोकावता, गणपतीपुळ्यात १९८१मध्ये समुद्रकिनाऱ्यावर ‘एमटीडीसी’ने कॉटेज बांधल्यावर पर्यटक येथे दाखल होऊ लागले होते. त्यानंतर १९९१दरम्यान गणपतीपुळे विकास आराखडा, रस्ते आणि मंदिर नव्यानं बांधलं गेलं. नजीकच्या मालगुंडला केशवसुत स्मारक आणि ‘प्राचीन कोकण म्युझियम’ झालं. अनुकूल शासकीय धोरणं आणि दळणवळाच्या सोयींनी गणपतीपुळे भागात २०००नंतर पर्यटनाचा वेग कमालीचा वाढला. एका उपलब्ध अंदाजानुसार गणपतीपपुळ्याला वर्षभरात २० ते २२ लाख पर्यटक येत असावेत. त्यात सुमारे पाचेक हजार शाळांच्या सहली संभवतात. अर्थात गणपतीपुळेतील पायाभूत सुविधांवर ताण येणे स्वाभाविक आहे. याच प्रकारे मालवण, तारकर्ली, आंबोली, कर्दे-मुरुड, काशीद, किहीम, अलिबाग आदी ठिकाणांचा विचार करता आज आणि उद्या कोकणात सर्वत्र कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

साहसवीरांसाठी मालवण-रत्नागिरीच्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहेत. मोटरबोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह पॅराशूटचीही मजा येथे घेता येते. खोल पाण्यात जाऊन समुद्रातील जलचर पाहता येतात. मालवणपासून तारकर्ली-देवबागपर्यंतचा सुमारे १२ किलोमीटर अंतराचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या आकर्षक किनारपट्टीवर तंबुनिवासाची सोयही आहे. कोकणातील रस्ते कसे का असेनात, येथे सुट्यांच्या हंगामात येथे तुडुंब गर्दी असते. मात्र काहीवेळा ‘स्कूबा डायव्हिंग’ला 'फार कमी वेळ मिळतो. समुद्र अस्वच्छ आहे' अशा तक्रारी ऐकू येतात तेव्हा यावर उपाय शोधण्याची आवश्यकता जाणवते. कोकणातील मोजक्या ठिकाणचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी पुरेसे पडणारे नाही आहे. अर्थात पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून मागील दहा वर्षात कोकण पर्यटन व्यवसाय संकल्पना विस्तारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ती  मार्केटिंगच्या बळावर केरळ, राजस्थानसारखी विकसित व्हायला हवी आहे. कारण सध्या जेवढे पर्यटक येऊन कोकण पाहतात त्यापेक्षा प्रचंड मोठे कोकण हे प्रचंड मोठ्या पर्यटकांची पर्यटनासाठी वाट पाहते आहे.

दरवर्षी राज्यात दहावी-बारावीच्या निकालात कोकणी टक्का अग्रेसर असतो. तरीही पुढे तो कोकण विकासाच्या चक्रात, शासकीय-निमशासकीय कार्यभारात कुठेही दिसून येत नाही. याचे कारण काय असावे? याच्या मुळाशी आम्ही जायला तयार होत नाही. कोकणच्या खऱ्याखुऱ्या विकासाचे असे विषय घेऊन आम्हाला दीर्घकाळ काम करावे लागणार आहे. त्यातून बदल शक्य आहे. ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, डॉ. प्रसाद देवधर, ‘मरिनर’ दिलीप भाटकर, डॉ. अर्चना गोडबोले, माधव महाजन, दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत मोकल, डॉ. सारंग कुलकर्णी, अलिकडच्या काळातील वैभव सरदेसाई, निशिकांत तांबे, सचिन कारेकर, प्रसाद गावडे अशा कितीतरी जणांनी कोकणात विषय घेऊन पाय रोवून उभे राहाण्याचे यशस्वी प्रयत्न केलेत. दुर्दैवाने ही उदाहरणे कोकण बोर्डात ‘टक्का’ गाजवणाऱ्या आमच्या हुशार तरुणाईपर्यंत योग्य वयात आणि योग्य वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे आळवावरच्या पाण्याप्रमाणे सोशल मिडीयाच्या मृगजळावर दिसणारं सारं सत्य मानून ही तरुणाई कोकणाबाहेर जाण्यासाठीसज्ज होते परिणामी कोकण वर्षानुवर्षे जिथल्या तिथेच राहिल्याचे दिसते. हे बदलण्याची ताकद कोकणी माणसात आहे. त्यासाठी कोकणात विषय घेऊन काम करणाऱ्या सृजनकर्मींची संख्या वाढायला हवी आहे. 'कोकण पर्यटन' म्हणून विविध जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेत आपणहून पुढे येऊन काम करणारी मंडळी हवीत. अशांची टीम एकदा का ‘पर्यटन साक्षर’ झाली तर कोकणातील गावेच्या गावे पर्यटनाच्या नकाशावर येतील. परिणामी कोकणाला बारमाही पर्यटनाच्या नव्या वाटा नक्की गवसतील.

-धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

 

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...