गुरुवार, १ मार्च, २०१८

'आदर्श गटशिक्षणाधिकारी' : सूर्यकांत पाटील

सूर्यकांत बळवंत पाटील  
चिपळूण प्राथमिक शिक्षणाच्या इतिहासात प्रथमच, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने 'आदर्श गटशिक्षणाधिकारी' म्हणून गौरव झालेले, चिपळूणात सहा महिन्यापूर्वीच (२२ जुलै २०१७) रुजू झालेले सूर्यकांत बळवंत पाटील यांना जिल्हा परिषद सोलापूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) अशी पदोन्नती बढती मिळाली आहे. मूळचे वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूरचे रहिवाशी असलेल्या पाटील यांनी चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागातील शाळांना भेटी, वादाचे विषय सामोपचाराने मिटविण्यात पुढाकार आणि विविध शाळांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करीत इथल्या प्राथमिक शिक्षण विषयात आदर्शवत काम उभे करण्याचा प्रयत्न केला.

चिपळूणातील आपल्या २२ जुलै २०१७ पासूनच्या अवघ्या गत सहा महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी अभिलेख वर्गीकरण, सेवा पुस्तकांचे अद्ययावतीकरण, प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला. चिपळूणात या पदाचा पूर्वीचा कालावधी हा ‘प्रभारी’ असल्याने अनेक विषय प्रलंबित होते. याकरिता कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलून काम करून घेण्याचे मोठे आव्हान होते. ७० केंद्राशाळातून विभागलेल्या ११३९ शिक्षकांचे कँप लावून किमान ८०० हून अधिक सेवापुस्तके अद्ययावत करून घेतली, उर्वरितही करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. वर्ग चारच्या सर्व सहा कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्या प्राधिकरणाने घेतलेल्या चाचण्या, ‘आसर’ संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत पहिल्या तीन क्रमांकात असून त्यात चिपळूण तालुका अग्रेसर आहे. शाळासिद्धी आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मुलांच्या वाचन विषयक जाणीवा समृद्ध करून त्यांना प्रभुत्व पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. गणितात विशेषतः भागाकारात मुले मागे पडत होती, त्याबाबत तसेच वर्तमान काळात मुलांना शिकायचे असेल तर आधुनिक डिजिटल युगाचा अवलंब अत्यंत आवश्यक मानून काम केले. सर्वात महत्वाचे म्हणजे चिपळूणात शिक्षक, प्रशासन यांच्यात अधिकाधिक सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येगाव शाळेत सुमारे ८-१० लाख रुपयांच्या शैक्षणिक उठावातून, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रकरिता आवश्यक सर्व उपक्रम राबविले जात असल्याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले. पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील ‘कुटी’ या शाळेत निर्माण करण्यात आली असून त्यात पुस्तके ठेवून मुक्त वाचन प्रकल्प राबविला जात आहे. उपक्रमशील शिक्षण असलेल्या या शाळेतील मुले पाहुण्यांची मुलाखत घेतात, इतपत सक्षम आहेत. चांगल्या कामाची संधी असलेल्या चिपळूणात काम करताना ‘संवाद आणि समन्वय’ अतिशय महत्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या खातेप्रमुखाला पुरस्कार दिला जातो, तो यावर्षी चिपळूणने शैक्षणिक इतिहासात पहिल्यांदाच मिळवला. रत्नागिरीत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘शिक्षणाची वारी’ कार्यक्रमासाठी कोल्हापूर विभागातून फक्त चिपळूणचा स्टॉल निवडण्यात आला होता, त्याचीही दखल शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतली होती.

सन १९८५ साली शाहूकुमार हायस्कूल कासारवाडा-बिद्री येथे त्यांनी सेवेस प्रारंभ केला, तिथे सात वर्षे सेवा बजावली. यावेळी काम करताना त्यांचा कल स्पर्धा परीक्षेकडे झुकला, सन १९९२ साली परीक्षा पास होऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण शाखेत वर्ग २ अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. दिनांक २५ मे १९९३ ला ते गटशिक्षणाधिकारी म्हणून कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे कार्यरत झाले. तिथेही त्यांनी सात वर्षे काम केले. सुरुवातीचा कालखंड तसा कठीण होता, अनेक प्रशासकीय गोष्टी मुळापासून समजून घेऊन कराव्या लागल्या. तिथे विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा शैक्षणिक उठावातून अधिकाधिक उपलब्ध व्हाव्यात, शिक्षक संख्येची कमतरता दूर व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत त्यांनी प्रयत्न केले. त्याबरोबरच विज्ञान प्रयोगशाळा, प्रकाशयुक्त खोल्या, प्रत्येक शाळेत एक बगीचा असावा याकरिता पाच लाख वृक्षारोपण, दुर्गम भागात शिक्षक रमावा म्हणून प्रयत्न केले. कुडाळ येथून त्यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे सन २००० ते २००३ दरम्यान एक वर्ष डायटमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर पुढे २००८ पर्यंत पन्हाळा येथेच ते कार्यरत राहिले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागात  उपशिक्षणाधिकारी म्हणून, एक वर्षे पुसेगाव महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केल्यावर ते चिपळूणात कार्यरत झाले होते. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुर्यकांत पाटील यांनी स्वत: श्रम करून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मूळगावी (वाघापूर, भुदरगड), त्यानंतरचे बी.एस.सी.एम.एड. पर्यंतचे शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर आणि प्रसिद्ध मौनी विद्यापीठ गारगोटी येथून पूर्ण केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात शिकत असताना जाधव नावाचे शिक्षक गणित शिकवायचे, त्यांच्या अध्यापन पद्धतीचा पाटील यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. आपण पुढील आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व्हायचे, हे त्यांनी त्यावेळेसच ठरवून टाकले होते. 
   
धीरज वाटेकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...