मंगळवार, ८ जून, २०२१

निसर्ग व पर्यावरण मंडळाची राज्यव्यापी आभासी कॉन्फरन्स

विविध ठिकाणच्या राज्य प्रतिनिधींसह महिला सखी मंचच्या प्रतिनिधींचा उस्फूर्त सहभाग

चिपळूण : राज्यभरातील कृतीशील पर्यावरणप्रेमी शिक्षकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे आभासी झूम कॉन्फरन्स जागतिक पर्यावरण दिन आणि मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन दिन संपन्न झाला. यावेळी वृक्षमित्र मोरे यांच्यासह राज्यातील उपस्थित प्रतिनिधींशी पर्यावरण मंडळाचे राज्य सचिव धीरज वाटेकर यांनी ‘पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या आभासी झूम कॉन्फरन्समध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख प्रतिनिधींसह राज्य महिला सखी मंचच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष स्वर्गीय गोरखनाथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी तांबोटकर आणि कोरोनात निधन पावलेले जगभरातील समस्त पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ. कावेरी मोरे यांनी ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांचे औक्षण केले. यावेळी सर्वांनी आभासी वातावरणात मोरे यांना अभिष्ट चिंतले. मंडळाने सायरा एज्युकेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण पीपीटी स्पर्धेत १०६ पर्यावरण पीपीटी आलेल्या होत्या. त्या स्पर्धेचा निकाल विशाल कांबळे यांनी आभासी वातावरणात स्क्रीनवर प्रमाणपत्र शेअर करून जाहीर केला. यात अनुक्रमे सुभाष नारकर पन्हाळा कोल्हापूर, कीर्ती मोरे भिवंडी ठाणे, वंदना कोरपे चिंचवड ठाणेहे विजेते ठरले. प्रदीप भाकरे कोपरगाव अहमदनगर आणि दत्ता लोकरे भिवंडी ठाणे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. मोरे यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर बोलताना राज्यभरातील पर्यावरणप्रेमी सहकारी शिक्षक बंधू-भगिनी यांचं मिळालेलं प्रेम महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं. मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी आपल्या पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका या विषयावरील संबोधनात छोटे छोटे जंगल निर्माण करण्याबाबत मांडलेल्या विचाराला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्याची कल्पना मांडली. मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी कोणत्या क्षेत्रात कोणती झाडं लावावीत याची संकलित केलेली माहिती महत्वाची आहे. नूतन बांदेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे त्यांनी कौतुक केले. शेवटी, झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन दिवसेंदिवस कमी होतो आहे. म्हणून सोसायटीत ऑक्सिजन देणारी छोटीछोटी झाडं लावायला हवीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका या विषयी बोलताना धीरज वाटेकर यांनी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘इको सिस्टीम रिस्टोरेशन’ असल्याचे सांगितले. आजूबाजूच्या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण, पुनर्वसन करण्याचा विचार या मागे असल्याचे ते म्हणाले. आपला ‘संपूर्ण निसर्ग हा एक परिवार आहे’ ही भावना पर्यावरणात काम करताना सतत मनात असायला हवी, असे ते म्हणाले. जलपासून सुरुवात  झालेल्या निसर्गाची दुसरी अवस्था जमीन आहे. तिसऱ्या स्तरावर प्राणअवस्था तर  चौथी जैवविविधता आहे. जैवविविधतेत मानव अंतर्भूत असून तो विकासाकडे वळल्यावर जगातील सुमारे ८० टक्के जंगल संपून निसर्गाचा ह्रास झाला आहे. म्हणून मंडळाला शाश्वत विकासाची भूमिका घेऊन पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासानुसार ७० वर्षांच्या जीवनात मानव १ टन कागद वापरतो. म्हणून किमान १७ झाडे लावून जगवण्याची आपली जबाबबदारी आहे. ‘टिशू पेपर संस्कृती’ सारख्या वर्तणुकीपासून आपण दूर राहायला हवं असं ते म्हणाले. जनजागृतीच्या क्षेत्रात चालणारे पर्यावरण मंडळाचे काम हे मनुष्य परिवर्तन, व्यक्तिनिर्माण, आचरणातील परिवर्तनाचे काम आहे. यासाठी समाज जागरण, समाजाची समज वाढविणे, सहभाग वाढविणेआवश्यक असून त्यासाठी मंडळ सातत्याने कार्यशाळा आणि पर्यावरण संमेलने आयोजित करत असल्याचे वाटेकर म्हणाले.

सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था हरित करणे, सर्वाकडून माहिती घेणे, सर्वाना माहिती देणे, आजूबाजूच्या रिकाम्या जागा, आपल्या घराच्या आजूबाजूला हरित पट्टा, घराजवळ अधिकाधिक सुगंधी फुलांची लागवड यासाठी आपण प्रयत्न करू या असे आवाहन वाटेकर यांनी केले. सर्वत्र झाडांना मारलेले खिळे काढून टाकण्याचा संवेदना अभियान सारखा स्त्युत्य उपक्रम आपण राबवू शकतो. सृष्टीत जीवाची उत्पत्ती पाण्यापासून झाली. प्राचीन भारतीय शास्त्रातही पहिला अवतार मत्स्यावतार आहे. आजही सर्वाधिक जैवविविधता पाण्यात आढळते. मात्र पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवते आहे. यासाठी आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना पूर्ण ऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे, एका बादलीत अंघोळ, अशा प्रकारे दैनंदिन वापरातील पाणी वापर कमी करण्याबाबत सुचविले. यावेळी त्यांनी कोकणात चालणाऱ्या ‘वाशिष्ठी नदी ; उगम ते संगम’ या उपक्रमाची माहिती दिली. एका संशोधनानुसार भारतात दरवर्षी प्रति व्यक्ति ५० किलो अन्नाची नासाडी होते. त्यामुळे अन्नाची नासाडी रोखण्यासाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क राहूया असं ते म्हणाले. जळलेल जंगल निर्माण व्हायला ७०-८० वर्षे निघून जातात. झाडं ही जंगलात वाढायला हवीत, त्यासाठी जंगलात बीजपेरणी अभियान व्हायला हवे. शहरातील मोकळ्या जागांवर लघुवन तयार करता येईल का ? असा विचार भविष्यात प्राधान्याने करावा लागणार असल्याची पर्यावरण मंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वागतपर मनोगत व्यक्त करताना नूतन बांदेकर यांनी, ‘पर्यावरणाचे काम सर्वव्यापी आहे. ते समाजातील प्रत्येक घटकाच्या मनामनात झिरपायला हवे आहे, असे नमूद केले. या महाराष्ट्रव्यापी चळवळीच्या माध्यमातून नव्या पिढीत पर्यावरण रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. महिला सखी मंचच्या राज्याध्यक्ष प्रियवंदा तांबोटकर यांनी,’ विकासाच्या नावाखाली झाडांची तोड झालेली आहे. त्यामुळे वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे म्हटले. घरातले अन्नपदार्थ हे स्वादिष्ट असतात हे आपण लॉकडाऊन काळात अनुभवले असल्याचे त्यांनी नमूद करताना प्लास्टिक कचऱ्याच्या कमी करण्याबाबत भूमिका मांडली. कार्याध्यक्ष उल्का कुरणे यांनी, ’निसर्गाचे रक्षण आणि संस्कृतीची ओळख आपल्याला पहिल्यापासून होती. निसर्गाचे स्वतःचे नियम आहेत. त्यांना बाधा निर्माण होईल असं काम आपण करू नये. सजीवांची आरोग्य साखळी, जैविक तराजू बिघडलेला आहे. म्हणून उपयोजनात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे’, असे म्हटले. नयना पाटील यांनी सखी मंचाने सुरुवातीपासून चांगले काम करायला सुरुवात केल्याची मांडणी केली. सुभाष नारकर यांनी, ‘आपल्या पीपीटीतील पर्यावरणीय विचार आणि मूल्यवर्धक उपक्रम शाळांत राबविणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रदीप साखरे यांनी ‘गाव तिथे पर्यावरण मंडळ हवं’ अशी भूमिका मांडली. मंडळाचे पदाधिकारी राजाराम ढवळे बोलताना पुणे-अहमदनगर मार्गावरील वनश्री पर्यावरण दिनी तोडल्याच्या मुद्द्याबाबत तीव्र आक्षेप नोंदविल्याचे म्हटले. मंडळाच्या या कार्यक्रमात याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनिषा पाटील, अनिल माळी, रमेश यमलवार, शिवम जाडकर, मनोहर सासे यांनी मनोगत व्यक्त केले.

पीपीटी स्पर्धा संयोजक आणि मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी कार्यक्रमाचे उस्फूर्त सूत्रसंचालन केले. सतत माणस जपणारे, जोपासणारे, जोडणारे, माणस घडविणारे, माणसांच्या मनाची मशागत करणारे असे आबासाहेब मोरे यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले. आभार वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी मानले. स्पर्धेतील विजेत्यांनी आपली बक्षीस रक्कम मंडळाच्या पर्यावरण कार्याला भेट दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्यभरातील उपस्थित पर्यावरण प्रेमींना त्यांनी वनश्रीप्रतिज्ञा दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची यु ट्युब लिंक : https://www.youtube.com/watch?v=eYyhbCpHltY




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...