बुधवार, २२ जानेवारी, २०२५

प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक

संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल (सर) 

कोकणात ग्रामीण साहित्य संमेलनांचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ला वाटूळ (राजापूर) येथे संपन्न होत आहे. प्रसिद्ध प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक-पत्रकार आदरणीय दिनकर गांगल (जन्म - २५ नोव्हेंबर १९३९, रोहा-रायगड) सर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सरांच्या रूपाने या ग्रामीण साहित्य संमेलनाला, मराठी भाषा व साहित्याबाबत चतुरस्त्र विचार करणारे आणि अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारे अध्यक्ष लाभले आहेत. शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित मराठी शाळा सर्वत्र बंद पडत आहेत. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर सरांचे अध्यक्ष होणे ग्रामीण भागातील साहित्यप्रेमींना बौद्धिक दिशादर्शक ठरावे.

कमालीचे साधे, प्रेमळ विनम्र, ठाम आणि सुस्पष्ट विचार असलेले गांगल सर हे महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा येथे २०११साली संपन्न झालेल्या १३व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे सरांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची साहित्य व संस्कृती क्षेत्रातील कारकीर्द सहा दशकांची राहिलेली आहे. सरांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्‍यांनी साकारलेली ‘महाराष्ट्र टाइम्स‘ची रविवार पुरवणी विशेष गाजली होती. सरांना ‘फीचर रायटिंग‘ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली होती. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. 'फीचर रायटिंग' मधले बापमाणूस अशी त्यांची ओळख यातूनच निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत, घडामोडीत, जडणघडणीत सरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे साक्षीदार असणारे गांगल सर वयाच्या ८५व्या वर्षी अमाप उत्साहाने काम करतात हे आमच्यासारख्यांना आदर्शवत आहे. सर अत्यंत धडपडणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या सहवासात अनेकांना नवी दृष्टी मिळाली आहे. साहित्य आणि सामाजिक व्यवहारातली अनेक माणसं ज्या वयात कालबाह्य झालेली पाहायला मिळतात, त्या वयात सरांचा डोळस सार्वजनिक वावर आश्वासक वाटतो. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ सरांच्या ठायी असल्याने आम्हालाही गांगल सर खूप जवळचे वाटतात. सरांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), क्षितीज अपार आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड‘ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सरांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती‘चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ‘ व ‘मराठा साहित्‍य परिषद‘ यांचे संपादनाचे पुरस्‍कार, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार आणि वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण‘ पुरस्‍कार प्राप्त झाला आहे.

कार्यरत होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सरांनी १९५७ पासून प्रथम 'केसरी' नंतर 'सकाळ'मध्ये काम केले. १९६४ पासून ते 'महाराष्ट्र टाइम्स'शी अखंड जोडले गेले. सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर जुलै १९६८ मध्ये ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना केली होती. १९६० ते १९८० हा दोन दशकांतला काळ विविध चळवळींचा होता. बहुसंख्य मध्यमवर्ग कोणत्यातरी चळवळीत होता. त्यात वाचनाची आस असलेला मोठा समाजगट होता. त्याच्यापर्यंत पुस्तके पोहोचवीत यासाठी १९७४-७५च्या सुमारास जाणीवसंपन्न समाजासाठी वाचन आणि विचारांची एक चळवळ उभी राहिली, ती ग्रंथाली वाचक चळवळ! ही चळवळ निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान गांगल सरांचे आहे. सरांनी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली‘ची स्‍थापना केली होती. ग्रंथाली पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. तिने अनेक मोठे लेखक घडवले. तळागाळातील अनेक हौशी कवी व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे विचार समृध्द केले. ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली त्यांपैकी ऐंशी टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते. त्यामागे गांगल सरांचे विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहल आणि संबंधित व्यक्तींमध्ये, विषयांमध्ये त्यांना दिसलेला स्पार्क हा धागा होता. दया पवार यांचे 'बलुतं' किंवा नरेंद्र जाधव यांचे 'आमचा बाप अन् आम्ही' ही त्याची दोन ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील. सरांनी ‘ग्रंथाली‘च्‍या ‘रुची‘ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. ‘ग्रंथाली‘ची चारशे पुस्‍तके संपादित केली. सरांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार‘चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. ‘ग्रंथाली’ ही साहित्याची उत्तम जाण व चोखंदळपणा यासाठी कार्यरत मराठी भाषेतील एक अग्रेसर चळवळ आहे. समाजाच्या नाडीवर अचूक ठेवले गेलेले बोट हे ग्रंथाली’च्या यशाचे खरे कारण होते. जाणीवजागृत तरुणांच्या प्रखर व तीव्र संवेदना, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा संघर्ष व त्यांना खुणावणाऱ्या विधायकतेमुळे ‘ग्रंथाली’कारांना लेखन-पुस्तकांचे नवनवे फॉर्म, नवनवे विषय सुचत गेले. गांगल सरांच्या शब्दात सांगायचं तर, ‘ग्रंथाली हे तत्त्वाग्रहांच्या कार्यपद्धतीतून उभी राहिलेली चळवळ आहे. ‘वाचनवेधकता’ हे मूल्य ‘ग्रंथाली’ आग्रहाने लेखकांसमोर मांडत आली. वाचकांना न कळणारे दुर्बोध साहित्य लिहिण्याची एक फॅशन मराठी साहित्यात होती. तेव्हा ग्रंथाली’ने वाचकांना आवडीने वाचता येईल असे सुगम साहित्य निर्माण करण्यावर भर दिला होता. विशेष म्हणजे या 'ग्रंथाली'ची वाटचाल ३५ वर्षांची झाल्यावर सरांनी 'ग्रंथाली'ची सूत्रे नव्या पिढीकडे दिलीत. गांगल हे ‘ग्रंथाली‘प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा‘चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. दीपक घारे यांच्या सहकार्याने २००१मध्ये त्यांनी ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ नावाने स्थानिक इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी छोट्या पुस्तिकांची मालिका तयार केली. ग्रंथाली ज्ञानयज्ञ’मध्ये हजार पुस्तके निर्माण झाली असती तर ते खूप महत्त्वाचे काम ठरले असते. अर्थात यात ज्या दोन-अडीचशे पुस्तकांची निर्मिती झाली तीही खूप महत्त्वाचीच होती. २००५मध्ये ‘मराठी विद्यापीठ डॉट कॉम’ वेबसाईटची निर्मिती केली.

एकविसाव्या शतकातील ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा संवर्धित व्हावा हा हेतू मनी बाळगून सरांनी २००९मध्ये ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ असलेले वेबपोर्टल चालवण्यात येते. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. ‘भारत देशात, महाराष्ट्रात विधायक असे काहीही होताना दिसत नाही. गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे.’ असं जाणवू लागल्यास सरांनी संपादित केलेल्या थिंक महाराष्ट्र’ वेब पोर्टलवर आवर्जून फेरफटका मारावा. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे ग्रंथालीचे पुढील अद्ययावत रूप आहे. एकप्रकारे त्याला मराठी विद्यापीठाचे प्रगत रूप म्हणता येईल. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल म्हणजे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशाचे विस्तारित आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे ते खरे आहे. हे पोर्टल उद्याच्या महाराष्ट्राचे म्युझियम आणि कंटेंप्ररी जर्नल असणार आहे. सरांनी सुरु केलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’चा प्रवास कोणत्या दिशेने असणार आहे? हे समजून सांगताना, ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतात. ‘पूर्वीच्या खेड्यातदेखील दारूचा गुत्ता, मटणाचे दुकान अशा, त्यावेळी दुष्ट मानल्या गेलेल्या गोष्टी होत्या. पण गावात दोन वारकरीदेखील असत आणि दारू प्यायलेला माणूस वारकर्‍यांच्या घरापाठीमागून लपतछपत स्वगृही जाई. ही दहशत नैतिक होती. समाजात सांस्कृतिक गोष्टी प्रभावी झाल्या तर असांस्कृतिकता, असभ्यता आपोआप निष्प्रभ होत जातात.’ हेच ध्येय बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ काम करते आहे. आजच्या बकालतेवर ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटवावे आणि सांस्‍कृतिकता अधिक प्रभावी करून लोकांमधील पुढाकार घेण्‍याची भावना जागृत करावी, यासाठी ‘थिंक महाराष्‍ट्र’ प्रयत्‍नशील आहे.

गांगल सरांनी मांडलेल्या थिंक महाराष्ट्र कम्युनिटी (समुदाय), जन्मशताब्दी वीरांचे दालन याही संकल्पना भन्नाट आहेत. १९०० ते १९३० या काळात जन्मलेल्या महनीय मंडळींनी महाराष्ट्रीय जीवन घडवले. अशा तीनशे मोठ्या व्यक्तींची नावेसरांच्या टीमने काढलीत. या मंडळींचा अभ्यास व त्यांचे कार्य संशोधन करून ‘जन्मशताब्दी वीरांचे दालन’अंतर्गत व्यवस्थितरित्या लोकांसमोर आणले तर अवघा महाराष्ट्र चकित होईल आणि सांस्कृतिकतेचे महत्त्व लोकजीवनात परत ठसेल. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे मराठी माणसाची कर्तबगारी आणि विधायकता यांचे नेटवर्क आहे. ते राज्याची तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न करते आहे. भौतिक विकासाचे मॉडेल स्वीकारले गेल्याने महाराष्ट्राच्या ‘व्हिजन’ला नव्वद सालानंतर अर्थ उरलेला नाही. महाराष्ट्र हा अमेरिकेप्रमाणेच ‘स्थलांतरितांचा देश’ (बॉयलिंग पॉट) आहे. मराठी कोणास म्हणावे? हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा ‘मिनी इंडिया’ आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला एकात्म उद्दिष्टाने बांधण्याचे काम आहे. हे एकात्म उद्दिष्ट वैचारिक व भावनिक असू शकते. मराठी माणसात कार्यकर्ता दडलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय ख्यातीचे कलाकार (भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गायतोंडे, हुसेन आहेत) व क्रीडापटूही (गावसकर, तेंडुलकर, नाटेकर) मोठे होऊन गेले. मात्र त्यांची छाप राष्ट्रीय पातळीवर मराठी म्हणून जाणवत नाही. महाराष्ट्रात मागील पन्नास-सत्तर वर्षांत काही मराठी विद्वान हे स्वतंत्र विचार मांडू शकतील अशा ताकदीचे होते. त्यांनी त्या त्यावेळी काही विचार नोंदूनही ठेवले. ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘स्वायत्त महाराष्ट्र’ पुस्तक या पठडीतले आहे. हे पुस्तक महाराष्ट्रकेंद्री आहे. दुर्दैवाने सुप्त सामर्थ्याचे असे अनेक विचारकण त्या काळात दडपले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्राची बौद्धिक हानी होऊन राज्याला बुद्धिमांद्याचा रोग जडल्याचे ठासून सांगत राज्याच्या स्थित्यंतरावर अचूक बोट ठेवणाऱ्या गांगल सरांच्या प्रतिभाशक्तीला सलाम करायला हवा.

महाराष्ट्र हा प्रदेश कर्तृत्वाचा आहे, हे गत आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. मानवी भाषांवर १९९०नंतर तंत्रज्ञानाचे मोठे आक्रमण सुरू झाले. त्यामुळे भाषेद्वारे आविष्काराची गरज कमी झाली. मानवी संभाषण पर्यायाने म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर, नव्या पर्यायी शब्दांचा शोध घेणे कमी झाले आहे. म्हणून इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे रूप नव्याने विकसित व्हायला हवे आहे. महाराष्ट्राच्या तालुक्या-तालुक्यात उपक्रमशील व्यक्तींचा संचार आहे. त्यांचा आणि प्रस्थापितांचा ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. उद्याचे परिवर्तन हे निर्मितीच्या प्रेरणांनी भारल्या गेलेल्या माणसांकडून होणार आहे. माणसांच्या सदसद्विवेकाची संस्कृती मागे पडते आहे. देशातील विचारी व संवेदनाशील समाज काहीसा आत्ममग्न आहे. माणसाच्या सत्त्व गुणाचे रुपांतर अतिगर्वात झाले आहे. रज गुणाने धुमाकूळ घातला आहे. हपापलेपण आणि विषयी वृत्ती हे समाजाचे ब्रीद बनले आहे. बुद्धीच्या जोरावर विवेकीपण येण्याऐवजी भोगवृत्ती वाढते आहे. प्रशासनावर वचक व पर्यायी विचार सापडत नाही आहे. मूल्यव्यवस्था ढासळते आहे. गावागावात पुतळे, मंदिरे, हॉस्पिटले बांधली जातायत. मात्र ग्रंथालय असायला पाहिजे असा आग्रह दिसत नाही. विद्वेष, विखार, विषमता हे सद्यकाळाचे दुखणे आहे. त्यामुळे संवेदनाशील व विचारी मनांमध्ये अस्वस्थता येते. माणसाची संवेदनेची पातळी कमी होत चालली आहे. सामाजिक कामांवर पैसा खर्च करण्याविषयीच्या संकल्पना खूप ठोकळेबाज असतात. गरजूला मदत करणे म्हणजे सामाजिक कामांवर पैसा खर्च करणे नाही. मन घडविण्याच्या कामांसाठी कोण काय करणार? याचा विचार करायला हवा. अशा मुद्द्यांवर गांगल सरांमधील भाष्यकार-निरीक्षक अचूक बोट ठेवतो. पर्याय म्हणून राज्यात तालुकास्तरावरील जीवनाचा-परंपरेचा व प्रगतीचा वेध घेणाऱ्या तालुका संस्कृती महोत्सवाची कल्पना राबवतो. समाजप्रबोधन व साहित्य संशोधन यांमधून तयार झालेल्या पिढीचा प्रभाव मराठी समाजावर १९४५ ते १९८० या काळात निर्विवाद होता. त्यानंतर हे सारे बिघडत गेले. नव्वद सालानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात केवळ पैशाला असाधारण महत्त्व प्राप्त होऊन इतर सारे दिशाहीन झाले. पूर्वी बहुसंख्य समाज अशिक्षित असूनही तो संस्कृतीच्या उत्तम कल्पना जोपासून होता. आज परिस्थिती उलटी आहे म्हणून समाजात सुसंस्कृत समाजाचा प्रभाव वाढायला हवा अशी सरांची अपेक्षा आहे. जुन्या मराठी साहित्यिकांच्या व कलाकारांच्या वेबसाईटस्ची निर्मिती, कला आणि करमणूक यांचा बिघडलेला तोल पुनर्स्थापित करण्यासाठी गांगल सरांनी रसिकतेचा अभ्यासक्रम उपक्रम सुरु करण्याची सूचना केली आहे.

बदलत्या काळात पुस्तकाची देवघेव करणाऱ्या ग्रंथालयांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागणार आहे. विविध ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे ग्रंथालयांचे मुख्य कार्य असायला हवे आहे. याविचारानेही सरांनी चळवळ सुरु केली आहे. सद्यकाळात मानवी भावना व्यक्त करण्याचे माध्यम पैसा आहे. ज्ञानाचा विस्तार प्रचंड झाला आहे. माहिती-ज्ञान सर्वत्र खुलेपणाने उपलब्ध आहे. गुरू गुगलबद्ध झाला आहे. मराठी प्रकाशन व्यवसाय आजही काहीसा संकटात आहे. हा व्यवसाय सरकारावलंबी राहिला आहे. पुस्तकांची लोकांमधील विक्री ही फार मोठी कधी राहिलेली नाही. साहित्य-कला-संस्कृती हे प्रश्न या समाजात कधी अग्रस्थानी आले नाहीत. जिज्ञासा, ज्ञानोत्सुकता यांना समाजात दोन-तीन टक्क्यांचे स्थान राहिले आहे. मागील दोनेकशे वर्षांपासून समाजात वावरणारे पुस्तक हे ज्ञानोत्सुकतेचे प्रतिक आहे. ‘पुस्तक व्यक्तीला घडवते’ यावर जिद्यासूंचा विश्वास आहे. असे नमूद करणारे गांगल सर, ‘वाचकाची भूक नव्या कंटेण्टची असण्याकडे मराठी पुस्तकांना पाहायला लागेल’ असं सांगून जातात तेव्हा त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन घडते. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. सर आजही वाचकांस काय हवे आहे? याचा प्रथम विचार करताना दिसतात. एखादा शब्द लिहिला नाही तर वाक्यात काही फरक पडेल का? संबंधित शब्द भविष्यात वापरात राहिल का? याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. ते रोज नव-नव्या व्यक्तींशी संवाद साधतात. व्यक्तींविषयी आपल्या साप्ताहिक स्तंभात लिहितात. अनेकांच्या लेखनावर संस्करण करतात. अनेक वर्तमानपत्रांसाठी विविध लेखकांचे साहित्य स्वतः संस्कारित करतात. सध्याच्या साहित्य क्षेत्रातील अशा मंडळींची यादी खूप मोठी आहे की ज्यांचे पहिले लेखन गांगल सरांनी संस्कार करून महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध करून त्यांना नावारूपास आणले होते. असे गांगल सरांचे आम्हाला जाणवलेले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, विचारी, व्यासंगी व मजकुराशी प्रामाणिक असलेल्या शैलीदार संपादकाचे आहे. सर रसिक, संवेदनशील आहेत. आमच्यासारख्या उभरत्या तरुणांना सरांसारख्या ज्येष्ठाने हात देणे, त्यांचे सान्निध्य मिळणे मौलिक वाटते. एका पत्रकाराची दृष्टी किती व्यापक आणि शोधक हवी हे सरांच्या कामाचा आढावा घेताना जाणवते. सरांची संपादकीय नजर, समाजभान, अपार औत्सुक्य आमच्यासारख्यांना समृध्द बनवते.

८५व्या वर्षी सरांचा उत्साह, उत्तम ते जतन करण्याबाबतचा आग्रह, आमच्यासारख्याचा एखादा लेख लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील राहिलेले बारकावे समजावून सांगत नव्याने लेखन घडवण्याचा आग्रह अफलातून आहे. महाराष्ट्रात सेवाजेष्ठतेनुसार अनेक संपादक झाले असतील पण अनेक नवीन विषय व लेखक घडवणारे गांगल सर ही एक व्यक्ती नसून संस्था आहे. सरांसारखा बहुश्रुत व व्यासंगी संमेलनाध्यक्ष मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. ‘मराठीत संपादक दोन प्रकारचे राहात आले आहेत. एक लिहिणारे, दुसरे संयोजक संपादक. वाचकांना लिहिणारे संपादक जास्त आवडतात.’ सरांचे हे विधान आजच्या काळात सोशल मिडीयावर ‘ब्रेकिंग न्यूज’चा धुमाकूळ घालणाऱ्या ‘ऑनलाईन’ पत्रकार-संपादकांनी समजून घ्यावे. वर्तमानकाळात वावरत असताना वर्तमानाच्या पलिकडे कुतुहलपूर्वक नजरेने पाहाण्याची दृष्टी लाभलेल्या ‘संमेलनाध्यक्ष’ दिनकर गांगल सरांना या ग्रामीण संमेलनात ऐकायची संधी सोडू नका!

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

 

  

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

अचाट वनसंवर्धन प्रयोगांची तीन दशके

             जंगल-देवरायांमध्ये खूप धडपड, मेहनत आणि संयमाच्या माध्यमातून वनसंवर्धनाचे अचाट प्रयोग 'प्रत्यक्ष जमिनीवर' यशस्वीपणे राबविणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ पुणे (AERF) संस्थेने तीन दशकांचा कार्यकाळ (१९९४-२०२४) पूर्ण केला आहे. खाजगी जंगल संवर्धन, देवराई व जंगलांचे पुनरुज्जीवन, वनशेती, पारंपरिक बियाणे संरक्षण व संवर्धन, सेंद्रिय पद्धतीने फळबाग व्यवस्थापन, आर्थिकदृष्टया उपयुक्त बांबू आदी झाडांची लागवड, सुधारित चुल निर्मिती आणि वितरण, दुर्मीळ वनस्पतींचा अभ्यास व संवर्धन, कांदळवन संवर्धन, स्थानिक लोकांचे सक्षमीकरण, स्थानिक लोकांना निसर्ग व्यवस्थापनाशी जोडणे, वनस्पती संशोधन आणि निर्मिती, जैवविविधता समिती सक्षमीकरण, लोक जैवविविधता नोंदवही, निसर्गपूरक पर्यटन (भीमाशंकर व अलिबाग) आदी प्रयोग सहाशे गावातून यशस्वी केले आहेत. संस्थेने तीन दशकांच्या कार्यपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील देवरुख कार्यक्षेत्रात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' कामाचे फ्रेमवर्क तयार केलेल्या, मानवी जीवन बदलवण्याची क्षमता असलेल्या या संस्थेच्या विलक्षण कामाचा हा आढावा...

 

समुदाय आधारित संवर्धन कामाचे फ्रेमवर्क


१९९४मध्ये स्थापना झाल्यापासून, अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) सह्याद्रीत जिथे इतर कोणतीही संवर्धन यंत्रणा अस्तित्वात अशा ठिकाणी काम करत आहे. AERFने 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' (Community Based Conservation) कामाचे फ्रेमवर्क तयार केले आहे. देवराया या परंपरेने देवतेच्या श्रद्धेने समुदायांनी संरक्षित केल्या आहेत. देवराया म्हणजे अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे समृद्ध भांडार आहेत. देवरायांमध्ये अनेक पाणी साठवण्याची पारंपारिक यंत्रणा आहे. येथील अनेक महाकाय वृक्ष कार्बन शोषून घेण्याचे काम करतात. AERFने आजवर ८० पवित्र उपवनांच्या पर्यावरणीय पुनर्संचयनाचे काम केले आहे.

संचालक - डॉ. अर्चना गोडबोले 

सहसंचालक - श्री. जयंत सरनाईक 

१९९४मध्ये स्थापन झाल्यापासून, AERF ‘प्रत्यक्ष जमिनीवर संरक्षण व संवर्धन कार्यक्रम उत्तर सह्याद्री परिसरात राबवत आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट क्षेत्रात जातात. संगमेश्वर तालुका हा पश्चिम घाटात वसलेला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य (BWLS) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ आहे. हे भारतीय जायंट स्क्विरल (शेखरू) आणि स्थानिक समुदाय - महादेव कोळी यांच्या निरोगी लोकसंख्येसाठी ओळखले जाते. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (IBA) आहे. AERFने २००६पासून येथे पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकणारे, शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी काम सुरु ठेवले आहे. तेथे हिरडा संकलनही चालते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आणि कातकरी व ठाकूर या जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायांचे घर आहे. AERFने अलिबागमधील महाजने गावात विकेंद्रित बायो-डिझेल संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. ग्लोबल व्हिलेज एनर्जी प्रोग्राम (GVEP) अंतर्गत हा प्रकल्प २००८ मध्ये सुरु झाला आणि तो आजही सुरु आहे. हा प्रकल्प गावातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशी बायो-डिझेल उत्पादन देणाऱ्या झाडांच्या प्रजाती-करंजाच्या वापरावर लक्ष केंद्रित करतो आहे. राज्यात करंजाची झाडे अलिबाग (रायगड) आणि सोलापूर जिल्ह्यात अधिक आहेत. सोलापूर भागात त्यांना विशेष महत्त्व नाही. मात्र अलिबाग भागात या झाडाचा उपयोग करून घेण्याची पारंपरिक व्यवस्था आजही आहे.

 

सिंधुदुर्ग हा पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात वसलेला अरुंद किनारी जिल्हा आहे. हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध असलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंसाठी प्रसिद्ध आहे. AERFने देवराई परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि संरक्षण करारांतर्गत येथे काम करत आहे. २०१०-११मध्ये जैवविविधता मूल्यांकन आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याने AERFने मुख्यतः असनिये आणि दाभिळ गावातील जमीन विनाशकारी खाण प्रकल्पापासून सुरक्षित केली. त्याबरोबर सावंतवाडी आणि दोडामार्ग जिल्ह्यातील सुमारे ५०० चौ किमी जंगल संरक्षण करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.  विशेष म्हणजे असनिये गावात पृष्ठभागावरील पाण्यापासून (surface water) विकसित झालेल्या प्रचंड उत्पन्न देणाऱ्या काजूच्या बागा आहेत.

 

देवरुख कार्यक्षेत्रातील काम

एईआरएफ संस्थेच्या ६० जणांच्या टीमपैकी देवरुख केंद्रावर सुमारे तीसेक विषयतज्ज्ञ लोकं काम करत आहेत. ‘अदिवासी भागातील लोकज्ञान आजच्या काळात संवर्धन विषयात उपयोगात आणता येईल का? पासून सुरुवात करून सह्याद्रीतील विशेषतः कोकणातील जंगलातून विशेष मेहनत न करता पैसे मिळायला लागले तरच ती वाचतील’ इथपर्यंतची भूमिका एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांनी अभ्यासकांना सुरुवातीलाच स्पष्ट करून सांगितली. उत्तर सह्याद्री भागात पर्यावरणाचे प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत. उत्तर सह्याद्री भागात महत्वाची जैवविविधता नाही, सर्वकाही दक्षिणेकडच्या सह्याद्री भागात आहे असंच मत काही तज्ज्ञांचं बनत असल्याचं ध्यानात आल्यावर ‘एईआरएफ’ संस्थेचा जन्म झाला होता. तज्ज्ञांचं मत असंच राहिलं तर अडचण वाढत जाणार होती. शहरी-निमशहरी भागातील आपण मंडळी दोन-चार झाडे लावून पर्यावरण संवर्धन केल्याचे समाधान मिळवतो. मात्र सह्याद्रीच्या ग्रामीण भागात याचा उपयोग नाही. सह्याद्रीतील खाजगी जंगले वाचवण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) या संस्थेने प्रकल्प सुरू केला. देवरुख भागातून या प्रकल्पाला सुरुवात केलेल्या संस्थेने आतापर्यंत उत्तर सह्याद्रीतील ७३ गावातील १३ हजार एकर जंगल सन २०३२ पर्यंत संरक्षित केलेलं आहे. समृद्ध जंगलांच्या वापराबाबतची समाजाची धारणा ही इंधनाच्या गरजांसाठी लाकूड किंवा लाकूडतोडीशी संबंधित आहे. AERFने जंगले त्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतात हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. जैवविविधता संवर्धनाचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. नवकल्पना, दीर्घकालीन प्रयत्न आणि अंमलबजावणीतील सातत्य याद्वारे यावर उपाय शोधले जाऊ शकतात. ’वृक्षलागवड’ हा शब्द अलीकडे फार प्रतिष्ठित झाला आहे. परंतु ’वृक्षलागवड’ हा शब्दच चुकीचा आहे, अशी संस्थेची धारणा आहे. आपण रोपं लावण्याचे काम करतो. लावलेल्या रोपाची वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून जोपासना केली तर अनेक वर्षांनी रोपांचे वृक्ष होण्याची शक्यता असते. वृक्षलागवडीने वृक्षतोडीची भरपाई मुळीच होऊ शकत नाही. एखाद्या महावृक्षाने वर्षानुवर्षं साठवून ठेवलेला कार्बन वृक्ष तोडल्यावर वातावरणात उत्सर्जित होतो. तेवढा कार्बन शोषून घ्यायला नवीन लावलेली झाडे किमान २०-२५ वर्षं मोठी व्हावी लागतात. आज वृक्षतोडीचा वेग प्रचंड आहे. कुठली झाडे कुठे लावायची? कशी लावायची? याचे शास्त्र बाजूला ठेवून निव्वळ ’अमुक अमुक कोटी’ इतका आकडा पूर्ण करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला दोन दोन फुटांवर झाडे लावण्याने निसर्गसंवर्धन होत नाही हे आपण समजून घ्यायला हवे आहे.

माध्यमातील अभ्यासकांना मार्गदर्शन करताना
‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेच्या
संचालक डॉ. अर्चना गोडबोले

देवराई पुनरुज्जीवन 

संस्थेने संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावी श्रीजुगाईदेवी ग्रामदेवतेच्या देवराईत पुनरुज्जीवन कार्यक्रम सुरु केला. तेव्हा तिथे ३१८ आकेशिया, गिरिपुष्प आदी वनस्पती होत्या. प्रयत्नांति आज सुंदर देवराई बहरलेली दिसते. सह्याद्रीत वर्षानुवर्षे जंगलतोड हा कार्यक्रम सुरु असताना संस्थेने मात्र किरदाडी (संगमेश्वर) गावात एका गृहस्थांच्या १५ एकर खाजगी पडीक जमिनीवर वनशेती विकसित केली. या जमिनीवर पूर्वी करवंद, रानमोडी, पेठगुळी आदींचे रान वाढलेले होते. जंगलात पाय ठेवणेही मुश्कील बनल्याने दुर्लक्षित होते. आज त्या भागात निलगिरी वूड पिजन सारख्या विविध पक्ष्यांसह, खवलेमांजर, गवे, बिबट्या, रानमांजर यांचा अधिवास आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुळे गावात ३३एकर क्षेत्राची श्रीनवलादेवीची देवराई आहे. संस्था यापैकी २०एकरवर काम करते आहे. या देवराईतील ५ एकर क्षेत्र गडगडी धरणाच्या कॅनॉलला सोडलं गेलं. परिणामस्वरूप देवराई दुभंगली. तोड वाढली. देवराईतील आपल्या कार्यक्षेत्रात संस्थेने साफसफाई केली. झाडांवर चढणाऱ्या वेली काढून झाडांना मोकळा श्वास घेऊ दिला. झाडे मोठी होऊ लागली. आमच्या भेटीत ही झाडे आकाशाशी स्पर्धा करायला सज्ज झालेली दिसून आली. संस्था या भागात वर्षाला किमान १० शेतकऱ्यांना १७५ दिवसांचे काम देते आहे. देवराईने ३०० प्रकारचे जैववैविध्य सांभाळले आहे. दीडशेहून अधिक वनस्पती आहेत. इथे सीता-अशोक, सांद्रुक, पन्नासेक दासवणसह वेगळ्या प्रकारची सावलीत वाढणारी अंजनीची झाडे आहेत. संस्थेने याच देवराईत एका वडाच्या झाडावर १७-१८ ग्रेट हॉर्नबील पाहिलेत. बाकी निलगिरी वूड पिजन, गरुड, ककणेर, माडगरुड, जंगली कुत्रे अशी संपदा आसपास आहेच! वाशी तर्फे संगमेश्वर गावात मोडकाडंग येथील श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची २२एकर देवराई आहे. संस्थेने ३० वर्षांपूर्वी याच देवराईतून आपले काम सुरु केले होते. संरक्षणाच्या दृष्टीने देवराईला गडगा व गेट बांधलेले आहे. विशेष म्हणजे, आता पिक घेतलं जात नसलं तरी या देवराईत पूर्वांपार ‘देवशेत’ आहे. पूर्वी देवशेत केलं जायचं. अख्खा गाव दिवस ठरवून शेत करायचा. उत्पन्नाचे धान्य गरीब-गरजूंना मिळायचे. त्या बदल्यात त्यांनी देवराईत किंवा मंदिर परिसरात काम करायचं असं पूर्वांपार नियोजन होतं.

 

संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन

संगमेश्वर तालुक्यातील
कुळे गावातील श्रीनवलादेवीची देवराई


संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन




भारत हा पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय या दोन जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटनी युक्त आहे. सह्याद्रीचा उत्तर पश्चिम घाट भाग हा संयुक्त राष्ट्रांनी (UN) जाहीर केल्यानुसार जगातील २% जैवविविधतेचे घर आहे. यात सुमारे ५००० प्रजातींच्या फुलांच्या वनस्पती आणि पक्ष्यांच्या ६०० प्रजाती आहेत. मात्र यातील महत्त्वाच्या अनेक वन्यजीव कॉरिडॉर झोनमध्ये अनेक एकर खाजगी मालकीची जंगले आहेत. भारतात १३ हजारपेक्षा जास्त दस्तऐवजीकरण केलेल्या देवराया आहेत. भारताच्या पर्यावरणीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे महत्त्व लक्षणीय आहे. दुर्मीळ जैवविविधतेचे आश्रयस्थान असलेला पश्चिम घाट हा भाग वृक्षतोड, अज्ञान आणि उदासीनतेच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आहे. पश्चिम घाटातील उत्तर पश्चिम घाटाचा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, कीटक यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. गोडबोले यांनी आपली सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ देवरायांसाठी काम सुरु केले. काही समविचारी सहकाऱ्यांसोबत ‘अ‍ॅप्लाईड इन्व्हॉरमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली होती. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील देवरायांपासून कामाला सुरूवात करताना गावकऱ्यांना संस्थेच्या कामाचे गांभीर्य लगेच लक्षात आले नव्हते. मात्र सततच्या प्रयत्नांनंतर देवराईत पुन्हा झाडे वाढू लागली. आसपासच्या विहिरीतून पाण्याची पातळी वाढली. गावकऱ्यांनी विश्वास दाखवण्यास सुरूवात केली. संस्थेच्या या कामाला दिल्लीच्या प्रतिष्ठित सिव्हिल सोसायटी मासिकातर्फे समाजात बदल घडविण्यासाठी, पायाभूत स्तरावर काम करणाऱ्यांना दिला जाणारा ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार मिळाला आहे.

 


लोकसहभागातून जंगल संरक्षण

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडीत संस्थेने लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्पाचा करार केलेला आहे. याद्वारे २०२८ पर्यंत ५०४एकर खाजगी जंगल राखलं गेलंय. यात १०० सहभागी शेतकरी आहेत. पैकी जमिन मालक आणि गावाचे सरपंच रत्नाकर सनगरे यांची अभ्यासदौऱ्यात भेट झाली. ‘हे जंगल वाचवल्याने जमिनीची धूप थांबली. जमिन अधिक पाणी शोषून घेऊ लागली. वाडीतील पाण्याचे प्रमाण वाढले. जवळचे ओढे जास्त काळ पाण्याचे राहू लागले. विहिरींना पाणी इतकं वाढलं की त्यावर पाणी योजना केली गेली. वाडीत नळाने पाणी पोहोचलं. यासोबत लोकांना आर्थिक फायदाही मिळाला’ असं सनगरे यांनी सांगितलं. देवरुख अभ्यासदौऱ्यात एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांच्यासह गुणवंत महाजन, राजेश जाधव, संजय पाष्टे, सचिन पर्शराम अशा अनेक जमिनीवर काम करणाऱ्या  विषयतज्ज्ञांनी माहिती दिली.

 

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प फलक 

खासगी आणि सार्वजनिक जमिनी अशा दोन्ही ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे काम आव्हानात्मक आहे. दोन्ही ठिकाणची कार्यपद्धती वेगवेगळी असते. देवराया सार्वजनिक असतात. अशी सार्वजनिक क्षेत्र राखण्यासाठी संपूर्ण गावाबरोबर काम करावे लागते. ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या ही प्रक्रिया थोडीशी दीर्घकालीन असते. खासगी जमिनीच्या बाबतीत फक्त जमीन मालकाशी व्यवहार असतो. अर्थात एका सातबाऱ्यावर अनेक नावे असल्यामुळे सगळ्यांची संमती घेणे हे एक आव्हान असते. एखादा खासगी जमीनमालक त्याच्या जमिनीवरचे जंगल न तोडता राखणार असेल तर आम्ही त्याच्याशी दहा वर्षांचा लेखी सामंजस्य करार करून प्रतिएकर काही ठराविक रक्कम बक्षीस / मोबदला म्हणून देतो. हा करार करताना मालकाचा जमिनीवरचा मालकी हक्क कायम राहील, याची स्पष्ट लेखी हमी संस्था देते. जेणेकरून त्याच्या मनात काही शंका राहू नये. यामुळे लोक लेखी करार करायला तयार होतात.

 

सह्याद्रीच्या डोंगराळ भागात पूर्वी ‘कुमरी’ पद्धतीने शेती चालायची. ही कुमरी पद्धतीने होणारी शेती community फार्मिंगचे उत्तम उदाहरण होती. पुढे आंबा आणि काजूच्या बागांच्या उभारणीत आम्ही या पारंपारिक शेती पद्धतीसह कोकणातील जैवविविधता संपवली. World Bank forestry projectने सुचविल्याप्रमाणे सह्याद्रीसह संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी विदेशी झाडे लावली गेली. परिणामस्वरूप रिठा, बिब्बा आदी महत्त्वाची देशी झाडे कमी होत गेली. कोकणातील निम्मे जमीन / जंगल खाजगी आहे. त्याची बेसुमार तोड होते. हे जळावू लाकूड जवळच्या इचलकरंजीला अधिक लागतं. कोकणात ते उपलब्ध होतं. एकदा तोडलेलं हे जंगलं पुन्हा उत्पादनक्षम व्हायला वेळ लागतो. अशी जंगलं पुनरुज्जीवित करायला धनेश सारखे पक्षी आवश्यक आहेत. म्हणून संस्थेने यावरही काम केलं. लोकं जंगलांप्रमाणे देवरायाही तोडतात लक्षात आल्यावर संस्थेने ५०० देवरायांचा सखोल अभ्यास केला. प्रत्यक्ष संवर्धन कामात उपयुक्त होईल असे जैवविविधता संशोधन केले. संस्थेच्या संशोधनानुसार तळकोकणात नाचणीच्या २७जाती मिळायच्या, आज चार जातीही शिल्लक राहिलेल्या नाहीत. सह्याद्रीतील जंगले शासकीय पातळीवर ताब्यात घेतानाही स्थानिकांच्या मानसिकतेचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं संस्थेला वाटतं. कारण जंगलातील बफर झोनमधून कोअरमध्ये जा-ये करणाऱ्या स्थानिकांना आम्ही चुकीची वागणूक देणार असू तर तो त्याच जंगलाला आग लावून आपला राग व्यक्त करू शकतो हेही आपण लक्षात घ्यायला हवं आहे.

 

वनोपजांचे मार्केटिंग

वनोपजांचे योग्य मार्केटिंग करून त्याद्वारे जंगलसंवर्धन कसे करता येईल? यासाठी संस्था काम करते आहे. देवरायांमध्ये बेहेडय़ाचे प्रचंड वृक्ष आहेत. बेहेडा गोळा करण्याचे काम अनेक गावकरी करत असत. पण त्यातून फारसा पैसा मिळत नसे. माळशेज घाटामध्ये संस्थेने देवराईतील ग्रामस्थांशी करार केला. तिथे हिरड्याची बरीच  झाडे आहेत. हिरडे विकून ग्रामस्थांना उत्पन्न मिळण्यासाठी संस्थेने मदत केली आहे. सोळा देवरायांमध्ये ’बेहडा संकलन कार्यक्रम’ सुरु झाला. यामध्ये निसर्गाला धक्का न लावता शाश्वत पद्धतीने बेहड्याचे संकलन करणे, त्यामधून मिळालेल्या मोबदल्याचे योग्य वाटप करणे आदी प्रशिक्षण संस्था ग्रामस्थांना दिले आहे. वनोपजांचे शाश्वत पद्धतीने संकलन केल्याबद्दल ’फेअरवाईल्ड फाऊंडेशन’ या जागतिक संघटनेकडून वनोपजांना प्रमाणपत्र दिले गेले. २०१५ साली संस्थेने हिरडा आणि बेहडा या वनोपजांसाठी हे प्रमाणपत्र मिळविले आहे. संस्थेने ‘नेचर कनेक्ट’ ब्रँड अंतर्गत आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद, हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदी शुद्धता प्रमाणित उत्पादने घेत असून त्याची संपूर्ण विपणन व्यवस्थाही तयार झाली आहे. जवळच्या चार-पाच तालुक्यातील हळद ही प्रक्रियेसाठी येत असते. बेहेडा चूर्ण पुरवण्यासाठी पक्का हर्ब्स या इंग्लंड मधील कंपनीशी संस्थेने करार केला आहे. यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे. मूल्यवर्धन आणि शाश्वत पुरवठा साखळी विकसित करून उच्च आर्थिक परतावा देऊ शकतात. एईआरएफचा ठाम विश्वास आहे की, खराब वातावरणात शाश्वत जीवन जगणे शक्य नाही. सह्याद्रीतील जंगलं उद्योगाशी जोडली जातायत हे सर्वसामान्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. संस्थेने देवरुख कार्यक्षेत्रात रोपवाटिका केली आहे. या रोपवाटिकेत निंबेरा, बिवळा, दासवण-चांदफळ, सीताअशोक, करंज, रिठा, फणस, चामोळी, सुरंगी, बकुळ, बहावा, सिरस, आवळा, सिसम, फाशी, हिरडा, बेहडा, अर्जुनसादडा, यरंडी, किळचा, जांभूळ, पारजांभूळ, कडूकवठ, सांदरुख आदी २७ प्रकारची ७ हजार रोपं आहेत.

 

संस्थेतर्फे नेचर कनेक्ट ब्रँड अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या
आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद,
हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदींची
माहिती देताना डॉ. गोडबोले आणि गुणवंत महाजन






‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेची रोपवाटिका

‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम

महावृक्ष म्हणजे अशी  झाडे, जी बघताक्षणी आपल्याला भव्यदिव्य वाटतात. ज्याची उंची २५-३० फुटांपेक्षा जास्त आहे. ज्याचा पर्णसंभार विस्तृत आहे. ज्याचा घेर दोन-तीन मीटरपेक्षा जास्त आहे ते वृक्ष. हे महावृक्ष किमान ८०-१०० वर्षं जुने आणि एका प्रदीर्घ काळाच्या पर्यावरणीय सुस्थितीचे निदर्शक असतात. असा महावृक्ष अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, खारीसारखे प्राणी, साप अशा जीवजातींना आश्रय देत असतात. ते वृक्ष म्हणजे एक परिसंस्थां असते. महावृक्षाच्या सावलीमुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहून माणसाचे, तसेच पशुपक्ष्यांचे जीवन सुसह्य होते. अशा महावृक्षांनी भरपूर प्रमाणात, टनावारी कार्बन वातावरणातून शोषून स्वतःमध्ये साठवून ठेवलेला असतो. ज्या क्षणी असे मोठे झाड तोडले जाते तेव्हा हा कार्बन पुन्हा उत्सर्जित होतो आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला खतपाणी मिळत असते.

 

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न
जवळजवळ १००० झाडे मोजून मालकांना प्रशस्तीपत्रक प्रदान

‘नवीन झाडे लावली म्हणजे जुनी कितीही तोडली तरी चालतील’ या भ्रमापोटी, वाढत्या शहरीकरणामुळे आज बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. जुन्या मोठ्या ‘महावृक्षा’चे महत्त्व ओळखून त्यांना वाचवण्याचे काम ही संस्था करते आहे. सह्याद्रीत, विशेषतः कोकणातल्या देवरायांत बेहडा वृक्षांची संख्या जास्त आहे. या वृक्षांवर धनेश (हॉर्नबिल) पक्ष्याची घरटी आहेत. धनेशाला वनशेतकरी (फॉरेस्ट फार्मर) म्हणतात. अनेक जंगली झाडांची फळे खाऊन बीजप्रसार करण्याचे आणि जंगल वाढवण्याचे काम धनेश करत असतो. संपूर्ण पश्चिम घाटामध्ये ’ग्रेट पाईड हॉर्नबिल’ आणि ’मलबार पाईड हॉर्नबिल’ या दोन पक्ष्यांनी बीजप्रसारावाटे जंगल राखण्याचे मोठे काम केले आहे. ’हॉर्नबिल’ वाचवायचा असेल तर त्याला घरटे बांधायला अनुकूल अशी मोठी झाडं वाचवली पाहिजेत, याचा विचार करून संस्थेने सह्याद्रीत असे वृक्ष कुठे कुठे आहेत? याची नोंद घेतली. ‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम सुरू केला. आर्थिक गरजेसाठी, पडून नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी किंवा विकासकामासाठी लोकांकडून या झाडांची तोड होते. अशी धोक्यातील झाडे हेरून त्या झाडांवर सूचनाफलक लावणे, झाडाच्या मालकाला थोडाफार आर्थिक मोबदला देणे, झाड न तोडण्याविषयी लेखी करार करणे, झाड वाचवल्याबद्दलचे प्रमाणपत्र देणे अशा शक्य त्या सर्व मार्गांनी धोक्यात आलेले महावृक्ष वाचवायचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे. आजवर साधारण एक हजार महावृक्ष वाचविण्यात आले आहेत. पाच हजारांहून अधिक वृक्षांची माहिती गोळा झाली आहे. या उपक्रमासाठी बंदीपूर अभयारण्याच्या आसपास काम करणाऱ्या ’जंगल स्केप’ संस्थेचे सहकार्यही आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या संस्थापक संचालक डॉ. गोडबोले यांनी सहा वर्षे ईशान्येकडील स्थानिक समुदायांसोबत काम केले आहे. त्यांनी उत्तर पश्चिम घाट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचे नेटवर्क विकसित केले आहे. त्या क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या निमंत्रित एनजीओ सदस्य प्रतिनिधी आहेत.

 

निधी उभारणीचे आव्हान

AERF आपल्या सामाजिक उद्देशासाठी डायकिन इंडस्ट्रीज लि. जपान, क्रेडिट सुइस इंडिया, पुक्का हर्ब्स U.K., डायनॅमिक रेमेडीज प्रा. लि., प्राज इंडस्ट्रीज, वनाझ इंजिनियरिंग लि. यांसोबत काम करते आहे. महावृक्ष वाचवल्याबद्दल संस्थेकडून गावांना अथवा खासगी मालकांना दिला जाणारा आर्थिक मोबदला / भरपाईसाठी निधी उभारणी ही सुद्धा खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संस्था ’ग्लोबल गिव्हिंग’ सारख्या संस्थांकडून निधी गोळा करतात. ’ग्लोबल गिव्हिंग’ ही जागतिक संस्था आहे जी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्याला देणगी द्यायला इच्छुक असणारे लोक यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते. ’ग्लोबल गिव्हिंग’ हा crowd funding platform आहे. इथून मदत मिळवणे आव्हानात्मक आहे. ज्या सामाजिक संस्थांचे काम हे व्यापक स्तरावर आहे, ज्यांचे व्यवहार चोख आणि पारदर्शक आहेत अशा संस्थांना ’ग्लोबल गिव्हिंग’तर्फे देणग्या मिळतात. यासाठी संस्थात्मक कामाचा दर्जा आणि शिस्त राखण्याचे आव्हान असते. जे अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF)ने सक्षमपणे पेलेले आहे. आजकाल वाघ अथवा हत्ती अशा लोकप्रिय प्राण्याच्या संरक्षणासाठी पैसे द्यायला तयार असणारे हजारो लोक आणि संस्था जगभर आहेत. परंतु झाडे वाचवण्यासाठी निधी उभारणे अवघड आहे. तरीही गेली ३० वर्षे ही संस्था महावृक्ष आणि जंगलं वाचवण्याचे काम करते आहे. महावृक्ष वाचवण्याचे संस्थेचे काम व्यापक स्तरावर व्हायला हवे आहे. सरकारी योजनांपेक्षा खासगी संस्थांच्या माध्यमातूनच हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकते असे संस्थेचे मत आहे. गावागावांमध्ये काम करणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा आहे. त्यासाठी खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. गावागावांमध्ये जाऊन अभ्यास करणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे, संस्थेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखणे, निधी उभारणी हे सगळं करण्यासाठी खूप धडपड, मेहनत आणि संयम आवश्यक आहे. नुसते भावनिक आवाहन पुरेसे नाही.

 

वाशी तर्फे संगमेश्वर गावातील मोडकाडंग येथील
श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची देवराई

अपवाद वगळता जंगल संरक्षण-संवर्धनाचे आजचे बहुतांशी काम हे cosmetic स्वरूपाचे असल्याची खंत डॉ. गोडबोले बोलून दाखवतात. आपल्या देशात आरडाओरडा करून विषय पूर्णत्त्वास जात नाहीत, अन्यथा हा देश खूप पुढे गेला असता. या देशात काम  करताना विषय समजून घेऊन, वेळ देऊन वर्षानुवर्षे शांतपणे काम करावं लागतं. तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर संवर्धन पाहायला मिळतं. संस्थेचे काही पथदर्शी प्रयोग ‘सरकारी धोरण’ म्हणून स्वीकारले जावेत असं टीम एईआरएफला अजिबात वाटत नाही. अशी कामं होण्यासाठी लोकं एकमेकांशी जोडलेली राहाणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. सरकारी प्रक्रिया, ‘चला जंगलं वाचवूया’ असं म्हणेलही पण त्यातून गोंधळ अधिक होईल. ‘प्रसिद्धी’बेस काहीतरी तात्कालिक उपाययोजना करून आपण जंगलं वाचवू शकत नाही. जंगल संवर्धनाचे काम हे सबसिडीबेस्ड काम नाही. अशी स्पष्ट भूमिका घेऊन जगभर वावरणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’चं हे काम पाहाणे, समजून घेणे, संवर्धित जंगलात मोकळा श्वास घेणे, या संस्थेसोबत काम करणे हा जंगल संवर्धनविषयक मानवी जाणीवा बदलवणारा अनुभव देणाऱ्या संस्थेला तीन दशकांच्या कार्यपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा!

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

ई-मेल :: dheerajwatekar@gmail.com



 

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कांबळे मास्तरांचा तास

        

        २०२२चा मराठी पत्रकार दिन. वेळ सकाळची! ठिकाण रत्नागिरी शहरातील माळनाका येथील सरकारी विश्रामगृह. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या, महाराष्ट्रातील मोजक्या नियतकालिकांपैकी एक असलेल्या, साप्ताहिक सत्यशोधकच्या दीडशेव्या विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे सर रत्नागिरीत आले होते. प्रकाशन करावयाच्या अंकाची प्रत सरांनी आदल्या रात्री पाहिलेली होती. ‘नव्या पिढीसाठी दस्तावेज’ या मथळ्याखाली अतिथी संपादकीय मनोगताच्या तिसऱ्या परिच्छेदात आम्ही लिहिलं होतं, ‘महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी दीनबंधु हे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले सत्यशोधक साप्ताहिक १८७१ सालचे आहे.’ आमच्या या मजकुराची वैचारिक दिशा अचूकपणे हेरून सरांनी सकाळी चहा-नाष्टा घेताना तासभराच्या काळात ज्या संपादकीय सूचना केल्या त्यातून हा ‘कांबळे मास्तरांचा तास’ लिहावासा वाटला. या लेखनाबाबत आम्ही सरांना कळवलं तेव्हा त्यांनी ‘स्वागत आणि शुभेच्छा’ दिल्याने आमचा लेखन उत्साह अधिक दुणावला.

सत्यसेवेचे कंकण बांधून, ‘हरि कृष्ण भक्ते तुला स्थापियेले | करि सत्य सेवा जना रंजविले || किती अन्य आले बहुश्रूत झाले | परि सर्व तुझ्याच ठायी रिझाले ||’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून लिमये यांनी सत्यशोधकसाप्ताहिकाचा पाया घातला होता. तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज होय. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. महात्मा फुले यांनी सुरुवातीपासून धरलेल्या सत्यशोधनाच्या आग्रहाचा प्रभाव कै. हरि नारायण लिमयेंवर पडला, नव्हे तर ते तसेच असणार अशी सरांची मांडणी राहिली. फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाची, सत्यशोधनाची व्यापक चळवळ चालू केली होती. अनेक अंगाने तिचा अनेक लोकांवर, अनेक पद्धतीने परिणाम झालेला आहे. ‘सत्यशोधनाची’ ही संकल्पना फुल्यांनी नक्कीच १८७१ पूर्वी वापरलेली असणार! हे सरांचं म्हणणं आम्हाला पटलं होतं. फुले पुढे याच शब्दाच्या नावे चळवळ स्थापन करण्यापर्यंत पोहोचले होते. १९७३ ला फुल्यांनी चळवळ सुरु केली म्हणजे पहिल्यांदा तो शब्द वापरला असं होऊ शकत नाही. तसा विचार केल्यास आपण फसण्याचा संभव अधिक आहे. सत्यशोधक चळवळीच्या स्थापनेच्या अगोदरचा काळ हा पूर्वतयारीचा भाग होता. एखादा नाविन्यपूर्ण शब्द असा अचानक चलनात येऊन ‘कॉईन’ होत नाही. त्यासाठी सुरुवातीला त्या शब्दाबाबत लोकांचं प्रबोधन करावं लागतं. शब्द लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. नंतर तो ‘कॉईन’ केला जातो. सत्यशोधक चळवळ स्थापन होण्यापूर्वी कोकणातल्या एका ब्राह्मणाने आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राला ते नाव दिले याचा अर्थ हा शब्द त्यापूर्वी कोकणात हा शब्द पोहोचला असावा का? त्या काळी या शब्दाचा प्रसार असा सर्वदूर झाला असेल? यावेळी काहीतरी घडलं असेल? काय घडलं? अशा विविधांगी अंगाने विचार करण्याची आवश्यकता कांबळे सर बोलून दाखवत होते. एखादा ऐतिहासिक दस्तऐवज बनवताना तू, ‘आपण ऐतिहासिक दस्तावेज करतोय या टेंशनमधून बाहेरच पडू नकोस’ असं खूप छान सरांनी सांगितलं. त्यांचं हे वाक्य अंतर्मनाला स्पर्शून गेलं. सत्यशोधक साप्ताहिकातील जुन्या अंकातील ऐतिहासिक लेखनाचे विश्लेषण व्हायला हवे. कोणीतरी यावर पी.एच.डी. करायला हवी. वेगवेगळे अॅप्रोच डोळ्यासमोर ठेवून लेखन करायला हवं. संदर्भ गोळा करणं हे खूप मोठं काम आहे. संदर्भ गोळा करताना वेड लागायची पाळी येते. तरीही शांतपणे काम करण्यावर भर द्यायला हवा. आमच्या संपादकीय लेखाचा दाखला देत सर पुढे म्हणाले, ‘महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज १८६३ ला स्थापन केला हे खरे आहे. पण ती एक संघटनात्मक क्रिया (organize activity) होती. प्रत्यक्ष सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी महात्मा फुले यांनी सत्यशोधक हा शब्द कशा पद्धतीने कोठे कोठे वापरला हे पाहावे लागेल’, सरांनी आम्हाला थोडा वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक शब्दानुसार प्रबोधन केले होते. शब्दाचा प्रचार केला होता. तो शब्द लोकांच्या मनात बिंबवला होता हे मान्य करायला हवं. कालांतराने नंतर त्याला संघटीत आणि आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ हे नाव पुढे आलं होतं. हे सारं सुरु असताना सत्यशोधन निमित्ताने सामाजिक अभिसरणाची प्रक्रीया सुरु असताना कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती वर्तमानपत्र सुरु करते आणि त्याला ‘सत्यशोधक’ हे नाव देते ही महत्त्वाची घटना असल्याचे लक्षात आले. ‘सत्यशोधक’ (truth finding / truth seeker) काय आहे? हा प्रबोधनाच्या लाटेतून आलेला शब्द आहे. मुळात सत्य काय आहे? असे प्रश्न स्वतःला विचारून संशोधनाचा आनंद घेत काम करण्याची आवश्यकता आहे. विशेषांकात ‘सत्यशोधक’ शब्दाविषयी लेखन असायला हवं होतं अशी सरांची भूमिका होती, एव्हाना ती आम्हाला पटली होती. सत्य कशाला म्हणतात? ते शोधायचं कसं? ते का शोधायचं ? त्याचा फायदा काय? परिणाम काय? असे अनेक प्रश्न कांबळे सरांनी तासाभरात उपस्थित केले. ‘मी मनापासून सारा अंक चाळला आहे. तू ये नाशिकला! मी देतो तुला माझ्याकडे काय असेल ते?’ असंही बोलून गेले.

‘मीही अशाच पद्धतीने काम खूप एन्जॉय करतो. मी दरवर्षी एखादा शब्द घेतो आणि त्यावर संशोधनात्मक दृष्टीने विचार करत राहातो’ असं कांबळे सर सांगत होते. ‘कोरोना’ काळात कांबळे सर ‘पोतराज’ या शब्दावर दीड वर्षे काम करत होते. पोतराज हा गावकूस नसलेला, रंगीबेरंगी चिंध्यांनी अंग झाकून (आभरान) अंगावर कोरड्याने आसूड ओढत दारोदार फिरणारा समाज किंवा कडकलक्ष्मी. मरीआई ही कडकलक्ष्मी पोतराजाची देवता. पोतराज हा स्त्री-‌वेशात पुरुष असतो. जटा वाढलेल्या, केसांचा अंबाडा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ आणि पायात खुळखुळ्या घातलेला पोतराज मरीआईच्या नावाने दान मागताना आपल्याला भेटतो. अर्थात आता त्यांच्या भेटीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मुळात पोतराज कशाला म्हणतात? मरिआई म्हणजे काय? ती देवी असेल तर देवी कुणाला म्हणतात? देवीचे प्रकार किती? मरिआई हे नाव पहिल्यांदा कुणी ठेवलं? ‘आभरान’ कसं तयार करतात? आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्याची कल्पना काय आहे? इतर धर्मात काय आहे? लोकांना सत्य का आवडतं? या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात? आदी प्रश्न स्वतःला विचारून लेखनकाम वेडयासारखं एन्जॉय करता आलं पाहिजे. एखाद्या मिशनसारखं त्याकडे बघायचं. म्हणजे आपल्याला गुणवत्ता मिळते, असं कांबळे सर सांगत राहिले.

प्रत्यक्ष प्रकाशन समारंभातही कांबळे सरांनी, असत्यशोधनाची मोहीम सुरु असलेल्या काळात सत्यशोधनाचे काम आवश्यक असल्याची भूमिका मांडली. महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ १८७३ची आणि रत्नागिरीतील साप्ताहिक सत्यशोधक १८७१चे यास्तव आम्हाला एकमेकांच्या संबंधांबाबत प्रश्न पडला होता. कांबळे सरांनी यावर थेट भाष्य करताना सत्यशोधक साप्ताहिक हे फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा परिणाम असल्याचं म्हटलं. सत्यशोधनाची चळवळ, विचार आपल्याकडे युरोपमधून आलेला आहे. मुळात ‘सत्य’ ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. सत्याला असंख्य पैलू आहेत. ‘कदाचित सत्य असं काहीच नसतं’, असंही उत्तर मिळू शकतं. सत्याचे सारे पैलू तपासून पाहिले तरीही सत्याची नीटशी व्याख्या करता येत नाही. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून सत्यशोधनाची, प्रबोधनाची चळवळ सुरु झाली.   तत्पूर्वीचे सत्यशोधन आध्यात्मिक पातळीवर होते. महात्मा फुल्यांच्या काळात जातीव्यवस्था टोकाला पोहोचलेली होती. व्यवस्था देवा-धर्माने केलेली आहे असं सांगितलं जात होतं. मात्र खरंच हे कोणी तयार केलेलं आहे? याचा शोध घेतल्याशिवाय विषमता संपणार नाही. यासाठी सत्यशोधनाचा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. सार्वजनिक सत्यधर्म सुरु केला होता. चळवळ सुरु केली होती. फुल्यांच्या विचारांतील शिक्षणाचा विचार अल्पावधीत सर्वत्र पसरलेला दिसतो. त्याकाळी महात्मा फुल्यांचा विचार समजून घेण्यासाठी त्यांची भेट होणं आवश्यक नव्हतं. मानवी जीवनात दु:ख का निर्माण होतं? नशीबामुळे, परंपरेमुळे की पाप केल्यामुळे याची मीमांसा नीट होत नव्हती. भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा याची मीमांसा केली. बुद्धांनी ‘तृष्णा’ तर महात्मा फुल्यांनी ‘अविद्या’ असा शब्द योजला. यातून सत्यशोधनासाठी पर्याय पुढे आला. दु:ख हे मानव निर्मित आहे. सत्याचा शोध घेतला पाहिजे. ही भावना प्रबळ होत गेली. त्या भावनेचा एक किरण कोकणात येऊन पोहोचला असावा. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी हे करणं, वृत्तपत्र काढणं अवघड होतं, वेडेपणा होता. कारण पूर्वी म्हटलं जायचं, ‘ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार प्रबळ होतो तो वर्तमानपत्र काढतो.’ आपल्या भाषणाच्या शेवटी, ‘फुल्यांचा प्रभाव होता की नव्हता? यात फार अडकू नका’ असंही आम्हाला सांगायला सर विसरले नाहीत. दीडशे वर्षांपूर्वी लिमये यांनी आपला रस्ता पकडला असे कांबळे सरांनी नमूद केले. कांबळे सरांनी आपल्या या भाषणात अभ्यासक आणि पत्रकारांसाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलं. पण विविध संघटनांच्या भाऊगर्दीत या कार्यक्रमाकडे फिरकायला असंख्य पत्रकारांना वेळ मिळाला नाही. या कार्यक्रमाचं मर्यादित वृत्त शासकीय स्वरुपात प्रसिद्ध झालं. कांबळे सरांच्या या मांडणीमुळे आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो...

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ सालचा. १८४७ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना इंग्रजी, मराठीशिवाय उर्दू, कानडी, मद्रासी, गुजराती भाषा येत होत्या. संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. त्यांचे वाचन चौफेर, चिकित्सक आणि चोखंदळ होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानांचा, संप्रदायांचा त्यांनी अभ्यास केला होता. थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ आणि ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांनी त्यांच्या मनात सर्वप्रथम खळबळ उडवून दिली होती. यातून त्यांची दृष्टी प्रगल्भ झाली होती. १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात या देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी सुरु केली. यासाठी त्यांना परांजपे, हाटे, गोवंडे आदी सहकाऱ्यांनी आर्थिक साहाय्य केले होते. वयाच्या विशी-पंचविशीत त्यांनी सत्य शोधनाचा मार्ग स्वीकारला होता. लोकांना शक्य ती मदत करण्यापासून समाज सुधारणेसाठी प्रशासकीय, तसेच लोकांमध्ये सक्रीय राहून, बदल घडवणारे समाजसेवक म्हणून ते काम करू लागले होते. आपले विचार सभांमधून आणि पत्रके काढून प्रसिद्ध करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचे १८५३चे ‘निर्मिकाचा शोध’ हे चौदा अखंडांचे वैचारिक पद्यमय पुस्तक याचे द्योतक आहे.

साऱ्या निर्मितीला । पोकळी कारण ।। असे तिचे गुण । स्वाभाविक ।।

विषाणूचा मेंदू । धर्माची प्रकृती ।। देवाची उत्पत्ती । तोच करी ।।  

शिका शिका तुम्ही । घ्या सत्याचा शोध ।। उत्पत्तीचा बोध । ध्यानी आणा ।।

‘निर्मिकाचा शोध’मधून महात्मा फुल्यांनी ‘सत्याचा शोध घेण्यासाठी शिकावे’ ही भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. फुल्यांनी १८५५ साली लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ नाटकातही ‘सत्य’ हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. या नाटकातील एका प्रसंगात तर ‘सत्य बोल सर्वास आवडू लागतात’ असे वाक्य विदूषक पात्राच्या तोंडी आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुशिक्षित समाजात धर्म सुधारणेच्या विचाराचे स्वागत करणारे तीन प्रवाह महाराष्ट्रात प्रभावीपणे वाहात होते. पहिला प्रवाह धार्मिक सुधारकांचा होता. यात २० ऑगस्ट १८२८ला राजाराम मोहनरॉय यांनी स्थापन केलेला एकेश्वरवादी ब्राह्मो समाज आणि ३१ मार्च १८६७ साली मुंबईत केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारातून स्थापन झालेला ‘एकेश्वरी पंथ’ प्रार्थना समाज होता. दुसरा प्रवाह हा आगरकर यांच्यासारख्या बुद्धिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. तिसरा प्रवाह ब्राह्मण्यास विरोध करणाऱ्या बहुजन समाजाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा होता. १८५३ साली मुंबईत वेस्टर्न इंडिया असोसिएशन तर १८८५ साली इंडियन नशनल कॉंग्रेसची स्थापना झाली होती. या संपूर्ण शतकात सार्वजनिक जीवनाला प्राधान्य मिळू लागले होते. समाजसेवेत जवळपास पंचवीस वर्षे घालवल्यावर वयाच्या पन्नीशाच्या आसपास फुले यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा अनुभव आलेला होता. समाजाच्या स्थापनेपूर्वी तुकाराम हनुमंत पिंजण, ज्ञानगिरी बाबा, रामशेठ उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ग्यानोबा झगडे मिस्त्री, धोंडीराम गवंडी वैग्रे आदी मंडळी सायंकाळी त्यांच्याकडे चर्चेसाठी जमायची. यावेळी संत कबीरांच्या विशेषतः बीजक ग्रंथातील ‘विप्रमती’ भागाचं वाचन व्हायचं. ज्ञानगिरी बाबा हे वाचन करीत असत. यावेळी घडणाऱ्या संवादातून सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं फुल्यांना अगत्याचं वाटू लागलं होतं. ‘सत्यशोधक’ समाजच्या स्थापनेची बीजं फुल्यांच्या याच विचारात असावीत. स्थापनेच्या पहिल्या, २४ सप्टेंबर १९७३च्या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा झाली होती. ‘सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था, सत्य शोधण्याचे काम करणारा समाज म्हणून 'सत्यसोधक समाज' हे नाव सर्वांनी संमत केलं होतं. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली होती. आपल्या या चळवळीसाठी महात्मा फुल्यांनी 'सत्यशोधक' हा शब्द का वापरला? तो कोठून आला? याबाबतची पुरेशी स्पष्टता होईल असा एकही थेट संदर्भ उपलब्ध होत नाही. तथापि महेश जोशी यांनी आपल्या 'सत्यशोधक समाजाचा इतिहास' ग्रंथामध्ये, ‘महात्मा फुले यांच्या तोंडी सत्यशोधक समाज आणि मानवधर्म असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी सत्यशोधक हा शब्द बाबा पद्मनजी यांच्याकडून आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला दिसतो’ असं म्हटलं आहे. बडोद्याच्या गायकवाड यांना उद्देशून मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड क्लेअर १८३२ साली आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना लिहिलेल्या पत्रात गायकवाड यांना उद्देशून ‘हे भारतीय लोक सत्याची फारशी पर्वा करत नाहीत’ असे म्हटल्याने भारतीयांविषयी असा अपप्रचार होत असताना ‘सत्यशोधक’ हा शब्द समाजसुधारकांना आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटला असावा, असंही मत त्यांनी नोंदवलं आहे.

महत्वाचं म्हणजे बाबा पद्मनजी यांनी लोकांमध्ये धर्मजागृती व्हावी म्हणून ‘सत्यशोधक सभा’ स्थापन केली होती. मात्र तिच्या कालावधीचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे 'बाबा पद्मनजी’ यांनी तो शब्द कोठून उचलला असेल, तेही सांगता येत नाही. फुल्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. हा पोवाडा शुद्ध करण्यासाठी बाबा पद्मनजीयांचे सहकार्य मिळाले होते. हे दोघेही समकालीन होते. ब्राह्मणांचे कसब या १८६९ साली जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमनजी त्यांची प्रस्तावना आहे. बाबा पद्मनजी हे शालेय वयात असताना फ्री चर्च स्कूलमध्ये जाऊ लागल्यावर त्यांच्या मनावर नव्या शिक्षणपद्धतीचा परिणाम होऊन त्यांनी ‘सकल विश्वाचा उत्पन्नकर्ता श्री जगद्गुरू सर्वोत्तम नारायण याच्या पवित्र चरणांते स्मरून’ २५ ऑगस्ट १८४९ रोजी एक शपथ घेतली होती. जिचा उल्लेख अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रात भेटतो. यात त्यांनी ‘ईश्वर मला असत्य भाषण करण्यास बुद्धी न देवो’ असं म्हटलं आहे. बाबा पद्मनजी यांनी आपल्या याच शाळेमधील मित्रांविषयी १८५१ मध्ये लिहिले होते, ‘मी मुंबईस सत्य शोधू लागल्यापासून बेळगांवी जाईपर्यंत फ्री चर्च विद्यालयात जी सत्यशोधकांची टोळी झाली होती तिच्यात ब्राह्मण, परभू, सोनार, शेणवी इ. जातींची मुले होती.’ (संदर्भ :: बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, १९७९, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई - पान २६, पीडीएफ आवृत्ती) पुढे ३ सप्टेंबर १८५४ साली बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ‘हिंदू धर्मात राहून मनातील अज्ञान व अविद्या यांचा नाश करता येत नाही. सत्यशोधन व असत्य मुक्ती यासाठी ऋषिप्रणित हिंदू धर्मातील वचने उपकारक ठरत नाहीत.’ यामुळे आपण ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बाबा पद्मनजी यांनी १२ नोव्हेंबर १८५१ रोजी उडतरे, जि. सातारा येथून ज्ञानप्रकाश वर्तमानपत्रास प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रात ‘...सत्ययुगाचा प्रथम दिवसाचा अरुणोदय झाला आहे.’ असे लिहिले होते. बाबा पद्मनजी यांनी १८६१ मध्ये सत्यदीपिका (धाकटी) नावाचे लहान मुलांचे मासिक सुरु केले होते. हे मासिक १८७३ साली बंद पडल्यावर त्यांनी सत्यदीपिका (थोरली) सुरु केले होते. ते १८७७ला बंद पडले. पुढे १८८२ मध्ये त्यांनी ‘सत्य’वादी नावाचे पाक्षिक सुरु केले होते.

‘सत्यशोधक या नावाचे एक मराठी पत्र निघणार आहे असे ऐकून आम्हास मोठा आनंद वाटला होता. परंतु जेव्हा त्याचा एक अंक येऊन पोहोचला आणि आम्ही तो वाचला तेव्हा आम्हास खेद वाटला. कारण सत्यशोधक हे नाव देऊन त्यात द्वेषाने उगीच जागा भरणे अयोग्य आहे’ असा उल्लेख १ जुलै १८५४च्या ‘ज्ञानोदय’ मध्ये असल्याची नोंद आपल्याला ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ‘रा. का. लेले’ यांच्या ग्रंथात भेटते. अहमदनगरच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनने याच ज्ञानोदयचा पहिला अंक २० जून १८४२ रोजी प्रकाशित केला होता. या अंकाचा बाबा पद्मनजी यांच्यावर प्रभाव राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातल्या नवशिक्षित तरुणांमधला एक मोठा वर्ग स्वधर्मापासून वैचारिकदृष्ट्या दुरावत होता. आपला धर्म, परंपरा, समाजव्यवस्था यांच्यातल्या दोषांची जाणीव झाल्यामुळे ही मंडळी ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाली होती. बाबा पदमनजींप्रमाणे काहींनी प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचं धाडस केलं. या वर्गासाठी ज्ञानोदयहे मार्गदर्शक वर्तमानपत्र होतं. “आपल्या तरुणपणी आपण ज्ञानोदयचे वाचक तर होतोच, पण स्वतःशिवाय आणखी दहा वर्गणीदार या वर्तमानपत्राला मिळवून दिले होते”, अशी आठवण बाबा पदमनजी यांनी अरुणोदयया आत्मचरित्रात नोंदवली आहे.

महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे सत्यशोधकीय नियतकालिकेहे डॉ. अरुण शिंदे यांचे महत्त्वाचे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. त्यानुसार सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघालीत. दीनबंधु’ (१८७७ - कृष्णराव भालेकर, नारारण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे), ‘सत्सार’ (१८८५, म. फुले), ‘दीनमित्र’ (१८८८ - गणपतराव पाटील), ‘राघव भूषण’ (१८८८ - गुलाबसिंह कौशल्य), ‘अंबालहरी’ (१८८९ - कृष्णराव भालेकर), ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ (१८९२ - कृष्णराव भालेकर), ‘मराठा दीनबंधु’ (१९०१ - भास्करराव जाधव), ‘दीनमित्य’ (१९१०, मुकुंदराव पाटील), ‘विश्वबंधू’ (१९११ - बळवंतराव पिसाळ), ‘जागरूक’ (१९१७ - वालचंद कोठारी), ‘जागृति’ (१९१७ - भगवंतराव पाळेकर), ‘डेक्कन रयत’ (१९१८ - अण्णासाहेब लठ्ठे), ‘विजयी मराठा’ (१९१९- श्रीपतराव शिंदे), ‘सत्यप्रकाश’ (१९१९ - नारारण रामचंद्र विभूते), ‘गरिबांचा कैवारी’ (१९२० - बाबूराव रादव), ‘भगवा झेंडा’ (१९२० - दत्ताजीराव कुरणे), ‘तरुण मराठा’ (१९२० - सखाराम पांडूरंग सावंत), ‘राष्ट्रवीर’ (१९२१ - शामराव भोसले), ‘प्रबोधन’ (१९२१ - के. सी. ठाकरे), ‘संजीवन’ (१९२१ - द. भि. रणदिवे), ‘सिंध मराठा’ (१९२४ - दत्तात्रेर वासुदेव अणावकर), ‘हंटर’ (१९२५ - खंडेराव बागल), ‘मजूर’ (१९२५ - रामचंद्र लाड), ‘कर्मवीर’ (१९२५ - शि. आ. भोसले), ‘नवयुग’ (१९२६ - बाबासाहेब बोले), ‘सत्यवादी’ (१९२६ - बाळासाहेब पाटील), ‘ब्राह्मणेतर’ (१९२६ - व्यंकटराव गोडे), ‘कैवारी’ (१९२८ - दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिके सुरू झाली. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. जागृतिहे साप्ताहिक बडोद्याहून तर सिंध मराठाहे कराचीहून प्रसिद्ध होत होते. येवला, जि. नाशिक (राघव भूषण), तरवडी, जि. अहमदनगर (दीनमित्र) अशा ग्रामीण भागांतून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत नियतकालिके प्रसिद्ध होत होती. यात रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी १८७१ साली सुरु केलेल्या सत्यशोधक साप्ताहिकाचा उल्लेख नाही.

सत्य हा संस्कृत शब्द आहे. भारतीय दर्शनांमध्ये ‘सत्य’ या संकल्पनेचा विचार प्रमाण आणि प्रामाण्य या संकल्पनांच्या संदर्भात झालेला दिसतो. महात्मा फुले यांच्या असंख्य पत्रावर ‘सत्यमेव जयते’ असाच उल्लेख आहे. फुले यांचा संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी 'अखंड' रचले होते. त्याची एकूण अखंड संख्या ९९९ आहे. १८८७ मध्ये प्रसिद्ध झाले. यात महात्मा फुले म्हणतात,

सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥

जगामाजी सुख सारे । खास सत्याची  ती पोरे

सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥

सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे. महात्मा फुल्यांची अखंड रचनेत अनेकदा ‘सत्य’ शब्द वापरला आहे. आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात महात्मा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ लिहिला होता. ‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही’ अशी सुरुवात करून महात्मा फुल्यांनी लिहिलेला हा ग्रंथ त्यांच्या मृत्युनंतर १८९१ ला प्रकाशित झाला.

तत्कालिन सरकारी परिस्थिती लोकांसमोर मांडायची एवढाच सत्याचा मर्यादित अर्थ असल्याच्या काळात फुल्यांनी सत्यशोधनाचा आग्रह धरला होता. आपल्याकडील केशवपनाची चाल बंद करायला समाजसुधारकांना संघर्ष करावा लागला होता. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहामागील भूमिका तपासताना ‘ब्रिटीश इथले नव्हेत’ हे सत्य आपल्या लक्षात येतं. गांधीजींनी ब्रिटीशांच्या जाण्याचा आग्रह धरल्याचेही दिसते. भाषेच्या अंगाने पाहिलं रत्नागिरीतील लिमये यांनी ‘सत्यशोधक’ शब्द पहिल्यांदा कॉईन केला असं दिसतं. पण चळवळीच्या अंगाने पाहिलं तर तो महात्मा फुल्यांच्या जीवनात सर्वत्र आढळतो. सत्यशोधक समाज हे दोन शब्द कदाचित एकमेकांना जोडलेले नसावेत. ‘बहिष्कृत भारत’ किंवा ‘सत्याचे प्रयोग’ प्रमाणे हे शब्द थेट वापरले गेले असण्याची शक्यता आहे. फुल्यांच्या सत्यशोधक समाज मधील ‘समाज’ हा शब्द तत्पूर्वी अनेकांनी आपल्या चळवळीसाठी वापरला आहे. अशा अभ्यासात शोधाच्या वाटा बंद झाल्यावर आपल्याला विषयाचा अर्थ-अन्वयार्थ शोधावा लागतो असं उत्तम कांबळे सरांचं रास्त म्हणणं होतं. महात्मा फुल्यांच्या संपूर्ण विचारांचे बीज आपल्याला ‘सत्य काय हे जाणून घ्यायला हवे म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात’ याकडे झुकलेले दिसते. महात्मा फुल्यांनी जीवनात सत्याला खूप महत्त्व दिले आहे. त्यांनी जीवनभर केलेली मीमांसा सत्याशी निगडित आहे. त्यांनी सत्य हे तर्काला आणि वास्तवाला जोडलेलं दिसतं. तत्पूर्वीचं सत्य आपल्याला देव, धर्म याला जोडलेलं दिसतं. महात्मा फुल्यांनी जीवनभर स्वतःला कृतीतूनच ‘सत्यशोधक’ मानलं आहे. इतिहास हा एक आरसा आहे. जितका इतिहास जुना तितका त्या आरश्यामागील पाराही प्रसंगी क्षीण होत जाण्याची संभवना असते. अशा प्रसंगी नवीन पारा जोडून नीटसं पाहाणं आवश्यक बनतं. तसंच ‘सत्यशोधक समाज’ हे विशेषणात्मक नाव १९७३ ला पुढे आलं असलं तरी महात्मा फुल्यांचं काम तत्पूर्वीपासून सुरु आहे हे स्पष्ट आहे. कधीकधी काही शब्द नावात यायला उशीर होतो पण ते शब्द तत्पूर्वी वापरात किंवा व्यवहारात आलेले असतात. ‘सत्यशोधक’ संदर्भात ही शक्यता अधिक वाटते. आपल्याकडे इतिहासात कॉईन झालेले शब्द हे ज्यांच्या नावावर जमा झालेले दिसतात, त्यांच्यापूर्वी ते कोणीतरी वापरले असावेत असे मानणारा एक प्रवाह आहे. बाबा पद्मनजी यांचे विषयी अभ्यासताना ‘सत्यशोधक’ हा शब्द पूर्वी अस्तित्वात असावा असं वाटतं. महात्मा फुले यांनी जीवनभर कार्य केलेल्या चळवळीचं बिरूद असलेला ‘सत्यशोधक’ शब्द रत्नागिरीच्या लिमयेंनी कसा वापरला? त्यामागे शाब्दिक आकर्षण असावं का? की महात्मा फुल्यांच्या प्रभावातून हा शब्द घेतला? पण तसं त्या साप्ताहिकात दिसतं नाही आणि नोंदही नाही. दुर्दैवाने त्याचे सुरुवातीचे अंकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा लेख वाचून कोणाला यातील मसुद्यावर कोणाला अधिक प्रकाश टाकता आला तर आम्हाला अधिक आनंद होईल.

सत्यशोधकचा दीडशे वर्ष विशेषांक निघेपर्यंत ‘रत्नागिरीतून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ प्रसिद्ध होते’ हे अनेकांना माहिती नव्हते. सत्यशोधकीय विचारधारेतील नियतकालिकांच्या आजवरच्या यादीत रत्नागिरीतील या पत्राचा उल्लेख नाही. ‘सत्यशोधक’ हे नाव आपल्या नियतकालिकासाठी संघटीत पद्धतीने कै. हरि नारायण लिमये यांनी पहिल्यांदा कॉईन केले होते. यावरून आम्ही अनुमान लावलं होतं. सत्यशोधकचे स्वातंत्र्यपूर्व जुने अंक चाळताना आम्हाला अंकात ज्योतिष विषयक मजकूर दिसला. बाबासाहेब बोले यांच्या चळवळी संदर्भात लिहिताना चरित्रकार धनंजय कीर यांनी ‘सत्यशोधक’ मधून खोतांची पाठराखण झाल्याची नोंद केल्याने हे महात्मा फुल्यांच्या विचारधारेशी संबंधित नसल्याचं आमचं मत बनलं होतं. तरीही कांबळे सरांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा होता. सत्यशोधक अंकाच्या अतिथी संपादकीयात आम्ही पुढे लिहिलं होतं, ‘पत्रकारिता’ ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं जग क्षणोक्षणी बदलतंय. पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ बेहेरेंच्या शब्दातील हे चैतन्य आम्हाला उत्तम कांबळे मास्तरांच्या तासात अनुभवता आणि हा लेख लिहिताना जगता आलं.

 

संदर्भ :-

तृतीय रत्न (नाटक) – महात्मा फुले (१८५५ :: अप्रकाशित) प्रथम प्रकाशन – पुरोगामी सत्यशोधक

बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर (१९७९ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

जोतिचरित्र – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (सप्टेंबर १९९१ :: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया)

सत्यशोधक समाजाचा इतिहास – महेश जोशी (२००२ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले – श्रीराम गुंदेकर (जुलै २००४ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)

महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्रीराम गुंदेकर

मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा. का. लेले (द्वितीयावृत्ती २००४ :: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)

 

धीरज वाटेकर चिपळूण, मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित नऊ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  

 

कोकणच्या सांस्कृतिक बंधातील उमाळा

            कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या ...