शुक्रवार, २५ मे, २०१८

साडेसात हजार कि.मी. भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील पहिली ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ कोकणात !


पालशेत गुहेमध्ये संशोधन
करताना डॉ. अशोक मराठे  
एकविसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला सन २००१ साली पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी शोधलेली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ आजही असंख्य पर्यटक-अभ्यासकांना खुणावते आहे. किमान ९० हजार वर्षे जुनी, भारताच्या साडेसात हजार कि.मी. लांब समुद्र किनाऱ्यावरील ही पहिली गुहा आहे. ही गुहा म्हणजे, जगाच्या पुरातत्वीय पटलावर दिमाखाने मिरवू शकणारा आणि या विषयात जगात भारताची मान उंचावण्याची क्षमता असलेला अनमोल ठेवा आहे. याकडे शासनासह समाजाने ‘पर्यटन’ म्हणून सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे.


पालशेत हे गाव गुहागर हेदवी मार्गावर गुहागरपासून १२ कि.मी. अंतरावर आहे.
पालशेत गुहा मुख  
पालशेतच्या अरबी समुद्रकिनाऱ्यापासून दोन कि.मी. आत समुद्रसपाटीपासून ८५ मी. उंचीवर सुसरोंडी भागात ‘सुंदर’ नदीच्या उगमाजवळ जांभ्या दगडात ही मानवनिर्मित गुहा
(१७° २६ एन, 73° १५ ई) आहे. या भागातील स्थानिक याला ‘वाघबीळ’ म्हणून ओळखतात. इथे पोहोचण्यासाठी डोंगर चढून किमान २० मिनिटांची पायपीट करावी लागते. येथे पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग गावातील पालशेत हायस्कूलचे पर्यवेक्षक मनोज जोगळेकर यांच्या आंब्याच्या बागेतून जातो. पालशेत ते पोमेन्डी मार्गावर निवोशी गावाजवळ बारभाईच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. सुंदर नदीच्या
पालशेत गुहेची पाहणी करताना
       धीरज वाटेकर आणि विलास महाडिक  
दोन्ही तीरावर, जांभ्या दगडाचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे. पावसाळ्यात या भागातून छोटे-मोठे असंख्य ओहोळ अरुंद आणि खोल घळयांतून वाहत असतात. ते दृश्य अतिशय मोहक असते. याच नदीपात्रात साधारणत साडेचार मीटर उंचीच्या धबधब्याशेजारी ही गुहा असून तिच्या जवळ जीवंत झरा आहे. या गुहेचे प्रवेशद्वार दक्षिणेला असून ते आयताकृती आहे. त्याची रुंदी दीड मीटर, उंची अडीच मीटर आहे. सन २००१ साली गुहेत आदिमानवाच्या वापरातील काही हत्यारे मिळतील  का ? यासाठी डॉ. मराठे यांनी गुहेत उत्खनन केले होते. तेव्हा त्यांना २.७ मी. खोलीवर नव्वद हजार वर्षांपूर्वीची
हात कुऱ्हाड, तोड कुऱ्हाड, फरशी, तासव्यासारखी तब्बल ५४ पुराश्मयुगीन हत्यारे सापडली होती.

यापूर्वी भारतात तामिळनाडूमध्ये मद्रासजवळील पल्लवम येथे काही दगडी हत्यारे सापडली
गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा !
होती. भारताच्या साडेसात हजार कि.मी. विस्तीर्ण समुद्र किनारपट्टीवरील नव्वद हजार वर्षे जुनी असलेली ही पहिलीच गुहा आहे. या गुहेमधील पहिला आदिमानव हा होमो इरेक्टस प्रकारचा होता. त्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र त्याच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नव्हता. जंगलातील अन्न गोळा करणे आणि दगडी हत्यारे फेकून प्राण्यांची शिकार करण्यापर्यंत त्याची प्रगती झालेली होती. भारतात  विविध २२ हून अधिक ठिकाणी पालशेतसारख्या अच्युलियन मानवाच्या गुहेतील वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यात देशातील ७५०० कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्याजवळील ही गुहा हे पहिले संशोधन आहे. डॉ. मराठे यांचे हे संशोधन 'चालू विज्ञान' या देशातील अग्रगण्य वैज्ञानिक जर्नलमध्ये जून २००६ च्या अंकात प्रकाशित झाले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.  


पालशेत गाव नकाशा 
पालशेत गुहा नकाशा 
पालशेत गुहेत मिळालेली दगडी हत्यारे 
नारळ आणि सुपारीच्या बागांनी युक्त असलेल्या पालशेतला समुद्रकिनारा लाभला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात डॉ. मराठे यांनी या गावात पुराश्मयुगकालीन गुहेसह पुरातन बंदर आणि त्याच काळातील समुद्रातील बांधकामाचेही संशोधन केलेले आहे. गावात लक्ष्मीनारायण मंदिराला लागून, कुंभारआळी आणि बापटआळी भागात इ.स. २ ते इ.स. १६ पर्यंत अस्तित्वात असलेले पुरातन बंदर आहे. येथून समुद्रापर्यंतचे अंतर दोन ते अडीच कि.मी. इतके आहे. बंदराच्या बांधकामाचे अवशेषही समुद्रापर्यंत दिसून येतात. इ.स. पहिल्या शतकात एका ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या ‘पेरिप्लस मॉरीस एरिग्रायर’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात कोकण किनारपट्टीतील अनेक बंदरांचा समावेश असून त्यात ‘पालमपट्टई’ असा आजच्या पालशेतचा उल्लेख आहे. इ.स. तिसऱ्या शतकादरम्यान ग्रीस आणि रोमशी या बंदरातून व्यापार चालत होता. इ.स. सतराव्या शतकात सलग झालेल्या दुष्काळामुळे हे बंदर मागे पडले असावे. हे बंदर अर्धगोलाकार बुरुजाच्या आकाराचे आहे. गुहागर तालुक्यात सुरळ येथील प्राचीन शिवमंदिर आणि मानवनिर्मित सोळाशे वर्षपूर्व गुहा, वेळणेश्वरमध्ये सापडलेल्या दहाव्या शतकातील बंदराच्या खुणा, मानवी देहाचे सांगाडे, आठ हजार वर्षांपूर्वीची समुद्र भिंत आणि जगातील सर्वात जुन्या मानवी वसाहतीचे नमुने मिळाले होते. श्रीवर्धन-केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत असलेल्या मानवनिर्मित बांधकामास पणजीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला होता. हे बांधकाम सुमारे २२५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. ते दगडी असून, सलग नाही. याबाबत सलग सहा वर्षे संधोधन सुरु होते. या साऱ्यांतून हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन आणि देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा डॉ. मराठे यांनी केला होता. दुर्दैवाने जुलै २०११ मध्ये डॉ. मराठे यांच्या निवृत्तीनंतर हे सारे संशोधन थंडावले. त्यानंतरच्या कालखंडात इतर कोणाही संशोधकाने हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

गुहा परिसराचा विकास व्हायला हवा !

    सध्या ही पालशेतची गुहा अक्षम्य दुर्लक्षाची शिकार ठरली आहे. येथे घेऊन जाण्याची
  गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा
मानसिकता असलेल्या मनुष्यबळाचीही परिसरात सध्या वानवा आहे. या गुहेचा शोध लागल्यानंतर गावातून तिथपर्यंत जाण्यासाठीच्या मार्गावर चुन्याने रंगविलेले पांढरे दगड ठेवून रस्ता समजेल अशी व्यवस्था केली गेली होती. मात्र त्यालाही आज १७-१८ वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हा देशभरातील अनेक अभ्यासक, पर्यटक आणि चिकित्सकांची पाऊले पालशेतच्या दिशेने वळली होती. आज पर्यटकांना, अभ्यासकांना चाचपडत इथपर्यंत पोहोचावे लागते आहे. या दुर्लक्षित गुहेला भेट देण्यासाठी जात असताना साप आणि विंचू यांच्याबाबतच्यासह इतर योग्य ती सर्व खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. गुहेचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. सुंदर नदीच्या पात्राचे पाणी बांध घालून अडविले तर या ठिकाणी असलेल्या मुबलक जागेचा उपयोग करून एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आकाराला येऊ शकते. यासाठी प्रशासकीय पुढाकार आवश्यक आहे. असंख्य संशोधक आणि अभ्यासक सातत्याने कोकणात विविध ठिकाणी आपापले संशोधन-अध्ययन कार्य करीत असूनही निव्वळ तेवढ्याने पर्यटन विकास शक्य नाही. आजही दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजीच्या लेणींना आपण संपूर्ण न्याय देऊ शकलेलो नाही. कोकणच्या मातीवर ‘बेगडी’ नव्हे, मनापासून प्रेम करणाऱ्या विकास पुरुषाची कमतरता कायम सतावते आहे.     

जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये, नेरळ-माथेरानची नॅरो गेज’ ‘टॉय ट्रेनवगळता, हजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. निवृत्त पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित केळशी, ता. दापोली येथील निश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीसह समुद्रातील ८ हजार वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि पालशेतची पुराश्मयुगकालीन गुहा यांसारखे संशोधन ‘जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळ यादी’त समाविष्ट व्हायला हवे. कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. कोकणात एकविसाव्या शतकात झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे झालेले असताना त्यास दुर्लक्षून जागतिक स्तरावर संपूर्ण कोकणचा पर्यटनात्मक विकास शक्य नाही, याची जाणीव कोकणवासियांना होईल तेव्हाच कोकणचा संपूर्ण विकास होईल.  

धीरज वाटेकर
मो.९८६०३६०९४८







शनिवार, १२ मे, २०१८

Crocodiles, boating and a tour of 'history' is what Chiplun offers

A summer boating and crocodile safari, to be organised on the outskirts of the city of Chiplun between May 4 and 8, is touted to attract more than 25 thousand tourists. This is the only crocodile safari that has been organised for the past four years at Chiplun located in Ratnagiri district, which is nearly 250 km away from Mumbai.

Ram Redij, the chairman of the Global Chiplun Tourism Multi-purpose Cooperative Society told DNA that this is the only crocodile safari that is being conducted twice a year, for the past four years. Redij informed that Vashishti River backwaters are rich in various beautiful spots including a picturesque coastline, Govindgad Fort, small islands, among others.

Dheeraj Watekar, a local writer and journalist said though Vashishti River has crocodiles, there have never been any report of a crocodile attack in this area. He there is a possibility of Maharashtra getting its first crocodile park at Chiplun, near Govindgad Fort, like the one in Chennai. Watekar stressed on the need for a scientific survey and census of the crocodiles in the river for the same.
Redij said that there are around 250 to 300 crocodiles in the area, but no scientific survey has been done to ascertain the numbers. A large croc population is the primary reason why the Chiplun tourism society has been organising the safari during the summers and also to usher in the new year.
Watekar added that he himself has many a times taken photographs of crocodiles, which are easily located during low tide. Taking these factors into account, the organisation arranges the festival during the the first week of May every year.
Redij said that the organisation has acquired the latest boats, including rowing boats and pedal boats and that tourists would be given a tour of the nearby islands, forts, while fun games will also be organised for the tourists. A food court in the area will serve Konkan delicacies, too.
Those interested to take this tour can get in touch with Ram Redij (7767007110) or manager Vishwas Patil (9823138524).

(By Shri. Shailendra Paranjpe, DNA India) 
May 2, 2018, 06:00 AM IST

http://www.dnaindia.com/mumbai/report-crocodiles-boating-and-a-tour-of-history-is-what-chiplun-offers-2610512

https://www.nyoooz.com/news/mumbai/1099662/crocodiles-boating-and-a-tour-of-history-is-what-chiplun-offers/

http://www.zeebiz.com/india/news-as-summer-holidays-beckon-try-crocodile-safari-in-chiplun-maharashtra-45093



शनिवार, १४ एप्रिल, २०१८

‘अलोरे हायस्कूल अलोरे’ नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने...

निर्णय घेणा-या खूर्चीतील अधिकारी व्यक्ती ‘काहीतरी वेगळं’ करून दाखविण्याच्या स्वप्नाने झपाटलेली असेल तर ती व्यक्ती आपल्या कार्यकाळात किती उत्तम काम उभे करू शकते ? याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूल अलोरे या एकाच शाळेचे रत्नागिरी जिल्हास्तरावर सर्वाधिक काळ म्हणजे २७ वर्षे ७ महिने १९ दिवस ‘मुख्याध्यापक’ म्हणून (सन १९७२-२०००) कार्यरत राहिलेल्या, ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर’ या शिस्तप्रिय मुख्याध्यापकांचे नाव त्याच शाळेला देण्याचा नामकरण समारोह नुकताच गेल्या शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या प्रांगणात, ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, सन १९७२ च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी, निवृत्त नौसेना अधिकारी गुरुदत्त साळोखे, शाळेला बोर्डाच्या यादीत पहिले यश मिळवून देणारी जयश्री कुलकर्णी-वाळिंबे, सीए वसंतराव लाड यांचे ज्येष्ठ सुपुत्र परीक्षित लाड, देऊळ, वळू या ‘राष्ट्रपती’ पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे निर्माते उमेश कुलकर्णी, जि. प. सदस्य विनोद झगडे, सरांच्या पत्नी श्रीमती शुभदा आगवेकर, मुलगा अमित आणि नचिकेत आगवेकर, संस्थाध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष प्रकाश गगनग्रास, मुख्याध्यापक उमेश पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्या निमित्ताने आगवेकर सरांच्या कारकीर्दीचा हा थोडक्यात आढावा...! 
मुंबईहून गोव्याला जाताना सावर्डेच्या पुढे निवळीफाटा ओलांडल्यावर लागणाऱ्या ‘आगवे’ गावचे सर मूळ रहिवाशी ! ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’चे ‘संस्थापक-संवर्धक’ राहिलेले शिक्षक कै. नागेश प. पोटे हे सरांचे आजोबा. त्यांच्या कन्या सत्यभामा या सरांच्या आई होत. सरांचे वडील आत्माराम‘नाना’ हे व्यवसायाने गावातील प्रगतशील शेतकरी होते. उभयतांना, २ मुलगे आणि ५ मुली अशी ७ अपत्ये झाली, पैकी मोरेश्वर हे ६ वे अपत्य होय. त्यांचा जन्म दिनांक ८ मार्च १९४२ रोजी झाला. मोठाल्या, कौलारू, मातीच्या विटांनी बनविलेल्या, सारवलेल्या भिंती, जमीन, चारही बाजूंनी पडव्या असलेल्या सुगंधी घरात या भावंडांचे बालपण गेले. घरात गाई-म्हशी, भरपूर दुध-दुभते असायचे, सारे कोणालाही न विकता घरीच वापरले जायचे. त्यामुळे हातात रोख रकमेचा अनेकदा अभाव असायचा. परंतू प्रगत शेती हेच श्रीमंतीचे लक्षण मानले जाणारा तो काळ होता. लहानपणापासून अध्यात्मिक आवड, आणि डावखुरे असूनही दोन्ही हातांनी लिहिण्याची सवय, शालेय विषयात गणिताची विशेष गोडी असलेले मोरेश्वर पुढे गणिताचे शिक्षक म्हणून नावाजले गेले. चतुर्मासात गावातल्या श्रीलक्ष्मी-नारायणाच्या देवळातले कार्यक्रम त्यांना विशेष प्रिय ! अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मोरेश्वरना पुढे शिकवणे घरच्यांना शक्य होत नसताना बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. आपले बी.एस्सी. बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला संगमेश्वर, दाभोळ येथे काही काळ नोकरी केल्यानंतर सन १९६८ साली सर चिपळूणच्या ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’च्या युनायटेड हायस्कूलमध्ये नोकरीला लागले. यानंतर मूळचे कोल्हापूरचे, परंतु नोकरी निमित्ताने बरेचसे आयुष्य सांगलीत घालविलेले, तिथल्या एका माध्यमिक शाळेचे शिक्षक गणेश नरसिंह कुलकर्णी आणि मूळ मिरजच्या रहिवाशी, इंदूमती या दाम्पत्याच्या पोटी दिनांक २१ मे १९४९ रोजी जन्मलेल्या २१ वर्षे वयाच्या बी.ए.बी.एड. झालेल्या ‘शुभदा’ यांच्याशी २८ वर्षांचे मोरेश्वर दिनांक १३ डिसेंबर १९७० साली विवाहबद्ध झाले. परशुराम एज्युकेशन सोसायटीची अलोरेत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर, ‘त्या शाळेची मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी कोण घेणार?’ या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मोरेश्वर आगवेकर यांचे नाव पुढे आले. सोमवार, दिनांक १२ जून १९७२, अलोरे हायस्कूल अलोरेचे मुख्याध्यापक म्हणून आलेली नवीन जबाबदारी घेऊन ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर’ हे युनायटेड इंग्लिश स्कूलचे बी.एस.स्सी.,बी.एड. पर्यंत शिक्षण झालेले गणिताचे शिक्षक, साधारण दुपारच्या १२ वाजताच्या सुमारास अलोरे बसस्टॉपवर उतरले. सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केव्हाच उत्साहात संपन्न झाला होता. अलोरेत शाळा सुरु व्हावी म्हणून अलोरेचे सरपंच राहिलेले गणपत दाजी देवरे, नागवेचे शंकरराव पालांडे, राजाराम पालांडे, पेढांबेचे दौलतराव शिंदे, खडपोलीचे दत्तोपंत बापट यांच्यासह स्थानिक पालक आणि ग्रामस्थांचे सहकार्य होते. दरम्यान कोणीही शिक्षक नाही म्हटल्यावर जमलेले आठव्या इयत्तेतील जवळपास ६४ विद्यार्थी आणि २१ विद्यार्थींनी घरी जायला निघाले होते. घरी जाणा-या विद्यार्थ्यांची आणि मोरेश्वर आगवेकर सरांची शाळेच्या वर्गाबाहेरच गाठभेट झाली आणि, ‘चला रे सगळ्यांनी !’ म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शिंदे कॅन्टीन जवळच्या, भूकंपपिडीतांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या, उपलब्ध पत्र्याच्या शेडमधील इमारतीतील ३ पैकी २ वर्गात नेऊन बसविले. ‘या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता...’ या सरस्वती वंदनेचे स्वर, सह्याद्रीच्या त्या विशाल डोंगराच्या कपारीतील ‘बोलादवाडी’ या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या कोळकेवाडी धरण प्रकल्प क्षेत्रातील ‘अलोरे’च्या निसर्गरम्य वातावरणात ऐकू आले आणि गेल्या ४६ वर्षांत देश-विदेशात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी घडविणाऱ्या, अनेकांच्या आयुष्यातील ‘सोनेरी पान’ ठरलेल्या अलोरेची शाळा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-याच्या परवानगीने सुरु झाली.
सुरुवातीला या तीन शिक्षकी शाळेत २९ वर्षे वयाचे मुख्याध्यापक आगवेकर सर, २३ वर्षे वयाच्या आगवेकर मॅडम आणि गावकर आडनावाच्या २१ वर्षे वयाच्या बी.एस.स्सी. शिकलेल्या शिक्षिका कार्यरत होत्या. कोयना प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचा-याच्या मुलांच्या सोयीकरिता अलोरेच्या पूर्वी सन १९६९ साली संस्थेची पोफळीतही शाळा सुरु झाली होती. इयत्ता ८ वीचा एक वर्ग, ३ शिक्षक, १ लिपिक, १ शिपाई आणि तुटपुंजे शैक्षणिक साहित्य घेऊन, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याचे, कोळकेवाडी धरण आणि बोलादवाडी पॉवर हाऊसचे काम सुरु झाल्यावर शासनाने वसविलेल्या ‘अलोरे वसाहत’ करिता मुख्यत्वे शाळा सुरु झाली. शाळेत विद्यार्थ्यांसोबत स्वत: विद्यार्थी होऊन आगवेकर सर कार्यमग्न असत. शाळा भरायच्या वेळेस स्वतः घंटेच्या खालीच ते उभे असायचे, त्यांचा हा शिरस्ता नंतर शाळा नव्या इमारतीत आल्यावरही निवृत्तीपर्यंत कायम राहिला. विद्यार्थी आणि शिक्षकांपैकी कोण-कोण उशिरा येतंय, यांसह सर्वजण वर्गात जाऊन प्रार्थना सुरु होत नाही तोपर्यंत सरांचे बारीक लक्ष असायचे. शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने पहिल्याच वर्षी ‘पालक शिक्षक संघ’ स्थापन झाला, ‘शाळेची सर्वांगीण प्रगती’ हेच एकमेव ध्येय होते. आगवेकर सर स्वतः अगदी जिद्दीने ही शाळा उभी करायचीच अशाच प्रयत्नात होते, पण काही वेळा त्यांनाही निराश व्हावे लागायचे, शाळा चालविणे हे तितके सोपे काम नक्कीच नव्हते. या साऱ्यांतून एके दिवशी  ‘आपल्याला हे नक्की झेपेल का ?’ अशी शंका त्यांच्या मनात डोकावली. मनातल्या विचारांना मनातच दाबून काम करणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने त्यांनी आपल्या मनातील ही भावना संस्थाचालकांनाही बोलून दाखविली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात सर्वाधिक काळ एकच ‘मुख्याध्यापक’ लाभलेली आणि प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली शाळा हा नावलौकिक मिळविण्यासाठी अलोरे शाळा सज्ज झाली होती.
नव्याने शाळेची गणिते जुळवू पहाणाऱ्या आगवेकर सर, शिक्षण क्षेत्रातील एखाद्या जाणकार व्यक्तिमत्वाच्या शोधात असताना त्यांना ५६ वर्षे वयाचे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लाभलेले, गांधीवादी विचारसरणीचे बी.एस.स्सी.,बी.एड., एम.एड. पर्यंत शिक्षण झालेले, पुढे किंचितसा सोगा सोडलेले पांढरे स्वच्छ धोतर, अंगात सैलसर सदरा नि डोक्यावर पांढरी टोपी परिधान करणारे माधव नारायण कुलकर्णी नावाचे शिक्षक गवसले. आगवेकर सरांना त्यांच्याविषयी कमालीचा आदर राहिला. त्यामागे वयाबरोबरच स्वत: विज्ञान शिक्षक असूनही इंग्रजी, मराठी, संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. यांसह शाळेतला कोणताही विषय शिकवायची तयारी आणि संपूर्ण शालेय व्यवस्थापन याबाबतीतील त्यांचे असलेले ज्ञान ही कारणे होती. या मा. ना. कुलकर्णी सरांचे योगदान पाहून आगवेकर सर शाळेतील शिक्षकांच्या ‘तासिके’ची पाहणी करायला त्यांना सांगत असत. याच दरम्यान, पूर्वी संगमेश्वर-माखजनच्या शाळेत मुख्याध्यापक राहिलेले पु. वि. जोशी हेही कार्यरत झालेले होते. गो. रा. कुलकर्णी नावाचेही एक शिक्षक होते, तेही अलोरेत येण्यापूर्वी कुठेतरी मुख्याध्यापक होते. फार थोडा काळ बर्वे नावाचे पूर्वी मुख्याध्यापक राहिलेले शिक्षक अलोरेत येत होते. कितीतरी वेळा शाळेत प्रतिकूलता निर्माण झाली पण म्हणून त्याचा परिणाम इतरत्र कुठेही वा घरात जाणवला नाही. ‘शाळेचा व्याप आहे माझ्या डोक्यात तो असू देत, पुन्हा घरी आल्यावर तो नको’ असं ते म्हणायचे. शाळेत शाळा आणि घरात घर हे गणित सरांनी १९७३ साली वर्षी जमवले आणि अगदी सन २००० पर्यंत सांभाळले. मा. ना. कुलकर्णी सरांनी अगदी सुरुवातीला आगवेकर सरांना सुचविले होते, ‘शाळा सुरु होण्याच्या आधि किमान १० मिनिटे मुख्याध्यापक शाळेत हजर असलेच पाहिजेत’ आगवेकर सरांनी ते तत्व आयुष्यभर जपले. तीन मुख्याध्यापक आणि गुरूंचे गुरु मा. ना. कुलकर्णी या वयाची पन्नाशी केव्हाच ओलांडलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात ३१ वर्षीय आगवेकर सरांच्या ‘मुख्याध्यापक’ पदाची कसोटी सुरु होती. पुढच्या काळात या कसोटीवर सर किती खरे उतरले याची साक्ष देणारे दिनांक २ जानेवारी १९९७ चे एक पत्र आजही उपलब्ध आहे. या पत्राचा विषय अलोरे शाळेत संगीत वर्ग सुरु करणे हा असून, त्यासाठी आलेल्या अर्जावर, संस्थाचालकांकरिता आपला हस्तलिखित शेरा लिहिताना शेवटच्या ओळीत आगवेकर सरांनी, ‘कृपया आपण मान्यता देणेत कोणतीच अडचण नाही’ असे म्हटले आहे. हे वाक्य लिहिण्यासाठी लागणारा आत्मविश्व्वास सरांनी आपल्या मेहनतीने कमावला होता.
पुढच्या काळात उत्तम अध्यापनाशिवाय इतर कार्यात आघाडीवर राहणाऱ्या असंख्य हुशार, नवतरुण, उत्साही, कर्तृत्ववान आणि झपाटलेल्या शिक्षकांची टीम सरांनी जमविली. अलोरे शाळेने महाराष्ट्राच्या शालेय इतिहासात जे दखलपात्र यश प्राप्त केले त्यात या शिक्षकांचा आणि त्यांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापक आगवेकर सरांचा रोल महत्वाचा राहिला. स्वत: शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांनी शाळेतही शेतीचे अनेक प्रयोग केले, विद्यार्थ्यांना कमवा शिका योजनेचे महत्त्व पटवून दिले. शेतक-याच्या मुलांबाबत विशेष कणव होती. सन १९७३-७४ साली त्यांनी नव्याने शाळेत आलेल्या बचॅमधील काही मुले निवडली आणि त्यांच्या मदतीने आजूबाजूच्या गावातील शेतक-याच्या मुलांचा शोध घेतला होता. या लांबच्या मुलांना त्याकाळी रोजचा एवढा चालून करावा लागणारा प्रवास लक्षात घेत त्यांनी मुलांची, क्वचित मुलींचीही रात्रीची शाळेतच राहण्याची व्यवस्था केली होती. २४ तास शाळा जगणारे सर स्वतःही रात्री-अपरात्री शाळेत येत असत. सरांचे कर्मचारीही सोबत असत. बाहेरच्या या सा-या मुलांमधील तब्बेतीने चांगला असलेल्या मुलाला सर रोज घरी पाठवित, हा विद्यार्थी दुस-या दिवशी शाळेत येताना उर्वरित विद्यार्थ्यांचे डबे सोबत आणीत असे. हे वाचायला जितकं सोपं वाटतंय, प्रत्यक्षात ते तितकं सोपं मुळीच नव्हत, पण ‘आगवेकर’ नावाच्या सरांचं हेच तर वैशिष्ट्य होत. जे हळूहळू लोकांना समजू लागलं होतं, सरांच्या याच स्वभावामुळे पंचक्रोशीतील अनेकांनी सरांना आपलं मानलं होत. त्याकाळी कोयना प्रकल्पातल्या अनेक कर्मचाऱ्यांना ११ वी पास झाल्याशिवाय पुढील प्रमोशन मिळत नव्हते, कर्मचा-यांचे नुकसान व्हायचे. संघाच्या संस्कारातून तयार झालेल्या सरांनी सामाजिक जाणीवेतून या अशा लोकांसाठी त्यावेळी शाळेत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ११ वीचे जुन्या अभ्यासक्रमानुसार विशेष वर्ग, प्रकल्पात शेजारच्या कर्नाटक राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांकरिता १० वीच्या ‘मराठी’ भाषेचे वर्ग शाळेने चालविले. सन १९७५ साली शाळेच्या पहिल्या एस.एस.सी. बॅचचा निकाल ८० टक्के इतका सर्वोच्च लागला. शाळेची राणीदेवी सुमेरचंद अगरवाल ही ७०० पैकी ५७७ (८२.४२ टक्के) गुण मिळवून चिपळूण केंद्रात पहिली आली. शालेय विद्यार्थ्याचा अगदी आई-बापाप्रमाणे, किंबहुना किंचितसा त्याहूनही अधिक विचार करणारे, मुलांचा सांभाळ करणारे व्यक्तिमत्व म्हणून, सतत काळी पँट आणि किंचित पांढरा ढगळा शर्ट परिधान करणारे आगवेकर सर एव्हाना पंचक्रोशीत लोकप्रिय झालेले होते. याच दरम्यान त्यांना ‘बाबा’ आगवेकर हे मिळालेले नामाभिधान त्याचेच सार्थस्वरूप होय.
माजी विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासह सन १९७८ पासून शाळेने आपले स्नेहसंमेलन घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या पटावरील एकूण विद्यार्थ्यांपैकी किमान २५ टक्के विद्यार्थी स्टेजवर यायलाच हवेत, यासाठी सर आग्रही असायचे. अलोरे सारख्या लहान गावात राहणा-या विद्यार्थ्यांना लांब पल्याच्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षणीय स्थळे पाहाता यावीत यासाठी आगवेकर सर एस.टी.ची बस मध्यरात्री १२ वाजता सोडायचे. वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करता साहित्याची जमवाजमव करण्यापासून त्याच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा सन १९८० साली शाळेत उभारण्यात आली. शाळेचे पहिले स्वतंत्र स्नेहसंमेलन दिनांक १२ ते १४ ऑक्टोबर १९८१ ला के. पु. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तात्यासाहेब नातू हे स्वतः शैक्षणिक चळवळीशी खूप वर्षे संबंधित आणि कष्टाची पारख असलेले, मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व असल्याने, त्याचा आगवेकर सरांना खूपच चांगला उपयोग झाला. रामचंद्र गणेश खोत हे शाळेत सन १९७५-७६ च्या दरम्यान दाखल झालेले व्यक्तिमत्व पुढे शिष्यवृत्ती परीक्षांच्या विषयात जिल्ह्यात अग्रक्रमाने नावाजले गेले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेने जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत येण्याचा रत्नागिरीच्या पाठक हायस्कूलचा विक्रम मोडीत काढला. अलोरेची शाळा दर्जेदार म्हणून गणली जाऊ लागली तेव्हा प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे काम जोरात सुरु झालेले होते. अलोरे पंचक्रोशीत शासनाच्या विविध प्रकारांची जवळपास ५२ कार्यालये तेव्हा येथे कार्यरत होती, प्रत्येक कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदापर्यंत किमान १२ आणि त्यानंतर लिपिक, भांडारपाल आणि शिपाई वगैरे कार्यरत असायचे. अलोरे ‘हाउसफुल्ल’ झालेले होते. सुदैवाने कर्मचा-याना निवासासाठी खोल्या अपु-या पडत असताना, शाळा चालविण्याच्या निमित्ताने विविध किमान चार ठिकाणी अनेक खोल्या अडकून असणे ही एक जमेची बाजू होती. ‘शाळेला कुठेतरी द्या एक इमारत बांधून !’ ही भावना त्यातूनच जोर धरू लागली होती. कधीतरी अचानक शाळेत संस्थाचालक आले की मग त्यांची आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घडावी, शाळेच्या नव्या इमारतीच्या विषयात काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी म्हणून ध्यास घेतलेले आगवेकर सर सतत प्रयत्नात असायचे. त्याकाळात मोबाईल नव्हते, त्यामुळे अधिकारी प्रकल्पाच्या कोयेनेच्या कार्यालयात असेपर्यंतच संपर्क राहायचा, नंतर ते अलोरेत पोहोचेपर्यंत विश्रामगृहात निव्वळ वाट पाहात बसावे लागायचे, यात किती कालावधी नि संयमाची कसोटी नियतीने पाहिली असेल, याची मोजदाद न केलेलीच बरी ! सर अशावेळी तासनतास उभे असलेले अनेकांनी पाहिलेत. प्रकल्पातील अधिकारी अभियंता आणि संस्थाचालक यातील दुवा बनून समन्वय साधण्याचे महत्वाचे काम आगवेकर सरांनी केले, प्रकल्पात कार्यकारी अभियंता राहिलेले इनामदार आजही हे मान्य करतात. ‘नवीन शाळा हवीच !’ हा आगवेकर सरांचाच अट्टाहास होता. दिनांक २४ जानेवारी १९८७ साली शाळेच्या नवीन भव्य वास्तूचा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री महोदय येणे ही घटना संस्था चेअरमन आमदार तात्यासाहेब नातू यांच्यामुळेच शक्य झाली होती. शाळेला जून १९८७ ला, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष पां. म. कुलकर्णी यांची मुलगी कुमारी जयश्री कुलकर्णी हिच्या रूपाने मुंबई विभागीय मंडळाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले, ९१.२८ टक्के गुण मिळवून यादीत ती १७ वी आली. त्यावेळचा तो आनंद केवळ शब्दातीत !
सरांचा तास विद्यार्थ्यांना जीवंतपणाची जाणीव करून द्यायचा. खणकन् कानाखाली वाजवून स्पष्टीकरण द्यायची सरांची पद्धतच वेगळी होती, त्यामुळे आगवेकर सर शाळेच्या आवारातच काय संपूर्ण गावात कुठेही दिसले की त्यांना पाहून जो लपेल, तो अलोरे शाळेचाच विद्यार्थी समजला जायचा. अशी कधीतरी एखादी कानाखाली वाजविलेली, अख्या वर्गालाच काय अख्ख्या शाळेला पुढचे अनेक महिने पुरायची. ‘शाळेतल्या विद्यार्थ्यांना मारणे, बदडणे यात काहीही गैर नाही’, या तत्वावर सरांचा गाढा विश्वास होता आणि तसे ते वागलेही ! यामुळेच त्याकाळी मुलाला अलोरे हायस्कूलमध्ये घालून आगवेकर सरांच्या देखरेखीखाली दिलं की, ‘मुलगा सुरक्षित’ असल्याची प्रबळ भावना पालकांची असायची ! सरांच्या घेरदार पोटावर अडकविलेला तो किंचितसा ढगळा बऱ्याचदा पांढरा किंवा फिक्कट शर्ट, काळी पँट, पायात चप्पल असा अत्यंत साधासा सरांचा पेहेराव राहिला. पावसाळ्याच्या दिवसात सर कधीकधी शर्टच्या कॉलरला मागून छत्री अडकवून चालायचे, हे फक्त आगवेकर सरांनाच शोभावे. ज्यांनी हे पाहिलेय त्यांना ते आजही आठवेलं. सरांचा सतत मार खाणा-या विद्यार्थ्याने एखाद्या दिवशी डबा नाही आणला तर ते त्याला आपल्या घरी घेऊन जात. कोणाही शिक्षक-कर्मचा-याच्या सुख-दुखा:सह व्यक्तिगत अडचणीच्यावेळी शाळेचे वातावरण ‘त्या’ व्यक्तीला अक्षरशः एखाद्या कुटुंबासारखेच वाटायचे, मायेचा ओलावा आणि आपलेपणाचं हे वातावरण काही अचानक तयार झालेलं नव्हतं, त्यामागे अनेक वर्ष एक अविश्रांत मन, मेंदू आणि शरीर एकाचवेळी कार्यरत राहून विचार करत होत. ज्याने आपल्या धीरोदात्त व्यक्तिमत्वाने अलोरे शाळेच्या सा-या वातावरणाला ‘बाबा’ बनून आधार दिला होता. जून १९९१ साली अलोरे शाळेत कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांच्या परवानगीने उच्च माध्यमिक ‘कला आणि वाणिज्य’ शाखेचे वर्ग सुरु झाले. दिनांक १४ नोव्हेंबर १९९२ साली शाळेच्या नवीन वास्तूचे शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
एकदा वर्गात शिरले की विद्यार्थ्यांना शिकविण्यात सारेच तरबेज आणि एकापेक्षा एक सरस अशा हरहुन्नरी शिक्षकांचा शब्दशः ‘ताफा’च आगवेकर सरांनी जमविला होता, शाळेच्या सततच्या चढत्या आलेखामागे हे एक प्रमुख कारण होते. सन १९८२ ते ९७ दरम्यानचा कालावधीत सरांना शाळेच्या माध्यमातून यशाचे बरेच पाळले गाठता आले. सर्व सुखसोयींनी युक्त अशी दर्जेदार शाळा म्हणून या शाळेने अनेकदा शासनाची विशेष ‘ग्रँट’ मिळविल्याचा इतिहास आहे. दिनांक २६ नोव्हेंबर १९९५ च्या सकाळी सरांना पहिला दुर्दैवी ‘माईल्ड हार्टअॅटक’ येऊन गेला. यामुळे सरांच्या कणखर मानसिकतेला धक्का बसला. शाळेच्या चौकटीबाहेरील ‘बोर्डाचा चीफकंडक्टर’ सारख्या जबाबदा-याआता आपण कमी करू या असेही त्यांना वाटू लागले होते. सरांच्या कार्यक्षमतेवरही याचा निश्चित परिणाम झाला, पण सरांनी निवृत्तीपर्यंत तो कधी कोणालाही जाणवू दिला नाही.
दिनांक १२ जून १९९६ साली शाळेने आपला रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याचा भव्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर १९९६ ला संपन्न झाला. तोपर्यंत शाळेने ‘महाराष्ट्रातली १९ व्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २ ऱ्या क्रमांकाची आदर्श शाळा’ असा लौकिक प्राप्त केलेला होता. रौप्य महोत्सवी वर्षात शाळेत ‘बालवाडी ते बारावी’ पर्यंतच्या शिक्षणाची सोय झालेली होती. फेब्रुवारी १९९७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत ६५ पैकी २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली. सन १९९५ ते १९९७ दम्यान, संस्थेच्या सहकार्याने खडपोलीला हायस्कूल व्हावे, म्हणून सरांनी यशस्वी प्रयत्न केला. सन १९९९ च्या दरम्यान शाळेला नवी इमारत कमी पडू लागली, इमारत वाढविणे शक्य होत नव्हते अखेर शासनाच्या परवानगीने शाळा ‘दुबार’ पद्धतीने भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक ३१ मार्च २००० रोजी आगवेकर सरांच्या निवृत्तीप्रसंगी ‘प्राचार्य आगवेकर गौरव समारंभ’ पार पडला. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक आणि इंटरनेट सारख्या माध्यमांच्या वापरातून स्वतःला अधिकाधिक अद्ययावत करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला होता. आपले गुरुवर्य मा. ना. कुलकर्णी सरांचा मुख्याध्यापक होण्याचे भाग्य लाभले, हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा गौरव असल्याचे सरांनी नमूद केले होते. ‘प्रचार आणि प्रसिद्धी यांच्या फार मागे धावणारे असे सरांचे व्यक्तिमत्व नव्हते, त्यांचा स्वतःचा एक स्पेस होता. ते अत्यंत मोजक्याच माणसांजवळ मनापासून मोकळे व्हायचे. एखाद्याजवळ त्यांचे जमेपर्यंत थोडे अवघड असायचे, पण एकदा का जमले की मग सरांसारखा माणूस नाही असेच शब्द सरांना अनुभवणा-या प्रत्येकाच्या तोंडून यायचे.
पुढे २००० साली निवृत्त झाल्यावर पूर्णतः मोकळे झाल्यावर सर ख-या अर्थाने खचत गेले. आपण रिकामे आहोत ही भावना त्यांना कायम सतवायची. ‘अलोरे हायस्कूल हे आगवेकर सरांचे तिसरे अपत्यचं !’ सरांच्या मुलांच्या अमित आणि नचिकेत यांच्या या भावना आपल्याला खूप काही सांगून जातात. निवृत्तीनंतर, आता यांचे कसे होणार ?’ याची काहीशी चिंता कुटुंबियांच्याही मनात होती. ‘आयुष्यातील सर्वाधिक काळ २४*७ एका विशिष्ट ध्येयाने झपाटून कार्यरत राहिलेला हा माणूस त्याच्याशिवाय कसा जगू शकतो ?’ हा प्रश्न होताच !
दुर्दैवाने तसचं घडलं ! शारीरिक कारणं काहीही असतील ! पण निवृत्तीनंतर अवघ्या ३ वर्षांत ११ एप्रिल २००३ साली सरांचे निधन होण्यामागे, ‘आपण निवृत्त झालोय’ ही गोष्ट मानसिक पातळीवर स्वीकारण्यात त्यांना निर्माण झालेली अडचण हे ‘आपण सिद्ध करू शकत नसलो तरीही’ एक प्रमुख कारण असल्याची भावना त्यांचा मुलगा नचिकेतची आहे. सर भूतकाळात रमणारे नव्हते, त्यांना त्याबाबत फारसे बोलणेही आवडायचे नाही, ते सतत भविष्याचे इमले बांधण्यात, विचारात मग्न असायचे. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतानाचे सर आणि निवृत्तीनंतरचे आगवेकर सर यांत ‘जमीन-अस्मान’ एवढे अंतर होते. ‘खरंतरं माणसाने आपली नोकरी एवढी मनावर घेऊच नये’ असं कोणीही आज म्हणेल, पण सरांनी ती घेतली होती, आजचे शाळेचे समृद्ध रूप त्याचेच प्रतिक असून त्यांचेच नाव शाळेला दिले जाण्याचा हा नामकरण सोहोळा अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com
(माजी विद्यार्थी, इयत्ता दहावी बॅच १९९५)



बुधवार, १४ मार्च, २०१८

चला ! ‘चिपळूण’ला मुक्कामी जाऊ या !

कोकणच्या दिशेने सिंधुदूर्गात वा रायगड-ठाण्याच्या दिशेने निघालेल्या पर्यटकाला कुठे निघालात ? या प्रश्नानंतर,  कसे ? असा प्रश्न विचारल्यावर ‘व्हाया चिपळूण !’ असेच उत्तर मिळते. मुंबई ते गोवा महामार्गावरील चिपळूण शहराची ‘विश्रांतीस्थान / व्हाया’ ही ओळख पर्यटनावर प्रेम करणाऱ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून बदलते आहे. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन सहकारी संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे चिपळूणच्या पर्यटनाला चांगले दिवस यावेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा.

चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात 'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. श्रीविष्णूचा अवतार भगवान परशुरामाने या नगरीची स्थापना केल्याचा उल्लेख ई.स. १६३७ साली कवी विश्वनाथ यांनी लिहिलेल्या 'श्री व्याडेश्वर माहात्म्य' या संस्कृत ग्रंथात आढळतो. शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा.
 
भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे ‘परशुराम’ होय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामी’ यांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. त्यामुळे मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ, सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात. चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास आजही विशेष प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी.  समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.

डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवती अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात, भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावी. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीक असावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर लिंग स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.

सावर्डेपासून कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते.  त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे. 

अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतून श्री.ना. पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या या देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला  लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’ नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’ असून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात ‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.   

पर्यटकांना अवघ्या ६० ते १०० कि.मी.च्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजआदि सारी अमर्याद पर्यटन समृद्धी देणाऱ्या चिपळूणात जवळपास ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार हॉटेलात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था आहे. तालुक्यातील पर्यटन संपूर्णतः विकसित करण्याचे प्रयत्न ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ करते आहे. या साऱ्याची प्रसिद्धी करण्याबरोबरच दर्जेदार पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही चिपळूणात सुरु झाले आहे. आगामी काळात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवेल, ज्यातून पर्यटक चिपळूणात रमतील हे नक्की !

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com  
मो. ९८६०३६०९४८. 
     

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...