बुधवार, ३ एप्रिल, २०१९

आयुष्य जगणारा गुरुजी !

उद्याच्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, आज आमचे ज्येष्ठ मित्र, चिपळूण शहरानजीक असलेल्या उक्ताड जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास (भाई) महाडिक (गुरुजी) यांचे अभिष्टचिंतन आणि श्रीसत्यनारायण पूजा त्यांच्या पेढे परशुराम येथील श्री परशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रात, मित्रपरिवाराकडून होत आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले विलासराव हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत. दिनांक ५ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेले विलासराव आज वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधत, आपल्यातील उपजत कलागुणांना न्याय देत त्यांनी आपले जीवन जगण्याचा चालविलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. जवळच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात शिक्षण पूर्ण करून ही तीनही  भावंडे प्राथमिक शिक्षक झालीत. अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार देण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही या एकाच सक्षम गुणाच्या बळावर ते कार्यरत झाले. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत विलासरावांनी आपल्या शालेय स्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर असतात. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष देण्यास पुरेसं आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सन २००६/०७ साली सपत्निक ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या विलासरावांनी शिक्षणासोबतच आवडत्या पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ‘जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलं’ या न्यायाने, आमच्या सोबतच्या गेल्या १०/१२ वर्षांच्या कालखंडात, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे.    

      आपल्या कार्यसक्षम अर्धांगिनी, सौ नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी सन २००७ साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरु केले. या विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज, प्रसाद काणे, कैसर देसाई, मिलिंद कापडी अशा अनेकांचे सहकार्य त्यांना याकामी लाभले. नुसते पर्यटन केंद्र काढून भागणार नाही म्हणून त्यांनी सन २००८ साली, आमची ‘चिपळूण तालुका पर्यटन’ ही पुस्तकाची कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याला पहिली पुस्तक प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर, कोकणचे बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ग्रंथालय चळवळीतील अग्रणी आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर, इतिहास संशोधक श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत राहताना, शाळेशी होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या विलासरावांना एका पत्रव्यवहारातून ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे भेटले. त्यांच्यासोबत पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. हा प्रवास पुढे अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली अलिकडच्या भूतान पर्यावरण अभ्यास दौऱ्यापर्यंत येऊन पोहोचला. चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीत संपन्न झालेल्या तीन पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तिथे स्वतः येऊन अनुभवले आहे, त्याला दादही दिलेली आहे. सन २०१४ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील त्यांच्यातल्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या लेखन सहकार्याने ‘ठोसेघर पर्यटन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील गमती-जमती हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. विलासरावांमधला निखळपणे आयुष्य जगणारा अवलिया आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे पुरस्काराने गौरविण्यातही आले. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे ‘बिगरमोसमी जंगलपेर अभियान’ चिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ ‘वनश्री’ महेंद्र घागरे भेटले नि रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा म्हणून अभियान सुरु झाले, त्याला आता ५/६ वर्ष झालीत. विलासराव कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातूनही, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेय स्तरावर बीज पेरणी अभियान संपन्न झाले आहे. या संघटनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.

लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात, आमच्या साथीने अनेक विशेषांकांचे संपादन करण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. आपले ८५ वर्षे वयाचे गुरु ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ मो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी विलासरावांच्या ‘गुरुदक्षिणा’ या लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.’ अधिक काय लिहावे ? विलासरावांना आम्ही मन:पूर्वक अभीष्ट चिंतितो.  
   
धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...