मंगळवार, १४ मे, २०१९

उमाळा : मातीशी असलेल्या नात्याचा !

कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या फुललेल्या जाणीवांसहच्या विचार-कृतीतून अनेकजण एकत्र येतात. एकत्र आलेली माणसं लाल मातीच्या ओढीनं जोडली जातात. एक साखळी तयार होते. मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी, त्या नात्याचं ऋण फेडण्यासाठी अशी माणसं सतत आयुष्यभर कार्यरत राहतात. चाकरमान्यांनी पाहिलेलं गाव विकासाचं स्वप्नंही अशातूनच साकार होत जातं. डोळस नजरेनं पाहिलं तर मातीशी असलेलं हे असं नातं सांगणाऱ्या अनेक कहाण्या कोकणातल्या गावागावात सतत घडत असतात. या साऱ्यामागे इथल्या मातीशी असलेला हृदयस्थ आंतरिक उमाळा दडलेला सापडतो. त्या उमाळ्याचा घेतलेला हा धांडोळा !

बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. पण मातीची नाळ पिढ्यांशी जुळलेली असते. म्हणूनच मातीला / जमिनीला आई म्हणत असावेत. तिच्या दर्शनाचा सोहोळा सर्वांगसोहळा ठरतो. ताठ कण्याचा आणि निधडय़ा छातीचा बापाच्या जागी असलेला सहय़ाद्रीसारखा पाठीराखा, तांबडय़ा मातीत खेळ मांडून एकमेकांच्या गळाभेटीसाठी आसुसलेली, फळांफुलांनी युक्त वृक्षसंपदा, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारी रंगीबेरंगी पाखरं, वन्यजीव, निसर्ग नवलांची दुनिया, इथलं अध्यात्म आणि माणसांची जडणघडण या साऱ्यातूनच झालेली आहे. हा माणूस शतकभरापूर्वी पोटापाण्यासाठी मोठाल्या शहरात जाऊ लागला. मनिऑर्डरवर जगणारा प्रांत अशी कोकणची ओळख खरंतर तेव्हापासूनची ! या चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. गावागावातल्या जत्रा, मे महिन्याची सुट्टी, शिमगा-गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी पिढ्यानपिढ्या कोकणात येत असतात. नोकरीत वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा कोकणात जाण्यासाठी राखून ठेवणारी पिढी आजही कार्यरत आहे. हा या मातीचाच गुण म्हणावयास हवा !

गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण. एकवेळ वर्षभर नाही जमलं तरी चालेलं पण गणपतीत कोकण कमिंग मस्टच ! कोकणात गणपतीची शाळाअसते. मुंबईत कारखाना तर पुण्यात चित्रशाळाअसते. गणपतीला घरी येणाऱ्या चाकरमान्याचे सामान म्हणजे ऐश्वर्य ! काय-काय असतं त्याच्यात ! जणू सगळा संसारच सोबतीला आणलेला असतो. कोकणातील माणसांची श्रद्धाही जाज्ज्वल्य आहे. इथल्या ग्रामदेवतांचे लोकजीवनाशी असलेलं नातं भक्तीशी मर्यादित नाही. इथली दैवतं लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलेली आहेत. ही देवस्थाने आजही सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसंग्रहाची केंद्रे आहेत. देवाला गाऱ्हाण घालणं, वर्षातून एकदा किमान शिमग्याला देवतेची ओटी भरणं, गावरहाटीचे नियम पाळणं सारं विलक्षण आहे. इथली दैवते माणसांशी बोलतात, संवादही साधतात ! संवादाची प्रक्रिया सुशिक्षित माणसांना धर्मभोळेपणाची, अंधश्रद्धेची वाटत असेलही ! पण गावात उभे आयुष्य घालविलेल्या माणसांना त्याच्या खडतर दैनंदिन जीवनात प्रसंगी संवादाची हीच प्रक्रिया आधार देणारी वाटते. हे एकविसाव्या शतकातील वास्तव आहे. इथल्या मातीशी दूरदेशीच्या माणसाचं जे नातं आजही टिकून आहे, त्यामागे ही सुद्धा काही कारणे आहेत. गूढरम्य गोष्टींचे भांडार असलेला कोकण भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भूतही संकल्पना खरी की खोटी ? हा वेगळा विषय आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा इथल्या मातीवर पगडा आहे, हे नक्की ! जगातील पुढारलेल्या अनेक देशांच्या प्राचीन दंतकथात डोकावल्यावरही आपल्याला हेच जाणवते.

पावसाळ्यातल्या कोकणाचं आमच्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळ स्थान आहे. कोकणातला पाऊस आजतागायत आम्ही तरी शांतपणे आलेला पाहिला नाही. ढगांच्या प्रचंड आवाजात गर्जना करीत तो येतो. तेव्हाचा गंधवती पृथ्वीचा नाकात शिरणारा सुगंध ‘मातीशी आपलं नातं’ सांगतो. हा सुगंध कोकणी कर्तृत्वाला मातीचं ऋण फेडण्यासाठी तेव्हाही उद्युक्त करायचा, आजही करतोय. वचन दिल्याप्रमाणे येणाऱ्या या पावसाच्या तयारीसाठी अवघ्या कोकणची लगबग चालू असते. पावसात कुठं पाणी गळू नये म्हणून घरावरची कौलं परतणं, पत्रे सरळ करणं, अंगणातला माटव (छत) काढून ठेवणं, नित्य चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं शाकारलेल्या पडवीत आणणं अशी बरीचं कामं याकाळात सुरु असतात. कोकणी माणसाच्या पायांना ह्या दिवसात थारा नसतो. अर्थात तसा तो पूर्वीही नसायचा. नशीबानं, जन्मानं आणि कर्मानं आम्ही कोकणातील आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत. शालेय सहलींचे क्वचित प्रसंग वगळले तर बारावी होईतोपर्यंत या जिल्ह्याच्या बाहेर आमचं पाऊल पडल्याचंही आम्हांला स्मरत नाही. दापोली तालुक्यातलं केळशी आमचं मूळ गाव ! जन्म आमचा तळवडे-लांज्याचा ! लहानपणापासूनचं वास्तव्य चिपळूणात ! अगदी काल-परवापर्यंतचं आमचं सुट्टीतलं बालपण मातीच्याचं घरात गेलंय. कोकण आमच्याही जगण्याचा भाग आहे. बालपणी शाळेच्या सुट्टीच्या दिवसात उन्हाळी सुट्टीत आजोळी तर दिवाळीत मूळगावी आमचा मुक्काम ठरलेला. त्या लहानपणी या सुट्टीत आमच्याही पायांना अजिबात थारा नसायचा. आमचा संबंध कामाशी कमी नि भटकण्याशी जास्त असायचा. अशातच कधीतरी आभाळ आवाजू लागायचं. खेळून सुटी झालेली पायाखालची लाल माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. झाडं हलायची. सारं आभाळ पाखरांचं व्हायचं. भर दिवसा काळोख दाटून आल्यावर जाम मज्जा यायची. तेव्हा लाईट नव्हती. काळोख दाटून आला की आजी / काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे घरभर लावायची. कळकट्ट लोखंडी नळीने चूल फुंकायची. होणारा आवाज आम्हाला प्रचंड आवडायचा. चुलीवरचा गरम कोरा (बिना दुधाचा) चहा, यथेच्छ बरसणारा पाऊस, रातकिड्यांचे आवाज, जवळच्या पाणवठयावर, नळाजवळ येणारे बेडकांचे आवाज, रात्रीच्या जेवणानंतर रॉकेलच्या दिव्याजवळ बसून रंगणाऱ्या गप्पा, मारताना कमालीचं सुरक्षित वाटायचं आयुष्य ! किती वर्णावा या मातीतल्या आठवणींचा तो महिमा ?

भगवान श्रीपरशुरामानं समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली. यावर आमची श्रद्धा आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर झालेल्या संशोधनाद्वारे या भागात बऱ्याच ठिकाणी पूर्वी समुद्र खूप आतपर्यंत होता आणि पुढे तो मागे हटला याचे अनेक भूपुरातत्त्वीय पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. भडोच (भृगुकच्छ), नालासोपारा (शूर्पारक) येथील समुद्रकिनाऱ्यांबाबतची संशोधने हेच सांगत आहेत. गेली सतत १५/१८ वर्षे आम्ही या मातीत पनवेल ते पणजी भटकतो आहोत. आज एका दमात अख्ख कोकण फिरताना प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या अनेक जुन्या खुणा हरवत जाताना पाहातो आहोत. मागच्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणातल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत आलाय ! जुन्या कौलारू देवळांच्या जागी भव्य मंदिर उभी राहिलीत. बाकी सारं ठीक मानलं तरी आधुनिक जीर्णोद्धार आमच्यासारख्या इतिहास, पर्यटन, प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासकाला पटणारा नाही. कोकणातल्या लालमातीतील वास्तुसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्ही ती मोडीत काढू पाहतो आहोत. इथल्या आरोग्याला पूरक असणारे तांदूळ, उडीद, नाचणी, कुळीथ, शेवग्याच्या शेंगा, जांभूळ, भोपळा, काकडी, करांदे आज गायब होत आहेत. कोकणची भौतिक प्रगती, भौगोलिक विविधता आणि इथली संस्कृती ह्याची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आम्हां कोकणवासियांसमोर आहे.

कोकण बदलतंय. माणसं बदललीत. मागच्या पिढीने अनुभवलेलं कोकणपुढच्या पिढीला बघायला मिळेल का ? प्रश्न आहे. कौलारू घर, घराबाहेरची पडवी, झोपाळा, पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपा मारलेल्या खिडक्या, छानसं माजघर, जातं, सारवलेली चूल, स्वच्छ अंगण, तुळस, तुळशीतला दिवा, गुरांचा गोठा, साठवून ठेवलेलं गवत, वासरू, कौलारू देऊळ, देवळातला गुरव, मानाचे दगड, देवळातले देव... महापुरुष, वाघजाई, सोळजाई, महाकाली, व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर, नाटेश्वर, देवाची राई (देवराई), वेशीवर दिला जाणारा नारळ, शिमग्यातली सोंगं, ढोल-ताशा, निशाण, ग्रामदेवतेच्या पालख्या, घराघरातला देवचार, वाडवडिलांच्या पुण्याईची जाणीव, मोहरत जाणारा आंबा, फणस, आंब्याची साठं, माडा-पोफळीची झाडं, बकुळी, करवंदाची जाळी, कण्हेरी, इथला मांसाहार... सरंगा, पापलेट, सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी, चुलीवर भाजलेला बांगडा, भाकरी, मिरचीचा ठेचा, उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठला, फणसा-केळफुलाची भाजी, मऊ गुरगुरीत भात, कैरी घातलेली डाळ, घावणे, उसळी, मुसळधार पाऊस, नदीला येणारे पूर, पुलाखालून वाहणारा व्हाळ, गणपती बाप्पा, त्याची मंडपी, गावरान सजावट, मोदक, रात्रीच्या डबलबाऱ्या, दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या, कंदिल, इथली होळी, होळीतल्या बोंबा, ग्रामदेवतांच्या जत्रा, लोककला, समुद्रातून हाती लागलेली रापण, तिला ओढणारे तांडेल, बघ्यांचा गलका असं सारं बरचं काही उद्याच्या पिढीला पाहायला मिळावं यासाठी कोकणातील काही माणसं आजही जीव तोडून धडपडतायतं. सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर अग्रेसरहोऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. उद्याच्या कोकणात मुंबई ते गोवा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग, रो-रो ट्रेन सर्व्हिस, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेसेवा, वेंगुर्ल्याच्याजवळचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, चिपी येथील विमानतळ, सागरी महामार्ग यांमुळे परकीय आणि भारतीय पर्यटकांच्या नजरा गोव्यावरून कोकणाकडे वळताहेत. हे सारं कोकणचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.

बड्या शहरांच्या बजबजपुरीत जगणारा माणूस आपल्या हिरव्यागार कोकणात आला की परत जाईपर्यंत कोकण डोळ्यांत साठवून घेत असतो. परतताना त्याच्या गाडीत, खांद्यावरल्या पिशवीत सारं कोकण भरलेलं असतं. बसस्टँडवर, स्टेशनवर जेव्हा तो घरच्यांच्या हातात आपला निरोपाचा आणि प्रेमाचा हात ठेवतो तेव्हाचं दृश्य तर खास ठेवणीतलं असतं. खिडकीतून बाहेर काढलेल्या हातातून एकमेकांची बोट जेव्हा सुटतात तेव्हा ती इथल्या मातीशी असलेल्या नात्यांची खरी जाणीव करून देतात. बदलत्या कोकणात त्याचं प्रमाण आज कमी झालं असेलही ! पण जाणीवांचा ओलावा कायम आहे. स्वतःला कोकणी म्हणवणाऱ्या, या मातीशी आपलं नातं सांगणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या, या मातीचं ऋण मानणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीशी असलेल्या आंतरिक उमाळ्यापोटी या जाणीवा जपायलाच हव्यात. 
 
धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५,
जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८         
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...