गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

चांगभलं करणारं ‘पवतं’ !

    श्रावण शुक्ल त्रयोदशीचा दिवस होता. चार वर्षांपूर्वी (२०१६) आम्ही चिपळूण तालुक्यातील पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानच्या देवराईमध्ये वृक्षारोपण करण्याकरिता हरडा, नीव, गुलमोहर, सोनचाफा आदी जातींचे साठेक वृक्ष घेऊन गेलो होतो. तेव्हा मंदिरात ग्रामदेवतेला ‘पवतं’ अर्पण करून उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे ते पवतं बांधण्याचा कार्यक्रम सुरु होत होता. आमच्यासमोर ग्रामदेवतेला गुरवांनी ‘पवतं’ अर्पण करून, 'जसं हे ‘पवतं’ तुला घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ असं साकडं घातलं. ग्रामस्थांच्या हाती ग्रामदेवतेच्या नावाची पवत्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं. उपस्थित ग्रामस्थांनी एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलेलंही आम्ही ऐकलं. कुतूहलाने तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच हातावर ‘पवतं’ बांधलं. तेव्हापासून मनात ‘पवतं’ घर करून बसलं होतं. मानवी जीवनाचं ‘चांगभलं’ करलं अशी श्रद्धा असलेल्या ‘पवतं’विषयी लक्षात आलेलं काही म्हणूनच लिहावसं वाटलं.

कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावात ‘पवतं’ बांधण्याची परंपरा आजही सुरु आहे. त्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आपल्याला भेटतात. कोकणात ग्रामदेवतेला ‘पवतं’ बांधण्याचा कार्यक्रम सर्वत्र नागपंचमी ते नारळी पोर्णिमेच्या दरम्यान होत असावा. पारंपरिक महाराष्ट्रीय लोकगीतातील स्त्रीधन समजल्या जाणाऱ्या उखाण्यात, ‘पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेतें दोरं, आलं शिलंगान म्होरं’ अशा शब्दांनी पवतांना गौरविलं गेलं आहे. वरील उखाण्यातील उल्लेखानुसार पवतं पंचमीचं असलं तरी विविध ठिकाणी ते स्थानिक सोयीनुसार दिवस ठरवून बांधलं जाण्याची परंपरा आहे. ‘पवतं’ बांधण्याची आम्ही पाहिलेली पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानची परंपरा ही श्रावण शुक्ल त्रयोदशीची आहे. फारपूर्वी या गावच्या खोत मंडळींवर हे पवतं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असायची. खोतांच्या घरी बसून कोष्टी (विणकर) समाजाचे मानकरी पवतं विणत असत. ही पद्धत आता बंद झाली. तेव्हा ग्रामदेवतेला पवतं अर्पण करण्याच्या आदल्या दिवशी देवाला ‘जागर’ व्हायचा. ‘जागर’ हा ग्रामदेवतेला रात्रभर जागवायचा कार्यक्रम होय. ही आदली रात्र जागविल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे देवाला रूपे (मुकुट) लावून सजवलं जायचं. या दिवसाला ‘जागर पोर्णिमा’ म्हणत. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला, नारळी पौर्णिमेच्या दोन दिवसपूर्व हे पवतं बांधलं जायचं. आजही असंच बांधलं जातं. फक्त रात्र जागविली जात नाही.

सध्याच्या काळात पवतं बनविण्याचा दोरा आणण्यासाठी कोष्टी समाजाच्या मानकऱ्यांना  गावाकडून पैसे दिले जातात. श्रीबाजी वाघंबर देवस्थान ग्रामदेवतेच्या पारंपरिक पद्धतीनुसार वर्षाच्या एकूण दिवसांइतकं बारीक पांढऱ्या दोऱ्याचं ढोपरांवर केलेलं ३६५ सलग फेऱ्यांचं एक अशी ७ पवतं (श्रीबाजी वाघंबर, श्रीसोमेश्वर, श्रीवाघजाई, श्रीकेदार, श्रीनवलाई, श्रीपावनाई, श्री चोपडाई) ७ देवतांसाठी कोष्टी समाजाकडून तयार करून घेतली जातात. ही तयार केलेली पवतं ग्रामदेवतेला अर्पण करण्यापूर्वी ‘गुरव’ विधिवत पूजा करतात. त्यानंतर गावाच्या उपस्थित खोतांकडून, ‘पवतं घालायला घ्यायची काय ?’ असा हुकूम मागितला जातो. हुकूम काढण्याची जबाबदारी अर्थात गुरवांची असते. ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करताना गुरवांच्या हातात धुपारती असते. त्यांच्या मागून पालवण-ढोक्रवली गावचे खोत, गावकर आदि ४/५ मंडळी ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करतात. देवाला अर्पण करून झालं की पवतं मंदिराच्या खांबाला, इमारतीला बांधलं जातं. उपस्थित सर्वांना बांधण्यासाठी स्वतंत्र पवतं आणलेलं असतं. ते घातलं जातं. गावकर मंडळी उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे पवतं बांधतात. गुरव देवाची आरती करतात. सोबत परिटांच्या घरचा एक माणूस दिवा दाखवायला असतो. एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलं जातं. ग्रामदेवतेला साकडं घातलं जातं. ‘आज जसं तुला हे पवतं घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ म्हणून देवाच्या नावाची दोऱ्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं जातं. पवत्याचा हा दोरा काही ग्रामस्थांच्या हातात वर्षभर पाहायला मिळतो. नवा बांधायची वेळ आल्यावर जुना काढला जातो. हे पवतं हातात किंवा गळ्यातही बांधलं जातं. त्यादिवशी घरपट आलेला माणूस आपल्या घरातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे पवतं घेऊन जातो. पूर्वी गावचे गुरव पवतं वाटत घरपट फिरायचे. आजही कोकणातल्या काही गावात ही परंपरा कायम आहे. परंतु प्रस्तुतच्या ढोक्रवली आणि पालवण ग्रामदेवतेच्या मंदिरात नाही. पूर्वी हे मंदिर तीन गावचं होतं. इथे देवराई होती. तेव्हा या गावांना निवाचा कोंड (निवळी), पालाचा कोंड (पालवण) आणि ढोकाचा कोंड (ढोक्रवली) असं म्हटलं जायचं. कालांतराने निवळकरांनी आपलं श्रीनवलाई श्रीपावणाई ग्रामदेवतेचं स्वतंत्र मंदिर उभारलं. तर ग्रामदेवतेला पवतं बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मंदिरातला देव भंडारायला घेतला जातो. देवाची वस्त्रे आणि मुकुट उतरवून पेटीत पूर्ववत ठेवली जातात. ही पेटी गावकरांकडे पेटी सुपूर्द केली जाते. पूर्वी २/३ गावच्या ग्रामदेवतांची जबाबदारी असलेल्या गुरवांचा गळा यादिवशी पवतांनी भरून जायचा. मंदिरात न येऊ शकलेली मंडळी, लहान-लहान मुलं पवतं घ्यायला त्यांच्याजवळ यायची. गावोगावी हाती ग्रामदेवतेचं पवतं बांधलं गेल्यावर नारळी पौर्णिमेचं ‘रक्षाबंधन’ संपन्न व्हायचं, आजही होत असतं.

गेल्यावर्षी (२०२०) जिंतूरच्या (परभणी) प्रा. जी. एन. गडदे यांची नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ संबोधणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर आमच्या वाचनात आली आणि पुन्हा ‘पवतं’ आठवलं. मराठवाड्याच्या ग्रामीण भागात आजही जुन्या पिढीतील लोकं नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ म्हणतात. आजच्या पिढीला हा शब्द फारसा परिचित नाही. या दिवशी घरातल्या सर्वांच्या हाती पवतं बांधलं जातं. मराठवाड्यात ठिकाणी यालाच राखी म्हणूनही संबोधलं जातं. याच दिवसात कापसाला पातं लागायला सुरुवात होत असते. ते गळून पडण्याची शक्यता असते म्हणून एक दिवस शेतीची कामं बंद असतात. महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागात ५० वर्षांपूर्वी ‘राखी पोर्णिमा’ हा शब्दच बहुदा रूढ नसावा. कदाचित गावोगावी दूरदर्शन आल्यावर हे शब्द पोहोचले असा एक मतप्रवाह आहे. तेव्हा गावचे जंगम किंवा पुजारी भिक्षा मागताना सोबत ‘पवतं’ आणत. घरोघरी पुरुष, मुलांना बांधत. हे ‘पवतं’ घरच्या देवासह सायकल, गाडी, मशीन, दुकानातील तराजूंसह व्यवसायातील अवजारांना बांधलं जायचं. काही भागात नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर काढलेल्या नागोबांना हळदीने पिवळे केलेले दोरे चिकटवले जायचे. दुसऱ्या दिवशी तेच दोरे ‘पवतं’ म्हणून हातावर बांधले जात. काही भागात पावसाळ्यात खरिपाची पेरणी संपल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये बैलपोळ्यावेळी बैलांच्या शिंगानाही पवतं बांधली जायची. नारळी पौर्णिमेला, आजही महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबालाही पवतं अर्पण केलं जातं. त्यानंतर पवित्र रक्षक धागा (पवतं) मिळवण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. राज्यातल्या काही ठिकाणी पूर्वी दानवीर महाबली राजा बळी यांना जे बांधलं गेलं तेच ‘रक्षासूत्र’ आज तुम्हाला बांधत आहे अशा अर्थाचा, 'येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:। हा मंत्र म्हणून पवतं बांधलं जात होतं.

चार वर्षांपूर्वी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यासह आम्ही जेव्हा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी ढोक्रवलीला गेलो तेव्हा आम्हाला ही ‘पवतं’ परंपरा पाहायला मिळाली. याबाबत लिहायचं ठरवल्यावर आम्ही पालवण मराठवाडी येथील सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे ज्येष्ठ ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांच्यासह नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक आणि त्यांचे चिरंजीव विकास महाडिक यांच्याशी चर्चा केली. अलिकडे सोशल मिडीयावर, ‘गणेशपूजेप्रसंगी बाप्पाला घालण्यात येणारं कापसाचं वस्त्र (पवतं) निर्माल्यात न टाकता भिजणार नाही अशा ठिकाणी अंगणातील एखाद्या झाडाला अडकवून ठेवा. याचा उपयोग पक्षी घरटे बांधताना करतात.’ अशा आशयाची पोस्ट वाचनात आली होती. तेव्हा आम्हाला परत ‘पवतं’ भेटलेलं. या कल्पनेचं अनेकांनी अनुकरण केलं. कापसाच्या पवतांचा पर्यावरणीय उपयोग साध्य करत एक पाऊल पुढं सरकलेल्या या ‘पवतं’ परंपरेनं आम्हाला लिहितं केलं.

 

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...