शनिवार, ८ एप्रिल, २०१७

अण्णांचे छांदोग्योपनिषद !

तब्बल नऊ ताम्रपटांचे संशोधन करून कोकणच्या इतिहासाला प्राचीनतेचे संदर्भ बहाल करणारे दाभोळचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी आपल्या अनुभवसमृद्ध लेखणीतून साकारलेल्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून या संग्राह्यमूल्य असलेल्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वाचकांच्या हस्ते येत्या रविवारी (दिनांक ९ एप्रिल रोजी) सायंकाळी ४.०० वाजता शहरातील राधाताई लाड सभागृहात संपन्न झाले. या ३०० पानी पुस्तकात एकूण २१ प्रकरणे आहेत. पुस्तकाची निर्मिती आणि त्यातील ३ प्रकरणांचे लेखन पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले आहे. पुस्तकात समाविष्ट असलेल्या प्रकरणांतील अण्णांच्या छंदांची माहिती देणारे हे प्रकरण देत आहोत.


अण्णांचे छांदोग्योपनिषद !

संत कबीर यांचा एक दोहा प्रसिद्ध आहे,
गोधन, गजधन, बाजिधन और रतनधन खान । जब आवो संतोषधन, सबधन धुरि समान ।।

अर्थात आपल्याकडे गाई, हत्ती आणि घोडे यांचे धन असो किंवा रत्नांची संपत्ती असो, परंतु जेव्हा आपल्याकडे समाधाननावाचं धन येतं तेव्हा, ही सारी संपत्ती आपल्याला एखाद्या धुराप्रमाणे वाटते आणि हे समाधान नावाचं धन समृद्ध आयुष्यात आपल्याला आपले छंद बहाल करतात. आपली आवड हीच आपल्या जीवनाचा मुख्य हेतू बनवली तर आपल्याला समाधानपूर्वक समृद्ध आणि सर्वार्थाने यशस्वी आयुष्य जगताउपभोगता येतं, याचंमूर्तीमंत उदाहरण म्हणजे अपरान्ताचा प्रवासी म्हणून गौरविलेले विविधांगी व्यासंगी छंदवेडे व्यक्तिमत्त्व आदरणीय अण्णासाहेब शिरगावकर होत.

आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजलेल्या अण्णांनी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकला. जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्‍या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगण्याचं त्यांनी ठरविलं. चारचौघांसारखे अमुक एवढे पैसे मिळविलेच पाहिजेत, अमुकच प्रकारचे घर हवे, गाडी हवी, एकूणात सतत भौतिक सुखाच्या जगात पुढे जात राहिले पाहिजे ही सार्वत्रिक मानसिकता जुगारून अण्णांनी आपल्या आयुष्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला. यात त्यांनी जोपासलेल्या छंदांचे फार मोठे योगदान आहे. वास्तविकतः मनुष्य हा निर्मितीशील प्राणी आहे. निर्मितीची इच्छा मानवी मनात निर्माण होणे हा छंदाचा उगम असतो. सर्जनशीलता हे कलागुण निसर्गाने प्रत्येकालाच दिलेले आहेत. परंतु अनेकविध कारणांनी मनुष्यप्राणी नको त्या गोष्टींच्या मागे आयुष्यभर पळत राहात आपल्यातील ही नैसर्गिक ऊर्मी दाबून टाकत असतो. अण्णांच्या एकूण आयुष्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी या ऊर्मिला तितकाच जबदरस्त न्याय दिल्याचे जाणवते.

अगदी लहानपणी साधारणतः ६-७ वर्षांचे असल्यापासून अण्णांना रंगीत दोरे, पेन्सिली, रंगीत काचांचे तुकडे, पाखरांची पिसे असे काहीना काही परंतु वेगळे जमविण्याचे वेड लागले. त्यानंतरच्या कालखंडात प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांच्या संपर्कामुळे त्यांच्या सोबतच्या फिरस्तीतून अण्णांच्या काहीना काही जमविण्याच्या छंदाला, प्राचीन इतिहासाच्या संशोधनाला लागणारी पूरक साधने जमविण्याचे  व्यापक स्वरूप प्राप्त झाले.'सुंदर ते वेचावे, सुंदर करूनी मांडावेअसा ध्यासच अण्णांना लागला. आयुष्यातील तत्कालीन सामाजिक आणि राजकीय जीवनातून उरलेल्या वेळात अण्णांनी आपला वस्तुसंग्रह वाढवत नेला.

छंद म्हणजे आपली स्वतःची लय, आपला स्वतःचा शोध, आपला छंद हीच खरेतर आपली ओळख असते. फावल्या वेळेत, रिकाम्या वेळेत करावयाचा विरंगुळा म्हणजे खरेतर छंद असू नये. छंद ही आयुष्यात करावयाची मुख्य गोष्ट आहे हे आपल्या मनावर बिंबविण्यासाठी अण्णांचं आयुष्य आवर्जून अभ्यासायला हवं. मनुष्याला पोट वगैरे भरण्यासाठी नोकरी, शिक्षण, व्यवसाय वगैरे सारं करावंच लागतं, परंतु मनुष्य म्हणून मिळणारी खरी ओळख, सापडणारा जगण्याचा खरा अर्थ आणि समाधान हे निव्वळ छंदातूनच गवसतं. अनेक प्रकारच्या छंदांनी अण्णांच्या आयुष्यातील खूप मोठी जागा व्यापली आहे. जीवन जगण्याची वास्तविक गरज असल्याप्रमाणे अण्णांच्या आयुष्यात हे सारं घडत गेलं असावं, असं वाटावं इतका निर्मितीचा आनंद यातून अण्णांनी मिळविला आहे. आपल्या छंदांमधून आपली अभिरूची, आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, मानसिक स्तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सहज ध्यानी येतो. दैनंदिन कामाचे विचार डोक्यातून बाजूला सारण्यासाठी, आयुष्यातील कंटाळा कमी करण्यासाठी छंद माणसाला नेहमीच मदत करीत राहिले आहेत.घड्याळाच्या काट्याप्रमाणे कार्यरत मानवी जीवनात छंद एखाद्या औषधासारखं काम करतो’, हे अण्णांचं वाक्य म्हणूनच महत्त्वाचं वाटतं. मानवी आयुष्यातील ओळख, माणसातील माणूसपण टिकविण्याचे काम, स्वतःला व्यक्त होऊ देण्याची संधी, जगण्यावर प्रेम करायला लावणारी भावना, मन रमविण्याची कला, स्वतःच्या जीवनाचा, निसर्गाचा, मानवी मनाचा शोध घेण्याची कला आणि जगण्याची नवी दृष्टी मानवाला त्याच्या छंदातून मिळत असते. आपल्या प्राचीन कोकणातील तितकाच प्राचीनतम इतिहास विविध ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून उलगडवून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे आणि कोकणचा इतिहास वस्तूरूपाने जीवंत करून हजारो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणारे अण्णा म्हणूनच  कोकणच्या सर्वांगीण विकासातील सोनेरी पान ठरले आहेत.

पुराण व इतिहास वस्तूसंग्रह

ज्या छंदामुळे अण्णांना इतिहास संशोधक म्हणून जगभरात मानसन्मान मिळाले, तो छंद पुराण व इतिहास वस्तूसंग्रहाचा होय. विविध प्रकारची नाणी, नऊ ताम्रपट, शिलालेख, सनदा, पत्रे, हस्तलिखिते, तोफा, बंदुका, पिस्तुले, भाले, परशू, चिलखत, तलवारी, कट्यार, जंबीये, ढाली, दांटपट्टे, मूर्ती, तोफगोळे, काष्टशिल्पे, मूर्ती, कुलपे, भांडी आणिगुहालेण्यांचा शोध यांचा यात समावेश होतो. या सार्‍यांचा, प्राचीन कोकणी मानवी जीवनाचे आणि समाजाचे अध्ययन करून कोकणचा इतिहास नव्याने मांडण्यात त्यांना खूप उपयोग झालेला आहे. कचर्‍यातून कलाकृती हा सुद्धा एक छंदच आहे. रिकामे बॉक्स, पॅकींग पेपर्स, रिबीन्स, यांचा उपयोग यात केला जातो. कोकणातील प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या विविध अवशेषांचा शोध घेऊन त्यांचे निरीक्षण करून त्या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे इतिहासातील संदर्भांसह विश्लेषण करून कोकणच्या इतिहासाला कलाटणी देण्याचे जबदरस्त काम अण्णांनी केले आहे. अण्णांच्या प्रयत्नामुळे उजेडात आलेली पन्हाळेदूर्गची लेणी कोणत्याही प्रदेशाला स्वतःविषयी गर्व वाटावा इतकी महत्त्वाची आहेत. विशेष म्हणजे 29 लेण्यांच्या या समूहात वैदिक, जैन आणि बौद्ध या तीनही धर्माच्या संस्कृतींचा मिलाफ आढळतो. कोकणातील मानवज्ञातीचा इतिहास नव्याने तपासण्याची ऊर्मी संशोधकांमध्ये जागविण्याचे यशस्वी काम अण्णांच्या याच छंदाने केले आहे. अण्णांचा नाणी गोळा करण्याचा छंद हा सुद्धा मानवी जीवनात एक विस्तृत अभ्यास केले जाणारे शास्त्र म्हणून ओळखला जातो. शिल्प, वास्तू आणि चित्र या तीनही कलांचा अभ्यास मूर्तीशास्त्रामध्ये केला जातो. शिल्पकला ही याच मूर्तिशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा उलगडा अण्णांनी हे सारेच छंद जोपासून वृद्धिंगत करून आपल्यासमोर करून ठेवला आहे. कोकणचा सांस्कृतिक वारसा इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून शोधून काढण्याचे फार मोठे काम यातून घडले आहे. या कामाचे स्वतःचे असे जबरदस्त मोठे आणि व्यापक महत्त्व आहे.

वास्तविक पुरातन वस्तूंचा, जुन्या नाण्यांचा संग्रह करायचा म्हणजे माणूस श्रीमंत हवा. कारण हा छंद खूप खर्चिक आणि किचकट छंद आहे. परंतु या सार्‍यावर समाजकार्याची आवड असलेल्या अण्णांनी पद्धतशीर मात केली. सन १९६२  साली अण्णा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जनसंघाच्या तिकिटावरती उभे राहिले. त्यांच्या मतदार संघात पन्हाळेकाझीनावाचे गाव होते. ते बदलून पन्हाळेदुर्गकरावे अशी स्थानिक जनतेची मागणी होती. अण्णांच्या विनंतीवरून आमदार रामभाऊ म्हाळगी यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. परंतु तो मान्य होण्यासाठी ठोस पुराव्याची गरज होती. या प्रयत्नात असताना अण्णांना केशवराव जाधव नावाच्या इसमाच्या घरी पूजेत असलेला ताम्रपट अनेक खटपटींनंतर मिळाला. या ताम्रपटाचे वाचन केल्यानंतर,‘पन्हाळेकाझी हे गाव अकराव्या शतकातील शिलाहार राज्याची पद्मनालदुर्ग नावाची राजधानी होती. कालांतराने अपभ्रंश होऊन ते नाव पन्हाळेदुर्ग झाले. साधारणतः १५०  वर्षांपूर्वी काझी नावाच्या मुस्लिम जमीनदाराच्या नावाने गावाचे नाव बदलले गेलेही सारी माहिती उजेडात आली आणि अण्णांच्या छंदाला ऐतिहासिक वळण लागले. पन्हाळेदुर्ग लेणी अजिंठा वेरूळनंतरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लेणी समूह आहे. ही लेणी प्रकाशात यावी म्हणून अण्णांनी खूप परिश्रम घेतले आहेत. यानंतरच्या कालखंडात प्रा. डॉ. शोभना गोखले, गो. नी. दांडेकर, डॉ. राजगुरू यांचेसह पत्नी कै. नंदिनी काकी यांनी दिलेल्या प्रोत्साहनपर सततच्या पाठिंब्याने अण्णांचा छंद आणि संग्रह वाढत गेला. त्यांना ऐतिहासिक गोष्टींकडे पाहाण्याची दृष्टी गवसली.

नाणीसंग्रह

जगातील विविध ६० देशातील सात/आठ हजार नाणी आणि भारतातील एक/दोन हजारांवर जुन्या नाण्यांचा संग्रह अण्णांकडे झाला. परदेशात नेव्हीत कार्यरत असलेले कोकणी मुस्लिम आपल्या खिशातील जुनी नाणी आवर्जून अण्णांचे हवाली करीत. यातूनच अण्णांचा हा छंद बहरला. ब्रिटीशकाळातील गेल्या २०० वर्षातील व पंचमार्क, चालुक्य, शिलाहारकालीन नाणीही त्यांचे संग्रही आहेत. न्यू मॅसमेटिक सोसायटी ऑफ इंडिया, रघुवीर पै, ब्रह्मानंद देशपांडे आदि संस्था-अभ्यासकांना अण्णांनी आपला नाणेसंग्रह भेट दिला आहे. या नाण्यांचा व्यापार, स्मगलिंग आणि जागतिक मार्केट खूप मोठे असल्याचे त्यांना माहिती असतानाही पैशाचा मोह बाजूला सारून अण्णांनी हे दान केले आहे. अण्णांनी जमविलेल्या नाण्यांचाही मोठा इतिहास आहे. नाणी मिळविण्यासाठी अण्णांना खूप प्रकारच्या हिकमती कराव्या लागल्या. कोकणात नाणी देवघरात पूजेत असत. काहीवेळा देवाच्या पालख्या घरोघरी फिरतात तेव्हा जुनी नाणी लोक देवाला अर्पण करीत. अशातली काही नाणी अण्णांना मिळविण्यासाठी प्रसंगी देवाला कौलही लावावा लागला आहे. काही लोकांच्या पूजेत नाणी बाहेर काढायचा मुहूर्त ठरलेला असे. एका गृहस्थाच्या पूजेत असलेले नाणे पाहिल्यानंतर त्यावरील मुद्रा पाहून अण्णांनी, ‘ही औरंगजेबाची मुद्रा आहेअसे सांगताच तो गृहस्थ स्वतःवरच चिडल्याचा अनुभव अण्णांनी घेतला आहे. अण्णा वास्तव्यास असलेल्या दाभोळ गावाला सुमारे साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. अठराशे वर्षांपूर्वीच्या टॉलेमीच्या सर्वांत जुन्या नकाशात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळ या एकाच बंदराचा उल्लेख आहे. यास्तव दाभोळ परिसरात अनेक ठिकाणच्या उत्खननातून अण्णांना नाणी संग्रह करता आला आहे.

ताम्रपट संशोधन

फारसे काही हाताशी नसताना सामान्य कुटुंबात जन्मलेल्या किमान अक्षर ओळख असलेल्या एखाद्या गृहस्थाने तब्बल ९ ताम्रपट शोधावेत हे आजतागायत संपूर्ण भारत वर्षातील वैयक्तिक कारकीर्द स्तरावरील एक आश्चर्य आहे. आणि ते आश्चर्य गेली अनेक वर्षे अण्णा जगत आहेत. कारण ताम्रपट मिळविणे हे खूपच जिकिरीचे काम असते. एखाद्या व्यक्तीकडे ताम्रपट असला तरी तो दाखवण्यासाठी लोक तयार नसतात. लोक त्याला देवाचा पत्रा असे संबोधतात. त्यावर गुप्तधन लिहिलेले आहे, असा अनेकांचा समज असतो. यास्तव जो हा ताम्रपट प्रथम वाचेल त्याला हे गुप्तधन मिळेल अशीच त्यांना भीती असते. दुसरे म्हणजे सरकार जप्त करेल ही भीती असते. म्हणून ताम्रपट मिळविण्यात नाना प्रकारच्या अडचणी येतात. तरीही अण्णांनी शिलाहार, वाकाटक, चालूक्य, आदिलशाही, निजामशाही आदि राजवंशातील ताम्रपट मिळविले.

ग्रंथसंग्रह आणि वाचनवेड

सुमारे १५०  वर्षांहून अधिक जुनी पुस्तके, संशोधनात्मक दुर्मीळ ग्रंथ, समाजसेवा, नृत्य, नाट्य, चित्रकला आदि विशेष दुर्मीळ ग्रंथ, स्मरणिका, वृत्तपत्रांचे गत १०० वर्षातील दुर्मीळ अंक असा जवळपास २० हजारांवर ग्रंथांचा संग्रह अण्णांच्या ठायी आहे. यात २ ते ५ किलो वजनाची कॉफीटेबल बुक, नाणक शास्त्रावरील सुमारे ५०, मूर्तीकला शास्त्रावरील ५ दुर्मीळ पुस्तके, कोशवाड्‌.मय, आर. के. लक्ष्मण आदि मान्यवरांचे कार्टून बुक्स्‌, एरियल फोटोग्राफी बुक्स्, विविध विनोदी अंक, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरील सुमारे ५०, पेशव्यांवरील १०, गडकोट किल्ल्यांवरील ५० आणि देशातील विविध म्युझियम संदर्भात माहिती देणारी पुस्तकांचा समावेश आहे. अण्णांना आवर्जून भेटायला येणारे स्नेही, मान्यवर, इतिहासाचे अभ्यासक, साहित्यप्रेमी वाचक, वाचनालये तसेच विविध लग्नादि सोहळ्यातही अण्णा सर्वांनाच ग्रंथभेट अर्पण करीत आले आहेत. भेटी देण्याच्या त्यांच्या या कामातून परिसरात जवळपास १० वाचनालये स्थापन झाली आहेत.

कात्रणसंग्रह

वृत्तपत्रातून येणारे इतिहासविषयक, साहित्यविषयक, कोकणासंबंधी विविध माहितीपूर्ण लेखांची कात्रणे काढून ती त्या-त्या विषयातील अभ्यासकांना, वाचकांना पाठविणे हा सुद्धा अण्णांचा छंद असून अण्णांच्या या वयातही आमच्यासारख्या अनेक अभ्यासकांना याचा लाभ होतो आहे.  महत्त्वाच्या बातम्या अण्णांनी फाईलबंद करून ठेवल्या आहेत. आजही वृद्धापकाळात रोज सकाळी चहा आणि पेपर वाचनानंतरच त्यांचा हा छंदोपक्रम सुरू होतो.

धूम्रपान  साहित्य

देशोदेशींचे विविध माचीसचे ४५० बॉक्स, देखणे आणि तितकेच मौल्यवान १०० लायटर्स, सुमारे १५० सिगरेटची रिकामी पाकिटे हीसुद्धा अण्णांच्या संग्रहाचाच एक भाग आहेत.

काचेच्या बाटल्या

दोन हजाराहून अधिक उत्तमोत्तम सेंट आणि अत्तरच्या बाटल्या, सुमारे ५००  उंची दारूच्या बाटल्या, १ इंचापासून ते ३ फुटांपर्यंतच्या विविधोपयोगी, विविधांगी आकारमान असलेल्या सुमारे ३०० बाटल्यांचा संग्रहही अण्णांच्या संग्रहाचा भाग आहे. यातील बरेचसे साहित्य त्यांनी संग्रहालयाना भेट दिले आहे व तितकेच अजून त्यांच्याकडेही आहे.

पोस्टाची तिकिटे, किचेन्स्‌ आणि मेडल्स्‌

देशविदेशी पोस्टाची तिकिटे, फर्स्ट डे कव्हर्स यांचे सुमारे ५ अल्बम अण्णांच्या संग्रहाने भरलेले आहेत. देशोदेशीच्या सुंदर किचेन्स्‌, मेडल्स्‌चा संग्रह अण्णांच्या ठायी असून पाहाणार्‍यांसाठी हा एक आनंददायी ठेवा आहे.

पंचांग, कॅलेंडर्स, लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका आदि

गेल्या ११० वर्षातील पंचांगाचा संच अण्णांना एके ठिकाणी उपलब्ध झाला होता. त्यांनी तो काही वर्षे आपल्या संग्रहात समाविष्ट करून घेऊन कालांतराने म्युझियमला भेट दिला. सुमारे ५ रूपयांपासून ५०० रूपये पर्यंतच्या किंमतीच्या लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, कॅलेंडर्स, निमंत्रण पत्रिका अण्णांकडे संग्रही आहेत.

पत्रव्यवहार

गेली ५० हून अधिक वर्षे अण्णा सरासरी रोज स्वहस्ते किमान ५ पत्रे लिहित आले असून आज वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. याच्या निम्मी पत्रे अण्णांना विविध माध्यमांकडून सतत येतही असतात. अण्णांचा जनसंपर्क आणि लोकसंग्रह खूपच मोठा आहे.  अण्णा कोकणातील प्राचीन पार्श्वभूमी लाभलेल्या ज्या दाभोळगावी राहातात. तेथील डाकघरात सर्वात जास्त टपाल येणारे आणि जाणारे घर अण्णांचेच आहे असे दाभोळचे पोस्टमास्तर आवर्जून नमूद करतात. अण्णांनी लिहिलेल्या पत्रांची अनेकांकडून आलेली उत्तरेही तितकीच कौतुकास्पद आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. अशी असंख्य पत्रे अण्णांनी संग्रह करून ठेवली आहेत.

विविध प्रकारचे बॉलपेन, पेनसेटचे बॉक्स, बोरू, टाक, ठोकळे, सुंदर कलमदाने, डेस्क आदि जुनी लेखनसाम्रगीही अण्णांच्या संग्रहात होती.

दीपज्योती

घरांमध्ये जुन्याकाळी वापरात असलेल्या ठकू-चिमणी पासून दिवट्या, मशाली, विविध प्रकारच्या समया, हंड्या, झुंबरे, कंदील-फणस, टेबल लॅम्प, लामण दिवे, लॅम्प, सायकल, व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील दिेवेही अण्णांनी जमविले आहेत.

कोकणातील खनिज संपत्ती

कोकणात मिळालेली विविध प्रकारची खनिजे, विविध रंगाचे दगड, स्फटिक, सिलिका, ग्रेनाईट दगड, ऍगेट, विविध प्रकारचे जेम्स अण्णांच्या संग्रहात आहेत.

सागरसंपत्ती

कोकण, केरळ, रामेश्वर, मॉरिशस, अंदमान, ऑस्ट्रेलिया पासून, मेहनतीने जमविलेले शंखशिंपले, कवड्या, प्रवाळ अण्णांचे संग्रही आहेत.

समाजकार्याचे वेड

जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून पाय उतार झाल्यानंतर अण्णांनी अवघ्या वर्षभरातच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारत स्वतःला पूर्णवेळ समाजसेवी उपक्रमांमध्ये झोकून दिले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. यामुळे परिसरातील दलित, मागासवर्गीय, खारवी, भोई, कोळी आदि मच्छिमार आणि दर्यावर्दी मुलामुलींना एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेता आले. मुलांचे वसतिगृह, बालवाड्या, वाचनालये, संगीत क्लास, टाईप रायटींग, शॉर्ट हॅन्ड क्लास, बालभवन, शेती सोसायटी, महिला सोसायटी आदि सुमारे पंचवीसएक उपक्रम असलेली ही संस्था उभी केल्यानंतर त्यांनी शेतकरी मेळावे, महिला मेळावे, फर्स्ट एडचे वर्ग, पोल्ट्री ट्रेनिंग, शिबिरे, संगीत सभा, प्रवचने, व्याख्याने आदि अनेक उपक्रम सातत्याने राबविले, राबवित आहेत. एखादी गोष्ट, अपमान खुंटीला टांगून जीव ओतून चांगलीच करायची हा त्यांचा प्रयत्न नेहमीच कार्यक्रम यशस्वी करण्याकडे नेत राहिला आहे. अपंग संस्था, घरेलु कामगार संघ, दर्यावर्दी कामगार संघ, रस्ता कामगार संघ अशा युनियन अण्णांनी त्यांच्या समाजसेवी जीवनात यशस्वी केल्या.

माणुसकीची भिंत

माणुसकीची भिंत या नावाने चालणारा एक उपक्रम अलीकडे सातत्याने वृत्तपत्रातून चर्चेत असतो. आपल्याला नको असलेल्या कपडे आदि वस्तू या भिंतीजवळ ठेवायच्या आणि ज्यांना त्यांची गरज आहे त्यांनी त्या तेथून पाहून घेऊन जायच्या अशी ही छान कल्पना आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता गेली ४० वर्षे अण्णा छंद रूपाने ही सेवा करीत आले आहेत. मुंबई-पुण्यातील दानशूर व्यक्तींकडून जुने परंतु वापरावयास योग्य कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मिळवायचे आणि गरीब गरजू, स्त्री पुरूष, लहान मुलांना वसतिगृहातील मुलांना द्यायचे असे याचे स्वरूप आहे. याद्वारे साड्या, फ्रॉक, शर्ट, पॅन्ट, रग, चादरी, टॉवेल, स्वेटर, कोट, पर्स, दफ्तरे आदि वस्तूंचा अण्णांच्या माध्यमातून हजारो गरिबांना लाभ घेता आला आहे. अण्णांची कनिष्ठ कन्या विभावरी आणि तिच्या सहकारी मावश्या यासाठी अण्णांना मदत करीत. सध्या कमी होत चाललेली गरिबी आणि शारीरिक प्रकृती यांमुळे या छंदाला तूर्त मर्यादा आलेली आहे.

वाचनवेडे अण्णा

स्वतःहून विकत घेतलेली, भेटीतून मोफत मिळालेली अशी भरपूर पुस्तके अण्णांच्या संग्रही आहेत. मुळात अल्पशिक्षित असलेल्या अण्णांना वाचनासारखे, जीवन समृद्ध करणारे वेड लागले हे फार मोठे आश्चर्य आहे. अर्थात, या वाचनाच्या वेडातूनच अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला हे निश्चित आहे. अण्णांच्या ८७ वर्षाच्या प्रदीर्घ जीवन कालखंडातील जवळपास ७५ हून अधिक वर्षे वाचनात गेली आहेत. आदरणीय कै. काकी (अण्णांच्या पत्नी) नेहमी म्हणायच्या, ‘स्नान सोडून इतर सर्व वेळ अगदी झोपतानासुद्धा यांच्या छातीवर पुस्तक हे असणारच!  अण्णांनी आपल्या आयुष्यात हजारो पुस्तके वाचली, संग्रह केला, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. आपल्या छंदाना न्याय देत कार्यरत असलेल्या अण्णांना आणीबाणीच्या कालखंडात पोलिसांनी पकडले आणि तुरूंगात टाकले. वाचनाची अमर्याद आवड असलेल्या अण्णांनी सन १९७५ ते ७७ दरम्यानचा आपला तुरूंगवासही सत्कारणी लावला. एरवी आपल्या नेहमीच्या व्यापात अण्णांना मनासारखे वाचन करता येत नव्हते. ती कसर त्यांनी तुरूंगात भरून काढली. याखेरीज मोठमोठ्या नेत्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि चिंतन सुरूच होते. आयुष्यात कधीही कॉलेज न पाहिलेल्या अण्णांसारख्या अडाणी माणसाला राजबंदी झाल्यानंतर नाशिक आणि येरवडा जेल म्हणजे एक विद्यापीठच वाटले होते. अण्णांनी येरवडा जेलमधील जुनी प्रचंड लायब्ररी या कालखंडात वाचून काढली होती. कर्माला हात लावून दुःख व्यक्त करीत बसण्यापेक्षा तुरूंगातही सतत कार्यरत राहून अण्णा शिकत राहिले, वाचत राहिले, आजही या वयात आजूबाजूला वाचनासाठी काही नसेल तर अण्णा बेचैन होतात, हे आम्हीसुद्धा अनुभवले आहे. पुस्तकांमुळेच विविध मोठे लेखक साहित्यिक आदिंच्या मैत्रीसाठी आणि सहवासासाठी अण्णा सतत प्रयत्नात राहिले. त्यात त्यांना यशही मिळाले. लेखकांच्या सहीने मिळालेल्या भेट पुस्तकांचा एक कोपरा अण्णांजवळ आहे. कवितेची २०० हून अधिक पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.

लेखनाचा छंद

आपण वाचलेले, अनुभवलेले, अभ्यासलेले आणि संशोधन केलेले सारे काही समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अण्णांनी स्वतःला लेखनाच्या छंदातही गुंतविले. गेली ५० वर्षे ते विविध वृत्तपत्रांमधून स्फुटलेखन, प्रसंगानुरूप कविता लेखन करीत आले आहेत. त्याही पुढे जाऊन जवळपास १२ पुस्तके अण्णांनी लिहून प्रकाशित केली आणि कोणत्याही मातब्बर प्रकाशकाच्या मदतीशिवाय खपवलीही ! लिहिलेल्या १२ पुस्तकांमध्ये युरोप, मॉरिशस, इस्त्रायल आणि भारतभर प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. अण्णांना लेखक-साहित्यिक म्हणूनही समाजाने गौरविले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि तिचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्रीमधू मंगेश कर्णिक यांच्याशी अण्णांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचा आणि कोकण इतिहास परिषदेचा जीवन गौरवपुरस्कारही अण्णांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे.

लोकसंग्रह

अण्णांच्या आयुष्यात त्यांचा लोकसंग्रह फार मोठा राहिला आहे. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी त्यांची कार्यतत्परता यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदिसंह सर्वधर्मीय त्यांचेवर शतप्रतिशत विश्वासून असतात. आणीबाणीच्या कालखंडात राजबंदी असताना अण्णांच्या लोकसंग्रहकारी वृत्तीचा त्यांना खूप उपयोग झाला. नाशिकच्या जेलमध्ये जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी, बापूसाहेब परूळेकर, समाजवादी पक्षाचे राजहंस, प्रधान, वर्दे, बागायतकर, भालेराव, भाई वैद्य, बाबा आढाव, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरूण लिमये, कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ. शांताराम गरूड, प्रा. ठेकेदत्त, खोपकर, नाईक, जमाते इस्लामचे सर्फराज हुसैन, सर्वोदयचे गंगाप्रसाद अग्रवाल, संघाचे  ऍड. बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकर, विश्व हिंदूचे अप्पा सोहनी, कॉंग्रेसचे खासदार रतनसिंह राजदा, मोहन धारिया, प्रभाकर गुप्ते, शिक्षणक्षेत्रातील डॉ. केणी, अर्थशास्त्रज्ञ डॉ. वागळे, डॉ. राहूलकर, पंचांगकर्ते दाते अशा अनेकांची सोबत अण्णांना लाभली. मा. बाळासाहेब देवरस यांचे रोजचे दर्शन आणि चारदोनवेळा संवाद साधण्याची संधीही याचवेळी अण्णांना मिळाली. अण्णा बांधकाम सभापती असताना त्यांच्या शासकीय गाडीतून गणपतीपुळे ते मालगूंड असा प्रवास करण्याचा योग एकदा पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांना आला. अगदी पहिल्याच भेटीत, ‘शासकीय गाडीतून एका अशासकीय पाहुण्याला नेण्यामध्ये कोठे कायदेभंग तर होत नाही ना?’ असा प्रश्न मधु मंगेश यांनी विचारल्यानंतर, ‘या रूक्ष वाहनाला आणि माझ्यासारख्या रूक्ष माणसाला साहित्यिकाची संगत लाभत असेल तर असे हजार कायदेभंग मला मान्य आहेतअण्णांच्या या पहिल्या भेटीतील उत्तराने अण्णांचे आणि मधु मंगेश यांचे सख्ख्या भावंडाइतके मैत्र पक्के झाल्याची नोंद खुद्द मधु मंगेश यांनीच अण्णांचे जीवनावरील बखर अपरान्ताच्या प्रवाशाचीया पुस्तकात केली आहे. समोरील व्यक्ती अडचणीत आहे आणि ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहे या निकषावर अण्णा सहकार्याला उभे ठाकायचे. या गुणांमुळे वाढलेल्या लोकसंग्रहाच्या बळावर सुमारे दहा-वीस मानाची पदे अण्णांकडे चालून आली. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदाचाही समावेश आहे. मात्र राजकारणानंतरची, जवळपास ६० हून अधिक विविध पुरस्कार मिळवून देणारी इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहकम्हणून बहरलेली अण्णांची कारकिर्द सर्वार्थाने लोकसंग्राहक म्हटली जायला हवी.

दाभोळ : अण्णांच्या संग्रहाचे माहेरघर

सन १९४२ ला स्वातंत्र्य समराचे यज्ञकुंड पेटले होते. अण्णा दाभोळ नं. १ शाळेत दाखल झाले. इयत्ता ५ ते ७ वी अण्णा येथेच शिकले. दुसर्‍याच दिवशी शाळेसमोरून सानेगुरूजींची बैलगाडीतून निघालेली मिरवणूक अण्णांनी पाहिली. त्या वयात व्हायचे ते संस्कारही झाले. विसापूरच्या घरी पंतोजी विठ्ठल त्रिंबक भागवत हे शिक्षक अण्णांना शिकवत. पुस्तक एकच होते. इयत्ता वगैरे नव्हती. अण्णांनी मराठी सातवी होऊन शाळा सोडली. दाभोळला सहा महिने आणि गुहागर येथे वर्षभर स्पेशल इंग्लिश कोर्स करून अण्णांचे शिक्षण आटपले. त्यानंतर सन १९५८ च्या दरम्यान ओणी आणि १९६० दरम्यान अण्णांनी विसापूर येथून आपला मुक्काम दाभोळला हलवला. राजकारणाच्या जोडीने पुनम स्टोअर्सया नावाचे औषधांचे दुकान काढून व्यवसायाचा सुमारे २५ वर्षे यशस्वी प्रयत्न केला. परंतु त्यांची ओढ काही वेगळीच होती. ओढीच्या दिशेने अण्णा सतत धावत राहिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशांना नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे झाले. कारण दाभोळही प्राचीन नगरी दालभ्यपूरीहोती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा केवळ अनुपम ! दाभोळ धक्क्यावरील आदिलशहाच्या बिबिची अर्थात मॉं साहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कवलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लॉंचेस होड्या आणि डुगडुग्या या सार्‍यांचे मिळून नजरेत सामावणारे चित्र पाहाण्याचा योग दाभोळच्या त्या डोंगरावर जुळायचा. या वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला जबरदस्त खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोनही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात हात स्वच्छ ठेवून अण्णा आयुष्यभर वावरले.

या सार्‍यांशिवायही गेली ७५ हून अधिक वर्षे अण्णा दैनंदिन डायरी लेखन करीत आहेत. याशिवाय आयुष्यातील कार्यतत्पर कालखंडात अण्णांनी नाटक, सिनेमा आणि तमाशा पाहाण्याचा छंदही जोपासला होता.  बेताची आर्थिक परिस्थिती असूनही अण्णांनी आपल्या आयुष्यात एवढे सारे छंद जोपासले, अपरान्ताच्या साधनांसाठी ५० हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली, दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. अक्षरशः कणकण करून अण्णांनी हे सारे मणभर गोळा केले. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे अण्णांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण आहेत. सज्जनहो, ‘छंदी व्हा!हा विषय घेऊन लायन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयातून अण्णा महाराष्ट्रभर फिरले, जवळपास ४०० हून अधिक व्याख्याने त्यांनी या दरम्यान दिली. ज्यातून असंख्य अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली. छंदीफंदीदिनचर्येपासून कोसो दूर राहात अनेक अभ्यासकांच्या जीवनात आनंद वाटण्याचे काम आपल्या छांदग्योपनिषदांद्वारे अण्णांना सहज साधता आले.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८                                                                               
पुस्तक हवे असल्यास संपर्क :
श्री. अंबरीश उर्फ दादा खातू मो. ९६२३८५८५८५ ! श्री. अण्णासाहेब शिरगावकर मो. ९५७५१६६८६५

गुरुवार, ३० मार्च, २०१७

देशाला प्रदूषित-विषारी हवेचा विळखा !

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...7

द लान्सेट या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन स्वतंत्र पाहण्यांत देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश असल्याचे चित्र नुकतेच पुढे आले आहे. द लान्सेटनुसार दरवर्षी हवेच्या प्रदूषणामुळे दहा लाखांपेक्षाही अधिक लोकांचा  मृत्यू होत असतो. आपण भारतीय ज्या हवेत श्‍वास घेत आहोत ती हवाही दिवसेंदिवस विषारी बनत  चालली आहे. आपल्याकडेही हवेच्या प्रदूषणामुळे रोज सरासरी दोन माणसांचा मृत्यू होत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे दक्षिण आशियावर अधिक दुष्परिणाम झालेला आहे. अकाली मृत्यू होण्यामागच्या जगभरातील विविध कारणांपैकी ते चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण  ठरले आहे. देशाला ‘प्रदूषित-विषारी’ हवेचा विळखा बसू लागल्यानंतर आपण भारतीय या समस्येकडे ‘समस्या’ म्हणून बघून पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध होणार का ? हा प्रश्न आहे.    

कालपर्यंत जगातील हिरव्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे नागपूर शहर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या या यादीत आले आहे. शहरातील हिरवळ प्रदूषणाला रोखण्यासाठी पुरेसी नाही. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर आणि बदलापूर, वाहनांची जेमतेम संख्या आणि औद्योगिकदृष्टय़ा मागास अमरावती शहर, अकोला, चंद्रपूर या शहरांचाही समावेश आहे. अमरावती शहरात दुचाकीनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुख्यत्वे ऑटोरिक्षांवर अवलंबून आहे. ऑटोरिक्षांमधील इंधनाच्या भेसळीमुळे प्रदूषण वाढले आहे. जीवनासाठी आवश्यक शुध्द हवा आणि पाणी या दोन्ही गोष्टी चंद्रपूर जिल्हय़ात पूर्णत: प्रदूषित झाल्या असून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट व पोलाद उद्योग, कोळसा जाळणे, सदोष घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. वाढती लोकसंख्या, घनकचरा, सांडपाणी, वाहनांची वाढती संख्या यामूळे अनेक शहरे प्रदूषणाच्या खाईत लोटली गेली आहेत. अनेक शहरात रस्ते दुभाजकावर लावण्यात येणारी ही झाडे शोभीवंत असून, धुळ शोषून घेणारी आणि ऑक्सिजन निर्माण करणारी नसतात. त्यामुळे शहरातील वाढत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातून निघणाऱ्या धुरांवर कोणतेही नियंत्रण राहात नाही. गाव आणि शहराच्या विकासाचा असमतोल बिघडल्यामुळे प्रत्येक राज्यातील ३० टक्के जनता त्या-त्या राज्यातील शहरांमध्ये राहते आहे. प्रत्येक राज्यात निवडक शहरांचा विकास झाला आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई, मध्यप्रदेशातील इंदोर आणि भोपाळ, गुजरात मधील अहमदाबाद आणि बडोदा, आंध्रमध्ये हैद्राबाद, कर्नाटकमध्ये बंगलोर, युपीमध्ये लखनौ आदि. असं का झालं ? गेली ६७-७० वर्षे देशाचा कारभार चालवणारे ह्याला जबाबदार आहेत. आपल्याला ‘स्वच्छता’ हा विषय शाळा-कॉलेजमधून शिकवावा लागेल अशी स्थिती  आहे. ज्या वेगाने आपण प्राणवायू वापरतो आहोत, वृक्षतोड करतो आहोत, त्याचा विचार करता आगामी काळात प्राणवायू अपुरा पडणार आहे. मुंबई लोकलमध्ये, निव्वळ गर्दीमुळे रोज काही माणसे मृत्युमुखी पडतात, याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही. 

भारताने पर्यावरण बदलाबाबतच्या ऐतिहासिक पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) ताजा अहवाल पर्यावरण म्हणून भारतासाठी धक्‍कादायक आहे. देशाची राजधानी कमालीची प्रदूषित झालेली आहे. मागे एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले, तेव्हा येथील प्रदूषणाची पातळी विचारात घेवून, त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर अमेरिकी आरोग्य खात्याने अनेक बंधने आणली होती, तरीही आम्हाला भारतीय म्हणून याची लाज वाटली नाही. जगातील प्रत्येक दहा शहरांपैकी एका शहरातील वातावरण हे डब्ल्यूएचओच्या निकषांनुसार जगण्यासाठी पात्र नाही. या परिस्थितीमुळे कोट्यवधी नागरिकांना श्‍वसनविषयक अनेक विकार होतात आणि आपले प्राणही गमवावे लागताहेत. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहून पर्यावरण संवर्धन होणार नाही. यातून बाहेर पडावयाचे असेल आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांस मान्य होईल, असे पर्यावरण सभोवताली उभे करावयाचे असेल तर स्वत:वर अनेक निर्बंध घालून घ्यावे लागतील. वृक्षारोपणाचे निव्वळ दिखाऊ कार्यक्रम आयोजित न करता, लावलेली झाडे जगतील कशी ? याबाबत काळजी घ्यावी लागेल. इतक्या प्रमाणावरील प्रदूषणास फक्त उद्योगच कारणीभूत नाहीत, आपण सर्व त्यास जबाबदार आहेत. शहरातील कचऱ्याची, मैलापाण्याची विल्हेवाटही लावता येऊ  न शकलेल्या महाराष्ट्राला मग विकसित राज्य असे तरी का म्हणायचे ? हा प्रश्न आहे. रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याच्या मोहिमेचा शहरातील तापमानावर विपरीत परिणाम होऊन, शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षाही गेली आहे. त्यामुळे देशभर शंभर ते हजार फूट खोल विहिरी खणून पाण्याचा थेंब न् थेंब शोषून घेण्याची स्पर्धा लागतेय. जालना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पिण्याचे जे पाणी मिळते, ते चहाच्या रंगाचे असते. चीनसारख्या देशात वृक्षराजीने बहरलेल्या इमारती उभ्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे हवेतील कर्बवायू मोठय़ा प्रमाणात शोषून घेण्याची नैसर्गिक व्यवस्था करण्याची योजना आखण्यात आली आहे.

हवेचे हे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्याला वैफल्यग्रस्त करते, असे संशोधन ‘ओहियो स्टेट विद्यापीठ’ शास्त्रज्ञांनी पुढे आणले आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो. हवेचे  प्रदूषण हे माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे होत आहे. शहरातील नागरिक हवेच्या प्रदूषणामुळे हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरतात, यावर जर्मनीतल्या संशोधनाने शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्प यातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. निसर्गचक्रात मानवाने ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासूनच हवामान बदलाच्या संकटाचे बिगुल वाजले आहे.
पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची असून त्यात वातावरण, हिम आणि बर्फ, नद्या, सागर, महासागर, जलयंत्रणा, अनेक सजीव यांची परस्परावलंबी आणि महत्त्वाची भूमिका कार्यरत असते. या प्रणालीस ऊर्जा पुरवण्याचे काम सूर्य करतो. सूर्याच्या सरळ येणाऱ्या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूंच्या पडद्यामुळे शक्य होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे या वायूंच्या पडद्यावर  वाईट परिणाम होत आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान हळुहळू वाढत आहे. २१ वे शतक संपेपर्यंत हवामान बदलामुळे जागतिक तापमान सुमारे चार ते सहा अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. याचा विचार आपणाला प्रत्येक भारतीयाला आपापल्या पातळीवर येवून करावा लागेल, आपली जीवनपद्धती बदलावी लागेल, तेव्हा पर्यावरण संवर्धन आणि शुद्ध हवेकडे आपण मार्गक्रमण करू !

धीरज वाटेकर

गुरुवार, २३ मार्च, २०१७

कुपोषण आणि सरकारी असंवेदनशीलता

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...6

देशभरातील कुपोषणग्रस्त भागात सातत्याने ‘कुपोषित बालक तपासणी शिबीर’ आयोजित केले जाते, या शिबिरातील परिस्थितीवरून नजर फिरवली की आपणाला आजही या प्रश्नांबाबत सरकारसह आपण असंवेदनशील आहोत, हे मनोमन पटते. नुकतीच फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील जव्हार-विक्रमगड तालुक्यातील १०४ कुपोषित बालकांची तपासणी ‘श्रमजीवी संघटना आणि श्रीविठू माऊली सामाजिक संस्था’ यांनी पुढाकार घेऊन केली. या संपूर्ण परिसरात बालकांची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविकांना सप्टेंबर २०१६ पासून मानधन आणि पोषण आहाराचे पैसे, बचतगटांची देयके अदा झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आणि कुपोषणाबाबत सरकारी असंवेदनशीलता पुन्हा समोर आली.          

एका आकडेवारीनुसार सन २०१६ साली महाराष्ट्रात १८,००० बालमृत्यू झाले. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास २० लक्ष बालके जन्माला येतात. हे प्रमाण, अमेरिकेतील बालमृत्यूंच्या प्रमाणाच्या जवळपास हजार जन्मांमागे नऊ येते. बालमृत्यू न नोंदवून किंवा कमी नोंदवून हा प्रश्‍न सोडवायची जुनी शासकीय परंपरा आहे. मग खरा आकडा कोणता ? हाही प्रश्नच आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील बालमृत्यू पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीही भारतातील एकूणच कुपोषणात आदिवासी बालकांमधील कुपोषण भयंकर आहे व त्यांच्यात बालमृत्यूंचे प्रमाण इतरांपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्र शासनाने २००३ साली बालमृत्यू मूल्यांकन समितीनिर्माण केली. या समितीने २००४ व २००५ साली दोन अहवाल व शिफारसी शासनाला दिल्या. त्यात घरोघरी नवजात बालसेवा ही पद्धत आशामार्फत लागू करण्याचे ठरले. परंतु २०१६ पर्यंत राज्यातील सर्व आशांचे त्याबाबतीतील प्रशिक्षण अपूर्ण होते. ज्यांचे प्रशिक्षण झाले त्यांना उपकरणे व औषधे मिळाली नव्हती. महाराष्ट्राचा आर्थिक विकास वेगाने होत असताना सन १९९० ते २०१५ च्या काळातच विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कुपोषण व बालमृत्यू आणि नक्षलवाद वाढले, मराठवाड्यात दुष्काळ माजला. आर्थिक विकासासोबत नेमका सामाजिक न्याय्य विकास मात्र रखडला.
कुपोषण निर्मूलनासाठी सुरू असलेली केंद्र सरकारची ‘ग्रामबाल पूरक पोषणआहार योजना’ बंद करण्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसून, सप्टेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या एका वर्षात ०.२१% वाढ झाली असल्याची कबुली आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अलीकडेच हिवाळी अधिवेशनात, विधानपरिषदेत दिली होती. ग्रामबालऐवजी ‘अमृतआहार’ ही नवीन योजना सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न सरकारने केला. यास्तव मध्यंतरी कुपोषणाच्या पातळीवर सरकार नापास झाल्याची कबुली आरोग्यमंत्र्यांना द्यावी लागली. नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रातील आणि राज्यातील वजनदार नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यात तब्बल 611 बालके कुपोषित आढळली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर कुपोषण मुक्तीसाठी राज्य व केंद्र शासनाकडून शेकडो उपाययोजनांच्या माध्यमातून खर्च केला जाणारा लाखोंचा निधी जातो कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

सप्टेंबर २०१६ मध्ये, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ासह रायगड जिल्ह्य़ातही २४१ तीव्र कुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या दरम्यान कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्यातील १६ जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची ‘एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ बनवण्यात आली. यात कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाचा समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये मे महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांत बंद पडली, यामागे त्यांना योग्य वेळेत अदा न होणारे मानधन हे कारण आहे. आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव सरकारी खात्यात आहे. त्यामुळे शासनस्तरावर योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येतात. रत्नागिरी सारख्या ठिकाणी तर पालक आणि लोकसहभागाअभावी कुपोषणमुक्तीच्या मोहिमेत अडचणी येत असल्याचे नुकतेच समोर आले. कमी वजनाच्या बाळांना बालक विकास केंद्रात उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी मुलांचे पालक धजावत नसल्याचे पुढे आले.

राज्यांतील कुपोषणग्रस्त भागातील आदिवासी बालकांना कोणत्याही प्रकारे सोयीसवलती मिळत नाहीत, त्यांच्यासाठी करण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची तरतूद त्यांच्यापर्यंत पोहचतही नाही ही वर्षानुवर्षे ओरड आहे. महाराष्ट्रात धुळे-नंदुरबार, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट-धारणी, ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोरवाडा, तलासरी, डहाणू, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक आदि जिल्ह्यात दुर्दैवाने आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. कुपोषण विषयात महिला-बाल कल्याण, आदिवासी विभाग, आरोग्य खाते आणि अन्न-नागरी व पुरवठा या चार खात्याचा संबंध आहे. मात्र या चारही खात्यात आजतागायत कधीही समन्वय असल्याचे दिसले नाही, हे या विषयातील अपयशाचे प्रमुख कारण आहे. आदिवासींच्या कुपोषणाच्या प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळून ७०  वर्षे झाल्यानंतरही कायम आहे. आदिवासी बालके जन्म घेतात, १ ते ६ वर्षांपर्यत तडफडून मृत्यूमुखी पडतात. या देशातील ७०  टक्के जनता अजूनही गरीब आहे. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या काळात राज्यातील वावर-वांगणी सारख्या दुर्गम भागात आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्य पुरवठा करण्यासाठी १८  व्हॅन दिल्या गेल्या होत्या त्या कोठे गेल्या ? आजतागायत कोणालाही माहित नाही.  शासनाला कागदोपत्री आदिवासी लोकसंख्येच्या ९ टक्के इतका निधी देण्याचे बंधन आहे. हा निधी आदिवासींपर्यंत पोहचतच नाही. कहर म्हणजे मध्यंतरी आदिवासी विकासाच्या नावावर निव्वळ दिनांक ८  जुलै २०१३ या एका दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याने ३५९ कामे मंजूर केल्याचे दाखविले असल्याचे वृत्त वाचनात आले होते. अर्थात आदिवासी विकासाचा पैसा  इतर विभाग पळवतात, हे नग्नसत्य आहे.

गरीबी हेच सार्वत्रिक कुपोषणाचे प्रथम आणि मूळ कारण आहे. दक्षिण आफ्रिकी खंडातले अनेक देश आपल्यापेक्षा कैकपटींनी गरीब असूनही उंची-वजनात धट्टेकट्टे आहेत, तरीही हा फरक पडतो. पोषण विषयातील शास्त्रज्ञांनी यामागील भारताबद्दलची महत्वपूर्ण कारणे सांगितली आहेत. यात बाळांचे जन्मवजन कमी असणे, त्यामागे अल्पवयीन लग्ने व मातेच्या कुपोषणाचा अंतर्भाव, मुलामुलींची एकूण वाढ होण्यासाठी कुटुंबातल्या स्त्रियांना घरात आणि समाजात पुरेशी सत्ता नसणे आणि मुलभूत स्वच्छता नसण्याने जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव यांचा समावेश आहे. त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून आमच्याकडे शासनस्तरावर विविध प्रकारची ‘खाती’ कार्यरत आहेत. त्या खात्यांच्या असंवेदनशीलतेचा फटका गेली ७० वर्षे देश भोगतो आहे, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्हाला आमच्या संवेदना जीवंत कराव्या लागतील. 

धीरज वाटेकर


मंगळवार, ७ मार्च, २०१७

दुर्दैवी ‘वणवे’ सुरु झालेत !

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...4-5 

सध्याचा ऋतू जंगलातील वणव्यांचा आहे. दरवर्षी देशातील विविध जंगलांत वणवे लागतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा तालुक्‍यातील डिंगणे गावात वाळलेल्या गवताच्या कुरणांमुळे ५००  एकरांवर नैसर्गिक वणवा भडकल्याने काजू, आंबा आणि नारळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. ९० शेळ्या, दोन घरे व ९५ बोकडांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरवर्षी या परिसरात बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडतात. शिवजयंतीदिनी पोलादपूर ते खेड दरम्यान असलेल्या कशेडी घाटात वणवा लावला गेला. वाऱ्यामुळे वणवा रस्त्यावर आल्याने काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहन चालकांना वाहने थांबवावी लागून घाटात लांबच लांब रंग लागल्या होत्या. सातारा येथील अजिंक्यतारा किल्यावरही फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मंगळाईदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस अज्ञात समाजकंटकांनी वणवा लावला. मोठ्या प्रमाणात वारा, कडक ऊन यामुळे वणवा भडकला. आज वणव्यामुळे हा डोंगर काळाकुट्ट पडला आहे. मध्यंतरी उत्तराखंडमधील एक हजार ९०० हेक्टर एवढय़ा मोठय़ा क्षेत्रात लागलेल्या एका महावणव्याने अनेकांची झोप उडविली होती. पर्यावरांची अतोनात हानी करणारे हे वणवे आणि त्यांचा हंगाम सुरु झाला आहे, ते रोकण्यासाठी आपल्याला आपापल्यापरीने प्रयत्न करावे लागतील.

भारतातील वनांत लागणाऱ्या वणव्यांच्या प्रमाणात  गेल्या दोन वर्षांत जवळपास ५५ टक्के वाढल्याने वणवा हा अतिशय चिंताजनक विषय बनला आहे. राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने अलीकडेच सादर केलेल्या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ मध्ये १५,९३७ वणव्याच्या घटना नोंदविल्या गेल्या तर २०१६ मध्ये हा आकडा २४,८१७ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. यातील सर्वाधिक घटना ओडीसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे नोंदविल्या गेल्या असून महाराष्ट्रातील वणव्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मागील काही वर्षांत सन २०१२ साली सर्वाधिक वणवे लागले होते. या अहवालात त्यांनी वणवा समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘राष्ट्रीय धोरण’ तयार करण्याची सूचना केली आहे. कोरडय़ा पानगळीच्या जंगलात चैत्र महिन्यापर्यंत सर्वत्र पानांचा थर साचतो. गवतही वाळलेले असते. त्यात वातावरणातील कोरडेपण भर टाकते. वरील काहीतरी किंवा निसर्गनिर्मित निमित्त घडते आणि वणवा लागतो. परंतु नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. साधारणत: मार्च हा सर्वाधिक वणव्यांचा महिना असतो. या महिन्यात एकूण वणव्यांच्या ४६ ते ६६ टक्के वणवे लागतात. हे वणवे अनेक कारणांनी लागतात. जंगलमाफिया मुद्दाम आगी लावतात आणि त्या विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव करतात. नैसर्गिक वणवे लागणे, वनौषधी, वनसंपत्ती गोळा करण्यासाठी आणि जंगल पर्यटसाठी गेलेल्या माणसांकडून निष्काळजीपणे आणि काहीवेळा जाणुनबुजून केलेल्या कृत्यामुळे वणवे लागतात. वनातून जाताना पेटती सिगारेट फेकणे, टेंभे (मशाल, पलिते) घेऊन जाणे, कॅम्पवरील आग तशीच सोडून जाणे, शेतीबांधावरील लावलेली आग आदि कारणे यामागे आहेत. आग लागल्यामुळे सामान्यत: जंगलात असलेले पालापाचोळा व गवत नष्ट होते. वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक फायदा असतो. ज्या जंगलात आदिवासी आहे आणि बाजूला शेती आहे त्या ठिकाणी वणव्याची परिस्थिती तयार होते. वन्यजीव आणि आदिवासी संघर्ष, तर दुसरा वनखाते आणि आदिवासी असा संघर्ष यामागे आहे. जंगलात फिरणारे गुराखी, रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे प्रवासी लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक फेकतात. कुठे तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते. मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, अशा गैरसमजातून गवत पेटवून दिले जाते. त्याचा परिणाम निसर्गाच्या जैविक शृंखलेवरही होत असतो. वारंवार आगी लागल्यामुळे झाडाच्या बुंध्यांना आग लागून ती कमजोर झाल्याने कोलमडतात. त्यात जंगल संपत्तीची हानी होते, वन्य जीवांना धोका पोहोचतो. वणवा लागलेल्या क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर भाजली गेल्याने जमीन टणक होते, तिच्या पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जमिनीची उत्पादकता कमी होते.

वणव्यासंदर्भात भारतीय वनखात्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी कोणतीही अद्ययावत यंत्रणा नाही. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते. आग लागू नये म्हणून जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या या पारंपरिक पद्धतीवर भारतीय वनखात्याची मदार आजही आहे. वनक्षेत्रात लागणाऱ्या आगी आणि त्यावरील उपाय योजनांच्या कृती आराखड्यासाठी महाराष्ट्र शासनाने या मोसमाकरिता १९ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार रुपये २९ कोटी ८६ लाख इतका निधी विविध कार्यबाबींकरिता प्रस्तावित केला आहे. तरीही वणव्यांचे प्रमाण देशात वाढते आहे. यास्तव शासन वणवा विषयात जे काही खात्याला देऊ करतेय, तेही नीटसे कार्यान्वित केले जाते का ? याबाबत संशय आहे. ‘ग्रीन इंडिया’चे स्वप्न पाहाणाऱ्या, गेली ३६ वर्षे अव्यह्यातपणे झाडे लावत आसाममधील ब्रह्मपुत्रे वालुकामय प्रदेशाला जंगलाचे रूप देण्याचे काम जादव पायेंग या आदिवासी व्यक्तीने केले आहे.  राजकीय हस्तक्षेप वाढल्याने देशातील सर्वच जंगल राष्ट्रपतींच्या अखत्यारित देण्याची गरज आहे. अशी भूमिका पायेंग यांनी मंडळी आहे. रायगड जिल्ह्यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१६ मध्ये या जिल्ह्यात ९६ ठिकाणी वणवे लागून ६१३ हेक्‍टर क्षेत्राला त्याची झळ पोहोचली. अनेकदा जंगलातील अनियंत्रित वणवे गावात शिरतात. डोंगरातील आदिवासी वाड्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. हिवाळ्याच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोकणातील जंगलांत वणवे लावले जातात. यामागे  स्थानिकांमधील गैरसमज कारणीभूत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत चांगले यावे, सरपणाला-जळणाला  लाकूडफाटा मिळावा, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या शिकारीकरता याव्यात म्हणून वणवे लावले जातात. वणवा पेटला की वन्यप्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरुवात करतात. त्यामुळे या वन्यजीवांची शिकार करणे सहज शक्‍य होते. कोकणात भातशेतीच्या भाजणीसाठी विविध झाडांच्या सुक्या फांद्या तोडून त्या जमवून पेटविल्या जातात. पूर्वी हे करीत असतांना आग शेजारच्या जंगलात पसरू नये, याची काळजी घेतली जाई. हे काम एप्रिल-मेमध्ये चाले. मात्र सध्या शेतीची भाजणी ही सुद्धा खूप लवकरच उरकून घेतली जाते. तसेच भाजणीसाठी जंगलातील काट्याची झुडपे व इतर पालापाचोळा यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पावसाळ्यात आणि तदनंतरच्या जमिनीतील ओलाव्यामुळे शेतजमिनीत अनेक प्रकारची छोटी-छोटी झाडे, वेली उगवलेल्या असतात. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान ही रोपटी साधारणतः तीन ते चार फुट उंचीची झालेली असतात. ती काढून टाकण्यासाठी पारंपारिक पध्दत म्हणून जमिनीची भाजणी करतात. वास्तविक ही भाजणी अयोग्य आहे, ती करू नका असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून नियमीत केले जाते. मात्र तरीही निव्वळ मानसिकतेपायी हे घडते, आणि त्या पुढे ह्यातीलच विकृत मानसिकता जिथे शेती नाही असे जंगलही जाळायला सरसावते, ज्याला आपण "वणवा" म्हणतो. जागतिक स्तरावरही ही पध्दत योग्य नसल्याचे सर्वमान्य झाले आहे. मात्र तरीही आपल्याकडील समाजमान ही पारंपारिक पध्दत सोडण्यास तयार होत नाही. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. हे गवत पूर्वी गुरांच्या चार्‍यासाठी वापरत असत. याच गवताच्या माध्यमातून चार पैसे मिळवलेही जायचे. गवताची एक वरंड 30 ते 35 रुपयांना विकली जायची. परंतू पशुपालन कमी झाल्याने आणि गवताला मागणीच नसल्याने वणव्याचा ट्रेंड वेगाने पुढे आला आहे.

यावर उपाय म्हणजे, सरकारने "वणवा मुक्त गाव योजना" अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. "आमचा गाव, वणवामुक्त गाव" अंतर्गत गावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृतीदल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवा विरोधी सशस्त्र पथक आदि विविध पर्याय वापरले जायला हवेत. प्रसंगी कायद्याचा, विधायक कामासाठी बळाचा वापर करून "वणवा" संस्कृतीचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आपल्याला वनांचे महत्त्व, वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल, त्यातूनच हे प्रकार थोपवले जाऊ शकतात.  

धीरज वाटेकर

प्रसिद्धी : साप्ताहिक गोयंकार गोवा दिनांक ५ मार्च २०१७ 
http://www.mulshidinank.com/2017/03/blog-post_20.html?m=0












गुरुवार, २ मार्च, २०१७

“भावसाक्षर” नसलेल्या समाजाची शोकांतिका !

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...३

फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रत्नगिरीतील ८ व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बाल्यावस्थेतील मुलाने निव्वळ वर्गशिक्षिकेने पालकांना शाळेत बोलाविल्याच्या भीतीने, ओढणीच्या सहाय्याने बेडरूम मधील सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली ! भावनिकदृष्टय़ा अस्वस्थ असलेल्या मुलांना तातडीची मदत मिळावी, अशी मुले शालेयस्तरावर सहज पटकन ओळखू यावीत, गरजानुरूप त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळावी किंवा शिक्षकांना-पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि यातून आपल्या सभोवतालच्या मुलांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न व्हावेत, म्हणून आपण सारेच गळा काढीत असतो. परंतु अधूनमधून घडणाऱ्या अश्या घटना भावसाक्षर नसलेल्या आपल्या समाजाची शोकांतिका सांगत असतात. आपण यातून धडा घेवून स्वत: भावनासाक्षर कधी होणार ? हा प्रश्न आहे.

‘आईने दोन दिवस गणवेशाशिवाय शाळेत पाठविले म्हणून प्राथमिक शाळेतील मुलीची आत्महत्या’,  ‘बहिणीने आपणास हवा असलेला चॅनेल लावू दिला नाही म्हणून नवव्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलाची  गळफास लावून आत्महत्या’, अशा घटना आजकाल अधूनमधून घडतच असतात. वडिलांनी स्कूटर घेऊन दिली नाही म्हणून दिल्लीत, सप्टेंबर २०१२ मध्ये एका चौदा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली होती, वर गळफास लावून घेण्याआधी आता तुमचे पैसे वाचवाअशी चिठ्ठीही त्याने आपल्या वडिलांसाठी लिहून ठेवली होती. या विषयातील सगळ्या घटना वृत्तपत्रात येतातच असे नाही. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने आत्महत्या केल्याची उदाहरणे आपल्याकडे आता रूळली आहेत, असेच वाटते. क्षुल्लक कारणांवरून छोटी छोटी मुले आत्महत्येचा निर्वाणीचा मार्ग अवलंबितात आणि आपले जीवन उमलण्याआधीच संपवतात ही भयानक दुःखदायक बाब आहे. जीवन अद्याप पुरते उमललेले नसताना कोवळ्या मुलांच्या मनात पराकोटीचे नैराश्य का उत्पन्न व्हावे ? आपले जीवन संपवावे, आपल्या जीवनात काहीही शिल्लक नाही असे का वाटावे ?

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, शालेय वयोगटातील ३ ते ५ टक्के मुलांना मानसिक आजार असतात आणि १५  ते २० टक्के मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचे मानसिक अस्वास्थ्य असते. या मुलांना वेळीच मदत व उपचार मिळाले तर आत्महत्येसारख्या अनेकविध टोकाच्या घटना टाळता येऊ शकतात. आजच्या स्पर्धेच्या काळात मानवी आयुष्याचा वेग वाढला असून कुटुंबाबरोबर घालवण्याचा वेळ कमी झाला आहे. यास्तव मुलांच्या मनामध्ये निर्माण होणा-या छोटया-छोटया अस्वस्थता ओळखण्यात पालकांना अनेकदा अवघड बनते. त्या समस्या हाताळण्यासाठी आवश्यक वेळ देणेही दिवसेंदिवस पालकांसाठी अवघड बनत चालले आहे. या साऱ्यातून मानसिक अस्वस्थतेचा गाळ साचला तर कधीतरी आत्महत्त्येसारखे टोकाचे विचार मुलांच्या मनात येतात. आजचे आपले बदललेले प्राधान्यक्रम, ढळलेला आयुष्याचा समतोल, आयुष्यात आर्थिक उन्नत्तीला आलेले  महत्त्व यांमुळे सभ्यता, नैतिकता, वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक नातेसंबंध या सर्वांचे प्राधान्यक्रम मागे पडले आहेत. आज स्पर्धा आणि यशस्वितेचे बदललेले मापदंड भयानक बदलले आहेत. सातत्याने स्पर्धा करणे हा युगधर्म झाल्यासारखी स्थिती आहे. सतत यशस्वी झाले पाहिजे. अपयश ही एक भयंकर गोष्ट असल्याबाबतचा  समाजात स्थिरावलेला विचार मुलांच्या मुळावर उठला आहे. मानसशास्त्र सांगते, जैविक, मानसिक व सामाजिक आदि तीन पातळ्यांवर आत्महत्येची मानसिकता घडते. त्यात जैविक पातळीवर अनुवंशिकता, मानसिक पातळीवर विचार करता अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्व दोष, सामाजिक पातळीवर मान-अपमानविषयक टोकाच्या कल्पना, भावनांवर ताबा ठेवण्यात येणारे अपयश, उतावळा स्वभाव यांचा समावेश होतो.

या प्रश्नांचे स्वरूप तपासून पाहिले तर लक्षात येते की, किशोरवयीन मुलांच्या वाढत्या आत्महत्या हा महाराष्ट्रापुरता मर्यादित प्रश्न नसून त्याची व्यापकता जगभर आहे. मानवी मृत्यू हा जीवनाचा शेवट करतो. आपणाला आयुष्यात अनेक मृत्यूंचा चटकाही जाणवतो. परंतु  स्वत:च्या हाताने, स्वत:चे आयुष्य संपवले जाते, आयुष्याचा फारसा अनुभव न घेता बारा-पंधरा वर्षाची मुलं जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा ते अनेक प्रश्न उभे करते. परीक्षेत अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले’, ‘आई-वडील ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केली.कुपोषणाने होणारे बालमृत्यू, स्त्रीभ्रूणहत्या यासारखेच किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण नेहमीच वर्तमानपत्रांमधून वाचत असतो. आयुष्याची समज वाढवित असताना, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेची जोपासना करणारे, जीवन कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण, शाळेतील किमान एका शिक्षकाला, बाल व कुमार मानसशास्त्राचे प्रशिक्षण देण्याची गरज कायम बोलली जाते. या साऱ्यांचा विचार करता स्वत:चे जीवन संपवून टाकण्यामागची मानसिकता ही समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञांपर्यंत मर्यादित ना राहता सामाजिक स्तरावर मुळातून समजून घेतली जाण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वी गावातील वडीलधाऱ्या समंजस माणसांची शाळेकडे अधूनमधून फेरी होई. यात ते शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी बोलत, यातून त्यांना मुलांची मनोगते कळत. सध्या शाळा संस्थाचालक हे काम कितपत करीत असतात ? ते कळण्यास रीतसर असा कोणताही मार्ग नाही. आजची मुले खाण्यात आणि बोलण्यात घसरत चालली आहेत यावरचे बोलणे दुर्दैवी निष्कर्षाकडे कधी नेते, काळातही नाही. आज शैक्षणिक संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा यांचे केंद्र बनण्याची गरज आहे. शाळेत मुलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे. चुकांवर पांघरून न घालता त्यावर प्रतिक्रिया देत असताना त्या मुलाचे ‘वर्तनशास्त्र’ लक्षात घेतले जायला हवे, ते समजण्यासाठी तसे प्रक्षिक्षण हवे. यश, स्पर्धा, पैसा ही गृहितके बदलून आपल्याला किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या थांबवता येतील. चुकांवर पांघरून न घालता मानसिक दुर्बल मुलांना स्वीकारणे आणि त्यांना चांगली वागणूक देणं हे प्रौढम्हणून समाजाचे कर्तव्य आहे. हे परिवर्तन घडवून आणण्याची पहिली पायरी, त्या मुलांना आदराने वागवून सुरु होते. परिवर्तन घडण्यासाठी काही दिवस, महिने वर्षही लागतील, पण आपण सर्वांनी प्रयत्नांची कास धरली आणि हा गंभीर आणि भयानक प्रश्न तडीस नेण्याच्या विचाराने प्रवृत्त झालो तर समाजात नक्की परिवर्तन घडेल !

धीरज वाटेकर

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...