रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आदर्श प्राध्यापक हरपला !


आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते ही दुर्मीळ जाणीव जपणारे, आपल्या लिखाणातून सतत ती व्यक्त करणारे, या वाटेवरून चालणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारे चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त, आदर्श प्राध्यापक मधू जाधव यांचे दिनांक २५ ऑगस्ट (रविवार) रोजी सोलापूर मुक्कामी दु:खद निधन झाल्याची पोस्ट वॉट्सअपवरून समजली. धक्काच बसला. लौकिकार्थाने सरांचा विद्यार्थी नसलेला मी अस्वस्थ मानसिकतेत थेट सन २००२ सालात पोहोचलो !

सन १९७४ ते २००९ इतका प्रदीर्घ कालावधी चिपळूणात प्राध्यापकीय जीवन जगलेल्या सरांची आणि माझी पहिली भेट झाली २००२ सालच्या मराठा साहित्य संमेलनात ! चिपळूणच्या ग्रामीण पत्रकारितेत काहीतरी करण्यासाठी धडपडत असलेल्या मला या संमेलनाच्या स्मरणिकेच्या संपादन समितीत काम करण्याची संधी मिळाली. विषय माझ्यासाठी नवीन होता. मार्गदर्शक होते, अर्थातच जाधव सर ! तेव्हापासून सरांसोबत संवाद सुरु झाला आणि असंख्य स्मरणिका, विशेषांकांचे संपादन, पुस्तकांचे लेखनही ! सन २०१८ साली आम्ही आमच्या ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या जीवनकथेवरील अभिप्राय पुस्तिकेकरिता, चरित्रनायक परांजपे गुरुजींच्या सूचनेनुसार सरांशी संवाद साधला. त्यांना, आम्ही लिहिलेली काही पुस्तके भेटही पाठविली. सरांनी ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ यावर ‘बेस्ट वर्ड्स ईन बेस्ट ऑर्डर’ या शब्दात आपला अभिप्राय पाठविला. सर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आमची इतर भेट पुस्तकेही वाचली. त्यातल्या ‘कृतार्थीनी’ या मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या चरित्र पुस्तकात आम्ही नीटशा माहिती अभावी ‘मोघम’ कॅप्शनसह छापलेला विद्यार्थी वसतिगृहाच्या कोनशीला अनावरण प्रसंगीचा फोटो पाहून, तात्काळ फोनवर ‘हा चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेजचा असून त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले होते’ असे सांगून उत्तम माहितीही दिली. आपल्या देशात गावागावात, कानाकोपऱ्यात विलक्षण काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या जीवनाला शब्दबद्ध करायला हवं. या ठाम मताचे सर होते. आमची ती पुस्तके वाचून सरांनी आपली अलिकडची तीन पुस्तके भेट पाठविली, आवर्जून अभिप्रायही मागितला. त्याबाबत फोनवर बोलणंही झालं ! मात्र लेखी अभिप्राय द्यायचा राहिला तो राहिलाचं ! ती तीनही पुस्तकं सरांच्या आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते या भूमिकेशी सुसंगत आहेत. सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद (रावबहादूर मल्लप्पा बसप्पा वारद), उद्योगरत्न श्री. ए. जी. पाटील ; एका संघर्षाची कहाणी आणि तिसरे आहे होनमुर्गीचे संत श्री सद्गुरू जंगली महाराज (मोहम्मदशाह उर्फ जंगलीशाह दाऊदशाह कादरी) यांचे ! पुण्याच्या जंगली महाराज रोडवर एक तपाहून अधिक काळ माझे जाणे-येणे आहे. मात्र त्या मूळ स्थानाची सरांनी दिलेली, सोलापूरच्या होनमुर्गी गावात आपल्याला घेऊन जाणारी माहिती यापूर्वी वाचलेली नव्हती.  

तीन तपाहून अधिक काळ सरांनी साहित्य, इतिहास, संत, समाजसुधारक या विषयांच्या अवतीभवती राहून आपला जीवनकाळ सफल केला. अलिकडेच सरांच्या २२ व्या कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे २७ नोव्हेंबर २०१८ ला ना. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. ‘सोलापूर जिल्हा पर्यटन’ पाठोपाठ सध्या सर ‘अक्कलकोट दर्शन’ लिहित होते. चिपळूणातून, कोकणातून त्यांच्याकडे जाणाऱ्या स्नेहींना ते आपणहून अभ्यासपूर्ण अक्कलकोट दर्शन घडवितं. आम्हांलाही त्यांनी यायला सुचविले होते, पण तेही राहिले. या पुस्तकानंतर ‘संत गाडगेबाबा’ यांच्या जीवनावर विस्तारपूर्वक लिहायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. खरंतर गाडगेबाबांविषयी आम्हांलाही अतीव आदर असल्याने आम्ही, ‘आपले पुस्तक वाचावयास उत्सुक आहोत’ असे त्यांना बोललो होतो, आता तेही राहिले. सरांचे विवेकवादी लेखन, आकाशवाणीवरील व्याख्याने इथल्याप्रमाणे सोलापूरातही सुरूच होती. सरांच्या भूत भानामती जादूटोणा आणि शोध भुताचा या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले होते. आदर्श प्राध्यापक, प्रौढशिक्षण कार्यकर्ता, व्यसनमुक्ती कार्य, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्या कामासोबतच ते कन्या भक्ती हिच्या जलचळवळ अभियानचे खंबीर पाठीराखे होते. स्वतःची पदरमोड करून सुरु असलेला भक्तीचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी ते सुरुवातीपासून गेली ८ वर्षे सोबत राहिले. परवाच्या ९ ऑगस्टला भक्तीने फेसबुकवर, ‘उजनीतील पाण्याने हिप्परगा तलाव भरणार, पप्पांचं - आमचं स्वप्न पूर्ण होतंय, धन्यवाद. सोलापूरला आल्याचे सार्थक झाले, लाखोंना पाणी मिळेल !’ अशी पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला. तो सरांनी सरांनी ‘याचि देहि याची डोळा’ अनुभवला आणि अवघ्या दोनेक आठवड्यात सर गेले ! हा सरांच्या कुटुंबियांवर मोठा आघात ठरला आहे.  
       
जेष्ठ संपादक, नानासाहेब जोशी यांनी, ‘चिपळूणला मिळालेले वैभव’ अशा शब्दात सरांचा गौरव केला होता. त्याचा अर्थ जाधव सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या ‘ज्ञान जान्हवीचा प्रवाह’ या डी.बी.जे. कॉलेजच्या साडेतीन तपाची वाटचाल सांगणाऱ्या ग्रंथाकडे पाहाताना कळतो. अशा प्रकारचे ग्रंथ सिद्ध करताना, यापूर्वी असे काम केलेल्यांचा संदर्भ समोर ठेवून काम करण्याची सरांची सवय, आपल्यालाही असल्याबाबत आम्हांला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले होते. असो ! सरांनी देहदान केले होते. त्यांचे अचानकचे जाणे सहृदयांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज वाटेकर  

२२ व्या पुस्तक प्रकाशन प्रसंगीचा क्षण !

दैनिक सकाळ रत्नागिरी २५ ऑगस्ट २०१९  

दैनिक सकाळ सोलापूर ३१ ऑगस्ट २०१९














सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

एक ‘संजय’ मलाही भेटला !



निश्चित तारीख नि वार डायरीत शोधावा लागेल ! पण पावसाळ्याचे दिवस होते. सायंकाळची चहाची वेळ ! ठिकाण बहुधा तृप्ती हॉटेल असावं ! लिहिलेलं मनाजोगं छापून येतं नसल्याच्या, नाराजीत वावरत असलेल्या मला त्या दिवशी संजय सहजच बोलून गेला. ‘कुठल्यातरी पेपरला जॉईन हो ! लिहिलेलं छापून यायला तेही आवश्यक असतं.’ झालं ! त्याच्या या वाक्याने पुर्वानुभावामुळे ‘पत्रकार’ होण्याची इच्छा नसलेला मी केवळ आपलं लिहिलेलं छापून येईल या एका आशेने पुन्हा पत्रकारितेकडे वळलो. त्यात रुळलो आणि जवळपास १२/१४ वर्षे वावरलोही ! आज या घटनेला, संजयच्या जन्मतारखेएवढी वर्ष पूर्ण होताहेत. ‘संजय’ स्वतः कसा आणि किती बहरला ? याबाबत आत्ताच एक्कावनीच्या उंबरठ्यावर मांडणं कदाचित घाई-घाईचं होईल. पण त्याच्या सहज स्वभावातून, बोलण्यातून, गुदगुदल्यांतून, माणूस जोडो अभियानातून अनेकांचं निभावल्याचं मी तरी पाहिलंय ! ही यादी मोठी आहे. या मागची कारणं शोधताना, का कुणास ठाऊक ? पण कायम मला महाभारतातला संजय आठवतो आणि मी म्हणतो, ‘एक संजय मलाही भेटला.’    
 
महाभारतातल्या संजयला सगळेच ओळखतात. हा संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होता. तो धृतराष्ट्राला नेहमी सल्ला देत असे. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना या संजयच्या वाणीने ऐकली होती. असो ! प्रस्तुतच्या गौरवांकाची गौरवमूर्ती असलेला आमचा संजय आज वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करतोय ! यशस्वी आयुष्याचा अर्धशतकी टप्पा त्याने पूर्ण केला आहे. आमचाही संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. माझ्यासह अनेकांना त्याने आजवर अनेक उपयुक्त सल्ले दिलेत. आपल्या पोटापाण्याच्या ठिकाणावरील कामाचा, तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा बरोबर अंदाज घेत, त्याचा उपयोग करून स्वतःकडे, शिल्लक असलेला ‘वेळ’ दुसऱ्या कामात गुंतवून पदरात यश पाडून घेण्याचं फार कमी लोकांना जमलेलं कौशल्य संजयने जमवलंय ! यामागचं त्याचं तत्वज्ञानही खूप साधं, सरळ नि सोपं आहे. नोकरीच्या निमित्ताने तो गाणे-खडपोली एम.आय.डी.सी.तील जे. के. फाईल्स कंपनीत कामगार म्हणून रुजू झाल्यावर दुपारी साडेतीन नंतरचा वेळ शिल्लक असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुंदर हस्ताक्षर असलेला संजय अधिकचे काय करता येईल ? याच्या शोधात असताना त्याला ‘पत्रकारिता’ हे क्षेत्र गवसले. कंपनीतील निळ्या कपड्यांचा त्याने त्याच्या मानसिकतेवर कधीही परिणाम होऊ दिला नाही, हे त्याच्या विनोदी जगण्याच्या पद्धतीचे सर्वात मोठे यश मानायला हवे. तो कार्यरत असलेल्या कंपनीत, पंचक्रोशीतल्या जवळपास साऱ्या गावातील सहकारी असल्याने गावोगावच्या ताज्या घटना त्याला एकाच ठिकाणी कळायच्या. बोलका, विनोदी स्वभाव असल्याने त्याचं तेव्हाही आणि आजही कुणाशीही जमतं. या मिळकतीच्या जोरावर संजयने पत्रकारिता यशस्वी केली. तेव्हा या भागात हा एकटाच पत्रकार म्हणून कार्यरत होता. शैलीदार बोलण्यामुळे तो हसतखेळत बातम्या मिळवायचा. त्याच्या या बातम्यांनी ‘तरुण भारत’ वृत्तपत्राच्या रत्नागिरी आवृत्तीचा सुरुवातीचा काळ गाजविलायं. कोयना प्रकल्प अस्तित्वात येत असल्याच्या कालखंडापासूनचा अलोरे पंचक्रोशीचा ‘संजय’ हा एक चालता-बोलता इतिहास आहे. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात त्याच्या फेसबुकवरील पोस्ट वाचल्यावर प्रतिसाद म्हणून जो आठवणींचा पाऊस कमेंटमध्ये पडतो, तो पहिला की याची जाणीव व्हावी. आपल्याला कशाकशातलं किती कळतं ? यात अडकण्यापेक्षा आपल्याला जे काही कळतं, त्याचा सर्वोत्तम उपयोग करून आयुष्य सार्थकी कसं लावावं हे संजयकडून शिकावं !    
   
आता सोशल मिडिया अधिक प्रभावी झालायं ! मनातलं सगळं पेपरात छापता येतचं असं नाही. मग संजय या सोशल मिडियाचा सहज वापर करताना दिसतो. अलिकडच्या काळात अलोरेतील देवमाणूस असलेले डॉ. पी. डी. पांढरपट्टे यांनी वयोमानपरत्त्वे, निवृत्तीनंतरही सुरु असलेला आपला दवाखाना बंद करून मुलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संजयला कळले. त्याने ‘देवमाणूस दूर चाललायं, हे वेदनादायी आहे’ म्हणत आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविल्या. अलोरे हायस्कूलने आपल्या सन १९७२ पासूनच्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचं ठरवलं. त्यात याला आपला शालेय मित्र अनिल रायबागी भेटला. विप्रो या नामवंत उद्योग समूहाचा व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेल्या मित्राशी संजय ज्या आत्मीयतेने एकरूप झाला ते कौतुकास्पद होते. शाळेनेही प्रत्यक्ष कार्यक्रमात रायबागींचा सन्मान संजयच्याच हस्ते केला. असंख्य राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या व्यंकटेशराव कररा यांच्यासोबत सुरुवातीच्या कठीण काळात उभे राहणाऱ्यांपैकी संजय एक जबाबदार घटक आहे. चिपळूणच्या पूर्व भागात असलेल्या दसपटीतल्या व्यक्तिमत्त्वांचा याला प्रचंड अभिमान ! तो त्याच्या लेखणीतूनही जाणवतो. याच अनुषंगाने त्याने दैनिक तरुण भारतमध्ये पूर्वी ‘बॉर्डर’ नावाचे सदर चालविले होते. आजही तो या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वांविषयी लिहित असतो. पूर्वीचं हे सगळं लेखन त्यानं सांभाळलं असतं तर आज एक सुंदर पुस्तक झालं असतं. स्वतः गुणवंत कामगार ठरल्यानंतर त्याने इतरांना प्रेरणा दिली. कामगार कल्याण मंडळाचे उपक्रम समाजातील कामगारांपर्यंत पोहोचावेत म्हणून तो आजही धडपडत असतो. गप्पांच्या निमित्ताने घडलेला एखादा जुना गंमतीदार किस्सा जसाच्या तसा पुन्हा उभा करून सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. सहजतेने मनातलं सगळं बोलून मोकळं होण्याचा त्याचा स्वभाव अनेकांना आवडतो. या स्वभावाने कधीकधी त्याचं नुकसानही होतं ! पण संजयला त्याची फारशी चिंता नसते. ‘पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेलं पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !’ असं म्हणणाऱ्या व. पु. काळेंच्या लिखाणाचा संजयवर मोठा पगडा आहे. वाचनाची गोडी लागायच्या सुरुवातीच्या कालखंडात त्याने त्यांचीच पुस्तके अधिक वाचलीत. हे त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून कुणालाही लक्षात यावं. कुणाला पटो अथवा न पटो ! आपल्या साऱ्या कुटुंबियांसह जवळच्या अनेक मित्रांच्या अडचणींच्या प्रसंगी धावून जाणारा संजय अनेकांना माहिती आहे. किंचित उशीरा लक्षात आल्यानंतरही झपाटल्यासारखा तो श्रद्धा वहिनीच्या मागे उभा राहिला, तिचे शिक्षण त्याने पूर्ण होऊ दिले. अर्थात वाहिनीनेही त्याच्या विश्वासाचं चीज केलं. ‘शिक्षिका’ म्हणून वाहिनीची आजची असलेली ओळख निश्चित कौतुकास्पद आहे. त्याच्या दोनही गुणवान लेकरांच्या प्रगतीचा आलेख कुणालाही हेवा वाटावा असाच राहिला आहे. त्याचा आजचा गौरव सोहोळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला आईचं असणं जितकं आनंददायी आहे तितकंच अण्णांचं नसणं वेदनादायी आहे.        

मी व्यावसायिक, सामाजिक स्तरावर कार्यरत होतानाच्या कालखंडातल्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी ‘संजय’ एक आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातलं चांगलं-वाईट जवळून अनुभवलेल्या संजयने, वयाने तब्बल ११ वर्षांनी मोठा असूनही जसं माझ्यासारख्याला मित्र म्हणून सहज स्वीकारलं, तसं अनेकांना स्वीकारलेलं आहे. माझ्या लग्नाचा सन्माननीय निमंत्रक राहिलेल्या संजयविषयी सांगण्यासारख्या खूप काही आठवणी माझ्याजवळ आहेत, तशा त्या अनेकांजवळ असणार आहेत. आजपासून काळ जसजसा पुढे जात राहिलं तसतशा त्या उलगडत जातील ! उलगडणाऱ्या अनेकांच्या आठवणींमधून एक माणूस म्हणून ‘संजय’चे व्यक्तिमत्व समाजात अधोरेखित होईल ! या साऱ्या शुभेच्छांतून नवचैतन्याने भारलेले संजयचे व्यक्तिमत्त्व समाजाच्या प्रत्येक हाकेला ‘ओ’ देण्यासाठी अधिक क्षमतेने कार्यरत होईल, या विश्वासासह !

धीरज वाटेकर

बुधवार, २४ जुलै, २०१९

राज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !

खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५/१७ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा  गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. या पार्श्वभूमीवर नुकतीच किल्याला भेट दिली असता किल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आल्याने घोर निराशा झाली. पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेला आढळला. यामुळे शासनाने हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करताना नेमके कोणते तांत्रिकनिकष लावले ? याबाबत पुन्हा एकदा इतिहासप्रेमींच्या मनात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचा संरक्षित स्मारकअसा बोर्ड लागलेला असताना तिथे टाळेपाहायला मिळणे अत्यंत वेदनादायी आहे.

धीरज वाटेकर यांनी नुकतीच स्थानिक दीपक वैद्य, चिपळूणचे सर्पमित्र अनिकेत चोपडे यांच्यासमवेत बहुचर्चित किल्ले गोपाळगडला (दि. २३ जुलै २०१९) भेट दिली. साधारणतः १५/१६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात आवाज उठवला होता. अलिकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. शिवतेज फौंडेशनच्या मनोज बारटक्के यांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली. याबाबत फौंडेशन पुन्हा आवाज उठवेल अशी प्रतिक्रिया दिली. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी शिवतेज फाऊंडेशन, अॅड. संकेत साळवी, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे, आदि अनेकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वास्तू, स्मारके, किल्ले संरक्षित केले जातात. या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हणतात. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा येथेही लागू करण्यात आला आहे. तरीही गोपाळगडावर ‘टाळे’ लावलेले का आहे ? हे अनुत्तरित आहे.

महाराष्ट्रातील विविध राजवटींनी सह्याद्रीत गडपरंपरा निर्मिली. एका पेक्षा एक ताकदीचे, देखणेबुलंद सागरीदुर्ग निर्मिले गेले. शिवकाळात तर या दुर्ग परंपरेला तेज प्राप्त झाले. कोकण किनारपट्टीवर ताठ मानेने स्वतःची ओळख जपून असणारा याच परंपरेतील अंजनवेलचा गोपाळगड अलिकडेच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला. दुर्ग आणि इतिहासप्रेमी, स्थानिकांच्या आग्रही मागणीनंतर शासनाने गोपाळगडला न्याय दिला. प्राचीन काळात वाशिष्ठी नदीतून चिपळूण ते दाभोळ बंदर पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी वशिष्ठी खाडीच्या उगमाच्या आणि संगमाच्या मुखाजवळ दोन किल्ले उभारण्यात आले. यात अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड यांचा समावेश होतो. हे दोन्ही किल्ले वाशिष्ठीचे पहारेकरी म्हणून ओळखले जातात. यातल्या गोपाळगडावर अनेक राजवटी नांदल्या. विविध कालखंडात गडाची पुनर्बांधणी होत राहिली. गडाचे आजचे स्वरूप हे शिवकालिन आहे. सन १६६० दरम्यान गोपाळगड स्वराज्यात आला. त्याचा गोपाळगड झाला. स्वातंत्र्यात गोपाळगडाला खासगी मालकीचे ग्रहण लागले. गडात कलमी आंब्याची बाग फुलविण्यात आली. किल्याची तटबंदी कोसळून, खंदक बुजवून दरवाजा करण्यात आला. दरवाजाला ग्रील बसविण्यात आले. या ग्रीलावरून उद्या मारून आत जाऊन शिवप्रेमी हा किल्ला पाहात असतं. मात्र आता किल्ला राज्य संरक्षित झाल्यानंतर तिथे ‘टाळेबंदी’ का आहे ? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पूर्वी या गडावर 'खाजगी मालमत्ता' असे लिहिलेला बोर्ड असायचा. तो बोर्ड शिवप्रेमींना अवस्थ करायचा. गडकोट ही राज्याची मिळकत असताना तिथे खासगी मालकी आलीच कशी ? हा पूर्वीचा मूळ मुद्दा आजही अनुत्तरीत आहे.

गोपाळगडावर अनधिकृत बांधकाम, गडातली वडाची झाडे तोडली गेली आहेत. किल्ल्यावरील धान्य कोठारे, बुजवलेल्या विहिरी पुन्हा सुस्थितीत यायला हव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सागरी आरमाराचा गोपाळगड हा महत्वाचा घटक आहे. गोपाळगडाची अभेद्य तटबंदी तोडून त्या ठिकाणी लोखंडी प्रवेशद्वार बनवले आहे. किल्ल्यात बांधकाम करण्यात आलेले असून हा सारा प्रकार वेदनादायी आहे. शासनाने ऑगस्ट २०१६ मध्ये ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या दस्ताऐवजामध्ये सरकारी कातळ अशी नोंद होऊन हा गोपाळगडाचे अस्तित्व नाहीसे झाले होते. सन २०१५ मध्ये स्थानिकांच्या १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते. तीन बाजूंनी खंदक, २० मीटर लांबीची तटबंदी असलेला गोपाळगड किल्ला १ हेक्‍टर ५.८३ आरमध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याजवळील पठारापर्यंत आजही गाडीने जाता येते. किल्ला एका छोट्या टेकाडावर बांधलेला आहे. टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी समुद्राच्या दिशेने खाली नेलेली दिसते. सर्वात खालच्या भागाला पडकोट आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या ह्या किल्ल्यावर जमिनीकडून आक्रमण झाल्यास संरक्षणार्थ खोल खंदक आहेत. जमिनीकडील बाजूला किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. बुरुजांवर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस देवड्या आहेत. किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, धान्य व दारु कोठारे त्याजवळील बांधीव तलाव, घरांची जोती, तीन विहीरी असे अवशेष दिसतात. ७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही. विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात गोपाळगड बांधण्यात आला. शिवाजी महाराजांनी इ.स. १६६० च्या दाभोळ स्वारीवेळी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला, याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली. किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खैरातखान याने किल्ला जिंकला. याच काळात त्याने किल्ल्याचा पडकोट बांधला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेनी हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुढे १८१८ पर्यंत तो स्वराज्यात राहिला. १७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला जिंकून घेतला.

हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहे. गोपाळगड खाडीपातळीपासून सुमारे ३०० फूट उंचीच्या डोंगरावर उभा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या गडाच्या दक्षिण दिशेला मोठी दरी आहे. हा गड किती भक्कम होता ? हे तटबंदी पाहाताच लक्षात येते. या किल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, त्याबाबतचा निश्चित निर्णय होण्यासाठी अजूनही प्रयत्न आवश्यक आहेत.

धीरज वाटेकर  







रविवार, ७ जुलै, २०१९

धीरज वाटेकर यांना ‘लोटिस्मा’चा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार


चिपळूण : येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार लेखक, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना जाहीर झाला आहे. धीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना ग्रंथालयाचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली. 

सन १९९७ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमाध्यमातून लिखाणाची, सामाजिक कार्याची गोडी लागलेल्या वाटेकर यांनी दैनिक कोकण गर्जना, पुढारी, लोकसत्ता करिता पत्रकारिता केली आहे. अध्ययनासाठी केलेल्या हिमाचल ते कन्याकुमारी आणि भूतान या प्रवासातून जमविलेला किमान २५ हजार वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. गेल्या किमान तीसहून अधिक संग्राह्य विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक, दिवाळी अंकांचे संपादन, संदर्भ कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, "परमचिंतन" अभ्यासिकेसह संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन त्यांनी केले आहे. राज्यभरातील नियतकालिकतून विविध विषयांवरील, दीड हजारहून हून अधिक लेख प्रसिद्ध झालेत. कोकणच्या इतिहासाचे अभ्यासक अण्णा शिरगावकर यांनी लिहिलेल्या वाशिष्ठीच्या तीरावरून, गेट वे ऑफ दाभोळ, शेवचिवडा, व्रतस्थ, वाटचाल या ग्रंथांची निर्मिती आणि संपादन त्यांनी केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे यांचा सहवास लाभलेल्या सौ. कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थीनी’ हे चरित्र त्यांनी लिहून प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अण्णांच्या कार्याचाही गौरव केला आहे. त्यांची चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन, ही ५ पर्यटन पुस्तके आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी ह्या जीवनकथा प्रसिद्ध आहेत. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. २०१५ साली त्यांच्या ठोसेघर पर्यटन पुस्तकास कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा नलगे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. सप्टेंबर २०१६ ला माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषणपुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात गौरव, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून गेल्यावर्षी जून महिन्यात 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘वाशिष्ठी नदी : उगम ते संगम’ हा संशोधित निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.

धीरज वाटेकर हे ग्रंथनिर्मितीसह पर्यावरण रक्षण, पर्यटन, कोकण विकास आदि सामाजिक चळवळीत अग्रभागी असतात. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सर्व कामात अत्यंत तळमळीने सहकार्य करतात. त्यांचे लेखनही अत्यंत प्रवाही व वाचनीय असते. या निवडीबद्दल लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रकाशित बातमीच्या लिंक्स !





दैनिक प्रहार ०६०७२०१९


दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस ०६०७२०१९ 


दैनिक रत्नागिरी टाईम्स ०७०७२०१९

बुधवार, ३ जुलै, २०१९

तिवरेतील शोकांतिका !

'अरे त्या ...ची डेडबॉडी नाही मिळायला अजून ? खाली गेली असलं वाहून ? लोकं शोधतायतं !' काल रात्री धरण फुटून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे (ता. चिपळूण) गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या एका बाजूच्या खोलीत दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना, सकाळी भेटायला जाताना हा संवाद कानावर पडला नि मनाला असह्य वेदना झाल्या. कालपर्यंत जी नावानंं ओळखली जात होती त्यांची आजची ओळख त्रासदायक होती. पुढे गेल्यावर त्या खोलीतील प्रत्यक्ष दृश्य जे दिसलं ते तर त्याहून विदारक होतं. त्या खोलीतले आर्त स्वर मन विस्कटून टाकत होते. प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळणारं सत्य घटनेची भयानकता सांगत होता. कुणा लहानग्या शाळकरी मुलानं डोळ्यांदेखत घरचे सारे गमावले होतं ! तर कोणी आपली दुचाकी वाचवायला म्हणून गेलेला परतलाच नव्हता. कोणी पुलावरून दुचाकी घेऊन जाताना अचानकच गायब झाला होता. कोणी जेवायला बसलेला पुन्हा उठूच शकला नाही. गेलेल्यांच्या या साऱ्या आठवणीने जमाव अश्रू ढाळत होता. चिपळूणहून तिवरेकडे जाताना वाटेत भेटलेल्या नदीच्या दोन्ही पात्राशेजारील विस्कळीत निसर्ग, शेती, घरे, झाडे कालच्या रात्रीची तिवरेतील शोकांतिका बयाण करत होते.

photo : www.thehindu.com
घटना घडल्याचे चिपळूणात अनेकांना आदल्या रात्रीच (मंगळवार) समजले. प्रशासन सतर्कही झाले. आज (बुधवारी) सकाळी-सकाळी अनेकजण तिवरेकडे धावले. तिवरे धरण फुटल्याची बातमी आम्ही सकाळी व्हसअपवर पाहिली, नुसती बातमीच नाही तर पाठोपाठ मृतांचा आकडाही वाचायला मिळाला. खरंतर सह्याद्रीतील प्राचीन बैलमारव घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेलं तिवरे हे निसर्गरम्य गावं. आज मात्र गावात जाताना त्या वातावरणाकडे बघवत नव्हतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह असंख्य बघ्यांचीही गर्दी उसळल्याने सकाळीच रिक्टोली फाट्याच्या अलिकडे रस्ता जॅम झाला. चिपळूणच्या पर्यटनात ‘तिवरे’ गावाचे स्थान महत्वाचे आहे. अर्थातच 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'ची टीमही घटनास्थळी पोहोचली. भेटणारे अनेकजण घटनेची माहिती देत होते. काल (मंगळवारी) धरण ओव्हर फ्लो झाले. धरण जिथून फुटले तिथून खालून गढूळ पाणी येत होते. धरण लिक होते. प्रत्यक्ष घटनेत तिवरेच्या भेंवाडीतील सारी घरे, गणपतीचे मंदिर वाहून गेले. या धरणाच्या गळतीचा विषय किमान ४ वर्ष जुना आहे. ३ वर्ष तो गावात चर्चेत आहे. गेली २ वर्षे वृत्तपत्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर मांडला गेलेला आहे. अर्थात ‘असं होऊ शकतं ?’ हे माहित असून सुद्धा ते कोणाला थांबवता आलेलं नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे ८ घरं गेली, ११ कुटुंब उद्धवस्थ झाली. जवळपास २३ जण बेपत्ता झाले. एकजण सुदैवाने जीवंत सापडला. १८ जणांचे मृतदेह सापडले. ४ जणांचा शोध सुरु आहे. किमान ३५ जण विस्थापित झालेत. सारं वेदनादायी आहे. मृतदेह शोध मोहिमेत एन.डी.आर.एफ.चे पथक आणि त्यांच्या मदतीला स्थानिकांसह साताऱ्याचा सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुप, रत्नागिरीचा जिद्दी मौन्टेनिअरिंगचा ग्रुप कार्यरत आहे. सगळ्या प्रेतांची धरणाच्या अजस्त्र लोंढ्यात आदळआपट झाल्याने ओळख पटविणेही कठीण बनले आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर विस्थापितांना अनेकांनी आपापल्या परीने मदतीचा हात देऊ केलाय. तशी सुरुवात तर तिवरे ग्रामस्थांनीच केली. सरकारची यंत्रणा, वैद्यकीय सेवा, ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ सह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही तिवरेत पोहोचले. आमच्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ म्हणून दिवसभरात गावात दोन फेऱ्या झाल्या. पहिल्या भेटीत तातडीची गरज समजावून घेवून चेअरमन श्रीराम रेडिज यांनी पुढच्या आठवड्याभराच्या जेवणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. जसा त्यांनी विचार केला तसा विचार करणाऱ्या अनेक संस्था असल्याचं दुसऱ्या भेटीत लक्षात आलं. कारण तातडीच्या गरजांमध्ये लागणारे अन्नधान्य, कपडे, भांडी, पाणी असं शाळेत जमा झालेलं पाहिलं. संपूर्ण दिवसभर लोकं मदत घेऊन आपणहून तिवरेकडे धावत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रत्नागिरीहून कोणीतरी पाचशे वडापाव घेऊन आलं होतं. समाज एकवटलेला दिसला. 
   
तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. हा भाग दुर्गम आहे. २.४५२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण सन २००० साली पूर्णत्वास गेले होते. तिवरे धरण फुटीत भेंदवाडी पाण्याखाली गेली. स्थानिकांनी या घटनेला प्रशासनाला जबाबदार धरले. त्यांचा पत्रव्यवहारही तेच बोलतोय. सरकारी कारभार लोकांच्या जीवाशी खेळल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. यातल्या दोषींवर कारवाई होईलही ! मात्र ही घटना गेलेल्यांचे आणि मागे राहिलेल्या विस्थापितांचे प्रश्न, नव्याने निर्माण करून राहिली आहे. ते सुटेपर्यंत तरी क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणारी कालची अमावस्या विसरणे केवळ अशक्य आहे !

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...