सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

बालकांच्या समस्या वाढविणारी ‘ब्लु व्हेल गेम’ संस्कृती

कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ! मोबाईल, संगणकाचा शब्दशः अतिरेकी वापर घडावा, म्हणून जगभरात ज्या काही बाबी तथाकथित बुद्धिमंतानी पुढे आणल्यात त्यातील ‘गेम’ संस्कृतीने गेल्या महिन्याभरापासून भारतात प्रचंड दहशत निर्माण केली आहे, कधी नव्हे तो पालकवर्ग, ‘आपला मुलगा मोबाईल अथवा संगणकावर बसून नेमका कोणता गेम खेळतोय ? आणि त्याचे काही भयानक परिणाम तर नाही आहेत ना ?’ याची चाचपणी करीत आहे. विज्ञानामुळे जग जसजसे जवळ येते आहे, तसतश्या समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू लागल्यात. गेल्या महिन्याभरात त्यांनी ब्लू व्हेल गेमच्या माध्यमातून ज्या प्रकारे बालकांच्या मेंदूचा ताबा घेतला ते पाहाता, नीट विचार करता धोके अधिक गंभीर होताना दिसत आहेत.    

जगातील लहानग्यांमध्ये ब्लू व्हेल, द सायलेंट हाऊस, द सी ऑफ व्हेल, वेक मी अप अ‍ॅट टू फोर्टी हे विचित्र इंटरनेटवरील खेळ विशेष प्रसिद्ध आहेत.  १२ ते १९ या वयोगटात या गेमची क्रेझ आहे. यातील ‘ब्लू व्हेल’ने भारतात हल्लीच एका १४ वर्षाच्या मुलाचा बळी घेतला, आणि यातील गांभीर्य देशासमोर आले, तसे जगात इंग्लंड, इटली आणि अमेरिका या देशांमध्येही या गेमने जवळपास १३० जणांचे प्राण घेतले होते, पण तेव्हा त्याचे गांभीर्य आपल्याला कळले नव्हते. या घटनेनंतर मात्र आपल्या सरकारने या खेळावर बंदी आणली, पण तरीही समस्या संपलेली नाही. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे रोज एक नवा गेम इंटरनेटवर येत असतो. आपली मुलंही तो गेम डाउनलोड करून सहज खेळायला लागतात. हे खेळ कुणी कुणाला शिकवतही नाही. तरीही हे खेळ थेट खेळायला सुरु करुन, गेमचे नियम आत्मसात केले जातात. आपली मुलेही हे करतात. कोणताही शास्त्रीय शोध हा माणसाच्या सोयीसाठी लागलेला असतो. परंतु त्याचा वापर करण्याचे तारतम्य सुटले म्हणजे असे जीवघेणे खेळ सुरू होतात. मोबाईल गेम बनविणारे मानसिकदृष्टया अपरिपक्व, कमकुवत मनस्थितीचा गैरफायदा घेऊन 'ब्लु व्हेल' सारखे जीवघेणे खेळ तयार करतात. त्यातील अवघड टास्क पूर्ण करण्यासाठी मुले जीवावर उदार होतात, तेव्हा अंगावर शहाराच येतो. हे गेम खेळता खेळता मुले आत्महत्या करतात, हे वास्तव धक्कादायक आहे. हे असे का घडते ? आत्महत्या करणार्‍या जगातील या मुला-मुलींचं सोशल मीडियावरील प्रोफाईल तपासल्यानंतर लक्षात येत की, या मुलांपैकी बहुतांश मुलं एकटी, एकलकोंडी आणि तणावग्रस्त असतात. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर निराश, उदास, डिप्रेस्ट मजकूर पोस्ट केलेला आढळतो. अशांना हे खेळ एक आव्हान देतात. काहीतरी करुन दाखवण्याचं ! आणि मग त्या मागे धावताना पुढे हे घडतं !
पूर्वी सन २०१५ साली चार्ली चॅलेंज नावानेही एक गेम प्रसिद्ध झाला होता. यामध्येही आत्म्यांशी किंवा दुष्ट अद्भूत शक्तींची भेट घालून देण्याचे आश्वासन दिलेले होते. मध्यपूर्वेतील अनेक तरुणांना या खेळानं वेडं केलं होत. तेथील पोलिसांना शेवटी कॉलेजमध्ये समुपदेशनाचे वर्ग आयोजित करुन जागृती करावी लागली. ब्लू व्हेल गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. सूचना  देणारा व्यक्ती अज्ञात असतो. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. ५० प्रकारच्या आज्ञांचे टप्पे ओलांडणाऱ्या खेळणार्‍याला शेवटी आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं, काही शूरवीर आपलं जीवन या खेळण्याच्या नादात संपवतात ! त्यामुळे मृत्यूचा हा कुप्रसिद्ध ब्लू व्हेलगेम तपासाचा भाग म्हणून आता पोलीसही खेळणार आहेत. भारतात काही ठिकाणी या गेममुळे मुलांनी घर सोडल्याच्या, काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांच्या साहाय्याने बसस्थानकातून त्या मुलाला ताब्यात घेतले, पुढील अनर्थ टळला. आजही देशात, ग्रामीण भागात ब्लु व्हेल, लुडो हे गेम मुले रात्र-रात्रभर खेळत आहेत. अलीकडे जामनेरमध्येही या गेमच्या आहारी जाऊन एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 
सामान्य मुलांना मोबाईलवरचे कॅँडीक्रश, स्रेक, रेस, बर्न इट आऊट, ड्रॉप लीटज डिलाईट, बर्न द रोप, बॉम्ब टॉस, ब्लॉक ब्रेकर्स, क्रिकेट वर्ल्ड, स्पीड रेसींग, अ‍ॅँग्री बर्ड, टेम्पल रन, सबवे, फुटबॉल, सॉकर, तीनपत्ती
हे गेम आवडताहेत. पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर टाकलं की हातपाय धुऊन, खाऊ खाऊन कधी अंगणात खेळायला जातो असे व्हायचे. पण त्या अंगणाची किंवा मैदानाची जागा आता मोबाइलच स्क्रीनने घेतली आहे. पूर्वी साधा फोन नवलाईची गोष्ट होती तिथे, आज दोन वर्षाच्या मुलांना मोबाइलवरचे अ‍ॅप्स चालवता येताहेत. जितके फायदे तितकेच तोटेही या मोबाइलमुळे मुलांच्या आयुष्यात आले आहेत. आम्ही लहान असताना, लहान मुलांच्या दवाखान्यात इंजेक्शनच्या भीतीने मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा. आज ही लहान मुले बिझिनेसमॅनप्रमाणे मोबाइलमध्ये गर्क दिसतात. मुलांची भिती, चिंतेची जागा मोबाइलने घेतली. हा बदल चांगला की वाईट ? यावर भाष्य करणे जरा अवघडच आहे.
सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा अति वापर करणारे, इंटरनेट गेमिंग अॅडिक्ट मुले याच्या प्रभावाखाली लवकर येतात. अर्थात हे झाले लहान मुलांचे, पण आम्ही मोठी माणसेही मोबाईलच्या इतके आहारी गेलोय की सेल्फी काढण्याच्या नादात जीवास मुकतोय ! आजकालच्या वेगवान युगात अनेक गोष्टी अपरिहार्य बनल्या आहेत, पण त्याचा अतिवापर घातक ठरतो  आहे. लहानमुलांच्या हातात मोबाईल देणे, त्यांना सतत माहिती, व्हिडीओज, गेम्स पाहण्याची सवय लागली तर या छंदिष्ट मुलांना वेड लागण्याची पाळी येते. नंतर अचानक आपण त्यांच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ते चवताळून उठतात. अशा छंदिष्ट मुलांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे या वापरावर पालकांनी सततचे कालबद्ध नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे.


धीरज वाटेकर                                                                        dheerajwatekar@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...