शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने !

पुढील दोन वर्षात महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त होईल, अशी भूमिका महाराष्ट्राने केंद्र सरकारसमोर मांडली   आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या राज्य शासनाच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारची, शौचालय बांधकामाची गती वाढविण्याची गरज स्वयंसेवी संस्थेच्या सव्‍‌र्हेतून पुढे आली आहे. देशभरातील गावे हागणदारीमुक्त होऊन याठिकाणी स्वच्छता निर्माण करणे हे शासनाचे उद्दीष्ट अतिशय चांगले आहे. परंतु स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणा, अधिकारी आणि राजकीय पुढार्‍यांच्या अनास्थेपायी वर्षानुवर्षे या योजनांचा उद्देश साध्य होत नाही. खेडय़ांच्या या देशाला शुद्ध, ताजी हवा मिळत असली तरीही स्वच्छतेचा अभाव, हागणदारी हा शाप आहे. आकडेवारीनुसार सन १९८० पर्यंत ग्रामीण महाराष्ट्रात अवघा एक टक्का जनता शौचालयाचा वापर करत होती. यात सुधारणा झाली असली तरी ग्रामीण भागातील जवळपास किमान ४५ टक्के प्रात:र्विधी हे उघडयावरच गावाच्या कडेला रस्त्यावरच उरकले जातात, हेच दुर्दैवी वास्तव आहे.
स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अभियानांतर्गत सन २०१५ मध्ये राज्यातील ५२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. नागरी भागातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानात, घराघरात, सार्वजनिक ठिकाणी शौचालये बांधणे आणि घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे या दोन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील २६५ स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या शहरांमध्ये शौचालये नसलेल्या घरांची संख्या ८ लाखांहून अधिक आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घरात व सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वास्तविकत: आपले गाव स्वच्छ व सुंदर करुन हागणदारीमुक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गाव हागणदारीमुक्त झाले तरच राज्य हागणदारीमुक्त होणार आहे. राज्य शासनामार्फत शौचालय उभारणीसाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच राज्यात सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. व्यापक लोकसहभागासह सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणांचा या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग मिळत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करीत आहे. राज्याच्या जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात १९ लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उघड्यावर शौचाला प्रतिबंध म्हणून केंद्र शासनामार्फत दरवाजा बंद माध्यम अभियान सुरु करण्यात आले आहे. १६ हजार गावे हागणदारीमुक्त झाली असून हे प्रमाण देशातील हागणदारीमुक्त गावांच्या १८ टक्के आहे. शासन आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्यातील ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून यात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे यांचा समावेश आहे. गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेत घरगुती किंवा वैयक्तिक स्वच्छता कामांचा प्राधान्य क्रमामध्ये समावेश करावा, असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.
राज्यातील आदिवासी समाज संख्येने देशात सर्वाधिक आहे. आदिवासी क्षेत्रात शौचालय सुविधांचा १०० टक्के वापर व्हावा, यासाठी युनिसेफच्या सहकार्याने तयार केलेल्या जिल्हा आराखड्यानुसार शौचालय सुविधा वापर आणि स्वच्छता सवयींचा प्रसार यासाठी व्यक्ती संवाद आणि गृहभेटीसारखे उपक्रम राबवून स्वच्छता सवयीमुळे आजारांचे घटणारे प्रमाण आणि लहान मुलांच्या पोषणावर होणारे अनुकूल परिणाम लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होत असून एकूण राज्यातील स्वच्छता ३५ टक्क्यांनी वाढल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या साऱ्या शासकीय आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा पुरता हास्यास्पद ठरला आहे. राज्यातील अनेक गावातील शौचालयांचे बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून तिथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी तर शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार तर नाही ना ? अशी शंका यावी अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात अजुनही असंख्य महिलांना शौचालय उपलब्ध नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्राने गरज पडल्यास हा उपक्रम महिला रोजगार व स्वयंरोजगार किंवा बचतगटाच्या माध्यमातून राबविण्याची गरज आहे. यापूर्वी बचतगटाच्या माध्यमातून हागणदारीमुक्तगाव योजनेला गती देत सिक्कीम, केरळ, हिमाचलप्रदेश या राज्याने निर्मल होण्याचा मान मिळविला आहे.
आपल्याकडे बहुतांश सार्वजनिक आजार हे अस्वच्छतेमुळे फैलावतात. राज्यात अनेक गावात लाखो रुपये खर्चून वेशीवर आकर्षक कमानी बांधलेल्या दिसतात. सूर्य मावळतीला गेला की याच कमानीच्या जवळपास गावातील महिलावर्ग उघडयावर शौचासाठी बसतो. ग्रामीण भागात घराघरात शौचालये असावीत, ही संकल्पना निर्माण होणे गरजेचे आहे. एका ताज्या अहवालानुसार देशातील ५४.२ टक्के घरांमध्ये शौचालयांची सुविधा नसावी आणि ७२.५ टक्के घरांमध्ये दूरध्वनी असावेत, यातच सारे समजून यावे ! शासकीय योजनेतून हागणदारीमुक्त योजनेद्वारे शौचालय बांधण्यासाठी पैसे मिळवायचे, ‘संडास’ नामक छोटी खोली बांधून त्याचा वापर हा जळण, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी करायचा अशी मानसिकता आहे. अस्वच्छता हे संपूर्ण भारत देशाचं दुखणं आहे. स्वत:च्या घरात संडास बांधणा-या माणसालाच या देशात निवडणुकीला उभं राहता येईल, असा कायदा करावा लागतो. इतके आपण या विषयात मागासलेले आहोत. त्यामुळे या विषयात महाराष्ट्रासमोर मोठे काम करण्याचे आव्हान खूप मोठे आहे, हे नक्की !

धीरज वाटेकर                                                                              dheerajwatekar@gmail.com

कुपनलिकेतील दुर्दैवी मृत्यू !

गत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिर्डी नजीकच्या कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर गावी बोअरवेलमध्ये पडलेल्या सात वर्षीय साई बारहाते या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी पुणे येथून बोलाविण्यात आलेल्या एनडीआरएफच्या पथकाने, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बोअरवेलच्या दोन्ही बाजुनी खड्डा खोदून बाहेर काढले. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठीही हलवले परंतु तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात सतत ठराविक अंतराने कुठे-ना-कुठे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सुरुवातीच्या काळात या प्रकारांना ‘प्रिन्स’ प्रसिद्धीही मिळाली, परंतु कुपनलिका (बोअरवेल) खोदल्यानंतर तिला पाणी न लागल्यास ती मुजविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना आणि गावागावात जबाबदार ‘शासनप्रतिनिधी-लोकप्रतिनिधी-नेते-कार्यकर्ते’ वगैरे असताना या घटना थांबत नाहीत, ही बाब समाजाच्या बोथट  मानसिकतेवरही बोट ठेवते आहे.     

पिण्याच्या पाण्यासाठी, शेती किंवा अन्य वापरासाठी विंधनविहीरी, कुपनलिका खोदल्या जातात. त्यातील  अयशस्वी व वापरात नसलेल्या विंधन विहीरी, कुपनलिका या उघडया राहिल्यामुळे अपघात घडतात.  बोअरवेल खोदण्याची कृती करण्यापूर्वी परिसराच्या मालकाने त्या-त्या भागातील प्रशासकीय अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविणे, खोदकाम करणाऱ्या एजन्सीjजची जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी असणे, बांधकामाच्या ठिकाणी सूचनाफलक लावणे, बोअरवेलभोवती काटेरी कुंपण, योग्य अडथळा तयार करणे आदि उपाय वास्तविक करायला हवेत. नव्याने खणण्यात आलेल्या कुपनलिका, विंधनविहीरी वापर होईपर्यंत योग्य आकाराची झाकणे लावून बंद करण्याची गरज असते. वापरात नसलेल्या कुपनलिका, विंधनविहीरीच्या निकामी खडड्यामध्ये वाळू व दगडगोटे भरुन कोणतीही पोकळी राहणार नाही, अशा पध्दतीने सिमेंट कॉन्क्रीटने भरण्याची वा बुजविण्याची दक्षता संबंधित मालकाने घेणे गरजेचे असते. अशा कुपनलिका, विंधनविहीरीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी जागरुक व सावध असणे गरजेचे आहे. आपल्या गावात, परिसरात अशा धोकादायक विहीरी, कुपनलिका आढळून आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत यांचेशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. आवश्यकता वाटल्यास ग्रामसभा, विभागसभा याद्वारे या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.

अलिकडेच गेवराई भागातही कूपनलिकेमध्ये अडकलेल्या, शेतविहिरीवर काम करणाऱ्या नागू मस्के या मजुराचा दोन वर्षांचा मुलगा संतोष यास तब्बल सोळा तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत तो मृत झालेला होता. संतोषचा मृत्यू गुदमरून झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर जाहीर केले.  या प्रकरणी मुलाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून शेतमालक जानकीराम रंगनाथ जोशी यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे कुपनलिकेचे झाकण उघडे ठेवून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हाही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. मे २०१६ मध्ये शिरुर तालुक्यातील जुनामळा येथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुनिल मोरे या चिमुरड्यालाही एनडीआरएफ, अग्निशामक दल, वैद्यकिय पथक यांच्या प्रयत्नांनी तब्बल ३१ तास ३५ मिनिटानंतर बाहेर काढण्यात यश आले, मात्र उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली. शेतात खेळत असताना सुनिल मोरे हा पाय घसरुन वीस फुट खोल असणा-या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील करसगढ गावात एका ४ वर्षाचा मुलगा ५०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचवर्षी मार्च महिन्यात गिरगावातील फणसवाडी भागात जव्हार मॅन्शनमधील ४० फूट खोल बोअरवेलमध्ये दोन व्यक्ती पडल्या असताना, त्यांना प्रयत्नपूर्वक बाहेर काढल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मध्यंतरी दौंड तालुक्यातील mस्वामी चिंचोली येथेही कूपनलिकेत पडलेल्या ऊसतोडणी कामगाराच्या चार वर्षांच्या मुलाला वाचविण्यात सुदैवाने ग्रामस्थांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर यश आले. यापूर्वी देशात ग्वाल्हेरमध्ये तीन वर्षांचा मुलगा, कानपूरमध्ये अल्पवयीन मुलगी, नालगोंडामध्ये बालिकामेडकमध्ये बालक, वारांगण-आंध्रप्रदेशमध्ये दीड वर्षाच्या महेशचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.  सन २०१४ साली फेब्रुवारी महिन्यात श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव गावातील बोअरवेलमध्ये अडकलेल्या, विलास निकम या ऊस तोडणी कामगाराच्या १८ महिन्यांच्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला खूप प्रयत्नांती यश आले होते. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथील अवघ्या चार वर्षांचा ऋतुराज ढंगारे खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. याचा विचार करून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंगसुळीत भागात तरुणांनी ७५ बिनकामी कुपनलिका बूजविल्या, याचा दुसरा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणात त्या अनेकांनी तशाच उघड्या टाकल्या होत्या.

अशा साऱ्या प्रकरणांत अनेकदा लहान मुलांचा निष्कारण जीव तर जातोच आहे, परंतु त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी जे बचाव कार्य शासनाला करावे लागते त्यामध्ये फार मोठी धावपळ होत असते. अशी घटना घडल्यानंतर संबंधित मालकाविरुद्द गुन्हा दाखल करतानाच असे अपघात टाळण्यासाठी कुपनलिकेला झाकण बसविण्याची जबाबदारी सक्तीने कुपनलिका खोदून देणाऱ्या एजन्सीवर सोपविण्याची गरज आहे, कुपनलिका घेणारे शेतकरी अशिक्षित, कायद्याविषयी अनभिज्ञ असू शकतात. त्यामुळे याबाबतीत बोअरवेल्स एजन्सीज्ना हे झाकण बसविण्याची सक्ती करणे आवश्यक आहे. विविध विकासकामे होत असताना गावातील स्थानिक नेत्यांचे त्या कामांकडे ‘बारीक’ लक्ष असते. गावागावात खोदल्या गेलेल्या निकामी बोअरवेल बुजविण्यासाठी स्थानिक नेते, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना सहज लक्ष ठेवणे सोपे आहे. आपल्या देशाला विकसित देश बनव्याचे असेल तर आपल्याला सर्वांनाच छोट्या-छोट्या विषयांत कायदा पाळावा लागेल.


धीरज वाटेकर

विंचूदंश बळींची शोकांतिका !

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील काळवली गावात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडया ‘श्रावणी राजेश पार्टे’चा विंचूदंशानंतर उपचाराविनाच दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे घरात आनंदाने वावरणाऱ्या श्रावणीला अचानक काहीतरी चावले आणि वेदनांमुळे ती जोरजोरात रडू-ओरडू लागली. घरातील लोकांना तिच्या शरीरावर विंचूदंशाच्या खुणा दिसल्या, तातडीने तिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले गेले. तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे उपचारार्थ प्रवासात असताना उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला आणि अवकळा आलेल्या आरोग्यव्यवस्थेवर समाजमनाने आसूड ओढायला सुरुवात केली. विंचूदंशावर प्रतिलस उपलब्ध असताना निव्वळ निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या या शोकांतिकांना जबाबदार कोण ? त्यावर कारवाई कधी आणि काय होणार ? असे प्रश्न त्यामुळे निर्माण झालेत.        

या घटनेत पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यासाठी विंचूदंशावरील प्रतिलस इंजेक्शन उपलब्ध नव्हते. महाड येथील डॉक्तरांनी ‘वयाने व प्रकृतीने खुपच लहान असल्याचे कारण देऊन एवढया लहान बालिकेवर विंचूदंशाचे उपचार करण्यासंदर्भात असमर्थता दर्शवित माणगाव उपजिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.  माणगावला जात असतानाच उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला. शासकीयस्तरावर सर्वदूर डॉक्टरांची वानवा आहे आणि त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावते, म्हणूनच कदाचित स्थानिकांना अनेकदा बोगस डॉक्टरांची बाजू घ्यायला आवडत असावे. दुर्गम भागातील आरोग्यकेंद्रात जर विंचूदंशावर उपचार होऊ शकत नसतील तर या केंद्रांची आवश्यकता ती काय ? अर्थात या साऱ्याला नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेसंदर्भात सर्वसामान्यांत कमालीची चीड आहे. गोरगरीबांकडून अधिक पैशाची इथे नेहमीच लुट होत असल्याची ओरड होत असते. वर्षानुवर्षे हे असेच सुरु आहे. भारतात ब्रिटीश राजवटीपासून आरोग्य सेवा पद्धती सुरु झाली, तत्पूर्वी आयुर्वेदीय ‘वैद्य’ परंपरा होती, आजही आहे. ब्रिटीशकालीन आरोग्य यंत्रणेचे उद्दिष्ट सैनिक आणि युरोपियन नागरिकांना सेवा देणे हे होते. दरम्यान त्यांनी भारतातील प्लेग, कॉलरा, देवी या साठींवर उपचार सुरु केले. हे औषधोपचार पाश्चात्य पद्धतीचे होते.कालांतराने देशात सन १९४० साली आरोग्यसेवा सुरु झाली आणि सन १९४२ साली पश्चिम बंगाल राज्यात कलकत्याजवळ ‘शिंगुर’ गावी देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. तेव्हापासून देशभर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून काम सुरु आहे, तरीही ही केंद्रे मानवी चुकांनी ग्रासलेत, आणि त्यामुळे आजही सक्षम नाहीत. वास्तविकत: प्राथमिक आरोग्य केंद्रांना रोज ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी वैद्यकीय बाहयरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा (६ बेड) पुरविणे बंधनकारक आहे. जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर स्थितीत २४ तास तातडीची सेवा देण्याचे बंधन आहे. तरीही हे घडत नाही, कोणी काही बोलत नाही, या साऱ्यांत नाहक बळी जात आहेत.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात घराच्या शेजारी मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेलेल्या १४ वर्षे वयाच्या श्रध्दा विठ्ठल गुरव या मुलीचा घरी परतत असताना अंधारात पायवाटेवर विंचूदंश झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर पालकांनी सर्वप्रथम प्रथमोपचार आणि नंतर तिला अधिक उपचारासाठी संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगमेश्‍वर तालुक्यातील २५८ लोकांना एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत विंचूदंश झाल्याची नोंद देवरुखच्या ग्रामीण रुग्णालयात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील गत दहा वर्षांत झालेल्या तब्बल ७४३ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूत ‘विंचूदंश’ हे एक प्रमुख कारण होते. यातील ६० टक्के विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नव्हते. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात लावणीसह शेतीची कामे सुरू झाल्याच्या काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण, तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल झाले होते. सन २०१४ साली जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात १७६ विंचू, १३६ श्वानदंश, तर १० जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने एकही रुग्ण दगावला नाही. सन २०१५ मध्ये मे ते जून या कालावधीत बिरवाडी-महाड भागात ५१ जणांना विंचूदंशाची बाधा झाली होती. विंचूदंश, सर्पदंश झाल्यानंतर आवश्यक असणारे उपचार ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याची ओरड होत होती, रुग्ण दगावण्याचे प्रमाण तेव्हाही वाढले होते.

महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सापडणाऱ्या काळ्या विंचूपेक्षा कोकणात सापडणारा लाल विंचू जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो. एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या विंचूदंशाचे प्रमाण कोकणात सर्वाधिक आहे. सातत्याने बदलत जाणारे हवामान, वाढता उष्मा यामुळे विंचू बाहेर पडण्याच्या प्रमाणात वाढ होऊन दंशाचे प्रमाणही वाढते. कडक उष्मा वातावरणात विशेष काळजी घेण्याची गरज असते. ग्रामीण भागातील परिसरात होणा-या विंचूदंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. अलिकडच्या संशोधनामुळे विंचवाचा दंश म्हणजे यमाचीच भेट अशी खात्री असणाऱ्या कोकणात विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चाळीस टक्क्यांवरून एक टक्क्यापर्यंत आले आहे. मात्र तरीही निव्वळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे विंचूदंश व सर्पदंशाने आजही रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, ही बाब खूपच चिंताजनक आहे, यावर स्थानिक पातळीवर जबाबदार समाजघटकांनी ठोस मार्क काढायलाच हवा.

धीरज वाटेकर

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

‘कॅम्पस’बाहेरील उच्चशिक्षण

साधारणतः वर्ष-दीड वर्षापूर्वी, जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या एका ‘व्यवसाय परिषद’ कार्यक्रमात बोलताना राज्यातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीनी, ‘महाराष्ट्रात हजारभर इंजिनिअरिंग कॉलेज असून त्यातून प्रतिवर्षी एक लाख इंजिनिअर बाहेर पडतात’ असे आत्मविश्वासपूर्ण विधान केले होते. तेव्हा महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणाचे वास्तव जवळून अनुभवणाऱ्या प्रत्येकाला पडतील, असे सारे प्रश्न पडले होते. एकतर राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेश क्षमतेपैकी किमान ४० हजार सीट दरवर्षी रिकाम्या राहतात. बाकी बहूतेक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळणारा कंपनी जॉब असा की, अकुशल कारागिराइतका पगार! अर्थात जे विद्यार्थी पहिल्यापासून ध्येय ठरवून हे शिक्षण घेतात, ते आपले करियर घडवतातच ! पण बाकी बहुसंख्यकांचे काय? आणि या मागील कारणे काय? ‘कॅम्पस’बाहेरील उच्चशिक्षणाबाबतची ही सारी कारणे नेहमीच दबक्या आवाजात चर्चिली जातात. परंतु औरंगाबादच्या चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ मे २०१७ रोजी ४७ विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग’ या विषयाचा पेपर नगरसेवकाच्या घरात बसून लिहायला घेतला, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकरवी हा प्रकार उघडकीस आला, आणि या साऱ्या चर्चेला जणू व्यासपीठच मिळाले. ‘कॅम्पस’बाहेरील या ‘भ्रष्ट’ उच्चशिक्षणामुळे गेल्या काही वर्षांपासून शिक्षित महाराष्ट्रात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.   

शिक्षणातील असे हे अनेक प्रकार ‘समाजकार्य’ नक्कीच नव्हे ! यामागे लाखो रुपयांचे ‘अर्थ’कारण लपलेले आहे. आपली ‘संस्कारक्षम मूल्यव्यवस्था’ आजच्या बाजारु दुनियेत कशी पायदळी तुडवली जात आहे, हेच यातून जाणवते. औरंगाबादच्या घटनेत यातील ४७ पैकी विद्यार्थ्यांसह ३० जणांना कोर्टाने २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर ३ विद्यार्थिनींना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यात संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, नगरसेवक, नगरसेवकाचा मुलगा यांचा समावेश होता. घटनासमयी प्राध्यापक विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत होते, मुले उत्तरपत्रिका लिहीत होती. दिनांक २ मेपासून या भागात अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. दोनदा रद्द करण्यात आलेले हे परीक्षा केंद्र दबावामुळे पुन्हा देण्यात आले होते. परीक्षेदरम्यान रोज १५ हजार उत्तरपत्रिकांचे संकलन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने केले जाते. त्यासाठी विद्यापीठाकडे दोनच वाहने आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील तुळजापूर, आंबाजोगाई, परळी, जालना, बीड आणि उस्मानाबादच्या सोडवलेल्या उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यासाठी आठ-आठ दिवस वाहने जात नसल्याची, एका मुलाकडून या रॅकेटने एका पेपरसाठी दहा हजार रुपये घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या समाजातील युवक असंतुष्ट आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करून घेण्यापेक्षा वरवरच्या तात्कालिक व्यथा-वेदनांबद्दल बोलले जाते, उपाय करणारेही मूळ रोग बरा करण्यापेक्षा वरवर मलमपट्टी करून मोकळे होतात, यामुळे असंतोष वाढतो आहे. शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश करू पाहणारा युवक कोणत्या हेतूने उच्चशिक्षणाकडे वळतो, यावर सखोल चिंतन व्हायला हवे. विद्यापीठाने उच्चशिक्षणाचे उद्दिष्ट कोणते मानले आहे ? शासनाला काय मान्य आहे ? पालक आणि विद्यार्थी काय समजतात ? हे अभ्यासता गोंधळ समोर येतो.  स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात कारकून तयार करण्यासाठी आखलेली शिक्षणपद्धती आजही तशीच आहे. नोकरी मिळवण्यासाठी पदवी आवश्यक आहे याच कारणासाठी युवक उच्चशिक्षणाकडे धावतात. उच्चशिक्षणाबद्दल समाजात आकर्षणही आहे. उच्चशिक्षणाचे नेमके प्रयोजन आणि त्यानुसार शैक्षणिक क्रांतीचे स्वरुप निश्र्चित करण्याची वेळ आलेली आहे.शिक्षणपद्धती अधिकाधिक समाजाभिमुख व्हायला हवी आहे. कारण एखाद्या शिक्षणाची फलश्रुती ही जीवनात दृगोचर व्हायला किमान एका पिढीचा काळ जावा लागतो. आपल्या उच्चशिक्षणाने जो सुशिक्षित वर्ग निर्माण केला आहे तो स्वत:ला पांढरपेशा आणि बुद्धिजीवी मानत  श्रमजीविंविषयीची तुच्छता-उपहासाची भावना मनात निर्माण करून घेतो. त्यामुळे ‘श्रम आणि बुद्धी’ यांचा वियोग भूषणावह मानणारी पिढी राष्ट्रविकास आणि राष्ट्रनिर्माण करायला कशी समर्थ ठरेल याची शंका वाटते. बुद्धी, श्रम यांचा समन्वय आणि दोन्हींतील मूलभूत प्रतिष्ठेवर आधारित समता प्रस्थापित करणारेशिक्षण मिळायला हवे ! महात्मा गांधींनी "जीवनशिक्षण' असा शब्द वापरला होता. जीवनातून शिक्षणाचा, ज्ञानाचा उगम होतो ही त्यांची कल्पना होती, आपण ते सारे विसरलो आहोत. आपल्यावर भाषेने गारुड केले आहे. सर्वसाधारणपणे उच्चशिक्षणाचा हेतू विद्यार्थ्याला व्यवसाय-नोकरी मिळवून देण्यासाठी आवश्यक पात्रता निर्माण करणे हा आहे. जर चरितार्थ सुरळीतपणे चालेल असा व्यवसाय शिक्षणातून मिळणे शक्य होत नसेल तर अनेक समस्या निर्माण होतील. त्यापुढे जाऊन समाजात युवक उपयुक्त' ठरावा अशी पात्रता त्याच्या ठायी उत्पन्न करीत, त्या युवकातील सुप्तशक्तींना जागवून, त्याच्या सामाजिक जाणीवांचा विकास घडविणारे शिक्षण मिळायला हवे.

पदवी प्राप्त करुन प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिकलवर्क' मध्ये आपले ‘थिरॉटिकल' ज्ञान अपूर्ण आहे असे आढळून येते. विद्यापीठाच्या पदव्या जीवनात नोकरी-व्यवसाय मिळवायला पात्र ठरू शकत नाहीत, तरीही त्यांचा हव्यास कमी होत नाही. आजची आपली परीक्षापद्धती विद्यार्थ्यांच्या आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अध:पतनाला कारणीभूत आहे. भ्रष्टाचार आणि गैरप्रकार यांनी बरबटलेल्या या परीक्षा पद्धतीची विश्र्वासार्हता अनेक कारणांनी नेहमीच शंकास्पद ठरत असते, औरंगाबाद प्रकरणाने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


धीरज वाटेकर


बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

वेगवान विचारांचा कोकणी ‘प्रवाह’ : स्वर्गीय नानासाहेब जोशी

चौकट मोडून काहीतरी नवं घडविणारा माणूस विचार, शोध आणि बोध यामुळे समृद्ध होत असतो. अशी व्यक्ती सततच्या आत्मचिंतनाने प्रगल्भ होत, साठलेल्या ज्ञानाचा भार न वाटता अधिक विनम्र होत जाते. सर्वसामान्यपणे माणूस हा अनुकरणप्रिय असतो आणि ते राहणे सोपेही असते. अनुकरण करणे म्हणजे स्वतः समजून घेण्याच्या श्रमांपासून पलायनवाद स्विकारणे असते, जबाबदारीपासून दूर राहणे असते. ते टाळून आलेल्या प्रत्येक समस्येवर आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर, वेगवान विचारांच्या सहाय्याने स्वतःच समाधान शोधत समाजातील धार्मिक, पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक, साहित्य, वैचारिक क्षेत्रात आपल्या अनुभवसमृद्ध जाणीवांनी, ‘सुवर्णमहोत्सवी’ दैनिक सागरच्या माध्यमातून अवघ्या समाजमनावर प्रवाही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर्गीय निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांचे अचानकचे जाणे (३ जून), विविध क्षेत्रात समाजसुधारणेचा वसा घेवून काम करणाऱ्या त्यांच्या असंख्यांना चाहत्यांना चटका लावून गेले आहे.

महाराष्ट्राला लाभलेला तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी विचारांचा ‘प्रवाह’ नानांनी पुढे नेला. नानांचे मानवी मन मोठे विलक्षण होते. एकाच वेळी काय काय चालत असेल त्या मनात ? स्वतःशी संवाद अन् कधी-कधी वादविवादही ! तरीही समोर बसलेल्याशी कोणत्याही विषयावर तासंतास शतप्रतिशत बौद्धिक गप्पा मारण्याची क्षमता असलेल्या नानांशी संवाद साधताना कोणालाही, ‘हिमनगाचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि उर्वरित पाण्याखाली’ या उक्तीची सहज जाणीव होऊन जावी, अशा विचारांची वेगवान झेप घेणाऱ्या, विलक्षण व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. तालुकास्तरावर सुरु झालेल्या देशातील पहिल्या, कोकणातील असंख्य लेखक-पत्रकारांना पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणाऱ्या, दैनिकाचे नाना संस्थापक-संपादक होते. पाच-पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यात घडलेली, अनुभवलेली, पाहिलेली, जगलेली घटना सांगताना नानाजे बिनचूक बारकावे सांगायचे ते ऐकताना अक्षरशः मती गुंग व्हायची ! नाना गांधीवादी होते, परंतु सध्यस्थितीत तरुणांनी काय केले पाहिजे ?  यावरही ते तासंतास बोलत. नानांसोबतचे वैचारिक जगणे हा बौद्धिक आनंदाचा भाग असायचा.

कोकण विकासाचा ध्यास घेतलेल्या नानांनी, ‘मुंबईसह कोकणाचे सागरी राज्य झाले तरच कोकणचा विकास होऊ शकतो’ अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या बरोबरीने मांडली होती. कोकणातून दैनिक सुरु करण्यामागे ‘कोकणाचा भरीव विकास’ हाच त्यांचा दृष्टीकोन राहिला. ‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ नाना जगले. कोकणला झुकते माप देणाऱ्या घटनांचे भरभरून कौतुक नानांनी जसे केले तसे कोकणाच्या उपेक्षेबाबतच्या अनेक गंभीर, इतरांच्या नजरेतून सुटलेल्या प्रश्नांची, मुद्द्यांची मांडणीही अनेकदा केली. पर्यावरणाचे संतुलन साधूनच कोकणाचा विकास होणे आवश्यक आहे, या मताशी नाना कायम राहिले. सनसनाटी बातम्या म्हणजे ‘वृत्तपत्र’ ही नानांची पत्रकारीता कधीही नव्हती. ५२ वर्षांपूर्वी कोकणात वृत्तपत्र सुरू करणे हे अतिशय धाडसाचे काम होते. नानांनी दळणवळणाची अत्यंत तुटपुंजी साधने असताना, अनेकदा वीज, तांत्रिक बाबी नसताना त्याकाळी जनरेटर आणून वृत्तपत्र चालवले. मृत्यूपूर्वी दोन आठवडे अगोदर नानांनी, ‘कोकणातील नेत्यांची राज्यातील इतर राजकारणी नेते कोंडी करीत आहेत त्याचा कोकणातील सर्वांनी एकमताने धिक्कार करावा’ असे लिहिले होते.

चिपळुणातील परशुराम येथे प्राथमिक शिक्षण, मुंबई-गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. ख्यातनाम समीक्षक राम मनोहर यांच्याकडे काही काळ लेखनिक म्हणून काम करणाऱ्या नानांच्या मनात इथेच पत्रकारितेची बीजे रुजली. बी.ए.बी.एड. झाल्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये ‘शिक्षक’ म्हणून काम करताना ‘उष:काल’ नावचे भित्तीपत्रकही त्यांनी चालवले होते. खिशात अवघे दोनशे रुपये असताना २० जून १९६५ रोजी त्यांनी कोकणचे मुखपत्र दैनिक सागर सुरु केले. सागरमधील एन.एम.या टोपण नावाने तेच लिहित असलेला प्रवाहहा स्तंभ म्हणजे त्यांच्या अव्याहत विचारांचा वाहता प्रवाह होता. नानांनी दैनिकातल्या तपशिलातील वैविध्य जपले. अखंड वाचन आणि देश-विदेशातली डोळस भ्रमंती यातून कमावलेला व्यासंग हे नानांचं मुख्य भांडवल होतं. आखाती देशांसह जगभरात वावर, तेथील मराठी आणि कोकणी माणसांशी सततचा संपर्क, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचं वाचन यामुळे अनेक संदर्भ ते सहज देत. एखाद्या गोष्टीचा सखोल मागोवा घेणारा आणि अवतीभवतीच्या वातावरणाबद्दल संवेदनशील असणारा त्यांच्यातला संपादक त्यांनी सदैव जागा ठेवला होता.
कोकणचा चालता बोलता इतिहास असलेले नाना `परशुराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते. या देवस्थानचा कायापालट त्यांच्याच काळात झालेला आहे. कोकणातील अनेक सामाजिक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. चिपळूण तालुक्यातील गावागावात रस्ते, धरणे, शाळा अशा विकासकामांचा वेगही तेव्हा जोरात होता. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, एमआयडीसीचे संचालक, रोजगार हमी योजनेचे कार्यकारिणी सदस्य, कोकण सिंचन अभ्यास मंडळाचे सदस्य, राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. चिपळूणला अखिल भारतीय मराठी पत्रकार संमेलन, पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, कोकण सांस्कृतिक अकादमीतर्फे १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत संमेलने यांमुळे ‘कोकणाची सांस्कृतिक राजधानी’ असे अभिमानास्पद बिरूद त्यांच्याच काळात प्राप्त झाले. अभिजात कलेची आवड असणाऱया, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या नानांच्या भाषणांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची कायम गर्दी होत राहिली. चिपळूणात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांची भाषणे म्हणजे बौद्धिक मेजवानीच होती.
कोकण सांस्कृतिक अकादमीचे संस्थापक, अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे उद्गाते, विविध सामाजिक संस्थांचे आश्रयदाते, दैनिक सागरचे संपादक असे नानांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते, डोळस पत्रकारिता हा त्यातला मूळ पैलू होता, पत्रकारितेचं ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या सानिद्ध्यात घालवलेला क्षणनक्षण मौलिक आहे. कोकणच्या सांस्कृतिक, साहित्य, कला, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रांत त्यांच्या जाण्याने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभ्यासोनि प्रकटावे... हे समर्थ रामदासांचे वचन शैक्षणिक आयुष्यात वाचनात, ऐकण्यात आल्यानंतर ते जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच्या वाटेवर तेच वचन तंतोतंत जगणारे, आभाळाएवढ्या उंचीचे, कोकणचे बुद्धिवैभव ठरलेल्या स्वर्गीय नानांचे व्यक्तिमत्व जवळून तासंतास अभ्यासायला, अनुभवायला मिळाले, त्यांच्यासोबत जगता आले. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकालाच त्यांच्या वेगवान विचारांच्या प्रवाही सागरात, पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळालेय हे मात्र नक्की ! 

धीरज वाटेकर


३ ऑगस्ट : द्वितीय मासिक स्मृतिदिन अभिवादन !!!


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...