शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

दृष्टी परिवर्तनाचे ‘रक्षाबंधन’ घडावे !

     
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी बहिण भावाच्या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृती मानवी जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असे वचन आहे अर्थात ‘जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो.’ हे सारे खरे असले तरीही स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचार आपल्याला नवीन नाहीत. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळात रक्षाबंधनाचा सण हा मानवी दृष्टी परिवर्तनाचा सण बनायला हवायं ! ज्यातून भारतीय संस्कृती संवर्धनाचे मूल्य बदलत्या युगातही जपले जाईल.

      हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेस राखी पौर्णिमा येते. ही पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावाआपल्या भावाने आपले रक्षण करावेही या मागची मंगल मनोकामना ! रक्षाबंधन एकमेकांशी जवळीक साधण्याचा, परस्परांना हमीविश्वास देण्याचा, ‘मी तुझ्या मदतीसाठीसंरक्षणासाठी इथे आहे, मी आपल्या नाते संबंधाप्रति,  मैत्रीप्रति वचनबद्ध आहे’  हा विश्वास दर्शवण्याचा सण आहे. आपल्याकडे पूर्वी सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपणलाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणीतरी असावा, ही भावना भावाजवळ येऊन थांबे, तेव्हा ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतं. कोणत्याही क्षणीप्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणाऱ्या भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना बहिणीच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भसंस्कार यात महत्त्वाचा आहे. ‘राखी ह्या शब्दातच ‘रक्षण कर (राख म्हणजे सांभाळहा संकेत आहे. रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झालीयाबाबत निश्‍चित पुरावा नाही. एका आख्यायिकेनुसार पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे अनेकदा देवांचे काही चालत नसे. एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेलअशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याला त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे म्हणतात. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले होते. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलत असते. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःकडे घेत असतो. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे बहिणीचे भावाच्या विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत यामध्ये दिसून येतो. देशाच्या काही भागात ज्या स्त्रीयांना भाऊ नाहीत्या स्त्रीया चंद्राला आपला भाऊ मानून ओवाळतात. हा पूर्वांपार चालत आलेला सणभारतीय संस्कृतीमध्ये आजही मानाचे स्थान राखून आहे.ह्याच दिवशी आपले कोळीबांधव खवळलेल्या सागराला शांत करण्यासाठीत्याची पूजा करून नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात थांबलेल्या मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात.

      आज बदलत्या काळात राख्यांचे ट्रेण्डही बदललेत. सध्या बाजारात डिझायनर राख्यांची चलती आहे. बच्चे कंपनीसाठी डोरेमॉनपासून बालगणेशापर्यंत राख्यांची भरपूर व्हरायटी आज पहायला मिळते आहे. एका मोठ्या मण्यामध्ये आणि दोन्ही बाजूला एकेक किंवा अधिक छोटे मणी अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या बीड्स राख्यांना आज बाजारात खूप मागणी आहे. जरदोसी धाग्यांपासून वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बनलेल्या राख्या, लहान मुलांच्या भावविश्वातली मिकी माऊस, टेडी बेअर, बॅटमॅन, हॅना मॉण्टा, छोटा भीम,बालगणेशडोरॅमॉन कार्टून्स विराजमान असलेल्या राख्या, मण्यांप्रमाणेच मोत्यांचाही वापर असलेल्या डिझायनर राख्या, विविध रंगधागे आणि आकारात मिळणाऱ्या फॅन्सी राख्यांसह स्वस्तिकजपमाळेतील मणीरुदाक्षओम्कुयरीगणपतीदेवी अशी अक्षरं / चिन्हं असणाऱ्या धार्मिक, अध्यात्मिक टच देणाऱ्या राख्यांनी मार्केट काबीज केले आहे. डायमण्ड्स, मणी, वेल्वेट बॉल्स यापासून बनवण्यात आलेली ब्रेसलेट राखी, फेंगशुईतील विण्डकॉइन, ड्रॅगन, कासव, गोल्डफिश, लाफिंग बुद्धा अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षीचा ट्रेंड आहे तो वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो असे लिहून धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा. बदलत्या काळात नात्यातील भावना त्याच असल्या तरी परिसीमा बदलताहेत. पूर्वीपासूनचा कडक स्वभावाचा दादा आता मित्र किंवा कुल ब्रो झाला आहे. त्यामुळे राख्याही बदलल्यात. राखीपौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षकआणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे तरुणींचा कल जास्त आहे, अर्थात बाजारपेठेनेही याची दाखल घेतलेली आहे. ऑनलाइन मार्केट अर्थात इन्स्टाग्रामफ्लिपकार्ट सारख्यासाइट्सवरूनही राख्यांची विक्री होते आहे. ‘प्लॅटिनम बँड्स’ हे सुद्धा राखीचं एक महागडं नवं रूप बाजारात उपलब्ध आहे. कस्टमाइज्ड गोष्टी आवडणाऱ्यांसाठी, भावांना त्यांच्या नावाच्या आद्याक्षराची राखी बांधणं पसंत करणाऱ्या बहिणींसाठी वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये नावे कोरून अ‍ॅक्रेलिक, लाकूड, धातूवर तयार केलेल्या राख्या अनेकांनाभावताहेत. बाजारात या राख्यांचं प्रमाण फारसं नसलं तरी त्या ऑनलाइन उपलब्ध होताहेत. राखीला बंधू-भगिनी प्रेमाची झालर म्हणून चक्क भावाबहिणीचे फोटोच राखीवर पिट्र करून घेण्याचा नवीन प्रकार रुजू पाहतो आहे, अर्थात राखीतही आता डिजिटलायझेशन येत आहे.

      आमच्या लहानपणी आम्ही सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या चकतीची स्पंजवाली राखी मनगटावर आवडीने मिरवायचो. एक सोनेरी धागा, त्या धाग्याच्या मधोमध एक चांदीची चकती, त्या चकतीवर एक भला मोठा स्पंज आणि त्या स्पंजवर फुलं, मोती असलं काही तरी डिझाइन असायचं. ही राखी बांधल्यानंतर दुसऱ्या किंबहुना त्याच दिवशी पहिल्या त्या राखीच्या चकत्या गळून पडायच्या. मग स्पंज सुटा व्हायचा आणि दोन दिवसांनंतर मनगटावर फक्त धागा शिल्लक राहायचा. स्पंजचा वापर पाटी पुसायला व्हायचा. लालहिरव्यापिवळ्या अशा कोणत्याही रंगात मिळणारी रेशमी गोंड्याची साधी राखी अनेकांच्या हातावर दिसायची. बालपणातली राखी म्हटलं की अजूनही हेच चित्र राखी डोळ्यांसमोर येते. त्या काळीही चंदनाचा एखादा छोटासा नारळ, एकच फुलं, रूदाक्ष अशा डिझाइनच्या आटोपशीर राख्याही होत्या. स्वस्तिकचं चिन्ह आणि त्यावर शुभ लाभ ही अक्षरं असलेली राखी अपवादाने दिसायची. राखी जेवढी मोठी, तेवढं चांगलं, अशी एक वेडी समजूत मनात कुठेतरी घट्ट रूजलेली होती. शाळेतल्या रक्षाबंधनाची मौज वेगळीच होती. तिसरी-चौथीत असताना आपल्याच हातावर अधिकाधिक राख्या असाव्यात, असं वाटायचं. नि आठवी-नववीत आल्यानंतर, आज आपला हात प्लास्टरमध्ये असता तर किती बरं झालं असतं ? असा विचार मनात येऊन जायचा, असो !

            कुरियर, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात पोस्टानं राख्या येणं कमी झालं तरीही ग्रामीण भागात ते कायम आहे. माध्यमं बदलली असली तरी माया कायम आहे. हा सण साजरा करण्यामागचा मूळ हेतू, शास्त्र जाणून तरुण पिढी या संस्कृतीलापरंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. याची जाणीव करून देण्याची जबाबदारी ज्येष्ठांनी योग्य रित्या पार पाडली तर हे सण मानवी जन्माचे सार्थक घडवतील.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

‘ग्रेटभेट’ : विश्वविख्यात 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे

      जेथे अंधार आहे, तेथे दिवा लावा !
     
माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपतीपदाच्या काळातील आपल्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान विश्वास दाखवलेले आणि संपूर्ण जगभर 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' अशी ओळख असलेल्या, '...आणि दोन हात' या प्रसिद्ध आत्मचरित्राचे नायक आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांची त्यांच्या दादर येथील क्लिनिकमध्ये आम्ही नुकतीच (१८ ऑगस्ट २०१८) सदिच्छा भेट घेतली. आपल्या समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. समाजात वाईट कितीही असलं तरीही आपण आपल्या आयुष्यात काय चांगलं करू शकतो ? याचा विचार सतत केला पाहिजे. असे सांगून,  'जेथे अंधार आहे तिथे दिवा लावा !' जे काम करतायं, ते लिहूनही ठेवा. उपयोग होईल, असा सल्ला ८७ वर्षे वयाच्या आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांनी दिला.

      दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी, प्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांचे आम्ही लिहिलेले चरित्र, आमची आठवी लेखनकृती 'कृतार्थीनी' प्रकाशित झाल्यानंतर, त्या पुस्तक लेखनाचे कौतुक करण्यासोबतच आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांनी, 'मुंबईत याल तेव्हा अवश्य भेटा' अशी सूचना केली होती. आम्हालाच त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला बराच उशीर झाला, अर्थात संपर्क होता !

      'काळोखाचा सागर किती अथांग असला,
      तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातचं !’
ही कुसुमाग्रजांची कविता सरांनी आम्हाला ऐकवली. आपलं वय किती ? आणि काही कौटुंबिक प्रश्न विचारल्यानंतर, इंजिनियर असूनही पैशाच्या मागे न धावता लेखनकला जोपासून आहात. तुमच्याकडे पाहून तुमच्या मित्रमंडळींचा काय वाटते ? सद्यस्थितीत लोकं जागे होत आहेत का ? शिक्षणाचा परिणाम काही होतोय का ? कोणाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडला ? संस्काराची शिदोरी ? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी विचारले. विशेष म्हणजे आम्ही देत असलेल्या उत्तरातील मुद्दे, हातात कागद-पेन घेऊन आदरणीय डॉ. श्रीखंडे सर स्वतः टीपत होते. आमच्या जीवनातील हा अत्यंत विलक्षण असा अनुभव होता.

      बोलताबोलता आमची कॉलेजमध्ये असल्यापासूनची चरित्रे वाचनाची आवड आणि त्यातून 'कॅटलिस्ट' प्रमाणे कार्यरत राहाण्याची बनलेली मानसिकता त्यांनी बरोबर हेरली. आमच्या व्यक्तिगत ग्रंथालयाची, संकल्पित संग्रहालयाची माहिती, कोकणातील पर्यटन, पर्यावरण विषयक आम्ही करीत असलेल्या कामांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. पुरातत्तवीय नवलांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, संग्रहालयाकडे आत्यंतिक आवश्यक म्हणून पाहण्याच्या आपल्याकडील वृत्तीचा अभाव आणि विदेशी लोकांची संग्रहालये विकसित करण्याची मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले. भरपूर पैसा कमावणारी माणसं आज प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगून त्यांनी याच्या पुष्ठ्यर्थ वैद्यकीय जीवनातील अलिकडची उदाहरणे सांगितली.

      अटलबिहारी वाजपेयींबद्दल तुला काय वाटतं ? या त्यांच्या प्रश्नावर बोलताना, 'काही माणसांचं मोठेपण आपल्याला उशीरा समजतं. किंबहुना माणूस गेल्यावर समजतं.' हे आमचे उत्तर ऐकल्यावर या मागची कारणमीमांसा करताना ते थेट आठनऊशे वर्षे मागे गेले. इतिहासात आपली प्राचीन भारतीय संस्कृती महान आहे. संपत्ती आणि सुबत्ता यामुळे भारतावर झालेली परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्यात गेली आठ-नऊशे वर्षे राहिल्याचा हा परिणाम आहे. जे देश कधी पारतंत्र्यात गेलेच नाहीत ते पाहिले की हे जाणवतं असे त्यांनी सांगितले. वेस्टर्न सायन्स येईपर्यंत जगात आयुर्वेद श्रेष्ठ सायन्स होते. आज दुर्दैवाने आपल्याकडे संशोधन कमी, थापा मारण्यात रस अधिक अशी मानसिकता जाणवत असल्याचे ते म्हणाले. चीनच्या सामान्य माणसाची कमाई आपल्याकडील माणसाच्या सहा पट अधिक आहे आणि हे गेल्या वीस वर्षांत घडलंय याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शंभर वर्षांपूर्वी बालकामगार जगात सर्वत्र होते, आज नाहीत कारण जगं बदलत चाललंय. जातिभेद मागे पडलाय. पूर्वी माणसं मलेरिया टायफाईड न्यूमोनिया ने मरतं, आज ते ही बदललंय. आपल्याकडे भारतात कायद्याने न्याय उशीरा मिळतो आणि ते योग्यच आहे अन्यथा सर्वजण कोर्टात जात राहतील असेही त्यांनी सांगितले.

      जगातील सुंदर आहे नि अनेक चांगली माणसं चांगली कामं करताहेत. लेखणीतून माणसं तयार होऊ शकतात, माणसं बदलू शकतात. माणसांना बदलवण्यातच खरे कौशल्य आहे. स्वतःबद्दल पुस्तक लिहा, प्रकाशित कधी करायचं ते नंतर बघू पण स्वतःविषयी लिहायला सुरुवात करा. ‘जी चूक मी केली ती करू नका’, असा आपुलकीचा सल्लाही सरांनी दिला. गेली २० वर्षे आम्ही डायरी लिहितोय हे मात्र सरांना सांगायचे राहून गेले. आम्ही चिपळूणचे म्हटल्यावर, सरांनी चिपळूणचे प्रसिद्ध डॉ. रत्नाकर घाणेकर हे माझे विद्यार्थी अशी आठवण सांगून डॉ. देवधर, डॉ. पाटणकर, नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. 'या भेटीने समाधान झालेलं नाही, पुन्हा भेटायला याअशी आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांची सूचना ग्रहण करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

https://www.facebook.com/groups/2124009321200341/permalink/2153386568262616/?__tn__=K-R


रविवार, १५ जुलै, २०१८

‘डेस्टिनेशन चिपळूण’ स्वप्न नव्हे सत्य !



मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ताजने साधारणत सन १९८९ ते ९५ च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात, महेंद्रगिरी डोंगरात, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्रीस्टार हॉटेल उभारले. नंतरच्या काळात कोकणच्या राष्ट्रीय महामार्गावर, इथेच विसावा पॉइंटजन्माला आला, तेव्हापासून चिपळूणची विश्रांतीस्थानही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या २०-२५ वर्षांत अनेकांनी आपापल्यापरीने केले. मात्र त्याला दखलपात्र यश मिळत नव्हते. अलीकडेच चिपळूण पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच, देशभरातील पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या चिपळूण दर्शनदौऱ्यातून हे दखलपात्र यश मिळण्याची आशा निर्माण झाली.गेल्या पर्यटन हंगामात अनेक पर्यटकांनी चिपळूणला पसंती दिली. वाशिष्ठी खाडीतील बोट सफारीला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.डेस्टिनेशन चिपळूण हे स्वप्न नसून ते एक सत्य असल्याचा विश्वास यातूनच या विषयात काम करणाऱ्या सर्वांना प्राप्त झाला आहे.गेल्या २५ वर्षांत एकही नवा उद्योग चिपळूणात आलेला नसल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता डेस्टिनेशन चिपळूण अधिक दर्जेदार होण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन स्वयंसेवी काम करणाऱ्या ‘ग्लोबल चिपळूण’ सारख्या असंख्य हातांना, स्वतःला ‘लोकप्रतिनिधी-प्रशासन’ वगैरे म्हणवणाऱ्या यंत्रणेचे खंबीर पाठबळ आणि स्थानिक चिपळूणकरांचे मनस्वी सहकार्य मिळायला हवे आहे.   

चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात 'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा.

भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे परशुरामहोय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामीयांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. त्यामुळे मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ, सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात. चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामीअवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला नंदीवैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात श्रीलक्ष्मी मल्लमर्दनची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशवस्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.

डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवतील अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात, भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीनशाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते.अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावीत. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीकअसावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर लिंगस्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.

सावर्डेपासून २ कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या राजेशिर्केयांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे.

अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात तुंबाडचे खोतया कादंबरीतून श्री.ना. पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या वाशिष्ठीनदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सफार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रअसून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात नेचरट्रेलची अनुभूती घेता येते.

आगामी काळात चिपळूणात परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे, चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा धबधबा बारमाही प्रवाही करणे, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, रिव्हर बँक प्रकल्पहे आगामी महत्वाचे प्रकल्प असायला हवे आहेत.शहरातील पर्यटनाशी निगडीत रिक्षावाले, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर निश्चिती व्हायला हवी असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत.चिपळूणात आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत.

पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता, रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी,कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार करावा लागणार आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, अशी व्यवस्था आपण चिपळूणात करायला हवी आहे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे.

चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजअशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.गोव्यात मांडवीआणि झुआरीनदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव, चिपळूणला आपणपर्यटन समृद्ध करू शकतो आहोत. फक्त याचा नीट विचार व्हायला हवा.त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी डेस्टिनेशन चिपळूणएक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत क्रोकोडाईल टुरिझमसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी पर्यटन श्रीमंतीचा हा आढावा आपल्यालाही चिपळूण पर्यटनाबाबत अनुकूल बनवेल.



धीरज वाटेकर (पर्यटन अभ्यासक)
मो. ०९८६०३६०९४८



गुरुवार, ५ जुलै, २०१८

पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' पुरस्काराने धीरज वाटेकर सन्मानित !

चिपळूण / पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डाॅ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन नुकताच चिपळूणचे पर्यावरणप्रेमी पत्रकार व लेखक धीरज वाटेकर यांना डाॅ. आपटे यांच्याच हस्ते सन्मानित करण्यात आले. 

धीरज वाटेकर यांनी गेली काही वर्षे सातत्याने कोकणात राबविलेल्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. विनीता आपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. प्रकाशाचे बेट हा पुरस्कार त्यांना 'पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील काम आणि पर्यावरण पत्रकारिता' या करिता दिला गेला आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून आजतागायत गेली सतत एकवीस वर्षे धीरज वाटेकर हे विविध सामाजिक कामात कार्यरत आहेत. विविध अभ्यासदौरे, पर्यटन, संशोधन, अभ्यास, जंगल भ्रमण या करिता त्यांनी हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर प्रवास केला असून त्या माध्यमातून देशभरातील पर्यावरण आणि पर्यटन या विषयातील हजारो छायाचित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगर मौसमी जंगल पेर अभियान, वृक्ष लागवड, बीज पेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, रोपवाटिका, पर्यावरण जनजागृती यासारख्या उपक्रमात ते गेली काही वर्षे सक्रीय आहेत. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन या विषयावरील आठ पुस्तके लिहिली आहेत. संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादनही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार", पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘नलगे ग्रंथ पुरस्कार', सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय ‘अर्थ फौंडेशन’तर्फे “पर्यावरण भूषण” पुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव आणि यावर्षी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. 

हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी व ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या 'तेर पाॅलिसी सेंटर'च्या पुण्यातील एरंडवणे येथील कार्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहोळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात "अनादि काळापासून आहे, वसुंधरा ही अमुचि आई | वृक्षवल्लरी निर्झर सरिता, यांच्यासंगे बहरून जाई" या संस्थेच्या वसुंधरा गीताने करण्यात आली. हे गीत लवकरच संपूर्ण भारतातील चित्रपटगृहात दाखविले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 'तेर' या शब्दाचा फ्रेंच भाषेतील अर्थ 'पृथ्वी' असा होतो.

यावेळी वाटेकर यांनी कोकणातील विविध उपक्रमांची माहिती दिली. निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या वाटेकर यांनी या क्षेत्रातील मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, चंदनतज्ञ महेंद्र घागरे, प्रमोद काकडे, विलास महाडिक यांच्याप्रति आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचा फडणीस हिने केले. यावेळी नामवंत विज्ञान लेखक म. ना. गोगटे आणि संस्थेशी जोडलेले पर्यावरण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.


शुक्रवार, २५ मे, २०१८

साडेसात हजार कि.मी. भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील पहिली ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ कोकणात !


पालशेत गुहेमध्ये संशोधन
करताना डॉ. अशोक मराठे  
एकविसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला सन २००१ साली पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी शोधलेली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ आजही असंख्य पर्यटक-अभ्यासकांना खुणावते आहे. किमान ९० हजार वर्षे जुनी, भारताच्या साडेसात हजार कि.मी. लांब समुद्र किनाऱ्यावरील ही पहिली गुहा आहे. ही गुहा म्हणजे, जगाच्या पुरातत्वीय पटलावर दिमाखाने मिरवू शकणारा आणि या विषयात जगात भारताची मान उंचावण्याची क्षमता असलेला अनमोल ठेवा आहे. याकडे शासनासह समाजाने ‘पर्यटन’ म्हणून सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे.


पालशेत हे गाव गुहागर हेदवी मार्गावर गुहागरपासून १२ कि.मी. अंतरावर आहे.
पालशेत गुहा मुख  
पालशेतच्या अरबी समुद्रकिनाऱ्यापासून दोन कि.मी. आत समुद्रसपाटीपासून ८५ मी. उंचीवर सुसरोंडी भागात ‘सुंदर’ नदीच्या उगमाजवळ जांभ्या दगडात ही मानवनिर्मित गुहा
(१७° २६ एन, 73° १५ ई) आहे. या भागातील स्थानिक याला ‘वाघबीळ’ म्हणून ओळखतात. इथे पोहोचण्यासाठी डोंगर चढून किमान २० मिनिटांची पायपीट करावी लागते. येथे पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग गावातील पालशेत हायस्कूलचे पर्यवेक्षक मनोज जोगळेकर यांच्या आंब्याच्या बागेतून जातो. पालशेत ते पोमेन्डी मार्गावर निवोशी गावाजवळ बारभाईच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. सुंदर नदीच्या
पालशेत गुहेची पाहणी करताना
       धीरज वाटेकर आणि विलास महाडिक  
दोन्ही तीरावर, जांभ्या दगडाचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे. पावसाळ्यात या भागातून छोटे-मोठे असंख्य ओहोळ अरुंद आणि खोल घळयांतून वाहत असतात. ते दृश्य अतिशय मोहक असते. याच नदीपात्रात साधारणत साडेचार मीटर उंचीच्या धबधब्याशेजारी ही गुहा असून तिच्या जवळ जीवंत झरा आहे. या गुहेचे प्रवेशद्वार दक्षिणेला असून ते आयताकृती आहे. त्याची रुंदी दीड मीटर, उंची अडीच मीटर आहे. सन २००१ साली गुहेत आदिमानवाच्या वापरातील काही हत्यारे मिळतील  का ? यासाठी डॉ. मराठे यांनी गुहेत उत्खनन केले होते. तेव्हा त्यांना २.७ मी. खोलीवर नव्वद हजार वर्षांपूर्वीची
हात कुऱ्हाड, तोड कुऱ्हाड, फरशी, तासव्यासारखी तब्बल ५४ पुराश्मयुगीन हत्यारे सापडली होती.

यापूर्वी भारतात तामिळनाडूमध्ये मद्रासजवळील पल्लवम येथे काही दगडी हत्यारे सापडली
गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा !
होती. भारताच्या साडेसात हजार कि.मी. विस्तीर्ण समुद्र किनारपट्टीवरील नव्वद हजार वर्षे जुनी असलेली ही पहिलीच गुहा आहे. या गुहेमधील पहिला आदिमानव हा होमो इरेक्टस प्रकारचा होता. त्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र त्याच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नव्हता. जंगलातील अन्न गोळा करणे आणि दगडी हत्यारे फेकून प्राण्यांची शिकार करण्यापर्यंत त्याची प्रगती झालेली होती. भारतात  विविध २२ हून अधिक ठिकाणी पालशेतसारख्या अच्युलियन मानवाच्या गुहेतील वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यात देशातील ७५०० कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्याजवळील ही गुहा हे पहिले संशोधन आहे. डॉ. मराठे यांचे हे संशोधन 'चालू विज्ञान' या देशातील अग्रगण्य वैज्ञानिक जर्नलमध्ये जून २००६ च्या अंकात प्रकाशित झाले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.  


पालशेत गाव नकाशा 
पालशेत गुहा नकाशा 
पालशेत गुहेत मिळालेली दगडी हत्यारे 
नारळ आणि सुपारीच्या बागांनी युक्त असलेल्या पालशेतला समुद्रकिनारा लाभला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात डॉ. मराठे यांनी या गावात पुराश्मयुगकालीन गुहेसह पुरातन बंदर आणि त्याच काळातील समुद्रातील बांधकामाचेही संशोधन केलेले आहे. गावात लक्ष्मीनारायण मंदिराला लागून, कुंभारआळी आणि बापटआळी भागात इ.स. २ ते इ.स. १६ पर्यंत अस्तित्वात असलेले पुरातन बंदर आहे. येथून समुद्रापर्यंतचे अंतर दोन ते अडीच कि.मी. इतके आहे. बंदराच्या बांधकामाचे अवशेषही समुद्रापर्यंत दिसून येतात. इ.स. पहिल्या शतकात एका ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या ‘पेरिप्लस मॉरीस एरिग्रायर’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात कोकण किनारपट्टीतील अनेक बंदरांचा समावेश असून त्यात ‘पालमपट्टई’ असा आजच्या पालशेतचा उल्लेख आहे. इ.स. तिसऱ्या शतकादरम्यान ग्रीस आणि रोमशी या बंदरातून व्यापार चालत होता. इ.स. सतराव्या शतकात सलग झालेल्या दुष्काळामुळे हे बंदर मागे पडले असावे. हे बंदर अर्धगोलाकार बुरुजाच्या आकाराचे आहे. गुहागर तालुक्यात सुरळ येथील प्राचीन शिवमंदिर आणि मानवनिर्मित सोळाशे वर्षपूर्व गुहा, वेळणेश्वरमध्ये सापडलेल्या दहाव्या शतकातील बंदराच्या खुणा, मानवी देहाचे सांगाडे, आठ हजार वर्षांपूर्वीची समुद्र भिंत आणि जगातील सर्वात जुन्या मानवी वसाहतीचे नमुने मिळाले होते. श्रीवर्धन-केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत असलेल्या मानवनिर्मित बांधकामास पणजीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला होता. हे बांधकाम सुमारे २२५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. ते दगडी असून, सलग नाही. याबाबत सलग सहा वर्षे संधोधन सुरु होते. या साऱ्यांतून हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन आणि देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा डॉ. मराठे यांनी केला होता. दुर्दैवाने जुलै २०११ मध्ये डॉ. मराठे यांच्या निवृत्तीनंतर हे सारे संशोधन थंडावले. त्यानंतरच्या कालखंडात इतर कोणाही संशोधकाने हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

गुहा परिसराचा विकास व्हायला हवा !

    सध्या ही पालशेतची गुहा अक्षम्य दुर्लक्षाची शिकार ठरली आहे. येथे घेऊन जाण्याची
  गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा
मानसिकता असलेल्या मनुष्यबळाचीही परिसरात सध्या वानवा आहे. या गुहेचा शोध लागल्यानंतर गावातून तिथपर्यंत जाण्यासाठीच्या मार्गावर चुन्याने रंगविलेले पांढरे दगड ठेवून रस्ता समजेल अशी व्यवस्था केली गेली होती. मात्र त्यालाही आज १७-१८ वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हा देशभरातील अनेक अभ्यासक, पर्यटक आणि चिकित्सकांची पाऊले पालशेतच्या दिशेने वळली होती. आज पर्यटकांना, अभ्यासकांना चाचपडत इथपर्यंत पोहोचावे लागते आहे. या दुर्लक्षित गुहेला भेट देण्यासाठी जात असताना साप आणि विंचू यांच्याबाबतच्यासह इतर योग्य ती सर्व खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. गुहेचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. सुंदर नदीच्या पात्राचे पाणी बांध घालून अडविले तर या ठिकाणी असलेल्या मुबलक जागेचा उपयोग करून एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आकाराला येऊ शकते. यासाठी प्रशासकीय पुढाकार आवश्यक आहे. असंख्य संशोधक आणि अभ्यासक सातत्याने कोकणात विविध ठिकाणी आपापले संशोधन-अध्ययन कार्य करीत असूनही निव्वळ तेवढ्याने पर्यटन विकास शक्य नाही. आजही दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजीच्या लेणींना आपण संपूर्ण न्याय देऊ शकलेलो नाही. कोकणच्या मातीवर ‘बेगडी’ नव्हे, मनापासून प्रेम करणाऱ्या विकास पुरुषाची कमतरता कायम सतावते आहे.     

जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये, नेरळ-माथेरानची नॅरो गेज’ ‘टॉय ट्रेनवगळता, हजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. निवृत्त पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित केळशी, ता. दापोली येथील निश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीसह समुद्रातील ८ हजार वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि पालशेतची पुराश्मयुगकालीन गुहा यांसारखे संशोधन ‘जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळ यादी’त समाविष्ट व्हायला हवे. कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. कोकणात एकविसाव्या शतकात झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे झालेले असताना त्यास दुर्लक्षून जागतिक स्तरावर संपूर्ण कोकणचा पर्यटनात्मक विकास शक्य नाही, याची जाणीव कोकणवासियांना होईल तेव्हाच कोकणचा संपूर्ण विकास होईल.  

धीरज वाटेकर
मो.९८६०३६०९४८







आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...