मंगळवार, १६ जून, २०२०

अशी वेळ कोणावरही न येवो !

            
            कोकण किनारपट्टी, 3 जून २०२० ! वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत !! नाव, ‘निसर्ग’ चक्रीवादळ !!! ते आपल्या दिशेने येत असल्याच्या सूचनेचा ‘भोंगा’ सरकारने तत्पूर्वी वाजवून आपली जबाबदारी पार पाडली होती. सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी ते आल्यावर स्थानिक मित्र बोललेला, ‘वादळ जबरदस्त आहे. असा वारा पहिल्यांदा पाहिला !’ वादळ येऊन गेल्यानंतर भेटला तेव्हा म्हणाला, माझं एवढं हे सारं वैभव खलास झालं रे ! असं कधीही वाटलं नव्हतं की हे सारं शून्यावर येईल ! कोकण किनारपट्टीत आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागायतदारांसह अशा छोट्या-मोठ्या असंख्य उमद्या व्यावसायिकांना हताश आणि हवालदिल झालेला पाहणे निवळ क्लेशकारक आहे. कितीही संकटं आली तरी लोकं जगणं सोडत नाहीत. मात्र अशी हानी लोकांना कित्येक वर्षे मागे सारत असते. डोळ्यांदेखत व्यवसाय उध्वस्थ होऊन दमछाक झालेल्या पिढीची उमेद जीवंत ठेवण्याचं मोठं सध्या आव्हान आहे. त्यांच्या वेदना आम्ही कशा समजून घेणार आहोत ? ...अन्यथा हे शासनयंत्रणेचं सर्वात मोठं अपयश मानलं जाईल.

त्या ३ जूनला तारखेला सकाळपासून थंडगार वारे सुटलेले होते. लोकांची आवराआवर सुरु झाली. वारा वाढू लागला. पण त्याला जोर नव्हता.  हळूहळू लोकांनी आपली दार खिडक्या बंद करायला घेतल्या. काहीजण टी.व्ही.वरचे अपडेट्स पाहू लागले. रेंज असेपर्यंत वाऱ्याचे व्हिडीओही व्हायरल करून झाले. काहींनी फोन करुन इकडची-तिकडची परिस्थिती चाचपली. तोवर सकाळचे १० वाजून गेले. वादळाने १२० किमी वेग पकडायला सुरुवात केली. बघताबघता उत्तर रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड तालुके चक्रीवादळाने आपल्या कवेत घेतले. लोकांच्या घराच्या दरवाजा आणि खिडक्यांतून आत येऊ पाहाणारे पाणी छतावर जमा होऊ लागले. घरा-घरातल्या वस्तू भिजल्या. आगोटचं म्हणून जमवलेल्या अन्नधान्याला पाणी लागून ते डोळ्यादेखत खराब होऊ लागलं. सगळीकडे पाणीचपाणी होणार या विवंचनेनं लोकांना घेरलं. आवरायचं कसं ? नि सावरायचं कुणाला ? भिजत चाललेलं अन्नधान्य कोरोनाच्या कहरात जमविण्यासाठी केलेली धडपड आठवून काहींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कौला, पत्र्यांचा होणारा जीवघेणा आवाज, झाडांची पान हवेत उडावीत तसे घरांवरचे पत्रे लोखंडी चॅनेलसह उडू लागले. ५/१० नव्हे तर तब्बल पन्नासेक फुटांवर जाऊन पडले. काही तर झाडांवर जाऊन अडकले. जिथे उडून गेले तिथेही त्यांनी नुकसान केलं. कुणाच्या शेतातली १०० वर्षांपूर्वीची चिंच मुळासकट उन्मळून पडली. कुठे घरावर फणस पडला. दोन माणसांच्या कवेत न सामावणारा आंबा पिळवटून कोसळला. काही झाडं उभी पिंजकली. मुळांसकट एकावर एक उन्मळून पडणाऱ्या या मोठाल्या झाडांचे धडकी भरवणारे आवाज, वाऱ्याच्या वेगाने पिळवटणारे वीजेचे पोल, डोळ्यांदेखत तुटणाऱ्या त्यांच्या तारा, २/२ किलोमीटरपर्यंत स्पष्ट ऐकू येणारी सागराची गाज, स्वतःभोवती वेगाने चक्राकार फिरणाऱ्या वादळात सापडून धडधडू लागलेली धरतीमाता, सरकारी सूचनेप्रमाणे स्लॅबच्या खाली उभारलेल्या माणसांची हालणारी अस्वस्थ शरीरं असं काहीसं कुणीही कधीही न अनुभवलेलं दृश्य होतं ते ! शेवटी स्लॅबवरून, इकडून तिकडून, आडवंतिडवं पाणी घरात आलंच. बघता बघता सारं घर पाण्यानं भरलं. जीन्यांवरून धबधबे वाहू लागले. मातीच्या भिंती क्षणार्धात जमिनींना भेटत्या झाल्या. आता झोपायलाही जागा शिल्लक राहिली नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबप्रमुखांची आपल्या लहानश्या लेकरांच्या नजरेला नजर देताना काळीज पिळवटून टाकणारी झालेली हृदयातली कालवाकालव शब्दात पकडता न येणारी ! उत्तर रत्नागिरीत विध्वंस करून चक्रीवादळ श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर करत अलिबागला पोहोचलं. मुंबई वाचली. चक्रीवादळ पुढे नाशिकला धडकलं. वादळ अनुभवलेला मित्र म्हणतो, ‘आता काही नाही रे ! जे काही झालं ना ते त्या ३ तासातच ! ते पाहिलं असतं ना म्हणजे कळलं असतं नक्की निसर्ग ‘चक्रीवादळ’ म्हणजे नक्की काय आलं होतं ते !’ खरं आहे त्याचं म्हणणं !

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड भागातील काही आपदग्रस्त गावांत असं काही घडलंय याची सुरवातीच्या २/४ दिवसात कुणालाच नीटशी कल्पना आलेली नसावी. जसजशी येत गेली तसतशी यंत्रणा हलू लागली. नेते, पदाधिकारी, मंत्री यांचे पाहाणी दौरे सुरु झाले. सांत्वन होऊ लागली. धीर दिला जाऊ लागला. मदत मिळू लागली. सुरुवातीचे १५ हजार नुकतेच रुपये आपदग्रस्तांच्या खात्यात जमा होऊ लागलेत. गावागावात पोहोचलेले पाहुणे मदतीच्या पिशव्या रिकाम्या करून परतू लागलेत. तरी एक नशीब हे चक्रीवादळ दिवसा आलं. कोकणात मदतीला, नातेवाईकांच्या भेटीला जाणारी लोकं तिथली स्थिती पाहून अश्रू ढाळू लागली. केळशीतल्या खालच्या डुंगात तर दोन स्त्रीया दोन भिंतींच्या मधात दिवसभर अडकून पडल्या होत्या. त्या घरावर वड कोसळलेला. रात्री सुदैवाने त्यांच्या दीर्घ श्वासोच्छवासाच्या आवाज आल्याने ओढून बाहेर काढण्यात यश आलं. काही भागात तर एवढ्याश्या वादळात परसदारातल्या विहिरी भरल्या. काही लोकांनी चक्रीवादळापूर्वी घरांवर नवे पत्रे टाकलेले होते. बऱ्याच शाळांची वित्तहानी झाली. तरीही गावागावातून लोकं त्याचं दिवशी दुपारी कामाला लागली. काही शाळाही स्वच्छ झाल्या. वाड्यावाड्यातून एकत्र होऊन एकेक घर तात्पुरतं शाकारू लागली. पंचनाम्यातून काय मिळणार आहे ? पंचनामा करा नाहीतर काहीही करा. झालेलं नुकसान काही परत मिळणार नाही. हे पक्क माहिती असल्यानं लोकं एकमेकांना आधार देती झाली.

८/१० दिवसानंतरचं चित्र मात्र आमच्यातल्या पर्यावरणप्रेमीला केवळ झाडं कापण्याच्या ‘ट्री कटर’ मशिनींच्या आवाजाने जणू साऱ्या निसर्गाला वेठीस धरलेलं जाणवलं. खरंतर ‘ट्री कटर’ मशीनवर बंदी आणण्याची मागणी व्हायला हवी, अशा मताचे आम्ही ! पण इथं दिवसभर त्याचेच आवाज ऐकावे लागले. अर्थात पर्यायही नव्हता. अजून काही काळ फक्त तेच आवाज ऐकू येत राहतील. जवळपासची सारी झाडं थबकलीत. ‘सुक्या सोबत ओलंही जळतं’, तश्याप्रकारे काही ठिकाणी घडतंय. का तर म्हणे ? चक्रीवादळाने झाडं पार मुळापासून हादरलीत. त्यांना रस्त्यावर, परसदारी ठेवण्यात काहीही अर्थ नाही. शिल्लक दिसेल ते झाड तोडण्याचा सपाटा सुरु आहे. हे बघून वाईट वाटलं. सुदैवाने अशातही दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ. संतोष वरवडेकर आणि त्यांचे सहकारी समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे आदिंनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिल्याची वार्ता समजली, निसर्गमन सुखावलं.

११ वर्षांपूर्वी आमच्या विवाहाला आलेल्या एका आजीला भेटलो. ती म्हणाली, ‘काय नाय ओ ! पोरं माझी वाचली एवढंच नशीब म्हणायचं ! पुढची १५/२० वर्ष आता फळफळावळ बघायला नको. लागवड केली तर ही लहान पिढी उद्या पुढे खाणार ! नंतर होईलही सगळं चांगलं ! पण आम्ही थोडंच राहणार आहोत. प्रत्येकाचं असंच झालंय. इतक्यात आजीसाठी आणलेली पिशवी आम्ही हळूच घरात सरकवली. घर कुठलं ? सारी दैनाच झालेली ती ! ज्या व्हरांड्यातून आम्ही नेहमी घरात पाऊलं टाकतो तिथंच चूल मांडलेली. संसार उघड्यावर आलेला. तिची मुलं पाठीमागच्या बाजूला एकावर एक कोसळलेले नारळ, फणस, आंबा बाजूला करण्यात गुंतलेले होते. कोसळलेल्या घराला त्यातल्याच एका सुपारीच्या सरळ खोडाचा तात्पुरता आधार दिला गेला. कौलाच्या खालच्या जागेत आधाराला नारळा-सुपारीच्या खोडाच्या म्हणून रिपांना टाकलं गेलं. कौलं चढवायला सुरुवात झाली. अगदीच नाही तिथं प्लस्टिकचं कापड, ताडपत्री असलं काहीतरी जे मिळलं ते शाकारण्याचं  काम सुरु राहिलं. घराघरात हीच स्थिती राहिली. आजीनं कुठून बघितलं कुणास ठाऊक. पण जाताना म्हणाली, ‘पिशवी रिकामी नेऊ नकोस. ४/२ शहाळी घेऊन जा. नातवंड खातील माझी ! आता परत कधी होतील माहिती नाय !’ बापरे ! माझे डोळे पाण्याने भरले. परिस्थिती काय ? आजी बोलत्येय काय ? मी विचार करत असल्याचं बहुदा तिच्या लक्षात आलं असावं. परत म्हणाली, ’अरे ने हे ! घेऊन जा. मी जगताय का मरताय ? कोणास ठाऊक ?’ तेवढ्यात कोकणच्या उत्तर किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाचं हे तांडव अनुभवलेली आजीची दीड वर्षांची नात जवळ येऊन बोलली, ‘आमचा नाय, आजीचा घर मोडला !’

पुण्या-मुंबईसह दुनियेभरातली संवेदनशील मनाची माणसं लोकांना सहकार्य करण्यामागं तर साऱ्या आपदग्रस्त गावागावातली व्यापारी मनाची माणसं पैशामागं इथेही धावू लागली. अपवाद असतीलही. पण मालाच्या तुटवड्याच्या जोरावर चालणारं, ‘कोरोना’ने दुनियेला दाखविलेलं हे जीवंत सत्य इथेही अनुभवायला मिळालं. मोलमजूरी करून जगणाऱ्या समूहाला १३ रुपये एम.आर.पी.ची वस्तू २० रुपयांना विकत घ्यावी लागली. कोन्यावरचे पत्रे ५० रुपये फुटांनी विकले गेले. एक बागायतदार म्हणाले, ‘लोकं तिप्पट खर्चात पडलेत ओ !’ एका ठिकाणी तर वाडीत घरे ५२ ! आणि कोणा पुढाऱ्याकडून मदत काय पोहोचली तर ५ पुड्या फरसाण, ५ बटर पुड्या आणि २ पाकीट मेणबत्या बस्स ! आता २४ नग मेणबत्या ५२ घरांत कशा वाटायच्या ? प्रश्न पडला. मेणबत्ती तोडायची की अर्धी जाळून मग दुसऱ्या घरात पुन्हा पेटवायची. सांगणारा खूप तावातावाने सांगत होता. त्याचा रागही स्वाभाविक होता. पण दोष त्या पुढाऱ्याचाही नसावा. दुर्दैवाने त्याने व्यक्तिगत किंवा आपल्या जवळच्यांना किंवा नक्की कुणाला मदत पोहोचणार आहे याचा नीटसा अंदाज न घेता पाठवली असावी. स्वीकारणाऱ्यांनी मात्र ती वाडीत आणली. त्यातून, ‘आपण काय लोकांची चेष्टा करायची काय ? ज्याच्याकडून घेतलं त्याला परत नेऊन द्या.’ इथवर विषय आलेला. अर्थात, ‘एखाद्या संस्थेने मदत आणून दिली तर त्यांचा अपमान करू नका. ज्यांना गरज आहे त्यांची घर दाखवा’ असंही तो आपदग्रस्त बोलला. तोही संवेदनशील वाटला. हा किस्सा नोंदवायचं कारण इतकंच की अशा प्रसंगी कार्यकर्त्यांनी बेभान होऊन काम जरूर करावं. पण चुकीच्या दिशेनं भान हरपून गेलं की अशा संदेश देणाऱ्या घटना घडण्याची संभावना वाढत जाते, हेही लक्षात घ्यायला हवं.

शहरातली माणसं ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. कोकणात, गावातली माणसं मरेपर्यंत राबतात. बरं ! घरचं ठीक असलं तरी या माणसांचं राबणं थांबत नाही. ‘जोवर झेपतंय तोवर करायचं’ या विचारानं ही माणसं कार्यरत राहतात. आत्ताच्या चक्रीवादळातही ही लोकं उठून कामाला लागलीत ती याचमुळे ! कोकणासाठी १०० टक्के अनुदानाच्या फळबाग लागवड योजनेची रास्त मागणी पुढे आलेली आहे. तेवढी रोपं उपलब्ध होण्याचं आव्हान आहे. हे बागायती नुकसान सावरायला किमान १० वर्ष जातील. तरीही शक्य होईल ती माणसं आपापल्या बागा साफ करून नव्याने खड्डे खणून ४/२ कलमंही लावतील. त्यांना जगवतील. हे वर्ष वाया घालवणार नाहीत. हमीभाव मिळत नाही. बँकेचे कर्ज फेडता येत नाही हे खरं असलं तरीही इथली माणसं घरात रडत बसणार नाहीत. गणपती बाप्पाची थोडी उंची नक्की कमी करतील, पण ही माणसं येऊ घातलेल्या बाप्पाला आनंदात घराघरात बसवतील. आपलं दु:खही त्याला कळू देणार नाहीत ती ! सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेलं हे कोकण, इथला ४/५ महिन्यांचा भरपूर पाऊस, तुकड्यात विभागलेली शेती, महद्प्रयासानं त्यात येणारं भाताचं पिकं घ्यायला, जमिनीत नांगर फिरवायला, लावणीला इथं सुरुवात झालीय. कोकणी माणूस कर्जापासून तसा दूर पळणारा आहे. कर्ज बुडवणं, मग माफ करायला लावणं, आत्महत्या करणं असल्या गोष्टी करायला त्याला वेळ मिळत नसावा. एका आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये राज्यात गेल्या ३ महिन्यात ११९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने इथल्या आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमधल्या फरकांचा अभ्यास करून अहवाल बनविण्यासाठी एक समिती घोषित करायला हरकत नाही. संकटांकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची इथल्या माणसाची ‘त्या आजीची’ भूमिका तरी या निमित्ताने जगासमोर येईल.

यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय ? अशा चर्चा सुरु होतील. तज्ज्ञ आपली विचारी भूमिकाही मांडतील. सरकार त्या मुद्यांचं काय करेल ? पूर्वी कोकणातली घरं अत्यंत उतरत्या छपराची होती. आम्हीही गावच्या घरी आणि आजोळी लहानपणी कंबरेत वाकून घरात शिरायचो. जागतिकीकरणाने ग्रासलेल्या विकासाच्या प्रक्रियेत ती घरं गायब झाली. तेव्हाची कमी शिकलेली जुनी माणसं अधिक शहाणी होती. आज वीजपुरवठा भूमिगत पद्धतीने करण्याच्या सूचना येऊ लागल्यात. विकासाच्या आड येणारी झाडं एकाबाजूने कापल्याने झाडाचं वजन एका बाजूला जास्त होतं. दुर्दैवानं ते झाडं जोराच्या वाऱ्यात उन्मळून पडतं हे जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांचं निरीक्षणही महत्त्वाचं आहे. परसदारातल्या वृक्ष लागवडीबाबतही निश्चित भूमिका शासनाकडून नव्याने जाहीर व्हायला हवी. आपत्ती ही नुकसान करते. पण नुकसान नगण्य करायला आपण कधी शिकणार ? जपान भूकंपप्रवण आहे. पण वारंवार भूकंपाचे लहान-मोठे धक्के सहन करून ते ताकदीने उभे आहेत. आपणही राहू यात. या चक्रीवादळामध्ये वृक्षसंपदेची सर्वात जास्त हानी झालेली आहे. सुदैवाने 'निसर्ग'बाबत ३१ मेला याचा संभाव्य इशारा मिळाला होता. मुंबई परिसरातल्या समुद्रात सन १८८२ साली धडकलेले मोठे चक्रीवादळ ‘बॉम्बे_सायक्लॉनम्हणून ओळखले जाते. मुंबई लगत कोकण किनारपट्टीत चक्रीवादळ धडकण्याच्या घटनेची दुर्मीळ नोंद आहे. सन १९६८ साली हर्णैला चक्रीवादळ धडकले होते. सन २००९ ला फयान येऊन गेले. फयानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान केले. ‘कोरोना’काळात पूर्व किनारपट्टीवर ‘अम्फान’ चक्रीवादळ आल्यावर कोकणातही असं काही येईल असं कुणाला वाटलं नव्हतं. तेवढ्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळ आलं. आता ते निसर्गनिर्मित की मानवनिर्मित अशा चर्चाही होत राहतील. कारण येणारी वर्षे चक्रीवादळांची असतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. हवामान बदल हे सत्य आहे. निसर्गाने दुसरी घंटा वाजविली आहे. याच्याशी सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, बागायतदारांना जुळवून घ्यावे लागेल हा तज्ज्ञांचा सूचक इशारा पुरेसा बोलका आहे. या साऱ्या किनारपट्टीत सध्या भयानक रोगराई पसरण्याचा धोका आहे. समुद्रकिनाऱ्यावर वादळांचा वेग थोपवून धरणाऱ्या वृक्षांची लागवड गरजेची आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळानं  विध्वंस घडवलाय. या विध्वंसाला कोरोनाची दुर्दैवी किनार आहे. कोकण किनारपट्टीचं झालेलं सारं नुकसान पंचनाम्यात सापडणार नाही आणि मावणार तर त्याहून नाही आहे. इथल्या पर्यटन व्यवसायाचं झालेलं नुकसान असह्य करणारं आहे. ते भरून काढणं निवळ कोकणावर प्रेम करणाऱ्या पर्यटन प्रेमींच्या हातात आहे. लॉकडाऊन नंतर पर्यटक आपली दमदार पाऊलं पुन्हा कोकणात टाकतील याची खात्री आहे.

नुसत्या राजकीय दौऱ्यांनी प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न फक्त कळतील. ते सोडवायला ठाण मांडून बसावं लागेल. सुदैवाने १/२ नव्हे तर तब्बल 3 पक्षांचं सरकार राज्यात सत्तेवर आहे. गावागावात त्यांचे कार्यकर्ते विखुरलेत. सामाजिक पक्षकार्य सुरु आहे. तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘कोरोना’ग्रस्तांच्या व्यथा आपण पहिल्यात. निसर्ग चक्रीवादळाचेही तसेच आहे. तिघांची ताकद एकत्रित येऊन गावागावात कार्यरत झाली तर जनसामान्यांना निश्चित मदत पोहोचेल. पण अपवाद वगळता दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यावर (सिंधुदुर्गसह) सन १९२९ पासून ऑक्ट्रॉय कर लावलेला होता. हा कर रद्द करावा आणि उत्त्पन्नासाठी पर्यायी योजना सुचविण्यात यावी अशी मागणी सन १९६३ पासून होऊ लागली होती. सन १९७२ च्या दरम्यान जिल्ह्याला ऑक्ट्रॉय करातून ३०/३२ लाखांचे उत्त्पन्न मिळत होते. जिल्हा परिषदांना शासन त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नाइतकी मॅचिंग ग्रँट देत असते. ऑक्ट्रॉय कर ही रत्नागिरी जि.प.ची बाब होती. तेवढीच मॅचिंग ग्रँट शासनानेही द्यायला हवी. पण शासनाकडून तेव्हा ५ लाख रुपये मिळत. एकूण मागील किमान १० वर्षाचा सरासरी २० लाखप्रमाणे विचार करून जिल्ह्याच्या मॅचिंग ग्रँटमधील सुमारे दीड कोटींची तफावत शासनाने आम्हाला द्यावी अशी मागणी तेव्हा आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांनी केली होती. कोकणात कृषी विद्यापीठ झाल्यापासून, इथल्या माणसाची इकॉनॉमिक कंडिशन सुधारायची तर असेल पाण्याची टंचाई दूर केली पाहिजे. विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती करायला पाणी लागणार आहे. त्यांच्या एक-दोन एकर जमिनीला आपण पाणी देणार नसू तर विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

कोकण आणि घाटावरील बागायती वेगवेगळी आहे. घाटावरील ऊस, हळद, तंबाखू ही बागायती पिके वर्षाला होणारी आहेत. कोकणात आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या झाडांना फळधारणा व्हायला किमान पाच वर्षे लागतात. अलीकडचे केळी, अननसासारखे फळ एक-दीड वर्षानंतर येते. राज्यात जी पिकं वर्षाला उत्पन्न देतात. ते ते अडचणीस्तव वर्षा-वर्षाला सरकारकडे याचना करीत असतात. सरकारही त्यांचं ऐकतं. कोकणात मात्र तसं घडत नाही. म्हणून कोकणाने आपत्कालीन मदत मागितली तर ती तेवढ्याच सक्षमतेने सरकारने द्यायला हवी आहे. दुर्दैवानं कोकणचं ऐकणारं दीर्घकालीन सरकार राज्याला लाभलेलं नाही. अपवाद वगळता आमचे लोकप्रतिनिधीही आपापली व्होटबँक सांभाळण्यात गुंतलेले असतात. त्यासाठी ते रोजच्या पेपरात कधी पाठी तर कधी पुढे हसतमुख चेहरा घेऊन हजर होतात. जनताही अशालाच भुलते. ‘यथा प्रजा, तथा राजा !’ इथली स्वर्गीय भूमी नासवणारे रासायनिक प्रकल्प, एन्रॉनसारखे बुडणारे प्रकल्प येथे आले. त्यामुळे कोकणी माणसाची मानसिकता कमालीची ‘विरोधी’ बनलेली आहे. अनेकविध कारणांनी ‘स्वतंत्र कोकण’ची मागणी इथे अधूनमधून पुढे आणली जाते. हे कोकण सावरावं म्हणून प्रशासन वेगाने काम करतंय ! काही ठिकाणी आपदग्रस्त कर्मचाऱ्यांनाच त्यांच्या गावातून दुसरीकडे हलवलं गेलंय, हे वाईट आहे. एन.डी.आर.एफ., एस.डी.आर.एफ. तुकड्या, कण्हेरी मठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आदि सामाजिक संस्था, संघटना, बँका, विद्यार्थी संघटना, छोटे-मोठे गट, सामाजिक कार्यकर्ते, पंचनामा करणारे महसूल कर्मचारी, शिक्षक जीवतोड मेहनत करताहेत. त्या सर्वांप्रति नक्की कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे. निसर्गदेवता साऱ्या आपदग्रस्तांना यातून लढण्याचं बळ देवो !

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या निमित्ताने कोकणावरील कायमच्या दुर्लक्षाचा दुर्दैवी घटनाक्रम पुसून टाकून काही ठोस आणि भरीव करण्यासाठीची संधी सरकारला चालून आली आहे. ३/३ एकत्र आलेले पक्ष सरकार चालवत असल्याने निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे अवघड नाही. गावागावात या पक्षांचं दखलपात्र अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांकडून ‘पल पल की खबर’ घेत जनतेला ठोस सहकार्य करण्याची भूमिका पार पाडली जायला हवी. पंचनाम्यापूर्वीच इथं अनेकांनी आपापली उध्वस्थ घरं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती शाकारायला घेतली. ही बाब नोंदी करणाऱ्या ‘महसूल’च्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली असेल. इथला माणूस स्वाभिमानी आहे. तो ‘आत्महत्या’ करणार नाही. सरकारकडे तो दरवर्षी मदतीसाठी याचना करायला गेल्याचाही इतिहास नाही. ‘अशी वेळ कोणावरही न येवो !’ असं म्हणण्याची आलेली ही वेळ म्हणूनच नीट समजून घेतली जायला हवी आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल : dheerajwatekar@gmail.com          

दैनिक सागर २० जून २०२० 

साप्ताहिक कोकण मिडिया १९ जून २०२० 
                                    
दैनिक जनमाध्यम अमरावती २० जून २०२०  

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग १ - १८ जून २०२०  

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग २ - १९ जून २०२०



दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग ३ - २० जून २०२०

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग ४ - २१ जून २०२०

दैनिक 'पुढारी'ने या प्रदीर्घ लेखाची 'वादळखुणा' या नावाने ४ भागात उत्तम मांडणी केली.
 पहिल्या भागात, आम्ही न काढलेल्या (संग्रहित) फोटोवर दिलेले आमचे नाव वगळता 
इतर कुठेही सदर मजकूर आमचा असल्याचा उल्लेख, बहुदा नजरचुकीने केला नाही.




 
निसर्ग चक्रीवादळ:कोकण किनारपट्टी





 घरांच्या तात्पुरत्या शाकाराणीस प्रारंभ

 घरांच्या तात्पुरत्या शाकाराणीस प्रारंभ.

लोकांच्या पत्र्यांच्या शेड्स
अशा झाडांवर पोहोचल्या.
झाडांची चैत्र पालवी कुठच्याकुठे हरवली.

शांत मी, अशांत मी !

चक्रीवादळाच्या वेगाने
पीळ बसलेला वीजेचा पोल




गुरुवार, ४ जून, २०२०

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील ‘जिल्हाध्यक्ष’ पदभार निवड जाहीर

अहमदनगर : वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनी आपल्या पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांची पदभार निवड जाहीर केली आहे. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे : अहमदनगर - तुकाराम तुळशीराम अडसूळ, रत्नागिरी - विजयकुमार अनंत पंडित, रायगड - स्वाती सदानंद कदम, सिंधुदुर्ग - रणजित सीताराम पाताडे, बीड - कचरू सूर्यभान चांभारे, नांदेड - सारीनाथ धारबा लोणे, सांगली - बाळासाहेब शिवप्पा कणके, नाशिक - सुहास अशोक गावीत, जालना - तारा श्रीवल्लभ काबरा, लातूर - माधव विठ्ठलराव केंद्रे, वाशिम - शिवप्पा प्रल्हाद नंदकुले, सातारा - डॉ. गौतम महादेव सावंत, चंद्रपूर - स्वाती राजेश धोटकर, ठाणे - सुचिता राजेंद्र सकपाळ, जळगाव - नाना शंकर पाटील, मुंबई -  कमलाकर समर्थ मोरे, धुळे -संजीव मारुती ढवळे, सोलापूर - विजयचंद्र ज्ञानोबा पाटील, औरंगाबाद - राजन रघुनाथ सोमासे, उस्मानाबाद - लक्ष्मण गुराप्पा चव्हाण, हिंगोली - रमेश निवृत्तीराव  यमलवाड, कोल्हापूर - डॉ.पाटील महंमद हुसेन अब्दूलगणी, पुणे - मारुती सीताराम कदम, अमरावती - डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे, गोंदिया - गोवर्धन रघुनाथ खेडकर, यवतमाळ - पंडितराव शंकरराव म्हस्के, गडचिरोली - विठ्ठल  एस. परशुरामकर, नागपूर - रामदास तेजराव खवशी, परभणी - पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी, वर्धा - सीमा वसंतराव कांमडी, अकोला - रुपसिंग सूर्यभान  बागडे, भंडारा - सुनीता उमाजी बिसेन, नंदुरबार - दिग्विजय मगणलाल माळी, बुलढाणा - प्रा. डॉ. अविनाश कृष्णराव मेश्राम.

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने, ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामापासून व विविध साथीच्या आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात व घराभोवती ऑक्सिजन देणारे पिंपळ ,वड ,कडूनिब ,नांदूरखी ,तूळस या देशी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. हे जर सतत पाच वर्षे केले तर आपल्याला कशाचीही भीती राहणार नाही. आपल्या नातवांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी ,आरोग्यसंपन्न जीवन मिळेल.असा संदेश वृक्षमित्र आबासाहेब मोरे दिला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यास दौरे आगामी काळात समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन करू पाहणारे उपक्रम म्हणून नोंदवले जातील. राज्यभरातील सर्व नूतन जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे उपाध्यक्ष विलास महाडिक, प्रमोद काकडे, सचिव धीरज वाटेकर, कार्यालयीन सचिव प्रमोद मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

बुधवार, ३ जून, २०२०

गरज पर्यावरणपूरक राजकारणाची !

            कोरोना लॉकडाऊन ५ च्या प्रारंभी एक जूनला, आजच्या पर्यावरण दिनाचा विचार करत असताना, ‘पर्यावरणाची सर्वांना अभिप्रेत असणारी काळजी वाहिलेले एकतरी परिणामकारक भारतीय राजकीय नेतृत्त्व स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनुभवायला मिळाले आहे का ?’ असा प्रश्न आम्हाला पडला. हा प्रश्न आम्ही राज्यभरातील संपर्कातील असंख्य जेष्ठ पर्यावरणप्रेमी अभ्यासकांचा, कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या विविध व्हाट्सअप ग्रुपवर विचारला. उत्तरादाखल काही मोजक्या प्रतिक्रिया आल्या. समोर आलेली नावंही अगदी तुरळक होती. काहींनी तर ‘एकही नाही’ असेही कळविले. मला सुन्न व्हायला झालं. सन २०२२ ला ‘भारत’ आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. पर्यावरण हा जगातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. हे बहुतेक आम्हाला ‘कोरोना’ नावाच्या विषाणूने समजावून सांगितले आहे. तरीही पश्चिम घाटातील ३८८ गावे संवेदनशील यादीतून हटविल्याची बातमी आली. आणि पर्यावरणावर काय लिहावं ? असा प्रश्न पडला. पर्यावरणपूरक राजकारणाची गरज तीव्रतेने जाणवू लागली.

पर्यावरणपूरक राजकीय नेतृत्व जी समोर आली, त्यात एकच नाव समान होतं ते म्हणजे माजी केंद्रीयमंत्री ‘पद्मविभूषण’ ‘मोहन धारिया’ यांचे ! धारिया यांनी पुणे महापालिका नगरसेवक, राज्यसभा सदस्य, दोन वेळा लोकसभा सदस्य, राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदि पदे भूषविली. त्यांनी सन १९७० मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. त्यांनी सन १९८३ च्या सुमारास 'वनराई' संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. वनराईसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये वनीकरणाची मोहीम राबविली. या माध्यमातून त्यांनी ३०० हून अधिक गावांमध्ये वनीकरणाची चळवळ उभारली. सच्चे पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री राहिलेले कै. अनिल दवे हेही एक यात जवळचं नाव वाटलं. २३ जुलै २०१२ रोजी दवेंनी आपल्या  इच्छापत्रात, माझ्या नावाने स्मारक नको, पुरस्कार नको. माझी छाय़ाचित्रेही नकोत. जर माझ्यासाठी काहीतरी करायचे असेल तर झाडे लावा आणि त्यांना जगवा. मला खूप आनंद होईल. त्याशिवाय नदी संवर्धनाचेही काम करता येऊ शकेल. पण हे ही करताना माझे नाव कोठेही नको,’ असे सांगितले होते. दवेंच्या भोपाळमधल्या घराचं नावही ‘नदी का घर’ असं आहे. त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केली होती. अशी आणखी काही नावं वाचकांच्या नजरेत येतील. माझ्याकडून निसटलेली ! आपण ती नक्की जोडावीत. पण एकूणात या विषयातला अंधार दूर करायची सूचना घेऊन सध्या ‘कोरोना’ आपल्या आसपास वावरतो आहे. रोज सकाळचं वार्तापत्र जगात आज किती लोकांना गिळंकृत केलंय ते सांगतेय, हे सारं दुर्दैवी तितकं भीषण आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबतच्या अलिकडच्या पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राबाबतच्या  राज्य सरकारच्या बैठकीत संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी २०९२ गावांची अंतिम यादी प्रस्तावित करण्यात आली. यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला. दुर्दैवाने वगळलेल्या ३८८ गावांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाघ, हत्ती आदि वन्यजीव भ्रमणमार्गाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. सध्या त्याच्यावर काथ्याकूट सुरु आहे. कोकणात ज्याला जंगल म्हणावे असे क्षेत्र फक्त फणसाड अभयारण्य आणि दोडामार्ग भागात शिल्लक असताना तिथेच औद्योगिक क्षेत्र विस्तारासाठी असे निर्णय होणे दुर्दैवी आहे. देशाच्या विकासनितीवर पुनर्विचार करण्याचा संदेश कोरोना देत आहे. देशाची प्रचंड लोकसंख्या पाहता रोजगारहे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती, खाणकाम, मासेमारी, उद्योग, सेवाक्षेत्र या गोष्टींची वाढ अपरिहार्य आहे. पण याचा पर्यावरणावर परिणाम होतो. पर्यावरणाला प्रगतीच्या मार्गातील नको असलेला खोडा म्हणून बघणे थांबायला हवे आहे. सध्याच्या केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना, इलेक्ट्रिक वाहनांबाबतचे धोरण हे तसे पर्यावरणपूरक विषय आहेत. पण तेवढ्याने भागणारे नाही. पर्यावरणस्नेही, शाश्वत-शेती हा शेतीविषयक धोरणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. यातून स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकते. शहरांची सूज कमी करण्याचा मुद्दा अनेक वर्षे चर्चेत आहे. सध्या तो ‘कोरोना’ने सांभाळला आहे.

देशाचे राष्ट्रीय धोरणच पर्यावरणवादी असावे असा विचार करणारा एकही राष्ट्रीय पक्ष भारतात नव्हता. या पार्श्वभूमीवर इंडिया ग्रीन्सहा पहिला हरित राजकीय पक्ष अखिल भारतीय पातळीवर सक्रिय होत असल्याचे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वाचले होते. पर्यावरणविषयक प्रश्नांच्या अराजकाला राजकीय सोडवणूकहे एक प्रमुख अंग आहे. जगात असे हरित राजकीय पक्ष टास्मानिया (१९७२), न्यूझीलँड (१९७२) आणि ग्रेट ब्रिटन (१९७३) या देशांत स्थापन झाले आहेत. भारतातील राजकारण आणि जीवनशैली पर्यावरणपूरक होणे निकडीचे आहे. पर्यावरण विनाशावर आधारीत राजकारण बदलण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जगात प्रदूषण कमी झाले. नद्या आपोआप स्वच्छ झाल्या. हवा शुद्ध झाली पक्षी मोकळे फिरू लागले. जंगलात निरनिराळ्या पक्षांचे, प्राण्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. तरीही जगात पृथ्वीचे तापमान वाढते आहे. यंदा दिल्ली, नागपूर, राजस्थान येथे जगातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. तापमान मानवी जगण्याची मर्यादा ओलांडू लागले आहे. सागराचे पाणी तापून अधिकची वाफ वातावरणात निर्माण होते आहे. लॉकडाऊन ४ मध्ये ‘टोळधाड’बाबत बातमी आली. आपल्याकडे ती पूर्वीही येत होती. मात्र तेव्हा जहाल विषारी किटकनाशके आणि विध्वंसकारी औद्योगिकरण नव्हते. मला आणखी एक प्रश्न पडतो. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायला आपण हरितक्रांतीच्या नावाने रासायनिक शेती या देशात आणली. आणि आज २०२० मध्ये लोकसंख्या कमी झालेली असल्या कारणाने आपण सेंद्रिय शेतीचा आग्रह धरू लागलो आहोत ? कमी वेळेत अधिक उत्त्पन्न, अधिक नफा या कारणान्वये आम्ही या देशातील भूमातेच्या पोटात रसायने ढकलली, तिला नासवली. भूमातेला नासवायला नव्हे भूमातेला हिरवा शालू नेसवायला हवा हे सांगणारी सक्षम व्यवस्था नसल्याने हे घडले. हरितक्रांतीने निसर्गाच्या अनेक समस्या जन्माला घातल्या.

चालू जून महिन्यात सलग महिनाभर लॉकडाऊन घोषित झाला आहे. याच्या मागे निश्चित कारणे आहेत. जून अखेरीस आपल्याला ‘कोरोना’च्या देशातील भवितव्याचा, वाटचालीचा अंदाज येईल असे ठोकताळे सध्या बांधले जात आहेत. पाऊस सुरु झालाय ! वादळ आलंय. तेही ‘निसर्ग’ नाव घेऊन ! दशकानुदशके भारतीय राजकारणात टिकून राहात देशाचे भवितव्य घडविणाऱ्या राजकारण्यांनी, ‘आपण नक्की या देशाचा कसला विकास केला ?’ असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा आहे. कोरोना काळात जे मानवी कामगारांचे थवे गावोगावी परतू लागले तेव्हा ‘शहरे’ नावाचे विकासाभिमुख परावलंबी जग हे ग्रामीण भागावर अवलंबून असल्याचे पुढे आले. शहरांना विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे पाणी, वीज आदि घटक ग्रामीण भागातून मिळत असतात. विकासाच्या दुनियेत वावरणारी जागतिक नेतृत्त्वे निसर्गाची भाषा समजून घेऊ शकली असती तर बरं झालं असतं. मानव आपल्या कमाईचा बराचसा हिस्सा ‘लाइफस्टाईल’ नावाच्या चैनीवर खर्च करतो. त्यातून नको एवढ्या रोगांना बळी पडतो. पुन्हा रोगांपासून वाचण्यासाठी उलटे चक्र फिरवत राहतो. कोरोनाने हे सारं थांबवलं आहे. तरीही माणूस शहाणा होईल ? असं म्हणायचा अजिबात धीर होत नाही. कारण आमचा हा समाज, ‘ना कीर्तनाने कधी सुधारला ना तमाशाने कधी बिघडला, अशातला ठरावा !’ तरीही आम्हाला सुधारावेच लागेल हा कोरोनाचा संदेश आहे. अन्यथा पुढच्या कधी वर्षांत पुन्हा एखादा नवा कोरोना जन्माला येण्याची दाट शक्यता आहे, याची जाणीव बाळगलेली बरी ! भारतीय राजकारणाने, हा देश वाचला तरच आपण वाचू याची प्रामाणिक जाणं ठेवून आगामी काळात पर्यावरण आवरणाच्या समृद्धीसाठी आपण कोणता कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहोत त्याची निश्चिती करायला हवी. आपापल्या प्रभाव असलेल्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्या आधारावर निवडणूका लढल्या जायला हव्यात. जनतेनेही अशाच पक्षांना साथ द्यायला हवी. अन्यथा जनतेला साथ द्यायला पुन्हा कोरोना येणार आहे ! देशभरातील आजवरचे पर्यावरण, वने आदि विषयातील केंद्रीय आणि विविध राजकीय नेतृत्वाच्या कामांचा अभ्यास करायला घेतला तर अनेक भयंकर विनोद समोर येतील, अशी भीती वाटते. मध्यंतरी सरकारी प्लास्टिक बंदी ही लोकांनी मनावर घेतली असताना सरकारी आदेशाची कारवाई थंडावली. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना शिक्षा झाल्याची बातमी आपल्याकडे येत नाही. आजही आम्हाला शौचालयांचे महत्त्व पटवून द्यावे लागत आहे. कचरा कचराकुंडीमध्ये, घंटागाडीत टाका हे सांगावे लागते. ५ जून १९७२ रोजी पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतासह एकूण १३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. या परिषदेत पर्यावरणविषयक जाहीरनामा काढण्यात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा होतो आहे. परंतु हा विषय कृतीमध्ये उतरविला गेलेला नाही.

विज्ञान, तंत्रज्ञान, विकास या बाबी अपरिहार्य असल्या तरी या प्रक्रियेत आपण माणसाच्या आणि वसुंधरेच्या अंतिम भल्याचा, सामाजिक न्यायाचा आणि सार्वजनिक हिताचा विचार अधिक करणे आवश्यक आहे. आणि इथेच आज राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्वाची गरज आहे. सुदैवाने मोठ्या संकटांना मोठी संधी समजणारे आणि धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व आज भारताच्या केंद्रस्थानी आहे. ‘कोरोना’ने पर्यावरणपूरक राजकारणाची गरज अधोरेखित केली आहे. या देशाचं पर्यावरण रक्षण आमची जबाबदारी आहे असं समजून आपल्या संपूर्ण राजकीय वाटचालीत काम करणारी मंडळी आपल्या देशात अभावानेही आढळत नाहीत. ‘पर्यावरण’ मुद्दा दुर्दैवाने इतका टाकाऊ बनला आहे. तरीही जगभर पर्यावरणप्रेमी काम करत आहेत. सजगतेने हे काम पुढे नेणाऱ्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा !

 धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५,

जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

दैनिक सागर ५ जून २०२० 


दैनिक रत्नभूमी कडून 
"गरज पर्यावरणपूरक राजकारणाची"
या लेखाचा 'अग्रलेख' म्हणून सन्मान 


सोनटक्का फुलू लागला !

    

        जून महिना उजाडला. अजूनही दारातल्या सोनटक्क्याची पानं टोकाला करपलेलीच होती. यावर्षी भर उन्हाळ्यात त्यांना अंघोळ घालत होतो. पण सोनटक्का काही फुलला नाही. काल पाऊस झाल्याने आज पाणी घातलं नव्हतं. सकाळी थोडं उशीरा परसदारी फिरताना यातल्या काहींवर कणिश पुष्पबंध प्रकारच्या गुच्छांवर कळ्या उमलत असल्याचे लक्षात आले. म्हटलं, व्वा ! झाला यांचा सीझन सुरु ! थोडं अधिक बारकाईनं पाहिलं तर यातल्या एका पानामागे सोनटक्क्याचं एक लेकरू जन्मलेलं होतं. सकाळची देवासाठीची फुलं वेचताना याची चुकामूक झालेली होती. आता दिसलं तेव्हा डोक्यात पर्यावरणदिनाचा विचार सुरु होता. कडक उन्हाळा पचवून आसमंतात मंद सुगंध पसरवायला ‘सोनटक्का’ सज्ज झालेला होता. पर्यावरणपूरक कामं फारशी होत नसल्याच्या परिस्थितीतही चिकाटी न सोडत कार्यरत राहाणाऱ्या पर्यावरणप्रेमी सुजनांच्या तनामनाला आनंद द्यायला जणू ‘हा’ अवतरला. सोनटक्का फुलू लागला !

‘कोरोना’ येण्यापूर्वी आम्ही निसर्गवेडे माचणूर (सोलापूर) आणि दोडामार्ग-सिंधुदुर्ग या दोन ठिकाणी मनसोक्त भटकलो होतो. २९ फेब्रुवारीच्या सायंकाळी आंबोली मुक्कामी असताना, सुप्रसिद्ध उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी (सर) आल्याचे वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर यांच्याकडून कळले. त्यांच्यासोबतच डॉ. गिरी सर मुक्कामी असलेल्या हेमंत ओगले यांच्या निवासस्थानी पोहोचलो. डॉ. गिरी सरांशी छान गप्पाही झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीही पुन्हा भेट घडली. यादरम्यान ओगले यांच्या पर्यटन केंद्रातील फुललेल्या ‘सोनटक्का’ फुलझाडाने आम्हाला स्वत:कडे खेचून घेतले. त्याला पाहाताच आम्हाला आमच्या परसदारातील सोनटक्क्यांची तीव्र आठवण झाली. विशेष म्हणजे ‘आंबोली’तला सोनटक्का फेब्रुवारीत फुललेला होता. जेव्हा आमच्याकडचा कायम करपत चाललेला असतो. मला आश्चर्य वाटलं. अर्थात आंबोली ही अशा जैवविविधतेच्या आश्चर्यांची खाण असल्यानं त्यात वेगळं असं  काही नसावं ! पण आम्हाला मात्र त्या निसर्गाची कमाल वाटली. सोनटक्का झुडपाची उंची साधारण अर्धा ते दीड मीटरपर्यंत असू शकते. मात्र यांची नक्की त्याहून अधिक होती. आंबोलीतील वातावरण सोनटक्क्याच्या नाजूक फुलांना, त्याच्या त्या नाजूक गंधाला वर्षभर सुगंधी राहायला जणू सहकार्य करत असावं ! अहाहा ! ‘किती किती म्हणून देतो, हा निसर्ग मानवाला ! पण आम्ही करंटे समजून घेतो, का हो या निसर्गाला !’ अशा तरल भावना चट्कन स्फुरल्या. आंबोलीच्या वातावरणातील चैतन्य सोनटक्क्याच्या नाजूक फुलांना वर्षभर फुलायला प्रोत्साहन देते आहे, म्हणजे नक्की काय ? हे त्या फुलांचा सुगंध आपल्या सर्वांगात भिनवलेल्या निसर्गप्रेमींना नक्की समजेल.

सोनटक्का ही भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित प्रकारची वनस्पती आहे. दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज वाढते. अनेकांच्या परसदारी असते. हळद, आले, कर्दळ यांच्या कुळातील ही बहुवर्षायु वनस्पती आहे. याची फुले शुभ्र पांढरी, सुगंधी, लांब देठाची आणि खूप नाजूक पाकळ्यांनी युक्त असतात. पाकळ्या इतक्या नाजूक, शुभ्रता इतकी लक्षवेधी की हात लावायलाही भीती वाटावी. उमललेल्या फुलाचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये Butterfly Ginger Lily म्हणतात. याच्या तीन पाकळ्या एकवटतात त्या ठिकाणी, फुलाच्या मध्यभागी थोडी पिवळसर झाक असते. परागकणांनी भरलेली ती पिवळीधमक पिशवी खास दिसते. ही फुलं सायंकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. कदाचित म्हणूनच नाराज होऊन लगेच कोमेजून जाणाऱ्या स्त्रीला सोनटक्का फुलाची उपमा देत असावेत. सुगंधी द्रव्यं, पुष्पौषधीमध्ये या फुलांचा वापर केला जातो. फुले उमलली की हाताळून खराब होतात म्हणून याच्या कळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. याचे खोड जमिनीत अनेक वर्षे जगणारे, मांसल जाड आणि आडवे वाढणारे असते. जमिनीवर सरळ पानांसह उभे, बारीक पण मजबूत खोड येते. पाने साधी एकाआड एक, हिरवीगार बारीक आणि लांबट असतात. मोठी पाने दोन रांगात असतात. खोडावर पाने एकमेकांच्या समोरासमोर असतात. माशाच्या काट्यासारखी पानांची रचना असते. सध्याच्या लॉकडाऊन काळात विणीच्या हंगामात गुंतलेल्या लालबुड्या बुलबुलला आम्ही याचे पान आपल्या चोचीने मधातून खुडताना दोनदा पाहिले. जणू बुलबुल त्या पानातला रस शोषून घेत आहे असे वाटले. याच्या कंदापासून नवीन रोपांची निर्मिती होते. याच्यात दुर्मीळ पिवळा सोनटक्काही आढळतो. परसदारी लावण्यात येणाऱ्या झाडांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंदसोबत याचाही नंबर लागतो. पावसाळ्यात याला चांगला बहर येतो. पाकळ्यांच्या एका कणिश पुष्पबंध प्रकारच्या गुच्छातून किमान ६ ते १२ फुलं मिळतात. व्यवस्थित देखभाल आणि पाणी असेलं तर हिवाळ्यातही फुलं येतात. संख्या मात्र कमी होत जाते. याला इतर झाडांपेक्षा पाणी अधिक लागतं. तरीही, आपल्या परसदारी नसल्यास सुंगंधी जीवनाचा आंनद देणारं हे रोप मिळवून नक्की लावायला हवंय.

कोरोना लॉकडाऊन : ५ मधील मागच्या एक जूनची सकाळ ! उन्हात रखरखलेल्या सृष्टीला चैतन्य प्रदान करायला येणाऱ्या वर्षाऋतू आगमनाची निसर्गाला चाहूल लागलेली होती. लॉकडाऊनमुळे ती नक्की जुळून येणार असल्याचं गेले ४/२ दिवस ढगाळून आलेलं आकाश सांगू पाहात होतं. आज आमच्याही लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे जरा अधिकच्या   उत्साहात सकाळी देवपूजेसाठी परसदारातली फुलं वेचू लागलो. आदल्या दिवशीही पाऊस शिंतडलेला होता. त्यामुळे झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नव्हती. फुलं वेचल्यावर सौ.ने नेहमीप्रमाणे (कोरोनाने सध्याच्या जगण्याला ‘नेहमीप्रमाणे’ म्हणायला भाग पाडलंय ! एरव्ही अनेकदा आम्ही ना पूजेला ना फुलं वेचायला घरी सापडतो !) पूजा आटपली. आम्ही आमच्या कामाला लागलो. सकाळी ११ वाजता दारातल्या कल्पवृक्षावर दयाळचा कलकलाट ऐकू आला. म्हणून उठलो. खरंतर त्याचे सध्या कलकलाट करण्याचेच दिवस आहेत. पण तरीही उठून बाहेर बघीतलं तर मार्जार कुलोत्पन्न मांसाहारी ‘मांजर’ जवळपास वावरत होतं. त्याला हटकलं. इतक्यात जवळच्या सोनटक्क्यावर पुन्हा नजर स्थिरावली. बारकाईनं पाहिल्यावर यातल्या काहींवर कणिश पुष्पबंध प्रकारचे कळ्यांचे गुच्छ उमलत असल्याचे लक्षात आलं. एका गुच्छात तर छानसं एकच फुलंही जन्मलेलं दिसलं. सकाळी वेचताना हे लक्षात न आलेलं. म्हणून तसंच राहिलं होतं. तेव्हा चिरंजीव सोबत होता. त्याला म्हटलं, ‘याचा वास घे !’ चिरंजीवाला वास आवडला. मग त्याला थोडं अधिकचं म्हणून दसरा, दिवाळीतला झेंडू, हिवाळ्यातली रातराणी, उन्हाळ्यातला अनंत, रात्री फुलणारा मोगरा, उन्हाळ्यात जरा जास्त आणि इतरही वेळेसही बहरणारा चाफा, आणि पावसाळ्यात गंध वेडावून टाकणारा हा सोनटक्का ! आदि गंमत सांगितली.

सोनटक्का ! किती नाजूक फुलं हो ते ! काय ते त्याचं पांढरं-पिवळं सौंदर्य ! काय तो त्याचा बेधुंद करणारा मंद गंध सुगंध ! ‘कोरोना’ने साऱ्या मानवी बुद्धीमत्तेला निसर्गापुढे नतमस्तक व्हायला लावलंय ! निसर्ग मोकळेपणाने मुक्त विहरतोय ! त्याचे अनेक किस्सेही माध्यमांतून प्रसूत झालेत ! अशा छोट्या-छोट्या उदाहरणातून निसर्ग आम्हां मानवजातीला समजून घेण्याची सूचना करतोय ! खरंतर सगळ्या पर्यावरणीय समस्यांना चघळून त्यांचा चोथा झालाय ! पर्यावरण रक्षणाचं मूळ राजकीय सक्षमतेत दडलंय ! स्वातंत्र्यापूर्वीपासून तिथेच गडबड होत आली आहे. अजूनही गडबड होते आहे. पण आम्ही आतातरी सुधारायला हवंय ! मंद सुगंधाचं सृष्टीचैतन्य हेच खऱ्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. हे रोजची सकाळची हृदयाची धडधड वाढवणारी ‘कोरोना’ची आकडेवाढ आम्हाला शिकवतेय ! यंदाच्या पर्यावरण दिनी आम्ही यातून बोध घेतला, आजूबाजूचा निसर्ग-पर्यावरण सांभाळायला सुरुवात केली आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीचं सच्चं पाठबळ मिळालं तर पर्यावरणीय सुगंध आपलंही जीवन फुलवेल !

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

जून २०२० सिझनमध्ये पहिल्यांदा फुललेले सोनटक्का

या सिझनमध्ये पहिल्यांदा फुललेले परंतु सहज नजरेला
न पडता या पानात कुठेतरी लपलेले सोनटक्का

आंबोली (सिंधुदुर्ग) येथील हेमंत ओगले
यांच्या बागेत नियमित अपेक्षेपेक्षा
अधिक उंच वाढलेल्या, फुललेल्या
सोनटक्का कंद फुलझाडाचा
२९ फेब्रुवारी २०२० रोजी टीपलेला फोटो

              






शुक्रवार, २९ मे, २०२०

निवृत्ती ! ‘भाग्याचं जगणं’ लाभलेल्या मुख्याध्यापकाची !!


    रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातल्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अलोरेचे (अलोरे हायस्कूल अलोरे) मुख्याध्यापक अरुण केशव माने (सर) आज (३१ मे २०२०) सेवानिवृत्त होत आहेत. दीड वर्षापूर्वी ते मुख्याध्यापक झाल्यावर त्यांच्यावर, ‘You deserved it much earlier, A promotion well deserved, An occasion worth celebrating आदि शुभेच्छांचा सोशल मिडीयावर पाऊस पडलेला. वर्तमानपत्रात पुरवणी प्रसिद्ध झाली. ‘आपण केलेल्या शिक्षेमुळे आज माझे जीवन घडले’ असं म्हणू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणीं छानश्या पुष्पगुच्छासारख्या फुललेल्या होत्या ! ३४ वर्षांच्या सेवेत ही विलक्षण किमया साधलेल्या मानेसरांच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...!

त्याकाळात कोकणातील शिक्षणसंस्थाचे संचालक कोल्हापूरला जाऊन शिक्षकांच्या मुलाखती घेत असत. वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध व्हायच्या. कुठल्यातरी हॉटेलातल्या पत्त्यावर मुलाखतींना तारीख, वेळ दिली जायची. अशीच एक जाहिरात मे १९८५ ला कोल्हापूरच्या हॉटेल रायगड येथे येऊन भेटण्यासंदर्भात प्रसिद्ध झाली. जाहिरात वाचून विषयज्ञान आणि शैक्षणिक अर्हता असलेले तरुण मुलाखतीला पोहोचले. मुलाखतीतून शिक्षक निवड झाली. इंग्रजी विषयासाठी निवडले गेले, अरुण केशव माने सर ! आणि शाळा होती चिपळूण जवळच्या खेड तालुक्यातली एल. पी. इंग्लिश मिडीयम स्कूल ! जून १९८५ पासून शिकवणं सुरु झालं. पण नियतीच्या आणि सरांच्या मनात काही वेगळं असलेलं ! मानेसर पुढच्याचवर्षी चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचून श्रीरामभाऊ भिडे, खेरसर आदिंनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे जून १९८६ ला अलोरे शाळेत रुजू झाले. मागील वर्षभरात, कोकणातल्या विद्यार्थ्यांच्या मनात असलेली इंग्रजीची भीती सरांच्या लक्षात आलेली. ही भीती, न्यूनगंड सरांना विद्यार्थ्यांच्या मनातून काढायचा होता. त्यांनी ठरवलं. वर्गात एकही शब्द मराठीत न बोलता केवळ इंग्रजीतून शिकवायचं. प्रयत्नातून हे शक्य होतं, हे त्यांना विद्यार्थ्यांना समजवायचं होतं. तसं सुरु झालं. अलोरे शाळेत कार्यरत असलेले दिलीप शिंदे, उमेश पाठक, दिलीप सपाटे हे त्यांचे समकालीन शिक्षक सहकारी ! अलोरेतील सुरुवातीचे दिवस सरांनी, याच सहकाऱ्यांच्या समवेत घालविले ! कालांतराने सरांना स्वतंत्र रूम मिळाली. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याकडे जाणाऱ्या मार्गावरच्या आंब्यानजीक राहणाऱ्या ‘वाशिटकर’ आजी स्वयंपाक करायला यायच्या ! सरांना त्या आजही आठवतात. वसतिगृहातले शिक्षण म्हणतात ते हेच !

जुलै १९८७ ! मानेसर एकाएकी आजारी पडले. सर्दी, ताप आणि पित्ताचा त्रास त्यांना जाणवू लागला. अविवाहित, गावात नवखे असलेल्या सरांची काळजी कोण घेणार ? जवळच्या डॉक्टरांकडून आणलेली नेहमीची औषधे घेऊन सर आपल्या अंथरुणात पडून होते. शाळेतली त्यांची आजची अनुपस्थिती बाकी कुणाला नसली तरी एका व्यक्तीला जाणवलेली होती. सायंकाळी शाळा सुटली. सारे शिक्षक आपापल्या घरी निघून गेले. मानेसर अजूनही अंथरुणात असलेले. इतक्यात, ‘माने सर ! दार उघडा !’ असा भारदस्त आवाज सरांच्या कानावर पडला. अंथरुणातून उठून कसाबसा त्यांनी दरवाजा उघडला तर समोर मुख्याध्यापक आगवेकर सर उभे ! त्यांच्या हातात ‘त्रिभुवनकीर्ती आणि सुतशेखर’च्या गोळ्या होत्या. आगवेकर सरांनी मायेनं सरांच्या कपाळाला हात लावून ताप तपासला. काही सक्तीच्या विश्रांतीच्या सूचना दिल्या. कौटुंबिक चौकशी केली. आणलेल्या गोळ्या दिल्या. मानेसरांच्या हृदयात वडिलांच्या आठवणी जाग्या करून आगवेकरसर निघून गेले. आगवेकर सरांचं येणं मानेसरांना अंथरुणातून उठण्याची ऊर्जा देणारं ठरलं !

वरील प्रसंगानंतर आगवेकर सरांच्या सानिद्ध्यात विद्यार्थी घडविणे या एका मंत्राने सरही भारावून गेले. मानेसर अक्कोळचे ! सीमावर्ती भागातले. कोकणाशी अजिबात संबंध नसलेला. त्यामुळे सुरुवातीला ओळखीचं नसल्यानं अलोरेत त्यांना अवघडल्यासारख वाटलं. पण इथल्या स्थानिकांनी आपलस केल्यानं अल्पावधीत छान जमून आलं. सरांना जाणवले की मुलांच्या हृदयाला स्पर्शिणारे दर्जेदार शिकवलं पाहिजे. मग प्रयत्न सुरु झाला. विद्यार्थी आणि पालक मायेनं, आत्मीयतेनं वागू लागले. ‘इयत्ता आठवी क’चे वर्गशिक्षक ते इयता ‘दहावी अ’चे वर्गशिक्षक आणि पुढे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक हा खडतर प्रवास नुसता सेवाज्येष्ठतेनुरूप नसलेला !

सरांच्या हाताखाली शिकून बाहेर पडून २५ वर्ष उलटल्यावरही जगभर पसरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या १० मेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ‘wish you a best one’ म्हटलं. यातून जणू कामाची पोचपावती मिळाली. मानेसरांचा आजी-माजी विद्यार्थ्यांवरला प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या वेगवेगळ्या पोस्टवर शेकड्यांनी शुभेच्छा येतात. सरही फेसबूकवरून रोजच्यारोज न थकता आपल्या विद्यार्थ्यांना ‘शुभसकाळ’ संदेश पाठवित असतात. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर अनेकांना याचा कंटाळा असला तरी सरांच्या रोजच्या शुभेच्छांना ४०/५० विद्यार्थी न चुकता लाईक करतात, हे कशाचे द्योतक आहे ? विद्यार्थ्यांच्या भावना शंभर टक्के अस्सलं, भावविश्वातून प्रकटणाऱ्या ! मानेसरांचं सर्वात मोठं सामर्थ्य यात दडलेलं आहे.

वेगाने वाढणाऱ्या विज्ञाननिष्ठ जीवन पद्धतीमुळे दोन पिढ्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. ‘कोरोना’ने त्या दरीला घरोघरी एका छताखाली बंदिस्त करून टाकलंय. त्याला अडीच महिने होताहेत ! खरंतर मानेसरांची सेवानिवृत्ती जल्लोषात साजरी व्हायची. पण नेमकं कोरोनाचं संकट उभं राहिलं. वयोमानपरत्त्वे सरांची सेवानिवृत्ती जाहीर झाली असली तरी, ‘काम अजून संपलेलं नाही !’ हे सूचित करायला तर ही परिस्थिती निर्माण झाली नसेल ना ? सन २०२२ साली संपूर्ण देश आपला अमृतमहोत्सव साजरा करीत असेल तेव्हा आपल्या अलोरे हायस्कूल अलोरे शाळेत सुवर्णमहोत्सवी वातावरण असेल. मानेसर एकषष्टीत पदार्पण करतील ! सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी संकल्पपूर्तीसाठी मानेसरांची आवश्यकता आहे. सरही हे जाणून आहेत. सरांच्या उपस्थितीत, शाळेचा सुवर्णमहोत्सव ‘न भूतो...’ व्हावा यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यानी स्वतःला कटिबद्ध करायला हवंय ! मानेसरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना, आगवेकर सरांच्या मनातले मुख्याध्यापक या नात्याने आगवेकर सरांच्या नावाची सार्थ ‘पाटी’ मिरवणाऱ्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ध्येयाच्या दिशेने वाटचाल आरंभायला हवी ! विशेष म्हणजे, सरांनीही महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले आहे.

खरंतर मानेसरांचं वैशिष्ट्य काय ? असा प्रश्न मला नेहमी पडतो. मग वाटतं, शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यावर गुरूचा सार्वकालीन प्रभावशाली ठसा उमटावा लागतो. एकाचवेळी तो अनेकानेक विद्यार्थ्यांवर उमटविण्यात मानेसर कमालीचे यशस्वी ठरलेत. सरांकडे ‘विद्यार्थी’ भेदभाव कधीच नव्हता. त्यांना हुशार, कमी हुशार, काठावर पास होणारे, शब्दशः ‘ढ’ असे सगळे विद्यार्थी एकसारखेच ! त्यांचं सगळ्यांशी सहज जमायचं ! बोर्डात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याशी सरांचं जितक्या सहजतेनं जमायचं तितक्या सहजतेनं त्यांचं शाळा सोडून देऊन रिक्षा चालवायला लागलेल्याशीही जमायचं ! हे जमणं विलक्षण नैसर्गिक ! कुठलंही काम हलकं नसतं हा संस्कार सरांवर बालपणात बिंबवला गेला असावा.

‘ए कोण रे तो आलाय खाली, व्हरांड्यातून जाते अशी हाळी !

मानेसर आहेत खाली, म्हणत विद्यार्थी करती पळापळी !!

रागीट चेहऱ्यामागे सहृदयतेचा झरा, ममत्वात सामावला जीवनाचा अर्थ खरा !

आदर्श शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, येता कोणती अडचण हेच चांगले समुपदेशक !!

सौ. राधा रायकर मॅडम यांनी शब्दबद्ध केलेल्या या ओळी ! मूळात, ‘हा माणूस जे काही करतोय ते आपल्या फायद्याचं आहे’, असं सरांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मनात झिरपत राहायचं ! कारण ती कृती करताना मानेसर हातचं न राखता अक्षरशः हृदयातून साद घालायचे. म्हणून त्यांच्या मांडवाखालून गेलेले विद्यार्थी आज २०/३० वर्षानंतरसुद्धा आपल्या शालेय जीवनातील त्यांच्या सोबतच्या क्षणांना विसरू शकलेले नाहीत. त्या क्षणांमध्ये देखावा अजिबात नव्हता. जे होतं ते केवळ अन् केवळ विद्यार्थ्याचं कल्याण ! तसे अलोरे शाळेतील सगळे शिक्षक या गुणांनी युक्त ! तरीही आगवेकर सरांनंतर अनेकांना मानेसर अधिक जवळचे वाटतात. याचं मूळ सरांच्या जडणघडणीत, त्यांच्या वसतिगृहातील दिनचर्येत गवसावं ! वसतिगृहातील शालेय शिक्षण तेव्हाही काही विशेष नव्हतं. गावात शाळा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती नाही म्हणून अनेकांच्या ते नशीबी आलं. मानेसरांनीही मैलोनमैल पैदल करीत, खडतर परिस्थितीतून स्वतःला सर्वोत्तम बनवलं. आपल्या पदरात पडलेल्या हजारो कोऱ्या पाट्यांवर शंभर टक्के तेच शिस्तबद्ध संस्कार करण्याचं कसब, स्वतःच्या अध्यापन विषयावरील त्यांची ‘कमांड’, जगण्यातलं सामाजिक भान, परिस्थिती कशीही असली तरी त्यातून शंभर नंबरी सोनं तावून सुलाखून बाहेर काढण्याची क्षमता, त्यासाठी अखंड मेहनतीची तयारी हे सारं शालेय वयात सरांनी बिंबवलंय, त्याला आजही धक्का लागलेला नाही.

आगवेकर सरांच्या सान्निध्यातल्या वातावरणाचं शतप्रतिशत सोनं केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे मानेसर ! याच क्षमतेची अजून दोन व्यक्तिमत्त्व मला आठवतात ती म्हणजे श्री. खोतसर आणि कै. जाधव सर ! यातल्या खोतसरांचा विद्यार्थ्यांशी असलेला थेट संबंध सातवीच्या स्कॉलरशिपनंतर काहीसा कमी व्हायचा. जाधवसरांच्या बाबतीत कदाचित त्यांचा ‘भूगोल’ विषय विद्यार्थ्यांवर कमी प्रभाव टाकणारा ! परंतु कोणाच्याही अध्यापन पद्धतीला तोड नव्हती. स्कॉलरशिपच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना तासनतास बसविण्याची खोत सरांची क्षमता किंवा खडू हातात धरून, फळ्याला चिकटून उभं राहून आपला हात सहजतेने फिरवून पृथ्वीचा गोल काढणारे जाधव सर आठवले की काय विलक्षण क्षमतेची माणसं ‘शिक्षक’ म्हणून लाभली आम्हांला, असं वाटतं ! आगवेकर सरांची सगळी टीम याच पठडीतली, प्रत्येकाच्या शैलीवर एक स्वतंत्र लेख व्हावा अशी ! मानेसरांचं म्हणाल तर त्यांचा विषय इंग्रजी ! त्यात त्यांची अध्यापन पद्धत !

‘मानेसरांच्या तासाला तेव्हा, इंग्लडला गेल्यासारखे व्हायचे !

एवढं कुणीचं फ्लुएन्ट नव्हते, आम्हाला प्राऊड फील व्हायचे !!’

सरांची विद्यार्थींनी निशा खरातच्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत, आमच्यासारख्या बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी सर्वात अवघड असलेल्या इंग्रजीच्या तासाला, ३५ वर्षांपूर्वी एकही शब्द मराठीत न बोलणारे माने सर म्हणूनच वेगळे ठरले. आपल्याला जे सहज जमत नसतं ना ? त्याचं समूहाला आकर्षण अधिक असतं. माने सरांचं ‘विषयज्ञान’ आकर्षणाचा विषय ठरलं. ते वर्गात आल्यावर जो ‘पिनड्रॉप सायलेन्स’ व्हायचा त्याला आजही तोड नाही.

दिनांक १० मे १९६२ चा सरांचा जन्म ! सरांचं मूळगाव अक्कोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातले. गावात घरची ज्वारी आणि तंबाखूची शेती. संपूर्ण कुटुंबावर कडक शिस्तीच्या आजोबांचे संस्कार अधिक ! त्यांना ३ भाऊ आणि १ बहीण आहे. दोन भाऊ आजही गावातील शेती सांभाळतात. सरांना शेतीची सर्व कामे उत्तम अवगत आहेत. अक्कोळमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. घरची गरीबी असल्याने, इयत्ता आठवीपासूनचे शिक्षण त्यांनी निपाणीच्या वसतिगृहात राहून विद्यामंदिर शाळेत घेतलं. त्यांना निपाणी ते अक्कोळ पैदल करावी लागायची. सर बारावीला असतानाची घटना. परीक्षा जवळ आली होती. दुर्दैवाने, अजूनही पुस्तकांचा अभाव होता. अनेक समकालीन मित्रांची मदत आणि कॉलेजमधील लेक्चर्सच्या बळावर परीक्षेला बसले. परीक्षेच्या कालावधीत अभ्यासाचं गणित जुळविताना खूप त्रास झाला. खरंतर तेव्हाच सरांनी मनाशी खूणगाठ बांधली की काही करायचं पण आपण इंग्रजी विषयात पदवीधर व्हायचं. पुढे सरांनी बी.ए.साठी स्पेशल इंग्रजी विषय निवडला. तोवर शिक्षक वगैरे होण्याबाबत अजिबात न ठरलेले. बी.ए. इंग्रजी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी निपाणीच्याच देवचंद कॉलेजात एम.ए.साठी प्रवेश घेतला. पहिलं वर्षही पूर्ण झालं. तेव्हा आजोबांनी विशेष आग्रह करून बी.एड.चा फॉर्म भरायला लावला. शिक्षक व्हायचं पहिल्यांदा तेव्हा ठरलं. सन १९८५ ला शासकीय अध्यापक विद्यालय बेळगाव येथून सर शिक्षणशास्त्र विषयात बी.एड. झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेवर सरांचं प्रभुत्त्व ! त्यांनी एन.सी.सी.चे ‘सी’ प्रमाणपत्रही मिळविले ! त्याचा उपयोग अलोरेत झाला. सन १९९७-९८ दरम्यान शाळेत एम.सी.सी. सुरु झालं. यासाठी दोन शिक्षकांची निवड झाली. श्री. खोतसर आणि मानेसर ! दोघांच्या मार्गदर्शनखाली कवायत म्हणजे साक्षात लष्करी प्रशिक्षणाचा अनुभव ! सन २००८ साली सरांनी, मुंबई विद्यापीठाचा ‘डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ (डी.एस.एम.) हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सरांच्या जीवनातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे, त्यांच्या पत्नी सौ. कविता (एम.ए.बी.एड.-इंग्रजी) यांचे दिनांक १ जून २०११ साली दु:खद निधन झाले. त्या शिक्षिका म्हणून अलोरे जवळच्या मंदार एज्युकेशन सोसायटीत, चिपळूणच्या बांदल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि शेवटी डेरवणच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात आपल्या दोनही जुळ्या मुलाचं संपूर्ण पालन, पोषण आणि संगोपन सरांनी केलं. एकाचवेळी आई आणि वडिलांची भूमिका बजावली. अशा दु:खद प्रसंगी अलोरकरांनी धीर दिला. वेळोवेळी प्रसंगाला धावून आले. आपल्या साऱ्या समस्या, विवंचना बाजूला ठेवून सरांचा विद्यार्थ्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न राहिला. सध्या सरांची मुलगी कुमारी अक्षता ही बी.एल.डी.ए. ए.व्ही.एस. आयुर्वेद महाविद्यालय बिजापूर येथे तर मुलगा कुमार अक्षय हा श्रीनिवास विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अॅन् टेक्नॉलॉजी, मेंगलोर येथे शिक्षण घेत आहे.

अलोरेत, स्वतंत्र खोली मिळाल्यावर ७/८ मुलं तिथं अभ्यासाला, मुक्कामाला असायची. सरांनी अनेक वर्ष इंग्रजीचा क्लास घेतला. बॅचनं मुलं यायची. त्यांचा इंग्रजी शिकवण्यांचा ज्ञानयज्ञ सकाळी पावणेसहा वाजता सुरु व्हायचा. नाममात्र शुल्कात तो चालायचा. एकदा शिकवणं स्वीकारलं की मग त्याच्या बदल्यात मला काय मिळतंय याचा विचार न करता बेभान होऊन शिकवणं विद्यार्थ्यांनी अनुभवलंय ! अनेकांच्या मेंदूत ते कायमचं कोरलं गेलं आहे ! जाता जात नाही आहे ते ! कालांतराने शाळेने दहावीच्या सर्व विषयांच्या विशेष तयारीसाठी प्रश्नपत्रिका काढायला घेतल्या. संपूर्ण जिल्हाभर त्या वितरीत व्हायच्या. त्याचंही काम कै. देशमाने सरांच्या नेतृत्वाखाली सरांनी पाहिलं.

अलोरे शाळेला आगवेकर सरांचे नाव दिले जावे यासाठी मानेसरांनी केलेली धडपड हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. नामकरण सोहोळ्याच्या स्मरणिकेचेही सरांनी संपादन केले. सरांसह, पर्यवेक्षक मा. विभावर वाचासिद्ध आणि शशिकांत वहाळकर सर या तिघांनी केलेली धावपळही कृतज्ञतापूर्ण उल्लेख करण्यासारखी आहे ! या सोहोळ्याच्या अनेक आठवणी आमच्याजवळ आहेत, परंतु प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सरांना प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नावं पाठ आहेत, माजी विद्यार्थ्यांची आहेतच आहेत ! मागच्या फेब्रुवारी अखेरीस मानेसर नेपाळला जाऊन आले. आपला प्रवासातला आनंद फेसबुकवरून आपल्या विद्यार्थ्यांशी शेअर करत राहिले. सरांनी अलोरे जवळच्या खडपोलीत छानसं घरकुल उभारलंय ! अर्थात निवृत्तीनंतरही ते इथंच असणार हे नक्की आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर आगवेकर सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोरे शाळेतून सेवानिवृत्त होताना स्वतः आगवेकर सरांनी, आपल्या पश्चात शाळेच्या मुख्याध्यापक पदाकरिता खात्रीपूर्वक विश्वास दाखवलेले, ज्ञानमंदिर पावित्र्यासाठी, केवढा जीवाचा आटापिटा ! ही काव्यभावना जगणारे मानेसर हे आगवेकर सरांनंतरचे शाळा आणि सरया सूत्रात सामावणारे, दीर्घकालीन कारकीर्द लाभलेले अफलातून व्यक्तिमत्त्व ! शालेय जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. आमच्यासारख्या अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी मुलांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशीरपणा, वेळापत्रकानुसार वर्तणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणारे माने सर अनेकांच्या पक्के स्मरणात आहेत. शाळा भरतानाचा पहिला तास चुकविणाऱ्यांच्या, उशीरा येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मानेसर गेटवर हातात शिमटी (बारीक काठी) घेऊन उभे असायचे. मजबूत झाडाच्या फांद्या कायम नम्र असतात. निसर्गाच्या या नियमाचे सदैव भान असलेल्या सरांचा शिक्षित विद्यार्थी देश घडवू शकतोया तत्त्वावर गाढा विश्वास राहिला.

शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तीला शालेय जीवनात स्व-नियमन सवयीची आणि त्याकरिता शिस्तीची गरज असते. सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामचं असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते. आश्वासक जीवनासाठीचा ती महत्त्वाचा पाया असते. तशी शिस्त आपल्या विद्यार्थ्यांच्यात पेरण्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून माने सर यशस्वी झाले आहेत. स्वत: मानेसर हे स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत. ‘आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत’, ही जीवनातील केवढी तरी मोठ्ठी आनंदाची बाब आहे. सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापूर्वी, काळगतीचे अचूक भान असलेल्या विभावर वाचासिद्ध सरांचे अलोरे शाळेत येणं, शाळेचा मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूलनामकरण सोहोळा, मानेसरांचं मुख्याध्यापक होणं आणि पुढच्या काळात त्यांचं शाळेच्या सोबत असणं या साऱ्या सकारात्मक घटनांकरीता शाळेचे संस्थाचालक आदरणीय डॉ. विनय नातू साहेब आणि सर्व संचालक मंडळाप्रतिही कृतज्ञता व्यक्त करायला हवी !

निवृत्ती ! सेवेत कार्यरत असलेल्या मनुष्य जीवनात एक सर्वोत्तम संधी घेऊन येणारी घटना ! काही वेळेला सेवेत उद्देशपूर्ण कार्य न घडल्यामुळे निवृत्त व्यक्‍तीच्या मनात उदासी पसरलेली असते. तर काही माणसं निवृत्तीकडे जीवनातील नवीन टप्पा, कार्य साधण्याजोगे द्वार म्हणून पाहतात. स्वतःला व्यस्त ठेवत समाजासाठी अधिकाधिक फलदायी बनण्याचा मार्ग अनुसरतात. ‘शेवटी आपल्या हृदयात काय आहे ?’ हे फार महत्त्वाचं असतं. हृदय जर काठोकाठ भरून वाहात असेलं तर या जीवनात आपण सर्वकाही मिळवलेलं आहे. ह्या अनुभूतीसह जगणं सरांच्या उत्तर आयुष्यातील सुंगंधी ठेवा ठरावा. भूतकाळाशी न भांडता, त्याचं केवळ तटस्थ निरीक्षण करत शक्य तेवढं स्वच्छ आणि मोकळेपणाने जगण्याचं महत्तम कसब मानेसरांनी फारपूर्वी आत्मसात केलंय ! हे कसब त्यांची जगण्यातली श्रीमंती आणि सौंदर्य अधिकाधिक वाढवत जाणार आहे. आगवेकरसरांच्या कारकिर्दीच्या अखेरीस ऑक्टोबर १९९८ ते २००३ पर्यंत मानेसर उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. आपली शिक्षणव्यवस्था, त्यातले कायदे, ‘सेवाज्येष्ठता’ नावाचे उद्योग गुणवत्तेच्या आडवे आले. दोष तरी कोणाला द्यावा ?

सन २०११-१२ मध्ये ते संस्थेच्या खडपोली शाळेत, सन २०१७-१८ मध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्याध्यापक पदावर रुजू होऊन २०१९ च्या वर्षारंभी मानेसर पुन्हा आपल्या कर्मभूमीत अलोरेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. ‘सगळंच काही वाईट नसतं’ हे प्रतिपादन करणारा हा दीडवर्षांचा कालावधी लाभला ! रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या सन २००० च्या बॅचने वर्तमानपत्रात सरांवर ‘जाहिरात पुरस्कृत पुरवणी’ प्रकाशित केली. पुरवणीतील जाहिराती त्या बॅचच्या अख्ख्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने जमा केलेल्या ! जणू वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात असलेला सरांचा राज्याभिषेकच त्या दिवशी घडला ! इतका भावनाप्रधान की ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीत बसताना सरांना आनंदाश्रू अनावर झाले. सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अलोरे शाळेच्या ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीला, मोरेश्वर आत्माराम आगवेकर सरांनी आपल्या विलक्षण कर्तृत्वाने, नेतृत्वाने समाजात वेगळा मानदंड प्रस्थापित करून दिला. ‘मुख्याध्यापक हा कर्तव्यनिष्ठ, वेळेचे भान असणारा, त्यानुसार नियोजन करणारा, कर्तव्यकठोर तितकाच वेळप्रसंगी मेणाहून मऊही असावा. आपल्या विषयात पारंगत, अभ्यासू, व्यासंगी, पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यात दुवा म्हणून काम करणारा मुख्याध्यापक असावा.’ असं आगवेकर सर कायम म्हणत. स्वतः तेही कायम असेच वागले. संधी मिळालेल्या प्रत्येक काळात त्यांच्या तत्वानुसार मानेसरांनी प्रभावी काम करण्याचा प्रयत्न केला. आगवेकर सरांनी प्रस्थापित केलेला ‘तो’ मानदंड तितक्याच समर्थपणे सांभाळणारे ‘केवळ’ मानेसर म्हणून या अभिषेकाला, सन्मानाला पात्र ठरले !

कधीकधी आपण ज्या समाजात वावरतो तो समाज आपल्याला अधिक ओळखत असतो. ‘आपलं म्हणालं तर काम बोललं पाहिजे, तोंड नव्हे !’ प्रत्येकाच्या स्वतः विषयीच्या कल्पना आणि समाजभावना यातलं वाढतं अंतर ‘कीर्तनाचा वर्तनाशी नसलेल्या संबंधासारखं ठरावं !’ मानेसरांना सामान्य मानवी जीवनातील ह्या असामान्यत्वाच्या कसोट्या साधता आल्या ! म्हणून मानेसरांचं संघर्षाला पुरून उरत जगणं आम्हाला भाग्याचं’ वाटलं. आज काळ बदललाय ! आव्हानं बदललीत. शिक्षण पद्धती बदलल्येय ! तरीही शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं कायम आहे. कायम राहणार आहे. त्या नात्यातला उमाळा साधत शाळेच्या ‘मुख्याध्यापक’पदाच्या खूर्चीचा सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी तिच्यात स्थानापन्न होणाऱ्या पुढच्या प्रत्येकावर असणार आहे. तो सन्मान ‘कालातीत’ राखला जावा, खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकाने खूर्चीचा हा इतिहास जाणून ‘बेभान होऊन कार्यरत व्हावं !’ या देशाचं भवितव्य असलेली सुजाण निखळ पिढी घडवावी, यासाठीचं हे प्रामाणिक निवेदन !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com

(माजी विद्यार्थी, इयत्ता दहावी बॅच १९९५)


एका कार्यक्रमात देवी सरस्वतीच्या प्रतिमेस
          पुष्पहार अर्पण करताना, संस्थाचालक डॉ. विनय नातू
           आणि मुख्याध्यापक अरुण केशव मानेसर !

सन २०१९ ला शाळेच्या विद्यार्थ्यानींनी जवानांना
             पाठविण्यासाठी बनविलेल्या राख्या स्वीकारताना मानेसर !

विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करताना मानेसर !


शाळेच्या एका कार्यक्रमात बोलताना मानेसर !


दैनिक सागर ३१ मे २०२० 

दैनिक सकाळ ३० मे २०२० 

दैनिक पवना समाचार पुणे १ जून २०२० 

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...