सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

‘वंदनीय’ अटलजी...!

दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने वंदनीय अटलजींचं निधन झाल्याची बातमी आली आणि देशातल्या आमच्यासारख्या असंख्य संवेदनशील नागरिकांना जणू आपल्याच घरातलं वडीलधारं गेल्यासारखं वाटलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संपूर्ण भारतीय जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडलेली दिसते त्यात अफाट विद्वत्तादेवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व लाभलेले पूर्व पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान फार वरचे आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी राहिलेले अटलजी हे पत्रकारकवीलेखकविचारवंतराजकीय नेते तर होतेच परंतु त्यांची खरी ओळख सह्रदयीदिलदारनिखळ मनाचा माणूस म्हणून अधिक होती. भारतीय राजकारणाचे स्वातंत्र्यानंतरचे एक युग गाजवलेल्याआपल्या पक्षाच्या विचारसरणीसह मर्यादेचे सजग समाजभान असणाऱ्याआपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचे मानवी मूल्य कालौघात समाजाच्या अधिक प्रखरतेने लक्षात येत राहील.


      सन १९२४ च्या डिसेंबर महिन्यातल्या २५ तारखेला, मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षक कृष्णबिहारी आणि कृष्णादेवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शब्दांचं सामर्थ्य अटलजींकडे त्यांच्या वडिलांकडूनच आलं होतं. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी अशी इच्छा असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला स्वप्नातही वाटलं नसेल की ग्वाल्हेरच्या मातीत खेळणारा हा मुलगा एक दिवस आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर देशातील कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल ! खरंतर कॉलेजच्या दिवसापासूनच अटलजींच्या शब्दांनी लोकांना वेड लावलं. त्यांच्या जीभेवरच्या सरस्वतीने अनेकांना मोहित केलं. एका छोट्या शहरातला हा मुलगा, विद्यार्थी नेता म्हणून नावारुपाला येत असतानाच कर्तृत्व गाजवत होता. त्यांचा संघाशी सर्वप्रथम संपर्क आला त्यावेळी ते आर्य समाजांतर्गत बालसंघटन आर्यकुमार सभा ग्वाल्हेर या संस्थांशी संबंधित होते. ग्वाल्हेरच्या आर्यकुमार सभेचे प्रमुख कार्यकर्ते भूदेव शास्त्री यांनी एक दिवस आर्य समाजाच्या साप्ताहिक सत्संगाशिवाय संध्याकाळी रोजच्या शाखेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यातून अटलजी लहान असताना संघ शाखेत दाखल झाले. अटलजी ग्वाल्हेरला ज्या शाखेत जात असत, त्या शाखेतील बहुतांश बाल स्वयंसेवक मराठीत बोलत असत. अटलजींना शाखेतील रोजचे खेळ, साप्ताहिक बौद्धिकवर्ग विशेष आवडत. येथे संघदृष्ट्या बाल अटलजींवर प्रभाव पडला, तो संघ प्रचारक नारायणराव तरटे यांचा. आज मी जो काही आहे तो स्व. नारायणरावजींमुळेच’, असे अटलजी मोठ्या आदराने व विनम्रपणे नमूद करीत असतं. संघदृष्ट्या अटलजींवर ज्या अन्य दोन महनीय व्यक्तींचा प्रभाव पडला त्या म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. भाऊरावजी देवरस. शाळेत दहावीत असताना हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचयही चिरस्मरणीय रचना लिहिणाऱ्या अटलजींनी संघदृष्ट्या १९४१ मध्ये संघ शिक्षा वर्गाचे (अधिकारी शिक्षण वर्ग) प्रथम वर्ष, १९४२ मध्ये द्वितीय वर्ष व १९४४ मध्ये बी.एच्या अंतिम वर्षाला असतानाच तृतीय वर्ष पूर्ण केले. महाविद्यायलीन जीवनात संघशाखा स्तरावर काम करणाऱ्या अटलजी हे महात्मा गांधी यांच्या ब्रिटीशांविरोधातील चले जाव, भारत छोडोया आंदोलनात सक्रीय होते. १९४२ मध्ये त्यांना या आंदोलनाच्या काळात कारावासाची शिक्षा झाली होती. पुढे कानपूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये राज्यशास्त्रात एम. ए. केल्यानंतर सन १९४६ दरम्यान अटलजींनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलेलं असताना ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता (प्रचारक) बनले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याच विचारधारेशी अटलराहिले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रधर्म, वीर-अर्जुन, पांचजन्य या सारख्या नियतकालिकांमधून पत्रकारिता केली.

      सन १९५१ साली तरुण अटलजींमधली गुणवत्ता पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी हेरली. त्यांनी अटलजींना कानपूरहून लखनऊमध्ये बोलावून त्यांच्यावर 'राष्ट्रधर्म' या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवली. याच दरम्यान डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. अटलजींच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा इथेच झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्यावरच्या बाकावर झोपून ते बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीत अपनी अपनी बातमध्ये या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. बलरामपूरच्या लोकांनी पहिल्यांदा विश्वास दाखवला आणि ते देशाच्या संसदेत पोहोचले. त्याकाळी जनसंघाचे केवळ ४ खासदार होते. शब्दांचा हा अटलधनी राजकीय पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहात होता. १९५० - ६० च्या दशकात अटलजी नेहरूंच्या पक्षात नसले तरीही त्यांना भारताचा दुसरा नेहरू असे म्हटले जात होते. पंडित नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावित असत. वयाची तिशीही न गाठलेले अटलजी संसदेत परराष्ट्र खात्याच्या मागण्यांवर भाषण करायला उभे राहात तेव्हा नेहरू सभागृहात नसले तरी पळत पळत लगबगीने सदनात येत असत आणि या तरुण नेत्याचे भाषण केवळ लक्ष देऊन ऐकत, हातात वही घेऊन त्या भाषणातले मुद्देही टिपून घेत असत. इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते ?’ याचं उत्तर देताना एके ठिकाणी अटलजी म्हणाले होते, ‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही !तरुणपणातल्या अटलजींनी अमोघ वाणीने संसदेत विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात ? याचे उदाहरण अटलजीच आहेत. सन १९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. नेहरू यांनी प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..असे भाकीत केले होते. अटलजींनी नेहरूंचा तो शब्द आपल्या कर्तृत्वाने पुढल्या चार दशकांत खरा करून दाखविला.

      आपल्या राजकीय जीवनात कविमनाच्या अटलजींनी स्वतःतली संवेदना कधी हरवू दिली नाही. कवितेनंच त्याचं राजकारण समृद्ध बनवलं. आयुष्याचं रोज नवं गाणं लिहिणाऱ्या या कवीला अनेक अग्नीपरीक्षांना सामोरं जावं लागलं. दिनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर अटलजींच्या खांद्यावर जनसंघाची जबाबदारी आली. ही जबाबदारी लिलया पेलत त्यांनी जनसंघ तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या इंदिरा गांधींनी १९७५ साली देशावर आणीबाणी लादली. त्यात सरकारनं अटलजींना जेरबंद केलं. सन १९७७ साली झालेल्या निवडणुकीत देशातल्या जनतेनं आणीबाणीविरोधात कौल दिला. अटलजींनी आपल्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केले. मोराजजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री बनले. आपल्या मंत्रीपदाच्या काळात अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठारून हिंदीतून भाषण करत भारताचा गौरव वाढवला. दुर्दैवाने अंतर्गत गटबाजीनं मोरारजींचं सरकार कोसळलं नि इंदिरा गांधींना पर्याय देण्याचं स्वप्न भंगलं. अटलजी अस्वस्थ झाले. १९८० साली अटलजींनी त्यांच्या सहकाऱयांसोबत 'भारतीय जनता पक्ष' या नावाने नव्या सुरुवातीचा शंखनाद केला. सन १९८० च्या दशकात जनता पक्षाचे नेते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेताना, राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या अटलजींनी भविष्यवाणी केली, ‘सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा !पुढे सन १९९६ साली हे भविष्य खरं ठरलं. १९८४ च्या निवडणुकीत मोठय़ा पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. एकेकाळी ३० पेक्षा अधिक जागांवर आपले अधिराज्य गाजवणाऱ्या पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेले असतानाही त्यांनी धीर न सोडता आपल्या पक्षाचा चेहरा अधिक तेजोमय करण्याचा अखंड यशस्वी प्रयत्न केला. सन १९८९ नंतर कोणत्याच पक्षाला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नव्हते. आघाडीच्या राजकारणाची चर्चा होत असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे चालविलेल्या आघाडी सरकारचे आजही अनेकांना स्मरण होते. या काळात त्यांनी आघाडी सरकार चालविण्याचा आदर्श निर्माण केला. यात देशभरातील जवळपास ३० छोटे-मोठे पक्ष सहभागी झाले होते. सध्या यातील अनेक पक्ष भारतीय जनता पक्षाचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. अटलजींनी या पक्षांना बरोबर घेत सरकार कसे चालविले असेल ? याची कल्पना यावी.

      सन १९९६ साली केंद्रात भाजपचं सरकार आलं. अटलजी पंतप्रधान बनले. परंतु संख्याबळाच्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. त्या दिवशीचं संसदेतलं त्यांचं भाषण संसदीय इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. त्यांना संख्याबळ जमवता आलं नाही. त्यामुळे १३ दिवसात सरकार कोसळलं. पण अटलजींनी देशातील जनतेची मनं जिंकली. पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशाच्या चार दिशा जोडणाऱ्या स्वर्णिम चतुर्भूज योजनेतून अटलजींचा द्रष्टेपणा, शत्रूराष्ट्र पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करत दिल्ली-लाहोर बससेवा सरु करणाऱ्या अटलजींचा शांततेवर चा अटल विश्वास, जगाच्या दबावाला झुगारत पोखरणमध्ये अणूचाचणी करत दाखवलेला कणखरपणा, देशातलं पहिलं टिकलेलं गैरकाँग्रेसी सरकारं देणारं नेतृत्व, मूल्यांसाठी सत्तेला लाथ मारण्याची धमक दाखवणारी तत्वनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा देशानं पाहिली. अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरक, आश्वासक आणि मार्गदर्शक ठरून ते जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलिकडचे आदर्श लोकनेता बनले. अटलजींच्या जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्षात गेला. राजकारणातही ते व्यासंगी, सृजन, लढवय्ये, तत्वचिंतक नि बहुआयामी राहिले. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या. ममता बॅनर्जी अटलजींना पितृस्थानी मानत. बिजू जनता दलाचे नविन पटनाईक हेही वाजपेयींना वडिलांप्रमाणे मानत. पश्चिम बंगालचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांनीही अटलजींसोबत राजकारणापलीकडची आपली मैत्री जपली. कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग हे त्यांना गुरूजीम्हणून हाक मारत. अटलजी संघ परिवारापेक्षा अधिक देशात लोकप्रिय होते. अटलजी संघाचे होते आणि त्याचवेळी साऱ्यांनाही ते आपले वाटत होते ही गोष्ट पाहिली की त्यांच्या असामान्यत्त्वाची जाणीव होते. 

      रामभाऊ म्हाळगी आणि अटलजी यांचं नातं कायम अतूट होतं. सन २००३ मध्ये अटलजी पंतप्रधान असताना भाईंदरमधील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर पंतप्रधान अटलजी आणि त्यांचे परममित्र उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीत मुक्काम केला. सामान्यत: पंतप्रधान आणि उपपंतप्रधान सुरक्षेच्या कारणासाठी एकत्र प्रवास करत नाहीत, एकत्र राहत नाहीत. तरीही हे दोघे म्हाळगी प्रबोधिनीत शेजारी शेजारी राहिले, हा एक दुर्मीळ योग होता. अटलजींसारख्या मोठय़ा माणसाची ही छोटीशी कृती त्यांचं मोठेपण अधोरेखित करणारी ठरली. लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय राजकारणातील भीष्म पितामहम्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एकदा राज्यसभेत काढले होते. वर्षानुवर्षे राजकारणाच्या खुर्चीला चिकटून बसण्याची परंपरा भारतात पक्की रुजलेली असताना अटलजींनी सन २००५ साली स्वतःहून राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. ४० पुस्तके प्रकाशित झालेल्या अटलजींचा मेरी एक्क्यावन्न कविताएँहा काव्यसंग्रह विशेष गाजला. गीतकार साहिर लुधियान्वी यांचे कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है या गाण्याची, पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची, पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची त्यांना विशेष आवड राहिली. अटलजी अशा काळात वाढले, जेव्हा राजकीय पक्षाचे नेते आणि सामान्यजन यांच्यात फार मोठी दरी नव्हती. साहजिकच अनेक गावातल्या अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांचा दौरा असला म्हणजे आपलेपणाने वाट पाहाणारी अनेक कुटुंबं गावागावात दिसत. जेवणात त्यांना विशेष आवडणारी पुरणपोळी हमखास असे.

      पक्षहिताहून देशहिताला आणि राजकारणाहून राष्ट्रकारणाला महत्त्व देणारी जी मोजकी माणसे देशाच्या नेतेपदावर आतापर्यंत आली त्यात अटलजी अग्रेसर होते. मनाचा उमदेपणा हे अटलजींचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. वक्तृत्व आणि विद्वत्ता, कवित्व आणि द्रष्टेपण व राजकारणपटुता आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व या साऱ्या गोष्टी एकाच नेत्यात अभावाने आढळतात. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात या गुणांचा मनोज्ञ संगम होता. विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना विरोधी नेता कसा असावा ? याचा आदर्श घालून देण्याबरोबरच देशाचा पंतप्रधान कसा असावा ? त्याचाही परिपाठ त्यांनी आपल्या कारकिर्दीत साऱ्यांसमोर ठेवला. आपल्या भाषणात शुरु से शुरुवात करू  या  अंत से  आरंभ करूअसा नादमधुर अनुप्रास साधणारे अटलजी काश्मीर समस्येबाबत बोलताना, ‘आँखो से रोशनी कैसी अलग हो सकती है ? होटों से मुस्कान कैसी अलग हो सकती है ?’ असं काव्यमय रूपक मांडायचे. अटलजींची संघाबद्दलची आत्मीयता जाणवणारे, निष्ठावंत स्वयंसेवकासारखे अनेक प्रसंग सांगितले जातात. मी संघाच्या संपर्कात आलो, दीर्घकाळ संघ संघटनेत राहिलो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला रा.स्व.संघ मनापासून भावला. मला संघ तत्त्वज्ञान तर आवडतेच ! पण त्याहून अधिक अशी मला आवडणारी बाब म्हणजे, संघाची परस्परांच्या संदर्भातील व एकमेकांबद्दल जोपासली जाणारी धारणा.  साप्ताहिक ऑर्गनायझरमध्ये प्रकाशित आरएसएस इज माय सोलया आपल्या लेखात खुद्द अटलजींनी संघाशी असणारे संबंध, संस्कार यावर विस्तृत व स्पष्ट विवेचन केले आहे.

      अटलजी सभेसाठी श्रोत्यांची उत्सुकता ताणणारा उशीर फारच क्वचित करत. गर्दीचा अंदाज घेऊन त्यांचं भाषण सुरु होत असे. शब्दांचा प्रपात, कधी तीव्र, कधी मध्यम, कधी वीज तळपावी तसा तर कधी ऋजुता आणि पारिजातकाचा दरवळ भासे. त्यांची भाषणातली तन्मय मुद्रा लोभस असायची. देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्षे अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने अटलजी वावरले. पंतप्रधान होण्यापूर्वी अटलजींची जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६), भारताचे पंतप्रधान,  (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. एकेकाळी प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी अटलबिहारीअशा अनेक वेळा घोषणा दिल्या जात होत्या. त्या घोषणा केवळ अटलजींच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटलजींना गुरूस्थानी मानायचे. ते वाजपयीच होते ज्यांनी माझ्या हाताला धरून मला अनेक राजकीय गोष्टी शिकवल्या’, असे उद्गार मोदी त्यांच्या कार्यक्रमात अनेकदा बोलून दाखवतात. अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या विशेष ब्लॉगमध्ये मोदी लिहितात, ‘अटलजी कधीही आडमार्गाने गेले नाहीत. त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात नवीन मार्ग बनवले आणि निश्चित केले. वादळातही दिवा पेटवण्याची क्षमतात्यांच्यात होती. ते जे काही बोलायचे ते थेट जनमानसाच्या हृदयाला भिडायचे. आयुष्य कसे जगायचे, राष्ट्राची सेवा कशी करायची हे त्यांनी आपल्या जगण्यातून इतरांना शिकवले.

      अटलजी म्हणायचे, ‘आपण केवळ आपल्यासाठी जगू नये, इतरांसाठीही जगावे ! आपण राष्ट्रासाठी जास्तीत जास्त त्याग करायला हवा. जर भारताची स्थिती दयनीय असेल तर जगात आपला गौरव होऊ शकणार नाही. परंतु जर आपण सर्व दृष्टीने सुसंपन्न असू तर जग आपला गौरव करेल’. देशप्रेम ही भावना अटलजींच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते म्हणतं असतं, ‘भारत ज़मीन का टुकङा नही है, जीता-जागता राष्ट्रपुरुष है । हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है । कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं । विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी है । पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं । कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण पखारता है । पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं । चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं । यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है । यह तर्पण की भूमि है । इसका कंकर-कंकर शंकर है,  इसका बिंदु-बिंदु गंगाजल है । हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये।राष्ट्राप्रति अटलजींच्या या जाज्ज्वल्य देशभक्तीने भारलेल्या भावना वर्तमानात आजच्या आम्हां पिढीने जगणं म्हणजे अटलजी आपल्याला सदैव वंदनीयअसल्याच्या म्हणण्याचे सार्थक होईल.  


धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...