मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

कोरोना प्रसाद !



दिनांक ७ एप्रिल २०२० ! वेळ सकाळी १० वाजून ५७ मिनिटे ! ठिकाण चिंचनाका, चिपळूण ! दिनांक १६ मार्चच्या सायंकाळनंतर आज पहिल्यांदा अगदी नाईलाजास्तव घराबाहेर पडलेलो. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ए.टी.एम. मधून पैसे काढणे अत्यावश्यक बनलेले. पत्नीला किराणा खरेदी करायची घाई झालेली. तिची घाई नाही म्हटलं तरी लेखनात व्यत्यय आणू लागलेली. मनात म्हटलं, या ग्राह्य कारणांचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार होईल का ? प्रश्न मनात ठेऊन घराबाहेर पडलेलो. कोरोना संचारबंदीत दुचाकी / चारचाकी वाहन चालविण्यास बंदी असताना ते चालविल्याबद्दल दोनशे रुपयांचा दंडरुपी ‘पोलिसी’ प्रसाद प्राप्त करूनच घरी परतलो.


घराजवळच्या किराणा दुकानात शुकशुकाट पसरलेला. दूरच्या दुकानात पत्नीला चालत पाठवावं तर किराणा आणायला रस्त्यांवर रिक्षांचा अभाव. इतक्या लांबून पिशव्या हातातून आणाव्यात तर तेही जीवावर आलेलं. बरं ! हे सगळं नंतर ! आधि पैसे असलेलं ए.टी.एम. मशीन शोधायची आवश्यकता...? आता करायचं काय ? सगळा विचार करून रामायण संपताच, नशीबावर हवाला ठेऊन घर सोडलेलं. वास्तव्याला असलेल्या खेंडीतून जाखमाता मंदिर, पिंपळपार गणेश मंदिर मार्गे नगर परिषदेच्या कार्यालयासमोरून पुढे जाताना चिंचनाक्यात पोलिसांना सापडलो. त्यांच्याकडून तत्परतेने ‘POLICE MANUAL SIGNAL VIOLATION’ असा शेरा असलेली २०० रुपये दंडाची पावती हातात ठेवली गेली. ‘पैसे ऑनलाईन भरा’ असंही सांगितलं गेलं. आता दंड भरायचाच आहे तर ज्या कामासाठी बाहेर पडलोय ते उरकून घेऊ म्हणून ए.टी.एम. मशीन शोधलं. पैसे काढले. एका सुपर मार्केटच्या मागच्या दारामधून आत जाऊन तिथे सध्या शिल्लक असलेल्या किराणा मालातून आवश्यक खरेदी केली. जे मिळालं ते घेतलं. एवढ्या काळात, ‘जास्त वेळ घालवू नकोस’ म्हणून पत्नीवर २/३ वेळा वैतागलोही. परत फिरलो तेव्हा आजुबाजूने प्रवास करणाऱ्यांचे चेहरे न्याहळू लागलो. त्यांच्यातल्या संवादाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं, पोलिसांसमोरही पर्याय नाही. कितीही नको म्हटलं तरी सहज फिरणाऱ्यांचं प्रमाण आजही रस्त्यांवर जाणवत होतचं. म्हणूनच कालपर्यंत (६ एप्रिल) रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजारांवर गाड्यांवर कारवाई करीत सुमारे २० लाखांवर दंड वसुली केली गेली. नाही म्हणायला मेडिकलच्या दुकानात शिस्तीत रांगा लागलेल्या दिसल्या. जीव वाचवायला धडपडणारे जीवावर उदार तरी कसे होतील म्हणा ? ए.टी.एम. मशीनची आवश्यकता सोडली तर मीही आजचा ‘प्रसाद दंड’ टाळू शकलो असतो. पण ते घडलं.

साधारणपणे १९९८ पासून, अर्थात सज्ञान झाल्यापासून मी दुचाकी आणि २०११ पासून चारचाकी चालवतोय. पोलिसी दंडाची पावती स्वतःच्या नावावर फाडून घेण्याची वेळ कधी आलेली नव्हती. नाही म्हणायला २०१०-११ साली सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने महिंद्रा मॅक्स जीपने प्रवास करताना रेल्वेफाटकानजीक गाडी अडवली जाऊन १०० रुपयांच्या दंडाची पावती माझ्या हातावर टेकवली गेली होती. मला तर तीही झेपलेली नव्हती. तेव्हा मी लोकसत्तेत वार्ताहर होतो. चेकपोस्टवर विनंती करून पाहिली. पण पावती फाटलेली होती. आता दंड भरावा लागेल, असं सांगितलं गेलेलं. नाखुशीने पैसे भरताना हातात टेकवलेली पावती निरखून पहिली. नवी दिल्लीतील कुठल्यातरी संस्थेच्या नावे तिथल्या एड्सग्रस्तांना मदतनिधीची ती पावती होती. मी क्षणभर चक्रावलो. मला काही कळेना. पावतीत किंचित अधिक डोकावल्यावर मला त्यात ‘बातमी’ दडलेली दिसली. मग काय ? वैभववाडीतील काम आटोपून पुन्हा तळेरेमार्गे कणकवलीहून कुडाळला आलो. लॉजवर फ्रेश झालो. बॅगेतून कागद, पेन, पॅड काढला नि लिहायला सुरुवात केली. ‘सिंधुदुर्ग पोलीस जमा करताहेत नवी दिल्लीतील एड्सग्रस्तांसाठी निधी ; कोकणातील रुग्ण वाऱ्यावर’ अश्या मथळ्याची लिहिलेली बातमी जवळून मुंबई ऑफिसला फॅक्स केली. लोकसत्ताने सुदैवाने दुसऱ्या दिवशी ती प्रसिद्ध केली. त्यावेळी मी ती बातमी जपूनही ठेवली होती. आता  ऑफिसमध्ये शोधावी लागेल. त्या घटनेनंतर आजपर्यंत त्या रस्त्याने मी अनेकदा प्रवास केला पण तिथे पोलिस कर्मचारी उभे असलेले मला तरी दिसलेले नाहीत.

असो ! पण आजचा विषय ‘कोरोना’चा होता. परवानगी नसताना आगाऊपणा करून आपण बाहेर पडलेलो असल्याचं माहिती होतं. त्यामुळे आजचा दिवस स्वतःच्या तोंडावर बांधलेला रुमाल काढून ओळख सांगण्याचा, आपली गरज समजावण्याचा, स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्यांशी अधिक बोलण्याचाही नव्हता. प्रवास पुरेशा खबरदारीने झालेला. पत्नी सोबत असल्याने किमान इथून पुढची माझी ‘संचारबंदी’ तरी घरात निवांत जाईल याची खात्री पटवून घेऊन तासाभरात मी घरी पोहोचलो.

धीरज वाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...