बुधवार, ३ एप्रिल, २०१९

आयुष्य जगणारा गुरुजी !

उद्याच्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, आज आमचे ज्येष्ठ मित्र, चिपळूण शहरानजीक असलेल्या उक्ताड जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास (भाई) महाडिक (गुरुजी) यांचे अभिष्टचिंतन आणि श्रीसत्यनारायण पूजा त्यांच्या पेढे परशुराम येथील श्री परशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रात, मित्रपरिवाराकडून होत आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले विलासराव हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत. दिनांक ५ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेले विलासराव आज वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधत, आपल्यातील उपजत कलागुणांना न्याय देत त्यांनी आपले जीवन जगण्याचा चालविलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. जवळच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात शिक्षण पूर्ण करून ही तीनही  भावंडे प्राथमिक शिक्षक झालीत. अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार देण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही या एकाच सक्षम गुणाच्या बळावर ते कार्यरत झाले. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत विलासरावांनी आपल्या शालेय स्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर असतात. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष देण्यास पुरेसं आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सन २००६/०७ साली सपत्निक ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या विलासरावांनी शिक्षणासोबतच आवडत्या पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ‘जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलं’ या न्यायाने, आमच्या सोबतच्या गेल्या १०/१२ वर्षांच्या कालखंडात, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे.    

      आपल्या कार्यसक्षम अर्धांगिनी, सौ नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी सन २००७ साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरु केले. या विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज, प्रसाद काणे, कैसर देसाई, मिलिंद कापडी अशा अनेकांचे सहकार्य त्यांना याकामी लाभले. नुसते पर्यटन केंद्र काढून भागणार नाही म्हणून त्यांनी सन २००८ साली, आमची ‘चिपळूण तालुका पर्यटन’ ही पुस्तकाची कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याला पहिली पुस्तक प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर, कोकणचे बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ग्रंथालय चळवळीतील अग्रणी आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर, इतिहास संशोधक श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत राहताना, शाळेशी होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या विलासरावांना एका पत्रव्यवहारातून ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे भेटले. त्यांच्यासोबत पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. हा प्रवास पुढे अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली अलिकडच्या भूतान पर्यावरण अभ्यास दौऱ्यापर्यंत येऊन पोहोचला. चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीत संपन्न झालेल्या तीन पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तिथे स्वतः येऊन अनुभवले आहे, त्याला दादही दिलेली आहे. सन २०१४ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील त्यांच्यातल्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या लेखन सहकार्याने ‘ठोसेघर पर्यटन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील गमती-जमती हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. विलासरावांमधला निखळपणे आयुष्य जगणारा अवलिया आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे पुरस्काराने गौरविण्यातही आले. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे ‘बिगरमोसमी जंगलपेर अभियान’ चिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ ‘वनश्री’ महेंद्र घागरे भेटले नि रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा म्हणून अभियान सुरु झाले, त्याला आता ५/६ वर्ष झालीत. विलासराव कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातूनही, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेय स्तरावर बीज पेरणी अभियान संपन्न झाले आहे. या संघटनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.

लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात, आमच्या साथीने अनेक विशेषांकांचे संपादन करण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. आपले ८५ वर्षे वयाचे गुरु ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ मो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी विलासरावांच्या ‘गुरुदक्षिणा’ या लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.’ अधिक काय लिहावे ? विलासरावांना आम्ही मन:पूर्वक अभीष्ट चिंतितो.  
   
धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 

शनिवार, २३ मार्च, २०१९

साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक !


अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती कायम आमच्या वैचारिक जडणघडणीचे कारण ठरलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रकाशकाका देशपांडे होत.

सन १९९२ साली, प्रकाश काकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा १२ वर्षांचे आम्ही अलोरेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होतो. सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अलोरेच्या वातावरणात काही साहित्यप्रेमी सृजनांच्या सहकार्याने, आमच्या वडिलांनी 'ओंजळ काव्य रसिक मंच' स्थापन केला. या मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रमुख वक्ते’ म्हणून  दिनांक ४ एप्रिल १९९२ रोजी गुढीपाडव्याला प्रकाशकाका अलोरेत आले असताना आम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिले, त्यांचे विचारही ऐकले. अर्थात तोपर्यंत आमचा आणि साहित्याचा फारसा संबंध नव्हता. निव्वळ आमच्या बाबांच्या आग्रहाखातर आम्ही कार्यक्रमात असायचो. वाचन ही जेमतेमच होतं. काकांनी आपल्या भाषणात वाचनाबाबत केलेलं मार्गदर्शन आजही आठवतंय. ‘अस्वस्थ आणि बेचैन साहित्यप्रेमींची चळवळ’ अशा शब्दात त्यांनी ‘ओंजळ’ला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी ‘कविता नव्या-जुन्यांची’ हा आमच्या वडिलांच्याच संकल्पनेतला कार्यक्रम सादर झाला होता, अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. बाबांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘प्रमुख वक्ते’ म्हणून प्रकाशकाकांची प्रतिमा आमच्या मनात तेव्हाच घट्ट बसली.

प्रकाशकाकांची दुसरी व्यवस्थित भेट आठवतेयं ती सन २००८ सालच्या मार्च महिन्यातली ! त्याच्या काही महिने अगोदरपासून आम्ही आमचे सहकारी समीर कोवळे आणि विलास महाडिक यांच्या सहकार्याने पूर्ण करीत आणलेला 'चिपळूण तालुका पर्यटन' हा पुस्तक निर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना 'एक्सर्ट ओपिनिअन' घेण्यासाठी आम्ही काकांना भेटलो होतो. काकांमधील 'साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक' व्यक्तिमत्वाची ओळख पहिल्यांदा आम्हाला तेव्हा झाली. आमच्या नियोजित पुस्तक प्रकल्पाचे मनापासून कौतुक करताना काकांनी आवर्जून त्यात काही मुद्द्यांची आपणहून भर घातली होती, यास्तव आम्हीही सर्वानुमते काकांचा फोटोसह गौरवपूर्ण उल्लेख त्या पुस्तकात केला होता. पुढे जाऊन त्याच बैठकीत काकांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या हॉलमध्ये घेण्याची सूचना केली होती. पुढे गुढीपाडव्याला तो कार्यक्रम लोटिस्माच्याच सभागृहात पार पडला. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हॉल भरून रसिकांची दुर्मीळ गर्दी तेव्हा चिपळूणात अनेकांनी अनुभवली होती. या सा-यात काकांचे मोलाचे सहकार्य राहिले हे नक्की ! 

या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीनंतर यावर्षीच्या सन २०१८ च्या गुढीपाडव्याला, पेढे गावातील श्रीपरशुराम निसर्ग सान्निध्य पर्यटन केंद्रात आम्ही त्याच चिपळूणच्या पुस्तकाची 'दशकपूर्ती' साजरी केली. काकांचे हमखासचे मार्गदर्शन तेव्हाही मिळाले. गेल्या दहा वर्षांत आमची आठ पुस्तके प्रकाशित झाली. प्रत्येक वेळी प्रकाशित पुस्तक चिपळूणच्या वाचनालयाकरिता काकांच्या हाती देतानाचा आमचा आनंद केवळ अवर्णनीयचं राहिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या कार्यबाहुल्यातून वेळ मिळेल तेवढे वाचनालयाशी जोडले गेलो ते काकांमुळेच ! वाचनालयाच्या उपक्रमात काहीवेळा व्यासपीठावर येऊ शकलो तेही काकांमुळेचं ! आमच्या आठव्या लिखित 'कृतार्थीनी' या सुप्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाच्या दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी मुरूड ता. दापोली येथील प्रकाशन सोहोळ्यास प्रत्यक्ष निमंत्रण नसतानाही काका आपले दोन सहकारी नामवंत कवी आणि लोटिस्माचे वर्तमान अध्यक्ष अरूण (दादा) इंगवले आणि साहित्यिक प्रा. संतोष गोणबरे (आमचा    कॉलेजयीन साहित्यिक मित्र) यांच्यासह उपस्थित राहिले, तो क्षण आमच्यासाठी सुखद तितकाच धक्कादायक होता. आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुरूडच्या कार्यक्रमाला चिपळूणातून कशाला कोण येईल ? हा आमचा विचार काकांनी खोटा ठरविला होता. 'मुद्दामहून तुला शुभेच्छा देण्यासाठीच आलोय' असेही ते यावेळी म्हणाले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'कदाचित' वाचनालयाच्या कक्षेत येऊ न शकणारे परंतु सर्जनशील समाजासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम काकांनी विचारपूर्वक सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाच्या पटलावर आणून यशस्वी केलेले आम्ही पाहिलेत. वाचनालयाचे 'कलादालन' हा अशातीलच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तो काकांच्या कल्पक नेतृत्वाखाली पूर्णत्वास जातो आहे. आगामी काळात त्याचा परिघ विस्तारेल असा विश्वास वाटतो. 

सतत कार्यरत राहू पाहणा-या वर्तमान तरूण पिढीच्या सोबत असलेले 'प्रकाशकाका' आम्ही पाहिलेत-अनुभवलेत. आज प्रकाशकाका देशपांडे यांच्या विविधांगी कतृत्वसंपन्न कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रति सदैव आदरभाव असलेल्या सर्वांकडून 'कृतज्ञता सोहोळा' संपन्न होतो आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सोहोळ्यासाठी आणि काकांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही भरभरून सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला सतत मिळत राहावा, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. 


धीरज वाटेकर  (८ ऑक्टोबर २०१८)



सोमवार, १८ मार्च, २०१९

पालावलेल्या जंगलातील दोन तास !

रात्री साडेनऊची वेळ ! ठिकाण चांदोली अभयारण्याचा बफर झोन ! रस्त्यावर न्यायला आलेल्या धनगराने घराचा दरवाजा उघडला. घरात पाऊल ठेवले तर दरवाजातच आडव्या मोकळ्या जागेत म्हैस, रेडकू, दोन बैल बांधलेले. अधिकची जनावरं शेजारच्या एका खोलीत ! जवळच्या खुराड्यातल्या काही कोंबड्या, नि घरातच इकडे तिकडे फिरणाऱ्या दोन कुत्र्यांनी आमचे स्वागत केले. घरच्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर घोंगडी अंथरलेली. हातपाय धुऊन तिथेच बसलो. मित्राने विचारले, ‘कसं वाटलं ?’ आमची प्रतिक्रिया ‘जबरदस्त !!!’

चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने गेल्या आठवड्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते. चिपळूणला परतताना रात्रीच्या जेवणाचा बेत निलेशने, आमच्या परतीच्या प्रवासाचा रस्ता थोडा वाकडा करून ढेबेवाडी नजीकच्या प्रसिद्ध वाल्मिकी पठाराजवळ असलेल्या पाणेरी गावात निश्चित केला होता. ज्यांच्या घरी गेलो त्या विठ्ठल येमकर यांच्या पत्नी माळकरी असल्याने माझ्या शाकाहारी जेवणाचा प्रश्न सुटला होता. आमच्या दोघा मित्रांना मसाल्याचे वाटण नसलेल्या इथल्या खास मांसाहारी जेवणाचा, रश्याच्या आनंद घ्यायचा होता. म्हणून आमचे इकडे येणे झाले. पण या रात्रीच्या दोन तासात आम्ही इथले जे जगणे अनुभवले ते सारेच विलक्षण होते.

ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत. शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ च्या रात्री आमची गाडी जेव्हा तिथे नावनोंदणी करायला थांबली तेव्हा अंगाला स्पर्शिलेला वारा, पवनचक्यांचा कानात गुंजलेला ‘उँ उँ उँ’ असा विशिष्ट आवाज मनात तिथेच थांबण्याची इच्छा निर्माण करून गेला. वनखात्याची चेकपोस्ट सोडल्यावर, गेली अनेक वर्षे ज्याच्या दर्शनासाठी आतूर होतो त्या जरबेल (रानटी उंदीर)ची वाटेत अनेकदा भेट झाली. खूप चपळ त्यात रात्र त्यामुळे फोटो घेता आला नाही. हा उंदीर हाती लागलेलं धान्याचं अख्खं गोडावून खाली करण्याची ताकद ठेवतो. अर्थात सारं धान्य तो हळूहळू बिळात नेतो. जंगलाचा इन्सायक्लोपिडिया असलेल्या निलेशने माहिती दिली. मध्येच आकाराने काहीसे मोठे, गवताळ भागात रात्रीचे अॅक्टीव असलेले रानटी ससे (हेअर) भेटले. या दोघांचं दर्शन जाता-येता झालं. काही वेळाने आम्ही येमकर यांच्या घरी पोहोचलो. अंधाराची तीव्रता एवढी जबरदस्त की घरात लाईट पोहोचलेला असतानाही बाहेरचा काळाकुट्ट अंधार शहरी मनात धडकी भरवायला पुरेसा असलेला. घराबाहेरच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून प्रत्यक्ष घरात प्रवेश करेतोपर्यंत नाकाला येणारा वास तीनदा बदलला जो नेहमीच्या शहरी परिचयातला नक्कीच नव्हता. दारातली जनावरं वाळकं गवतं, भाताचा पेंढा खात बसली होती. काही रवंथ करीत होती. आता हळूहळू यांना हिरवा झाडपाला कमी होत जाईल, आमची नजर हेरून येमकारांनी माहिती दिली. थोड्याश्या गप्पा झाल्या, वेळ कमी होता. पुन्हा चिपळूणला निघायचे होते. वाघाच्या उपस्थितीने दिव्याने दिवा लागावा तसं जंगल कसं पेटत जातं ? म्हणजे जागं होतं जातं, याची सुंदर माहिती त्यांनी दिली. घरात शेतात लागणारी हत्यारे, लाकडी नांगर, कुळव, सापत्या ठेवलेली दिसली. त्या पठारावर धनगरांची चार घरे नि तीनच माणसे होती.

काही दिवसांपूर्वीच इथे गव्याने एक बाई मारली. ती नेमकी यांच्या संबंधातली. दुपारी पाण्याला गेलेल्या त्या बाईची परतायची नि गव्याची एकाच वाटेत गाठ पडली. सध्याच्या पालावलेल्या जंगलात कुठल्याश्या झाळीत लपलेला तो गवा दुर्दैवाने तिला दिसला नाही. दोघे समोरासमोर येताच जे व्हायचं तेच झालं. जंगलातील झाडं जुनी पालवी पडून नवी पालवी अडवायला लागलीत. त्यालाच पालावलेल्या जंगलाचा काळ म्हणतात. घरी येऊन आम्ही जेवायला बसलो. निलेश आणि विश्वासराव मांसाहारावर ताव मारते झाले. तसं विशेष काही असणारही नव्हतं ! पण तरीही जे होतं आणि ज्या वातावरणात मिळालं होतं त्याला कशाचीच सर येणार नाही. दोघा मित्रांना येमकरांनी मटन वाढले. सोबतीला ते आणि त्यांचा मुलगाही बसला. आणखी एक मुलगा आणि सून माहेरी गेलेले. आम्ही आलोय म्हणून शेजारच्या घरातली बाईही इथेच आलेली. माझ्यासाठी एका बाजूला छानशी शाकाहारी पातळ भाजी बाईनी चुलीवरून आणून ठेवली. समोर एका ताटलीत तुकडे केलेल्या भाकऱ्यांचा ढीग ठेवला होता. मी आणि विश्वासरावांनी मनातून म्हटलं एवढं कधी नि कुणाला संपायचं ? पण त्या साऱ्या भाकऱ्या संपवून पुन्हा मागवाव्या लागल्या. त्या भाकऱ्या बऱ्यापैकी कडक होत्या. आपल्याकडच्या भाकऱ्या नरम होतात. म्हणून मी सहजंच विचारलं तेव्हा, ‘पीठ जरा जास्त वेळ मळलं की येते अशी भाकरी !’ अगदी सहजतेने त्या बाई बोलून गेल्या. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता ! मला त्यांचं वागणं मनाचा मोठेपणा सांगून गेलं. 

तिकडे मांसाहारावर ताव मारणे सुरु असताना मध्येच येमकर मला म्हणाले, ‘पाव्हणं खा दणकून....!’ त्यांचा हा आदेश चाळीशीच्या उंबरठ्यावर जगण्यापुरतं खाण्याचा विचार करणाऱ्या मला पुरता संकटात टाकून गेला. जेवणाचे काही घास पोटात ढकलतो तोच समोरचा बैल निवांत मुतला, शाकाहारी जेवणाऱ्या मला ते पटकन जाणवलं. तेवढ्यात दुसराही...! बाकी इथल्या लोकांसाठी त्यात काहीच नवीन नव्हतं. कोणाचं तिकडे लक्षही गेलं नाही. मी मात्र विचार करू लागलो. ग्रामीण भागातील संस्कृती नि त्यांच्याशी आमची असलेली एकरूपता म्हणजे काय ? ते लक्षात आलं. जंगलात फिरताना असे अनुभव अनेकदा येतात. मात्र घरातला हा माझा तरी पहिलाच अनुभव होता. निलेशच्या आग्रहाने इथला भातही आवडीने खाल्ला. जोडीला त्यानेच मागवून घेतलेलं, वेगळ्या चवीचं दही, लसणीची चटणी याने जेवणाची लज्जत अधिक वाढविली. जेवण आटपले. निलेशने मटणाची हाडं ताटाबाहेर ठेवलेली होती. विश्वासरावांची ताटात होती. घरच्यांनी ताटं उचलली. हाडं तिथंच ठेवली. मला काहीच कळेना ? मनात म्हटलं, ‘हा निलेश असा कसा ?’ तेवढ्यात तिथं दारातला कुत्रा आला नि ती हाडं खाऊन गेला, मी बघतच बसलो ! माहितीचा पुढचा अध्याय निलेशने सांगून संपवला. जेवल्यानंतर येमकर पुन्हा गप्पा मारू लागले. म्हणाले, ‘जंगलातल्या आमच्या पिढीचं निभावलं. पुढच्या पिढीचं अवघड आहे, शिक्षण गरजेचं आहे.’ त्यांचं बोलणं खरचं होतं. पण इथल्या मुलांना आम्ही जाणीवपूर्वक आत्ताचे जंगलं विषयक शिक्षण द्यायला हवे आहे, असं उगाचंच मनात वाटून गेलं.

चिपळूणजवळचं कोयनेचं वाहतं पाणी घाटावरती असतं तर इथले शेतकरी लखपती झाले असते. असं सांगताना मध्येच काही निलेश बोललाच तर येमकर त्याला, ‘हाँ...! बोल तू...!’ असा प्रतिसाद देत होते. त्यातून त्या दोघातले वर्षानुवर्षांचे संबंध सतत जाणवत होते. निघताना घरातल्या बाई म्हणाल्या, ‘या पुन्हा कुटुंबाला घेऊन !’ तर आमचा निलेश म्हणाला, ‘लॉज दाखवायला बामण आणलायं ! त्याला आवडलं तर आलोच आठवडाभर...!’ नेहमीच्या सवयीप्रमाणे निलेशने त्या जेवणाचे पैसे देऊ केले. परतीच्या प्रवासात या भागातल्या जुन्या आठवणी तो सांगत राहिला. आम्ही जमेल तेवढे प्रश्न विचारत राहिलो. रात्री अडीच वाजता चिपळूण आले. येमकरांसारख्या लोकांच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे घालविलेल्या निलेशचा मला मनापासून हेवा वाटला.  

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com, https://dheerajwatekar.blogspot.com


दैनिक तरुण भारत (रत्नागिरी) संवाद पुरवणी २३ मार्च २०१९
दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) २३ मार्च २०१९ 

मंगळवार, १२ मार्च, २०१९

आठवणीतले ‘भडकावू’ भाषण !


घडत्या-बिघडत्या, रत्नागिरीतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या कॉलेजयीन जीवनात आमच्या व्यक्तिमत्त्वावर, आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली आणि आदरणीय प्रा. एस. डी. आटे या दोन अधिव्याख्यात्यांचा जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे. गेल्या नुकताच आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. यावेळी आम्हाला सुदैवाने सोबतच्या सहकाऱ्यांसह आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली सरांना विजयनगर-सांगली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटता आले. भेटीदरम्यान आमच्या सहकाऱ्यांना काही जुन्या आठवणी सांगताना सर थेट, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. त्या भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

आदरणीय हंपाली सरांसोबतची प्रत्येक भेट ही बुद्धीवर्धकच असते. याची जाणीव त्यांना भेटणाऱ्या आणि ओळखणाऱ्या सर्वांनाच आहे. सर सध्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनात स्थापत्य / उपयोजित यंत्रशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात आम्ही चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते.

शनिवार दिनांक ८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी कोल्हापूर मधील भेटी आटपल्यावर दिवसभरातल्या कामाविषयी फेसबुक आणि वॉट्सअप सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. आमच्या पुढील नियोजनाविषयी काहीही माहिती नसताना सरांनी थेट, ‘सांगली अभियान कधी आहे मित्रा ?’ असा प्रश्न विचारला. इच्छा असूनही, निव्वळ व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण ठिकठिकाणच्या जवळच्यांना भेटू शकत नाही ही नेहमीची खंत याहीवेळी जाणवली. सरांकडून मात्र सांगलीतील जेवणाचे चांगले पर्याय, गणपती दर्शन आणि वेळ मिळाला तर घरी भेट अशा बाबी सांगितल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तर सरांनी फोन करून पत्रकार परिषद असलेल्या सांगलीतील हॉटेल नटराज येथे मी भेटायला येतो असे सांगून आमची अडचणही बहुदा ओळखली. या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्हांला अचानक सरांकडे जाण्यासाठी वेळ उपलब्ध असल्याचे लक्षात येणे, सुदैवाने आम्ही त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात असणे असे सारे काही जुळून आले. प्रत्यक्षात सरांना जाऊन भेटलो तेव्हा मनाला लाभलेले समाधान शब्दात सांगणे कठीण आहे. आम्ही येतोय म्हणताच मॅडमनी अगदी थोड्या वेळात केलेला उपमा-चहा गप्पांत गोडवा निर्माण करून गेला. देशाच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, माणसाच्या मानसिकता बदलाच्या आव्हानापर्यंत वेगवेगळ्या विषयावरील गप्पा सुरु असताना सर अचानक, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

रत्नागिरी युवा महोत्सवात
कॉलेजला मिळालेल्या चषकासह...!  
वयाच्या एकविसाव्या वर्षी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना सन २००१ साली रत्नागिरीत विविध कॉलेजचा स्पर्धात्मक सहभाग असलेला युवा महोत्सव सुरु होता. या महोत्सवाच्या वक्तृत्त्व स्पर्धांत, ‘युवकांच्या दृष्टीकोनातून देशासमोरील प्रश्न’ असा विषय देण्यात आला होता. आमच्या कॉलेजमधून यासाठी प्रतिनिधी म्हणून स्पर्धेतून आमची निवड झालेली. भाषणाची रिहसल सरांनी घेतली होती. स्पर्धांत आकाशवाणी केंद्राचा सहभाग होता. ही सारी निवडक अंतिम भाषणे केंद्रावरून प्रसारित होणार होती. आमच्या भाषणातील सारे मुद्धे निवडण्यात आम्हाला आमच्या वडिलांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे व्यावसायिक कार्यकर्ते नरेंद्र घाडीगावकर यांनी सहकार्य केले होते. हे मुद्दे सरांनाही ज्ञात होते. अनेक मुद्धे असेही होते जे इच्छा असूनही काही मर्यादांमुळे आम्ही वगळले होते. स्पर्धास्थळी प्रत्यक्षात मात्र आम्ही सळसळत्या रक्ताच्या भावनिक आवेशात स्टेजवर भाषणाला उभे राहिलो. सुरुवातीपासूनच अचानक शरीरात संचारलेल्या त्या उत्साहाच्या भरात आमच्या तोंडून ठरलेले मुद्धे अधिक आक्रमकतेने मांडले गेलेच पण रिहसलमध्ये नसलेला ए्नरॉन प्रकल्पाचा मुद्धाही अधिकच तीव्रतेने मांडला गेला. अखेर नको व्हायला तेच झाले ! आमच्या भाषणाला उपस्थितांच्या अधिक टाळ्या मिळूनही प्रत्यक्षात गुणांकनात मात्र कमतरता राहिली. कॉलेजचा एकत्रित युवा महोत्सव स्पर्धेतील पहिला क्रमांक हुकला. पुढच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ए्नरॉनचा मुद्धा भाषणात आला नसता तर कदाचित कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला असता. पण ते राहिले. मुख्य म्हणजे एवढे होऊनही आदरणीय हंपाली सर आणि आटे सर यांपैकी कोणीही आम्हांला फारसे बडबडले नाहीत. कदाचित त्यानांही ते मुद्धे पटले असावेत. आमचे व्यक्त होण्याचे व्यासपीठ आणि आवाजाची तीव्रता यात काहीतरी गडबड झाली असावी. स्पर्धेत व्यासपीठावर आमच्याकडून जे बोलले गेले ते सारे सहजतेने आलेले होते. त्याचा झालेला परिणाम मात्र आम्हांला खूप मानसिक वेदना देऊन गेला.     
   
परवाच्या भेटीत, १८ वर्षानंतर सरांनी पहिल्यांदा त्या भाषणाचा उल्लेख ‘भडकावू’ असा केला नि हे सारे आठवले. कदाचित त्यावेळच्या परीक्षकांनीही आमच्या भाषणाला असाच शेरा दिला असेल ! पण त्या भाषणाने सरांचे नि आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले ते कायमचेच ! तेव्हापासूनच्या आमच्या जीवनप्रवासात शरीराने दूर असले तरी मनाने सरांचे निश्चित लक्ष असते. जीवनाच्या विविध वळणावर वेळोवेळी भेटलेले, ज्यांच्यासमोर आम्ही कायम नतमस्तक होतो असे सरांसारखे मोजके मार्गदर्शक या ना त्या मार्गाने आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून लाभणाऱ्या या मार्गदर्शनरुपी श्रीमंतीने जबरदस्त सुखावलेले आम्ही आणखी एका नव्या उपद्यापासाठी सज्ज होत असतो.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
ईमेल : dheerajwatekar@gmail.com   

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

नवागतांना घडविणारा व्रतस्थ पत्रकार !

साधारणत एकवीस वर्षांपूर्वीची, सन १९९८ सालची लिहिलेलं छापून यायला सुरुवात होण्यापूर्वीची घटना. ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ अशा मथळ्याचा तीन फुलस्केप पानी लिहिलेला लेख घेऊन आम्ही दैनिक सागरच्या कार्यालयात पोहोचलो. सकाळची साधारण अकराची वेळ. कार्यालयातली लगभग नुकतीच सुरु झाली असावी. कोणाशीच ओळख, नीटशी माहिती नसलेल्या आम्ही तो लेख एका टेबलाजवळ वर्तमानपत्र वाचत उभ्या असलेल्या गृहस्थांच्या हातात नेऊन दिला. त्यांनी त्यावरून नजर फिरवली मात्र, पुढच्या काही क्षणात, काही कळायच्या आतच तो लेख आमच्या दिशेने भिरकावला गेला. आमच्यासारख्या नवागतांना घडवू पाहणाऱ्या व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांची आणि आमची ती पहिली भेट !
अखिल भारतातील तालुका (चिपळूण) स्तरावरून सर्वप्रथम प्रसिद्ध होण्याचा मान मिळविणाऱ्या दैनिक सागरचे कार्यकारी संपादक, ‘संदर्भकोष’ अशी ओळख असलेले भालचंद्र दिवाडकर साहेब गेले (१६ फेब्रुवारी) ! आणि गेली अनेक वर्षे मनात कुठलाश्या कोपऱ्यात घर करून बसलेला वरील प्रसंग अचानक आठवला. तो व्यक्त होण्यासाठी मनातल्या मनात झुंजू लागला. व्यक्त व्हावं की होऊ नये ? या विचारात आठवडा निघून गेला. गेली अनेक वर्षे निव्वळ नाना (दैनिक सागरचे संपादक, कोकणचे बुद्धिवैभव निशिकांत जोशी) आणि दिवाडकर साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी आम्ही अधाशासारखा सागर वाचत आलो आहोत. लेखन संस्कार गिरवण्यासाठी, कोकणच्या प्रश्नांची समूळ जाण होण्यासाठी ते आवश्यकच होते. आता या दोघांच्या लेखनापासून आमच्यासारखे अनेक लिहिते तरुण पोरके झाले आहेत. आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिनांक ७ सप्टेंबर १९९८ ला दैनिक सागरनेच दिली. सागरमध्ये लिहूनही प्रत्यक्ष पत्रकारिता करण्याचा योग काही आला नाही. लेखन संस्कारासाठी मात्र सागर कायम महत्त्वाचा राहिला. ज्यांना ‘सागर’ने शब्दशः घडविले अशा पत्रकारांच्या सान्निध्यात आमच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला आहे. गेल्या एकवीस वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नानांपाठोपाठ दिवाडकरांच्या लेखनातील अनेक मुद्दे संदर्भ म्हणून जसजसे स्वीकारत गेलो तसतशी दिवाडकर साहेबांविषयी एक निश्चित भूमिका आमच्या मनात तयार होत गेली. गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालखंडातील स्वर्गीय नानांसोबतच्या आमच्या गप्पांचं दिवाडकर साहेबांना विशेष कौतुक वाटत राहिलं आहे.
दिवाडकर साहेबांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेबाबत आम्हाला चिपळूण पर्यटन चळवळीतील आमचे ज्येष्ठ सहकारी संजीव अणेराव यांच्याकडून कळले होते. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेव्हा ‘ते बरे होत आहेत’ अशी माहिती होती, आणि नंतर अचानक ते गेल्याची बातमी आली. मनात कालवाकालव झाली. १७ फेब्रुवारीला सकाळी दैनिक सागरमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. भालचंद्र दिवाडकर गेली ४५ वर्षे एकाच दैनिकात कार्यरत राहिले. ही आजघडीला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांच्या आणि नानांच्या संबंधांची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. गुहागर तालुक्यातील पेवे या गावातून शिक्षणाच्या निमित्ताने ते चिपळूण शहरात आले. सन १९७४ साली नानांना भेटून, ‘मला लिहायची आवड आहे. मी सागरासाठी लिहू का ?’ असे विचारत पुढे ते सागरची ‘पडछाया’ बनले. पुरोगामी डाव्या विचारसरणीचा वारसा त्यांना त्यांचे मामा मधुकर शेट्ये यांच्याकडून मिळालेला होता. आपल्या लेखनात त्यांनी तो कसोशीने जपला. मराठीसह हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, वृत्तपत्रीय जगतातील बदलांना स्वीकारून, स्वतःचे लेखन स्वतः टाईप करून देण्यातला त्यांचा साठीतला उत्साह जबरदस्त होता. त्यांच्या फिलॉसॉफीकल लेखांनी, अग्रलेखांनी काळ गाजवला. अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘एनरॉनची अंधारयात्रा’ या एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणाऱ्या पुस्तकासह मुलांसाठीची वैज्ञानिक विषयावरची आणि इतर अशी त्यांची एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध झाली. तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिनिष्ठ प्रतिपादन करणारे दिवाडकर साहेब चौफेर वाचन, व्यासंगी वृत्ती, कोकणच्या मातीशी बांधिलकी सांगणाऱ्या शैलीदार लेखनासाठी प्रसिद्ध होते. पत्नी व मुलीच्या निधनाने वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा ते जिद्दीने उभे होते. ‘कोकण विकासाची दिशा’ हा विषय तर आम्ही त्यांच्या आणि नानांच्या लेखनातूनच अभ्यासला. दहशतवाद, विविध भागातील राजकारणाचा अभ्यास शोधपत्रकारितेसाठी त्यांनी देशभर प्रवास केला. हजारो लेख लिहिले. पत्रकारितेतील अनेक आव्हाने त्यांनी लिलया पेलली.
तर, एकवीस वर्षांपूर्वीची घटना घडली तेव्हा आम्ही रत्नागिरीला शासकीय तंत्रनिकेतनात शिक्षण घेत होतो. सन १९९८ च्या सप्टेंबर महिन्यात १८ ते २० तारखांना होऊ घातलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आम्ही पहिल्यांदाच रत्नागिरीहून पुणे शहराचा प्रवास केला. ही घटना जुलै-ऑगस्ट १९९८ मध्ये केव्हातरी घडली. या प्रवासाचा, तिथल्या बैठकीचा, वातावरणाचा आमच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की परततनाच आम्ही या संपूर्ण संमेलनाबाबत तीन लेख लिहायचे नियोजन करूनच घरी, चिपळूणला परतलो होतो. त्यातला ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ लिहिलेला हा पहिला लेख काही क्षणात, काही कळायच्या आतच व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांनी आमच्या दिशेने फेकला होता. तेव्हा त्यांच्या तोंडचे वाक्य होते, ‘दिवसातून तीन वेळा एस.टी. गाड्या पुण्याला जाऊन परत येतात. त्या प्रवासावर लेख काय लिहायचा ?’ अभाविकपणे कानावर आदळलेल्या त्यांच्या या वाक्याने आम्ही अक्षरशः थरथरलो होतो. आज आम्ही म्हणू त्या किंवा सुचविणारा सांगेल त्या विषयवर लेख होतो. पण तेव्हा ‘त्या’ लेखाची पाने गोळा करून आम्ही परतलो होतो. अठरा वर्षांचे होतो. अजून एकही लेख कोठेही प्रसिद्ध झालेला नव्हता. काही दिवस विचारात गेले. पुन्हा धाडस करून आम्ही त्या साहित्य संमेलनाचे महत्त्व प्रतिपादित करणारा ‘प्रतिभा संगम’ का ? व कशासाठी ?’ हा दुसरा लेख लिहिला. तो मात्र ७ सप्टेंबर १९९८ ला छापला गेला. त्यावेळी झालेला आनंद पहिल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कसा होता ? ते शब्दात सांगता येणार नाही. दिवाडकर साहेबांसोबतची ‘ती’ पहिली भेट आम्हाला ‘बाळकडू’ देणारी ठरली. तो ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ हा अप्रकाशित लेख आजही आमच्या संग्रही आहे.
बाळकडू (शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर) हे एक बहुवर्षायू, सदाहरित सपुष्प विषारी झुडूप आहे. दक्षिण व मध्य यूरोप, पश्चिम आशिया आणि भारतातील डोंगराळ भागात ते वाढते. लहान मुलांना ठराविक काळाने उद्‌भवणाऱ्या रोगलक्षणांचा (उदा. ताप) प्रतिबंध करण्यासाठी याचा रस योग्य प्रमाणात देतात. त्याची फुले कुळातील नसली तरी रानटी गुलाबाप्रमाणे दिसतात. दिवाडकरांचा आमचा वरील अनुभव हा वरून अत्यंत काटेरी वाटला तरीही तो टवटवीत गुलाबासारखा, प्रसन्न मनाने आम्ही स्वीकारला होता. असे नक्की का घडले असेलं ? अशा स्वाभाविक प्रतिक्रियेमागची दिवाडकर साहेबांची नेमकी भुमिका काय असेल ? या वागण्यातून त्यांना नक्की काय सुचवायचे असेल ? असे प्रश्न स्वतःला विचारून घेत, अनेक अंगांनी आम्ही त्या घटनेचा विचार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात वरती म्हटल्याप्रमाणे आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दैनिक सागरने दिली. अलिकडच्या काही वर्षांत एखाद्या छानश्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर फोन करून वृत्तांत मागवून घेणारे, चिपळूणात संपन्न झालेल्या जलसाहित्य आणि बोलीभाषा संमेलनांचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत, विस्तृत वृत्तांत लिहायला लावून ‘रसिक’ पुरवणीत पानभर छापणारे, याच संमेलनात राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांचे झालेले अभ्यासपूर्ण भाषण शक्य तेवढे विस्तृत मागवून छापणारे दिवाडकर साहेब अलिकडच्या प्रत्येक भेटीत नानांप्रमाणे काहीतरी नवीन, सकस, दर्जेदार देऊन जायचे. आमचा तो काही मिनिटांचा वेळ सत्कारणी कसा लागेल ? याचीच जणू ते काळजी घ्यायचे. दैनिक सागरचा वेब माध्यमात तितका जम बसला नाही. याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. म्हणूनच की काय दिवाडकर साहेबांनी ‘कोकण अॅलर्ट’ नावाचे संकेतस्थळ स्वत: सुरु केले होते. त्यावर आमचे काही लेखही, त्यांच्या मेलवर पोहोचल्यानंतर काही तासात प्रसिद्ध झाले होते. मागाहून ते लेख सागरमध्ये प्रसिद्ध झाले. हे सारे पाहिल्यावर आम्हाला, वयाच्या अठराव्या वर्षी पचवलेल्या त्या एकवीस वर्षांपूर्वीच्या ‘बाळकडू’ प्रसंगाची आठवण व्हायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या घटनेनंतर ज्या ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीने आम्ही लिहित राहिलो त्याबाबत आमचे आम्हालाच आश्चर्य वाटायचे. दिवाडकर साहेबांना नंतर तो प्रसंग लक्षातही राहिला नसावा !
दुर्दैवाने नानांप्रमाणेच दिवाडकर साहेबांचेही अनेक संकल्पित पुस्तकांचे लेखन राहिले. दैनिक सागर हे नुसते वृत्तपत्र नसून ते कोकणचे सांस्कृतिक प्रतिबिंब आहे. कोकणातील अगण्य लिहित्या हातांचे, ‘सागर’ विद्यापीठ राहिले आहे. अनेकांप्रमाणे स्वर्गीय नाना आणि दिवाडकर साहेबांच्या सावलीत आम्ही लिहिते झालो हे आमचे भाग्य ! पण हा सागर नावाचा संस्कार आमच्या पुढच्या पिढीवर त्याच ताकदीने व्हायला हवायं. नाना गेल्यानंतरच्या पहिल्या भेटीत सागरसाठी साप्ताहिक स्तंभलेखन सुरु करण्याबाबतची सूचना दिवाडकर साहेबांनी केली होती. पण ते जमले नाही. अगदी हल्ली-हल्ली आदरणीय शुभदा जोशी मॅडम यांनीही सागरकरिता रोज एखादी ‘फोटोस्टोरी’ सुरु करण्याबाबत सुचविले होते, दुर्दैवाने तेही जमलेले नाही. लेखनाच्या प्रारंभिक दिवसातील सोबती म्हणूनही असेल कदाचित, पण आजही सागरसाठी आमचा जीव हळवा होतो. म्हणूनच नानांच्या, दिवाडकर साहेबांच्या आठवणी मनात जपत, सागरसाठी शक्य तेवढं लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, ई-मेल : dheerajwatekar@gmail.com    

http://www.mulshidinank.com/2019/03/blog-post_4.html



सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

नाथभूषण आर. आर. भंडारे : मनाला चटका लावणारी एक्झिट !


चालू महिन्याच्या पहिल्या रविवारी (३ फेब्रुवारी) अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने ‘नाथभूषण’ या महासंघाच्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने समारंभपूर्वक गौरविलेल्या खेड-भरणे येथील रामचंद्र रक्कमनाथ तथा आबा भंडारे यांचे अवघ्या आठच दिवसात गेल्या रविवारी (१० फेब्रुवारी) दु:खद निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहात समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे नाथपंथी समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या रामचंद्र रक्कमनाथ तथा आर. आर. भंडारे यांची ही अचानकची एक्झिट संवेदनशील मन असलेल्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

मृत्यूने चोरपावलांनी येवून आकस्मिकपणे माणसांचे जीवन संपवणे ही विसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्रापूर्वीची नेहमीचीच घटना होती. मात्र वैद्यकीय प्रगतीमुळे मानवी आयुष्य वधारले आहे. तरीसुद्धा मानवाला कुठे ? कधी ? कसे ? मरण येणार ? हे सांगणे कठीण आहे. गेल्या शंभर वर्षात मृत्यूची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. या साऱ्या कागदी अभ्यासाच्या पलिकडचा विचार करायला भाग पाडणारे असे आबांचे जाणे घडले आहे. आबांसारखी, जीवनातील प्रत्येक पायरीवर आपली कर्तव्ये पार पाडत, जीवनाचा उद्देश समजून घेत थोडेसे अंतर्मुख होऊन जगणारी माणसे आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असली तरी त्यांच्या स्मृती अनेकांच्या हृदयांतरी कायम राहतील असेच त्यांचे जगणे होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव तसा हळूहळू आपल्या शेवटाकडे प्रयाण करीत असतो. हा प्रवास अखंड सुरु असतो. त्याचा शेवट शांत आणि समाधानाने व्हावा असे आपल्याला कितीही वाटत असले तरीही प्रत्येकाच्या बाबतीत तसे घडतेच असे नाही, या मागची कारणमीमांसा हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे. परवाच्या रविवारी (१० फेब्रुवारी) चिपळूण-नवीमुंबई-चिपळूण प्रवासात, दिवसभर ड्रायव्हिंग करत असताना सायंकाळी चारसव्वाचारच्या सुमारास एका निवांत क्षणी वॉट्सअप पाहताना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ‘प्रवक्ता’ ग्रुपवर प्रवक्ते विश्वनाथ डवरी यांनी दुपारी २.२५ वाजता टाकलेली पोस्ट वाचून मन कातरले. ती पोस्ट आबांची प्रकृती बिघडल्याची जाणीव करून देण्याबाबतची होती. गेल्याच रविवारी (३ फेब्रुवारी) बरोबर याचवेळी आबा, ‘नाथभूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ. संजय कदम आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत सत्काराला उत्तर देत होते. ‘या पुरस्कारामुळे आपण कृतार्थ झालो आहोत. ज्या समाजासाठी झटलो. त्यांनी आपले प्रेम या पुरस्काराच्या रूपाने परत दिले त्यामुळे आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमानंतर आबांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप यांच्या आग्रहाखातर घरी आम्ही जाऊन चहापान घेतले होते. आबांची तेव्हाही भेट झाली होती. तशी तब्बेत ठीक नव्हती. आबा झोपूनच होते. हे सारे आठवले. तातडीने चार वाजून एकोणीस मिनिटांनी संदीपना फोन लावला. फोनवर ‘आबा गेले !’ एवढंच काय ते ऐकू आलं. बाकी संदीप यांच्या रडण्याचा आवाज कानात येत राहिला. २७ सेकंदांनी फोन बंद झाला. क्षणभर काय करावे ? हेच समजेना. विज्ञानयुगातील हा ‘भ्रमणध्वनी’ आपल्याला कोणत्या क्षणांना सामोरे जायला लावेल याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. संदीपचे शब्द पुनःपुन्हा कानात आठवून चार वाजून अडतीस मिनिटांनी आम्ही वॉट्सअपवरून घडलेली घटना इतरांना कळविली, इतक्या लवकर कळवणे योग्य होते की अयोग्य ? याबाबतही नंतर आमच्या मनात द्वंद्व राहिले. नंतरच्या वृत्तात आबांच्या जाण्याची वेळ सायंकाळी ४.२० अशी नोंदवलेली होती.  

समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, विधानभवनात साप आणि माकड सोडणारे नेते अशीही त्यांची ओळख होती. भंडारे, यांना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या सहीने दिलेले प्रवक्ता विश्वनाथ भंडारी यांनी लिहिलेले मानपत्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आजच्या पिढीस ओळख करून देण्यास पुरेसे आहे. त्यातील वर्णनानुसार, नाथ संप्रदायासारख्या महत्त्वपूर्ण पवित्र अशा समाजात आपला जन्म दिनांक ऑगस्ट १९४६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रामचंद्र रक्कमनाथ भंडारे असे नाव आपण धारण केले. परिस्थितीशी टक्कर देत आपले बालपण गेले. मंत्रालयासारख्या मोठ्या ठिकाणी आपण शासनाची सेवा केलीत. ही सेवा प्रामाणिकपणे करत असतानाच आपला नाथ समाज सुद्धा आपण विसरला नाहीत. मंत्रालयात डेस्क ऑफिसर, रेकॉर्ड इन्चार्ज आपण होता आणि इंडस्ट्री हे खाते आपणाकडे होते. मंत्रालयात संपूर्ण राज्यातून लोक येत असतात; त्या दृष्टीने आपण येणाऱ्या समाजाच्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. एक नव्हे- दोन नव्हे -तर तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्र नाथजोगी सेवा समाज मुंबई, या संस्थेचे आपण सचिव म्हणून काम केले आहे. विमुक्त भटक्या जमातीचे आपण सन्माननीय सदस्य सुद्धा होता. लक्ष्मण माने, मच्छिंद्र भोसले, बाबुराव चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबर आपण समाज एक करण्याचा प्रयत्न केला. अनेक मेळावे घेतलेत. त्यापैकी १९८७ ला अखिल महाराष्ट्र नाथजोगी समाजाचा महामेळावा आपण खेड या ठिकाणी घेतला होतात. मंत्रालयामध्ये आपण समाज कल्याण सल्लागार बोर्डावर सुद्धा होता. ज्येष्ठ नेते डॉक्टर जयाजी नाथ व डॉक्टर गोरखनाथ चव्हाण यांना आपण स्वतः संस्थेमध्ये घेतले होते व त्यांना मार्गदर्शनही केले होते. यावेळी संस्थेच्या इतर काही लोकांनी 'हे आपल्या जातीचे नाहीत' अशा प्रकारे विरोध केला होता; परंतु अशा प्रकारच्या बारीक-सारीक अडथळ्यांना लिलया पार करण्याचे कसब तुमच्याकडे होते. आपण अनेक वधू-वर मेळावे सुद्धा घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. आपण अनेक मोर्चे घेतले, त्यामध्ये पुंगीवाले, सापवाले, नंदीबैलवाले, माकडवाले यांना घेऊनही आपण मोर्चे काढलेले आहेत. आपण विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला मंत्री भेटायला येत नाहीत या रागातून आपण विधानभवनामध्ये साप आणि माकडे सोडली होती !! त्यामुळे गहजब झाला होता !! भारताची राजधानी दिल्ली येथे सुद्धा आपण एन. डी. सोनवणे संरक्षक यांच्या बरोबर मोर्चा काढून धडक दिली होती. नागपूर येथे काढलेल्या मोर्चा मध्ये सुद्धा आपले नेतृत्व सिद्ध झाले होते. वयाची कोणतीही तमा न बाळगता व शरीर प्रकृतीकडे लक्ष न देता आपण आज सुद्धा कोकणामधील गोरगरीब नाथ जोगी समाजाचे काम करीत आहात. आपण वयाने सुद्धा आता ज्येष्ठ असून, अनुभवाने परिपक्व आहात. या वयातही आपण मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहात, ही कौतुकाची व अभिमानाची अशी बाब आहे. नाथ जोगी समाजाचे चरित्रकार म्हणून इतिहास तुमच्याकडे पाहिल आणि संघटनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहास तुम्हाला टाळून पुढे जाऊ शकणार नाही !! पुढील आयुष्यात तुमची तब्येत चांगली राहावी व तुमची शंभरी पूर्ण व्हावी, अशी परमेश्वराकडे या सन्मानपत्राच्या निमित्ताने प्रार्थना करुन आपण केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, आपला अधिकार मान्य करून अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या हातात असलेला सर्वोच्च  "नाथ भूषण" हा पुरस्कार आपणाला सन्मानपूर्वक व कृतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे !! या मानपत्रासहच्या सत्कारानंतर अवघ्या आठच दिवसात आबांची प्राणज्योत मालवली.

आत्तापर्यंत जगलेल्या एकोणचाळीस वर्षांपैकी तेवीस वर्षांच्या सक्रीय सामाजिक आयुष्यात, स्वतःच्या समाजात वावरण्याचा अत्यंत कमी संबंध आलेल्या माझ्यासारख्याला अखिल भारतीय नाथपंथी महासंघाने गेल्या रविवारी (३ फेब्रुवारी २०१९) नाथभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने 'कोकण आणि नाथपंथ' या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात आबांशी झालेली माझी ती पहिली भेट दुर्दैवाने शेवटची ठरली. जन्म आणि मृत्यू या आपल्या नियंत्रणापलिकडील मानवी जीवनातील अटळ घटना आहेत. दरम्यानच्या आयुष्याची समीकरणेही इतकी साधी नसतात. आयुष्यातील शेवट गोड व्हावाही इच्छाही प्रत्येकाच्या अंतरी असते. पण तसे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. असे विलक्षण भाग्य लाभलेले, आम्ही पाहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या मनात आर. आर. भंडारे यांची सदैव नोंद राहील.

धीरज वाटेकर

दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ 

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...