शुक्रवार, १ मार्च, २०२४

मौजे शिपोशी :: विशेष नोंदी

कोकणातील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आजपासून (१-३ मार्च २०२४) शिपोशीतील न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरात होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ‘शिपोशी’ संदर्भातील काही दुर्लक्षित नोंदींचा घेतलेला हा आढावा...

धीरज वाटेकर चिपळूण (मो. ९८६३६०९४८)


निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी श्रीपोशीचा अपभ्रंश होऊन आजचे शिपोशी नाव रूढ झाले असावे असा कयास आहे. इ.स. १६८२ मध्ये गावात वस्ती असल्याचे उल्लेख सापडतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कोकणातील वसाहती ग्रंथात केलेल्या नोंदीनुसार हे गाव कोणी मराठा सरदाराने वसविलेले असावे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी देवीचे मंदिर बांधले त्यावेळी देवीचे पुजारी इनामदार आठल्ये होते. मौजे बावधन (वाई) हा गाव त्यांच्याकडे इनाम होता. देवीचे विद्यमान पुजारी हडप मूळचे आठल्ये होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भयंकर आणि दुर्दैवी मृत्युनंतर (१६८९) कोकणात ज्या चकमकी, जाळपोळी झाल्या त्यात शिपोशी गाव सापडून श्रीदेव गांगेश्वर मंदिराचे नुकसान झाले होते. शिपोशी हे पेशवाईपूर्व काळापासून विद्वत्ता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ह्यात पुढारलेले गाव होते.


११व्या शतकाच्या सुमारास पाटण (सातारा) तालुक्यातील पाटणच्या दक्षिणेस असलेल्या ‘ओटोली’तून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले होते. ‘ओटोली-ये’ आडनावाचा १६७६ च्या श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे. शिपोशी हे गाव हा इ.स. १७२५ च्या आसपास देवळे येथील आठल्ये यांना इनाम म्हणून मिळाले. गावचे ग्रामदैवत श्रीगांगेश्वर आहे. सन १७५०च्या दरम्यान आठल्ये यांनी श्रीदेव हरिहरेश्वराची स्थापना करून प्रसिद्ध मंदिर बांधले. शिपोशी गावात मुंबई इलाख्यातील सहावी मराठी शाळा १८५५ साली सुरु झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात मुंबईत उद्योगधंदे वाढत होते. मुंबई बोटीने कोकणाला जोडलेले होते. १८३० नंतर टप्प्याटप्प्याने झालेला मुंबई गोवा रस्ता तयार झाला. तर रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग १८८० ते १८९० या कालावधीत टप्प्याटप्प्याने टायर झाला. १९व्या शतकात कोकणातून लोकं कामधंदा व शिक्षणासाठी मुंबईला जाऊ लागले. १९०५ साली गावी पोस्टऑफिस सुरु झाले. गावात १९१३ साली शिपोशी ग्रुप सहकारी पतपेढी स्थापन झाली होती.  १८ जून १९५९ रोजी कै. डॉ. वि. ग. तथा बापूसाहेब आठल्ये यांच्या पुढाकाराने माध्यमिक विद्यालय सुरु झाले. शिपोशीचे शशिशेखर काशीनाथ आठल्ये गुरुजी हे आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे विविध समाजाच्या पाठबळावर विधानसभेवर सतत निवडून येत राहिले. आपल्या साधेपणासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या गुरुजींनी ‘सामाजिक कार्य कसे करावे?’ याचा आदर्श आपल्या जीवनात निर्माण केला. गावात १९५६ पासून ग्रामपंचायत अस्तित्वात असून पहिले सरपंच कै. रघुनाथराव बाईंग होते. गावातील मोहोळ पऱ्यावरील धरणामुळे लोकं उन्हाळ्यात भाजीपाला व इतर पिके घेत असतात. विशेष नोंदींची सुरुवात याच मोहळच्या पऱ्यापासून करूयात.

 

शिपोशी ओढ्याची दिशा बदलण्याची कल्पकता

जमीन सुधारण्यासाठी, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून साहाय्य मिळत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तर्फे देवळे मौजे शिपोशी या गावी मोहळचा पऱ्या (ओढा) व दाभोळच्या सीमेवरील ओढा असे दोन ओढे होते. विशाळगडचे पोतदार मल्हार रंगनाथ यांनी हे दोन ओडे मोडून नवे भातशेत करण्यासारखे आहे असे देवळे येथील ठाणेदारांना कळविले होते. मल्हार रंगनाथ मशागत करणारे असले तरी हे काम फार कष्टाचे होते. त्या जागी बराच खर्चही करावा लागणार होता. भातशेत तयार होऊन लागवडीस देण्यास बरीच वर्षे लागण्याची शक्यता होती. मल्हार रंगनाथ आणि देवळे येथील सरकारी कामगार यांनी ती जागा पाहून, तेथील मल्हार, गुरव यांना बोलावून सर्वासमक्ष नदीस मिळालेला मोहोळाचा ओढा मोडून उत्तरेच्या बाजूने डोंगरात चर काढून नदीस मिळविण्यासाठी तो १४०० हात लांबीचा खणावा अशी योजना होती. त्यासाठी त्यांना देवळे तर्फ्याचे ठाणेदार यांनी मल्हार रंगनाथ याला १६८२ साली कौलनामा सादर केला होता. ओढ्याची दिशा बदलण्याची आणि त्याखालील जमीन भातशेतीखाली आणण्याची योजना, त्याकाळचा विचार करता, अत्यंत कौतुकास्पद ठरावी अशी होती. या कल्पनेला संभाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मल्हार रंगनाथ आणि काशी रंगनाथ यांनी डोंगरातून जो चर खणला त्याची लांबी १८०० हात, रुंदी १८ ते २० हात आणि खोली ५ ते ७ हात होती. त्यांना या कामासाठी ८ हजार रुपये खर्च आला होता. श्रम, साहस व कष्ट मशागत करून केलेले हे बांधकाम फुटले. पुन्हा खर्च आणि श्रम करण्यासाठी हुशारी यावी म्हणून शिपोशीपैकी नदीच्या पूर्वेकडील सर्व भाग कोंड म्हणून स्वतंत्र करून द्यावा यासाठी काशी रंगनाथ याने १६९२ साली विशाळगडचे अमात्य रामचंद्र निळकंठ यांना विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांना सनद देण्यात आल्ली होती. खोदून तयार केलेला चर कित्येक ठिकाणी १० ते २० हात रुंद असून ७-८ हात उंचीचा आणि दोनअडीचशे हात लांबीचा होता. या ठिकाणाला 'चराची पट्टी' म्हणत. दाभोळ नावाच्या सीमेच्या ओहोळासही बांध घालून बाजूने चर खणून तोही नदीपर्यंत नेलेला होता. त्या ठिकाणी शेत तयार केलेले होते. मोहोळाच्या ओढ्यातील बांध फुटल्यामुळे ते काम अपुरे राहिले होते. चर खणण्याचे आणि बांध घालण्याचे काम १६८२ साली सुरू होऊन पुढे ८-९ वर्षे चालू होते.

 

जवळच्या गावात चकमक

२ मार्च १७०२ रोजी रात्री शिपोशी जवळच्या (कोतरी-कातर) गावावर मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी हल्ला चढवला होता. मराठे आणि मोगल बादशाही अधिकाऱ्यांच्यात यांच्यात चकमक झाली होती. मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी गाव ताब्यात घेतले होते. मराठ्यांनी खेळणा (विशाळगड) किल्ल्याचा आसरा घेतला होता.

 

रियासतकारांच्या प्राथमिक शिक्षणाचे गाव

रियासतकार डॉ. गो. स. सरदेसाई यांचा जन्म गोविळ गावी १७ मे १८६५ला (मृत्यू - २९ नोव्हेंबर १९५९, कामशेत) झाला. गोविळच्या परिसरात सृष्टीनिरीक्षण आणि काबाडकष्ट करण्यात त्यांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोविळ जवळ असलेल्या वेरवली एक वर्षे (वय वर्षे ७) आणि उर्वरित वर्षे शिपोशी या त्यांच्या मामांच्या गावी झाले होते. त्यांचे पुढील शिक्षण रत्नागिरी (१८७९), पुणे आणि मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून १८८८ साली बी.ए. झाल्यावर पुढे काय करावे? अशा विचारात असताना, बडोदा संस्थानात नायब दिवाण असलेल्या शिपोशीतील बापूसाहेब आठल्ये यांनी त्यांना तिकडे नेले. बडोद्याचे तरुण महाराज सयाजीराव यांचे वाचक म्हणून १ जानेवारी १८८९ रोजी त्यांची नेमणूक झाली. पुढे त्यांना राजपुत्र विद्यालयात शिक्षक म्हणून बढती मिळाली. विद्यालयाचे मुख्य कालानुरूप युरोपीय होते. पुढील जीवनात सयाजीराजांच्या सोबत अनेकदा ते विलायतेस गेले. सरदेसाई हे निर्लोभी असल्याने जे सहजरित्या मिळेल त्यावर संतुष्ट राहून जणू इतिहासाला आपला पुत्र मानून त्यांनी आपले काम चोख बजावले. त्यांच्या या जगण्याचा राष्ट्राला मोठा उपयोग झाला. वि. का. राजवाडे यांनी सरदेसाई यांना शतकातील शंभर नामांकितमध्ये ’इतिहासमार्तंड’ म्हणून संबोधले होते. इतिहास संशोधकांच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले.

 

हिंदू महासभेला शिपोशीत पाठींबा

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करण्याचा सरकारी आदेश असताना कोकणात त्याचे पालन होत नव्हते. तेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकारांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून १९२५ मध्ये हा प्रश्न हातात घेतला. जनजागृतीसाठी त्यांनी कोकणात सर्वत्र दौरे केले, व्याख्याने दिली. याचे पडसाद कोकणातील साठ-सत्तर गावात उमटले होते ज्यात शिपोशी एक होते.

 

१९२९ची शिपोशी सहकार परिषद

तत्कालीन सावंतवाडी प्रांतातील कुडाळ येथील बाकरे कुटुंबातील वैद्यकीय व्यावसायिक (आयुर्वेद आणि होमिओपॅथी) वासुदेव महाशेवर बाकरे यांनी १९०८मध्ये बेळगाव येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १३ वर्षे संचालक, सहकार परिषदेचे सदस्य, १९३२-३३मध्ये मुंबई प्रांतीय सहकारी संस्थेचे सचिव होते. विशेष म्हणजे १९२९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिपोशी येथे झालेल्या सहकार परिषदेचे ते अध्यक्ष होते.

 


आठल्ये दप्तर

शिपोशी गावातील श्रीकृष्ण विठ्ठल आठल्ये हे मराठा इतिहासाचे एक सुप्रसिद्ध समीक्षात्मक अभ्यासक होते. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मूळ दस्तऐवज संकलित, कॉपी आणि प्रेससाठी तयार केले होते. त्यांच्या आठल्ये दफ्तरातील हा संग्रह १९४५मध्ये रघुवीर लायब्ररीसाठी विकत घेण्यात आला.  

 


हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक शिपोशीचे!

क्रांतीकारक गणेश गोपाळ उर्फ अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ रोजी शिपोशी येथे झाला. पोस्टमास्तर वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी, अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकणे कठीण झाले. मुंबईत बदामवाडीत रहात असतांना त्यांचा संपर्क आर्यसंघ या बंगाली क्रांतीकारकांच्या संघटनेशी झाला. संघटनेतील शामसुंदर चक्रवर्ती हे अण्णांचे खास मित्र होते. त्यावेळी गुप्तपणे काम करणार्‍या क्रांतीकारकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा असे. त्यामुळे गणेश गोपाळ हे कधी अण्णा कधी डॉ. आठल्ये, अमेरिकन मेस्मोरिस्ट, ओ. अँटले, ए. गणपतराव, तर कधी गणेशपंत आठल्ये अशा अनेक टोपणनावांनी वावरत होते. गोव्यात झालेल्या राणे बंडाच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस त्यांची चौकशी करत असल्याने आठल्ये यांना मुंबईत रहाणे कठीण झाले होते. त्या वेळी बेंजामिन वॉकर या पारशी गृहस्थाने त्यांना आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे आठल्ये टोपण नावाने जहाजावरून वॉकर यांच्यासमवेत अमेरिकेला निघून गेले. त्या वेळी त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांचा मुलगा म्हणजेच (कै.) डॉ. विनायक गणेश आठल्ये केवळ दीड वर्षांचे होते. गणेश आठल्ये यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांचा छुप्या पद्धतीने दौरा करून बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या आत्मसात केली होती. त्यानंतर जर्मनीहून मालवाहू जहाजाने ते कोलकत्याला आले. या दरम्यान त्यांना क्षयरोग झाला. अज्ञातवासात असतांनाच ३२ व्या वर्षी २ सप्टेंबर १९११ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार तेथील तत्कालीन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य आणि नागपूरचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार, पुण्याचे डॉ. पळसुले यांच्या अर्थात महाराष्ट्रीय व्यक्तीच्या हस्ते अज्ञातपणे त्यांचा अंत्यविधी झाला. शस्त्रास्त्रांच्या जहाल मार्गाने अन्यायी ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणार्‍या या थोर क्रांतीकारकाचे संपूर्ण जीवन आणि कार्यपद्धत गुप्त राहिली आहे. मुंबईतील भडकमकर मार्गावरील चौकाला क्रांतीवीर जी. अण्णा यांचे नाव दिलेले आहे. “वन्दे मातरम् या जहाल नियतकालिकाचे संपादक शामसुंदर चक्रवर्ती यांनी अण्णांना बंगाली लिपीतील वन्दे मातरम् ही अक्षरे कोरलेली चंदनाची पाटी भेट दिली होती. गणेश गोपाळ हे हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक होते. सेनापती बापट यांच्यापूर्वी त्यांनी बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही विद्या त्यांनी बंगालमधील तत्कालीन जहाल क्रांतीकारकांना शिकवली. खुदीराम बोस यांनी उडवलेला हिंदुस्थानातील पहिला बॉम्ब त्यांनीच सिद्ध केला होता.

 

कवी-साहित्यिक कृष्णाजी नारायण आठल्ये

कोचीन (केरळ) मधील वास्तव्यात ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक सुरू (१८८६) करून ते सुमारे २५ वर्षे चालविणारे कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे मूळगाव शिपोशी. वडील दशग्रंथी वैदिक असल्याने त्यांनाही तेच शिक्षण मिळाले. कराड, पुणे ट्रेनिंग महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तीन वर्षे शिक्षण घेतले होते. मलबारमधील कोचीन येथे आठल्यांचे एक बंधू नोकरी करीत होते. ते आजारी पडल्याने त्यांना भेटायला म्हणून कृष्णाजी कोचीनला आले आणि तेथेच राहिले. कोचीन मधील वास्तव्यात त्यांनी ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक चालविले. त्यांनी ‘गीतापद्यमुक्ताहार’ (१८८४), ‘आत्मरहस्य’ (१९१९), ‘The English Teacher’ भाग १ व २’ (१९२३), ‘कोकिळाचे बोल’ - निवडक लेख (१९२६), ‘रामकृष्ण परमहंस’ (१९२९), ‘माझे गुरुस्थान’, ‘सार्थ दासबोध’, ‘समर्थांचे सामर्थ्य’, ‘सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘सुलभ वेदान्त’, ‘आर्याबद्ध गीता’, ‘वसंत पूजा’, ‘फाकडे तलवार बहाद्दर’, ‘नरदेहाची रचना’, ‘विवेकानंद जीवन’, ‘ज्ञानेश्वरांचे गौडबंगाल’, ‘पंचतंत्रामृत’ हे ग्रंथ ‘सुश्लोक लाघव’, ‘सासरची पाठवणी’, ‘माहेरचे मूळ’, ‘शृंगार तिलकादर्श’, ‘मुलीचा समाचार’ आदी काव्यसंग्रह तसेच ‘मुले थोर कशी करावीत?’, नजरबंद शिक्षक’, ‘ग्रहदशेचा फटका’, ‘मथुरा गणेश सौभाग्य’ आणि अनुवादित आदी चाळीसेक ग्रंथ लिहिले. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषा चित्रमयूर’ ही पदवी दिली होती. त्यांची ‘प्रमाण’ नावाची कविता विशेष गाजलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कविता सर्वाची तोंडपाठ होती. मराठी बालभारती १९९८च्या चौथीच्या पुस्तकात अभ्यासासाठी असलेली ही कविता खालीलप्रमाणे...

प्रमाण

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।



शिपोशीतील आठल्ये यांनी काढले                          रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे संपादक जनार्दन हरि आठल्ये यांचेही मूळगाव शिपोशी होते. जनार्दन हरि आठल्ये यांचा जन्म १८२६ ला झाल्याची नोंद मिळते. जनार्दन हरी आठल्ये (1826-1900) हे रावसाहेब विश्‍वनाथ नारायण मंडलिक हे प्रसिद्ध वकील आणि प्राच्यविद्या अभ्यासक यांचे लहानपणापासूनचे स्नेही आणि रत्नागिरीतील शाळासोबती होते. तसेच ते संस्कृतचे अभ्यासक बापूसाहेब आठल्ये यांच्याशी संबंधित होते. प्राथमिक आणि इंग्रजी असे सुरुवातीचे शिक्षण खाजगीत, घरी मिळवणारे ते एक स्वयंनिर्मित व्यक्ती होते. त्या काळात छापून आलेली इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती. यातून त्यांना भारताबाहेरील देशांच्या घडामोडींमध्ये रस निर्माण झाला. रत्नागिरीच्या सरकारी हायस्कुलात शिकून ते मॅट्रिक झाले त्यानंतर त्याच हायस्कुलात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेल्या जनुभांऊचा धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचा विशेष अभ्यास होता.

हस्तलिखितापेक्षा मुद्रित ग्रंथाना महत्व येणार आहे हे जाणून या ज्ञात्याने १८४८ ला रत्नागिरीत ‘जगमित्र’ छापखाना सुरू केला. जून १८५४ ते १८९० पर्यंत सुमारे ३७ वर्षे त्यांनी “जगन्मित्र” साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या शिळाप्रेसवर चालविले. पुणे-मुंबर्इ सोडून अन्यत्र कुठे वृत्तपत्राला प्रारंभ झाला नव्हता तेव्हा या दोन शहरानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा मान ‘जगन्मित्र’ लाच आहे. जनार्दन हरी यांचा स्वतःचा उत्तम असा ग्रंथसंग्रह होता. स्वतःचा मुद्रण व्यवसाय असल्यामुळेच त्यांनी साप्ताहिकाचा बुडिताचा धंदा सुरू केला. साप्ताहिक विकत घेऊन वाचायची मानसिकता समाजात आलेली नव्हती. ’जगन्मित्र ‘साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ५ रुपये होती आणि वर्गणीदारांची संख्या होती अवघी १७. विशेष म्हणजे या १७ वर्गणीदारात मराठीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखक आणि कोशकार मेजर थॉमस कॅडी, कराची येधील फ्रियर हे पुढे मुंबर्इ प्रांताचे गर्व्हनर झाले होते. मिस्टर एलिस अशा अभ्यासू व्यक्ती होत्या. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करताना हिंदू धर्मावर टीका करायला प्रारंभ केला असताना त्या टीकेला अभ्यासपूर्ण भाषेत लेख लिहून उत्तरे देण्याचे काम जनुभाऊ आठल्ये यांनी ‘जगन्मित्र’ मधून केले. २० ऑगस्ट १८६६ च्या अंकात, हिंदुस्तानात पडलेल्या दुष्काळाच्या एका बातमीत, ‘चितापूर येथे भिकाऱ्यास तांदुळ वाटिले तेव्हा त्या गरिबांचे गर्दीत ३२ माणसे ठार मेली व १५ स दुखापत झाली आहे.’ अशी नोंद आहे. ’जगन्मित्र‘चा त्या वेळी ’रत्नागिरीचे गॅझेट‘ असा उल्लेख व्हायचा. बिनचूक माहिती प्रसिद्ध होत असे. जगन्मित्र छापखान्यात आठल्ये यांनी ‘धर्मसिंधू’, भावार्थ दीपिका’, ‘बृहत्संहिता’ ग्रंथ प्रकाशित केले.  १८७५साली  आठल्ये आणि विनायक शास्त्री आगाशे यांनी शब्दसिद्धीनिबंध नावाचा कोश प्रसिद्ध केला होता. संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठी अनुवाद असलेला एक मूलभूत दुर्मिळ ग्रंथ वराहमिहिरकृत श्री बृहतसंहिता चे  भाषांतर करून जनार्दन हरि आठल्ये यांनी ११ ऑक्टोबर १८७४ रोजी प्रसिद्ध केला होता.

'वराहमिहिर' हा चौथ्या-पाचव्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. त्या काळात, भारतीय खगोलशास्त्र व गणित, युरोपपेक्षा खूपच प्रगत होते. वराहमिहिर, हा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता, अशी आख्यायिका आहे. या पुस्तकात १०७ अध्याय असून त्यातील भविष्य हे, व्यक्तिगत भविष्य नसून सार्वजनिक भविष्य आहे. भूकंपासारखी नैसर्गिक संकटांची कारणे आणि भविष्ये यात आहेत. अशा प्रकारचा हा ग्रंथ दीड हजार वर्षापूर्वी लिहिला गेला होता, ही आश्वर्याचीच गोष्ट आहे. १८७४ मध्ये आठल्ये यांनी रत्नागिरी सारख्या ठिकाणी, या ग्रंथाचे मुळाबरहुकूम भाषांतर सिद्ध केले होते. विद्योद्भव लाभ (१८४९) हा शिक्षणाच्या फायद्यांवरील निबंध, शब्दसिद्धी निबंध (१८७१) हा एक दार्शनिक निबंध, संस्कृतमधून मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल मुर्खासतक (१८७७) हा मूर्खाविषयीच्या २५ सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकांचा श्लोक स्वरूपात केलेला अनुवाद, काली उद्भव (1878) हे येणार्‍या अंधकारमय युगाबद्दल संस्कृत कृतीचे मराठी रूपांतर, सद्यस्थिती निबंध, विद्यामाला, ज्योतिष, बालवैद्य, पाकशास्त्र ही त्यांची कमी ज्ञात पुस्तके आहेत. या नोंदी History of modern Marathi literature 1800-1938 मराठी वान्द्मय कोश या govind chimanaji bhate निवृत्त प्राचार्य वेलिंग्टन कोलेज सांगली यांनी १७ फेब्रुवारी १९३९ रोजी लिहून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आहेत. त्यांनी शिपोशी येथे मराठी शाळा सुरू केली. लोकांच्या उदार सहकार्याने शाळेसाठी इमारत बांधली होती. भारतीय ग्रंथमुद्रण – बापूराव नाईक (कॅ. गो. गं. लिमये ट्रस्ट प्रकाशन) १० मे १९८० नुसार जगन्मित्र छापखान्यात १८५४ पासून १८६९ पर्यंत २५ पुस्तके छापण्यात आली होती. गुण्ये घराण्याचा इतिहास खंड दुसरा नुसार, शके १७९०, सन १८६८ मध्ये जनार्दन हरि आठल्ये (इनामदार शिपोशी) यांनी परिश्रमपूर्वक कऱ्हाड्यांची शुद्ध गोत्रावळी तयार केली होती.

१८०० ते १८६९ दरम्यान महाराष्ट्रात बेळगाव-धारवाड-कराची सह १०१ छापखाने होते. त्यात रत्नागिरीतील हा एकमेव होता. १८७० ते १८८५ - १८ पुस्तके छापण्यात आली. त्यांचे पहिले पुस्तक प्रातस्मरणादि पद्य (प्रती २५) सखाराम मोरेश्वर जोशी यांनी छापून घेतले  होते. विद्यामाला हे अन्वर्थक नाव घेऊन त्यांनी १८७८ मध्ये महाराष्ट्रीय ज्ञानकोश मासिक स्वरुपात छापायला सुरुवात केली होती. पण २०० पानांच्यावर त्याची प्रगती झाली नाही. जनुभाऊ वृद्धापकाळापर्यंत जगले आणि 1900 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ ::

१.       WHO’S WHO INDIA (EDITED AND COMPILED THOS. PETERS) १९३६

२.   HAND LIST OF IMPORTANT HISTORICAL MANUSCRIPTS IN THE RAGHUBIR LIBRARY १९४९ - RAGHUBIR LIBRARY SITAMAU (MALWA)

३.      डिसेंबर १९५१ - मासिक नवभारत - प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचा लेख

४.      शिवपुत्र संभाजी - डॉ. सौ. कमल गोखले (ज्ञान-विज्ञान विकास मंडळ १९७१)

५.     कै. वै. वि. आठल्ये यांचे १९८१ सालचे माघी उत्सवातील भाषण

६.     जानेवारी १९८३ :: मोगल दरबाराची पत्रे (खंड दुसरा) संपादक - सेतुमाधव पगडी 

७.     www.harihareshwardevasthanshiposhi.in


(धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

वार्तालाप - कोकण क्षेत्राचा शाश्वत, सर्वंकष विकास

आज रत्नागिरीत (२९ फेब्रुवारी २०२४), पत्र सूचना कार्यालय मुंबई (PRESS INFORMATION BUREAU) माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांनी निमंत्रित पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या वार्तालाप - ग्रामीण माध्यम परिषद (कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास SUSTAINABLE AND HOLISTIC DEVELOPMENT IN KONKAN REGION) कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

उद्घाटन सत्रानंतर भारतीय कोस्टगार्ड रत्नागिरी यांच्या SEFTY OF LIFE AT SEA या सत्राने वार्तालाप सुरू झाला. कोकणवासियांनी शाश्वत विकासासाठी सागरी विकासाच्या विषयाकडे अधिक आत्मियतेने पाहाण्याची आवश्यकता या सत्रातून जाणवली. दुसरे सत्र हे शाश्वत स्थानिक उपक्रमांद्वारे कोकणातील पर्यटन क्षमतांची कवाडे खुली करणे या विषयावर झाले. केंद्र शासनाचा अतुल्य भारत विभाग हा कोकण पर्यटनाचा विचार करतोय हे यामुळे जाणवलं. अतुल्य भारत प्रमोशनमध्ये कोकणातील शाश्वत पर्यटनाच्या विविध अंगांचा समावेश व्हायला हवा अशी आग्रही भूमिका जिल्ह्यातील निमंत्रित माध्यम प्रतिनिधींनी यावेळी मांडली. तिसरे सत्र हे कोकणातील उपजीविकेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास या विषयावर झाले. विक्रीमूल्य वाढवण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. भोजनानंतरच्या सत्रात पत्र सूचना कार्यालयाची देशभरातील कार्यपद्धती स्पष्ट करून सांगण्यात आली.

संपूर्ण वार्तालापास भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर, पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेश, कौशल्य विकास मंत्रालयाचे सहसंचालक अभय महिषी, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ कीर्ती किरण पूजा आणि पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी यांनी संबोधित केले. जिल्ह्यातील, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनुभव कथनाने वार्तालापाची सांगता झाली.

या निमित्ताने माध्यमकर्मींच्या दृष्टीने महत्त्वाच्या वार्तालापाला उपस्थित राहाता आले. या वार्तालाप कार्यक्रमाला येण्याची सूचना जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत सरांनी केली होती, त्यांना मनापासून धन्यवाद.

धीरज वाटेकर चिपळूण
मो. ९८६०३६०९४८

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

कोयनेच्या अभियंत्यांची मांदियाळी ('स्मृतिशलाका' लोकार्पण)


कोयना प्रकल्पातील निवृत्त मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत

अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे लोकार्पण

चिपळूण :: महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पात, आपल्या कार्यकाळात अधिकारी अभियंता म्हणून कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदासह महत्त्वाच्या विविध पदांवर सेवा बजावलेल्या मान्यवर निवृत्त अभियंत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोथरूड येथे चिपळूण तालुक्यातील अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे नुकतेच लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलोरे-कोयनानगर भागात १९६४ ते १९७१मध्ये कार्यकारी अभियंता त्यानंतर कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता (स्थापत्य) आणि शेवटी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले श्रीधर ए. भेलके (साहेब) होते. 

मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली अलोरे शाळेची ही स्मरणिका ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे. या कार्यक्रमाला कोयनेसह महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांचे माजी मुख्य अभियंता (स्थापत्य) दीपक एन. मोडक, प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कार्यकारी अभियंता, चौथ्या टप्प्यात पुणे येथे कोयना संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि शेवटी शासनाचे पाटबंधारे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले अशोक पी. भावे, १९५८पासून कोयना धरण आणि टप्पा तीनच्या कामात उप अभियंता त्यानंतर पदोन्नतीवर फ्रेंच जलविद्युत प्रकल्पात कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेले बालाजी एस. निकम, प्रकल्पात टप्पा चार मध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म्हणून कार्यभार पाहिलेले संजय. के. घाणेकर, प्रकल्पाच्या अलोरे भागात कार्यकारी अभियंता (विद्युत) म्हणून काम पाहिलेले रविंद्र व्ही. भाटे, त्यांच्या पत्नी आणि शाळेशी १९७३पासून शिक्षिका म्हणून परिचित सुनंदा र. भाटे, अलोरे गावात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी सतिश ई. शेंडे, भाग्यश्री एस. मांडके, शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रकाशक विभाकर वि. वाचासिद्ध, स्मरणिकेची निर्मिर्ती करणारे ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण के. माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शं. वहाळकर आणि स्मरणिकेचे संपादक-लेखक धीरज म. वाटेकर उपस्थित होते.

श्रीधर ए. भेलके (साहेब) म्हणाले, १९६७च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत. सिमेंट हे एक केमिकल आहे. त्यात पाणी किती मिक्स करायचे याचे प्रमाण ठरलेले आहे. सिमेंट कॉंक्रीटमधील आकुंचन (तडे जाणे) आणि प्रसरण पावण्याच्या प्रक्रियेमुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून कोयना प्रकल्पात सिमेंट कॉंक्रीटचे ग्रेडेशन/मिक्स डिझाईन स्वतंत्र अभ्यास करून ठरविण्यात आले होते. प्रत्यक्ष कॉंक्रीट काम करताना तापमानवाढ होऊ नये म्हणून बर्फ वापरला गेला होता. त्यासाठी बॅचींग प्लांटची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणून भूकंपात कोयना धरणाला धोका निर्माण झाला नसल्याची आठवण भेलके यांनी सांगितली. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण होत आलेले असताना अलोरेत तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु करायला हवे असा विचार पुढे आला होता. पहिल्या दोन टप्प्यातील वीजनिर्मितीचे पाणी समुद्राला मिळत होते. हा परिसर समुद्रसपाटीपासून उंच होता. त्या उंचीचा उपयोग करून विद्युतगृह उभारल्यास अधिकची वीज निर्मिती शक्य असल्याचे लक्षात आले होते. हे काम सुरु झाल्यावर सुरुवातीला कोयनेतून नियमित अलोरे भागात खोलवर उतरायचे आणि पुन्हा कोयनेत परत यायचे असा दिनक्रम सुरु होता. यात प्रवासात बराच वेळ जात होता. म्हणून अलोरे वसाहत उभारली गेली. त्यामुळे कामाला अधिक वेळ देता आला. अलोरे वसाहत उभारणीची मूळकथा अशी असल्याचे त्यांनी नमूद केले. अलोरे शाळेने हा उपक्रम इथे केला त्यामुळे आम्हाला सर्वाना एकत्रित येता आलं, जुन्या आठवणींना उजाळा मिळाळा. याबद्दल भेलके यांनी शाळेचे आभार मानले.

दीपक एन. मोडक म्हणाले, वडिलांच्या बदलीमुळे १९६५ साली बालपणी कोयना प्रकल्पाचा भूभाग पहिल्यांदा पाहिला होता. कोयनेच्या शाळेत शिक्षण झाले. एक वर्ष चिपळूणला राहिलो तेव्हा इयत्ता आठवीचे शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. कोयना प्रकल्पाशी अधिकारी-अभियंता म्हणून १३ वर्षे संबंधित राहिलो. पण बालपणीचा काळ वगळता प्रकल्पाच्या वसाहतीत राहायचा योग आला नसल्याचे मोडक यांनी सांगितले. माझा एक कथासंग्रह प्रकाशित झाला असून कोयना प्रकल्पातील आठवणींबद्दल मी लिहितो आहे. यावेळी त्यांनी कोयनेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मोडक यांनी पूर्वी प्रकल्पासाठी केलेल्या ‘महाराष्ट्राचे शक्तीपीठ : कोयना प्रकल्प’ या शासकीय कॉफीटेबल बुकविषयी आवर्जून माहिती दिली.

१९७२ पासून कोयना जलविद्युत प्रकल्पाशी अधिकारी अभियंता म्हणून संबंधित राहिलेले अशोक पी. भावे म्हणाले, आपण कार्यरत झालो तेव्हा अलोरे शाळेचे प्रपोजल शासनाकडे मंजुरीसाठी जाऊन मंजूर होऊन आले होते. शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होतो असे आठवते. शाळेच्या तुकड्या वाढवण्याची शासकीय मंजुरी आणण्यासाठी आमदार आणि शाळेचे चेअरमन डॉ. श्रीधर नातू आणि द. पा. साने (वकील) यांच्या मुंबईतील शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी आपण उपस्थित होतो. अलोरे शाळा सुरु होण्यापूर्वीची स्थितीही भावे यांनी सांगितली. मुलांना दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यायला लागू नये म्हणून शाळा अलोरेत आणण्यात आली. शासनाचा प्रकल्प जिथेजिथे कार्यान्वित होतो तिथे तिथे वसाहत/नगर स्थापन केली जाते. त्याप्रमाणे अलोरे गाव आणि पंचक्रोशी मिळून कार्यरत असलेल्या कोयना प्रकल्पाच्या वसाहतीला ‘वाशिष्ठीनगर’ असे नाव देण्यात आले होते. ही वसाहत अनेक गावांत पसरलेली होती. भावे यांनी शाळेच्या स्मरणिका उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. अलोरे-पेढांबे येथील स्वीचयार्डचे काम आपल्या कार्यकाळात झाल्याचे भावे यांनी नमूद केले. अलोरे विश्वकर्मा चौक ते कोळकेवाडी धरण रस्त्याला ‘पद्मभूषण एन.जी. के. मूर्ती मार्ग’ असे नामकरण माधव चितळे यांच्यानंतरचे अधीक्षक अभियंता व्ही. एम. भिडे यांनी आपल्या कार्यकाळात (१९७२) दिले होते. त्यांनी याची माहिती ‘एन.जी. के. मूर्ती’ यांनाही कळविली होती. कोयना प्रकल्प हे एक कुटुंब होते. सर्वत्र सलोख्याचे वातावरण असल्याची आठवण भावे यांनी सांगितली.

बालाजी एस. निकम म्हणाले, मी १९५८ ते १९७७ पर्यंत सुमारे १९ वर्षे कोयना प्रकल्पात काम केले. कोयनेत प्रत्येक कामात कॉंक्रीट स्ट्रेन्थ डिझाईन केली गेली होती. रबल कॉंक्रीट पद्धत पहिल्यांदा कोयना धरणासाठी वापरले गेले. कॉंक्रीट स्ट्रेन्थ डिझाईन या संशोधान संदर्भातील एक रिसर्च पेपर बी. एस. कापरे, भेलके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघांनी तयार केला होता. मी तेव्हा डेप्युटी इंजिनिअर होतो. हा रिसर्च पेपर देशातील विविध राज्यातील तज्ज्ञ अभियंत्यांसमोर सादर केला गेला. या पेपरला केंद्र शासनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते मेरिट प्रमाणपत्र मिळाल्याची आठवण निकम यांनी सांगितली.

संजय. के. घाणेकर म्हणाले, भेलके साहेबांच्या सुरुवातीच्या कार्यकाळापासून अलोरेशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. कोणत्याही पाटबंधारे प्रकल्पाचे नियोजित लाईफसायकल असते. प्रकल्प सुरु होतो. हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या वाढते. निवासी कॉलनी नांदती होते. सर्व प्रकारचे उपक्रम सुरु होतात. प्रकल्प संपत आला आणि कालांतराने संपला की हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते. ऑफिसेस कमी होतात. पूर्वीचं वातावरण कमी कमी होत जाऊन संपतं. हे सगळे टप्पे अलोरेच्या बाबतीत आपण अनुभवलेले आहेत. १९९९-२००० साली कोयनेचा चौथा टप्पा पूर्ण झाला. आपण चौथ्या टप्प्याच्या विद्युत गृहातील स्थापत्य कामांशी संबंधित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. कोयना प्रकल्पाच्या इतिहासाचा मागील शंभर वर्षांचा पट स्मरणिकेच्या निमित्ताने एका शाळेने पुढाकार घेऊन उलगडावा हे अधिक कौतुकास्पद असल्याचे घाणेकर यांनी आवर्जून नमूद केले.

सुनंदा र. भाटे यांनी स्मृतिशलाका लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून ‘वंदन हे शारदे’ हे गीत स्वागतगीत म्हटले. अलोरेत बदली झाल्यावर सुरुवातीच्या काळात सादर स्वप्न नाटकात केलेल्या भेलेके वहिनी यांनी मुख्य भूमिका केल्याची आठवणही भाटे यांनी सांगितली.

स्मृतिशलाका स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या निमित्ताने गावाच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवे म्हणून हा प्रयत्न केला आहे. ब्रिटीशांच्या काळातील दुष्काळ, त्या पार्श्वभूमीवरील जलसिंचन प्रकल्प आणि मुंबई प्रांताचे अधीक्षक अभियंता एच. एफ. बील यांनी १९०१ पासून केलेले कोयनेतील सर्वेक्षण आदी भविष्यात दंतकथा वाटू शकणाऱ्या परंतु स्मरणिकेत नोंद असलेल्या अनुषंगिक मुद्द्यांचा उहापोह केला.

समारोप प्रसंगी मुख्याध्यापक विभाकर वाचासिध्द यांनी, कोयना प्रकल्पाबाबत पूर्ण जाणकार असलेल्या अधिकारी वर्गाचे एकत्रीकरण व्हावे ही इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले. कार्यरत व्यक्ती हयात असल्याने, कोणत्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवावर मागील पन्नास वर्षांच्या इतिहासाच्या संकलनाची जबाबदारी येत असते. हे संकलन अमृत (७५) आणि सुवर्ण (१००) महोत्सवासाठी पुढील पिढीच्या हातात सोपवायचे असते. या अनुषंगाने झालेलं स्मरणिकेचं काम शाळेने आमच्याकडून करून घेतलं आहे. विद्यार्थ्यांच्या आठवणी जीवंत करण्याची क्षमता या स्मरणिकेत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले. यावेळी उपस्थित मान्यवर निवृत्त अभियंत्यांना अलोरे शाळेची ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका भेट देण्यात आली.

 

धीरज वाटेकर


शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

‘वाशिष्ठीनगर’च्या रंजक'स्मृति उलगडणारी आणि संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मृतिशलाका

‘स्मृतिशलाका’ ही भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मरणिका

अलोरेतील आगवेकर विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी प्रकाशन सोहळ्यात ‘पद्मश्री’ दादा इदाते यांचे प्रतिपादन

चिपळूण (रत्नागिरी) :: तालुक्यातील अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ या स्मरणिकेतून ‘एका गावची कथा’ (गोष्ट) आपल्या समोर येते. ती समजून घेण्यासारखी आहे. आपल्या देशात जवळपास सहा लाख गाव-खेडी आहेत. तितक्या कथा आहेत, पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशा सहा लाख गोष्टीरूप ग्रांथिक साहित्य साकारलं जाऊ शकतं. यातून आपण कोण आहोत? हे आपल्याला समजेल. ‘स्मृतिशलाका’ हा मौल्यवान ग्रंथ झाला आहे. वरवर पाहाता ही वाटचाल एका शिक्षण संस्थेच्या शाळेची आणि गावाची गावाची असं असलं तरी ती वाटचाल भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी आहे. असे प्रतिपादन ‘पद्मश्री’ दादा इदाते यांनी केले. 

अलोरेतील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड, सौ. ऋजुता व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर, कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, स्मरणिकेचे संपादक धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर, निर्माते व शाळा संस्था समन्वयक अरुण केशव माने व शशिकांत शंकर वहाळकर, प्रकाशक व मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत आदी होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘पद्मश्री’ दादा इदाते यांचा सत्कार शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांच्या हस्ते करण्यात आला. अलोरेचा वर्तमानकाळ, भूतकाळासह अमृतकाळाचा वेध घेणारी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका बौद्धिक स्मरण रंजन करणारी असल्याने प्रकाशनार्थ स्मरणिकेत लेख लिहिणारे आजी विद्यार्थी हर्ष मोहिते व सुजल साळवी यांच्या खांद्यावरून पालखीतून नकारात्मकता दूर करण्याचे गुण असलेल्या सोनपाकळ्यांच्या सान्निध्यात स्मरणिकेचे व्यासपीठावर आगमन होऊन प्रकाशन करण्यात आले.

यावेळी इदाते पुढे म्हणाले, एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षीच्या निमित्ताने एक संग्राह्य, महत्वपूर्ण दस्तऐवज केला आहे. स्मरणिका बनवताना खूप तपशिलात विचार केला आहे. शाळेच्या, गावाच्या दृष्टीने ही स्मरणिका अमूल्य अलौकिक ठेवा, संदर्भ ग्रंथ आहे. प्रत्येक काळाची कथा ही अशीच असते. भारतातील खेडं हे एक प्रातिनिधीक रूप आहे. भारतातील गावागावात, गांभीर्य, खोली, विविधता आहे. अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेतून पुढे आलेली 'एका शाळेची गोष्ट' ही अशाच एका भारतीय खेड्याचे रूप आहे. चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरेत येण्यात जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. त्याकाळात आपल्या देशाचा मूलभूत संस्कार देणाऱ्या शिक्षणसंस्था उद्धवस्त झालेल्या होत्या. इंग्रजी बाबू तयार होतील असं शिक्षण आणि तशा संस्थांना पाठबळ मिळत होतं. अशावेळी अलोरेत ही संस्था येणं खूप मोठी उपलब्धी ठरलं. खरंतर आपल्याकडे शिक्षणाच्या माध्यमातून अनावश्यक शिकवलं गेल्याने अडचणी निर्माण झाल्यात. अशी मांडणी इदाते यांनी केली. लॉर्ड मेकालो यांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीने कसे दुष्परिणाम झाले याचेही वर्णन त्यांनी केले. आम्ही कोण आहोत? हे आम्हाला कळेनासे झाले होते. तो काळ आता मागे पडला आहे. शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे आज स्पष्ट दिसते आहे. आपला देश केवळ सदिच्छेने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने बदलत आहे. परिवर्तन होत आहे. हे जाणवत असल्याचे इदाते यांनी नमूद केले. 

*नेतृत्वाच्या आशेने जग भारताकडे पाहातंय – सीए. वसंतराव लाड*
शाळेचे पालक सीए वसंतराव लाड यांनी ‘जगाच्या अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान’ या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले, भारत आज खूप उन्नती करत आहे. जागतिक ब्रिक्स संघटनेची वाढ या विषयातील भारताचे योगदान, जगाला व्हक्सिन पुरवठा करण्याची क्षमता, धोकादायक चीनच्या पार्श्वभूमीवर उर्वरित जग नेतृत्व म्हणून भारताकडे पाहतोय. आज भारत जगातील मोठी पाचवी अर्थसत्ता आहोत. तिसऱ्या मोठया अर्थसत्तेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आजचा भारत जागतिक उत्पादक ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत औषधांचे माहेरघर हैद्राबाद बनले आहे. जागतिक आयटी सेक्टर बेंगलोरला आहे. भारत देश जगासाठी आज आपण अँपल फोन बनवतो आहोत. आजच्या जागतिक बाजारपेठतील अनेक मोठ्या कंपन्या जागतिक उत्पादनासाठी भारतात येत आहेत. यासाठी लागणारं मनुष्यबळ हे कुशल हवे आहे. म्हणून शिक्षण पॉलिसीत बदल होत आहेत. कोरोनानंतर फक्त चीनवर अवलंबून न राहाता पर्याय म्हणून जग भारताकडे पाहाते आहे. भारत झपाट्याने बदलतो आहे. दळणवळणाने वेग घेतलेला आहे. 'उडाण' हा पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कार्यक्रम महत्वाचा आहे. बरेचसे देश कर्जावर अवलंबून असतात. आपल्या देशालाही १९९१च्या काळात आर्थिक अडचणीस्तव वीस टन सोने विकावे लागले होते. अशातून आपण आपल्या देशाला वाचवलं होतं. आज आपले सहा हजार लाख रुपये ठेव स्वरूपात आहेत. म्हणजे आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे. वीजेवर चालणाऱ्या सर्वाधिक गाड्या भारतात तयार होत आहेत. भारतात काश्मिरमध्ये चित्र बदलतंय. पाकिस्तानची आजची स्थिती भयंकर वाईट आहे. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. कलम३७० कुणाला हवं होतं? सामान्य माणसाला प्रगती, रोजगार हवा होता. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताला दुखावणे जगाला परवडणारे नाही. अबुधाबीमध्ये फेब्रुवारीत मोठ्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेत मांडलेले अलोरे प्रशंसनीय आहे. या स्मरणिकेचे महत्त्व खूप आहे. अलोरेची प्रकल्पीय वाटचाल १९६३ ते २०२३ अशी साठ वर्षांची आहे. गजबजण्याच्या पूर्वीच्या अलोरेतील आठवणीना लाड यांनी उजाळा दिला. 

*‘स्मृतिशलाका’ म्हणजे ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या इतिहासात वेगळी वाट दाखवणारा ‘दिवा’ – वाटेकर*
महाराष्ट्राच्या ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासातील एक वेगळी वाट चोखाळणारा दिवा अलोरे शाळेने आज प्रज्ज्वलित केला आहे. या वाटेवरून चालणाऱ्या भविष्यातील पांथस्थाला या शालेय क्षेत्रातील उजेडाचा दिलासा देण्याचं काम ही स्मरणिका करेल. असा विश्वास ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, दुतर्फी वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले अलोरे गाव ‘जावळी’तील इतिहासप्रसिद्ध राजे चंद्रराव मोरे यांच्यापैकी कोणा अज्ञात शाखापुरुषाने वसवलेले गाव आहे. गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्रीशंकर, श्रीगंगादेव मंदिराच्या आवारात चंद्रराव मोरे यांचे स्मृतिमंदिर आहे. कोकणात अशा प्रकारचे स्मृतिमंदिर इतरत्र कोठेही नसावे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी काळात, १९६०नंतर दोन्ही बाजूंनी वाशिष्ठी पात्राची सोबत लाभलेल्या अलोरे पंचक्रोशीस ‘वाशिष्ठीनगर’ नावाने ओळखले जात होते. १९व्या शतकात अलोरेत वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या डॉक्युमेंटेशनला महत्व आहे. घटना, वास्तव आणि सत्य समजून घेऊन आपण ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका संकलन-संपादन केले आहे. आपल्या कार्यसंस्कृतीचं संचित पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षितपणे पोहोचावं हाही हेतू यामागे असल्याचे ते म्हणाले. ही स्मरणिका म्हणजे महाराष्ट्रातील अवघ्या दीड टक्का म्हणजे ३५ हजार ८९९ गावांपैकी खेड्यांसह ५३६ गावात वीजपुरवठा होत होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. अलोरे गावाच्या विकासामागे असलेल्या १८७६-७८च्या दुष्काळापासून कोयना प्रकल्पाच्या आगमनापर्यंतच्या संपर्ण इतिहासाचे वर्णन वाटेकर यांनी केले.

शाळेतील सातव्या इयत्तेची विद्यार्थीनी सृष्टी प्रदीप शिंदे, ज्येष्ठ माजी विद्यार्थी सुरेश पालांडे, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत, प. ए. सोसायटीचे कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अलोरे संदर्भात अप्रतिम काम या स्मरणिकेने केले असल्याची भावना प्रमुख पाहुणे अमित मोरेश्वर आगवेकर यांनी व्यक्त केली. दादा इदाते यांचा परिचय शशिकांत वहाळकर यांनी करुन दिला. 'विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे' हे गीत चंद्रकांत राठोड यांनी सादर केले. सूत्रसंचालन सौ. देवकी लाड यांनी केले. आभार प्रदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचसिद्ध यांनी ‘विचाराच्या निष्ठेला न्याय देण्यासाठी दादा इदाते आल्याचे नमूद करत उपस्थित इतर मान्यवरांचे आभार मानले.


चिपळूण (रत्नागिरी) :: कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पाची वसाहत वसलेल्या अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी ओळख होती. तिच्या दुर्मीळ नोंदीसह पंचक्रोशीतील विविधांगी ऐतिहासिक व दुर्मीळ माहितीचा भरगच्च दस्तऐवज, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या १९१७ ते २०१२पर्यंतच्या सचित्र इतिहासाची मांडणी आणि कोयना प्रकल्पाचा पूर्वेतिहास कथन करणारी एका शाळेची गोष्ट लिहिलेली १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका आज (दि. १० डिसेंबर) 'पद्मश्री' भिकुजी उर्फ दादा इदाते यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.

मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरेची (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) ही सुवर्णमहोत्सवी स्मरणिका शाळेच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ४ ते ६ वाजता प्रकाशित होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड आणि कुटुंबीय, सौ. व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ‘एअर मार्शल’ हेमंत भागवत (निवृत्त), कार्याध्यक्ष मकरंद जोशी, सेक्रेटरी डॉ. संजय मोने, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांची विशेष उपस्थिती राहाणार आहे.

विविध मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली ही स्मरणिका महाराष्ट्रातील ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे. स्मरणिकेचे संपादन शाळेच्या दहावी १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी, लेखक-पत्रकार धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी केले आहे. निर्मिती ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण केशव माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर यांनी केली आहे.

स्वर्गीय मो. आ. आगवेकर हे या शाळेचे, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापक पदावर सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व होते. २०१८च्या मो. आ. आगवेकर नामकरण सोहोळ्यात शाळेने ‘श्रद्धा सुमन’ स्मरणिका प्रकाशित केली होती. तेव्हा ‘स्मृतिशलाका’ सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे बीज रोवले गेले होते. जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांना अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते आहे. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या या डॉक्युमेंटेशनला विशेष महत्व आहे. १९५० ते १९९९ हा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अलोरे येथे वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा कालखंड राहिला आहे. या कालखंडातील इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. नामकरण समारंभानंतर शाळेने विविध बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने अलोरे पंचक्रोशीतील चाळ संस्कृतीतील आठवणींचे उत्खनन करीत ‘स्मृतिरंजन’ करणाऱ्या ऐतिहासिक साधनांच्या लेखन-संकलनावर भर दिला होता. जितके संकल्पित रेकॉर्ड मिळवून तपासून ही स्मरणिका करायची ठरलं होतं त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्मरणिकेत अलोरे शाळेच्या उभारणीत सहभाग असलेले आणि पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या’ स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३)ने सन्मानित शास्त्रज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा शुभसंदेश, शाळेचे सुवर्णमहोत्सवी गीत, शाळेचे मागील पन्नास वर्षातील दहावी-बारावीचे प्रथम यशाचे मानकरी, यशवंत व्यासपीठ कराड वक्तृत्व स्पर्धा, सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार विजेते आदींच्या नोंदी पाहायला मिळतील. ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये, निवृत्त एअरमार्शल आणि परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हेमंतजी भागवत यांचे ‘शिक्षण’ या विषयावरील चिंतनशील लेख यात आहेत. शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांनी अत्यंत मनमोकळ्या शब्दात दुबईतील आपल्या कार्यक्षेत्रासह अलोरे गावातील प्रेरक आठवणी लिहिल्यात. ‘गुरुवर्य’ मा. ना. कुलकर्णी यांचे स्मरण, शाळेचे नूतन वास्तू उद्घाटन, शाळेचा रौप्य महोत्सव, शाळेची आठवणीतील गॅदरिंग, विविध कार्यक्रम-उपक्रम, पारितोषिक वितरण समारंभ, प्रशस्तिपत्रके, दहावीच्या विविध बॅच, शाळेची बदलती लेटरहेड्स, शाळेचे वाचनालय, वृत्तप्रसिद्धी, सुवर्णमहोत्सवी छायांकित दर्शन आदी ‘सचित्रस्मृति’रंजक ठेवा यात आहे. शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या पहिल्या अध्यक्षांसह अभियंता मनोगते, पालक मनोगते, ग्रामस्थ मनोगते, मुख्याध्यापक मनोगते, आजी-माजी शिक्षक-कर्मचारी मनोगते, ५४ आजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते व कविता, ४९ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते आणि अलोरे शाळेचा कोयना प्रकल्पीय पूर्वेतिहास कथन करणारी ‘एका शाळेची गोष्ट’ यात वाचायला मिळेल. स्मरणिकेच्या दस्तऐवजीकरणात अलोरे गावाचा १८७०चा नकाशा, ऐतिहासिक घराणे ‘चंद्रराव’ मोरे यांची कोकणातील एकमेव मंदिर’स्मृति’ सांभाळणाऱ्या अलोरे गावची पूर्वपीठिका, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा मागील शंभर वर्षांचा सचित्र ‘शोधक’ आढावा, परशुराम सहकारी साखर कारख्यान्यासह मंदार एज्युकेशन संकुल ‘स्मृति’दर्शन, आठवणीतील अलोरे-कोळकेवाडी पंचक्रोशी, एस.टी. प्रवासाची तिकिटे-पासेस, नाट्यसंस्कृती, चलतचित्र विभागाचे डोअर पासेस, प्रकल्प रुग्णालयासह पोस्ट ऑफिसच्या नोंदी, गणेशोत्सवाच्या मागील पन्नास वर्षांच्या अनुषंगिक आठवणी, विविध दुकानदारांची दुर्मीळ बीले संग्रहित केली आहेत. यावरून या स्मरणिकेची व्याप्ती ध्यानात यावी. 

अंकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रे ही शाळेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि सातारा येथील प्रसिद्ध चित्रकार संजय भागवत यांची आहेत. अंकाची मांडणी सानिया डीटीपीच्या मुखत्यार मुल्लाजी यांनी तर छपाई कोल्हापूर येथील मिरर प्रिंटींग प्रेस यांनी केलेली आहे. अलोरे शाळेचे एक अर्धशतक संपले आहे. दुसरे सुरु झाले आहे. दोन्ही अर्धशतकात खूप मोठी तफावत असणार आहे. म्हणून अशा प्रकारचे दस्तऐवज करणे आवश्यक ठरते. शाळेचा विद्यार्थी वर्ग जगभर पसरला आहे. त्याला जोडण्याचा शाळेने सुरु केलेला प्रयत्न पुढील काळात अव्याहतपणे चालू ठेवण्यात ही स्मरणिका योगदान देईल, असे शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे प्रकाशक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध यांनी म्हटले आहे.

‘स्मृतिशालाका’ स्मरणिकेचे स्वागतमूल्य एक हजार रुपये आहे. स्मरणिका हवी असल्यास कृपया मो. ९४२१२२७८५२, ९४२१२२७७१३ येथे संपर्क साधावा.

धीरज वाटेकर

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

स्मरण अपरान्ताच्या शोधयात्रीचे!

प्रसिद्ध कोकण इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अनंत धोंडू ऊर्फ अण्णा शिरगावकर यांना आपल्यातून जाऊन आज (११ ऑक्टोबर) एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने अपरान्ताच्या या शोधयात्रीचे केलेले हे पुण्यस्मरण!

आपल्या मृत्यच्या आदल्या दिवशी दुपारी अण्णांनी आमच्याशी बोलताना, कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकावरून नजर फिरवत काही मोजके बदल सुचवले आणि आम्हाला, 'आता परत दाखवू नका. छापायला द्या' अशी सूचना केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भावी लेखन संकल्पाबाबत आमच्याशी दोनेक तास चर्चाही केली होती. आपल्या बदललेल्या मालघरच्या पत्त्यासह आमचे नवीन व्हिजिटिंग कार्ड बनवायला द्या, असं ठामपणे सांगणाऱ्या अण्णांनी अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकाचे काम पूर्ण करत असताना अखेरचा श्वास घेणं आमच्यासाठी सर्वाधिक धक्कादायक ठरलं.

इतिहासात अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोकण इतिहास संशोधकांना फारशी उपलब्ध होऊ न शकलेली विविध साधने नव्याने उपलब्ध करून देण्यात अण्णांचे योगदान ऋषितुल्य राहिले. आज संगणक, इंटरनेट, मोबाईल, फोटोग्राफी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, अनुवाद यामुळे इतिहास संशोधनाचे क्षितिज विस्तारले आहे. इतिहास हा मानवाच्या आदिपासून अंतापर्यंत सोबत करणारा विषय आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीने इतिहासाचा मर्यादित अर्थ 'असे घडले' असा आहे. मात्र अण्णांसारख्या संशोधकाला 'असे घडले' यावर अवलंबून चालत नव्हते. एखादी घटना घडती की त्यांच्या मनात जणू का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे सहा ''कार प्रश्न उभे राहायचे. कोकण संदर्भात अण्णांनी या प्रश्नांचा जीवनभर शोध घेतला. त्याकाळी कोकण इतिहासातील घटनांचा अभ्यास करणे सोपे नव्हते. अत्यंत गुंतागुंतीचे, संदिग्ध आणि अस्पष्ट होते. पण अण्णा कधीही मागे हटले नाहीत. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते शरीराने वर्तमानात पण मनाने भूतकाळात वावरत पुराव्यांची संगती जोडत राहिलेले आम्ही पाहिलेत.

जगाच्या पाठीवर गणिताच्या उत्तरात बदल होणार नसतो, इतिहासाचे तसे नसते. मानवी कृती आणि मनोव्यापार यादृष्टीने आपणास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेळ्या पद्धतीने इतिहास घडल्याचे दिसते. कित्येकदा चमत्कार वाटावी अशी कृती एखादी व्यक्ती करून जाते, अण्णांच्या बाबतीत असेच घडल्याचे दिसते. कोणतेही ऐतिहासिक संशोधन शंभर टक्के मान्य होणे दुर्मीळ असताना अण्णांच्या कामाता राजमान्यता मिळाली. उपलब्ध पुराव्याला सदैव चिकटून राहित्याने हे शक्य झाले. कोकण इतिहासाच्या प्रांतात एकांड्या शिलेदाराची भूमिका घेऊन अण्णा कधीही वावरले नाहीत. त्यांनी या क्षेत्रातीत असंख्य नामवंत इतिहास संशोधकांशी संपर्क साधला. वेळोवेळी त्यांचे विचार समजून घेतले. उपलब्ध माहिती जुन्या पुराव्यांच्या साहाय्याने नव्या दृष्टिकोनांचा स्वीकार करून मांडली. यासाठी संशोधन विषयाच्या मर्यादा आणि व्यक्तिगत मर्यादा यांचे भान ठेवून विश्वसनीय तथ्यांचे आकलन आणि संकलन केले. म्हणूनच अण्णा कोकण इतिहास संशोधनावर आपला ठसा उमटवू शकले.

आजकाल आपल्याकडे इतिहासाविषयीचे आकर्षण वाढते आहे. ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस, महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ, कोकण इतिहास परिषद अशा संस्थांमधून वाचल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची संख्या वाढते आहे. याबाबत अण्णा समाधान व्यक्त करायचे. 'जगभर दृष्टी फिरवीत असताना स्थानिक इतिहासाकडे दुर्लक्ष व्हायला नको आहे. प्रत्येक गावाचा तालुक्याचा, जिल्हय़ाचा, हेरिटेज स्थळांचा इतिहास लिहिला जायला हवा आहे. कागदपत्रांची जपणूक, उत्तम दर्जाची संग्रहालये आणि त्यांची जोपासना याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे'. असे ते सातत्याने सूचीत करायचे. सद्याच्या काळात आपल्याकडे 'इतिहास' या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले असताना अण्णांची सतत आठवण होणे क्रमप्राप्त आहे. इतिहासाचा ध्यास घेऊन जीवन व्यतीत केलेल्या अण्णांचे प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू या!

धीरज वाटेकर

 

स्मृतिदिन वृत्त 


अण्णा शिरगावकर स्मृतीदिनी मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळा

चिपळूण :: कोकण इतिहासाचे नामवंत संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती निराधार फौन्डेशनमध्ये ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम तर अण्णांचे दाभोळोत्तर वास्तव्य राहिलेल्या शिरगाव येथील कन्या सौ. नूतन रविंद्र लब्धे यांच्या निवासस्थानी प्रथम स्मृतिदिन संपन्न झाला. यावेळी अण्णांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या पत्नी कै. सौ. नंदिनी अनंत शिरगावकर यांच्यासह अण्णांवर तयार करण्यात आलेली स्मरणयात्राही स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.



अण्णांच्या स्मृति जागवताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष गंगाराम इदाते म्हणाले, ‘गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यामंदिर कोळथरे उभारणाऱ्या स्वर्गीय कृष्णामामा महाजन यांच्या स्मृति जीवंत ठेवण्यासाठी कोळथरे येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांप्रमाणे अण्णांचे काम सतत सर्वांसमोर असावे यासाठी ‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. कोळी आणि गरजू-गरीब विद्यार्थांना शिक्षण घेता यावे यासाठी अण्णांनी केलेल्या शैक्षणिक कामाचा आढावा दादा खातू यांनी मांडला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत अण्णांचा सहभाग राहिल्याची आठवणही यावेळी सांगण्यात आली. अण्णांनी गरजू मुलींसाठी वसतिगृहे काढली होती. खेर्डी वाचनालय खेर्डीचे प्रतिनिधी आणि आंबडस शाळेचे माजी मुख्याध्यापक निर्मळकर, स्वर्गीय अण्णांची पुस्तके वाचनालयाला भेट मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रविंद्र लब्धे यांनी अण्णांच्या जीवनपरिचयाचे वाचन केले. यावेळी ‘स्मरणयात्रा’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर, विलास महाडिक, समीर कोवळे, महम्मद झारे, कैसर देसाई, आरती फाउंडेशनच्या अनिता नारकर, प्रियांका कारेकर, या कार्यक्रमाचे आयोजन सौ. नूतन रविंद्र लब्धे यांनी तर संयोजन आणि सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रकाशबापू काणे यांनी केले. आभार केवल लब्धे यांनी मानले.

 

मालघर येथे ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम संपन्न


स्वर्गीय अण्णांचे मृत्युपूर्व काही दिवसांचे वास्तव्य राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती सेवा फाऊंडेशनच्या दुसऱ्या शाखेत स्मृतिगंध कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेसमोर प्रसिद्ध व्यावसायिक आणि माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांनी दीपप्रज्ज्वलन केले. लेखक आणि अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाटेकर यांनी अण्णांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेतला. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं ऑडीट करायला हवे आहे. मला, तुमच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचंय. असं ऑडीट करायला मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही ते वेळीच करा. कारण या ऑडीट दरम्यान काही त्रुटी लक्षात आल्यास त्या पूर्ण करण्यास अवधी मिळायला हवा.’ असं आपल्याला एकदा अण्णांनी सांगितल्याची हृद्य आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांनी सांगितली. श्रीकांत बापट यांनी बोलताना, आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसात मालघरला येऊन अण्णांनी जणू ‘वानप्रस्थाश्रम’ जगल्याची भावना व्यक्त केली. दादा कारेकर यांनी नाणीसंग्रह करण्याच्या दृष्टीने अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनाची आठवण सांगितली. यावेळी ‘दलितमित्र’ शिलभद्र जाधव, विलास महाडिक, अलताफभाई, सचीन शेट्ये, गणेश भालेकर, प्रशांत साठे, नामजोशी, सुरेश आवटे आदी अण्णांचा परिसस्पर्श लाभलेली व्यक्तीमत्त्वे उपस्थित होती. प्रियांका कारेकर यांनी सूत्रसंचालन तर आरती फाउंडेशनच्या संस्थापक अनिता नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


प्रसिद्ध कोकण इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांचेविषयी आम्ही लिहिलेले इतर ब्लॉगलेख वाचण्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा.   

अखेर तेदिवस संपले! (मृत्युलेख)

https://dheerajwatekar.blogspot.com/2022/10/blog-post.html

 

अण्णा, नव्वदीपार... (साप्ताहिक लोकप्रभा)

https://dheerajwatekar.blogspot.com/2021/08/blog-post_26.html

 

अण्णा, ‘शतायुषीव्हा!

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/09/blog-post.html

 

अण्णा शिरगावकर यांच्या शेवचिवडाआणि व्रतस्थविषयी...!

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

 

अण्णांचे छांदोग्योपनिषद

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

 

धन्यवाद

धीरज वाटेकर

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...