शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

स्मरण अपरान्ताच्या शोधयात्रीचे!

प्रसिद्ध कोकण इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अनंत धोंडू ऊर्फ अण्णा शिरगावकर यांना आपल्यातून जाऊन आज (११ ऑक्टोबर) एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने अपरान्ताच्या या शोधयात्रीचे केलेले हे पुण्यस्मरण!

आपल्या मृत्यच्या आदल्या दिवशी दुपारी अण्णांनी आमच्याशी बोलताना, कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकावरून नजर फिरवत काही मोजके बदल सुचवले आणि आम्हाला, 'आता परत दाखवू नका. छापायला द्या' अशी सूचना केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भावी लेखन संकल्पाबाबत आमच्याशी दोनेक तास चर्चाही केली होती. आपल्या बदललेल्या मालघरच्या पत्त्यासह आमचे नवीन व्हिजिटिंग कार्ड बनवायला द्या, असं ठामपणे सांगणाऱ्या अण्णांनी अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकाचे काम पूर्ण करत असताना अखेरचा श्वास घेणं आमच्यासाठी सर्वाधिक धक्कादायक ठरलं.

इतिहासात अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोकण इतिहास संशोधकांना फारशी उपलब्ध होऊ न शकलेली विविध साधने नव्याने उपलब्ध करून देण्यात अण्णांचे योगदान ऋषितुल्य राहिले. आज संगणक, इंटरनेट, मोबाईल, फोटोग्राफी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, अनुवाद यामुळे इतिहास संशोधनाचे क्षितिज विस्तारले आहे. इतिहास हा मानवाच्या आदिपासून अंतापर्यंत सोबत करणारा विषय आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीने इतिहासाचा मर्यादित अर्थ 'असे घडले' असा आहे. मात्र अण्णांसारख्या संशोधकाला 'असे घडले' यावर अवलंबून चालत नव्हते. एखादी घटना घडती की त्यांच्या मनात जणू का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे सहा ''कार प्रश्न उभे राहायचे. कोकण संदर्भात अण्णांनी या प्रश्नांचा जीवनभर शोध घेतला. त्याकाळी कोकण इतिहासातील घटनांचा अभ्यास करणे सोपे नव्हते. अत्यंत गुंतागुंतीचे, संदिग्ध आणि अस्पष्ट होते. पण अण्णा कधीही मागे हटले नाहीत. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते शरीराने वर्तमानात पण मनाने भूतकाळात वावरत पुराव्यांची संगती जोडत राहिलेले आम्ही पाहिलेत.

जगाच्या पाठीवर गणिताच्या उत्तरात बदल होणार नसतो, इतिहासाचे तसे नसते. मानवी कृती आणि मनोव्यापार यादृष्टीने आपणास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेळ्या पद्धतीने इतिहास घडल्याचे दिसते. कित्येकदा चमत्कार वाटावी अशी कृती एखादी व्यक्ती करून जाते, अण्णांच्या बाबतीत असेच घडल्याचे दिसते. कोणतेही ऐतिहासिक संशोधन शंभर टक्के मान्य होणे दुर्मीळ असताना अण्णांच्या कामाता राजमान्यता मिळाली. उपलब्ध पुराव्याला सदैव चिकटून राहित्याने हे शक्य झाले. कोकण इतिहासाच्या प्रांतात एकांड्या शिलेदाराची भूमिका घेऊन अण्णा कधीही वावरले नाहीत. त्यांनी या क्षेत्रातीत असंख्य नामवंत इतिहास संशोधकांशी संपर्क साधला. वेळोवेळी त्यांचे विचार समजून घेतले. उपलब्ध माहिती जुन्या पुराव्यांच्या साहाय्याने नव्या दृष्टिकोनांचा स्वीकार करून मांडली. यासाठी संशोधन विषयाच्या मर्यादा आणि व्यक्तिगत मर्यादा यांचे भान ठेवून विश्वसनीय तथ्यांचे आकलन आणि संकलन केले. म्हणूनच अण्णा कोकण इतिहास संशोधनावर आपला ठसा उमटवू शकले.

आजकाल आपल्याकडे इतिहासाविषयीचे आकर्षण वाढते आहे. ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस, महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ, कोकण इतिहास परिषद अशा संस्थांमधून वाचल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची संख्या वाढते आहे. याबाबत अण्णा समाधान व्यक्त करायचे. 'जगभर दृष्टी फिरवीत असताना स्थानिक इतिहासाकडे दुर्लक्ष व्हायला नको आहे. प्रत्येक गावाचा तालुक्याचा, जिल्हय़ाचा, हेरिटेज स्थळांचा इतिहास लिहिला जायला हवा आहे. कागदपत्रांची जपणूक, उत्तम दर्जाची संग्रहालये आणि त्यांची जोपासना याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे'. असे ते सातत्याने सूचीत करायचे. सद्याच्या काळात आपल्याकडे 'इतिहास' या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले असताना अण्णांची सतत आठवण होणे क्रमप्राप्त आहे. इतिहासाचा ध्यास घेऊन जीवन व्यतीत केलेल्या अण्णांचे प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू या!

धीरज वाटेकर

 

स्मृतिदिन वृत्त 


अण्णा शिरगावकर स्मृतीदिनी मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळा

चिपळूण :: कोकण इतिहासाचे नामवंत संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती निराधार फौन्डेशनमध्ये ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम तर अण्णांचे दाभोळोत्तर वास्तव्य राहिलेल्या शिरगाव येथील कन्या सौ. नूतन रविंद्र लब्धे यांच्या निवासस्थानी प्रथम स्मृतिदिन संपन्न झाला. यावेळी अण्णांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या पत्नी कै. सौ. नंदिनी अनंत शिरगावकर यांच्यासह अण्णांवर तयार करण्यात आलेली स्मरणयात्राही स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.



अण्णांच्या स्मृति जागवताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष गंगाराम इदाते म्हणाले, ‘गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यामंदिर कोळथरे उभारणाऱ्या स्वर्गीय कृष्णामामा महाजन यांच्या स्मृति जीवंत ठेवण्यासाठी कोळथरे येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांप्रमाणे अण्णांचे काम सतत सर्वांसमोर असावे यासाठी ‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. कोळी आणि गरजू-गरीब विद्यार्थांना शिक्षण घेता यावे यासाठी अण्णांनी केलेल्या शैक्षणिक कामाचा आढावा दादा खातू यांनी मांडला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत अण्णांचा सहभाग राहिल्याची आठवणही यावेळी सांगण्यात आली. अण्णांनी गरजू मुलींसाठी वसतिगृहे काढली होती. खेर्डी वाचनालय खेर्डीचे प्रतिनिधी आणि आंबडस शाळेचे माजी मुख्याध्यापक निर्मळकर, स्वर्गीय अण्णांची पुस्तके वाचनालयाला भेट मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रविंद्र लब्धे यांनी अण्णांच्या जीवनपरिचयाचे वाचन केले. यावेळी ‘स्मरणयात्रा’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर, विलास महाडिक, समीर कोवळे, महम्मद झारे, कैसर देसाई, आरती फाउंडेशनच्या अनिता नारकर, प्रियांका कारेकर, या कार्यक्रमाचे आयोजन सौ. नूतन रविंद्र लब्धे यांनी तर संयोजन आणि सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रकाशबापू काणे यांनी केले. आभार केवल लब्धे यांनी मानले.

 

मालघर येथे ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम संपन्न


स्वर्गीय अण्णांचे मृत्युपूर्व काही दिवसांचे वास्तव्य राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती सेवा फाऊंडेशनच्या दुसऱ्या शाखेत स्मृतिगंध कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेसमोर प्रसिद्ध व्यावसायिक आणि माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांनी दीपप्रज्ज्वलन केले. लेखक आणि अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाटेकर यांनी अण्णांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेतला. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं ऑडीट करायला हवे आहे. मला, तुमच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचंय. असं ऑडीट करायला मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही ते वेळीच करा. कारण या ऑडीट दरम्यान काही त्रुटी लक्षात आल्यास त्या पूर्ण करण्यास अवधी मिळायला हवा.’ असं आपल्याला एकदा अण्णांनी सांगितल्याची हृद्य आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांनी सांगितली. श्रीकांत बापट यांनी बोलताना, आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसात मालघरला येऊन अण्णांनी जणू ‘वानप्रस्थाश्रम’ जगल्याची भावना व्यक्त केली. दादा कारेकर यांनी नाणीसंग्रह करण्याच्या दृष्टीने अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनाची आठवण सांगितली. यावेळी ‘दलितमित्र’ शिलभद्र जाधव, विलास महाडिक, अलताफभाई, सचीन शेट्ये, गणेश भालेकर, प्रशांत साठे, नामजोशी, सुरेश आवटे आदी अण्णांचा परिसस्पर्श लाभलेली व्यक्तीमत्त्वे उपस्थित होती. प्रियांका कारेकर यांनी सूत्रसंचालन तर आरती फाउंडेशनच्या संस्थापक अनिता नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


प्रसिद्ध कोकण इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांचेविषयी आम्ही लिहिलेले इतर ब्लॉगलेख वाचण्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा.   

अखेर तेदिवस संपले! (मृत्युलेख)

https://dheerajwatekar.blogspot.com/2022/10/blog-post.html

 

अण्णा, नव्वदीपार... (साप्ताहिक लोकप्रभा)

https://dheerajwatekar.blogspot.com/2021/08/blog-post_26.html

 

अण्णा, ‘शतायुषीव्हा!

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/09/blog-post.html

 

अण्णा शिरगावकर यांच्या शेवचिवडाआणि व्रतस्थविषयी...!

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

 

अण्णांचे छांदोग्योपनिषद

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

 

धन्यवाद

धीरज वाटेकर

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

तेरड्याची ज्येष्ठा गौरी आली

निसर्गसुंदर कोकणाने गणपती आणि त्यांची आई गौराई यांना जणू निसर्गदेवता मानले आहे. कोकणी आसमंतात तेरडा फुलायला लागला की गौरी-गणपतीचे दिवस जवळ आल्याचे मानले जाते. गौरीचं वास्तव्य पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असतं. आजच्या (दि. २१) गौरी आगमनदिनी दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया व कुमारिकांनी येथील आतगाव रोडवरील पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीची गौरी स्वरूप आवाहन पूजा केली आणि गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढली.

कोकणातील अनेक गावात गौरी आगमनासाठी डोक्यावरील रोवळीत किंवा सुपात  हळद, तेरडा, आघाडा यांचे रोपटे घेण्याची प्रथा आहे. तेरडा वनस्पतीची गौराई कोकणात बघायला मिळते. केळशी पंचक्रोशीत तेरडा रोपाला गौरीचे प्रतिक मानून आवाहन करण्यात येते. ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त आज सायंकाळी महिलांनी तेरड्याची रोपे मुळासकट काढून वाजत गाजत मिरवणुकीने आणली. तेरडा वनस्पतीची ही मुळे ही लक्ष्मीची पाउले मानली जातात. पूजनासाठी तेरड्यापासून सुंदर गौराई साकारण्यात येते. तेरड्याचा वापर श्रीगणेशाच्या माटोळीतही केला जातो. देवी गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून तिला ज्येष्ठागौरीही संबोधले जाते. गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला अतिशय आकर्षक रुपात सजविले जाते. आज सायंकाळी कोकणातील तेरडा रोपट्यांची, विड्याची विधिवत पूजा व गौरी देवतेस आवाहन करण्यात आले. देवी गौराई आपल्या लाडक्या लेकाला बाप्पाला भेटावयास अवतरली आहे. या श्रद्धेने सर्वत्र गौरीपूजनाची तयारी होत असते.

परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष पूजा-साहित्य आणावे लागत नाही. रानावनात आढळणारी फूलपत्री गौराईस प्रिय आहे. कोकणात माळरानी, डोंगर उतारावर, शेताच्या बांधावर जांभळी, फिक्कट गुलाबी, तांबड्या, पांढऱ्या रंगांची ही फुले सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. तेरड्याच्या फुलांचं आयुष्य पाच ते सात दिवस असते. सह्याद्रीतील काही भागात यंदा तेरडा जुलै-ऑगस्टमध्येच बहरला होता. हवामानातील बदल याला कारणीभूत असावा.

फेसबुक लाईव्ह लिंक :: (१) https://m.facebook.com/story.php?story_fbid=635692405317530&id=100002456712976&mibextid=Nif5oz
(२) https://m.facebook.com/story.php?story_fbid=657021372869388&id=100002456712976&mibextid=Nif5oz

धीरज वाटेकर

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

'प्रदक्षिणा संकल्पेश' आरती संग्रह प्रकाशन



केळशी (दापोली) :: येथील आतगाव वरची भाट भागातील वाटेकर परिवाराच्या वतीने पारंपरिक गणेशोत्सवाच्या 'अंगारक योग' पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन, भजनातून समाज प्रबोधनाची चळवळ राबविणारे आणि आपल्या भजन मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशासमोर भजन सेवा सादर करणाऱ्या 'बुवा' जहांगीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अंगावर योगावर स्थापन झालेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशोत्सवाचे हे एकविसावे वर्ष आहे.



या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केळशीच्या विकासाचा ध्यास घेतलेले उपसरपंच केदार पतंगे, गोसावी ग्रामस्थ मंडळ आणि गोसावी भजन मंडळाचे अध्यक्ष विलास कुवेसकर, अरविंद जाधव, 'प्रदक्षिणा संकल्पेश' मूर्तीकार शेखर केळसकर, 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरत्यांचे लेखक मच्छिन्द्रनाथ तुकाराम वाटेकर, गोसावी महिला मंडळाच्या प्रतिनिधी सौ. शुभांगी बाईत, श्रीमती विजया बन्सीधर वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 



तांबड्या जास्वंद फुलाची प्रभावळ पाठीशी घेऊन स्थानापन्न झालेली मस्तकापासून लांबसडक निमुळती पायापर्यंत रूळणारी सरळ सोंड, तिच्या मुख अग्रावर पांढरा शुभ्र एकवीस कळ्यांचा दाणेदार मोदक धरलेल्या अवस्थेतील प्रदक्षिणा संकल्पेशगणेशाची शाडूच्या मातीतील मूर्ती पाहाता क्षणी नजरेत भरावी अशी आहे. त्याच्या लंब उदरावर नाभी कमळातून नुकताच जन्म घेतल्यासारखे भासवणारी नागपाशकटी, मागच्या डाव्या हातात आपलाच अर्धा दात, मागच्या उजव्या हातात परशू, नेहमीप्रमाणेच पुढच्या उजव्या हाताने वरदान प्रदान करणारा वरदहस्तआणि पुढच्या डाव्यात हातात इक्षुदंड (गणेशवेल) गुंडाळलेल्या या बाप्पाच्या साथीला मूषकराज विराजित आहेत. बाप्पाचे मस्तकावरचे सुपाएवढे कान म्हणजे जणू भक्तांचे गाऱ्हाणे मनापासून ऐकून घेण्याची खात्री पटविणारे, दीड दिवसीय पूजेसाठी दोन्ही पाय जवळ घेऊन स्थानापन्न झालेल्या प्रदक्षिणा संकल्पेशाच्या चेहऱ्यावरील कोवळे नाजूक हास्य समाधान देणारे आहे.

 



पूर्वी पार्थिव श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी घरोघरी लागणार्‍या आवश्यक वस्तूंमध्ये आरतीचे एखादे पुस्तक हमखास असायचे. या पुस्तकांचे जतनही व्हायचे. सध्या ऑनलाईन आरत्या उपलब्ध झाल्याने अशा छापील पुस्तिकांची गरज कमी झाली आहे. अर्थात आरत्या सगळ्यांनाच तोंडपाठ नसल्यामुळे पुस्तिका आवश्यकही आहेत. श्रीगणेशाच्या नियमित आरत्यांसह डॉक्युमेंटेशन म्हणूनही प्रदक्षिणा संकल्पेशआरती संग्रहाकडे पाहण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 



स्वर्गीय निसर्गसौंदर्य आणि परंपरा जपलेल्या ग्रामीण कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी येथील पर्यटन वैशिष्ट्ये यात अंतर्भूत आहेत. गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या नियमित आरत्यांसह, भाषाशास्त्राचे अभ्यासक मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी लिहिलेल्या प्रदक्षिणा संकल्पेशया अंगारक गणपतीचे स्वरूप, सौंदर्य, वैशिष्ट्य विशद करणाऱ्या आरत्या यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रदक्षिणा संकल्पेशाच्या मागील एकविस वर्षांच्या उत्सवातील चित्रमय रंजकआठवणी या आरती संग्रहात सामावलेल्या आहेत.

 



निरूपणासाठी प्रसिद्ध असलेले येथील कै. तुकाराम (बुवा) सुभाननाथ वाटेकर यांनी सांगितलेल्या 'घरात गणपती आणायचा असेल तर तो अंगारक योगावर आणायचा आणि घरीच विसर्जन करायचे तर ते बुधवारच्या गणेश चतुर्थीचे' या संकेतानुसार हा अंगारक योग प्रदक्षिणा संकल्पेश गणेशोत्सव सुरू आहे.

 


यावेळी जहांगिर शेख, केदार पतंगे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आठवणी सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वाटेकर परिवाराच्या वतीने गोसावी भजन मंडळाच्या सर्व प्रतिनिधींना चिपळूणच्या मनोदय एंटरप्रायझेसचे दीपक वाटेकर यांच्या हस्ते लेंगा-कुर्ता-टोपी पारंपरिक पेहेराव भेट देण्यात आला. यावेळी दापोलीतील पायल मोटर्सचे प्रविण वाटेकर, राजेश भिसे, नरेश भिसे, संतोष मांडवकर, प्रदीप शिर्के, संतोष पाटील, सौ. उर्मिला पाटील, सौ. वैशाली जाधव, सौ. रिना भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक धीरज वाटेकर यांनी केले.

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

नवभारताचा निर्माता :: भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक असाधारण दूरदर्शी अभियंता होते. विसाव्या शतकात, ते त्यांच्या हयातीत जणू आख्यायिका बनलेले अतुलनीय अभियांत्रिकी कामगिरीने भरलेले जीवन जगले. औद्योगिक विकासाच्या भव्य दृष्टीने त्यांना अद्वितीय व्यक्ती बनवले. पिण्याचे सुरक्षित पाणी आणि योग्य सिंचनासाठी जलस्रोतांचा प्रभावी वापर हा त्यांच्या जीवनाचा ध्यास राहिला. तंत्रशुद्ध आर्थिक व्यवहार्यता, गुंतवणुकीवर पुरेसा परतावा आणि सामाजिक उद्देशाची पूर्तता होण्याची खात्री असल्याशिवाय त्यांनी मोठे अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेतले नाहीत.

विश्वेश्वरय्या हे गणितज्ज्ञ आणि इंग्रजीचे उत्तम अभ्यासक होते. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. आज हा दिवस देशात सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. विश्वेश्वरय्या यांनी भारतात अभियांत्रिकीचा पाया घातला. जागतिक कीर्तीचे अभियंता आणि नवभारताचे एक निर्माते म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे त्यांच्या पूर्वजांचे गाव. दक्षिण भारतात आपल्या मूळ गावाच्या नावाचा स्वत:च्या नावाच्या आधी उल्लेख करण्याची पद्धत आहे. त्यानुसार ‘मोक्षगुंडम’ गावाचे नाव विश्वेश्वरय्या यांच्या नावाच्या आधी आलेले आहे. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होते. पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये (लग्न-मुंजी, सत्यनारायण वगैरे) यांमधून मिळणार्‍या दक्षिणेतून त्यांचा घरखर्च कसाबसा चालवत. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी पैसा नव्हता. तेव्हा त्यांनी विद्यार्थिदशेत शिकवण्या करून शाळेच्या फीसाठी कष्टाने पैसा जमा केला होता. १८८०मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून प्रथम क्रमांकासह बीए केले. यामुळे पुणे कॉलेज ऑफ सायन्समध्ये (भारतातील सर्वात जुने आजचे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे) त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. येथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत पूर्ण करून नोव्हेंबर १८८३ मध्ये ते एल.सी.ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजीनिअरिंग) आजची बी. ई. सिव्हिल पदवी वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना बर्कले पदकाने सन्मानित करण्यात आले. मार्च १८८४मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारमधून त्यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता म्हणून आपल्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्दीची सुरुवात केली होती.

नद्यांच्या जलस्रोतांचा योग्य उपयोग करणे ही त्यांची आवड होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सेवेत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील खानदेशातील धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण व नियोजन केले. त्याची अंमलबजावणी केली. पाणीपुरवठा योजनांची त्यांची कल्पना आणि यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता ओळखून सरकारने त्यांना सिंध प्रांतातील सुक्कूर शहराच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेचे स्वतंत्रपणे नियोजन, आराखडा आणि अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले होते. तुलनेने हे कठीण काम होते. त्यांनी तेही यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना सुरत पाणीपुरवठा योजना पुरविण्याचे काम देण्यात आले. यातून एक प्रतिभावान आणि सक्षम जलसंपदा अभियंता म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. हळूहळू त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बेळगाव, धारवार, विजापूर, अहमदाबाद, पुणे आणि भारताबाहेरील एडन बंदरासाठी ब्रिटिश लष्करी वसाहत आदी ठिकाणी काम केले. पुणेजवळील खडकवासला जलाशयाची साठवण क्षमता वाढवणे आवश्यक असताना धरणाची उंची न वाढवता त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण क्षमतेचे प्रदर्शन घडवले. १९०३मध्ये विश्वेश्वरय्या यांनी आठ फूट उंच स्वयंचलित गेट्सची प्रणाली शोधून काढली. जेव्हा पाणी पूर्ण पूर पातळीपर्यंत वाढते तेव्हा हे दरवाजे उघडायचे आणि पूर ओसरल्यावर बंद व्हायचे. त्यामुळे धरणाची पूर्ण क्षमता नेहमीच वापरली जायची. त्यांचे हे ‘पेटंट’ डिझाईन नंतर ग्वाल्हेरमधील तिगारा धरण आणि म्हैसूर राज्यातील कावेरी ओलांडून कृष्णराजसागर धरणासह भारतातील इतर अनेक धरणांमध्ये वापरले गेले. त्यांचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे ब्लॉक सिस्टीम ऑफ इरिगेशन (BSI) ही पद्धत होय. ज्यात कालव्यांद्वारे पाणी पुरवठा रोटेशन आणि पुरवठ्याचे समान वाटप समाविष्ट होते. ज्यामुळे पाण्याचा गैरवापर टाळता येणे शक्य झाले होते. या कल्पनेचा डेक्कनच्या कालवा प्रणालीत उपयोग झाला.

वसाहतवादी ब्रिटीश प्रशासनात कार्यरत अस्वस्थ विश्वेश्वरयांनी १९०८मध्ये ४८व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि फ्रीलान्स सल्लागार अभियंता म्हणून काम सुरु केले. दरम्यान आपला दृष्टीकोन विस्तृत करण्यासाठी त्यांनी युरोप प्रवास केला. युरोपहून परतल्यावर हैदराबाद सरकारने त्यांना सल्लागार अभियंता बनण्याची विनंती केली. हैदराबाद शहराला मुसी नदीच्या विनाशकारी पुरापासून वाचवण्यासाठी आणि चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी सिकंदराबाद-हैदराबाद या जुळ्या शहरांतील प्रसिद्ध टँक बंडची योजना तसेच परिसरातील इतर नाल्यांमध्ये वाहणारे पाणी साठवण्यासाठी त्यांनी योजना आखल्या. दरम्यान त्यांना पूर्वीच्या म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून आमंत्रण मिळाले. १५ नोव्हेंबर १९०९रोजी विश्वेश्वरय्या म्हैसूर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. म्हैसूरमधील कार्यकाळात त्यांनी त्यांची दूरदृष्टी आणि अष्टपैलुत्व दाखवून दिले. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी त्यांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प महाराज सर जयचमराजेंद्र वोडेयार यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी झाले. त्यांनी म्हैसूर आर्थिक परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कावेरी खोऱ्याचे सर्वेक्षण केले. म्हैसूरमधील उद्योगांसाठी पुरेशी वीज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कृष्णराजसागर धरणाची रचना करताना विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या स्वयंचलित स्लुइस गेट्सची नवकल्पना वापरली. दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या हे राज्याचे जलद औद्योगिकीकरण करण्यात आणि तेथील नागरिकांसाठी शैक्षणिक संधींचा विस्तार करण्यात यशस्वी ठरले. नीटनेटके, स्वच्छ, कुठेही एकसुद्धा सुरकुती नसलेले धोतर किंवा सूट आणि डोक्यावर म्हैसुरी फेटा (पगडी) घालणे हे विश्वेश्वरय्यांचे खास वैशिष्ट्य होते. ते शिस्तीचे भोक्ते होते. ऑफिसमध्ये कामासंबंधीची गोष्ट आखीव, घाई न करता, व्यवस्थित करणे ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. स्थापत्यशास्त्रज्ञ विश्वेश्वरय्या हे जन्माने मोठे नव्हते ते प्रयत्नाने श्रेष्ठ झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन, उत्साह आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. 

पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणत, ‘He is an engineer of Integrity, Character and Broad National Outlook.’ १ सप्टेंबर १९६१ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवात पंडित नेहरूंनी आपल्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्याच छापाची पोस्टाची तिकिटे चिकटवलेली होती. त्यांनी युवा पिढीला दिलेला संदेश - It is better to worn out than rust out – अर्थात झिजलात तरी चालेल, पण गंजू नका. गंज चढलेले आयुष्य काय कामाचे? त्यांच्या हयातीत त्यांना अनेक सन्मान मिळाले. १९११मध्ये कमांडर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE), १९१५मध्ये नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (KCIE), स्वतंत्र भारताने १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. विश्वेश्वरय्या हे १०१ वर्षे ६ महिन्यांचे वृध्दापकाळ होईपर्यंतचे शिस्तबद्ध जीवन जगले. १२ एप्रिल १९६३रोजी त्यांचे निधन झाले.
भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना मानाचा मुजरा...

धीरज वाटेकर
स्थापत्य अभियंता चिपळूण


‘अभियंता दिन’ पुरवणीची सुरुवात रत्नागिरीतून!

स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘खाजगी अभियंता’ म्हणून जबाबदारी सांभाळून आवड जोपासण्यासाठी आम्ही पत्रकारितेकडे वळलो. २००२साली वार्तांकनासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातील पोफळी वीज मंडळात साजरा होणाऱ्या अभियंता दिन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. तेव्हा कोकणात फारसा कुठे अभियंता दिन साजरा होत नव्हता. असल्यास तो अभियांत्रिकी कार्यालयातील भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याच्या पलिकडे जात नव्हता. पोफळीतील कार्यक्रमाने आमच्या मनात ‘टयॅब्युलर’ आकाराच्या ‘अभियंता दिन’ पुरवणीची बीजे पेरली. तेव्हा कोणत्याही वर्तमानपत्रात एखाद्या विषयावर ‘टयॅब्युलर’ आकाराची किमान आठ किंवा सोळा पानी पुरवणी करणे हे आव्हानात्मक होते. आमचे तत्कालिन सहकारी ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रमोद पेडणेकर यांच्या सहकार्याने आजपासून वीस वर्षांपूर्वी २००३साली १६ पानी ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून आजतागायत रत्नागिरीसह राज्यातील विविध दैनिकात ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध होत असते. मात्र २००३पूर्वी ‘टयॅब्युलर’ आकाराची पुरवणी प्रसिद्ध झाल्याचे आम्ही पाहिलेले नाही.

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

'पर्यावरणप्रेमी' सैनिकी शाळेचे व प्रमुखांचे दर्शन

एका शैक्षणिक संस्थेने प्रयत्नपूर्वक साकारलेली रोपवाटिका पाहाण्याच्या उद्देशाने अचानक योगावर नुकताच आम्हाला हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांच्या आग्रहास्तव, लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव (तालुका हवेली, जि. पुणे) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देण्याचा योग आला. अत्यंत संवेदनक्षम बोलक्या भिंतींच्या या शाळेत सुरू असलेले रोपवाटिकेसहचे संगीत, चित्रकला, घोडा चालविणे, तिरंदाजी, ढोल व ताशा पथक आदी विविध उपक्रम पाहिले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार दीपकजी पायगुडे यांनी शाळेचा संपूर्ण परिसर फिरवून दाखवत माहिती दिली.

आम्ही भेट दिली तेव्हा, संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक ढोल-ताशा पथक सराव शुभारंभ कार्यक्रमाची तयारी करत होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभाचे श्रीफळ वाढवण्याचा मान हा पायगुडे साहेब आणि डॉ. महेंद्र घागरे यांचा असताना तो अनपेक्षित आग्रहामुळे आमच्याकडे आला. उत्साही विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात आमचे दोन तास अतिशय छान गेले. सक्रीय राजकारणापासून बाजूला होऊन वेगळी वाट चोखाळत अविश्रांत परिश्रम करून यशाला गवसणी घालणारा आणि तरुणांना योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक अशी पायगुडे यांची ओळख आहे. त्यांच्या संस्थेतील 'ध्येयपूर्ती दत्तक योजना' ही हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जणू संजीवनी ठरते आहे. 'वृक्ष आमचे संगोपन तुमचे' अंतर्गत ही संस्था मोफत रोपवाटप उपक्रम राबवित असते. नेटक्या नियोजनातून साकारलेले या संस्थेचे समर्पित काम पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. या विद्यानगरीत १४००+ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थाध्यक्ष पायगुडे साहेब हे जणू स्वतः विद्यार्थी बनून इथल्या साऱ्या उपक्रमात रमलेत. शाश्वत काम उभं करण्यासाठी त्यांचं स्वतःला वाहून घेणं खूप काही सांगून जातं. 

त्यांच्यासोबतच्या दोनेक तासात आम्हाला कुठेही संस्था चालकाचा रुबाब दिसला नाही. नवीनतम शिकण्याचा, काही करण्याचा त्यांचा उत्साह, साधी राहणी आणि स्पष्ट विचारांचं कौतुक वाटलं. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या पायगुडे साहेबांसोबत वावरताना आम्हाला, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात त्यांच्याविषयी खोलवर रुजलेला आदर क्षणोक्षणी दिसून आला.

धीरज वाटेकर चिपळूण

रविवार, ३० जुलै, २०२३

शाळेची ‘गरज’ ओळखून कार्यरत शिक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

आकांक्षांची रेलचेल अन
अध्यापनी सचैल उत्कंठा
दृढनिश्चयाने आम्हा शिकविता
अचंबित आपुली पाहूनि दृढनिष्ठा  

कोकणातील चिपळूण तालुक्यातील ‘सुशिक्षितांचे नगर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अलोरे गावच्या मो. आ. आगवेकर माध्यमिक आणि सीए. वसंतराव लाड उच्च माध्यमिक विद्यालयात ‘तंत्रशिक्षण निदेशक’ पदावर कार्यरत राहिलेले शशिकांत शंकर वहाळकर सर आज (३१ जुलै) स्वेच्छानिवृत्त होत आहेत.

कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपल्या मर्यादा पुरेपूर ओळखून अमर्याद काम करण्याच्या ध्यासाने पछाडून जात नव्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नोंद इतिहासाला घ्यावीच लागते. वहाळकर सर हे शैक्षणिक क्षेत्रातील या रांगेतील नाव आहे. खरंतर ‘सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती’ हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील पूर्वनियोजित प्रसंग. सध्याच्या सोशल मिडीयाच्या धबधब्यात सगळ्याच ‘निवृत्ती’ मनसोक्त न्हाऊन निघताना दिसतात. त्यातल्या अगदी मोजक्या निवृत्ती ह्या नव्या ‘प्रकाशमान’ जीवनाचा प्रारंभ करणाऱ्या ठरतात. आपल्या शाळेची अचूक गरज ओळखून कार्यरत झालेल्या वहाळकर सरांची निवृत्ती याच अंगाने जात अनेकांना प्रेरणा देणारी ठरावी.

६ जुलै १९६७ला जन्मलेल्या सरांनी आपल्या जवळपास ३५वर्षांच्या सेवेनंतर वयोमानपरत्वे निवृत्ती कालखंडाच्या दोन वर्ष पूर्व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. पुढील काळात स्वतःला सामाजिक कामात झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीला अनुकूल असाच आहे.

चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेच्या पश्चिमेला जेमतेम हजार-पंधराशे लोकवस्ती असलेलं वहाळ हे सरांचं मूळगाव. तसं त्यांचं मूळगाव गुहागर तालुक्यातील शीर आणि आडनाव ‘काटदरे.’ दीड-दोनशे वर्षापूर्वी ही मंडळी जवळच्या सात गावात विखुरली. वहाळसह आबिटगाव, खांडोत्री, केरं, कळंबट, मुर्तवडे, पातेपिलवली या गावांना ‘सात गाव काटदरे’ अशी संज्ञा आहे. सरांचं बालपण जून्या वाडा पध्दतीच्या घरात गेलंय. त्यामुळे त्यांच्यावर ‘जुनं ते सोनं’ सहज संस्कार झालेत.

व्हॉटसअप पासून अनभिज्ञ असलेले सर अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर त्याच्याशी जोडले गेले. सर स्वत:च्या लिखाणाला ‘वाचकसेवा’ म्हणतात. पण, शाळेच्या विविध विषयात त्यांनी केलेली ही ‘वाचकसेवा’ (पोस्ट) वाचताना त्या केवळ त्यांनीच लिहाव्यात असे वाटावे इतक्या मनाची पकड घेणाऱ्या असतात. ‘मी लेखक नाही’ असं सरळ सांगून टाकणाऱ्या सरांच्या पोस्ट भावनेचा ओलावा धरून असतात. या साऱ्याचा बारकाईने विचार करता सरांशी फक्त आणि फक्त शाळेप्रति असलेली एकरूपता जाणवते. ‘वर्तमानपत्र वाचून झालं की त्याची गणना रद्दीत होते त्याप्रमाणेच आमच्या पोस्टचा भाव २४तासांनी आपोआप पडतो. मात्र आम्ही वाचकांना सतत काहीतरी नवं द्यायच्या हेतूने थांबत नाही. फ्रेश काहीतरी बाजारात आणत असतो.’ आपल्या पोस्टबाबत असं उमदं मतप्रदर्शन सर करतात.

मागच्या उन्हाळी सुट्टीत, शेजारच्यांचे कुरियर त्यांच्या अनुपस्थित सरांच्या फ्लॅटमध्ये देण्यासाठी कुरियरवाल्याने सहजपणे डोकावलं. तर ‘आपण आपल्या सरांच्या दारात आहोत’ याची जाणीव होऊन त्या विद्यार्थ्याने सरांना ओळख सांगितली. सरांनी आपल्या माजी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्याची उठबस केली. सरांनी नंतर सोशल मिडीयावर त्याच्याविषयी ज्या तळमळीनं लिहिलं ते आजच्या काळात शाळेत कार्यरत असलेल्या नव्या पिढीच्या प्रत्येक प्रतिनिधीने आवर्जून वाचावं असंच! भविष्यात अँड्रॉइड’ नावाच्या साधनाचा उपयोग सर जातील तेथे याच एकरूपतेने करतील यात शंका नाही.

वहाळकर सरांना सांगितिक मैफीलीसह गायनाची असलेली आवड सर्वश्रुत आहे. त्यांच्या कार्यकाळात तिचा उपयोग शाळेलाही झालेला आहे. चिपळूणातील स्वरदर्शन कलारत्नचे ते ज्येष्ठ सहकारी आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाला आनंद देणारं हे शास्त्रीय संगीत सरांना महत्त्वाचं वाटतं. ‘...शेवटी गाणं हेच गाण्याचं मोल असतं बाकी सगळं फोल असतं’ असं ठामपणे सांगू पाहाणाऱ्या वहाळकर सरांनी आपल्या अलोरे शाळेची सुवर्णमहोत्सवी पूर्वसंध्या-प्रारंभ एखाद्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या सुश्राव्य गायनाने व्हावी म्हणून जीवाचा किती आटापिटा केला होता, हे सांगण्यासाठी आम्हाला स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

वहाळकर सरांच्या मनातलं संगीत १९९०च्या दशकात अलोरेतील बालकमंदिरात कै. सूर्यकांत सिनगारे आणि कै. गंगाराम बाणे यांच्या सानिद्धयात रुजलं. ‘स्वर अर्पिले तुला रसिका’ या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा शाळेसह, शिंदे कॅन्टीन, करमणूक केंद्र, पोफळी कामगार कल्याण केंद्रातील विविध कार्यक्रमांशी संपर्क आला. ही कला सरांनी इतकी आपलीशी केली की, गावात वहाळला गणेश विसर्जनानंतर करमणूक म्हणून सादर केलेल्या नमन लोकनृत्य कलेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर पाहून गोव्यातील आप्तेष्टांनी एका पारिवारिक कार्यक्रमासाठी त्यांच्या ग्रुपला खास निमंत्रण दिलं होतं. नमनाचा हाच प्रयोग त्यांनी चिपळूणच्या लोककला महोत्सवातही सादर केला होता.

स्पर्धात्मक वापरल्या जाणाऱ्या विविध अॅपच्या अज्ञानातील सुख आणि दु:ख आपल्या खास खुमासदार शैलीत सांगावं ते वहाळकर सरांनीच! ‘ओलाअॅप चालवणं हे गाडी चालवण्यापेक्षा अवघड असावं असा समज करुन घेऊन आम्ही शेअर बाजाराप्रमाणेच यापासून चार हात लांब होतो. तसे आम्ही काळाच्या चार पावलं मागेच राहाणं पसंद करतो. कसं आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा! आम्हाला कोणी वेडयात काढू नये इतकंच!’ त्यांच्या या वाक्यात सारं आलं.

सरांनी मागील तीनेक वर्षात आपल्या फेसबुकवर किमान दोनशे कव्हर इमेज पोस्ट केल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या इमेज त्यांच्याशी व्यक्तिगत संबंधित नसून त्या त्यांच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रातील अनेकांशी जोडलेल्या आहेत. सरांच्या मनाचा हा मोकळेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जणू आरसा आहे.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी, माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी माजी मुख्याध्यापक अरुण मानेसर, मुख्याध्यापक विभावर वाचासिद्ध सर यांच्यासोबत वहाळकर सर पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले. त्यांनी आपल्या या ज्येष्ठ सहकाऱ्यांसह शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विविध माजी विद्यार्थ्यांना शाळेशी पुन्हा जोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि अशा असंख्य ठिकाणी केलेल्या अविश्रांत प्रवास-धावपळीची नोंद अलोरे शाळेचा इतिहास नक्की घेईल. विशेषतः २०१५नंतर त्यांनी आणि शाळेतील विद्यमान सहकाऱ्यांनी ज्या गतीने माजी विद्यार्थ्यांची मोट बांधली त्याच्याच मजबूत पायावर अत्यंत कुशलतेने ‘वाचासिद्ध आणि माने’ सरांनी शाळेचा ‘न भूतो...’ असा ‘सुवर्णमहोत्सवी डोलारा’ उभा करण्यात यश मिळवलं हे वास्तव आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्वात मिश्किल, उत्साही, कलासक्त आणि अत्यंत दिलखुलासपणा जोपासलेल्या वहाळकर सरांची आजची स्वेछानिवृत्ती त्यांच्या जगभरातील असंख्य माजी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक असेल.

शाळा मग ती कोणतीही असो, शिक्षक जेव्हा तिची अचूक गरज ओळखून आपल्यात आपणहून बदल घडवून पूर्ण क्षमतेने कार्यरत होतो तेव्हाच सर्वार्थाने शाळेचा उत्कर्ष होत असतो. वहाळकर सरांनी अलोरे शाळेच्या उत्कर्षात अमूल्य योगदान द्यावे यासाठी त्यांना नियतीने बहाल केलेल्या संधीचे शब्दशः सोने केले. शाळेच्या सुवर्णमहोत्सवी इतिहासात मैलाचा दगड ठरणारे काम उभे केलेल्या वहाळकर सरांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या वाटेवरील या मैलाच्या दगडाचे ‘उद्याचे’ प्रवासी होण्याचे भाग्यदायी दायित्व स्वीकारायला विद्यमान शिक्षकांनी ‘आजच’ पुढे यायला हवे!  

वहाळकर सरांचा संपर्क क्रमांक :: +91 94212 27852

 

धीरज वाटेकर, चिपळूण

माजी विद्यार्थी- बॅच १९९५

मो. ९८६०३६०९४८ 

गुरुवार, २७ जुलै, २०२३

स्व. बापूसाहेब परुळेकर :: उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’

कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे आज, (२७ जुलै) सकाळी वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाल्याचे वृत्त समाजमाध्यमावरून समजले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे नेणारं एक खंबीर वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाल्याची अस्वस्थता मनात दाटून आली. मन भूतकाळात गेले. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी १८ जुलै २००४ रोजी सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने संपन्न झालेल्या ‘जल-जीवन अमृत’ कार्यशाळेत आम्ही लिखित-दिग्दर्शितकेलेली कोयना अवजल : कोकणातील पाणी समस्येवरील एक उपायही टेलिफिल्म प्रथम प्रदर्शित झाली होती. त्याच दिवशी कॉलेजच्या दूरध्वनीवर संपर्क साधून बापूसाहेबांनी आमच्यासाठी, ‘कोयना अवजलच्या सीडीसह येऊन भेटावे’ असा निरोप ठेवला होता.

तेव्हा आमच्याजवळ मोबाईल नव्हते. सावंतवाडीत सुरु असलेल्या कार्यशाळेची माहिती घेऊन जिल्ह्याच्या माजी खासदार राहिलेल्या व्यक्तीने भेटीसाठी निरोप ठेवण्यातील तत्परता पत्रकारितेत वावरत असूनही चौवीस वर्षांच्या आमच्यासाठी एकदम नवीन आणि धक्कादायक होती. त्यानंतर याच विषयाला अनुसरून बापूसाहेबांसोबत आमच्या एक-दोन भेटी झाल्याचे आठवते. गप्पा मारताना विविध घडामोडी सांगण्यातील त्यांची सहजता आणि प्रसन्न शैली अफलातून होती. त्यांची अल्पकालीन खासदारकी जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब होती. या प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्याविषयी आमच्या मनात एक विलक्षण कृतज्ञता निर्माण झाली ती कायमची! अगदी आम्ही लिहिलेल्या आणि अलिकडे बाजारात उपलब्ध झालेल्या, भारत सरकारच्या हाफकिनसंस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तकआमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांच्या जीवनचरित्रातही प्रसंगानुरूप बापूसाहेबांच्या आठवणी नोंदवल्यात. नोव्हेंबर १९७०-७१च्या रत्नागिरी दौऱ्यात अटलजींचे दुपारचे भोजन हे बापूसाहेबांकडे झाले होते. अणीबाणीनंतर जनता पक्षाने, रत्नागिरी लोकसभेसाठी परिचित चेहऱ्याच्या, निगर्वी आणि नम्र स्वभाव असलेल्या बापूसाहेबांना उभे केले होते. तत्पूर्वी १९७१च्या निवडणुकीतही त्यांना जनसंघाने तिकीट दिले होते. तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अणीबाणीनंतरच्या निवडणुकीत बापूसाहेब निवडून आले होते. तेव्हा दोन पोती गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. देशात पहिले बिगर काँग्रेसी सरकार स्थापन होण्यासोबत जयप्रकाश नारायण यांची लढाईही यशस्वी झाली होती. ऑक्टोबर १९७९च्या सातव्या लोकसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून बापूसाहेब पुन्हा एकदा निवडून आले होते. उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपली मोहर उमटवली होती.

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाने स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. ही घटना निवडणूक प्रक्रियेमधील महत्वाची घटना होती. यासाठी लोकसभेमध्ये आपल्या कार्यकाळात आग्रही भूमिका घेण्याचे व तसा अशासकीय ठराव मांडण्याचे काम बापूसाहेबांनी केले होते. जाणकारांमध्ये सतत चर्चा होत राहावी म्हणून या विषयाला लोकसभेत आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने त्यांनी चालना दिली होती. अशी नोंद ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत स्वर्गीय निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांनी आपल्या ‘प्रवाह’ सदरात केली होती. बापूसाहेबांनी १९५१मध्ये स्वतःच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली होती. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात पंडित, नानल, बर्वे, चितळे, जोशी असे मोजके नामांकित वकील होते. जिल्ह्याचे मुख्य न्यायालय रत्नागिरी येथे होते. बापूसाहेबांनी अत्यंत कष्टाने समाजमान्य यशस्वी वकील अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती. बापूसाहेबांच्या घराण्यात चार-पाच पिढ्यांचा वकिली व्यवसाय आहे. राजकीयदृष्ट्या ते संघ-जनसंघाशी जोडले गेले तरी त्यांच्या येथे सर्व विषयांवर वाचन, अभ्यास व व्यासंग सुरु असायचा. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. अणीबाणीतही ते तुरुंगात गेले होते. लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये फिरोज गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोपऱ्यात बापूसाहेब हे तासन् तास बसून अनेक खासदारांसोबत चर्चा करीत असत. १९७७मध्ये ते श्यामरावजी पेजे यांच्यासारख्या बलशाली नेत्याच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक जिंकले होते. जनता पक्षाची राजवट कोसळल्यावर १९८०मध्ये उमर काझींचा पराभव करून ते निवडून आले होते. लोकसभेत सर्व पक्षाच्या खासदारांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. राजीव गांधीही अनेकदा त्यांचा सल्ला घेत असत. स्व. नानांसाहेबांनी लिहिलेल्या या आठवणी स्व. बापूसाहेबांच्या कर्तृत्वावर भाष्य करण्यास पुरेशा आहेत.

१९६०च्या दशकात रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे चेअरमन राहिलेले स्व. बापूसाहेब हे १९७०च्या दशकात रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे अध्यक्ष होते. ते लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनासह अणीबाणी काळात मिसा कायद्यांतर्गत त्यांना १६महिने कारावास भोगावा लागला होता. रत्नागिरीत जनसंघ-भाजपाची पायाभरणी करणाऱ्यांपैकी ते प्रमुख नाव होतं. अनेकांच्या राजकीय जीवनातील आदर्श असलेल्या बापुसाहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवण्यात मोठे योगदान होते. स्व. बापूसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८०६०३६०९४८

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...